मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ माऊलीची… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ ओढ माऊलीची सुश्री नीलांबरी शिर्के 

पंढरीशी जाता सुख होई फार

भेटते माहेर भक्तालागी !!

*

चंद्रभागा स्नान आनंद सोहळा

भक्ताचाच मेळा वाळवंटी !!

*

चंदनाचा टिळा बुक्का मधोमध

शांत शांत वाटे अंतरंगी !!

*

आता लागे ओढ माऊलीची फार

धावताती पाय राऊळाशी !!

*

राऊळात सार्या वैजयंती गंध

 भेटते माऊली परिमळी !!

 *

प्रत्यक्ष माऊली भेटता समोर

 आनंद विभोर मन होई !!

*

विसरते सारे व्याप ताप मन

भेटते जाऊन माऊलीला !!

 *

पावलाचा स्पर्श मनामधे हर्ष

 तृप्ततेचा अंश भरलेला !!

 *

वाटते जगणे सार्थकी लागले

 भेटणे जाहले माऊलीशी!!

 *

माहेरचे सुख भेटते भक्ताला

 रंगतो सोहळा पंढरीत !!

©  नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ तूच एक सावळा… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

☆ तूच एक सावळा… ☆ प्राची अभय जोशी ☆

विठ्ठलाचे हे रूप असे सावळे सुंदर…

गळा तुळशीमाळ अन्, कासे पितांबर…

रूप सावळे साजिरे की, भास होतसे कान्हाचा…

दोन्हीं तयाचीच रूपे, वेध घेतसे मनाचा…

 *

मन सावळे नी ही, हा देहही सावळा…

कटीवर हात ठेऊनी, वाही भार विश्वाचा…

 *

भक्त असे हे वेडे, होती तुझ्यात दंग…

मुखावर तुझ्या शोभे, हा कस्तुरीचा गंध…

 *

सावळ्याची मोहिनी, भिनली ध्यानी मनी…

देहात असूनी विदेही, ही संवेदनाच न्यारी…

 *

जो तो घेई अशी, तुझ्या चरणाशी धाव…

पाव आता विठ्ठला, आर्त झाला भाव…

 *

विठ्ठला बा विठ्ठला, धाव पाव आता…

भक्तांच्या मेळ्यामध्ये, तूच एक सावळा…

तूच एक सावळा…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वारी… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ वारी… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

वारी आली वारी आली,

विठ्ठलाच्या दारी आली!

ज्ञानोबा-तुकयाची वारी,

वाखरीस भेट झाली! … १

*

भक्तमेळा सारा गोळा,

 जीव पंढरी रमला!

विठ्ठल जयघोषात,

 वारकरी दंग झाला! … २

*

चंद्रभागा स्नान करी,

 वाळवंटी केली दाटी!

 पुण्य स्नान नदीकाठी,

 विठू उभा भक्तांसाठी! .. ३

*

अबीर, गुलाल, बुक्का,

 पडे सडा चोहीकडे!

 केशरी पताका माळा,

 मार्गावर चोहीकडे! … ४

*

 भक्त मेळा सारा गोळा,

 जीव पंढरी रमला!

 विठ्ठल जयघोषात,

 वारकरी दंग झाला! … ५

*

 चंद्रभागा स्नान करी,

 वाळवंटी केली दाटी!

 पुण्यभाव दिसे काठी,

 विठू उभा भक्तांसाठी! . ६

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७९ आणि ८० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७९ आणि ८० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७९ – – 

मना पावना भावना राघवाची ।

धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।

भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।

नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली ।

अर्थ : हे मना श्रीरामांचे स्मरण पवित्र करणारे आहे. त्यांचे स्मरण कायम आपल्या अंतरात म्हणजे म्हणजे मनामध्ये ठेव. संसाराची चिंता सोडून दे. या संसाररूपी मायेची भूल मानवाला पडते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा गोष्टीची कास धरणे व्यर्थ आहे.

(पावना – पवित्र, भावना- विश्वास/स्मरण, धरी – धारण कर, भवाची – संसाराची, भूलि – भ्रम, वेर्थ – व्यर्थ)

विवेचन : आधीच्या श्लोकात आपल्याला समर्थांनी देह, संसाराची व्यर्थ चिंता वाहू नका असे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे ते सांगत आहेत. आपल्या मनामध्ये नेहमीच या संसाराबद्दल एक आंतरिक ओढ किंवा ममत्व असते. शिक्षण, नोकरी, विवाह, मुलेबाळे, पैसा, जमीनजुमला यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे आपल्याला वाटते. माणूस आयुष्यभर त्यासाठी धडपडत राहतो. परंतु या संसाराची व्यर्थता त्याला शेवटी लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.

राघवाचे स्मरण, त्याच्यावरील दृढ श्रद्धा मनाला पवित्र करणारी आहे. कारण तो पतितांना पावन करणारा आहे. आपल्या अंतरात अनेक बऱ्या वाईट भावना, वासना ठाण मांडून असतात. परंतु भगवंताच्या नामाने वासना शुद्ध होत जाते. म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना पवित्र करणाऱ्या राघवाची श्रद्धा अंतर्यामी बाळग. त्यासाठी ‘ धरी अंतरी ‘ हे शब्द समर्थांनी वापरले आहेत. अंतर्यामी काय धारण करायचे?  तर राघवाचा विश्वास. आणि काय सोडायचे?  तर ‘ चिंता भवाची ‘ आपण संसारात असताना एवढे त्यात गुंतलेले असतो, की पुढे माझे कसे होईल, म्हातारपणी मुले मला विचारतील ना?  एक ना दोन अशा अनंत चिंता मन करीत राहते. संसाराची व्यर्थ चिंता करून उपयोग नाही. म्हणूनच ही चिंता टाकून द्यावी असे समर्थ सांगतात.

ही चिंता का टाकून द्यायची?  कारण जी गोष्ट मुळात नाहीच आहे, तिच्याबद्दल चिंता करून काय उपयोग?  मोहमायेमुळे हा संसार आपल्याला खरा वाटतो. त्याची भूल आपल्याला पडते. पण खऱ्या सत्यापासून आपण लांब जातो. वाळवंटातील तहानलेल्या माणसाला मृगजळ दृष्टीस पडते. तिथे आपल्याला नक्कीच पाणी मिळेल या आशेने तो त्याच्या शोधात पुढे पुढे जात राहतो. शेवटी त्याला लक्षात येते की आपल्याला जे पाणी वाटले होते, ते तर केवळ मृगजळ! मृगजळ म्हणजे भ्रम. पाणी नाही हे सत्य. त्याप्रमाणेच हा संसार! खरा वाटतो पण अखेरीस त्याची व्यर्थता लक्षात येते. खरी वस्तू एकच. ती म्हणजे भगवंताचे नाम. ते नाम पवित्र करणारे आहे. सत्याची जाणीव करून देणारे आहे. संसाराची व्यर्थता लक्षात आणून देणारे आहे. म्हणून हे मना, असे पवित्र नाम तू हृदयात धारण कर आणि संसाराची व्यर्थ चिंता सोडून दे. जी गोष्ट मुळात नाहीच तिची चिंता करण्यात काय अर्थ?

तुकाराम महाराज म्हणतात, “हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. “ भक्ती करणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला अत्यंत प्रिय असते, ती परमेश्वराला अर्पण करावी. संसार, मुलेबाळे या गोष्टी आपल्या अत्यंत प्रिय असतात. त्यांच्यावर आपले जीवापाड प्रेम असते. हेच प्रेम भगवंताला अर्पण करावे. आणि भगवंताचे प्रेम अंतर्यामी धारण करावे.

स्वसंवाद :: 

१. ज्या शिक्षण, नोकरी, संपत्ती किंवा नात्यांना मी माझ्या ‘जीवनाचे सार्थक’ मानून बसलो आहे, ते खरंच चिरंतन सत्य आहे की केवळ एक तात्पुरता भ्रम (मृगजळ) आहे?

२. “म्हातारपणी माझे कसे होईल?  मुले मला सांभाळतील ना? ” अशा भविष्यातील ‘भवाच्या’ (संसाराच्या) व्यर्थ चिंतांमध्ये मी माझा आजचा दिवस आणि मनाची शांतता गमावत आहे का?

३. माझ्या अंतर्मनात साचलेला बऱ्या-वाईट वासनांचा कचरा साफ करण्यासाठी मी ‘पतितांना पावन करणाऱ्या’ राघवाच्या नामाचा आश्रय किती वेळा घेतो?

४. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी प्रपंचातील माझी सर्व आसक्ती आणि प्रेम भगवंताच्या चरणी अर्पण करून ‘निर्वासन’ भक्तीचा अनुभव घ्यायला तयार आहे का?

===== 

श्लोक क्र. ८० – – 

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।

तरा दुस्तरा त्या परा सागराते ।

सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।

करा नीकरा त्या खरा मछराते ।।८०।।

अर्थ : हे मना, श्रीमहादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या सीतापती श्रीरामांना आपल्या हृदयात धारण कर. श्रीरामांना अखंड हृदयी धारण करून पार करण्यास अतिशय कठीण असा संसाररूपी सागर तरून जा. जे कितीही भरले तरी अपूर्णच राहते अशा पोटाला (संसाराला)विसरून जा. मत्सराशी निग्रहपूर्वक झगडून साधुसंतांनी सांगितलेल्या मार्गाने जा.

(श्रीवरा – सीतापती श्रीराम /लक्ष्मीपती विष्णू, हरा अंतराते – महादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या, दुस्तर – कठीण, परा – मोठा, सरा – अंश/छटा, दुर्भर – भरण्यास अतिशय कठीण, नीकरा – प्रयत्नपूर्वक/हट्टाने, खर – गाढव, मच्छराते – मत्सर)

विवेचन : या श्लोकाची रचना भाषिक दृष्टया फार सुंदर आहे. ‘ र ‘ या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्याशिवाय रचनेत सहजता आहे. श्रीवर म्हणजे भगवान विष्णू. श्री म्हणजे लक्ष्मी. राम हाही विष्णूचाच अवतार असल्याने येथे सीतापती राम असा देखील अर्थ घेता येतो. अशा या भगवंताला आपल्या हृदयात प्रत्यक्ष महादेव धारण करतात. त्या भगवंताला आपणही आपल्या हृदयी धारण करावे. श्रीरामांची योग्यता किंवा महती एवढी थोर की प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्यांना आपल्या हृदयात स्थान देतात. त्यांचे ध्यान करतात. त्यामानाने आपण तर सामान्य माणसे! तेव्हा अशा या भगवंताला आपण देखील आपल्या हृदयात स्थान द्यावे.

समर्थ संसाराला संसार सागर म्हणतात. एक वेळ एखादी नदी पोहून पार करणे सोपे पण सागर पार करणे महाकठीण. हनुमंत सागर पार करून लंकेला पोहोचला होता. त्याने हृदयात रामनाम धारण केले होते. रामनाम ही एक अशी नौका आहे की जी आपल्याला हा महाकठीण असलेला भवसागर पार करण्यासाठी साहाय्यभूत ठरते. जो या नौकेत बसला, तो हा भवसागर तरून गेला.

पण हा भवसागर म्हणजे एक मायाजाल आहे. ते भल्याभल्यांना सोडवत नाही. भगवंताची माया अत्यंत प्रबळ आहे. एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकावेत तसा माणूस या मायेच्या जाळ्यात अडकतो. रामकृष्ण परमहंसांनी याबाबत बोलताना एका ठिकाणी अतिशय सुंदर दाखला दिला आहे. ते म्हणतात जे मासे कोळ्याच्या अवतीभवती असतात, ते जाळ्यात अडकतात. पण जे मासे कोळ्याच्या पायाजवळ असतात, ते मात्र जाळ्यात अडकत नाहीत. आपण संसारी माणसे म्हणजे या संसारसागरातील मासे. मायारूपी जाळ्यात आपण अडकतो. पण आपण जर भगवंताच्या पायाशी राहिलो, त्याचे चरण जवळ केले तर मायेच्या जाळ्यातून आपण सहीसलामत सुटू शकतो.

देवाने आपल्याला पोट दिले आहे. पोट ही अशी गोष्ट आहे की ती कधी भरतच नाही. अग्निमध्ये आहुती टाकल्यानंतर अग्नी आणखी प्रज्वलित होतो. तसेच हे आहे. संसाराची आसक्ती देखील अशीच आहे. ती कधीच संपत नाही. म्हणून ती थोडी का होईना पण विसरण्याचा प्रयत्न करावा. ते सोपे नाही. पण भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती बाजूला ठेवता आली पाहिजे.

आपली संसाराची हाव कधी संपत नाही. ‘ हवेपण ‘ सुरूच राहते. त्यातून मग एखादी गोष्ट नाही मिळाली आणि ती दुसऱ्याकडे असेल तर मत्सर किंवा द्वेष निर्माण होतो. मत्सराला काही कारण लागत नाही. म्हणून त्याची तुलना समर्थ गाढवाशी करतात. परमार्थात तर मत्सर अतिशय हानिकारक. तेव्हा अशा मत्सराचा निकराने म्हणजे सर्वशक्तीनिशी सामना करायला हवा. त्यासाठी विवेक आणि वैराग्य ही दोन प्रभावी शस्त्रे आहेत. मत्सर आणि संसाराची आसक्ती टाकून देऊन श्रीरामाला हृदयी धारण करा म्हणजे हा भवसागर तरून जाल असे समर्थांचे सांगणे आहे. ‘ नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार. ‘

स्वसंवाद :: 

१. मी या संसारसागरात ‘मायेच्या जाळ्यात’ अडकलो आहे हे मला जाणवते का?

२. “कितीही दिले तरी न भरणारे हे दुर्भर पोट (आसक्ती)” याच्या मागे धावताना, मी कधी समाधानाचा अनुभव घेतला आहे का?

३. जेव्हा मला एखादी गोष्ट मिळत नाही आणि ती दुसऱ्याकडे दिसते, तेव्हा माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ निर्माण होतो का?

४. संसाररूपी जाळ्यातून सहीसलामत सुटण्यासाठी माझ्या ठायी भगवंताप्रती अनन्य शरणागती आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७९ आणि ८०

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

 पंढरपूरचा विठु काल

 अचानक आला घरी

आणि म्हणाला, आवर लवकर बयो

निघालेत वारकरी ।।

 

मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।

 

लगबग माझी सुरू झाली

नवऱ्याचे कपडे बघू की

मुलांसाठी खाऊ करु

एवढया कमी अवधीत

सगळं कसं आवरू ?

 

शेवटी एकदाची तयार झाले

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

 

काळजातली गलबल लपवु पाहत होते।

डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।

 

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।

मीच मला समजावत होते परोपरी ।

 

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असु दे,बघु पुढे केव्हातरी ।।

 

माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।

 

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।

 

मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।

 

उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।

तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।

 

कुणी म्हणतं ममत्व सोड ।

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

 

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।

 

एकच भीती वाटते विठु,

प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक

तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।

आणि कधीच घडणार नाही रे,

तुझ्या पंढरपूरची वारी ।।

 

माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।

त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।

 

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,

संसार सोडू नकोस,एक फक्त कर

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।

 

इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।

 

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।

 

तुझ्या हृदयातला माझाअंश ,त्याला ठेव साक्षी

 त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।

 

मग बघ मन, बुद्धी, चित्त, अहंकार..

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।

 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।

 

अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।

रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।

 

 हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।

 

 निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।

आणि विश्वास ठेव पोरी!

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

 

 जय हरि

         

कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अक्षर स्पर्श… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अक्षर स्पर्श… ☆ सुरेखा चिखलकर ☆

नजरेचा स्पर्श व्हावा

अक्षरांनी जन्म घ्यावा,

जणू क्षणांच्या साखळ्या

कागदावर विसावा…

​उघडावी पांघरूण

पानं ओठी हसू देई,

जणू दडलेलं दुःख

पानांनी हलकं होई…

 *

​दीर्घ विरहानंतर

वितळून जावे ओझं,

मनातील पानात या

जतन केलेले गूज…

 *

​काटे वेळेचे मोजले

दिस-रात्र सोबतील,

अक्षरांना गंध आला

शब्द पुन्हा फुलतील…

 🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

(सामान्यांविषयी तुकारामांचे मत)

आजच्या भागात समाजातील सामान्य जनतेविषयी तुकाराम महाराजांचे काय मत होते, त्याविषयीच्या अभंगांचा विचार करू. सामान्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखे, संसारात गुरफटलेले, एका ठराविक चक्रातून अहोरात्र फिरणारे.

आपल्याच फुंदे/ जेथे तेथे घेती छंदे//

पडला सत्याचा दुष्काळ/ बहु फार झाली घोळ//

विश्वाचे माठ/ त्याचे कपाळी ते नाट//

तुका म्हणे घाणा/ मूढा तीर्थी प्रदक्षिणा//

 या अभंगाचा अर्थ काय? तर तुकारामांच्या मते असे अनेक लोक आहेत की ते त्यांच्या गर्वाने प्रत्येक वेळी दुराग्रह धरतात. परमार्थातील खरी तत्वे काय आहेत ती त्यांना समजली नसल्यामुळे सगळाच घोळ होतो. या नश्वर जगताचा खोटा अभिमान धरून त्यांचे आचरण चालू असते. उदाहरणार्थ- आपल्याला आवडलेली वस्तू न मिळता जर ती दुसऱ्याला मिळाली, तर अत्यंत दुःख होते, पण हे कळत नाही की त्या वस्तूचे अस्तित्व किती काळ असणार आहे? मग विनाकारण दुःख का करायचे आणि स्वतःस त्रास करून का घ्यायचा? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जसा घाण्याचा बैल घाण्याभोवती फिरतो तसा तो मूर्ख मनुष्य जगातल्या सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घालत बसतो, परंतु त्याच्या अशा वागण्याने त्याला हरीच्या प्राप्तीचे भान आणि ज्ञान नसते.

 अहंकार तो नासा भेद/ जगी निंद्य ओवळा//

 नातळे तो धन्य यासी/ जाला वंशी दीपक//

करवितो आत्महत्या/ नेदी आत्मा आतळो//

तुका म्हणे गुरुगुरी / माथा थोरी धरुनी//

या अभंगात महाराज जनतेला हेच समजावून सांगत आहेत की माणसाचा अहंकार, म्हणजे मी पणा, हे माझे आहे, हे मी केले आहे, हा गर्व

त्याचा विनाश करतो. माणसामाणसात भेदभाव निर्माण करणारा अहंकार अगदी मलीन आहे, तो ओवळा म्हणजे अशुद्ध आहे, निंदनीय आहे. सगळा घात या अहंकारानेच केला आहे. ज्याने या अभिमानाचा विटाळ होऊ दिला नाही, त्यानेच वंशाचे नाव उज्वल केले आहे व तोच धन्य आहे असे समजावे. अहंकारानेच आत्मा स्वतःचा अपारपणा विसरतो आणि या मर्यादित देहाला कवटाळतो. जसा काही तो आत्मघातच करतो. या अभिमानामुळेच खऱ्या श्रीहरीची भेट होऊ शकत नाही. यामुळे माणूस स्वतःकडे मोठेपणा घेऊन उगीचच गुरगुरत राहतो.

तुकाराम महाराजांचे सामान्य माणसांना कळकळीचे हेच सांगणे आहे की आपण सामान्य माणसे म्हणजे एक साधन आहोत, कर्ता- करविता तो एक श्रीहरीच आहे.

आस निसरली गोविंदाचे भेटी/

सवंसारी तुटी पुढीलिया//

पुढे पाठविले गोविंद गोपाळ/

देऊनी चपळ हाती गुढी//

हाका आरोळी या देऊनी नाचती/

एक सादाविति हरी आला//

आरंधी पडिली होती तया घरी/

संकीर्ण त्या नारी नरलोकां//

लोकां भूक तहान नाही निद्रा डोळा/

रूप वेळोवेळा आठविती//

आहा कटा मग करिती गेलिया/

आधी ठावा तया नाही कोणा//

* आधी चुकी मग घडे आठवण/*

* तुका म्हणे जन परिचय*//

सर्वसामान्य माणसांची पद्धतच आहे, की कोणतीही गोष्ट करताना सखोल विचार न करता ती करायची. कधी कोणाच्या सांगण्यावरून करायची, नंतर त्याचे परिणाम काय होतील याचा सारासार विचार करायचा नाही आणि नंतर अंगाशी आले की देवाला आळवायचे. आपल्याकडे म्हणच आहे करून करून भागले अन् देवपूजेला लागले संत तुकाराम नेमकी सामान्य जनांची हीच ओळख त्यांच्या या अभंगातून देत आहेत.

ते म्हणतात की, गोविंदाची भेट झाल्याने सर्व आशा नाहीशी होऊन पुढच्या संसाराचा संबंध सुटला. गोविंदाने चपळ गोपाळांच्या हाती पताका देऊन त्यांना पुढे पाठवले. मोठमोठ्याने हाका, आरोळ्या देऊन ते नाचू लागले व एकमेकांना हरी आला म्हणून सावध करू लागले. आपापल्या घरी ते स्त्री-पुरुष उद्विग्न होते. त्या लोकांची तहानभूक निद्रा नाहीशी होऊन ते वेळोवेळी हरीचे रूप आठवीत असत. हरि डोहात गेल्यावर कृष्ण किती चांगला होता म्हणून आक्रोश करू लागले परंतु पूर्वी त्याचे मोठेपण कोणी जाणत नव्हते. तुकाराम महाराज हेच सांगतात की आधी चुका करायच्या नंतर पश्चातापाने पोळायचे हा जगाचा स्वभावच आहे.

भारवाही न ओळखती या अनंता/

जवळी असता अंगसंगे//

 अंगसंगे तया न कळे हा देव/

कळोनी संदेह मागुताला//

मागुते पडती चिंतेचिये डोही/

जयाची हे नाही बुद्धी स्थिर//

बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण/

आशाबद्ध जन लोभिकांची//

लोभिका न साहे देवाचे करणे/

तुका म्हणे तेणे दुःखी होती//

या अभंगात साध्या सरळ संसारी माणसाचे वर्णन महाराजांनी केल्याचे आपण पाहतो. जी माणसे प्रपंचाचा गाडा वाहत आहेत, ती माणसे परमेश्वर कितीही जवळ असला तरी त्याला पाहू शकत नाहीत. देहात असलेल्या देवाला ती ओळखत नाहीत. अंग संगतीने असलेला देव त्यांना कळत नाही आणि यदाकदाचित समजलाच तर त्याविषयी त्यांच्या मनात संशय निर्माण होतो. ज्यांची बुद्धी स्थिर नाही ते काळजीच्या डोहात बुडतात. जे लोभी आहेत, नारायण त्यांची बुद्धी स्थिर होऊ देत नाही. लोभी माणसांना देवाचे हे कृत्य सहन न झाल्यामुळे ते कायम दुःखीच राहतात.

थोडक्यात सांगायचे तर संसारात राहूनही लोभ, मोह… इत्यादी शड्रिपुंना दूर ठेवले तर हरिनारायण आपली बुद्धी स्थिर ठेवील आणि देहातील देवाची जाणीव होऊन सर्व दुःखे नाश पावतील.

क्रमशः… ३० 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

मी कोण?

नोकरी संपली,

दिनक्रमही गेला,

घरातली गजबजही थांबली,

आणि शांततेच्या प्रतिध्वनीत

मी स्वतःला शोधायला लागलो.

 

मी कोण?

बंगलो बांधले,

फार्महाऊस उभारले,

मोठी-लहान गुंतवणूक केली,

आणि आता?

चार भिंतीत अडकून पडलोय.

 

सायकलवरून मोपेड,

मोपेडवरून मोटार,

मोटारीतून गाडी,

गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,

पण आता?

हळूहळू पाय रेंगत रेंगत

आपल्या खोलीतच फिरतोय.

 

निसर्गाने विचारलं—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी म्हणालो,

“मी… फक्त मीच.”

 

राज्य, देश, खंड फिरलो,

पण आज

माझे प्रवास

हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.

 

संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,

पण आता माझ्या कुटुंबाने

मला समजून घ्यावं

अशी इच्छा आहे.

 

निसर्ग हसून म्हणाला—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी उत्तर दिलं,

“मी… फक्त मीच.”

 

पूर्वी वाढदिवस,

लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,

पण आज

फक्त छान झोप लागली,

भूक लागली,

हेच साजरं करतो.

 

सोने, चांदी, हिरे, मोती

सगळं बँकेत गप्प बसलंय.

सूट-बूट कपाटात लटकलेले.

आता फक्त मऊ सुताचे कपडे,

साधेपणातला आराम.

 

इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,

पण आता

माझ्या मायबोलीतच

सुख मिळतं.

 

व्यवसायासाठी

जगभर धावलो,

नफा-तोट्यांची गणितं केली,

पण आज

फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.

 

व्यवसाय सांभाळला,

कुटुंब जोडलं,

खूप नाती केली,

पण आता?

शेजारचा साधा-सोपा माणूसच

माझा जिवलग सोबती आहे.

 

नियम पाळले,

शिक्षण घेतलं,

पण आता कळतंय—

खरं महत्त्वाचं काय आहे.

 

जीवनाचे चढउतार अनुभवून,

शांत क्षणी

माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:

 

“पुरे झालं आता…

तयार हो प्रवासी,

अंतिम प्रवासासाठी…”

 

निसर्ग पुन्हा हसून विचारतो—

“कोण आहेस रे मित्रा?”

 

मी हळूच म्हणतो:

“अरे निसर्गा,

तूच मी…आणि मीच तू.

एकेकाळी आकाशात झेपावलो,

आता जमिनीलाही

प्रेमाने स्पर्शतो.

मला माफ कर…

एकदा पुन्हा जगू दे मला—

पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,

तर खराखुरा माणूस म्हणून—

मुलांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.”

 

वरिष्ठ नागरिकांना समर्पित

 संपत्ती एका झटक्यात,

सौंदर्य एका आजारात,

आणि प्रतिष्ठा एका चुकीत

नष्ट होते,

म्हणूनच या तिन्ही गोष्टींचा

कधीही गर्व नको ..!

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कल्पवृक्ष… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

?️? चित्रकाव्य ?️?

? कल्पवृक्ष… ? प्राची अभय जोशी ☆

 प्राजक्त भामेच्या दारचा

 हळूवार अलगद उमलला

*

त्याचा पसाभर सडा मात्र

 रुक्मीणीच्या अंगणी सांडला..

*

प्राजक्त वेचला कितीही ढिगाने

 तरी तो काट्यावर नाही तोलला 

*

त्याच्या नाजूकपणाचा त्याने

 कधीच बाजार नाही मांडला…

*

प्राजक्त असा असावा अंगणी

 कृष्णाच्या कथेची अशी महती

*

त्याच्या फुलण्या उमलण्यातच

 श्रीकृष्णाची दडलेली भक्ती…

*

प्राजक्ताचा असा सुवासिक वृक्ष

 त्याचे खरे स्थान तर स्वर्गातच 

*

इंद्रदेवाचे आहे हे तेरावे रत्न

 स्वर्गीय आनंदाचा निखळ स्त्रोत

*

प्रत्येकाच्या मनी वसलेला मात्र

 हा एक कल्पवृक्ष 

 हा एक कल्पवृक्ष…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पारिजातक… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पारिजातक... ? शालिनी जोशी 

 पारिजातक पुष्प लहान

 परी असे कीर्ति महान 

*

 त्रिलोकांचा प्रवास तरुला 

 समुद्रमंथनातून इंद्र वनाला

*

 श्रीकृष्णाने भूलोकी आणिला

 सत्यभामेचा स्त्री हट्ट पुरविला

*

 शुभ्र पाकळ्यात सुगंध साठा 

 केशरी रंग खुले नाजूक देठा

*

कळ्या रात्रीच्या चांदण्या झाडावर 

 सकाळी केशरी पांढरा सडा भूवर

*

 भरल्या तबकी खुले मोहकपण

 हात न लावता जपा कोमलपण

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares