मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘रथसप्तमी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘रथसप्तमी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कथांनी, प्रथांनी उजळलेला सूर्यरथ

 *प्रास्ताविक*

 माघ मास शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. पहाट अजून झोपेत असते. आकाशाच्या पदरावरून अंधार हळूहळू सरकतो आणि पूर्व क्षितिजावर सोनसळी रेष उमटते. त्या क्षणी काळाचा रथ पुढे सरकतो, सप्त घोड्यांच्या टापांनी अवकाश गाजते. ऋषींची वाणी आठवते—

तमसो मा ज्योतिर्गमय।”

अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास म्हणजेच रथसप्तमी. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशीही अन्य नावे आहेत.

या पहाटे अनेक घरांच्या दाराशी रांगोळी उमटते. ती केवळ सजावट नसते, तर ऋतू परिवर्तनाची जाणीव करून देणारी शुभ खूण असते. तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी घरात समृद्धीचे, अन्नधान्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक ठरते. घराच्या उंबरठ्यावरच सण उतरतो—जणू सूर्याला आमंत्रण दिले जाते.

हा सण केवळ एक तिथी नाही, तर कथा, श्रद्धा, विज्ञान आणि अनुभवांनी विणलेला एक संस्कार आहे. सूर्याभोवती गुंफलेल्या असंख्य पौराणिक कथा, ऐतिहासिक परंपरा आणि लोकविश्वास या दिवशी एकत्र येतात आणि मानवी जीवनाला उजाळा देतात.

*पौराणिक कथा*

सूर्यदेवांचा जन्म आणि सप्त घोड्यांचे रहस्य

 पुराणकथांनुसार रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिन मानला जातो. कश्यप ऋषी आणि अदिती यांचा पुत्र म्हणून सूर्याचा जन्म झाला, म्हणून त्याला आदित्य म्हटले जाते. अदिती ही देवमाता, तर सूर्य हा देवतांचा तेजस्वी अधिपती—ही कल्पना वैदिक परंपरेत खोलवर रुजलेली आहे.

 सूर्याच्या रथाला सप्त घोडे आहेत, अशी कथा प्रसिद्ध आहे. हे घोडे म्हणजे सात दिवस, सात किरण, सात रंग आणि सात चेतना. मार्कंडेय पुराणात सूर्याचा सारथी अरुण असल्याचा उल्लेख आहे—जो उषेचे, म्हणजे पहाटेच्या प्रकाशाचे प्रतीक आहे. त्यामुळे रथसप्तमीची पहाट विशेष पवित्र मानली जाते.

लोककथेत सांगतात—

“अरुण आला की सूर्य मागेच येतो.”

म्हणजेच आशा आधी येते, पूर्ण प्रकाश नंतर.

*यशोधरा आणि यशाचा सूर्य*

एक भावस्पर्शी कथा

एक पौराणिक कथा सांगते की यशोधरा नावाची स्त्री दीर्घकाळ आजाराने त्रस्त होती. ऋषींनी तिला रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाला स्नान करून सूर्योपासना करण्यास सांगितले. श्रद्धेने केलेल्या उपासनेमुळे तिचे आरोग्य सुधारले आणि तिला आयुष्यात नवा प्रकाश मिळाला. त्यामुळे काही प्रांतांत रथसप्तमीला आरोग्यसप्तमी असेही म्हणतात. याच आरोग्यदृष्टीतून अनेक घरांत दाराबाहेर गोमयाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या बोळक्यात दूध व तांदूळ शिजवले जातात. गोमयाचा अग्नी वातावरण शुद्ध करतो, तर मातीचे भांडे उष्णता समतोलपणे धरून ठेवते. दूध आणि तांदूळ हे पोषणाचे प्रतीक—बदलत्या ऋतूत शरीराला बळ देणारे.

दक्षिण भारतात दूध उतू जाऊन अग्नीवर सांडणे, ही प्रथा विशेष अर्थवाही मानली जाते. दूध उतू जाणे म्हणजे जीवनातली समृद्धी ओसंडून वाहो, अन्न आणि आरोग्य भरपूर सो—अशी सामूहिक इच्छा.

सूर्यपूजा म्हणजे केवळ देवपूजा नाही, तर आरोग्याची जपणूक आहे, हेच या प्रथेतून व्यक्त होते. म्हणूनच मंत्र म्हटला जातो—

“नमः सूर्याय शान्ताय सर्वरोगनिवारणाय।”

*रामायण–महाभारतातील सूर्यसंदर्भ*

रामायणात भगवान राम सूर्यवंशी असल्याचे सांगितले जाते. युद्धाच्या निर्णायक क्षणी ऋषी अगस्त्य रामाला आदित्यहृदय स्तोत्र देतात—

“एष देवो महातेजा आदित्यः पापनाशनः”

हे स्तोत्र केवळ भक्तीगीत नसून आत्मविश्वास जागवणारे तेजस्वी वचन आहे.

सूर्य हा बाह्य अंधार जसा दूर करतो, तसाच अंतर्मनातील भयही नाहीसे करतो—ही रामायणातील शिकवण आहे.

महाभारतात कर्ण हा सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो. कुंतीने केलेल्या सूर्योपासनेतून कर्णाचा जन्म झाला. सूर्याने कर्णाला कवच-कुंडले दिली—ती म्हणजे आत्मसन्मान, दानशूरता आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक. त्यामुळे सूर्य हा केवळ शक्तीचा नाही, तर धर्मनिष्ठेचा स्रोतही मानला जातो.

*खगोलीय सत्य आणि ऋषींची दूरदृष्टी*

रथसप्तमीचा खगोलीय अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात स्थिरावतो आणि रथसप्तमीच्या आसपास त्याची उष्णता स्पष्टपणे वाढू लागते. दिवस मोठे होतात, जीवन पुन्हा गतिमान होते. ऋषींनी हे निरीक्षण हजारो वर्षांपूर्वी केले आणि त्याला सणाचे रूप दिले. म्हणूनच म्हणतात—

“भारतीय सण हे ऋतूंचे शास्त्र आहे. ”

सूर्याचा रथ म्हणजे कालचक्र. तो थांबत नाही, थकत नाही. सिंधू संस्कृतीपासून वैदिक काळापर्यंत सूर्यपूजा अखंड सुरू आहे. कोणार्क व मोढेराची मंदिरे—ठरावीक दिवशी गर्भगृहात प्रवेश करणारे सूर्यकिरण—विज्ञान आणि श्रद्धेचे अद्भुत मिलन दाखवतात.

*कृषी कथा : शेतकऱ्याचा देव*

लोककथांमध्ये सांगतात—एकदा सूर्य अनेक दिवस ढगाआड लपला. शेतकरी चिंतेत पडले. पिके कोमेजू लागली. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सूर्याची प्रार्थना केली. काही दिवसांत आकाश निर्मळ झाले आणि पीक वाचले. तेव्हापासून म्हणतात—

“सूर्य रुसला तर अन्न रुसतं.”

रथसप्तमी शेतकऱ्यासाठी आश्वासन घेऊन येते. थंडी कमी होते, पिकांना बळ येते. म्हणूनच या दिवशी शेतात पूजा, नवीन कामाची सुरुवात केली जाते. “अन्नं बहु कुर्वीत” ही वेदवाणी शिवारात साकार होते.

*विविध प्रांतांतील कथा आणि परंपरा*

तिरुपतीत रथसप्तमीला भगवान व्यंकटेश सर्व वाहनांवर नगरप्रदक्षिणा करतात—देव स्वतः भक्तांना भेटायला बाहेर पडतो, अशी श्रद्धा आहे.

ओडिशामध्ये चंद्रभागा नदीत स्नान केल्यास पापक्षालन होते, असे मानले जाते.

उत्तर भारतात सूर्याला अर्घ्य देताना म्हटले जाते— “हे सूर्यनारायणा, आम्हाला दीर्घायुष्य दे.” 

महाराष्ट्रात पहाटे स्त्रिया म्हणतात—

“सूर्य आला, सोनं आलं, घरात सुख समाधान आलं.”

*उपसंहार*

कथांमधील जीवनदृष्टी

रथसप्तमी हा कथांचा, किरणांचा आणि काळाचा संगम आहे. रांगोळीतील शुभ्र रेषा, गोमयाचा शुद्ध करणारा अग्नी, उतू जाणारे दूध—या साऱ्या प्रतीकांमधून एकच संदेश मिळतो—जीवन भरभरून जगावे.

आज विज्ञान प्रगत झाले असले, तरी सूर्यावरील आपले अवलंबित्व बदललेले नाही. म्हणूनच रथसप्तमी आजही तितकीच अर्थपूर्ण आहे.

“जिथे सूर्य आहे, तिथे जीवन आहे. ”

सप्त घोड्यांचा रथ अजूनही धावत आहे—आकाशात, शिवारात आणि आपल्या मनात. त्या रथाकडे पाहण्याची, त्याच्या प्रकाशात स्वतःला ओळखण्याची संधी म्हणजेच रथसप्तमी!

यावर्षी, २०२६ रविवार २५ जानेवारी दिवशी रथसप्तमी आहे.

*ॐ श्रीसवितासूर्यनारायणाय नमः ।।*

© श्री  दिवाकर बुरसे

१४ जानेवारी २०२६

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन वर्ष म्हणजे… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन वर्ष म्हणजे… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

नवीन वर्ष म्हणजे – – 

खरं पाहिलं तर नवीन वर्ष म्हणजे काही भौतिक बदल नाही. सूर्य तोच असतो, आकाश तेच असतं, आपल्या जबाबदाऱ्या, अपयश, स्वप्नं सगळं कालचं असतं. फक्त कॅलेंडरवरची एक तारीख बदलते. तरीही या बदलाला माणूस इतकं महत्त्व का देतो, याचा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. माणूस तारखांपेक्षा भावनांवर जगतो.

आपण आयुष्यात अनेकदा थकतो. एखादा दिवस वाया गेला की, मनात अपराधभाव येतो. एखादं अपयश बोचत राहतं. पण त्या थकलेल्या मनालाही स्वतःला सावरण्यासाठी एखादा टप्पा, एखादी रेषा हवी असते. नवीन वर्ष ही अशीच एक मानसिक रेषा असते. इथपर्यंत झालं, आता पुढे नव्याने प्रयत्न करू.

खरं तर नवीन सुरुवात करण्यासाठी 1 जानेवारीची गरज नसते. पण तरीही हा दिवस वेगळा वाटतो, कारण तो आपल्या मनाला परवानगी देतो. मागचं ओझं थोडं बाजूला ठेवून पुढे पाहण्याची. सोमवारी, महिन्याच्या पहिल्या दिवशी, किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला जो उत्साह जाणवतो, तो बदलामुळे नाही; तो आशेमुळे असतो.

नवीन वर्ष म्हणजे संकल्पांची यादी नाही. ती पूर्ण झाली नाही म्हणून स्वतःला दोष देण्याचाही तो दिवस नाही. नवीन वर्ष म्हणजे स्वतःशी शांतपणे केलेली एक कबुली मी अजूनही बदलू शकतो. अजूनही शिकू शकतो. अजूनही स्वतःपेक्षा थोडा चांगला होऊ शकतो.

वर्ष बदलतं तेव्हा आयुष्य बदलत नाही, पण आयुष्य बदलण्याची तयारी मात्र मनात जन्म घेते. हीच तयारी महत्त्वाची आहे. कारण माणसाला पुढे नेणारी गोष्ट तारीख नाही, तर नव्या शक्यतेवरचा विश्वास आहे.

येतं वर्ष हे केवळ शुभेच्छांचा औपचारिक सोहळा न राहता, थोडं अधिक प्रामाणिक, थोडं अधिक जागरूक आणि थोडंसं स्वतःकडे वळलेलं ठरो. कालच्या चुका आपल्याला तोडू नयेत, तर घडवाव्यात एवढीच अपेक्षा.

नवीन वर्ष आपल्याला नवा माणूस बनवो, असं नाही;

पण आपल्यातला खरा माणूस अधिक ठळकपणे समोर आणो.

याच भावनेतून नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शिक्षण क्षेत्रातील काही भयावह…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “शिक्षण क्षेत्रातील काही भयावह…” ☆ सुश्री शीला पतकी 

चार दिवसांपूर्वीचे वर्तमानपत्रात एक बातमी वाचली… क्लासेस मध्ये घडलेली घटना… शिक्षक फळ्यावर लिहित आहेत म्हणजे ते पाठमोरे आहेत… इतक्यात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा गळा चिरून टाकला… वर्गात गोंधळ त्या मुलाला दवाखान्यात… तोपर्यंत त्याचा प्राण गेलेला…! इतकी कृरता इतक्या कमी वयाच्या मुलांमध्ये येथे कुठून?

मी या बातमीने खूपच अस्वस्थ झाले. किती भयानक घडायला लागलेल आहे आणि हे एक दिवशी घडणार याची मला खात्रीच होती. कारण मी जी नापास शाळा चालवत होते त्यामध्ये येणारी सगळी मुलं ही आगाऊ खोडकर त्रास देणारी कोणती शिस्त नसणारी बेफिकीर असत. त्यांना शिकण्याची इच्छाच नसते. आई-वडिलांनी शाळेत डांबलेली मुले. कित्येक शाळेतून शिक्षकांचे मला फोन नाही आलेत की या मुलाला घेऊ नका फार त्रासदायक मुलगा आहे पण मी चॅलेंज म्हणून अशी मुलं स्वीकारायची आणि त्यांच्या चांगले बदल घडवून आणत होते. काही मुले मुळतः चांगल्या घरातून आलेली होती संस्कारी होती पण ही जी बेफिकीर मुले होती त्यांच्या खोड्यांना सुद्धा मर्यादा होत्या. काहीतरी चांगलं दिलं तर ऐकण्याची वृत्ती होती. आजकाल तसे राहिले नाही साधारणपणे 19-20 सालची घटना असावी.. इंग्रजीचे शिक्षक फळ्यावर एक मोठं वाक्य लिहीत होते. म्हणजे साधारण एक 30-40 सेकंद ते वर्गाला पाठमोरे… इतक्यात एका मुलाने समोरच्या मुलाचे डोळे बंद केले… दुसऱ्याने तोंड दाबले आणि दोघांनी त्याला बेदम मारले. हे अवघ्या काही सेकंदात घडले. शाळा सुरू झाल्यानंतर ची घटना… मुख्याध्यापकांचा मला फोन आला तातडीने मी घरातून शाळेत गेले. ज्याला मारलं होतं तो मुलगा खूप रडत होता त्याला मी जवळ घेतलं कुठे खूप लागलय का याची दखल घेतली पण सुदैवानं तोही दणकट असल्याने फारसा परिणाम झाला नव्हता. पण मी मात्र हाबकून गेले. मन विचार करायला लागले ह्या मुलाला जर काही झालं असतं तर…! हा सगळा जिवानिशीचा खेळ आहे… दिवसेंदिवस मुलं वाईट व्हायला लागलेत. एके दिवशी एका मुलाने दोन कबूतरच विकत आणली आणि ती शाळेत ठेवली शाळेच्या आवारा बाहेर पार्किंग मध्येएका खोक्यात.. त्यातून आवाज आल्यामुळे सगळ्याकडे हलकल्लोळ की आत नेमकं काय.. मग ती ज्याचे कबूतर होते त्याने मान्य केले की आपणच तो बॉक्स तिथे ठेवलाय आणि कबूतर हे प्रकरण काय आहे… तर काही ग्रामीण भागातील मुले अशी कबुतरे पकडून आणून विद्यार्थ्यांना विकतात त्याचे पैसे पूर्ण झाले नाही की मग बाहेर मारामाऱ्या होतात हे सगळे मोठे रॅकेटच होते त्यापैकी एका विद्यार्थ्याला ठार मारल्याचे ही मी वर्तमानपत्रात वाचले होते. अर्थात ही अन्य ठिकाणी घडलेली घटना होती… त्यानंतर वर्गात बसल्या बसल्या पटकन शेजारच्या मुलीचा हात पकडायचा नको त्या गोष्टी करायच्या आणि मित्राने त्याचा फोटो काढायचा हे तर अजूनच भयानक होतं… माझ्या कल्पनाशक्ती पलीकडचे सगळे खेळ चालले होते… त्या दिवशी ठरवलं ही शाळा आणि हा उपक्रम बंद करायचा कोणाचातरी भलं करायला जाण्यासाठी इतकी मोठी रिस्क आपण आपल्या आयुष्यात पत्करायची नाही. त्यानंतर कोविड मुळे हे काम आपोआपच बंद पडले मुलं नापास होण्यास बंद झाले आता ह्या अधोगतीला सुरुवात कुठून झाली पहा!

अनेक वर्षांपूर्वी पहिली ते चौथीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही असा शासनाचा नियम निघाला. शाळातून फतवा गेला आणि मग सुरू झाली अभ्यासाच्या अधोगतीला…! नापास होणार नाही म्हणल्यावर पालकांचे लक्ष कमी शिक्षकही तितक्या चांगल्या पद्धतीने काम करेनात कारण सगळे शेवटी रिझल्ट ओरिएंटेड असतं ना तो काय लागणार आहे नक्कीच माहीत होते त्यामुळे मेहनत करण्याची काही गरज भासली नाही. पालक निवांत… शिक्षक निवांत.. त्यामुळे विद्यार्थी बेदरकार बनत चालले. त्यापेक्षा चांगला शब्द होईल बेलगाम बनत चालले. चौथीतून आलेला गाळ वरती शिकवताना म्हणजे पाचवीच्या शिक्षकाला फारच त्रासदायक होऊ लागला. कारण त्याला लिहिता वाचताच येत नव्हते… लिहिता वाचता न येण्याची सुरुवात येथे झाली मग आम्ही वरती म्हणजे हायस्कूलला असे विद्यार्थी वेगळे करून तुकडी वेगळी केली आणि त्याच्यावरती वर्षभर विशेष प्रयत्नाने लिहा वाचायला शिकवायचे असे ठरले… पण तरी पाचवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे होते ना त्यामुळे तिथे यथातथाच काम झाले. राजकीय लोकांना शिक्षणाने शहाणे झालेले लोक नकोच होते. त्यामुळे आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही हा नियम निघाला. चौथीपर्यंतचे वाटोळे झाले होते आता आठवीपर्यंत झाले!

अभ्यासाची भीती नाही अभ्यासक्रम शिकवण्याचे वेगळेपण नाही सगळे निवांत झाले सरकारी काही कामात आठवीपर्यंतचे शिक्षण कंपल्सरी झाले माझ्या नापास शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला येणार्‍यांची संख्या वाढली शाळेत येऊ शकत नाही पण परीक्षाला 17 नंबर फॉर्म भरून बसतो असे सांगणारे खूप लोक येऊ लागले कारण गाडीचे लायसन रिक्षाचं लायसन अन्य काही ठिकाणी किमान आठवी पास पाहिजे हा नियम निघाला आता तुम्ही शाळेत आला नाही तर पास कसे होणार? त्यावर त्यांचे उत्तर काय तर… दहावी नापास झाल्याचे सर्टिफिकेट आहे म्हणजे आठवी पास आहेच की त्यामुळे आम्हाला लायसन मिळण्यास कोणती अडचण येत नाही. मी डोक्याला हात च लावून घेतला…! काही कर्ज मिळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ लागला… हे सर्व गणित ग्रामीण भागातल्या शाळांवर असतं कारण ही सगळी तयारी ग्रामपंचायत पासून असते… मला आठवते मध्यंतरी आमदारकीला उभं राहण्यासाठी दहावी पास ची आवश्यकता होती आणि सोलापुरातील एक आमदार एका ग्रामीण सेंटरला जाऊन बसून पास झाले होते. शिक्षणाक्षेत्रातल्या या घडामोडी आणि बदल या घटना राजकीय क्षेत्राशी निगडित असतात. त्यामुळे आठवीपर्यंतची मजल पुढे सरकत सरकत… नववीला नापास होणाऱ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असे ठरले. म्हणजे त्यांना लगेच दुसऱ्यांदा संधी द्यायची महिनाभर त्यांचे वर्ग घ्यायचे. आता मला सांगा उन्हाळ्याची सुट्टी सोडून यांचे वर्ग कोण शिक्षक घेत बसतो? त्यामुळे नववीत हजर असणारे सर्व उत्तीर्ण घोषित होऊ लागले…! आता यांना रोखणारा एकच वर्ग उरला तो म्हणजे इयत्ता दहावी ची बोर्ड परीक्षा ती तरी त्याचं खरं परीक्षण करेल असं वाटलं होतं… पण बोर्डाने शंभर मार्काच्या पेपरच्या ऐवजी 80 चा पेपर आणि 20 मार्क तोंडी परीक्षा किंवा इतर काम याला द्यायला सुरुवात केली… शाळा कशाला त्याला कमी देतायेत वीस पैकी 20! मग पास होण्यासाठी उरले फक्त पंधरा मार्क ते तर पहिल्या गाळलेल्या जागा जोड्या लावा यात सहज मिळून जायचे आणि बोर्डाचा रिझल्ट लागला 98% दोन टक्के…! अनुपस्थित विद्यार्थी नापास म्हणजे तळापासून वर पर्यंत विद्यार्थ्यांचा पायाच उखडून टाकण्यात आला. त्यामुळे वाचायला न येणारे विद्यार्थी लिहायला न येणारे विद्यार्थी तुम्हाला आढळतील आणि मग सामान्य माणसं म्हणत राहतात दहावी झालाय पण वाचता सुद्धा येत नाही हे कसले शिक्षण…? काहीच शिकवत नाहीत शिक्षक…! सरकारी नियमच असे आहेत… फक्त दहा वर्षाची हजेरी लावा आणि सर्टिफिकेट घेऊन जा… पालकांनाही वाटत नाहीये की आपल्या मुलाला काही आले पाहिजे. आता जे पालक सुज्ञ आहेत त्याला मुलाचे खऱ्या अर्थाने भवितव्य घडवायचे आहे ते मात्र जाणीवपूर्वक त्या मुलावर काम करतात आणि ती मुलं हुशार निघतात शिक्षणात पुढे जातात.

माझ्या शाळेतल्या मुलांचे रेकॉर्ड आहे बरेचसेच विद्यार्थी हे कॉन्टॅक्टर् झालेले आहेत ठेकेदार झालेले आहेत मुकादम झालेले आहेत सरकारी क्षेत्रातली टेंडर यांच्या नावे फुटतात यातील काही राजकीय नेतेही झाले आहेत व्यावसायिक झाले आहेत अर्थात काही उत्तम नोकरदार व्यावसायिक सुद्धा झालेले आहेत पुढील शिक्षण नाही म्हणून त्यांचे काही अडले नाही… शिक्षणाने माणूस घडतो का? हा प्रश्न मला पुन्हा नव्याने पडू लागला… अर्थात त्याचे उत्तर माझ्यासारख्या विवेकी माणसाला मिळाले…! कारण तुम्ही कितीही मोठे झालात तरी शिक्षणाबरोबर मिळणारे ज्ञान आणि संस्कार यांनी तुम्ही खरे माणूस होता अर्थात ते योग्य दिले गेले असतील तर…! यासाठी शिक्षणाचा जो त्रिकोण सांगितला आहे पालक शिक्षक आणि विद्यार्थी त्या त्रिकोणामध्ये काम होण्याची गरज आहे. विद्यार्थ्याला शिक्षणाची लालसा पाहिजे… पालकांना वेळ काढून लक्ष देण्याची गरज आहे… आणि शिक्षकाला शिकवण्याविषयी आस्था हवी… हे तिन्ही घटकात कमी असल्यामुळे शैक्षणिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. गुंड प्रवृत्तीची… खलनायकी वृत्तीची.. मुले तयार होत आहेत. आणि त्यामुळे समाजामध्ये गुंडगिरी बलात्कार खून मारामाऱ्या ह्या गोष्टी वाढल्या आहेत. यामध्ये समाजाचेही काम आहे सरकारचे हे काम आहे की आपण येणाऱ्या पिढीसमोर काय आदर्श ठेवतोय सरकार गुंडांना पाठीशी घालत असेल सत्तेत येण्यासाठी ठाऊक असलेल्या गुंडानाही प्रवेश देत असेल.. मूल्यावरची गणिते सोडुन आकड्यावरची गणिते मांडत असेल… तुरुंगातून सुटून आलेल्या गुंडांच्या मिरवणुका निघत असतील.. हार तुरे यांनी त्यांचे स्वागत होत असेल आणि आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या शेजारी ते सन्मानाने बसताना दिसत असतील तर समाजातील आज निरागस असलेल्या मुलाने घ्यावे तरी काय सगळेच विचाराच्या पलीकडे चालले आहे!!! अर्थात सगळे संपले आहे असे कधी होत नाही भारतीय संस्कृतीत तरी नाहीच नाही… अजूनही काही दिलासादायक उदाहरणे आहेत तीच या देशाला तारतील आणि आमच्या अस्वस्थ मनाला दिलासा देतील अशी सद्भावना व्यक्त करण्यापलीकडे आपण तरी आता काय करू शकतो…? यासाठी समाजातील अनेक घटक ही जबाबदार आहेत सामाजिक परिस्थिती चित्रपट मोबाईल सोशल मीडिया पण या इतक्या सगळ्या घटकांवर एका लेखात लिहिणे शक्य नाही त्यामुळे फक्त पायाभूत गोष्टी मांडल्या आहेत.

© सुश्री शीला पतकी

निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिल्टी माइंडस्… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ गिल्टी माइंडस्…  ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

गिल्टी माईंड्स – – 

 – – बोध आणि शोध अपराधी मनोवृत्तीचा!

या वेब सिरीजच्या नावाने लक्ष वेधून घेतलं होतं पण एकूण त्या नावाचा जो आशय आहे त्यावरून यामध्ये प्रचंड खून खराबा, किंवा अश्लीलता असेल की काय असं वाटत असल्याने बऱ्याच आधीपासून नोटिफिकेशन्स आले तरी पाहिली जात नव्हती. शेवटी एकदा एखादा एपिसोड बघूया आणि मग ठरवूया असं म्हणून या शीर्षकाने खेचून घेतलं आणि वेब सिरीज बघायला सुरुवात झाली.

आजकाल कोणतीही वेबसिरीज बघायची झाली तर तुम्हाला अश्लीलता, खून हिंसा आणि अल्कोहोलिकता याचा सामना करावाच लागतो. अगदी काही कौटुंबिक वेब सिरीज सोडल्या तर जवळपास प्रत्येक वेब सिरीजचा हा एक अपरिहार्य भाग असल्याप्रमाणे झालं आहे. हे असं का आहे हा प्रश्न पडणारी व्यक्ती म्हणजे जणू आजच्या काळातली मागासलेली ठरावी अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात फार काही हशील आहे असं वाटत नाही. तर असो.

मूळ मुद्दा हा आहे की ही वेबसिरीज त्याला अपवाद आहे. म्हणजे यात हिंसा, क्रौर्य किंवा अल्कोहोलिकता, वगैरे नाही असं नाही. परंतु त्याचं प्रमाण अतिशय मर्यादित आहे. ही एका कोर्टाच्या कामकाजावरती केंद्रित अशी वेबसिरीज आहे. त्यामुळे अर्थातच यामध्ये काम करणाऱ्या सर्व पात्रांचा वकीली हा व्यवसाय दिसतो. आणि वकिली म्हटलं की गुन्हा आला, आरोप आले, प्रत्यारोप आले, डावपेच आले, शिक्षा आली, कायदा आला. हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे पण बरंच वास्तवदर्शी आहे. कथानकात, मांडणीत कुठेही भाबडेपणा नाही. अतिरंजितता नाही आणि हे थोडेसं कौतुकास्पदही वाटलं. खरं म्हणजे यातले कित्येक प्रसंग असे आहेत की जे खूप लाऊडसुद्धा करता आले असते परंतु वास्तवदर्शी चित्रण करण्याचा हेतू असल्यामुळे असेल ते जेवढ्यास तेवढ्या प्रमाणामध्ये दाखवले गेले आहेत. आणि म्हणून ते जास्त परिणामकारक ठरले आहेत. इथे व्यक्ती आणि समाज म्हणून घडणाऱ्या गुन्ह्यांमागची मानसिकता आपल्याला जास्त विचार प्रवृत्त करते.

दुर्दैवाने आज गुन्हेगारी हा विषय आपल्याला नवीन नाही. समाजात दिवसातल्या 24 तासात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे गुन्हे घडत असतात. त्यातल्या काही मोजक्याच गुन्ह्यांची नोंद केली जाते. त्यातल्याही काही मोजक्या गुन्ह्यांवर खटले चालवले जातात. आणि त्यातल्याच काही मोजक्याच खटल्यांचा योग्य प्रकारे निकाल लागतो. याची आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पुरेपूर कल्पना आहे. ती कल्पना किती बरोबर आहे हे या वेब सिरीजमधून चांगल्या प्रकारे अधोरेखित होतं.

मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे हा की वकिली व्यवसायाकडे एका वेगळ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं जाण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे असं म्हणता येईल. आणि या वेबसिरीजचं शीर्षकच ही मानसिकता चपखलपणे मांडतं.

एकामागे एक येत जाणाऱ्या केसेस, ते सोडवत जाणारे वकील, त्यांचे प्रत्यक्षातले एकमेकांशी असलेले संबंध, एकीकडे कायद्याची बुज राखण्याची त्यांची मनापासून चाललेली धडपड, दुसरीकडे काही सामाजिक आणि राजकीय दबाव यांच्यातून घ्यावे लागणारे निर्णय अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती खरा न्याय हा कसा कोंडीत पकडला जातो ते यातून प्रभावीपणे दिसतं.

गुन्हा करणारा माणूस आहे, त्याला वाचवणारा आणि त्याला शिक्षा ठरवणारासुद्धा माणूस आहे ही सगळी माणसं आहेत समाजात वावरणारी, सामाजिक नीतिनियम यांची पुरेशी कल्पना असणारी, काही प्रमाणामध्ये साक्षर, काहींना तर कायद्याच्या वाटा आणि पळवाटाही माहित आहेत अशी, तरीही त्यांच्याकडून स्वार्थी भावनेतून गुन्हे घडतात. आणि त्यातून वाचण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण हा प्रयत्न सुरू असताना एका वकिलाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, वैचारिक आंदोलन, त्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी यासुद्धा खूप छानपणे यातून मांडलेल्या आहेत. इथे वकिलातला माणूस आणि माणसातला वकील दोन्हीही प्रभावीपणे दिसतात.

या वेब सिरीजमध्ये प्रत्येक भागामध्ये वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे आणि विशेष म्हणजे वेगळ्या पातळीवरचे जणू काही भविष्यकाळात घडू शकतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद या वेब सिरीजमध्ये घेण्यात आलेली आहे. इथे गाण्याच्या कॉपीराईटचा प्रश्न आलेला आहे. इथे आयव्हीएफ तंत्रज्ञान मध्ये केले जाणारे घोटाळे आलेले आहेत. व्हिडिओ गेमच्या माध्यमातून हिंसा करायला प्रवृत्त होणारी तरुणाई इथे आली आहे. स्वयंचलित मोटार मुळे निर्माण होणारा अपघात आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत इथे आहे. म्हणजे चालू आणि पुढील आधुनिक काळामध्ये घडू शकतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार यात प्रामुख्याने केलेला दिसतो. आणि हेच मला या वेब सिरीजचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे असं यश वाटले. शिवाय प्रत्येक केसमध्ये भाबडेपणाने काव्यगत न्याय न देता कायदा हा पुरेशा पुराव्यांवरच चालतो हे मांडलं आहे. मग तो गुन्हा कितीही गंभीर स्वरूपाचा का असेना. आणि अनेकदा जिंकू पाहिलेली केस एखाद्या पुराव्याने हरवू शकते तर एखादी हरू पाहणारे केस ही योग्य त्या प्रकारे जिंकताही येते हे अतिशय स्पष्टपणे दाखवलेले आहे.

यातली सर्व पात्रे अतिशय उत्तम रीतीने आपापल्या भूमिकेनुसार चोख वागतात. कारण अशा भूमिकांमध्ये संयम बाळगणे हे खरंच कठीण आहे. भूमिकेचा तोल चुकूनसुद्धा एखाद्या विशिष्ट विचाराकडे झुकू शकतो आणि त्यातून त्या पात्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. या सर्व भूमिका ग्रे शेड्समध्ये आहेत कारण वकील असो की न्यायाधीश त्याला अनेकदा अनेक गोष्टींकडे केवळ पुराव्या अभावी कानाडोळा करावा लागतो आणि निर्णय घ्यावे लागतात. इथे भावनांपेक्षाही कर्तव्याला आणि समोर उपलब्ध असलेल्या पुराव्याला महत्त्व आहे हे दाखवताना कमालीचा संयम मला यात आढळला.

यातले मुख्य कलाकार, उप कलाकार कोण या सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च केल्यावर नक्कीच मिळतील त्यामुळे त्या मी इथे देत नाही. मात्र सर्व कलाकारांचं काम हे वाखाणण्याजोग झालं आहे.

प्रत्येकाने तुम्हाला हिंसा आवडत असो अगर नसो गुन्हेगारीबद्दल वाचणं पाहणं आवडत असो नसो ही वेब सिरीज एकदा पहावी असं माझं सांगणं आहे. त्यावरून साधारणपणे गुन्हा काय असतो, गुन्हेगाराची मानसिकता काय असते, खटले कसे दाखल होतात, वकील कशा प्रकारे विचार करतात, आणि एकूणच ज्या सामाजिक जगतात आपण जगतो, ज्या कायद्याच्या आधारे आपण जगू पाहतो आहोत, सुरक्षितता बाळगू पाहतो आहोत तो कायदा नक्की कसा वागतो. त्याचा कसा वापर होतो. याचे उत्तम उदाहरण देणारी ही वेब सिरीज आहे. त्यामुळे जरूर जरूर पहा.

– – या वेब सिरीजला जर रेटिंग द्यायचं झालं तर माझे पाच स्टार्स नक्की असतील.

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – १ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – १ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

” नीले, उद्या मी आणि आप्पा येतोय सोलापुरला.. येताना काय आणू मिरजेहून? ” – वहिनीचा खणखणीत आवाजातला प्रश्न..

आप्पा म्हणजे खरंतर प्रशांत, माझा एकुलता थोरला भाऊ… पण त्याकाळच्या पद्धतीला तंतोतंत अनुसरून… चुलत नि सख्ख्या भावांना अनुक्रमे तात्या, भाऊ, अण्णा, आप्पा, आबा अशी संबोधनं बहाल केलेली.. आप्पाची बायको स्वाती.. माझी वहिनी.. आईबाबांनंतर या दोघांनी माझं मातृ-पितृत्त्व स्वत:कडे घेतलेलं… म्हणूनच प्रत्येकवेळी माझ्याकडे येताना हा प्रश्न… उपचारापुरता…

खरंतर बसाप्पाची बर्फी, पेढे, खाजा, चुरमुरे आणि भलीमोठी ताजी भाजी त्यांच्याबरोबर येणार.. हे ठरलेलं..!! .. “ बाकी काही नको… फक्त लालमाठ आण”

दुसरे दिवशी हिरवीगार मेथी, कोवळा शेपू, पातळ पानांचा चाकवत, लालबुंद गाजरं, फिकट हिरव्या रंगावर पांढऱ्या नक्षीने सजलेली कृष्णाकाठची कोवळीझार वांगी नि लाल डाळिंबी रंगांची कोवळी पानं ल्यालेला ” तांबडा माठ ” अशा ” अवघ्या विठाई ” नं माझं स्वयंपाकघर उजळून निघालेलं…!!

” नुसतं बसणं म्हणजे पाप ” या विचारावर ठाम असलेली माझी वहिनी ” भाज्या निवडूनच ठेवूया लगेच ” म्हणत फरशीवर मांडी ठोकून बसलेली… — नि माझं मन केंव्हाच चाळीस वर्षे उलटा प्रवास करून मिरजेच्या घरात आईला शोधत पोहोचलेलं..!!

अगदी बाळबोध दिवस होते ते! – – आपलं घर, आपली माणसं, आपलं गाव, शाळा, मैत्रिणी, नातेवाईक.. लग्नकार्य, फक्त सुट्टीत गावाला म्हणजे मामा, मावशीकडे जाणं… एवढं चिमुकलं विश्व.. आनंदाच्या आकाशगंगेतलं!!

सकाळचा नाष्टा असा नसायचाच… असायचं ते खाणं… तेही भूक लागलेली असेल तरच… शिळ्या भाताचा तव्यावर परतलेला फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा गूळ, तूप घातलेला लाडू किंवा कांदा घालून केलेली फोडणीची पोळी, आदले दिवशीची भाकरी उरलेली असेल तर दही, दूध, खाराची मिरची घालून केलेला दहीकाला, दहीपोहे, दूध पोहे, नागपंचमीच्या आसपासचे दिवस असतील तर दूध-लाह्याचं पीठ, भाजकी कणिक नि दूध आणि अगदीच काही नसेल तर आईनं करून ठेवलेला किंवा कुणाकडून तरी आलेला एखादा रव्याचा, बेसनाचा, राजगि-याचा लाडू..!!

पोरावळ, आलं गेलं, कामाच्या रगाड्यात अक्षरश: पिचलेल्या आयांची मजल यापलीकडे जाऊच शकायची नाही.. उद्या ब्रेकफास्टला काय करावं याचा विचार करणारी आजची स्टायलीश आई आणि इडली-सांबार, मेदूवडे, डोसे, पराठे, ऑम्लेट्स, सॅंडविचेस, ओट्स, उपमा, पोहे, फ्रूट्स, फ्रूट्स ज्युसेस असे अनंत पदार्थ काचेच्या टेबलावर मांडून मुलांना खाण्याचा आग्रह करणारी नि इडली आवडत नाही तर ऑम्लेट खा.. असं गोडीने विनवणारी मेकअप नि सुंदर कपड्यातील ती नाजुकशी आई टी. व्हीवर पाहिली की मला अक्षरश: रडू येतं… नि वाटतं ” अशीच आमुची आई असती तर…? “

” जे घरात आहे ते खायचं!! ” या ब्रिदवाक्यावर नि ” नाही खाल्लं एखादे दिवशी तर लगेच काही मरत नाही ” या प्रबळ विश्वासावर आमच्या काळच्या आयांनी आमचं संगोपन केलं… म्हणूनच ” मुलं भाज्या खात नाहीत तर काय करू? ” असले प्रश्न आमच्या आयांना कधी पडले नाहीत. आणि ” पराठे, कटलेट्स, थालीपीठ, वडे असे पदार्थ करून त्यांत न आवडणा-या भाज्या घाला ” अशी उत्तरंही कधी मिळाली नाहीत.

” भूक लागली की मुलं आपोआप खातात नि एखादं जीवनसत्त्व कमी पडलं ते मिळवण्यासाठी शरीर आपोआप ते जीवनसत्त्व असलेल्या भाज्या, फळं मागून घेतं..!! “.. या आई -आजीच्या सल्ल्यावर नि निसर्गाच्या कर्तृत्त्वावर श्रद्धा ठेवून मुलांना वाढवणा-या आमच्या आयांच्या विश्वासाला आमच्या पिढीनेही तडा जाऊ दिला नाही.. बोर्नव्हिटा, कॉम्पलान किंवा सप्लीमेंट्स न घेताही आमची छान वाढ झाली!!

अमावस्या, पौर्णिमेला पोळी… इतरवेळी रोज भाकरी… यात डाएट किंवा कॅलरीच्या हिशोबाचा गंधही नव्हता.. ज्वारी स्वस्त होती नि भाकरीला तेल लागायचं नाही… एवढ्याच आर्थिक हिशेबात बसणारं हे पोळीभाकरीचं गणित महिना कमी खर्चात पार पाडायचं!

डावीकडे शेंगा, जवस, लसूण, कारळे यांची सुकी चटणी, सणावाराला ओल्या खोब-याची चटणी, पाहुणे आले तर वर्षभरातील साठवणीतलं लिंबू, कैरी, मिरची यांचं लोणचं, काकडी/गाजर/बीट/कोबी यांची कोशिंबीर-कधी दह्यातली तर कधी लिंबू पिळून, कधी भोपळ्याचं नाहीतर वांग्याचं भरीत, वांगी/गवार/.. घेवडा/ कोबी/भोपळा/पडवळ/ तोंडली/कारली/दोडका इ. पैकी भाजी, आमटी/कढी आणि भात… नेहमी साध्या जाड्या तांदुळाचा आणि सणावाराला इंद्रायणी किंवा आंबेमोहराचा..

भातावर, पोळी -भाकरीवर आमची आई तूप मात्र आवर्जून वाढत असे… जेवणानंतर ताक न चुकता…

बाकी लोण्या-दह्याचे चोचले फक्त बाजरीची भाकरी, चकली, थालीपीठ, धिरडी यांपुरते!! उप्पीट, शिरा, पोहे, धिरडी, थालिपीठे, उकड.. हे पदार्थ संध्याकाळच्या खाण्यासाठी राखून ठेवलेले… पण मर्यादित… एखादी बशी भरून…

भाकरी, पालेभाज्या, पिठलं नि मूगडाळीची खिचडी रात्रीला आंदण दिलेली..

पक्वान्ने, मसालेभात, असे चविष्ट पदार्थ नि भजी पापडांसारखे तळणाचे पदार्थ सणा-समारंभांपुरते… जिभेच्या चोचल्यांसाठी नाहीत..

साबुदाणा खिचडी, बटाट्याचा चिवडा, राजगिरा लाडू, खजूर, शेंगदाण्याचा लाडू, केळी, चिक्कू, सफरचंदासारखी फळे.. दही, यांची बेगमी उपवासापुरती… एकादशी, महाशिवरात्र नाहीतर आई, आजीच्या उपवासादिवशी मिळणा-या चार चमचे साबुदाण्याच्या खिचडीची चव दिवसभर जिभेवर रेंगाळायची..

आईच्या नाजुक हातांनी भरवलेला मऊ गुरगुट्या गरम गरम मेतकूट-भात नि लिंबाचं लोणचं, लापशी, मऊसर सांजा, साजुक तुपातला शिरा, घसा शेकून देणारी उकड, तोंडाला चव यावी म्हणून कमी तेलातलं भरपूर लसूण घातलेलं धिरडं, खडीसाखर, काळे मनुके, मोसंब्याचा रस फक्त आजारपणात… म्हणूनच “पडू आजारी मौज हीच वाटे भारी “

इतर वेळेला मात्र शाळेत जाताना गडबडीत कसाबसा बोटांना पोळत तोंडात कोंबलेला वरण भात नि डब्यातली थंडगार पोळी नि गोळा झालेली, अनेकदा दप्तराला नि वह्या पुस्तकांना तेलाने अंघोळ घालणारी भाजी… नि लोणचं!

आईनं डबा भरून करून ठेवलेला पातळ पोह्याचा चिवडा, भडंग… कुठल्यातरी देवापुढे फोडलेल्या नारळापासून बनवलेले रव्याचे लाडू, नारळाच्या वड्या नाहीतर… बेसनाचे लाडू…

आई गावाला गेलेली असताना आम्ही दोघी बहिणींनी बनवलेले तेल, तिखट, मीठ लावलेले पोहे किंवा चुरमुरे… किंवा चुरमु-यात कांदा, कोथिंबीर नि चिंचेचं पातळ पाणी घालून केलेली नि आम्ही तिघा भावंडांनी मिटक्या मारत खाल्लेला तो भेळ नामक आंबटचिट्ट दिव्य पदार्थ (फरसाण, शेव विरहित)

अशा या नीरस खाद्ययात्रेमुळेच आम्हाला चिवडा, चकली, लाडू, अनारसे, शेव नि दिवाळी संपल्यावर बनणा-या मिसळीमुळे दिवाळीचे वेध लागत..

कधीतरीच होणारा मैत्रिणीचा वाढदिवस, वर्षातून एखाद-दुसरं होणारं कुणाचं तरी लग्न, पाहुण्यांकडची सुट्टी, घरातले सण-समारंभ अगदी श्राद्ध -पक्ष सुद्धा… यांचं फार आकर्षण वाटे … कारण या दिवशी वेगळ्या चवीचे, वेगळे खाद्यपदार्थ थोड्याशा चमचमीत स्वरूपात खायला मिळत…

हॉटेलच्या चमचमीत, चवदार चवीची चटक लागलेल्या नि कधीतरीच घरचं अन्न खाणा-या आजच्या पिढीला आमचं हे आकर्षण समजणारच नाही…

भरपूर आलं- लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण घालून केलेला बटाटा, फ्लॉवरचा रस्सा, भरली वांगी, डाळकांदा, वरणफळं किंवा चकोल्या, दगडासारखी झालेली असली तरी वेगळ्या चवीची इडली, तव्याशी झटापट करून तुकड्या-तुकड्याची गॅंग म्हणून जन्म घेणारा तथाकथित डोसा, टोमॅटो सार, केवळ भाज्या घातल्या आहेत म्हणून ज्याला पुलाव म्हणायचं असा बेचव भात… अशा पदार्थांनीही आमच्या ओसाड खाद्यजीवनात मरुस्थळं फुलवलेली आहेत…!!

रोजच्या पोळी भाकरी, भात, आमटीच्या त्याच त्याच चक्रात एकच गोष्ट वेगळेपणा आणायची –ती म्हणजे भाजी! रोजचं जेवणं बाकी सगळं तेच भाजी मात्रं वेगळी!!

त्या काळची भाजीही त्या काळासारखी शुध्द असे.. स्वत:ची चव, स्वत: चा रंग, स्वत:चा स्वाद.. स्वत:चं अस्तित्त्व राखणारी… आजच्या पंजाबी भाजीसारखी स्वत:ला कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, काजू यांच्या ग्रेव्हीत स्वत:ला समर्पित करून स्वत:ची ओळख संपवणारी नव्हे किंवा सोया-टोमॅटो किंवा व्हाईट सॉस, चीज अशा चिकचिकाटात स्वत:ला गुरफटवणारी चायनीज किंवा कॉंटिनेंटलही नाही…

कढईत टाकली की अख्ख्या गल्लीभर बातमी पसरावी अशी शेपूची भाजी मग ती डाळ घालून केलेली असो, पीठ पेरूनची असो नाहीतर वरणातली… माझ्यासारखा शेपू आवडणारा भाकरी नि शेपूच्या भाजीवर ताव मारेल किंवा न आवडणा-याला त्या दिवशी उपवास घडेल..

तुरट चवीचा नवलकोल… पादवायुसारख्या वासाचा.. तोही कुणाला तरी आवडणारा..

डाळ घालून कोबीची भाजी नुसतीही खावी अशी..

भरपूर ओल्या खोब-यातल्या मिरची, आलं घालून केल्या फ्लॉवरच्या भाजीला पोळीशिवाय मजा नाही.

भाजणी पेरून केलेली असो किंवा वाल घालूनची असो… पडवळाची भाजी मला आवडतेच..

श्रावणघेवड्याला मटकी नि आमसूल हवेच… पण त्याची लिंबू, ओले खोबरे घालून पचडी सरस…

गवारीला ओव्याशिवाय स्वाद नाही नि लाल भोपळ्याला मेथीशिवाय गंध नाही..

दुधीची भाजी ही निव्वळ फसवणुक आहे.. पण त्याच्या कापाला मात्रं तोड नाही..

भेंडी लहान मुलांना का आवडते, हे एक मोठं कोडं आहे..

दुस-याच्या मदतीशिवाय पानही न हलणारं वांगं.. मात्र त्यात भरलेल्या मसाल्यामुळे मिरवून घेतं.. कांदा, मसाल्यामुळे भरीताच्या रुपात आवडून जातं नि डाळवांगं म्हणूनही भाव खातं.. नशीबवान कार्टं..!!

पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…

– क्रमशः भाग पहिला

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग १ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग १ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

हा विषय म्हणलं तर सोपा आहे म्हणलं तर फार कठीण. कारण अध्यात्म हा धार्मिक विषय नाही ती एक जीवनशैली सांगते. हिंदू हा सुद्धा धर्म नाही माणसांनी समाजात, निसर्गात, वातावरणात कसे वागावे म्हणजे आजच्या भाषेत आपली लाइफ स्टाईल कशी असावी हे सांगितले जाते. म्हणूनच कदाचित अध्यात्म हे हिंदू धर्मातील काही विशेष आहे असा गैरसमज समाजामध्ये रूढ झाला आहे. अध्यात्म हे कोणत्याही जाती, धर्माने अवलंबवlवे किंवा जोपासाव. त्यास भेदभाव नाही. मुळात अध्यात्म एका धर्माची, ज्ञातीची, समाजाची मक्तेदारी नाही. मग अध्यात्म म्हणजे आहे तरी काय? त्याचा विस्तार किती? आणि ते कोणते जीवनशैली माणसाला शिकवते? हा सहज प्रश्न पडतो.

अध्यात्म या शब्दाची फोड दोन प्रकारांनी करता येते.

१) आधी + आत्मा. म्हणजेच स्वतःच्या आत्म्याची ओळख आधी करून घेणे. आणि २)आद्य अधिक आत्मा. आद्य म्हणजे प्रथम. प्रथम आपण आपल्याला ओळखायला शिकले पाहिजे. (संदर्भ यूट्यूब)याचा अर्थ आधी स्वतःला ओळखा, आत्मशोध घ्या. मी कोण आहे म्हणजेच अर्थात मी ईश्वराचा अंश आहे. आपण एक माणूस म्हणून, ” मी” कसा आहे याचे उत्तर शोधा. ते उत्तर मिळाले की पुढे आपली आपल्याला सुधारणा करता येते. यातूनच आपण आपले आयुष्य नेमके कसे जगणार आहोत याची पूर्व रेषा मनामध्ये हळूहळू तयार होईल. त्यातूनच जीवन जगण्याचा उद्देश मनात ठसेल, लक्षात येईल. त्यामुळे भावभावनांबाबत स्थितप्रज्ञता येइल. निर्भय जीवन जगणे, आत्मसन्मानाने जगणे, लोकांप्रती नि:स्वार्थ सेवा आणि प्रेम, बंधुभाव तयार होऊन जीवनात सकारात्मक दृष्टी प्राप्त करून घेणे त्यातून आनंद मिळवणे आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे हे फक्त माणसातील व्यवहारातच नसून संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे, अवघ्या चराचरावर अशी माया निर्माण करणे असे प्रगटीकरण माणसांमध्ये दिसून येईल.

आता प्रश्न असा की एवढे अध्यात्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय? मुळात अध्यात्म म्हणजे काय हे आपल्याला समजल्याशिवाय आपण ज्येष्ठांची काळजी का, कशी घ्यायची याचा उलगडा होईल. अर्थात इथे अनेक जण असे असतील की ते आपल्या आई-वडिलांची उत्तम काळजी घेत आहेत तेही ” हा विषय लक्षात न घेता किंवा न समजता. म्हणजे खऱ्या अर्थाने ते ‘अध्यात्म ‘जगत आहेत. आपल्या घरातील विस्मरण झालेले लोक पूर्वी ”normal” होते. पण कालांतराने वाढत्या वयाबरोबर त्यांच्या मेंदूतील स्मरणाच्या पेशी काम करेनाशा झाल्या. अशा पेशी (हृदय मेंदू)यातील पुन्हा त्यांना पुनरुत्पादन नाही म्हणून त्यांचा उपयोग होत नाही व मेंदूचा तो भाग किंवा केंद्र कार्य करत नाही. एरवी त्या माणसाचे जगणे ”normal असते. पण थोड्या वेळापूर्वी केलेली किंवा झालेली गोष्ट त्यांना आठवत नाही. मग अशा लोकांचे ‘संगोपन ‘एखाद्या वर्षाच्या मुलासारखे करावे लागते म्हणजे अगदी निरागस मुलासारखी असतात. यावेळी ते लोक कसे वागतात हे तुम्हाला अनुभवाने माहीत झालेले आहे.

कोणत्या गोष्टीत काळजी घ्यायची याची उजळणी आपण घेऊया.

१) आहार – संगोपन करताना अगदी प्रथम विचार त्यांच्या आहाराचा येतो त्या लोकांना काहीच उद्योग नसल्याने सतत भूक लागली आहे किंवा चहा घ्यायचा राहिला आहे असे वाटत राहते आणि ते सतत खायला दे चहा दे म्हणत राहतात प्रथम प्रथम आपण त्यांना दोन-तीन वेळा चहा किंवा खायला देतो पण ते पचत नाही चहाने ऍसिडिटी वाढते मग याच्यावर उपाय काय तर सुरुवातीलाच खायला देताना कमी खायला द्यायचं आणि पुन्हा मागितलं की पुन्हा खायला देतो म्हणजे योग्य प्रमाणात अन्नसाठा त्यांच्या पोटात जाईल त्यांना अपचन होणार नाही तसेच चहाच चहा देताना सुद्धा कपबशी चिखली उचलायचीच नाही म्हणजे त्यांना सांगता येतं की बघा मगाशी तुम्ही चहा प्यायला की नाही अजून कप बशी सुद्धा उचलल्या नाहीत किंवा अर्धा अर्धा कप दोनदा चहा दिल्यानंतर त्यांचं समाधान होतं. त्यांचा आहार सकस, पौष्टिक पण पचनास हलका असा ठेवावा.

दुसरी गोष्ट ही माणसे एखादी गोष्ट मना विरुद्ध झाली तर चिडचिड करतात. प्रसंगी व्हायोlant होतात. त्यासाठी त्यांच्या मनामनाने घ्यावे लागते. त्यांच्यावर ओरडू नये किंवा तुम्हाला कसे कळत नाही हो? असे म्हणू नये कारण अशा वागण्याने ते आणखी चिडतात. म्हणून आपणच शांत रहायला हवे.

३) तुम्हाला अमुक गोष्ट आठवते आहे का? असे विचारून, त्यांच्या स्मरणशक्तीला ताण देऊन गोंधळात पाडू नये.

४) विस्मरण होणे हा गुन्हा नाही. म्हणून घरातल्या कार्यक्रमात किंवा कोणाला कोणी भेटायला आले तर त्यांना आपल्या खोलीत न पाठवता आपल्याबरोबर बसून घ्यावे. त्यांनीही त्या गप्पा ऐकाव्यात. पाहुण्यांना त्यांच्या आजाराची कल्पना द्यावी. खरं म्हणजे हा आजार नाही तर ती बौद्धिक पातळीवर एक स्टेज आहे. आणि अवघ्या घराला त्याचा सामना करावा लागतो.

५) कुणी कोरडी सहानुभूती आपल्याला किंवा त्या व्यक्तीला दाखवत असल्यास सौम्य शब्दात त्या व्यक्तीला थांबवावे.

६) घरातील व्यक्तीला अशी स्थिती असल्यास घरात प्रथम भीती, चिंता वाटते. म्हणजे करणाऱ्या माणसालाही आणि करून घेणाऱ्या माणसालाही. त्यातून असुरक्षितता येते. म्हणून अशी परिस्थिती हाताळताना जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागावे लागते. अध्यात्माने ही मन:शक्ती वाढते.

मग या आजारातून त्या व्यक्तीचे जीवन सुखकर आणि आपले सुकर होण्यासाठी काहीतरी वागण्यातील पथ्य पाळावी लागतील.

१) स्पर्श_स्पर्शातून न बोलता अनेक भावना व्यक्त होतात. पाठीवर हात ठेवला तर तो ‘आश्वासक’ स्पर्श असतो. डोक्यावरून गालावरून हात फिरवला तर प्रेमाची जाणीव होते. त्या व्यक्तीच्या झोपेच्या वेळी हातापायावरून हात फिरवल्यास मायेची ऊर्जा, ऊब जाणवते. माणूस स्पर्शासाठी भुकेला आहे. म्हणून आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्याजवळ बसून, हात हातात घेऊन किंवा पाठीवर ठेवून त्यांच्याशी बोलावे. ती माया त्यांना समजते. कदाचित पुढच्या दहा मिनिटात ते विसरतील. पण तो क्षण महत्त्वाचा असतो.

 २) भाषा_ त्यांच्याशी ओरडा ओरडा करत न बोलता गोड भाषेत सावकाश बोलावे. या वयाच्या माणसांना ऐकू कमी येते आणि गडबडीने बोलल्यास त्यांना समजत नाही. मग ते चिडचिड करतात.

३) चेहऱ्यावरील भाव आपण त्यांच्याशी बोलत असताना आपल्या चेहऱ्यावर तसा भाव यावा. म्हणजे घरातील आनंदात आपल्याला सामील केले आहे हे त्यांना समजते. रागीट चेहरा करून बोलल्यास ते मनात खट्टू होतात आणि नकारात्मक भावना निर्माण होतात.

४) देहबोली _यांच्याशी बोलताना नॉर्मल देहबोली असावी. एखादी जुनी गोष्ट असेल तर त्यावेळची देहबोली कशी असेल त्याप्रमाणे ठेवावे म्हणजे कदाचित क्षणभरासाठी का होईना त्यांना भूतकाळ आठवतो का ते लक्षात येईल.

५) त्यांना स्वावलंबी ठेवावे. स्वतःची कामे स्वतः करत असतील तर ती करू द्यावी. उगीच पसारा पडतो म्हणून त्यांच्या काम करण्यात अडथळा आणू नये.

त्यांचे छंद जोपासावेत. म्हणजे एखाद्याला पूर्वीच्या गाण्याची आवड असेल तर जुनी गाणी त्यांची आवडती असतील ती लावून ठेवावे. कदाचित त्यातून भूतकाळ आठवेल आणि आता म्युझिकल थेरपी अनेक आजारांवर उपयुक्त ठरत आहे. त्या व्यक्तीवरही त्याचा काही परिणाम झाल्यास चांगलेच असेल.

दोन एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर कागद पेन पेन्सिल रंग त्यांच्यासमोर आणून ठेवावे. आणि चित्र पूर्ण झाल्यावर ‘ चित्र सुंदर काढलेत ‘अशी प्रशंसा करावी.

बायकांना स्वयंपाकाची आवड असते. त्यांना पोळ्या करणे, कुकर लावणे हे करू द्यावे. फक्त त्यावेळी आपण आजूबाजूला असावे. म्हणजे पाणी, गॅस वगैरे कडील लक्ष राहील.

सडा घालणं, रांगोळी काढणे या गोष्टी करू द्याव्यात. त्याचे कौतुक करावे. देवपूजा करून घ्यावी. माणसाला आपला घरात अजूनही उपयोग होतो आहे ही भावना सुखावह असते.

— भाग पहिला 

💦🌨️

लेखिका : डॉ. सौ. पुष्पा घळसासी

प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड -पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवनाची खरी साधने…- लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ जीवनाची खरी साधने… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

स्वयंपाकघरातील नळ पुन्हा एकदा गळत होता. कंटाळून मी प्लंबरला फोन केला.

थोड्याच वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले — शांत, स्थिर, हातात जुनी, झिजलेली टूलबॅग.

मी त्यांना काम करताना पाहत होतो. त्यांनी पाना काढला — हँडलजवळ तो तुटलेला होता.

“अशा साधनांनी हा काय काम करणार? ” असा विचार माझ्या मनात आला.

पण त्यांना काहीच फरक पडलेला दिसला नाही. शांतपणे त्यांनी पाइप सैल केला. एक गंजलेला भाग कापावा लागणार होता. त्यांनी पुन्हा बॅगेत हात घातला आणि एक छोटी करवत काढली — तिचा अर्धा भागच नव्हता!

आता मला खात्री वाटली — मी चुकीच्या माणसाला बोलावलं आहे. पण अवघ्या दहा मिनिटांत गळती थांबली. नळ चमकत होता आणि थेंबही गळत नव्हता.

मी त्यांना शंभर रुपयांची नोट दिली. त्यांनी नकार दिला. “नको साहेब. यातील अर्धेच पुरेसे आहेत. ”

मी आश्चर्याने पाहिलं. “आजकाल जास्त पैसे कोण नाकारतं? ”

ते हसले — शांत, स्थिर हास्य.

– – “साहेब, प्रत्येक कामाची एक ठरलेली किंमत असते. आज जास्त घेतलं, तर उद्या जास्त अपेक्षा राहील. तेव्हा मिळालं नाही, तर मन अस्वस्थ होईल. म्हणून जे योग्य आहे तेवढंच घेणं मला समाधान देतं. ”

मी हळूच मान डोलावली. “किमान स्वतःसाठी नवा पाना आणि करवत घ्या. काम सोपं होईल. ”

ते हलकेच हसले. “अहो साहेब… साधनं झिजण्यासाठीच असतात. तेच त्यांचं नशीब. पण तुटलेली, ओरबाडलेली असली तरी ती आपलं काम करतात. ज्येष्ठ माणसांसारखीच — काही जखमा आल्या म्हणून ते निरुपयोगी ठरत नाहीत. ”

… क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता तेव्हा कोणता पेन वापरता याने फरक पडतो का? महाग किंवा साधा — लिहिता येत असेल तर कुठल्याही पेनाने चांगलं लिहिता येतं. पण लिहिताच येत नसेल, तर सर्वात महाग पेनही उपयोगाचं नाही. कौशल्य हातात असतं, साधनात नाही. ”

मी नि:शब्द उभा राहिलो. त्यांचे शब्द खोलवर मनात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दुर्मिळ होतं — जे पैसा कधीच देऊ शकत नाही.

एक जपण्यासारखा विचार –

संपत्ती आणि सुखाच्या अखंड शर्यतीत…

.. आपण जीवनातील खरी “साधने” विसरतो —

*प्रामाणिकपणा, *

*मेहनत, *

*कृतज्ञता, *

*जाणीव*

*आणि समाधान*.

ही जर टिकून असतील, तर तुटकी साधनंही चमत्कार घडवू शकतात.

– – पण तीच नसतील, तर जगभरची संपत्तीही आपल्या आतली गळती थांबवू शकत नाही.

*

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘राग वसंत… राग बहार…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘राग वसंत… राग बहार…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आज वसंत पंचमी आहे. त्या निमित्त दोन कविता

१. राग वसंत व २. राग बहार

🌼राग वसंत 🌼

ऋतूंचा राजा’वसंत’ तर रसांचा राजा शृंगार! वसंतात आधिष्ठान असतं रसराज शृंगाराचं! स्वतः भगवंतानेही विभूतियोगात स्वतःचा उल्लेख ” ऋतुनां कुसुमाकरः” असा केलाय.

असा हा वसंत येतो बहुरंगी, शतगंधी फुलांच्या पायघड्यांवरून. मग काय विचारता, अनंगरंगात विश्व रंगून जात!

राग वसंत 

तोड़ा

 *

मुरलीचे स्वर ऐकुन राधा झाली की बावरी

यमुनातटि हा रंग खेळतो राधा कुंजविहारी

धुंद बसंतातून बहरती रंग रंग फुलपंखी

भिजली राधा, भिजला माधव, भिजली सुरासुरांनी।।

या कुंजावर, त्या कुंजावर।।धृ।।

भ्रमरांचे गुंजारव सुंदर

वसंत फुलला अंगांगावर

जैशी सुमने वृक्षलतांवर

या कुंजावर, त्या कुंजावर।। १।।

 *

कोकिळ बोले आम्रतरूवर

मधुबन नाचे त्या तालावर

रस शृंगारा, येई बहरा

तू तर राणा नऊ रसांवर!

या कुंजावर, त्या कुंजावर।।२।

 *

दिवाकर बुरसे, पुणे

९५५२ ६ २९ २ ४ ५

 🌼🌼🌼🌼

🌼 राग बहार 🌼

वसंत ऋतुत गाईला, वाजवला जाणारा महत्वाचा दुसरा राग म्हणजे “बहार” हा ही शृंगार रसप्रधान राग, फार लोकप्रिय आहे.

🌼 राग बहार 🌼

तव सहवासा आसुसले रे, कर माझा स्वीकार

श्यामला, जुईस आला बहार! ।।धृ।।

 *

फुलल्या वेली, फुले नाचरी

विमल चंद्रिका नभी हासरी

एकांती मज मिठीत घेउनि

घाल गळा कर हार

श्यामला, जुईस आला बहार।।१।।

 *

अधरावरती अधर टेकुनी

करपाशी घे तनू बांधुनी

गात्रागात्रातून घुमू दे

अमृतमय झंकार!

राजसा, जुईस आला बहार।।२।।

 *

रतिमंची ही तनू शिणू दे

उठता किंचित तोल ढळू दे

विशाल वक्षावरी झेलुनी

 दे मजला आधार!

राजसा, जुईस आला बहार।।३।।

 *

अर्धोन्मीलित नेत्र होउ दे

भाळावरले दव ओघळु दे

अन् ओठातुन पुन्हा फुटू दे

 अस्फुटसा सीत्कार!

राजसा, जुईस आला बहार।।४।।

 *

श्वासामध्ये श्वास विरू दे

धुंदीमध्ये रात्र जागु दे

रेंगाळू दे मुक्त कुंतली

 उगाच मृदु गंधार!

राजसा, जुईस आला बहार।।५।।

🙏🏽🙏🏽🙏🏽

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # कॅमेरा… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # कॅमेरा # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… ॲक्शन.. साऊंड कॅमेरा… या परवलीचा शब्दाचा ध्वनी ऐकला मी भरभरा नुसती

समोरची दिसणारी ताजी चित्रंं टिपत जातो… कमीत कमीत पन्नास वेळा तरी त्यात कट कटचा व्यत्यय तो स्वयंघोषित दिग्दर्शक आणत असतो… त्याला कधीच कुठलीही ॲक्टींग त्याच्या मनासारखी होतेय असं वाटंत नसल्याचं असमाधान त्याच्या बथ्थड चेहऱ्यावर झळकत असतं.. मग प्रसंग कुठलाही असो.. आनंदाचा, दु:खाचा, रोमान्सचा, भांडणाचा मारामारीचा वा प्रेमाच्या गळाभेटीचा.. या सगळ्यात तो मात्र उदासिनच राहतो आणि समोरच्या कडून मात्र आभासी असला तरी सत्याचा प्रत्यय आणून दाखवशील का रे.. अशी अपेक्षा ठेवतो… आणि मला कॅमेरामनला अगदी नॅचरल, ॲक्शनवरच फोकस ठेवण्यासाठी सांगतो… माझं कामचं असते ते जे दिसेल आपल्या नजेरच्या टप्प्यात जसे असेल तसे टिपून संग्रही ठेवायचं.. मग मी टिपलेल्या प्रसंगात रासायनिक आणि तांत्रिक बदल घडवून त्याला हवा असलेला आकार रंग आणत असतो… रंग भरतो पण त्या त्या प्रसंगाच्या भावना मात्र मला आणता येत नाहीत, दाखवता येत नाहीत ही खंत जाणवते. मग एखादा बथ्थड चेहऱ्याचा कलावंत हावभाव दाखविण्यात कमी पडतो तेव्हा त्या प्रसंगाच्या बॅकग्राऊंडला तशीच आशयाची सिन सिनरी दाखवतो आणि प्रसंगाचा प्रभाव पाडतो… वर्तमानाला भविष्याचा आरसा दाखवत झुलवत नेणे आणि भुतकाळातील दु:खऱ्या जखमेवरची काळवंडलेली खपली काढून एकीकडे हसू तर दुसरीकडे आसू याचा अनोखा संगम दाखवणे हीच माझी खासियत… कुणी त्याला फ्लॅशबॅक म्हणतात, जिंदगी का नया दौर… फिल्मी रीळ… सगळा मोह मायेचा बाजार असतो आणि कलावंत कठपुतली प्रमाणे दिग्दर्शकाच्या तालावर नाचत राहतात… त्याचं समाधान होईपर्यंत त्याला नाचावचं लागतं याशिवाय त्याच्याकडे कुठला दुसरा पर्याय असतो.. कारण शेवटी त्याचाही पापी पेट का सवाल असतोना भाई… बाकी कले करिता जीवन आणि त्यासाठी झोकून दिलेले तन मन आणि धन दुय्यम ठरते…

आणि तसं म्हणाल तर आपलंही दुसरं काय असतं हो? .. तो वरचा नियंताच्याच हातातील कठपुतलीच तर असतो.. तो नाचवतो आणि आपण… सारं काही आधीच त्यानंच ठरवून मग आपल्या इथं पाठवून देतो.. एकेक गोष्टीला संघर्ष करायला लावतो.. म्हणजे एक प्रकारे रिटेक असतो.. जोवर त्याचं समाधान होत नाही तोवर तुम्हालाही तुमच्या कार्याची यश सिद्धता मिळत नाही… तुमचा कॅमेरा फोकस करत राहतो तुम्ही ठरवलेल्या टार्गेटवर.. नि त्याच वेळेला तुमच्या वर्तमानातला वारू वाटेवर स्वार होतो तेव्हा भूतकाळाच्या कडूगोड आठवणींचे खाच खळग्यात अडखळतात. भविष्य उज्ज्वल आहे दाखवणारा चमचमत्या आरश्याला भुलून जातात… आणि हेच तर तुमच्या आमच्या जीवनाच्या चित्रपटाला कॅमेरा बंदिस्त करत असतो तेव्हा वरून निरंतर सुचना येत असतात

ॲक्शन.. साऊंड कॅमेरा… या परवलीचा शब्दाचा ध्वनी ऐकला मी भरभरा नुसती चित्रं टिपत जातो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

भक्तीतून तुकारामांना प्राप्त झालेली अधिकार वाणी-

गाथेतील एकेक अभंग वाचत गेले की संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भेटीची अत्यंत तळमळ लागून राहिली आहे, हे आपण पहिल्या तीन भागात पाहिले. अशी अनन्य भक्ती करत असताना पांडुरंगाशी ते कित्येक वेळा मोठ्या अधिकार वाणीने बोलत आहेत याची जाणीव होते.  

पांडुरंगाने त्यांना भेट द्यावी म्हणून या अभंगातील महाराजांचा युक्तिवाद पहा.

ठाईची ओळख ही येईल टाकू टाका सुखी

तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन

ठेवीला तो ठेवा अभिलाषा बुडवावा

मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा 

स्वतःचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराज विनवणी करत आहेत. ते म्हणतात, ” देवा, तुझी आणि माझी फार जुनी ओळख आहे, ती तू विसरू शकत नाहीस. जर विसरलास तर तूच बदनाम होशील. तुझे इमान जाईल आणि माझे पतन होईल. ” यासाठी ते दृष्टांत देतात. म्हणतात, ” एखाद्या जवळ कोणी काही ठेवा ठेवण्यासाठी म्हणून दिला आणि त्याच्याकडून तो काही कारणास्तव बुडाला, तर तो लोभाने बुडाला असेच म्हटले जाईल. म्हणून हे दातारा

 या गोष्टीचा तू विचार कर (आणि मला दूर लोटू नकोस.)

कारे माझा तुज ये कळवळा

असोनी जवळा हृदयस्था

अगा नारायणा निष्ठा निर्गुणा

केला शोक नेणा कंठस्फोट

काय चित्त नाही पावत विश्रांती

इंद्रियाची गती खुंटेचीना

तुका म्हणे का हो धरीयेला कोप

सरले नेणो पाप पांडुरंगा

पांडुरंगा तू माझ्या हृदयात आहेस. इतका जवळ आहेस तरी तुला माझी करुणा का येत नाही?

हे नारायणा, तू देव असून गुणातीत आहेस, मग इतका निष्ठूर का आहेस? घसा फुटेपर्यंत मी रडलो तरी तू माझ्याकडे जराही लक्ष देत नाहीस. माझी विषयासक्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, ती का थांबत नाही? माझे चित्त अजून शांत का होत नाही? देवा तू माझ्यावर रागावला आहेस का?

मधूनच ते विठ्ठलाशी अशा प्रकारे सलगीने बोलतात.

दीनानाथ तुझी ब्रिदे चराचर

घेशील कैवार शरणागता

तू दीनांचा स्वामी आहेस आणि तुला शरण आलेल्या तुझ्या भक्तांचा तू कैवारी आहेस.

पुराणी जे तुझे गरजेची पवाडे

ते आम्हा रोकडे कळो आले

आपल्या दासाचे न साहसी उणे

उभा त्या कारणे राहिलासी

तुका म्हणे तुज भक्तीचे कारण

करावया पूर्ण अवतार*

वेद पुराणात तुझी कीर्ती वर्णिली आहे. तुझ्या दासांवरची संकटे तुला सहन होत नाहीत. तू ती तात्काळ दूर करतोस. त्याच्यासाठी तू सदैव उभा आहेस. भक्ताचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझे अवतार आहेत.

शिवाजी महाराजांवर परचक्रं आली, तेव्हा महाराज विठ्ठलाला अधिकाराने सांगतात.

न देखवे डोळा ऐसा हा आकांत

परपीडे चित्त दुःखी होते

काय तुम्ही येथे नसालसे झाले

आम्ही न देखीले पाहिजे हे

परचक्र कोठे हरिदासांच्या वासे

न देखजे ते देशे राहातिया

तुका म्हणे माझी लाजवीली सेवा

हीन पणे देवा जिणे झाले

देवाला निर्वाणीच्या शब्दात गाऱ्हणे घालतात. विठ्ठला, हा दुःखद प्रसंग मला पाहवत नाही. हे असे का व्हावे? त्यावेळी तू तेथे नव्हतास का?

अशा प्रकारचे दुःख आम्हाला दिसता कामा नये. हरिदासाच्या घरी परचक्र येतेच कसे? मी तुमची इतकी सेवा केली, तिला तुम्ही लाज आणली आणि मलाही न पणे जगणे प्राप्त झाले. — किती ही अधिकार वाणी!

 पुढच्या अभंगात महाराज विठ्ठलाला सांगतात, हरी किर्तन आणि सर्व भक्त तरले जावेत, हे त्याचे खरे फळ आहे. हे जे परचक्र आले आहे, त्यावरून आपणच सगळा उच्छाद मांडला असावा असे वाटते. पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही हे या प्रसंगाने उघड आहे, पण जेथे तुमचे दास राहतात तेथे तुम्ही पण राहता हे मी खरे कसे मानावे? असा परखड प्रश्न महाराज देवाला विचारतात.

पुढील भागात अधिकारवाणीच्या आणखी काही अभंगांचा विचार मांडण्याचा प्रयत्न असेल.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares