☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
दुर्जन निंदा – (२) ~पाखंडी लोक
मागील भागात तुकाराम महाराजांनी किती बीभत्स शब्दांत दुर्जनांची त्यांच्या अभंगातून निर्भत्सना केली आहे, हे आपण पाहिले. याही भागात आणखी काही अभंगांद्वारे तुकारामांचे अशा लोकांविषयीचे मत जाणून घेऊया, कारण दुर्जन निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. पाखंडी, म्हणजे वरवर दाखवायला सज्जन, भक्तीचे उपासक परंतु मनाने अत्यंत नीच अशा लोकांचा तुकाराम महाराजांना फार संताप आहे. त्यांच्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण आज त्यांच्या अभंगांतून पाहूया…
भक्तीचे सोंग करणाऱ्या ढोंगी माणसांविषयी या अभंगात महाराज म्हणतात,
न ये नेत्रा जळ/ नाही अंतरी कळवळ/
तो हे चावटीचे बोल/ जन रंजवणे फोल//
न फळे उत्तर/ नाही स्वामी जो सादर/
तुका म्हणे भेटी/ जंव नाही दृष्टादृष्टी//
ज्याच्या डोळ्यात भावभक्तीच्या पाण्याचा टिपूस नाही, आणि जोपर्यंत अंतरंगात हरी विषयी कळवळा नाही, तोपर्यंत त्याच्या भक्ती विषयी भारलेल्या सर्व गप्पा पोकळ आणि फक्त करमणूक करणाऱ्या असतील. स्वामींची कृपा असल्याशिवाय ते अभक्ताला कधीही भेटणार नाहीत. वरवरची प्रार्थना केवळ पोकळ आहे.
ढोंगी भक्तांविषयी या अभंगात महाराजांनी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे.
टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी/
देखो नेदी जगी फासे जैसे//
धीवर या मत्स्या/ चारा घाली जैसा/
भीतरील फासा /कळो नेदी //
खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी /
कापावया नळी तयासाठी//
तुका म्हणे तैसा भला मी लोकात/
परी तू कृपावंत पांडुरंग//
जो बहुरूपी असतो तो त्याचे वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळ्यासारखा ध्यानस्थ बसतो. त्याचप्रमाणे मैद म्हणजे ढोंगी लोक स्वतःला भक्त म्हणविणारे, कपाळावर सतरा टिळे लावतो, गळ्यात कसल्या कसल्या माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो आणि जगाला लुटण्याचे त्याचे आतील बेत कळू देत नाही. या लोकांची जात जशी काही फासेपारध्यांसारखीच असते. गळाला काहीसे आमीष लावून मासे अडकविण्याचा हा प्रकार आहे. खाटीक बोकड पाळून त्याला धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यास कापतो. अभक्त मंडळी याहून वेगळी नसतात, असे तुकारामांचे स्पष्ट मत आहे.
पाखंडी लोकांना महाराज सतत सांगत आहेत की तुम्ही अनुभवावाचून बडबड करणे थांबवा. ही तुमची बडबड म्हणजे बाळंत न होता बाळंतीणीप्रमाणे स्वतःवर सर्व सोपस्कार करून घेणे आहे.
व्याल्याविण करी शोभून तातडी/
चार ते गधडी करीतसे//
अशा लोकांना ते गधडी म्हणतात. (बिनडोक)
काही नित्यनेमाविण/ अन्न खाय तो श्वान/
वाया मनुष्यपण/ भार वाहे तो वृषभ//
त्याचा होय भूमी भार/ नेणे जातीचा आचार//*
जाला दावेदार/ भोगवी अघोर पितरासी//
अखंड अशुभवाणी / खरे नच बोले स्वप्नी//
पापी तयाहुनी नाही/ आणिक दुसरा//
पोट पोसी एकला/ भूती दया नाही ज्याला/
पाठी लागे आल्या/ अतिताचे द्वारेशी//
काही संतांचे पूजन/ न घडे तीर्थाचे भ्रमण//
यमाचा आंदण/ सीण थोर पावेल//
तुका म्हणे त्यांणी/ मनुष्यपणा केली हाणी//
देवा विसरूनी/ गेली म्हणती मी माझे//
वरील अभंगात तुकाराम महाराजांनी अभक्त लोकांचे वर्णन केले आहे. भोजनाआधी देवपूजा करणे, गीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा जप जाप्य करणे असा काही नियम जो पाळत नाही, तो मनुष्य कुत्र्यासमान आहे. मनुष्यपणाचा तो व्यर्थ भार वाहतो. खरंतर तो बैलच म्हणावा. अशा माणसाचा भूमीला केवळ भार आहे. आपल्या पितरांचा तो केवळ दावेदार आहे, कारण तो त्याच्या कुकर्माने त्यांना नरक भोगवितो. त्याची वाणी अशुभ आहे, स्वप्नातही त्याला खरे बोलता येत नाही. फक्त स्वतःपुरता विचार करून दारी आलेल्या अतिथीला तो हाकलून देतो. कधी संतांचे पूजन करीत नाही, की तीर्थाटन करीत नाही. असे लोक म्हणजे मनुष्यपणाची केवळ हानीच आहेत.
तुकाराम महाराजांना पाखंडी, (स्वतःला हरीचे दास म्हणणारे, ज्ञानी समजणारे) लोकांचा अनुभव फार जवळून मिळाला. अशा लोकांविषयी त्यांचे एक ठाम मत बनले, ते या अभंगातून आपण पाहूया.
अतिवादी लावी/ एका बोट सोंग दावी/
त्याचा बहुरूपी नट/ नव्हे वैष्णव तो चाट//
प्रतिपादी वाळी/ एका पूजी एका छळी/
तुका म्हणे नाही/ भूतदया ज्याचे ठायी //
एक मनुष्य कपाळाला काळी रेघ लावून आपण वैष्णव आहोत असे सांगत सुटतो. वादविवादही करतो, परंतु तो खरा वैष्णव नव्हे. तो वेशधारी बहुरूपी आणि खोटा आहे. तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिक्कार करतो, आणि एकाला पूजनीय मानतो व दुसऱ्याला छळतो. खरे वैष्णव तर सर्वांशी समान वागतात. ते भूतदयेने परिपूर्ण असतात. या पाखंडी लोकांच्या ठायी भूतदया जराही नसते.
ढोंगी लोकांना तुकाराम महाराज रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्याचे उदाहरण म्हणजे हा खालील अभंग…
जाऊनिया तीर्थ/ काय तुवा केले/
चर्म प्रक्षाळीले/ वरी वरी//
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले/
भूषण ते केले आपणया//
वृंदावन फळ घोळले साकरा/
भीतरील थारा मोडेची ना//
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया/
तोवरी कासया फुंदा तुम्ही //
ते म्हणतात, ” अरे ढोंगी माणसा, तू तीर्थास जाऊन केलेस काय? तर तुझ्या चामड्याचे प्रक्षा लन केलेस, तुझे कातडे फक्त पाण्यात भिजवलेस. तुझ्या अंतराचे काय? कडू वृंदावन फळ साखरेत किती घोळले तरी त्याचा उपजत कडूपणा जात नाही, तुझे तसेच आहे. तीर्थ स्नान करून तुझ्या मनाचे मालीन्य कसे जाणार? जोपर्यंत तुझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या भावना नाहीत तोपर्यंत तुम्ही हरीचे दास म्हणून गर्वाने फुलून जाऊ नका. “
तुकाराम महाराजांना खऱ्या भक्तीचा अर्थ म्हणजे मानवता, भूतदया, अंतःकरणाची शुद्धता हेच सामान्यांना सांगायचे आहे असे मला वाटते. तो खरा हरीचा दास आहे, त्यालाच माऊली आपल्या चरणी आश्रय देते.
अर्थ : सर्वकाळी सर्व शक्तिनिशी प्रेमभावाने कोणतीही चिंता न करता एक भगवंत भक्ति करण्यास योग्य आहे असे समजून त्याची भक्ती करावी.
विवेचन : एखाद्याने साधकाने साधना करायला सुरवात केली. सकाळी अमुक अमुक वेळ अमुक उपासना आणि संध्याकाळी अमुक वेळ अमुक उपासना. बाकीचा वेळ माझा भगवंताशी संबंध नाही, असे म्हणून किंवा अशी कृती करून चालणार नाही. त्याचे अनुसंधान सतत टिकले पाहिजे, त्यासाठी त्याने सतत विविध मार्ग शोधून भगवतांच्या चिंतनात राहिले पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग सर्व संतांनी सांगितले आहेत. त्यातील एक मार्ग आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करणे.
भक्ती ही केवळ काही वेळापुरती, उत्सवापुरती किंवा गरजेपुरती नसावी. ती सतत असावी. जेव्हा मन, वाणी आणि कृती या तिन्हींतून भगवंताचे स्मरण होते, तेव्हाच खरी भक्ती घडते.
भगवंताची भक्ती ही केवळ आनंद किंवा दुःखाच्या प्रसंगीच न करता, सर्व भावनांनी (जसे की प्रेम, भक्ती, करुणा, नम्रता, लोभ नसलेली तृष्णा, वियोग इ.) करावी. भक्त भगवंताशी प्रत्येक मनोभावाने जोडलेला असतो. समर्थ म्हणतात,
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥”
(संदर्भ : दासबोध दशक ४ समास ३)
ज्याप्रमाणात भक्ति वाढत जाते त्याप्रमाणात साधक निश्चिंत होऊ लागतो. कारण त्याच्या पाठीशी उपासनेची शक्ति उभी असते. एकदा देवाला, सद्गुरूंना साधक शरण गेला की त्याची सर्वोतोपरी काळजी सद्गुरू घेत असतात. असा सर्व संतांचा अनुभव आहे.
सर्व संतांमध्ये एक साम्य नक्की अनुभवायला मिळते, ते म्हणजे त्यांच्या अंतरी असलेले समाधान. त्यासाठी साधकाने आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून, आपली साधना अखंड करावी. सद्गुरू त्याला कायम सांभाळतात.
अर्थ : भगवंताचे कीर्तन किंवा नामस्मरण केले जाते, तेव्हा तो भगवंत फार लवकर प्रकट होतो आणि आपल्या भक्तांना आपले अस्तित्व जाणवून देतो.
विवेचन: समारोपाला चाललेल्या या लेखमालेच्या या सूत्रांत आपण भक्तीची फलश्रुती पहात आहोत.
या सूत्रात नारद मुनी आपल्याला भक्तीची एक अमूल्य अनुभूती सांगत आहेत. भक्त जेव्हा भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण, कीर्तन करतात, त्याचे नानाविध प्रकारे गुणगान करतात, तेव्हा भगवंत दूर नसतो. तो तत्क्षणी, शीघ्रतेने, त्या भक्तांच्या रक्षणासाठी, त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट होत असतो.
सर्व संतांची चरित्रे अभ्यासली तर आपल्या ही सहज लक्षात येईल. कोणत्याही भक्ताचे चरित्र अभ्यासा. त्या त्या भक्तासाठी भगवंत धावत आलेले आहेत. मग तो गजेंद्र असो की द्रौपदी असो, भक्त प्रल्हाद असो की ध्रुव बाळ असो. भगवंत भक्ताच्या आवश्यकतेनुसार तो सखुबाईचे दळण दळतो, कबिराचे शेले विणतो, कुंभाराच्या घरी मडकी भाजतो, पाणक्या बनतो… ! किती सांगावे…
माझ्या सारख्या सामान्य मनुष्यानं भगवंताचे यथार्थ वर्णन करणे निव्वळ अशक्य!!
भक्ताने भगवंताला बोलविले की तो येतो. हे सूत्र भगवंताच्या प्रेमळ आणि कृपामय स्वभावाचे वर्णन करते. तो आपल्या भक्तांना दूर ठेवत नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देतो. या सूत्रातून हे शिकायला मिळते की, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जटिल साधने आवश्यक नाहीत. प्रेमाने, भक्तिभावाने, नामस्मरणाने त्याचं आवाहन केलं की तो तत्काळ हजेरी लावतो. त्यामुळे भक्ती ही सहज, सुलभ, आणि सर्वोच्च साधना आहे. “कीर्तनातून भगवंताचा अनुभव मिळतो – हा भक्तीचा परमोच्च प्रभाव आहे. “
अर्थ : सत्य वचन, सत्य आचरण आणि सत्य संकल्प ही तीन सत्य वचने आहेत, पण त्यापेक्षा परम सत्याची भक्ति श्रेष्ठ आहे. केवळ भक्ति श्रेष्ठ आहे.
विवेचन :कोणताही काळ ज्याप्रमाणे नीतिमत्ता श्रेष्ठ मानली जाते, त्याप्रमाणे सत्य श्रेष्ठ मानले जाते. प्रामुख्याने सत्याचे तीन प्रकार सांगता येतील.
सत्य वचन (वाणीने सत्य बोलणे)
सत्य आचरण (कर्माने सत्य आचरण करणे)
सत्य संकल्प (मनाने सत्य व संकल्पशुद्ध असणे)
नारदमुनी या सूत्रात स्पष्ट सांगतात की, जरी एखादी व्यक्ती त्रिसत्य अर्थात वाणी, आचरण आणि संकल्प पूर्णपणे सत्यनिष्ठतेनी करणारी असली, तरीसुद्धा भक्तीच त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
एखादा मनुष्य खरे बोलणारा आहे पण त्याचे आचरण शुद्ध नाही. एखाद्याचे आचरण अतिशय शुद्ध आहे, पण त्याचा संकल्प शुद्ध नाही असे अनेक दोष मनुष्यामध्ये असू शकतात. काही लोकं प्रकांड पंडित असतात, पण त्यांचा अभिमान पण तितकाच मोठा असतो, अशा लोकांना देवाची भेट दुष्करचं असते, उलट एखादा मनुष्य पंडित नसेल, त्याला लिहिता वाचताही येत नसेल, पण त्याचा भाव शुद्ध असेल, त्याच्या मनात भक्तीचा अंकुर उगवला असेल, तर अशा मनुष्यावर देव प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असते.
“मनी नाही भाव आणि देवा मला पाव”
अशाने देव पावत नसतो. तर ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याला देव खात्रीने दर्शन देत असतो, असा अनुभव सर्व संतांनी घेतलेला दिसून येतो. अनेक संत लौकिक अर्थाने निरक्षर होते, पण आज त्यांच्या अभंगावर लोकं विद्या वाचस्पती ची पदवी घेत आहेत, त्यांच्यावर शोध प्रबंध प्रकाशित करीत आहेत, त्यांचे अभंग पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जात आहेत.
आपल्याकडे नुसते सत्याचे महत्त्व नाही, तर सत्याचरण करणाऱ्याने त्याला भक्तीची जोड दिली, तीच साधना पूर्ण करणारी ठरते. केवळ नैतिकता, सत्यतेचे पालन हे अध्यात्मासाठी पुरेसे नाही, तर त्याला भावपूर्ण भक्तीची जोड आवश्यक आहे.
मनुष्य भक्ति करू लागला की त्याचे भाडोत्री असलेले अवगुण त्याला सोडून जाऊ लागतात. ही भक्तीची किमया आहे. जिथे भक्ती आहे, तिथे सर्व सद्गुण आपोआप येतात. म्हणूनच नारदांनी दोनदा “भक्तिरेव गरीयसी” असे म्हणत भक्तीच्या श्रेष्ठतेवर जोर दिला आहे.
सत्य, नैतिकता, शुद्ध आचरण हेसुद्धा तेव्हाच सर्वोच्च ठरतात, जेव्हा त्यामध्ये भगवंतावरची भक्ती मिसळलेली असते. म्हणून भक्ती ही साध्यही आहे आणि साधनही. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. श्रीमहाराज एकदा नैमिष्यारण्यात जायला निघाले. त्यावेळी थोरल्या रामाच्या मंदिरातील रामाच्या मूर्तीतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज स्वतः आले आणि त्यांनी रामाचे डोळे पुसले, तेव्हा अश्रुपात थांबला. ही भक्तीची शक्ति आहे. अशी भक्ति असेल तर भगवंत खांबातूनही प्रगटतो. ही भक्तीच्या महानतेची काही उदाहरणे.
इथे श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील एक उतारा देत आहे – –
– – “खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान् लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. “
(संदर्भ : श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने दिनांक २७ जून)
आपल्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा आदर्श म्हणून स्वीकार केला परंतु प्रशासन ही लोकशाहीची शोषण यंत्रणा ठरली हे सुद्धा नाकबूल करून चालणार नाही. एके काळचे स्वतः पंतप्रधान जेव्हा सांगतात की एक रुपयांपैकी ८५ पैसे यंत्रणेमध्ये गायब होतात आणि प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसे पोहोचतात. याचा अर्थ प्रशासन यंत्रणा ही ८५% भ्रष्टाचारी आहे आणि शोषक आहे. प्रशासन यंत्रणेवर एवढा मोठा आरोप करून सुद्धा इतकी वर्ष होऊनही त्या आरोपाचे खंडन सुद्धा प्रशासन यंत्रणेतील कोणीही अजून पर्यंत केले नाही. भ्रष्टाचाराची सुरुवात ही प्रशासन यंत्रणेपासून झाली. कारण ब्रिटिशांच्या काळात मूठभर ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून राज्य करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला भ्रष्टाचाराचे स्वातंत्र्य देणे हे गरजेचे होते. प्रशासन यंत्रणा ही राज्यकर्त्यांची बटीक झाली ही फक्त पगारामुळे नव्हे, तर त्यांना मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या स्वातंत्र्यामुळे झाली. राज्यकर्त्यांपुढे लाचार होण्याचे भ्रष्टाचार हे सर्वात प्रमुख कारण होते. या प्रशासन यंत्रणेच्या भ्रष्टाचार स्वातंत्र्यामुळेच ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर एकतंत्री राज्य करणे शक्य झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही प्रशासन यंत्रणा ब्रिटिश कालीन प्रशासन यंत्रणेप्रमाणे जशीच्या तशी चालू राहिली. त्यावर अंकुश ठेवणे राजकीय सत्ताधाऱ्यांना संपूर्णपणे कधी जमलेच नाही. उलट पक्षी त्या प्रशासन यंत्रणेनेच स्वतःच्या सोयीसाठी हळूहळू राजकीय सत्ताधाऱ्यांनाच भ्रष्टाचारी जगामध्ये ओढून घेतले.
आता जर राज्यकर्त्यांना खरोखरच काही करायचं असेल तर त्यांना दुसऱ्या एखाद्या अभिनव पद्धतीने प्रयत्न करून बघावे लागतील. त्याचेही भले बुरे परिणाम कालांतराने दिसतीलच. त्यानंतर नवीन काही प्रयोग होतीलच.
नव्हे त्यांना ते तसे करावेच लागतील.
मला अजून आठवते ज्यावेळी मा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते त्यावेळी एक व्यंगचित्र आले होते. एक व्यक्ती त्यांना म्हणते आता तुम्ही पंतप्रधान झाले आहात तर सर्व भ्रष्टाचा-यांना दूर करा.
त्यावर ते असे उत्तर देतात ‘ If I have to remove all corrupt persons, then, one man cannot run the government’
व्यंगचित्रकाराने अगदी वर्मावरच बोट ठेवले होते.
मी जर भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करायची असेल तर काही दिवस माझ्या कार्यालयात सुद्धा भ्रष्टाचारी असतील तरी त्यांचे बद्दल लगेच कारवाई करता येणार नाही. तशी केली तर माझ्या कार्यालयामध्ये स्टाफच राहणार नाही. जर मी माझ्या पक्षातल्या लोकांवर प्रथम कारवाई करायची ठरवली तर माझे पद व अधिकार सुद्धा राहणार नाही.
शुद्धीकरणाची सुरुवात आता दूर वरून बाहेरून आत मध्ये करण्याची गरज आहे. आपल्याशी संबंध नसलेल्या दूरच्या लोकांच्यावर आणि विरोधी पक्षांवर कारवाई प्रथम सुरू करणे हाच पर्याय शिल्लक उरतो. फक्त एवढेच व्हावे की विनाकारण चांगल्या व्यक्तींना त्रास होऊ नये. जे खरोखर भ्रष्टाचारी आहेत त्यांचे वरच कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार विरोधात कार्यवाही धडाक्याने चालू आहे हे पाहिल्यानंतर एखाद्या वेळेस स्व पक्षातले किंवा जवळचे लोक सुद्धा त्या भीतीने भ्रष्टाचारामधून मुक्त झाल्यास उत्तमच. बाहेरची कार्यवाही हळूहळू पूर्ण झाल्यास, सगळ्यात शेवटी स्वतःच्या जवळच्या लोकांच्यावर कार्यवाही सुरू करता येईल.
अशा तऱ्हेचा एक नवीन पॅटर्न जर राबवता आला तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःच्या पक्षात सामावून घेतलेले भ्रष्टाचारी लोक सुद्धा आत्ताच्या वॉशिंग मशीन मुळे नाही पण नंतरच्या ब्रेन वॉशिंगमुळे भ्रष्टाचारापासून दूर राहतील असा एक प्रयोग जर करत असतील तर काही हरकत नाही.
आत्तापर्यंतच्या परंपरेने जे काही चालले आहे त्याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने पण सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता असेल तर एक नवा प्रयोगही करून पाहायला हरकत नाही. फक्त अशा कारवाया करताना विरोधी पक्षाचे असले तरीसुद्धा त्यापैकी खरोखरच भ्रष्ट असतील त्यांच्यावरच कार्यवाही व्हावी. विनाकारण विरोधातले म्हणून बदनामीसाठी त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उत्तमच. परंतु ती कार्यवाही न्याय यंत्रणे मार्फत व कायदेशीर मार्गानेच होणे आवश्यक असल्याने त्याला कालावधी प्रचंड मोठा लागणार आहे. ही त्यातली अडचणीची बाब ठरू शकेल. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये. सध्या बहुता तसेच घडते आहे. कारवाईची सुरुवात जोर जोरात गाजावाजा करून होते आहे. एकदा ती न्याय यंत्रणेच्या चक्रामध्ये अडकवून टाकली की मग शांतता कोर्ट चालू आहे! ती केस केव्हा निकाली निघू शकेल हे कोणी सांगू शकेल काय?
सध्या तरी अनेक प्रकाराने यंत्रणेमध्ये बदल करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचे छोटेखानी प्रयत्न चालू आहेत. लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा करणे. ऑनलाइन पद्धतीने काही गोष्टी केल्याने सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज भासू नये. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतील असे पाहणे. यातूनही खूप फरक पडतो आहे, पडला आहे.
काही बाबतीत सरकारी यंत्रणांची काही कामे खाजगी यंत्रणांकडे दिल्यास जो पैसा भ्रष्टाचारामधून काळ्याधना मध्ये जात होता, तो अधिकृतपणे खाजगी यंत्रणांना मिळाल्यास काय हरकत? लोकांचीही सोय आणि ती सोय झाल्यामुळे त्यांची चार पैसे खर्च करण्याची तयारी याचा सुवर्णमध्य निघेल. सध्या अशी यंत्रणा पासपोर्टच्या संबंधात वापरली जात आहे ती यशस्वीही होत आहे असे दिसते.
अशा वेगवेगळ्या मध्यस्थ सेवा निर्माण केल्यास लोकांचीही सोय होईल आणि रोजगाराचीही निर्मिती होईल. अनेक सरकारी यंत्रणांमध्ये आता ऑनलाईन अर्ज विनंती ही पद्धत सुरू झाली आहे. परंतु सर्वसामान्यांच्या अंगवळणी ही ऑनलाईन पद्धती पडत नाही. अशावेळी तरुणांसाठी अशा सेवांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती निर्माण करता येईल. सध्या रेल्वे, विमान इत्यादी आरक्षण सेवा अशा पद्धतीने दिल्या जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे आणि जनतेच्या उपयोगाची सुद्धा आहे. जुन्या पद्धतीने सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालून कंटाळून शेवटी नाईलाजाने खुर्चीवरील बाबूला पन्नास शंभर रुपये देऊन काम करून घेत असत. त्याऐवजी आता झालेले ऑनलाईन कामाचे प्रकार याबाबत सेवा देणाऱ्या बेरोजगार तरुणांना पन्नास शंभर रुपये सेवा शुल्क त्यांचे कडून ऑनलाइन सेवा उपलब्ध करून घेणे हे जास्त योग्य होईल. अशाप्रकारे
सामान्य जनतेची क्रयशक्ती जेवढी असेल त्यातून विविध सेवा उद्योगांना जास्त कामाची संधी मिळेल. त्यामुळे सामान्यजनांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणे यावर भर दिला जाणे ही गरजेची गोष्ट झाली आहे. त्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजना राबवून सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळता ठेवण्याची योजना राबवत आहे का ? पण त्याचवेळी ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली तर ही गोष्ट सुद्धा राष्ट्राच्या दृष्टीने धोकादायक आणि नुकसानीची ठरेल. त्यामुळे अशा योजना या फक्त मर्यादित कालावधीसाठी किंवा वेगळ्या पद्धतीने परंतु त्यामधील धोके टाळून राबवता येणे शक्य आहे काय याचाही विचार करून अत्यंत कौशल्याने योजनांची निश्चिती करणे आवश्यक ठरेल.
उद्योग व्यवसायामध्ये सरकारी यंत्रणांची लुडबुड कमी करणे. कर प्रणालीचे सुलभीकरण. अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन सरकारी कामकाजाचे सुलभीकरण. अशा विविध गोष्टी करण्याचा हळूहळू प्रयत्न चालू आहे असे दिसते.
या सर्व प्रयत्नांचे योग्य ते परिणाम कालांतराने दिसतीलच कारण हे परिणाम झपाट्याने होत नसतात, परंतु त्यासाठी एका गोष्टीची मात्र आवश्यकता आहे. सरकार जरी बदलले पक्ष जरी बदलले तरी हे बदल पुन्हा उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा परिणाम शून्य.
अर्थात भविष्यावर नजर ठेवून वाट पाहणे, याशिवाय आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या नशिबात दुसरे काय आहे?
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस १५ मे. रविंद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच आज आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊ या.
महर्षी देवेंद्रनाथ टागोर (ठाकूर) म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू देवेंद्रनाथ हे राजा (प्रिन्स) द्वारकानाथ टागोरांचे ज्येष्ठ पुत्र.
देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोड़ासाँको भागातील प्रसिद्ध वडिलोपार्जित वाड्यात १५ मे १८१७ रोजी झाला.
ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. फार पूर्वी तेथून या कुटुंबाने यशोहर गावी स्थलांतर केले. कालांतराने जातीबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली.
त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय, यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले.
द्वारकानाथ टागोर हे राजा राममोहन रॉय यांचे सहकारी होते. त्यामुळे देवेंद्रनाथांना लहानपणापासूनच राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राजा राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राजा राममोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र, देवेंद्रनाथांचे सहाध्यायी होते. बंगाली ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे.
राजा राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. त्यांनी एकेश्वरवादाचा (एकाच ईश्वराची पूजा) प्रसार केला.
(अपूर्ण-उरलेला भाग पुढील भागात)
—–
☆ गीत : ६७ ☆
THOU art the sky and thou art the nest as well.
O thou beautiful, there in the nest it is thy love that encloses the soul with colours and sounds and odours.
There comes the morning with the golden basket in her right hand bearing the wreath of beauty, silently to crown the earth.
And there comes the evening over the lonely meadows deserted by herds, through trackless paths, carrying cool draughts of peace in her golden pitcher from the western ocean of rest.
But there, where spreads the infinite sky for the soul to take her flight in, reigns the stainless white radiance. There is no day nor night, nor form nor colour, and never, never a word.
THY sunbeam comes upon this earth of mine with arms outstretched and stands at my door the livelong day to carry back to thy feet clouds made of my tears and sighs and songs.
With fond delight thou wrappest about thy starry breast that mantle of misty cloud, turning it into numberless shapes and folds and colouring it with hues ever changing.
It is so light and so fleeting, tender and tearful and dark, that is why thou lovest it, O thou spotless and serene. And that is why it may cover thy awful white light with its pathetic shadows.
THE same stream of life that runs through my veins night and day runs through the world and dances in rhythmic measures.
It is the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into tumultuous waves of leaves and flowers.
It is the same life that is rocked in the ocean-cradle of birth and of death, in ebb and in flow.
I feel my limbs are made glorious by the touch of this world of life. And my pride is from the life-throb of ages dancing in my blood this moment.