☆ # चहाच्या कपातले वादळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
अन चहाच्या कपात वादळ उठले… निमित्त तिचे माझे भांडणाचे झाले… शब्दाने शब्द वाढत गेला.. ना तिने खाली पडू दिला ना मी सोडून दिला… विषय तसा क्षुल्लक होता. नेहमी सारखा वादाला तोंड फोडणारा… तू तू त मैं मैं ने कागाळीला संथ सुरवात झाली… आणि हळूहळू ती तारसप्तका पर्यंत पोहचली… तुमचं हे नेहमीचंच असं असतं आपलं तेच खरं मानायचं… जरा म्हणून कुठे बायकोचं ऐकाल तर शपथ… आम्ही मेलं राब राब राबायचं नि वरती मनं मारायचं… तुम्हाला हवं ते करू द्यायचं आणि आम्ही ब्र सुद्धा काढायचा नाही… बायको म्हणून काही कदर राहिली नाही. मोलकरीण म्हणूनच किंमत दिली गेली… आता अडलयं माझं खेटर… तुम्ही आता खुशाल राहा तुमच्या घरी.. ही मी निघाले माझ्या माहेरी… मग लवकरच कळेल बायको म्हणजे काय चीज असते… तिच्या शिवाय घरी दारी दुसरं कोण झिजते… किती दिवस माझ्या विना इथं तोऱ्यात राहाल… दोन वेळेचे जेवणाचे नि तिनत्रिकाळ चहाचे मिळायचे झाले कि वांधे मग कोण पुसेल तुमचे हाल… फोनवर फोन निरोपावर निरोप धाडाल मला.. सुसरबाई तुझी पाठ बरं मऊ चल ना आता आपल्या घरला… समझोताचा आवाज नरम आला… जावा जावा माफ केले मी तुम्हांला चला आताच येते तुमच्या बरोबर आपल्या घरला… असा तर्हेने वादाचे काटे गळून गेलेल्या प्रीती च्या गुलाबाचा सुंगध पुन्हा दरवळला… अंदर कि बात सांगु का तुम्हाला..
खरं म्हणजे माहेरी जाण्याचा आततायी निर्णयाने माझाही जीव होता चुटपुटला… कसे राहतील घरी धनी माझ्यावाचुनी.. तनाने मी माहेरी नि सासरी मन तगमगुनी… वाट पाहत बसले कधी येतील मला न्यायला… कोणी काही म्हणोत भांड्याला भांड लागतचं कि संसारातल्या खऱ्या प्रेमाला तेव्हा तेव्हा अशी चहाच्या कपातली वादळं उठंत असतात… कुणीच हारत नसतात आणि जिंकत तर त्याहूनही नसतात…
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समाज स्थितीचे वर्णन
गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.
समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—
हाती होन दावीती वेणा /
करिती लेकीची धारणा//
ऐसे धर्म जाले कली/
पुण्य रंक पाप बळी//
सोडिले आचार/
द्विजृाचहाड जाले चोर//
टिळे लपविती पातडी /
लेती विजार कातडी//
बैसोनिया तक्ता/
अन्योविण पीडिती लोका//
मुदबरव लिहिणे/
तेल तूप साबण केणे //
नीच्याचे चाकर/
चुकलिया खाती मार//
राजा प्रजा पिडी/
क्षेत्री दुश्चितासी तोडी//
वैश्य शुद्रादिक/
हे तो सहज नीच लोक//
* वघे बाह्यरंग/*
आत हिरवे वरी सोंग//
तुका म्हणे देवा/
काय निद्रा केली धावा//
समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.
ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे
सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”
तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—
वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /
बोलतो ती वर्मे संतांपुढे//
चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/
पाप-पुण्यभागी विभागीले//
प्रथम पाऊली पावविला पंथ/
आदी मध्य अंत भेद नाही//
आंबे बोरी वड बाभुळ चंदन/
गुणागुणभिन्न अग्नि एक//
तुका म्हणे मन उन्मन जो होय/
तोवरी हे सोय विधी पाळी//
तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,
वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.
त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-
आली सिंहस्थ पर्वणी/
न्हाव्या भटा झाली धणी //
अंतरी पापाच्या कोडी/
वरी वरी बोडी डोई दाढी//
बोडीले ते निघाले/
काय पालटले सांग वहिले//
पाप गेल्याची काय खूण/
नाही पालटले अवगुण//
भक्तीभावेवीण /
तुका म्हणे अवघा सीण //
सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.
चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.
पहा हो देवा कैसे जन/
भिन्नभिन्न संचिते //
एक नाही एका ऐसे/
दावी कैसे शुद्ध हीन//
पंचभूते एकी राशी/
सूत्रे कैसी ओळखावी//
तुका म्हणे जो जे जाती/
त्याची स्थिती तैशी ते//
देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.
अंगातला एप्रन काढून खुर्चीवर ठेवत माधुरीने” विमल मावशी “अशी हाक मारली. “आले आले हो ताई” म्हणत विमल मावशी लगबगीने स्टाफ रूम मध्ये आल्या. हाताची घडी डोक्या खाली घेत माधुरी कोचवर कलंडली.. “आई ग!”अती श्रमामुळे तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.
माधुरी जवळ जवळ आठ-दहा तासांनी जरा आरामात आडवी झाली होती. सकाळपासून तिची नुसती धावपळ सुरू होती. दुपारपासून अडकलेल्या रूपालीचे बाळंतपण करण्यात तिने आपलं कौशल्य पणाला लावले होते. आता रूपाली आणि तिचे बाळ दोघेही शांतपणे झोपले होते. रूपालीच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणं पसरलं होतं. तिची सुखरूपपणे सोडवणूक करण्यासाठी माधुरीवर खूपच मानसिक ताण आला होता. अशा प्रकारची अवघड केस हाताळण्याची तिची पहिलीच वेळ होती. डॉक्टर साने प्रख्यात स्त्री रोग तज्ञ होते, त्यांचयावर रुग्णांचा विश्वास होता आणि त्यांच्या हाताला यश होते. आज माधुरीवर सर्व हॉस्पिटलची जबाबदारी टाकून डॉक्टर विश्वास साने व त्यांच्या पत्नी विशाखा साने दोन दिवस मुंबईला कॉन्फरन्स साठी गेले होते. त्यांचा माधुरीच्या कामावर पूर्ण विश्वास होता आणि रूपाली चे बाळंतपण यशस्वीरित्या पार पाडून तिने विश्वास सार्थ करून दाखवला होता. आता ती स्टाफ रूम मध्ये परतली होती. विमल मावशींची चाहूल लागताच माधुरी म्हणाली, “मावशी माझ्यासाठी एक कप कॉफी करता का?! तुमची कॉफी होईपर्यंत मी फ्रेश होऊन येते”
आषाढातील दिवस होते, हवा पावसाळी होती आकाशात काळया ढगांनी गर्दी केली होती. अशावेळी कॉफीची आवश्यकता होती. माधुरी फ्रेश होऊन येताच मावशी वाफाळलेली कॉफी आणि बिस्किटांची डिश घेऊन आल्या. ” ताई सकाळ धरनं लई थकलासा! ही गरम गरम काफी घ्या, मंग वाईज बरं वाटल “म्हणून त्यांनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला आणि राहिलेली कामे उरकण्या साठी त्या आत गेल्या.
माधुरीने कप तोंडाला लावून एक घोट घेतला असेल तोच बाहेरून बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. अनुभवी माधुरीने तान्ह्या बाळाचा आवाज लगेच ओळखला. तिनं”विमल मावशी”अशी हाक मारताच हातातले काम सोडून त्या बाहेर आल्या. ” ताई अजून काही हवे आहे का?”. ‘नाही, मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जरा मावशी बघा हो बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येतोय तो?
मावशींनी चाहूल घेतली व आवाज बाहेरून येतोय हे लक्षात येताच त्या मुख्य दरवाजाकडे धावल्या.
विमल मावशींनी मुख्य दरवाजा उघडला. कंदीलाच्या प्रकाशात दरवाजाच्या समोर नुकतंच जन्मलेलं इवलसं बाळ टॉवेल मध्ये गुंडाळलेले त्यांना दिसले. ते पाहताच त्यांनी माधुरीला हाक मारली. “ताई लवकर बाहेर या”मावशींची हाक ऐकून माधुरी कॉफीचा कप तसाच ठेवून दाराशी धावली. दारात टॉवेलमध्ये गुंडाळलेले छोटसं बाळ अन् त्याला पाऊस लागू नये म्हणून डोक्यावर उघडलेली छत्री हे दृश्य तिला दिसले.
माधुरीतील डॉक्टरी हृदयाने तिला कर्तव्याची जाणीव करून दिली. तिने पटकन बाळाला उचलले टॉवेल मध्ये गुंडाळलेल्या निष्पाप अर्भकाला तपासले. लालचुटूक ओठ, गोरीपान, डोक्यावर भरपूर जावळ असलेली बालिका होती. तिने किलकिले डोळे करून पाहिले पण उजेड सहन न झाल्याने ती पुन्हा निस्तब्ध पडून राहिली. तिचे वजन कमी होते, ती थंडीने कुडकुडत होती. माधुरीने मावशींच्या मदतीने बाळाला स्वच्छ केले, तिला प्रथम मधाचे बोट चाटवलं, ड्रॉपर ने थोडे दूध पाजले. दवाखान्यातील कपडे घालून चटकन् “इंक्युबेटर “मध्ये ठेवले. अशी केस घ्यायची म्हटलं तर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागणार होती पण माधुरीने ठरवले की बोलणी बसली तरी बेहत्तर पण माणुसकीला काळिमा लावून घ्यायचा नाही. त्यामुळे त्या मुलीची सर्व व्यवस्था झाल्यावर तिने डॉक्टरांना फोन केला, “सर मी एक अनौरस मुलगी दाखल करून घेतली आहे. तिची परिस्थिती पाहता तुमच्या परवानगीशिवाय मला दाखल करून घेणे भाग पडले. ” डॉक्टर साने म्हणाले, “वेल डन माधुरी”केवळ मुलगी म्हणून तिला जगण्याचा अधिकार नाकारणारे हे कोण? असा विचार माधुरीच्या मनात चमकून गेला. काही झाले तरी या बाळाला वाचवायचे असे तिने निर्धार केला. ती तिची खूप काळजी घेत होती आज गुंतागुंतीची केस तिने एकटीने हाताळली होती. यश पदरी पडल्यामुळे खुश होती खरं पाहता तिला विश्रांतीची गरज होती पण त्या निष्पाप बाळासाठी तिचा जीव कासावीस होत होता. दहा मिनिटाच्या अंतराने जाऊन ती स्वतः बाळाची तपासणी करत होती.
तिला ड्रॉपर ने दूध पाजत होती. तिच्या योग्य वाढीसाठी औषधांचे drops देत होती. तिला वाचवण्यासाठी धडपडत होती. तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाने त्या बाळाची तब्येत सुधारू लागली. सतत सहवासात राहिल्यामुळे त्या दोघींच्यात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला, माधुरीला तिचा लळा लागला. ,. या निष्पाप मुलीला अंतर द्यायचे नाही असे तिने मनोमन ठरवून टाकले. एक दिवस माधुरीने “या मुलीला माझी मुलगी म्हणून वाढविण्याची माझी इच्छा आहे” हे डॉक्टर साने यांच्या कानावर घातले.
डॉक्टर साने म्हणाले, “तुझा निर्णय चांगला आहे पण अगं माधुरी भावनेच्या भरात असा निर्णय येऊ नकोस. अजून तुझे लग्न व्हायचे आहे. या मुलींमुळे तुला आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, लोकांच्या शंका कुशंकांना सामोरे जावे लागेल, लोकांच्या कुत्सित नजरा सहन कराव्या लागतील. , लोक तुझी बदनामी करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत थोडक्यात काय तुला एक प्रकारचे “अग्नी दिव्य” करावे लागेल. याची तुझी तयारी आहे का? दोन दिवस पूर्ण विचार कर आणि मगच निर्णय अन्यथा आपण तिची चांगल्या अनाथाश्रमात सोय करू,. ”
रात्रीचे दोन वाजले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती पण माधुरीच्या डोक्यात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. तरीसुद्धा त्या विचारावर मात करून तिने त्या निष्पाप बालिकेचे मातृत्व स्वीकारण्याचा निश्चय केला. दुसरे दिवशी डॉक्टरांना ती म्हणाली, “पूर्णविचारांती मी त्या मुलीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे “. डॉक्टरांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले.
मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो’ माणसाचं काहीसं तसंच असतं, काही माणसं काही क्षणात आपली होऊन जातात तशी त्या बाळाने माधुरीवर मोहिनी घातली होती जणू! डॉक्टरांच्या संमतीने दवाखान्यातील रुग्णांच्या समवेत बाळाचं थाटामाटात बारस करून माधुरीने तिचे नाव ठेवले “मोहिनी. ” मोहिनी म्हणजे माधुरीच्या आयुष्यात एक गोड स्वप्न होतं, तिच्या बोबड्या बोलांनी सर्वांवर गारुड केले होते. समंजस आणि गोड, तेवढीच खेळकर स्वभावाची मोहिनी नेहमी सर्वांना हवीहवीशी वाटे.
माधुरीला आपले बालपण आठवले. आई, बाबा आणि ती एक सुखी कुटुंब होते. तिचे वडील एका छोट्या कंपनीत अकाउंट सेक्शन मध्ये नोकरीला होते. आई गृहिणी होती. पैशाची चणचण होती पण काटकसरीने तिची आई छान घर चालवत होती. लाडक्या माधुरीची हौस पुरी करत होती. माधुरी एक साधी मुलगी होती, तिला खूप शिकायचे होते, फुलपाखरांचे पंख लावू उडायचं होते. तिच्या आईला तिच्या गुणांचे कौतुक होते. एके दिवशी लेकीच्या शाळेत लेकीचे नृत्य पाहण्यासाठी ते गेले आणि कार्यक्रम संपवून घरी परतत असताना त्यांच्याच स्कूटरला कारने धडक दिली. आई वडील दोघेही खाली पडले पण गाडीवाला न थांबताच भरधाव निघून गेला. कोणीतरी मामाला फोन करून बातमी कळवली. तो तात्काळ त्या ठिकाणी पोचला पण तो येण्यापूर्वी ते दोघे जग सोडून गेले होते. माधुरीचे वडील एकटेच तिच्या मामाला आपल्या बहिणीची निशाणी म्हणून माधुरीला घरी घेऊन जाणे भाग होते. माधुरी शाळेतून येण्यापूर्वी सर्व संपले होते. आई-वडिलांचा मृतदेह पाहून माधुरीने हंबरडा फोडला. मामाने कसेबसे सावरले. थोडे दिवस मामीने प्रेमाने केले. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर मामाने माधुरीला घरी नेले खरे पण मामीला मात्र घरकामासाठी आयती मोलकरीण मिळाली. तिने या पोरीला अनेक प्रकारे छळले. मामा ऑफिसला गेला की तिच्याकडून घरची कामे करून घ्यायची मग शाळेत जायची परवानगी द्यायची. रात्री काम आवरून तिने अभ्यासाला सुरुवात केली की मामी ओरडत येई, “लाईट बिल काय तुझा बाप भरणार?’माधुरी नाईलाजाने लाईट बंद करून झोपायला जायची. मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.
सध्या सगळीकडे तीन वर्षांनी येणाऱ्या पारंपारिक अधिक मासाची, म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची जोरदार रेलचेल सुरू आहे. मुली-जावयांना हक्काने घरी बोलवणं, चांदीच्या ताटात पुरणपोळीचं सुग्रास जेवण देणं, आणि ते ३३ अनरसे देऊन जावयाला ‘लक्ष्मी-नारायण’ मानून त्याचे लाड पुरवणं सुरू आहे.
परवा दुपारी मी सुद्धा माझ्या घराच्या सोफ्यावर बसून जावयाला काय काय खरेदी करायची, याची मोठी यादी करत होते. माझा नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. बदल हवा असं त्यांना कधी वाटत नाही. बदल केला तर नक्कीच तो चांगला असं असं वाटतं.
जावयाच्या खरेदीची यादी बनवता बनवता अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. मी हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि नवऱ्यालाम्हटलं, “अहो ऐकलंत का? जावई दुसऱ्याच्या घरातून आपल्याकडे दोन दिवस पाहुणा म्हणून येतो, तर आपण त्याला देव मानून त्याचे एवढे लाड करतो. पण जी मुलगी तिचं हसतं-खेळतं माहेर सोडून, स्वतःचं आडनाव बदलून, आपलं घर साभाळायला ‘सून’ म्हणून येते… तिच्यासाठी कॅलेंडरमध्ये असा एकही महिना का नसावा? म्हणून मी ठरवलंय, या अधिक मासाला छेद देत मी माझ्या सुनेसाठी कॅलेंडरमध्ये एक नवीनच सण सुरू करणार आहे— ज्याचं नाव असेल ‘वजा मास’!”
माझं हे बोलणं ऐकून नवऱ्यानी वर्तमानपत्र खाली ठेवलं, चष्मा नाकावर सरकवला आणि आश्चर्याने म्हणाले, “हा कुठला नवीन मास? कॅलेंडरमध्ये जेमतेम १२ महिने असतात, १३ वा अधिक मास असतो. हा ‘वजा मास’ कुठून टपकला?”
मी त्यांना हसून समजावून सांगितलं की, ‘वजा’ म्हणजे वजाबाकी नाही, तर सुनेच्या डोक्यावरचा घरचा, स्वयंपाकघराचा आणि जबाबदाऱ्यांचा सगळा ताण महिनाभरासाठी ‘वजा’ करणे! हा संपूर्ण महिना तिने फक्त तिचं आयुष्य बिंधास्त आणि आनंदाने जगायचं.
तेवढ्यात माझा मुलगा आणि सून दिवसभराचं काम आटपून घरात आले. सुनेच्या एका हातात कष्टाची पिशवी होती आणि दुसऱ्या हातात बाजाराची भाजी. तिची ती दमलेली अवस्था बघून मी लगेच तिच्या हातातली भाजीची पिशवी बाजूला घेतली आणि तिला प्रेमाने पाटावर बसवलं. मी घरात जाहीर केलं की, आजपासून या घरात माझ्या सुनेसाठी ‘वजा मास’ लागू झाला आहे!
सुनेने आश्चर्याने विचारलं, “वजा मास? आई, म्हणजे नक्की काय?”
मी तिला सांगितलं की, या संपूर्ण महिन्यात तुला स्वयंपाकघरात पाऊल ठेवायला सक्त मनाई असेल. जावयाला ५६ भोग चालतात ना? मग माझ्या सुनेला महिनाभर तिच्या आवडीचे पुरणपोळी, श्रीखंड-पूरी आणि सुग्रास जेवण तिची सासू स्वतःच्या हाताने बनवून भरवणार! सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तिने फक्त सुखात बसायचं. “रात्री जेवणात काय बनवू?” हा प्रश्न तिच्या आयुष्यातून महिनाभरासाठी वजा केला जाईल.
मुलाने मध्येच विचारलं, “बरं, आणि हिची हौसमौज?” त्यावर मी मुलाला फर्मान सोडलं की, या महिन्यात सुनेला तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला, बाजारात जाऊन हवी ती खरेदी करायला घरची तिजोरी खुली असेल! तिच्या आनंदावर आणि खर्चावर घरातून एकही प्रश्न विचारला जाणार नाही. साडी नेसण्याची किंवा घरकामाची अजिबात सक्ती नाही, अगदी सुती आणि सुटसुटीत कपड्यांमध्ये तिने फिरावं. रात्री हवं तितकं जागावं आणि सकाळी मनासारखं उशिरा उठावं, हिला घरात कोणीही उठवणार नाही!
माझा हा मराठमोळा आणि कल्पक विचार ऐकून सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती गदगद होऊन म्हणाली, “आई… खरंच? आजपर्यंत सासरी आल्यावर फक्त जबाबदाऱ्या वाढतात हेच ऐकलं होतं. पण सासू आपल्यासाठी असा विचार करू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये!”
मी तिचे डोळे पुसले आणि म्हटलं, “विश्वास ठेव बाळा! जावयाला आपण विष्णू रूप मानतो, पण सून तर साक्षात चालती-बोलती गृहलक्ष्मी असते. या वजा मासाच्या शेवटच्या दिवशी मी तुझी चांदीच्या ताटात ओवाळणी करणार आणि जावयाच्या ३३ अनरशांच्या ऐवजी, तुला तुझ्या आवडीच्या ३३ सुंदर वस्तू सासरकडून वाण म्हणून मिळणार!”
हे सगळं ऐकून माझे कारभारीही हळवे झाले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि मुलाला म्हणाले, “बाळा, काढ घरची तिजोरी आणि दे हिच्या हातात… आजपासून घरात वजा मास लागू! आजपर्यंत आम्ही पुरुषांनी फक्त जुन्या परंपरा पाळल्या, पण नात्याला इतकं मायेचं आणि सुंदर रूप देता येतं, हे तुझ्या आईकडून शिकायला मिळालं. ” मुलानेही हसत हसत आईच्या या निर्णयाला होकार दिला.
सुनेने जेव्हा मला प्रेमाने मिठी मारली, तेव्हा मला जाणवलं की, परंपरा फक्त जुन्या चौकटीत जगण्यात नसते, तर नव्या पिढीला पोटच्या मुलीसारखं समजून घेऊन नात्यांना नवा श्वास देण्यात असते. जर प्रत्येक सासूने सुनेला अशी मायेची सुट्टी दिली आणि स्त्रीने स्त्रीचा असा आदर केला, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक घर स्वर्गासारखं सुंदर होईल.
मी तर माझ्या कॅलेंडरमध्ये ‘वजा मास’ लिहून ठेवलाय, आणि माझी सून सासरी यायला आता रडत नाही, तर हसत हसत येणार आहे!
जावई हा केवळ पाहुणा असतो, पण सून ही नव्या पिढीला आणि वंशाला जन्म देणारी, संपूर्ण घराला उजळवून टाकणारी साक्षात महालक्ष्मी असते!”
त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अधिक मासाचे अनरसे जावयाला भरवताना, आपल्या घरच्या लक्ष्मीच्या सुट्टीचा ‘वजा मास’ ठरवायला विसरू नका. सासूबाईंनो, कंबर कसा आणि कामाला लागा; कारण सुनेचा चेहरा खुलला की संपूर्ण घर कसं कडाडून हसतं!
बाकी, आमचा हा ‘वजा मास’ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातल्या सुनेला हा सुखद धक्का कधी देताय?
लेखिका : सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“दूसरों को नहीं खुद को समझाना सबसे बड़ी चुनौती होती है।”
आयुष्य म्हणजे roller coaster ride, चढ उतार, चार धागे सुखाचे तर दहा धागे दुःखाचे. कधी स्वतः च्या चूकीमुळे तर कधी दूसऱ्यांच्या, कधी निर्णय चूकतात म्हणून, तर कधी (+, -, ×, ÷) ही चिन्हे योग्य वेळी, योग्य जागी वापरली जात नाहीत म्हणून. कधी ते सर्व आपल्या नशिबातच होत, असं समजून, वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. आयुष्य कधीच एक रंगी नसत. यात बघायला गेलं तर दोष असा कोणाचाच नसतो. वयाप्रमाणे अनुभव मिळतो, समज वाढते. हळूहळू आपण शहाणे होत जातो. प्रश्नांना हाताळायची कला आत्मसात करतो.
घर, बाहेर, ऑफिस अशा अनेक जागी काही ना काही चालूच असते. कधी कधी तर सर्व दिशांनी अटॅक होतो. म्हणजे अगदी वॉशिंग मशीन मध्ये जसे कपडे धुतले जातात ना, तसेच गोल गोल फिरत राहतो. एक प्रश्न सोडवा, जरा श्वास घ्या, तर दुसरा हजर. कदाचित त्यांनंतर आपण जास्त चकचकीत, हुशार होऊन आयुष्यात येणाऱ्या पूढच्या प्रश्नांना जास्त आत्मविश्वासाने उत्तर देण्यास समर्थ होत जातो. विचारांची क्लॅरिटी वाढते.
प्रश्न आयुष्याच्या प्रत्येक फेज मध्ये असतातच.
मला काही ही problem नाही. असं म्हणणारे या जगात कोणीच नाही. प्रोब्लेम ची डिग्री कमी जास्त असू शकते.
अडचणी आल्या की माणसाला सर्व दोष दिसतात गृहदोष, वास्तूदोष, पितृदोष सर्व दोष दिसतात. देव आठवतात.
आयुष्यात दुःख आहेत, म्हणून तर देव आहे. देऊळ आहे. नाही तर देवाला सुद्धा कोणी विचारलं नसतं बहुतेक. शनिवारी शनी देवता, मंगळवारी बजरंग बली ला कोणी विचारलं असतं का?? फक्त देवावर माझी श्रद्धा आहे, या विचाराने जाणारे किती लोक असतात??
देव सुद्धा म्हणत असेल,
अरे!! कधी फक्त भेटायला ही येत जा, नेहमी काही तरी मागायलाच येतो. बरे असो
तरीही आयुष्य छान, सुंदर, आनंदी असूच शकत. नाही का?? कारण,
“Happiness is not the absence of problems but it’s our ability to deal with them. ”
देवही आपल्याला त्याच समस्या देतो, ज्या सोडविण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यात आपण उत्तीर्ण होणार, याची देवाला खात्री असते.
समजा एखादा प्रोब्लेम आलाच आणि जास्त दिवस घरात जम ठोकून बसलाच, तर थोडा काळ शांत बसावं. थोडा विसावा घ्यावा. प्रत्येक दुःखाचे ही एक ठराविक वय असतच. या BAD PATCH ला जाऊ द्यावे. आणि मग नव्याने सुरुवात केली तर काय हरकत आहे?? काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून दिल्या तर त्रासही कमी होतो.
माझी आजी नेहमी म्हणायची,
सुख मिरवायचे नाही, दुःख गिरवायचे नाही.
प्रोब्लेम नेहमी मोठेच असतात, असं नाही. खूपदा तर प्रोब्लेम्स, self created असतात. म्हणजे,
चढाओढ, one up ship कार्यक्रम, सर्व गोष्टी माझ्या मनासारख्याच झाल्या पाहिजे हा आग्रह, लवकर श्रीमंत व्हायची इच्छा, उसकी साड़ी मेरे साड़ीसे सफ़ेद कैसे?? हा असा स्वभाव, काल्पनिक भीती, हे सर्व स्वतः च निर्माण केलेले अनावश्यक प्रोब्लेम असतात. दुसऱ्यांचे सुख बघून त्रस्त होणारेही असतातच.
आयुष्य म्हणजे सापसीढी चां खेळ. नवऱ्या बरोबर कागदी पत्रिकेत न जुळलेल्या गुणांबरोबर जुळवून घेण्याची कसरत, आयुष्य म्हणजे नियतीने जे पत्ते तुमच्या हातात दिले आहेत, त्यांचा चांगला डाव मांडणे, आयुष्य म्हणजे एक प्रवास हसत पूर्ण करायचा की रडतखडत करायचा ही प्रत्येकाची इच्छा.
आयुष्याच्या महाभारतात स्वतःलाच कधी कृष्ण, कधी अर्जुन बनून, रोज स्वतः च आपल्या रथाचा सारथी बनून लढाई जिंकायची असते. कधी कधी दोन पाऊल मागे घेण्यातही जीत दडलेली असते.
म्हणतात ना.
जीतने वाला ही नहीं, बल्कि कहां पे क्या हारना हैं । ये जानने वाला भी सिकंदर होता हैं।
कठीण काळात. दुसऱ्याला समजविण्यापेक्षा स्वतः ला समजाविणे हे सगळ्यात मोठ चॅलेंज आपल्या समोर असत.
म्हणतात ना,
जिंदगी में आप तब तक नहीं हार सकते, जब तक आप स्वयंसे ना हारो।
नियतीने आपली Excel Sheet तयार ठेवली आहे. आपल्या आयुष्यात कोण, कधी? केंव्हा? भेटणार?? काय घडणार?? हे script तयार आहे. तेंव्हा या सिनेमात आपल्याला काम करायचे आहे. आपला रोल ठरलेला आहे. त्यात आपल्याला काही खोडाखाड करता येणार नाही.
जे आहे ते आहे. तेच मान्य करायचे. देवाच्या/ नियतीच्या script वर पूर्ण विश्वास ठेवायचा.
जे होईल ते चांगलंच होईल.
देव आहे ना काळजी घ्यायला, सर्व काळजी आपणच केली तर मग देव काय करणार??
तेंव्हा,
मजेत रहा,
खाओ पिओ ऐश करो.
ये जिंदगी ना मिलेगी दोबारा ।
म्हणतात ना,
“जिस मनुष्य को परमात्मा के न्याय पर विश्वास है,
उसे संसार की कोई भी परिस्थिति विचलित नहीं कर सकती ।
☆ “Load-bearing R. C. C. पेक्षा मजबूत निघाले!”☆ श्री संभाजी बबन गायके
– – प्रा. मुकुंद पाध्ये
एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचे सैनिकी कल्याणासाठी कोटीचे उड्डाण!
गणित, शास्त्र विषयाच्या शिक्षकांचा सहभाग असलेल्या पेपरफुटीच्या बातम्यांनी देशात रणकंदन माजवलेले असताना एका गणिताच्या अध्यापकांनी कोणताही गाजावाजा न करता देशापुढे एक आदर्श उभा करून कमाल केल्याची बातमी समजली ती कारगिल वीर, PARA स्पेशल फोर्सेसचे सुभेदार मेजर बाळासाहेब मोहारे (सेवानिवृत्त) यांच्या एका मेसेजमधून. विदर्भातील वकील अजिंक्य धर्माधिकारी साहेबांनी ही बातमी लिहिली आहे. वकील साहेबांनी ही माहिती प्रसाद महाजन यांच्याकडून समजली!
अकोला येथे गणिताचे अध्यापन करून अवघं आयुष्य विद्यार्थी सेवेत व्यतीत केलेल्या मुकुंद पाध्ये सरांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षीपर्यंत पै-पैसा जमा करून एक कोटी रुपये भारतीय सैनिकांच्या कल्याणनिधीसाठी दान दिले… ही ती बातमी!
समाजाचा load ख-या अर्थाने bear करणारी ही माणसं. इतर जण R. C. C. वापरून स्वत:ची घरं मजबूत करण्याचा integrated प्रयत्न करीत असताना दातृत्वाची ही उत्तुंग इमारत मजबुतीने उभी करणारी पाध्ये सरांसारखी माणसं पाहिली की वाटतं… अजूनही फार काही बिघडलेले नाही!
आजच्या जागतिक भयावह परिस्थितीत जगातील इतर सर्वच देश त्यांचे त्यांचे लष्कर अधिकाधिक सामर्थ्यशाली बनवण्याच्या प्रयत्नांत दिसते. यासाठी आर्थिक पाठबळ तर लागतेच. आपल्याकडे संरक्षणावर कमी तरतूद आहे, असेही नाही. मात्र जनतेने लष्कराच्या आर्थिक सबलीकरणात सहभागी होण्याने राष्ट्रीय एकात्मता, परस्पर सहयोग वाढीस लागून त्यातून आदर्शवत व्यवस्था उभी राहू शकते, हे ध्यानात घ्यावे लागेल. विशेषत: सैनिक कल्याण निधीमध्ये नागरीकांनी सढळ हातांनी साहाय्य करणे गरजेचे आहे. सैनिकांचे उपकार फेडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. पुण्यातील कै. योगेश चिथडे साहेबांनी त्यांच्या पत्नी सुमेधाताई चिथडे यांच्या साथीने आणि लोक सहभागातून सियाचीन दुर्गम बर्फाळ प्रदेशातील रुग्णालयांमध्ये भारतीय सैन्यासाठी कित्येक कोटी रुपयांची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा भेट दिल्याचे देशाला ठाऊक आहे. ही यंत्रणा नागरीकांनाही उपयुक्त ठरते आहे!
प्राध्यापक मुकुंद पाध्ये सरांनी या त्यांच्या donation मधून अनेकांची शिकवणीच घेतली आहे, एक धडा घालून दिला आहे, असं म्हणावंसं वाटतं! यातून सरांचा class ही दिसून आला! अशी माणसं वाढली तर देश NEET चालू शकेल…!
☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
आजचा आमच्या सहलीचा सहावा आणि अखेरचा दिवस. आज सकाळीच जिम कॉर्बेटच्या सफारीसाठी निघायचे होते. सकाळी साडेचारलाच उठलो. तयार होऊन बसमध्ये बसलो. जिम कॉर्बेट अभयारण्यापासून आमचे हॉटेल साधारण दहा किमी लांब होते. बरोबर पाच साडेपाचच्या सुमाराला जिम कॉर्बेटच्या धनगरी गेटजवळ पोहोचलो. तिथे सफारी जीप्स तयारच होत्या. तेथील अधिकाऱ्यांनी आमची आधार कार्ड्स ओळखीसाठी मागितली. जिम कॉर्बेट पार्कमध्ये मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाईल गेटजवळ असलेल्या लॉकर्समध्ये जमा करावा लागतो. सफारी संपल्यावर आपल्याला तो परत मिळतो. वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने कॅमेरा नेता येतो.
जिम कॉर्बेट हा भारतातील सर्वात जुना आणि पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. इंग्रज वंशीय भारतीय शिकारी जिम कॉर्बेट यांचे नाव या अभयारण्याला देण्यात आले आहे. नामशेष होत चाललेल्या बंगाली वाघांचे संरक्षण करणे हा या पार्कचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे या प्रकल्पात वाघ हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असतेच. आजमितीला जवळपास दोनशे पन्नास वाघ या अभयारण्यात आहेत अशी माहिती आमच्या गाईडने दिली. त्याशिवाय हत्ती, अस्वले, विविध वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींनी हे जंगल समृद्ध आहे.
जिम कॉर्बेटमध्ये जाण्यासाठी अनेक प्रवेशद्वारे आहेत. धनगरी किंवा धनगडी या प्रमुख गेटवरून आम्ही जीप सफारी घेतली. एका जीप सफारीसाठी साधारणपणे ७५०० रू एवढे शुल्क आकारले जाते. एका जीपमध्ये सहा व्यक्तींना परवानगी आहे. या जीप्स उघड्या असतात. त्यामुळे जंगलाचे सौंदर्य मनसोक्त पाहता येते. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी साडेपाच ते साडेआठ किंवा सहा ते नऊ वाजेपर्यंत या जंगल सफारी चालतात. संध्याकाळी तीन ते सहा अशी साधारण वेळ असते. उन्हाळा किंवा हिवाळा या ऋतूंप्रमाणे वेळा थोड्या बदलतात.
गेटवरील सर्व सोपस्कार आटोपून आमची जीप सफारी ढिकला क्षेत्रात जाण्यासाठी निघाली. सकाळची वेळ होती. प्रसन्न वातावरण होते. वातावरणात सुखद गारवा होता. गाडी लवकरच घनदाट जंगलात शिरली. रस्ते कच्चे आणि खडकाळ होते. पण सकाळच्या वेळी जंगलातील वातावरण पाहून मन अगदी हरखून गेले. इतके सुंदर जंगल एवढया सकाळी कधी पाहिले नव्हते. सकाळबरोबरच जंगलातील वातावरणही जणू उमलतं. एक नवी कोरी सकाळ तुम्हाला बघायला मिळते. जंगलातील झाडांचा गंध काही वेगळाच असतो. आपल्या रोजच्या शहरी वातावरणात हा गंध आपल्याला कधी अनुभवायला मिळत नाही. हवा अतिशय शुद्ध होती. ही हवा मी मनसोक्त फुफ्फुसात भरून घेत होतो. थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला हरणांचे कळप दृष्टीस पडले. आता या जंगलातील प्राण्यांना बहुधा माणसांची सवय झाली असावी. त्यामुळे जीप पाहूनही त्यांना काही फरक पडला नाही. ते आपले मजेत चरत होते. माकडांच्या टोळ्याही ठिकठिकाणी होत्या. विविध रंगीबेरंगी पक्षी आपल्या मधुर आवाजाने सकाळची भूपाळी गात होते. आणखी काही अंतर पुढे गेल्यानंतर पूर्ण पिसारा फुललेले मोर दृष्टीस पडले. जंगलात मधून मधून मुंग्यांच्या वारुळासारखी घरे दृष्टीस पडत होती. परंतु ती वाळवीची घरे आहेत असे आमच्या गाईडने सांगितले. ही घरे फारच सफाईदार पद्धतीने बांधलेली असते. त्यात अगदी शेवटपर्यंत हवा खेळती राहते. त्यामुळे या छोट्या जीवाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. वाळवीचे आणखी एक वैशिष्ट्य गाईडने सांगितले की ती हिरव्या किंवा जिवंत झाडाला कधीच लागत नाही. वाळलेले लाकूड हे तिचे खाद्य! त्यामुळे लाकडाचे लवकर विघटन होऊन पर्यावरणात ते मिसळून जाते. अशा रीतीने वाळवी पर्यावरणासाठी सहायक ठरते.
या अभयारण्यात प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. अशाच एका नाल्यात आम्हाला एक झाड पडलेले दिसले. त्या झाडाच्या एका फांदीलगत एक घोरपड दृष्टीस पडली. मध्येच रानडुकरांच्या काही टोळ्या आमच्यासमोरून गेल्या. भव्य अशा गरुड पक्ष्याचे दोन तीन वेळा दर्शन घडले. हा सरपन्ट ईगल आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. जंगल नैसर्गिक आणि स्वच्छ राहण्यात इथले वनाधिकारी, गाईड आदी लोक महत्वाची भूमिका बजावतात. आपल्याजवळील खाद्यपदार्थांचे वेष्टन, कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदी गोष्टी ते जंगलात टाकू देत नाहीत. प्राण्यांना माणसांपासून कमीत कमी त्रास किंवा उपद्रव व्हावा याची काळजी ते घेतात.
जंगल सफारीचा वेळ आता संपत आला होता. बरेच फिरल्यावर देखील आम्हाला वाघ किंवा हत्ती वगैरे दिसले नाहीत. आमचा गाईड म्हणाला की वाघ दिसणे हा नशिबाचा भाग आहे. आमच्यातील काही मंडळी वाघ दिसला नाही म्हणून जरा नाराज झाली होती. पण मी त्याबद्दल फार काही वाटून घेतले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे वाघाचे दिसणे जरा दुर्मिळ आणि नशिबाचा भाग आहे हे मी जाणून होतो. आणि चंद्रपूरजवळील ताडोबाच्या अभयारण्यात मी वाघांना गाडीजवळून जाताना पाहिले होते. दुसरी गोष्ट म्हणजे मी केवळ वाघ पाहण्याच्या उद्देशाने गेलो नव्हतो. पहाटेच्या वेळी जंगल पाहणे आणि अनुभवणे हा माझा उद्देश होता. तो सफल झाला होता. जंगल पाहून मी ताजातवाना झालो होतो.
सफारीनंतर आम्ही हॉटेलवर परतलो. फ्रेश होऊन नाश्ता घेतला. थोडा आराम केला. परत धनगरी कॉर्बेट म्युझियम पाहण्यासाठी निघालो. जिम कॉर्बेट अभयारण्यातील वन्यजीवांची माहिती, मगर, वाघ, सांबर, हत्ती आदींचे जतन केलेले अवशेष इथे बघायला मिळतात. वन्य जीवांची माहिती आणि जिम कॉर्बेट अभयारण्याचा इतिहास या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येतो. याच ठिकाणी एक सुवेनिर शॉप आहे. तिथे जिम कॉर्बेटबद्दल आणि वन्य जीवांबद्दल माहिती देणारी पुस्तके, हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या विविध वस्तू आपण खरेदी करू शकतो.
दुपारी जेवणासाठी आम्ही पुन्हा हॉटेलवर परतलो. सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्यायला मिळाला. विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. जेवणानंतर थोड्या वेळाने आम्ही पुन्हा जिम कॉर्बेट यांचे निवासस्थान असलेल्या काळाढुंगी येथे गेलो. आपल्याला कल्पना असेल की जिम कॉर्बेट हे इंग्रज वंशाचे पण भारतीय शिकारी होते. ते केवळ शिकारी नव्हते तर वन्यजीवांचे अभ्यासक, एक उत्तम लेखकही आणि संशोधकही होते. त्यांनी ज्या शिकारी केल्या त्या केवळ नरभक्षक वाघांच्या केल्या. त्यांच्या या निवासस्थानाचे रूपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. इथे जिम कॉर्बेट यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, चित्रे, पेंटिंग्ज, त्यांची हस्तलिखिते आदी गोष्टी पाहता येतात. १९२२ मध्ये बांधलेला त्यांचा हा बंगला सुस्थितीत जतन करण्यात आला आहे. बंगल्याचा परिसर विशाल आणि निसर्गरम्य आहे.
आजचा आमच्या सहलीचा हा अखेरचा दिवस होता. रात्री आम्ही याच द बनियन रिट्रीट या हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. सकाळी नाश्ता करून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. बसने दिवसभर प्रवास करून आम्ही संध्याकाळी दिल्लीला पोहोचलो आणि पहाटेच्या सुमारास पुण्यात विमानाने परत आलो. आमच्यासोबत आमच्या सामानासोबतच होत्या या सहलीच्या साऱ्या रम्य आठवणी.