मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परदेशात मोठमोठ्या चित्रांचे लिलाव होतात आणि त्याला करोडो रुपये मिळतात. मला फार आश्चर्य वाटायचे, काय असतं एवढं या चित्रात? का त्याला एवढी किंमत मिळते? कशी ठरते ही किंमत.

कुतुहल म्हणून मी काही चित्रे त्या दृष्टीने पाहिली आणि नंतर त्याची कथाही वाचली तर समजले की वरवर दिसते तसे ते चित्र नसतेच मुळी. त्यामधे खूप गूढार्थ सामावला आहे. ही चित्रे मॉडर्न आर्ट म्हणून विक्रीस ठेवलेली होती. 

अचानक पुरुषोत्तम सदाफुले सरांच उजेडाचे मळे पुस्तक हाती पडले आणि त्या मुखपृष्ठाकडे पहातच राहिले. खरोखर मॉडर्न आर्ट असलेले चित्र वाटले.

सहज बघितले तर असंख्य उडणारे पक्षी••• थोडं नीट पाहिलं तरं माणसाच्या डोक्यातून आलेले विचार पक्षी••• 

परंतु जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि त्यातील गहनता जाणवत गेली•••

मध्यभागी असणारी माणसाची आकृती ही फक्त माणसाची नसून कारखान्यात जाम करणार्‍या एका कामगाराची आहे. कामगारांच्या समस्या कारखान्यातील प्रश्नांमुळे निर्माण झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी कामगाराचे हृदय कारखान्याच्या आकाराचे जणू काळीज चिरले जात आहे हे दर्शवते. त्या समस्यांचे विचार पक्षी रुपाने उडू पहात आहेत.

कामगाराचे मन जरी हिरवे असले तरी आजूबाजूचा परिसर प्रदुषणामुळे पिवळा पडत चालला आहे आणि याच प्रदुषणात जगणे अवघड होऊन हे पक्षी हा परिसर सोडून उडून जात आहे आणि बिचारा कामगार जरी अवघड झाले तरी असहाय्य होऊन या प्रदुषणात, कारखान्यात होरपळत आहे.

कामगारांचे प्रश्न कोण सोडवेल? मी सोडवू शकेन का? कसे सोडवता येतील हे प्रश्न या कामगार विषयीच्या प्रश्नांची पाखरे डोक्यात घिरट्या घालत आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारणा सगळ्यांनी विशेषतः कामगारांनी तरी विसरली नाहीच पाहिजे म्हणून हा क्रांतीसूर्य सतत कामगाराच्या विचारात तळपत आहे. कामगारांबद्दलचे विचार त्याला मूर्त रूप येत नसल्याने हा अर्धाच सूर्य तळपत आहे हे सांगणंयासाठी लाल रंगाचा सूर्य आणि त्याची पांढरी आभा दाखवली आहे. 

कारखान्याच्या भोवती वाढणारा कचरा, त्यातून निघालेले धुरांचे पक्षी,बाहेर पडणारी रसायने यातून कामगारांचे जीवन धोक्यात येऊन कामगार हिरवा- निळा पडत आहे. 

अगदी लहान मुलाच्या नजरेतून बघितले तर ती लहानमुलाची आकृती आत लाल मधे पांढरे आणि खाली हिरवे असलेले कलिंगड खाण्याचा विचार करत आहे. पण हे कलिंगडही म्हणावे तितके शुद्ध राहिले नाही हे दुर्दैव.(माहित आहे की कलिंगड आणि लेखन यांचा दुरान्वयेही काही संबंध नाही पण लहानमुल सहज असे म्हणेल म्हणून तोही अर्थ निघू शकतो असे सुचवायचे आहे)

असे अनेक सांकेतिक विचार प्रश्न घेऊन येणारे हे चित्र आणि त्याला तितक्याच सच्चतेने उत्तर देणारे सच्चेपणा आणि निरागसता यांचे प्रतिक असलेले निळंया रंगातील आकाशाचेही निळेपण घेऊन येणारे वाचकांच्या मनात फुलवणारे उजेडाचे मळे.

खरेच असे मॉडर्न आर्टने खुलणारे  सरदार जाधव यांचे हे वेगळेच चित्र मुखपृष्ठ म्हणून निवडणार्‍या प्रतिमा पब्लीकेशनच्या डॉ.दीपक चांदणे ,अस्मिता चांदणे आणि लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तक: निसर्गाची निळाई

कवी: अजित महाडकर 

प्रकाशक: शॉपीजन

पृष्ठे ७५, किंमत  २५०/—

कवी अजित महाडकर यांचा निसर्गाची निळाई हा काव्यसंग्रह अलीकडेच शॉपिजन प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ५१  कविता आहेत. या सर्वच कविता निसर्ग आणि नैसर्गिक भावभावनांशी निगडित आहेत. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे की यात वृत्तबद्ध, कृष्णाक्षरी, संगीताक्षरी, अष्टाक्षरी, शिरोमणी, जपानी हायकू, तांका असे विविध काव्यप्रकार लीलया हाताळले आहेत.  त्यामुळे हा काव्यसंग्रह वाचताना एकात अनेक असा सुखद अनुभव येतो.

अजित महाडकर हे एक सिद्धहस्त  प्रतिभावंत कवी आहेत.  त्यांच्या कविता वाचताना विशेष करून जाणवते ती त्यांची अतिशय सरल अशी काव्य भाषा.  एक एक फुल धाग्यात सहजपणे ओवावे इतकी साधी त्यांच्या काव्याची गुंफण असते. काव्याचे शास्त्र आणि नियम सांभाळूनही भाषेच्या काठीण्यापासून, क्लीष्टते पासून  त्यांची कविता दूर असते आणि म्हणूनच ती वाचकाला कवींच्या विचारांपाशी सहजपणे घेऊन जाते.

कवी महाडकरांच्या सर्वच कवितांचा हा स्थायीभाव असल्यामुळे त्यांच्या कविता मनात घर कराव्यात इतक्या बोलक्या आहेत आणि आपल्या वाटणाऱ्या आहेत.

या कवितासंग्रहातील भक्तीरसातील आरत्या व अभंग वाचताना जाणवते की कवीची वृत्ती धार्मिक, परोपकारी आणि श्रद्धाळू असली तरी कुठेही अंधश्रद्धेचा भाव त्यात नाही.

भगवंत या अभंगात ते लिहितात

भेटा भगवंत ।मानवी रूपात ।

नका देवळात। जाऊ रोज ।।

भगवंत हा मनुष्य रूपातच आपल्या सभोवती असतो. आई-वडिलांच्या रूपात, रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या वैद्याच्या रूपात, असंख्य दात्यांच्या दातृत्वाच्या रूपात तो भेटत असतो.

मर्म संसाराचे या कवितेत ते लिहितात

करिता काम धाम 

जपावे रामनाम

मनोमनी

या संगीताक्षरी  काव्यरचनेत गृहस्थधर्म आणि भक्तीमार्ग यांची अगदी सोप्पी सांगड त्यांनी घातलेली आहे.

निसर्गाची अत्यंत ओढ असलेल्या या कवीच्या लेखणीतून शब्द उतरतात ,

देणे निसर्गाचे जपून ठेवावे 

*त्याला का उगा नष्ट करावे ।*।

किंवा ,

झरा निर्मळ असेल का तिथे?

खरा आनंद डुंबण्याचा घेऊया 

या कृष्णाक्षरी काव्यातून सुंदर जीवन कसे जगावे, निसर्ग कसा जपावा याचे प्रबोधनच जणू होते.

लेखणी, कविता, प्रतिभा याच कवीच्या खऱ्या सख्या आहेत.

हाती येईल त्या लेखणीने 

काढते नक्षी कागदावर 

स्वतःच हसते पाहून नक्षी 

आनंद होतो अनावर …

कवीचे हे मनस्वी आणि हृदयस्थ बोल किती मधुर आहेत! जीवन म्हटले म्हणजे सुख दुःख, निराशा, प्रेम आणि वियोगाचाही अनुभव येतोच. अशा या भावभावनांचे प्रतिबिंबही महाडकरांच्या कवितेमध्ये उमटलेले आहे.

कातरवेळ या कवितेत ते लिहितात

सागरकिनारी कातर वेळी 

असता प्रिया जवळी 

संसाराची सुख स्वप्ने 

पाहतो आम्ही आगळी …

निसर्गाच्या सहवासात माणसांची छोटी छोटी स्वप्ने कशी खुलत जातात हेच या ओळीतून व्यक्त होते.

मन संवेदनशील असले की एखाद्या साध्या दृश्यानेही ते उमलते त्याचीच प्रचिती देणाऱ्या या ओळी,

 डेरेदार झाड बागेतले 

रंगीत फुलांनी बहरले 

पाहुनी तो रम्य नजारा 

*मन माझे आनंदाने फुलले.*.

वाह क्या बात है!  निसर्गातच आनंद भरलेला आहे हो! फक्त तुमची पंचेद्रिये जागी असली पाहिजेत. मग जीवन हे सुंदरच होते. किती सुरेख संदेश कवीने या साध्या ओळींतून दिला आहे!

या संपूर्ण काव्यसंग्रहात कवीने ईश्वर, बारा ज्योतिर्लिंगासारखी स्थळे, कृष्ण, अर्जुन, झाडे—पाने, पक्षी, प्रिय सखी, गुरु, घर, कन्या, अगदी घरात वावरणारा मोती कुत्रा यावर इतकी सुरेख काव्य टिपणे केली आहेत  की वाचक त्यात सहजपणे रमून जातो.

दुसऱ्यांना सुखी ठेवण्याची 

कला आहे ज्यांच्यात 

एक आशेचा किरण 

दिसतो मला त्यांच्यात ..

किंवा ,

संस्कार या कवितेत ते लिहितात

डोक्यावरी पिडीतांच्या 

हात फिरवी मायेचा 

दिसे मला त्यांच्यामध्ये

 एक किरण आशेचा…

मनात सहज येते, सभोवताली माजलेल्या स्वार्थी, मतलबी, अनाचारी जगातही सुखाचा किरण शोधणाऱ्या या कवीची सकारात्मकता किती योग्य आहे, महान आहे!

 चंद्र प्रकाश 

तुझा चेहऱ्यावर

 दिसे सुंदर ..

असे हायकू आणि 

 

ऋतू बदल 

निसर्गात घडतो 

तरी फुलतो 

संघर्ष करूनिया

 नव्याने बहरतो ..

अशा तांका काव्यातून झिरपणारे हे काव्यबिंदू मनाला खूप सुखवतात.

निसर्गाची  निळाई ही शीर्षक कविता सृष्टीच्या निळाईचा सुंदर अविष्कारच घडवते.

स्वच्छ निर्मळ चमके

निळे पाणी सागराचे

घेई  उंच उंच लाटा

फेडी पारणे नेत्रांचे ..

किती सुरेख आहे ही स्वभावोक्ती!

खरं म्हणजे यातली प्रत्येक कविता वाचकाला विविध भावभावनांचा अनुभव तर देतेच पण जीवनातले मधुकण टिपण्यासाठी एक चोचही देते .

सुरेख आणि सहज साधलेली यमके, ठिकठिकाणी विखुरलेली स्वभावोक्ती, चेतनागुणोक्ती, उपमा, उत्प्रेक्षांसह उलगडत चाललेला हा काव्यप्रवास अपार सुखद, समाधानाचा आहे.

या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लेखिका व कवयित्री सौ. संपदा देशपांडे लिहितात,

शब्द बनती कविता 

तोच असे सिद्ध कवी..

त्यांचं लिहिणं किती सार्थ आहे हे या कविता वाचल्यावर  लक्षात येते.

अजित महाडकर यांच्या या चौथ्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देताना कवयित्री सानिका पत्की यांनीही महाडकरांच्या कविता म्हणजे सहज, सुंदर, साधे, सोपे व भावनेच्या जाणिवांना स्पर्श करणारर्‍या असे भाष्य महाडकरांच्या काव्यरचनांबद्दल केले आहे.

काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि सुंदर आहे.

संपूर्ण निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला अथांग निळा सागर, क्षितिजाच्या रेषेवर टेकलेलं निळं आभाळ आणि मुक्त विहरणारे निळसर जलद. केवळ अप्रतिम!

कवी श्री. महाडकर त्यांच्या मनोगतात नम्रपणे लिहितात, “या कविता तुम्हाला आवडतील अशी आशा आहे”

सर! या कविता आमच्या अंतरीच्या कप्प्यात बंदिस्तच होतील एवढेच मी म्हणेन.

कवी अजित महाडकरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या  पुढील  साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय : राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘चांदणे शब्दफुलांचे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘चांदणे शब्दफुलांचे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – चांदणे शब्दफुलांचे

लेखक- श्री विश्वास देशपांडे

प्रकाशक-सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे  

पृष्ठसंख्या- १६८ पाने

मूल्य-२०० रुपये

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव 

कोजागिरीच्या मनोरम चांदण्या रात्री अर्थात २८ ऑक्टोबर २०२३ ला चाळीसगावचे जेष्ठ आणि प्रथितयश साहित्यिक श्री विश्वास देशपांडे यांचे ‘चांदणे शब्दफुलांचे’ हे नवे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक वाचल्यावर लक्षात आले की यातील काही लेख समाजमाध्यमांवर आलेले होते. मात्र एक सलग पुस्तक वाचतांना तेच लेख नवे रूप लेऊन आल्याचे जाणवले. जणू चांदण्या रात्रीच्या गोड स्वप्नाची अनुपम अशी अनुभूती जागृतावस्थेत परत अनुभवली. पुस्तकाचे शीर्षक उत्कंठावर्धक आणि देखणे आहेच आणि त्याला साजेशी गर्द निळाईच्या पार्श्वभूमीवर फुललेली कुमुदिनी मुखपृष्ठावर अतिशय आकर्षक दिसते. विश्वास सरांच्या ललित लेखांचा सुरेख कोलाज या आधीच्या पुस्तकांत अनुभवलेला आहे. मात्र या पुस्तकात कोलाज आहे तो विभिन्न व्यक्तिरेखांचा! याला कोलाज म्हणणेच योग्य, कारण प्रत्येक व्यक्तिरेखेची रूपरेषा, मांडणी आणि सजावट वेगवेगळी आहे! मग या सर्वांना जोडणारा एक धागा कोणता तर यातील सर्व मानवी व्यक्तिचित्रे काही सांगतात, बोलतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. कांहींचे व्यवसाय उच्चभ्रू तर कांही रोजच्या जीवनातले आपले भागीदार, कांही प्रसिद्धीच्या उंचच उंच शिखरावर विराजित तर कांहींच्या रोजच्या जीवनात अन्न, वस्त्र अन निवारा शोधण्याची धडपड सुरु! असे या पुस्तकातील विविधरंगी अन विविधगंधी व्यक्तिरेषांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले कोलाज वेगळेच सौंदर्य दर्शवते.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

शीर्षकाच्या नावाच्याच ‘चांदणे शब्दफुलांचे’ या पहिल्या लेखातच वाचकांचे मन एका सुवर्णयुगात पोचते. बालगंधर्व आणि पु ल यांच्यावरचा हा लेख म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर ज्यांच्या गौरवान्वित अन वलयांकित प्रतिमा कायम कोरल्या गेल्या आहेत, त्या दैदिप्यमान सूर्य चंद्र यांची जणू ‘ज्योतीने तेजाची केलेली आरती’! नारायणराव आणि पुरुषोत्तम या दोन नावातील साम्य साधत लिहिलेला हा अप्रतिम लेख म्हणजे गरम जलेबी अन थंडगार रबडीचे पौष्टिक अन रुचकर कॉम्बो! आता रंगमंचाचा पडदा उघडल्यावर जसे एकाहून एक सरस नटसम्राट रंगमंचावर अवतरतात, तद्वतच हे लेख कागदावर अवतरल्यावर जणू त्या रंगमंचाच्या लखलखीत प्रकाशाला चार चांद लागत आहेत असे वाटते. लावण्याचा गाभा असलेले देखणे महान संतूरवादक दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावरील लेख विश्वास सरांच्या संगीताविषयी असलेल्या गहन जाणीवा आणि ज्ञानाची साक्ष देतात. तसेच ते दिवंगत झाल्यावर हा लेख लिहिलेला असल्याने पुरुषी सौंदर्याची मूर्तिमंत प्रतिभा अन प्रतिमा आणि संतूरला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणाऱ्या या दिग्गज वादकाचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! याच संगीतदालनात ज्यांच्या स्वरात आणि संगीतात ईश्वरी साक्षात्कार होतो, असे संगीतकार गायक हेमंतकुमार यांच्यावरील लेख खूपच वाचनीय असा आहे.

हा झाला एक रंग! मात्र सरांचा आवडीचा अन अभ्यासपूर्ण वाचन, लेखन, भाषण आणि चिंतनातून साकार झालेला भक्तिरंग त्यांना अन त्यांच्यासंगे आपल्यालाही सावळ्या रंगाची बाधा प्रदान करतो. विठू माउली, भगवान परशुराम, ज्ञानेश्वर माउली, गोंदवलेकर महाराज, गणेश उत्सव इत्यादी विविध लेखांतून झिरपत गेलेली दिव्य प्रकाशशलाका थेट आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात चैतन्याचे तेजस्वी दीप उजळून टाकते. यासोबतच भेट झालेली नसतांना देखील भेटीची आस धरून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली समर्पित करीत लिहिलेला लेख असाच हृदयंगम आहे. बाबासाहेबांचे विस्तीर्ण जीवन पटल आपल्यासमोर उलगडण्यात लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप दिसून येतो. विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वे वेचताना लेखकाच्या सामाजिक जाणीवा अत्यंत प्रखर आणि दूरदर्शी आहेत हेच दिसून येते. वनस्पती शास्त्रज्ञ ल्युथर बरबँक, पोलिओची लस शोधून मानवाला निरामय अक्षत जीवन प्रदान करणारा डॉक्टर जोनास साक, कीटकनाशकांचे दुष्परिणाम शोधत नामधारी अन माजलेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांशी दोन हात करणारा डॉक्टर टायरॉन हेज, सिंगापूरला नाव, रूप अन वैभव प्रदान करणारा ली क्कान यु, क्रांतिसूर्य हेमंत सोमण, सेरेब्रल पाल्सीग्रस्त, पण जिच्या आकांक्षांचा वेलू गगनाला भिडला आहे अशी स्फूर्तीदायिनी आणि चैतन्यमयी वल्लरी करमरकर आणि इतरही व्यक्ती या ललित लेखांच्या मांदियाळीत आपल्याला भेटतील.

सामाजिक व्यक्तिरेखांसह या पुस्तकात सुखनैव नांदणाऱ्या विश्वास सरांच्या नात्यातील अन आसपास वावरणाऱ्या व्यक्तींना देखील आपण जणू प्रत्यक्ष भेटतोय असा भास होतो. शीर्षस्थानी अर्थातच लेखकाच्या तीर्थरूप ‘आई’ आहेत. आई अन मुलाचे भावनिक प्रेममय नाते उलगडणारा हा लेख देवघरातील शांतपणे तेवणाऱ्या पावन नंदादीपाची स्मृती जागवून भावविभोर करून जातो. या पुस्तकात लेखकाने चित्रविचित्र व्यवसायातील मंडळी एकाच पंगतीत आरामात ऐसपैस बसवली आहेत. मिस्त्री, गवंडी, नाभिक अन कल्हईवाला यांच्या सोबत ज्ञानवंत गुरुमूर्ती सर, उच्च विद्याविभूषित डॉक्टर गोपाळ देशपांडे अन त्यांच्या स्वयंप्रकाशित सौ. विभा हे देखील या पंगतीत आहेत. लेखांची नावे अनवट आणि उत्सुकता ताणणारी पण मॅटरमध्ये अन मीटर मध्ये चपखल बसणारी (दोन उदाहरणे देते-वल्लरीवरच्या लेखाचे नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ तर नाभिकांवरील लेखाचे शीर्षक-‘सर जो तेरा चकराये’). लेखकाचे गीत-संगीताचे उपजत अन अद्ययावत ज्ञान असे संपूर्ण पुस्तकातून प्रतिबिंबित होत राहते.  

मंडळी, या पुस्तकाच्या व्यक्तिविशेषांकात एकंदरीत ३६ लेख आहेत. अशा रचनेची एक खासियत असते. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो, आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र मॅटर बघावे तर पूर्णत्वास पोचलेले!

विश्वास सरांच्या लेखनशैलीविषयी त्यांच्या आधीच्या सात पुस्तकातून ओळख झाली, ती या पुस्तकांतून वर्धिष्णू झाली. साधी सोपी सरळ भाषा! गुंत्यात गुंता नाही, मात्र अनुभव ‘गुंतता हृदय हे’ असाच! भ्रमर एकदा का मधुर मधुकणांची आस बाळगून कमलदलात गुंतला की बाहेर येण्याचं विसरून जातो, तद्वतच हे पुस्तक वाचायला सुरुवात केलीत की शेवटचे पान येईस्तोवर आपण थांबत नाही. (आले तरी दोन पर्याय आहेत, एक तर यातील आपल्या आवडत्या प्रांतातील लेखांचा फिरफिरुनि आस्वाद घ्यावा अथवा याच कोजागिरीला लेखकाची प्रकाशित झालेली आणिक दोन पुस्तके आहेतच! मंडळी, त्यांच्याविषयी नंतर!)    

वाचकहो, प्रत्येक लेखाचा उहापोह करण्याचा मोह मी जाणीवपूर्वक टाळलाय. आपणही उत्सुक व्हावे आणि आणखी काय काय असेल बरं यात, हा प्रश्न स्वतःला विचारत हे पुस्तक वाचावे, हा माझा एकमेव उद्देश आहे! आता माझा सवाल ऐका मंडळी! सूर्याची धगधगीत उग्र किरणे नाहीत, उन्हाचा रखरखाट नाही, तर मुग्ध, मनोहर, शांत, शीतल, सौम्य, पवित्र आणि धवल चंद्रप्रकाशाची जाळी विखुरलेली आहे. निशिगंधाच्या धुंद सुगंधाने आसमंत अन आपलं मन भारून टाकलंय. या नीरव शांततेत काळ्याभोर रंगाच्या अन चांदण्यांच्या टिकल्यांचे नक्षीकाम असलेल्या चंद्रकळेच्या महावस्त्राने नटलेल्या निशेचे निश्चल मनमोहक सौंदर्य अनुभवायचे आहे कां? मग या पुस्तकातील शब्दफुले कधीही वेचा, चांदण्या रात्रीच्या निखळ सौंदर्याची आपल्याला नक्कीच भुरळ पडेल, हा झाला माझा अनुभव! अन तुमचा?

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

छान दाट निळे ••• काळे भासणारे आकाश ••• त्यात असंख्य लुकलुकणार्‍या चांदण्या, तारे तारका••• या सगळ्या गोपिकांत शोभून दिसणारा कृष्ण जणू हा पूर्णचंद्र••• पृथ्वीवर डोंगरांवर झाडांवर पाण्यात सगळीकडे सांडणारा हा लक्ख प्रकाश ••• हे सगळे पाहताना भान हरपलेले एक प्रेमी युगूल तळ्याकाठी झाडाखाली बसलेलं ••• हितगूज करण्यात मश्गूल असलेलं••• 

सुंदर लोभस असे हे चित्र. कोणत्याही रसिक मनाला भुरळ घालणारं•••

पण काय सांगते हे चित्र? फक्त पौर्णिमेची रात्र आहे एवढच? मला नाही तसे वाटतं••• 

हे संपूर्ण चित्र कितीतरी कथा सांगतेय असे वाटतं

०१) धरती आणि आकाश यांना जोडणारी ही डोंगराची रांग दु्रून चांगली दिसत असली तरी त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार, खाचाखळगे यांचे दर्शन त्या युगुलाला देते. त्याचेच स्पष्ट प्रतिबिंब पाहून ते विचार करू लागले••••

०२) आयुष्यात कितीही अंधार असला तरी ब्लू मूनची रात्र कधीतरी येतेच जीवनात. याचा अनुभव ते दोघे घेत होते•••

०३) दोघेही व्याकूळ••• समदु:खी••• आपापली कथा, व्यथा सांगताना तो पूर्णचंद्र त्यांच्या कथा ऐकायला केव्हा झाडावर विसावला हे त्यांना कळलेच नाही•••

०४) नर्गिस राजकपूरचा प्रभाव असलेले दोघे झाडाची छत्री करून एकत्र त्यामधे गुजगोष्टी करत असताना चांदण्याची बरसात होत आहे•••

०५) आपल्या जीवनाचा निर्णय घेताना साशंक असणारे ते दोघे••• विचारमंथनातून त्यांच्या अंतरंगावर ऊमटलेल्या लहरी••• यातून त्यांच्या जीवनात एक शरदचंद्रीय निर्णयाची आलेली जीवन उजळणारी कोजागिरी पौर्णिमा •••

अशा अनेक कथांचे कथन करणारे केशरयुक्त रंगाचे कथापौर्णिमा हे शब्द•••

लेखिकेच्या नावाप्रमाणेच पुनवेची छत्री घेऊन आपल्या शब्द चांदण्यांना लकाकते रूप देऊन प्रत्येक कथेतून साराचा पूर्णचंद्र घेऊन येणार याची ग्वाही••• 

तरीही एक कहाणी मला या चित्रातून समजली ती  कवितेतून सांगावी वाटते .

☆ सुरेल मैफिल ☆

रात सांगते एक कहाणी

चमचमणा-या ता-याची

गज-याला स्पर्श करून 

गंधाळणा-या वा-याची

 

वारा गाई एक गाणे 

लकेर घेऊन हास्याची

मंजूरवाने पुलकीत होऊन 

मोहरणा-या प्रितीची

 

प्रीत छेडी एक तराणा

साथ तया आरोहाची

अवरोह ये मागूती

सुरूवात मल्हाराची

 

मल्हार हा भारी जीवन

साथ तया असे तुझी 

भूपाळी ते भैरवी

सुरेल मैफिल दोघांची 

हे सगळे म्हणजे कथापौर्णिमा या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ. या कथा संग्रहात १५ कथा असल्याने दिलेले कथापौर्णिमा हे नाव संयुक्तिक असले तरी कितीतरी कथाबिजे मनात देणारे हे मुखपृष्ठ आहे एवढे नक्की. 

इतके बोलके मुखपृष्ठ करणार्‍या गंगाधर हवालदार यांना धन्यवाद आणि या मुखपृष्ठाची निवड केली म्हणून रसिक आंतरभारतीचे प्रकाशक नांदुरकर आणि लेखिका पूनम छत्रे यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

” ३६ आकडा आणि ६३ आकडा ”  हे दोन अंक शिकवतात जीवनातील सत्य स्वरूप . 

३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांचं असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. 

आता ६३ आकडा पहा.

या आकड्याने साठी ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो. 

६३ च्या या आकड्याप्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.    

वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर,, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆

☆ पुस्तकांवरबोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆ 

लेखिका : मनुबहेन गांधी 

प्रकाशक : नवजीवन प्रकाशन 

लांबी रुंदीला छोटेसे व पानेही 56 इतकेच व फक्त 15₹ किंमत असणारे नवजीवन प्रकाशनाचे हे पुस्तक तसे महत्वाचेच व आशयघन ही.

गांधींची नातेवाईक मनुबहेन गांधी यांचं ‘भावनगर समाचार’ मध्ये प्रकाशित झालेल्या डझनभर लेखांचे हे पुस्तक होय.                 

मनुबहेन यांचा हा लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. बापूजींच्यासोबत एका कठीण काळात नोआखली मध्ये राहण्याचा भाग्ययोग त्यांना लाभला. तत्संबंधीचा हा महत्वपूर्ण असा ऐतिहासिक दस्तऐवजच मानला पाहिजे.          

बापूजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर यात उलगडताना आपणाला पहायला मिळतात. काही प्रसंगांमधील बापूजींचे वागणे कसे होते. व त्यांची वैचारिक पातळी किती उच्च दर्जाची होती ते या लेख संग्रहातून जाणवते. जसे मनुबहेन यांना नोआखलीतील शांततेच्या कामासाठी रात्री २ वा. उठवताना सांगितलेला महत्वाचा संदेश. 

बापूजींचे सहकारी सतीशबाबू यांनी एक झोपडी तयार केली होती जीचे एक-एक भाग लहान मुलांनाही वाहून नेता येतील व कुठेही ती झोपडी वसवता येईल. जेणेकरून बापूजींना त्यानिमित्ताने या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कामात थोडी उसंतही मिळावी. परंतु, एकदा एका गावात ती झोपडी वापरल्यानंतर त्या गावातील भयंकर परिस्थिती पाहून आपणाला अशा झोपडीत ही राहण्याचा अधिकार नाही असे जाणून त्या झोपडी चे रुपांतर एका लहान इस्पितळात करण्यास सांगितले. असे अनेक प्रसंग आपणास वाचण्यासाठी मुळातूनच हे पुस्तक वाचायला हवे.  धन्यवाद !

परिचय –  श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पाचवा कोपरा (मराठी कथासंग्रह) – – लेखिका – प्रा. सुनंदा पाटील ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  पाचवा कोपरा (मराठी कथासंग्रह) – लेखिका – प्रा. सुनंदा पाटील ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆ 

लेखिका                 प्रा.सुनंदा पाटील 

प्रकाशक               शब्दान्वय प्रकाशन, मुंबई

पृष्ठे                       136

मूल्य                     रु 250/-

प्रा. सुनंदा पाटील

प्रा. सुनंदा पाटील यांचे जेष्ठ नागरिकांना समर्पित केलेला कथासंग्रह आजच वाचून पूर्ण केला.

कथा वाचनापूर्वी लेखिकेचे मनोगत ही वाचले होते ते जरा मनात धाकधूक ठेऊनच !  याचे कारण अस कि जेष्ठंना सूचना, सल्ला, पर्याय हे सतत मिळत असतात . सांगणाराही मदत करण्याच्या उद्देशाने किंवा त्रास कमी करण्याच्या हेतूनेच सांगत असतो. पण प्रत्येक घरातील माणसांची  पध्दत व आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने हा सल्ला वापरता येतोच अस नाही.अशावेळी जर मानसिकरित्या  संभ्रमीत असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळतो तो प्रत्यक्ष अश्या परिस्थितीतून वाट काढणाऱ्या आपल्या सहकारी मित्रांची. नेमकी हीच उपलब्धी या कथांनी दिली आहे.

कथासंग्रहातील कथा जेष्ठांच्या असल्या तरी वैविध्य पूर्ण आहेत.  एकट्याने रहाताना आपली पेंटिंग ची आ्ड जपणार्या भरारी मधील सुनिताताई असोत किंवा वाटचाल मधल्या शारदबाई वागळे असोत , आपल्या छंदांना त्यांनी म्हातारपणीच्या काठीचा मान दिला, तर मनात ओसंडून वाहणाऱ्या मायेला मला आई हवी अस म्हणणाऱ्या मुलाला माधवीताईंनी आईची माया दिली. रिटायर झालेल्या अण्णांना पैशाची नड भासू लागली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची संस्कृत ची आवड हेरून पौरोहित्याचा मार्ग दाखवला विक्री या कथेतील मनोहरपंतांनी आपल्या भावांचे नाते पैशापेक्षा जास्त मोलाचे मानले. मोकळा श्वास मधील अक्कानी तर मला जोरदार धक्काच दिला.  ज्या आक्का देवासमोर माझ्याआधी माझ्यापतीचे निधन होउदे असे मागणे मागत होत्या त्या घर सोडायची हिमंत बांधतात वजरा छोट्या गावात घर घेऊन स्वतंत्र राहू बघतात ही धीराची कल्पना आहे.

ज्या कथेचे नाव कथा संग्रहाला दिले आहे ती पाचवा कोपरा ही कथाही  वास्तवाशी नाते सांगणारी आहे.घरात उपर्यासारखी मिळणारी वागणूक, साध्या साध्या गोष्टी वर लादलेली बंधने, आवडीच्या गोष्टींना मुद्दाम अडथळे आणणे या सर्व गोष्टींना वैतागून श्रध्दाताई वृध्दाश्रमात रहायला जातात व तेथे आपला लिखाणाचा छंद पुरा करतात .हे सर्व करताना त्यांनी आपला मनाचा मोठेपणा जपला आहे.  त्या मुलाला आपल्या अकौंटमधले पैसे काढून मोठे घर घेण्यास सुचवतात. आपल्या घरातील माणसांना कमी लेखू नये, क्षमता ही स्वतंत्र गोष्ट आहे त्याचा आदर करायला शिक हेही त्या सांगायला विसरत  नाहीत. अत्यंत भावपूर्ण शब्दांत लेखिकेने कथेचा शेवट केला आहे. 

सर्व कथांचे तात्पर्य मात्र सर्व जेष्ठांनी लक्षात ठेवले पाहिजे ..  ते म्हणजे जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देउ नये अशी आपली जुनी म्हण. ही मात्र वारंवार प्रचितीस  येते.

लेखिकेने आपल्या मनोगतात आपले विचार व्यक्त करतानाही ही अपेक्षा ठेवली आहे. पुस्तकाच्या समारोपाच्या कथेनंतर वाचकाचाही हाच विचार पक्का झाला तर लेखनाचे सार्थक झाले असे होईल. 

सर्व जेष्ठांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

परिचय : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-6 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-6 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

श्रीकृष्णाच्या अद्भुत लीलांनी व कथांनी युक्त असा भागवतातील दहावा स्कंध म्हणजे जणू भागवताचा आत्माच!! मागील भागात आपण या दहाव्या स्कंधातील पूर्वार्ध पाहिला. (पाचव्या भागात).आता या दहाव्या स्कंधाचा – पर्यायाने-  श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध पाहू या.

सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने वेदस्तुती या कथा भागाने केली आहे. शब्दांनी वर्णन न करता येणाऱ्या परब्रम्ह परमात्म्याची वेदांनी केलेली ही स्तुती आहे. भागवत ग्रंथामध्ये दशम स्कंधाच्या ८७ व्या अध्यायातील हे २८ श्लोक म्हणजे वेद वेदांताचे सार आहे असे लेखक म्हणतात. वाचायला फारच कठीण असणाऱ्या पण सुंदर संस्कृत श्लोकांनी आणि  या वेदस्तुतीने सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने केली आहे.

नंतर लेखक पुन्हा श्रीकृष्ण चरित्राकडे वळले आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला कंसवधा नंतरची कथा सांगतात. कंस हा जरासंधाचा जामात होता. जरासंधाच्या दोन मुली अस्ति आणि प्राप्ति या कंसाच्या पट्टराण्या होत्या. कंस वधा नंतर त्या पित्याकडे गेल्या तेव्हा जरासंधाला दुःख व संताप झाला. त्याने तेवीस अक्षौहिणी सैन्यासह मथुरेला वेढा घातला. संपूर्ण यादव कुळ नष्ट करण्याचे ठरवले. श्रीकृष्णानेही पृथ्वीवरील हा दैत्य भूभार कमी करण्याचे ठरवले. आकाशातून सूर्यरथासारखे तेजस्वी दोन रथ पृथ्वीवर उतरले. कृष्णाने एक बलरामाला दिला. श्रीकृष्णाचा दारुक नावाचा सारथी होता. यानंतरच्या या तुंबळ युद्धाला सुरुवात कशी झाली, परस्परांशी कसे युद्ध खेळले गेले , शस्त्रविद्या वगैरेचे अतिशय रोचक, अंगावर काटा आणणारे वर्णन लेखकाने केले आहे. जरासंधाचा पूर्ण पराभव करूनच श्रीकृष्ण मथुरेला परतले. जरासंध पुन्हा मगध राज्यात परतला. पण नंतर असेच तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने एकूण सतरा वेळा मथुरेवर हल्ला केला. प्रत्येक वेळी त्याचे सारे सैन्य नष्ट करून श्रीकृष्णाने त्याला उदारपणे सोडून दिले. पण भूभार नष्ट केला.

अठराव्या वेळी कालयवन नावाचा म्लेंच्छ तीन कोटी सैन्य घेऊन आला. हे संकट महा भयंकर आहे . हे जाणून श्रीकृष्णाने समुद्रात बारा योजने दूर विस्तीर्ण नगरी विश्वकर्म्या कडून वसवून तिथे सर्व यादवांना सुरक्षित ठेवले. हीच द्वारका नगरी होय!! या नगरीचे वर्णन लेखकाने अत्यंत सुंदर केले आहे. त्या नगरीतून बाहेर पडणाऱ्या श्रीकृष्णाचा कालयवनाने पाठलाग केला. कालयवनाला एका गुहेपर्यंत आणून मांधाता राजाचा मुलगा मुचकुंद याचे कडून त्याला भस्मसात करविले. ही मुचकुंदाची कथाही खूपच सुंदर रंगविली आहे. श्रीकृष्ण रणांगणातून पाठ दाखवून पळाले म्हणून त्यांना रणछोडदास नाव पडले . जरासंधही त्यानंतर पुन्हा युद्धास आला त्या युद्धाचेही वर्णन खूपच रंजक आहे.

यानंतरची रम्य व रसाळ कथा रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणी हरण याची आहे. ही कथा प्रत्यक्ष वाचावी अशीच आहे.स्वयंवरानंतर कृष्णाने जमलेल्या सर्व राजांच्या देखत रुक्मिणीला रथात बसवले. शिशुपाल व रुक्मिचा पराभव केला (रुक्मि हा रुक्मिणीचा भाऊ !) आणि श्रीकृष्ण रुक्मिणीस घेऊन द्वारकेला गेले. शंकराने कामदेवाला (मदनाला) भस्म केले. तेव्हा मदनाने पुन्हा देह मिळावा म्हणून भगवंताची प्रार्थना केली होती. तोच कामदेव, भगवंत व रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्माला आला. त्या प्रद्युम्नाची छोटी कथा पुढे आली आहे .नंतर श्रीकृष्णाचा जांबवती व सत्यभामाेशीही विवाह झाला. पुढे स्यमंतक मण्याची मनोरंजक कथा आहे. यानंतर श्रीकृष्णाने कालिंदी व इतर स्त्रियांशी विवाह केल्याची कथा आहे. तसेच श्रीकृष्णांनी इंद्राचे छत्र बळकावणाऱ्या नरकासुरास ठार केल्याची रम्यकथा लेखकाने वर्णन केली आहे. त्याने बंदीवासात टाकलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी भगवंताने तितकी रुपे घेऊन विवाह केले. श्रीकृष्णाने एकदा गंमतीने रुक्मिणीच्या पती प्रेमाची परीक्षाही घेतली. ही कथा खूप छान रंगविली आहे.

यानंतर श्रीकृष्णाच्या मुख्य आठ राण्यांची नावे सांगितली आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, सत्या (नाग्नजिती), कालिंदी, लक्ष्मणा, मित्रविंदा, भद्रा अशा या आठ राण्या!! या राण्यांच्या मुलांची ही नावे सांगितली आहेत .या  सोळाहजार स्त्रियांनाही प्रत्येकी दहा मुले झाली असल्याचा उल्लेख आहे. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मिची कन्या रुक्मवती हिच्याशी तर प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याचा विवाह रुक्मिची नात रोचना हिच्याशी झाला होता.  बाणासुर दैत्याची मुलगी उषा! हिचे अनिरुद्धावर प्रेम होते. त्याचे सुंदर वर्णन कथाकाराने केले आहे. त्यावरून बाणासुराचे श्रीकृष्णाशी युद्ध झाले. त्याला कृष्णाने मुक्ती दिली.

या आणि यापुढील काही कथा आपल्याला माहीतही नसाव्यात. श्रीकृष्णाची मुले खेळत असताना त्यांना कृकलास नावाचा पर्वतप्राय खेकडा दिसला. श्रीकृष्णाने त्याला विहिरीतून बाहेर काढले. तो पूर्वजन्मी इक्ष्वाकूचा मुलगा नृग नावाचा दानशूर राजा होता. या नृग राजाला त्याची चूक नसताना केवळ गैरसमजाने खेकड्याचा जन्म मिळाला ही कथा आहे.

एकदा बलरामांनी गोकुळाला भेट दिली, त्याचे वर्णन पुढे दिले आहे. पुढची कथा स्वतःला श्रीकृष्ण समजणाऱ्या पौंड्रकाची आहे. त्याच्याशी युद्ध करून कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडविले. काशी राजाचा वध केला. ते पाहून सुदक्षिण नावाचा काशीराजाचा मुलगा श्रीकृष्णावर चालून आला. त्याचाही वध कृष्णाने सुदर्शन चक्राने केला व काशीनगरीही भस्मसात केली. बलरामांनीही काही अद्भुत पराक्रम केले. त्याच्या कथा शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितल्या आहेत. द्विविद नावाच्या वानराचा वध बलरामाने केला. तो सुग्रीवाचा मंत्री होता. पण नरकासुराचा परममित्र होता. बलरामाने हस्तिनापुरास जाऊनही खूप पराक्रम  गाजविला. कौरव घाबरले. दुर्योधनाने बलरामाला बाराशे हत्ती, एक लाख वीस हजार घोडे, सहा हजार सुवर्ण रथ आंदण दिले.

नारद मुनींनी एकदा द्वारकेस जाऊन श्रीकृष्णाचा संपूर्ण संसार व परिवार पाहिला. या कथेनंतर श्रीकृष्णाची दिनचर्या लेखकाने वर्णन केली आहे. नंतर भीमाकरवी श्रीकृष्णाने युक्तीने जरासंधाचा वध करविला. ही कथा आहे. जरासंधाने बंदी बनवलेल्या सर्व राजांची मुक्तता श्रीकृष्णाने केली. शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर त्याचा सुदर्शन चक्राने वध केला. तीन जन्म तो वैरभावनेने का होईना कृष्णाचाच जप करीत होता. त्यामुळे शिशुपालाला कृष्णाने मुक्ती दिली.

मयासुराने निर्माण केलेल्या भवनात दुर्योधनाची फजिती झाली. तेव्हा द्रौपदी त्याला हसली. मग दुर्योधन संतापला. ही कथा थोडक्यात सांगितली आहे. यानंतर शाल्व या शिशुपालाच्या मित्राचा वध, बलराम कौरव पांडवांच्या युद्धात निष्पक्ष म्हणूनच राहिले, ते तीर्थयात्रेस निघून गेले ही कथा आहे. बलराम नैमिषारण्यात आले. प्रभास क्षेत्री गेले. तिथून द्वारकेस परतले. या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले. त्याचे वर्णन लेखकाने केले आहे.

यानंतरची कथा सुदाम्याची आहे. ही कथा सर्वांनाच ज्ञात आहे. ती लेखकाने फारच सुंदर वर्णलेली आहे. सुदाम्यावर कृष्णाने अनुग्रह केला. यानंतर श्रीकृष्ण खग्रास सूर्यग्रहणाचे वेळी स्यमंतपंचक या क्षेत्री गेले. तिथे त्यांची नंद यशोदा व इतर गोपगोपींची भेट झाल्याचे वर्णन आहे.द्रौपदीने सर्व कृष्णपत्नींची  भेट  घेतल्याची  कथा  पुढे  आली आहे.वसुदेवाने श्रीकृष्णा कडून कर्माचा निरास कसा होईल याविषयी सर्व तत्त्वज्ञान समजून घेतले. श्रीकृष्णांनी देवकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिला कंसाने मारलेली तिची सात मुले देखील ब्रह्मदेवाकडून आणून आईला त्यांची भेट घडविली.

पुढे सुभद्रा हरणाची कथा आहे. बहिणीच्या स्वयंवराचे वेळी तिचे हरण करण्यास अर्जुनाला श्रीकृष्णाने मदत केली. हा कथा भाग आहे. यानंतर वृकासुराची कथा आहे. त्याने शंकराची आराधना करून- मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून जावा- म्हणून वर मागितला. त्यामुळे पृथ्वीवर हाहा:कार माजला. श्रीविष्णूंनी एकदा बटूचे रूप घेऊन त्याला सांगितले की शंकराने तुला खोटा वर दिला आहे. तू त्याची प्रचिती पहा. असे म्हणून त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि त्याला युक्तीने भस्मसात केले.

शेवटी द्वारकेचे वैभव व कृष्ण महिमा या वर्णनाने दहाव्या स्कंधाची व सहाव्या दिवसाच्या कथा भागाची समाप्ती होते.

सहाव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर विष्णूंच्या गळ्यातील वैजयंती माळेचे चित्र आहे. तिच्यात मुक्ता, माणिक्य, मरकत, इंद्रनील,हीरक ही पाच रत्ने गुंफलेली असतात. ती पाच रंगांची व गुडघ्यापर्यंत लांब असते. ही माला पंचमहाभूते व पंचतन्मात्रा यांचे प्रतीक आहे.

पंचरूपा  तु या  माला वैजयंतीगदाभृत: |

सा भूत हेतुसंघाता  भूतमाला च वै  द्विज ||

(विष्णपुराण)

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निशिगंध (भावगीत संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ निशिगंध (भावगीत संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

कवी:            डॉ. निशिकान्त श्रोत्री

प्रकाशक:      नीलकंठ प्रकाशन (श्री प्रकाश रानडे)

पृष्ठ संख्या:    २१२

किंमत:        Rs. २००

डॉक्टर निशिकान्त श्रोत्री हे नाव साहित्य क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या या भावगीत संग्रहात  भक्तीपासून शृंगारापर्यंत विविध अंगांना आणि विषयांना स्पर्श करणारी गीते असल्यामुळे विषयांनुसार गीतांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. एकूण नऊ भागात ही गीते विखुरली आहेत. भक्ती, देशभक्ती, चिंतन, प्रीती, युगुल, विरह, शृंगार सगे सोयरे आणि नारी जीवन असे हे विभाग आहेत. जवळजवळ २०० हून अधिक गीते यात समाविष्ट आहेत आणि सगळीच गीते एकाहून एक सरस आहेत.

या गीत वाचनात वाचक अगदी सहजपणे रमून जातो ते त्यांतील सुंदर शब्दरचना आणि तितक्याच सुंदर विचारांमुळे. गीतांच्या शब्दांत अडकत असतानाच अगदी सहज प्रत्येक विभागासाठी काढलेली रेखाचित्रेही खूप बोलकी आहेत. या रेखाटनांंमुळे  गीते वाचणारा रसिक त्या वातावरणाशी या चित्रांमुळे पटकन जोडला जातो.

वास्तविक यातली सारीच गीते म्हणजे उत्तम काव्य, अनमोल  विचार, भाषा, भावना यांचा एक समृद्ध झराच आहेत. सर्वच गीतांविषयी लिहिणे केवळ अशक्य आहे. मात्र काही लक्षवेधी भावगीतांबद्दल आपण इथे नक्कीच बोलूयात.

भक्ती विभागातील पहिलेच गीत गणनायका. गणेश प्रार्थना सादर करून या पुस्तकाची सुरुवात एक सुंदर भक्ती पूर्ण आणि “प्रथम वंदना तुजला गणेशा” या पारंपारिक प्रथेप्रमाणे होते.

धन न वांच्छितो संपत्ती हिरे 

दर्शन दे मजला कर ठेवून शिरावरती या.. आशीर्वच दे मला…

संग्रहाची सुरुवातच अशी भक्तीमय, लीन आणि नम्रतेने होते. कलाकार कसा नम्र, समर्पित असावा याची जाणीव  होते. या  विभागात अनंत स्तोत्र, शारदा स्तवन, भूपाळी, प्रार्थना, गवळण, परमेश्वराची, ब्रह्मचैतन्याची केलेली आळवणी आहे.

जनमनाचा अधिनायक 

कोट्यावधीचा तो विधायक

व्यापिले ज्याने  अंतःकरणाला अभिमानाने जगायला 

राज्य राज्यांच्या देशभक्तीला जाती-जातीच्या मिलनाला 

लोक तंत्राने एकवटला 

मान देऊया तिरंग्याला

वंदू या भारत देशाला..

(वंदू या भारत देशाला)

…वरील प्रत्येक ओळीमध्ये देशाप्रती गौरवाची, अभिमानाची भावना जागृत करण्याचं सामर्थ्य जाणवतं.

वैभवात जी नाती जपली.

दैन्ये  ना त्यागली 

नसे अपेक्षा कृतज्ञ प्रीती 

मनात जोपासली…

— ‘ वेध निवृत्तीचे ‘ या कवितेत ते म्हणतात,

कर्मयोग हे दैव जाणिले 

अविरत गतीला नाही रोखले

 चल चक्राची गती थोपवा 

काया शिणली

 कार्य संपवा…

जीवनाविषयी केलेले सखोल चिंतन या काव्यरचनांतून जाणवतं. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे हा जीवनानुभवातून आलेला अनमोल संदेश कवी सहज जाता जाता देऊन जातात.

अतिशय हळुवार, अलवार, कोमल मोरपिशी, शब्दांतून कवीचे प्रीत काव्य उलगडत जाते.

मुक्त संचार तुझा माझ्या गे स्वप्नात

कधी असतो का रात्री मी तुझ्या ध्यानात 

करितो अर्ज मी मुग्ध तुझ्या नयनाते

एकदा घेई मजला बंद तुझ्या पापणीते

(एक वार हळूच पाहू दे)

…या गीतातल्या या सुंदर प्रेमाचं आर्जव करणाऱ्या ओळी. एखाद्या सुकलेल्या, व रुक्ष मनालाही उमलवतात आणि गतकाळाच्या आठवणीत रमवतात.

युगुल विभागातील गीते तो आणि *ती*चीच आहेत. या गीतांमध्ये इतकं माधुर्य आणि गेयता आहे की वाचता वाचता आपण सहजच मनाचा एक ठेका पकडतो.

 ती:  तुझं जालं मी ल्याले

       मन तुजं मी प्याले

      जीव तुज्यात विरलाय माजा

      लाटं लाटंत झेलिन होरी तुजी मी

     जीवाचा तू तर राजा..

 तो:  का डोल्यात पानी तुज्या

       व्हटात गानी

रानी खरी जीवाची माज्या… या कोळीगीतातला प्रेमाचा हळुवार अविष्कार आणि ठसका, एकमेकात गुंतलेली मनं वाचकांच्या हृदयात आनंदाच्या लाटाच उसळवतात.

पाजुनी दवबिंदू

 मी कलिका मनी जोपासली

 कंटकाची बोच म्हणून 

दूर तिज सारू कशी..

(भैरवी)

 किंवा..

 जगण्याची आशा जात असे सुकून 

साथ नसताना कसे जा जगू जीवन

(खिन्न कातरवेळ)

अबोल्यात जर जगायचे

तर प्रतीक्षा तुझी कशासा गे

पहायचे जर नसेल तुजला 

नेत्र मिटू दे अखेरचे..

(दिवा स्वप्न)

विरहाचे  बोचरे दुःख व्यक्त करणारी ही गीते खरोखरच मन उदासही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी विराणीचे क्षण येतातच. त्या क्षणांना पुन्हा एकदा भावनांचा झोका या गीतांमुळे दिला जातो. इतक्या सजीवपणे या गीतांचे लेखन झालेलं आहे.

पाकळी चुंबता अंतरी लाजले 

चिंब पदरातुनी वक्ष आसुसले 

दाटली आर्तता नयन पाणावले

 स्पर्श तव जाहला प्रेम अंकुरले 

(चित्त धुंदावले)  

शृंगारातला उन्नतपणा, आतुरता, देहभावना, लज्जा, औत्स्युक्य या साऱ्या प्रणय भावनांचं सुरेख मिश्रण या शब्दांतून ठायी ठायी पाझरतं. पण तरीही या शब्दांमध्ये कुठेही अश्लीलता जाणवत नाही. इथे राखलेलं आहे ते शृंगाराचं पावित्र्य आणि हेच या गीतांचं वैशिष्ट्य.

काही नाती ही जन्मभर आपल्या सोबत राहतातच. त्या व्यक्ती या जगात असोत वा नसोत पण त्यांनी जे दिलेलं आहे ते  आपल्या आयुष्यासोबत अखंड येत असतं. याची जाण देणारी सुंदर गीते  सगे सोयरे या भागात वाचायला मिळतात. ही गीते वाचताना कुठेतरी कवीच्या मनातली सगे सोयऱ्यांविषयीची कृतज्ञता ही जाणवते.

 सुकून जाईल कैसे जीवन 

पाखर धरी ती दृष्टी 

कितीक रुजले किती उमलले 

कृतज्ञतेची वृष्टी 

आज पोरकेपणी वरद हा आहे आधाराला

 उजाड धरतीवरी पसरला पावन पाचोळा

(दोन तरुंची छाया )

निसर्ग नियमाप्रमाणे सोडून गेलेल्या मात्यापित्यांनी पसरवलेल्या अनेक संस्कार पर्णांना ते पावन पाचोळा असं संबोधून त्यांच्या ममतेचा गौरवच करतात.

जीवन सारे शिल्प जाहले 

तुझीच ही किमया

 कवतुक तुझीया नयना मधले 

मोहरली ही काया

(नाही मजला जगायचे) 

अत्यंत प्रिय व्यक्तीच्या प्रोत्साहनने जीवन कसे बहरते हेच यातून व्यक्त होते तसेच त्यांच्याविना जीवन कसे शुष्क होते याही भावना इथे प्रकट होतात. सगे सोयरे कोण असतात, का असतात, त्यांची जीवनातली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे अर्थ प्रत्येक गीतात वाचायला मिळतात. मातृत्वाची सर्वंकष महती सांगणाऱ्या गीतरचना नारी जीवन विभागात वाचताना धन्य तो नारी जन्म आणि नारी जन्माचा सन्मान व्हायला हवाच असे वाटते आणि  असाच  संदेश देणाऱ्या रचना यात आहेत. या गीतांमधून नारित्व, स्त्रीत्व या संज्ञांचा अतिशय नेमकेपणाने अर्थ उलगडलेला आहे. त्याचबरोबर नारीचा झालेला अनादर, तिच्या देहाची विटंबना याविषयीची चीडही कवीने व्यक्त केलेली आहे.

धुक्यापरीही धूसर झाली 

पावन सारी नाती 

मोल न काही लेकीला ती केवळ पैशापोटी 

विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा 

छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा..

(बावरलेली जखमी हरणी)

विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा ही शब्दपंक्ती  मनावर खरोखरच आघात करते. आणि  जगाचा एक कडवट वास्तव अनुभव देते. समाजात घडत असणाऱ्या स्त्री अत्याचारांची कवीने सखेद दखल घेतलेली आहे.

 या सर्वच काव्यातून कवीचे एक सामाजिक, संवेदनशील, विशाल, बांधील मन  जाणवते.

एकंदरच निशिगंध हा सर्व विषय स्पर्शी गीत संग्रह आहे. मानवी जीवन, माणूस टिपणारा आहे. प्रत्येक गीतात मौल्यवान असा विचार मांडलेला आहे. शिवाय या सर्वांतून कवीचा त्या त्या विषयावरील अभ्यास, निरीक्षण, संवेदना, सहअनुभूती आणि भाषेची अत्यंत मजबूत पकड जाणवते. मुख्य म्हणजे कुठेही विचारांचा गोंधळ नाही. स्पष्टता आहे. प्रत्येक ओळ गतीत वहात वहात रसिकांच्या मनात अलगद फुटते. शिवाय या सर्व गीतांमधून एक काव्यधर्मही त्यांनी जपलेला आहे. ऊपमा, उत्प्रेक्षा, लयबद्धता, गेयता, सहज यमके यामुळे  काय वाचू, किती वाचू आणि किती वेळा वाचू अशीच वाचकाची मनस्थिती होते. काही कविता अवघड भासतात, पटकन अर्थ लागत नाही, कवीला नेमके काय म्हणायचे आहे ते समजायला वेळही लागतो. पण तेच काव्य पुन्हा पुन्हा वाचलं की कवीच्या विचारांशी आपण जाऊन पोहोचतो आणि त्या वेळेला जो आनंद होतो तो शब्दातीत आहे.

“डॉक्टर निशिकांत श्रोत्री, इतका सुंदर गीत संग्रह सादर केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही.

(कंसात कवितेची शीर्षके दिली आहेत)

परिचय : राधिका भांडारकर पुणे.

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-5 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-5 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

मी आज श्रीमद् भागवत कथेचा जो भाग लिहीत आहे तो सर्वांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आपण एकूण नऊ स्कंध वाचले. आजचा हा दशम स्कंध म्हणजे भागवत पुराणाचा आत्मा आहे. हा भाग पूर्णपणे श्रीकृष्णाच्या लीलांनी व्यापलेला आहे. रासक्रीडेचेही वर्णन रसभरीतपणे यात आहे. या पुस्तकाची सुरुवात लेखकाने गोपीगीताने केली आहे. हे गोपीगीत म्हणजे गोपींना श्रीकृष्णाच्या सहवासाचा गर्व झाला होता, तो दूर करण्यासाठी व त्यांना शुद्ध भक्तीचा धडा देण्यासाठी भगवंत गुप्त झाले. मग मात्र गोपी विराहाने वेड्या झाल्या. सर्व चराचरसृष्टीत श्रीकृष्ण कोठे आहे म्हणून विचारीत फिरत राहिल्या. निराशेने कालिंदीकाठी बसून श्रीकृष्णाची त्यांनी आर्त विनवणी केली. दशम स्कंधातील हा भाग गोपीगीत म्हणून प्रसिद्ध आहे. तो कृष्णा वरील अनन्य भक्तीचा एक उत्तम ठेवा आहे. एकूण एकोणीस संस्कृत श्लोकांच्या, गेय असणाऱ्या गोपीगीताने या पुस्तकाची सुरुवात होते.

पुढे मात्र संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र आहे. पहिली कथा वसुदेव देवकीच्या विवाहाची आहे. मागील स्कंधात शुकाचार्यांनी परीक्षित राजाला यदुवंशाचा विस्तार सांगितला होता. तेव्हा परीक्षिताने पुढील वृत्तांत जाणून घेण्यासाठी शुकाचार्यांना काही प्रश्न विचारले की, माझे आईच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून संरक्षण कसे झाले? कंसाला देवाने का मारले? त्याचे आयुष्य, पत्नी वगैरे वगैरे!! त्यानंतर शुकाचार्य परीक्षिताला श्रीकृष्ण चरित्राचे कथन करतात. दानवांच्या भाराने पृथ्वी व्यथित झाली.. ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे गेली. सर्वांनी मिळून भगवान श्रीविष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली की शेष आदिमाया यांच्यासह भगवंत स्वतः वसुदेवाच्या पोटी अवतार घेणार आहेत.. सर्व देवांनी व देव स्त्रियांनी यदुकुलात गोपगोपींच्या रूपात अवतार घ्यावा, असे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले.

वसुदेव देवकीचा विवाह झाला. त्यांच्या रथाचे सारथ्य देवकीचा बंधू कंस मोठ्या आनंदाने करीत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली की “याच देवकीचा आठवा गर्भ तुझा काळ बनणार आहे” हे ऐकून कंसाने ताबडतोब वसुदेव व देवकीस बंदीवासात ठेवले.  त्यांची मुले जन्मतःच कंसाला आणून द्यायचे वचन कंसाने वसुदेवाकडून घेतले. पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा प्रामाणिकपणे वसुदेव मुलाला घेऊन कंसा कडे आला. पण कंसाने सांगितले की “या मुलाला घेऊन जा परत. तुझा आठवा मुलगा मला मारणार आहे.” वसुदेव आनंदाने परत गेला. पण मग कंसाचे सगळे अपराध भरणे आवश्यक होते. म्हणून नारद मुनी त्याला म्हणाले की “देवकीच्या पोटी येणारा कोणताही मुलगा विष्णूचा  अंश असू शकतो”. मग मात्र कंसाने देवकीची मुले जन्मतःच मारून टाकली. अशी सहा मुले त्याने मारली.. सातव्या वेळी योगमायेने यशोदेच्या गर्भात प्रवेश केला. शेषाने रोहिणीच्या पोटी अवतार घेतला. तो बलराम!!

आठव्या वेळी मात्र भगवंताने देवकीच्या पोटी जन्म घेतला त्या वेळचे सृष्टीतील बदलांचे सर्व रम्य वर्णन लेखकाने केले आहे. ते प्रत्यक्ष वाचायलाच हवे.. वसुदेवाने तो अंश गोकुळात नंदाघरी नेऊन ठेवला व यशोदेची नवजात मुलगी देवकी पुढे आणून दिली. तिला धरून कंस तिला शिळेवर आपटणार इतक्यात ती योगमाया त्याच्या हातून निसटली. कंसाला उपदेश करून ती अंतर्धान पावली. नंतर श्रीकृष्ण यशोदेच्या मायेत गोकुळात वाढू लागला. असंख्य लीलांनी त्याने गोकुळाला तोषविले. ते सर्व वर्णन पुस्तकात आले आहे. कंसालाही समजले की आपला शत्रू कुठेतरी अवतीभवतीच्या गावात वाढतो आहे. त्याने पूतना या राक्षसीला सर्व गावातील लहान मुले मारून टाकण्याची आज्ञा दिली. ती रूप पालटून गोकुळातच आली. श्रीकृष्णाने तिचे स्तनपान करताना तिचे रक्त व प्राणही प्राशन केले. तिला नंतर मुक्ती ही दिली. यानंतर शकटासूर तृणावर्त वगैरे राक्षसांचे वध ही कृष्णाने युक्तीने केले. पुढची कथा बलराम व कृष्णाच्या नामकरणाची आहे. ती अगदी रसाळ कथा आहे.

यशोदेने खोड्या करणाऱ्या कृष्णाला उखळाला बांधले. त्याच उखळांना दोन झाडांच्या मधून ओढत नेऊन कृष्णाने शापित रुद्र सेवकांचा उद्धार केला. ते वृक्ष म्हणजे नारदांच्या शापाने वृक्ष बनलेले रुद्र सेवक- कुबेराचे मुलगे होते. पुढची कथा सर्व गोकुळ वासियांचे वृंदावनात स्थलांतर, अघासुराचा वध यासंबंधी आहे. ब्रह्मदेवांनीही कृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी गाई गुरांना व गोपांना पळवून नेले. तेव्हा कृष्णाने जेवढी गाई गुरे व गोपाळ होते तेवढी रूपे धारण केली. याआधी  सर्व  गोपाळांसमवेत  बलराम व कृष्णाने केलेल्या गोपाळकाल्याचा व भोजनाचा  अतिशय  सुंदर कथाभाग  लेखकाने  वर्णन  केला आहे.  पुढे ब्रहमदेवानेही  श्रीकृष्णाची परीक्षा  पाहण्याचे  ठरविले. गाई वासरे व गोपाळ परत पाठवले आणि त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली धेनुकासुर या दैत्याच्या वधाच्या नंतर देवांनी कृष्णावर पुष्पवृष्टी केली, ती कथा आली आहे.

यानंतरचे कालिया मर्दनाचे अतिशय सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. कालियाचा पूर्वेतिहासही पुढे आला आहे. प्रलंब राक्षसाचा वध, श्रीकृष्णाने जंगलातील वणवा प्राशन केला, गोपींनी श्रीकृष्णाचे गुणवर्णन केले, गोपींनी कृष्ण हा पती म्हणून लाभावा म्हणून केलेले कात्यायनी व्रत, विप्रस्त्रियांवर श्रीकृष्णाने अनुग्रह केला वगैरे छोट्या कथा आल्या आहेत. यापुढची कथा मात्र इंद्राचा क्रोध, गोवर्धन पूजा, श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून इंद्राचे गर्वहरण केले. ही रसाळ कथा लेखकाने सुंदररीत्या वर्णिलेली आहे. कृष्णाने महावृष्टीतून ब्रज स्त्रियांचे, व्रजवासीयांचे रक्षण केले तेव्हा इंद्राने कृष्णाची क्षमा मागितली. इंद्राने आकाशगंगेच्या जलाने व कामधेनूने दुग्धाने कृष्णाला सर्वाधीश म्हणून अभिषेक केला व त्याला गोविंद असे नाव दिले.

पुढचा कथा भाग हा रासक्रीडेचे रसभरीत वर्णन आहे. गोपींचे गर्वहरण, गोपी गीत, या कथा फारच छान आहेत. शंखचूडाच्या वधाची कथा त्यातच आहे.वृषभासुर,केली, व्योमासुर इत्यादी कंसाने पाठवलेले दैत्य कृष्णाने मारले. त्यामुळे कंस अस्वस्थ झाला. त्याने अक्रूराला पाठवून कृष्णाला मथुरेत पाचारण केले. अक्रूर बलराम, कृष्णाला घेऊन गेला. तिथे कृष्णाने कुब्जेचा उद्धार केला. या कथा सतत वाचत राहाव्या असे वाटते. कृष्णाने कंसाच्या निमंत्रणानुसार आखाड्यात प्रवेश करून प्रथम कुवलयापीड या मत्त हत्तीचा वध केला. मुष्टिक, चाणूर यांचाही वध केला आणि सर्वात शेवटचे वर्णन आहे ते कंसवधाचे!!!! प्रत्यक्ष वाचायलाच हवे .

मग श्रीकृष्ण आपल्या जन्मदात्या मात्यापित्यांना भेटले. मातामह उग्रसेन यांना कृष्णाने राज्यावर बसविले. मग ते दोघे बंधू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी गेले . चौसष्ट दिवसात चौसष्ट विद्या आत्मसात करून त्या दोघांनी गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना त्यांचा प्रभासक्षेत्री समुद्रात बुडून मेलेला मुलगा परत आणून दिला. हा ही कथा भाग खूपच छान आहे. तसेच अक्रूराला त्यांनी गोकुळात पाठवले. तिथली अवस्था काय आहे हे जाणून घेतले ..तेव्हाचे कृष्ण नसलेल्या गोकुळाचे वर्णन अगदी व्यथित करणारे आहे. नंतर कृष्णाने उद्धवावर अनुग्रह केला. ती कथा आहे. नंतर कुंतीची व धृतराष्ट्राची हस्तिनापुरला जाऊन भेट घेतली. तिथे त्याने धृतराष्ट्राला कृष्णाचा उपदेश सांगितला की “सम बुद्धीने वागावे” वगैरे!! पण धृतराष्ट्राने ते ऐकले नाही. तेव्हा अक्रूर परत मथुरेला गेला आणि त्याने धृतराष्ट्राचे वर्तन श्रीकृष्णाला सांगितले. इथे दहावा स्कंध समाप्त होतो. तसाच पाचव्या दिवसाचा कथा भागही संपतो.

पाचव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्री विष्णूंच्या रत्नखचित किरीटाचे चित्र आहे. किरीट व मुकुट वेगळे असतात किरीट हा निमुळता, शिखरासारख्या आकाराचा तर मुकुट त्रिकोणी असतो. श्रीविष्णूंच्या मस्तकी दोन्ही दिसतात. त्याचे वर्णन श्री शंकराचार्यांनी केले आहे.

यत्र प्रत्युप्तरत्नप्रवरपरिलसद्भूरिरोचिष्प्रतान –

स्फूर्त्यां  मूर्तिर्मुरारेर्द्युमणिशतचितव्योमवद्दुर्निरीक्ष्या |

कुर्वत्पारेपयोधिज्वलदकृशशिखाभास्वदौर्वाग्निशंकाम्

शश्वन: शर्म  दिश्यात्  कलिकलुषतम: पाटनं  तत्किरीटम्  ||

सारांश — 100 सूर्यांच्या तेजाप्रमाणे तेज असलेले, संसार सागरातून बाहेर काढणारे आणि कलिकालाचा अंधार दूर करणारे श्री विष्णूचे हे किरीट आम्हाला शाश्वत सुख  ( मोक्ष )देवो.

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print