☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
ही कथा आहे ‘१३ लाख रुपये दहा रुपयांच्या बदल्यात’ची.
एका व्यावसायिकाने नुकतेच दुकान उघडले होते. तेवढ्यात एक महिला आत आली आणि म्हणाली, “सेठ, तुमचे दहा रुपये घ्या…! “
व्यावसायिकाने त्या गरीब महिलेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, जणू काही त्याची नजर विचारत होती, “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले? “
बाई म्हणाली, “काल संध्याकाळी, मी वस्तू खरेदी केल्या तेव्हा मी तुम्हाला शंभर रुपये दिले. ७० रुपयांचा माल खरेदी केला. तुम्ही मला ३० रुपयांऐवजी ४० रुपये परत दिले. “
व्यापाऱ्याने दहा रुपये कपाळावर लावले, नंतर ते परत त्याच्या कॅश बॉक्समध्ये ठेवले आणि म्हणाला, “मला सांग ताई, वस्तू खरेदी करताना तू खूप वाटाघाटी करत होतीस. किंमत पाच रुपयांनी कमी करण्यासाठी तू खूप वाद घातलास आणि आता तू हे दहा रुपये परत करायला आली आहेस! ”
महिलेने उत्तर दिले, “किंमत कमी करून घेणे, हा माझा अधिकार आहे. पण एकदा सौदा झाला की, त्या वस्तूचे कमी पैसे देणे हे पाप आहे. “
तो व्यापारी म्हणाला, “पण, तू कधी कमी पैसे दिलेस? तू पूर्ण पैसे दिलेस. हे दहा रुपये चुकून तुझ्याकडे गेले. तू ते ठेवले असतेस तर मला काही फरक पडला नसता. ”
ती महिला म्हणाली, “तुम्हाला काही फरक पडत नसेल. पण माझ्या मनात नेहमीच हा सल असता की, मी तुमचे पैसे जाणूनबुजून घेतले. म्हणूनच मी काल रात्री ते परत करायला आले होते. पण तुमचे दुकान त्यावेळी बंद होते. “
व्यापाऱ्याने त्या महिलेकडे आश्चर्याने पाहत विचारले, “तू कुठे राहतेस? ”
ती म्हणाली, “मी सेक्टर ८ मध्ये राहते. ”
त्या व्यापाऱ्याचे तोंड वासले गेले.
तो म्हणाला, “तुम्ही ७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात, मला हे दहा रुपये देण्यासाठी? “
त्या महिलेने सहज उत्तर दिले, “हो, मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही, पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण एखादा माणूस गप्प राहू शकतो, पण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते. “
हे सांगून ती महिला निघून गेली.
व्यापाऱ्याने ताबडतोब कॅश बॉक्समधून तीनशे रुपये काढले आणि नोकराला म्हणाला, “तुम्ही दुकान सांभाळा, मी लवकरच परत येईन. ” तो व्यापारी बाजारातल्या एका दुकानात पोहोचला. दुकानदाराला तीनशे रुपये देत म्हणाला, “प्रकाशजी, तुमचे तीनशे रुपये घ्या. काल, तुम्ही सामान खरेदी करायला आलात, तेव्हा बिलाचे जास्त पैसे भरले. ”
प्रकाश हसून म्हणाला: ” मी जास्त पैसे दिले होते, ते मी पुन्हा दुकानात आलो असतो, तेव्हा तुम्ही ते मला देऊ शकला असता! पण इतक्या सकाळी तुम्ही मला तीनशे रुपये द्यायला आलात.”
व्यापारी म्हणाला, ” तुम्ही पुन्हा कधी आला असता? तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला माहीत नव्हते की, माझ्याकडे तुमचे तीनशे रुपये आहेत! बरोबर ना? म्हणूनच ते देणे आवश्यक होते. देव कधी हिशोब मागेल हे मला माहीत नाही… आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात…! “
तो व्यापारी निघून गेला होता.
पण प्रकाशचे मन अशांत होते.
दहा वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. पण पैसे परत करण्याअगोदर त्याचा मित्र मरण पावला.
त्याच्या मित्राच्या कुटुंबाला त्या पैशांची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच कोणीही ते परत मागितले नव्हते.
प्रकाश लोभात बुडाला होता. म्हणून त्यानेही ते परत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आज त्याच्या मित्राचे कुटुंब गरिबीत जगत होते. त्याची पत्नी लोकांची घरे झाडून, पुसून मुलांना वाढवत होती. तरीही, प्रकाशने त्यांच्या पैशावर डल्ला मारला होता.
“देव कधी न्याय मागेल हे मला माहीत नाही.. आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात… ” सेठचे हे शब्द ऐकून प्रकाश घाबरला होता. तो दोन-तीन दिवस तणावात राहिला.
शेवटी, त्याचा विवेक जागृत झाला. त्याने बँकेतून तेरा लाख रुपये काढले आणि ते देण्यासाठी मित्राच्या घरी गेला.
त्याच्या मित्राची पत्नी घरी होती. ती तिच्या मुलांसोबत गप्पा मारत बसली होती. तेव्हाच प्रकाश आला. तिच्या पाया पडला.
त्या विधवेसाठी, जी एकेक रुपयासाठी झगडत होती, १३ लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.
ते पैसे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले.
ती प्रकाशला आशीर्वाद देऊ लागली, ज्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले होते!
ही तीच महिला होती जी एका व्यावसायिकाला त्याचे दहा रुपये परत करण्यासाठी दोनदा गेली होती!
कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची देव नक्कीच परीक्षा घेतो. पण तो त्यांना कधीही सोडत नाही. एक दिवस तो नक्कीच न्याय करतो. देवावर विश्वास ठेवा!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मी केलेली ‘पुलं’ची हजामत – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी☆
☆
सकाळी नऊ-साडेनऊची वेळ. विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार उघडून आत आला.
‘ तुम्हाला पु. ल. देशपांडेसाहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘
त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून, ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.
आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला ‘ हो लगेच निघतो, ‘
असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.
त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं’चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.
‘ राहू द्या हो. माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘
त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं’बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली.
त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी मी केस कापावयास जात असे, तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार, यावर माझा विश्वास होता.
थोड्याच वेळात मी ‘रुपाली’मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.
‘ थोडावेळ बसा. भाई जरा नाश्ता करतो आहे’, असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.
आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार, याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.
अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.
इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘चंद्रकांत, यांचे केस बारीक करून टाका, ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहिण्यात गर्क झाल्या.
त्यांचे लक्ष नाही, असे पाहून
‘ फार लहान करू नका,
थोडेच कापा ‘
पुलं माझ्या कानात कुजबुजले.
माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलीकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.
पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी’ का म्हणतात, याचा अर्थ उमगला.
त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे, त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.
केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सर्वोच्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.
‘ चंद्रकांत, ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका, ‘ त्यांनी आज्ञा केली.
मला जरा विनोद करावासा वाटला.
मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘
त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशु ख्रिस्त वगैरे आहे की काय? ‘
मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते.
म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.
शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,
‘एक आनंदाचं देणं’.
पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘
☆
लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत
प्रस्तुती:सौ. नीता गडकरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कदर…” – लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆
रात्री फार उकडत होतं. किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लाॅकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला. दोघे गप्पा मारत चालू लागले. अरुण म्हणाला, ” किशोर, परवा दिवशी पहाटे मी आणि शर्मिला बाहेर जाणार आहोत. मुलं सासुरवाडीला ठेवणार आहोत. फक्त जरा घराकडं लक्ष ठेव. वहिनी असतातच ना घरात.. ”
”हो.. पण मध्येच कुठं निघाला आहात? ” किशोरनं विचारलं.
”अरे, जरा बदल म्हणून शर्मिलाला घेऊन जातो आहे. तापोळा, भिलार, महाबळेश्वर. चार पाच दिवस नाही आता” अरुण म्हणाला.
”मध्येच कसं काय ठरवलं? तुमची प्राॅपर्टीची कामं झाली की नाही? बाबांना जाऊन तीन आठवडे झाले ना!” किशोर म्हणाला. त्याचा सूर ओळखून अरुण हसला. बाबांना जाऊन तीन आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा…अशा सुरात किशोर बोलला ते समजलं अरुणला.
”अरे, झालंय ते. आता एक सही केली की काम झालं. पण बाबांच्या आजारपणात शर्मिलाची फार ओढाताण झाली रे. सतत त्यांचं औषध पाणी, पथ्य, माणसांचं येणं जाणं. फार करावं लागलं तिला. नुसता पैसा असला तर होतं असं नाही. सेवा करायची तर माणूस हवं. बाबा गेले नी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर. सगळी क्रियाकर्मं… घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा! आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया. माझ्या बाबांचं तिनं चार महिने सारं केलं.. मी चार दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे? ”अरुण म्हणाला.
किशोर घरी आला. अनुराधानं अंथरुणं घातली होती. मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या अनुराधानं त्याच्याकडं एकदा पाहिले नि ती पुन्हा मोबाईलमध्ये वाचण्यात बुडून गेली. आताशी अनुराधा असंच करते. आपल्याशी कमीत कमी बोलते आहे. संवादच काय विसंवादसुध्दा बंद केले आहेत तिनं. पूर्वी ती नव्हती अशी. समरसून करायची सारं. आपणच तिला हाडतुड करायचो. पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायची. काहीतरी सांगायची. पण आताशी ती हे सारं टाळते, असं वाटतं.
”अनु…. ” त्यानं हाक मारली. तिनं मोबाईल बाजूला केला.
”हं…बोला. ” त्यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडा.
”आत्ता बाहेर अरुण भाटिया भेटला होता. शर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत. चार पाच दिवस. जरा लक्ष ठेव, घराकडं म्हणत होता”
“बरं, ” असं म्हणून अनुराधाने पुन्हा मोबाईल घेतला.
”का जाणार आहेत, विचारलं नाहीस? ”
”मला माहीत आहे.. शर्मिलानं सांगितलं आहे मला. बाबांच्या आजारपणात, ते गेल्यावर तिला झालेल्या दमणुकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत. ” अनुराधा कोरडेपणाने म्हणाली. परत तिनं मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि किशोरला फार एकाकी वाटू लागलं.
गेल्या वर्षीची अनुराधा आठवली त्याला. कशी रसरशीत होती!सगळं हौसेने करायची. आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिचं. आई इतकी रडली होती.. अनु मी फार त्रास दिला तुला, पण काही मनात न ठेवता किती प्रेमानं केलंस माझं. सतत तिला आईच्या उशा पायथ्याशी थांबावं लागायचं. अनुराधा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती. सतत आईच्या सेवेत रुजू. आईच्या औषधांच्या वेळा, जेवणातलं पथ्यपाणी, येणारी जाणारी माणसं.. त्यांचं अगत्य.. काही काही कमी केलं नाही तिनं. चार दिवस ताई माहेरी आली नि मग थोडी उसंत मिळाली तिला.
ताईला तिची कुचंबणा समजत होती. सतत आईच्या भोवती रहाताना आपलं बायको म्हणून किशोरकडं दुर्लक्ष होतं आहे, असं तिचं वाटणं.. मुलांवर कधीतरी होणारी चिडचिड, तिची दमणूक. मधूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं यांचा अनुराधाला त्रास व्हायचा. ते जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला.
”वहिनी, तू आराम कर थोडा. दादा सोबत कुठंतरी जाऊन ये तासभर. जरासा विरंगुळा होईल तुला. किती करावं लागतं तुला! खरंच जाऊन या. मी आहे आईजवळ. ” असं तिनं सांगितलं.
बिचारी अनुराधा…! त्यादिवशी स्वयंपाक करताना तिनं किशोरला व्हाॅटस्अपवर मेसेज केला, ”आपण कुठंतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ. ”
किशोरला ते इतकं मूर्खपणाचं वाटलं! लग्नाला वीस वर्षं झाली आहेत आणि अनुराधा बाहेर जाऊ म्हणतेय. त्यानं उत्तर द्यायचीसुध्दा तसदी घेतली नाही. अनुराधा खूप वेळ उत्तराची वाट पहात होती. किशोरनं लक्षही नाही दिलं.
दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडाडला, ” कशाला मला व्हाॅटस्अपवर मेसेज करतेस गं? इकडं जाऊया नि तिकडं जाऊया.. ”
अनुराधा इतकी वरमली! त्यांच्यातील पर्सनल गोष्ट किशोरला अशी चारचौघात बोलायची काय गरज होती.. मग तिनं ओठ घट्ट मिटले. दोन महिन्यांत आई गेली. किती ताण आला होता अनुराधावर!आईचे दिवसकार्य झाल्यावर पंधरा दिवस ती माहेरी निघून गेली. किशोर तिच्या फोनची वाट पहात होता. पण ना तिनं फोन केला ना मेसेज. कितीदा ती ऑनलाईन दिसायची, पण मेसेज बाॅक्स मोकळाच असायचा. मग त्यानंच फोन केला. अनुराधा बोलली, पण त्या बोलण्यात जीव नव्हता. कोरडं कोरडं होतं ते बोलणं. परत आली, पण तिनं एकंदरीत किशोरपासून अलिप्त राहणं पसंत केलं
आज अरुण भेटला नि हे सारं किशोरला आठवलं. आपण अनुराधावर अन्याय केला काय? त्यादिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं? आणि तिच्या मेसेजेस बद्दल पट्कन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं.. तिला लग्न करुन आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडंही काहीही मागायचं नाही.. आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली. तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का?
एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही.. हे मनाची समजूत काढायला ठीक वाटतं; पण ते सगळीकडं लागू होत नाही. माणूस आहे तोवरच त्याला समजून घ्या. त्याची कदर करा. नाती जपा, ती कौटुंबिक असोत, मित्र मैत्रिणींसोबत असोत, सहकाऱ्यांसमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असोत. कदर करा. वेळेत करा. कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. कधी कधी आयुष्य तो पश्चाताप करायलाही वेळ देत नाही नि नंतर त्याला अर्थ रहात नाही. खूपदा माणूस तुमचं वागणं, जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो;कारण त्यांची काहीतरी विवशता असते. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी शारीरिक. पण एकदा का अंतःकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परिणाम होतो, तो फार भयंकर होतो… वेळीच सावरा आणि नाती फुलवा. थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात…ती फुंकर घालायला उशीर करु नका!
लेखिका : श्रीमती मुक्ता कुलकर्णी
प्रस्तुती:सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈