मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत — संक्रमण. संक्रांतीचा सण हा निसर्गाचा उत्सव आहे .भारत हा कृषिप्रधान देश असल्याने निसर्गाशी, शेतीशी निगडित असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,म्हणजे संक्रमण करतो, तो दिवस 14 जानेवारी. सूर्य भ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी, दर 80 वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. व 15 जानेवारीला संक्रांत येते. यानंतर दिवसाचा काळ मोठा, आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. धार्मिक हिंदू लोक उत्तरायणात मृत्यू यावा, असा जप करतात. मृत्यूलाही थांबवून धरणारे पितामह भीष्म हे उत्तम उदाहरण आहे.

संपूर्ण देशभर या सणाला महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटक आणि केरळ मध्ये संक्रांति ,उडुपी भागात संक्रमण, तर काही ठिकाणी, यादिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली, म्हणून त्यास उत्तरायणी असेही म्हणतात .तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते, म्हणून कापणीचा सण, असेही म्हणतात .तेलगू त्याला पेंडा पाडुंगा , बुंदेलखंडात सकृत, उत्तरप्रदेश बिहार मध्ये, खिचडी करून सूर्याला अर्पण करून, दानही  दिले जाते, म्हणून या दिवसाला खिचडी असेच  म्हणण्याची प्रथा आहे. गंगासागर मध्ये या दिवशी खूप मोठा मेळावा भरवला जातो. हिमाचल हरियाणामध्ये मगही आणि पंजाब मध्ये लोव्ही म्हणतात. मध्यप्रदेशात सक्रस, जम्मूमध्ये उत्तरैन, काश्मीर घाटी मध्ये    शिशुर संक्रांती, आसाम मध्ये भोगाली बिहू, तर ओरिसामध्ये आदिवासी या दिवशी पासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळ मध्ये तर हा उत्सव  ७–14 –21           किंवा  40 दिवसांचाही करून, संक्रांति दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये  दान घालून गुप्त दान देण्याची पद्धत आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे, पतंग उडविण्यासाठी मैदानात किंवा गच्चीत जावे लागते. आणि आपोआपच  सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही  जोडलेले आहे. त्यादृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.

सूर्याचा ( पृथ्वीचा ) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला धुंधुरमास किंवा धनुर्मास म्हणतात.( 13 डिसेंबर ते 1३ जानेवारी). मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. याबाबत पुराणातही एक कथा सांगितली आहे. या काळात एखाद्या दिवशी तरी पाहाटे स्वयंपाक करून, उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

आपल्याकडे संक्रांत हा तीन दिवसाचा उत्सव साजरा करतात. भोगी, संक्रांत ,आणि किंक्रांत.

भोगी दिवशी  सुगडाच्या (सुघटचा अपभ्रंश  सुगड असा असावा ). पूजेचे महत्व असते. मातीची नवीन गाडगी, ( घट) कोणी दोन, कोणी पाच अशी आणून, त्यापैकी एका मध्ये अगदी छोटी बोळकी ,(ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात). घालतात. ऋतूप्रमाणे शेतातून आलेले गाजर, घेवडा, शेंगा, सोलाणा, ऊस, बोर, तिळगुळ, असे जिन्नस त्यामध्ये भरून, ती देवापुढे ठेवून , त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ ,शेंगा, पातीचा कांदा ,मुगाची डाळ, तांदूळ, लोणी, वस्त्र, विड्याचे पान, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर अगदी स्नानासाठी शिकेकाई, खोबरेल तेल असे सर्व ठेवून ते  वाण स्नानापूर्वी एखाद्या सुवासिनीला  देण्याची पद्धत आहे .या दिवशीच्या स्वयंपाकात  तीळ लावून  बाजरीच्या भाकरी राळ्याचा भात किंवा खिचडी आणि वरील सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी  (या भाजीला लेकुरवाळी असे नाव आहे.) भरपूर लोणी, दही असा हा आरोग्यदायी घाट असतो.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! ) इथून पुढे —

तिघांचीही सोय करणं गरजेचं होतं… पण माझ्या स्वतःकडे कोणतीही सोय नाही…. 

तिघांची एकदम, एकाचवेळी, सोय कुठे आणि कशी करणार ? कोण या तिघांना पटकन प्रवेश देऊन कायमची जबाबदारी स्वीकारेल ? 

मी कात्रीत सापडलो होतो, आणि हे तिघेही माझ्याकडे डोळे लावून बसले होते….! 

मागच्या आठवड्यात माया केअर सेंटरचे संचालक डॉ. श्री व सौ भाटेताई यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती. 

या दाम्पत्याचं मला कौतुक वाटतं. जिथं प्रत्यक्ष मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत, तिथं हे दोघे रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना आपल्या घरात घेऊन येतात. मुलांनी सोडून दिलेल्या आईबापांना स्वतःचे आई-बाबा म्हणून सांभाळतात. 

एखादी व्यक्ती घरात घेऊन येणं म्हणजे एखादी वस्तू घरात आणण्या इतकं सोपं नसतं. त्या व्यक्तीचं जेवण-खाणं, कपडा लत्ता, दुखणं खुपणं, सर्वच बघावं लागतं …. मरेपर्यंत! 

अशात, यांच्याकडे जागा कमी, काम करायला कामगार मंडळी कुणीही नाहीत, अपुरी साधनसामुग्री, सरकारी कोणतीही मदत नाही.

डॉ सौ भाटेताई, स्वतः आजारी असून सुद्धा, स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करून या आईबाबांची सेवा शुश्रूषा करतात.

अशाही परिस्थितीत, यापूर्वी रस्त्यावर मला सापडलेले चार ते पाच लोक मी यांच्या सेंटरला ठेवले आहेत, डॉ भाटे दांपत्य, माझ्या या लोकांचा सांभाळ करत आहे. 

ऋण कसं फेडावं यांचं ? 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असताना, आपण आणखी तीन लोकांचा भार यांच्यावर टाकावा का ? …. असं म्हणत, निर्लज्जपणे मी पुन्हा डॉ. भाटे सरांनाच फोन लावला. 

भाटे सरांना विषय सांगताच ते चटकन म्हणाले, ‘पाठवून द्या सर माझ्याकडे त्यांना.’

‘पण भाटे सर, अगोदरच तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून वेळ मारून नेत आहात त्यात…’ 

मला पुढे बोलू न देता ते म्हणाले, ‘परिस्थिती आपल्याला अनुकूल अशी कधीच नसते, ती आपल्याला बनवावी लागते सर, आणि आपण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसलो तर रस्त्यात पडलेले हे लोक आपली वाट न बघता देवाघरी जातील, आपणच मग आपल्याला माफ करू शकणार नाही… पाठवून द्या तुम्ही तिघांनाही…!’ 

काय बोलू मी या माणसापुढे ?

शुक्रवार 17 डिसेंबर 2021,  हा दिवस या तिघांना भाटे यांच्या आश्रमात पाठवण्यासाठी मी निश्चित केला.

त्या अगोदर बाकीची सर्व तयारी म्हणजे पोलिसांना कळवणे, त्यांच्यासाठी लागतील त्या सर्व वस्तू विकत घेणे वगैरे सोपस्कार पार पाडले. 

शुक्रवारच्या सकाळी यांची आंघोळ आणि दाढी कटिंग झाली.

यांना आणलेले नवे कोरे कपडे घातले. तिघांनाही नवीन बॅगा आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्या बॅगेत ठेवून दिल्या. 

आंघोळ आणि दाढी-कटिंग नंतर, वर्षानुवर्षे काळवंडून पडलेली पितळी समई, घासावी पुसावी आणि लख्ख व्हावी …. तसे आता हे तीघे दिसत होते… !

पहाटेचा काळोख हळूहळू विरत जावा आणि सूर्याने आपला मुखडा दाखवावा…. आज तसे ते दिसत होते… !!! 

संध्याकाळी घरात पूर्ण अंधार असावा आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली पणती आपण चेतवावी आणि यानंतर तो देव्हारा काळोखात उजळून निघावा, आज तसे भासत होते मला हे तिघेही…. !!! 

माझ्यासाठी हिच पूजा…हाच माझा अभिषेक… ! 

हाच माझा नैवेद्य… हाच मला मिळालेला प्रसाद आणि हिच मी केलेली आरती… !!!

आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली ! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! अल कपोने आणि दयाळू काल्या दादा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? अल कपोने आणि दयाळू काल्या दादा ! ?

“अगं ऐकलंस का, चहा टाक बघू फक्कडसा, मग तो घेता घेता तुला आणलेली एक वस्तू दाखवतो !”

“असं बोलून तुम्ही उगाच आशा लावता आणि ती वस्तू नंतर नेहमी फुसका बारच ठरते !”

“अगं आज आधी आणलेली वस्तू एकदा बघ तर खरी, मग ठरव फुसका बार आहे का ऍटोम बॉम्ब आहे ते !”

“ठीक आहे ! फुसका बार निघाला तर खाली इराण्याकडे जाऊन कटिंग पिऊन यायचा आणि ऍटोम बॉम्ब निघाला तर घरच्या आल्याच्या चहा बरोबर क्रीम बिस्कीटं मिळतील तुम्हांला !”

“ठीक आहे !  हा बघ नऊ इंच धारदार पात असलेला, गेल्या शतकातला रामपुरी चाकू !”

“उ s s ठा, ताबडतोब उ s s ठा आणि खाली इराण्याकडे जाऊन कटिंग चहा पिऊन या !”

“अगं पण माझं जरा ऐकून तर…”

“काय ऐकायचं तुमच ? घरात पाच पाच वेगवेगळे चाकू, सुऱ्या असतांना, हा रामपुरी चाकू कशाला आणलाय तुम्ही? त्याने मी काय सगळी कामं सोडून मर्डर करत सुटू की काय ?”

“अगं अशी डोक्यात राख नको घालून घेऊ ! या रामपुरीने पण अनेक खरे खून केले आहेत त्या….”

“आणि असा रामपुरी चाकू तुम्ही मला देताय आणि वर चहा मागताय ? आज आता तुम्हांला दिवसभर चहाच काय, नाष्टा, जेवण काहीच मिळणार नाहीये, कळलं ?”

“अगं जरा बैस आणि शांतपणे मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे आणि मग बोल !”

“ठीक आहे, बोला पटपट, मला भरपूर कामं पडली आहेत घरात !”

“अगं हा रामपुरी चाकू साधासुधा नाही ! याची नक्षीदार मूठ बघितलिस का ?”

“त्यात काय बघायचं? सोनेरी रंगाची आहे म्हणून….”

“अगं वेडाबाई ती खऱ्या चांदीवर सोन्याच पाणी दिलेली मूठ आहे !”

“काय सांगताय काय ?”

“मग ? अगं हा रामपुरी खास आहे म्हटलं ! गेल्या शतकात आपल्याकडे होऊन गेलेल्या ‘दयाळू काल्या दादाचा’ आहे हा !”

“अहो पण हा तुम्हाला मिळाला कुठे ?”

“अगं आपल्याकडे जी ‘दानी आणि मनी’ नावाची लिलाव संस्था आहे ना तिथून हा मी लिलावात घेतला, अँटिक पीस म्हणून !”

“मी पण ऐकून आहे त्या संस्थे बद्दल, जी लिलावातून आलेल्या अर्ध्या पैशाचे गरजूना दान करते !”

“बरोब्बर !”

“पण केवढ्याला घेतलात हा रामपुरी चाकू ते सांगा ना ?”

“अगं त्याची एक गंमतच झाली ! त्या संस्थेच्या लीलावातील सगळ्या दुसऱ्या वस्तू खूपच चढया भावाने गेल्या, पण या रामपुरी चाकूला कोणी बोलीच लावे ना !”

“का हो ?”

“अगं असं काय करतेस ? याच रामपुरीने ‘दयाळू काल्या दादाने’ तेरा श्रीमंत सावकारांचे मर्डर केले होते ना ?”

“आणि असा चाकू तुम्ही घरात घेवून आलात ? आधी तो फेकून…..”

“अगं माझं जरा ऐक ! त्या दादाने गेल्या शतकात श्रीमंत सावकारांचे मर्डर केले असले तरी त्याने त्यांचे धन गरीब लोकांतच वाटले ! म्हणून तर त्याला ‘दयाळू काल्या दादा’ म्हणतात !”

“पण हा रामपुरी आपण घ्यावा असं का वाटलं तुम्हांला ?”

“अगं त्याच काय झालं सांगतो. परवाच पेपरात एक बातमी वाचली ! परदेशातल्या जगप्रसिद्ध ‘सदबी’ या लिलाव कंपनीने, गेल्या शतकात इटालीत होऊन गेलेल्या ‘अल कपोने’ या कुप्रसिद्ध ‘गॉडफादरचे’ पिस्तूल अडीच कोटी रुपयांना, कॅलिफोर्नियात झालेल्या लिलावात विकले म्हणून ! अगं त्या पिस्तूलानेच त्या कुप्रसिद्ध ‘अल कपोनेने’ दोनशे जणांचा खून केला होता !”

“बापरे !”

“पण मजा अशी, की त्याच्यावर शेवट पर्यंत एकाही खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही बोल ! पण हां, त्याला ‘टॅक्स’ चुकवल्या प्रकरणी दोषी ठरवून फक्त साडे सात वर्षाची शिक्षा झाली !”

“कठीणच आहे सगळं!”

“अगं पण तो वर बसला आहे ना तो सगळं बघत असतो बघ ! वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्याचे निधन झाले.”

“ते सगळं ठीक, पण हा रामपुरी….”

“अगं एकदम स्वस्तात मिळाला !”

“खऱ्या चांदीची मूठ आणि त्यावर सोन्याचं पाणी दिलेला, तरी स्वस्तात कसा काय मिळाला ?”

“त्याच कारण म्हणजे त्या रामपुरी चाकूने गेल्या शतकात झालेले तेरा खून ! त्यामुळे त्या चाकूला कोणी लोकं बोलीच लावायला तयार होईनात, हे मी तुला मगाशी बोललोच.”

“बरोबरच आहे लोकांचं, असा खुनी चाकू कोण कशाला घरात….”

“हो, पण त्यामुळे ‘दानी आणि मनी’ कंपनीचे धाबे दणाणलं आणि त्यांनी त्याच्या बेस प्राईस पेक्षा खालची बोली स्वतःच डिक्लेर केली !”

“बापरे”

“तरी कोणी तो घ्यायला तयार होईना ! शेवटी कंपनीने स्वतःच एकशे एक किंमत डिक्लेर केली तरी सगळे गप्प !”

“मग ?”

“मग शेवटी मीच एक्कावन्न रुपयाची बोली लावली आणि ती कबूल होऊन मी हा अँटिक रामपुरी चाकू घरी घेवून आलो !”

“हो पण आपण याच करायचं काय ?”

“आपण काहीच नाही करायच ! हा असाच शोकेस मधे ठेवून द्यायचा ! जे काही करायच ते आपल्या नातवाने मोठा झाल्यावर !”

“म्हणजे ?”

“अगं तो मोठा झाल्यावर जेंव्हा हा अँटिक रामपुरी तो पुन्हा एखाद्या लिलावात विकेल, तेव्हा त्याला नक्कीच कमीत कमी पन्नास लाख तरी मिळतील बघ !”

“कमाल आहे बाई तुमची ! आत्ता आणते आल्याचा चहा आणि क्रीम बिस्कीटं !”

असं बोलून बायको हसत हसत किचनकडे पळाली आणि मी नातवाला त्याच्या तरुणपणी मिळणाऱ्या पन्नास लाखावर, बोटं कापली जाणार नाहीत याची दक्षता घेत हळुवार हात फिरवत, चहाची आणि क्रीम बिस्कीटांची वाट बघत बसलो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी..अगबाई! नवं वर्षंउगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू,आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मूळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

काय म्हणताय् तिळगुळजी..

तिळगुळ…सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजुन तीळगुळ घरी बनवतेस…

संक्रात..अरे पण तुझं महत्व सांग ना..नाही जमत सगळ्यांनाच स्वत: बनवायला..महत्वाचं आहे ते तिळगुळाचं  असणं,..

तिळगुळ…हे बघ तिळआणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ…हेमंत ऋतुत येते संक्रांत..

थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक ,स्निग्ध.शिवाय त्यातली अॅमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोहअसते .ते .शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का?शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक.राग हेवे दावे विसरून जायचे.नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..

मी..किती छान!!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..

संक्रांत…अगदी बरोबर!

मी..पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट कां बरं बोलतात!!

संक्रांत…कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात.याचवेळी उत्तरायण सुरु होते.हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं..

सूर्याची पूजा केली जाते.शुक्राचाही उदय होतो..

मी ..भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..

संक्रांत..हो .तामीळनाडुत पोंगल असतो.बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…

मी ..खिचडी?

संक्रांत…हो.कारण या दिवशी तुर मसुर तांदुळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे.

तीळाचे लाडु ,वड्या ,रेवडी गजक गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…

मी..वा!!किती छान माहिती मिळाली.भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे.बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानीक अभ्यास आहे…मग स्त्रीयांसाठी हळदीकुंकु,वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण पतंग उडवणे या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.

खरोखरच आज मला मी,तीळगुळ आणि संक्रांत यातील परस्पर संबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग तिळगुळ घ्या अन् गोड बोला…..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….!) इथून पुढे —- 

पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर त्या रुग्णांमध्ये काहीही केलं तरी विशेष सुधारणा होत नसते, तरीही माझ्या या आजोबांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं.

हेतू पुन्हा तोच…. किमान काही दिवस हॉस्पिटलमध्ये का होईना, पण  चांगल्या ठिकाणी  तरी राहतील आणि दोन वेळच्या जेवणाची तरी सोय होईल. 

एके दिवशी या ही हॉस्पिटल मधून सुद्धा फोन आला, तुमच्या पेशंटचं जितकं काही करता येणं शक्य आहे ते आम्ही केलं आहे, पेशंटला डिस्चार्ज देत आहोत, कृपया त्यांना घेऊन जावे. 

आता या आजोबांना कुठे घेऊन जाऊ ?  की सोडू परत बागेबाहेरच्या त्याच फूटपाथवर यांना ? की सांगू त्यांना ?  पडून राहा इथे बागेबाहेर …. मरणाची वाट बघत ! 

प्रसंग तिसरा – पुणे कॉर्पोरेशनकडून शनिवारवाड्याकडे जात असताना,  तिथल्या पुलावर अचानक एक फोन आला, मी गाडी थांबवून तो फोन घेतला.

माझं सहज लक्ष गेलं, पुलाच्या कठड्यावर एक मध्यम वयाची व्यक्ती बसली होती. त्याला दिसत नव्हतं, हे त्याच्या हालचालींवरुन मला समजलं, जागेवरच बसून त्याची काहीतरी चुळबूळ चालली होती.

थोडा चुकला, तर पुलाच्या कठड्यावरून सरळ खाली पाण्यात पडेल…. त्याला कुठेतरी सुरक्षित जागेत बसवून द्यावं, असा विचार करून त्याच्या जवळ गेलो, त्याला सुरक्षित जागेत हलवलं आणि सहज विचारपूस केली… 

याचं सध्याचं वय साधारण 42

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच याला दिसत होतं, पण घरच्या कटकटीमुळे वैतागून पुण्यात आला, एका हॉटेलमध्ये नोकरी करून स्वतःपुरता व्यवस्थित जगत होता.

एके दिवशी, म्हणजे त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका अपघातात डोक्याला मार लागला आणि यात त्याची दृष्टी गेली. 

दृष्टी गेली, तशी नोकरी गेली….  घर आधीच सुटलं होतं…. आता तो भिक्षेकरी म्हणूनच जगायला लागला. फूटपाथ वर राहायला लागला 

जन्मतः ज्यांना दृष्टी नसते ते लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात….

पण वयाच्या चाळीसाव्या वर्षी, दृष्टी जाणे हा धक्का अतीभयानक असतो. ते परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत….! 

अचानक पणे बसलेल्या अशा धक्क्यातून कुणीच लवकर सावरू शकत नाहीत. अशात घरच्यांचा आधार असेल तर ठिक , पण ज्याला कोणाचाच आधार नाही, अशा दृष्टी गेलेल्या व्यक्तीने जगायचं कसं ?

याची कहाणी ऐकून, मी याच्या जवळ ओढला गेलो…. 

यानंतर आधुनिक वैद्यक शास्त्रात डोळ्यांच्या संदर्भात ज्या काही ट्रीटमेंट असतील त्या सर्व ट्रीटमेंट त्याला पुण्यातल्या नामांकित Opthalmologist कडून दिल्या. पण कसलाही फरक पडला नाही….

शेवटी माझा मित्र डॉ. समीर रासकर याने सांगितलं, निसर्गापुढे आपण हरलो आहोत, याला आयुष्यात कधीही दिसणार नाही. 

याला हे समजल्यानंतर, ज्या पद्धतीने तो कळवळून रडला होता, ते कारुण्य मला इथे शब्दात मांडता येणं शक्य नाही. 

तरीही त्याच्या मनाला उभारी देऊन, त्याला एक व्यवसाय टाकून दिला.

फुटपाथवर बसून तो हा व्यवसाय करायचा. 

रात्री कुठेतरी आडोशाला झोपायचा.  भुरटे चोर येऊन याला त्रास द्यायचे,  झालेली कमाई काढून घेऊन पळून जायचे….  दिसत नसलेला हा….  याने प्रतिकार कसा करावा? 

आता, वैतागून तो आत्महत्येची भाषा करायला लागला. 

कुणाच्यातरी देखरेखीखाली त्याला ठेवावं असं मला वाटू लागलं…. अन्यथा डिप्रेशन मध्ये त्याने स्वतःचा अंत करून घेतला असता…!

नेमकं काय करावं मी ? या एका मागोमाग आलेल्या तीन प्रसंगांनंतर…..? 

पहिल्या बाबांची सोय कुठे करावी….?  या विचारात असताना दुसरे बाबा समोर आले…..आता या दोघांची सोय कुठे करावी ?  या विचारात असताना हा तिसरा अचानकपणे समोर आला…

कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: ऋषिका जुहू ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ ऋषिका जुहू ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

ऋषिका जुहू

वैदिक काळामध्ये लोपामुद्रा, आदिती, विश्वावरा, इंद्राणी, सर्परागिणी, शाश्वती  अशा अनेक ऋषिका होऊन गेल्या. वेदांच्या स्तोत्रांच्या किंवा मंत्रांच्या जाणकार, त्यांचे रहस्य समजून घेणाऱ्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या त्या सर्व स्त्रिया ऋषिका नावाने प्रसिद्ध आहेत. आपण आज जहू या ऋषिके ची माहिती घेऊया.

ऋषिका जुहू  ब्रह्मवादिनी होती. ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयन करणारी आणि अग्निहोत्र करणारी. वेदांचा अभ्यास करणारी आणि घरातील लोकांची निस्वार्थ सेवा आणि स्वेच्छेनं मिळालेल्या अन्नपाणी पैशांनी जगणारी. ब्रह्मा + वादिनी= ब्रम्ह .ब्रम्हाला साक्षात आत्मतत्व म्हणतात. . ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करुन तिला वेदाध्ययन करता येत असे .खूप तपस्या करून ब्रम्हाचे ज्ञान रसिकांना पोचवण्याचे  काम ब्रह्मवादिनी करते.

ऋषिका जुहू आणि ब्रह्मदेव हे पती-पत्नी होते म्हणून तिला ब्रह्म जाया असेही म्हणतात. काही कारणाने ब्रह्मदेवाने तिचा त्याग केला. पण ऋषिका जुहू अजिबात घाबरली किंवा विचलित झाली नाही. ती पतिव्रता होती. धर्मपरायण होती आणि म्हणून तिचा धर्मपरायण निर्णायक मंडलावर पूर्ण विश्वास होता. त्या काळात पत्नीचा त्याग करणे हा मोठा अपराध मानला जात असे .अशा पतीना प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. वायू अग्नी सूर्य सोम आणि वरुण या देवतानी ब्रह्मदेवाला प्रायश्चित्त दिले. सर्वात प्रथम सोम राजाने  ब्रह्मदेवाला या पवित्र चारित्र्याच्या स्त्रीचा निसंकोचपणे स्वीकार करण्यास सांगितले. वरूण देवता आणि मित्र म्हणजे सूर्याने देखील त्यास अनुमोदन दिले. मग अग्नि देवतेने तिचा हात धरून तिला तिच्या पतीकडे सोपवले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाला सांगितले तुझ्या पत्नीने खूप तपस्या केली आहे. त्यामुळे तिचे  रूप अति उग्र झाले आहे. तिला शत्रू कधीच स्पर्श करू शकणार नाही. तिचे चारित्र्य शुद्ध आहे. ती पापी मुळीच नाही.ती  तेजस्विनी आहे. निष्पाप आहे.  निरपराध आहे.निर्दोष आहे .तिच्यावर अन्याय होता कामा नये. ब्रह्मदेवाला ते पटले आणि ऋषिका जुहूचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला. पण ब्रह्मवादिनी असूनही ऋषिका जुहू ला अन्यायाविरुद्ध लढावेच लागले.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

हृदयी अमृत, नयनी पाणी.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रसंग पहिला – साधारण सहा महिन्यांपूर्वीचा…

नेहमीप्रमाणे याचकांच्या भेटीला निघालो असताना, पुण्याच्या मध्यवर्ती गजबजलेल्या भागात एका सरकारी ऑफिसच्या गेट बाहेर, दाढी वाढलेल्या आणि अत्यंत गलिच्छ अवतारात, उकिरड्यात झोपलेल्या बाबांना विव्हळताना पाहिलं.

जवळ जाऊन पाहिलं तर पायाला भली मोठी जखम झाली होती आणि त्यात अक्षरशः किडे वळवळत होते.

बाबांची ओळख झाली, त्यांची व्यथा समजून घेतली. 

यानंतर किडे बाहेर काढण्याची वेगवेगळी औषधे वापरून रस्त्यावर ड्रेसिंग करत राहिलो. जखम बरी झाली झाली… म्हणता म्हणता पुन्हा बिघडायची.

मला जाणवलं की, हे किडे रस्त्यात अशी मला दाद देणार नाहीत…. रस्त्यावरचे किडेच ते….!

आपल्या आजूबाजूलाही असतात असे अनेक किडे…. दुसऱ्यांची आयुष्य पोखरणारी….!

तर यांना माझे मित्र डॉ. शोएब शेख यांच्या मॉडर्न हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केलं.  इथल्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबांचा पाय वाचवला. 

दवाखान्यात होते, तोवर अन्नपूर्णा प्रकल्पातून जेवणाची सोय लावून दिली.

मला आपलं एकच सुख… बाबा जोपर्यंत ॲडमिट आहेत तोपर्यंत हॉस्पिटलमुळे निवारा तरी आहे…. दोन वेळच्या जेवणाची सोय तरी होतेय. किमान रस्त्यावर तरी आता यांना पडून राहावं लागत नाही. 

एके दिवशी हॉस्पिटल मधून फोन आला, येत्या काही दिवसात बाबांना डिस्चार्ज करत आहोत, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, त्यांना घेऊन जावे. 

डिस्चार्ज झाल्यानंतर मी त्यांना कुठे घेऊन जाणार होतो ?  परत त्याच रस्त्यावर ?  त्याच जागेवर ?? त्याच उकिरड्यात सोडून येऊ?? त्यांच्या मुलानेही हेच केलं होतं…. मी पण तेच करू ??? 

प्रसंग दुसरा – पुण्यामध्ये एक प्रसिद्ध बाग आहे. अनेक दानशूर मंडळी येथे अन्नदानाचे काम करत असतात.

इथे भीक मागणारी मंडळी मला एक गठ्ठा भेटतात,  मी इथेही वार लावून येत असतो. 

एके दिवशी बागेशेजारच्या फुटपाथवर एक आजोबा पडलेले दिसले. जवळ गेल्यानंतर कळलं यांना Paralyais झाला आहे , वाचा जवळपास गेली आहे. 

आता यांच्याशी बोलायचं कसं ?  यांचा भूतकाळ कसा जाणून घ्यायचा ? 

ज्यांना बोलता येत नाही,  ते किमान हातवारे करून, खाणाखुणा करून काहीतरी सांगतात, त्यातून काहीतरी दिशा मिळते.

परंतु पॅरालिसीस झालेल्या या बाबांकडे हे दोन्ही मार्ग नव्हते….  ना ते खाणाखुणा करु शकत,  ना स्वतःची वेदना शब्दात मांडू शकत….!

पण वेदनेला शब्दांची गरज नसते…. संवेदनेला भाषा नसते….! 

निष्प्राण डोळ्याने माझ्याकडे बघत मला बोबड्या बोलीत काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करायचे….. परंतु मला काहीही कळायचं नाही.

ते जमिनीवर पडून असायचे…. मी यांच्याकडे गेलो कि काही न बोलता यांच्या डोळ्यातून टपटप आसवं गळायची…. आपल्याला पाहून कुणाची तरी आसवे टपकली तर समजावे, आपल्या बरोबर तो त्याचा गतकाळ वाटू इच्छितोय….! 

मी जवळ बसलो कि माझा हात धरायचा ते प्रयत्न करायचे….. बुडता माणूस जसा मिळेल तो आधार शोधतो तसा….

मला कळलं, हे माझ्यात आधार शोधत आहेत….!

एकदा त्यांनी हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत मला इशारा केला…. मला कळलं, यांना भूक लागली आहे, मी बाजूच्या हॉटेलमधून काहीतरी मागवलं…. आणि त्यांच्या तोंडापुढे  नेलं…. पण त्यांनी तोंड फिरवलं….

मला काहीच कळेना….

यानंतर त्यांनी मनगटावर बोट ठेवलं…. आणि पुन्हा हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत, माझ्याकडे बोट दाखवलं ….

ओह…. त्यांना म्हणायचं होतं…. खूप वेळ झालाय पोरा, तू जेवून घे…..!

मी त्यांच्या या बीन बोललेल्या वाक्यावर रडलो होतो तेव्हा …!!!

जो स्वतः उपाशी आहे, तो दुसऱ्याला म्हणतो…. जेवून घे….! खूप मोठं मन लागतं याला…..

असं हे बीन शब्दाचं, बीन भाषेचं आमचं नातं….! 

माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

अलीकडं घरी आम्ही दोघेच असतो.हे सकाळी दवाखान्यात जातात. त्यानंतर साधारणपणे मी एकटीच असते. त्यामुळे माझ्या दुपारवर कोणाचाही हक्क नसतो. आजही मी एकटीच दिवाणवर लोळत पडले होते. दाराची बेल वाजली. कोण बाई एवढ्या ऊन्हाचं? असं म्हणत मी दार उघडलं. दारात एक तरुणी उभी होती.

‘हाय’ ती घुसलीच घरात.

माझ्या कपाळावरील आठ्या बघून सुध्दा ती हसत हसत गळ्यातच पडली.

‘कोण तू?’ मी घुश्शातच विचारलं.( खरंतर अगोचर म्हणायचं होतं. पण जीभ आवरली.)

तोपर्यंत ती बया हातपाय पसरुन सोफ्यावर पसरलीही!

मोठ्यानं हसून म्हणाली,’ बघ, विसरलीस ना मला?’

‘छे बाई, काय ते गडगडाटी हसणं? असं का हसतं कुणी?’

आत्तापर्यंत माझं निरीक्षण पूर्ण झालं होतं.

उंच, शेलाटी, जाड- जाड दोन लांब वेण्या; त्याही पुढं घेतलेल्या! बॉटल ग्रीन बेलबॉटम, डबल कॉलरचा लाईट पिस्ता कलरचा थोडा ढगळा टॉप, कानात छोटे छोटे स्पिनर्सवाल्या डुलणाऱ्या रिंग्ज …… अं … अं …. अं.. ही तर..

‘बरोब्बर अगं मी तूच ..ती.. ती कॉलेजमधली दीपा’.

 टाळीसाठी लहानसा हात पुढं आला. मीही टाळी दिली.

‘काय हा अवतार दीपा? साडी, टिकली, बांगड्या.. . ‘

या वाक्याकडं दुर्लक्ष करून स्वयंपाकघरात जाता जाता मी विचारलं… ‘कॉफी?’

‘पळ्ळेल…’

आता मी ही हसत हसत आत वळले.

ती केंव्हाच ओट्यावर चढून पाय हलवत बसली.

‘हे काय नेसकॅफे? ब्र्यू नाही? ‘

‘नाही गं, ह्यांना ब्र्यू नाही आवडत.’

‘हो क्का? ‘

मग ओट्यावर बसूनच कॉफी चे घुटके घेत भरपूर गप्पा झाल्या.

कॉलेजच्या दीपाला मी निरखत राहिले. मला ती न्याहाळत होती. अल्लड, अवखळ, निरागस, दीपा. ठाम पण शांत दीपा. साधी, सरळ तरीही मैत्रिणींच्या घोळक्यात राहणारी, डोळ्यात सुंदर, निरामय, साधीशी स्वप्नं…

तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आला. लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. आरडाओरडा, गाड्यांच्या हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज…. दोघींनीही कानावर हात ठेवले. ती तर कपाळावर आठ्यांच जाळं घेऊन, हातात डोकं खुपसून बसली.काही वेळानंतर आवाज थोडे कमी झाले.

‘काय ग, असल्या कोलाहलात कुठं घेतलंस घर?’

‘विसरलीस तुला हवं होतं शांत, रमणीय परिसरात छोटंसं घर. कुठं आलीस तू? ‘

‘हं. हे डॉक्टर आहेत ना! मध्यवर्ती ठिकाणी बरं पडत त्यांच्या व्यवसायासाठी.’ मी पुटपुटले.

‘एवढ्या कलकाटात!, बापरे!!. कल्पनाच करवत नाही.

‘सोप्पं जातं त्यांना. खाली दवाखाना वर घर.मुलांनाही शाळा-कॉलेज जवळ. भाजी मार्केट दोन मिनिटांवर.’

‘काय म्हणतेयस ऐकूही येत नाही नीट.’

‘असू दे ग.’

‘काय? क्क क्क काय….?

रस्त्यावरचे आवाज पुन्हा वाढले बघ. धन्य आहेस बाई तू. तूच बैस इथं तुझं घर सांभाळत. मी कलटी घेते.’बाय बाय. करत ती निघूनही गेली. मी दीपा. . दीssपा . .  अशा हाका मारत राहिले.

पण ती कधीच जीना उतरुन पळाली.

मी मात्र सोफ्यात विचार करत बसले. बरोब्बर बोलली ती. तेच तर स्वप्न होतं. लहान असलं तरी चालेल, घर हवं शांत वसाहतीत, गर्दी पासून दूर.. खरंच राहूनच गेलं…

कितीदा बोलूनही दाखवलं ह्यांना की एखाद्या कमी वर्दळीच्या जागी घर होतं मनात माझं, स्वप्नातलं, इवलंसं. इथला रस्ता सकाळी सहा वाजल्यापासूनच बोलू लागतो. गाड्यांची खडखड, हॉर्न ची पीं पीं, सायलेन्सर काढलेल्या बाईक्सचा कर्णकर्कश आवाज. या सगळ्यात पक्ष्यांची किलबिल ऐकू येतच नाही. हलक्याशा झुळूकीनं डोलणाऱ्या पानांची सळसळ वाऱ्यावर विरुन जाते. रेडिओ टीव्ही मोठ्या आवाजात कोकलत असतील तरच कान वेधतात. हा वर्दळीचा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत वहात असतो. कर्णकटू सूरात वेडेवाकडे आलाप? गात असतो. ओरडत असतो. मनातलं शांतता वाटणारं घर दूर राहिलंय. हरवून गेलंय. बांधायचंच राहून गेलं… राहूनच गेलं.

क्रमशः ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(हिंदीभाषिकांकडून  ” आपकी हिंदी बहूत अच्छी है “असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.) इथून पुढे —–

सुरुवाती सुरुवातीला उत्तर भारतीयांच्या शब्दप्रयोगाचं मला खूप हसू यायचं. त्यातले मुख्य म्हणजे स् वर्ण प्रथम असलेली जोडाक्षरे. एकदा श्रीराम सेंटरला एक हिंदी नाटक पाहायला आम्ही गेलो होतो. हिंदीतले खूप नामवंत कलाकार त्यात होते. एक असाच गंभीर प्रसंग त्यात चालला होता…. आणि नायक नायिकेला एका मोठ्या संवादात,” मैं पुरुष हूँ और तुम एक इस्त्री हो”…असे जेव्हा म्हणाला,तेव्हा एकदम मला जोरात आलेल्या हसण्याच्या आवाजानं आजूबाजूचे, मागचे पुढचे लोक माझ्याकडं रागानं बघू लागले होते.

खूप जण हल्ली जाणीवपूर्वक स्कूल, स्टेशन असं म्हणायला लागलेत. पण बरेच जण अजून इस्कूल, इस्टेशन  असेही म्हणणारे आढळतात. कोणी कोणी अनावधानाने बोलून पण जातात—

” सुनिता वो राईस इस्पून (भातवाढी)जरा इधर देना.” माझी एक उच्चशिक्षित मैत्रिण मला म्हणाली होती—-“ माझा एका विद्यार्थी इस्कूल म्हणायचा. माझे खूप प्रयत्न करून झाले पण काही उपयोग झाला नाही. मग एकदा मी त्याच्या आईला ते सांगितले. तर ती म्हणाली ” मुझे कहाँ बोलना आता है जो उसको आएगा. फिर भी मैंने उसको बताया है कि बेटा,सकूल या अस्कूल बोला करो।” कपाळावर हात मारून घ्यायची वेळ माझ्यावर आली होती.

मोठे मोठे सुशिक्षित नेते सुद्धा भाषण करताना…’ देश में महिलाओं का जीवन अस्तर हमें उपर उठाना है…’ अशा तर्‍हेची वाक्ये बोलून जातात। हे जरा तरी ठीक आहे. पण ‘ देश को हम अस्थायी किंवा अस्थिर सरकार देंगे, किंवा यह मेरा अस्पष्ट मत है।’ असं म्हणत असतात तेव्हा त्याचा एकदम विरुध्द अर्थ होतो, याची त्यांना जाणीवही नसते.

‘स ‘च्या ठिकाणी ‘श’ आणि ‘श’च्या ‘स’ हे तर पहाडी, बिहारी,पूर्व यु.पी.तल्या लोकांत नॉर्मलच असतं. तो थोडा अर्धमागधीचा प्रभाव पण म्हणता येईल. पण बिहारी लोक ‘ हम हूँ ना ‘ ..’मैं नरभसा गई’ (मी नर्व्हस झाले ),हमारा भिलेज (व्हिलेज ),अशा तऱ्हेने बोलतात, नंतर मला त्याही शब्दांचे अर्थ चांगले कळू लागले. तोंडात रोशेर गोला भरून बोलणारी माझी बंगाली मैत्रीण ‘’आज शोपिंग के लिए कोमला नगर मत जाना.आज वहाँ बोंद है.”  किंवा अशा तऱ्हेचं काही बोलली तर त्यावर हसणं मी बंद केलं.

आठ कोसावर भाषा बदलते म्हणतात. ते तर खरे आहेच. पण थोड्याथोड्या कालांतरानेही भाषा बदलते. पूर्वी अंकल, आंटी, सर, मॅडम यापुढे ‘जी’ लावायची जी पद्धत होती, ती आता बंद झालीय. एकदा माझी आई दिल्लीला माझ्याकडे आली होती. मी एका वयस्कर ऑंटीबरोबर फोनवर बोलत होते…आणि माझं हाँजी,हाँजी चालू होतं.( जिथे साधारणपणे मराठी हो,हो- हो, बर,बरंय असं बोललं जातं.) ” तू इतरांची किती हांजी- हांजी करतेस गं “हे माझ्या आईचे बोलणे ऐकून मला खूप हसू कोसळेले होते. 

एकेकाळी बहू शब्दाचा अर्थ आजच्यासारखा सून असा होत नव्हता. तर तो होता ‘ब्याहता.’ वह शर्मा,वर्मा, गुप्ता कोई भी… उनके खानदान की,घरकी ब्याहता…मतलब बहू. और नरेश की बहू, रामलाल की बहू, मतलब सून नाही तर…उसकी पत्नी. पण काळाच्या ओघात ती आता सूनच ! काळाबरोबर भाषा बदलते याचे हे एक उदाहरण.

आता तर दिल्लीची भाषा हिंदी ऐवजी  हिंग्लिश झालीय.

दरवर्षी हिंदी दिवस साजरा करताना ‘हिंदी को बढावा दो’ असे सगळ्या साहित्यिकांना, विचारवंतांना कळकळीने सांगावे लागतेय. 

पण हेही खरे आहे की, बोली भाषा बदलत गेली की त्यानुसार साहित्यिक भाषाही हळूहळू बदलत जाणारच.ती जिवंत भाषेची खूण आहे. बदलणे हा निसर्गाचा आणि सजीवांचाही नियमच आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी विचारपूर्वक बदल स्वीकारणे हेच प्रासंगिक आहे.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

“थांब,भास्करा,थांब ! असा जाऊ नकोस.

अरे तू येणार या कल्पनेनच मी किती आरक्त झाले होते. आठवतयं ना तुला, माझं ते रूप? हवेत गारवा सुटला होता. तुझ्या लक्ष लक्ष किरणांतील एखादा किरण, वांड मुलासारखा, तुला न सांगताच, आगाऊपणानं पुढं आला होता. पण ते ही बरंच झालं. त्याच्या येण्यानच मला तुझ्या येण्याची चाहूल लागली. मी लगबगीनं उठले. अंगावरची श्यामल वस्त्रे दूर सारली. त्या नादात चांदण्यांची पैंजणं कुठं विखुरली समजलही नाही. मी तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. तुला आवडेल असं शुभ्र वस्त्र परिधान केलं. पण काय सांगू? त्या धवल वस्त्राला लाल, गुलाबी छटा  केव्हा आल्या माझं मलाही समजलं नाही. केवळ तुझ्या येण्याच्या चाहुलीन केवढा फरक पडला होता बघ! तुझं तेजस्वी दर्शन होणार या कल्पनेनच माझी अवघी काया शहारून उठली. चेह-यावर  रक्तिमा चढला.तो सा-या आसमंतात पसरला. खरच मित्रा,तुझ्या दर्शनासाठी मी किती व्याकुळ झालेली असते ते तुला कसं समजणार?

सोन्याच्या पायघड्या घालून तुझ्या आगमनाची वाट  पहात असते. आणि तू असा निष्ठूरपणे निघून जातोस? नाही, भास्करा तुला थांबावच लागेल. माझ्या प्रेमासाठी तरी थांबावच लागेल.

मान्य आहे मला की तुझ्या मागे फिरता फिरता माझं रूप मला बदलावं लागतं. मला हे ही मान्य आहे की थांबणं, गतिहीन होणं हे तुला मान्यच नाही. तुझ्या तेजाला ते शोभणारही नाही. म्हणून तर तुझी वेडी झालेली ही उषाराणी तुझी पाठ सोडायला तयार नाहीय.पण तू तरी  असा निष्ठूर का होतेस? अरे, तुझं तेजच इतकं दिव्य आहे की त्याच्यापुढे माझ्या सौंदर्याचा रक्तिमा. फिका पडून जातो. पण तरीही तुझा सहवास मला हवा आहे.मी अगदी निस्तेज झाले तरी तुझा सहवास मला हवा आहे.

पण तू तर ऐकायला तयारच नाहीस. तुझी पाऊले तर वेगानेच पडत आहेत. क्षणभर मागे वळून पहा. पाहिजे तर मी तुला आवडेल अशा रूपातच पुन्हा येते. तोच रक्तिमा, तोच शितल वारा सारं काही घेऊन येते. तुझी ही उषाराणी, तुझी अभिसारिका बनून, तुझ्या साठी संध्याराणी   होऊन  आली आहे. आता तरी थांब.माझं हे रूप   पाहशील तर तुला नक्कीच आपल्या प्रभातसमयिच्या  मंगल भेटीची आठवण होईल.थांब जरासा.

पण नाही, तू थांबणार नाहीस. सा-या विश्वासाठी वणवण भटकशील. पण माझा एक शब्दही ऐकणार नाहीस. ठीक आहे. तुझी मर्जी. तुझ्यासारख्या सामर्थ्यशाली,तेजस्वी प्रियकराला समजावणं माझ्या कुवती बाहेरचं आहे.

पण एक लक्षात  घे. तू. निघून चाललायस. आता माझ्या जीवनात काळोखच काळोख आहे.ही शुभ्रवस्त्र मला आता परिधान करवत नाहीत. हा रक्तिमाही मला आता नकोसा झालाय. बघता बघता माझा चेहराही काळवंडेल. तुझ्या विरहात माझी अवस्था दयनीय दयनीय होऊन जाईल. माझेच काय, सा-या जगाचे व्यवहार थंडावतील.

तू ही एक लक्षात ठेव.

मी तुझ्या तेजाची पूजक आहे. तुझ्या तेजानं मी दिपून तर जातेच. पण ते तेज तस मी सहजासहजी हातचं सोडणारही नाही.तुझी वाट पाहीन. मला खात्री आहे,तुलाही माझ्या विरहाची किंमत कळेल. आपलं निघून जाणं चुकलं असं तुला वाटेल आणि तू नक्की परत येशील,तुझ्या तेजाचा ताफा   घेऊन येशील मला दिपवायला.

पण……पण मनात अपराधीपणाची भावना बाळगून येशील.माझ्या समोर एकदम येणं तुला जमणार नाही. म्हणूनच आपला एखादा किरण दूत म्हणून पाठवशील, माझा अंदाज घेण्यासाठी.

मला तुझी चाहूल लागेल मी तर काय, प्रेमवेडीच!

तुझ्या येण्याच्या चाहुलीनं मी पुन्हा विरघळेन.

माझ्या कांतिवर पुन्हा एकदा रक्तिमा चढेल.

तुझ्या स्वागतासाठी मी पुन्हा एकदा हसतमुखानं सामोरी येईन.

रानपाखरांना सांगेन मंजुळ गायन करायला.

विरहात तापलेल्या तुझ्या देहाला थंडावा मिळावा म्हणून वा-यालाही आमंत्रण देईन.

मला खात्री आहे, तू नक्की येशील.

उशीरा का होईना, ख-या प्रेमाची किंमत तुला कळेल.

ये, भास्करा, ये.

तुझ्या विरहात काळवंडलेली ही उषाराणी, तिच निशाराणीचं रूप टाकून, चांदण्याचा चंदेरी शालू फेकून, पुन्हा एकदा उषाराणी बनून तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे.

मला माहित आहे, हा पाठलाग जीवघेणा असला तरी हे नातं युगायुगांच आहे. कधीच  न संपणारं. अगदी कधीच न संपणारं.!”.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares