मराठी साहित्य – विविधा ☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी 

युद्ध हा शब्द आपण रामायण महाभारत हे वाचताना ऐकला यावरचे सिनेमे त्याच्या सिरीयल पाहताना ते पाहायला खूप मजा येत होती. रावणाची 10 तोंड बाणाने कापली जात असताना लहानपणी छान वाटायचं… मग बिभीषण सांगायचा नेमका बाण कुठे मारायचा आहे… मग रावण मरायचा… रामाचा विजय… रावणाचा अंत्यविधी… त्याला रामाची उपस्थिती… आणि मग सितेला घेऊन रामाचे परतणे…!

तसंच महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध. सख्खे आणि चुलत यांचं… श्रीकृष्णाने सांगितलेली गीता… कुरुक्षेत्रावरती असलेल्या व्यवस्था… म्हणजे उद्या सैन्याचा किती सैनिकांचा स्वयंपाक करायचा किती मेले आहेत… किती उरले आहेत… हे श्रीकृष्ण खात असलेल्या शेंगाच्या टरफलावरून ठरत असे… आणि तितक्या लोकांचा स्वयंपाक युद्धभूमीवर व्हायचा… ह्या सगळ्या रंजक कथा वाचून कमाल वाटायची.

मी सातवीत असताना हिंदी प्रवीण परीक्षेला बसले होते. खरं तर ती परीक्षा बीए समकक्ष होती आणि मी फक्त सातवीत. त्यात अभ्यासाला एक पुस्तक होतं ‘भारत दर्शन ‘आणि त्यात काही लेख होते त्यातला कुरुक्षेत्रावरचा एक शेवटचा लेख होता त्यामध्ये मरताना दुर्योधन युधिष्ठराला म्हणतो “युधिष्ठिर मै तो विरोंको साथ लेकर स्वर्ग जा रहा हूं तुम विधवाओंको लेकर राज करो”*हे वाक्य संदर्भा सहित स्पष्टीकरण.. चार मार्क इतकाच अभ्यास केला… पण त्या वाक्याचा खरा अर्थ मोठ झाल्यावर कळायला लागला… की अरे खरंच युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाच होत असेल तर ते स्त्रियांचं होतं. पुरुष सगळे सैनिक… ते युद्धभूमीवर मरतात तो मरणारा माणूस कोणाचातरी भाऊ असतो,  कुणाचा तरी मुलगा असतो,  कुणाचा तरी बाप असतो,  कुणाचा तरी नवरा असतो, आणि या सगळ्या बायकांची म्हणजे आई मुलगी बायको या सगळ्यांची यानंतर परवड होते म्हणजे सर्वात जास्त नुकसान स्त्रियांचं होतं… त्यांना वैधव्य घेऊन बिनआधाराचे जगावे लागते आणि ते खरोखर कठीण होते… आणि तो विजय पांडवांच्या हातात येताना सुद्धा त्याला कारुण्याची केवढी झालर होती हे आपल्या लक्षात येईल. पांडव कोणावर राज्य करणार होते? … पुरुष तर सगळे मेले होते ना युद्धात…! ही ही सगळी त्याकाळी होणारी जमिनीवरची युद्ध त्या युद्धाला नियम होते. सामान्य माणसाला त्याची झळ फक्त या पद्धतीने लागत होती मालमत्तेचं नुकसान नव्हतं आताची युद्धं वेगळी आहेत पण कारणं तीच आहेत.. सत्ता…! माझ्या हातात सत्ता असायला हवी. आपल्या भूभागापलीकडे जाऊन मला सत्ता हवी आहे. आणि तो भूभाग मला काबीज करायचा आहे. तेच कारण आहे… तेल साठ्यांचा भूभाग आपल्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न…! यामध्ये भारत मात्र चतुर आहे. एकीकडे विरोधी पक्ष हाकाटी पिटत आहे की भारताने कोणाची तरी बाजू घ्यावी नरेंद्र मोदी सारखा हुशार पंतप्रधान त्यांनी कोणाची बाजू घेणे पसंत केले नाही पण आपणच युद्धात मध्यस्थी केली पाहिजे अशी परिस्थिती मात्र फार पूर्वीपासून त्यांनी तयार केली आहे चाबहार(चारबहार) बंदर

विकसित करून भारताने त्या ठिकाणी मोठे काम केले आहे त्यामुळे हा भौगोलिक प्रदेश तेल साठे उपलब्ध करून देण्याला अत्यंत उपयुक्त आहे तो विकसित करून देण्याची ताकद भारतीय इंजिनियर्स मध्ये आहे त्यामुळे इराणला आपल्या विरोधात जाऊन चालणार नाही तसेच ट्रम्प साहेबांना सुद्धा युद्धामध्ये तेल साठ्यावरती आक्रमण करायचे नाही. कारण ते संपले तर युद्धाचे कारण संपेल तेव्हा यातील काही बेटांवर येथे तेल साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ती बेटे सुरक्षित आहेत.! … कालच बातमी आपण वाचली की रिलायन्स कंपनीने तेला साठ्याबद्दल मोठा सौदा केला आहे वगैरे वगैरे… हे काय आज ठरलेलं नसतं अनेक वर्षापासून याची योजना झालेली असते ते साठे आपल्या वर्चस्वाखाली कसे येतील याची तरतूद मोदी सरकारने आधीच करून ठेवली त्यामुळे आता मध्यस्थिला जर बोलावलं गेलं तर ते फक्त मोदींना बोलवलं जाईल आणि युद्ध थांबेल. युद्ध भौगोलिक कारणाने सुरू होते त्याने इतिहास घडतो,  बदलतो, सत्ता पालट होऊ शकतो, याचा नेमका फायदा कसा उठवायचा याचे ज्याला सूत्र कळाले तो त्या युद्धात न पडताही त्यावर वर्चस्व गाजवतो.

भारतासारख्या शांतता प्रिय राष्ट्राला युद्ध नकोच आहे.. कुणाचेच नकोय! कारण आम्ही बुद्धाला मानणारे लोक आहोत कोणत्याही देशातल्या शाळेतली मुलं एखाद्या बॉम्बने मृत्युमुखी पडणं या बातमीने आमच्या देशातला प्रत्येक नागरिक अस्वस्थ होतो. युद्धात अपरिमित हानी होते ती महिलांची आणि मुलांची परवा तर मी एक व्हिडिओ पाहिला आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॉम्ब चे गोळे पडत होते. अंगाला तोंडाला काळ लागलेल आहे पडल्यामुळे काहीतरी थोड्याशा जखमा झाल्यात असा एक छोटा मुलगा जो पाठीमागे होत असलेल्या बॉम्ब च्या आवाजाने भयभीत झालेला आहे आणि तो हात हलवून सांगत होता” प्लीज स्टॉप इट प्लीज स्टॉप इट “… त्याच्या चेहऱ्यावरचे भय पाहून डोळे पाणावले. तसेचयुक्रेंनच्या युद्धाच्या वेळी सुद्धा तेथील मुलांना सुरक्षितपणे हलवत होते तेव्हा एक मुलगी अगदी पाच सहा वर्षाची बापाला सोडून जायला तयार नव्हती आणि ते दोघे इतके धाय मोकलून रडत होते. त्यांच ते दूर जाणं बघून पोटात अक्षरशा कालवत होत..! काय मिळवणार आहोत जमिनीच्या तुकड्यावर सत्ता साधून..? हे सत्तेची अभिलाषा असणाऱ्यांनाच ठाऊक पण दुनियेतल्या सगळ्या दुःखाची जाणीव झाल्यानंतर शांततेच्या शोधात फिरलेल्या बुद्धांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे त्यामुळे आपण भारतीय लोक युद्धापेक्षा शांती पसंत करतात परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही फक्त जो संदेश द्यायचा होता तो दिला वास्तविक पाहता पाकिस्तान बरोबर दोन हात करून त्याला नेस्तनाबूत करणे इतकी ताकद भारताकडे नक्कीच आहे पण आपल्याकडे एक मंत्र आहे फुत्कारो लेकिन काटो नही आम्हाला कोणालाही बेचिराख करायचे नाही त्या देशातल्या निरपराध सामान्य माणसाला काहीच करायचे नव्हते तुम्ही तुमच्या देशात सुखाने नांदा आम्ही आमच्या देशात पण… पण जर काही कराल तर मात्र सोडणार नाही हे नुसत्या फुत्कारण्यावरून आम्ही दाखवून देतो आमच्यासमोर उदाहरण असतं… सगळं जग जिंकल्यानंतरही मोकळ्या हाताने परत जाणाऱ्या नेपोलियनचे… आणि प्रेतांचे खच पाहून अस्वस्थ झालेल्या सम्राट अशोकाचे… म्हणून आम्हाला भारताला युद्ध नकोच आहे. आम्हाला फक्त बुद्ध हवा आहे! शांततेचा संदेश देणारा… स्थिर जीवनाची शाश्वती देणारा… निसर्गाला जपायला सांगणारा. आणि युद्धभूमी वरती ही गीता सांगणारा कृष्ण.. आम्ही आजही पसंत करतो आणि मला वाटते हेच आम्हा भारतीयांच्या संतोषकारक समाधानाच्या जीवनाचे रहस्य असावे…!

टीप :वरील लेख खूप अभ्यासाचा नाहीच आहे मला नेमकं काय वाटलं त्याचा आहे त्या दृष्टिकोनातून याचे मूल्यमापन करावे.

©  शीला पतकी

निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एनी बेझंट ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ एनी बेझंट ☆ शालिनी जोशी

ॲनी बेझंट  –परदेशी असूनही भारतासाठी कार्य करणाऱ्या

जन्माने ख्रिश्चन पण मनाने हिंदू असलेली एक ब्रिटिश महिला म्हणजे  ॲनी बेझंट.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एकनिष्ठ व्यक्ती त्या ठवल्या.ॲनी बेझंट यांचा जन्म एक ऑक्टोबर १८४७ रोजी लंडन येथे झाला. त्या पाच वर्षाच्या असताना वडील विल्यम पेजवुड यांचे निधन झाले. ते विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. आई एमिली ही धार्मिक, कष्टाळू होती. पण पेजवुड यांच्या निधनानंतर आई कौटुंबिक अडचणीत सापडली. त्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने ॲनीचे शिक्षण व पालन पोषण केले. त्या धार्मिक बनल्या. पुढे १८६७ मध्ये रेव्हरंट फ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशका बरोबर त्यांचा विवाह झाला. देवावरील श्रद्धेवरून दोघात मतभेद झाले आणि बेझंट यांनी घटस्फोट घेतला.

त्या स्त्री सुधारणावादी होत्या. कामगारांची युनियन स्थापन केली. महिला कामगारांचा संप घडवून आणला. लेखन भाषण मार्गाने समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. पुढे १८८९ मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची त्यांचा संबंध आला. ही संस्था अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा शोध घेणारी व विश्वबंधुत्वाला प्रोत्साहन देणारी होती. त्यात त्या सामील झाल्या. १८९३ च्या सर्व धर्म परिषदेत थिओसाॅफिकल सोसायटीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.  १८९३ मध्ये या सोसायटीच्या प्रसारासाठी त्या भारतात आल्या.

भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सक्रिय पुरस्कार केला. लोकमान्य टिळकांबरोबर होमरूल चळवळ उभारली. तुरुंगवासही भोगला.१९१७ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (कलकत्ता) अध्यक्ष पद त्यांनी भूषविले. या पदावरच्या त्या पहिल्या महिला ठरल्या. स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांनाही त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नाने भारतात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. महिला शिक्षणावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. १८९८ मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. यातूनच पंडित मदन मोहन मालवीय यांचे बनारस हिंदू विश्वविद्यालय स्थापन झालं. मुलींसाठी सेंट्रल हिंदू स्कूल फॉर गर्ल्स ची स्थापना करून शैक्षणिक सुधारणांचा पाया घातला.

भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. लेखिका व व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाल्या. भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे यावर अनेक व्याख्याने दिली. १९०५ मध्ये गीतेचे इंग्रजी भाषांतर केले. २५० ग्रंथ लिहिले. भारतीयांनी प्राचीन परंपरा विसरू नये यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगावा हे पाहून लोक प्रभावित झाले. त्यांना मानू लागले. पण सनातनी हिंदू मात्र त्यांना आपल्या शत्रू समजत. सहभोजने, बालविवाह प्रतिबंध, स्त्रियांची सुधारणा इत्यादी क्षेत्रात त्यांनी काम केले. मद्रास येथे ‘कॉमन विल’ आणि न्यू इंडिया’ ही वृत्तपत्रे सुरू केली. असहकार व सत्याग्रह या बाबतीत मात्र गांधींची त्यांचे मतभेद झाले.

मद्रास येथे १९३३ मध्ये ॲनी बेझंट यांचे निधन झाले. पार्थिव देहाचे दहन करून रक्षेचा अंश गंगेत विसर्जित करण्यात आला. ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मियता, समाज सुधारण्याची तळमळ होती. त्या प्रकांड पांडित्य, वक्तृत्व, कार्यक्षमता, स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा अशा अष्टपैलू होत्या. ॲनी बेझंट एकदा भारतात आल्या  त्या इथल्याच होऊन राहिल्या. पुढील पिढ्यांना प्रेरणादायी असे समर्पित जीवन त्या जगल्या.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा…भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता (२)

सध्या आपण गाथेतून उमजणाऱ्या गीता तत्वाचे चिंतन करीत आहोत.

भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की “करणारा तू कोण? नियतकर्माचे पालन करून तू ते कर्म कृष्णार्पण कर. कर्ता करविता हा एक भगवंतच आहे. हेच गीतेतले तत्त्व तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून भक्त जनांना सांगत आहेत. ते म्हणतात, “माझ्या वाणीतून अभंगांच्या रूपात जे बाहेर येते, ते सर्व बोल पांडुरंगाचेच आहेत. बोलविता धनी तोची आहे.”

ते म्हणतात,

झाली माझी वैखरी/ विश्वंभरी व्यापक/

मोकलीने जावे बाणे/ भाता जेने वाहिला/

आता येथे कैचा तुका/ बोले सिक्का स्वामींचा/

हे जे काही शब्द माझ्या मुखावाटे बाहेर पडत आहेत, ते माझे नसून मी तर स्वामींचा शिक्का आहे. ते माझ्याकडून वदवून घेत आहेत. भात्यातून बाण जसे बाहेर पडतात, त्याचप्रमाणे माझ्या मुखावाटे शब्द बाहेर पडतात इतकेच!

पिडलेती भ्रमे/ वाटा नकळती वर्मी/

 तुका म्हणे भार/ माथा टाका अहंकार//

हरीच्या भेटीची आस लागलेल्या भक्तांना

तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या मनातील देहाच्या अहंकाराचा भार जेव्हा तुम्ही टाकाल, तेव्हाच तुम्हाला हरी भेटेल.

संत तुकारामांनी खालील अभंगात गीतेतून होणारा बोध भक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

काय दरा करील वन/ समाधान नाही जव/

(जोपर्यंत अंतःकरणात समाधान नाही, ते वासना शून्य झालेले नाही, तोपर्यंत रानात, गिरीकंदरात जाऊन तपश्चर्या करण्याचा काहीही उपयोग नाही.)

रीधता धावा पेवा मधी/ जोडे सिद्धी ते ठायी/

(धान्य काढण्याकरता पेवामध्ये घाईघाईने शिरले, तरी लगेच अन्न मिळेल का? )

काय भस्म करील राख/ अंतर पाख नाही तो/

(मुळात अंतकरण जर शुद्ध नसेल, तर अंगाला नुसती राख फासून काय उपयोग? )

वर्ण आश्रमाचे धर्म / जाती श्रम झालिया/

(वर्णाश्रम-धर्मानुसार विहित कर्म करण्याचा कंटाळा केला, तर ते कर्म वाया जाईल)

सर्व संतांना हेच सांगायचे आहे की कोणतेही कर्म उच्च किंवा नीच नसते. समाजाची घडी व्यवस्थित राहण्यासाठी खरंतर वर्णाश्रम धर्म रचना केली गेली. परंतु पुढे मात्र ब्राह्मण म्हणजे उच्च आणि शूद्र म्हणजे नीच अशी भावना लोकांच्या मनात विनाकारण निर्माण केली गेली.

गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला कर्म संबंध विच्छेद या ठिकाणी तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत.

तेही नव्हे जे करिता काही/ ध्याता धाई तेही नव्हे/

तेही नव्हे जे जानवी जना/ वाटे मना तेही नव्हे/

त्रास मानिजे कांटाळा/ अशुभ वाचाळा तेही नव्हे/

तेही नव्हे जे भोवती भोववे/ नागवे धावे तेही नव्हे/

तुका म्हणे एकची आहे/ सहजी पाहे सहज/

 याचा अर्थ असा की, हे साधका तू जे काही करशील ती भक्ती नाही, कारण त्याचा कर्तेपणा तू तुझ्याकडे घेशील. ध्यान करणाऱ्याने मूर्ती समोर ठेवून जरी ध्यान केले, तरी ती भक्ती नाही, कारण त्यात तुझा अहंकार असेल. लोकांना परमार्थ समजावणे, मनाला जे वाटेल तीही भक्ती नव्हे. एकच तत्व महत्त्वाचे आहे, मुद्दाम ठरवून काहीही कर्म करण्याचा अभिमान स्वतःकडे न ठेवता तू जर सहजपणे पाहशील तर तीच खरी भक्ती होईल.

 हेच तत्व अधिक स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात काय सांगतात ते आपण पाहू.

 जे जे जेथे पावे/ तेथे समर्पावे सेवे/

 सहज पूजा याची नावे/ गणित अभिमान/

 अवघे भोगिता गोसावी/ आधी अवसानि जीवी/

 तुका म्हणे सीण /न धरिता नवे भिन्न//

 जीवाने जर मी करणारा आणि मी भोगणारा

 असा अभिमान बाळगला नाही तर भगवंताशी द्वैत राहत नाही.

 

 विचारा वाचून/ न पाविजे समाधान/

 देह त्रिगुणांचा बांधा/ माजी नाही गुण सुधा

 देवाचिये चाडे/ देवा द्यावे जेजे घडे/

 तुका म्हणे होते/ बहु गोमटे उचिते//

 या ठिकाणी विवेकाविषयी महाराज जनसामान्यांना सांगत आहेत. ज्या ठिकाणी विचार नसेल, विवेक नसेल, त्या ठिकाणी समाधान प्राप्त होणार नाही. प्रपंच असार आहे आणि आत्माच सार तत्व आहे, असा विवेक झाल्याशिवाय संतोष तेथे नाही. त्रिगुणात्मक अशा या शरीरात कोणताच गुण परिपूर्ण नाही. म्हणून आपण केलेले कर्म हे कोणत्याही गुणांनी(सत्व, रज, तम) युक्त असले तरी ते देवालाच अर्पण करणे आवश्यक आहे. गीतेत भगवान हेच सांगतात की पार्थ, सर्व कर्म तू मला अर्पण कर.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र –‘या पत्राबद्दल साहेबांना आत्ताच कल्पना द्यायला हवी. त्यांनी माझा अॅप्लीकेशन फॉरवर्ड करण्याआधी त्यांना हे समजायलाच हवं… ‘ हा विचार मनात येताच मी ते पत्र घेऊन तत्परतेने वखरे साहेबांच्या केबिनकडे निघालो. या क्षणी माझी पावलं प्रकाशवाटेकडे धाव घेतायत की मिट्ट काळोख्या अंधारवाटेकडे हे मात्र फक्त ‘त्या’लाच… त्या कर्त्या-करवत्यालाच माहित होतं!!)

“सर, माझा अॅप्लीकेशन फाॅरवर्ड करण्यापूर्वी तुम्हाला कल्पना असावी म्हणून आजच माझ्याकडे आलेलं हे पत्र तुम्ही एकदा वाचून पहावं असं मला वाटतं. ” हातातलं एन्व्हलप त्यांच्याकडे देत मी म्हंटलं.

“कसलं पत्र? “

“मला नागपूर रिजनल आॅफिसकडून आलेला ‘शो काॅज’ मेमो आहे हा… “

माझं बोलणं सुरु असतानाच त्यांनी ते पत्र नजरेखालून घातलं आणि शांतपणे मला परत दिलं.

” आजपर्यंत आलेले सगळे अर्ज आज एकत्रच फाॅरवर्ड होतील. तुमचा एकट्याचाच अर्ज या कारणासाठी रोखून धरायची गरज नाहीय. तुम्ही या पत्राला तुमचं उत्तर तातडीने देऊन टाका. पुढं काय करायचं ते आपण पाहू. ” ते आत्मविश्वासाने म्हणाले. हे एरवी मला दिलासा देणारं वाटलंही असतं पण आज…?

” सर, आधीच्या पत्रात हेच सगळे आक्षेप होते. त्याला मुद्देसूद उत्तर मी आधीच दिलंय. ते त्यांना मान्य नाही एवढंच त्यांनी लिहिलंय. ते कां मान्य नाही, मी लिहिलंय त्यात नेमकं काय खोटं आहे, हे मी त्यांना विचारू शकत नाही. मग मी त्याच त्या प्रश्नांना तीच ती उत्तरं देत रहायचं आणि त्यांनी ते नाकारायचं याला शेवट नसणारच. त्यापेक्षा…? “

मी बोलावं की बोलू नये या संदर्भात…

“बोला ना.. ” ते म्हणाले.

“ज्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालाय किंबहुना केला गेलाय त्याची नेमकी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू कां सर? कारण.. रिजनल मॅनेजर कांहीही म्हणत असले तरी त्यांचे वरिष्ठ म्हणून फायनल निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे ना सर? मी माझी बाजू तुम्हाला समजावून सांगितल्यानंतरच तुमच्याशी चर्चा करून त्यांच्या या पत्राला योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकेन असं मला वाटतं… “

त्यांनी क्षणभर विचार केला…

” मी आज रिजनल मॅनेजरशी एकदा फोनवर सविस्तर बोलून घेतो. त्यांना नेमकं काय म्हणायचंय पाहू तरी. अशा बऱ्याच गोष्टी कम्युनिकेशन गॅपमुळे विनाकारण चिघळत जातात. तसं होऊ नये म्हणून. बाकी कांही नाही. यू डोन्ट वरी.

आपण बोलू नंतर ” ते म्हणाले.

त्यांचंही बरोबरच होतं.

मी निरूत्तर झालो. आता मूळ प्रश्न कांही काळ तरी असाच लटकत रहाणार होता. दुसरा पर्यायच नसल्याने मी वाट पहायचं ठरवलं.

मी वखरेसाहेबांच्या केबिनमधून बाहेर पडलो ते अशा अधांतरी अवस्थेतच. माझ्या केबिनमधे माझी रोजची कामं वाट पहात होतीच पण प्रयत्न करूनही आज माझं कामात मन लागेना. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज प्रलंबित ठेवला जाईल म्हणून मी अस्वस्थ नव्हतो. तो मी न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून प्रलंबित ठेवला जाईल या कल्पनेने मी अस्वस्थ होतो. आजवरच्या तीस वर्षांच्या माझ्या स्वच्छ रेकाॅर्डवर कुणीही इतक्या सहजपणे शिंतोडे उडवू पहाणं मला अपमानास्पद आणि अन्यायकारक वाटत होतं याची ती अस्वस्थता होती. मी प्रतिकूल परिस्थितीत अकोला ब्रॅंचसाठी घेतलेले कष्ट, बॅंकेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून जीव तोडून केलेली धडपड, क्रिमिनल केसेस् योग्य वेळेत तातडीने फाईल करण्यासाठीची माझी यशस्वी धावपळ हे सगळं विचारात न घेता, एका महत्त्वाच्या खुर्चीवर बसलेली ‘रिजनल मॅनेजर’ सारखी महत्त्वाच्या पदावर काम करणारी व्यक्ती बॅंकेच्या आर्थिक नुकसानीला मलाच विनाकारण जबाबदार ठरवण्याचा विचार करूच कशी शकते? ‘ हा प्रश्न माझं मन कुरतडत राहिला होता. हे माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक आणि संतापजनकही होतं. आता मला कांहीही न करता स्वस्थ बसून रहायचीही भीति वाटू लागली

पण वाट पहाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. या विरोधाभासातून निर्माण झालेलं हे अधांतरीपण माझी घुसमट वाढवू लागलं.

मला यातून बाहेर तर पडायचं होतं पण ते कसं हेच समजत नव्हतं. या अशाच विचारात दंग असताना शिपायाने मला वखरेसाहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला आणि अंधारल्या मनात आशेचा एक किरण ओझरता डोकावून गेला!

” मी बोललोय रिजनल मॅनेजरशी. अकोला ब्रॅंचमधल्या थकीत कर्जखात्यांबद्दलच्या स्टाफ अकाऊंटॅबिलीटी बाबत सेंट्रल आॅफिसच्या त्यांना स्ट्रिक्ट इन्सट्रक्शन्स आल्यात. बऱ्याच थकित कर्जखात्यांबाबत रिजनल आॅफिसच्या रेकाॅर्डनुसार वसुलीबाबत तुमच्याकडून कांहीच पाठपुरावा झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे” वखरेसाहेब म्हणाले.

” थकीतच नव्हे तर थकीत होऊ पहाणाऱ्या इतर सर्व खात्यांचाही मी नियमित पाठपुरावा केलाय सर. ते कसं हे मी कागदोपत्रीही सिध्द करू शकतो, पण त्यातील नेमक्या कोणत्या खात्यांबाबत मी समाधानकारक पाठपुरावा केलेला नाही हे आधी त्यांनीही सांगायला नको कां? माझ्यावर सरसकट आरोप करून ते समाधानकारक स्पष्टीकरणाची कशी अपेक्षा करू शकतात सर? म्हणूनच या सर्व प्रश्नांबाबतची नेमकी पार्श्वभूमी मी सविस्तर सांगू कां असं तुम्हाला विचारलंही होतं सर. त्यानंतर तुमच्याच सल्ल्याने मी काय उत्तर द्यायचं ते ठरवणार होतो. ” मी म्हटलं.

मी कितीही शांतपणे आणि सहज बोललोय असं मला वाटलं तरीही त्यातली अस्वस्थता त्यांच्यापासून लपलेली नसावी. म्हणूनच ते मला समजावल्यासारखं म्हणाले, “जे कांही सांगायचंय ते तु्म्ही मला जरूर सांगा पण या सगळ्याचं असं विनाकारण दडपण घेऊ नका. होईल सगळं व्यवस्थित. नका काळजी करू. मी आहे ना? “

वखरेसाहेबांनी उच्चारलेल्या या शब्दांमधून ‘तो’च जणूकांही मला आश्वस्त करतो आहे हा विचार मनाला स्पर्शून गेला आणि एखाद्या तृषार्ताला घोटभर पाणी मिळालं तरी तो अगदी तृप्त होतो ना तसा दिलासा मला मिळाला. नाहीतरी रिजनल आॅफिसरनी कोणताही निर्णय घेतला तरी त्यावर सेंट्रल आॅफिसने शिक्कामोर्तब करण्यापूर्वी झोनल आॅफिसचं म्हणजेच पर्यायाने वखरेसाहेबांचं रेकमेंडेशन आवश्यक होतंच. मग मला भीति कसली? म्हणूनच ‘नका काळजी करू. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना? ‘ हे वखरेसाहेबांचे शब्द मला अनेकार्थांनी वरदान मिळाल्यासारखेच वाटत राहिले. पण…?

पण.. पुढे अचानक घटनाच अशा घडत गेल्या कीं कांहीतरी विपरीत होणार असल्याच्या आशंकेने माझं मन सैरभैर झालं.. आणि..?

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य ☆ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य ☆ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष, कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष, एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण ” गुढीपाडवा ” असे म्हणतो. याला वर्ष प्रतिपदा, तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी, एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचे आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:/” असे वेदाने प्रथम सांगितले. आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमधे चैत्रशुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ दिवस सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. नैसर्गिक आणि भौगोलिक — गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपावर येतो. (संपातबिंदू, क्रांतीवृत्त व विषुववृत्त हे दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांना छेदतात तो बिंदू) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्या काळात उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायीच असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षा ची सुरुवात करणे योग्य आणि आदर्श आहे.

‘गुढीपाडवा ‘ या सणाला पौराणिकही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला, तो हा दिवस. महाभारताच्या आदी पर्वात उपरीचर राजाने, त्याला इंद्राने दिलेल्या कळकाची काठी जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून “गुढीपूजन ” केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर पार्वती यांचे लग्न चैत्रशुद्ध प्रतिपदेला ठरले आणि तृतीयेला झाले. म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.

ऐतिहासिक दृष्टीने विचार करता, “शालिवाहन” नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य केले. आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने क्षात्रतेज संपलेल्या समाजात आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रुवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर, या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात. त्यामुळे हा दिवस वर्षारंभ मानला जातो. व्यावहारिक दृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका ही शुभ मुहूर्तच असल्याने वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही. गणेशयामल या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की, 27 नक्षत्रांपासून निघालेल्या लहरींमध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्रशुद्ध प्रतिपदेला सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे रास्त आहे

या दिवशी पूजा करण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. प्रत्येक रूढी परंपरेला शास्त्रीय आधार आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करून ब्रह्मदेवाची दवणा (थंड असतो म्हणून) वाहून नंतर महाशांती केली जाते. ” नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः’/ हा मंत्र म्हणून विष्णूची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे दान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते. आरोग्य लाभते. समृद्धी येते. अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करताना, एका उंच वेळूच्या टोकाला भरजरी खण किंवा साडी, साखरेच्या गाठींची माळ, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची डहाळी आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा

चांदीचा कलश अशी सजवून गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते. याला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे, उत्साहाचे, आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडूलिंब आणि आंब्याच्या झाडांच्या पंचांगाचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. (ते देव वृक्ष आहेत). कलशरुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. (अँटेनाच्या कार्याप्रमाणे). या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्न करून, प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकात संबंध वाढवून एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणी सुरुवात करतात. पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुका काढून आनंद लुटतात.

आपल्या प्रत्येक सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. आज काल आपल्या संस्कृतीचे प्रतिक म्हणून अगदी छोट्या टेबलवर ठेवण्यासारख्या गुढ्या परदेशी लोक घेऊन जायला लागले आहेत.

या शुभदिनानिमित्त येणारे नवीन संवत्सर “परभाव ” संवत्सर, शालिवाहन शके 1948 सर्वांना सुखाचे आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अभावातून प्रभावाकडे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ अभावातून प्रभावाकडे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

✍️प्रारब्ध व नशिब!

प्रारब्धात कर्म व स्वीकार असेल तर ते नशिब आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

नशीब स्वीकारण्यासाठी सुद्धा धैर्य व आत्मविश्वास लागतो यात २ भाग स्पष्ट आहेत.

पहिला अनुकूल व सकारात्मक परिस्थिती असेल तर नशीब हा भाग लक्षात येत नाही

नकारात्मक परिस्थिती असेल तर नशीबालाच दोष दिला जातो

दोन्ही ठिकाणी नशिबाचा भाग असतोच पण तो अहं त्या आवरणाखाली असतो.

पण जर जीवनाकडे तटस्थपणे पहाता आले तर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही ही परिस्थिती एकाच जीवनाचा अविभाज्य घटक आहेत हे जाणवतं व संपूर्ण जीवन मात्र वेगळंच आहे हे लक्षात येतं. या क्षणी नशिब किंवा स्वकर्तव्य काय यावर विचारमंथन घडतं.

असे विचारमंथन घडले तर बाहेर पडणारे नकारात्मक विचार म्हणजेच मर्यादित अहं ची जाणीवच असतात‌ व अमृत म्हणजे विस्तारित स्वयंची अनुभूती असते.

प्रारब्धातूनच आपल्याला ही जाणीव होऊ शकते हे लक्षात यायला हवं. प्रारब्ध आपल्या जीवनाचा नकाशा असतो प्रत्येक गोष्ट आपल्याच कर्माचे फळ असते म्हणून च वैयक्तिक अनुभव येतात हे सत्य स्वीकारले तरच तटस्थ भूमिकेतून स्वतः च्या आयुष्याचा अभ्यास करता येईल. म्हणून मिळालेले हे आयुष्य ही सुसंधी आहे हे समजायला जी बुद्धी लागते त्यासाठी विवेक आवश्यक आहे. दुसरे कुणीही यात बदल करु शकत नाही हे ही त्रिकालाबाधित सत्य आहे.

शिक्षक पूर्ण वर्गाला शिकवतात पण मोजकेच विद्यार्थी याचा खरा फायदा घेतात त्याप्रमाणे सद्गुरू आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतात त्यांची महावाक्ये समजून घेणे हे सद्षिष्याचे लक्षण आहे. सनातन धर्मात गुरु शिष्य जोडीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सूर्यप्रकाश सर्वत्र असतो पण जो खिडकी बंद करेल त्याला तो प्रकाश अनुभवता येणार नाही व ज्याने खिडकी उघडली, त्याच्या घरातील अंधार राहूच शकणार नाही

तसेच प्रारब्धाचा आनंदाने व साक्षीभावाने स्वीकार करणे म्हणजे आपले नशीब आपण ठरवणे आहे , हा विवेक सद्गूरु व सद्संगाशिवाय शक्य नाही म्हणूनच

महाजनो येन गत स पंथ: ……..

आपले प्रारब्ध हे आपले नशिब ठरवण्याची शिडी आहे हे मात्र निश्चित!

मग आपण नशिबवान ठरायचे की करंटे हा आपलाच निर्णय नाही का?

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🔅 विविधा 🔅

☆ कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

​आजकाल कोणत्याही शहरात गेले की कोचिंग क्लासेसचे बोर्ड बघायला मिळतात. टॉपर्स आणि रँकर्सचे फोटो. त्यांचे स्पर्धा परीक्षेतील सुयश म्हणजे टक्केवारी ! यालाच तुम्ही आम्ही शिक्षण म्हणतो. परंतु हे शिक्षण नव्हे किंवा संस्कारही नव्हेत. हे फक्त प्रमाणित करणे आहे. एखादा विद्यार्थी एवढं एवढं शिकला आहे किंवा हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे हेच त्यातून सिद्ध होतं. पण त्याने ज्ञानार्जन किती केले आहे किंवा त्याच्यावर संस्कार किती झाले आहेत, एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या तो शिकला आहे का या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते.

परंतु आजकाल वातावरणच असे निर्माण झाले आहे. या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती पाहून पालकांना सुद्धा आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेस मध्ये घालावे असे वाटते. त्यातही ज्या चांगल्या संस्था असतात त्यांची फी भरमसाठ असते. अनेक पालकांना ती परवडत नाही. प्रसंगी कर्ज काढून पालक आपल्या मुलाला अशा कोचिंग क्लासेसमध्ये दाखल करतात. उद्देश एकच असतो की त्याने परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रकारे यश मिळवून चांगली शाखा किंवा चांगली नोकरी मिळवावी. हे क्लासेस विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवतात. इंग्रजांच्या काळात इंग्रजांना जसे इंग्रजी मानसिकता तयार झालेले भारतीय कारकून हवे होते तशाच प्रकारचे परीक्षार्थी नोकरीच्या दृष्टिकोनातून हे क्लासेस घडवतात.

शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत चालली आहे आणि कोचिंग क्लासेस भरभरून वाहत आहेत. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना कितीही चांगल्या पद्धतीने शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवण्याचा प्रयत्न केला तरी मुलांचे तिकडे लक्ष नसते. त्यांची एकाग्रता होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. तर अभ्यासक्रमातील काही भाग शिकवत असताना हे आमच्या क्लासमध्ये शिकवले गेले आहे म्हणून मुले लक्ष देत नाहीत अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी तर शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्या संगनमताने हे कोचिंग क्लासेस सुरू असतात. त्यातून काही संस्थाचालक आपले उखळ पांढरे करून घेतात.

सकाळचे सहा वाजले की गाढ झोपलेल्या मुलाला आईचा आवाज ऐकू येतो. ” उठ रे बाळा, आज टेस्ट आहे ना ?” बिचारा मुलगा डोळे चोळत विचार करतो, ‘शाळेची टेस्ट की क्लासची?’ आता शाळा आणि क्लास या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. फरक फक्त इतकाच की, शाळा ‘ संस्कार ‘ द्यायचा प्रयत्न करते आणि क्लासेस देतात ‘ रँक ‘ आणि घेतात पैसे मोजून ! अशा रीतीने आपला लाडका बाळ रँक होल्डर होतो !

पूर्वी मुलं शाळेतून आली की दप्तर एका कोपऱ्यात फेकून मैदानाकडे धावायची आणि पालकांना त्यांना घरी बोलावून आणावे लागायचे. खेळण्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहायचे. पण आता सगळेच बदलले आहे. शाळेतून किंवा महाविद्यालयातून घरी आल्याबरोबर त्यांना कोचिंग क्लासेसला जावे लागते. या सगळ्या धावपळीत आपल्या मुलाचे बालपण किंवा तारुण्य कोमेजून जात आहे याची जाणीव पालकांना अभावानेच होते. सकाळी शाळा किंवा कॉलेज आणि नंतर कोचिंग क्लासेस यातच त्याचे बालपण, ऊर्जा आणि आनंद हरवून जातो. खरं म्हणजे नवीन ज्ञान शिकण्याचा जो आनंद असतो तो अशा या वातावरणामध्ये कसा मिळणार ?

स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या स्पर्धेत कोचिंग क्लासेसची मदत घेणे इथपर्यंत ठीक आहे. एखादा कठीण विषय समजून घेण्यासाठी किंवा परीक्षेचे तंत्र आत्मसात करण्यासाठी क्लासेस नक्कीच उपयुक्त ठरतात. पण अडचण तेव्हा येते जेव्हा कोचिंग क्लासेस हे शाळा-कॉलेजांना ‘पर्याय’ ठरू लागतात. शाळेची जागा कोचिंग क्लासेस घेऊ शकत नाहीत. शाळा हे ते ठिकाण आहे जिथे आपण जगायला शिकतो, मित्र जोडतो आणि संघभावना शिकतो. जेव्हा क्लाससाठी शाळा बुडवली जाते किंवा शाळा केवळ नावापुरती उरते, तेव्हा शिक्षणाचा मूळ हेतूच हरवतो. क्लासेसने केवळ अभ्यासातील उणिवा भरून काढण्याचे काम करावे, ते शिक्षणाचे ‘मुख्य केंद्र’ बनू नयेत. क्लासेसने त्यांना पूर्णपणे परीक्षार्थी बनवले आहे. ही मुलं विज्ञानाचे नियम तोंडपाठ करतात, पण पावसाचा आनंद घ्यायला त्यांना वेळ नसतो. त्यांना गणितातले ‘प्रॉब्लेम्स’ सोडवता येतात पण आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम आला की मात्र ते गोंधळून जातात.

​पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मुलाला ‘स्पर्धक’ बनवण्याआधी त्याला एक समृद्ध ‘विद्यार्थी’ म्हणून शाळेत घडू देणे जास्त गरजेचे आहे. शाळा हेच मुख्य व्यासपीठ असायला हवे आणि कोचिंग हे केवळ त्याला दिलेले एक पूरक पाठबळ असावे. पालकांनी मुलांच्या निकालाच्या टक्केवारीपेक्षा त्यांच्या आनंदाची टक्केवारी मोजायला शिकावे. क्लासेस लावण्यापूर्वी त्यांच्या आवडीची ‘क्लास’ ओळखा.

​आयुष्याची खरी परीक्षा वर्गाच्या बाहेर असते, तिथे कोणताही क्लास कामाला येत नाही, तिथे फक्त तुमची जिद्द आणि शाळेत शिकलेले मूलभूत संस्कारच कामी येतात. शेवटी, शाळा आपल्याला ‘आयुष्य’ नावाच्या मोठ्या परीक्षेसाठी तयार करत असते! शिक्षण संस्थांनी देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या शाळा महाविद्यालयातून उत्तम प्रकारचे शिक्षण, संस्कार मिळतील याकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयांकडे पुन्हा कसे वळतील यासाठी प्रयत्न करावेत.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ४ – स्टोव्ह -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ४ – स्टोव्ह – ☆ विभावरी कुलकर्णी

स्टोव्ह (रॉकेलचा) सारख्या वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत. पण आठवणीत मात्र अजूनही आहेत. कारण चूल ते रॉकेल स्टोव्ह हे स्थित्यंतर पाहिले आहे आणि त्यातील सुख अनुभवले आहे. गॅस सिलिंडर येण्यापूर्वी घराघरात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता.

या स्टोव्ह चे मुख्य दोन प्रकार असायचे.

१) वातीचा स्टोव्ह – हा अगदी साधा, सुरक्षित! यात सुती वात पेटवण्याची सोय असते. आवाज अजिबात नाही. यात सर्वात खाली रॉकेलची टाकी असते त्यात रॉकेल भरायचे असते. त्याच्या वरच्या भागात गोलाकार वाती असतात. त्या टाकीला तिवई प्रमाणे स्टॅन्ड असतो. त्यावर एक गोलाकार ताटली वातीचा भाग मोकळा ठेवून बसवलेली असायची त्यावर भांडे ठेवता यायचे. त्याची ज्योत लहान मोठी करण्यासाठी वातिच्या खाली एक मोठी किल्ली असायची. निळी ज्योत असली की भांडी काळी व्हायची नाहीत. ज्योतीचा रंग पिवळा झाला की वातीवर काजळी जमली आहे हे कळायचे. मग वाती वरचे झाकण काढून वाती काजळी असलेल्या जागेवर थोड्या कापाव्या लागायच्या. मग तो चांगला पेटायचा.

२) पंपाचा स्टोव्ह किंवा दाबयुक्त स्टोव्ह बोलीभाषेत मात्र त्याला पितळी किंवा फरफऱ्या स्टोव्ह म्हणायचे. कारण त्याला पेटवले की त्याचा मस्त फर्रर्रर्र आवाज यायचा. यालाही एक टाकी असते. त्यावर एक पंप असतो. त्यावर बर्नर असते. त्याला एक छोटे छिद्र असलेले निपल असते. आणि टाकीला जोडलेल्या स्टॅन्ड वर एक भांडे ठेवण्यासाठी ताटली असते. जेथून टाकीत रॉकेल भरायचे तिथे एक छोटे झाकण असायचे आणि त्याला एक किल्ली असायची. रॉकेल टाकीत भरल्यावर पंप मारून हवा भरायची आणि त्या हवेच्या दाबाने रॉकेल निपल मधून बर्नर मध्ये चढायचे. त्या आधी काकडा लावून बर्नर तापवले जायचे. त्यामुळे चढलेल्या रॉकेलचे हवेत रूपांतर होऊन बर्नर भोवती ज्योत पेटायची. या स्टोव्हला काही झाले की प्रथमोपचार म्हणजे त्या निपलच्या छिद्रात पीन करायची म्हणजे तेथील कचरा साफ व्हायचा. मात्र हवा जास्त भरली किंवा बर्नर फुटले तर भडका उडायचा तो थेट घराच्या छता पर्यंत पोहोचायचा. मग सर्वांचीच पळापळ व्हायची. मग तो त्याच्या दवाखान्यात न्यावा लागायचा. आमच्या घरा शेजारी जे दुरुस्तीचे दुकान होते त्या दुकानाला त्याने स्टोव्ह व सायकलचा दवाखाना असे नाव दिले होते.

हा पितळी स्टोव्ह सुद्धा चिंच लावून चकचकित घासला जायचा. आणि घरातील स्टोव्हची चकाकी बघून गृहिणीची स्वच्छतेची आवड ठरवली जायची. मी इयत्ता ९ वीत असताना शालेय अभ्यासक्रमात आम्हाला स्टोव्ह दुरुस्ती विषय होता. शाळेत शिकलेले घरी केलेच पाहिजे. या न्यायाने मी घरी येऊन चांगला उत्तम चालणारा स्टोव्ह खोलला आणि त्याचे सगळे अवयव सगळ्यांना दाखवले. आणि त्याची सफाई कशी करायची, दुरुस्ती कशी करायची हे पण दाखवले. घरात, वाड्यात, शेजाऱ्यांना सर्वांनाच कौतुक वाटले. पण ते थोडाच वेळ टिकले. कारण तो स्टोव्ह म्हणजे त्याचे सुटे भाग काही जोडता येईना. मग तो सुटा स्टोव्ह वडिलांना पिशवीत घालून दुकानात नेऊन जोडून आणावा लागला.

नंतर मैत्रिणीच्या घरी एक साईडला असलेली टाकी आणि दोन बर्नर असा स्टोव्ह वापरला खूप मज्जा वाटायची एकाच वेळी दोन पदार्थ करता यायचे. या स्टोव्ह मुळे नोकरी करणाऱ्या स्त्रियांची सोय झाली होती. आणि चुलीच्या धुरापासून त्यांची मुक्तता झाली होती.

पुढे काही वर्षांनी गॅसची सोय झाली परंतु तोपर्यंत सर्वसामान्यांना या स्टोव्हनेच आधार दिला. अशा जुन्या वस्तूच्या आठवणी! वस्तू कालबाह्य झाल्या पण आठवणी मात्र मनात ताज्या आहेत.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि समस्त मराठी मनामनात आनंदाचा सागर उचंबळला. वास्तविक हा मनामनातला आनंद मायमराठी बद्दलच्या अभिमानाचेच प्रतीक आहे पण नुसता भाषेचा अभिमान, अस्मिता बाळगणं पुरेसं नाही तर आपल्या भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं प्रत्येक मातृभाषिकाचं कर्तव्य आहे. जगात कितीतरी परकीय भाषा बोलल्या जातात, अभ्यासल्या जातात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात सातासमुद्रापलीकडेही आपली मराठी भाषा त्याच आत्मियतेने अथवा औत्स्युक्याने, त्यातलं सौंदर्य, संस्कृती, परंपरा जाणून, आपल्या अफाट ग्रंथसंपदेचा मान राखून का अभ्यासली जाऊ नये? आज अनेक मराठी कुटुंबातील मुले परदेशी स्थायिक आहेत. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांना मराठी भाषा ही त्यांची ही मूळ मातृभाषा आहे याची जाणीव करून देणे हे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी भाषेला पर्याय नसला तरी जिथे आपलं मूळ आहे त्या भाषेचं ज्ञान असायला हवं याची जाणीव जरी करून देता आली तरी मराठी भाषेसाठी चाललेली चळवळ अर्धी जिंकलो असं म्हणायला हरकत नाही.

तिसऱ्या पिढीशी आपला संवाद जुळला पाहिजे आपल्याच नातवंडांशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी, गमती जमती सांगता, करता याव्यात म्हणून मराठी मातृभाषेची ओळख आणि त्यातून आवड निर्माण करण्याची गरज ही मागच्या पिढीकडून अपेक्षित आहे,

माझ्या नाती माझ्याशी मराठीत बोलू शकतात याचं मला कौतुकच नाही पण अभिमानही वाटतो. त्यांच्या सुट्टीच्या काळात मी त्यांना आंतरजालावर वर्णमाला, बाराखडी, शब्दांची ओळख, जोडाक्षरे आणि वाक्यं लिहायला आणि ओळखायला शिकवली, त्यांना मराठी आलंच पाहिजे हा माझा दुराग्रह नक्कीच नव्हता पण एका सुंदर, आणि त्यांचं मातृमूळ असलेल्या भाषेशी त्यांचं नातं जुळावं म्हणून माझा खटाटोप होता आणि तो नक्कीच यशस्वी झाला. हळूहळू मी त्यांना काही बडबड गीते काही बालगीते शिकवली, भारतातून पुस्तके पाठवली. त्यांनी तर ती वाचलीच पण या मराठी भाषेचे कौतुक त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंत पोहोचवले. हे काही थोडकं आहे का?

आज तिथे शनिवार रविवारी काही मराठी संघटनाच्या माध्यमातून अथवा खाजगीरित्या काही तास मराठीचे वर्ग घेतले जातात आणि अशा वर्गात आपल्या मुलांना पालक मराठी भाषेचं जतन व्हावं म्हणून आपुलकीने पाठवतात. तिथे मराठी शब्दांचे उच्चार, पाठांतर, श्लोक पठण, प्रार्थना या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते.

अगदी अलीकडेच एका समारंभात एका मराठी कुटुंबातल्या परंतु जन्माने अमेरिकन असलेल्या तेरा वर्षीय मुलाने शिवरायाचा पोवाडा अस्खलितपणे सादर केला तेव्हा सभागृहातील समस्त मराठी समुदायाने त्याला उभे राहून मानाचा मुजरा दिला.

।ईये मराठीचिये नगरी अवतरली जणू अटकेपार सागरी।।

तिथल्या संपन्न वाचनालयात गेल्यानंतर एका विभागात मला सुप्रसिद्ध मराठी लेखकांची पुस्तके दिसली आणि माझं मन एकदम भरून आलं पण त्यांची अल्पसंख्या पाहून मात्र थोडसं वाईटही वाटलं. हा विभाग इथल्या वाचकांसाठी अधिक समृद्ध करायला हवा त्यासाठी मराठी साहित्य संपदेचा इथे जाणीवपूर्वक भरणा झाला तर मराठी पुस्तकांसाठी एक चांगला वाचक वर्ग तयार होईल.

एक विचार माझ्या मनात आला की इथे जशी ठिकठिकाणी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे आढळतात तशी भाषिक वाचनालये का असू नयेत इथल्या मराठी भाषिकांनी एखादं समृद्ध संपन्न मराठी वाङ्मयाचेच स्वतंत्र वाचनालय सुरू करणे मुळेच अशक्य नाही. शेवटी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असते ती दर्जेदार सातत्याने होणारी साहित्य निर्मिती आणि मोठा वाचक वर्ग. ही जागरूकता असेल तर भाषा का विझेल? ती निरंतर, चिरंतन राहील. चला तर मग सागरापलीकडे रुजवूया हे रोप मराठी भाषेचे.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगांतून गीतेचे तत्वज्ञान

देह बुद्धी नष्ट होऊन भक्तिमार्गाने परब्रम्ह प्राप्त झाले, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून माणसाची सुटका होते, हे तत्त्वज्ञान आहे. परंतु तुकाराम महाराजांना पांडुरंगाची अखंड भक्ती करून त्याची सेवाच करायची आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही, म्हणून त्यांच्या एका अभंगात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,

आमुचे उचित/ हेचि उपकार/

आशपुलाची भार/ घालू तुज//

 आमच्या योगक्षेमाचा भार देवा तुझ्यावर घालून स्वस्थ बसणे हेच उचित आहे.

 मी भक्त व तू माझा हरी, अशी द्वैतभावना तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिसत असली

 तरी अद्वैत झाल्याशिवाय, खरा भक्त असूच शकत नाही हे त्यांच्या अभंगातून दिसणारे गीतेचेच तत्त्व आहे. ते अभंगातून स्पष्ट सांगतात,

दुजेखंडे तरी/ उरला तो अवघा हरी/

आपण बाहेरी/ नलगे ठाव धुंडावा//

इतुले जाणावया जाणा/ कोड तरी मने मना/

पारधीच्या खुणा/ तेणेची जाणाव्या//

तुकाराम बुवा या अभंगात काय सांगतात? मनानेच मनाला जाणले पाहिजे. जो पारधी असतो तो शिकारीचा शोध कसा घेतो, हे दुसरा पारधीच जाणतो. आपला हरी हा आपल्या जवळच आहे, तो दुसऱ्या ठिकाणी शोधायची गरज नाही.

 देह आधी काय खरा/ देहसंबंध पसारा/

 बुजगावणे चोरा/ रक्षणसे भासते//

 तुका करी जागा/ नको वासपू वाऊगा/

 आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//

तुकाराम महाराज निजरूप विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात, आणि सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैत रूप हरी तुला सापडेल, कारण तू स्वतःच परमात्मरूप आहेस. तुझी आत्मदृष्टी उघडी ठेवशील तर तुला हा बोध होईल.

थोडक्यात महाराजांना इथे असे सांगायचे आहे, की संपूर्ण विश्वात, चराचरात जो परमात्मा भरलेला आहे, तो तुला तू जर डोळे उघडे ठेवलेस तरच दिसू शकेल. आपल्याला एखादा माणूस सहज कुठेतरी भेटतो, आणि आपली मदत करून जातो. परमेश्वराच्या रूपानेच आपल्याला मदत करण्यासाठी तो आलेला होता याची मात्र आपल्या देहधारी माणसाना जाणीव नसते.

भगवंताने अर्जुनाला काय सांगितले?

“तुझे सर्व कर्म मला अर्पण कर.” तुकाराम महाराजही मुमुक्षुंना हेच सांगत आहेत.

आहे ते सकळ/ कृष्णासी अर्पण/

नकळता मन/ दुजे भावी//

म्हणून पाठे/ लागतील भुते/

येती गिवसित /पाच जणे/

(पंचमहाभूते, ज्यापासून माणसाचे शरीर बनले आहे)

 ज्याचे त्या वंचले/ आठव न होता/

दंड हा निमित्त कारणे/ तुका म्हणे//

अर्थात सर्व कर्मे हरीची असून त्याची त्याला अर्पण करायची आठवण न ठेवल्यामुळे, माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो, त्याला दंड मिळतो.

तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा गीतेत आलेल्या धर्म रक्षणाचे महत्त्व जीवनात का आहे ते त्यांच्या अभंगातून सांगतात, त्याचप्रमाणे शांत मनोवृत्तीचे महत्व ते समजावून सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख/

म्हणवुनी  शांती धरा/ उतराल पैलतीरा//

अंगी भरती आधी व्याधी/ तुका म्हणे त्रिविध ताप/ मग जाती आपोआप//

 मन जेव्हा शांत असेल, त्याचवेळी सर्व दुःखांचा नाश होऊन पैलतीरास जाणे सोपे होईल.

साळंकृत कन्यादान/ पृथ्वीदानाच्या समान/

परिते न कळे या मुढा/ येईल कळो भोग पुढा//

आचरता कर्म/ भरे पोट राहे धर्म/

सत्या देव साहे/ ऐसे करूनिया पाहे//

अन्न मान धन/ हे तो प्रारब्ध आधीन/

तुका म्हणे सोसे दुःख/ आता पुढे नासे//

गीतेतील कर्मयोग महाराजांनी या अभंगात भक्तांना सांगितला आहे. या ठिकाणी त्यांनी तत्कालीन वर्णाश्रमधर्माचे महत्त्व लक्षात घेतले आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माला अनुसरूनच कर्म केल्याने दुःख राहत नाही असा या अभंगातून त्यांनी उपदेश केला आहे.ज्याप्रमाणे

कृष्णाने पार्थास त्याच्या क्षात्र धर्माचे पालन करण्यास सांगितले.

क्रमशः… 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares