(आज प्रस्तुत है गुरुवर स्व प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित – “कविता – शिक्षा की महत्ता…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण स्वप्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे.।)
☆ काव्य धारा # २६९ ☆
☆ शिक्षा की महत्ता… ☆ स्व प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆
शिक्षा ही देती इस जग में, सबको समुचित ज्ञान है
शिक्षा से ही संभव इस जीवन में हर कल्याण है।
शिक्षा के बिन अंधकार है, फीका हर व्यवहार है
शिक्षा से ही पाता मानव धन उन्नति सम्मान है ।।1।।
*
सदा सुशिक्षित विनयशील का युग करता गुणगान है
अपने विद्वानों पर ही होता सबको अभिमान है।
दूर दूर इससे ही जाते शिक्षा पाने लोग हैं
सुख दुख में सब साथ निभाती विद्या मित्र समान है ।।2।।
*
शिक्षा ही इस जग में सचमुच हर विकास का प्राण है
शिक्षा से ही संभव गहराई का अनुसंधान है।
शिक्षा सचमुच अक्षय धन है, शिक्षा सुख की खान है
शिक्षा बिन भटकाव बहुत हैं, मुश्किल निज अधिकार है ।।3।।
*
सुलभ कामना पूर्ति मंत्र-शिक्षा पर केन्द्रित ध्यान है
ज्ञानवान ही कर सकता भावी का कुछ अनुमान है।
मिली न शिक्षा सही अगर तो पग-पग पर कठिनाई है
संकट की रक्षा करने को सही ज्ञान भगवान है ।।4।।
*
शिक्षा बिन अंधा सा औ’ निर्बल जैसा इन्सान है
शिक्षा के प्रकाश से होती हर मुश्किल आसान है।
शिक्षा ने ही सुलभ कराई सुविधाएं विज्ञान कीं
शिक्षा से ही हुआ विश्व का चतुर्मुखी उत्थान है ।।5।।
आपल्या संस्कृतीची काही खास पवित्र अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवा, दीपक! घरातील देवघरात, मंदिरातील गाभाऱ्यात तेवणारा दिवा जसा मंगलमय, पवित्र असतो तसाच तो चैतन्यदायी असतो. प्रज्वलित दिवा एक मंगलमय वातावरण निर्माण करतो. दिवा जेव्हा अंधाराचे निर्मूलन करतो तेव्हाच तो तेजोमय प्रकाशाचे स्वागत करतो. दिवा लावल्याशिवाय जशी देवपूजा संपन्न होत नाही तसेच सायंकाळी लावलेला दिवा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो.
दिवा दररोज सकाळी, सायंकाळी देवापुढे लावला जातो. षडरात्र, नवरात्र, दीपावली, नागदिवे/ देव दीपावली, पुरुषोत्तम मास आणि इतर अनेक सणांच्या निमित्ताने अहोरात्र नंदादीप तेवत ठेवण्याची आपली परंपरा आहे. अनेक घरांमध्ये सायंकाळी दिवा लावताना घरातील बालकांना देवापुढे बसवून प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेतून लहानपणापासून दिव्याचे महत्त्व बालकाच्या मनावर बिंबवले जाते. त्यातील काही ओळी…
‘दिव्या दिव्या दीपत्कार,
कानी कुंडल मोतीहार |
दिव्याला पाहून नमस्कार |
दिवा लावला देवापाशी,
उजेड पडला तुळशीपाशी|’
ज्याप्रमाणे अनेक सणांमध्ये तबकात दीप घेऊन ओवाळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे अधिकमासात दिव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये देवाजवळ नंदादीप लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्या संदर्भातील काही आख्यायिका ‘अधिकमास महात्म्य’ या अंतर्गत अनेक ठिकाणी वाचायला मिळतात…
अधिक मासाची कहानी
एकदा भगवान नारायण जनहितार्थ तपश्चर्येत ध्यानमग्न असताना तिथे महर्षी नारद यांचे आगमन झाले. “नारायण… नारायण… ” हा स्वर नारायणांच्या कानी पडला. नारद मुनींचे आगमन झाले हे समजताच भगवान विष्णूंनी डोळे उघडले. त्यांनी विचारले,
“होय, नारायणा! सारे काही कुशल आहे. एक प्रश्न विचारायचा आहे.”
“नारदमुनी, तुम्हाला कधीपासून परवानगी घ्यावी लागते? काय मनात आहे ते नि:संकोच विचारावे. “
“नारायण… नारायण…! देवा, दरवर्षी बारा महिने असतात परंतु प्रत्येक तीन वर्षानंतर तेरावा महिना येतो. त्यामागे काही विशिष्ट संकेत आहेत का?”
“मुनी श्रेष्ठ, आपण खूप छान प्रश्न विचारला आहे. जगात सत्कर्म वाढले की कल्याण होते. उलट जगामध्ये वाईट गोष्टींचे प्रमाण वाढले की मग अधोगती सुरू होते. सद्य युगात दुष्कर्मांची संख्या वाढल्यामुळे पाप वाढत चालले आहे. तुम्ही म्हणता त्या बारा महिन्यांनी तक्रार केली होती, की सध्या सर्वत्र वाढलेले पाप आम्ही आमच्या पोटात घेत असतो परंतु ते आम्हाला सहन होत नाही. आम्ही आमच्या पोटात जमा असलेल्या पापाचा तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकत आहोत म्हणजे तितकाच पापाचा भार कमी होईल. त्याप्रमाणे त्या प्रत्येक महिन्याने तिसरा हिस्सा काढून टाकला. काढून टाकलेल्या पापाच्या हिश्श्यापासून नवीन मास उत्पन्न झाला अर्थात तेरावा महिना जन्माला आला. तो पापमय असल्याने त्याला मलमास किंवा मलिनमास असे नाव मिळाले.
मलमासाला त्याच्या सोबतचे बारा महिने चिडवत होते, त्याची टिंगलटवाळी करत होते कारण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मलमास अयोग्य समजला जात असे. सूर्याची गती मोजताना मलमास गृहित धरला जात नसे. त्यामुळे मलमास दुःखी होत असे. मलमासाने मानवरूप धारण केले. काय करावे म्हणजे हे बारा महिने आपला दुस्वास करणार नाहीत, मलाही इतर महिन्यांप्रमाणे योग्य स्थान, प्रतिष्ठा मिळेल. अशा विचारात असताना त्याला वैकुंठपती श्रीविष्णुचे स्मरण झाले. मलमास वैकुंठात गेला. आसवं गाळत तो श्रीविष्णुला शरण गेला. भगवान विष्णुंची त्याने आराधना केली. विष्णू म्हणाले,
“वैकुंठात केवळ सुख आणि सुख असताना तू दुःखी का आहेस? काय झाले?” तेव्हा अधिकमासाने स्वतःचे दुःख नम्रतेने श्री मधुसूदनाला सांगितले. ते ऐकून माधव म्हणाले,
“ठीक आहे. आपण आता गोलोकात जाऊया. तिथे मुरलीधर कान्हा आहे. सकल भक्तांचे दुःख तो तत्काळ हरण करतो. चल. “
भगवान विष्णुंच्या पाठोपाठ मलमास गोलोकात गेला. तिथे श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. मलमासाचे आसवे थांबत नव्हती. ते पाहून श्रीकृष्णाने भगवान विष्णुला विचारले,
“महाविष्णू, हा मानव कोण आहे? हा सतत अश्रू का ढाळत आहे? याला कोणते दुःख आहे?” दामोदराचे प्रश्न ऐकून विष्णुंनी सारी परिस्थिती कृष्णाला कथन केली म्हणाले,
“हा पीडित मास माझ्याकडे आला. मी त्याचे सारे दुःख ऐकले. त्याचे दुःख केवळ तुम्हीच दूर करू शकाल म्हणून मी त्याला गोलोकात घेऊन आलो आहे. या दुःखिताचा तुम्ही उद्धार करावा, त्याच्या दुःखाचे हरण करावे. “
“महाविष्णू, हे चांगले केले. अगोदर तुम्हाला आणि नंतर मला शरण आलेल्या या मलमासाला मी माझे ‘पुरुषोत्तम’ हे नाव देतो. हा सर्व महिन्यांत श्रेष्ठ असेल. इतकेच नाहीतर माझे ऐश्वर्य ह्यास देतो. जसा मी सर्वत्र पवित्र, पूज्य आहे तसाच हाही पवित्र मानला जाईल. पुरुषोत्तम मासात भक्तगण जी धार्मिक कार्ये करतील त्याचे पुण्य फल त्यांना मिळेल. ” श्रीकृष्णाने मलमासाला जणू पुनर्जिवित केले, त्याला वरदान दिले. त्यामुळे आनंदित झालेला पुरुषोत्तम मास भगवान श्रीविष्णूंसह वैकुंठात परतला. त्याने तिथेच वास्तव्य केले…
००००
अधिकमास: दीप प्रज्वलन!
एकदा विष्णुपत्नी लक्ष्मीने पतीला विचारले, “श्रीहरी, मधुसूदना, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की, अधिकमासात देवाजवळ दीप लावण्याचे किंवा लावलेल्या दिव्याचे रक्षण केल्याने कोणते फळ मिळते?”
विष्णू म्हणाले, “ऐक. अधिकमासात दीप लावण्याचा विधी आणि महत्त्व सांगतो…
अधिकमासाच्या प्रथम दिवशी सकाळी स्नानादि कार्ये आटोपून स्वच्छ केलेल्या, सजविलेल्या भूमीवर घट मांडावा. त्याच्यासमोर एक दीप ठेवावा, ज्यात सप्ततंतूंची वात घालून तूप किंवा तेल घालून यथाविधी पूजन करून दीप प्रज्वलित करावा. मनोभावे प्रार्थना करावी…
“हे परमेश्वरा, ही माझी दीपसेवा गोड मानून घ्यावी. ह्या दिव्यामुळे अंध:कार दूर होऊन कांतीही उजळून निघावी. ” याप्रमाणे पूजन केल्यामुळे गोदान, भूदानाचे पुण्य लाभते. दीप दान करणारास ज्याप्रमाणे सुकांती लाभते, त्याचप्रमाणे धनसंपदा लाभते, अखंड सौभाग्य मिळते. यासह विद्या प्राप्त होते, आयुरारोग्यासह समृद्धी मिळते, पुत्रपौत्र संतती लाभते, जो ब्राह्मण स्वतः दीप दान करतो त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त होते, कुमारिकेस इच्छित पती मिळतो, सर्व दुःखांचे हरण होते, भीती दूर पळते, इतकेच नाही तर अधिकमासात जे कुणी दीप प्रज्वलनाच्या गोष्टी, महत्त्व सांगतात तेही पापमुक्त होतात… “
“श्रीहरी, अधिक मासातील दिव्याची अतिशय चांगली अशी माहिती सांगितली. ” लक्ष्मी समाधानाने म्हणाली.
००००
वेणीमाधव वात!
श्री लक्ष्मीने भगवान विष्णू यांना विचारले, “देवा, अधिक मासात ‘वेणीमाधव वातीचा’ दिवा लावतात. त्याबद्दल सांगावे. “
“महालक्ष्मी, हिंदू संस्कृतीमध्ये देवापुढे लावल्या जाणाऱ्या वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या घरात सकाळ, संध्याकाळ पूजेच्या वेळी दिवा लावला जातो ते घर पवित्र होते. सहा दिवस, दहा दिवस नंदादीप लावण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे अनेक संकटांचे निवारण होते, एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक’ मासात देवापुढे वेणीमाधव ही वात प्रज्वलित करण्यात येते. वेणीमाधव वातीचा आकार इतर वातींच्या मानाने मोठा असतो. वेणीमाधव वात लावण्यामागे अध्यात्मिक कारण आहे. वेणीमाधव वात ही नेहमी दिवा लावताना जी वात वापरल्या जाते तशी वात नसते. दररोज जी तुपाची फुलवात वापरण्यात येते त्या तेहतीस फुलवाती एकात एक माळून वेणीमाधव वात तयार होते. ती गुंफण एखाद्या वेणीसारखी दिसते म्हणून त्या वेणीस वेणीमाधव वात असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये तसेच अधिक मासामध्ये तेहतीस अंकाला धार्मिक महत्त्व आहे. तेहतीस हा अंक तेहतीस कोटी देवांचे अर्थात तेहतीस प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिक मानल्या जातो. त्यामुळे तेहतीस फुलवातींची वात प्रज्वलित होताच मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेमुळे घरातील अपवित्रता, अघोरी शक्तींचे निर्मूलन होते, सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी भक्तांची मान्यता आहे. भक्त असेही मानतात की, ही वात लावल्याने निर्माण झालेली पवित्रता पुढील तीन वर्षे म्हणजे पुढील अधिक मास येईपर्यंत टिकून राहते.
ही वात वेणीमाधव म्हणून ओळखली जाते त्यामागे असलेले कारण म्हणजे, सृष्टीचे निर्माते आणि पालनकर्ते ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीच्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे वेणीमाधव वात होय!
वेणीमाधव वातीचे दुसरे महत्त्व असे की, यातील माधव म्हणजे श्री महाविष्णू! प्रयागराज येथे माधव अर्थात भगवान विष्णू, श्री महालक्ष्मीचे अर्थात आपले वास्तव्य आहे. श्री विष्णू यांना प्रयागराजचे व्दारपाल म्हणून ओळखले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे असे मानले जाते की, या सर्व गोष्टींमुळे वेणीमाधव ही वात आपल्या देवघरात लावल्याने मोठे पुण्य मिळते.
अधिकमासात किंवा धोंड्याच्या महिन्यात एकदा तरी वेणीमाधव वात देवघरात लावल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समाधान-आनंद मिळतो. ज्याप्रकारे त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळते तसेच पुण्य वेणीमाधव ज्योत देवघरात लावल्यामुळे प्राप्त होते.
“विष्णू देवा, खूप छान माहिती सांगितली आहे. आपण पाहतोय, वेणीमाधव वातीशिवाय भक्त इतरही वाती लावतात. “
“देवी, खरं आहे. तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. मंजूळ वातही काही भक्त लावतात. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे. वातीला वेगवेगळी नावे असली तरीही भक्तांचा भाव सारखाच असतो. “
“बरोबर आहे, देवा! खूप छान माहिती सांगितली. “
००००
मनीमाऊला मिळाली मुक्ती!
श्रीविष्णू लक्ष्मीला म्हणाले, “एक कथा सांगतो, सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. एकदा पुरुषोत्तम मासाचा योग साधून त्याने षोडशोपचारे पुजा करून दीप प्रज्वलित केला. दररोज सकाळ- संध्याकाळ दिव्याची पूजा, भजन करणे हा त्याचा नेम होता. त्याच्या घरी असलेल्या उंदरांना पकडण्यासाठी एक मांजर दररोज येत असे. एके रात्री ती मांजर नेहमीप्रमाणे त्याच्या घरात आली असता ब्राह्मण नेहमीप्रमाणे नाम घेत दिव्यासमोर बसलेला होता. दिव्यावर काजळी चढली असल्याने दिव्याचा प्रकाश मंद झाला होता. तितक्यात तिथे उंदीर आल्याचे पाहून टपून बसलेली मांजर उंदराकडे झेप घेत असताना तिचा पाय दिव्याला लागला. त्यामुळे दिवा हलला. परंतु त्यामुळे ज्योतीवर आलेली काजळी गळून पडली. दिव्याचे तेज फाकले. सकाळ होताक्षणी मांजर गतप्राण झालेली आढळली. देवी, नकळतपणे दिवा प्रज्वलित केल्यामुळे मांजराला मुक्ती मिळून ते मांजर वैकुंठाला पोहोचले. दुसरीकडे मनोभावे दीपपूजन करणारा सुशर्मा नावाचा ब्राह्मण समृद्ध झाला, पुत्रपौत्र प्राप्त झाले. उत्तम आरोग्य, सुख मिळून त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. “
“हे देवा, आपण खूप छान माहिती सांगितली आहे. त्यामुळे दिव्यासंदर्भात अजून काही ऐकण्याची लालसा उत्पन्न झाली आहे… “
००००
विमला नि सुशीला!
“लक्ष्मीदेवी, तुझी इच्छा जाणून एक कथा ऐकवतो…
अनेक वर्षांपूर्वी मथुरा नगरात शाकली नावाचा एक ब्राह्मण राहत होता. शुद्ध आचरण अशी त्याची ख्याती होती. त्याला विमला आणि सुशीला या नावाच्या दोन बायका होत्या. पुरुषोत्तम मासात एके दिवशी सुशीला पाणी आणण्यासाठी नदीवर गेली, तेव्हा तिला तिथे बरेच स्त्री पुरुष स्नान करताना दिसले. सुशीलेने घरी येऊन पतीला नदी स्नानाचे महत्त्व काय आहे ते विचारले. तेव्हा शाकलीने पत्नीला सांगितले, “श्री विष्णूला प्रिय अशा पुरुषोत्तम महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात दीप प्रज्वलित केला असता मोठे पुण्य लाभते. ” ते ऐकून सुशीला म्हणाली,
“पतिदेवा, तुम्ही सांगितलेला या मासाचा महिमा ऐकून संपूर्ण महिना मी दीप लावू इच्छिते. “
पत्नीची इच्छा जाणून शाकलीने तिला परवानगी दिली. सुशीलेने मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने पूजा करून दीप प्रज्वलित के
ला. नंतर पतीला नमस्कार करून त्यांना जेवायला देऊन स्वतः जेवण केले. आपल्या सवतीने केलेले कार्य विमलेस आवडले नाही. तिच्या मनात सवतीमत्सर जागा झाला. ती विचार करू लागली, काय करावे म्हणजे हिच्या पुजेत व्यत्यय येऊन तिची मनोकामना पूर्ण होणार नाही. विमलेच्या मनात एक कुविचार जागृत झाला. घरात कुणीही नाही हे पाहून विमलाने तेवत असलेला दीप शांत केला, त्यातले तेलही काढून टाकले. नंतर उतावीळपणे काय होते हे पाहण्यासाठी बसून राहिली. बाहेरून आलेल्या सुशीलेला शांत झालेला दिवा दिसताच तिला अतोनात दुःख झाले. तिने श्रीविष्णुला प्रार्थना केली. रोज तसाच प्रकार घडत होता.
विमला जाता येता कधी पदराने, कधी फुंकर घालून, कधी सारे तेल काढून दीप शांत करुन सुशीलाच्या भक्तीमध्ये विघ्ने निर्माण करीत होती. तो प्रकार सुशीलाच्या लक्षात आला परंतु ती शांत राहिली. कुणासही काहीही बोलली नाही. तिने पूर्ण पुरुषोत्तम मासात दीप प्रज्वलन करून व्रताची सांगता केली. त्याचे पुण्य तिला लाभले. दुसरीकडे विघ्नकर्ती विमलालाही तिच्या पापाचे फळ मिळाले. तिची तीन मुले मृत झाली. तिला स्वतःला दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. काही काळानंतर तिलाही मरण प्राप्त झाले… “
“देवी, लक्ष्मी असे आहे, दीप लावण्याचे महत्त्व!”
“स्वामी, केवळ पुरुषोत्तम मासातच नाही तर दररोज मनोभावे दिवा लावणाऱ्या कुटुंबांवर आपला असाच आशीर्वाद असू द्या. “
(मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.)
इथून पुढे ––
तिचे शिक्षक त्यांना जमेल तेवढी मदत करत होते. जात्याच हुशार असल्याने तिला थोड्या अभ्यासाने चांगले मार्क पडत होते. सरस्वतीचा वरदहस्त असल्याने तिने धीराने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, गुणवत्ता यादी चमकली आणि वर्गशिक्षिकेचया सहकार्याने “निराधार केंद्रात” प्रवेश मिळवला. तिच्या या निर्णयामुळे मामा दुखावला गेला पण घरातील वातावरण पाहून त्याने तिला नाईलाजाने होकार दिला. पुढे बुद्धिमत्तेच्या जोरावर पुण्यात बी. जे. मेडिकल महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळवून ती जिद्दीने डॉक्टर झाली. पुढे डी. जी. ओ पदवी संपादन केली हुशार विद्यार्थिनी म्हणून तिचे कौतुक झाले. मामालाही आनंद झाला. मामीने गोड पदार्थ करून तिला जेवायला बोलावले आणि घरी राहण्याचा आग्रह केला पण आता माधुरीला स्वतःच्या हिमतीने जगायचे होते, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करायचा होता. आपला नोकरी करण्याचा निर्णय तिने स्पष्ट सांगितलं. त्याच वेळी तिला तिच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून डॉक्टर साने यांच्या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली. कासे गाव पासून 20 किलोमीटर आत वाटेगाव आहे. तिथे जाण्याची तुझी तयारी आहे का? तुझे आयुष्य पुण्यासारख्या शहरात गेले तेव्हा खेडेगावात जायचे की नाही ते तू ठरव. असे त्यांनी सांगितले. त्याच क्षणी तिने वाटेगाव ला जायचे ठरवले.
प्राध्यापकांनी सांगितले, “मधुरा वाटेगावला डॉक्टर साने यांचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तसे फार मोठे नाही, तिथे गोरगरिबावर मोफत उपचार केले जातात एकंदरीत कमी पैशात उपचार केले जातात. त्यामुळे तुला पगार कमी मिळेल पण देव माणसासारख्या दांपत्याकडून बरेच शिकायला मिळेल हे निश्चित. “ठरवल्याप्रमाणे ती वाटेगावला डॉक्टर साने यांना भेटली. तिने आपली कागदपत्रे त्यांना दाखवली. तिची मार्कलिस्ट व इतर सर्टिफिकेट्स पाहून साने यांना तिचे कौतुक वाटले आणि त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तिला काम करण्याची संधी देण्याचे ठरविले.
ममता हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या क्वार्टर मध्ये तिची राहण्याची सोय केली. तिची राहण्याची सोय झाली आणि साने कुटुंबासारख्या सज्जन माणसांचा आधार मिळाला. माधुरीने “वाटेश्वराच्या “साक्षीने कामाला सुरुवात केली आणि मिळालेल्या संधीचे सोने केले. आपल्या डॉक्टरी पेशाला सर्वस्व मानले. आजच्या “कलियुगात मोजकीच माणसे कर्तव्य या शब्दाला जपणारी असतात “आणि माधुरीचा स्वभाव तोच आहे हे डॉक्टर जाणून होते. माधुरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती प्रत्येक रुग्णाशी प्रेमाने व न थकता आपुलकीने बोलायची. किती ही शंका विचारल्या तरी न चिडता त्या शंकांचे निरसन करायची, कायम हसतमुखाने गोड बोलून रुग्णांना आपलेसे करण्याच्या या पद्धतीमुळे ती लवकरच सर्वांची लाडकी झाली. तिच्यामुळे हॉस्पिटलचे वातावरण हसते खेळते झाले होते.. ती गुणी व परिस्थिती समजून वागणारी होती. डॉक्टर नेहमी तिचे कौतुक करत. “कौतुकाने ओझे कमी होत नाही पण कर्तव्य पेलणारे हात बळकट होतात “हा त्यांचा अनुभव होता. डॉक्टर साने दांपत्याला मूलबाळ नसल्याने त्यांनीही माधुरीला मुलीप्रमाणे माया लावली होती. आणि माधुरी सारख्या पोरक्या मुलीला “मायेची सावली “मिळाली होती. माधुरी सारख्या अनाथ मुलीला अनाथ मुलाबद्दल जिव्हाळा असणे साहजिकच होते म्हणूनच तिने अनाथ मुलीचा स्वीकार करण्याचे ठरविले तिच्यावर चांगले संस्कार केले, तिच्या बालपणीच्या लाडाकोडात स्वतःचे बालपण अनुभवले. माधुरीचा व्याप व जबाबदाऱ्या वाढत होत्या. विमल मावशी आपली नोकरी सांभाळून आपुलकीने मोहिनीला सांभाळत होत्या. तिची जेवणाची वेळ, शाळेची वेळ पाळत होत्या, तिचे कोड कौतुक करत होत्या. तिच्या ” आजी” या शब्दाने सुखावत होत्या. मोहिनी बालपणापासून कुशाग्र बुद्धीची होती. , माधुरी सारखीच बुद्धिमत्तेच्या जोरावर चमकत होती,. दहावी उत्तम गुणांनी पास झाली. तिला थोडी समज येताच माधुरी ने तिला तिची “जन्म कहाणी” सांगितली. त्यानंतर तिचा आई बद्दलचा आदर भाव अजून वाढला. वाटेगाव तसे खेडेगाव असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला सांगलीला जावे लागले. आपल्यापासून दूर पाठवणे माधुरीला जड वाटत होते पण “भावनेपेक्षा कर्तव्य” करणे जरूर आहे या विचारांनी तिला सांगलीला पाठवण्याचा विचार माधुरीने निश्चित केला. चांगल्या गुणामुळे विलिंग्डन कॉलेजमध्ये ला प्रवेश मिळाला. मोहिनी मन लावून अभ्यास करत होती. मैत्रिणींना अभ्यासात मदत करत होती. वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा जिंकून कॉलेजचे नाव उज्वल करत होते. सगळ्यांच्या आग्रहाखातर तिने जी. एस पद पण स्वीकारले पण अभ्यासात कुचराई केली नाही. बारावी उत्तम गुणांनी पास झाल्यावर तिने आईचा वारसा पुढे चालवण्याचा मानस बोलून दाखवला आणि माधुरीने दिला दुजोरा दिला. गुणांच्या जोरावर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. जिद्दीने M. B. B. S. केले. पुढे बालरोग तज्ञ म्हणून बोर्डात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिच्या पदवीदान समारंभाला येण्यासाठी महाविद्यालयाकडून डॉक्टर साने व माधुरीला आग्रहाचे निमंत्रण होते. तिच्या पदवीदान समारंभाला माधुरीने डॉक्टर साने कुटुंबासमवेत हजेरी लावली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी साने यांना पुढील रांगेत बसवले, माधुरी त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसली. मोहिनीचे नाव पुकारण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात मोहिनी स्टेजवर आली. समोर आपली आई व आजोबा यांना पाहून तिला खूप आनंद झाला. तिने आदरपूर्वक सर्वांना हात जोडले आणि मेडल आपल्या आजोबांच्या हस्ते मिळावे अशी मोहिनीने अध्यक्षांना विनंती केली. डॉक्टर साने स्टेजवर येताच मोहिनीने त्यांना चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि पाठोपाठ प्राचार्यांना वाकून नमस्कार केला डॉक्टर आजोबांच्या हस्ते मेडल स्वीकारल्यानंतर हातात माईक घेऊन ती म्हणाली, “नमस्कार, माझ्या आजी आजोबांचे आशीर्वाद व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच आणि आईचे उपकार ही’त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली चांगले काय? आदर्श कसे वागावे याचे ज्ञान मिळाले त्यांच्यामुळेच मी आज तुमच्या पुढे उभी आहे” पुढे माधुरी कडे पाहून म्हणाली, “तू माझी जीवनदात्री आहेस. आज मी जी काही आहे ते केवळ तुझ्यामुळे. मी खूप आनंदात आहे ते तुझ्यामुळे. माझ्या नशीब मोठं म्हणून मला तुझ्यासारखी आई मिळाली.. “माधुरीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि केलेल्या अग्नी दिव्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.
तिच्या यशाप्रीत्यर्थ साने यांनी ममता हॉस्पिटलच्या टेरेसवर “कौतुक समारंभ “आयोजित केला त्यावेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे स्नेही हजर होते. माधुरीचे प्राध्यापक डॉक्टर गोडबोले यांनाही साने यांनी अर्जवून बोलवले होते. माधुरीने निवृत्त झालेल्या विमल मावशींना प्रेमाने बोलावले होते. मोहिनीने स्व खर्चाने सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणली होत्या. विमल मावशी साठी सुंदर, सुती वायल साडी आणली होती. ती विमल मावशी येताच नमस्कारसाठी पुढे झाली तेव्हा विमल मावशींनी तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत तिच्या बालपणीच्या आठवणी सामावल्या होत्या. ती म्हणाली, “मावशी आजी माझे बालपण रम्य झाले ते तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या लहानपणी दिलेला वेळ माझ्यासाठी आठवणींचा अमूल्य ठेवा आहे “हे मोहिनीचे शब्द ऐकून विमल मावशी सुखावल्या त्यांच्या डोळ्यात पाणी तराळलं. कौतुक सोहळा होताच मोहिनी म्हणाली “मला एक माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. ” सर्वजण तिची इच्छा ऐकण्यासाठी उत्सुक होते. मी उद्यापासून याच हॉस्पिटलमध्ये “बाल रोग तज्ञ”. म्हणून रुजू होणार आहे हे ऐकताच माधुरी तसेच साने कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला. डॉक्टर साने म्हणाले “आता तू आणि तुझी आई दोघीही माझे कार्य पुढे नेण्यासाठी समर्थ आहात आता आम्ही आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगायला मोकळे झालो”
आपल्या आई वडिलांना सुद्धा काही वेळा आपली हुशारी कळत नाही. मी आमच्या घरात विज्ञानाचे प्रयोग करत बसायची. मग त्याचा रंग देणे – खिळे मारणे हे माझ्या हातून व्हायचं नाही. ते मी आमच्या कामवाल्या बाईच्या नवऱ्याकडून करून घ्यायची.
– – एकदा चक्क मी ‘ तिहेरी उपयुक्त शेगडी ‘ नावाचं उपकरण तयार केले.
घरात आमच्या एक जुनं कुकर पडलं होतं – किर्लोस्कर कंपनीच! डबे डबे जोडलेले. माझ्या डोक्यात रात्री तीन वाजता ही कल्पना आली की याच्यामध्ये वाफ सोडली तर, (ते वाफेवर होणार कुकर होतं) म्हणजे त्या प्रत्येक डब्याला आतून एक नळीचा कनेक्शन होतं – म्हणजे पहिल्या डब्यातली वाफ दुसऱ्या डब्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या या पद्धतीने..! ते मी शाळेत घेऊन गेले. नळाची शेगडी तयार केली. त्या नळातनं कमी व्यासाचा एक तांब्याचा पाईप आत मध्ये फिट केला. नळातून पाणी सोडल्यावर ते गरम होऊन बाहेर यायचं.. आत मध्ये बसवलेल्या तांब्याच्या नळातलं पाणी.. त्याची गरम वाफ होत असे, कारण शेगडीच्या आत तापमान जास्त.. त्या नळीवर कोळसा असायचा ना. तांब्याची नळी आणि कमी व्यास त्यामुळे
ती वाफ शेतावर फवारणी करतो तो पाईप असतो ना त्याच्याद्वारे त्या कुकरला जोडून आत सोडली. एका वेळेला तीन वस्तू होत होत्या.. म्हणजे शेगडी, शेगडी सारखी… बाजूला नळ जोडलेले.. याच्यातून पाणी येत होतं ते 56-57 अंश सेल्सिअस इतकं गरम, आणि डब्यामध्ये डाळ तांदूळ आणि बटाटे – –
– – ४0 मिनिटात शिजवून तयार…!
… कुकर शेगडीवर ठेवलेला नाही, ते सगळं वाफेवर व्हायचे. हे असलं काही काम मी घरात करत बसले की वडील आमच्या आईला सांगायचे, ” काय करते की येडं कुणास ठाऊक. काहीतरी जुनंपानं घेऊन खटपट करत बसतय झालं.. नादिष्ट आहे. कसे व्हायचे या पोरीचे कुणास ठाऊक?” घरात अशी चर्चाही चालायची. आई म्हणायची, “ जाऊदे, काहीतरी करून ती आपला आनंद घेतेना.. राहू दे “…
– – या उपक्रमाला राष्ट्रपती-सन्मान प्राप्त झाला त्यावेळेला रेडिओ होता. सातच्या बातम्यात त्याचा सन्मान झाल्याचेही सांगितले. लखनऊ येथील प्रदर्शनात त्याची मांडणी झाली. तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय झैलसिंग यांनी गाडीतून उतरून उपकरण पाहून याचे अतिशय कौतुक केले. लखनऊच्या सर्व वृत्तपत्रांनी मुलाखती घेतल्या. इथे आल्यावर आमचे सोलापुरात अनेक ठिकाणी सत्कार झाले. कारण त्या काळात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या एक दोनच शाळा होत्या. आता सुद्धा कमीच आहेत. सर्वत्र माझं कोड कौतुक…! वृत्तपत्रात मुलाखती… शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी, घरी बोलावून सत्कार केले. – – पण आमच्या घरात – –
काय येडं काहीतरी करतंय झालं… ही प्रतिक्रिया होती. चालायचंच.. प्रेमापोटी बोलतात ते.
एकूण काय… कोण काय म्हणते याकडे फारसं लक्ष देऊ नये. यावर मी काल एक व्हिडिओ पाहिला.. चार छान सुटाबुटातली माणसं.. समोर एक माणूस उभा आहे.. ती चार माणसं एकत्र बोलत होती…
“आपण नेहमी विचार करतो ना की चार लोक काय म्हणतील?… ते चार लोक आम्हीच आहोत… आम्ही काही म्हणणार नाही…! आणि इथं ती फिल्म संपते.
☆ बॅंकेतल्या मुली ! – लेखक : हेमंत खेर ☆ श्री सुभाष धारणकर ☆
बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंक शाखा उघडण्याचे प्रमाण वाढले आणि सेवा भरतीही वाढली. १९७४ ते १९९२ पर्यंत बॅंका, जनरल इन्शुरन्स, एल्आयसी ह्या मध्ये स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून भरपूर भरती झाली. ह्या भरतीत महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पांढरपेशा आणि तुलनेने सुरक्षीत वातावरणातील कार्य संस्कृती मुळे ही क्षेत्रे त्यांना भावली. प्रथमच शिक्षीका, नर्सिंग, पोस्ट आणि सरकारी विभागा बाहेर एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. महिला सक्षमीकरण हा शब्द खूप नंतर आला. त्या आधीच ही शांततापूर्ण क्रांती झाली होती.
बॅंक व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी सुद्धा सहानुभूतीचा आणि काहीसा उदार दृष्टिकोन स्विकारून ह्या महिलांचे जिणे सुखकर केले.
मी १९८४ साली बॅंकेत लागलो. आमच्या बरोबरचे सहकारी जवळपास सगळे गरीब ते कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आले होते.
ह्या मुली सुद्धा अशाच परिवारातून आल्या होत्या. आपल्या बरोबर काटकसरीचे, निगुतीने काम करण्याचे, पापभिरू संस्कार घेऊन आलेल्या. जबाबदारीची जाणीव असलेल्या. काही जणींनी बॅंकेत प्रेमविवाह केले. तरी बहुतांशी जणींचे विवाह पारंपारिक मार्गाने झाले. उच्छृंखलपणा अत्यंत अपवादात्मक होता. नटवेपणाही जवळपास नव्हताच (बऱ्याच जणींनी आपल्या मुलीं बरोबर वा मुलांच्या लग्नात ब्युटी पार्लर बघितले असावे)
आणि कधी काळी कुणी केलाच तर केस हाताबाहेर जाऊ न देण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. मत्सर हा स्त्रीसुलभ असला तरिही सहकार्य आणि सांभाळून घेणं असायचं. अनेकदा सासुरवास भोगणाऱ्यांना बॅंकेत एकमेकींशी बोलून मन मोकळं करता येत असे.
आजच्या तुलनेत तेंव्हा स्वातंत्र्य कमी होतं जबादाऱ्या जास्त होत्या. मुलाबाळांचे करण्यात वेळ मिळत नसे. सासू सासरे छान आणि नातवंडांना सांभाळतायत असं दृष्य कमीच.
खरं तर आमच्या पिढीचे नशीब म्हणजे आधी आई वडिल, सासू सासरे ह्यांची सेवा आणि नंतर मुलांची सेवा.
ह्या मुलींनी हसत हसत सगळं केलं. घरं बांधली, पर्यटन केलं, कर्ज काढून वस्तू केल्या.
अपवाद वगळता फार कोणी प्रमोशनच्या मागे लागल्या नाहीत. पण ज्यांनी घेतली त्या कुठेच कमी पडल्या नाहीत.
एकेकाळी जाड आणि जड लेजर उचलणाऱ्या. काऊंटर, खुर्च्या पुरुषांच्या उंचीच्या विचाराने असत त्यावर उशा टाकून किंवा जुनी लेजर टाकून बसणाऱ्या मुली, सफाईदारपणे संगणक चालवू लागल्या. नाकावर आलेल्या चष्म्यातून स्क्रीन पाहू लागल्या.
जवळपास सर्वांच्याच मुलांनी छान शिक्षण घेतलं. देश विदेशात कर्तृत्व गाजवत आहेत.
ह्या मुलींनी काय दिलं? त्यांच्या मुळे कार्यालयात सभ्यपणा टिकून राहिला.
येणाऱ्या अडाणी महिला ग्राहकांना आधार वाटला. समाजातील महिलांचे स्थान उंचावले.
माझ्या बदल्यांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला आमच्या पिढीच्या ह्या प्रतिनिधी भेटल्या.
त्यावेळी लढणाऱ्या मुली आज निवृत्त होत आहेत. जवळपास सर्व जणी आज निवृत्त होऊन सासू, आजी ह्या रोल मध्ये गेल्या आहेत. आमच्या पिढीने झगडून मिळवलेली पेन्शन अजूनही त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
त्यांनी चाललेल्या वाटेचा आज महामार्ग झाला आहे.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मागच्या महिन्यात सिनकर मॅडम निवृत्त झाल्या. आणि ह्या महिन्यात लोटलीकर मॅडम निवृत्त होतील. त्यांना शुभेच्छा.
– वर सांगितलेल्या पिढीतील या बहुतेक शेवटच्या प्रतिनिधी.
त्यांना शुभेच्छा देताना हे विचार मनात आले. ते दिवस पुन्हा आठवले. म्हणून जमेल तसं लिहिलं. (काही चुकलं असेल तर कान उपटायला अजूनही अनेक जणी समर्थ आहेत.)
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५१ आणि ५२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ५१ – –
मदें मछरे सांडिला स्वार्थबुद्धी|
प्रपंचिक नाही जयाते उपाधि|
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|५१|
अर्थ : जो अहंकार आणि द्वेषरहित आहे, ज्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे, जो संसारात राहूनही विरक्त वृत्तीने वागतो, नेहमी नम्र आणि मधुर वाणीनेच बोलतो, असा मनुष्य सर्वोत्तम अशा भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
(मद – अहंकार, मछरे -मत्सर/द्वेष, सांडिला – सोडून दिले आहे, स्वार्थ बुद्धी – केवळ स्वतःचा फायदा पाहणे, उपाधि – बाह्य पाश /बंधन, सुवाचा – गोड /मधुर बोलणे)
विवेचन :हा फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. खऱ्या भक्ताची लक्षणे आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. खरा भक्त अहंकार आणि द्वेष रहित असतो. त्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केलेला असतो. काही ठिकाणी या श्लोकामध्ये पाठभेद आढळतात. काही पुस्तकांमध्ये सांडली असा शब्द आहे तर काही पुस्तकांमध्ये सांडिला असे म्हटले आहे. या शब्दांमुळे अर्थामध्ये जरा फरक पडतो ज्या पुस्तकामध्ये मदे मत्सरे सांडीली स्वार्थ बुद्धी असे म्हटले आहे, तिथे सांडली म्हणजे त्याग केला या अर्थाने मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांचाही खऱ्या भक्ताने त्याग केलेला असतो असा अर्थ घेता येतो. तर जेव्हा सांडीला हा शब्द वापरलेला आढळतो तेव्हा मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी हे दुर्गुण खऱ्या भक्ताला सोडून गेलेले असतात. म्हणजे त्याला ते स्पर्शही करत नाहीत असा अर्थ घेता येतो. तसेच काही पुस्तकात मत्सरे तर काही ठिकाणी मछरे हा शब्द वापरला आहे. अर्थात दोन्हींचा अर्थ मत्सर हाच आहे.
या शब्दांच्या जास्त खोलात न शिरता आपल्याला असे लक्षात येते की खरा भक्त हा अहंकार आणि द्वेषरहित असतो. त्याच्याजवळ स्वार्थ बुद्धी नसते. मद म्हणजे गर्व किंवा अहंकार. माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप गर्व असतो. त्यातूनच मग तो मी हे केले, मी ते केले, माझ्यामुळेच हे झाले अशा प्रकारची अहंकारी विधाने करत असतो. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ आहे असे दिसले की मग त्याचा मत्सर जागा होतो. तो त्याचा द्वेष करू लागतो आणि मग त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही पातळीला जातो.
स्वार्थ म्हणजे स्व -अर्थ. स्वार्थी माणूस केवळ स्वतःचाच फायदा पाहत असतो. पैसा, संपत्ती यासारख्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्याचे समाधान होत नाही. अजून हवे, अजून हवे असे त्याला वाटत राहते. एकदा हातात भरपूर पैसा आला की मग त्याच्या जोडीला मद येतो. अहंकार वाढत राहतो. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याचा द्वेषही मनामध्ये ठाण मांडून बसतो. पण जो परमेश्वराचा खरा भक्त असतो, त्याची मानसिक अवस्था या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते. तो तृप्त असतो. आहे त्या परिस्थितीत संतुष्ट आणि समाधानी राहतो. कोणाचा तिरस्कार किंवा द्वेष करणे त्याच्या मनात येत नाही.
या श्लोकात खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. खरा भक्त प्रपंच तर करतो पण कसा? तर संसारात राहूनही तो त्यापासून अलिप्त असतो. तो विरक्त वृत्तीने जगतो. खरा भक्त असण्यासाठी भगवे कपडे, माळा, टिळा, टोपी, गंध इत्यादी धारण केले पाहिजे असे नाही. त्यासाठी कुठे वनात जावे लागत नाही. आपण संसारात राहून सुद्धा भगवंताचे लाडके भक्त होऊ शकतो.
कमलपुष्पाचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कमळ चिखलात असते पण त्यात राहूनही ते त्यापासून दूर असते. असेच संसारात देखील राहता आले पाहिजे. संसाराची उपाधी खऱ्या भक्ताला असत नाही म्हणजेच त्याला संसाराचे पाश बांधू शकत नाहीत. संसारात असूनही तो मुक्त असतो, विरक्त असतो.
खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. त्याचे बोलणे नम्र असते, बोलण्यात माधुर्य असते. आपल्या बोलण्याने तो कोणालाही दुखवत नाही. यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. खऱ्या भक्ताच्या अंगी हे गुण आपोआप येतात. निवडणूक आली म्हणजे बरेच पुढारी अगदी नम्रतेने जनतेला सामोरे जातात. कार्पोरेट क्षेत्रातही कामाच्या गरजेपोटी नम्रता धारण केली जाते. पण हे सगळे मुखवटे असतात. आतले रूप वेगळ्याच असते. असे आपल्याला अनेक प्रसंगी आढळून येते. खरा भक्त हा अंतर्बाह्य निर्मळ असतो. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जेवढं मऊ आणि मुलायम असतं, तसंच सज्जनांचे चित्त असतं असं तुकाराम महाराज म्हणतात.
समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांच्यासारखे संत काही वेळा कठोरपणाने बोलताना दिसतात. पण त्यामागे समाज हिताची तळमळ असते. आई सुद्धा आपल्या मुलाला प्रसंगी रागावते, तर कधी चिडून ” मर मेल्या… “असे सुद्धा उद्गारते. परंतु त्यातही तिचे प्रेम असते आणि मुलाच्या कल्याणाचाच विचार असतो. असेच संतांचीही बोलणे असते. जाणीवपूर्वक कोणाचेही मन दुखवावे म्हणून ते बोलत नसतात.
म्हणून आपणही परमेश्वराचे प्रिय भक्त होण्याचा प्रयत्न करावा. अहंकार, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी यांच्यासारख्या दुर्गुणांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात रहावे, प्रपंच उत्तम करावा. परंतु ज्या काही गोष्टी घडतात, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहायला शिकावे म्हणजे आपल्याला त्या बंधनकारक होत नाहीत. अनावश्यक बोलणे टाळावे आणि जे काही आपण बोलू त्यात नम्रता आणि माधुर्य असावे. असा भक्त हा त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील सर्वोत्कृष्ट असा भक्त असतो.
स्वसंवाद ::
१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का – की ते केवळ गरजेपुरते असते आणि आतमध्ये वेगळेच असते?
२) माझ्या मनात कोणाबद्दल मत्सर किंवा द्वेष आहे का – आणि त्याची मला जाणीव होते का?
३) “संसारात राहूनही विरक्त” – माझ्या जीवनात मी साक्षीभावाने वागण्याचा प्रयत्न करतो का की संसारातील गोष्टी मला पूर्णपणे बांधून टाकतात?
– – –
श्लोक क्र. ५२ – –
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥
करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥
अर्थ :खरा भक्त तत्वचिंतनात वेळ घालवतो. अहंकार, दंभ आणि वादविवादात तो वेळ घालवत नाही किंवा त्यात गुंतून पडत नाही. तो उगमाचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करून स्वतःशी किंवा इतरांशी सुख संवाद साधतो असा भक्त परमेश्वराचा खरोखरच धन्य असा भक्त होय.
(क्रमी – वेळ घालवतो, तत्त्वचिंतन – परमात्मस्वरूपाचे चिंतन, अनुवाद – आचरण /अनुकरण, लिंपे – लिप्त होत नाही किंवा दोष लावून घेत नाही, दंभवाद – फसवा युक्तिवाद, विवाद – निष्फळ वाद, उगम – मूळ स्वरूप)
विवेचन : खरा भक्त आपला वेळ कसा घालवतो हे समर्थ पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत सांगतात तर भक्ताने कसे असू नये हे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले आहे.
– – क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे…
साधकाचे अंतिम ध्येय परमेश्वराला प्राप्त करून घेणे हे असते एकदा त्याने ही गोष्ट आपल्या मनाशी निश्चित केली की मग त्याचे चिंतन करण्यातच तो आपला वेळ घालवतो. त्याव्यतिरिक्त जो इतर गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो तो खरा साधक नव्हेच! तो मूळ तत्वाचे म्हणजे परमेश्वराचे चिंतन करतो. याच ओळीत अनुवादे हा शब्द आला आहे याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. साधारणपणे अनुवाद म्हणजे भाषांतर असे आपण समजतो परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ आचरण किंवा अनुकरण असा घ्यायला हवा. म्हणजे ज्याला परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले आहे तो साधकाने जसे वागायला हवे तसेच वागत असतो. आपल्या गुरूंनी किंवा आपल्या श्रेष्ठ ग्रंथांनी जी गोष्ट सांगितली आहे, त्याचे अनुकरण करत असतो. त्याचा अनुभव घेत असतो. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाबद्दल एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीवाचून उपयोग नसतो तर त्याप्रमाणे वागून त्या ओवीची अनुभूती घेणे, अनुभव प्राप्त करणे हा त्याचा अर्थ आहे आणि खरा भक्त तेच करत असतो.
असा भक्त निष्करण वादविवादात गुंतून पडत नाही. आपल्याला थोडेफार ज्ञान झाले, काही मोजक्या ग्रंथांचे आपण वाचन केले म्हणजे आपल्याला फार कळते आहे असे आपल्याला वाटू लागते. मग आपण ते दाखवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी वादविवाद करत बसतो आणि मी किती श्रेष्ठ आहे, मला किती कळते हे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. खरा भक्त बोलतो, गातो ते फक्त परमेश्वराबद्दल बोलण्यासाठीच. त्याचीच महती तो गात असतो. म्हणून तो व्यर्थ वादविवादात पडत नाही किंवा त्यात स्वतःला गुंतवून घेत नाही.
आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळतात. त्यातील आठ ते दहा तास झोपेत जातात. दहा ते बारा तास आपली नोकरी, प्रपंचाचे काम यात जातात आणि उरलेले तीन -चार तास आपण आपल्या मनाप्रमाणे घालवतो. त्यात टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, मित्रमंडळींमध्ये गप्पा मारणे यासारख्या गोष्टी करतो. खरा भक्त या वेळेत काय करतो? तर तो स्वतःशी संवाद साधतो, आत्मचिंतन करतो. त्यालाच सुखसंवाद असे म्हणता येईल. हा सुखसंवाद उगमाकडे जाण्याचा असतो. गंगा नदी किंवा यमुना नदी आपण पाहिलेली असते परंतु हिमालयात प्रवास करणारे यात्रिक किंवा भाविक गंगोत्री किंवा यमुनोत्री म्हणजेच गंगेच्या किंवा यमुनेच्या उगमपर्यंत जातात. म्हणजेच मूळ स्थान शोधून काढतात.
आपल्यालाही मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. परंतु आपणही आपले मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोहम म्हणजे मी कोण आहे, माझे मूळ स्वरूप कोणते आहे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मग आपण सोहम पर्यंत येतो म्हणजे तो मीच आहे हे आपल्याला कळू लागते आणि मग आपलाच आपल्याशी संवाद होऊ लागतो. ” तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ” आणि जेव्हा भक्ताच्या वागण्यात ही सगळी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो फक्त खरोखरच परमेश्वराचा धन्य भक्त ठरतो.
स्वसंवाद ::
१) माझा रिकामा वेळ कशात जातो – तत्त्वचिंतनात की मोबाईल, गप्पा यासारख्या गोष्टींमध्ये?
२) मला थोडे ज्ञान झाले म्हणून मी वादविवादात पडतो का – की माझ्या ज्ञानाचे आचरण करण्यावर माझा भर असतो?
३) “कोहम ते सोहम” – मी कोण आहे हा प्रश्न मला कधी पडला आहे का? माझ्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याची माझ्या मनात खरी ओढ आहे का?
☆ तो ‘जादुई डबा’ – – – माहिती संग्राहक/लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆
जॉन शेफर्ड-बॅरन
एका बंद दरवाजातून जन्मलेला तो ‘जादुई डबा’ आणि तुमच्या ४ अंकी पिनचा रंजक इतिहास – – –
लंडनच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर पावसाची रिपरिप सुरू होती. जॉन नावाचा एक माणूस धावत धावत बँकेच्या दिशेने जात होता. घड्याळाचा काटा बरोबर दुपारी एकवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यादेखत बँकेचं जड लोखंडी दार बंद झालं. जॉन फक्त एक मिनिट उशिरा पोहोचला होता. खिशात पैसे नव्हते आणि पुढचे दोन दिवस बँक उघडणार नव्हती.
*****
त्या दिवशी झालेली ती चिडचिड एका जागतिक क्रांतीची ठिणगी ठरेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तो माणूस म्हणजे जॉन शेफर्ड-बॅरन. योगायोग बघा, जॉन यांचा जन्म आपल्या भारतातल्या मेघालयातील शिलाँगमध्ये १९२५ मध्ये झाला होता. बँकेचं दार तोंडावर बंद झाल्यावर जॉन घरी गेले, पण त्यांच्या डोक्यात एक विचार चक्रावून गेला.
****
त्या रात्री अंघोळ करताना त्यांना चॉकलेटच्या व्हेंडिंग मशीनची आठवण झाली. जर मशीनमध्ये पैसे टाकल्यावर चॉकलेट बाहेर येऊ शकतं, तर मशीनमधून पैसे का बाहेर येऊ शकत नाहीत? हा साधा विचार घेऊन जॉन बार्कलेज बँकेच्या व्यवस्थापकांकडे गेले. त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली.
****
२७ जून १९६७ हा दिवस बँकिंगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. उत्तर लंडनमधल्या एनफिल्डमध्ये जगातील पहिलं एटीएम (Automated Teller Machine) बसवण्यात आलं. गंमत म्हणजे, तेव्हा आजच्यासारखी प्लास्टिकची कार्ड्स नव्हती. लोक एका विशिष्ट प्रकारचा, केमिकली कोडेड चेक मशीनमध्ये टाकायचे आणि मग मशीनमधून १० पाउंडची नोट बाहेर यायची.
****
जॉन यांना वाटलं होतं की एटीएमचा पिन सहा अंकी असावा. त्यांनी स्वतःच्या आर्मी नंबरवरून तसा विचार केला होता. पण जेव्हा त्यांनी ही गोष्ट आपली पत्नी कॅरोलिनला सांगितली, तेव्हा तिने एक साधी पण महत्त्वाची अडचण मांडली. ती म्हणाली, “सहा अंक लक्षात ठेवणं खूप कठीण आहे, मला फक्त चारच अंक नीट लक्षात राहतात. “
पत्नीचा हा विसरभोळेपणा म्हणा किंवा व्यावहारिक सल्ला, जॉन यांनी पिनची लांबी चार अंकांवर आणली. आज आपण गुगल पे असो वा डेबिट कार्ड, जो ४ अंकी पिन वापरतो, त्याचं श्रेय कॅरोलिन यांच्या त्या एका वाक्याला जातं. एका स्त्रीच्या सोयीसाठी बनलेला हा नियम आज जगाचं स्टँडर्ड बनला आहे.
****
ज्या एटीएमने आपल्याला रांगेतून मुक्त केलं, तेच एटीएम आता एका वेगळ्या वळणावर उभं आहे. आता आपल्याला रोख रकमेसाठी एटीएम शोधत फिरावं लागत नाही. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर असो वा मुंबईच्या खाऊ गल्लीत, खिशात पाकीट नसलं तरी चालतं, फक्त हातात मोबाईल आणि समोर एक क्यूआर कोड (QR Code) असला की काम फत्ते होतं.
****
डिजिटल पेमेंटच्या या लाटेत एटीएमची गरज हळूहळू कमी होताना दिसतेय. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीला एटीएमबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत. बँकाही आता नवीन एटीएम मशीन बसवण्यापेक्षा डिजिटल ट्रान्झॅक्शनवर जास्त भर देत आहेत.
****
एकेकाळी क्रांती घडवून आणणारा हा ‘जादुई डबा’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे का? कदाचित काही वर्षांनी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सांगावं लागेल, “बाळा, पूर्वी पैसे काढायला रस्त्यावरच्या एका मशीनपाशी जावं लागायचं आणि तिथे एक विशिष्ट आवाज यायचा जो ऐकून खूप समाधान वाटायचं. “
****
काळ बदलला की गरजा बदलतात आणि तंत्रज्ञानही. ज्या जॉन शेफर्ड-बॅरन यांनी आपल्याला २४ तास पैसे मिळण्याची सोय करून दिली, त्यांच्या त्या कल्पनेने बँकिंग सोपं केलं. पण आज मोबाईलच्या एका क्लिकवर होणारे व्यवहार पाहता, एटीएम हे मशीन लवकरच इतिहासाच्या पुस्तकात जमा होईल असं वाटतंय.
☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
(पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
धर्मसंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्मसंबंधीच्या साऱ्या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा.
धर्मांनी समावेशक वृत्ती धारण केली पाहिजे, ईश्वरविषयीच्या त्यांच्या विशिष्ट कल्पना इतरांहून वेगळ्या आहेत एव्हढ्याचसाठी त्यांनी तिरस्काराने एकमेकांना तुच्छ न लेखले पाहिजे. मी आपल्या आयुष्यात अशी कितीतरी धार्मिक माणसे पाहिली आहेत, अशी समंजस माणसे पाहिली आहेत की ज्यांचा ईश्वरावर, आपण त्या शब्दाचा जो अर्थ करतो त्या अर्थाने मुळीही विश्वास नाही. कदाचित तुम्हा-आम्हाला कधी कळू शकला असेल त्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने ईश्वर त्यांना कळला आहे.
धर्मांनी, त्यांच्या ठायी प्रचंड शक्ती वसत असल्यामुळे, जगाचे भले करण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त केले आहे, आणि असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा संकुचितपणा आणि विशिष्ट सीमांमध्येच घुटमळत राहण्याची त्यांची प्रवृत्ती.
– स्वामी विवेकानंद (पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
लेखक: स्वामी विवेकानंद
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आठवणी अंगाराच्या
लेखक : विश्वास विनायक सावरकर
पृष्ठे : १९८
मूल्य : ३००₹
आठवणी अंगाराच्या’ या पुस्तकाची ही चतुर्थ आवृत्ती एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वास सावरकर हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केली, ती त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे – –
तात्यांच्या आठवणी असंख्य आहेत. कुटुंबातल्या माणसांपुढे आपण अनेक आठवणी केवळ व्यक्तीच्या आठवणी म्हणून सांगतो व ऐकतो; पण या आठवणी माझ्या वडिलांच्या असल्या तरी त्या एका राष्ट्रीय पुढाऱ्याच्या असल्याने त्यांच्या काही आठवणी मी अशा निवडल्या आहेत, की, ज्या वाचल्याने तात्यांच्या स्वभावाचं दर्शन व वागण्या-बोलण्यातून त्यांचं देशप्रेम व तत्त्वनिष्ठा व्यक्त व्हावी.
त्याचप्रमाणे लोकांना सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्वी विशिष्ट प्रसंगी दिलेल्या संदेशांचा उपयोग व्हावा, हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी आठवणी लिहिल्या असून त्यायोगे तात्यांच्या जीवनाच्या घरगुती आणि सार्वजनिक बाजूंवरही प्रकाश पडावा.
त्याचप्रमाणे त्यांच्या घरगुती आवडी-निवडी, त्यांचे कुटुंबीयाशी बोलणं-चालणं, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम यांविषयीची लोकांमध्ये असलेली उत्सुकताही थोड्याफार प्रमाणात पुरी व्हावी. ह्यापुढे माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या आदराविषयी लिहिणं हे मी गौण मानलं. काही जणांनी माहिती काढण्याच्या ओघात काही स्पष्ट व सविस्तर प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना, वस्तुस्थितीला धरून मीही सुस्पष्ट व सडेतोड उत्तरं दिली. ती या लेखनात आली आहेतच.
तात्यांच्या वैयक्तिक वागणुकीतून व्यक्त होणारं त्यांचं देशप्रेम, तत्त्वनिष्ठा, दूरदृष्टी व पुढे अनेक वर्षं उपयोगी पडणारं मार्गदर्शन यांचं आकलन व्हावं हा मूळ हेतू या आठवणी लिहिताना डोळ्यांसमोर असल्याने अशा आठवणीं संबंधातील कालगणनेतील वा इतर तपशिलातील अचूकपणात क्वचित फरक पडण्याचा संभव आहे. परंतु या आठवणींमधील गाभा मात्र माझ्या वर वर्णिलेल्या मूळ हेतूच्या दृष्टीने पक्का आहे.
वर उल्लेखिलेल्या माझ्या मूळ हेतूच्या दृष्टिकोनातून मी या ज्या निवडक आठवणी लिहिल्या आहेत त्या लोकांमधील असलेली जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात पुरी करतील, असा मला विश्वास वाटतो.
– – लेखक विश्वास सावरकर
एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.
या पुस्तकाची प्रस्तावना शंकर रामचंद्र दाते यांनी लिहिली आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी ‘संघर्ष याचं नाव सावरकर’, त्याचं स्वरूप विश्वासराव सावरकर यांनी लिहिलेल्या अनेक आठवणींतून प्रसंगोप्रसंगी व्यक्त झालं आहे. त्यायोगे त्या-त्या वेळच्या प्रसंगाचं शब्दचित्र साक्षात उभं राहातं. त्यांनी आपल्या पित्याच्या या आठवणी लिहून पितृऋण, तसंच समाजऋणही काही अंशी फेडले आहे. त्यांच्या या आठवणी म्हणजे ‘की घेतलं व्रत न हे अम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या उक्तीचा साक्षात्कार होय. ‘
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈