मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंढरीच्या वाटेवरी… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पंढरीच्या  वाटेवरी… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

पंढरीच्या वाटेवरी वारी थेंबाची चालली

थेंब अबिरी रंगता विठू नाम ती बोलली

*

टाळ गाजविती थेंब दगडांच्या शिळेवरी

ओवी तुषार पानात टिळा शोभे भाळावरी

*

दगडांच्या कपारीत पाणी वाजवे मृदुंग

थेंब वारकरी नाचे थेंबासवे विठू दंग

*

थेंब अश्व धावे धावे करी शेतात रिंगण

पिक मनी सळसळे भरे धान्यांनी अंगण

*

चाले संताच्या पालख्या थेंब होई तेथे भोई

दंग भजनात होता पाप, ताप सारे धोई

*

थेंब चंद्रभागी नाचे भेट पुंडलिका घेई

रखमाई म्हणे म्हणे सुख पांडुरंग देई

*

विठू  मंदिर पायरी नामा तेथे वाट पाही

थेंब अमृत भेटीत मुखी  वारकरी जाई

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंद दर्शनाचा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंद दर्शनाचा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

न्हावू चला सुखाने प्रेमात विठ्ठलाच्या

दिंडी मधून जावू गावात विठ्ठलाच्या

 *

खांद्यावरी पताका घेवून वैष्णवांची

रंगून दंग होवू रंगात  विठ्ठलाच्या

 *

आध्यात्म साधनेचा मांडू प्रपंच साधा

होवू विनीत आता ध्यानात विठ्ठलाच्या

 *

विसरून भेद सारे समता धरून वागू

होऊन एक जावू नादात विठ्ठलाच्या

 *

वारीत पंढरीच्या मिसळून धन्य होऊ

सहवास नोंदवाया खेळात विठ्ठलाच्या

 *

जपल्या मनात आम्ही आहेत खूप इच्छा

पुरवा म्हणून सांगू कानात विठ्ठलाच्या

 *

घेवू मिळून सगळे आनंद दर्शनाचा

होतील संत भेटी दारात विठ्ठलाच्या

 *

साधा प्रपंच नाही आहे कठीण मोठा

तरण्यास दिव्य शक्ती नामात विठ्ठलाच्या

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रवाह आणि लाटा! ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी  ☆

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

अल्पपरिचय 

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी .

शिक्षण – B Com,  B J, M Phil ( मराठी साहित्य )

  • १९९८ पासून आकाशवाणीवरून  विविध कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण
  • गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने दिवाळी अंकासाठी कथा, कविता व नियतकालिकांमधून सदरलेखन  प्रसिद्ध

प्रकाशित साहित्य : (४ पुस्तके)

  • स्वप्नझुला (कवितासंग्रह)
  • कविता उलगडताना (आस्वादक समिक्षा संग्रह)
  • सोनबावरी (ललितलेख संग्रह) व
  • रुजवाई (कथासंग्रह )

? विविधा ?

☆ प्रवाह आणि लाटा! प्रतिमा रवींद्र कुलकर्णी 

‘काय करु, ताई ? कालपासून गिऱ्हाईकच नाही. ’ फळवाला नाराजीने म्हणाला.  गिऱ्हाईक या शब्दाचे मूळ काय बरं असेल ? मी विचारात पडले आणि मला संस्कृतमधला ग्राहक हा शब्द आठवला आणि मग याच्यासारखेच कितीतरी शब्द आठवले.  संस्कृतमधल्या मिष्ट म्हणजे गोड चे मराठीत गोडमिट्ट झाले.  मुष्टीचे मुठीत रूपांतर झाले.  पत्रल चे पातळ झाले आणि ‘शाटी’चे साडी झाले.  संस्कृतमधून मराठीत येताना शब्दांचे रूपरंग बदलते.  अभिजनांच्या भाषेतून आलेल्या मूळ शब्दाला लोकभाषेचा मुलामा चढतो.  पण अशा बदललेल्या शब्दांना बोलीभाषेत अपभ्रष्ट शब्द म्हटले जाते.  भ्रष्ट होणे म्हणजे खाली पडणे किंवा घसरणे.  भ्रंश म्हणजे विकृत होणे किंवा बिघडणे.  त्यामुळे मूळ संस्कृत शब्दाच्या बिघडलेल्या रुपाच्या शब्दाला अपभ्रंशाने आलेला शब्द असे म्हटले जाते.  असे कितीतरी शब्द आता आपल्या भाषेत रुळून गेलेले आहेत कि त्याचे मूळ रुप आठवावे लागते.  आपल्या बोलीभाषेतल्या या शब्दांत आपल्या मातीचा गंध जाणवतो.  उदा.  ग्रामीण भागात उशीर या अर्थी वाढूळ (किंवा वाढवेळ) हा शब्द सहजतेने वापरला जातो.  त्याचे मूळ संस्कृतातल्या ‘वृध्दवेला ‘ (म्हणजे वाढलेला (वाढीव ) वेळ ) या शब्दात आहे.  काळाच्या प्रवाहात शब्दांची ही बदलत गेलेली रूपे !

अपभ्रंश ही संज्ञा केवळ शब्दांसंदर्भात वापरली जाते असे नाही, तर ते विशिष्ट काळातल्या भाषेचे नाव होते.  संस्कृत भाषेतून प्राकृत आणि त्यातून आधुनिक भाषा परिणत होत असतानाचा एक टप्पा म्हणजे अपभ्रंश भाषा.  साधारणतः सहाव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत ती बोलली जात असे.  विशेषतः पाली, मागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषांच्या या काळातल्या रूपांना अपभ्रंश भाषा म्हटले जाते.  सिद्ध, जैन, बौद्ध अशा धर्मोपदेशकांनी जनसामान्यांची बोली अनुसरत आपले कार्य केले.  पुढे परिणत होऊन आधुनिक बंगाली, गुजराती, मराठी यासारख्या विकसित भाषांचा जन्म झाला.  संस्कृतमधून आलेले मूळ शब्द अपभ्रंश प्राकृतच्या संगतीने मराठीत परिणत झाले.  संस्कृतमधून प्राकृत आणि त्यांचे मराठीकरण झालेल्या शब्दांची काही उदाहरणे – अग्रतः – अग्गदो – आघाडी.  सत्यम् – सच्छम – साच.  मयूर – मोरो – मोर.  ही रुपे पाहताना प्राकृत -अपभ्रंश भाषेची आपल्या आजच्या मराठीशी जवळीक लक्षात येते.

भाषेतली ही स्थित्यंतरे त्यांच्या लिखित नमुन्यांमधून जाणवतात.  प्रत्येक काळानुरूप तिच्यात झालेले वैशिष्टपूर्ण बदल जाणवतात.  मंगळवेढयाच्या ताम्रपटातली( इ. स.  ४८८ – शके ४१०) शके ६५८ मधील चिकुर्डे ताम्रपटातली आणि शके १०५१ च्या चालुक्यराज सोमेश्वर रचित अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथातली भाषाशैली वेगळी जाणवते.  शके १११० च्या विवेकसिंधू (मुकुंदराज ) मध्ये ‘ जैसे अमृत चाखे आपुले चवी । तैसे स्वसुख अनुभवी ” असे अध्यात्मज्ञान येते.  

शके ११२८ मधल्या पाटणच्या शिलालेखात ‘कापासी दामाचा विसोवा, आसुपाठी मगरे दिन्हला ‘ आसू म्हणजे त्यावेळचे चलन व कापूसविक्रीसंदर्भात हे लेखन असावे.  बारा-तेराव्या शतकातल्या महानुभाव ग्रंथात – आबैसी गोसावियाते पुसिले ( आबाईसा नावाच्या शिष्येने चक्रधरांना विचारले ) अशी भाषा येते.  याच काळातल्या ज्ञानेश्वरीप्रमाणेच उकारांत वळणाची भाषा तेराव्या शतकातल्या पंचतंत्र (मराठी ) मध्ये ‘पिंगलकु पुसे, दमनकु सांघे ‘ पहायला मिळते.  यानंतरच्या काळातल्या रामदास, तुकाराम, एकनाथ अशा संतांच्या मांदियाळीने विपुल लेखन केले त्यातून त्या त्या काळातील समाजभाषेचे दर्शन घडते.  बखरवाङमयातून, ऐतिहासिक पत्रव्यवहारातून वापरलेल्या भाषेतून अरबी, फारसीचा प्रभाव जाणवतो.  पेशवाई काळापासून मोरोपंत, महीपती, वामनपंडित यांच्या काव्यातून संस्कृतप्रचुरता आढळते.  त्यानंतरच्या काळात इंग्रजांच्या प्रभावामुळे इंग्रजी शब्दांचा वापर वाढत गेला.

भाषेची ही प्रत्येक शतकांत बदललेली रूपे म्हणजे बदलत गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब ! संस्कृतीचे बदलत गेलेले रूप भाषेच्या इतिहासातून उलगडत जाते.  त्या काळातले लेखन आणि शब्दसंपत्तीवरून अनेक गोष्टींचा अंदाज येतो.  समाज, संस्कृती आणि भाषा यांच्यावर इतरांचा प्रभाव पडणे हे अपरिहार्य असते.  त्यामुळे प्रारंभापासून अखेरपर्यंत तिचे स्वरूप एकसारखे राहत नाही.  नव्या कल्पनांसोबत नव्या शब्दांची भर पडत जाते.  कधी जुन्या शब्दांचे नवे अर्थ रूढ होतात तर कधी कल्पना कालबाह्य झाल्यामुळे शब्दही नाहीसे होतात.  शब्दांच्या या भरती आणि ओहोटीमुळे भाषेच्या प्रवाहात लाटांचे उसळणे अपरिहार्य ठरते.

 

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आठवणींची छोटी वाटी…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? जीवनरंग ?

☆ “आठवणींची छोटी वाटी…तृप्ती देव

परवा आईला फोन केला…

“आई, रविवारी येतोय बरं का… मी, मुलं आणि स्वाती. काही करू नकोस हं फार त्रास! फक्त भेटायला येतोय. ”

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तिचा नेहमीचा हक्काचा आणि घाईचा कार्यक्रम सुरू झाला…

“अरे मग मुलांना काय आवडतं आता? … त्या छोट्याला अजून पुरणपोळी आवडते का? की शहरातल्या पिझ्झा-बर्गरच्या नादात विसरला? … आणि स्वातीला तिखट कमीच ना? … तू येताना दही घेऊन येऊ नकोस हं बाहेरचं, मी कालच विरजण लावलंय घरी, छान घट्ट जमेल! ”तृप्ती देव 

फोन ठेवला… पण तिचे फोन थांबले नाहीत. तिचं मन तिथेच घुटमळत होतं.

कधी — “तुला वांग्याचं भरीत करू का रे? गावची गावरान वांगी आणलीत गल्लीत आलेल्या गाडीवरून. ”

तर कधी — “अरे त्या जुन्या कपाटातल्या चिनी मातीच्या बरणीतलं लोणचं अजून आहे हं, तसंच मऊ आणि रसरशीत! ”

… आईचं प्रेम म्हणजे मेन्यू कार्ड नसतं… ते आठवणींनी गच्च भरलेलं स्वयंपाकघर असतं, जिथे प्रत्येक पदार्थाला मायेची फोडणी असते.

बाबांना जाऊन अजून काही महिनेच झाले होते. घरातलं मुख्य छत्र हरपलं होतं. बाबा गेल्यावर मी खूप प्रयत्न केला, “आई, चल माझ्यासोबत शहरात. तिथेच एकत्र राहू. इथे या मोठ्या घरात तू एकटी कशी राहणार? “

पण आई साफ नाकारायची. म्हणायची, “अरे राजा, माझं आयुष्य या घरात गेलंय. तुझ्या बाबांचा वावर आहे या भिंतींमध्ये. शहरातल्या त्या सिमेंटच्या फ्लॅटमध्ये कोंडल्यासारखं होतं मला, तिथे माझं मन करमत नाही. मी इथेच बरी आहे गावाला. आणि तू काळजी करू नकोस, शेजारी राहणारे जोशी काका आहेत ना, काही लागलं-सवारलं तर ते हक्काने उभे राहतात. “

जोशी काका खरंच देवासारखे शेजारी होते. दिवसातून दोनदा चक्कर माराचे, ‘वहिनी, काही आणायचं का बाजारातून? ‘ म्हणून विचारून जायचे. पण तरीही, नोकरीच्या जबाबदारीमुळे मला शहरात परत जावं लागलं होतं, आणि आई मागे या घरात एकटीच राहायची. मनात सतत तिची काळजी असायची, म्हणूनच या रविवारी वेळ काढून आम्ही सगळे गावाला आलो होतो.

रविवारी सकाळी आम्ही दारात उभे राहिलो. बेल वाजवल्या वाजवल्या आईने हसऱ्या चेहऱ्याने दार उघडलं. पाऊल आत पडताच, त्या बंद दाराआड साठलेला घराचा तोच जुना आणि ओळखीचा सुवास एका दमात छातीत भरला… स्वयंपाकघरातून येणारा मोहरीच्या खमंग फोडणीचा सुटलेला दरवळ, कोपऱ्यात तेवणाऱ्या उदबत्तीचा पवित्र सुगंध आणि त्याहूनही जास्त, आईच्या साध्या सुती साडीला लगटून राहिलेला तिचा हक्काचा, मायेचा स्पर्श! त्या एका श्वासाने शहरातला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.

मुलं तिच्या गळ्यात पडून धावत आत गेली. स्वाती नेहमीप्रमाणे पदर खोचून स्वयंपाकघरात शिरली. काही वेळ गप्पा झाल्या. बऱ्याच वेळ झाल्यानंतर 

आणि मी सहजच डायनिंग टेबलवर नजर टाकली…

तिथे स्टीलची एक छोटी, जुनी वाटी ठेवलेली होती. कडा थोड्या घासून घासून झिजलेल्या, पण लख्ख स्वच्छ.

… ती रिकामी होती.

क्षणभर वाटलं स्वातीचं किंवा मुलांचं काही राहिलं असेल, धुवायची राहिली असेल. पण आईने मागून येत ती वाटी अलगद, जणू काही काचेची मौल्यवान वस्तू असल्यासारखी उचलली आणि कपाटातल्या एका कोपऱ्यात ठेवून दिली.

मी सहज विचारलं…

“काय गं आई, ही कोणाची वाटी? रोज तर नाही दिसत टेबलावर. ”

आई दोन सेकंद शांत राहिली. तिचा हात कपाटाच्या कड्यावरच रेंगाळला.

मग मागे वळून, डोळ्यातली आर्द्रता लपवत हलकंसं हसत म्हणाली…

“तुझ्या बाबांची…”

मी जागीच थबकलो.

ती पुढे म्हणाली…

“अरे, त्यांना जेवताना दही किंवा ताक वेगळ्या, अगदी याच छोट्या वाटीत लागायचं. ताटात कितीही पंचपक्वान्नं असली, तरी ही वाटी नसेल ना, तर तोंड वाकडं करायचे… म्हणायचे — ‘जेवणाला काय ती मजा नाही आली आज. ’ हट्टी होते गडी! ते गेल्यापासून ही वाटी मी वापरतच नाही रे. बाकी सगळी भांडी घासते, वापरते… पण ही वाटी हातात घेतली ना, की तिचा गारवा थेट काळजाला लागतो. नाही जमत रे हातात घ्यायला…”

माझ्या अंगावर सरसरून शहारा आला.

एखादं माणूस गेल्यावर… त्याचे कपडे, त्याचा चष्मा, त्याचा घोगरा आवाज आठवतोच… पण काही लोक घराच्या विटाविटांमध्ये आणि जगण्यात इतके मिसळलेले असतात, की त्यांच्या जाण्यानंतर घरातली निर्जीव भांडीसुद्धा एकाकी आणि पोरकी पडतात.

आई पुढे अगदी सहज, एका सुस्कारा सोडत बोलून गेली…

“पूर्वी रोज न विसरता दही लावायचे मी, त्यांना आवडायचं म्हणून. आता फारसं करत नाही रे. स्वतःसाठी कोण एवढा पसारा करणार? आणि कोण इतकं कौतुकाने खाणार? ”

त्या क्षणी अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला… आणि छातीत कुठेतरी गलबलून आलं.

बाबा गेल्यापासून गेल्या काही महिन्यांत आम्ही आईच्या हातचं श्रीखंड खाल्लंच नव्हतं. चक्का बांधणं, तो गाळणं, त्यात केशर-वेलची सुवास भरणं… हे सगळं कौतुक बाबांच्या ‘वाः! काय जमलंय श्रीखंड! ‘ या एका वाक्यासाठी होतं. बाबा नसताना आईने स्वतःच्या हातातील ती चव आणि ते कौतुक कपाटात बंद करून ठेवलं होतं. म्हणूनच तिला शहरातही यायचं नव्हतं, कारण तिथे बाबांच्या या आठवणी साठवून ठेवायला तिची हक्काची कपाटं आणि भांडी नव्हती.

मला अचानक आतून कसंसंच झालं. कृतज्ञतेची आणि एकाच वेळी अपराधीपणाची भावना दाटून आली.

दुपारी तृप्त जेवण झाल्यावर मुलं आणि स्वाती गप्पा मारत बसले. मी हळूच उठून स्वयंपाकघरात शिरलो. आई आवराआवर करत होती, मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो.

मी फ्रिज उघडला, सकाळी आईने कौतुकाने लावलेले घट्ट दही काढलं. एक स्वच्छ सुती कपडा किचन मधला घेतला.

आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं…

“काय करतोयस रे राजा? ”

मी हसत, तिचा हात हातात घेत म्हणालो…

“आज तुझ्यासाठी आणि बाबांसाठी… श्रीखंड करतोय. ”

“अरे वेड्या, आता या दुपारी? आणि मी कुठे एवढं गोड खाणारे आता—”

“तू शांत बस गं… काही बोलायचं नाही आज. आणि हो… हे श्रीखंड आज बाजाराच्या वाटीत नाही, तर त्या बाबांच्या आवडत्या वाटीतच वाढलं जाणार आहे! ”

आई काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त पदराने तिचे पाणावलेले डोळे टिपले आणि ती स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. कदाचित तिला तिचं रडू लपवायचं होतं.

संध्याकाळी चहाच्या वेळी, मी फ्रिजमधून तो केशर-वेलचीचा सुवास सुटलेला मऊशार चक्का काढला. आणि कपाटातून ती छोटी, बाबांची स्टीलची वाटी काढून घेतली. त्यात चमचाभर श्रीखंड अगदी सुबकतेने वाढलं.

मी श्रीखंडाची ती वाटी आईच्या समोर नेऊन ठेवली.

आईने ती वाटी हातात घेतली… इतकी जपून, दोन्ही हातांचा द्रोण करून… जणू काही त्या स्टीलच्या स्पर्शात अजूनही बाबांच्या हाताचा उबदार स्पर्श शिल्लक होता.

जेव्हा आईने त्या वाटीतलं श्रीखंड खाल्लं, तेव्हा त्या वाटीचा तो परिचित आणि जिवंत स्पर्श आईला बाबांच्या अनेक गहिऱ्या स्मृतींमध्ये, त्यांच्या एकत्र घालवलेल्या सुखाच्या दिवसांत आणि न संपणाऱ्या अथांग प्रवासात परत घेऊन गेला… जणू बाबा तिथेच तिच्यासमोर बसून कौतुकाने म्हणत होते, ‘वाः! काय जमलंय श्रीखंड! ‘

खूप दिवसांनी… आई खऱ्या अर्थाने हसली होती.

त्या दिवशी मला एक अथांग सत्य कळलं…

काही पदार्थ हे फक्त जिभेच्या चवीसाठी किंवा भूक शमवण्यासाठी नसतात… ते ‘कोणीतरी आपल्यासोबत आहे, आपण कोणासाठी तरी हवं आहोत’ या अस्तित्वाच्या भावनेसाठी बनत असतात. भूतकाळ आणि वर्तमान का जोडण्यासाठी असतात.

माणूस गेल्यावर… त्याची आवड किंवा त्याची चव घरातून संपत नाही. ती शांतपणे कुठल्यातरी अंधाऱ्या कपाटात, एखाद्या रिकाम्या छोट्या वाटीत, एखाद्या न बोललेल्या आठवणीत आणि सांडलेल्या आसवांमध्ये जिवंत राहते. गरज असते ती फक्त, मुलाने आईचा हात धरून त्या आठवणीला पुन्हा एकदा मायेची चव देण्याची… मग ती गावाला असो वा शहरात!

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

मो ९१६५९८४३२२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “येई वो विठ्ठले…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “येई वो विठ्ठले…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

“येई वो विठ्ठले माझे माऊली ये

निढळावरती कर ठेवुनी वाट मी पाहे… “

आलीया गेलिया हाती धाडी निरोप

पंढरपुरी आहे माझा मायबाप”

विठ्ठलाची ही आरती मला फार आवडते.

येई वो… किती प्रेमाने, लडिवाळपणे,आपलेपणाने विठु माऊलीला साद घातलेली आहे. अरे ये रे…

लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर)आडवा हात धरतो.

डोळे बारीक करून कोणी दिसतंय का… हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय.. तू येरे…

आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यां बरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री आहे… त्याची वाट बघण्यातही आनंद आहे…

“पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला

गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला… “2

अंतरंगातला प्रकाश उजळला तरच हे डोळे दिपवून टाकणार आभाळभर पसरलेलं..

झळकलेलं दिसेल.

प्रत्यक्ष विठ्ठल येणार आहे त्याचं रूप असे भव्यदिव्यच असणार…

कल्पनेच्या राज्यात जाऊन बघा बरं ते रूप…

मग गरुडावर बसून येणारा तो कैवारी दिसेल… पण तो माझा कैवार म्हणजे पक्ष कधी आणि कसा घेईल… याचाही मला विचार करायला हवा. त्यासाठी माझी बाजू सत्याची,न्यायाची हवी. मगच तो माझ्या साथीला येईल.

“असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया

कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया”3

महाराजांना आपली स्थिती कशी आहे हे पूर्ण माहित आहे… ते ओळखून आहेत.. तुझ्या बाबतीत आमचा भाव इतका शुद्ध,सात्विक, निरामय नाही. आम्ही प्रपंचात अडकलो आहोत.. तुझ्याकडे काहीतरी मागायलाच येतो. संकटात असलो की तुझी आठवण काढतो..

स्वतःचे हे अवगुण माहीत असूनही अत्यंत लडिवाळपणे हक्काने ते सांगत आहेत…

कारण तो सर्वांत जवळचा आहे. इथे त्याला म्हणूनच

“माझ्या पंढरीराया” असे संबोधले आहे.

तू आम्हाला क्षमा कर आणि आमच्याकडे कृपाळु नजरेने पहा.

“विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी

विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी”4

विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला की मग काय रोजच दिवाळी… दिवाळी म्हणजे पूर्णानंद आणि तो रोजच मिळणार… मग सुखाला काय कमी?

म्हणूनच आपला सात्विक भाव एकत्र करून त्याची आरती करायची.. आरती म्हणजे काय तर… आर्त स्वराने हृदयातून साद घालून म्हटली जाते ती आरती…

आता अंतकरणात भक्तीची निरांजन पेटवायची.. सदविवेकाचा कापूर लावायचा.. मनोभावे… आरती करायची.. तरच ती विठ्ठलापर्यंत पोहोचेल. इतका मनोरम आणि निर्मळ भाव आमच्यात हवा.. आरती म्हणताना ती आस आमच्या शब्दातही हवी…

असं हे या आरतीतलं आपल्याला नीट समजलेलं आहे.

इथपर्यंत झालं…

आता आपल्याला कृती करायची आहे. शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. आरती नुसती तोंडाने म्हणायची नाही तर ती अंतःकरणपूर्वक म्हणायची. त्यातला मूळ अर्थ जाणून घ्यायचा. शाब्दिक अर्थापेक्षा खूप वेगळे काही सांगायचं आहे हे ध्यानात… लक्षात घ्यायचं आहे.

मग जबाबदारी वाढते. आपल्याला तसं वागायचं बंधन येतं. पण हे बंधन हवसं आहे. या बंधनात कोणाची जबरदस्ती नाही. तर विठ्ठल प्रेमाने आपणच… बांधून घ्यायच आहे.

आपल्याला प्रगत करणारं उन्नतीकडे नेणार अस हे आहे. ते पूर्णपणे अंगी बाणून घेऊया.

विठ्ठलाला अनन्य शरण जाऊ या

मग तो येईलचं त्याची वाट पाहूया…

प्रत्यक्ष विष्णुदास नामांनीच हे सांगितलेलं आहे ते सुद्धा कितीतरी वर्षापूर्वी… एक सांगू का…

आपणही मनापासून बोलावून तर बघू या … मग प्रेमाने त्याला हाक घाला बरं ……

येई वो विठ्ठले माझे माऊली ये ……  

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असावा असा एक छंद! – लेखिका : रेशमा डोळे (रमा) ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? मनमंजुषेतून ?

☆ असावा असा एक छंद! – लेखिका : रेशमा डोळे (रमा) ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

नवीन ठिकाणी राहायला आलो, पण मन काही त्या नव्या जागेत अजून रुळलं नव्हतं. नवऱ्याच्या नोकरीची अजून सहा वर्षे बाकी होती. तब्येतीच्या कारणामुळे आम्हाला जुनी राहती जागा सोडावी लागली आणि त्यांच्या नवीन ऑफिसजवळ घर घ्यावं लागलं.

सुरुवातीचे एक-दोन दिवस सामान लावण्यातच गेले.

एक दिवस दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर एक गोड आजी उभ्या होत्या. गोऱ्यापान, गुलाबी वर्ण, ठेंगण्या. अंगात सुंदर पंजाबी ड्रेस, त्याला मॅचिंग टिकली, कानातले, बांगड्या… आणि ते निळेशार डोळे! सगळंच देखणं… आणि त्याहूनही गोड त्यांचं बोलणं.

 

मी मात्र घरच्या अवतारात होते. मला अगदीच लाजल्यासारखं झालं.

“अगं, मी तुझी शेजारीण. सगळे मला ‘माई’ म्हणतात. कालच यायचं ठरवलं होतं ओळख करून घ्यायला, पण लगेच आले असते तर तू म्हणाली असतीस, ‘काय ही म्हातारी, लगेच आली! ‘”

हे बोलून त्या गालावर खळी पाडत इतक्या गोड हसल्या की मी त्या खळीतच हरवून गेले.

“हे घे, मस्त टोमॅटो सूप आणलंय. घरात किती जण आहेत माहीत नव्हतं, म्हणून अंदाजाने आणलं. आवडतं ना? म्हणजे आवडत नसलं तरी आता प्यावंच लागेल हं! “

पुन्हा तेच मधाळ हसू…

“अगं, मीच बोलत बसले ना! माझं असंच होतं. समोर माणूस दिसला की किती बोलू आणि किती नको, हेच कळत नाही.

चल येते… चालू दे काम तुझं.. काही लागलं तर सांग.. “

आमच्या दोघींच्या गच्च्या समोरासमोर होत्या. त्यामुळे सकाळी हळूहळू गप्पा सुरू झाल्या. बिल्डिंगमध्येही एक-दोन ओळखी झाल्या; पण तिथल्या बायकांना इतर रहिवाशांच्या घरात काय सुरू आहे याच्या गप्पा, मालिकांची चर्चा यांतच जास्त रस होता. त्यामुळे मी त्यांच्यात फारशी रमले नाही.

माईंच्या हातचे पदार्थ अप्रतिम असायचे. हळूहळू माझ्या घरूनही पदार्थांच्या वाट्या त्यांच्याकडे जाऊ लागल्या. त्या मनापासून कौतुक करायच्या आणि मला अजून काहीतरी करून त्यांना खाऊ घालावंसं वाटायचं.

मी आता इथे रुळले आहे, हे पाहून नवरा आणि परदेशात असलेली मुलगी दोघेही निर्धास्त झाले. “आता काय करू? कंटाळा आलाय… ” हा माझा पंचक्षरी मंत्रही बंद झाला.

एक दिवस सकाळी माई गच्चीत बसून क्रोशेचं काम करताना दिसल्या.

“माई, तुम्हाला हे येतं? मला शिकवाल का? “

“अगं, आजपासूनच ये. उभ्याउभ्या पळतेस नेहमी. निवांत घरीच आली नाहीस अजून. “

दुसऱ्या दिवशी सगळी कामं आटोपून मी अकराच्या सुमारास त्यांच्या घरी गेले.

माईंबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं. एवढंच ऐकलं होतं की त्यांचे पती आणि मुलगा आर्मीमध्ये होते.

घरात शिरताच समोर भिंतीवर मोठा फोटो होता. माई, त्यांचे पती आणि मुलगा. पती आणि मुलगा दोघेही आर्मीच्या गणवेशात.

घराचा प्रत्येक कोपरा त्यांनी इतका सुंदर सजवला होता! कुठेही दिखाऊपणा नव्हता; पण साधेपणातलं देखणेपण मात्र प्रत्येक वस्तूतून जाणवत होतं.

“येतेस का गं आत? मी जरा आमच्या नातेवाईकांना जेवू घालून येते. “

मी चकित झाले.

नातेवाईक? पण घरात कोणाचाच आवाज नव्हता. बाहेर चप्पलही नव्हत्या.

“माई, मी नंतर येऊ का? “

“अगं, कशाला? थांब. हे असे जेवतील आणि जातील. “

मला काहीच कळेना.

“ये ना, आतच. तुझी ओळख करून देते. “

मी किचनमध्ये गेले.

खिडकीजवळ खुर्ची टाकून माई बसल्या होत्या. त्यांच्या हातात कणकेच्या छोट्या गोळ्यांचा डबा होता.

एक गोळा त्यांनी खिडकीत ठेवला.

क्षणात एक कावळा आला, दोन मिनिटं एकदम शांत बसून राहिला. सावकाश एक गोळा चोचीत धरला आणि उडून गेला.

“ही माझी बहीण. एकदम गाय होती. आयुष्यभर कधी कसले नखरे नाहीत. समोर जे आलं ते आनंदाने स्वीकारलं. “

पुढचा गोळा ठेवताच दुसरा कावळा आला. बराच वेळ कर्कश आवाज करत राहिला. गोळा चोचीने इकडे-तिकडे करत राहिला आणि मग घेऊन गेला.

माई हसत म्हणाल्या,

“या माझ्या सासूबाई. आयुष्यात कधी म्हणून कौतुक नाही. “

मलाही आता गंमत वाटू लागली.

पुढचा गोळा ठेवला. एक कावळा आला; पण आमच्याकडे पाठ करून बसला.

“हा कोण? “

“आमच्या आईचे मोठे जावई. कायम मानपान हवा असायचा. अजूनही ताठा तोच. “

माई म्हणाल्या,

“जयंतराव, वाढलं आहे. येता का? “

माई हे म्हणताच क्षणात तो कावळा वळला, गोळा घेतला एकदा कर्कश्य ओरडला आणि उडून गेला.

योगायोग असेल कदाचित; पण मला मात्र हे सगळं विलक्षण वाटत होतं. मला आता जरा मजा वाटत होती.

आणखी एक कावळा गोळा घेऊन खिडकीच्या कपारीत ठेवून थोडा खाऊन उडून गेला.

“ही माझी जाऊ. कायम सगळं लपवून ठेवायची. “

तेवढ्यात एक खार आली.

“माई, हीसुद्धा नातेवाईक? “

“नाही गं. ही पाहुणी. “

एक गोळा घेऊन ती धूम ठोकून पळाली.

थोड्याच वेळात आणखी एक कावळा आला. आधी त्याने चोचीने जागा स्वच्छ केली, मग स्वतःची चोच साफ केली आणि शेवटी गोळा खाल्ला.

मी भुवया उंचावत विचारलं,

“हे कोण? “

माई कपाळावरचं कुंकू दाखवत हळूच म्हणाल्या,

“आमचे हे… सगळी कडे शिस्त म्हणजे शिस्त. “

त्यांच्या डोळ्यांत त्या क्षणी वेगळीच चमक होती.

थोड्या वेळाने कावळे येणं थांबलं.

माईंनी दहीभाताची वाटी खिडकीत ठेवली.

क्षणात एक कावळा आला आणि दहीभातावर तुटून पडला.

मी हसत विचारलं,

“याला वेगळा मेनू? फार स्पेशल दिसतोय हा नातेवाईक. “

क्षणात माईंचे डोळे भरून आले.

“माझा लेक… नील. त्याला माझ्या हातचा कालवलेला दहीभात फार आवडायचा. “

माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत.

क्षणभर शांतता पसरली.

पण पुढच्याच क्षणी माई नेहमीसारख्या गोड हसल्या.

“चल… झाले सगळे. उरलेले गोळे ठेवून देऊ. अजूनही येतात हळूहळू. जवळचे सगळे भेटून गेले. “

मी म्हणाले,

“माई… आज क्रोशा नको. आज फक्त गप्पा मारूया. हा सगळा प्रकार मला सांगाल? “

माई हळूच बोलू लागल्या.

“हे आणि माझा मुलगा नील… दोघेही एका पाठोपाठ गेले. हे आजाराने गेले आणि नील देशासाठी शहीद झाला. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. आम्ही दोघी बायका अक्षरशः कोलमडलो होतो.

एक दिवस मला स्पष्ट जाणवलं… नील मला दहीभात मागतोय.

सुनेनेच सांगितलं, ‘आई, तुम्हाला तो जाणवतोय ना? मग खिडकीत ठेवा. ‘

मी दहीभात ठेवला… आणि मिनिटभरात एक कावळा आला. सगळा भात खाऊन गेला. मग रोजच ठराविक वेळी येऊ लागला.

त्या दिवशी मला किती आनंद झाला होता, हे मी कुणालाच सांगू शकले नाही.

वर्षभराने मी सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं. ती तिच्या संसारात सुखी आहे. मला दोन गोड नातवंडं आहेत. आली की तुला भेटवेन.

मग नीलसाठी ठेवलेला दहीभात… त्यानंतर एक-एक कावळा यायला लागला मग रोज अशी पंगत बसायला लागली… आणि हळूहळू हा माझा छंद झाला.

लोक म्हणतात ना, माणूस एकटा पडला की काहीतरी आधार शोधतो…

मी माझे आधार या ‘नातेवाईकांमध्ये’ शोधले. “

 

थोडा विराम घेऊन त्या पुढे म्हणाल्या,

“बिल्डिंगमध्ये गेले की मुल सुनांचा तक्रारी, मेंदू बधिर करणाऱ्या मालिकांवर चर्चा या गप्पा. माझी सून दुसऱ्या घरी सुखात आहे म्हणून तिच्याबद्दल वाईट बोलायचं मला कधी जमलं नाही. मग माझ्या कडून काही मसालेदार खबर नाही म्हणून मी जरा त्यांच्यात नापासच होते.. मग मी खाली जाणंच बंद केलं.

आता, सकाळी या नातेवाईकांसोबत वेळ जातो. दुपारी थोडेसे विणकाम किंवा वचन, चार वाजता परदेशात राहायला जाणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन रेसिपी क्लास. संध्याकाळी मिलिटरीच्या एनजीओमध्ये काम. रात्री पुन्हा घर… असा माझा दिवस संपतो.

लोक मला वेड्यात काढतील म्हणून हे कावळ्यांचं प्रकरण मी कुणालाच सांगितलं नव्हतं… तुला सांगितलं… कारण तू चेष्टा करणार नाहीस, असा विश्वास वाटला. “

मी त्यांच्या हातावर हलकेच हात ठेवला. त्या दिवशी मला एक गोष्ट उमगली…

प्रत्येक जण दुःख विसरण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. कुणी देवात रमतो, कुणी कामात, कुणी आठवणींमध्ये… आणि माई? माई रोज आपल्या “नातेवाईकांना” एक गोळा कणिक वाढून जगण्याची उमेद गोळा करत होत्या.

त्या दिवशी मी क्रोशा शिकले नाही…

पण आयुष्याच्या विणकामात दुःखाचे धागेही किती प्रेमाने गुंफायचे असतात, हा सर्वात मोठा धडा मात्र माईंनी मला शिकवला.

लेखिका : रेश्मा डोळे (रमा).

प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८१ – – 

मना मच्छरे नाम सांडू नको हो ।

अती आदरे हा निजध्यास राहो ।

समस्तांमधे नाम हे सार आहे ।

दुजी तूळणा तूळिता ही न साहे ।।८१।।

अर्थ : हे मना, कोणत्याही प्रकारच्या मत्सराच्या आहारी जाऊन देवाचे नामस्मरण कधीही सोडू नकोस. इतरांचा हेवा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी, अत्यंत आदराने व निष्ठेने भगवंताच्या नामाचा अखंड ध्यास घे. देवाचे नामस्मरण हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे. त्याची तुलना अन्य कशाशीही करवत नाही.

(मच्छरे – मत्सराने, सांडू नको – सोडू नको, निजध्यास – मनाला ध्यास/ओढा लागणे, समस्तांमधे – ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये, दुजी – दुसरी, तूळिता – तुलना करता)

विवेचन : या श्लोकातही समर्थ नामाचा महिमा आपल्याला सांगतात. आधीच्या श्लोकात निर्धारपूर्वक ज्या मत्सराचा त्याग करायला समर्थांनी आपल्याला सांगितले, त्याचा उल्लेख या ठिकाणी पुन्हा येतो. मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे आहे असे पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दल पहिली प्रतिक्रिया मनात येते ती म्हणजे मत्सर. हा मत्सर वाढत गेला की अनर्थ घडतो. नको त्या गोष्टी माणसाच्या हातून घडतात. गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘ मत्सर ‘ हा आसुरी गुण आहे. मागील काही श्लोकात हिरण्यकश्यपूचे उदाहरण आपण पाहिले आहे. हिरण्यकश्यपू राजा होता, सामर्थ्यवान होता, स्वतःच्या शक्तीचा त्याला गर्व होता, इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण जेव्हा लोक त्याची स्तुती करायची सोडून परमेश्वराची स्तुती करतात, तेव्हा मात्र त्याच्या मनात भगवंताच्या नामाविषयी मत्सर निर्माण होतो. मग प्रजेने आपलेच नाम घ्यावे, भगवंताचे नाम कोणी घेऊ नये असा आदेश तो काढतो. पण त्याचा स्वतःचा मुलगाच विष्णुभक्त असतो. शेवटी मत्सर आणि द्वेषामुळे हिरण्यकश्यपूचा नाश होतो हे आपल्याला माहिती आहे.

काही लोकांना नकळत नामाबद्दलही द्वेष असतो. नामाने असे काय होणार आहे? त्याला कशाला एवढे महत्व द्यायचे? मग नकळत नामाबद्दल मनात मत्सर निर्माण होतो. नाम घ्यायला सुरुवात केली असेल तरी मग असा मनुष्य नाम घेणे सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबारे, मत्सराच्या अधीन होऊन नाम घेणे सोडू नकोस.

मत्सराच्या अधीन झालेल्या माणसाला नामाचे महत्वच कळलेले नसते. महत्व कळण्यासाठी नामाचे सामर्थ्य माहित असावे लागते. त्यासाठी संतांचा उपदेश मनापासून ऐकावा लागतो. तो उपदेश नुसता ऐकून चालत नाही तर तो पटला पाहिजे. इथे बळजबरी उपयोगाची नसते. हे महती जेव्हा पटते, तेव्हा भगवंताबद्दल, नामाबद्दल आदर निर्माण होतो. म्हणून भगवंताचे नाम आदरपूर्वक घेतले पाहिजे. त्यात प्रेम हवे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपल्या आवडीची एखादी गोष्ट असते. मग तिचा आपल्याला ध्यास म्हणजेच छंद लागतो. हा छंद लागला म्हणजे मन पुन्हापुन्हा तिकडे ओढ घेते. कोणी सांगावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ” गोविंद गोविंद, मना लागलिया छंद. ” एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली की त्याला कोणी अभ्यास कर म्हणून सांगावे लागत नाही. साधकाला नामाची गोडी लागली की मग नाम घ्या असे त्याला सांगावे लागत नाही.

परमेश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत. अनेक मार्ग आहेत. पण त्या सर्वांमध्ये ‘ नाम ‘ हे साधन श्रेष्ठ आहे. त्यासाठी कोणतीही उपाधी, कोणतेही साधन लागत नाही. जपमाळ नसली तरी चालते. आपले काम करताना देखील नाम जपता येते. ‘ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असे ते सांगतात ते याचसाठी. समर्थही आपल्याला हीच गोष्ट सांगतात. संतांच्या उपदेशात एकवाक्यता असते. लोककल्याणाची तळमळ आढळते. शब्द भलेही वेगळे असतील पण तात्पर्य एकच असते.

तेव्हा हे मना, कोणत्याही परिस्थितीत तू नाम घेणे सोडू नकोस. ते अत्यंत आदरपूर्वक घे. समस्त साधनांमध्ये ते सारभूत आहे. त्याची महती एवढी की त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ नाही. ‘ नामपरते तत्व नाही रे अन्यथा. ‘ हे लक्षात ठेव.

स्वसंवाद : 

१. माझ्याकडे जे नाही आणि इतरांकडे आहे, ते पाहून माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ किंवा हेवा निर्माण होतो का? त्यामुळे माझे मनस्वास्थ्य हरवते का?

२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनाला संसार किंवा इतर भौतिक गोष्टींऐवजी कधी भगवंताच्या नामाचा ‘निजध्यास’ (छंद) लागला आहे का?

३. नाम घेताना भगवंताबद्दल आदर आणि प्रेम माझ्या मनात असते का?

४. माउलींनी सांगितल्याप्रमाणे “नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा” यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे का? की माझे मन अजूनही इतर साधनांच्या गराड्यात फिरत असते?

===== 

श्लोक क्र. ८२ – – 

बहू नाम या रामनामी तुळेना ।

अभाग्या नरा पामरा हे कळेना ।

विषा औषध घेतले पार्वतीशे ।

जिवा मानवा किंकरा कोण पूसे? ।।८२।।

अर्थ : रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामाशी होऊ शकत नाही. परंतु जी माणसे पारमार्थिक दृष्ट्या अभागी असतात, त्यांना (रामनामाचे हे महत्व) कळत नाही. अहो, प्रत्यक्ष भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनाम हे औषध म्हणून घेतले. मग आपल्यासारख्या सामान्य जीवांची त्यासमोर किंमत काय?

(तुळेना – तुलना होऊ शकत नाही, अभागी नर – पारमार्थिक दृष्टया दुर्दैवी व्यक्ती, पार्वतीशे – भगवान शंकर/ पार्वतीचे पती, किंकर – चाकर/दास)

विवेचन : या श्लोकामध्ये देखील अन्य श्लोकांप्रमाणे समर्थ रामनामाचे महत्व आपल्या मनावर ठसवत आहेत. श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. त्यामुळे साहजिकच त्यांना रामनामापुढे अन्य नामाचे महत्व वाटत नाही. रामनामाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. आणि त्यांना असे वाटणे हे अगदी बरोबर आहे. रामरक्षेचा समारोप करताना बुधकौशिक ऋषींनी रामनामाचे महत्व सांगताना, ” सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ” असे म्हणतात. अर्थात या श्लोकात भगवान शंकर पार्वतीला रामनामाचे महत्व सांगताना म्हणतात की राम राम या नामातच माझा जीव रमतो. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्र नामांची बरोबरी करणारे आहे. खरे तर रामनामाचे महत्व स्पस्ट करणारे एवढे मोठे उदाहरण दिल्यानंतर अन्य काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. पण तरीदेखील माता जशी तळमळीने आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तसेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.

आपली ज्या देवतेवर श्रद्धा असेल, त्या देवतेचे नाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे असे आपल्याला वाटले पाहिजे. आपण जर शंकराची भक्ती करीत असू तर ‘ ओम नमः शिवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. आपण जर विष्णूचे भक्त असू तर ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. तसेच रामनामाचे महत्व श्रीरामाच्या भक्तांना वाटले पाहिजे. ते सांगण्यासाठीच समर्थांची एवढी तळमळ!

पण समर्थ म्हणतात,” जी माणसे पारमार्थिक दृष्टया अभागी असतात त्यांना रामनामाचे हे महत्व (सांगूनही) कळत नाही. म्हणूनही असे जीव अभागीच आहेत. मुखामध्ये रामनाम यायला किंवा त्याची गोडी वाटायला देखील काही तरी पूर्वसंचित हवे. मुखात रामनाम येणे किंवा रामनाम घ्यावेसे वाटणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. ज्यांना तसे वाटत नाही ते जीव अभागी!

देवांनी आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केले. त्यातून दिव्य अशा चौदा रत्नांसोबतच हलाहल (जहाल विष) देखील बाहेर आले. त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाला. भगवान शंकरांनी हे हलाहल प्राशन करून सर्व सृष्टी आणि प्राणिमात्रांचे रक्षण केले. पण त्यांचा अंगाचा तीव्र दाह होऊ लागला. तो कशानेच शांत होईना. त्या हलाहलाने त्यांचा कंठ निळा झाला. ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाचा दाह शांत होण्यासाठी त्यांनी शीतल चंद्र मस्तकी धारण केला. गंगेला देखील मस्तकी धारण केले. पण शेवटी रामनामानेच त्यांचा दाह शांत झाला.

जालीमातील जालीम विषाचा देखील ज्या औषधाने दाह शांत होतो, असे औषध म्हणजे रामनाम आहे. सर्व भव म्हणजे संसाराचे भय हरण करणारे, दुःख दूर करणारे असे हे औषध आहे. ज्याप्रमाणे श्रीरामाचा बाण अचूक शरसंधान करतो, तसे रामनाम म्हणजे रामबाण औषध आहे. आधुनिक विज्ञानाने देखील रामनामाचे महत्व मान्य केले आहे. आजचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स रामनाम हे प्रभावी साउंड थेरपी आणि ध्यान पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करतात. तणावमुक्तीसाठी रामनाम ऊर्जा प्रदान करणारे असल्याचे ही आधुनिक शास्त्रे मान्य करतात.

प्रत्यक्ष भगवान शंकर जेव्हा रामनामाच्या आश्रय घेतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नराची काय कथा? संत तुलसीदासजी म्हणतात, ” रामनाम में पावत पावन, रवी तेजोमय चंद्र सुधा धन. ” रामनाम हे पावन करणारे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता आपल्याला जीवन प्रदान करते, तसेच हे रामनाम सर्व सुख, परम शांती आणि ऊर्जा देणारे आहे.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनामाचा आश्रय घेतला, तसा मी माझ्या आयुष्यातील राग, मत्सर किंवा चिंतेचा दाह शांत करण्यासाठी नामस्मरणाचा आधार घेतो का?

२. “मुखामध्ये रामनाम येणे किंवा त्याची गोडी वाटणे हे भाग्याचे लक्षण आहे,” हे लक्षात घेऊन मी माझ्या या परम भाग्याचा रोज सुयोग्य वापर करतो का?

३. माझ्या आराध्य दैवताच्या नामावर आणि मंत्रावर माझी संपूर्ण आणि अनन्य श्रद्धा आहे, की माझे मन अजूनही डळमळीत होत असते?

४. संत तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे, रामनामातील सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी मी दिवसातून काही क्षण तरी शांत चित्ताने नाम घेतो का?

– क्रमशः श्लोक श्लोक ८१ आणि ८२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : श्री संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

डॉ. पांडुरंग खानखोजे

यंदाच्या फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटनीय सामना रंगला, तो मेक्सिको सिटीत. यजमान मेक्सिकोसह अमेरिका आणि कॅनडाही या स्पर्धेचे सहआयोजक आहेत. तब्बल ३२ तासांचा प्रवास करून मी अखेर या उद्घाटन सामन्याच्या वार्तांकनासाठी मेक्सिकोत पोहोचलो.

फुटबॉलची मजा काही औरच असते. मैदानावर चेंडू फिरत असताना जितका थरार असतो, त्यापेक्षाही अधिक जल्लोष सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर उसळतो. जणू तो एक बेधुंद करणारा कार्निव्हल असतो.

सामना संपताच, मीही त्या कार्निव्हलचा भाग झालो. पोटात भूक होतीच; पण स्टेडियमबाहेर सर्वत्र लागलेल्या मक्याच्या स्टॉलने ती आणखीच भडकावली. एका स्टॉलवर मी थांबलो. उकडवलेले टपोरे मक्याचे दाणे, त्यावर खास मेक्सिकन तिखट मसाल्याचा पहिला घास घेताच, जिभेवर मेक्सिको उतरल्यासारखे वाटले. माझ्यासोबत काही स्थानिक मेक्सिकन पत्रकार होते. त्यातील एकजण सहज म्हणाला,’Did you know Pandurang Khankhoje? The man from India. This crop is his gift. ‘

क्षणभर माझा घास अडकला. डोळ्यांसमोर फुटबॉलचा जल्लोष होता, हातात मेक्सिकन मका होता आणि कानांवर आलेले नाव होते, पांडुरंग खानखोजे!

स्वातंत्र्य लढ्यात ‘गदर पार्टी’ स्थापन करणार्‍या क्रांतिकारकांपैकी एक पांडुरंग सदाशिव खानखोजे महाराष्ट्रातील वर्ध्याचे होते, इतके जुजबी ज्ञान होतेच. पण मेक्सिकोच्या फुटबॉल कार्निव्हलमध्ये, मक्याच्या त्या स्टॉलपाशी, एका मेक्सिकन पत्रकाराकडून त्यांचे नाव ऐकणे, हा माझ्यासाठी आयुष्यभर जपावा, असा क्षण होता.

मेक्सिकोच्या हरित क्रांतीत महाराष्ट्रात जन्मलेल्या या सुपुत्राचा मोलाचा वाटा होता. मेक्सिकन टाको जितके प्रसिद्ध, तितकाच येथील मका लोकांच्या जगण्याचा भाग आहे आणि त्या मक्याच्या समृद्धीमागे एका मराठी माणसाचे संशोधन, परिश्रम आणि दूरदृष्टी आहे, ही गोष्ट अंगावर रोमांच उभे करणारी आहे.

१९२० साली खानखोजे मेक्सिकोत आले आणि मग जणू मेक्सिकोचेच झाले. वयाच्या १६व्या वर्षी लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी घर सोडले. जपानमार्गे अमेरिका गाठली. मजूर म्हणून काम केले. त्याचबरोबर शिक्षण घेतले. वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी संपादन केली. लष्करी प्रशिक्षण घेतले. तेथेच लाला हरदयाल यांच्याशी त्यांची भेट झाली आणि ‘गदर चळवळी’चा प्रवास सुरू झाला.

क्रांतीच्या कार्यामुळे भारतात परतणे त्यांना शक्य नव्हते. अशा वेळी मेक्सिकन शेतकर्‍यांच्या ओळखीने त्यांनी मेक्सिको गाठले. तेथे राष्ट्रीय कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी स्वीकारली आणि सुरू झाला, एका मराठी क्रांतिकारकाचा दुसरा अवतार, अन्नक्रांतीचा, शेतीक्रांतीचा, माणुसकीच्या सेवेत झोकून देणार्‍या शास्त्रज्ञाचा!  

मेक्सिकोतील हवामानात मक्याच्या उत्पादनात होणारी घट त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यांनी त्यावर अथक संशोधन केले. मक्याचे नवे वाण विकसित केले; ते पुढे जगभर स्वीकारले गेले. त्यांच्या संशोधनामुळे मेक्सिकोतील असंख्य शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. एका परक्या देशात आलेल्या मराठी माणसाने तेथील मातीत स्वतःला मिसळून घेतले आणि त्या मातीतून लाखो लोकांच्या पोटाची भाकर उगवली.

मेक्सिकोनेही या ऋणाची जाण ठेवली. मेक्सिकोच्या शिक्षण सचिवालयाच्या इमारतीत खानखोजेंच्या सन्मानार्थ खास म्युरल साकारण्यात आले आहे. महान चित्रकार दिएगो रिव्हेरा यांनी ‘लास्ट सपर’च्या धर्तीवर हे म्युरल चितारले. त्यात खानखोजे मेक्सिकोच्या सामान्य शेतकर्‍यांसोबत मका आणि भाकरीची मेजवानी करताना दिसतात. हा केवळ चित्राचा सन्मान नाही; तो एका भारतीयाला, एका महाराष्ट्रीयाला, एका मराठी माणसाला मेक्सिकोने केलेले कृतज्ञ अभिवादन आहे.  

एक मराठी क्रांतिकारक विचारांनी जपान, पॅरिस, अमेरिका फिरत मेक्सिकोत येतो, तिथे स्थिरावतो आणि गरीब शेतकर्‍यांचा अन्नदूत बनतो, ही कथा छाती अभिमानाने फुलवणारी आहे. “खानखोजे माझ्या महाराष्ट्रातील आहेत,’ असे त्या मेक्सिकन पत्रकाराला सांगताना माझ्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या. त्याक्षणी मला वाटले, ही मेक्सिकोवारी सार्थकी लागली.  

खानखोजे यांच्या कृषिक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मेक्सिकोच्या ‘चॅपिंगो’ विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा केवळ दगडाचा नाही; तो मराठी कर्तृत्वाचा, भारतीय प्रतिभेचा आणि सीमांच्या पलीकडे जाणार्‍या मानवतेचा साक्षीदार आहे!

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर खानखोजे सहकुटुंब भारतात परतले. महाराष्ट्राच्या भूमीत, नागपुरात दि. २२ जानेवारी १९६७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सक्रिय राजकारणापासून ते शेवटपर्यंत दूर राहिले; पण त्यांनी केलेले कार्य कोणत्याही राजकीय पदापेक्षा मोठे होते. त्यांनी एका देशातील शेतकर्‍यांचे जीवन बदलले. त्यांनी भुकेशी लढणार्‍या माणसांच्या हातात आशेचा दाणा दिला.

मेक्सिकोत सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात भारत नाही. जागतिक क्रमवारीत भारत १३९व्या क्रमांकावर आहे. भारत फुटबॉल विश्वचषक कधी जिंकेल, हे माहीत नाही. पण १०० वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने मेक्सिकोच्या मातीवर येऊन येथील लोकांची मने जिंकली, ही नोंद आचंद्रसूर्य राहील, हे नक्की!

फुटबॉलच्या जल्लोषात, मक्याच्या एका साध्या घासातून मला महाराष्ट्राची ही सुवर्णकथा भेटली. मेक्सिकोत खानखोजे आजही जिवंत आहेत, शेतकर्‍यांच्या स्मृतीत अन् मक्याच्या प्रत्येक दाण्यात! पांडुरंग खानखोजे यांची ही यशोगाथा अनुभवण्यासाठी एकदा तरी मेक्सिकोला आलेच पाहिजे.

धन्यवाद

लेखक : संदीप चव्हाण

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

एकदा पत्नीने मला सहज विचारले…

“सांगा ना, जर कधी अशी वेळ आली की तुझी आई किंवा मी… आमच्यापैकी एकीचीच निवड करावी लागली, तर तू कोणाला निवडशील?”

 

प्रश्न साधाच होता…

पण उत्तर देताना अनेक नात्यांचे ओझे मनावर येऊन बसले.

 

मी काही क्षण शांत राहिलो…

आणि मग हळूवार पणे म्हणालो,

“मी… माझ्या आईची निवड करीन.”

 

क्षणात तिचा चेहरा उतरला.

ती हळव्या आवाजात म्हणाली..

“ज्याच्यासाठी मी माझे माहेर सोडले…

आई-वडील, भाऊ-बहीण सोडले…

सगळे आयुष्य तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या घरी आले…

त्याच माणसाच्या आयुष्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे…?”

 

तिच्या डोळ्यांतील दुःख मला दिसत होते.

मी तिचे हात हातात घेतले आणि शांतपणे म्हणालो…

“अगं वेडे… माझे उत्तर तुझ्यावरच्या प्रेमाचे मोजमाप नाही.

ते माझ्या संस्कारांचे प्रतिबिंब आहे.

आज जर मी माझ्या पत्नीसाठी माझ्या जन्मदात्या आईला दूर केले…

तर, उद्या आपला मुलगाही त्याच्या पत्नीसाठी स्वतःच्या आईला… म्हणजे तुलाच… दूर करणे योग्य समजेल.

आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यांतले अश्रू मी कधीच पाहू शकणार नाही.

म्हणून मला माझ्या मुलांना एवढेच शिकवायचे आहे—

आईचा सन्मान करताना पत्नीचा अपमान करू नका…

आणि पत्नीवर प्रेम करताना आईला विसरू नका.

कारण प्रेम म्हणजे कोणाला जिंकणे नाही…

तर प्रेम म्हणजे कोणालाही न हरवता सगळ्यांना जपणे.”

 

हे ऐकून तिच्या डोळ्यांतले अश्रू अलगद ओघळले…

पण त्या अश्रूंमध्ये पराभव नव्हता…

होता तो माझ्या विचारांचा स्वीकार…!

आणि दोन्ही नात्यांचा सन्मान करणाऱ्या एका घराचा सुंदर पाया…!

 

लक्षात ठेवायला हवे…

आई ही जीवनाची सुरुवात आहे…

पत्नी ही जीवनप्रवासाची साथ आहे…

 

एकीने जन्म दिला…

दुसरी आयुष्याला अर्थ देते…

या दोघींपैकी कोण मोठे? कोण जवळचे? कोण अधिक प्रेमाचे? हे प्रश्नच चुकीचे आहेत.

 

कारण घर तेव्हा स्वर्ग बनते, जेव्हा तिथे तुलना नसते…

अहंकार नसतो…

तर असतो फक्त परस्परांचा आदर, प्रेम आणि जपणूक.

 

खरा पुरुष तो नाही जो एका नात्यासाठी दुसरे नाते तोडतो…

खरा पुरुष तो आहे, जो दोन्ही नात्यांना न्याय देतो, दोघींच्या डोळ्यांत विश्वास ठेवतो आणि पुढच्या पिढीला नात्यांचा खरा संस्कार देतो.

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विनवणी… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ विनवणी नीलांबरी शिर्के 

मातीची मशागत केली

कसदार पेरले बीज

अंकुरत्या बीजाला तो

कुतुहले निरखतो रोज!!

*

ही काळी आई त्याची

देतसे मुखाला घास

घन भरूनी येवो नभी

धरणीस हवा पाऊस!!

*

 मातीत बैसुनी कुणबी

 आभाळा जणू विनवितो

 धरती पाऊस मिलनी

 तो स्वप्ने रेखीत बसतो!!

*

उघड्यावर त्याची शेती

 उघडेच तयाचे धन

 या धडपडणाऱ्या जीवा

 दे सुख पाऊस रूपानं!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares