मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानसिक डाएट – लेखक : अनामिक  ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆ 

☆ मानसिक डाएट – लेखक : अनामिक  ☆ प्रस्तुती –  अंजली दिलीप गोखले ☆

मानसिक डाएट

ही कन्सेप्ट जरा नवीन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

 

म्हणजे बघाना,

आपलं वजन वाढतं,  

फिगरवर परिणाम होतो,

बीपीच्या गोळ्या सुरु होतात,  

शुगर डिटेक्ट होते.

किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा.. किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.

 

हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.

मी नेहमी सांगत असतो की 

“तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो” 

आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का? जेवढी शरीराला आहे.

आपण जागृत व्हायला हवंय!

 

“इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील“… असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे; 

अवघड आहे असं होणं,

 

मानसिक डाएट म्हणजे काउंसिलिंग नव्हे.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल!

हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं स्वत:च तोंड कडू का असेना,

पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस!

स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते. 

मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.  

– – तर मानसिक डाएट  म्हणजे काय करायचं तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

 

– – तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

– – अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

– – दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु. 

– – दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकून देऊ

– – आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ.

 

या अशा मूल्यशिक्षणाबरोबरच महत्वाचं आहे ते म्हणजे – – 

– – स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक ओळखून स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,

– – दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,

– – दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालू ठेवणं. 

– – मनातलं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,

– – एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं 

… आणि बरंच काही.

 

या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच 

आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळू शकते.

 

माणुस आहे, मनं पण थकतं हो कधीकधी,

– – त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने, आत्मविश्वास! ! !

 

सगळ्यात महत्वाचं कि आपल्या डाएट चे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतात.

– – लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या.

– – तुमच्या चेहर्‍यावरचा ताण कमी होतो,

– – तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.

 

… वास्तविक, मन ओके असेल तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

 

असं ह्या डाएट चं व्रत – – 

– – हे आजच्या सॅन्डविच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.

– – साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

– – शाकाहारी विचार बेस्ट लाईफ देऊन जातील.

 

बदल हा नेहमीच चांगला असतो.

असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना?

– – – कारण गुगलवर “एव्हरेस्ट” बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे 

आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं मनच खरी ताकद देणार आहे..

 

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टपरीवरचा चहा… भाग – २ ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ टपरीवरचा चहा… भाग – २ ☆ राधिका भांडारकर ☆

(चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया. ”) 

इथून पुढे – – 

टपरीभोवती चहा-बाज लोकांची गर्दी होतीच. अनधिकृतपणे का असेना त्या भर गर्दीतही फुटपाथवरच समोरासमोर दोन बाके, बसून चहा पिणाऱ्यांसाठी होती. रस्त्यावरच्याच बोर्डवर खडूने चहाबाबतचा मेनु लिहिला होता किंमतींसह. गुळाचा चहा, साखरेचा चहा, बिनसाखर चहा, आलं गवतीचहा, वेलदोडा चहा वगैरे. फुल कप, हाफ कप, कटींग असेही शब्द वाचायला मिळाले. माझ्यासाठी खरोखरच हे सगळं अनोळखी, गंमतीदार होतं.

वंदना अगदी सराईतपणे त्या चहावाल्या जवळ जाऊन म्हणाली, “भैय्या दो कप कमशक्करवाली चाय दो. ” खरं म्हणजे चहावाला मराठी माणूसच होता पण वंदनाने कदाचित सवयीने त्याला “भैय्या” म्हटले असणार. या उत्तर प्रदेशीय लोकांचं वर्चस्व महाराष्ट्रात किती आहे हे सहज जाणवलं.

दणदण गॅस स्टोव्ह पेटलेला आणि त्यावर मोठ्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळणारा चहा. ऑर्डर प्रमाणे तो दूध, पाणी, चहाची पत्ती, काही आस्वाद वाढवणारे मसाले एकापाठोपाठ एक भराभर टाकत होता आणि एका डवल्याने ते सर्व मिश्रण खालीवर इतकं काही लयीत ढवळत होता की ते पाहताना माझ्या मनात सहज आलं, ” काम कुठलेही असो, कुठेही असो पण त्यातली तल्लीनता, एकाग्रता महत्त्वाची. शिवाय ग्राहकांची खुशी ही विक्रेत्यांच्या यशाची गुरू किल्ली! हेही जाणवलं चहाची ही टपरी नक्कीच लोकांची आवडती जागा असेल. काही लोक उभे होते. काही बाकावर बसले होते पण एक कपभर लज्जतदार चहासाठी त्यांच्यात असलेली थांबण्याची चिकाटी कौतुकास्पद होती. तिथे असलेल्या सर्वांसाठीच तो एक मस्त स्पेस टाइम होता. तिथे राजकारणावरच्या चर्चाही घडत होत्या. मतं मांडणारा प्रत्येक जण जणू काही त्या विषयात त्याच्या इतकं पारंगत कुणीच नव्हतं अशा अविर्भावात होता. घरापासून दूर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी तिथे श्रमपरिहारासाठी थांबले होते. त्यांच्यात आगामी परीक्षांविषयी, शिक्षण पद्धतीविषयी, ऐकायला मिळत होतं. कुणाला सरकारी दिरंगाईमुळे हवी ती ओळखपत्रे मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भविष्याची काळजी होती. त्याच जमावात पुणं पाह्यला आलेले पर्यटकही होते. त्यातले काही ज्येष्ठ पूर्वीचं आणि आजचं पुणं यावर बोलता बोलता मानवाचं सारंच जीवन कसं यांत्रिक झालं आहे यावरची खंतही व्यक्त करत होते. मग विकास, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, हरित वायू, जागतिक परिषदांपर्यंत ते युद्धांपर्यंत सर्व विषय घुसळले जात होते. या व्यतिरिक्तही अनेक विषय होते. ती केवळ चहाची टपरीच नव्हती तर एक भलीमोठी गाव चावडी होती असे मला वाटले. एक चालतं बोलतं मुक्त बातमीपत्रच म्हणाना. लोकशाही तत्त्वांचं प्रतीकच जणू काही!

इतक्या सर्वांसाठी चहा बनवणारा तो चहावाला मला खरोखरच एक महात्मा वाटू लागला. त्या चहातलं एकतत्त्व या वैविध्यपूर्ण, वेगवेगळ्या स्वभाव जाती धर्मातल्या जनसमूहात आनंदमयी होउन, उर्जा बनून एकवटलं होतं. वंदना मला सांगत होती, ” अगं! पुण्यातली ही “माऊली चहा टपरी” अनेक वर्षांपूर्वीपासून आहे बरं का? टपरीचं थोडंफार आधुनिकीकरण झालं असेल पण बाकी सारं अगदी ४०/५० वर्षांपूर्वी होतं तसंच आहे. चहाची चव सुद्धा बदललेली नाही. आता तिसरी चौथी पिढी असेल पण या कामात त्यांच्या कुटुंबातलीच माणसं आहेत. इथे तुला एकही बालकामगार दिसणार नाही. गरजूंना रोज मिळतो. मात्र. हा मुलगाही पदवीधर आहे पण याच पारंपरिक व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. नाही तरी नोकऱ्या कुठे मिळतात? हा व्यवसाया उत्तम! या क्षणी माझ्या मनात विचार येत होता की बहुसंख्य चहाप्रेमी लोकांची गरज ओळखून या व्यवसायाची परंपरा सांभाळणारे हे खरोखरच थोर लोक नाहीत का? काम हीच प्रतिष्ठा असते. या व्यवसायांद्वारे इतकी सधनता प्राप्त करूनही त्यांनी या टपरीचे चांगल्या हॉटेलमध्ये का नाही रूपांतर केले?

पण तसं नसतं.

इथे एक मानवी मानसशास्त्र असतं. टपरीवरचा चहा आणि चहा पिणारे यांची भावनिकता ही या टपरीशीच परंपरेप्रमाणे जोडलेली असते. तो आनंद, ती भावनिकता, ते वातावरण आणि तो स्वाद जपणं हा त्यामागचा प्रयत्न आणि हेतू असावा. शिवाय टपरी चहा ही एक आगळीवेगळी संस्कृती आहे.

टपरीवर चहा पिण्याचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता. तो कडक, सुगंधी, मसालेदार, वाफाळलेला कपात ओसंडून बशीत सांडलेला चहा मला चहापानाचा एक वेगळाच आनंद देत होता जणू काही मी त्या वातावरणातला एक भाग बनले होते आणि ते फीलिंग मला आवडत होतं. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, स्टेडीअममध्ये जाऊन क्रिकेटची मॅच पाहणे आणि टपरीवरचा चहा पिणे यातला आनंद एकाच जातीचा आहे असेच मला वाटले. चहापानाची माझी चौकट मी मोडली होती पण या निमित्ताने मी मानवी जीवनाचं एक वर्तमानपत्र जणू काही वाचत होते.

म्हटलं तर तो एक उनाड दिवस होता पण त्या उनाड दिवसांने मला एक वेगळी दृष्टी मात्र नक्कीच दिली. जीवनातली ही रांगडी सार्वजनिकता मला मजेची वाटली. असेही जगावे..

वंदनाने रिक्षानेच मला एका सोयीच्या वळणावर सोडले. उतरताना मी तिचा हात धरला आणि म्हटले, ” थँक्यू वंदना! आज मला खूप मजा आली. “माऊली अमृततुल्य चहा” प्यायला आपण परत या टपरीवर नक्की जाऊया.” 

 समाप्त –

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकल्प आणि सिद्धी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ संकल्प आणि सिद्धी ☆ उज्ज्वला केळकर

संकल्प करणे, म्हणजे एखादी गोष्ट नियमितपणे, न चुकता, खंड पडू न देता करणे. मला लहानपणापासून संकल्प करण्याचा नाद होता. मी ५वी-६वीत असेन तेव्हा. आम्ही मैत्रिणींनी नवं वर्षाचा संकल्प केला, पहाटे उठायचं. फिरून यायचं. मग तासभर अभ्यास करायचा. मग नेहमीच रूटीन. ३-४ दिवस तसं केलंही. त्यानंतर मात्र आमचा संकल्प आमच्यासारखाच ऊबदार पांघरुणात गुडूप झाला. मैत्रिणींना विचारलं, ‘तुम्ही जाता का रोज फिरायला? ’ त्यांचंही माझ्या सारखंच झालं होतं. ४-५ दिवसात सगळ्यांचाच संकल्प गारठून गेला होता.

शाळेत असताना, मी दरवर्षी जूनमध्ये संकल्प करी, की यंदा गृहपाठ वेळच्या वेळी आणि घरीच करायचा. काही आठवडे, महिने ते सुरळीत चालू राही. पुढे पुढे कधी नवीन छान पुस्तक मिळालं म्हणून, टी. व्ही. ची सिरिअल चांगली आहे म्हणून, बऱ्याचदा झोप आलीय म्हणून, गॅदरिंगच्या वेळी कार्यक्रमाची प्रॅक्टीस म्हणून यात खंड पडत जाई आणि माझा संकल्प गडबडून जाई. मग शाळेत थोडं लवकर येऊन, कुणाचं तरी पाहून गृहपाठ पूर्ण करायची लगबग चालू व्हायची. किंवा गृहपाठ मोठा असेल, तर तो न होण्यामागची खरी-खोटी कारणं शोधायची. पण एवढं मात्र खरं, मी दर वर्षी, जूनमध्ये नव्या उत्साहाने हा संकल्प करायचीच!

शाळेत असताना मी एकदा संकल्प केला. होय, ८वीत असेन बहुधा मी तेव्हा, शाळेत कधीही कुणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांनी ‘मिलनसार’ मुलगी म्हणून माझं कौतुक केलं पाहिजे. बरेच दिवस हा संकल्प निभावला. कारण ठरवलं होतं, भांडणं झाली, तरी आपण नमतं घ्यायचं. आपली चूक नसली तरी… एकदा वार्षिक क्रीडा सामने चालू होते. ८अ विरुद्ध ८ब ‘खो खो’ची मॅच होती. आम्ही दोन्ही वर्गातल्या मुली भवतीनं गोल करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होतो. आमच्या वर्गाच्या टीमची कॅप्टन मीना. छानच खेळत होती. मी म्हंटलं, ’काय छान खेळतेय मीना! ’ माझ्या शेजारीच ब वर्गातली मधुरा उभी होती. ती म्हणाली, ‘नीता जास्त चांगली खेळतेय! ’ मी म्हंटलं, ‘नाही मीनाच जास्त चांगली खेळतेय. ’ ‘मुळीच नाही नीता… ‘ मीना… नीता… मीना… नीता… ’ आणि जुंपलीच की आमची. मॅच संपली मीना-नीता गळ्यात गळे घालून खो खोच्या मैदानातून बाहेर आल्या. आमचं आपलं ‘मीना… नीता… ’ चालूच. मग काय माझ्या संकल्पाची झाली ना ऐशी न् तैशी!

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर संकल्प केला, आता स्टडी रूममध्ये फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची किंवा संदर्भ ग्रंथ बघायचे. पण काऊंटरवर एखादा देखणा कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी दिसली की आपोआपच ती पुस्तके चाळली जात. आणि नकळतच त्यातले पुस्तक नोंद करून घेतले जाई आणि मी बैठक जमवून वाचायला सुरुवात करी. पानामागून पाने उलटली जात आणि संकल्प बिचारा बापुडवाणा होऊन मान खाली घालून बसे.

याच वयात काही कविता आवडणार्‍या आणि करणार्‍यासुद्धा काही मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्यांनी संकल्प केला, रोज एक कविता करायची. पहिले दोन –तीन दिवस काही तरी नवे नवे सुचत गेले. नंतर नंतर काही सुचेना. कविता संग्रह चाळून चाळून नवीन विषय शोधत राहिलो. ‘र ला र आणि टला ट’ जुळवून कविता करत राहिलो. मग तेवढेही जमेना. भवतीनं अनेक विषय दिसत होते. सुचतही होते, पण ते कवितेत यायला मात्र तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने रोज एक कविता करायची, निदान चार ओळी तरी लिहायच्याच, या संकल्पाला पूर्णविराम द्यावा लागला. तशी अजूनही मी कविता करते म्हणा, पण रोज एका कवितेचं सृजन व्हावं, अशी प्रतिभा देवाने नाही दिली.

एकदा संकल्प केला रोजनिशी लिहायची. रोज जे घडलं, ते लिहून ठेवायचचं. अनेक थोरा-मोठ्यांनी रोजनिशा लिहीलेल्या आहेत. त्यातल्या काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात छापूनही आल्या आहेत. मग मी १ जानेवारीपासून मोठ्या उत्साहाने रोजनिशी लिहायला लागले. वाटलं, न जाणो आपल्याही रोजनिशीला हे भाग्य लाभेल. पण ८-१० दिवस रोजनिशी लिहिल्यावर लक्षात आलं, सकाळी उठले. कॉलेजमध्ये गेले. स्टडीत बसून आभ्यास केला. घरी आले. जेवले. टी. व्ही. बघितला. झोपले. रोज तेच ते. तेच ते. कधी बदल म्हणजे तास बुडवून टेबल-टेनीस खेळले. किंवा ‘मॅटिनीला ‘प्यासा‘ बघायला गेले. चित्रपटाने भारून टाकले. गाणी तर… अहाहा… कधी तरी बदल म्हणजे, आज अभ्यास सोडून कथा-कादंबार्‍या वाचते, म्हणून बाबा रागावले. नवीन ड्रेस घ्यायला आई नाही म्हणाली, म्हणून मी रूसले. असे सटर फटर बदल. शेवटी तेच तेच लिहून मी इतकी कंटाळले, की माझं रोजनिशी लेखन मी थांबवलंच!

लग्नं झालं. नव्या नवलाईचे अद्भूतरम्य, स्वप्नील वगैरे, ‘तू म्हणशील तसं’ म्हणायचे दिवस सरले. वास्तव जीवनात ‘मी म्हणेन तसं’ असं ‘तू.. तू… मैं… मैं’ चालू झालं. ‘नळ का बंद केला नाहीस? दिवा का मालवला नाहीस? ’ अशा साधा साध्या प्रश्नांवरून वाद झडू लागले. त्यातून भांडणे होऊ लागली. या वादा-भांडणाला कंटाळून मी एकदा संकल्प केला, की नवर्‍याशी अबोला धरायचा. बोललंच नाही, तर वाद- भांडणं होतीलच कशी? टाळी एका हाताने थोडीच वाजते? दोन दिवस अबोल्यात गेले. तिसर्‍या दिवशी हे ऑफीसमधून सांगत आले, ‘आज रात्री तुझे आई-बाबा आपल्याकडे येताहेत. आठवडाभर रहाणार आहेत. त्यांचं काही काम आहे. आता त्यांच्यादेखत न बोलता कसं रहाता येईल? विचारल्या प्रश्नांची उत्तरे तरी नकोत का द्यायला? झालं! माझा अबोला बोंबलला.

नेहमीसारखा संसार सुरू झाला. दोन गोजिरवाणी मुले झाली. राकेश आणि रिया. मुले हळू हळू मोठी होऊ लागली. आमच्या दोघांऐवजी मुलांच्यात तू… तू… मैँ… मैँ… सुरू झालं. बालमानसशास्त्र अभ्यासलेली मी… मी ठरवलं होतं, इतर बायकांसारखं आपल्या मुलांवर ओरडायचा नाही. त्यांना मारायचं नाही. त्यांच्याशी गोड बोलून त्यांना समजववायचं. पण माझ्या वागण्याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी, मुलं जास्तच दाणगट, हट्टी, आक्रमक झाली. उद्धटपणे उलट उत्तरे देऊ लागली. शेवटी व्यवहारात प्रत्ययाला आलं, ‘लाथों के भूत बातों से नाही मानते. ’ शेवटी बलमानसशास्त्राचं पुस्तक मनाच्या कपाटात मिटून ठेवलं आणि भांडणार्‍या मुलांना बाजूला करत चार दणके दिले. तेव्हा ती गप्प झाली. आई रागावतीय म्हंटल्यावर त्यांचा हटवादीपणाही कमी झाला. थोडक्यात काय माझा दीर्घकालीन संकल्प, पावसाळयातल्या भूछ्त्र्यांप्रमाणे उगवला आणि मावळला.

राकेशची मराठीची टेस्ट होती. मी त्याचा अभ्यास घेत होते. बाबा आमट्यांवरचा धडा होता. त्यावरचे काही प्रश्न त्याला विचारता विचारता, माझ्या एकदम मनात आलं, आपल्यासारख्या सामान्यांचे संकल्प सिद्धीला न जाण्यासाठीच असतात. पण काही महात्मे असे असतात, की कितीही अडचणी येवोत, परिश्रम होवो, ते आपल्या संकल्पापासून जराही ढळत नाहीत. बाबा आमटे यांनी केलेला संकल्प, महारोग्यांना स्वावलंबी बनवणे. खूप त्रास सहन करावा लागला त्यांना, पण ओसाड जमिनीवर आंनंदवन फुलावलंच त्यांनी! अगदी कुष्ठरोग्यांच्या हातांनी.

मग एकदम हेलन केलर आठवली. मुकी, बहिरी आणि आंधळी. तिच्या शिक्षिकेने अ‍ॅना सुलिव्हनने तिच्या मनात वस्तूंची संकल्पना निर्माण करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, वाचूनही थक्क व्हायला होते. पण तिने संकल्प केला आणि अखेर तो सिद्धीस नेला. तिची जिद्द आणि हेलनचे प्रयत्न, याबद्दल अनेक साहित्यिकांना लिहिल्याशिवाय राहवले नाही. वी. वा. शिरवडकरांनी तर अ‍ॅनाला किमयागारच म्हंटलय॰ हेलन ही अंध, बाहिरी असूनही तिने पदवी मिळवली. पुढे ती व्यख्याती, उत्तम लेखिका, अंधांसाठी आणि बहीर्‍यांसाठी वकील म्हणून काम केले. पुढे अनेक अंधांना तिने ब्रेल लिपीचे धडे दिले.

नेहमीसारखा संसार झाला. उतारालाही लागला. अधून मधून मला नवे नवे संकल्प करण्याची हुक्की येते. मी नव्या उत्साहाने ते करतेही पण… नित्यनेमाने होणार्‍या पानगळीप्रमाणे ते गळून पडतात. माझे संकल्प हा घरात आता चेष्टेचा विषय झालाय. मुले दर वर्षी न चुकता १ ज्ंनेवारीला विचारतात, ‘आई, यंदा कोणता संकल्प करणार आहेस तू? ’ मी तितक्याच खेळीमेळीने उत्तरते, ‘बघू या. ठरवलं नाही अजून! ’

असाच एक संकल्प. मुलं आता मोठी झालीत. त्यांना सगळं कळतं. त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात. त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काही विचारायचा नाही. काही सांगायचं नाही. रागावायचं तर नाहीच नाही. पण मुले शिस्तीच्या नावाखाली, त्यांच्या मुलांना बोलली, रागावली, कधी मारलंसुद्धा… नातवंडांचे चेहरे हिरमुसले झाले, की मग पडावं लागतंच ना मधे? अखेर, संकल्प महत्वाचा की नातवंडे महत्वाची? परिणाम काय? संकल्प सिद्धी नाही.

यंदा मात्र नव वर्षाला मी असा संकल्प केला आहे, की सिद्धीला जाईलच जाईल. कोणता संकल्प विचारताय? अहोsss यापुढे कधीही संकल्प न करण्याचा संकल्प केलाय मी यंदा!

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ जगणं जेव्हा ‘नाम’ बनतं… – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ जगणं जेव्हा ‘नाम’ बनतं… – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

कधी कधी आयुष्याच्या वाटेवर अशी काही माणसं भेटतात की, त्यांच्या साधेपणातच एक विलक्षण तेज दडलेलं असतं. ते तेज शब्दांत मावणारं नसतं. ते अनुभवावं लागतं. अशा व्यक्तींना भेटल्यानंतर आपला खुजेपणा आपल्याला जाणवायला लागतो. अशाच एका अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी काही दिवसांपूर्वी भेट झाली… माँ कोंडाळकर आजी!

वय वर्ष ८५…सडसडीत बांधा पण शरीरात विलक्षण चैतन्य, चेहऱ्यावर प्रसन्न शांतता आणि डोळ्यांत अपार श्रद्धेचा उजेड. स्मृती आणि श्रवणशक्ती अत्यंत उत्तम. भूक लागणे हा निसर्गनियम आहे. परंतु या निसर्ग नियमावर मात करून त्याच्या विरुद्ध जगणारी काही उदाहरणे मी माझ्या आकाशझुला पुस्तकात एका लेखात दिली होती. त्यापैकी एक होत्या पश्चिम बंगालमधील प्यारी बाई आणि दुसरे उदाहरण होते गुजरातमधील एका बाबांचे. ज्यांना लोक चुडीवाले माताजी म्हणून ओळखत असत. आता ते दोन्हीही हयात नाहीत. परंतु त्या दोघांनी अन्नपाण्याशिवाय कित्येक दिवस काढले ही गोष्ट खरोखरच अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी होती. युरोपातील देखील एक संत महिला अशाच प्रकारची होती.

परंतु अशा व्यक्तींचे उदाहरण मला प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि त्यांच्याशी भेट होऊ शकेल असे कधी वाटले नव्हते. परंतु माँ कोंडाळकर यांना भेटलो आणि खरोखरच खूप धन्यता वाटली. त्यांचं नाव ताराराणी. पण सगळे त्यांना माँ म्हणून हाक मारतात. त्यांच्या आहाराबद्दल ऐकलं आणि आश्चर्यचकितच झालो. आठ वर्षांपासून त्या फक्त दोन केळी आणि थोडं दूध यावर जगत आहेत. हे ऐकताना प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटतं. वारीत तर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. तरी देखील दुपारी फक्त दोन केळी त्या घेतात. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही आहार त्या घेत नाहीत. पण त्यांच्यासमोर बसल्यावर जाणवतं की, शरीराच्या गरजा मर्यादित केल्या की आत्म्याची शक्ती किती व्यापक होते! शरीरात ऊर्जा केवळ अन्नामुळे येते असा आपला समज असतो. परंतु तो या माउलींनी खोटा ठरवला आहे श्रद्धेचे बळच त्यांना जगण्याची ऊर्जा देते. केवळ दोन केळी आणि दूध एवढाच आहार त्यांना या वयात देखील संपूर्ण वारी पायी करण्याएवढी ऊर्जा प्रदान करतो हे केवढे आश्चर्य!

त्यांच्याशी भेटायची उत्सुकता मला आधीपासूनच होती. माझ्या मुलीच्या सासूबाईंमार्फत त्यांच्याबद्दल ऐकलं आणि मग एक दिवस मी, माझी पत्नी श्रद्धा आणि मुलीचे सासू-सासरे असे आम्ही चौघं त्यांना भेटायला गेलो. पुण्यातील महात्मा सोसायटीत त्या राहतात. त्यांची भेट झाली आणि मी अक्षरशः भारावून गेलो.

त्यांचं आयुष्य म्हणजे एक अखंड वारी आहे. त्यांना कळायला लागल्यापासून त्या वारी करीत आहेत. आजपर्यंत एकही वर्ष त्यांनी पंढरपूरची वारी चुकवलेली नाही. वारीला जाण्याआधी त्या आळंदीला जातात, तिथून वारीसोबत पंढरपूर, आणि परत येतानाही जेव्हा इतर लोक वाहनाने येतात, तेव्हा त्या मात्र पायीच परत येतात. पुन्हा आळंदीला जाऊन दर्शन घेऊनच वारीची सांगता! सदानंद महाराज आळंदीकर हे त्यांचे गुरु! गुरूंनी अनुग्रह दिला आणि गुरूकडून घेतलेले नाम त्यांनी आयुष्यभर जपले आणि जपत आहेत.

त्या सांगत होत्या, ” वारी म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यात खूप शिस्त असते. कोणी शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला वारीतून काढून टाकतात. परंतु तिथे खूप मजा सुद्धा असते. तिथं कोणी कोणाला काही म्हणत नाही. सगळे एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. ‘माऊली चला… माऊली या…’ असं म्हणताना सगळा अहंकार गळून पडतो. ” वारीत अभंग, भजन किंवा गवळणी म्हणताना आजही या वयात त्या एखाद्या लहान मुलीसारख्या रममाण होऊन नाचतात. नाचताना सगळं काही विसरून जातात.

खरंच… ‘माऊली’ या एका शब्दातच समतेचा आणि प्रेमाचा एक विलक्षण सुगंध दडलेला आहे! आपल्या वागण्याबोलण्यामुळे वारीत त्या सगळ्यांच्या माऊलीच झाल्या आहेत. वारीत, आळंदीला आणि पंढरपूरला सगळेजण त्यांना माँ या नावानेच संबोधतात.

त्यांची दिनचर्या ऐकली की आपण थक्क होतो. रात्री सात-साडेसातला निजणं… आणि पहाटे तीनला उठणं! त्या स्वतः सांगतात, “रात्री नामस्मरण करताना केव्हा झोप लागते ते कळतही नाही. ” पहाटे उठल्यावर पुन्हा नामस्मरण, भजन-कीर्तन… सकाळी सहाला राजाराम पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनपूजन… साडेआठला परत… दुपारी ज्ञानेश्वरी, गीता, तुकाराम गाथा, विष्णू सहस्त्रनाम यांचे वाचन… आणि दिवसभर नामात रममाण!

घरात दोन मुलं, सुना, नातवंडं—सगळा संसार आहे; पण त्या त्यात कणभरही हस्तक्षेप करत नाहीत. संसारात असूनही त्या अलिप्त आहेत. संसारात राहून अलिप्तपणे जगणारी आणि आपल्या साधनेत गढून गेलेली ही योगिनी आहे. त्या स्वयंपाकघरात चुकूनही डोकावत नाहीत. समोर काहीही अगदी त्यांचा आवडता पदार्थ ठेवला तरी त्या घेत नाहीत. मंदिरात प्रसादाचा पेढा मिळाला तरी तो स्वतः न खाता दुसऱ्याला देतात!

त्यांच्या आयुष्यात दानधर्मालाही तेवढंच महत्त्व आहे. वारीत त्या एक दिवस सर्व वारकऱ्यांना आपल्या वतीने भोजन देतात. “दानधर्म केला पाहिजे, ” हे त्यांचं ठाम मत आहे.

त्यांच्या बोलण्यात एक सहज विनोदही आहे. त्यांनी सांगितलेला एक प्रसंग तर अतिशय गमतीदार होता. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी त्या कोथरूडला राहत होत्या. बहुधा थंडीचे दिवस असावेत. पहाटेच्या अंधुक प्रकाशात पांढरे केस, पांढरे कपडे घालून त्या बाहेर पडल्या होत्या. एका टेम्पोवाल्याने त्यांना पाहिलं आणि त्याला वाटलं भूतच आहे! तो एवढा घाबरला की त्याने गाडी एका बाजूला घेऊन थांबवली. आजी त्याला समजवायला पुढे गेल्या, तर तो आणखीच घाबरला! मग थोडे उजाडेपर्यंत त्यात तशाच थांबल्या. शेवटी उजाडल्यावर त्यांनी खिडकीवर टकटक करून सांगितलं, “बाळा, घाबरू नकोस… मी आजी आहे! ” पण भीतीमुळे तो माणूस अक्षरशः ओलाचिंब झाला होता.

ही गोष्ट सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य मनात घर करून राहत होतं.

त्यांच्या श्रद्धेची खोलीही तितकीच विलक्षण आहे. मीराबाई, जनाबाई यांची उदाहरणं देताना त्या म्हणाल्या, “श्रद्धा अशी असावी! नाम हीच इस्टेट आहे. आपण ती वापरली, तर देवाला आपली काळजी घ्यावीच लागते! ”

त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा बाणेरला राहतो आणि धाकटा त्यांच्याजवळच महात्मा सोसायटीत असतो. त्यांचे नाव सतीश. या सतीशदादांना आम्ही भेटलो. सतीशदादा म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व! त्यांच्याशी थोड्या गप्पाही झाल्या. आपल्या आईबद्दल बोलताना ते म्हणाले की आठ वर्षांपासून ती काहीही खात नाही. आमच्या घरात सर्वजण माळकरी आणि शाकाहारी आहेत. सकाळी आपल्या आईला विठ्ठल मंदिरात घेऊन जाण्याचे आणि परत आणण्याचे काम सतीशदादा आनंदाने करतात.

माँ यांनी आपल्याजवळील सर्व पैसे, दागदागिने मुलांमध्ये वाटून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, ” सोने आणि रूपे आम्हा मृत्तिकेसमान. सोन्याची, धनाची, पैशाची कोणतीही आसक्ती त्यांनी ठेवली नाही. ” बोले तैसा चाले “या उक्तीप्रमाणे वागणाऱ्या त्या आहेत. देह सुटल्यानंतरही कोणाला आपला त्रास नको म्हणून मुलांना त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलं की, तिरडी, लाकूड काही नको… थेट विद्युत दाहिनीमध्ये माझे अंत्यसंस्कार करा! देहाबद्दलचे प्रेम आणि देहाची आसक्ती भल्याभल्यांना सुटत नाही. पण इथे त्यांची विरक्ती स्पष्टपणे दिसून येते.

ही विचारांची स्पष्टता… ही अलिप्तता… आणि तरीही सगळ्यांवर असलेलं प्रेम! मला वाटतं हेच खऱ्या अध्यात्माचं लक्षण असावं.

निघताना माँ ना सहज विचारलं. परमेश्वराचा एखादा साक्षात्कार आपल्या अनुभवास आला आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या मी ८५ वर्षाची आहे. फक्त दोन केळी आणि थोडे दूध एवढाच आहार आहे. या देहाला तो भगवंत दरवर्षी वारीला घेऊन जातो आणि सुखरूप परत घेऊन येतो हा मोठा चमत्कार नाही का? खरंच आहे. हे तर माझ्या लक्षात आलंच नव्हतं. मी निघताना पुन्हा एकदा त्या माउलीच्या पायावर नतमस्तक झालो.

त्यांच्याकडून निघताना एक वेगळीच शांतता मनात उतरली होती. जणू काही आतल्या गोंधळावर कोणीतरी अलगद हात फिरवला होता…”रामकृष्ण हरी “हा जयघोष मनात सुरु होता.

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टपरीवरचा चहा… भाग – १ ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ टपरीवरचा चहा… भाग – १ ☆ राधिका भांडारकर ☆

जरा विमनस्क अवस्थेतच होते. एकाएकी रुटीनचा कंटाळा आला. जीवनात नव्याने काही करण्यासारखे उरलेच नाही असंच वाटायला लागलं. तोचतोचपणामुळे एक प्रकारची निरसता मनाला व्यापून राहिली. प्रत्येकाची एक वेगळी चौकट ही असतेच. चौकटीच्या बाहेर काहीतरी करणे यात नक्कीच थ्रिलिंग असावं किंवा मौज असावी. अशा काहीशा विनाकारणच्या भग्नावस्थेत असतानाच वंदनाचा फोन आला. वंदनाला मी “गडगडाटी”च म्हणते. साध्या साध्या गोष्टीतही तिचा उत्साह प्रचंड ओसंडत असतो. खरं म्हणजे आमची दोघांची व्यक्तीमत्त्वे भिन्न असली तरी आमची मैत्री मात्र घट्ट आहे.

पलिकडून म्हणाली, “काय करतेस आज? थांब! काहीच करू नकोस. माझ्याकडे आज मस्त प्लॅन आहे. “प्रार्थना” मध्ये नवा स्टॉक आलाय, सेल पण आहे आणि हो हो तुझा आवडता चहा. तिथे जवळच माऊली अमृततुल्य चहाची टपरी आहे. मला माहीत आहे, तुला टपरीवर चहा प्यायला आवडत नाही. आरोग्यव्यवस्था वगैरे वगैरे पण एकदा पिऊन तर बघ. “होश उड जायेंगे तेरे” आणि तुझ्या त्या साऱ्या सोफिस्टिकेटेड चौकटी मोडून टाक बरं का एक दिवस तरी आणि काय आश्चर्य? मी पण तिला हो म्हणूनच टाकले. ”चालेल. जाऊया. कुठे भेटूया वगैरे आमचे फोनवरच ठरले.

वंदनाचं एक वैशिष्ट्य आहे ती कधीही ब्रँडेड दुकानात अथवा शोरूम वगैरे सारख्या ठिकाणी खरेदी करणारच नाही. “प्रार्थना” सारख्याच भर गर्दीतली टपरी वजा दुकानातच ती खरेदी करते.

“अगं! अशा ठिकाणी ओव्हरहेड खर्च नसतात म्हणून. तू जो ड्रेस मॉलमध्ये घेतेस ना तो इथे निम्म्या किमतीत मिळतो अगदी त्याच क्वालिटीचा. ” असेच ती नेहमी म्हणत असते आणि ते खरे ही असल्याचे मला जाणवलेले आहे. वास्तविक ही एका प्रथितयश उद्योगपतीची बायको आहे बरंका? पण विनाकारण जास्तीचे पैसे का खर्च करायचे हे तिचे तत्त्व!

टपरीवरच्या चहाबाबतीतही तेच. “अगं एकदा तरी सोड ना तुझी किटली, शृंगारिक कपबशी वगैरे. कंटेनर पेक्षा आतला पदार्थ महत्त्वाचा नाही का! काय भारी असतो गं माऊलीचा चहा! सुगंधी खऱ्या अर्थाने उत्तेजित करणारा! अहाहा! तुझ्या ताज संस्कृतीची ऐशी की तैशी! ”

तर असा हा चहा.

चहा नावाचं हे उत्कट पेय ज्याने शोधून काढलं त्याचे मी पहिले आभार मानते. त्यामागचा इतिहास काही असेल. ब्रिटिशांच्या काळात एका इंग्रज माणसानेच चीन मधून चहाचे रोप भारतात आणले आणि हळूहळू भारतात चहाचे मळे फुलले.

तशी चहाची परंपरा अश्मयुगापासून आहे म्हणतात. एकदा जंगलात फिरणाऱ्या माणसाने गरम पाण्यात एक वनस्पती टाकली. पाण्याचा रंग बदलला, सुगंध दरवळला आणि न राहवून तो ते पेय प्राशन करता झाला. हे अनोळखी पेय पिताच त्याला विलक्षण ऊर्जा जाणवू लागली आणि त्याने सारी वस्ती जमा करून हे पेय सर्वांना प्यायला लावले. तोच हा चहा.

माझ्या आयुष्यात तसा फार उशिरा आला. खात्रीशीर गवळ्याने आणून दिलेलं नुकतंच काढलेलं, पांढरं शुभ्र, फेसाळ दूध गरम करून रोज सकाळी ग्लासभर पिण्यातच माझं बालपण गेलं पण मोठी माणसं पितात त्या चहापासून मी वंचितच राहिले. बुद्धी, मेंदू स्मरणशक्तीस धोकादायक म्हणून चहा वर्ज्य पण जीवनाच्या पुढच्या पर्वात सायनस, मायग्रेन, पचनसंस्था असहकार, थकवा, मानसिक ताण यामुळे चहा जवळ आला आणि तो आयुष्यभर मस्त एक सवंगडी बनवून व्यापून राहिला. मात्र या चहापानासोबत माझे काही नखरे आहेत बरं का? एक तर मला कान तुटलेली, जराशीही फुटकी कपबशी अजिबात चालत नाही. चहा कसा मस्त हलकीशी डिझाईन असलेल्या शक्यतो सफेदच सोनेरी कड असलेल्या कपात आणि साजेशा बशीसोबत असला की चहा पिण्याची लज्जत वाढते. शिवाय मला थेट कपात डळमळत आणलेला, बशीत सांडलेला चहा प्यायला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मला देखणी किटलीही लागतेच. तर असे सगळे नखरे सांभाळतच मी चहाचा खरा आनंद (माझ्या दृष्टीने) अनुभवात असते. मी ४० वर्षे नोकरी केली पण त्या दरम्यानही मी माझा चहा कपबशीसह थर्मास मध्ये नेत असे. टपरीपेक्षा थर्मास बरा म्हणून आणि त्या कारणाने सह कर्मचाऱ्यांकडून माझी भरपूर थट्टा ही झालेली आहे. त्यावेळी “लोगों का काम है कहना… छोडो बेकार की बातों को.. ” अशा झोनमध्येच मी स्वतःला ठेवायचे.

तर सांगायची गोष्ट अशी की आज वंदना बरोबर एक मस्त उनाड दिवस जरासा चौकटी बाहेरचा घालवायचाच असे मी ठरवले.

लक्ष्मी रोडवर भर गर्दीत एका गल्लीतल्या मारुती मंदीरा जवळ आम्ही भेटलो. वंदना नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साही आणि खळखळणारीच. दिवस आषाढ महिन्यातले असूनही अगदी काही कोसळणारा पाऊस त्या दिवशी नव्हता. पावसाची फक्त भुरभुर होती. हवा छान थंडगार होती आणि सारं मजेदार वाटत होतं. गजबजलेले रस्ते, माणसं, वाहनं, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा छोटी मोठी दुकाने, हॉटेल्स सगळं काही. मी फारशी कधी या भागात येत नाही पण आज वंदना बरोबर गप्पा करत, गर्दीतून वाट काढत, मनसोक्त शॉपिंग करत, लहान लहान, फूटपाथवर पसरलेल्या दुकानापाशी थांबत, चालण्यात मला खरोखरच खूप मजा वाटत होती. या वैविध्यात, गर्दीत एक चैतन्य होतं. एक जीवन होतं. धक्काबुक्की, आवाज, गोंधळ पावसामुळे रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला साठलेले जलाशय चिखल सारंच मजेशीर वाटत होतं मला एकदम “रोमन हॉलिडे” चित्रपटातली ती बागडणारी “अॉड्री हेपबर्न” आठवली. भटकण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. शिणलो होतो. थकलो होतो. चहाची एक मस्त तल्लफही जाणवत होती. तेवढ्यात वातावरणात खमंग कांदा भजीचा वासही दरवळला आणि त्यासोबत चहाचा सुगंधही. चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया.”

– क्रमशः भाग पहिला 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभूळ आख्यान… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ जांभूळ आख्यान☆ शीला पतकी 

जांभूळ आख्यान नावाच नाटक खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं. त्याची कथा थोडक्यात अशी आहे… की एकदा पांडव वनविहाराला गेले असताना कर्ण द्रौपदीच्या दृष्टीला पडतो. आणि क्षणभर तिला त्याचा मोह होतो. आणि वाटतं की हा जर सहावा पांडव असता तर… हा विचार अगदी क्षणभरच येतो… कृष्णाला तिच्या मनातला हा भाव कळतो. द्रौपदी खरंतर तो विचार क्षणात झटकून टाकते… तरी तिला असा विचार आपल्या मनात कसा आला असं वाटतच राहतं… पण ते किती स्वाभाविक होतं ना कारण तो खरंच पहिला पांडव होताच ना… त्या सगळ्यांना खूप भूक लागते म्हणून फळे आणण्यासाठी त्यातील एक पांडव जातो… कुठेही फळं मिळत नाहीत केवळ. एका झाडाला एक जांभूळ लागलेल असत ते तो काढतो. तेव्हा तिथे तपश्चर्याला बसलेल्या ऋषींनी बारा वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर खाण्यासाठी ते जांभूळ राखून ठेवलेले असत हे जेव्हा त्या पांडवाला कळतं तेव्हा तो घाबरतो. ते ऋषी आपल्याला शाप देतील ही भीती वाटते. तो श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगतो. कृष्ण तेव्हा सांगतो की पतिव्रता स्त्रीने ते झाडाला जर चिकटवलं तर ते पुन्हा लागून जाईल. मग आता द्रौपदी सारखी दुसरी पतिव्रता नाही… सगळे म्हणतात, जा बाई तू हे कर… ती मनोमन जाणून असते हे खरं नाहीये… आपल्या मनात क्षणभर का होईना पर पुरुषाचा विचार आला होता… आणि ती मनोमन श्रीकृष्णाचा धावा करते की, आता मला या पेचातून सोडव. आणि त्याच्या प्रतिमेला नमस्कार करून ती झाडाला जांभूळ चिकटवते. ते चिकटत पण ते उलट चिकटतं… असं का घडलं? … याचे उत्तर श्रीकृष्ण तिला सांगतो की, परपुरुषाचा विचार मनात आणल्यामुळे तुझ्यातून चूक झालेली आहे. त्या चुकीची जाणीव तुला सतत व्हावी म्हणून तुझ्या हातून चिकटवलेले ते जांभूळ उलट लागलं तुला सदैव याची खंत वाटली पाहिजे…

 इथे आख्यान संपत. बायकांच्या मनात पर पुरूषा विषयी कधीही लोभ निर्माण होता कामा नये… अगदी मनांत सुद्धा! …

आता याकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहूयात… एखाद्या पुरुषाला हे जांभूळ चिकटवण्याचा सांगितले असते तर… तर मला वाटतं सगळी जांभळं झाडाला उलटी चिकटली असती किंबहुना जांभळाचे झाडच उलटे झाल असत.

त्या कथेत शेवट सांगताना असं सांगितलं जातं की… म्हणून जांभळ खाल्लं तर आपली जीभ जांभळट होते… म्हणजे जांभूळ खाल्ल्याचे लपून राहत नाही जसे की पाप लपून राहत नाही… म्हणजे एखाद्या स्त्रीच्या कल्पनेत असलेला क्षणभर तिने कल्पना केलेला पुरुष तिच्या मनात आला तर तिच्या पातीव्रत्याचा भंग…! तिच्या हातून मोठे पाप घडले…! आणि पुरुषांच्या दिवसातनं दहा वेळा दहा बायकांबद्दल विचार येतात ते मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ…!

अगदी श्रीकृष्णांन सुद्धा बायकांवर अन्याय केला आहे… हे माझं मत तुम्हाला काय वाटतं…?

– – मी आत्ताच जांभळं आणली.. ते घेताना माझ्या डोक्यात हिच कथा होती. काहीतरी कारण सांगतात. खरंतर जांभळाला पूजेमध्ये ठेवू शकत नाही. पण द्राक्षाला ठेवतात का? किंवा ज्या फळांचे घोस असतात त्यांना तरी ठेवतात का? एक तर जांभूळ पिकल्यानंतर ते लगेच फुटतं. ते जास्त टिकत नाही. त्यामुळे कदाचित पूजेमध्ये त्याला ठेवता येत नसेल.. पण त्याच्या मागे ही कारण देणे चुकीचेच आहे.. कोणत्याही कारणांच्या मागे स्त्रियांना नीतिमत्ता शिकवणं ही एकेकाळची परंपराच होती. स्त्रियांना सगळे नियम आणि बंधन.. अर्थात याला अनेक कारणं आहेत.. कारण स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यात तीच सफर होते.. पुरुष नामानिराळे राहतात. म्हणून स्त्रियांचे चारित्र्य जपण्यासाठी अशा अनेक कथा निर्माण झाल्या असाव्यात..

आणि स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळे त्या जास्त श्रद्धाळू म्हणा किंवा अंधश्रद्धाळू होत्या म्हणजे बाईने पुस्तक वाचलं तर नवरा मरतो अशा सगळ्या भयावह गोष्टी तिच्या माथी मारल्या आणि नवरा मेल्यावर बाईची अवस्था त्याकाळी खूप वाईट होती अगदी घरात कामाला मोलकरीण. बायकोचं बाळंतपण करायला घरात हक्काची बाई म्हणून दिर ठेवून घ्यायचे आणि छळायचे. शिक्षणाने खूप परिवर्तन झाले, समाजाला ते स्वीकारावेच लागले. काल माझ्या शेजारी एका मुलीची आई गेली ती डॉक्टर आहे आणि तिची बहीण प्राध्यापिका डॉक्टर असलेल्या मुलीने सर्व क्रिया कर्म मुलाप्रमाणे केले. आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यातील चार माणसं काय म्हणतील बाई ती चार बोलणारे नेहमीचे माणसे कोणीही बोलले नाहीत म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडवून आले हे नक्की! आणि ते नेमके शिक्षणानेच घडले यात वादच नाही. पण अशा भंपक गोष्टींमुळे मुली थोड्या अधिकच धीट झाल्या आणि कुटुंब व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली आहे. आता संस्कार काहीतरी टिकून ठेवेल अन्यथा अवघड आहे…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”  ARE YOU DEAD?..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ARE YOU DEAD? ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक असे आहेत, जे सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर आपल्या गृप्स मध्ये पहिला मेसेज Good morning चा टाकतात.

बरोबर एखाद गुलाबाचे फूल पण पोस्ट करतात.

खरतर हा एक अभिवादन करायचा प्रकार आहे.

मी कधी कोणाला Good morning चा मेसेज पाठवत नाही. गुलदस्ता पाठवत नाही. आणि कोणी मेसेज पाठवला तर मी उत्तरही देत नाही. मला हे उगीचच, waste of time, काय गरज आहे या सगळ्याची? अस वाटत. बहुतेक यात माझा उद्धटपणा दिसतो.

काहीच रिसपोन्स मिळत नसल्यामुळेच, पूढे असे मेसेज मला येत नाहीत. कदाचित फारच शिष्ठ आहेत या असा शिक्का पण माझ्या नावावर मारला जात असावा.

वर्तमानपत्रात एक लेख वाचल्यावर या Good Morning msg कडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. आता हा असा मेसेज किती महत्वाचा असू शकतो. हे लक्षात आल.

दृष्टिकोन बदलला की विचार बदलतात.

हे खरय.

आता एका वेगळ्या अर्थाने Good morning msg पटला.

Are you dead? हा लेख वाचला.

चीन मध्ये हा app वापरणारे बरेच लोक आहेत. आजकाल फॅमिलीच्या नावाखाली जास्तीत जास्त 3 जणांची संख्या असते. त्यातील मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी, लग्न झाल्यावर दूर गेले की फॅमिलीत फक्त 2 जण उरतात. जसजस वय वाढत तस ज्येष्ठांच्या समस्यांना तोंड देत, एक वेळ अशीही येते की दोघांपैकी फॅमिलीत एकच उरतो.

आधीच्या काळात एका मुलाला वाढवायला आजूबाजूचे अनेक लोक असायचे. घरातच कमित कमि आठ दहा जण असायचे. आता तर हम दो हमारे दो हा हिशोब पण गेलाय, आता एकच.. किंवा मुल नकोच. आता DINK चा जमाना आहे (double income no kids), मग एकटे राहणार्यांचा नंबर वाढणारच. त्यात 996 कल्चर.

9 to9 job, मग इतक काम केल्यावर दोन दिवस आराम, भटकंतीत. 6 days busy. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या लोकांशी संबंध नाही, भेटीगाठी नाही, बोलण नाही. शेजारी कोण. राहतय? हे सुद्धा खूपदा माहित नसत. social life as such नाहीच.

अशा वेळेस त्यांच्या घरात काय घडलय/ काय घडतय? हे कळायला मार्ग नाही. त्यात privacy च्या नावाने वागण्या बोलण्यात मोकळीक नाही. विदेशी राहणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, तेही एक मोठ कारण आहेच.

आज single/ एकटे राहणार्यांची संख्या वाढतेय. त्याला कारण अनेक आहेत.

नोकरीमुळे दुसर्या शहरात जाणे, डायव्होर्स झाल्यावर, लग्न करायचे नाही, अशा विचारांचे पण बरेच आहेत. ऑफिस मधून घरी आल्यावर ही conference calls. Work culture अस झालय की आई-वडीलां बरोबरही बोलायला वेळ मिळत नाही. त्यामुळे

एकटेपणा ही समस्या फक्त जेष्ठांचीच आहे अस राहिलेल नाहिये.

 एका समृद्ध घरात एकटी राहणार्या वृद्ध स्री चे प्राण गेले, हे कळल केंव्हा? तर आठवड्याभरानंतर. या दरम्यान कधी कोणी फोन केला, रिंग गेली, फोन उचलला नाही… अस कदाचित झाल असेल. तर बाहेर गेल्या असतील अशी आपली समजूत करून, या बाबतीत कदाचित लक्ष दिल गेल नसेल.. काय नक्की झाल असाव? माहित नाही. पण कळल मात्र आठ दिवसांनी. हे बरोबर आहे का?

Are you dead?

 या app ला CHINA मध्ये छान response मिळाला/ मिळतोय.

एकटे राहणार्यांनी फक्त रोज तेथे एक बटन दाबायचे असते. आणि 

मी आहे

 I am there , I am in

 ही सूचना द्यायची. जर लगातार दोन दिवस हे बटन operate झाल नाही, तर काही problem असावा.

अस लक्षात येईल. त्या app वर registration करताना, काही महत्वाचे, तुमच्या नातेवाईकांचे फोन. नंबर नक्की घेतले असतीलच. त्यानुसार पूढचे काम करण सोप होईल.

मधून मधून वर्तमान पत्रात, TV वर या संदर्भात काही भयानक बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.

भारतात या app ची गरज आहे का?

आज भारतात 5% लोक एकटे राहतात.

ही संख्या वाढतच चाललीय.

आज तरी या प्रकारचा App भारतात नाही.

या प्रश्नावर काही उपाय आहे का?

मला वाटत

 जर आपला एक गृप असला, मग तो मित्र/मैत्रीणींचा, आपल्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा, ऑफिस मधला, समवयस्क मैत्रीणींचा, कोणताही असू शकतो.

त्या गृपवर फक्त

Good Morning msg रोज टाकायचाच असा नियम ठरवला तरी हा प्रश्न सूटू शकतो. नाही का?

आज खासकरून जेष्ठांसाठी अनेक संस्था काम करतायेत.

UP मध्ये 112 वर फोन केला तर लगेच मदद मिळते. तर केरल मध्ये एकटेपणा घालवायला Listener parlours 

 Manglore मध्ये sathi Shifts आहेत.

एकटे राहणार्यांच्या मनात… मला काही झाल तर लोकांना कळेल का? केंव्हा कळेल? हा प्रश्न भेडसावतोच.

काळजी कमी करण्याच एक रहस्य समजून घ्याव. उगीच कल्पनेत काळजी करत बसण्यापेक्षा काही तरी निर्णय घ्यावा. व्यक्त व्हाव.

जस शरीरात वेदना झाल्या की आपण डोॅक्टरकडे जातो, तसेच मनात काळजी / शंका / भीती असेल तर ती वेळेवर समजून व्यक्त होण आवश्यक आहे.

वेळेवर घेतलेल्या correct decision मुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

No need to worries.

म्हणून रोज good morning चा मेसेज गृपमध्ये पाठवणे हा सरळ साधा सोपा उपाय चांगला आहे. सहज करण्यासारखाही आहे.

आयुष्यातील चुका जरी खोडता येत

नसल्या तरी दुरूस्त नक्किच करता येतात.

मी माझी चूक सुधारणार…

आजपासून मी good morning लिहिणार आणि अशा मेसेज ला उत्तरही नक्की देणार.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

– – आभाळात आपण इंद्रधनुष्य साकारू शकत नाही…

 पण कोणाच्या दारात रांगोळी तर काढू शकतो…

– – आभाळात आपण फुलांची झाडं लावू शकत नाही…

 पण कोणाच्या दारात फुलांचं झाड तर लावू शकतो…

 

फुलं एकतर आपल्या अंगणात पडतील किंवा दुसऱ्यांच्या… त्याने काय फरक पडतो…?

अंगण पाहून फुलं सुवास द्यायची थोडीच थांबतात…?

– – याच भावनेने या महिन्यात आपल्या सर्वांच्या साथीने जे काही थोडेफार जमलं ते केलं…!

 

आता जून महिना सुरू होईल, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट या मे महिन्यात माझ्या मागे सुरू झाला आहे…

अंकील, काका, मामू, बाबा, बाबू, पप्पा, डाकसाब, भाऊ, भैय्या या नावाने हाक मारत अख्खा मे महिना या पोरा आणि पोरींनी माझा नुसता जीव खाल्ला आहे…

– – नवीन शाळा कॉलेजचा हंगाम आता सुरू होईल…

सर्वांना शाळा कॉलेजमध्ये जायची गडबड आहे, त्याआधी सर्वांना मापाचे युनिफॉर्म, शूज सॉक्स, शाळा, कॉलेजच्या फीया, दुरेघी / एकेरी वह्या, आवडणाऱ्या रंगाच्या वॉटर बॅग, आणि अजून लई काय काय…

पोरांनी नुसतं डोकं उठवलंय…!

 

पण दरवर्षी मी बाप होऊन जातो, दरवर्षी माझ्या घरात जून ते ऑगस्ट दरम्यान पाळणा हलतो…

I am blessed – – 

 

‘ए गपा रे, हाताची घडी तोंडावर बोट… ‘ पोरांवर डाफरून मी शिक्षकाच्या भूमिकेत येतो.

मलाच माझ्या लहानपणी शाळेत जायची इतकी इच्छा का नव्हती याचं कोडं मला अजून पडतं…

माझी इच्छा मग मी याच पोरांवर भागवून घेतो… तुमच्या मदतीने…!

 

तर सध्या मुलांना लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट घेणे, संस्थेला लागणारे आधार कार्ड, फोटो, त्यांचे रिझल्ट वगैरे वगैरे अशा गोष्टी घेणे, शाळेत / कॉलेजमध्ये जाऊन फी कन्फर्म करणे, कोणी ऑनलाईन फी घेतंय तर कोणाला कॅश हवी आहे, त्याचे लिस्टिंग करणे आणि दिवसभर फिरत राहणे…

मनीषा सोडून माझ्याकडे सोबतीला आणि मदतीला कोणी नाही…

… अख्खा महिना या चिमण्यांच्या भविष्यातल्या घरट्यांचा विचार करत गेला…!

 

तुम्हा सर्वांच्या घरात एक दोन किंवा तीन मुले असतील, शाळा कॉलेज जवळ आल्यानंतर ती तुमचं काय डोकं खात असतील? ते तुम्ही जाणताच…

– – शाळा कॉलेज ही मुलांची नसतातच, ती आई बापाची परीक्षा असते…!

… मला आणि मनीषाला 52 मुले आहेत… आता आमची परीक्षा सुरू झाली आहे…

आणि ती किती असेल याची आपण कल्पना करू शकता…

 

आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा संक्षिप्त… (In bulletted points) आपणास सविनय सादर – – 

 

– दवाखान्यात जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना डबा आणून देणारा कोणीही नातेवाईक नाही, अशा सर्वांना जेवणाचे डबे देऊन आपणच नातेवाईक झालो…

… देत आपण आहात आम्ही फक्त हात झालो…

 

– रस्त्यावरील असहाय्य अवस्थेत जगणाऱ्या लोकांना कोणीही जेवण देत नाही अशांना आपण अन्नाचे दान तरी कसे म्हणू? दान करणारा मी कोण? आपल्या साथीने, त्यांची क्षुधा शांती केली आहे…

 

– ज्यांना घराबाहेर काढले आहे, अशा अनेक माऊली रस्त्यावर उन्हात अशाच तडफडत आहेत, जीव तव्यागत तापला आहे, आपल्या साथीने थंडगार पाणी त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडून त्यांना रोज प्यायला थंड पाणी देत आहोत, तृष्णाशांती म्हणतात ती हीच असावी का…?

 

– अत्यंत क्रिटिकल केसेस ज्यांना कोणत्याही दवाखान्यात ऍडमिट केले जात नाही, अशांची जमेल तितकी सेवा रस्त्यावर करत आहे आणि त्यानंतर ओळखीने त्यांना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहे आणि आपण त्यांचे बिल भरत आहोत… आपण म्हणजे पुन्हा “आपणच”आम्ही नव्हे…!

 

– महिन्यात कितीतरी सणवार येतातच, आपल्या या रस्त्यावरील माऊलींना कोणी गोडधोड देत नाही आणि म्हणून त्यांना गोडधोडाचे जेवण दिले आहे, “आपण” आम्ही नव्हे…!

 

– ज्यांना हात नाहीत पाय नाहीत किंवा दोन्ही असून नसल्यासारखे, अशा सर्वांना वैद्यकीय उपकरणे देऊन खऱ्या अर्थाने पायावर उभे केले आहे, त्यांनी आता काहीतरी काम करावे यासाठी प्रयत्नात आहे.

– – अनेक ताईंना हातगाडी देऊन कामाला लावले.

– – 70 वर्षाच्या आजोबांना पुणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर स्वच्छता करण्याचे काम मिळवून दिले आहे.

– – भूक लागली की भीक मागणारे आमचे लोक त्यांच्याकडे जे जमा असेल ते मला जेऊ घालतात, हाताने… शाही जेवण कदाचित यालाच म्हणत असावेत…!

मी त्यांच्यात बसून हे खाताना, या कड़क उन्हात कोणी पदरानं वारा घालतं, कुणी पाणी भरवतं, तर कुणी घास तोंडात घालतं…

– – भिकेमधलं खाऊन सुद्धा, भिक्षेकर्‍यांसाठी काम करताना, मला मी कुठल्यातरी देशाचा राजा आहे किंवा बादशहा आहे असा फील मला येतो…

 

… मी कुणीही नसतानाही, मला हा फील देणाऱ्या माझ्या त्या प्रत्येक माऊलीला साष्टांग नमस्कार.

 

– अजूनही सांगण्यासारखं बरंच बरंच आणि बरंच काही आहे…

– किती लिहू? काय काय लिहू? कुठे थांबू? माझं मलाच कळत नाही.

 

हाताचे चार तुकडे झाले आहेत, पायाचा चुराडा झाला आहे, हाडं मोडून शरीराच्या बाहेर आली आहेत, डोकं फुटून मेंदू बाहेर आला आहे, खून होऊन पोटातली आतडी बाहेर आली आहेत, त्यांचे ऑपरेशन करतानाचे फोटो इत्यादी इत्यादी मी कधीही आजवर शेअर केले नाही. माझ्याकडे अशाच फोटोंची भरमार जास्त असते.

– – असे फोटो टाळून, लेखाजोखा लिहिणे आणि त्यातून खूप काळजीपूर्वक आपल्याला फोटो… तेही कोणाची ओळख न दाखवता मास्क करून दाखवणे… हे सुद्धा माझ्यासाठी महिन्याच्या शेवटी दिव्य असते, वेळ खाऊ असते…!

 

पण मला त्यात अत्यंत आनंद होतो… ,! – कारण आपल्या मदतीमधून काय काम झाले हे साधारणपणे आपल्याला कळवणे हे सुद्धा माझे मी परम कर्तव्य समजतो…

 

तर माऊली काही चुका भुला झाल्या असतील तर माफ करावे…

आज अकरा वर्ष 24 तास मी या क्षेत्रात आहे, केवळ आपल्यामुळे…!

तरीही माझं काहीतरी चुकत असेलच…

चुकत असेन तर पदरात घ्या…

– – आणि नाहीच चुका पदरात घेतल्या, तर मी जाऊ कुठे…????

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Take it easy..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Take it easy.. ☆ संध्या बेडेकर ☆

If your plans are not working out… Take it easy. 

इतक्यातच अजय अनिताचे लग्न झालय. अनिता छान हंसमुख मुलगी आहे. बडबडी आहे. तिच्या पोटात काही रहात नाही. ऑफिस मधल्या गमती जमती, मैत्रीणींच्या गोष्टी, त्या आमच्या ओळखीच्या असो वा नसो सर्व सांगते. मी अगदी मन लावून ऐकते. हा तिच्या स्वभावाचा चांगला पार्ट आहे. उद्या या नवीन घरातील तिला काही आवडल नाही, तर ती स्पष्ट बोलेल. आतल्या गाठीची नाही, हे चांगल आहे. नाहीतर मनात एकत्र केलेल्या गोष्टींचा स्फोट व्हायचा. आम्ही सगळेच खुश आहोत. आमचे हे तसे अबोल आहेत, त्यांच्या बरोबर पण छान गप्पा मारते. यांच्यातला बदल मला आवडलाय. अबोल माणसाला समजायला उशीर लागतो. गैरसमज व्हायचे चांन्सेस जास्त असतात.

संवाद असला तर अनेक प्रश्न उद्भवतच नाही. नवीन माणसांबरोबर आपण सहज adjust होऊ शकतो.. बोलण्याने स्वभावाचा कल कळतो. विचार कळतात. आवडी निवडी कळतात.

नेहमी एकत्र रहाण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात.

हे दोन्ही पार्टी साठी आवश्यक आहे.

आज मी सकाळी बटाट रस्सा केला. बरोबर चार जास्तीचे बटाटे उकडून ठेवले. अनिताला डब्यात रस्सा भाजी आवडत नाही. सूखी भाजी आवडते. हे तिने एकदा बोलताना सहज सांगीतल होत. आज तिला दोसा भाजी डब्यात दिली. हे अस सहजच मला करता आल. कारण माहित होत.

ऑफिस मधून आल्यावर आमचा गप्पा टप्पा सेशन चालतो. तेंव्हा तिने सांगितल होत.

आज अनिताला बर नव्हत. थोडा ताप होताच. बाबांनी तिला कारने ऑफिस मध्ये सोडल. ऑफिस सुटल्यावर किंवा आवश्यकता वाटली तर कळव, घ्यायला येईन म्हणाले.

संध्याकाळी अनिताला रोजपेक्षा यायला

उशीर झाला. आधी मिटिंग्स नंतर तीनदा बुक केलेली टॅक्सी केंसल झाली. यात वेळ गेला.

घरी आल्यावर सर्व किस्सा कळला.

मी म्हंटल… अग! बाबांना बोलवायच ना घ्यायला. आधीच तुला बर नाही.

अनिता म्हणाली… Its ok आई.

अहो! एवढ काही झाल नाही हो.

मी ऑफिसमध्ये दुपारी औषध घेतल होत. मी मुद्दामच बाबाना किंवा अजयला बोलवल नाही. उगाचच संध्याकाळच्या गर्दीत त्याना ड्रायव्हिंग कराव लागल असत.

आई मी आधी अशी नव्हते. मी ठरवलेल काही झाल नाही की मला खूप त्रास व्हाचा, चिडचिड व्हायची. घर डोक्यावर घ्यायची मी. मला पण माझी चूक कळत होती. कधी कधी…

आयुष्यात अशा काही घटनां घडतात. त्याबघून आपल्यात बदल होतो. माझ पण असच झाल.

सुनिता विलियम्स आणि बेरी विलमोर आठ दिवसांसाठी स्पेस मध्ये गेले होते, पण आले मात्र 286 दिवसानंतर. म्हणजे आठ दिवसांच्या ट्रीपवर गेलेला माणूस अक्षरशः वर्षभरानंतर परत येतो. ही ट्रीप काही सामान्य, आनंदाची नव्हतीच. फ्रेश हवा नाही, जेवण नाही परिस्थिती एकदम वेगळीच… unnatural… unfavourable परिस्थितीवर त्यांचा काहीच कंट्रोल नव्हता. फक्त शांत राहण आणि वाट बघण एवढच काय ते करू शकत होते. Return flight चे option त्यांच्याकडे नव्हतेच.

ही घटना माझ्यासाठी एक *learning lesson* च होता. टॅक्सी कैंसल होणे, ऊशीरा मिळणे, interview मध्ये rejection, एखाद महत्वपूर्ण काम डिले होणे, डील कैंसल होणे, या गोष्टी मला आधी खूप डिस्टर्ब करायच्या.. तस बघीतल तर अस होण खरतर किती common आहे.. सहज शक्य असत. पण आपल्याला ते सहन होत नाही.

पेशन्स, तक्रार न करता एखादी डिफिकल्ट सिच्युएशन फेस करण, दीर्घकाळ एखादे कठीण काम चिकाटीने करत राहण. ही क्षमता, सहनशीलता, चिकाटी तेही 286 दिवस… 

Hats off to these legends for not just surviving, but making history. 

आता जेंव्हा कधी मी कधी डिफिकल्ट सिच्युएशन फेस करते, तेंव्हा मी स्वतःलाच समजावते…

Thank god… Atleast I am not stranded in space. 

आयुष्य म्हणजे roller-coaster ride. कधी तरी up-down होणारच. गुगली, बाउन्सर्स खेळावेच लागणार.

So, conclusion is

If your plans are not working out properly… Take it easy. 

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आजी…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आजी…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नमस्कार, मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो. त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या.. एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात.. मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो.. मग त्या रुसून बसतात.. मग मी त्यांना ‘म्हातारे’ म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो.

ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार..? गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते.. डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते.. मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो, तिचाही आणि माझाही.. मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते..!

हे मी रोजच गणित सांगितलं. असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं.. (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो) दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो…!

आत्ता वरच्या आजीचा फोटो पाठवीत आहे, ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने. सुनेला आजी (सासू) अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही. बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही. या आजीनं जगायचं कसं…? म्हणून ती एका परिसरात भीक मागायला येते. (राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत, परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भिक मागावी लागते.)

तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच…! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”.. अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो. तेवढ्यात ही आजी पाठीमागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती.

आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष.. जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप. तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो. तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही… ”

ती म्हणाली, “माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…?” असं म्हणून ती तोंड पाडून निघाली…!

मला वाईट वाटलं. पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “मी तुला खरच लांबचा वाटतो…???”

“न्हाय रं बाळा, तूच तर माझा मुलगा हायस.. असं म्हणत तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून बोटं कडाकडा मोडली. युद्ध तिथंच संपलं…

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “म्हातारे, सगळंच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत… ”

ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या…!!!”

तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं. ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…??? त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं… परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात यात खूप फरक आहे..

स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं… काय म्हणू या दातृत्वाला..?? एरव्ही शे 200 किलो डोक्यावर, अंगावर, खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी.. पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना. तीच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती.

बॅग उचलता उचलता ती म्हणाली, “तू हे माझ्यासमोर खा… ”

मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या. ती भरून पावली.. देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो..

मला नेहमी असं वाटतं, देव, देवी, अल्ला, ईश्वर, येशु हे आता मंदिर, मस्जिद, चर्च, , गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत, माणूस, माणूसच आहे का हे पाहायला..? हि आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…? माहित नाही…

आजी समोर खाल्लेला एक घास! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली. कशी कोण जाणे? मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली. तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता. आजीही गालातल्या गालात हसत होती.

खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो. सहज मागं वळून पाहिलं. सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती.

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1