मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सगळं उभं आहे पण… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

 

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ सगळं उभं आहे पण… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सगळं उभं आहे… पण माणूसपण…

… कोसळत चाललंय

आजच्या जगात आपण पाहिले तर भौतिक प्रगती आणि विकासाची एक अकल्पित लाट आलेली आहे. उंचच उंच इमारती, वेगवान तंत्रज्ञान, एका बटणावर उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा, जगाच्या पाठीवर कुठेही संपर्क साधण्याची क्षमता – या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने ‘उभ्या’ आहेत. आर्थिक समृद्धीचे आकडे वाढत आहेत, नवनवीन शोध लागत आहेत आणि मानवी जीवनातील अनेक कष्ट कमी झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपण मैलाचे दगड पार केले आहेत. एकंदरीत पाहता, बाह्यतः जग खूप मजबूत आणि स्थिर उभे असल्याचे दिसते.

परंतु, या भौतिक विकासाच्या गडद छायेत एक गंभीर आणि चिंताजनक सत्य लपलेले आहे: ‘माणूसपण कोसळत चाललंय’. माणूसपण म्हणजे केवळ मानवी शरीराचा अस्तित्त्व नव्हे, तर ती भावना, संवेदना, सहानुभूती, नैतिकता, परोपकार आणि दुसऱ्यांबद्दलची आत्मीयता होय. हीच माणुसकी आज हळूहळू नाहीशी होत असल्याचे दिसत आहे.

माणूसपण कोसळण्याची कारणे आणि लक्षणे:

स्वार्थ आणि व्यक्तिवाद:

आधुनिक समाजात ‘मी आणि माझे’ या विचाराने मूळ धरले आहे. स्पर्धा आणि भौतिक ध्येयांच्या मागे धावताना लोक एकमेकांपासून दुरावत आहेत. दुसऱ्यांच्या गरजा, दुःख आणि अडचणींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत आहे.

संवादहीनता आणि दुरावा:

तंत्रज्ञानाने जगाला जोडले असले तरी, माणसा-माणसांतील प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. कुटुंबातील सदस्यही एकमेकांशी संवाद साधण्याऐवजी मोबाईल फोनमध्ये गुंतलेले दिसतात. या आभासी जगात खरी नाती आणि भावनांची कदर कमी होत आहे.

संवेदनशीलता हरवणे:

रस्त्यावर एखादा गरीब किंवा गरजू व्यक्ती दिसल्यास अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. दुसऱ्यांच्या दुःखावर सहज प्रतिक्रिया न देण्याची, किंवा त्याकडे संवेदनहीनपणे पाहण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

नैतिक मूल्यांची घसरण:

प्रामाणिकपणा, सचोटी, वचनबद्धता यांसारखी नैतिक मूल्ये दुय्यम ठरवली जात आहेत. भ्रष्टाचार, फसवणूक आणि अनैतिक मार्गांनी प्रगती साधण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते, ज्यामुळे सामाजिक विश्वास कमी होत आहे.

गरिबी आणि विषमतेकडे दुर्लक्ष:

एकीकडे प्रचंड पैसा आणि समृद्धी दिसत असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गरिबी, उपासमार आणि वंचितता आहे. या विषमतेकडे समाजाचे डोळे झाकले जात आहेत, आणि ‘माझे काम झाले’ ही भावना वाढत आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि माणुसकी:

जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात, तेव्हा माणुसकी जागृत होते, पण ती अल्पकाळ टिकणारी असते. त्यानंतर पुन्हा दैनंदिन जीवनातील धावपळीत आपण माणुसकी विसरून जातो.

आज खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण ज्या भौतिक प्रगतीचा अभिमान बाळगतो आहोत, ती जर माणुसकीच्या पायावर उभी नसेल, तर ती कितीही उंच असली तरी ती कधीही कोसळू शकते. इमारती कितीही मजबूत असल्या तरी, आत राहणारे लोकच जर संवेदनाहीन असतील, तर त्या इमारतींना काय अर्थ?

‘सगळं उभं आहे’ हे सत्य आहे, पण हे केवळ बाह्य स्वरूप आहे. खरा धोका ‘माणूसपण कोसळत चाललंय’ यात आहे. माणुसकी जपण्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. लहानसहान कृतीतून, संवादातून, सहानुभूतीतून आणि परोपकाराच्या भावनेतून आपण या कोसळणाऱ्या माणूसपणाला पुन्हा उभारी देऊ शकतो. अन्यथा, भविष्यात आपण केवळ यांत्रिक आणि भावनाशून्य जगाचे नागरिक बनून राहू, जिथे ‘सगळं उभं असेल’, पण ‘माणूस’ मात्र कोसळलेला असेल.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द टर्न ऑफ टाईड… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ द टर्न ऑफ टाईड… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.

त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली… शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले…

‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी. ’’ 

गॉर्डन तयारच होते…

त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,

‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे. ’’ 

दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले…

सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली…

त्यावर लिहिले होते… ‘ऐका.’ 

काय ऐकायचे…? त्यांना प्रश्‍न पडला…

ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले… एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…

झाडीतून वाहणारी हवा…

मध्येच समुद्रावरून येणारा वारा,..

विभिन्न पक्षांचे आवाज,..

दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्‍या पक्षांचे आवाज… ,

अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या…

जणु काही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते…

भाग आहोत, हे त्यांना जाणवले…

मनातला सर्व कोलाहल थांबला… एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता…

बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही…

दुसर्‍या चिठ्‌ठीची वेळ झाली होती…

त्यावर लिहिले होते,… ‘मागे वळून पहा. ’ 

त्यांना काय करायचे कळले नाही. पण सूचनांचे पालन करायचेच होते. त्यांनी विचार करणे सुरू केले….

भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला… आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,.. बालपणीचे सवंगडी,.. कट्‌टी आणि क्षणात होणारी दोस्ती,.. त्या हसण्या-रडण्यातील सहजता,.. अकृत्रिम वागणे,.. इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले….

भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले….

आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते, हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…

आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो. संबंधात कृत्रिमता, दिखावूपणा, औपचारिकता जास्त आली.

… या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्‌ठी उत्सुकतेने उघडली…

त्यात लिहिले होते, ‘‘आपल्या उद्दिष्टांची छाननी करा. ’’

गॉर्डन म्हणतात, ” मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही. पण मी सखोल परीक्षण केले… आपले उद्दिष्ट काय..?

यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत… ” त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…

सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्‌ठी उघडली.

त्यात लिहिले होते, ‘‘सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये. ’’ 

त्यांनी एक शिंपला घेतला… आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या… आणि ते घरी जायला निघाले… समुद्राला भरती येत होती… त्यांनी मागे वळून पाहिले.. , एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….

गॉर्डन म्हणतात, त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणुसकीचं दुकान … – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ माणुसकीचं दुकान … – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

ते रोजच्याप्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली —

“काका… काका…”

ते वळाले.

७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती.

“काय झालं गं… एवढी धावत आलीस? “

काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं.

“काका… पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती… “

मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.

काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं.

“आता दुकान बंद केलं गं… सकाळी ये, मिळेल. “

“पण आता हवी होती… “

तिने हळू आवाजात सांगितलं.

“लवकर यायचं होते ना ग… आता सगळं आवरून ठेवलंय. “

त्यांनी सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं.

मुलगी गप्प झाली. नजर खाली घालून बोलली,

“सगळी दुकानं बंद झालीत. आणि घरी पीठही नाही… “

हे ऐकून काकांचं काळीज सुन्न झालं. क्षणभर ते शांत राहिले.

“तू आधी काआली नाहीस गं? “

“बाबा आत्ता घरी आलेत… आणि घरी… “

ती थांबली, बहुतेक अश्रू रोखत होती.

काकांना काही विचारायचं नव्हतं आता. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिलं, आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली.

दुकान उघडलं, आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ न तोलता थेट थैलीत टाकून दिलं.

ती थैली घेताना म्हणाली,

“थॅंक यू काका… “

“काही नाही गं… आता घरी नीट जा. “

त्या रात्री ते झोपू शकले नाहीत. त्या मुलीचं चेहरा, तिची हतबलता आणि ती एक ओळ 

“घरी पीठही नाही… “

ती सातत्याने त्यांना अस्वस्थ करत राहिली.

त्यांना स्वतःचं बालपण आठवलं.

रिक्शा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई… पाण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली रात्र…

“आज माझ्याकडे दुकान आहे, कमाई आहे… पण माणूसकी आहे का? “

स्वतःला त्यांनी विचारलं.

दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांनी एक फलक लावला,

“तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील, तरी संकोच करू नका. हक्काने मागा..

ही उधारी नाही, माणुसकी आहे. “

आणि बाजूला एक डबा ठेवला..

“जर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल, तर या डब्यात पैसे टाका. “

सुरुवातीला लोक चकित झाले. पण हळूहळू समजलं… हे प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे.

एक आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली… या वेळेस आपल्या लहान भावासोबत.

“काका, बाबांनी काही पैसे दिले आहेत… मागच्या वेळेस जे घेतलं होतं, त्याचे पण पैसे यातून घ्या. “

“नाही ग, त्या दिवशी जे दिलं होतं, ते माणुसकीचं होतं. त्याचा हिशोब नसतो. “

मुलगी हसली. फलक वाचला आणि म्हणाली

“बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की, या डब्यात पैसे टाकतील.. जेणेकरून इतरांनाही मदत होईल. “

त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यांत पाणी आलं.

खरंच, “नेकी कधी वाया जात नाही. ”

हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं —

“माणुसकीचं दुकान. “

गल्लीतल्या आजीबाई, एकटे राहणारे वृद्ध, रोजंदारी करणारे मजूर… आता तिथून सन्मानाने सामान घेत.

सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत जातात.

शाळेतली मुलं आपला गुल्लक फोडून त्यात पैसे टाकू लागली.

हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं, ते एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं.

नंतर एका स्थानिक पत्रकाराने ही गोष्ट प्रसिद्ध केली…

“जिथे नफा नाही, गरज महत्त्वाची.. वाचा माणुसकीच्या दुकानाची गोष्ट”

ही बातमी व्हायरल झाली. अनेक सोशल मीडिया पेजेसनी त्यावर व्हिडीओ बनवले.

लोक लांबून या दुकानाला बघायला येऊ लागले.

पण दुकानदाराने कधीही त्याचा फायदा घेतला नाही.

“जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं, तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल. “

ती मुलगी आता रोज शाळेत जाते.

दुकानदाराने तिच्या शिक्षणाची फी गुप्तपणे भरली.

एक दिवस तिचे बाबा म्हणाले

“त्या दिवशी तुम्ही केवळ तांदूळ आणि डाळ दिली नव्हती, माझ्या मुलीला विश्वास दिला की जगात अजूनही चांगले लोक आहेत. “

आजही त्या दुकानाबाहेर तो फलक आहे —

“तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील, तरी संकोच करू नका. “

आणि त्या डब्यात रोज कुणीतरी शांतपणे काहीतरी टाकून जातं…

ही गोष्ट एका चिमुरडीची आहे, पण हे एक मोठं परिवर्तन बनलंय.

“बदल बाहेरून नाही होत… तो आपल्या अंतःकरणातून सुरू होतो. “

लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं..!!!” – लेखक – श्री दिनेश हसबनीस ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं..!!!” – लेखक – श्री दिनेश हसबनीस ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात कि ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात!!!

१) रायगड १००० वेळा चढून जायचा संकल्प गायक श्री सुरेश वाडकरांनी केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादही देतात. 

२) श्री जेधे नावाचा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.

३) डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत… रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की “रूळ ओलांडू नका, पुलावरून जा”. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर! तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार…? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते, इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 

४) मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या त्याला बोलतं केलं होतं. त्याने सांगितलं,

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो.” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण, अब वक्त बदल गया…, आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

५) एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की, मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची! आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका…!!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले होते! प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 

६) शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो – जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या, असे उपाय सुचवतो.

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 

७) असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी. पती-पत्नी दोघेही सायकिऍट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. 

— — ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं. 

…… आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात. त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की, ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 

एक अभंग आहे….;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना”

नीट वाचलं की समजतं;

आम्ही “बी घडलो, “

तुम्ही “बी घडाना

माहिती संकलन : श्री दिनेश हसबनीस

पत्रकार नागपंचमीचे शिराळा. 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’आई आठवताना…’ – लेखक : डॉ. रघुनाथ माशेलकर – शब्दांकन : श्री सागर देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ’आई आठवताना…’ – लेखक : डॉ. रघुनाथ माशेलकर – शब्दांकन : श्री सागर देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

माझ्या पहिल्यावहिल्या विदेश प्रवासाच्या वेळी असंच झालं. इंग्लंडला जायचं होतं. तिकिटाचे पैसे नव्हते. आमच्या ओळखीच्या काही जणांनी मदत केली. हे सर्व पैसे नंतर आम्ही परतही केले. चाळीतल्या आमच्या छोट्याशा जागेत अभ्यासाजोगं वातावरण कुठून येणार? मग गिरगाव चौपाटीवरील दिव्यांच्या प्रकाशात मी अभ्यास करायचो. रेल्वे स्टेशनवर शेवटच्या गाड्या गेल्या की तिथे प्लॅटफॉर्मवर जाऊन बसायचो. अभ्यासातली चिकाटी कायम होती; त्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात 30 वा आलो आणि बारावीच्या परीक्षेत बोर्डात 11 वा आलो. माझ्या आईला अशा वेळी खूप आनंद होत असे. मात्र पुढचं उच्चशिक्षण घेणं अशक्य आहे असं वाटत असतानाच, सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली आणि माझं शिक्षण पुढं चालू राहिलं.

गोव्यात मडगाव येथे 10 मे 2011 रोजी माझ्या ‘Reinventing India’ या ग्रंथाचं प्रकाशन झालं. माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मातृभूमीची -म्हणजेच आपल्या भारत देशाची समृद्ध वाटचाल आणि भविष्याची दिशा रेखाटण्याचा प्रयत्न मी या ग्रंथात केला आहे. हे पुस्तक मी माझ्या आईला अर्पण केलं आहे. त्या अर्पणपत्रिकेत मी लिहिलंय… “dedicated to my mother, who is no more, and yet is everywhere. “

आजही माझ्या आईचं सदेह अस्तित्व नसलं तरी ती आमच्या सहवासातच आहे; किंवा आम्ही कुटुंबीय तिच्या सहवासात आहोत, अशी माझी भावना आहे.

‘माझी आई माझं प्रेरणास्थान आहे, तिने मला जीवनमूल्यं शिकवली’, असं मी नेहमी सांगतो. कारण तिच्यामुळंच मी घडलो, संस्कारित झालो आणि आयुष्यातील अनेक आव्हानांना सामोरा जात-जात इथंवर येऊन पोचलो.

दक्षिण गोव्यातलं माशेल हे आमचं मूळ गाव. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं. आई आणि मी एकमेकांच्या सोबतीला उरलो. मला त्यावेळचं फारसं आठवत नाही; पण वडिलांच्या निधनानंतर आई आणि मी मुंबईत आलो. त्यानंतर आम्हा मायलेकरांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. माझ्या आईचं नाव अंजलीबाई. प्रचंड सोशिक, धीराची अन्‌ जिद्दीचीही.

गिरगावातील खेतवाडीमध्ये एका छोट्याशा चाळीत आम्ही राहू लागलो. उदरनिर्वाहासाठी आई कष्टाची अनेक कामं करायची. तिचं शिक्षण जे ते लिहिण्या-वाचण्यापुरतंच झालं होतं. त्यामुळे तिला नोकरी मिळत नव्हती.

शिवणकाम मिळणार म्हणून ती एकदा काँग्रेस हाऊसजवळ गेली. मोठी रांग होती तिथं. संध्याकाळी तिचा नंबर लागला. पण ‘किमान तिसरी झालेल्यांनाच घेतलं जाईल’, असं सांगण्यात आलं. त्यामुळं तिला नाइलाजाने परत फिरावं लागलं; पण त्याचवेळी तिनं आपल्या मनाशी निश्चय केला, ‘मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. ’

मला आठवतंय… गिरगावातून लोअर परळपर्यंत डोक्यावर कापडाचे तागे घेऊन ती चालत जात असे. दोनशे वार कापड ती डोक्यावरून वाहून न्यायची; कारण पाटीवाल्याला द्यायला सहा आणेही तिच्याकडे नसत. म्युनिसिपालटीच्या शाळेत मी जाऊ लागलो; पण त्या वेळी शाळेतल्या चाचणी परीक्षेसाठी लागणारा तीन पैशांचा कागद आणणंही आम्हांला अशक्य व्हायचं. आमची शाळाही गरीब होती. माझ्या आईच्या डोळ्यांत त्या वेळी पाणी यायचं, तरी तिनं धीर सोडला नाही.

लहानपणापासून मी अभ्यासात हुशार होतो, पण समोर प्रतिकूल परिस्थितीचं आव्हान! वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत मला अनवाणी चालावं लागलं. तरीदेखील मोठ्या निर्धारानं प्रयत्नपूर्वक माझा अभ्यास मी सुरू ठेवला. अभ्यासातली एखादी शंका आली, काही अडलं तर विचारणार कुणाला? माझा एक मामा दोन वर्षं मुंबईत होता, त्याची त्या वेळी मदत झाली, मार्गदर्शन मिळालं. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेत मला खूप चांगले शिक्षक लाभले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे. खेतवाडीतील मराठी शाळेमध्ये प्रवेश फीचे 21 रुपये भरायचे होते. त्या वेळी एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? अखेर कुठून कुठून मागून, उसनवारी करून माझ्या आईनं या पैशांची जुळवाजुळव केली.

पुढं माझ्या पहिल्यावहिल्या विदेश प्रवासाच्या वेळी असंच झालं. इंग्लंडला जायचं होतं. तिकिटाचे पैसे नव्हते. आमच्या ओळखीच्या काही जणांनी मदत केली. हे सर्व पैसे नंतर आम्ही परतही केले. चाळीतल्या आमच्या छोट्याशा जागेत अभ्यासाजोगं वातावरण कुठून येणार? मग गिरगाव चौपाटीवरील दिव्यांच्या प्रकाशात मी अभ्यास करायचो. रेल्वे स्टेशनवर शेवटच्या गाड्या गेल्या की तिथे प्लॅटफॉर्मवर जाऊन बसायचो. अभ्यासातली चिकाटी कायम होती; त्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात 30 वा आलो आणि बारावीच्या परीक्षेत बोर्डात 11 वा आलो. माझ्या आईला अशा वेळी खूप आनंद होत असे. मात्र पुढचं उच्चशिक्षण घेणं अशक्य आहे असं वाटत असतानाच, सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली आणि माझं शिक्षण पुढं चालू राहिलं.

मोलमजुरी करून आपल्या मुलाला वाढवताना त्यानं काही वावगं वागू नये, यासाठी माझ्या आईचं माझ्यावर बारीक लक्ष असे. लहानपणी मी पत्ते, गोट्या खेळलेलं तिला अजिबात आवडत नसे. एकदा तर तिनं गोट्या गटारात फेकायला लावल्या होत्या. पत्ते हातात दिसल्यावरही ती रागावल्याचं मला अजून आठवतंय.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून मी पुढचं शिक्षण घेतलं. रासायनिक अभियंता झालो. नोकरी शोधू लागलो. एवढ्या वर्षांच्या काबाडकष्टांनंतर आपल्या आईला चार दिवस सुखाचे लाभावेत ही त्यामागची इच्छा होती. पण आईनं विचारलं, ‘तुझ्या विषयातली पुढची पदवी कोणती? ती तू घे. ’ मग अवघ्या तीन वर्षांत मी पीएच. डी. झालो.

आई म्हणायची, ‘तू घरात नको लक्ष घालू, जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घे. पोट हे भरतंच, त्यासाठी मी काम करीन. मी तुझ्या पाठीशी आहे. कष्टाचं फळ परमेश्वर आपल्याला देतोच. ’ परदेशात मी गेलो तेव्हा दर आठ दिवसांनी मी व आई एकमेकांना न चुकता पत्र पाठवत असू. तिला इंग्रजी येत नव्हतं आणि म्हणून ती माझ्या मित्रांकडून पाकिटावर इंग्रजीतून पत्ता लिहून घेई. शेवटी तिला वाटलं की, आपणच शिकावं. तिने कॅपिटल इंग्रजी अक्षरात स्वत: पत्रावरील पत्ता लिहून मला पत्र पाठवलं होतं.

माझ्या मुलींकडून फोन करायला ती शिकली. मी दौऱ्यावर असलो की नियमितपणे तिच्याशी फोनवर बोलायचो. घरात कोकणी बोलायची, पण पुढे ती एखादं इंग्रजी वाक्यही बोलून जायची. मला खूप आनंद वाटायचा.

एक गोष्ट आवर्जून नोंदवलीच पाहिजे. माझी पत्नी वैशाली आणि माझी आई यांच्यातले संबंध हे अगदी आई आणि मुलीसारखेच होते. खूप जिव्हाळा होता दोघींमध्ये.

पुण्यात 2000 साली सायन्स काँग्रेसचं ऐतिहासिक आणि संस्मरणीय अधिवेशन झालं, त्या वेळी माझं अध्यक्षीय भाषण झालं. पंतप्रधान अटलजींसह अनेक नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज व हजारो पुणेकर त्यावेळी उपस्थित होते. माझी आई टी. व्ही. वरून हा सोहळा पाहात होती. त्या वेळी तिला खूप समाधान वाटलं, आनंद वाटला. तिच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं, अशीच जणू तिची भावना होती!

अलीकडेच काही वर्षांपूर्वी माझ्या आईचं वार्धक्यानं निधन झालं, पण अधूनमधून ती माझ्या स्वप्नात येते. आशीर्वाद देते. आता ती नाही याची पोकळी जाणवतेच, पण तिच्या आशीर्वादामुळे आणि आठवणींमुळे तिचं अस्तित्वही जाणवतं. तिची शिकवण आणि तिची मूर्ती नेहमी डोळ्यांसमोर येते.

 

लेखक : डॉ रघुनाथ माशेलकर

ram@ncl. res. in

शास्त्रज्ञ

शब्दांकन : श्री सागर देशपांडे

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चोर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “चोर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका शाळेतील आठव्या इयत्तेतील एका विद्यार्थ्याला चोर या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. त्याने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे तुम्हालाही विचार करायला लावतील. त्याचा निबंध असा…..

राष्ट्राच्या अर्थकारणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चोर होय. तो या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. राष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्योग पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण मी आता यावर आणखीन काही प्रकाश टाकू इच्छितो.

चोरांपासूनच संरक्षणासाठी तिजोऱ्या, कपाटे, कुलपे, बनविली जातात. या वस्तू बनविण्याच्या उद्योगामुळे पुष्कळ कारखाने यात गुंतले आहेत. त्यायोगे खूप कामगारांना रोजगार मिळतो. अगदी सोसायटीत किंवा बंगल्यातही कंपाउंड असतात, त्याला गेट असतात व गेटवर वॉचमन म्हणून काम करणाऱ्यांना नोकऱ्या मिळतात. इतरही काही कारागिरांना पोटासाठी पैसे मिळू शकतात. त्यांचे व्यवसाय म्हणजे खिडक्या दारांवर जाळ्या बसविणे, कुलपे बसविणे इत्यादी. चोरांमुळेच घरे, दुकाने, शाळा-कॉलेजेस, कचेऱ्या आणि कारखाने सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, आणि अशा इतर साधनांची निर्मिती करीत राहतात आणि या योगेही अनेक रोजगार निर्माण होतात.

पोलीस, वकील, न्यायाधीश, कोर्ट-कर्मचारी, अशा अनेक लोकांची नेमणूक चोरांमुळेच होते. शिवाय पोलिसांच्या मदतीसाठी बॅरिकेड, शस्त्रे, बंदुकीतील गोळ्यांचे पट्टे, गणवेश, वाहने, गाड्या, मोटरसायकली अशा बऱ्याच वहानांची खरेदी केली जाते. त्यामुळे देशाच्या आर्थिक उलाढालीस चालनाच मिळते.

शिवाय कारागृहातील कर्मचारी, ज्वेलर्सच्या दुकानातील रखवालदार, यांना चोरांमुळेच नोकऱ्या मिळतात. चोर कैदी म्हणून कारागृहात असताना अनेक वस्तूंची निर्मिती करीत असतात, आणि त्यांच्या विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळू शकते.

जेव्हा मोबाईल, लॅपटॉप, मोटारी, बाईक्स, इ. गोष्टी चोरीला जातात तेव्हा त्यांची नक्कीच पुन्हा खरेदी केली जाते. त्यामुळे व्यापारही वाढतो. खूप प्रसिद्ध अट्टल चोर राजकारणात जातात आणि तेथेही घोटाळे करतात. मात्र अशा राजकीय चोरांचा देशाच्या अर्थकारणाला अजिबात फायदा होत नाही कारण ते देशासाठी नाही तर स्वतःसाठीच जगत असतात. असो.

तसेच ‘ चोर ‘ या शब्दामुळेच चित्रपटसृष्टीला प्रसिद्धी आणि अर्थही मिळतो. उदाहरणार्थ ‘चोरी चोरी’, ‘चोरी मेरा काम’, ‘चितचोर’, ‘चोर मचाये शोर’, ‘चोरोंकी बारात’, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ इत्यादी इत्यादी.

आणि त्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी कित्येक लोकांना कित्येक दिवस रोजगार मिळतो.

आपली मराठी भाषाही ‘चोर’ या एक शब्दावरून आलेल्या कितीतरी म्हणींमधून समृद्ध झाली आहे. उदाहरणार्थ – – चोरावर मोर / चोराच्या मनात चांदणे/ चोर सोडून संन्याशाला फाशी / चोर तो चोर वर शिरजोर.. इत्यादी.

अजूनही बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण एकंदरीतच देशाच्या आर्थिक प्रगतीत चोरांचा वाटा हा वाखाणण्यासारखाच आहे हे मात्र नाकारता येणार नाही असं माझं ठाम मत आहे..

…. शिक्षकांनी या संशोधनपूर्ण निबंधास 100 गुण देऊन त्या विद्यार्थ्याची गणना मेरिट लिस्टमध्ये सुद्धा केली आहे.

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अंतर्मुख करणारी गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “अंतर्मुख करणारी गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

लग्न पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला होता.

नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली, मग ती आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली.

सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती.

नवरदेव अविनाश आपला मित्र विकाससोबत गप्पा मारत होता.

विकास म्हणाला,

“यार अविनाश, एक काम कर…

घरी पोचताक्षणी ‘अमृतबाग’ हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू…

इथे तुझ्या लग्नात काही मजा आली नाही जेवणात. “

तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हटला, ” पनीरची भाजी पण काही खास नव्हती…आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता. खूपच पांचट जेवण होते रे “

आणि मोठ्याने हसायला लागला.

अविनाशही हसत म्हणाला –

“जाऊ आपण अमृतबागला, जे पाहिजे ते खा…

इथे काही चवच नव्हती… पुऱ्यापण गरम नव्हत्या. ” मामा व मावस भाऊ, मावस बहिणी म्हणाल्या की आपण झोमॅटो वरून काहीतरी इथे चटपट मागून घेऊ.

हे सगळं ऐकून,

नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की ती अचानक मागे वळली,

डोईवरचा पदर काढून कंबरेला खोवत तडक वडिलांकडे आली आणि त्यांचा हात हातात घेत म्हणाली,

“मी या लग्नाला नकार देते बाबा…

माझं हे लग्न मला मान्य नाही! “

सगळे थक्क झाले…

नेहाच्या सासरच्यांना तर धक्काच बसला… कोणालाच काही कळेनासे झाले.. सगळे

तिच्याजवळ जमले.

सासरे श्यामराव पुढे आले.

“अगं सुनबाई, असं झालं तरी काय?

लग्न पार पडलं आहे…

आता अचानक का नाही म्हणतेस? “

अविनाशही धावत आला,

त्याचे मित्र, भावंडं सर्वजण…

नेहा सासऱ्यांना म्हणाली,

“मामंजी, माझ्या आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून माझं शिक्षण, माझं भविष्य घडवलं…

वडिलांनी किती रात्रंदिवस जागून

या लग्नासाठी तयारी केली…

आईनं नवीन साडीही घेतली नाही,

दुसऱ्याची साडी घालून लग्नात उभी आहे…

वडील १५० रुपयांचा शर्ट घालून उभे आहेत…

त्या शर्टच्या आत शंभर भोकं असलेलं बनियन आहे!

आणि माझ्या नवऱ्याला पुऱ्या थंड वाटल्या??

त्याच्या मित्राला पनीर आवडलं नाही??

दिराला रसगुल्ला फिक्का वाटला??

ही फक्त अन्नावर टीका नाही,

माझ्या वडिलांच्या त्यागावर, मेहनतीवर आणि इज्जतीवर चिखलफेक आहे…

हे जेवण कॅटररनं बनवलंय.

माझ्या वडिलांनी नाही…

पण त्यांच्या मनानं, मनगटानं, त्यागानं ते अन्न बनलंय…

आणि त्या अन्नाची निंदा करणं म्हणजे माझ्या वडिलांचा अपमान करणं. “

वडिल म्हणाले –

“बाळा, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी…? “

नेहा म्हणाली –

“ही छोटी गोष्ट नाही बाबा…

माझ्या पतीच्या नजरेत जर माझ्या पित्याचा मान नाही,

तर मला असा संसार नको…

माझ्यात तुमचं सर्वस्व आहे,

हे ज्यांना दिसत नाहीत,

त्यांच्याशी माझं नातं मी जोडणार नाही. “

इतकं बोलल्यावर सगळे शांत झाले…

 

अविनाश पुढे आला, हात जोडले सासऱ्यांपुढे,

“माफ करा बाबा… माझी चूक झाली…

मी अज्ञानीपणानं बोललो…”

श्यामराव पुढे आले, डोळ्यात पाणी होतं “बेटा, मी सुन घेऊन जायचो म्हणत होतो,

पण मला मुलगी मिळाली…

माझं नशीब की ईश्वराने तुला माझी कन्या बनवली…

माफ कर मला… मला पूर्ण खात्री आहे की तू माझं घर उजळवशील. “

नेहाने त्यांच्या पायाला स्पर्श् केला…

” मामंजी …”

ते म्हणाले – “नाही, आता फक्त ‘बाबा’ म्हण. “

दोघेही भारावून गेले…

शंकरराव अभिमानानं पाहत होते…

आपली कन्या आज खऱ्या अर्थाने मोठी झाली होती…

आता नेहा सासरी रवाना झाली…

मागे राहिलं फक्त तिचं घराभोवतीचं रिकामं झालेलं अंगण,

आई-बाबांचे अश्रूंनी भरलेले डोळे…

आणि एक मोठा संदेश….

“जेव्हा आपण कुणाच्या मुलीच्या लग्नाला जाऊ, तेव्हा भाजी बेचव, पुऱ्या थंड, रसगुल्ला कोरडा वाटल्यासारखी टीका करू नका…

कारण त्या अन्नासाठी एका वडिलांनी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो,

त्या जेवणाला बनायला केवळ २ तास लागले असतील,

पण त्या अन्नामागे मुलीच्या पित्याचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो…

“लेक” ही परकं धन नसते,

ती आई-वडिलांची शान असते.

जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल,

तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा…

लेकीचा मान ठेवा…

एका वडिलाच्या स्वप्नांचा आदर ठेवा……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “एका रुपयात पोटभर आनंद!” – लेखक : श्री रवींद्र पिंगे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “एका रुपयात पोटभर आनंद!” – लेखक : श्री रवींद्र पिंगे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

घटना घडायच्या असल्या की, त्या ‘अचानक’ घडून जातात.

आता मी ‘अचानक’ हा शब्द वापरलाय खरा, पण तो निव्वळ सवयीने. अचानक वगैरे काहीही नसतं. सर्व काही ठरलेलं, पूर्वनियोजित असतं. महाकवी शेक्सपिअरचे शब्द आहेत, ‘‘कुठली घटना घडायची नि कुठली माणसं तुम्हांला आयुष्यात भेटायची, ह्याचं रोपण अगोदरच झालेलं असतं. ’’

ह्याचा मला प्रत्यय आला.

बाजारात नऊ रुपयांची खरेदी केली. त्यासाठी दहा रुपयांची नोट दिली, तर दुकानदार म्हणाला, ‘‘माझ्याकडे परत करायला एक रुपया सुटा नाही. ’’

आता काय करावं? माझ्या पत्नीने मला केव्हापासून बजावून ठेवले आहे की, कुणाकडेही परत करायला एखादी रुपया नसला, तर त्याला रुपयाच्या मिरच्या घालायला सांगायचं. स्वयंपाकात पावलापावलाला मिरच्या लागतात. त्या मागायच्या म्हणजे दुकानदार यांचंही नडत नाही नि आपलंही काम होऊन जातं. हे खरंच आहे, पण ज्या दुकानदाराकडे परत द्यायला सुटा रुपया नव्हता, ते भाजीपाल्याचं दुकान नव्हतं; वाटलं, आपण त्या रुपयाचा मोह सोडून द्यावा. नाहीतरी आजकाल रुपयाला मोल उरलंय कुठं? असं काय मिळणारंय त्या चिमुकल्या रुपयात? त्यापेक्षा आपण त्या रुपयावर पाणी सोडू या. रिक्षावाल्यांकडे परत करायला सुटे पैसे अनेकदा नसतात, तेव्हा आपण कुठे भांडत बसतो? सोडून देतो ते पैसे. तसंच हेसुद्धा करायचं. पैसे सोडायचे. मग फेरविचार केला, रुपयावर पाणी नाही सोडायचं. पैसे मिळवायला आपल्याला किती कष्ट उपसावे लागतात! आपण थोडा वेळ थांबू, दरम्यानच्या काळात दुकानदाराकडे सुटा एक रुपया नक्कीच येईल. तो घ्यायचा नि नंतरच निघायचं.

सुदैवाने तिष्ठावं लागलं नाही. माझा बाकी रुपया माझ्या ताब्यात घेतला.

पुढचा प्रश्न- ह्या रुपयात अशी काय मोठी खरेदी करता येणाराय? साधे मुरमुरेसुद्धा मिळणार नाहीत. इतक्यात आठवलं की एका रुपयात दोन पोस्टकार्ड मिळतात. ती घेऊ या. घेतली.

लगेच पुढचा प्रश्न – ही कार्डं पाठवायची तरी कुणाला? हल्ली घरोघरी दूरध्वनी यंत्रं बसलेली आहेत. जे काय निरोप द्यायचे-घ्यायचे असतात, ते तिथल्या तिथे वेळ न दडवता फोन वरून दिले-घेतले जातात. लिखापढीची कटकट करतो कोण? मग आता ह्या दोन कार्डांचं करायचं काय?

इतक्यात आठवलं, की आम्हांला साठ वर्षांपूर्वी शाळेत शिक्षक असलेले मुळ्येमास्तर आता नव्वद वर्षांचं पिकलं पान होऊन बोरिवलीला आपल्या नातवाकडे राहायला आले आहेत. त्यांनी मला कोणे एके काळी बीजगणित शिकवलेलं आहे. त्यांना जुनी आठवण काढून पत्र पाठवावं. कृतज्ञता व्यक्त करावी.

दोनांपैकी एक कार्ड मायाळू शब्द पेरून मी मुळ्येसरांना पाठवलं. आठवडाभराने त्यांचं कापऱ्या अक्षरातलं जिव्हाळ्यानं लिहिलेलं उत्तर आलं;

“चि…, तुझं पत्र वाचून आनंद झाला, त्यापेक्षा आश्चर्य वाटलं, कारण गेल्या पंचवीसेक वर्षांत मला कुणीही, कधीही साधं कार्डसुद्धा पाठवलेलं नाही. ही जगरहाटीच आहे. जुनी माणसं कालांतराने अडगळीत पडतात. त्यातून मी तर साधा शिक्षक. तू माझा विद्यार्थी होतास हे मला आठवत नाही, पण तू माझी इतक्या वर्षांनंतरही आठवण ठेवलीस ह्याचा संतोष आहे. कधीतरी समक्ष भेटायला ये. लवकर ये, मी कायम घरीच असतो. येताना भेटवस्तू आणू नये, मला त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त प्रेम आणावे.’’

मुळ्येसरांचं पत्र वाचून मी गहिंवरलो. वाटलं, मी कृतज्ञतेने त्यांना कार्ड पाठवलं ही लाख मोलाची गोष्ट झाली. अस्ताला चाललेला तो म्हातारा जीव किती फुलला असेल!

दुसरं कार्ड तसंच पड़ून राहिलं. नंतर माझी कोकणात फेरी झाली. तिथे खाड़ीकाठावरल्या बंदरात मी तरीची वाट पाहत रेंगाळलो होतो. बंदरात कोकणी मुसलमान होडीवाल्यांची नि मच्छीमारांची अगदीच रया गेलेली वस्ती आहे. मूर्तिमंत दारिद्र्य, आश्चर्य म्हणजे मी तरीची वाट पाहात असताना बंदरावर माझ्या शेजारी एक गरीब कोकणी मुसलमान बाईसुद्धा तरीची वाट पाहत उभी होती. तिच्यासोबत तिचं तीन-साडेतीन वर्षाचं लेकरू होतं. त्याच्या अंगावर जेमतेम कपडे होते. तरीची वाट पाहणारी ती खेडवळ माता आपल्या त्या मुलाला गाणं म्हणत नाचायला, डुलायला, हावभाव करून कौतुकाने शिकवीत होती, नि ते बाळ आईने दाखवल्याप्रमाणे आपल्या परीने नाच करून दाखवीत होतं. गाणं होतं,

‘नाच रे मोरा…. ‘

मायलेकरांचा तो उमाळ्याचा प्रेमाचा प्रसंग पाहून मला खोलवर दिलासा वाटला. एक कंगाल कोकणी मुसलमान माता, जिला कदाचित मराठीची अक्षरओळखसुद्धा नसेल, ती आपल्या लेकराला एक गाणं तालावर म्हणून नाचायला, डुलायला शिकवते ही किती हृद्य घटना आहे! ह्या गीताचे शब्द गदिमांचे नि तालबद्ध स्वररचना पु. ल. देशपांडेंची. माझ्या मते मराठीतलं अगदी तळागाळापर्यंत झिरपत गेलेलं गाणं म्हणजे पु. लं. नी संगीतबद्ध केलेलं ‘नाच रे मोरा… ‘ अक्षरओळख असो-नसो, गळ्यात सूर असो-नसो, घरोघरच्या आयांनी आपल्या लेकरांना ते गाणं साभिनय म्हणून दाखविलेलं आहे, नि घरोघरचे बोबडे बालगोपाल ते सूर ऐकताना ठेक्यावर डुलले आहेत. गावोगावच्या मातांनी आणि त्यांच्या लेकरांनी ते गाणं गात गात घरीदारी आनंदाचा कल्लोळ अनुभवला असेल. हजार वेळा, घरी परतल्यावर त्या शिल्लक राहिलेल्या कार्डावर हा प्रसंग लिहून मी पु. लं. ना कळवला नि लिहिलं,

‘ज्ञानोबांचे नि तुकोबांचे शब्द समाजात तळागाळापर्यंत पोहोचले असं आपण म्हणतो, ते खरंच आहे. पण गायला सहज-सोपी आणि हावभाव करून दाखवायला त्याहीपेक्षा सोपी, अशी तुमची लयबद्ध चाल तळागाळापर्यंत पोहोचलेली, मी मालप्याच्या तरीवर ऐकली. कोण ती कोकणातल्या बंदरवस्तीतली एक मुस्लीम माउली? पु. ल. देशपांडे हे नावसुद्धा तिला माहीत नसेल, पण तुम्ही विणलेली रेशमी चाल मात्र तिच्या काळजापर्यंत पोहोचली नि ती तिच्या हाडकुळ्या लेकराला सुरावर म्हणते, ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… ‘ आणि ते बाळ तसं नाचतं! अशा हजारो-लाखो आया गावोगाव असतील. भाई, तुम्ही जिंकलंत!’ 

भाईंचं कापऱ्या अक्षरात लिहिलेलं कार्ड उलट-टपाली आलं. त्यांनी लिहिलं होतं, ‘‘पिंगे, तू अगत्याने लिहिलंस त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु. ल. देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत. मी कसलाही पराक्रम केलेला नाही. फक्त जीव ओतून काम केलं. ते माझ्या हातात होतं. कंपवातामुळे हात थकला. थांबतो. ’’

तुझा,

‘भाई.’

हे पत्रोत्तर हाती पडलं तेव्हा माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं, ते पु. लं. नी दोन वाक्यांत सांगितलं. जीव लावून काम करा, बस्स. क्षणभर वाटलं, ते कार्ड फ्रेम करून भिंतीवर लावावं, तेच थोर लेखक, जे अनुभवाचे उत्तर दोन-चार शब्दांत तुमच्या हाताला लावतात. विनोबांच्या नंतर त्या ताकदीचे फक्त पु. ल. देशपांडे!

पुढे व्हायचं तेच झालं. ह्याला दाखव, त्याला दाखव, करता करता पत्राला पंख फुटले. घ आभाळात दूर कुठेतरी ते भटकत असेल. हाती आलेल्या एका रुपयाची दोन पोस्टकार्डं मी सहज म्हणून खरेदली नि ती योग्य ठिकाणी, योग्य संदर्भात निर्हेतुक पाठवली. त्यांच्या बदल्यात मला लाभलेला आनंद केवढा पोटभर ठरला!

तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कुणाला पाठवलं…. तुम्हाला कुणाचं आलं…

धन्यवाद ! आपल्या वाचनाबद्दल !!

 

लेखक : रवींद्र पिंगे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’हो… अगदी आत्ताच जागा झालोय’ – लेखक : श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ’हो… अगदी आत्ताच जागा झालोय’ – लेखक : श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

” हो… अगदी आत्ताच जागा झालोय “

बर्‍याच दिवसांनी आला होता तो आज, त्याच्या आईकडे. पुण्याहून मुंबईला येणं हल्लीच्या दिवसात, हे एखाद्या फाॅरेन कंट्रीहून येण्यासारखंच झालं होतं. पण तरीही तो आला होता… एकटाच. आतून अगदी खोलातून त्याला वाटलं होतं की, आईला ताबडतोब भेटायला हवं. मग वर्क फ्राॅम होमचं मानगुटीवरचं भुत… दोनेक दिवसांकरता उतरवून, त्याने मुंबई गाठली होती. आई अर्थातच खुश झाली होती प्रचंड, लेकाला जवळपास आठेक महिन्यांनी बघून. आणि लगोलग थोडीशी नाराजही झाली होती… सुन, नातवंडं नं आलेली पाहून. अर्थात ह्या अशा दिवसांत… लहानग्यांना घेऊन प्रवास शक्यतो टाळावाच, हे समजून घेतलं होतं आईने.

तर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा, चौकशा, हालहवाल झाल्यावर… आई उठली स्वैपाक करायला. लेकाला आवडते म्हणून… डाळींबी भिजवून अगदी स्वतः सोलून ठेवली होती तिने, तिचीच उसळ करणार होती आई आज. जोडीला अर्थातच आमरसही होता. तो मस्त पहुडला होता, बेडरुमच्या खिडकीखाली असलेल्या पलंगावर. इथे पडल्या पडल्या खिडकीतून बाहेर बघत बसणं, हा त्याचा छंद असे कोणे काळचा. त्यावेळी खिडकीतून तो दूरवरचा डोंगर दिसत असे… पण आता झालेल्या दोन – तीन बिल्डिंग्जमुळे, तो डोंगर पार अडला होता. पुर्वी सुर्योदय दिसणार्‍या ह्या खिडकीतून आता, थेट मध्यान्हीलाच त्याचं दर्शन घडत असे. आज डोक्यावरचा सुर्य पाहून हळहळला होता तो.

तेवढ्यात मस्त हापुस आंब्याचा, सुवास दरवळला घरभर… आंबे पिळायला घेतले गेले होते म्हणजे. पाठोपाठ वाजलेल्या कुकरच्या शिट्टीने, शिजलेल्या डाळींबीचा गंध घरभर पसरवला. पोळीवाल्या काकूंनी तव्यावर उपडी केलेली पोळीही मग, मागे न राहता खरपूस घमघमून गेली. पाठोपाठ ‘घर्रर्र’ करुन वाजलेल्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण… आईने उघडायचीच खोटी होती की, लसूण चटणीचा चटका आसमंतात दर्वळला. तोपर्यंत गॅसवरील पातेल्यातून उकळी फुटलेली आमटीही, हळूवारपणे येऊन नाकाशी हुळहुळली. त्याच्या मनात विचार आला की… “सुख म्हणजे आणिक काय असतं? “. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, समोरच्या भिंतीवरच फडफडणार्‍या मराठी कॅलेंडरकडे. पुर्णपणे कोरं – करकरीत दिसत होतं ते. त्याच्या आईला कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर, काही ना काही लिहायची सवय होती. त्याला आश्चर्य वाटलं की… “अरे हे असं इतकं रिकामं कसं? “.

ह्या विचारांतच त्याने उठून… ते कॅलेंडर हूकवरुन काढून हातात घेतलं, नी अगदी जानेवारीपर्यंत मागे गेला तो. पण एकाही तारखेवर, अगदी काहीही लिहिलेलं नव्हतं. तेवढ्यात त्याला दिसलं मागल्या वर्षाचं कॅलेंडरही, त्याच हूकवर टांगलेलं… ज्याच्या वरच हे नवं कॅलेंडर लावलेलं आईने. त्याने ते जुनं कॅलेंडरही काढलं, नी चाळू लागला तो. तर ते ही कोरच होतं. डिसेंबर, नोव्हेंबर, आॅक्टोबर असं एकेक महिना मागे जात जात… तो जुलैवर गेला नी थबकला. जुलै २०२० च्या १ ते १५ तारखा, आईच्या अक्षराने भरलेल्या होत्या. १ तारखेवर लिहिलेलं… ‘ह्यांची अमूक एक गोळी सुरु, पुढील दोन महिन्यांकरीता’. ४ तारखेवर लिहिलं होतं… ‘ह्यांच्यासाठी नवी छत्री नी पावसाळी बुट आणले’. ६ तारखेवर लिहिलेलं… ‘ह्यांच्यासाठी कंबरदुखीच्या डाॅक्टरची अपाॅईंटमेन्ट घेतली ९ तारखेची’. अशा त्या १ ते १५ तारखांपैकी… आठ – नऊ तारखांवर आईने लिहिलं होतं, पण फक्त त्याच्या बाबांबद्दल. त्याने मागे जात आणिक दहा – बारा तारखा चेक केल्या वेगवेगळ्या महिन्यांच्या, तर त्यांवरही बाबांबद्दलच काही ना काही लिहिलेलं दिसलं त्याला आईने. तो पुन्हा जुलै महिन्यावर आला… आणि त्याने १४ तारीख पाहिली, तर ती वर लिहिलं होतं… ‘ह्यांच्या जिभेची चव गेली आज’. लगेच त्याने १५ तारीख बघितली, जी शेवटची तारीख होती काहीतरी लिहिलेली. आणि त्यावर आईने लिहिलेलं… ‘आज ह्यांना कुठलाच वासही येईनासा झाला’.

मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत… म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होता, एक मोठ्ठा काळा टिंब… अर्थातच फुलस्टाॅप. “म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं? … तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे? … इतकी रिकामी झालीये ती अंतरातून, ह्या कॅलेंडर्स सारखीच? ” ह्या विचारांनीच गलबलून आलं त्याला. पण त्याने आईकडे मात्र, काहीच विषय काढला नाही ह्या बाबत. दुपारचं आईच्या हातचं मनसोक्त जेवण करुन, तिच्या हातून काही घास भरवून घेऊन… तो तृप्त होऊन झोपी गेला. संध्याकाळी पाचच्या सुमारास, चहाच्या आधणाच्या वासानेच त्याला जाग आली. आणि पुन्हा त्याला ती मागल्या वर्षीची… १५ जुलै तारीख आठवली, नी आठवलं आईने लिहिलेलं… ‘आज ह्यांना वासही येईनासा झाला’. त्याला पुन्हा कसंनूसं झालं, आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं कॅलेंडरकडे आजच्या तारखेवर.

तो चमकलाच… घाईत पलंगावरुन उतरत, तो भिंतीशी गेला. आणि त्याला दिसलं… त्याच्या आईने लिहिलेलं काहीतरी, आजच्या तारखेवर… ‘आज लेकाला हातचं करुन जेऊ घातलं… अचानक पुन्हा जगावसं वाटू लागलं’. हे वाचलं मात्र… एक हुंदका त्याला न जुमानता, जोराने बाहेर निघालाच. आजच्या तारखेवरुन हळूवार बोट फिरवत राहिला तो. तेवढ्यात आईचा आवाज आला स्वैपाकघरातून… “चहा झालाय रे… जागा झालास का? “. तो रडतच ओरडून म्हणाला… “हो… आजच, अगदी आत्ताच जागा झालोय”. उपड्या हातांनी दोन्ही डोळे पुसत उठला तो जागचा, मनोमन निर्धार करुनच की… “आता ह्यापुढे आईला आणि कॅलेंडरातील ह्या तारखांनाही, कधी एकटं पडू द्यायचं नाही”.

 

लेखक : श्री सचिन श. देशपांडे

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी?

याचं एक उत्तम उदाहरण 

 

बाभुळझाड “

*

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

*

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे

*

अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे

*

जगले आहे, जगते आहे

काकुळतीने बघते आहे

खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे

*

टक… ट्क… टक… ट्क…

चिटर फट्क… चिटर फट्क…

सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलतो आहे, शोषत आहे

*

आठवते ते भलते आहे

उरात माझ्या सलते आहे

आत काही कळते आहे, आत फार जळते आहे

कवी – वसंत बापट 

कविता मना-मनातली”

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares