मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक, दोन राउंड घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसतात. संगीताचा खणखणीत आवाज लांबुनच कानी आला…

” इतकं गुण्यागोविंदानी शांततेत सगळं जग चाललं होतं तर… मी म्हणते कशाला भांडणं उकरून काढायची? “

” हो ग खरचं त्या ट्रम्पला युद्ध करायची काय गरज होती ?”

जया म्हणाली,

 ” त्यांचही काहीतरी कारण असेल ना?त्याशिवाय का कोणी युद्ध करेल.. ?

आज यांचा वेगळाच विषय ऐकून राऊंड न घेता मी तिकडेच गेले विचारलं,

” आज काय इराण अमेरिका विषय का?” 

” सध्याचा तोच ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच आज आम्ही त्याची चर्चा करत आहोत. ये.. “

मी त्यांच्या गप्पा ऐकायला बसले.

” माझ तर ठाम मत आहे.. ट्रम्प यांच चुकलंच… “

” म्हणजे तू इराणची बाजू घेणार आहेस का? “

“खरं म्हणजे मी तटस्थ भूमिकेत आहे. (हीच मत कोण विचारणार आहे देव जाणे… मनात म्हटलं..) माझं म्हणणं इतकंच आहे की युद्धानंतर होणारे भयानक विनाशकारी परिणाम विचारात घ्या. “

सुधाताई मध्येच म्हणाल्या,

“एकेकांना पट्ट्या मारून सरळ केलं पाहिजे”

” अहो पट्ट्या कसल्या मारताय ?ती काय शाळा आहे का ?मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड होऊन पंधरा वर्षे झाली तुम्हाला.. तरी अजून तीच शिक्षा सांगताय”

 ” तुम्हाला समजलं नाही.. मी प्रतिकात्मक बोलले. ज्याला जी भाषा समजते त्याला तसं उत्तर दिलं तरच त्याला ते समजते. “

मध्येच विनया म्हणाली,

” पंचमहाभूतातील जल आणि ही चराचर सृष्टी, ईश्वरानी सर्वांसाठी निर्माण केलेली आहे. अशा सखोल अध्यात्मिक विचारांची आपल्यासारखी त्यांना बैठक नाही. तिथे जाऊन कोणीतरी त्यांना हे शिकवायला पाहिजे. “

” हो ते पण खरं आहे. तुझं हे म्हणणं मात्र मला अगदी पटलं.. म्हणूनच शांततेत समाधान आहे.. हे त्यांना कळत नाही.

” मला तर वाटतं त्या होर्मुझ का काय सामुद्रधुनीतून जहाजांनी एकमेकांना वाट करून द्यायची. जरा कडेकडेनी जायचं.. जा बाबा तुम्ही जा.. आम्ही पण जातो. कोणी कोणत्या दिवशी जायचं आपापसात चर्चा करून ठरवून घ्यायचं. त्यासाठी युद्ध कशाला?”

“बरोबर आहे.. आणि एखादी गोष्ट करायचीच अस मनानी ठरवलं तर ती करता येते. “

” हो… आता रोजचच ऊदाहरण घे.. पुण्यात कसं आम्ही छोट्या गल्लीत.. कार, टेम्पो, रिक्षा, स्कूटर, शिवाय कडेला भाजीवाले, भेळ पाणीपुरीवाले असले तरी त्यातून वाट काढत जातो. “

निशा लगेच म्हणाली,

” याचं कसलं कौतुक.. तुम्ही पुणेकर कशाचाही अभिमान बाळगता. “

” निशा.. तुम्ही सोलापूरकर तर काही बोलूच नका. इतक्या वर्षात तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. पाच दिवसांनी तुमच्याकडे पाणी येतय”

विनिता म्हणाली,

” हो म्हणूनच तर पुढची पिढी पुण्यात राहायला येत आहे. “

” त्यांच्यामुळे इथल्या जागेचे भाव वाढले आहेत. पुढे या सर्वांना पाणी कसं पुरणार हीच चिंता आम्हाला आहे. “

आता यांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकदम जिल्हास्तरीयवर आली.

निशा म्हणाली,

” आमच्या सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, हुरडा तुम्हाला आवडतो. “

“अग पण त्याचा इथे काय संबंध?”

खरंतर कशाचाच.. कुणाचाही.. कसलाच.. संबंध नव्हता. या मैत्रिणी बागेत येतात. येऊन कुठलीही मतं मांडतात. घरी त्यांचं कोणी… ऐकत नाही. आणि यांच्याशी बोलायला घरी कुणाला वेळही नाही.

 इथं कसं मैत्रिणींशी काहीही बोलता येतं. वाट्टेल ती मतं मांडता येतात.

आपण सगळ्या विषयावर कसं बोलू शकतो असं… ऊगीच आपल मनाचं समाधान करून घेता येत… या सहज आनंदासाठी… खरंतर सगळ्याजणी इथे जमतात.

स्वाती इतका वेळ गप्प होती. ती एकदम उभीच राहिली. म्हणाली, “अगं आज संध्याकाळी मी कैरीची डाळ करून आणायचं ठरल आहे ना? ती भिजत घालायची आहे. आत्ता पाण्यात घातली तरच ती चांगली भिजेल. “

आता पाण्याची चर्चा एकदम वैयक्तिक पातळीवर आली.

 सगळ्या भानावर आल्या.

“हो ग पाच-सहा तास तरी भिजली पाहिजे “… असं एकजण म्हणाली

मी स्वातीला विचारले,

“कैरीची डाळ घेऊन कुठे जाणार आहेस?”

” अगं अनुकडे.. तिचे मिस्टर बेड रिडन आहेत. ती बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही चार पाच जणी अधून मधून तिच्याकडे जातो. गप्पा मारतो. तिचा दिवस चांगला जातो. “

संगीता म्हणाली,

” मी गोड करंज्या नेणार आहे. ती विचारत असते मी काय करू? वय झालं.. दमते ग.. बिचारी… म्हणून तिला सांगितल आहे.. तू फक्त पाणी दे. “

” आमची अगदी वाट पाहत असते.. चला निघू या”

” ए सोलापूरकर गुडघे दुखतात ना.. चालत जाऊ नको. मी गाडीवर सोडते तुला घरी. “

 दोघींनी तिचा हात धरला. सगळ्याजणी घरी निघाल्या.

खरचं मनात सामंजस्य, प्रेम, माया आपुलकी, आपलेपणा असला की अनेक प्रश्न सोडवता येतात…

ट्रंप साहेबांनी खरतर आमच्या मैत्रिणींशी बोलून त्यांचा सल्ला एकदा घेतला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय चर्चा करता करता सहजपणे रोजच्या जीवनातले प्रश्न सोडवणाऱ्या…

हातात हात घालून एकमेकींना आधार देत… घरी निघालेल्या या मैत्रिणींची मैत्री बघून माझ्या डोळ्यात आपोआप आलं… पाणी…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गीतांजलीतील कविता वाचत असताना कवी आणि देव यांच्या भावनिक नात्यांतील वैविध्यतेचे पदर जसजसे उलगडत जातात तसतसा एक प्रश्न वाचकांच्या मनात रुंजी घालू लागतो; तो म्हणजे या दोघांचं नातं तरी कोणतं आहे? आणि आश्चर्य म्हणजे हाच प्रश्न टागोरांना देखील पडतो. गीत क्र. ७७ मधे ते देवाला म्हणतात, “तू माझा कोण आहेस? पिता आहेस? बंधू आहेस? सखा आहेस? तू आहेस तरी कोण? समजा मी तुला पिता मानलं तर या नात्यातला जो आदर आहे तो मला तुझ्यापासून लांब ठेवेल. मग मी तुझ्याजवळ कसा येऊ? तुझा हात कसा धरू? तुला जर सखा मानलं तर मी कायमचा तुझ्याजवळ राहू शकणार नाही. तुला जर बंधू मानलं तर माझं जे संचित आहे त्यात तुला वाटणी द्यावी लागेल. ती कशी देऊ? शेवटी कवी म्हणतो मी तुला सरळ माझं जीवन समर्पित करतो. म्हणजे या नात्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही कारण मग मी तुझ्याशी एकरूप होऊन जाईन. ”

देव पिता म्हणून:-

ते देवाला पिता मानून प्रार्थना करतात की जिथे मनात भीती नसेल, मान ताठ असेल, जिथे ज्ञान मुक्त असेल, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात मला घेऊन चल. तिथे सत्य, शांती, प्रेम, अहिंसा यांचेच राज्य असेल. (गीत ३५)

देव माता म्हणून:-

ते देवाला माता मानतात. त्यांना मातेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होते. पण त्यांच्या लक्षात येतं की, सुख, आनंद, कीर्ती, संपत्ती या गोष्टी तर तिनेच दिल्या आहेत. त्याच तिला कशा परत द्यायच्या. त्यामुळे ते म्हणतात, माझ्या दुःखावर फक्त माझी सत्ता आहे. म्हणून त्या दुःखाश्रूंची माळच मी तुला वाहीन. ती तुझ्या वक्षावर रूळत राहील आणि तुझ्या हृदयाशी हितगुज करेल. (गीत ८३)

देव बालक म्हणून:-

त्यांना कधी कधी देव हा बालकाच्या रूपातही दिसतो. कवीने सागर किनारी वाळूत खेळणाऱ्या बालकांना वैश्विकरूप दिले आहे. त्या बालकांच्या निरागसपणात कवीला देव दिसतो. बालकांच्या हास्यात, नृत्यात, गोबऱ्या गालात त्यांना देवाची किमया दिसते, निसर्ग दिसतो आणि तो सर्व व्यापी परमेश्वर भेटतो. (गीत ६०, ६१)

देव पती म्हणून:-

मधुरा भक्ती ही आपल्या अध्यात्मात महत्त्वाची मानली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभू! या भक्तीमध्ये देव प्रियकर म्हणजे जोडीदार असतो. कवी स्वतः पत्नीच्या भूमिकेत जाऊन प्रियकराच्या रूपात देवाला पाहतो. या कवितेत (गीत ५२) कवीला म्हणजे पत्नीला वाटतं प्रियकराच्या गळ्यात असणारा हार खूप सुंदर आहे. पण त्याला विचारायचं कसं, देतोस कां म्हणून? पण सकाळ झाल्यावर तिला वाटतं तो आपल्यासाठी काहीतरी आठवण म्हणून नक्की ठेवून जाईल. तो जाता क्षणी ती धावत शेजेकडे येते. निदान एखादं फूल, निदान फुलाची‌ पाकळी ठेवून जाईल. प्रत्यक्ष पाहते तो एक तळपणारी तलवार ठेवलेली असते. प्रेयसी/पत्नी (म्हणजे कवी) खूप घाबरते. पण तिच्या लक्षात येतं की ज्याअर्थी प्रियकराने दिलेली वस्तू आहे त्या अर्थी त्यामागे काहीतरी त्याचा उद्देश असेल. या तलवारीने आता आपल्याला पाश तोडण्याची भीती वाटणार नाही आणि एकदा पाश तोडले की आपण आपलं सगळं आयुष्य त्याच्यावर ओवाळून टाकू शकतो. तोपर्यंत ही तलवार जपून ठेवायला हवी.

(अपूर्ण, पुढील भागात)

—–

गीत : ८८

DEITY of the ruined temple! The broken strings of Vina sing no more your praise. The

bells in the evening proclaim not your time of worship. The air is still and silent about you.

In your desolate dwelling comes the vagrant spring breeze. It brings the tidings of

flowers ⎯ the flowers that for your worship are offered no more.

Your worshipper of old wanders ever longing for favour still refused. In the eventide, when fires and shadows mingle with the gloom of dust, he wearily comes back to the ruined temple with hunger in his heart.

Many a festival day comes to you in silence, deity of the ruined temple. Many a night of worship goes away with lamp unlit.

Many new images are built by masters of cunning art and carried to the holy stream of

oblivion when their time is come.

Only the deity of the ruined temple remains unworshipped in deathless neglect.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ८८

तुटल्या तारा अन् भग्न वीणा।

इथे न भाकित कोणी करूणा॥

*

पूजन, अर्चन कधी नसे जरी।

सहजच कोणी घंटानाद करी॥

*

भग्न तुझ्या या मंदिरी निर्जन।

उनाड वारा, बनुनी सज्जन॥

*

पुष्पांचा गंधीत निरोप आणी।

जी नच पडली तुझिया चरणी॥

*

जो होता कधी तुझा पुजारी।

कृपाप्रसादा वंचित तो मुरारी॥

*

मनःशांती त्या कुठे मिळेना।

म्हणुनि येई तुझिया स्तवना॥

*

येई परतुनि तो भग्न मंदिरी।

घेऊनि तशीच आर्तता उरी॥

*

संध्याप्रकाश अन् छाया जेंव्हा।

मिसळत धूलीकणांशी तेंव्हा॥

*

असो दिवाळी, दसरा, होळी।

कुणी न दर्शना ये वेळोवेळी॥

*

काळोख्या रात्री अंधारातून।

कोणी न लावी समई परतून॥

*

लबाड, व्यवहारी लोकांनी।

मंदिरे निर्मिली, जुनी त्यागुनि॥

*

विस्मरतील सारे, ती ही नंतर।

दुर्लक्षाचे दुर्लक्षित अंतर॥

*

भग्न न होई पुन्हा, भग्न ते।

मृतास पुन्हा, मरण न येते॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत : ८९

NO more noisy, loud words from me ⎯ such is my master’s will. Henceforth I deal in

whispers. The speech of my heart will be carried on in murmurings of a song.

Men hasten to the King’s market. All the buyers and sellers are there. But I have my

untimely leave in the middle of the day, in the thick of work.

Let then the flowers come out in my garden, though it is not their time and let the midday bees strike up their lazy hum.

Full many an hour have I spent in the strife of the good and the evil, but now it is the

pleasure of my playmate of the empty days to draw my heart on to him; and I know not why is this sudden call to what useless inconsequence!

—–

मराठी भावानुवाद : गीत : ८९

हळुवार सुरांनी, गाईन गाणी

बोल हृदीचे, गीतात गुणगुणी॥

*

नित्यच येथे चाले, देणे घेणे

मी परि जाईन, येता बोलावणे॥

*

ऐनपणाच्या भरात असता

साद तयाची, कानी घुमता॥

*

वसंत नसता, फुले फुलावी

मधु त्यातला, भ्रमरा खुणवी॥

*

काळ जातो, भल्याबुर्‍या कलही

सखा सौंगडी, भेटो लवलाही॥

*

असे अचानक त्याचे बोलवणे

असो सार्थ वा अर्थहीन भेटणे॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत ९०

ON the day when death will knock at thy door what wilt thou offer to him?

Oh, I will set before my guest the full vessel of my life ⎯ I will never let him go with empty hands.

All the sweet vintage of all my autumn days and summer nights, all the earnings and gleanings of my busy life will I place before him at the close of my days when death will knock at my door.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९०

पुसे मज आज, सखा पांडुरंग।

पाहुणा यमासम, येता दारी सांग॥

*

करिसि का स्वागता, तुझ्या घरी।

दडपुनि दार का, पाठवी माघारी॥

*

शिकवण हीच, देई मम संस्कृती।

पाहुणा न जाये, रिकाम्या हाती॥

*

दिस शरदाचे, ग्रीष्मातल्या रात्री।

गोड समजुनी, वाढीन मी पात्री॥

*

ठेवीन सामोरी आयुष्याचा पेला। 

कमाई नि कोठी देईन त्याजला॥

*

मृत्यूचे दूत, माझ्या दारी आले।

स्वागता तयांच्या, प्राण माझे दिले॥

*

– क्रमशः भाग ३०

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

 बकुळीची फुले वेचतांना कविता आठवते…

 या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया

 बकुळीचा गजरा आणि बकुळीचा अत्तर मला फार आवडत.

पहाट होताच मंद धुंद वाऱ्यातून एक एक पाकळी उमले चराचरात

 रंगमार्दव पिवळसर हिरवा

भ्रमरही भिरभिरती चाखावया मधुर मकरंद

कधीन हिरमुसता फुले फुलती *

 गंधीत व्हावी दुःखे अवघी

 रहावी सुखा सवे आनंदी

 

 ओच्यात वेचता नाजूक फुले

 ओंजळीत घेता गंधाने वेडावे मन

मोत्या सम नाजूक फुले सुरेख 

एकेक फूल ओवताना

बहरात येई गजरा

 जपून मनाच्या कुपीत त्याचा गंध

लावे त्याचा तो वेगळाच छंद

येता सर पहिली पावसाची बकुळही मोहरे भरभरून

राधा ही वाट पाहे माधव देईल मज कधी फुल

नाजूक पाकळीत वाटे नक्षत्र अवतरले धरेवर

बहरतो बारमाही, औषधीय गुणधर्म आयुर्वेदात

बारमाही फुलणारं औषधीय गुणधर्माचं आणि पावसाळ्यात अधिकच भरणार बकुळ.

या फुलाला मराठीत बकुळी मालवणी मध्ये ओवळा कोकणी ओमवाल अस म्हणतात तर हिंदीत मौलसरी, बंगाली बकुल, गुजराती बरसोळी तामिळ मगिळहंबू, आदिवासी वोवळ, कानडी मध्ये रंजक, मल्याळम इळन्नी, उर्दू किराकुली.

बकुळ वृक्ष 

बकुळीची फुले त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत मुलांना ही फुले गोळा करायचा छंद असतो त्याचबरोबर धार्मिक ग्रंथात या वृक्षाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे रामायण महाभारत यामध्ये याचे उल्लेख आहेतच पण बुद्ध, जैन धर्मीय सुद्धा या वृक्षाला पवित्र मानतात बकुळीची फुले सुकली तरी त्याचा सुगंध टिकून राहतो तसेच आकारही फारसा बदलत नाही.

हा वृक्ष मूळचा भारतीय उपखंडातील असून ऑस्ट्रेलिया मध्ये ही आढळतो साधारण पाणथळ जागा सोडल्यास उष्णकटिबंधात याची चांगली वाढ होते याचे वनस्पतीशास्त्रीय नाव Minusops elengi linn असून कुळ नाव Sapotaceae आहे इतर नावे बकुल, बोलसरी, चिरपुष्प, ओवळी, इंडियन मेडलर, बुलेट वूड इत्यादी आहेत हा वृक्ष सदाहरित असून 30 ते 50 फूट उंच वाढतो खोड गोलाकार गुळगुळीत असते फांद्या गोलाकार पसरतात पाने चकचकीत हिरव्या रंगाची असतात पाने एक आड एक अशी येतात सुमारे दोन ते चार इंच लांब तर एक ते तीन इंच रुंदीची असून लांबट टोकदार असतात फुले मळकट पांढऱ्या रंगाची असून गोलाकार असतात आतला पुष्प मुगुट उठून दिसतो फुले आकर्षक सुगंधी असतात फळे लांबट गोल मासाल असतात त्यांचा रंग भगवा पिवळा असतो फुले व फळे साधारण जानेवारी ते जुलै या कालावधीत येतात फळे खाण्यासाठी वापरतात त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत फळे चवीला तुरट गोड असतात 

या वृक्षाचे अनेक औषधी उपयोग आहेत दंतविकार, वेदना नाशक, ज्वरनाशक, डांग्या खोकला, आव या विकारांमध्ये या वनस्पती पासून औषधे बनवली जातात तसेच फुलांपासून अत्तर बनविले जाते तसेच फुलांपासून हार व गजरे बनवितात लाकूड टणक टिकाऊ असल्यामुळे बांधकामात त्याचा वापर केला जातो दाट सावली व सुगंधी फुले यामुळे हा वृक्ष मंदिर, बागा, तसेच सावलीसाठी रस्त्याच्या कडेला लावला जातो अशा आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेला हा वृक्ष.

लेखिका : सुचिता पाटील

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “क्षणांचे सोने…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “क्षणांचे सोने… – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते, तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खूश असतो. दोन मुली असल्या तरी खूश असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो…

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

  ★★★

लेखक:पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ योगाभ्यास : एक मानसोपचार… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

प्रतिभा संतोष पोरे 

 

☆ योगाभ्यास : एक मानसोपचार…  ☆ प्रतिभा संतोष पोरे ☆

भारत देशास सुवर्णभूमी असे म्हणत याचे कारण म्हणजे देशातील सोन्याच्या खाणी नव्हेत तर भारतात असणारी नराला नारायण बनवणारी ग्रंथसंपदा होय. न्याय, मीमांसा, सांख्य, योग यासारखी शास्त्र किंवा दर्शन होय. भारताचे मानव जातीला सर्वात मोठे कोणते योगदान

असेल तर ते म्हणजे योगशास्त्र होय. योगशास्त्र म्हणजे जीवन- विज्ञान. जीवन जगण्याचे शास्त्र. ५००० वर्षापूर्वी ऋषीमुनींनी आपल्या दिव्य आकलन शक्ती, बुद्धीमत्ता, दूरदृष्टी आणि तपश्चर्येने विकसित केलेले योगशास्त्र आजच्या ताणतणावांच्या, संघर्षमय जीवनातही अत्यंत उपयोगी ठरत आहे. आज संपूर्ण जगात भारताकडे आदराने बघण्याचा दृष्टीकोन दिसत आहे हीच गोष्ट योगाची क्षमता योग्यता सिद्ध होण्यास पुरेशी आहे.

आजकाल हार्ट अ‍ॅटॅकने जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बीपी, शुगरचे पेशंट घरोघरी आहेत. या शारीरिक आजारांवर नियंत्रण करायचे असेल किंवा होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय करायचे असतील तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. योगासन, प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने आपणास निरामय आरोग्य निश्चितच लाभते. आपला आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमतादेखील वाढते.

आज काल चंगळवादी जीवनशैलीत माणसाकडे कितीही वस्तू असल्या तरी तो असमाधानी व अशांत आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही पातळींचा समतोल बिघडल्यामुळे तो अनेक मनोविकारांना बळी पडत आहे. मानसिक विकारांचा विळखा जगभरातील सर्वच लोकांभोवती पडत आहे. विकसित देशांमध्ये मानसिक विकार आणि पीडित लोकांचे प्रमाण भयावह आहे. सर्व भौतिक सुखं प्राप्त झाली म्हणजे मला आनंद व शांती मिळेल हा केवळ भ्रम आहे, हे आज लोकांना पटू लागले आहे. दरवर्षी जगभरातील आठ दशलक्ष मृत्यू मानसिक विकारांमुळे होतात. कॅलिफोर्निया ३९६००० तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. भारतात १९. ७% म्हणजेच वीस कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. त्यापैकी ४. ६ कोटी लोक नैराश्याने (डिप्रेशन) तर ४. ५ कोटी लोक अँक्झायटीने ग्रासले आहेत असा निष्कर्ष इंडिया स्टेट लेवल डिसीज बर्डन इनिशिएटिव्हने काढला आहे. जर तुम्ही तुमच्या शारीरिक फिटनेस बाबत जागरूक असाल आणि मानसिक आरोग्याचा विचार जराही करत नसाल तर आता तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हे सुचित करण्याचे कारण म्हणजे भारतात दर सात व्यक्तींमागे एक व्यक्ती मानसिक आजाराने ग्रासली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झाली आहे. जगातील निम्मी लोकसंख्या मानसिक विकार अनुभवेल असे भाकीत हार्वर्ड मेडिकल स्कूल ने केले आहे.

मानसिक विकारांची यादीही भरपूर मोठी आहे. भिती वाटणे(फोबिया), अँक्झायटी डिसऑर्डर, बाॅडी डिसमार्फिक डिसऑर्डर, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, व्यसनाधीनता, डिप्रेशन इ. यामध्ये रुग्ण मनोरंजन, छंद, सामाजिक संवादामध्ये सारस्य किंवा आनंद गमावतो. भूक, झोप खूपच जास्त लागते किंवा फारच कमी होते. लक्ष केंद्रित करणे किंवा एखादा निर्णय घेता येत नाही. संवाद टाळणे, कुटुंबापासून स्वतःला वेगळे करणे, उदासीनता येते त्यामुळे डोकेदुखी पोटदुखी हे आजार बळावतात. मृत्यूचे किंवा आत्महत्येचे विचार सतत मनात येतात.

हे मनोविकार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये आढळत आहेत. मनोविकारांवर वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. आपल्या मनातील चिंता, दुःख, राग या भावना आपल्या मेंदूतील लिम्बिक सिस्टीम मधल्या मज्जापेशींच्या उत्तेजित अवस्थेमुळे तयार होतात. याला मेंदूतील संदेश वाहक रसायने कारणीभूत असतात. सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाईन आणि गॅमा अमिनो ब्यूट्रिक ऍसिड (गाबा) ही मुख्य चार संदेश वाहक रसायने आहेत. ही रसायनं तयार होण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले की भूक न लागणे, झोप न येणे, नकारात्मक विचार वाढणे, चिडचिड वाढणे, इत्यादी अनेक दुष्परिणाम होतात आणि यामुळे मानसिक विकार बळावतात. यावर उपाय म्हणून डॉक्टर या रसायनांची पातळी वाढवणारी किंवा कमी करणारी व्हॅलियम, ऍटिव्हॅन वगैरे औषधे देतात. इतर काही मनोविकारांवर अँटिसायकॅटिक, अँन्टीडिप्रेसंट्स, अँन्टीअँक्झायटी अशी औषधे दिली जातात. या औषधांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. हे साईड इफेक्ट फार भयानकही असतात. औषधांबरोबरच डॉक्टर वेगवेगळ्या उपचार पद्धती सायकोथेरपी, बिहेवियरल थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, (सीबीटी), इलेक्ट्रोकन्व्हलसिव्ह थेरपी वापरतात. पण सर्वात महत्त्वाची परिणामकारक थेरपी म्हणजे योग थेरपी होय.

अजिंक्य आणि बलवान धनुर्धारी अर्जुन समोरील आप्तस्वकीयांना कसे मारू या चिंतेने अस्वस्थ झाला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समुपदेशन करून श्रीमद्भगवद्गीता सांगून अर्जुनाला भयमुक्त व चिंतामुक्त केले आहे.

योगो भवती दुःखहा म्हणजे योगामुळे सर्व दुःखांचा नाश होऊ शकतो. असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की योग हा फक्त शारीरिक व्याधी निवारण्यासाठी किंवा स्थूलता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु तसे नाही. योग हा मनाच्या क्रियेशी संबंधित आहे. योगामुळे मनाची एकाग्रता तर वाढतेच पण मनाचे संतुलन आणि मनःशांती यांचा लाभ होऊन आरोग्यही चांगले राहते. योग साधला तर माणसात शारीरिक व मानसिक कार्यक्षमता निर्माण होते. योगाभ्यासामुळे चिरंतन आनंद, परिपूर्णता व शांती यांचा लाभ होतो. मन ही आत्मशक्ती असून या मनातूनच परमेश्वर विश्व आकारतो. मन अत्यंत सूक्ष्म शक्तीतून बनले आहे. प्राणाची कंपने या मनावर उमटतात आणि विचारांची निर्मिती होते. अशा विचारांचे ठसे मनावर उमटत राहतात. मनावरील राग, लोभ, द्वेष, अहंकार, लालसा या तरंगांमुळेच मन कायम अशांत असते. ज्याचा आपण अतिशय विचार करतो त्याचेच रूप मन धारण करते हा मानसशास्त्रीय नियम आहे. सर्व इंद्रिये ही सैनिक असून त्यांच्यावर नियंत्रण करणारा सेनापती हे मन आहे. मनोविकार झालेल्या रुग्णांचे मन अतिशय दुर्बल झालेले असते. बुद्धीचा त्यावर ताबा रहात नाही म्हणूनच मनावर ताबा मिळवणे गरजेचे असते.

शरीर व मन यांना जोडणारा धागा म्हणजे प्राण होय. म्हणूनच प्राणावर ताबा मिळवला तर मनावर ताबा मिळवणे शक्य होते. जीवनाचे तत्व ऊर्जा शक्ती म्हणजेच प्राण होय. डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ या ज्ञानेन्द्रियांचे काम, शरीरातील पचन, रक्ताभिसरण, पोषण, श्वासोच्छ्वास ही सर्व कार्ये प्राण शक्तीमुळेच चालतात. चेहऱ्यावरील हसू, संगीतातील माधुर्य, बोलण्यातील गोडवा, डोळ्यातील चमक हे सर्व प्राणशक्तीनेच होते म्हणूनच जर प्राणावर काबू मिळवला तर सहजपणे मनावर ताबा मिळवता येऊ शकतो. ज्ञानतंतूतील प्रवाह व विचारशक्ती हे देखील प्राणाचे प्रकटीकरण आहे. श्वास हे प्राणाचे बाह्यरूप आहे. म्हणून श्वासावर नियंत्रण ठेवले की प्राणावर ताबा मिळवता येतो व प्राणावर ताबा मिळवला तर मनावर ताबा मिळवता येतो. म्हणून श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. प्राणायामाच्या सरावाने मनाचा समतोल ठेवण्यास मदत होते.

योग सायकॉलॉजी ही एक शाखा आता जोर धरायला लागली आहे. या शाखेतल्या विषयाची मुळं प्राचीन भारतातल्या ज्ञानावर आधारित आहेत. योगाचे वर्णन ऋग्वेदात व अथर्ववेदात केलेले आहे. मात्र योगाचे सर्वात शिस्तबद्ध संकलन महर्षी पतंजलीच्या योगसूत्रात आहे. मानसशास्त्रीय थेरपीज मध्ये योग सूत्रांचा वापर होऊ शकतो का? यावर सध्या संशोधन सुरू झाले आहे. काही मनोविकारांवर योगशास्त्रांचा हमखास उपयोग होतो.

आपल्या मनातील चिंता, दुःख, राग या भावना मेंदूतील रसायन सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाईन आणि गाबा यांच्याशी निगडित असतात. योगासन व प्राणायाम करण्याने या रसायनांचा समतोल राखला जातो रुग्ण पूर्ववत आनंदी व प्रसन्न होऊन सामान्य जीवन जगू शकतो.

मनोविकार असणारा रुग्ण जर स्वतःची दैनंदिन कामे करीत असेल आणि त्याने औषधांसोबत योगाभ्यास केला तर तो निश्चितच लवकर बरा होऊ शकतो. प्राणधारणा, कपालभाती, उज्जायी, अनुलोम विलोम आणि ओंकार इत्यादी प्राणायाम नियमितपणे केल्यास फायदा होतो. त्याचबरोबर रुग्णांनी शक्य असेल तर त्याच्या क्षमतेनुसार शवासन, मकरासन, कटिवक्रासन, भुजंगासन, नौकासन, ताडासन, पवन मुक्तासन, पर्वतासन इत्यादी असने करावयास हरकत नाही परंतु हा सर्व अभ्यास योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. काही मनोविकारांमध्ये योगनिद्रा ही फार महत्त्वाची ठरते. धारणा, ध्यान याही गोष्टींचा मनोविकारांमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.

मनोविकार न झालेल्या व्यक्तींना ते होऊ नयेत व आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा तसेच शारीरिक आजारांवर नियंत्रण ठेवून निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. नव्हे ही तर सध्याच्या काळाची नितांत गरज आहे. म्हणूनच चला, योगाकडे वळूया, योगाभ्यास करूया.

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः।

सर्वे भद्राणि पश्यंतु, माकश्चिद् दुःखभागभवेत्।।

© प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी

मानवी तृष्णेची तहान शमवणारी कथा.

अनादी कालापासून माणसाला मृत्यूबद्दलचे भय आणि आकर्षण दोन्हीही वाटत आले आहे. या भयावर मात करण्यासाठी त्याने सतत नाना प्रकारच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तथापि मृत्यूचे वास्तव हे या सगळ्याला कायमच आव्हान देत आले आहे. या आव्हानाला उत्तमरीत्या प्रतिसाद देणारी कथा म्हणजे वटसावित्रीची कथा. त्यामुळे या कथेतल्या सावित्रीबद्दल, तिने मागितलेल्या वरांबद्दल आणि एकूणच यमाबद्दल एक उत्सुकता मनात निर्माण झाली. त्या उत्सुकतेतून ही कथा पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह झाला. आणि प्रत्येक वेळी त्याच्यात काय नवीन सापडते हे स्वतःशीच पडताळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून गवसत गेलेल्या काही गोष्टी.

काही कथा काल्पनिक का खऱ्या या वादाच्या पलीकडे असतात. त्यांचं मूल्य कथा म्हणून स्वतःला सिद्ध करणं हे नसून त्यामध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टीचा विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. वटसावित्रीची कथा ही यापैकीच एक महत्त्वाची वाटते. याचं कारण या गोष्टीत असणाऱ्या मृत्यूच्या अनेक छटा…

साधारणपणे मृत्यू म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे शारीरिक मृत्यू हा चटकन येतो. परंतु मृत्यू हा शरीरापर्यंत पोहोचण्याआधीही अनेक पातळीवर मानसिकदृष्ट्या पोहोचलेला असतो. जसं की राज्य नसणं हा एखाद्या राजासाठी आणि राजकुमार म्हणून गणल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणावरती मानसिकदृष्ट्या मृत्यूच असतो. आपले सर्व राजभोग, राज कर्तव्य सोडून एखाद्या वनामध्ये अत्यंत सामान्य पातळीवरील जीवन जगावं लागणं. हा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा अक्षमता दाखवणारा, मृतवत अवस्था निर्माण करणाराच प्रसंग आहे. एक प्रकारे तो मृत्यूच आहे.

इथे हा राजा अंध दाखवलेला आहे. अंधत्व हे सुद्धा फक्त दृष्टी पूर्ती मर्यादित नसून संकुचित दृष्टी किंवा अज्ञानाची दृष्टी या अर्थाने सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून एखाद्या राजाचं राज्य नष्ट होण्यामागे त्याची संकुचित वृत्ती किंवा त्याचं अज्ञान हे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असणे ही गोष्ट मान्य करावी लागेल. आणि त्याबाबतीतला अंधत्व हे तर राजाकडे होतं ते अंधत्व दूर करण्याची थोडक्यात त्याबाबतीत ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा, वर सावित्रीने यमाला मागितला. म्हणजे इथे राज्यप्राप्तीसाठीचा राज्य चालवण्यासाठीचा जो दृष्टिकोन, आवश्यक ती क्षमता लागते तिची प्राप्ती ही महत्त्वाची आहे. ती सावित्रीने मिळवली म्हणजे मृत्यूची एक छटा सामर्थ्यहीनता यावर मिळवलेला विजय आहे.

त्यानंतर आपल्या सासू-सासर्‍यांसाठी तिने मागितलेले आणखीन पुत्रांचे वरदान म्हणजे साम्राज्यविस्तारासाठी लागणारे शारीरिक, मानसिक सामर्थ्यशाली जीवांची वृद्धी आहे. ज्या वेळेला सासू-सासरे ज्ञानाने सामर्थ्याने युक्त होतील त्यानंतर त्यांचे होणारे पुत्र हे हे देखील त्याचे प्रतीक असतील. आणि त्यांची जेव्हा वाढ होईल संख्यात्मक दृष्टीने गुणात्मक दृष्ट्या तेव्हा ते साम्राज्य विस्तार पावेल यात शंकाच नाही. म्हणजे अशा अर्थाने साम्राज्याचा संकुचिकरण होण्याचा किंवा पुन्हा ते हातून न जाऊ देण्याचा विजय हा देखील तिने मागितला.

आणि सरते शेवटी स्वतःला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागून ते साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष सत्यवानाला पुनर्जन्म मिळाला. यातून सावित्रीने पुन्हा एकदा चैतन्यमय तेजस्वी आनंददायी आणि धर्माधिष्ठित जीवनाची निवड केली. ज्या वेळेला राजा तसे पुत्र हे सर्व धर्माधिष्ठित जीवन जगतील त्यावेळेला ते  राज्य तेथील, वातावरण, तेथील इतरेजन यांचे जीवन देखील  सर्वच दृष्ट्या उन्नत ठरणारे असेल. थोडक्यात एका वरातून सावित्रीने संपूर्ण राज्याची तेही सामर्थ्यवान आणि नीतीवान राज्याची  पायाभरणी केली.

हा सर्व प्रसंग वटवृक्षाच्या झाडाखाली झाला म्हणून आज वटवृक्षाचे महत्व. परंतु वटवृक्षाचे आधीच पुराणातही पुष्कळ महत्त्व आहे. मुळात हा वृक्ष आपल्या पारंब्यातूनही पुन्हा नवनिर्मितीची क्षमता धारण करतो. म्हणजे या वृक्षातच मुळात अजेय राहण्याची वृत्ती आहे. विस्ताराचा ध्यास आहे. आणि अनेकांना आश्रय देण्याची क्षमताही आहे. थोडक्यात एखाद्या राजाला किंवा एखाद्या मनुष्याला ज्याप्रमाणे आपल्या वंश विस्ताराची किंवा साम्राज्यवाढीची इच्छा असते तशीच काहीशी इच्छा धारण करणारा वृक्ष आहे. असे सगळे साधर्म्य साधणारे योग या कथेत जुळून आले आहेत.

त्यामुळे सर्वच प्रकारच्या मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची  प्रगाढ ज्ञानाची आणि विश्वासाची ही कथा आहे असं मला वाटते. जे लोक अधिक अभ्यासक आणि जाणकार असतील ते आणखीनही शोधतील. पण एकंदरी कथा मानवी तृष्णेची तहान शमवणारी आहे यात शंका नाही.

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अशीही एक वटपौर्णिमा…” ☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆

मुक्ता महेश अभ्यंकर

??

“अशीही एक वटपौर्णिमा☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.

माझ्या लग्नानंतर आम्ही पवना नगरला राहत होतो तेव्हा माझी लग्नानंतरची वटपौर्णिमा होती. अगदी मराठी सिनेमात दाखवतात तशी मी आठ दहा सुवासिनीं बरोबर वडाची पूजा केली होती.

त्या नंतरच्या वर्षी माहेरी वटपौर्णिमेला जायचा योग आला. नुकत्याच लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणी बरोबर गणपती मंदिरात वडाची पूजा करायला गेले.

मंदिरात पूजेसाठी खूप बायका आल्या होत्या. मंदिरा बाहेर पाच फळांचा वाटा घेऊन विक्रेते व फुलवाले बसले होते.

मंदिराच्या आत पूजेसाठी खूप सारे गुरुजी होते.

मंदिराच्या परिसरातील वडाच्या झाडाभोवताली भरजरी साड्या नेसून असतील तेवढे दागिने घालून सुवासिनींनी गर्दी केली होती.

काही सुवासिनी गुरुजींच्या सल्ल्याप्रमाणे पूजा करत होत्या. नंतर नंतर वडाभोवती पांढरा धागा गुंडाळायला गोंधळ उडाला. आपला धागा कुठला हे ही कळेनासे झाले होते. हातात येईल तो धागा बायका वडा भोवतली गुंडाळून कशीबशी प्रदक्षिणा पूर्ण करत होते. पूजेसाठी इतकी गर्दी झाली की नंतर नंतर मोठ्या रांगा कराव्या लागल्या व फावल्या वेळेत बायकांच्या गप्पा सुरू झाल्या.

त्या मोकळ्या वेळेत बायका आपल्या घरच्यांबद्दल बोलू लागल्या. खूप जणी घरात होणाऱ्या मतभेदांबद्दल सांगत होत्या. त्यातील काही जणी आपल्या सासरी होणाऱ्या त्रासा बद्दल सांगत होत्या.

काही जणींना आपल्या पती कडून योग्य मान ही मिळत नव्हता तरीही त्या पूजेसाठी आल्या होत्या. एक जन्म ही ज्याच्या बरोबर सुखाने राहू शकत नाही त्याच्या बरोबर सात जन्माची सोबत मिळण्याची पूजा करायला आल्या होत्या. सुवासिनी एकमेकांना जी फळे देत होत्या ती फळे खूप कोवळी आणि खाण्यालायक ही नव्हती.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर जायला मिळायचे नाही पुजेच्या निमित्ताने बाहेर जाऊन लोकांना भेटणे ह्या उद्देशाने सण वार साजरे करण्यात यायचे.

हल्ली पण वडाची फांदी तोडून सुवासिनी एकत्र जमून पूजा करतात तर काही वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरा करतात. पण आता त्याच्या कडे एक इव्हेंट म्हणून बघितले जाते. रिल्स बनवणे स्टेट्स सारा दिखावा.

खरं तर नवरा-बायकोचे नाते विश्वास, आदर, प्रेम आणि मैत्री या पायावर आधारित असावे. दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेऊन, सुख-दुःखात एकमेकांना खंबीरपणे साथ देणे हे एक सुखी वैवाहिक आयुष्याचे गमक आहे. असे झाले तर खरी वटपौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल असे मला वाटते.

©  मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तो गजराज अजून जिवंत आहे…  – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ तो गजराज अजून जिवंत आहे…  – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पंचवटीतला फोन खणखणला, समोरून कुठल्यातरी वृत्तपत्राचा पत्रकार बोलत होता, विचारणा झाली ‘ग. दि. माडगूळकर’ यांचे निधन झाले ही बातमी खरी आहे का? . फोन उचलणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वतः गदिमा होते! . स्वतःची मरणवार्ता स्वतःच ऐकत होते. मंगरुळकर, माडखोलकर अथवा मंगुडकर नावाच्या एका कवींचे निधन झाले होते, नाव साधर्म्यामुळे ‘कविवर्य माडगूळकर’ यांचे निधन झाले अशी वार्ता पसरली होती. गदिमा नुकतेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून सावरत होते, त्यात पुण्यातील साहित्य संमेलनातील दुर्गाबाई भागवत यांच्या अनाठायी टीकेमुळे ते व्यस्थित होते, त्यातूनच त्यांच्या लेखणीतून झरझर कविता कागदावर उतरली… “तो गजराज अजून जिवंत आहे…

☆ तो गजराज अजून जिवंत आहे ☆

तो गजराज अजून जिवंत आहे

आपल्याविषयी,

अशा अफवा का अकारण पिकतात,

याचीच त्याला खंत आहे.

त्याचा देह पहाडासारखा.

रंग आकाशीच्या आषाढासारखा.

त्याचा एकेक दात दधिचीच्या हाडासारखा.

दृष्टी गरुडासारखी.

कान,

अनाहत ऐकतील असे,

शक्तिशाली.

त्याचे पाऊलच मोठे 

म्हणून चाल संथ आहे.

तो गजराज अजून जिवंत आहे.

 

वाऱ्यावर वार्ता वावरत होत्या,

की 

अपघाती मरणाने तो मेला.

कोणा एका अवघड घाटातल्या,

वानरांच्या वेडावण्याने,

त्याचा तोल गेला.

तो बावचळला.

खोल खोल,

दरीत खाली कोसळला.

त्याचे गंडस्थल फुटले.

कान फाटले.

दात तुटले.

दरीच्या गवताळ तळात,

रक्ताच्या थारोळ्यात,

त्याचे गवसले,

केवळ कलेवर.

 

असत्य,

पांढरे स्वच्छ असत्य.

त्याच्या जितेपणी त्याने त्याची,

मरणवार्ता ऐकली (लोकोक्तीनुसार) 

त्याचे आयुष्य अनंत आहे.

तो गजराज अजून जिवंत आहे.

 

एक सत्य, की 

अथांग अरण्यात मनसोक्त हिंडणारा 

तो चतुर चतुष्पाद,

एका कसरतीच्या खेळात,

शिक्षिका शिकविल तसे वागतो.

रिंगणातल्या रिंगणातच स्वातंत्र्य भोगतो.

त्याच्या चिटुकल्या डोळ्यात 

एक अनामिक अग्नी मात्र ज्वलंत आहे.

तो गजराज अजून जिवंत आहे.

┉❀꧁꧂❀┉

कवी : श्री. ग. दि. माडगूळकर

 (पूरिया काव्यसंग्रहातून)

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सिनेमा, क्रिकेट, राजकारण… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

सिनेमा, क्रिकेट, राजकारण… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

एक गोष्ट मला कधीच समजली नाही की…

चित्रपटांतील अभिनेते किंवा अभिनेत्री असे नेमके काय काम करतात की त्यांना एका चित्रपटासाठी ५० किंवा १०० कोटी रुपये मिळतात…?

काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अशी चर्चा खूप झाली होती की अभियांत्रिकीतील टॉपर मुले-मुली पुढे शिक्षण घेण्याऐवजी चित्रपटसृष्टीची निवड का करतात?

ज्या देशात सर्वोच्च शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते इत्यादी लोक वर्षाला १० ते २० लाख रुपये कमावतात, ज्या देशाचा राष्ट्रपती वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा कमी कमावतो, त्या देशातील चित्रपट कलाकार वर्षाला १० ते १०० कोटी रुपये कमावतात..!

कमावोत; पण ते असे काय काम करतात? हा प्रश्न तर उपस्थित होणारच ना…?

आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे?

मोठमोठ्या शास्त्रज्ञांना १०० कोटी रुपये कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते आणि हे लोक एका वर्षात इतके पैसे कमावतात..!

प्रश्न तर उपस्थित होणारच…

आज ज्या तीन क्षेत्रांनी देशातील नव्या पिढीला मोहित केले आहे ती म्हणजे

सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण

या तीन क्षेत्रांशी संबंधित लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा दोन्हीही मर्यादेपलीकडे गेली आहे. हेच आजच्या आधुनिक तरुणांचे आदर्श बनले आहेत. प्रत्यक्षात आज त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जेव्हा एखादी गोष्ट महागडी असते, अविश्वसनीय असते, अप्रासंगिक असते, तेव्हा ती देश आणि समाजासाठी हानिकारक किंवा आत्मघातकी ठरते.

आज कोणताही सुशिक्षित युवक किंवा युवती या क्षेत्रांकडे आकर्षित झाला नाही तरच ते अस्वाभाविक वाटेल..!

बॉलिवूडमध्ये ड्रग्स आणि वेश्याव्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग आणि ऑनलाइन जुगार, राजकारणात गुंडगिरी आणि भ्रष्टाचार.

या सगळ्यांच्या मागे मुख्य कारण पैसा हेच आहे..

आणि हा पैसा त्यांच्यापर्यंत आपणच पोहोचवतो, हीसुद्धा मोठी मूर्खता आहे..!

७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य वेतन मिळत असे. ३०-४० वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंची कमाईही विशेष नव्हती. ३०-४० वर्षांपूर्वी राजकारणही इतके धनसंपन्न नव्हते.

हळूहळू आपण लुटले जात राहिलो आणि ते आनंदाने आपल्याला लुटत राहिले..!

आपण या माफियांच्या जाळ्यात इतके अडकलो आहोत की येणाऱ्या पिढीचे आणि देशाच्या भविष्याचे नुकसान करत आहोत..!

५० वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट इतके अश्लील किंवा फुहड नव्हते. क्रिकेटपटू आणि नेते इतके अहंकारी नव्हते. आज तर हे लोक देव बनून बसले आहेत..!

आता गरज आहे की यांना डोक्यावरून खाली उतरवून जमिनीवर आणावे, जेणेकरून त्यांना स्वतःची मर्यादा कळेल..!

एकदा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो-ची-मिन्ह भारतात आले होते.

त्यांची भेट भारतातील मंत्र्यांशी झाली. बैठकीत त्यांनी मंत्र्यांना विचारले, “तुम्ही सर्व काय करता? ” आपले मंत्री म्हणाले, “आम्ही सर्व राजकारण करतो. “

त्यांना हे उत्तर समजले नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले, “माझा अर्थ असा की तुमचा व्यवसाय काय आहे? ” मंत्री म्हणाले, “राजकारण हाच आमचा व्यवसाय आहे. “

हो-ची-मिन्ह थोडे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “कदाचित तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही. राजकारण तर मीही करतो, पण माझा व्यवसाय शेती आहे. मी शेतकरी आहे. माझा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. सकाळ-संध्याकाळ मी शेती करतो आणि दिवसा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतो. ” हे ऐकून भारतीय प्रतिनिधीमंडळातील लोक निरुत्तर झाले..!

नंतरच्या एका सर्वेक्षणात समजले की भारतात ६ लाखांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह राजकारणावर चालतो; आज ती संख्या कोट्यवधींमध्ये पोहोचली आहे..!

जेव्हा कोरोनाने संपूर्ण युरोपला विळखा घातला होता, तेव्हा डॉक्टरांना अनेक महिने सलग सुट्टी मिळाली नव्हती आणि संपूर्ण युरोप संकटात सापडला होता. तेव्हा पोर्तुगालमधील एका डॉक्टरने संतापून म्हटले होते, “तुम्ही सर्व फुटबॉलपटू रोनाल्डोकडे जा. तुम्ही त्याला कोट्यवधी डॉलर्स देता, मग तोच तुम्हाला वाचवेल. आम्हाला सामान्य फी देऊन इतक्या मोठ्या अपेक्षा का ठेवता? “

माझे स्पष्ट मत आहे की ज्या देशातील तरुणांचे आदर्श शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादी नसून, राजकारणी, क्रिकेटपटू आणि अभिनेते असतात; त्या देशाची वैयक्तिक प्रगती कदाचित होऊ शकते, पण देशाची सर्वांगीण प्रगती अशक्य आहे.

सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, धोरणात्मक दृष्टिकोनातून तो देश कायम मागे राहील.

अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील.

ज्या देशात अनावश्यक आणि अप्रासंगिक क्षेत्रांचे वर्चस्व वाढत राहील, तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल.

देशात भ्रष्टाचारी आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढत जाईल.

प्रामाणिक लोक मात्र उपेक्षित राहतील. राष्ट्रवादी लोकांना जगणे कठीण होईल.

तथापि, सर्व क्षेत्रांमध्ये काही चांगले लोकही असतात आणि ते माझ्या दृष्टीने आदरास पात्र आहेत.

गरज आहे की आपण प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, समाजसेवी, देशासाठी काहीही करण्याची भावना असलेले, जिद्दी देशभक्त, राष्ट्रनिष्ठ वीर लोकांना आदर्श मानले पाहिजे…,

नाचणारे-गाणारे भांड, ड्रग्ज घेणारे, चारित्र्यहीन, गुंड, मवाली, जातीयवादी आणि दुष्ट देशद्रोही लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती आपण विकसित केली पाहिजे.

आपण असे केले तर ठीक, अन्यथा देशाची अधोगती निश्चित आहे.

तुम्ही स्वतः ठरवा,

सलमान, अमिर, शाहरुख, ह्रितिक, करिश्मा, करिना, आलिया किंवा सचिन, विराट यांचे देशाच्या सामाजिक मूल्यवर्धन आणि विकासात काय योगदान आणि सहकार्य आहे? (Value addition) 

आपली मुले अशा लोकांना आदर्श मानतात जे स्वतः फक्त आत्मकेंद्रित आहेत, असे या लेखाचे मत आहे..!

भविष्यात माझ्या भारत देशाला अशा स्वयंमशगुल तारकांची फार गरज नाही.

डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांची गरज भासणार आहे.

म्हणून भारताचे भविष्य डोळे उघडून जागे होवो अशी आशा.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भेट… कवी : मा. दीपक पटेकर. (दीपी) ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ भेट… कवी : मा. दीपक पटेकर. (दीपी) ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

एखादं नातं विरून जातं पण त्या नात्यातले अनुभवलेले काही हळुवार कोमल प्रीतीचे क्षण मात्र नकळत सोबत राहतात. प्रेमाची परिणीती जरी निर्णायक झाली नसली तरी भावनांचा अविष्कार पुसत नाही. रोजच्या जीवनचक्रात हे सारं गरगरत असतंच पण अचानक असं काहीतरी घडतं की काळ, परिस्थिती, मागे घडलेलं सारं काही विसरून जायला होतं आणि मन पुन्हा त्या मधुर क्षणांच्या आठवणीत रमतं. हरवलेलं गवसू लागतं.

“बकुळीची फुले” या कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या काव्यसंग्रहातील भेट ही कविता वाचल्यानंतर मनात हेच विचार झळकून गेले. अतिशय भावूक आणि हळुवार कविता! ती वाचली आणि तिचा रसास्वाद घ्यावासा वाटला. प्रथम कविता वाचूया.

 भेट ☆

 भेट अचानक होते तेव्हा

 जुन्या आठवा डोळे भरती

 वरवर शांती परि अंतरी

 विचारचक्रे गरगर फिरती …

भेट अचानक होते तेव्हा

 मुके शब्द अन् नयन बोलती

 नसे वाच्यता फक्त शांतता

 नयनामध्ये तिज साठवती..

 *

 भेट अचानक होते तेव्हा

 थरथर थरथर अधर कांपती

श्वासामध्ये वाढुनि अंतर

 हृदयामधले ठोके चुकती..

 *

भेट अचानक होते तेव्हा

 जुने वाद अन भांडण स्मरती

 रुसवे फुगवे हास्यात विरुनि

 हातामध्ये हातच धरती …

 *

भेट अचानक होते तेव्हा

स्पर्शामधुनी ओढ जाणती

 मनपटलावर होउनि हलचल

येते लाली गालांवरती..

 *

 भेट अचानक होते तेव्हा

 नयन इशारे नयना कळती

 अधरांशी अधरांनी बोलुनी

 मिटून डोळे मिठास घेती..

 – दीपक पटेकर

 या कवितेत एका ब्रेकअपची कहाणी आहे.

 भेट अचानक होते तेव्हा

 जुन्या आठवा डोळे भरती

बरोबर शांती परि अंतरी

 विचारचक्रे गरगर फिरती… 

सगळं काही संपलेलं असताना, ध्यानीमनी नसताना अचानक ती भेटते आणि जुन्या मधुर आठवणी जाग्या होतात. डोळे पाणावतात. काळाने सगळं बदललेलं असतं. दोघांचीही जीवने आता वेगवेगळ्या दिशेला पांगलेली असतात. त्यामुळे असे एकाएकी पुन्हा भेटल्यानंतर त्याच्याकडून कुठलीही उत्तेजित प्रतिक्रिया जरी परिस्थितीचे भान ठेवून झाली नसली तरी अंतरात मात्र असंख्य विचारचक्रे फिरू लागतात. ती कशी असेल या क्षणी?

तिच्या मनात नक्की कोणते भाव असतील?

माझ्या मनातल्या भावांशी त्यांचे साम्य असेल का? वगैरे शंका त्याच्या मनात स्वाभाविकपणे डोकावतात.

भेट अचानक होते तेव्हा

मुके शब्द अन् नयन बोलती

नसे वाच्यता फक्त शांतता

नयनामध्ये तिज साठवती..

या अनपेक्षित भेटीत शब्द, वाचा मूक झाली असली तरी नजरेच्या भाषेतून अर्थ झिरपत आहेत. तो फक्त त्या क्षणी तिचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवत आहे.

भेट अचानक होते

थरथर थरथर अधर कांपती

श्वासामध्ये वाढुनि अंतर

 हृदयामधले ठोके चुकती..

शृंगार, प्रीतभावना, प्रणयातुरता या अशा काही हळुवार कोमल भावना आहेत की त्या जेव्हा अंत:प्रवाहात जाणवतात तेव्हा त्याची स्पंदनं देहावर उमटतात. त्याचं कवीने नेमकं वर्णन या कडव्यात केलेलं आहे. तिला पाहिलं आणि नकळत ओष्ठद्वयांचं कंपन जाणवलं. श्वास जणू काही थांबला आणि हृदयातले ठोके वाजू लागले. धडधड जाणवू लागली. हरवलेल्या प्रेमाच्या आशावादामुळे होणारी देह स्थिती आणि त्याचा अनुभव असा निराळाच असावा, हे कवीने अत्यंत समर्थ शब्दात वेचले आहे.

 भेट अचानक होते तेव्हा

 जुने वाद अन भांडण स्मरती

 रुसवे फुगवे हास्यात विरूनी

हातामध्ये हातच धरती…

कसं असतं ना? प्रेमामध्ये वाद असतात भांडण असतात, रुसवे फुगवे सारं काही असतं. नात्यात अंतर पडतं, दरी निर्माण होते. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. रागाच्या भरात तुटफुट झालेली असते पण पुन्हा अचानक भेट घडल्यानंतर मात्र “कसं चुकलं आपलं! ” हे जाणवून हास्य फुलतं आणि एकमेकांचं नातं किती घट्ट आहे याची साक्ष हातात हात धरल्यावर मिळते.

 भेट अचानक होते तेव्हा

 स्पर्शामधुनी ओढ जाणती

मनपटलावर होउनि हलचल

 येते लाली गालावरती…

काळाबरोबर जे विसरलं गेलं असं वाटत असतानाच दोघांची अचानक भेट होते आणि जाणवतं आपल्यात अजून सारे काही तसेच आहे. स्पर्शातली ओढ आजही कायम आहे आणि मनावर लहरलेल्या या तरंगांनी पुन्हा शरीरात एक लाट उसळते. जे आतापर्यंत दडपलं होतं ते जागू लागतं आणि त्या भावनेने दोघेही तितकेच हरखून जातात. क्षणात जे त्याला वाटत होतं ते तिलाही वाटतंय याची साक्ष तिच्या गालावर चढलेली लाली देते.

 भेट अचानक होते तेव्हा

नयन इशारे नयना कळती

 अधरांशी अधरांनी बोलुनि

 मिटून डोळे मिठास घेती..

कवितेतलं हे शेवटचं कडवं म्हणजे भावनांनी गाठलेला शिखरबिंदू आहे. याप्रसंगात शब्दांचं काही कामच उरत नाही. प्रीतीची भाषा ही केवळ नयनांतून व्यक्त होते. इथे शब्द बोलत नाहीत नजरा बोलतात. नजरेचे इशारेच पुरे असतात मग सारे बंध सुटतात, नियम अटी नाहीशा होतात. या क्षणी खरं फक्त एकच असतं ते म्हणजे प्रीतीची ओढ, स्पर्शाची आतुरता, पुन्हा एकदा एकमेकांनी दिलेली देहाची हाक आणि अर्थात मग बेभानपणे ओठावर ओठ टेकतात आणि डोळ्यांची पाखरं अलगद मिटतात. त्यानंतरचा अनामिक आनंद आणि गोडवा मिटलेल्या देहात उसळतो.

तुटलेलं एक नातं पुन्हा जुळतं.

दीपक पटेकरांची ही कविता वाचल्यानंतर फक्त दोनच शब्द ओठावर येतात, ”निव्वळ अप्रतिम!”

ही संपूर्ण कविता पादाकुलक वृत्तात रचलेली आहे. अतिशय सहज- सुलभ, लयबद्ध शब्दरचना. संपूर्ण काव्यभाव वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी रसमय शब्दशैली. चोवीस ओळींच्या या कवितेत ओळींपलिकडचे कित्येक न लिहिलेले भावशब्दही वाचक वाचतो आणि एका वेगळ्याच भावविश्वात रमून जातो.

या कवितेचं वैशिष्ट्य असं की “भेट अचानक होते तेव्हा” ही या काव्याची मध्यवर्ती टॅगलाईन आहे आणि प्रत्येक कडव्यात या भेटीमुळे निर्माण झालेला अलवार भावरंग टिपण्यात कवीची संवेदनशीलता आणि शब्दसामर्थ्य जाणवते. दोन प्रेमिकांची ही भेट जशीच्या तशी त्याच गोडव्याने आणि भावनाविष्काराने डोळ्यासमोर उभी राहते. हा स्वभावोक्ती अलंकार कवीने फार सुंदर साधला आहे.

शृंगार रसात, प्रेमभावात भिजलेले हे काव्य वाचताना कुठेही अश्लीलता जाणवत नाही.

झाडावर फुल उमलावं आणि भ्रमराने पाकळ्यांवर हळूच उतरावे इतका अलगद शृंगार या काव्यात आहे. विरहानंतरच्या या शृंगारात पुनर्मिलनाची उत्कटता आहे. “कामोत्तेजिता” ही नैसर्गिक भावना आहे आणि त्याचं वर्णन जर संयतपणे केलं तर ते विकृत न वाटता सौंदर्यशाली वाटतं आणि शृंगारिक काव्य वाचताना हा अनुभव येणं हे शब्दांचे सामर्थ्य आणि कवितेचे यश अधोरेखित करतं.

दीपीजी, आपलं मनापासून अभिनंदन आणि आपला हा काव्यप्रवास सातत्याने होत राहो हीच शुभेच्छा!

© राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares