मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मृती सावली… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ स्मृती सावली… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मनातल्या ईच्छांना स्पर्श वेदनेचा

वियोगात स्मृतींना शाप साधनेचा.

*

भाव होऊनी एकजूट स्पंदनात

गतजन्मीच्या त्याच खुणा स्फुंदणेचा.

*

सांगत मी जावे पुन्हा, साक्ष प्रांगणेचा

सुंदर जीवन की संसार झिंगणेचा.

*

सावली घेऊनी आयुष्य क्षितीज पार

रंग भिन्न हेतूत चित्र पांगणेचा.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘गारंबीचा बापू ‘ या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे.

‘अजब सोहळा, माती भिडली आभाळा… ‘

रवींद्र साठे यांनी असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे. पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली? आपण कधी गेलो का तिथे? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न.

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या.

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥

जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरु राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला.

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला (पैस) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत.

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या.

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी उगीच नाही

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता, तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे.

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे.

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे.

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहुचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे.

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रेवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

(“बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”) 

इथून पुढे – – – 

तिथून फुडं दरवर्षी संत बहिणाबाई पोथी पारायन सुरू झालं. नंतर मातुर कुटलीबी घटना घडली नाय. त्यामुळं हळूहळू गावाचा ईस्वास पारायनावर बसला आनि जोमाने उत्सवाप्रमानं अत्यंत उत्साहात पारायन सुरू राहिलं. चार वर्षं झाली. यंदाचं पाचवं वरीस. पारायन सुरू झालं. दोन दिस झालं आनि अचानक कोल्हापूरहून मोतीलाल शेटजी गाडीतून गावात आले. त्यांचं चार पिढ्यांपूर्वी गावाशी नातं हुतं. गावात दुकान हुतं. पन पोरं बाहेर पडल्यामुळे दुकान तेंव्हाच बंद पडलं हुतं. रहातं घर पूर्वीच विकलं हुतं. दोन पिढ्या कोल्हापुरात राहून गडगंज झाल्या हुत्यात्या. सगळं येवस्थित हुतं. त्यास्नी वंशाला दिवा हवा म्हनून कुनीतरी सांगितलं, गावाकडं दान धर्म करायला होवा. त्यांना गावाचा ठावठिकाना लागला आनि त्यांनी ईचार केला की, आपलं पूर्वज जिथं रहात हुतं ते गाव तर पाहून यिऊ. तिथंच काही मदत करता आली तर पूर्वजांची आठवन म्हनून करू. मंडप पाहून शेटजींनी कार्यक्रमाची समदी इचारपूस केली. आता काय चाललंय इचारलं. पाटील, पंच, बाबा सर्वांच्या गाठी घेतल्या आनि समद्या गावकर्ऱ्यांफुडं जाहीर केलं की, मंदिर बांदायला सुरुवात करावी. मी लागल इतका दगड कोल्हापूरहून आननार हाय आनि मंदिराला दान करनार हाय.

बाबांना लई आनंद झाला. देवीनंच सुरूवात करून दिली. आता मंदिर होनार टप्प्याटप्प्यानं. फुडच्या वर्षात बाकी देनग्या गोळा केल्या. लाखभर रूपय जमा झालं. मंदिराबरोबरच समोर नंदी, तुळस सर्व काम झालं. रंगकाम झालं. मंदिर दिमाखात हुबं राहिलं. एक दिस कळस बसवावा आनि होमाचा कार्यक्रम करावा असं ग्रामपंचायत मिटींगमधे ठरलं. त्याप्रमानं बाबांनी पंढरपुरातून संन्यासी धुंडामहाराजांना निमंत्रित केलं. त्यांच्या हस्ते कळस बसवावा असं ठरलं. सांगलीतून कळस आनला. एका शुभ दिशी धुंडामहाराज आले. पालकी प्रदक्षणा झाली. पाच जोडप्यांनी मिळून होम केला. देवीची पूजा केली. पंचामृत स्नान झालं. देवी सजली. तेजस्वी दिसायला लागली. महाराजांनी कळसाचं पूजन केलं आणि मंदिरावर चढून कळस बसवला. खाली उतरले. सर्व विधी यथासांग झाले हुते. आता महाराजांनी प्रवचनाला सुरूवात केली.

“लोकहो, आपन सर्वांनी मंदिर बांदायचा पवित्र विचार केला. त्याला देविनं दुजोरा दिला. चार वर्षं आपल्याकडून सेवा करवून घेतली. आपल्याला देविनं खूप अनुभव दिले. परीक्षा पन बघितली.

सर्जाला इजा बी झाली. बरा बी झाला. हीच मोठी परीक्षा हुती. तिथं तुमी थांबला असता. पारायन थांबवलं असतं तर तुमी नापास झाला असता देविच्या परीक्षेत पन तुम्ही धीर धरला. देवीवर ईस्वास ठिवला. यालाच “श्रद्धा” म्हनतात.

ती तुमी दाखिवली. देविने ती पाह्यली. देवी प्रसन्न झाली. तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ही श्रद्धा पुना कदीबी डगमगू दिऊ नका. म्हनजे प्रत्येकाचे जन्माला येऊन सार्थक झाले म्हनता यिल. ”

“आता महत्त्वाचा ईषय हाय. आपल्या गावातील भुलाबाईचा. ती हाय का इथं? ”असे म्हनून महाराज लोकांकडे पहायला लागले. ती लांब हुबी राह्यली हुती. कुनीतरी तिला बोलावलं आणि फुडं आनलं. महाराज म्हणाले, ”भुला, ये बाई फुडं. आता मला सांग, तुझ्या अंगात येतं म्हन्जे काय हुतं ते सांगता यील का? ”

भुला म्हनली, “महाराज ढोलकी वाजली की काय तरी हुतं. मेंदूला बाकी कायबी कळत न्हाय. निस्त कामातनं गेल्यावानी हुतं. कशाचीबी सूद रहात न्हाय. म्यां येकदमच नाचायला लागते. मला काय बी कळत नाय. बाया ईचारतात एकेक प्रश्न पन म्यां मला वाटतंय ते सांगते. बाया माझी वटी भरत्यात. साडी, कापडं जमा हुत्यात. पैसं देत्यात. माजा प्रपंच चालतो. मला महत्त्व देत्यात. मी कुटंबी चोरी केली नाय बगा. आईची सेवा करते”

महाराज म्हणाले, “भुला, देवी दिसती व्हय तुला? ” “नाय बा”

“मंग तू मंदिर बांदू नका हे कसं सांगितलंस? ”

“आवं, पूर्वापार अनुभव हाय. कुनाकुनाच्या सपनात देवी ईती. मंदिर बांदन्यापेक्षा शेवा जास्त झाली तर पुन्याईपन वाढल आनि देविच्या वाटला बी नगं, श्रापबी नगं म्हनून म्या तसं सांगितलं. ”

“बरं, या दोन दिसांत तुझ्या अंगात का आलं नाही? ”

“आवं, ढोलकी कुटं वाजली? ”

असं म्हनताच समदीकडं एकच हशा पिकला. भुलाबाईला कळंना का हसत्यात. ती कावरीबावरी झाली. तिला सन्मानाने व्यासपीटावर आनलं.

महाराज म्हनाले, ” पाटील आणि पंचहो, आपल्या गावातील मानसांच्या ईकासातही आपन लक्ष घालायला हवं. निसत्या इमारती, मंदिर बांदून ईकास कसा हुनार? लोकहो, अंगात का येतं तर ज्या मानसाकडं कुनी लक्ष देत नाय, ज्या मानसाला जगन्याचं साधन नसतं, त्याला वाटतं का नाही की माझ्याकडं लक्ष द्यावं, मला जगायला साधन हवं. त्याची काय चूक? त्याच्या मेंदूत चलबिचल हुते. मानसिकता बिगडते. आनि कायतरी वाजायला लागलं की ही मानसं घुमायला लागतात आनि विच्छा पूर्न करून घेतात. ”

पाटलानं हात जोडलं, “चुकलं महाराज. आता काय करू आमी? तुमीच सांगा”

“आता असं करा, या भुलाच्या जगन्यासाठी समद्या गोष्टींची येवस्ता करा. आता पहिली गोष्ट, सर्वांनी भुलाबाई म्हन्जे देविच जनू, या देविच्या घराची डागडुजी करा. तिला झेपेल ते काम द्या. ग्रामसेविका, शिपाई असं काय बी करा. ती जगेल आनि नीट राहिल. महिला सक्षम करा म्हनत्यात म्हन्जे आनखी तरी काय? ”

भुलाबाईनं अश्रूंचा अभिषेक महाराजांच्या पायावर घातला. तिला साडी चोळी करून सन्मानाने घरी पाटविले.

या गोष्टीला एक वरीस झालं. धुंडामहाराज पुन्यांदा बघायला आले आणि पारायनालाबी. त्यावेळी भुलाबाई सर्वांत फुडं वाचायला बसली हुती. नीट नेटकं आवरून चापून चोपून साडी नेसून वाचत हुती. तिच्या घराची डागडुजी बी झाली हुती. दुपारी प्रसाद वाटप झाल्यावर तिनं महाराजांना घरी येन्याची इनती केली. महाराजांनी घर पाहिलं. टुमदार घर पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी भुलाला आशीर्वाद दिला. एक मुलगी सक्षम झाली. संत तुकारामांचा अभंग त्यांच्या मनात रूंजी घालू लागला. “जे कां रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले||तो चि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा||अभंग गुनगुनत समाधानातच ते पंढरपुरला परत आले. अशारितीने देवीच्या निमित्ताने अंधश्रद्धा दूर होन्याबरोबरच गावात महिला सक्षमीकरण सुरू झाले.

 – समाप्त –

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी मायबोली माझा अभिमान!! ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी मायबोली माझा अभिमान!! ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।

खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत कारण मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी ही भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. मराठी माणसाची खासियत अशी की तो हिन्दी संस्कृत या भाषा सहज आणि सोप्या रीतीने समजू बोलू शकतो. तसेच इंग्रजी बोलणे ही त्याला सोपे जाते कारण मराठी भाषा ही या भाषांमधूनच विकसित केली गेली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली आहे. तसेच तिचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहे. त्यात विदर्भाची भाषा, कोकणी, मालवणी अश्या मराठी पूरक भाषांचा समावेश आहे.

मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड व अनेक संत कवींच्या रचना, अभंग यांनी ती परिपूर्ण तर आहेच शिवाय ती मराठी मनाचा हळवा कोपरा आहे. मराठी मनाची शान आहे.

उद्योग, व्यवसाय, संगणक या बदललेल्या युगातही मराठी कोठेही कमी पडत नाही म्हणजेच ती पोट भरण्याचेही साधन आहे.

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे.

बराच वर्षांपासून इंग्रजीमाध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्व देणे कमी झालेले दिसत आहे. मराठी भाषेतील साहित्य कविता, नाटके, प्रवास वर्णने, निबंध, लघुनिबंध ह्यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो. मराठी साहित्यातील साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे.

मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

जय मराठी!

जय महाराष्ट्र!

जय भारत!

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

माझी आई सरदार बोकिलांकडची. पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांमधला एक पूर्ण शहाणा सखारामपंत बोकिल, यांची ही वंशज. वडिल बळवंतराव व आई गीताबाई यांचं माझी आई हे शेवटचं अपत्य म्हणजे शेंडेफळ. तिला एक मोठा भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी. भावाचं नाव अण्णाजी. माझा मामा अण्णाजी बळवंत बोकिल उतारवयात आपला जेष्ठ मुलगा बळवंत (आजोबांचं नाव काही विशिष्ठ हेतूनं पुन्हा नातवाला ठेण्याची त्यावेळी पद्धत होती. त्यामागे काही श्रद्धा असाव्यात.) याच्याकडे रहात असे. हिवरे, चांबळी, घोरपडी इथल्या काही जमिनी विकून त्यांनी पर्वती पायथ्याला एक बंगला घेतला होता, तो आजही आहे.

१९८० च्या मे महिन्यात माझा मामा गेला. ही दुःखद वार्ता कळताच त्वरित मी, माझी आई रिक्षा करून मामाच्या घरी पोहोचलो. आईला पाहताच मामीनं, ” वन्सं, हे काय झालं हो ” म्हणून हंबरडा फोडून आईला गळामिठी मारली. दोघीही ढसाढसा रडल्या. भावनांना आवेग ओसरला आणि मग काय झालं, कसं झालं वगैरे माहितीची देवाण-घेवाण झाली.

थोडयाच वेळात इतर आप्तेष्ट, नातेवाईक, परिचित, शेजारी जमू लागले. जागोजाग, घरात, बाहेर लोक उभे होते. स्त्रिया आतल्या खोलीत मामी, वहिनी यांच्या भोवती होत्या. अनुभवी जाणकारांनी पुढची कार्यवाहीची सूत्रं हाती घेतली. मला आणि काही लोकांना वैकुंठात जाऊन तिथल्या पुढच्या व्यवस्था बघण्याचं दायित्व दिलं गेलं. सूचनेप्रमाणे आम्ही स्मशानभूमीवर गेलो.

गेल्या गेल्या मी पहिलं काम केलं मोघे गुरुजींना कळवण्याचं. त्यानंतर विद्युत दाहिनीची व्यवस्था. पण ती नेमकी बंद होती. त्यामुळे पारंपारिक पद्धतीनं अग्निसंस्कार करणं भाग होतं. मग इंधन, सरपण, लाकडं, गवऱ्यांची व्यवस्था करणं आलं. मृतव्यक्ति कोण आहे, पुरुष का स्त्री, तरुण का वृद्ध का बाल त्यावर किती इंधन लागेल हे ठरतं हे तिथं कळलं. वखावाल्यानं आवश्यक तेवढं इंधन हातगाडीवर भरलं. सोबत एक सहाय्यकही दिला गाडीबरोबर. मी स्मशानातला, त्यातल्यात्यात स्वच्छ असा एक चर निवडला. तिथं लाकडं उतरून घेतली. माझी धावपळ चालू होती.

सहाय्यकानं सरण रचायला घेतली. सरण रचण हे ही एक तंत्रकौशल्य आहे. त्यानं सर्वात खाली लाकडी ओंडक्यांचा एक थर दिला. त्यावर आडव्या उभ्या लाकडांनी चारी बाजू भक्कम केल्या. वर दुसरा थर देऊन तो थांबला.

तोपर्यंत सूर्यास्तही झाला. अंधार पडू लागला. स्मशानातले पिवळे सोडियम व्हेपरचे दिवे लागले. दिवसा आकाशात विहरणारे पक्षी चिवचिवाट करीत, झाडाझाडात दडलेल्या आपापल्या घरट्यात परतले आणि त्याच झाडाझाडातून वाघळांचे थवे किचकिचाट करीत बाहेर झेपावू लागले.

परस्पर स्मशानात येणारे आप्तेष्ट एकेक करून जमू लागले. पंधरा-वीस मिनिटात शववाहिनी पोहोचली. तिच्या बरोबर दोन चाकी चारचाकीतून आलेले स्नेही, सोबती, नातेवाईक आले. सर्वांनी श्रीरामनामाच्या घोषात मामाचं पार्थिव गाडीतून बाहेर काढून सरणाच्या बाजूला ठेवलं.

धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य मांडलं गेलं. पाच मिनिटात मोघे गुरुजीही आले. सरण अर्ध्यापर्यंत रचून झालं होतं. आमचा दादा (मामेभाऊ) वस्त्रं बदलून पुढल्या विधीसाठी सज्ज झाला. गुरुजींनी मत्रोच्चारास आरंभ केला. बाजूला ठेवलेल्या पत्रावळीवरच्या सातूच्या पिठाकडे बोट दाखवून ” कोणीतरी या पिठाचे पाच सारख्या आकाराचे पिंड वळायला घ्या बरं”. गुरुजींनी सभोवती उभ्या राहिलेल्यांकडे बघून आज्ञा केली. मी पटकन पुढे होऊन ते कार्य करू लागलो. “आता बॉडी उचलून चितेवर ठेवा”. पुढची आज्ञा झाली. चार-सहा लोकांनी देह तिरडीवरून उचलून चितेवर ठेवला.

गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे मी केलेले पाच पिंड दादा नं मामाच्या देहावर ठेवले. त्यानंतर इतरांनी सहाय्यकाच्या मदतीनं उरलेली लाकडं, गावऱ्या रचल्या. एकानं शिंकाळ्यातलं मडकं उपडं करून त्यातला निखारा भूमीवर ओतला. गुरुजींनी प्रेताला अग्नी द्यायला सांगितला. गवरीची दोन खांडं हातात घेऊन, दादानं तो निखारा उचलून अश्रूभरल्या डोळ्यांनी चितेवर ठेवला आणि त्याला अनावर हुंदका आला. दोघांनी त्याला धरून जरा बाजूला नेलं. इतरांनी एकेक कोळंगा चितेवर ठेवला.

भावनांचा ओघ ओसरल्यावर दादानं जलानं भरलेलं मडकं डाव्या खांद्यावर धरून चितेला तीन प्रदक्षिणा घातल्या. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना कोणीतरी दगडानं (यालाच अष्मा म्हणतात). मडक्याला एकेक छिद्र पडलं. शेवटी चितेकडं पाठ करून त्यानं तो घट खांद्यावरून मागे सोडला. मोठ्ठा ‘फाट्’ असा ध्वनि उठून ‘घटस्फोट’ झाल्याचे जगजाहीर झाले! डाव्या हाताची पालथी मूठ ओठांवर आपटून बोंब मारली आणि तो मटकन खाली बसला!

अग्नी धुमसू लागला. आसमंतात धूरच धूर झाला. अजून ज्वाळा दिसत नव्हत्या. पाच मिनिटं वाट पाहून एकानं पश्चिमेच्या बाजूनं चितेवर बाटलीतलं घासलेट शिडकलं आणि एकदम लाल, भगव्या, पिवळ्या ज्वाळांचे लोळ वरती उसळले. सारी शेड त्या प्रकाशानं उजळली. भोवताली कोंडाळं करून उभ्या राहिलेल्या लोकांच्या चित्रविचित्र कृष्णछाया शेडच्या भिंतींवर, छतावर नाचू लागल्या.

मी जवळच उभा होतो. ज्वाळांचा प्रकाश आणि धग असह्य झाल्यामुळे मी डोळे मिटून पटकन थोडा मागे सरकलो आणि मान एका बाजूला वळवली. दोनेक क्षण गेले असतील. मी डोळे उघडले. सहज माझं लक्ष शेडच्या कोपऱ्याकडं गेलं. दिसलं की तिथं एक काळा कभिन्न, सहा फूट उंचीचा, सत्तरी पार केलेला, मुंडन केलेला, हातात दंड, अंगावर भगवं कौपीन, पायात खडावा, कपाळावर, दंडांवर भस्माचे आडवे तीन पट्टे लावलेला सन्याशी उभा आहे!

त्याच्या अंगावरची भगवी वस्त्रं चितेतून उठलेल्या केशरी, लाल, पिवळ्या रंगाच्या ज्वाळांच्या प्रकाशात अधिकच उठून दिसत होती. त्याचे टपोरे पाणीदार डोळे अधिकच चमकत होते. मी पटकन डोळे मिटून पुन्हा उघडले. मला काही भास तर होत नाहीये ना? मी चार-पाच वेळा डोळ्यांची उघडझाप करून पाहिलं. पण तो भास नव्हता, वास्तव होतं.

तो सन्याशी माझ्याकडेच पहात होता. जिथं तो उभा होता त्या कोपऱ्याकडे इतरांची पाठ होती. तिकडं कोणाचं लक्षही नव्हतं. मी त्याची दृष्टी टाळत दुसरीकडे पाहिलं. काही क्षणानंतर माझ्या मनाविरुद्ध माझी दृष्टी पुन्हा एकदा त्याच्याकडं गेली. तो अजूनही माझ्याकडेच एकटक पहात होता. आमची दृष्टभेट झाली. माझा घसा कोरडा पडतोय असं मला वाटलं. मी एक कोरडा आवंढा गिळला. तेवढ्यात त्यानं मला मान हलवून खुणेनं जवळ बोलावलं. मी जागचा हललो नाही पण माझ्या मणक्यातून एक लहर शिरशिरली. क्षणभर थांबून त्यानं आता हातानं जवळ येण्याचा संकेत करताच माझी पावलं त्याच्याकडं ओढली गेली.

मी त्या स्वामींच्या जवळ गेलो आणि वाकून नमस्कार करू लागताच ते थोडे मागे सरकत पुटपुटले, “please don’t touch my feet. It’s not required. May God bless you and your family. ” मी हात जोडून उभा राहिलो. माझे थरथरते हात त्यांनी पाहिले असावेत. ते म्हणाले, ” Don’t be affred young man, relax. I wish to congratulate you and your relatives. ” त्यांच्या त्या अश्वासक शब्दांनी मी काहीसा तणावमुक्त झालो. ” मी विचारलं, ” Why Sir, what is the reason? ” त्यावर ते म्हणाले, ” Because you deserve it. You are doing a great job. “

माझ्या लक्षात आलं की हे कोणी उच्च शिक्षित योगी, संन्यासी असावेत. त्यांच्या इंग्लिश शब्दोच्चारावरून हे ही ध्यानात आलं की ते अमराठी आहेत. बहुदा दक्षिण भारतीय असावेत. तरीही मी म्हणालो, “स्वामिजी मै क्या सेवा कर सकता हूँ आपकी? ” त्यावर जरा संकोचून ते उत्तरले, “I am sorry my boy, I don’t understand Hindi or Marathi. I can speak English, Sanskrit and almost all South Indian languages. Tamil is my mother toung. ” यावर मी इंग्लिशमधे पृच्छा केली, ” I am very sorry, what can I do for you sir? ” (पुढील संभाषण मराठीतच सांगणं बरं.)

“ज्या व्यक्तीची उत्तरक्रिया इथं चाललीय ती दिवंगत व्यक्ति कोण आहे? आणि जो इतक्या आपुलकीनं, भक्तिभावानं क्रियाकर्म करतोय तो कोण आहे? नक्कीच तो सुसंस्कृत परिवारातला असणार. गेला अर्धातास मी बघतोय, सगळे विधी यथासांग आणि शास्त्रवत होतायंत. हे मंत्रोच्चर करणारे, विधिक्रम सांगणारे पंडितजी सुद्धा सुशिक्षित आहेत. तुम्ही मंडळी उच्चकुलीन वाटता. महाराष्ट्रीय ऋग्वेदी ब्राह्मण आहात ना? संकल्प सोडताना त्या कर्म करणाऱ्या मुलानं पंडितजींना आपलं गोत्र, प्रवर सांगितलं त्यावरून मी ताडलं. बरोबर ना? ” स्वामींच्या निरीक्षणशक्तीनं मी थक्क झालो. त्यांचा अभ्यास जाणवला. त्यांचा तर्क योग्य असल्याचं मी त्यांना सांगताच त्यांच्या मुखावर समाधानाची छटा उमटली.

आमच्या संभाषणातून मला स्वामींविषयी काही त्रोटक माहिती मिळाली. त्यांचं सध्याचं (सन्यास ग्रहण केल्यानंतरचं) नाव ‘स्वामी चिद्विलासानंदभारती’. ते त्यांच्या कोणा परिचिताच्या अंत्यविधीसाठी उत्तर काशीहून पुण्यात आले होते. विलंब नको म्हणून मृत व्यक्तीच्या निवासस्थानी न जाता ते लोहगाव विमानतळावरून टँक्सीने परस्पर वैंकुठ स्मशानभूमीवर आले होते. त्यांची अपेक्षित मंडळी अजून आलेली नसल्यामुळे ते इथंच थांबले होते त्यांच्या प्रतीक्षेत, एका कोपऱ्यात उभे राहून आमचे विधि पहात होते.

स्वामींना मी माहिती दिली की, मृत व्यक्ती माझे मामा असून त्यांची उत्तरक्रिया करणारा मामांचा जेष्ठ पुत्र, माझा मामेभाऊ आहे. त्यावर स्वामी म्हणाले, “आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

कॅप्टन राकेश वालिया 

(स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.) 

इथून पुढे – – 

जीवनात मोठी मजल मारली होती. हा अनुभव शब्दबद्ध करण्याची उर्मी दाटून आली मनात. त्यानुसार जुळवाजुळव करीत पुस्तक प्रकाशित केलेही. लाखो शब्दांची कहाणी हजारो शब्दांत आणताना कसरत करावी लागली. तोवर विविध ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने देण्याची संधी मिळत होती… नाव होत होते. स्वत;चे घर झाले होते. एकूणच आयुष्य आता सुखात जाईल, अशी चिन्हे होती. पण पत्नीच्या गंभीर आजारात मोठी रक्कम खर्ची पडली… तिचे हाल बघवत नसतानाही आशा न सोडता उपचार सुरु ठेवले होते. पुस्तकाला प्रतिसाद तर उत्तमच लाभला. पण मध्येच कोरोना महामारी उपटली. घरातील सर्वच या कचाट्यात सापडले. यातून आर्थिक नाकाबंदी होत गेली. इंग्रजी पुस्तकाचे हिंदीत भाषांतर करून देण्यात मदत करेन, पुस्तकाचे प्रमोशन करेन असं सांगत एक महिला संपर्कात आली. आधी फोनवर होणा-या संभाषणातून चर्चेची गाडी प्रत्यक्ष भेटण्यावर आली. माझा नवरा आणि मी येते असे म्हणाली. आपल्या छोट्याशा मोटारीतून जाऊन साहेब त्या महिलेला भेटले. काही कारणांनी नवा-याला येणे जमले नाही… म्हणून ती महिला एकटीच आली होती. सर्वसामान्य सभ्य महिलांचा पोशाख अंगावर, उत्तम संभाषण कौशल्य तिच्याकडे होतेच. जुजबी चर्चा झाल्यावर नंतर भेटू असे ठरत असतानाच त्या महिलेने आणखी चर्चा करण्यासाठी एखाद्या हॉटेलात बसू असे सुचवले. इथे शंका आली. नम्र नकार देत साहेबांनी त्या महिलेला मोटारीतून दिल्लीतल्या एका पोलिस स्टेशनसमोरच सोडले. तिला तिथेच जवळपास काही काम होते, असे तिने सांगितले होते म्हणून. हा प्रवास केवळ सुमारे पंचवीस मिनिटांचा होता. साहेब घरी पोहोचले आणि त्यांना त्या पोलिस स्टेशनमधून फोन आला… एका महिलेने बलात्काराची फिर्याद गुदरली आहे… त्वरीत या.. अन्यथा हातकड्या घालून घेऊन येऊ! पलीकडून पोलिसी खाक्या बोलला. महिलेचे नाव विचारले तर भलतेच नाव सांगितले गेले. साहेब थेट पोलिस स्टेशनात धडकले. ती महिलाही तिथे होती… जी त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्यांना मदत करणार होती. “यांनी मला पेयातून गुंगीचे औषध पाजून माझ्यावर चालत्या मोटारीत लैंगिक अत्याचार केले… अशी फिर्याद होती. मामला अत्यंत गंभीर होता. अटक… बदनामी… खटला… आणि तुरुंगवास ठरलेला होता. अचानक बॉम्ब पडल्यावर कानठळ्या बसतातच… कारण कानांवर हात ठेवायला फुरसत मिळत नाही. इथेही असेच झाले. ती महिला मोटारीत बसली असताना जवळजवळ वीस मिनिटे दुस-या फोनवरून कुणाला तरी मेसेज करीत असल्याचे साहेबांनी पाहिले होते… त्यांच्या लक्षात हा डाव यायला वेळ लागला नाही. तेवढ्यात साहेबांच्या मुलाचा फोन आला… त्याला मेसेज गेला होता… तुझ्या वडिलांनी गुन्हा केला आहे!

पोलिसांनी त्या महिलेचीही चौकशी चालवली होती. पण सामान्य प्रश्नाला ती भलतीच उत्तरे देत होती… तपासात सहकार्य करायला राजी नव्हती. नशिबाने पोलिसांनी साहेबांविरुद्ध अटक करण्याची जरुरी नसलेले warrant जारी केले आणि खटल्याला सामोरे जाण्याची सुचना केली. पोलिसांना साहेबांचा काही दोष असल्याचे दिसत नव्हते. पंचवीस मिनिटांच्या मोटार प्रवासात महिलेला गुंगी आणणारे पेय देणे, तिला गुंगी येणे, छोट्या मोटारीच्या आसनावर तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करणे आणि तिला भरवस्ती असलेल्या रस्त्याने आणि त्यात डिसेंबर न्यू इअरसाठी लावलेल्या पोलिसी बंदोबस्ताच्या नाकाबंदीमधून आणून पोलिस स्टेशन समोर उतरवणे… आणि मग त्या महिलेने काही वेळाने त्याच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बलात्काराची तक्रार नोंदवणे… आणि या लेखी तक्रारीच्या अर्जावरचे अक्षर सुबक, नीटस आणि अगदी तपशीलवर वर्णन करणारे होते… जणू काही हा अर्ज आधीच तयार करून ठेवलेला होता… गोष्टी काही जुळत नव्हत्या.

साहेब घरी आले. पत्नीला, मुलाला परिस्थिती सांगितली. मित्रांशी चर्चा केली. तेवढ्यात त्या महिलेच्या तथाकथित वकिलाचा फोन आला… ले दे के बात को रफा-दफा कर सकते हैं! ‘वकील’ महाशय बोलत होते. अर्थातच कर नाही त्याला डर नाही… या उक्तीने साहेबांनी त्याला नकार दिला. काही मित्रांनी, पोलिसांतल्या काही मार्गदर्शक लोकांनी ‘तात्पुरते फरार व्हा… मग पुढे पाहू’ असा सल्ला दिला… जो साहेबांनी लगेच धुडकावून लावला. जामिनासाठी अर्जही केला नाही. आणि पोलिसांनीही ना-अटक वारंट बजावल्याने अटकेची वेळ आली नाही.

पुढे खटला खालच्या न्यायालयात चालला. महिलांच्या बाजूचे असलेले काही कायदे या महिलेच्या बाजूने वागले. कायद्यांचा गैरफायदा घेतला जाऊ लागल्यावर कायदेही हतबुद्ध होतात! इथे साहेबांच्या विरोधात निकाल गेला… पण वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा मिळाली!

तोवर मिडीया, लोकांत, नातेवाईक मंडळीत चर्चा तर झालीच होती. धूर आहे म्हणजे आग असणारच की… अशी घिसी-पिटी कहाणी इकडे तिकडे फिरली. साहेब नोकरी करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीने आता तुमच्या सेवेची गरज नाही, असे कळवले. प्रश्न केवळ पैशांचा नव्हता.. इभ्रतीचा होता!

पण फौजी साहेब गप्प बसणा-यातले नव्हते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनेही समांतर तपास केला. लष्करी सेवेत असताना त्यांनी गुप्त माहिती विभागातही सेवा बजावली होतीच. संगणक प्रणाली वापरण्याचेही ज्ञान तोवर मिळवले होते. त्यांनी त्या महिलेची इत्यंभूत माहिती मिळवली. पैसे द्या… सर्व मिटवून टाकू म्हणाना-या त्या महिलेने अशा प्रकारचे सात-आठ खटले विविध प्रौढ व्यक्तींवर दाखल केल्याचे दिसून आले. संबधित पोलिसांनी प्रोटोकौल न पाळता घाईघाईने गुन्हे दाखल केल्याचेही दिसले. साहेबांनी सर्व माहिती गोळा केली. काही लोक बदनामीच्या भीतीने पैसे देऊन गप्प बसलेले होते. साहेबांनी दिल्लीतील एका स्वयंसेवी कायदा साहाय्य सेवेची मदत घेतली. एकम न्याय फौंडेशन नावाची ही संस्था असून दीपिका नारायण भारद्वाज नावाची तरुणी हे सेवाभावी काम करते. तोवर या महिलेच्या माध्यमातून साहेबांना ४७ वेळा फोन केले गेले… पैसे मागितले गेले… साहेबांच्या वकिलांना त्या महिलेचा वकील भेटायला आणि प्रकरण मिटवण्याचे बोलणे करूनही गेला होता! साहेबांच्या वकिलाने त्या वकिलाचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवण्याची युक्ती मात्र वापरली, त्याचा फायदा झाला.

सुप्रीम कोर्ट मध्ये advocate अश्विनी कुमार दुबे साहेबांनी ‘आरोपी’ची बाजू मांडली. आरोपी आणि गुन्हेगार हे दोन वेगळे शब्द असतात. ज्याच्यावर आरोप केला गेलेला आहे तो गुन्हेगार असतोच असं नसतं. कायद्यांतील पळवाटा शोधून निष्पाप लोकांना अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणे ही सुद्धा एक प्रवृत्ती बनत चालली आहे, अशी शंका वाटते.

एका सेवानिवृत्त सैनिक अधिका-याच्या वाट्याला आलेले, २०२२ मध्ये सुरु झालेले हे दुष्टचक्र २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टच्या सकारात्मक निकालाने संपले… आणि भारतीय सेनेसाठी जीवाची बाजी लावून आलेला एक सैनिक अधिकारी जीवनाच्या या मोठ्या युद्धात विजयी ठरला… एकम न्याय संस्था, श्रीमती दीपिका नारायण भारद्वाज, वकील अश्विनीकुमार दुबे साहेब यांचे आभार मानताना आपले कथानायक शूरवीर कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) यांचेही त्यांच्या never say die वृत्तीबद्दल अभिनंदन झालेच पाहिजे. त्यांनी सेवा बजावली त्या गोरखा पलटणमध्ये ‘‘कायर हुनु भांडा मरनु रमरो’ म्हणजे ‘ भिऊन जगण्यापेक्षा लढून मरणाला कवटाळणे उत्तम’ असं म्हटलं जातं… कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) न भिता लढले… आणि जिंकले! त्यांनी स्वत: पस्तीस मिनिटे न्यायसनाच्या डोळ्यांना डोळा भिडवून नीडर युक्तिवाद करीत आपली बाजू मांडली, हे विशेष! सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने वालिया साहेबांची निर्दोष मुक्तता केली आहे.

एकम न्याय कॉन्फरन्स संस्थेने वालिया साहेबांना ‘आयर्न स्पाईन ‘ (अर्थात पोलादी कणा असलेला माणूस). या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.

जय हिंद… जय हिंद की सेना.

– समाप्त –

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी भाषा गौरव दिन… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मराठी भाषा गौरव दिन… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती.

या निमित्ताने आम्ही प्राथमिक शिक्षक शाळेत जे शिकवत असतो ते थोडे आपुलकीच्या माणसांना सांगावे वाटले. लहान मुलांना योग्य उच्चार शिकवले गेले नाहीत तर काय होते ते आपण सगळेच अनुभवत असतो. त्या साठी आम्ही प्राथमिक शिक्षक अगदी लहान वयाचे होऊन त्यांच्या वयाचा विचार करून काही गोष्टी सोप्या करून सांगतो. खूप वेळा त्यांच्यातले होऊन जावे लागते. आणि उच्चार चुकला तर काय गंमत होते आणि अर्थ कसा बदलतो हे दाखवावे लागते.

क, ख, ग, घ, ङ – यांना *कंठव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो. एकदा करून बघा.

च, छ, ज, झ, ञ- यांना *तालव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.

एकदा करून बघा 

ट, ठ, ड, ढ, ण- यांना *मूर्धन्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो. एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात. यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म, – यांना *ओष्ठ्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा.

हे लहान मुलांना सांगून चालत नाही. त्यांच्या कडून म्हणवून घ्यावे लागते. शिक्षकाने उच्चारणे व मुलांनी मागे म्हणणे हा एक आनंद सोहळा असतो. हे सगळे प्रात्यक्षिक करून घ्यावे लागते. तरच त्यांचे उच्चार व लेखन योग्य होण्यासाठी मदत होते.

बरेचदा काही कविता तयार करून त्यातील गंमत दाखवावी लागते.

अशीच एक कविता.

बघा कशी वाटते..

*एक काना वाढला*

 *आणि अर्थच बदलला*

मल झाला माल

गल झाली गाल

पल झाला पाल

चल ची बदलली चाल

 

मत झाले मात

नत झाली नात

पत मधून उगवली पात

रत होताच झाली रात

 

मन चा वाढला मान

धन चे झाले धान

तन ने घेतली तान

नन झाली नान 

 

तर बनले तार

मर बनले मार

हर झाला हार

गर झाला गार

 

सर चे झाले सार

पर ने केले पार

धर ची बदलली धार

खर बनली खार

 

भर चा झाला भार

नर ची झाली नार

सर चे झाले सार

चर चे झाले चार 

 

गड झाले गाड

पड झाले पाड

झड झाली झाड

लड बनली लाड

 

कडी बनली काडी

गडी बनले गाडी

सड बनली साडी

वड झाले वाडी

 

गज बदलून झाली गाज

सज वर चढला साज

भज झाले भाज 

मज ला चढला भलता माज

 

रग ला आला राग

मग ने काढला माग

नग बनला नाग

जग ला आली जाग

 

भंग ने पाडला भांग

रंग ने लावली रांग

संग वदला सांग

ढंग ची झाली ढांग 

 

तप करता आला ताप

जप जपता झाला जाप

कपा ने केले काप

खप बनला खाप 

 

टळ चे झाले टाळ

मळ ची झाली माळ

चळ चे झाले चाळ

गळ ने काढला गाळ

 

अशी माय मराठीची संपन्नता

उभी रेघ अवतरता

अकार आकार होता

शब्दांच्या अर्थात येते परिवर्तनता.

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का? कारण एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

म्हणून आपली भाषा अभिमानाने बोलू या.

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

 

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

‘ — हे अक्षर असलेली वणदार भाषा म्हणजे आपली मराठी!!

आणि ….

म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धीचा आम्हाला गर्व आहे!

अक्षर नसेल तर?

पळणार कसे…?

वळणार कसे…?

दुसर्‍यावर जळणार कसे?

भजी तळणार कशी?

सौंदर्यावर भाळणार कसे?

पोरं-टोरं तळ्यात-मळ्यात खेळणार कशी..?

तीळगूळ कसा खाणार?

टाळे कसे लावणार?

 

बाळाला वाळे कसे घालणार….?

खुळखुळा कसा देणार?

घड्याळ नाही, तर सकाळी डोळे कसे उघडणार?

घड्याळ बंद पडले, तर पळे कोण मोजणार?

वेळ पाळणार कशी?

मने जुळणार कशी?

खिळे कोण ठोकणार?

तळे भरणार कसे?

नदी सागराला मिळणार कशी……..?

मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा….

नाही उन्हाच्या झळा

नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा….!

कळी कशी खुलणार?

गालाला खळी कशी पडणार?

फळा, शाळा, मैत्रिणींच्या  गळ्यात गळा….

सगळे सारखे, कोण निराळा?

दिवाळी, होळी सणाचे काय……?

कडबोळी, पुरणपोळी  ओवाळणी पण नाही?

तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता?

भोळा सांब,

सावळा श्याम

जपमाळ नसेल तर कुठून रामनाम?

मातीची ढेकळे नांगरणार कोण?

ढवळे पवळे बैल जोततील कोण?

पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण?

निळे आकाश, पिवळा चाफा…

 

माळ्याच्या कष्टाने फळाफुलांनी बहरलेला मळा!

नारळ, केळ, जांभूळ, आवळा

काळा कावळा, पांढरा बगळा

ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा?

अळीमिळी गुपचिळी, बसेल कशी दातखिळी?

नाही भेळ,

नाही मिसळ,

नाही जळजळ

नाही मळमळ

नाही तारुण्याची सळसळ

 

कणीक मळली जाणार नाही, पोळ्या लाटल्या जाणार नाहीत…..

टाळ्या आता वाजणार नाहीत…..!

जुळी तिळी होणार नाहीत…….!

बाळंतविडे बनणार नाहीत……!

तळमळ कळकळ वाटणार नाही….!

काळजी कसलीच उरणार नाही…!

पाठबळ कुणाचे मिळणार नाही

सगळेच बळ निघून जाईल,

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.

काहीच कळेनासे होईल शिवाय!

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माझी मायबोली… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? माझी मायबोली… ? श्री आशिष  बिवलकर ☆

(१) 

मराठी प्रसवे | माझी मायबोली |

ज्ञानियांची वाली | राजभाषा ||१||

*
मराठी धरते | ज्ञानाची सावली |

भाषांची माऊली | जगी श्रेष्ठ ||२||

*
मराठी दाखवी | जगाची खिडकी |

सर्वांची लाडकी | मातृभाषा ||३||

*
मराठी गिरवी | हाती बाराखडी |

मुळाक्षर कडी | ज्ञानासाठी ||४||

*

मराठी शिकवी | संतांचे वचन |

ज्ञानाचे लोचन | अध्यात्माने ||५||

*

मराठी पाजते | मुखी बाळकडू |

पराक्रम घडू | कर्तूत्वाने ||६||

*

मराठी फोडते | मदांध ते तख्त |

क्षात्रधर्म व्यक्त | सामार्थ्यांने ||७||

*

(२) 

जन्माला आल्यावर,

बोबडे बोल आले ओठी |

श्वासाश्वासात जगतो,

माझी भाषा माय मराठी |

*
अमृताहुनही गोड,

जीची महती वर्णावी जगजेठी | 

ज्ञानाचा महासागर,

सामावते माझी माय मराठी |

*

शब्दातून व्यक्त होण्यासाठी,

जन्मोजन्मी जिव्हेशी जोडल्या गाठी |

कशाचीही तमा न बाळगता,

व्यक्त होताना बोलतो मराठी |

*

संतांनी आयुष्य खर्चले,

समाजाच्या उध्दारासाठी |

साध्या सोप्या शब्दात,

लिहल्या ओवी मराठी |

*

नाठाळांच्या माथी हाणायाला,

वापरतो शब्दरुपी काठी |

संताप व्यक्त करतांना,

शिव्यांची लाखोली वाहतो मराठी |

*

कविता लिहिण्याचा छंद जडला,

मी असेल नसेल.. त्याच स्मरतील पाठी |

माझ्या शब्दांवर प्रेम करणारे,

काव्य रसिक असतील मराठी |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २७४ – वन्देमातरम् ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है, आपके काव्य संग्रह ‘शब्द नहीं रहे शब्द‘ की एक भावप्रवण कविता – वन्देमातरम्।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २७४ – वन्देमातरम् ✍

(काव्य संग्रहशब्द नहीं रहे शब्द से )

प्रतिध्वनि टकराती है कानों से

झंकार उठती है प्राणों से

वन्देमातरम्! वन्देमातरम्!

और मैं

कुछ जागा सा,

कुछ

सोया सा

अतीत में खोया सा- देखता हूँ

मानवों का महासागर

उत्ताल तरंगों से नक्कारे और नारे

तरह तरह की बोलियाँ

चलती हुई गोलियाँ

और

पूरे जोश से उच्चरित होता- वन्देमातरम्।

आज लगता है

हम तुम ये वे सब

वन्देमातरम् का मर्म भूल गये

वे कौन थे. कैसे थे

जो वन्देमातरम् गाकर

फाँसी पर झूल गये?

वे भारत माँ की संतानें

हिन्दू, मुसलमान, सिक्ख

या नहीं ईसाई थे

वे तो राष्ट्रभक्त इंसान थे

भाई-भाई थे।

उन्होनें जीवन में उतारा था

जननी जन्भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी

का महामन्त्र

और विफल किये थे

अंग्रेजी सल्तनत के षड्यन्त्र ।

हम

मन्त्ररहित होकर

षडयन्त्रों में घिर गये हैं

गिर गये हैं- दलों के दलदल में

बहुत नीचे

और आँख मींचे

बैठे हैं शुतुरमुर्ग की मुद्रा

हमें दिखाई नहीं देती

में।

कृ

प्रपा

पूर्वोत्तर की आग

या केसर क्यारी के नाग

हम तो

छाती से चिपटाये हैं

जाति-धर्म-भाषा और प्रदेश

हमें कैसे याद रहेगा

वन्देमातरम् का सन्देश ।

है

एक ओर है हमारा क्षुद्र अहम्

ओर दूसरी ओर है

वन्देमातरम्!

 

© डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares