☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९३ आणि ९४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९३ – –
जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ।
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचें ।।९३।।
अर्थ :खरे पाहिले तर जगामध्ये परमेश्वर हा सर्वांचे भरणपोषण करणारा आहे असे दिसते. त्याला खरोखरच सर्वांची काळजी आहे. तेव्हा, हे मना, त्याचे फुकटचे नाम घेण्यासाठी तुला काही खर्च करावा लागतो का?
विवेचन :या जगात आपण जन्माला आलो आहोत, तेव्हा आपल्या उदरनिर्वाहाची काळजी परमेश्वराला असतेच. कोणत्याही जीवाला जन्माला घालण्यापूर्वी त्याच्या जगण्याची व्यवस्था तो करतो. मूल जन्माला येण्यापूर्वी आईच्या स्तनात दूध निर्माण होते. मूल थोडे मोठे होईपर्यंत मग त्याला बाहेरचे काही द्यावे लागत नाही. आई त्याचं सर्व प्रकारचं भरणपोषण करते. जशी त्याची शारीरिक भूक ती भागवते, तसेच आईच्या सहवासात बाळाचे मानसिक आणि भावनिक देखील भरणपोषण होते. पुढे मग ती आपल्याजवळ उपलब्ध असणारे अन्न त्याला भरवते. जशी आई, तशीच परमेश्वर ही आपली माउली आहे. तिला आपली चिंता असतेच. आपल्याभोवती असणारा निसर्ग आपल्याला फळे, फुले देतो. शेतातील अन्न आपले भरणपोषण करते. ते पिकवण्यासाठी लागणारी बुद्धीदेखील आपल्याला त्यानेच दिली आहे. आईप्रमाणेच निसर्ग सुद्धा आपल्याला मानसिक, भावनिकदृष्टया समृद्ध करीत असतो. निसर्गातील नदी, वृक्ष, समुद्र असा प्रत्येक घटक आपल्याला कसे वागावे याचा काही ना काही संदेश देत असतो.
पण परमेश्वराने जरी व्यवस्था केलेली असली तरी कोणतेही अन्न आपल्याला जागेवर बसून मिळत नाही. ते मिळवण्यासाठी हालचाल, कष्ट करावेच लागतात. ही धडपड हेच त्याच्या जगण्याचे बळ आहे. या धडपडीतूनच सजीवाला जगण्याचे ध्येय आणि जीवन जगण्यासाठीची ऊर्जा प्राप्त होत असते. पण होते काय की इतर प्राणी सोडले तर या जगण्याच्या शर्यतीत मनुष्य कमालीचा स्वार्थी बनतो. तो आपल्या गरजेपुरते न घेता इतरांच्या वाट्याचेही ओरबाडून घेतो. निसर्गालाही ओरबाडतो. त्यामुळे परमेश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर जगात कोणाजवळ संपत्तीचा प्रचंड साठा केंद्रित होतो, तर कोणाला दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. ही विषमता मानवनिर्मित आहे. सध्या जगात सुरु असलेली युद्धे याच संपत्तीच्या आणि सत्तेच्या हव्यासापायी होताना दिसत आहेत.
या जगात आपण मोजू शकणार नाही इतके अगणित प्राणी आणि जीवजंतू आहेत. त्यांची जगण्याची व्यवस्था आपण करतो का? तो परमेश्वरच त्यांना जन्माला घालतो, तोच त्यांचे भरणपोषण करतो. इतके असूनही माणसाला आपल्या कर्तृत्वाचा किती अहंकार असतो! घरात एखादा कुटुंबप्रमुख एकटा कमावता असेल तर त्याला वाटते मी कमावतो म्हणून या सर्वांना बसून खायला मिळते. माझ्यामुळेच घर चालले आहे. आपण नोकरी करतो. जिथे काम करतो तो मालक किंवा ते व्यवस्थापन आपल्याला त्याबद्दल पगार देते. पण त्या मालकाला देखील देणारा कोणीतरी असतोच ना! थोडक्यात म्हणजे मालकाचा देखील कोणीतरी मालक आहेच. त्या मालकाला तुम्ही आम्ही का ओळखत नाही? हा मालक म्हणजे परमेश्वर. व्यापक अर्थाने तो सर्वांचे हित पाहणारा आहे.
नवऱ्याने एखादा दागिना घेतला तर बायकोला कोण आनंद होतो! ती मोठया कौतुकाने सगळ्यांना सांगत सुटते. आपल्या नवऱ्याची तारीफ करते. पण ज्या भगवंताने तो दागिना घालण्यासाठी तुला हे सुंदर शरीर दिले आहे, त्याची कधी आठवण येते? त्याची तारीफ तू करतेस का? म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वर जर सर्वांची काळजी घेतो, पालनपोषण करतो, तर त्याचे स्मरण आपण का करत नाही? जेवल्यानंतर आपण ‘ अन्नदाता सुखी भव ‘ असे म्हणून जेवण देणाऱ्याला धन्यवाद देतो. मग खरा अन्नदाता तर तो आहे. त्याला देतो का आपण धन्यवाद? त्याचे नाम घेण्यासाठी तर काही पैसे खर्चावे लागत नाहीत. ‘ कृतघ्नता ‘ हे सर्वात मोठे पाप आहे. अन्नदाता असणाऱ्या भगवंताबद्दल आपण कृतज्ञ राहून त्याचे नित्य स्मरण करायला हवे. त्यासाठी काही खर्च करावा लागतो का? तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. ते म्हणतात
का रे नाठविसी कृपाळू देवासी । पोसतो जनासी एकला तो ।
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ति । वाढवी श्री-पति सवें दोन्हीं ॥
*
फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयांसी कोण घाली ।
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहें त्या अनंता आठवूनी ।
तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करीं ॥
स्वसंवाद ::
१. “माझ्यामुळेच माझे घर आणि कुटुंब चालले आहे” अशा कुठल्या खोट्या अहंकाराच्या ओझ्याखाली मी वावरत आहे का?
२. रोज जेवताना ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणताना, चराचरातील अनंत जीवांचे विनासायास पालनपोषण करणाऱ्या त्या खऱ्या ‘विश्वंभराची’ मला आठवण होते का?
३. ज्या भगवंताने मला हे सुंदर शरीर, बुद्धी आणि जगण्याची साधने दिली, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विनामूल्य असणारे नाम घेताना माझे काय ‘वेचते’ (खर्च होते)?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांनाही पालवी फुटणारे पाणी देणारा तो ‘अनंत’ जर माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे, तर मी संसाराची व्यर्थ चिंता का करत बसलो आहे?
=====
श्लोक क्र. ९४ – –
तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ।
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ।।९४।।
अर्थ :भगवान शंकर जर कोपले आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला तर तिन्ही लोक जाळून भस्म करू शकतात.अशा महासामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला, तेव्हा रामनामाचा आश्रय घेतल्यावरच तो शांत झाला. माता पार्वती देखील अत्यंत आदराने रामनाम जपते. म्हणून आपण देखील त्याच रामनामाचा आश्रय घ्यावा.
(तिन्ही लोक -स्वर्ग-मृत्यू-पाताळ, निवाला – शांत झाला, हरू – भगवान शंकर)
विवेचन : या ठिकाणी रामनामाचे महत्व स्पष्ट करण्यासाठी समर्थ पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यामागे आपल्या हिताची कळकळ आहे. एखाद्या अभ्यास न करणाऱ्या मुलाला आईवडील जसे एखाद्या अभ्यास करणाऱ्या मुलाचे उदाहरण पुन्हा पुन्हा देतात, तसेच हे आहे. भगवान शंकर देवांमध्ये श्रेष्ठ. म्हणून ते ‘ महादेव ‘ ब्रह्मदेव जगाची निर्मिती करतात, विष्णू जगाचे पालनपोषण करतात तर शंकर हे संहारकर्ते मानले जातात. त्यांच्या ठायी एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी केवळ आपला तिसरा नेत्र उघडला तर क्रोधाने ते हे त्रिभुवन जाळून भस्म करून टाकू शकतात.
अशा सामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाच्या हेतूने हलाहल विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या कंठाचा प्रचंड दाह होऊ लागला. शीतल चंद्र माथी धारण करून, पवित्र आणि शीतल अशा गंगेला शिरावर धारण केले. एवढे करून देखील त्यांचा दाह शमला नाही. पण अमोघ अशा रामनामामुळे त्यांचा दाह शांत झाला. एवढे सामर्थ्य रामनामाचे आहे. जी विश्वमाता आहे, जगज्जननी आहे अशी माता पार्वती देखील रामनामाचा जप करते. म्हणून आपणही तेच नाम घ्यायला हवे असे समर्थ आपल्याला उदाहरणासह पटवून देतात.
या श्लोकाचा अर्थ आपल्याला वेगळ्या प्रकारेही घेता येतो. आपण मानव म्हणजे गुणदोषांचे पुतळे असतो. क्रोध हा आपला एक प्रमुख शत्रू असतो. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, नातेसंबंध भस्म करण्याची शक्ती असते. त्यासाठी रामनामाचा आश्रय घेणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. रामनामामुळे मन शांत होऊ लागते, क्रोध कमी होऊ लागतो. भगवंताचे नाम हे शांती आणि सौख्य प्रदान करणारे आहे. म्हणून तेच आदरपूर्वक घ्यावे.
स्वसंवाद ::
१. माझ्या मनात जेव्हा ‘क्रोधाचा’ (रागाचा) भडका उडतो, तेव्हा मी माझे विवेक आणि नातेसंबंधांचे ‘त्रिभुवन’ जाळून खाक करतो का? त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी काय करतो?
२. जर तिन्ही लोकांना कवेत घेणारे महादेव आणि अखिल विश्वाची माता असणारी पार्वती अत्यंत आदराने रामनाम जपतात, तर संसारी विवंचनेत अडकलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?
३. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या चिंता आणि संतापाचा दाह शांत करण्यासाठी, मी कधी शांत चित्ताने रामनामरूपी शीतलता अनुभवली आहे का?
४. “म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता” हा समर्थांचा आग्रहाचा शब्द ऐकून, मी उद्याची वाट न बघता ‘आता’ या क्षणापासून नामस्मरण करायला तयार आहे का?
(श्रीमती शशि सुरेश सराफ जी सागर विश्वविद्यालय से हिंदी एवं दर्शन शास्त्र से स्नातक हैं. आपने लायंस क्लब और स्वर्णकार समाज की अध्यक्षा पद का भी निर्वहन किया. आपका “लेबल शशि” नाम से बुटीक है और कई फैशन शोज में पुरस्कार प्राप्त किये हैं. आपका साहित्य और दर्शन से अत्यधिक लगाव है. आप प्रत्येक शुक्रवार श्रीमती शशि सराफ जी की रचनाएँ आत्मसात कर सेंगे. आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता ‘स्वतंत्रता का सौभाग्य…‘।)
☆ शशि साहित्य # ३५ ☆
कविता – स्वतंत्रता का सौभाग्य… ☆ श्रीमती शशि सुरेश सराफ
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९१ – –
नको वीट मानू रघुनायेकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ।
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।
अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, ” हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा (वीट) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.
(वाचा – मुखाने, न वेचे – खर्च करावे लागत नाही)
विवेचन : मनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.
ते नाम किती सोपे आहे! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ‘ नाम ‘ हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात, ” सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ” सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.
समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ‘ जानकीवल्लभ ‘ हे ते नाम! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम!अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. “अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।” या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल. गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ‘ केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ‘अनुभवून तर बघा!
स्वसंवाद ::
१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला ‘वीट’ (कंटाळा) का येतो?
२. “नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे, ” या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का?
३. जानकीवल्लभ श्रीरामांचे नाम केवळ ओठांवरून उच्चारण्याऐवजी, मी कधी पेढ्यासारखी त्याची आंतरिक गोडी अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?
४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ ‘आवडीने आणि आदराने’ त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो?
=====
श्लोक क्र. ९२ – –
अती आदरे सर्व ही नामघोषे ।
गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।
हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।
विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।
अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात)
विवेचन : भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.
भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात
नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥
– – श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ‘ जेथे नाम तेथे माझे प्राण ‘ असे म्हणतात.
नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात.
रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात…
उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥
भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो.
स्वसंवाद ::
१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय?
२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत ‘यांत्रिकपणे’ भटकत राहते का? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे?
३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, “जेथे नाम तेथे माझे प्राण” यावर माझा विश्वास आहे का?
४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का?