(श्रीमती शशि सुरेश सराफ जी सागर विश्वविद्यालय से हिंदी एवं दर्शन शास्त्र से स्नातक हैं. आपने लायंस क्लब और स्वर्णकार समाज की अध्यक्षा पद का भी निर्वहन किया. आपका “लेबल शशि” नाम से बुटीक है और कई फैशन शोज में पुरस्कार प्राप्त किये हैं. आपका साहित्य और दर्शन से अत्यधिक लगाव है. आप प्रत्येक शुक्रवार श्रीमती शशि सराफ जी की रचनाएँ आत्मसात कर सेंगे. आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता ‘क्या हुआ…? ‘।)
☆ “दिल ढूँढता है… फिर वही…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
परी…
होय तिचं नावं परी आहे असचं तर तिने मला एकट्यालाच कानात सांगितलं… त्या लग्न सोहळ्यात…
बाशिंग बळ जड असलेल्या आणि लग्नाला उतावीळ असलेला आमच्या मित्रांच्या कंपूतला तो ओपनिंग बॅटसमन शेवट पर्यंत नाॅट आऊट राहिलेला एकमेव गडी…
वयाची बत्तीस गाठली तरी बिचाऱ्याची ब्रह्मचारीपणाची खडी फोडणं चालूच होतं… अगदी मागच्या आठवड्यापर्यंत तरी… आणि आज आता या क्षणाला त्याचं शुभ लग्न सावधान होतयं या गोष्टीवर आमचा निदान माझा तरी विश्वास बसत नव्हता… पाटा विकेटवर बुमराहला झोडपून काढल्यावर विकेट मिळते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येते ना… अगदी तसंच हसू आम्हा मित्रांच्या चेहऱ्यावर… शेवटी उशीराने का होईना पण विकेट पडली एकदाची…
कुबेराला उणेपणा येईल अशी धन, कनक संपती… उच्च विद्याविभूषित आणि विचारी घराणं… मानमरातबची छत्रचामरं अख्खा कुटूंबावर असलेली… आणि आणि बरेच काही असूनही आमच्या या मित्राचं लग्न मात्र काही जुळतं नव्हतं… बरं अटी चा कोलदांडा त्याच्याकडून काही नव्हता… ओपन माईंडेड नि मिरर ट्रान्सपरंट आणि वयात आलेल्या कुठल्याही बालिकेला ह्योच नवरा हवा असा त्यांच्या टिक टिक वाजे डोक्यात… हृदयात नि मनात घंटी वाजवणारा असाच हा होता… बरं काॅलेजात असताना किंवा नोकरी असताना मनाचिये गुंती सारखी परिस्थिती औषधालासुदधा कधी याची केमेस्ट्री जमलीच नाही… सारखं आपलं भ्रमर होऊन या फुलावरून त्या फुलावर त्याचा उडता प्रवास चालूच… कुणी एखादी ने जर त्याला डेरिंग करून तसं विचारलं माझ्याशी लग्न करशील का? त्यावर हा एक मंद स्मित करून उत्तर द्यायचा… माझा सध्या तरी विचार नाही… असं उत्तर देऊन उडवून लावत असे… मग स्थळं येणार कशी नि लग्न घटिका समिप तरी कशी येणार… पठ्ठयाच्या मनाचा थांग काही लागत नव्हता… घरच्यांची चिंता वाढत चालली… आम्ही मित्रांनी त्याला सरळ सरळ तर कधी आडून त्याच्या मनात काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला… आणि तो शोध अखेर लागला… पाच सहा वर्षा मागे त्याला कुठेतरी परी दृष्टीस पडली होती नि तिने त्याचं मनं नि हृदय काबीज करून टाकले होते… त्यामुळे लग्नाच्या हंगामात त्याच्या डोळ्यासमोर ती परीच दिसायची आणि समोरची दिसणारी मुलगीत परीचा त्याला भास झाला नाही कि नापसंत असायची… खरं तर इतक्या सुंदर देखण्या मुलीं पाहण्याचा कांदेपोहे खालेल्या डिशेसनां देखील धुवून धुवून कंटाळा आला होता… नाकारण्यासारखं त्या एकाही मुलीत तसं काहीही नसताना याचा कपाळकरंटेपणा मात्र आम्हा मित्रांना प्रश्नांकीत करायचा… आम्हालाच कधी कधी असं वाटायचं की आमच्या लग्नाच्या वेळी या सुंदर देखणं सौंदर्याने कुठे दडी मारून बसले होते… नि गळ्यात आमच्या मात्र बेतासबेत लोढणे अडकवले गेले होते… सिनेमे जलन… दूसरं कायं होणार होतं म्हणा… असो आता काय त्याचं रात गई बात गई… पण आमच्या मित्राचा नकार घंटेने आमची नक्की खात्री झाली कि पाणी मुरतयं कुठेतरी… गडी नक्की कुठंतरी गुंतलाय पण तो अजूनही ओपन का होत नाहीऐ याचचं आश्चर्य वाटलं…
आणि त्या आश्चर्याचा बुरखा असा आज टराटरा फाटला… त्याच्या त्या लग्न समारंभात ती परी म्हणणारी गुलाबी रंगाचा शरारा घालून एक गोड नि सुंदर बालिका त्या हाॅल मध्ये इकडून तिकडून धावपळ करताना दिसत होती… आपल्या गोरा रंगावर नि हसऱ्या चेहऱ्यावर गालावरच्या खळीने सगळ्यांना घायाळ करून सोडले होते… तिच्या ताईचंच लग्न असल्यामुळे तिचा करवलीचा मान ती मिरवत होती… आखिर ती होणाऱ्या जीजूची छोटी नटखट जो साली थी… खरं तर मित्राची ती बायको तितकीच सुंदर होती पण ती काही परी नव्हती… तरीही त्याने तिच्याशी लग्न केले… या निमित्ताने कधी कधी त्या परीचा सहवासात राहता येईल… तिच्या त्या सात्विक सौंदर्यात त्याने स्वतःला हरवून बसला… इतके दिवसाची तपश्चर्या फळाला आली होती… विशुद्ध प्रेमाची त्याला प्रचिती आली…
अशा तऱ्हेने आमच्या मित्राचा संसार सुरु झाला आणि त्याला लवकरच त्या परी बद्दल रहस्य कळले… कि परी काही त्याच्या बायोकोची सख्खी बहीण नव्हती तर तिच्या आइबाबांनी परीला अनाथालयातून आणलेली… चिखलात फुललेल्या कमलिनीला प्रेमाच्या वाटीकेनं संरक्षण नि पालनपोषण करून विकसित केलं होतं… मुग्ध कळीचं आता नाजूक कोमल सुंगधी फुल उमलू लागलं होतं… आणि आमचा मित्र तर त्या कमलदलात कधीचा बंदिस्त झाला होता…
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
तुकारामांचा युक्तिवाद
दिवस रात्र विठू माऊलीचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांची त्यांच्या देवाचे कधी दर्शन घडते आणि माऊलीच्या चरणी त्यांना कधी आसरा मिळतो अशी मनाची अवस्था झाली असताना त्यांनी त्यांच्या काही अभंगांतून खूप छान युक्तिवाद मांडला आहे. आज आपण असे काही अभंग पाहूया.
नवां नवसांची/ झालो तुम्हासी वाणीची//
कोण तुझे नाम घेते/ देवा पिंडदान देते//
कोण होते मागे पुढे/ दुजे बोलाया रोकडे//
तुका म्हणे पांडुरंगा/ कोणा घेतोसी वोसंगा//
देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात,
” अहो देवा, आम्ही तुमची नवसासायासाने झालेली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव घेणारे दुसरे कुणी आहेत का? आम्ही नसतो तर तुमचे पिंडदान कोण करणार? तुम्हाला परखड शब्दात जाब विचारणारे, रोखठोक बोलणारे आमच्या शिवाय दुसरे कोणीतरी आहे का? पांडुरंगा, आम्ही जर तुमची मुले नसतो तर तुम्ही कोणाला तुमच्या पदरात घेतले असते? “
आहे की नाही महाराजांचा हा मस्त युक्तिवाद? आम्ही तुमचे भक्त नसतो तर देवच जसा एकटा पडला असता, ही पांडुरंगाची मुले आहेत म्हणून त्यांना माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळण्याचा अधिकार आहे.
आता हा दुसरा अभंग पहा.
जेणे तुज जाले रूप आणि नाव/
पतीत हे दैव तुझे आम्ही//
नाही तरी तुज कोण हो पुसते/
निराकारी तेथे एकाएकी//
अंधारे ते दीपा आणियेली शोभा/
माणिकाची प्रभा कोंदणाची//
धन्वंतरी रोगे आणिला उजेडा/
सुखी काय चाडा जाणावे त्या//
अमृतासी मोल विषाचिया गुणे /
पितळ तरी सोने उंच नीच//
तुका म्हणे आम्ही असोनिया जाण /
तुज देवपण आणियेले//
रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन तुकाराम देवाला सांगतात, ” अरे देवा, आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत म्हणून तुझी ओळख आहे. ” ते काय म्हणतात? आम्ही पतीत आहोत. आणि आमच्यासाठीच देवा तुम्ही हे रूप धारण केले आहे. म्हणून आम्ही पतीतच तुझे दैवत आहोत. आम्ही जर नसतो तर तुझ्या निराकार, निर्गुण स्थितीला कोणी मानले असते? जसे की, अंधार आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशाची शोभा आहे. वैद्याला रोग्यामुळे प्रसिद्धी मिळते. जर सर्व लोक निरोगी असते तर वैद्याची गरजच काय? विषामुळे अमृताची गोडी आहे, आणि पितळ आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे. तसेच आम्ही पतीत आहोत, म्हणून तुझे हे सगुण सुंदर रूप आहे.
या अभंगातून तुकाराम महाराज एक प्रतिभावंत कवी होते असे आपल्याला दिसून येते. परमेश्वराला मनविण्याची ही मोठी चतुर बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच होती.
माणूस मायेच्या जंजाळात अडकून पडला आहे, जी माया अत्यंत नीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव खरंतर फार चांगला होता, परंतु या मायेने त्याला सुद्धा बिघडवले आहे. या मायेच्या संगतीत राहून देव लोकांना फसवण्याचे अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे शिकला आहे. या मायेमुळे याच्यावर जगाचे कर्ज झाले म्हणून लोक याच्या नावाने हाका मारतात. ईश्वरा जवळ कोणी काही मागितले की ही माया ज्याचे त्याला मिळू देत नाही, उलट ती मागणाऱ्याला भ्रम निर्माण करण्याकरता त्याच्या अंगावर धावते.
थोडक्यात काय तर मायेत गुरफटलेल्या माणसाने ईश्वरालाही सोडले नाही, त्यालाच मायेच्या पाशात अडकविले. या कारणाने आम्हा भक्त मंडळींना परमेश्वराची भेट होत नाही.
हा फार मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सामान्य जनतेला पोट- तिडकीने सांगितला आहे.
बहु होता भला/ परी या मायेने नासीला//
बहु शिकला रंग चाळे/ खरे खोटे इचे वेळे //
नव्हते आळविते कोणी/ तिने केला जग ऋणी//
ज्याचे त्यासी नेदी देऊ/ तुका म्हणे धावे खाऊ//
विठ्ठलाची भक्ती करीत असताना वेद पठण केलेल्या पंडितांना ते मुळीच मानत नाहीत. ते म्हणतात,
पंडित म्हणता थोर सुख/
परी तो पाहता अवघा मूर्ख//
काय करावे घोकिले/
वेदपाठ वाया गेले//
वेदी सांगितले न करी/
समब्रह्म नेणे दुराचारी//
हा वेदींचा अनुभव/
तुका देखे जीव शिव//
एखाद्याला कोणी पंडित म्हणून संबोधिले तर त्याला त्याच्या विद्वत्तेचा अभिमान वाटतो पण विचारांती तो मूर्खच असतो. कारण नुसत्या वेदांची घोकंपट्टी करून त्याचा अर्थ कळत नसेल तर तो कसला पंडित? मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे वेदपठण व्यर्थच आहे. वेदात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाने ब्रह्म विलसत असते, परंतु असा अनुभव येत नाही म्हणून असे पंडित हे खरंतर दुराचारीच. वेदातील मुख्य अनुभव म्हणजे जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष असा अनुभव आला आहे. त्यांच्या दृष्टीने खरा पंडित असा असतो.
पंडित तोची एक भला/ नित्य भजे जो विठ्ठला//
अवघे समब्रम्ह पाहे/ सर्वांभूती विठ्ठल आहे//
रिता नाही कोणी ठाव/ सर्वांभूती वासुदेव//
तुका म्हणे तोचि दास/ त्या देखिला जाती दोष//
तुकाराम महाराज म्हणतात की जो खऱ्या खुऱ्या भावाने विठ्ठलाची नित्यनेमाने भक्ती करतो, तोच खरा पंडित, कारण तो विठ्ठलाला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने पाहतो. तो हे जाणतो की वासुदेव सर्वत्र व्यापून आहे. रिकामे असे कोणतेच ठिकाण नाही. असा मनुष्यच खरा विठ्ठलदास आहे, त्याच्या दर्शनाने सर्वदोष नाश पावतात.
संत तुकारामांचे जनतेला हेच आवाहन आहे की, जन हो, हातात टाळ घ्या, वीणा घ्या, त्यांना विठ्ठल स्वरूप माना आणि विठ्ठल नामाचा मुखाने सतत गजर करा.
कॅनडाचं अल्बर्टा राज्य आणि त्यामधील अँडमिंटन शहरापासून साधारण चार तासाच्या अंतरावर असलेलं हायपेरी हे तीन हजार लोक वस्तीचं गाव! त्या ठिकाणी असलेल्या बर्फाळ प्रदेशातील एका कारखान्यामध्ये लॉजिस्टिकचे काम बघणारा सुधीर आपल्या रूमवर परतला. तेव्हा त्याला कॅनडा सरकारचं एक पत्र आलं होतं. त्याने ते उघडून बघितलं तर तो त्याचा पीआर होता… म्हणजे परमनंट रेसिडेन्शिअल परवाना होता…
सहा वर्षांपूर्वी कोरोनाआधी सुधीरच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते… त्याला कारणही तसेच होते… पुण्यातील एका नामांकित वाहन बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुधीरचे वडील अकाउंटंट होते… रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सर्व पैसा शेअर बाजारात गुंतवला होता… सुधीरच्या आईला किंवा सुधीरला न सांगता! त्यांनी घरातील सोन्यावरही कर्ज काढले होते… आणि कसे कोण जाणे? ह्या सगळ्यामध्ये ते फसले! आणि त्यांचे सगळे पैसे बुडीत झाले… ही गोष्ट बायकोला किंवा मुलाला कशी सांगावी? ह्या विचाराने त्यांना अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला…
त्यानंतर सुधीरच्या आईने तडकाफडकी निर्णय घेऊन सुधीरला कॅनडाला एम एस करण्यासाठी पाठविले होते… त्या करता तिने उरलेसुरले सगळे पैसे उपयोगात आणले होते… आता सुधीर मागील पाच वर्षापासून आईपासून दूर होता… कॅनडामध्ये एम एस केल्यानंतर कायमचा नागरिकत्व मिळावं, यासाठी तो प्रयत्न करीत होता… सुरुवातीला टोरांटो सारख्या मोठ्या शहरात असल्याने… त्याचे एक-दोन वर्ष तसे वाया गेले… कारण शहरी भागात पी आर लवकर मिळत नाही असे त्याला नंतर समजले… म्हणून त्याने टोरांटोपासून लांब अल्बर्टा स्टेटमध्ये असलेल्या हाय पेरी या खेडेगावात नोकरी स्वीकारली होती… इथे येऊन त्याला जवळपास तीन वर्ष तरी झाली होती… त्याचा मनमिळावू स्वभाव… सर्वांना मदत करण्याची वृत्ती… कामसूपणा… आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आईची स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द… ह्या गोष्टीमुळे तो रात्रंदिन कष्ट करायचा… त्याच्याच वयाची इतर मुले क्लब, पार्टी, सॅटर्डे नाईट, इत्यादींमध्ये गुंतून राहायची… पण सुधीर मात्र ह्या गोष्टीपासून लांब राहायचा…
हाय पेरीचा भाग संपूर्णतः बर्फाच्छादित असतो… या ठिकाणी फार थंडी असते… अशी ऊनही असते… उणे 20 डिग्री तापमान या ठिकाणी असतं… अशा वातावरणात इथल्या कंपनीमध्ये कारखान्यामध्ये इंटरशिप करणारी… काम करणारी मुले… पुन्हा पार्टटाइम म्हणून इथल्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये वेटर किंवा वेटरेस म्हणून कामे करतात… ह्या मुलांमध्ये बरीचशी चायनीज, फिलिपिन्स, इंडियन, त्यातही पंजाबी मुलामुलींचा भरणा अधिक आहे… आपापल्या देशांमध्ये आई-वडिलांच्या छत्राखाली राहणारी ही मुले इथे मात्र काबाडकष्ट करीत असतात… आणि हा सगळा आटापिटा केवळ पीआर मिळावा म्हणून असतो…
तीन वर्षांपूर्वी टोरांटोवरून जेव्हा अल्बर्टाला यायचे होते… तेव्हा गुगल मॅप नुसार रशिया नंतर कॅनडा हा जगातला दुसऱ्या नंबरचा विस्तारलेला देश आहे हे सुधीरला समजले. तेव्हा तर सुधीरने जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास त्याच्या कारने केला होता… त्यासाठी त्याला चार दिवस लागले होते… एवढे दिवस तो एकटाच कार चालवत होता… पण टोरंटो आणि हायपेरीच्या वातावरणात खूप फरक असल्याने म्हणजेच हा प्रदेश बर्फाळ असल्याने या ठिकाणी कार चालविणे कठीण असते. तिथल्या हायवेवर नियमानुसार गाडी चालवतांना १२० च्या गतीने चालवावी लागते… पण सुधीरला बर्फावर त्या पद्धतीने चालविण्याची सवय नसल्याने त्याची स्पीड कमी झाली… त्यामुळे पोलिसांनी मागून येऊन त्याला त्याबद्दल विचारणा केली… तेव्हा त्याने खरे कारण सांगितले की, ” मी पहिल्यांदा बर्फावर किंवा बर्फाच्या रस्त्यावर गाडी चालवत आहे आणि मला ती सवय नाही मुळे मी स्पीड कमी केली”… हे ऐकून त्या पोलिसांनी स्वतः ती कार चालवत सुधीरला हायपेरीपर्यंत पोचवले होते.
ग्रामीण भागात काम केल्याने पीआर लवकर मिळतो. असे त्याने ऐकले होते… शिवाय त्या त्या भागातला पीआर कोटा सुद्धा ठरलेला असल्याने शहरी भागाच्या तुलनेत ह्या ठिकाणी नंबर लागण्याची संधी जास्त असते हे त्याला आता लक्षात आले होते… त्यामुळेच अख्ख्या हायपेरीमध्ये दर महिन्याला एक दोन एक दोन नंबर पीआर साठी लागायचेच… आणि अलीकडेच त्याचा नंबर आलेला होता… ही आनंदाची बातमी आपल्या आईला देण्यासाठी सुधीर अधीर झाला होता… त्याने लगेच पुण्याला भारतात फोन लावला… आईला पीआरची गोड बातमी सांगितली… आणि आता तुझ्यासाठी सुनबाई बघ किंवा मग इकडचीच कॅनडाची एखादी बघतो… असं मनात आईसोबत आनंदाने बोलत राहिला…
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “भिकारी…???” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
भिकारी…???
अं… हं……. भिक्षेकरी किंवा याचक म्हणूया हवं तर…..!
समाजात मात्र भिकारी हाच शब्द प्रचलित आहे…….
कोण असतो हा भिकारी…..?
सध्या आंब्याचा सिझन चालू आहे, लोक आंबे आणतात, तो कापून खातात किंवा आमरस करतात…….
परंतु त्याची कोय जी असते तीला मात्र कोणी जपून ठेवत नाही, एका क्षणामध्ये या कोयीला डस्टबिन मध्ये टाकलं जातं…….!
– – – काही माणसं अशीच गोड असतात आंब्यासारखी, हा *गोडवा* असतो दरमहा मिळणाऱ्या पगाराचा / पेन्शनचा, प्रॉपर्टीचा किंवा सोन्या नाण्याचा, FD चा किंवा आणखी कशाचाही…….!
मग हा गोडवा त्यांच्याच घरातले लोक चाटून-पुसून खातात किंवा खरवडून खरवडून गर काढून त्यांचा आमरस करतात…….
एकदा का हा *”गोडवा”* संपला की, मग पुन्हा उरते ती कोयच…….!
आता गोडवा नसलेल्या या कोयीचा काय उपयोग…….?
गोडवा संपल्यानंतर या कोयीना सुद्धा डस्टबिन, म्हणजेच उकिरड्यात फेकलं जातं…….!
मी लहान असताना खेड्यात “कोयनापानी” नावाचा खेळ खेळायचो…….
यात एका कोयीला दुसऱ्या कोयीने नेम धरून उडवायचे……. या कोयी जिंकायच्या……. ज्याच्याजवळ जास्त कोयी त्याला सर्वात श्रीमंत समजले जाई…..!
ज्याच्याजवळ जास्त कोयी, तो स्वतःला अलेक्झांडर समजून चालत असे, आणि आम्ही त्याच्याकडे आदर युक्त भीतीने नम्रतेने पाहत असु…….!
जे खेड्यातील असतील त्यांना हा खेळ नक्की आठवेल…..!
– – कोयनापानी खेळून, कोयी जमवून श्रीमंत होणे हा खेळ आता कधीच संपला आहे, या गर आणि गोडवा नसलेल्या *कोयी* घरात ठेवणे आता कोणाला परवडणार आहे???
आई बापाला घरात ठेवण्याचा “डाव” सुद्धा आता संपला आहे…..!
आज अशा रस गर आणि गोडवा संपलेल्या कोयी घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून असतात, थेरडी, म्हातारी, मरायला टेकलेलं म्हातारं, रिटायर्ड झालेला बिनकामाचा बाप किंवा आजारपणात अडकलेली, लवकर मरत पण नसणारी म्हातारी आई……. अशी या कोयीना नावं आहेत…….!
कधीतरी सुंदर आंबा असणाऱ्या, या कोयी आता घरातल्या जागा अडवून ठेवतात, खाटा अडवून ठेवतात, खातात चारच घास परंतु स्वयंपाक करावा तर लागतोच ना…….?
‘यांची फालतूची आजारपणं काढायची का पोरांच्या शाळेचं बघायचं…….? यांच्यामुळे सगळं महिन्याचं गणित बिघडतं…….! ‘
“मरत पण नाहीत मेली लवकर”, “खायला कार भुईला भार’
……. हे शब्द ऐकून त्या कोयी आणखी कोमेजून जातात…..!
डोक्यावर घेतलेली फाटकी चादर किंवा पदर भिजून जातो, बघायला कोणाला वेळ असतो…….?
चादर किंवा तो पदर हेच या मूक अश्रूंचे “माफीचे साक्षीदार”…….!
कारण आई बाप कधी कोणाला शिक्षा करतात का?
त्यांनी मुलांना माफ केलेलं असतं…….!
– – किती दिवस सांभाळायचं अशा या कोयीना? म्हणत मुलं, सुना, नातवंडं यांचा बांध फुटतो आणि वैतागून, घरातले हेच लोक या “कोयी”……. रस्त्यावरच्या उकिरड्यात फेकून देतात.
कसं सांगू…..???
सूर्य मावळल्यावर नाही, “बाप विझला” की आयुष्यात अंधार होतो…..!
आई गेली की आईचा नाही, “बाळा” या कानावर येणाऱ्या गोड शब्दाचा, कायमचा “अंत्यविधी” होतो…..
आई कुठेच कधी जात नाही….. जातो तो “हा शब्द”…!!!
घरातल्या या कोयी फेकणाऱ्या मित्रानो आणि अगं ताई…..
इथून पुढच्या आयुष्यात जखमांनी जेव्हा जीव जाईल थकून……… तेव्हा मायेच्या ओलाव्याने आता कोण सांग, हळद लावेल फुकून…….????
आणि हो……. आता पावसाळा सुरू होईल, दारं नीट लागणार नाहीत……. ती फुगून बसतील, तेव्हा मित्रा आणि अगं ताई पावसाला दोष देऊ नकोस…….
कदाचित तुमच्या आई बापाचे, सासू सासऱ्यांचे पाय उंबऱ्यात अजूनही अडकून बसले असतील, तुमच्याच आठवणीत……. म्हणून दारं नीट लागत नाहीत…….!
कसं सांगू तुम्हाला…….????
तरीही या कोयी फेकल्या जातात उकिरड्यावर…….
अंगात त्राण नाही, या वयात कुठलंही काम करायचे बळ नाही, हातात डिग्र्या घेऊन कितीतरी तरुण बेरोजगार म्हणून भटकत आहेत, अशावेळी या म्हाताऱ्या माणसांना काम कोण देणार…..?
……. इथून खेळ सुरू होतो जगण्याचा…..
जगण्यासाठी नाईलाजाने भीक मागण्याचा…….!
आता या कोयीना नवीन नाव आपण देतो… भिकारी…!
मी आणि मनीषा मग या उकिरड्यात पडलेल्या कोयी उचलतो, त्यांना साफ करतो, आणि मायेचं पाणी घालतो, एक छोटासा खड्डा खणून त्यात यांना पुन्हा रुजवतो, थोडं खत घालतो आणि पुन्हा त्यांच्यापासून एखादं हापूसचं आंब्याचं झाड तयार करण्याचा प्रयत्न करतो….!
– – – आमच्या भाषेत आम्ही याला पुनर्वसन म्हणत होतो…!
(आम्ही पुनर्वसन त्यांचेच करतो, ज्यांना भीक मागायची नाही, सन्मानाने जगायचे आहे, जे घरातून बाहेर फेकले गेले आहेत, किंवा ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि यांना भीक मागण्याशिवाय पर्याय सुद्धा नाही.)
काम नको म्हणून ज्यांनी भिकेचा धंदा केला आहे, असे धंदेवाईक भीक मागणारे, भिकेच्या दलदलीतून बाहेर येण्याची इच्छाच नाही असे, यांनी यातून बाहेर यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत, परंतु जोपर्यंत समाज, पुण्य मिळेल या भावनेने यांना “दान” समजून “भीक” देत आहे, तोपर्यंत धंदेवाईक लोक यातून बाहेर येणार नाहीत, हे सुद्धा एक कटू सत्य आहे…..! )
मी दरवेळी सर्वांना सांगतो, कोणालाही “भीक” देऊ नका, “दा” म्हणून त्याला “मदत” करा…..!
भीक आणि मदत मध्ये फरक आहे…..
“भीक” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती आपल्यावर किंवा दुसऱ्यावर पुन्हा अवलंबून राहणार आहे, परावलंबी होणार आहे…….
आणि “मदत” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल किंवा कोणावरही अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होणार आहे…!
एखाद्याला सन्मानाने जगण्यासाठी, खड्ड्यातून बाहेर येण्यास “मदत” करूया…….!
एखाद्याला “भीक” देऊन, त्याला परावलंबी करून पुन्हा खड्ड्यात नको ढकलुया…..!!
असो, मला अपेक्षित असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी हरतऱ्हेने आपण “मदत” करत आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…….!
विषय आंब्यापासून सुरू झालाय, तर आंब्यापासूनच सुरुवात करतो.
अन्नदान….. नव्हे क्षुधाशांती आणि तृषाशांती
रस्त्यावरील आमच्या या लोकांना आंबे खायला कधी मिळत नाहीत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृद्ध आणि बाल बच्चे यांना हापूसचे आंबे खायला दिले आहेत.
रस्त्यावर अन्नावाचून रस्त्याकडेला पडून असणारे वृद्ध आणि आजारी लोक तथा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणारे अत्यंत गरीब लोक यांना दररोज संपूर्ण जेवण दिले आहे.
अन्नदान म्हणण्यापेक्षा “क्षुधाशांती” हा शब्द जास्त योग्य वाटतो. दान देण्याइतपत मी अजून श्रीमंत झालो नाही, जे काही दिलं, ते आपण… ती आपल्या मनाची श्रीमंती होती…!
तीव्र उन्हाळ्यात एकतर अंगाची लाही लाही होत असताना त्यात पाण्याची कमतरता, अशावेळी रस्त्यावरील वृद्धांना आणि लहान मुलांना पॅक केलेल्या पाण्याच्या बाटल्या दिल्या आहेत.
याच सोबत शरीरातील कमी झालेले पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) भरून काढण्यासाठी “ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS)” संपूर्ण उन्हाळ्यात आपण दिले आहे.
खराटा पलटण – (Community Cleanliness Team)-
पूर्वी भीक मागणाऱ्या आज्या आणि मावश्या यांची एक टीम तयार केली आहे, या टीम मार्फत परिसरातील स्वच्छता करून घेत आहोत. स्वच्छता केल्यानंतर ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याचे काही साधन आहे अशांना 7 किलो साखर तथा महिनाभर पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा / राशन दिले आहे.
– – मागितलेली भीक हि लाचारीने मिळते, पण आपण केलेल्या कष्टाचा मोबदला सन्मानाने मिळतोय… तोही भरपूर प्रमाणात, हा विचार त्यांच्यात रुजावा हि यामागे भावना आहे.
“हातात नको भिकेची वाटी… चल हातात घेऊ पेन्सिल आणि पाटी”… अर्थात शैक्षणिक मदत…!
भीक मागणाऱ्या लोकांचे संपूर्ण पुनर्वसन करताना, मुलांची भीक थांबवणे हा एक फार मोठा चॅलेंज आहे.
एक तर भरपूर खायला – प्यायला आणि पैसे मिळत असल्यामुळे मुलांना शाळेत जायची इच्छाच होत नाही आणि मुलांकडून दररोज भिकेतील पैसे पालकांना मिळतात यासाठी पालकांना मुलांनी शाळेत जावे असे वाटतच नाही.
– – परंतु गेल्या अकरा वर्षाच्या त्यांच्याबरोबर झालेल्या एका चांगल्या रिलेशनशिप मुळे आपण भिक्षेकर्यांच्या अनेक मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.
यात नर्सरीपासून ते बीबीए / एमबीए पर्यंतची मुले आहेत, हे सांगायला अभिमान वाटतो.
आपण या सर्व मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक मदत करत आहोत.
यात शाळा कॉलेजच्या फी, वह्या, पुस्तके, गाईड, युनिफॉर्म शाळेचे दप्तर, बूट सॉक्स, काही वेळा प्रायव्हेट ट्युशन इत्यादीचा अंतर्भाव असतो.
यावर्षी दरवर्षी पेक्षा जास्त मुलं आणि भिक्षेकरी पालक यांच्याकडून आम्हाला सुद्धा शैक्षणिक मदत करा, म्हणून विचारणा झाली.
खरं तर माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची, जमेची आणि सकारात्मक बाजू आहे!!!
भीक मागणाऱ्या पालकांची, नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, तर हळूहळू का होईना, परंतु भीक मागणाऱ्या समाजाची संख्या आपोआप कमी होत जाईल.
दरवर्षाचे जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने आमचे प्रचंड शैक्षणिक खर्चाचे असतात.
यावर्षी जून महिन्यात जे करायचे ठरवले होते, त्याहीपेक्षा जास्त मुलांना आपल्यामुळे मदत करता आली.
ओळख – देख नसणाऱ्या या मुलांच्या भविष्यासाठी आपण आपल्या घासातला घास काढून दिलात, ऋण व्यक्त करायला खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत.
नुकताच अकरावी कॉमर्स ला गेलेला एक मुलगा, मला आत्तापासूनच टॅलीचे क्लास लावून द्या म्हणून हट्ट धरून बसला.
– – टॅली (Tally) हे एक (गणितातील) अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. जमा-खर्च, हिशोब, बिले, कर अशा व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. या क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले हे सॉफ्टवेअर.
– – आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…!
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?
३० मे, २०२६ रोजी खडकवासल्यातील एन. डी. ए. National Defence Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) मध्ये दीक्षांत समारंभ झाला यात खडकवासल्याच्या अगदी भिंतीपलीकडे राहणारी जुई राजेंद्र ढगे ही आपली मराठी कन्याही दमदार पावले टाकीत देशसेवेत दाखल होण्याच्या प्रवासात अग्रेसर झाली… ही अत्यंत अभिमानाची बाब आहे… यातून मुलींनी प्रेरणा घ्यावी यासाठी हा लेखन-प्रपंच!
२०१७… धनुर्विद्या प्रकारातील मोठी नेमबाजी स्पर्धा कोकणातल्या डेरवण येथे सुरू होती… ती अन्य स्पर्धकांची निशाणेबाजी पहात मैदानाच्या बाहेरून जात होती……. कुणा स्पर्धकाचा भरकटलेला एक टोकदार बाण सणसणत आला आणि तिच्या डाव्या हातामध्ये आरपार घुसला! ती तर धनुर्धारी! प्रत्यंचा ताणायची असेल, तिच्यावर अडकवलेला बाण लक्ष्याच्या दिशेने सोडायचा असेल तर उजवा हात महत्त्वाचा. पण ही प्रत्यंचा ज्या धनुष्यावर बांधलेली असते, ती प्रत्यंचा ताणायला, ते धनुष्य पेलायला डावा हात मजबूत असावा लागतोच. आणि बाण तर हाच डावा हात भेदून गेलाय. झालेल्या जखमेचं आणि तिच्यातून वाहणा-या रक्ताची तमा नव्हती….. पण यापुढे या हातात धनुष्य धरता येईल ना? या एकाच चिंतेचे ढग तिच्या बालमुखकमलावर दिसत होते. सुदैवाने योग्य वैद्यकीय उपचार आणि मनातली प्रखर जिद्द यांमुळे जखम बरी झाली… आणि तिने पुन्हा धनुष्य उचलले! पुढे अनेक पदकं पटकावली.
२०२३… पण यावेळी तिचे लक्ष्य अत्यंत वेगळे होते!
पण भातुकलीच्या खेळामधली भांडीकुंडी किंवा इतर स्त्रीसुलभ नाजूक खेळ खेळण्याच्या पोरवयात तिच्या हाती हे धनुष्यबाण आले कुठून? यासाठी आई थोडी वेगळ्या मातीतली असावी लागते. तिची आई तशीच होती. तिने एक खेळ म्हणून का होईना तिच्या हाती हे काहीसं पुरूषी अस्त्र सोपवलं आणि तिने नेम अचूक धरला! राजपुत्र अर्जुनाच्या हाती धनुष्यबाण हक्क म्हणून मिळालं होतं. तसं ते इतर राजपुत्रांच्या हातीही होतंच, पण अर्जुनाने धनुष्य, बाण, लक्ष्य आणि लक्ष या चारी गोष्टींवर प्रभुत्व मिळवले आणि आज इतिहासात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अर्जुन हे नाव चिरंजीव झालेलं दिसतं. अर्जुन आणि माशाच्या डोळ्याचा लक्ष्यभेद ही गोष्ट तर लाखो मुलींनी ऐकलेली. पण तिच्या डोळ्यांत ही कथा जणू रुतून बसली होती.
पुराणातील किंवा इतिहासातील ढाल-तलवार, भाले आणि धनुष्यबाणाच्या लढाया आता केवळ गोष्टींत राहिलेल्या आहेत. मात्र आताही लढाई आहेच, मात्र आयुधं आमुलाग्र बदलून गेलीत. ही बदललेली आयुधं सक्षमतेने चालवणारी नवी सैन्यपिढी ही देशाच्या सीमांची सततची मागणी असते, आणि पुढील काळातही राहीलच. याएवढीच महत्त्वाची गरज म्हणजे सैन्याचं नेतृत्व करू शकणारी अतिशय कार्यक्षम, उच्चदर्जा-प्रशिक्षित सैन्य अधिका-यांची फळी.
गरज पडली तेंव्हा स्त्रियांनी हाती शस्त्रास्त्र धरून रणभूमीवर तांडव मांडल्याची उदाहरणं आपल्या हिंदुस्थानात अगदी देवादिकांच्या काळापासूनची. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात महाराणी ताराराणी आणि इतर रणरागिणींनी हाती खडग घेऊन लढताना जगानं पाहिलं आहेच. स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्षात मूळच्या महाराष्ट्रकन्या राणी लक्ष्मीबाईसाहेब तर पाठीस बालक बांधलेलं असताना लढल्या. सुभाषबाबुंच्या आझाद हिंद फौजेत स्त्रियांच्या नाजूक समजल्या जाणा-या हातांमध्ये वजनी बंदुकाही इतिहासाने पाहिल्या आहेत.
इंग्रजांच्या भारतातील सैन्याने १८८८ मध्ये त्यांच्या सोयीसाठी स्त्रियांना फौजेत घेतलं होतं पण ते केवळ परिचारिका म्हणून. पण स्वातंत्र्योत्तर आणि आधुनिक काळातही युद्ध आणि स्त्रिया हा विचार काहीसा मागे पडला होता. वैद्यकीय आणि तत्सम सेवांमध्ये मात्र जगातल्या कुठल्याही सैन्याला स्त्रियांशिवाय सक्षम पर्याय नाही. हिंदुस्थानही याला अपवाद नाही. एका अर्थाने स्त्रियांच्या रक्तातील शौर्याचे निखारे राखेखाली राहून गेले होते. हिंदुस्थानाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये स्त्रिया अगदीच कमी आहेत किंवा होत्या असं नव्हतं. Combat services and Supervisory Rols (as officers) अर्थात युद्धसेवा आणि पर्यवेक्षकीय सेवांमध्ये अधिकारी या वर्गात स्त्रिया आहेतच. वायुदलात २०१८ मध्ये १३. ०९%, नौसेनेत ६% तर पायदळात ३. ८०% अशा संख्येने स्त्रिया सेनेला मदत करीत होत्या आणि आता ही संख्या वाढलीही असावी. २०२० पर्यंतच्या माहितीनुसार यातील तीन स्त्रिया वैद्यकीय शाखांतून लेफ्टनंट जनरल किंवा समकक्ष अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या होत्या. परंतू प्रत्यक्ष हाती शस्त्र धरलेल्या ८३ दुर्गा मे, २०२१ मध्ये भारतीय पायदळात दाखल झाल्या, त्या सैन्य-पोलिस या शाखेत….. जवान म्हणून! स्त्रियाही ‘जवान’ होऊ शकतात, हे आपल्या व्यवस्थेने उशीराने का होईना लक्षात घेतले, हे महत्त्वाचे. देशरक्षणार्थ हौतात्म्य पत्करलेल्या अनेक शूर अधिका-यांच्या पत्नी सैन्यदलात अधिकारी झाल्याच्या बातम्या हल्ली आपण वाचतोच.
स्त्रिया सैन्याचं नेतृत्व करू शकतात हा विचार हिंदुस्थानाने स्विकारला आणि २०२१ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सैन्याधिकारी प्रशिक्षणासाठी स्त्रियांसाठी १९ जागांना अनुमती दिली. यासाठी पुरूष उमेदवारांना असते तशीच कडक सैनिकी परीक्षा निर्धारीत करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून सुमारे दोन लाखांहून अधिक मुली एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देतात……. ही संख्या सुखद आहे!
आपल्या या कथेची नायिका २०२१ पासून या दोन लाखांतून एक होण्याच्या स्वप्नांत रममाण होती. प्रखर जिद्द, विविध विषयांचा रोजचा सुमारे दहा-बारा तास अभ्यास, शारीरिक क्षमता कायम ठेवण्यासाठी लहानपणापासून पहाटे लवकर उठून व्यवस्थित व्यायाम करण्याची आई-वडिलांनी रुजवलेली सवय या सर्वांचा गोड परिणाम म्हणून ही महाराष्ट्र कन्या यावर्षी स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एस. एस. बी.)ची मुलाखत आणि इतर सर्व चाचण्या पहिल्याच प्रयत्नात पार करून सुमारे चार-साडेचार लाख मुला-मुलींमध्ये देशात एकतिसावी आणि मुलींच्यात तिसरी आली!
घरापासून हाकेच्या अंतरावर असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तिथले रूबाबदार कडेट्स, आकाशात भरा-या मारणारी त्यांची विमाने, पासिंग आऊट परेडच्या सकाळी आकाशातून घोंगावून जाणारी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आता तिच्या दृष्टीपथात आली आहेत…….
दहावीच्या बोर्ड परीक्षेचं परीक्षा केंद्र म्हणून एन. डी. ए. खडकवासला च्या प्रवेशद्वारावर असलेल्या केंद्रीय विद्यालयात जाण्याचा योग येणं, तिथून आणि त्यानंतर झालेलं एन. डी. ए. चं दर्शन, तेथील कडेट्सचं खडतर प्रशिक्षण व शिक्षा, त्यांची रूबाबदार पण शिस्तबद्ध व्यक्तिमत्वं, तिथंच पदवीनंतर प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याचा मनाचा आधीचा निर्णय रद्द करून सैन्यदलात झालेला निर्णय… बारावीत शिकत असतानाच प्रवेशपरीक्षेची माहिती मिळताच स्वयंप्रेरणेने अर्ज भरणं….. आई-वडिलांनी तयारीसाठी भोपाळ सारख्या दूरवरच्या प्रशिक्षण वर्गासाठी जाण्याची परवानगी देणं….. हा प्रवास खडतर आहे.
प्रबोधिनीतून उत्तीर्ण होणा-या कडेटसचा पासिंग आऊट परेड सोहळा अत्यंत देखणा आणि स्फुर्तीदायक असतो. आपले भावी सैन्याधिकारी अभिमानाने पावलं टाकीत टाकीत प्रतिकात्मक असलेली अंतिम पग नावाची पायरी ओलांडून देशाच्या संरक्षण सेवेत दाखल होतात.
आणखी तीनेक वर्षांनी आपली ही कथानायिका सुद्धा या पथावरचं आपलं ‘अंतिम पग’ टाकेल आणि मराठी मातीतून हिंदुस्थानाच्या सीमेवर एक संरक्षक उभा ठाकेल…….!
महाराष्ट्रातल्या एन. डी. ए. मध्ये आता महाराष्ट्राने पाऊल ठेवलं आहे! १५०व्या प्रशिक्षण तुकडीच्या यादीत आता एक मराठी नाव, जुई ढगे, हे हि-यासारखे झळकते आहे!
कुणी लाखात एक आहे, असं म्हणलं जातं तेंव्हा या त्याने किंवा तिने इतर नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव लोकांना मागे टाकलेलं असतं. शारीरिक सौंदर्याच्या मापदंडाने लाखात एक असणारे तर अनेक असतात, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असं एकमेव आणि अद्वितीय होणं, ही खूप मोठी बाब ठरते! दोन लाखांतून पहिल्या एकोणीसात येणं म्हणजे एक लाख नव्व्याण्णव हजार नऊशे एक्क्याऐंशी जणींना मागे टाकून पुढे येणे……. आणि ते ही स्वत:च्या हिंमतीवर……. घराण्यात तशी पूर्वपिठिका अजिबात नसताना, आसपासच्या परिसरात तसं वातावरण नावालाही नसताना, या वयातली तरूणाई ‘जवान’ होण्याऐवजी बेगडी दुनियेत ‘बेभान’ धुंदीत, आंतरजालात कीटकांसारखी अडकून पडलेली असताना आणि भक्कम आर्थिक नसताना….. हे किती विशेष!
मध्यमवर्गीय नोकरदार असलेली आई प्रा. डॉ. मनिषा आणि एका प्रसिद्ध कारखान्यात सेवा करणारे वडील राजेंद्र ढगे व कुटुंबीय, पाठिंबा देणारी शाळा, शिक्षक, पालकांनी तिला खेळांत भवितव्य घडवता यावी यासाठी केलेली पदरमोड, खेळांतून निर्माण होणारी जिद्द, अपयशातून धडे घेत पुन्हा लक्ष्याचा वेध घेण्याची आंतरीक भावना, बारावीची बोर्ड परीक्षा डोक्यावर असतानाही केलेला अभ्यास, सुयोग्य प्रशिक्षण यांमुळे प्रा. डॉ. मनीषा यांची कन्या कुमारी जुई राजेंद्र ढगे ही आपली मुलगी आता सैन्याधिकारी होणार आहे……… महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो….. Cadet जुई! जयहिंद!
जुई राजेंद्र ढगे आता पुढील प्रशिक्षणासाठी जातील आणि अधिकारी होऊन देशाच्या सेवेत दाखल होतील….. जय महाराष्ट्र!