मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभ दीपावली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शुभ दीपावली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

*

दीपावली परत जायला निघाली हं, मित्रांनो!

कसं भरून येतंय ना?

बघता बघता आली आणि निघालीसुद्धा!

दिल अभी भरा नहीं. ‘…

न मागता खूप काही देऊन निघालीय!

 

दर वेळेचंच आहे हे असं हिचं!

येते, येते….

आले, आले म्हणायचं…..

उसळत यायचं…..

सगळी दुनिया प्रकाशमय करायची…..

मनामनांत प्रकाश पसरायचा….

उद्यासुंदरच आहे, या भावनेची ज्योत तेवत ठेवायची…..

स्वप्नांना प्रकाशाची वाट दाखवायची….

आणि खोल आतून हळवं करून निरोप घ्यायचा!

तुळशीच्या लग्नापर्यंत थोडी थोडी लांब जात मग दिसेनाशी होते….

पण मनोमनी तेवत राहते…..

आठवणी उजळत ठेवते….

प्रवासाच्या पुढच्या वाटेवर

प्रकाशदीप ठेवून जाते

आपल्यासाठी…..

आम्ही कृतज्ञ आहोत गं तुझे!

 

अंगणात शांत झालेल्या पणत्या उचलल्या जातील

आता उद्यापासून…..

त्यातले तेल- वात संपलेले असले तरी

प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात ती ज्योत तेवतच राहणार आहे…

 

म्हणूनच

जरा तहजीब से बटोरना बुझे दियों को दोस्तो!

इन्होंने अमावस की अंधेरी रात में हमें रोशनी दी थी….

किसी और को जलाकर खुश होना अलग बात है…

इन्होंने तो खुद को जलाकर हमें खुशी दी थी……

 

शुभ दीपावली!

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रीचं झाड – कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्रीचं झाड –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

मिळतील का हो कुठे

मैत्रीच्या बिया

एक झाड लावावं म्हणतो

अंगणात माझ्या

*

असेल जे सतत

डोळ्यांसमोर माझ्या

सांगेन मग त्यालाच

सुख दु:खाच्या कथा

*

काळजी घेईन त्याची छान

निगुतीनी वाढवेन त्याला

खत-पाणी घालून घालून

जीवही लावेन त्याला

*

रोज फुटेल नवी पालवी

त्याच्या माझ्या नात्याला

फळा-फुलांचे येतील बहर

ऋतूमध्ये मैत्रीच्या

*

तसे असतातच की मित्र खूप

समाजामध्ये आपल्याला

कधी क्वचित येतो पण

मैत्रीमध्ये दुरावा

*

जाईन जेव्हा जवळ त्याच्या

धरेन अलगद फांदीला

तेही देईल आधार तेव्हा

माझ्या उतरत्या खांद्याला

*

बघा कधी तुमच्याही

मैत्रीत आला रुसवा

मैत्रीचं एक झाड

अंगणात तुम्ही रुजवा

*

म्हणूनच विचारतो

कुठे मिळतील

या मैत्रीचा बिया

सगळेच लावू एकेक झाड

अंगणात आपल्या आपल्या 

*

बाजार नको मैत्रीचा

मित्र असावा खात्रीचा

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“गुरुजी, मी कितीतरी पुस्तकं वाचली… पण त्यातलं बहुतेक विसरलोय. मग वाचनाचा उपयोग काय?” एका जिज्ञासू शिष्याने गुरुजींना प्रश्न विचारला.

गुरुजींनी काही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले.

काही दिवसांनी ते नदीकाठी बसले होते. अचानक गुरुजी म्हणाले –

“मला तहान लागली आहे. पाणी आण. पण त्या जुन्या चाळणीत भरून घे.”

शिष्य चकित झाला.

ही कसली विनंती?

चाळणीतून पाणी आणायचं? त्यात तर सगळीकडे छिद्रं आहेत!

पण त्याने वाद केला नाही.

त्याने चाळणी उचलली आणि प्रयत्न सुरू केले.

एकदा.

दोनदा.

पुन्हा पुन्हा…

कधी तो वेगाने धावला,

कधी कोन बदलून पाहिला,

कधी छिद्रं बोटांनी बंद करून पाहिली.

पण काही उपयोग झाला नाही.

एक थेंबही पाणी टिकेना.

शेवटी तो दमून-भागून गुरुजींच्या पायाशी चाळणी ठेवून म्हणाला –

“माफ करा, मी अपयशी ठरलो. हे अशक्य होतं.”

गुरुजी प्रेमाने म्हणाले –

“तू अपयशी झालास नाहीस. जरा चाळणीकडे नीट बघ.”

शिष्याने खाली पाहिलं…

आणि त्याला काही जाणवलं.

ती जुनी, काळी, घाणेरडी चाळणी आता स्वच्छ व चमकदार झाली होती.

पाणी जरी टिकून राहिलं नाही, तरी सतत वाहत राहिल्याने ती चाळणी झळाळून निघाली होती.

गुरुजी पुढे म्हणाले –

“वाचन असंच असतं. तुला प्रत्येक गोष्ट लक्षात राहिली नाही तरी हरकत नाही.

ज्ञान पाण्यासारखं हातातून निसटतं… पण मन मात्र ताजंतवानं होतं.

वाचनाने विचार स्वच्छ होतात,

आत्मा ताजातवाना होतो,

कल्पना प्रफुल्लित होतात.

आणि कळत-नकळत तू आतून बदलत जातोस.”

वाचनाचं खरं उद्दिष्ट म्हणजे स्मरणशक्ती भरून काढणं नव्हे…

तर आत्म्याला स्वच्छ, समृद्ध आणि प्रबुद्ध करणं आहे.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

ही कथा आहे ‘१३ लाख रुपये दहा रुपयांच्या बदल्यात’ची.

एका व्यावसायिकाने नुकतेच दुकान उघडले होते. तेवढ्यात एक महिला आत आली आणि म्हणाली,  “सेठ,  तुमचे दहा रुपये घ्या…! “

व्यावसायिकाने त्या गरीब महिलेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले,  जणू काही त्याची नजर विचारत होती,  “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले? “

बाई म्हणाली,  “काल संध्याकाळी,  मी वस्तू खरेदी केल्या तेव्हा मी तुम्हाला शंभर रुपये दिले. ७० रुपयांचा माल खरेदी केला. तुम्ही मला ३० रुपयांऐवजी ४० रुपये परत दिले. “

 व्यापाऱ्याने दहा रुपये कपाळावर लावले,  नंतर ते परत त्याच्या कॅश बॉक्समध्ये ठेवले आणि म्हणाला,  “मला सांग ताई,  वस्तू खरेदी करताना तू खूप वाटाघाटी करत होतीस. किंमत पाच रुपयांनी कमी करण्यासाठी तू खूप वाद घातलास आणि आता तू हे दहा रुपये परत करायला आली आहेस! ”

महिलेने उत्तर दिले,  “किंमत कमी करून घेणे,  हा माझा अधिकार आहे. पण एकदा सौदा झाला की,  त्या वस्तूचे कमी पैसे देणे हे पाप आहे. “

तो व्यापारी म्हणाला,  “पण,  तू कधी कमी पैसे दिलेस? तू पूर्ण पैसे दिलेस. हे दहा रुपये चुकून तुझ्याकडे गेले. तू ते ठेवले असतेस तर मला काही फरक पडला नसता. ”

ती महिला म्हणाली,  “तुम्हाला काही फरक पडत नसेल. पण माझ्या मनात नेहमीच हा सल असता की,  मी तुमचे पैसे जाणूनबुजून घेतले. म्हणूनच मी काल रात्री ते परत करायला आले होते. पण तुमचे दुकान त्यावेळी बंद होते. “

व्यापाऱ्याने त्या महिलेकडे आश्चर्याने पाहत विचारले,  “तू कुठे राहतेस? ”

ती म्हणाली,  “मी सेक्टर ८ मध्ये राहते. ”

त्या व्यापाऱ्याचे तोंड वासले गेले.

तो म्हणाला,  “तुम्ही ७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात,  मला हे दहा रुपये देण्यासाठी? “

त्या महिलेने सहज उत्तर दिले,  “हो,  मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही,  पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण एखादा माणूस गप्प राहू शकतो,  पण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते. “

हे सांगून ती महिला निघून गेली.

व्यापाऱ्याने ताबडतोब कॅश बॉक्समधून तीनशे रुपये काढले आणि नोकराला म्हणाला,  “तुम्ही दुकान सांभाळा,  मी लवकरच परत येईन. ” तो व्यापारी बाजारातल्या एका दुकानात पोहोचला. दुकानदाराला तीनशे रुपये देत म्हणाला,  “प्रकाशजी,  तुमचे तीनशे रुपये घ्या. काल,  तुम्ही सामान खरेदी करायला आलात,  तेव्हा बिलाचे जास्त पैसे भरले. ”

प्रकाश हसून म्हणाला: ” मी जास्त पैसे दिले होते,  ते मी पुन्हा दुकानात आलो असतो,  तेव्हा तुम्ही ते मला देऊ शकला असता! पण इतक्या सकाळी तुम्ही मला तीनशे रुपये द्यायला आलात.”

व्यापारी म्हणाला,  ” तुम्ही पुन्हा कधी आला असता? तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला माहीत नव्हते की,  माझ्याकडे तुमचे तीनशे रुपये आहेत! बरोबर ना? म्हणूनच ते देणे आवश्यक होते. देव कधी हिशोब मागेल हे मला माहीत नाही… आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात…! “

तो व्यापारी निघून गेला होता.

पण प्रकाशचे मन अशांत होते.

दहा वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. पण पैसे परत करण्याअगोदर त्याचा मित्र मरण पावला.

त्याच्या मित्राच्या कुटुंबाला त्या पैशांची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच कोणीही ते परत मागितले नव्हते.

प्रकाश लोभात बुडाला होता. म्हणून त्यानेही ते परत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आज त्याच्या मित्राचे कुटुंब गरिबीत जगत होते. त्याची पत्नी लोकांची घरे झाडून,  पुसून मुलांना वाढवत होती. तरीही,  प्रकाशने त्यांच्या पैशावर डल्ला मारला होता.

“देव कधी न्याय मागेल हे मला माहीत नाही.. आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात… ” सेठचे हे शब्द ऐकून प्रकाश घाबरला होता. तो दोन-तीन दिवस तणावात राहिला.

शेवटी,  त्याचा विवेक जागृत झाला. त्याने बँकेतून तेरा लाख रुपये काढले आणि ते देण्यासाठी मित्राच्या घरी गेला.

त्याच्या मित्राची पत्नी घरी होती. ती तिच्या मुलांसोबत गप्पा मारत बसली होती. तेव्हाच प्रकाश आला. तिच्या पाया पडला.

त्या विधवेसाठी,  जी एकेक रुपयासाठी झगडत होती,  १३ लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.

ते पैसे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले.

ती प्रकाशला आशीर्वाद देऊ लागली,  ज्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले होते!

ही तीच महिला होती जी एका व्यावसायिकाला त्याचे दहा रुपये परत करण्यासाठी दोनदा गेली होती!

कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची देव नक्कीच परीक्षा घेतो. पण तो त्यांना कधीही सोडत नाही. एक दिवस तो नक्कीच न्याय करतो. देवावर विश्वास ठेवा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी केलेली ‘पुलं’ची हजामत  – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी  ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

मी केलेली ‘पुलं’ची हजामत  – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी 

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ. विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार उघडून आत आला.

‘ तुम्हाला पु. ल. देशपांडेसाहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘

त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून, ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.

आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला ‘ हो लगेच निघतो, ‘

असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.

त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं’चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.

‘ राहू द्या हो. माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘

त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं’बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली.

त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी मी केस कापावयास जात असे, तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार, यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी ‘रुपाली’मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.

‘ थोडावेळ बसा. भाई जरा नाश्ता करतो आहे’, असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.

आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार, याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.

इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘चंद्रकांत, यांचे केस बारीक करून टाका, ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहिण्यात गर्क झाल्या.

त्यांचे लक्ष नाही, असे पाहून

‘ फार लहान करू नका,

थोडेच कापा ‘

पुलं माझ्या कानात कुजबुजले.

माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलीकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.

पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी’ का म्हणतात, याचा अर्थ उमगला.

त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे, त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सर्वोच्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

‘ चंद्रकांत, ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका, ‘ त्यांनी आज्ञा केली.

मला जरा विनोद करावासा वाटला.

मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘

त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशु ख्रिस्त वगैरे आहे की काय? ‘

मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते.

म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.

शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,

‘एक आनंदाचं देणं’.

पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘

लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत

प्रस्तुती:सौ. नीता गडकरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ह्यावर्षी ठरवलं

फराळाची बाहेर ऑर्डरच देऊ

नको ते गुढग्यांचे कुरकुरणे

नको खांद्याचे दुखणे

आणि नकोच ते घामाने निथाळणे

ह्या दिवाळीला अगदी फ्रेश राहू

स्वतःकडे जरा लक्ष देऊ.

*

तेवढ्यात मुलाने काढले फर्मान

आई चिवडा सोडून सगळं बाहेरून आण

म्हटलं, पटकन चिवडा करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नातू लाडाने म्हणाला

ए आजी, तुझे बेसन लाडू वर्ल्डमधे बेस्ट

कशी सांगू त्याला अरे माझी दुखतेय वेस्ट

म्हटलं ठीक आहे. लाडू तेवढे करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नात जवळ आली

तुझीच शंकरपाळी आवडतात, म्हणाली

शंकरपाळ्यांची तयारी केली सुरू

दुधावरच्या सायीला कसं नाराज करू

मनात म्हटलं बाकी सगळं मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात सूनबाई म्हणाली

आई लक्ष्मीपूजनाला करंजीची

तुम्हीच तर सवय लावली

मग काय लागले करंजीच्या तयारीला

घरच्या लक्ष्मीला नाराज करणे परवडेल का मला?

*

शेवटी सगळा फराळ करून झाला

सूनबाईनेही मला खूश करण्याचा चंग बांधला

माझ्यासाठी बॉडी मसाज बूक केला

आणि बघता बघता माझा थकवा दूर पळाला

*

पण खरं सांगू का तुम्हाला

फराळाचे भरलेले डबे बघून मीही झाले तृप्त

आता तुम्हीच सांगा मला

आईला होता येईल का हो कधी अलिप्त?

कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनमोल दैवी दागिने… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अनमोल दैवी दागिने… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

चला विरक्ती आली,

दागिन्याची आसक्ती संपली…

या बाह्य सौन्दर्यापासून आता,

मुक्ती हवीशी वाटू लागली!

 

पण सुंदर दिसण्याचा विचार

डोक्यातून काही जाईना…

आणि दागिन्याची हौस मनाला,

स्वस्थ बसू देईना!

 

मग मी रामाकडे घेतली धाव,

म्हणाले, तूच यातून मला सोडव…

रामा तूच माझा सोनार हो…. आणि

माझे दैवी दागिने घडव!

 

चेहर्‍यासाठी माझ्या घडव

सुहास्याचा दागिना.

मुखावर माझ्या कधी

 न उमटो मनातली विवंचना!

 

कानासाठी माझ्या घडव,

तू असे सुंदर झुबे…

माघारीही माझ्याबद्दल

चांगलंच ऐकू येऊ दे

 

गळ्याभोवती माझ्या

असूदेत सतत

आप्तजनांचे हात

काय करायचेत आता मला,

चंद्रहार आणि पोहेहार?

 

पाटल्या बांगड्या यांनी आजवर,

शोभा वाढवली हाताची…

आता वेळ आलीय,

हात दानाने मोकळे करण्याची!

 

वेळोवेळी सजली माझी

मेखला, कंबरपट्टा यांनी कंबर…

आता तिची खरी शोभा,

ती ताठ आहे तोवर!

 

जोडवी अशी जड घडव,

की पाय जमिनीवरच राहतील…

आता सांग, हे रामा,

हे सारे दागिने केव्हा देशील?

 

दैवी दागिन्याची माझी मागणी,

रामचंद्र सोनारानं नोंदवून घेतली…

“जरा वेळ लागेल” असं म्हणत,

स्वत:ची भूमिका स्पष्ट केली

 

हसतच वदला रामराया…

“अहो, हे दागिने तयार नसतात,

कारण त्यांना तेवढी मागणी नसते..

पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत,

घेणाऱ्या भक्ताची, (पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी,

एवढीच माफक अपेक्षा असते!

 

घडणावळीची काळजी नको,

कारण आम्ही ती घेतच नाही..

रामनाम चालू ठेव

दागिने लवकरच घरपोच होतील.

 

असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं…

खरेतर हाच माझा छंद..

त्यासाठीच मी येथे उभा आहे…

तुझ्या सारख्या अनोख्या भक्तांची वाट पाहत…

 

कारण भक्तांच्या इच्छा पुरविणे

 भक्तांना भयमुक्त करणे..

हेच तर माझे कर्तव्य….

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वच्छंद जगण्यासाठी वयाची मर्यादा नसते… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

स्वच्छंद जगण्यासाठी वयाची मर्यादा नसते… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते,

साठीत काय आणि सत्तरीत काय? माणसाने माणसासारखेच जगायचं असते.

स्वछंद जगण्यासाठी, वयाची मर्यादा नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ध्रु ||

*

मॅच्युरिटीच्या नावाखाली आपण करतो मिश्किल स्वभावाचा त्याग,

आतल्या आत झुरत राहते, ह्या विरहाची आग

केवळ लोकलज्जेखातर मनातली इच्छा मारायची नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || १ ||

*

मनसोक्त हसणारा तू,

आज फक्त गालातल्या गालातच हसतोस,

सुरांच्या मैफिलीत बसणारा तू

आज फक्त घरातच गुणगुणत बसतोस,

मनात वळवळणाऱ्या किड्यांची वळवळ

कोणाकरिता थांबवायची नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || २ ||

*

परफेक्षनिस्ट होण्याच्या हव्यासापायी

आपण फारच व्यस्त असतो,

छोट्या-छोट्या सुखांकडेही दुर्लक्ष करून बसतो,

चुका न होण्याची खात्री कुठल्याच वयात नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ३ ||

*

दादा, मामा, बाबा, आबा, असा चढत्या नात्यांचा आलेख

चाळिशीत हे शोभते का? साठीत असे वागावे का?

होतो अशा वाक्यांचा उल्लेख

वयाच्या आणि नात्यांच्या बंधनात फार अडकायचे नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ४ ||

*

व्यावहारिक जीवनाच्या साचेबद्ध चौकटीतच आपण फसतो,

दुसऱ्याच्या चष्म्यातून बघता-बघता, आपण आपलीच दृष्टी हरवून बसतो,

आपल्या जगण्याची दिशा दुसऱ्याच्या सांगण्यावरून ठरवायची नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ५ ||

*

एकदा अनुभवा तरी हे जग चौकटीच्या बाहेरून,

बिनधास्त जगा सर्व बंधन मर्यादा झुगारून,

मानवी देह मिळण्याची खात्री प्रत्येक जन्मात नसते,

अहो, संपत आलेल्या चिवड्यात देखील मीठ जास्तच असते || ६ ||

कवी: अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कदर…” – लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कदर…” – लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

रात्री फार उकडत होतं. किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लाॅकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला. दोघे गप्पा मारत चालू लागले. अरुण म्हणाला, ” किशोर, परवा दिवशी पहाटे मी आणि शर्मिला बाहेर जाणार आहोत. मुलं सासुरवाडीला ठेवणार आहोत. फक्त जरा घराकडं लक्ष ठेव. वहिनी असतातच ना घरात.. ”

”हो.. पण मध्येच कुठं निघाला आहात?  ” किशोरनं विचारलं.

”अरे, जरा बदल म्हणून शर्मिलाला घेऊन जातो आहे. तापोळा, भिलार, महाबळेश्वर. चार पाच दिवस नाही आता” अरुण म्हणाला.

”मध्येच कसं काय ठरवलं?  तुमची प्राॅपर्टीची कामं झाली की नाही?  बाबांना जाऊन तीन आठवडे झाले ना!” किशोर म्हणाला. ‌त्याचा सूर ओळखून अरुण हसला. बाबांना जाऊन तीन आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा…अशा सुरात किशोर बोलला ते समजलं अरुणला.

”अरे, झालंय ते. आता एक सही केली की काम झालं. पण बाबांच्या आजारपणात शर्मिलाची फार ओढाताण झाली रे. सतत त्यांचं औषध पाणी, पथ्य, माणसांचं येणं जाणं. फार करावं लागलं तिला. नुसता पैसा असला तर होतं असं नाही. सेवा करायची तर माणूस हवं. बाबा गेले नी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर. सगळी क्रियाकर्मं… घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा! आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया. माझ्या बाबांचं तिनं चार महिने सारं केलं.. मी चार दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे?  ”अरुण म्हणाला.

किशोर घरी आला. अनुराधानं अंथरुणं घातली होती. मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या अनुराधानं त्याच्याकडं एकदा पाहिले नि ती पुन्हा मोबाईलमध्ये वाचण्यात बुडून गेली. आताशी अनुराधा असंच करते. आपल्याशी कमीत कमी बोलते आहे. संवादच काय विसंवादसुध्दा बंद केले आहेत तिनं. पूर्वी ती नव्हती अशी. समरसून करायची सारं. आपणच तिला हाडतुड करायचो. पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायची. काहीतरी सांगायची. पण आताशी ती हे सारं टाळते, असं वाटतं.

”अनु…. ” त्यानं हाक मारली. तिनं मोबाईल बाजूला केला.

”हं…बोला. ” त्यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडा.

”आत्ता बाहेर अरुण भाटिया भेटला होता. शर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत. चार पाच दिवस. जरा लक्ष ठेव, घराकडं म्हणत होता”

“बरं, ” असं म्हणून अनुराधाने पुन्हा मोबाईल घेतला.

”का जाणार आहेत, विचारलं नाहीस?  ”

”मला माहीत आहे.. शर्मिलानं सांगितलं आहे मला. बाबांच्या आजारपणात, ते गेल्यावर तिला झालेल्या दमणुकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत. ” अनुराधा कोरडेपणाने म्हणाली. परत तिनं मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि किशोरला फार एकाकी वाटू लागलं.

गेल्या वर्षीची अनुराधा आठवली त्याला. कशी रसरशीत होती!सगळं हौसेने करायची. आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिचं. आई इतकी रडली होती.. अनु मी फार त्रास दिला तुला, पण काही मनात न ठेवता किती प्रेमानं केलंस माझं. सतत तिला आईच्या उशा पायथ्याशी थांबावं लागायचं. अनुराधा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती. सतत आईच्या सेवेत रुजू. आईच्या औषधांच्या वेळा, जेवणातलं पथ्यपाणी, येणारी जाणारी माणसं.. त्यांचं अगत्य.. काही काही कमी केलं नाही तिनं. चार दिवस ताई माहेरी आली नि मग थोडी उसंत मिळाली तिला.

ताईला तिची कुचंबणा समजत होती. सतत आईच्या भोवती रहाताना आपलं बायको म्हणून किशोरकडं दुर्लक्ष होतं आहे, असं तिचं वाटणं.. मुलांवर कधीतरी होणारी चिडचिड, तिची दमणूक. मधूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं यांचा अनुराधाला त्रास व्हायचा. ते जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला.

”वहिनी, तू आराम कर थोडा. दादा सोबत कुठंतरी जाऊन ये तासभर. जरासा विरंगुळा होईल तुला. ‌किती करावं लागतं तुला! खरंच जाऊन या. मी आहे आईजवळ. ” असं तिनं सांगितलं.

बिचारी अनुराधा…! त्यादिवशी स्वयंपाक करताना तिनं किशोरला व्हाॅटस्अपवर मेसेज केला, ”आपण कुठंतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ. ”

किशोरला ते इतकं मूर्खपणाचं वाटलं! लग्नाला वीस वर्षं झाली आहेत आणि अनुराधा बाहेर जाऊ म्हणतेय. त्यानं उत्तर द्यायचीसुध्दा तसदी घेतली नाही. अनुराधा खूप वेळ उत्तराची वाट पहात होती. किशोरनं लक्षही नाही दिलं.

दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडाडला, ” कशाला मला व्हाॅटस्अपवर मेसेज करतेस गं?  इकडं जाऊया नि तिकडं जाऊया.. ”

अनुराधा इतकी वरमली! त्यांच्यातील पर्सनल गोष्ट किशोरला अशी चारचौघात बोलायची काय गरज होती.. मग तिनं ओठ घट्ट मिटले. दोन महिन्यांत आई गेली. किती ताण आला होता अनुराधावर!आईचे दिवसकार्य झाल्यावर पंधरा दिवस ती माहेरी निघून गेली. किशोर तिच्या फोनची वाट पहात होता. पण ना तिनं फोन केला ना मेसेज. कितीदा ती ऑनलाईन दिसायची, पण मेसेज बाॅक्स मोकळाच असायचा. मग त्यानंच फोन केला. अनुराधा बोलली, पण त्या बोलण्यात जीव नव्हता. कोरडं कोरडं होतं ते बोलणं. परत आली, पण तिनं एकंदरीत किशोरपासून अलिप्त राहणं पसंत केलं

आज अरुण भेटला नि हे सारं किशोरला आठवलं. ‌आपण अनुराधावर अन्याय केला काय?  त्यादिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं?  आणि तिच्या मेसेजेस बद्दल पट्कन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं.. तिला लग्न करुन आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडंही काहीही मागायचं नाही.. आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली. तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का?  

एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही.. हे मनाची समजूत काढायला ठीक वाटतं; पण ते सगळीकडं लागू होत नाही. माणूस आहे तोवरच त्याला समजून घ्या. त्याची कदर करा. नाती जपा, ती कौटुंबिक असोत, मित्र मैत्रिणींसोबत असोत, सहकाऱ्यांसमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असोत. कदर करा. वेळेत करा. कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. कधी कधी आयुष्य तो पश्चाताप करायलाही वेळ देत नाही नि नंतर त्याला अर्थ रहात नाही. खूपदा माणूस तुमचं वागणं, जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो;कारण त्यांची काहीतरी विवशता असते. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी शारीरिक. पण एकदा का अंतःकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परिणाम होतो, तो फार भयंकर होतो… वेळीच सावरा आणि नाती फुलवा. थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात…ती फुंकर घालायला उशीर करु नका!

लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी

प्रस्तुती:सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ संवाद…  – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संवाद…  – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

संवाद कुठे हरवले?

इकडे तिकडे शोधून पाहिले

नाही कुठे सापडले

अरेच्चा !

हे तर मोबाईलमध्ये जाऊन बसले.

*

बोटांना काम मिळाले

तोंडाचे काम कमी झाले

शब्द मुके झाले

मोबाईलमध्ये लपून बसले

 *

हाय’ करायला मोबाईल

बाय’ करायला मोबाईल

GM करायला मोबाईल

GN करायला मोबाईल

*

शुभेच्छांसाठी मोबाईल

भावपूर्ण श्रद्धांजली’ साठीही मोबाईल

खरेदीसाठी मोबाईल

विक्रीसाठी मोबाईल

नाटक, सिनेमांची तिकिटं मोबाईलवर

बस, ट्रेन, विमानाची तिकिटं मोबाईलवर

शाळा, कॉलेजची फी मोबाईलवर

डॉक्टरांची फी मोबाईलवर

*

वेळंच नाही येत आता दुस-यांशी बोलण्याची

बोलता बोलता चेह-यावरचे भाव टिपण्याची

वेगवेगळ्या ‘इमोजी’ धावून येतात मदतीला

दुधाची तहान ताकावर भागवायला

*

आता शब्द कानांना सुखावत नाहीत

आता शब्द ओठांवर येत नाहीत

आता शब्द कोणी जपून ठेवत नाही

आता शब्द-मैफल कुठे भरतच नाही

*

मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही

प्रत्यक्ष संवादातील मौज इथे नाही

आभासी जगातले संवादही आभासी

अशा संवादांचा आनंद नाही मनासी

*

या आभासी संवादांना मूर्त रूप कधी मिळेल का?

नक्की सांगा माणूस खरंच ह्रुदयापासुन संवाद साधेल का ?

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares