मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४७ – – – 

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे|

जनी जाणता भक्त होऊनि राहे|

गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |४७|

अर्थ : ज्या साधकाला आपल्या देहाच्या आत आणि बाहेर एकमात्र भगवंतच दिसतो, जो जाणता म्हणजे ज्ञानी भक्त म्हणून जगात वावरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनेचा क्रम कायम राखतो असा भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा (भगवंताचा)दास हा खरोखरीच जगात धन्य होय.

विवेचन : या ४७ व्या श्लोकापासून ते ५६ व्या श्लोकापर्यंत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे अंतिम चरण आहे. यात समर्थ ज्ञानी साधकाचे किंवा भक्ताचे गुण सांगतात.

या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात, ” मनी लोचनी श्रीहरी तो चि पाहे” यामध्ये जो परमेश्वराचा भक्त असतो तो मनात आणि लोचनात म्हणजे डोळ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मनामध्ये त्याचे निर्गुण रूप असते आणि नेत्रांना म्हणजेच बाह्य जगतात त्याचे दृश्य रूप किंवा सगुण रूपाचे दर्शन होते. तात्पर्य म्हणजे आत बाहेर सर्वत्र त्याला परमेश्वराचेच दर्शन होत असते. भक्त हा शब्द जर आपण पाहिला तर जो परमेश्वराशी जोडलेला आहे तो भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. जो परमेश्वराशी जोडलेला नसतो तो भक्त कसा असेल ?

खऱ्या भक्ताला देव सर्वत्र दिसतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. प्राणीमात्रात सर्वत्र तोच भरलेला आहे. त्याची दृष्टी सम होते. मग भेद राहत नाही. जो आपल्या अंतरात आहे तोच बाहेर देखील आहे हे त्याला लक्षात येते. मग द्वैत राहत नाही. तो अद्वैताचाच एक भाग होतो. तो परमेश्वराशी तदाकार होतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे त्याला सांगण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील जेव्हा कधी तो सगुण मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा देखील तो परमेश्वराच्या दर्शनाने भाव विभोर होतो. त्याचे नेत्र पाणावतात.

समर्थांनी “मनी लोचनी तो चि पाहे” असे जे म्हटले आहे, त्यातील “चि “म्हणजेच तोच परमेश्वर त्याला सर्वत्र दिसतो. जसा तो भक्त प्रल्हादाला दिसत होता. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीला निर्जीव दिसणाऱ्या खांबामध्येही प्रल्हादाला परमेश्वराचे अस्तित्व दिसत होते.

खऱ्या भक्ताच्या डोळ्यासमोर परमेश्वराची सगुण मूर्ती नसली तरी काही बिघडत नाही. त्याच्या अंतर्यामी ती मूर्ती ठसलेली असते. सगुण निर्गुणाने त्याला काही फरक पडत नाही. “सगुण निर्गुण एकू गोविंदु रे “. अशी त्याची अवस्था असते. त्याला परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. अशा भक्ताला समर्थ ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तीतून ज्ञान होते पण ज्ञान झाल्यानंतरही भक्ती संपत नाही. असा भक्त हा ज्ञानी भक्त असतो.

पण ज्ञानी भक्त म्हणजे भोळा भक्त नव्हे. हा फरक आपण समजून घ्यायला हवा. आपला असा सोयीस्कर समज असतो की भक्त हा भोळा असतो, त्याला व्यवहार कळत नाही. काही लोक अशा लोकांना मूर्ख किंवा बावळट देखील समजतात. परंतु ज्ञानी भक्ताचे असे वागणे समर्थांना अपेक्षित नाही. त्यांच्या दृष्टीने चातुर्य अखंड सावधानता हे मोठे गुण आहेत. त्यांना अपेक्षित असलेला ज्ञानी भक्त व्यवहारात देखील चातुर्याने वागतो. तो लबाडी करत नाही, तो स्वार्थी नसतो परंतु लोकांकडून फसवला जाईल एवढाही भोळा नसतो.

तिसऱ्या ओळीचा अर्थ पाहूया. तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमूं साधनाचा. ” ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. परमेश्वराचे जे गुण आहेत की तो सर्वव्यापी आहे, शरणागताला आश्रय देणारा आहे, यासारख्या त्याच्या अनेक गुणां प्रति भक्ताची प्रीती म्हणजे प्रेम असते. परमेश्वराच्या गुणांवरच ज्याची प्रीती नाही, तो परमेश्वरावर प्रेम कसे काय करू शकेल ? असा भक्त साधनेचा क्रम देखील पाळत असतो म्हणजे जिवापाड जपत असतो. साधनेचा क्रम याचा अर्थ भक्त हा पायरीपायरीने परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते. उदा. परमेश्वराच्या नामाचे स्मरण, मनन, सदैव त्याचे चिंतन आणि मग पुढे त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. या सगळ्या विविध पायऱ्या आहेत. या ओळीतील राखे हा शब्द गुणांबद्दल प्रीती राखणे आणि साधनेचा क्रम राखणे या दोन्हींसाठी लागू पडतो.

चौथ्या ओळीत समर्थ अशा भक्ताबद्दल म्हणतात, ” जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ” सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम !कोण बरं असेल मग ? तर एक परमेश्वरच सर्वोत्तम आहे आणि अशा या सर्वोत्तमाचा दास होण्यामध्ये जी धन्यता आहे ती अन्य कशातच नाही. म्हणून अशा सर्वोत्तम असलेल्या परमेश्वराचा भक्त खरोखरच धन्य असतो. तसाच भक्त होण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद (नवीन) :: 

१) माझ्या दृष्टीत “समदृष्टी” आहे का – माझ्या भोवतालच्या माणसांमध्ये, निसर्गात मला परमेश्वर दिसतो का ?

२) मी “ज्ञानी भक्त” आहे की “भोळा भक्त” – व्यवहारात चातुर्य राखून भक्ती करण्याचा माझा प्रयत्न आहे का ?

३) माझ्या साधनेचा “क्रम” आहे का – नामस्मरण, मनन, चिंतन या पायऱ्या मी नियमितपणे पाळतो का ? 

– – – – 

श्लोक क्र. ४८ – – 

सदा देवकाजी झीजे देह ज्याचा |

सदा रामनामे वदे नित्य वाचा |

स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८|

अर्थ :  जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

विवेचन : देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मारुतींची स्थापना केली आणि गावोगाव श्रीराम आणि मारुतीची मंदिरे निर्माण करवली. मठ उभारून महंत घडवले. हे सगळे भगवंताचेच कार्य त्यांच्या हातून झाले. त्या कार्यातच त्यांचा देह झिजला.

भगवंताचे कार्य करायचे म्हणजे केवळ नामस्मरणच केले पाहिजे असे काही नाही. रंजल्या गांजल्यांची, दीनदुबळ्यांची, प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच आहे. ते देखील भगवंताचे कार्य आहे असे म्हणता येईल.

भक्ताने नेहमी ईश्वरसन्मुख राहिले पाहिजे. तसे राहण्यासाठी भगवंताचे नाम अखंड त्याच्या मुखात आले पाहिजे. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड असते असा भक्त धन्य होय. व्यवहारांमध्ये बोलताना भलेही त्याला लोकरीतीनुसार व्यवहार करावा लागेल. परंतु अंतरातील भगवंताचे चिंतन अखंड सुरूच राहते.

तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, “स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा” म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम तोच आपला स्वधर्म समजून जो उत्तम प्रकारे करतो तो भक्त धन्य होय. बऱ्याच वेळा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सर्व त्यावरील कलाकार आहोत असे म्हटले जाते. आपल्या वाट्याला जी भूमिका आली असेल ती उत्तम प्रकारे करणे हे आपले काम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तोच आपला स्वधर्म आहे तो आपल्याला उत्तम रीतीने निभवता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।

पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।

त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा अतिशय प्रिय आहे. म्हणजेच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला आवडते. मग तुम्ही मंदिरात किंवा तीर्थयात्रेला गेला काय आणि नाही गेलात तरी चालू शकते. प्रत्येकाने आपले काम जर उत्तम प्रकारे केले तर हीच त्या परमेश्वराची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा आपण बांधली असे होईल. मग जगामध्ये आपोआपच सज्जनांची मांदियाळी तयार होईल आणि सगळे सुखी होतील. तेव्हाच ऋषींनी सांगितलेले अस्तित्वात येईल

 सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥

– – सर्व सुखी होतील सर्वांना आरोग्य लाभेल. अर्थात प्रत्येकाने आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तर…

– – आणि असे वागणारा भक्त जगामध्ये धन्य होईल. भगवंताच्या उत्कृष्ट भक्तांमध्ये त्याची गणना होईल.

स्वसंवाद :: 

१) माझ्या दैनंदिन कामात मी “देवकाज” पाहतो का – माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असा भाव माझ्या मनात असतो का ?

२) “स्वधर्म” म्हणजे माझ्या वाट्याला आलेली भूमिका – ती मी उत्तम प्रकारे निभावतो का की इतरांच्या भूमिकेकडे माझे लक्ष जास्त असते ?

३) माझ्या नामस्मरणाने किंवा वागण्याने इतर कोणाला परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे का ?

– क्रमशः श्लोक ४७ आणि ४८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९५ – सृजन संगत…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९५ – विजय साहित्य ?

☆ सृजन संगत…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

हळवे अंतर

जपता जपता

जाणीव असावी

घडता घडता…! १

गिरवा अक्षर

धूळपाटीवर

स्वरादि व्यंजन

मना मनावर…! २

 *

जीवन संचित

संस्कार वारसा 

जपू मनांतरी

मौलिक आरसा…! ३

 *

गरजे पुरती

नसावीत नाती

मनांगणातील

उजळीत वाती…! ४

 *

जीव जीवावर

जगतो जडतो

संकट समयी

जगास नडतो…! ५

 *

प्रेमळ हृदयी

जाणीव असावी

स्वभाव कस्पटे

मुळीच नसावी…!  ६

 *

नसावी उणीव

नजरेचा धाक

ऐकू यावी सदा

हृदयाची हाक…! ७

 *

असायला हवी

नाराजी शब्दांत

प्रेमाचेच ‌बंध

गुंफलेले त्यात…! ८

 *

काका, मामा,नाती

आधाराचे हात

अक्षर धन हे

हवे दिनरात…! ९

 *

कमावले किती

जाणीव असावी

प्रेमळ जीवांची

उणीव नसावी …! १०

 *

गमावले किती

जाणीव असावी

सृजन संगत

उणीव नसावी…! ११

 *

काळाच्याही पुढे

धावणारे मन

उणीव नसावी

आठवांचे क्षण…! १२

 *

हिशोबात नको

व्यवहारी माया

झिजवावी प्रेमे

अविरत काया…!१३

 *

जाणीव असावी

आपल्या जनांची

उणीव नसावी

प्रेमळ मनांची….! १४

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ मोहविणारे सारे… ☆ जयश्री पाटील ☆

जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

☆ मोहविणारे सारे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

(वृत्त – लवंग लता ८+८+८+४=२८)

नदी वाहती काळी माती झुळझुळणारे वारे

हिरवी झाडी वाट वाकडी मोहविणारे सारे

*

पानोपानी सुंदर कोमल किती फुलांची दाटी

किलबिलणlऱ्या इवल्या इवल्या पक्षांची ती घरटी

*

गाणे गाते शिवार हिरवे धनधान्यांच्या राशी

गाय वासरे गोकुळ अवघे भासे मथुरा काशी

*

दूर डोंगरी शिखर मंदिरी भक्तीचा तो मेळा

संस्कारांचे ज्ञान दिले ती माय मराठी शाळा

*

पारावरती न्याय निवाडा सुधारणेच्या गोष्टी

अंगणातही मनामनांच्या संवादांची वृष्टी

*

गावाची मज ओढ लागते जातो वर्षाकाठी

थरथरणाऱ्या हातांचे ते आशिष घेण्यासाठी

*

सरळ मनाने खुल्या दिलाने आलिंगन मी देतो

मायेचा तो झरा गावचा कवेत मजला घेतो

 

© जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उडी… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ उडी… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

जन्म घेतला ज्या माते पोटी,

तिची धन्यता केवढी मोठी!

जिच्या उदरी वीर जन्मा आला,

स्वातंत्र्याचा मंत्र घेऊन ओठी! … १

*

स्वातंत्र्यसंग्रामी घेतली *उडी ,

उभारले स्वातंत्र्य मेळे गावी!

होती धगधगती आग उरामध्ये,

स्वप्न पाही स्वातंत्र्याचे भावी! … २

*

ब्रिटिशांच्या देशात जाऊनी,

ज्वाला पेटवल्या देश प्रेमाच्या!

स्वातंत्र्यासाठी लढणे हेच एक,

स्वप्न भरले उरी सर्वांच्या! … ३

*

मार्सेलीस बंदरात घेतली ,

जगप्रसिद्ध उडी समुद्रात!

झेप त्यांची समजून आली,

धडकी भरे वैऱ्याच्या अंतरात! … ४

*

स्वातंत्र्योत्तर काळात,

उपेक्षा च वाट्याला आली!

निराश न होता त्यांनी,

समाजकारणी उडी मारली! … ५

*

भव्य दिव्य हिंदू राष्ट्राचे,

स्वप्न उराशी बाळगले!

उच्चतम देशप्रेमासाठी,

किती देह कष्ट सोसले! … ६

आदर्श त्यांचा मनी धरावा,

प्रत्येकाने तो जोपासावा!

राष्ट्र प्रेमाचा वसा तो घ्यावा,

स्वातंत्र्यवीरा प्रणाम करावा!

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ आदित्य हृदय स्तोत्र ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ आदित्य हृदय स्तोत्र ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रभू रामचंद्र रणांगणात चिंतित अवस्थेत असतांना रावण शस्त्रसज्ज होऊन रणांगणात उतरला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी रामापाशी जाऊन त्याला ‘आदित्यहृदय स्तोत्र’ सांगितले.

आदित्य ह्रदय स्तोत्र 

ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्‌ । 

रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्‌ ॥१॥

 *

दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम्‌ । 

उपगम्याब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा ॥२॥

 *

राम राम महाबाहो श्रृणु गुह्मं सनातनम्‌ । 

येन सर्वानरीन्‌ वत्स समरे विजयिष्यसे ॥३॥

 *

आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम्‌ । 

जयावहं जपं नित्यमक्षयं परमं शिवम्‌ ॥४॥

 *

सर्वमंगलमागल्यं सर्वपापप्रणाशनम्‌ । 

चिन्ताशोकप्रशमनमायुर्वर्धनमुत्तमम्‌ ॥५॥

 *

रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम्‌ । 

पुजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम्‌ ॥६॥

 *

सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावन: । 

एष देवासुरगणांल्लोकान्‌ पाति गभस्तिभि: ॥७॥

 *

एष ब्रह्मा च विष्णुश्च शिव: स्कन्द: प्रजापति: । 

महेन्द्रो धनद: कालो यम: सोमो ह्यापां पतिः ॥८॥

 *

पितरो वसव: साध्या अश्विनौ मरुतो मनु: । 

वायुर्वहिन: प्रजा प्राण ऋतुकर्ता प्रभाकर: ॥९॥

 *

आदित्य: सविता सूर्य: खग: पूषा गभस्तिमान्‌ । 

सुवर्णसदृशो भानुर्हिरण्यरेता दिवाकर: ॥१०॥

 *

हरिदश्व: सहस्त्रार्चि: सप्तसप्तिर्मरीचिमान्‌ । 

तिमिरोन्मथन: शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोंऽशुमान्‌ ॥११॥

 *

हिरण्यगर्भ: शिशिरस्तपनोऽहस्करो रवि: । 

अग्निगर्भोऽदिते: पुत्रः शंखः शिशिरनाशन: ॥१२॥

 *

व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजु:सामपारग: । 

घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथीप्लवंगमः ॥१३॥

 *

आतपी मण्डली मृत्यु: पिगंल: सर्वतापन:। 

कविर्विश्वो महातेजा: रक्त:सर्वभवोद् भव: ॥१४॥

 *

नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावन: । 

तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्‌ नमोऽस्तु ते ॥१५॥

 *

नम: पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नम: । 

ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नम: ॥१६॥

 *

जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नम: । 

नमो नम: सहस्त्रांशो आदित्याय नमो नम: ॥१७॥

 *

नम उग्राय वीराय सारंगाय नमो नम: । 

नम: पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते ॥१८॥

 *

ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे । 

भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नम: ॥१९॥

 *

तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने । 

कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नम: ॥२०॥

 *

तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे । 

नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे ॥२१॥

 *

नाशयत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभु: । 

पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभि: ॥२२॥

 *

एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठित: । 

एष चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणाम्‌ ॥२३॥

 *

देवाश्च क्रतवश्चैव क्रतुनां फलमेव च । 

यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमं प्रभु: ॥२४॥

 *

एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च । 

कीर्तयन्‌ पुरुष: कश्चिन्नावसीदति राघव ॥२५॥

 *

पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगप्ततिम्‌ । 

एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ॥२६॥

 *

अस्मिन्‌ क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि । 

एवमुक्ता ततोऽगस्त्यो जगाम स यथागतम्‌ ॥२७॥

 *

एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत्‌ तदा ॥ 

धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान्‌ ॥२८॥

 *

आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्‌ । 

त्रिराचम्य शूचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्‌ ॥२९॥

 *

रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागतम्‌ । 

सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधेऽभवत्‌ ॥३०॥

 *

अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमना: परमं प्रहृष्यमाण: । 

निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति ॥३१॥

 — — 

आदित्यहृदय स्तोत्र : भावानुवाद

 ☆ 

चिंतेने ग्रस्त श्रीरामचंद्र युद्धश्रमाने थकून रणी

युद्ध करण्या प्रत्यक्ष ठाके रावण समरांगणी ॥१॥

 *

देखूनिया तया रणी मुनी अगस्ती सरसावले 

भगवंत श्रीरामासमीप जाउनिया वदले ॥२॥

 *

महावीरा हे श्रीरामा गुपित सनातन ऐकशील

युद्धात सर्वांवरती विजयश्री प्राप्त करशील ॥३॥

 *

पावन आदित्यहृदय स्तोत्र सर्वशत्रूविनाशक

परम शिव नित्य अक्षय जपावे विजयदायक ॥४॥

 *

समग्र मंगलांमधील मंगल सर्वपापविनाशक

चिन्ताशोक शमन करी आयुष्य वृद्धीदायक ॥५॥

 *

सुर-असूर नित्य पूजिती किरणोमयी उदय होता 

विवस्वान भास्कर भुवनेश्वराचे पूजन करी आता ॥६॥

 *

आभा सकल देवांची तेजस्वी किरणकारण

सुर-असुरसहित समस्त लोकांचे करती पालन ॥७॥

 *

हाचि ब्रह्मा विष्णु हा शिव कार्तिकेय तथा प्रजापति

महेंद्र कुबेर काल हा यम विधु हाचि तेजाचा पती ॥८॥

 *

पितर वसू साध्य मरूद्गण मनु तथा अश्विनीकुमार

पवन वन्ही प्रजा प्राण ऋतू नियामक तेजस्वी प्रभाकर ॥९॥

 *

आदित्य खग सूर्य सविता गभस्तिमान पूष 

भानु हिरण्यरेत प्रभाकर सुवर्णसदृश ॥१०॥

 *

हरिद्रश्व सहस्रार्चि सप्तसति मरीचिमान

तिमिरोन्मथन शंभू त्वष्टा अंशुमान मार्तंड ॥११॥

 *

हिरण्यगर्भ शिशिर तपन दिनकर विवस्वान 

अदितीपुत्र अग्निगर्भ शंख शिशिरनाशन ॥१२॥

 *

व्योमनाथ ऋग्वेद यजुर्वेद सामवेद पारगमनी

जलमित्र घनवृष्टी विन्ध्यवीथीप्लवंग तमोभेदनी ॥१३॥

 *

आतपी मण्डली मृत्यू पिंगल सर्वतापन

कवि विश्व महातेज रक्त समस्त चरजनन ॥१४॥

 *

नक्षत्रतारांगणस्वामी तथा असुन विश्वभावन

तेजस्वीत तेजोमयी द्वादशारिक्त नामे तुज नमन ॥१५॥

 *

उदयाचल अस्ताचल रुपे नमन तुजला

नमन तारांगण स्वामी तथा दिनाधिपतीला ॥१६॥

 *

जयासी जयभद्रासी हरिताश्वासी असो नमन

सहस्ररश्मी शोभित आदित्यदेवा वारंवार नमन ॥१७॥

 *

उग्रासी नमन वीरासी सारंगासी पुनर्नमन

पद्मप्रबोधासी नमन प्रचंडासी असो नमन ।१८॥

 *

ब्रह्मा विष्णु महेश तुम्ही किरणांची प्रभा तुम्हा 

तेजःपुंजा सर्वभक्षका हे रौद्रा नमन तुम्हा ॥१९॥ 

 *

तम विनाशक अनुपमरूपी शत्रुनाशका विनाशक हिम

कृतघ्न नाशक देवा ज्योतिषपते तव चरणी प्रणाम ॥२०॥

 *

हरे विश्वकर्मा प्रभा तप्त सुवर्णासमान

तमारि प्रकेशरूपा सर्वसाक्षी तुला नमन ॥२१॥

 *

सर्व जीव संहारक समस्त सृष्टीचे पालक ईश

देव तापाचा सूर्य पर्जन्याचा नमन गभस्ती ईश ॥२२॥

 *

सुप्तरूपे समस्त जीवांच्या अंतर्यामी जागृत 

अग्निहोत्र्यांसी अग्निहोत्राचे फल हाचि अर्पित ॥२३॥

 *

देव हाचि यज्ञ हाचि यज्ञाचे प्राप्त फल

समस्त कर्मांचे विश्वातील हाचि देई फल ॥२४॥

 *

कष्ट असो वा आपत्ती दुर्गम मार्ग भय वा

याचे करता कीर्तन होईल निवारण राघवा ॥२५॥

 *

एकाग्र होउनी जगदीश्वराची करावीसी अर्चना

युद्धे विजय प्राप्ती करिता स्तोत्रा त्रिवार पठणा ॥२६॥

 *

वीरश्रेष्ठा युद्ध करुनी या क्षणी पराजित करशील दशानना

निघून गेले ऋषी अगस्ती देउनिया रघुनायका आश्वासना ॥२७॥

 *

चिंतामुक्त जाहले रघुवीर ऐकुनिया वचना

प्रसन्न चित्ते धारियले रघुनाथे ऋषीवचना ॥२८॥

 *

 नेत्र लाविले आदित्यावर त्रिवार आचमन 

शुचिर्भूत राघव सज्ज हाती कोदंडा धरून ॥२९॥

 *

समोर बघता दशाननाला राघव सरसावले

अरीवधाचा निश्चय करूनी युद्धसिद्ध जाहले ॥३०॥

 *

देवगणांसमवेत ठाकल्या आदित्यरविदेवाने

समरसज्ज श्रीरामास पाहिले मोठ्या हर्षाने

निशाचरपति रावणवधास सज्ज पाहुनी राघव

हे रघुनंदन त्वरा करावी वदले भास्करमित्रदेव ॥३१॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१५ ☆ सत्तरी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१५ ?

☆ सत्तरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सत्तरी आली आहे आणि मी तर—

अजून तिथेच घुटमळतेय,

तू आलास आयुष्यात,

त्या वळणावर,

आणि सगळा आसमंत…

घमघमून गेला तुझ्या येण्याचे !

गुणगुणत होते,

“सब कुछ लागे नया नया”

 

काहीतरी कारण हवे असते–

जगण्याला!

लग्न हे ही एक कारण!

 

आयुष्य पुढे पुढे सरकत राहिले,

काय खरे काय खोटे ?

मूक स्वीकारले पदरात पडलेले,

प्रत्येक दान—

ईश्वरी संकेत समजून!

 

आज तू नाहीस,

पण माझ्या सगळ्याच,

विशीतल्या आठवणी–‘

“तरोताज़ा” —-

मी उगाचच लावतेय हिशेब,

असे झाले नसते तर —-

तर तसेही झाले नसते!

आता सत्तरीत केली जरी–

परतीच्या प्रवासाची तयारी,

तरी मन आसक्तच!

भविष्याच्या गडद अंधारात,

हवाय मला चिमूटभर प्रकाश!

तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून–

मी येतेच आहे,

पण —

गतजन्मीचे हे सारे पाश,

जेव्हा सुटतील तेव्हाच!!

कुणीतरी म्हटलंय ना —

“खाली हाथ आए है, खाली हाथ जाना है !”

तरीही—

आज सत्तरीत मी माझी विशी आठवतेय!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || स्वप्ने पैशाची || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

|| स्वप्ने पैशाची || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

सर पावसाची येते, तसा येत राहो पैसा

कष्ट छोटे फळ मोठे, काही मार्ग मिळो ऐसा

बिछान्यात अंथराया, हवी चादर पैशांची

हाक नुसती मारता, पायी लोळण सुखांची

 *

ऐन उन्हाळ्यात वाहो, खोली भर गार वारा

घशा कोरड पडता, थंड थंड जल धारा

 *

चार नोकर चाकर, फिरण्यास चार चाकी

कुठे दिसता वाटेत, सारे आदराने वाकी

 *

काय तोशिक खर्चाची, स्वप्ने पाहण्यास छान

जरी आज पायथ्याशी, वर उंचावून मान

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ नाच ग घुमा नाच॥ ☆ कावेरी सुतार ☆

कावेरी सुतार

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ नाच ग घुमा नाच॥ ☆ कावेरी सुतार ☆

ती रोज येते.. अंगावरचे निळे वळ लपवून,

मालकीण बघते घड्याळाकडे, स्वतःचा तोरा जपून.

मोलकरणीचा उंबरठा रोज, नवऱ्याच्या मारहाणीने रडतो,

आणि इकडे मालकिणीचा चहा, फक्त वेळेअभावी अडतो.

नाच गं घुमा नाच, तू काळजावर दगड ठेवून नाच, 

त्याच्या मारहाणीच्या खुणा, पदराखाली झाकून नाच… 

*

मालकिणीला वाटतं, ही उशिरा येते आणि ‘नाटकं’ करते,

पण तिला काय माहीत, ती रोज मरणाशी झुंज देऊन घर भरते.

घर तिचंही आहे आणि काम या घराचंही तीच करते,

दोन घरांचा डोलारा, ती एकाच तुटलेल्या कंबरेवर धरते.

एके दिवशी पदर सरकतो, अन् वळ मालकिणीला दिसतात,

तिच्या मग्रुरीचे सगळे हिशोब, एका क्षणात विरून जातात.

ज्या हातांनी ती भांडी घासते, ते हात कुणीतरी सोललेत,

मालकिणीचे डोळे आज पहिल्यांदा, माणुसकीने ओले झालेत.

नाच गं घुमा नाच, आता सन्मानाचा गुलाल उधळून नाच, 

मालकिणीच्या डोळ्यांतलं ते, पश्चात्तापाचं पाणी घेऊन नाच…

*

मालकीण हळूच पुढे येते, तिची जखम हातात घेते,

आज मोलकरणीला नाही, तर एका ‘बहिणीला’ ती साथ देते.

ती मालकीण विसरते सत्ता, अन् मोलकरीण विसरते पीडा,

माणुसकीच्या नात्याने सुटतो, पिढ्यानपिढ्यांचा हा वेढा.

दुसऱ्याचं घर सावरणारी, ती कुणी ‘कामवाली’ नसते,

ती स्वतःला जाळून, दुसऱ्याचं घर उजळवणारी वात असते.

मालकिणीने झुकून आज, तिचे हात हातांत घेतले,

आणि खऱ्या अर्थाने मोलकरणीचे, उपकार आज मानले !

*

नाच गं घुमा नाच, आता मस्तक ताठ करून नाच, 

अन्यायाचा तो पिंजरा, पायाखाली तुडवून नाच.

.. अन्यायाचा तो पिंजरा, पायाखाली तुडवून नाच… 

© कावेरी सुतार

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथ टागोर व संगीत

रविंद्रनाथांना जन्मजात लाभलेल्या रूपसौंदर्यासारखंच सूर सौंदर्य देखील लाभलं होतं. ब्राह्मो समाजाचे आद्य गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती हे त्यांचे पहिले गायन गुरू. यदुभट्ट यांच्याकडेही त्यांचे संगीत शिक्षण झाले मात्र कोणत्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही. त्यांनी जवळ जवळ २२३० स्वरचित गाण्यांना चाली लावल्या.

रविंद्रनाथांच्या कविता; नाद, सूर, लय घेऊनच त्यांच्या लेखणीतून प्रकट होत. ते त्यांच्या कवितेला कधी कविता म्हणत नाहीत, गीत म्हणतात. इंग्रजी गीतांजलीतील कविता खरंतर prose poetry किंवा गद्य काव्य या प्रकारातील आहेत पण तरीही त्यांनी तिला ‘गीतांजली, song offering’ म्हटलंय. कदाचित मूळ बंगाली कविता, ह्या गेय असल्यामुळे असेल. कविता व गेयता यांचं नातं अनादि कालापासून भारतीयांनी अनुभवलेलं आहे. आपली वेद, उपनिषदे सुद्धा गेय काव्य रूपातच आहेत.

रविंद्रनाथांनी सुरांचे सामर्थ्य लहानपणीच ओळखलं होतं. त्यांच्या कवितेचा भाव; सुख-दु:ख, हर्ष- शोक, भक्ती- प्रीती कोणताही असो, त्यांचे शब्द, सुरांचा साज लेऊनच वहीच्या मंचावर नर्तन करीत प्रवेश करत. कवितेचं गाणं होताना सुरांतून इंद्रधनुष्य निर्माण होत असतं असं त्यांना वाटे.

“मला गायला कधी येत नव्हतं असं मला आठवतच नाही. ” असं ते म्हणायचे. गाणं रचताना ते गात गात रचावं व रचता रचता तद्रूप होऊन जावं अशी तन्मयता, उन्मादावस्था त्यांनी अनेकदा अनुभवली व एकदा एका खाजगी पत्रात वर्णिली पण आहे. ही अलौकिक अशी अध्यात्मिक परमावस्था नाही काय?

रविंद्रनाथांना भारतीय अभिजात संगीताची चांगली जाण होती. अनेक रागरागिण्यांचे संस्कार घेऊन त्यांची गीतं प्रकट होत. पण लोकसंगीताच्या देखील असंख्य चाली त्यांच्या गीतांमध्ये दिसतात. बंगाली लोकसंगीत मुळात अतिशय समृद्ध आहे. बाऊल, भटियाली, कीर्तन, काका, कविगान, श्यामा संगीत, फकिरांची गाणी, सूफी गाणी, वैष्णव भक्तांची गाणी, भादू सारखी कहाण्यांची गाणी, पाँचालि, जात्रापाला असे अनेक प्रकार त्यात आहेत. आपल्या संगीतासाठी ख्याल, ध्रुपद, ठुमरी, दादरा, टप्पा इथपासून लोकसंगीतापर्यंतच्या; इतकंच नव्हे तर पाश्चात्य संगीतावर आधारित चाली देखिल वापरण्याची रविंद्रनाथांची प्रतिभा पाहून अभ्यासक देखील चकित होतात.

रविंद्र संगीताचा बंगाली संगीतावरील प्रभाव आज देखील ठळकपणे जाणवतो किंबहुना खरंतर रविंद्र संगीतापासून बंगाली संगीत वेगळं करताच येणार नाही. त्यांच्या संगीताकडे चित्रपट क्षेत्रातील सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, नितीन बोस, तपन सिन्हा, कुमार साहनी यांच्यासारखे अतिरथी, महारथी आकर्षित झाले नसते तरच नवल! त्यांनी आपल्या चित्रपटात रविंद्रनाथांची गाणी वापरली. इतकेच नव्हे तर कांही ब्रिटिश, युरोपियन व ऑस्ट्रेलियन चित्रपटांत देखील त्यांची गाणी वापरली गेली आहेत. मात्र आपल्या गीतातील शब्दच काय पण सूर देखील बदलणं त्यांना मंजूर नव्हतं. आज सुध्दा त्यांची गाणी जशीच्या तशी गायली जातात.

 (संदर्भ: रविंद्रनाथ तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

——

गीत : ७३

DELIVERANCE is not for me in renunciation. I feel the embrace of freedom in a thousand bonds of delight.

Thou ever pourest for me the fresh draught of thy wine of various colours and fragrance, filling this earthen vessel to the brim.

My world will light its hundred different lamps with thy flame and place them before the altar of thy temple.

No, I will never shut the doors of my senses. The delights of sight and hearing and touch will bear thy delight.

Yes, all my illusions will burn into illumination of joy, and all my desires ripen into fruits of love.

——

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७३

☆ 

सर्वसंगपरित्याग करुनि

कशास मी मुक्त व्हावे ?

हजार बंधनात सुखाच्या,

मुक्तीला आलिंगन द्यावे॥

 *

काठोकाठ रस तू भरिशी 

मातीच्या या घटाघटातुनी

अनेक रंगी तिला रंगविशी,

अनेक तशा सुवासातुनी॥

 *

तव ज्योतीने दीप उजळतील

मम जगती, राऊळी लावण्या

पंचेंद्रिये मम सजग राहतील

तुझे शब्द, स्पर्श जाणण्या॥

 *

तव दर्शनास आसुसलो रे,

कसा करीन मी बंद लोचना

सारी सुखे ही तुझी देणगी

याच जाणीवा आणि भावना॥ 

 *

आनंद इतुका मला हवा की

आभास सारे त्यात मिटावे

तव प्रेमाच्या अंतर्यामी

मनोरथ माझे फलित व्हावे॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆  गीत : ७४ ☆ 

THE day is no more, the shadow is upon the earth. It is time that I go to the stream to fill my pitcher.

The evening air is eager with the sad music of the water. Ah, it calls me out into the dusk. In the lonely lane there is no passer by, the wind is up, the ripples are rampant in the river.

I know not if I shall come back home. I know not whom I shall chance to meet. There at the fording in the little boat the unknown man plays upon his lute.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७४ ☆ 

☆ 

लांब गेल्या सावल्या अन्

क्षितिजी टेकला दिनमणी

मावळतीची सुवर्णलाली

जलात नदीच्या आरसपानी॥

 *

सांजवेळी नदी किनारी,

घडा भराया जाईन म्हणते

उत्सुक सायंकाळ परंतु 

उदासवाणे गीत गाते॥

 *

तिन्हीसांजेच्या या प्रहरी

दूर कोण मज साद देते

वात लहर ती अवखळ भारी

पाण्यावर तरंग उठविते॥

 *

जाईन म्हणते, नसे माहिती 

परतुनि येईन की नाही

नदी किनारी, कुणा भेटण्या

जीव अनावर होतच राही॥

 *

गेले धावत निर्जन मार्गे

तोच उमटले मधु सूर बासुरी

एकल नावेमधे बैसला

अनोळखी जरी, खचित मुरारी॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆   गीत : ७५ ☆ 

THY gifts to us mortals fulfil all our needs and yet run back to thee un-diminished.

The river has its everyday work to do and hastens through fields and hamlets; yet its incessant stream winds towards the washing of thy feet.

The flower sweetens the air with its perfume; yet its last service is to offer itself to thee.

Thy worship does not impoverish the world.

From the words of the poet men take what meanings please them; yet their last meaning points to thee.

—–

☆   मराठी भावानुवाद : गीत : ७५ ☆ 

☆ 

 दान तुझे तुळस मंजिरी

उणे न कांही तुझ्या मंदिरी

भरभरुनि तू देतच जाशी

परतुनि ये ते तुझ्याच पाशी॥

 *

नदी वाहते शेतामधुनी

शमते तृष्णा गावामधुनी

अविरत वाहे, अखेर सरिता,

पादाभ्यंगा तुझ्याच करिता॥

 *

कुसुम गंधा पवन वाहतो

आसमंत हा पुलकित होतो

ध्येय अंतिम परंतु त्याचे

तुझ्याच पायी लीन व्हायचे॥

 *

तुझ्या पूजना सर्वस्व वाहतो

इथे परि कुणी नच गरीब होतो

भरभरून सुख जीवनी वेचतो

तुझीच किमया हे ही जाणतो॥

 *

 कवीच्या गीतांमधुनी अर्था

जो तो शोधी, पुरवित स्वार्था

परि अखेर जी गीते बोलती

कृष्ण भावना तुझीच की ती॥

☆ 

– क्रमशः भाग २५..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,

पण जेवणापूर्वी वदनी कवळआणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो llll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,

पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो llll

 *

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,

पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो llll

 *

हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,

आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ll

 *

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,

पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो llll

 *

बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,

पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो llll

 *

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो

आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो llll

 *

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,

पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो llll

 *

सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,

पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो llll

 *

इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,

आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

 *

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले,

फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही? म्हणून विचारू लागलो ll११ll

 *

साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली,

अन स्वीट स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

 *

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो,

पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

 *

फॉरवर्ड झालो, फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना,

स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणून बुजून) विसरलो…

*

कवी : अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares