मराठी साहित्य – विविधा ☆ “पॉपकॉर्न ब्रेन : डिजिटल युगातील मनाची नवी व्याधी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “पॉपकॉर्न ब्रेन : डिजिटल युगातील मनाची नवी व्याधी…☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी मेंदू हा जगातील सर्वात गुंतागुंतीचा आणि अद्भुत अवयव मानला जातो. त्यानेच माणसाला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवले आहे. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही हा मेंदू बदलत्या जगाशी जुळवून घेत राहतो. परंतु गेल्या दोन दशकांत झालेल्या तंत्रज्ञानक्रांतीने या मेंदूवर इतका वेगाने आणि तीव्रपणे परिणाम केला आहे की आता मेंदूच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडिया, मोबाईल फोन, इंटरनेट आणि सतत वाहणारी माहिती या सगळ्यामुळे आजचा माणूस एका नव्या मानसिक स्थितीचा अनुभव घेत आहे. ही स्थिती म्हणजेच “पॉपकॉर्न ब्रेन” — एक असा मेंदू जो सतत उडणाऱ्या, फुटणाऱ्या, चमकणाऱ्या माहितीच्या फटकाऱ्यांना इतका सरावलेला आहे की शांतता, एकाग्रता आणि स्थिरता यांची क्षमता हरवू लागली आहे.

“पॉपकॉर्न ब्रेन” हा शब्द प्रथम सुमारे २०११ च्या सुमारास अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड लेव्हिन यांनी वापरला. त्या काळात स्मार्टफोनचा प्रसार झपाट्याने होत होता, आणि लोक सतत ऑनलाइन राहण्याची सवय लावत होते. लेव्हिन यांनी निरीक्षण केले की डिजिटल साधनांचा अतिरेकी वापर करणाऱ्यांचा मेंदू जणू पॉपकॉर्नच्या दाण्यासारखा सतत उड्या मारत असतो. एका क्षणात एका विचारातून दुसऱ्या विचारात, एका माहितीपासून दुसऱ्या सूचना, एका व्हिडिओपासून दुसऱ्या पोस्टमध्ये उडी घेणारा हा मेंदू स्थिर राहू शकत नाही. जसे गरम तेलात टाकलेले दाणे फुटत राहतात, तसेच या युगातील मेंदूही सतत “फुटत” आणि “उडत” राहतो. म्हणूनच या अवस्थेला “पॉपकॉर्न ब्रेन” असे नाव देण्यात आले.

या संकल्पनेचा वैज्ञानिक पाया मेंदूतील न्यूरोट्रांसमिटर “डोपामिन”मध्ये आहे. डोपामिन हे ‘रिवॉर्ड केमिकल’ मानले जाते. जेव्हा आपण काही सुखद अनुभव घेतो, काही नवीन माहिती मिळवतो, लाइक किंवा नोटिफिकेशन पाहतो, तेव्हा डोपामिनची पातळी वाढते आणि आपल्याला आनंदाची लहर जाणवते. या आनंदाचा शोध मेंदू पुन्हा पुन्हा घेत राहतो, त्यामुळे आपण वारंवार फोन तपासतो, सोशल मीडिया स्क्रोल करतो, व्हिडिओवरून व्हिडिओकडे जात राहतो. कालांतराने ही सवय इतकी दृढ होते की मेंदू सतत नवीनतेची मागणी करू लागतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या शांत वातावरणात बसावे लागते, जसे की पुस्तक वाचणे, संवाद साधणे, किंवा फक्त शांतपणे विचार करणे इ. तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो, लक्ष केंद्रित करणे अवघड जाते, आणि आपोआप हात पुन्हा मोबाईलकडे जातो. हीच “पॉपकॉर्न ब्रेन”ची मूळ मानसिक यंत्रणा आहे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, या स्थितीत मेंदूतील “अटेंशन नेटवर्क” आणि “डीफॉल्ट मोड नेटवर्क” या दोन भागांमधील समतोल बिघडतो. अटेंशन नेटवर्क हे कामावर लक्ष केंद्रीत ठेवते, तर डीफॉल्ट मोड नेटवर्क हे विश्रांतीच्या अवस्थेत कार्यरत असते, जिथे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मचिंतन घडते. सततच्या डिजिटल उत्तेजनामुळे अटेंशन नेटवर्क थकते आणि डीफॉल्ट मोड नेटवर्कला पुरेशी संधी मिळत नाही. परिणामी, माणूस सतत काहीतरी करण्याच्या धावपळीत असतो पण प्रत्यक्षात काही खोल विचार करू शकत नाही. ही स्थिती एखाद्या संगणकावर हजारो टॅब उघडे ठेवून एकाच वेळी सर्व वापरण्याच्या प्रयत्नासारखी आहे. शेवटी संपूर्ण प्रणाली हळूहळू अडकते, मंदावते आणि क्रॅश होते.

पॉपकॉर्न ब्रेनचा सर्वाधिक परिणाम तरुण पिढीवर होत आहे. इंटरनेटसह वाढलेली ही पिढी सतत बदलणाऱ्या डिजिटल जगाशी इतकी जुळलेली आहे की वास्तव जग त्यांना बोअर वाटते. वर्गात शिकवले जाणारे धडे, लांब व्याख्याने, किंवा पुस्तकातील मोठे परिच्छेद वाचणे त्यांना कठीण जाते कारण त्यांच्या मेंदूला १० सेकंदांच्या रील्स, २० शब्दांच्या ट्विट्स आणि सततच्या नोटिफिकेशनच्या जगाशी सवय झाली आहे. परिणामी, एकाग्रतेचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीने केलेल्या संशोधनानुसार २००० साली मानवाची सरासरी एकाग्रता सुमारे १२ सेकंदांची होती, तर २०२० पर्यंत ती फक्त ८ सेकंदांवर आली, म्हणजेच सोनमाश्याच्या एकाग्रतेपेक्षा कमी.

पॉपकॉर्न ब्रेन केवळ लक्ष केंद्रीत होण्यावर परिणाम करत नाही, तर भावनिक आणि सामाजिक आयुष्यावरही खोल परिणाम घडवतो. जेव्हा मेंदू सतत उत्तेजनांना सरावतो, तेव्हा तो शांततेत असहाय होतो. अशा व्यक्तींना एकांतात राहणे, एखाद्या मित्राशी खोल संवाद साधणे, किंवा दीर्घ काळ एकाच कामावर लक्ष ठेवणे जड जाते. त्यांना लगेच कंटाळा येतो आणि नवीन उत्तेजनाची भूक लागते. या प्रक्रियेला मानसशास्त्रात “डिजिटल रिवॉर्ड सर्किट” म्हणतात. जणू मेंदूला सतत साखर मिळत आहे आणि एकदा साखरेचा पुरवठा थांबला की तो थरथर कापतो. म्हणूनच लोक मोबाईल हातात नसला तरी नकळत तो हातात शोधतात, नोटिफिकेशनचा आवाज नसतानाही “फँटम वायब्रेशन” अनुभवतात.

पॉपकॉर्न ब्रेनचे शारीरिक परिणामही लक्षणीय आहेत. झोपेची गुणवत्ता घटते, डोळ्यांवर ताण येतो, मेंदू सतत सतर्क राहिल्यामुळे शरीराचा जैविक घड्याळ बिघडतो. सततच्या स्क्रीन एक्स्पोजरमुळे मेलाटोनिनचे स्राव कमी होते, त्यामुळे झोप येण्यास उशीर होतो आणि सकाळी थकवा जाणवतो. या स्थितीला “डिजिटल इनसॉम्निया” म्हटले जाते. दीर्घकाळात ही समस्या नैराश्य, चिंता, आणि आत्मसन्मानाच्या कमीपणाशी जोडली जाते कारण सोशल मीडियावरील सततची तुलना, लाईक्स आणि फॉलोअर्सची गणना मेंदूवर दडपण आणते. व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असल्यासारखे वाटते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, पॉपकॉर्न ब्रेन ही एका प्रकारची “न्यूरोप्लॅस्टिक ऍडॅप्टेशन” आहे. म्हणजेच मेंदू स्वतःला नवीन परिस्थितीशी जुळवून घेतो. परंतु ही जुळवणूक नैसर्गिक नाही, तर तात्पुरती आणि कृत्रिम आहे. मेंदूतील “सिनॅप्सेस” म्हणजे न्यूरॉन्समधील जोडणी सतत बदलणाऱ्या उत्तेजनांशी जुळवून घेतात, त्यामुळे हळूहळू “डीप फोकस” करणे कठीण बनते. संशोधन दर्शवते की ज्यांच्या जीवनात स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्यात “प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स” (निर्णय घेण्याचा भाग) आणि “हिप्पोकॅम्पस” (स्मरणशक्तीचा भाग) यांची क्रियाशीलता कमी होत जाते. त्यामुळे दीर्घकाळात विचारशक्ती, तार्किक निर्णय क्षमता आणि आत्मनियंत्रण या सर्व गोष्टींवर परिणाम होतो.

इतिहासाच्या दृष्टीने बघितले तर प्रत्येक तांत्रिक क्रांतीने मेंदूवर परिणाम केला आहे. मुद्रणयंत्राच्या काळात वाचनसवयींनी मेंदूच्या भाषिक भागाचा विकास केला, औद्योगिक क्रांतीने यांत्रिक विचार वाढवला, पण डिजिटल क्रांतीने पहिल्यांदाच मेंदूला बाह्य जगाशी सतत जोडून ठेवले आहे. हा जोड अखंड आहे, त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. आधीच्या युगात एक दिवस संपला की संवाद थांबत असत, परंतु आता रात्री झोपेतही नोटिफिकेशन येत राहतात. अशा परिस्थितीत मेंदूचा “रेस्ट मोड” जवळजवळ नाहीसा झाला आहे. काही न्यूरोसायंटिस्ट्स तर म्हणतात की आजचा माणूस “पॉज” बटण विसरला आहे.

औद्योगिक युगाने शरीरावर परिणाम केला, तर डिजिटल युगाने मेंदूवर. पण माणसात आत्मपरीक्षण करण्याची एक विलक्षण क्षमता आहे. हीच क्षमता आज पुन्हा जागवण्याची वेळ आली आहे. मेंदूला पुन्हा शांततेचा, शून्यतेचा, आणि विचाराच्या गाभ्याचा अनुभव द्यावा लागेल. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवर पुन्हा नियंत्रण मिळवू, तेव्हाच आपण “पॉपकॉर्न ब्रेन”मधून मुक्त होऊ. मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कृत्रिम बुद्धिमत्तेशी एकरूप होण्याचा नसून — सजग बुद्धिमत्तेशी परत एकरूप होण्याचा आहे. माहितीचा ओघ थांबवणे शक्य नाही, पण त्यात वाहून जाणे टाळणे शक्य आहे. म्हणूनच, या युगात सर्वात क्रांतिकारी कृती म्हणजे थांबणे. थांबून विचार करणे आणि थांबून स्वतःला पुन्हा शोधणे. “पॉपकॉर्न ब्रेन” आपल्याला शिकवतो की सतत उडत राहणारा मेंदू चमकदार असू शकतो, पण विचारशील मेंदूच खऱ्या अर्थाने प्रकाशमान असतो.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बाजार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बाजार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

पैसे देऊन वस्तू व काही प्रमाणात सेवा विकत मिळण्याचं ठिकाण असंच बाजार या बद्दल सांगता येईल. पण तरीही वेगवेगळा अर्थ बाजार या शब्दात असतो. ज्या वस्तू पैसे देऊन उघडपणे मिळतात व जिथे व्यवहार सरळ, व सचोटिने होतात असे कितीतरी बाजार आहेत.

भाजी बाजार, सराफ बाजार, मासळी बाजार, धान्य बाजार, कापड बाजार, अजूनही काही प्रमाणात बर्‍याच ठिकाणी भरला जाणारा आठवडे बाजार असे नेहमीचे व सगळ्यांना माहित असणारे अनेेक बाजार आहेत. या बाजारात मिळणार्‍या वस्तूंचे भाव सगळ्यांसाठी, सगळ्यावेळी सारखेच असतात अस नाही.

पण शाळेत वर्गावर शिक्षक येण्याआधी आमचा वाढलेला गोंधळ, गोंगाट ऐकून शिक्षक आल्यावर म्हणायचे, काय बाजार भरवला आहे. याचा अर्थ बाजार म्हणजे गोंधळ, गोंगाट, आणि बेशिस्तपणा असाच असायचा.

गुरांचा बाजार पण असतो. नावावरुन या बाजाराच स्वरूप काय असेल ते लक्षात येतच. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र काहीवेळा वारंवार घोडेबाजार हा शब्द वापरला जातो. तेव्हा मात्र शब्द जरी घोडेबाजार असा असला तरी तो वापरतांना त्यात घोड्याचा नाहीतर कोणाचा उल्लेख असतो हे सहज लक्षात येतं. पण तो शब्द उघडपणे वापरला जातो. आणि नकळत आपण प्राण्यांच्या रांगेत एका बुध्दीजीवी समजल्या जाणाऱ्या प्राण्याला बसवतो. एकिकडे बुध्दीमुळेच आपल्यात व प्राण्यात भेद आहेत हे सांगतो. आणि दुसरीकडे या घोडेबाजाराचा उल्लेख करत परत बुध्दीवरच शंका घेतो. एखाद्याला समजत नसेल तर त्याला गाढव म्हंणण समजून घेउ. पण…

या शिवाय ‘बाजार’ नावाचा एक चित्रपट पण काढला होता. यात काय दाखवलं होत ते सांगणार नाही, पण बाजार हा शब्द फक्त चांगल्या, किंवा फक्त वाईट गोष्टींसाठीच वापरला जातो अस नाही. तर त्यावेळी भावना कोणत्या असतात त्यावरून चांगल का वाईट हे ठरवाव लागतं. आता चोरबाजारही असतो. पण तिथे वस्तू विकत घेणारे चोरच असतात अस नाही. शेअर बाजार पण आहे. याबद्दल सांगायची गरज आहे असही नाही.

शारिरीक दुखणं, अपघात, डाॅक्टर, हाॅॅस्पिटल, ऑपरेशन या गोष्टींची देखील आता काहीप्रमाणात सवय झाली आहे. पण आता अशा ठिकाणी देखील पाॅलीसी आहे का? … अशी विचारणा पहिल्यांदा होतेच. हा विचारण्याचा हेतू वाईटच असतो अस नाही. पण काहिवेळा याचा अनुभव चांगला सुध्दा नसतो. अशा पाॅलीसी देणारे अनेक आहेत. पण यापैकी एकाचा पाॅलीसी बाजार असाच उल्लेख करतात. आणि मग खरच बाजार या शब्दाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार मनात येतातच.

या सगळ्या बाजाराचा विचार मनात आला तो सध्या सुरु असलेली सिलेंडरच्या काळ्याबाजाराच्या चर्चेवरून. वरचे सगळे बाजार हे दिसतात, खूपदा त्यांची ठिकाणही ठरलेली असतात. पण काळाबाजार हा असा बाजार आहे जो असतो, भरतो पण दिसत नाही. किंवा दिसणार नाही याचीच दक्षता या बाजारात घेतली जाते. हा प्रत्येकवेळी एकाच गोष्टीचा, एकाच ठिकाणी, एकाच वेळी नसतो. परिस्थिती आणि काळ यानुसार याची सगळी गणितं बदलतात. स्वस्त दरात पुरवठा होणारं धान्य. खतं, ज्या गोष्टी अनधिकृतपणे विकल्या जातात अशा गोष्टी. अशा सगळ्या गोष्टींचा मग काळाबाजार भरतो.

या शिवाय सिनेसृष्टीला माया बाजार अस म्हणणारे आहेत. याची पण अनेक कारणं असतील. शिवाय भंगार बाजार, कोंबडी बाजार असेही बाजार असतात. पण सगळ्या बद्दल लिहिल तर शब्दांचा बाजार भरवला अस वाटेल.

बाजार या शब्दामुळे विचारांचा बाजार भरला होता. तो थोडा थोडा कमी करतोय, बाकी काही नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…☆ श्री जगदीश काबरे ☆

मृतवत झालेल्या संस्कृत भाषेतील एका वाक्याचाही धड अर्थ न सांगता येणारे म्हणतात की संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी. त्या दांभिकोत्तमांना पु ल देशपांडे यांनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणातून जे सणसणीत आणि खणखणीत उत्तर दिले आहे ते असे…

‘भाषेच्या बाबतीतसुद्धा काही संकेत ठरून गेले. तुकोबांची मराठी चेपली गेली आणि पंतकाव्याचा मराठी गद्य आणि पद्य अवतार मान्य झाला. सभ्यतेचं नातं आशयाशी न जुळता संस्कृतप्रचुर भाषेशी जुळलं! आजही आपल्या भारदस्तपणाची सांगड मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांशीच घातली गेली आहे. खेड्यापाड्यातला नव्याने शिकलेला वर्ग तर उगीचच चांगले चांगले मराठी शब्द टाकून वर्तमानपत्रवाल्यांनी पुरवलेले संस्कृत शब्द वापरतो. आमचे पुढारी चुकलो, नेते सभेला ‘येत’ नाहीत, ‘उपस्थित’ राहतात. एके काळी इंग्रजी भाषेच्या दराऱ्यामुळे बायकोची मिसेस् झाली. तत्कालीन पांढरपेशा समाजात इंग्रजीला जे सामाजिक मोठेपण लाभलं ते आता पुन्हा नवशिक्षित बहुजन समाजातल्या प्रतिष्ठितांत संस्कृतप्रचुर मराठीला लाभायला लागलं आहे. संस्कृतवर माझा राग नाही. रेडिओवरून मी संस्कृतमधल्या बातम्या ऐकतो. इतका विनोदी कार्यक्रम मला लिहिता आला नसता. ‘डॉक्टर किसिंजरेण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चे अभिभाषणम् कृतम्’ वगैरे ऐकताना इंग्रजी आणि संस्कृतचा हा व्रात्यस्तोम पद्धतीने लागलेला विवाह पाहून मीदेखील ‘अहो ब्यूटिफुलम् एतद्! ‘ असं म्हणतो. पण हे संस्कृतचं प्रकरण इतकं साधं नाही. तिच्यामागे कोठेतरी ही देववाणी आहे या कल्पनेशी जुळलेलं नातं आहे. उर्दूच्या आग्रहात मुसलमानांचा जसा धर्माभिमान दडला आहे, तसाच संस्कृतच्या मागे आमचा संस्कृतिविषयक कल्पनांचा अभिमान दडला आहे. ‘

‘कोठेतरी आपण ह्या भाषेचं अतिमानवी शक्तीशी नातं जुळवलं आहे. त्यातून आमचे राष्ट्रवादी पुढारी संस्कृतचे अभिमानी. आश्चर्य असं की, स्वतः लोकमान्य टिळक हे संस्कृतचे पंडित असून साध्या मराठीचे पुरस्कर्ते होते. मंडालेहून सुटून आल्यावर त्यांच्यावर संपादक मंडळापैकी कोणीतरी अग्रलेख लिहिला, त्याचा मथळा होता ‘लोकमान्यांची बंधमुक्तता’! लोकमान्यांनी त्याच्यावर काट मारली आणि लिहिलं, ‘टिळक सुटले’! पण असा एखादा अपवाद सोडला तर मराठी साहित्यातल्या संस्कृतच्या ह्या जन्मसिद्ध बडेजावामुळे पुन्हा एकदा जनसामान्यांची भाषा निराळी आणि मराठी साहित्याची भाषा निराळी व्हायला लागली. पुढे इंग्लिश हे मोठेपणाचं लक्षण झालं. आजही आमच्या नवसुशिक्षित श्रीमंत मराठी समाजात आपल्या पोराच्या सुंदर मराठीचं कौतुक करण्याऐवजी तो ‘ज्याक् अॅण्ड जिल्’ किती छान म्हणतो याचंच कौतुक अधिक होतं. फुल्यांची मराठी भाषा तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या मताने वाचण्याच्याही योग्यतेची नव्हती! शेतकऱ्याच्या दारिद्रयाचं फुल्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ ह्या पुस्तकात काढलेलं शब्दचित्र केवळ भाषेच्या शैलीच्या दृष्टीनं पाहिलं तरी किती प्रभावी आहे! पण आमच्यापुढे आदर्श शैली होती चिपळूणकरांची. ‘

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रस्तावना

भारतीय काव्यपरंपरेत काही रूपं अशी आहेत, की त्यांचं वर्णन करताना शब्दही शहारतात. कारण तिथे केवळ देह नसतो, तर देहापलीकडची कांती असते; केवळ रंग नसतो, तर अनुभूतींचं अथांग विश्व दडलेलं असतं.

“श्याम”, “श्यामल”, “मेघश्याम”, “नीलमेघवर्ण”, “हिरण्यवर्ण”, “स्वर्णमय”, “कर्पूरगौर” — हे शब्द त्वचेच्या रंगाचं वर्णन करणारे नाहीत; ते करुणा, माधुर्य, गूढता, शांती आणि दिव्य तेजाचे स्वर आहेत. म्हणूनच भारतीय कवींनी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीलक्ष्मी किंवा श्रीमहादेव यांचं वर्णन करताना रंग नव्हे, तर आपल्या दर्शनानुभूती रंगवल्या.

राम : शांत निळाईचा करुणासागर

“नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम्” ही ओळ उच्चारताच मनात एक गंभीर, दयार्द्र आणि प्रसन्न निळाई उतरते.

रामांचं श्यामल रूप म्हणजे स्थैर्याची कांती. त्यांच्या वर्णात आकर्षण आहे; पण त्याहून अधिक संयम आहे. मुखावर तेज आहे; पण नेत्रांत त्याहून अधिक करुणा आहे. जणू ऋषींच्या तपश्चर्येतून सांजवेळचं नील आकाश आकार घेत गेलं आणि त्यातून रामांचं रूप प्रकट झालं.

“रामं दूर्वादलश्यामम्… ” — दूर्वेच्या कोवळ्या हिरवट-निळसर छटेसारखी त्यांची कांती : शीतल, सौम्य आणि डोळ्यांना निववणारी.

“नीलमेघश्याम” ही उपमा सहज जन्मलेली नाही. मेघ गडद असतो, पण भयावह नसतो; तो जीवनदाता असतो. त्याच्या कुशीत वीज असते, पण वर्षावात शीतलता असते. रामांची श्यामलता अशीच — सामर्थ्य आणि सौम्यता यांचा अद्वैत संगम.

त्यांच्या वर्णात श्रावणसंध्येची गंभीर प्रसन्नता आहे. जसा दिवस मावळताना आकाश अधिक गहिरं, अधिक शांत आणि अधिक सुंदर होत जातं, तशी रामांची कांती मनात उतरते.

कृष्ण : पावरीत विरघळलेली श्यामलता

“मेघश्यामं पीतकौशेयवासम्… ” ही ओळ ऐकताच श्रीकृष्ण जणू यमुनेच्या तीरावर उभे राहतात.

कृष्णांची श्यामलता ही गूढतेची माधुरी आहे. त्यांच्या वर्णात चपलता आहे, संगीत आहे आणि अंतःकरणाला मोहून टाकणारं आकर्षण आहे. मोरपिसांनी अलंकृत ते सावळं रूप म्हणजे जणू श्रावणमेघांनी बासरीचा स्वर धारण केला आहे.

तो अंधार नाही; तो चंद्रप्रकाशाला अधिक सुंदर करणारा निळसर गहिरा पडदा आहे. त्यांच्या श्यामल कांतीवर मोरपीस अधिक खुलतं, पीतांबर अधिक उजळतो आणि बासरीचा स्वर अधिक विरघळतो.

जशी काळ्या नभामुळं तारकांची शोभा वाढते, तशी कृष्णांच्या श्यामलतेमुळं भक्ती अधिक उजळते. म्हणूनच संत तुकाराम सहज उद्गारतात :

“सावळे सुंदर रूप मनोहर… ”

या एका ओळीत भारतीय सौंदर्यदृष्टीचा आत्माच दडलेला आहे.

श्यामरंग : गूढ प्रकाशाची सावली

राम आणि कृष्ण यांचा श्यामल वर्ण सामान्य अनुवंशिक देहवर्णाच्या चौकटीत मावणारा नव्हता. “श्यामल” म्हणजे केवळ सावळेपणा नव्हे; ती सावळेपणातून झिरपणारी दिव्य कांती आहे.

भारतीय कवींनी रंगांना त्वचेच्या मर्यादेत बंदिस्त केलं नाही. त्यांनी रंगांत स्वभाव पाहिला, करुणा पाहिली, माधुर्य पाहिलं, तेज पाहिलं. म्हणून इथं श्यामवर्णही राजस आहे आणि सावळेपणातही दिव्यता आहे.

श्याम रंग म्हणजे अंधार नव्हे; तो प्रकाशाचा अधिक गूढ झालेला स्वर आहे. जसा रात्रीच्या नभात चंद्र अधिक सुंदर दिसतो, तशीच श्यामलतेच्या पार्श्वभूमीवर करुणा अधिक उजळते.

स्वर्णमयतेचे सूर्यस्पर्शी तेज

भारतीय वाङ्मयानं केवळ श्यामलतेलाच दिव्यता दिली नाही; त्यानं स्वर्णमय तेजालाही तितक्याच आदरानं गौरवलं.

वैदिक श्रीसूक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन “हिरण्यवर्णां”, “पद्मवर्णां”, “चन्द्रां प्रभासाम्” असं येतं. महाभारतात कर्णाचं, तर बौद्ध साहित्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या वर्णाचं वर्णन “स्वर्णमय” असं आढळतं.

हे केवळ गोरेपण नव्हतं; ते वितळलेल्या सुवर्णासारखं तेजस्वी अस्तित्व होतं. त्वचेवर कमलदलासारखी कोमल गुलाबी छटा आणि व्यक्तिमत्त्वात सूर्यकिरणांची प्रभा होती. जणू पहाटेच्या बालरवीकिरणांनी मानवी रूप धारण केलं होतं.

भारतीय कवींनी व्यक्तिमत्त्वातील तेजाला रंगांची उपमा दिली — कुणी मेघश्याम झालं, कुणी हिरण्यवर्ण.

कर्पूरगौर शिव

श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही श्यामवर्णी असले, तरी त्यांच्या वर्णात सूक्ष्म भेद आहे. रामांचा वर्ण निरभ्र आकाशासारखा शांत निळसर आहे; तर कृष्णांचा वर्ण वर्षाऋतूतील सजल मेघासारखा गडद नील.

महादेवांचा वर्ण मात्र याहून भिन्न आहे. कैलासनिवासी शिव “कर्पूरगौर” आहेत — हिमालयाच्या शुभ्रतेसारखे, “रजतगिरीसम” धवल आणि तेजस्वी.

त्यांच्या गौरवर्णात वैराग्याची शांतता आहे; जणू हिमशिखरांनीच मानवी रूप धारण केलं आहे.

काही रंग अनुभवावे लागतात

आज विज्ञान रंग मोजू शकतं, छटा ठरवू शकतं; पण “मेघश्याम” मोजू शकत नाही. कारण तो रंग त्वचेवर नव्हता — तो अनुभूतीत होता.

रामांचा श्याम वर्ण म्हणजे शांत प्रार्थना. कृष्णांची निळाई म्हणजे यमुनेवर तरंगणारी पावरी. श्रीलक्ष्मीची स्वर्णमय प्रभा म्हणजे समृद्धीचं मंगल तेज.

हे रंग चित्रांत रेखाटता येतात, शब्दांत मांडता येतात; पण पूर्णपणे उलगडता येत नाहीत. कारण काही रंग डोळ्यांनी दिसत नाहीत — ते अंतःकरणानं अनुभवावे लागतात.

आकाशाचा रंग हातात पकडता येत नाही; तो फक्त डोळ्यांत उतरतो. तशीच रामांची गंभीर श्यामलता, कृष्णांची मधुर निळाई आणि शिवांची कर्पूरगौर प्रभा भारतीय मनाच्या आकाशात आजही तरंगत आहे — श्रावणातील पहिल्या मेघासारखी… शांत, गूढ आणि चिरंतन.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २४ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २४ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन (२)

जनसामान्यांची साधारण अशी रीत असते की स्वतःतील दोषांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे दोष दाखवत फिरायचे. म्हणतात ना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र चटकन दिसते. अशी माणसे सर्वकाळ असतात. तुकाराम महाराजांच्या काळातही समाजात असे भरपूर लोक होते. त्यांना उद्देशून महाराजांनी ही अभंग रचना केली आहे.

 तेचि करो मात/ जेणे होईल तुझे हित//

 काय बडबड निमित्य / सुख जिव्हारी सिणवीसी//

 जो मूळव्याधी पिडिला/ त्यासी देखोन हसे खरजुला//

 अरथ करी सोसी/ त्यासी हसे तो आळशी//

 क्षयरोगी म्हणे परता/ सरळ रोगीया कुष्ठिता//

 वडस दोन्ही डोळा वाढले/ आणिका *काने कोचे बोले

 तुका लागे पाया/ शुद्ध करा आपणिया//

 महाराज सामान्य जनाना सांगत आहेत, अरे माणसा उगीच जास्त वटवट करणे थांबव. तुझे हित कशात आहे तेवढे बघ, उगीच जास्त बडबड करून लोकांना त्रास का देतोस? सामान्य परिस्थिती अशी आहे की, जो कोणी मुळव्याधीच्या आजाराने त्रस्त आहे त्याला पाहून खरूज झालेला मनुष्य हसतो. अति श्रम करणाऱ्यांना आळशी मनुष्य नावे ठेवतो. कुष्ठरोग्यास पाहून क्षयरोगी त्याला दूर राहण्यास सांगतो. ज्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंब पडली आहेत तो दुसऱ्याला चकणा म्हणतो.

 महाराजांचे म्हणणे असे आहे की जन हो तुम्ही स्वतःतील दोष, दुर्गुण ओळखून आधी स्वतः शुद्ध व्हा. दुसऱ्याचा धिक्कार करू नका. समाजातील स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

 तुकाराम महाराजांच्या वेळी समाजातील दांभिकता फार वाढली होती. महाराजांच्या हे लक्षात आल्यामुळे देवाला विनंती करणारा असा हा अभंग आहे.

 बोल नाही तुझ्या/ दातृत्वपणासी/

 आम्ही अविश्वासी/ सर्वभावे//

 दम्भे करू भक्ती/ सोंग दावू जना/

 अंतरी भावना/ वेगळीया//

 चित्ताचा तू साक्षी/ तुज कळे सर्व/

 किती करू गर्व/ आता पुढे//

 तुका म्हणे देवा/ तू काय करीसी/

 कर्मा दुस्तरासी/ आमुचिया//

 हे देवा तू उदार आहेस. दाता आहेस. यात काहीच शंका नाही. खरंतर आम्ही दोषी आहोत.

(तुकाराम स्वतःलाही या जनसामान्यातील एक समजतात.) आमचाच तुझ्यावर विश्वास नाही. दांभिकपणे लोकांना दाखवण्यासाठी आम्ही तुझी भक्ती करतो. मनात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात. तू चित्ताचा साक्षी आहेस, म्हणून सर्व जाणतोस. तुझ्याकडे आम्ही गर्व तरी काय करणार? आणि आमच्या या दुस्तर कर्माला तू तरी काय करणार?

 कावळ्याच्या गळा/ मुक्ताफळ माळा/

 तरी काय त्याला/ भूषण शोभे//

 गजा लागी केला/ कस्तुरीचा लेप/

 तिचे तो स्वरूप/ काय जाणे//

 बकापुढे सांगे /भावार्थ वचन/

 वा उगाची सीण /होय त्यासी//

 तुका म्हणे तैसे/ अभाविक जन/

 त्यासी वाया सीण / करू नये//

समाजातील अज्ञानी, अभाविक जनांसाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात जनावरे, पक्षी यांची उदाहरणे देऊन अशा लोकांना भक्तीचे महात्म्य काय सांगावे असा विचार मांडला आहे.

कावळ्याच्या गळ्यात मोत्याचे हार घालून काय शोभा? हत्तीच्या अंगाला कस्तुरीचा लेप लावला तरी त्याचा सुगंध हत्तीला काय कळणार? बगळ्यापुढे आयुष्याचे महत्त्व वाचून, भक्तीचा महिमा सांगून काही फायदा आहे का? विनाकारण त्या प्रवचनकाराला थकवा यायचा. तेव्हा भक्त म्हणून मिरवणारे पण मनात मुळीच भाव नसलेले, अशा लोकांना कोणताही उपदेश करू नये असे महाराज सांगतात.

तुकाराम बुवाना त्यावेळच्या समाजातील मंबाजीबुवांसारख्या लोकांनी खूप त्रास दिला होता. त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवण्यापर्यंत मजल गेली होती. या संदर्भात हे अभंग महाराजांनी रचले असावेत.

ब्राह्मण म्हणजे वेदोक्त कर्म करणारे. तो त्यांचा अधिकार. तुकाराम महाराजांना भोजनाला बोलविणाऱ्या एका विद्वान ब्राह्मणाला उद्देशून तुकाराम बुवा म्हणतात,

 नये माझा तुम्हा होऊ शब्द स्पर्श/

 विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणांसी//

 म्हणून या तुम्हा करितो विनंती/

 धावे शेष हाती उरले ते//

 वेदी कर्म जैसे बोलीले विहित/

 करावी ते नित विचारूनी/

 तुमचा स्वधर्म माझा अधिकार/

 भोजन उत्तर तुका म्हणे//

माझा तुम्हाला शरीराने किंवा शब्दानेही स्पर्श होऊ नये, कारण तुम्ही विद्वान, विद्यावंत ब्राह्मण आहात. वेदांमध्ये तुमचे जैविक कर्म सांगितले आहे त्याप्रमाणे आपण करावे. तुमच्या पंक्तीला न बसता तुमच्या भोजनानंतर जे काही उच्छिष्ठ उरले असेल तेवढेच खाण्याचा माझा अधिकार आहे. आणि वेदोक्त कर्म करणे हा तुमचा स्वधर्म आहे. उपरोधिक असे हे वरील अभंग आहेत.

माणसातील चांगले गुण बघावे, जात- कुळीला अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. समाजातील उच्चनीचता भाव दूर व्हावा यासाठी रोजच्या जीवनातील दृष्टांत देऊन या अभंगात महाराज काय सांगतात?

 आपणा लागे काम वाण्या घरी गुळ/

 त्याचे याती कुळ काय कीजे//

 उकीरड्यावरी वाढली तुळसी/

 गाईचा टाकावी ते कैसी ठाया गुणे//

 गाईचा जो भक्ष अमंगळ खाय/

 तिचे दूध काय सेवू नये//

 तुका म्हणे काय सालपटाशी काज/

 फणसातील बीज काढुनी घ्यावे//

वाण्याच्या घरचा गुळ आपल्याला हवा आहे, तर त्यासाठी त्याची जात कुळी का विचारावी? तुळस उकिरड्यावर उगवली तरी ती पवित्रच असते. गाय अशुद्ध वस्तू खाते, पण आपण तिचे दूध पितो ना? फणसाचे साल काटेरी असले तरी आपला मतलब आतील गोड गरे खाण्याचाच! थोडक्यात काय तर गुणदोष युक्त कोणत्याही वस्तूतील दोषांकडे दुर्लक्ष करून त्यातील गुण तेवढे घ्यावे हेच खरे.

ब्राह्मणांसारख्या श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन कुळ भ्रष्ट करणारेही असतात.

 अंगी ब्रह्म क्रिया/ ख्रिस्ती चा व्यापार/

 हिंडे घरोघर / चांडाळाचे//

 अंतेजाची खिचडी/ घेता ती मागून/

 गाळीया प्रदान/ माय बहिणी//

 उत्तम कुळी जन्म/ क्रिया अमंगळ/

 बुडविले कुळ/ उभयता//

 तुका म्हणे ऐसी /कलियुगाची चाली/

 स्वार्थी बुडवली/ आचरणे//

काही ब्राह्मण असे असतात की, ब्रह्मकर्म न करता सावकारी करतात, आणि वसुलीसाठी चांडाळांच्या घरी जातात. महारांकडून कधीकधी पोट भरण्यासाठी खिचडी आणतात आणि व्यापारा निमित्त माय बहिणींवरून शिव्या देतात. असे ते उत्तम कुळात जन्मलेले असूनही त्यांचे कर्म अमंगळ असते. या कलियुगात अशी वागणूक सर्वत्र दिसून येते. स्वार्थ वाढला आहे, त्यामुळे शुद्ध आचरण भ्रष्ट झाले आहे.

 पापाचीया मुळे/ झाले सत्याचे वाटोळे/

 दोष झाले बळीवंत/ नाही ऐसी झाली नीत//

 मेघ पडो भीती/ पिके सांडीयेली क्षीती/

 तुका म्हणे काही/ वेदा वीर्य शक्ती नाही//

या कलियुगात पापे फार वाढली. सत्याचा ऱ्हास झाला. नीती भ्रष्ट झाली, दोष वाढले. दुष्काळ पडू लागले, निसर्ग कोपला. अधर्मामुळे वेदमंत्रातील बळ नष्ट झाले.

आज आपण अशाच परिस्थितीला सामोरे जात आहोत. आतंकवाद वाढला आहे. मुलगा वडिलांना विचारेनासा झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे. माणसातले माणूसपण हरवते आहे…

परिस्थिती सुधारणे आपल्याच हातात आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.

क्रमशः… २४ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (या सदरातील अखेरचा भाग)

माझ्या अजाण वयापासूनच्या विविध टप्प्यांवरचे हे सगळे अनुभव ‘त्या’चा कृपालोभ म्हणजे काय याची पुन्हा नव्याने प्रचिती देणारे साक्षात्कारच होते माझ्यासाठी!

‘देव’ ही मानवनिर्मित संकल्पना आहे. तो अस्तित्वातच नसतो. तो आहे असं मानणं हा एक भ्रम आहे’ असं आग्रहाने सांगणाऱ्यांची भूमिका माझं वय वाढत गेलं तसं अनेकदा ऐकता, वाचताना माझ्या मनात संभ्रम नाही पण प्रश्न मात्र निर्माण करायचीच. पण त्या प्रश्नांची उत्तरं अट्टाहासानं लगेचच मिळवावीत आणि ती टोकाची मते खोटी ठरवावीत अशी असोशी माझ्या मनात कधी निर्माण झाली नाही तरी त्यातलं तथ्य समजून घ्यावं असं, माझं वाचन वाढत गेलं तसं मला मनापासून वाटू लागलं हेही खरंच. हे समजून घ्यावं असं वाटणंच पुढे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात असणारी पुसटशी अंधूक रेषा माझ्यापुरती अधिकाधिक ठळक व्हायला निमित्त झाली. अर्थातच हे सगळं एका क्षणात घडून गेलेलं नाही. तरीही ते घडायला निमित्त झालेले एक एक क्षण मात्र मी समतोल मनाने स्वीकारल्यामुळे माझ्यासाठी ते हितकारक ठरले एवढं मात्र नक्की. या संदर्भातला एक प्रतिनिधिक अनुभव पुढे लिहिण्याच्या ओघात येईलच.

सुरुवातीच्या माझ्या अनुभवांबद्दल यापूर्वी सविस्तर लिहिल्याप्रमाणे माझ्या नकळत्या अजाण वयातच माझ्या बालमनात आजुबाजूचं वातावरण आणि घरातले संस्कार यामुळे माझ्याही नकळत ‘त्या’ची प्रतिष्ठापना झालेली होती! त्याची जाणिव अर्थातच पुढे आयुष्यातल्या कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांमध्ये हळूहळू दृढ होत गेली.

माझ्या मनातलं ‘त्या’चं हे आश्वासक अस्तित्व माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातला माझा श्वासच कधी आणि कसं बनलं ते मलाच समजलं नव्हतं! तोच श्वास पुढे माझी घुसमट व्हायची वेळ आलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात माझ्यासाठी संजीवक ठरत असायचा! !

‘श्रध्दा’ म्हणजे तरी वेगळं काय असतं? ‘तो’ आहे हा मनोमन असणारा ठाम विश्वास म्हणजेच तर श्रध्दा! ‘देव’ आहे की नाही हा संभ्रम माझ्या मनात निर्माण व्हायची वेळ जशी कधीच आली नाही तसेच ‘तो’ आहे हे इतरांना अट्टाहासाने पटवून द्यावे असंही मला कधी वाटलं नाही.

खरंतर देवाचं अस्तित्व मानणं किंवा न मानणं हा माझ्यापुरता मी ज्याचा त्याचा प्रश्नच मानला. म्हणूनच असेल कदाचित पण जवळचे अनेक मित्र आणि नातेवाईक नास्तिक असूनही आमचे परस्परसंबंध सलोख्याचेच राहिले. किंबहुना माझ्या मनातली श्रद्धा तिच्यावर अंधश्रद्धेची सावली पडू न देता अलवारपणे जपणं मला त्या सर्वांमुळेच सुलभ झालं असं मला मनापासून वाटतं.

माझ्या मनातल्या या श्रद्धेचं एरवीच्या दैनंदिन जीवनात मला कधीच प्रदर्शन करावं असं वाटलं नाही. कारण माझी श्रध्दा ही माझ्या हाडामांसासारखीच एक नैसर्गिक गोष्ट आहे असंच मला वाटायचं. त्यात आवर्जून मिरवावं असं वाटण्याचा प्रश्नच नव्हता.

मी जसा कधी कर्मकांडात रुतलो नाही तसंच माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं हेच माझे सतत प्राधान्यक्रम राहिले. त्यामुळे अट्टाहासाने अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आवर्जून करावं अशी ओढ मला असोशीने कधी वाटलीच नाही. त्यांचं वाचन झालं ते केवळ गरजेनुसार संदर्भ पहाण्यापुरतंच. तरीही लेखनाइतकीच मला वाचनाचीही आवड होती आणि त्या वाचनात नकळत आलेल्या विविधतेमुळे मी त्या त्या वेळी आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त झालो हे आवर्जून सांगायलाच हवं!

अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री जी. के. प्रधान यांचे पुस्तक मला प्रभावित करून गेले होते. श्री. हिराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्व मला समजून सांगितलेलं होतं. श्री. संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा तपासून पहायला मला प्रवृत्त केले आणि पुढेही माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कामही केले. श्री नरेंद्र दाभोळकरांच्या ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘भ्रम आणि निरास’, ‘उच्चाटन अंधश्रद्धेचे’ यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसट रेषा अधिक ठळक केली. हे सगळंच मला समृध्द करायला निमित्त ठरलेलं आहे!

श्रद्धेवर नकळत पडणारं अंधश्रद्धेचं सावट हळूहळू अधिक गडद होत जाण्याची प्रक्रिया सद्सदविवेकाच्या टोचणीनंतरही आपण सजगतेने थोपवू शकलो नाही तर मनातली श्रद्धा प्रदूषित व्हायला आपोआपच सुरुवात होते. हे अशिक्षितांच्या बाबतीतच नाही तर शिकलेल्या, सुजाण म्हणवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही नकळत कां होईना पण सर्रास घडत असते. यासंदर्भातला माझा एक अनुभव आवर्जून सांगायलाच हवा असं मला वाटतं. तो तसा अगदी साधाच अनुभव पण आपली त्याकडे पहाण्याची दृष्टी स्वच्छ असली तर साध्या साध्या गोष्टीही आपल्याला बरंच कांही शिकवून जातात याचा प्रत्यय देणारा!

माझं पोस्टिंग कोल्हापूर ब्रँचला होतं तेव्हाचा हा प्रसंग. साधारण १९७८-७९ दरम्यानचा. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आमचं बि-हाड होतं. रोजची देवपूजा म्हणजे फुले हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? हाच विचार तेव्हाच्या अननुभवी वयात माझ्या मनात खोलवर रुजलेला होता. आणि ती जागाच अशी होती की निदान एखाद्या कुंडीत फुलझाडाचं रोप लावावं एवढीही जागा घराभोवती कुठे नव्हतीच. त्यामुळे पूजेसाठी फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्यात मला कांही गैरही वाटलं नव्हतं. फुलवाला पहाटेच कधीतरी फुलपुडी आणून शटरमधून आत टाकून जायचा. त्यामुळे सकाळी उठल्यावर चूळ भरुन मी आधी फुलवाल्याने टाकलेली ती फुलपुडी आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ती फुलपुडी आत आणायला मी गेलो तर मला ती कुठे दिसेचना. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ती फुलपुडी बंद दाराच्या जवळच ठेवलेल्या छोट्या शूज स्टॅंडवरच्या माझ्या बुटाच्या खाचेत पडलीय. मी नाराज झालो. पण तरीही ती फुलपुडी उचलून आत आणली आणि त्या फुलांवर पाणी शिंपडून फुलं तबकात नेऊन ठेवली. आंघोळ आवरून पूजेला बसलो. देव पुसून ताम्हनात ठेवले. गंध लावलं. आणि नेहमीच्या सवयीनं देवाला वाहण्यासाठी तबकातली फुले हातात घेतली. आणि… क्षणभर थबकलो. ती फुलं देवाला वाहावीत असं वाटेचना. हातातली फुलं तशीच परत तबकात ठेवली. देवाला फक्त हळद-कुंकू वाहिलं आणि निरांजन लावून नैवेद्य दाखवला. कांहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होती पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली पुसट रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो म्हणतात. पण माझ्या बुद्धीनेच त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पहाणाऱ्या माझ्या मनाला सावरलं. योग्य आणि अयोग्य यांच्यातल्या फरकाची नेमकी जाणीव करून दिली. पूजेला फुलं न मिळाल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीनं अलगदपणे दूर केली. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं. केवळ उपचारापेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. मी अलगद डोळे मिटले. हात जोडले. आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,.. ‘देवा, आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारात एखाद्या लहानशा कुंडीत कां असेना पण चार-दोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहिन. “

पुढे जवळजवळ पंधरा- सोळा वर्षांनंतर १९९३ साली आम्ही सांगलीतल्या गावभागातल्या आमच्या स्वतःच्या फ्लॅटमधे रहायला गेलो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमधे निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तियुक्त अंत:करणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली, तेव्हा मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना माझ्या मनाला आत्यंतिक उल्हसित करुन गेली होती!

२००६ पासून आम्ही हरिपूर रोडवरील ‘त्रिदल’ या आमच्या नवीन वास्तूत रहायला आलो. आता सभोवतालच्या प्रशस्त बागेत विविध रंग, रूप, वासांच्या फुलांनी दोन-तीन मोठ्या परड्या तुडुंब भरतील एवढी फुले रोज मिळतात आणि तेवढीच झाडावेलींवर शिल्लकही असतात. त्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरांमधल्या आणि जवळच्या मंदिरामधील ‘त्या’च्यापर्यंत रोज पोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो! देणाराही तोच असतो आणि घेणाराही तोच! पण त्यात आपलं असं निमित्तमात्र असणंही किती सुखदायी असतं याच्या अनुभव मला रोज नव्याने येतो आहे! !

‘त्या’ला एकदा मनोमन मानल्यानंतर नकळत सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या प्रक्रियेतील या सगळ्या वाटा आणि वळणे! या प्रवासात या प्रत्येक टप्प्यावर ‘तो’ माझ्याबरोबर असायचाच. त्यामुळे अनेकांना पडतात तसे ‘तो कोठे आहे? ‘ ‘कसा आहे? ‘ हे प्रश्न मला कधीच पडायचे नाहीत. ‘तो’ आहे हेही माझ्यापुरतंच असायचं! इतरांनीही ते स्वीकारावं असं मला कधीच वाटलं नाही. मी माझ्याही नकळत जीवनाचं गणित सोडवण्यासाठी माझ्या नकळत्या वयापासून ‘त्या’चं असणं हे असं एक गृहीतच मानत आलो. आज हे गृहीत चुकलेलं नाहीय याची आजवरच्या अनुभवांती मला पूर्ण खात्री पटल्यानंतर आपल्या जीवनाचं गणित अचूक सुटणार याचा पूर्ण विश्वास मला वाटतो आहे!

‘तो’ माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्याच मनामनात अंश रुपाने असतोच. म्हणूनच ‘त्या’ला अंतर्यामी म्हणतात ना? ‘त्या’चं रंगरुप त्या प्रत्येकाच्या श्रध्दा आणि विचारांनुरुप वेगवेगळं असतं एवढंच. त्या वेगवेगळ्या रुपातला ‘तो’ प्रत्येक आस्तिकाच्याच नव्हे तर नास्तिकाच्या मनातही असतोच. त्यातील कुणाला त्याची जाणिव असो वा नसो. केवळ असा प्रत्येकाच्या अंतर्यामीच नव्हे तर चराचरातल्या प्रत्येक कणाकणात अंशरुपाने भरुनसुध्दा ‘तो’ वर अंगुलीभर उरतोच! !

‘त्या’च्याच साक्षीने मी माझ्या मनातल्या ‘त्या’चा आजवर घेतलेला हा मागोवा!

 या निमित्ताने माझ्या ओंजळीत साठलेली ही सगळी सुगंधी शब्दफुले मी आज अतिशय विनम्र आणि कृतज्ञभावाने ‘त्या’च्याच चरणी अर्पण केलीयत हीच भावना याक्षणी माझ्या मनात आहे!

 – पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ अमृता देशपांडे 

फिफा (FIFA) फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबाॅल असोसिएशन ही विश्वचषक सामने खेळवणारी संस्था आहे.

हे विश्वचषक सामने दर चार वर्षांनी खेळले जातात.

या वर्षी 11जून ते 19 जुलै 2026 या दिवसात खेळले जातील. हे सामने कॅनडा, मेक्सिको, आणि युनायटेड स्टेट्स् येथे खेळले जाणार आहेत. कॅनडामध्ये प्रथमच सामना होतो आहे. 1998 पासून 32 देशातले खेळाडू भाग घेत होते. 2026 ला 48 देश क्वालिफाय झाले आहेत. एकूण 104 सामने खेळले जातील.

काबो वेर्दे, कुरकाओ, जाॅर्डन आणि उझबेकिस्तान हे चार संघ प्रथमच भाग घेत आहेत. युकेचे इंग्लंड आणि स्काॅटलंड हे दोनच संघ सामील होतील.

48 संघ सोळा भागात विभागून सामने खेळले जातील. अंतिम निर्णायक सामना न्यू जर्सी (अमेरिका) येथे मेटलाईफ स्टेडियमवर 19 जुलैला खेळला जाईल. 2022 वर्षी अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यात अंतिम सामना खेळला गेला, तो अर्जेंटिनाने जिंकला होता.

पहिला विश्वचषक फुटबाॅल सामना 1930 साली उरुग्वे येथे खेळला गेला. तेव्हा 13 संघांनी भाग घेतला होता.

यानंतर पुढच्या चार वर्षांनी म्हणजे 2030 ला हे सामने मोरोक्को, पोर्तुगाल, आणि स्पेन येथे खेळले जातील. 2030 हे वर्ष या विश्वचषक सामन्यांचे 100 वे वर्ष असेल. विश्वचषक शतकपूर्तीचा मान म्हणून यातील एक सामना उरुग्वेच्या ईस्तादियो सेंटेनरी स्टेडियमवर खेळला जाईल.

विजेत्याला सन्मानाने, गौरवाने देण्यात येणारा कप हा सुवर्णचषक असतो. तो 3. 5 फूट उंच आणि त्याचे वजन 6. 2 किलो असते. त्याची किंमत 15 मिलियन पौंड म्हणजे भारतीय चलनात करायची तर असते दीडशे करोड रुपये.

पण विजेते ही ट्राॅफी घेऊन जात नाहीत, ती स्वित्झर्लंडच्या FIFA म्युझियम मध्ये ठेवली जाते. विजेत्या प्रत्येक खेळाडूला ब्राॅन्झची प्रतिकृती दिली जाते.

खेळाडूंची धावण्याची शारिरीक क्षमता, स्थिर आणि बळकट मन, समान गोल असताना पुढचा गोल करण्यासाठी लागणारी सांघिक एकात्म शक्ती, विरुद्ध संघातला खेळाडू बाॅल कुठल्या दिशेने कुठे पास करतो त्याप्रमाणे बाॅल गोलपोस्टकडे ठोकणे याला शारिरीक हालचाली आणि मेंदूची अतिशय तत्परतेची क्षमता लागते, तसेच गोलरक्षकाची येणा-या बाॅलचा अंदाज घेण्याची ताकद, मांजरासारखी धारदार नजर, चित्त्यासारखी झप् कन उडी घेण्याची चपळता

आणि सर्वात महत्वाचे, प्रत्येक सामना आणि विश्वचषक जिंकण्याची प्रचंड आणि जबरदस्त इच्छा हेच खेळाचे वैशिष्ट्य!

खेळाडूंच्या बरोबरीने पळणारा रेफरी हा तर प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा आणि खेळातला महत्वाचा दुवा.

खोडकर, रागीट, पळताना पायात पाय घालून पाडणा-या खेळाडूला एका शिट्टीवर बाहेरचा रस्ता दाखवणारा मास्तरच!

टीव्हीवर सामना बघताना सरासर धावणारे खेळाडू, रेफरी, गोलरक्षक, मध्येच धडाडकन् पडणारे धावक आणि एकत्र आवाजाने आणि टाळ्यांनी प्रोत्साहन देणारे प्रेक्षक हा सगळा नजारा बघायला आणि सामन्याचा थरार अनुभवायला तयार राहूया.

लिओनेल मेस्सी, पेले, रोनाल्डो, डायगो माराडोना यांची आठवण करत, चला तर, 11 जून पासून विश्वचषक फुटबाॅल सामन्यांचा आनंद घेऊया.

©  अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी नातेसंबंधांचा पाया हा केवळ करार, जबाबदाऱ्या किंवा एकत्र राहण्याच्या व्यवस्थेवर उभा नसतो; तर तो अनेकदा न दिसणाऱ्या पण सतत अनुभवता येणाऱ्या भावनिक प्रवाहांवर आधारलेला असतो. नात्यांमधील ऊब, जिव्हाळा आणि आपुलकी या गोष्टी प्रत्यक्षात भावनांच्या सातत्यपूर्ण देवाणघेवाणीमुळे निर्माण होतात. परंतु आधुनिक सामाजिक संरचनेत, विशेषतः बदलत्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेत, या भावनांची जागा हळूहळू व्यवहारिकता आणि व्यक्तिकेंद्रित जीवनशैली घेताना दिसते आहे. परिणामी, नाती ‘राहतात’ पण ‘जगली’ जात नाहीत. म्हणून आधुनिक समाजात नातेसंबंधांचा बाह्य आविष्कार जरी पूर्वीइतकाच टिकून असल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या अंतर्गत आशयात खूप मोठे बदल घडत आहेत. विवाह, कुटुंब आणि सामाजिक नाती या सर्वांचा पाया भावनांवर उभा असतो. ही एक मूलभूत सामाजिक गरज आहे. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत, वेगवान शहरीकरणात आणि भौतिक प्रगतीच्या अतिरेकात या भावना हळूहळू क्षीण होत चालल्याचे स्पष्टपणे दिसतेय. ‘कुपोषण’ ही संकल्पना आपण सहसा शरीराशी, अन्नाशी जोडतो; परंतु भावनांचेही कुपोषण होऊ शकते, ही जाणीव अद्याप सामाजात चर्चेत फारशी ठळकपणे आलेली नाही. जसे शरीराच्या पोषणासाठी योग्य अन्न, योग्य वेळ आणि संतुलीत आहार आवश्यक असतो, तसेच नात्यांना टिकवण्यासाठी भावनांचे पोषण होणे आवश्यक असते. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत या भावनिक पोषणाचा अभाव प्रकर्षाने जाणवायला लागलाय.

यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे चंगळवादाचा वाढता प्रभाव. आर्थिक प्रगती, उपभोगवादी संस्कृती आणि ‘सर्व काही पैशाने मिळू शकते’ हा दृष्टिकोन समाजात खोलवर रुजत चालला आहे. यामुळे आनंदाची व्याख्या बदलली आहे. पूर्वी नात्यातून मिळणारा आनंद, सान्निध्य, आपुलकी आणि परस्पर आधार यांना जे महत्त्व होते, त्यांची जागा आता वस्तू, सुविधा आणि वैयक्तिक यश यांनी घेतली आहे. परिणामी, माणूस नात्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी भौतिक साधनांमध्ये गुंतवणूक करू लागला आहे. ही गुंतवणूक तात्पुरता आनंद देऊ शकते, पण ती नात्यांमधील उब निर्माण करू शकत नाही. म्हणूनच नात्यांमध्ये ‘भावनिक कुपोषण’ निर्माण झाले तरी नात्याचे बाह्य स्वरूप वरवर टिकून राहिलेले दिसते. अंतर्गत ऊब आणि जिव्हाळा मात्र हरवलेला असतो. वाणी, कृती आणि स्पर्श या मानवी संवादाच्या मूलभूत माध्यमांमधून भावना व्यक्त होत असतात. माया, ममता, आस्था, सहसंवेदना, ओढ, क्षमा, संयम, आदर आणि कौतुक या केवळ शब्दरूप भावना नाहीत, तर ते नात्यांना पोसणारे घटक आहेत. परंतु आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. डिजिटल माध्यमांमधून होणारा संवाद हा माहितीपुरता मर्यादित असतो; त्यात भावनिक सूक्ष्मता कमी असते. ‘इमोजी’ आणि ‘मेसेज’ यांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना प्रत्यक्ष स्पर्श, आवाजातील ऊब किंवा नजरेतील आपुलकी यांची जागा घेऊ शकत नाहीत. परिणामी, नात्यांमध्ये भावनिक अंतर वाढते. हे अंतर हळूहळू तुटकपणात परिवर्तित होत जाते. अशाप्रकारे डिजिटल युगातील संवादाच्या बदलत्या स्वरूपानेही या प्रक्रियेला वेग दिला आहे. सोशल मीडियावरचे आभासी संबंध, तत्काळ प्रतिसादाची सवय आणि सततच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष संवादाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. ‘कनेक्टेड’ असण्याचा भास असला, तरी ‘कनेक्शन’ची खोली कमी होत आहे. भावनांची अभिव्यक्ती शब्दांपलीकडे असते… ती आवाजाच्या टोनमध्ये, नजरेत, स्पर्शात आणि उपस्थितीत दिसते. परंतु जेव्हा संवाद प्रामुख्याने डिजिटल माध्यमातून होतो, तेव्हा या सूक्ष्म अभिव्यक्ती हरवतात. परिणामी, नात्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते, जी अनेकदा व्यक्तींना स्वतःलाही स्पष्टपणे जाणवत नाही, पण ती त्यांच्या वर्तनात आणि भावनिक स्थितीत प्रतिबिंबित होते.

विवाहसंस्था ही दोन स्वतंत्र व्यक्तींच्या भावनिक आणि सामाजिक करारावर आधारलेली असते. या कराराचा गाभा ‘भावबंध’ हा असतो. दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला धक्का न लावता, परस्पर समजूत, सहानुभूती आणि जिव्हाळा यावर नातं उभं राहतं. परंतु जेव्हा या भावनांमध्ये अभाव निर्माण होतो, तेव्हा नातं केवळ औपचारिक उरतं. ‘बंध’ टिकवण्यासाठी ‘भाव’ आवश्यक असतात; अन्यथा ते नातं केवळ सामाजिक बंधन बनून राहते. अशा परिस्थितीत संघर्ष, गैरसमज आणि तणाव वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण भावनिक आधार नसताना कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही. कौटुंबिक नात्यांमध्येही हाच बदल दिसून येतो आहे. एकत्र कुटुंबपद्धतीपासून लहान कुटुंबपद्धतीकडे झालेल्या संक्रमणामुळे व्यक्तींचे स्वातंत्र्य वाढले असले, तरी त्याचबरोबर भावनिक आधार कमी झाला आहे. पूर्वी कुटुंबातील विविध सदस्यांमधील संवाद, सण-उत्सव, एकत्रित वेळ घालवणे यामधून भावनिक बंध दृढ होत होते. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जगात व्यस्त आहे. कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि वैयक्तिक प्राधान्ये यामुळे नात्यांना वेळ देणे दुय्यम ठरते आहे. परिणामी, नात्यांमध्ये औपचारिकता वाढतेय आणि जिव्हाळा कमी होतोय. या बदलांचा समाजातही व्यापक परिणाम दिसून येतोय. जेव्हा व्यक्तीला जवळच्या नात्यांमध्येच भावनिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम समाजातील एकात्मतेवर होतो. सहसंवेदना, परस्पर मदत, सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा ऱ्हास होतो. माणूस अधिक आत्मकेंद्रित बनतो. ही प्रवृत्ती समाजात तणाव, असुरक्षितता आणि एकटेपणा वाढवते. म्हणूनच भावनिक कुपोषण हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रश्न नसून तो एक व्यापक सामाजिक प्रश्न आहे. कारण कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे, आणि कुटुंबातील नात्यांची गुणवत्ता समाजाच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. जेव्हा कुटुंबातील सदस्य भावनिकदृष्ट्या तुटक होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक वर्तनावर, कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधांवर आणि व्यापक सामाजिक संवादावर होतो. सहसंवेदनेचा अभाव, असहिष्णुता, आणि वाढती एकाकीपणाची भावना हे सर्व या भावनिक कुपोषणाचेच परिणाम आहेत.

या पार्श्वभूमीवर, भावनांचे ‘अन्नग्रहण’ कसे करावे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. जसे शरीराला संतुलित आहाराची गरज असते, तसेच नात्यांना नियमित आणि जाणीवपूर्वक भावनिक गुंतवणुकीची गरज असते. संवादासाठी वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, कौतुक करणे, चुका स्वीकारून क्षमा मागणे आणि देणे, स्पर्शातून आपुलकी व्यक्त करणे, या सर्व गोष्टी भावनिक पोषणाचा भाग आहेत. या कृती कृत्रिम किंवा औपचारिक नसून नैसर्गिक आणि मनापासून असल्या पाहिजेत. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण नात्यांची खरी ताकद ही त्यांच्या भावनिक गाभ्यात असते. बाह्य यश, संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी नात्यांना टिकवू शकत नाहीत. त्या केवळ पूरक असू शकतात. नात्यांचा पाया मजबूत ठेवायचा असेल, तर त्यात भावनांचे पोषण आवश्यक आहे. ‘भाव’ आणि ‘बंध’ यांचा परस्परसंबंध लक्षात घेतला, तरच बदलत्या काळातही नात्यांची उब टिकवता येईल. अन्यथा, नाती केवळ अस्तित्वात राहतील, पण त्यात जिवंतपणा नसेल, आणि हेच भावनिक कुपोषणाचे सर्वात मोठे लक्षण ठरेल. त्यामुळे भावनांचे पोषण ही केवळ वैयक्तिक गरज नसून, सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठीची एक अत्यावश्यक अट आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी

‘परकायाप्रवेश’ हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरात अजिबात नाही. पुराणकथात, गोष्टीत कधीतरी ऐकलेला, वाचलेला. अलीकडेच नीना कुलकर्णी यांचे ‘अंतरंग’ वाचत होते. ‘अंतरंग’ हा लोकसत्तेतील अंतरंग या सदरात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यामध्ये एका लेखात नाटकातील काम हा परकाया प्रवेश असतो असे वाचले. आणि माझे मनात विचारांचे काहूर उठले.

स्वतःचा देह बाजूला ठेवून आत्मरूपाने दुसऱ्याच्या देहात केलेला प्रवेश म्हणजे परकाया प्रवेश. हा काही काळापुरता असतो. पण प्रवेश केलेल्या व्यक्ती सारखे वागणे, बोलणे साधावे लागते. परकायाप्रवेश ही एक सिद्धि आहे. खरंच नट तरी वेगळे काय करतो? जी भूमिका त्याला वटवायची असते तिला योग्य कपडे तो धारण करतो. त्याला योग्य चेहरा रंगवून घेतो. त्या भूमिकेचे वागणे, बोलणे, हालचाली आत्मसात करतो. तिचे जीवनच तो आपल्या पुढे उभे करतो. त्या पात्राच्या भावना हालचालीतून, चेहऱ्यावरील भावातून व्यक्त करण्यासाठी तो नट आपला मूळचा व्यवसाय, गुण, रूप, घरदार, वागणूक काही काळा पुरते का होईना विसरतो. असे त्या नाटकातील भूमिकेशी एकरूप होणे म्हणजेच पर काया प्रवेशच नाही का? काही काळापुरता, नाटकाच्या तीन तासा पुरता. असे साधले तरच लोक भूमिका चांगली वठली म्हणून कौतुक करतात. येथे तरुणाचा म्हाताऱ्यात, राजाचा भिकाऱ्यात किंवा तरुणाचा तरुणीत परकायाप्रवेश होत असतो.

सिनेमा, सिरीयल ची गोष्ट थोडी वेगळी असते. तिथे अभिनय साधला नाही तरी रीटेक असतो व समोर प्रेक्षक नसतात. पण नाटक म्हणजे प्रेक्षकांसमोर केलेला जिवंत पर कायाप्रवेश.

आणखी विचार करता, असे लक्षात आलं एखाद्या व्यक्तीविषयी लिहिताना त्या व्यक्तीशी एकरूप व्हावं लागतं. स्वतःला बाजूला ठेवून, त्या व्यक्तीचे विचार, बोली, मते यांचा विचार करावा लागतो. त्या भूमिकेत शिरलं तरच ते शब्दचित्र रंगवता येत. हीच गोष्ट काव्य निर्मितीचे बाबतीत असते. कवी जेव्हा आपल्या सर्व कथा- व्यथा बाजूला ठेवतो, तेव्हाच रसदार, सत्य, काव्य निर्माण होतं. असा हा परकाया प्रवेशाचा अर्थ मी लावला. तो सोपा नसतो. कवी, लेखकांना तो साधतो. दुसऱ्याच्या अंतरंगात त्यासाठी प्रवेश करावा लागतो. मग पक्षी, वारा, झाडे यांच्या मनातले कळते.

एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या शरीराच्या प्रवेश ही सिध्दी श्री शंकराचार्य याना साध्य होती. म्हणूनच मंडण मिश्र यांच्या पत्नीने शंकराचार्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी परकाया प्रवेश केला होता. अशा आणखीही गोष्टी सांगतात.

आपण एवढे समजू शकतो की वर्णन करावयाच्या वस्तूचे, व्यक्तीचे गुणदोष, सुख, दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. स्वतःला काही काळ विसरावे लागते. हाच परकायाप्रवेश. लेखकांच्या कवींच्या मध्ये सहजच हा गुण असतो. म्हणून त्यांचे लिखाण, हावभाव हृदयाला भिडतात, मनाला भावतात.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काही वेळा काही शब्द फार जपून वापरावे लागतात. आपल्या मनातला अर्थ आणि समोरच्याने त्याचा घेतलेला अर्थ यात गफलत झाली की संपलच. शहाणा, वेडा हे असे काही शब्द आहेत की ते कोणत्या परिस्थितीत वापरले जातात त्यावर त्याचा अर्थ लक्षात येतोच. यात कधी चांगला अर्थ असतो, तर कधी तो टोमणा असतो. तसाच अर्थ करंट अफेअर या एकत्र केलेल्या शब्दात जाणवला.

आपण नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो त्यावर अर्थ अवलंबून असतो. पण दोन वेगळ्या व्यक्ती वेगळा विचार करत असतील तर वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या अर्थात गोंधळ होतो. असच काहीसं मी आणि माझा मित्र यात झालं.

अफेअर आणि करंट अफेअर. असलेेली लफडी आणि सध्या चालू असलेल्या घडामोडी यात गोंधळ झाला. अफेअर खाजगी आयुष्याच्या संबंधी असतं, तर करंट अफेअर याचा संबंध देशात, जगात घडणाऱ्या, सुरु असलेल्या घडामोडी याच्याशी असतो. जे उघड असतं.

आम्ही भेटलो तेव्हा मी सध्या सुरु असलेल्या युध्दाच्या बातम्या पाहिल्या होत्या. तर त्याच त्याच बातम्या पाहून कंटाळा आल्याने तो चंदेरी दुनियाचा कोणता तरी कार्यक्रम. त्यात त्यांनी घातलेले कपडे आणि इतर बरंच काही जे पहायचं असतं, पण त्यावर (आपण) सहसा बोलायचं नसतं (कारण संस्कृती) अस पाहून आला होता.

माझ्या मनात युध्दाचे, तर त्याच्या मनात पाहिलेल्या कार्यक्रमाचे विचार. बाॅॅम्ब कसे पडले याचा विचार मी करत होतो, बातम्यांंमधे दाखवलेल्या त्या धुराळ्यातून मी बाहेर पडलो नव्हतो. तर पाहिलेल्या त्या कार्यक्रमामुळे वेगळ्याच बाॅम्ब वर्षावातून आणि मनात तयार झालेल्या धुराळ्यातून बाहेर पडायच्या मनस्थितीत तो नव्हता. मी अग्निबाणाच्या विचारात, तर तो नयन बाण, आणि मदन बाणांच्या. आणि याच परस्पर विरोधी विचारात या शब्दांनी गोंधळ घातला.

करंट अफेयर काय? अस मी त्याला सहज विचारलं. मग जे विषय निघतील त्यावर तरी गप्पा होतील अस वाटलं.

पण त्यावर तो जे काही बोलला त्यावर मलाच करंट बसला.

कोणाचं करंट अफेयर, काय करायचय आपल्याला, यात खरं खोटं आपल्याला कुठे नक्की माहिती असते. पुुर्वी फक्त सिनेमा, किंवा नाटक यातच हा शब्द ऐकायला मिळत होता. आता सगळ्याच क्षेत्रात अफेअर सुरु असल्याचं बोललं जात. आणि ज्याला आपण करंट म्हणतो ते करंट नसतच. जुनं झाल्यावर आपल्यापर्यंत येतं. आणि त्यावर चर्चा करेपर्यंत एक वेगळं, नवीन (करंट) अफेअर कानावर येतं.

काय त्यांचे कपडे, ते चालणं, तो डान्स. हो तो डान्स असच म्हणाला. नाच म्हणाला असता तर त्या डान्सला कदाचित आदर दिल्यासारख वाटल असत.

आता आम्ही दोघ अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा मारत बसलोय. माझ्या मनातल्या बाणांनी बरंच काही उध्वस्त झालं होतं. तर त्याच्या मनातल्या बाणांनी काही घायाळ झाले असतील. पण बोलतांना आम्ही आमचा बाणा सोडला नाही. माझ्या मनात युध्दामुळे निर्माण होणारी सद्यस्थिती, आणि कलह. तर त्याच्या मनात सद्यस्थितीमुळे निर्माण होणारी काही गृहयुध्द व कलह. युध्दातल्या अग्निबाणांनी काही उंच इमारती जमीन दोस्त झाल्या असतील अस माझं म्हंणण. तर कार्यक्रमातल्या काही गोष्टींमुळे संंस्कृृती जमीन दोस्त व्हायला वेळ लागणार नाही अस त्याच.

युध्दामुळे काही गोष्टींवर नव्याने प्रकाश पडत होता. जे करंट अफेअर मधे होतं. तर त्या झगझगीत प्रकाशा मागच काही प्रमाणात लपवलेलं सत्य त्याच्या (करंट) अफेअर मधून तो सांगायचा प्रयत्न करत होता. माझ्या बोलण्यात युध्दातले स्फोट होते, तर त्याच्या बोलण्यात घटस्फोट. मी आर्थिक हानी बद्दल सांगत होतो. आणि तो सांस्कृतिक हानी बद्दल. अस अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा सुरु होत्या.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares