राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ बाबांचं लग्न… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆
“काका मला तुमच्याशी थोडं बोलायचयं संध्याकाळी भेटाल का? ” ईशानचा फोन आला आणि मी मनांत म्हणालो, ही वेळ कधीतरी येणारच होती.
ठरल्याप्रमाणे आम्ही भेटल्यावर ईशान म्हणाला “काका शॉक न्यूज आहे. बाबा दुसरं लग्न करायचं म्हणताहेत. अहो काका! त्यांचं वय काय आणि काही वर्षांपूर्वीच आई गेली ते दुःख तिच्यावरच प्रेम, तिच्या आठवणी कुठे गेलं हे सगळं? काका लोकं काय म्हणतील! माझं लग्न ठरलंयहो! पण डिम्पल लग्नाची आहे तिच्या लग्नाचं बघायचं सोडून हेच बोहल्यावर चढायचं म्हणताहेत, हे काही बरोबर नाही! काय म्हणावं बाबांना, त्यातून आई बाबांचं लव्ह मॅरेज झालं होतं तुम्ही तिघं एका कॉलेजातले, आईबाबांची आणि तुमची आधीपासूनची मैत्री होती आई बाबांच्या प्रेमाला तुम्ही साक्षीदार आहात. मग मला सांगा आता कुठं गेलं बाबांचं आईवरचे प्रेम?
ईशानच्या लाह्या तडातड् फुटत होत्या. माझ्या मित्राचं सुधाकरच म्हणजे त्याच्या बाबांचं वागणं त्याला अजिबात पसंत नव्हतं. ईशानला शांत करणं अवघड होतं कारण प्रकरण बरच तापलं होतं. आता तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची असं मी ठरवलं.
कारण सुध्याला कसंबसं लग्नासाठी तयार करून मीचं त्याला घोड्यावर बसवलं होतं आणि मुलांना समजावण्याची तयार करण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली होती. ईशान चिडून मानमर्यादा सोडून पुन्हा पुन्हा म्हणत होता “कसलं खुळ आहे हे? म्हातारचळ लागलय का बाबांना?
आता मात्र मीही चिडलो “ईशान सांभाळून बोल ते बाबा आहेत तुझे. तुम्ही मुलं स्वतःचा विचार करता, लोकांचा विचार करता पण सुधाकरच्या मनाचा विचार कधी तुम्ही केला आहे का? तुमच्या व्यापात, मित्र मैत्रिणीत, पार्ट्यात तू आणि डिंपल मजेत असता तुझी बहीण तर सदा घराबाहेरच असते वहिनी गेल्यापासून तुमचं घर म्हणजे धर्मशाळाच झालीय. बाहेरचं पिझ्झा बर्गर खाऊन पोट भरलेलं असतं तुमचं, पण खाण्याचे हाल होतात ते तुमच्या बाबांचे. दिवसभर एवढ्या मोठ्या घरात तो एकटा असतो वहिनीच्या आठवणीत डोळे गाळण्यात दिवस जातो त्याचा.
तुझी आई अंथरुणावर होती तेव्हा तर खूप सेवा केली त्यानी बायकोची. आणि आता त्यांच्या आजारपणात पथ्य पाणी सांभाळणार, काळजी घेणार त्याच्या सुखदुःखात साथ देणारं जवळचं माणूस हवंच. निराशेच्या डोहातून आम्ही मित्रांनी बाहेर काढलंय त्याला, तेव्हा आली होती का बाहेरची लोकं? आणि तु म्हणतोस, लोकं काय म्हणतील. ” मी संतापून त्याला जाब विचारत होतो.
ईशानचा पारा खाली उतरत होता. तो म्हणाला, “तरी पण.. तरीपण काका. “. ईशान तुझा हा पण मागे घे. नीट ऐक उद्या तुझं लग्न झालं की तु परदेशात स्थायिक होण्याचं ठरवलं आहेस. जाशील तिकडचाच होशील, आता प्रश्न आला डिंपलचा ती लग्नाची आहे पण लग्नाला तयारच नाहीये. स्वातंत्र्याचा वारं तिच्या डोक्यात शिरलयं कारण तिच्या अपेक्षांचा डोंगर वाढतच चाललाय. अटीतटीचा मामला मिटतच नाहीय्ये.
सुधाकरने आणलेल्या स्थळांना धडाधड नकार देण्यात लग्नाचं वय सरतय आणि आता तर ती म्हणतेय मला लग्नच करायचं नाही. माझ्या म्हणण्याला पुष्टी जोडत ईशान म्हणाला. डिंपलचं मलाही काही कळत नाहीये. तिच्या काळजीने आई लवकर गेली.
त्याच्या बोलण्याचा धागा पकडून मी म्हणालो, “ईशान बेटा, पोरीच्या लग्नाची काळजी करून, परिस्थिती पुढे हात टेकले होते रे तुझ्या आईने, शेवटी ती माऊली वेगळ्याच विचारात गढली, रात्रंदिवस तिला फक्त सुधाकरची काळजी वाटायला लागली होती. आजारपणामुळे, भीषण भविष्यकाळ डोळ्यापुढे नाचत होता. तुझ्या बाबांची, सतत कसं होणार ही काळजी वाटत होती रे तिला.
आमच्या तिघांची मैत्री होती ना आधीपासून, त्या विश्वासाने एकदा वहिनी मोकळेपणी माझ्याजवळ म्हणाली, माझी शेवटची इच्छा आहे दीना, मी गेल्यावर ह्यांना एकटं राहू द्यायचं नाही त्यांचं दुसरं लग्न लावून देण्याचे वचन तुझ्याकडून मला हवं आहे
आणि ईशान त्या माऊलीच्या वचनात मी वचनबद्ध झालो.
बाळा आजच्या जगात खूप स्पर्धा आहे जो तो पुढे पुढे धावतोय. त्यात जवळची माणसं, आईवडिलांकडे बघायला, त्यांच्याजवळ बसायला, मनातलं जाणून घ्यायला कुणालाच वेळ नाहीये. वडीलधाऱ्यांच्या हळव्या मनाची, त्यांच्या मनातल्या काळजीची, एकटेपणाची खिल्ली उडवली जाते. तु समंजस आहेस. शांतपणे विचार कर. बाबांच्या बाजूने विचार केलास त्यांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात डोकावून बघितलंस तर तुला कळेल, अजूनही ते तुझ्या आईच्या आठवणीत अडकले आहेत. पण आता काही इलाजचं नाहीय्ये अनंताच्या प्रवासाला गेलेली तुझी आई, परत न येणाऱ्या वाटेवरून पैलतीरी पोहोचलीय. पण सुधाकरचं काय! उभं आयुष्य पडलं आहे. तु यूएसला जाणार. डिम्पल लांब रहाणार कारण तिने सांगूनच टाकलयं ‘मी स्वतंत्र रहाणार आहे. कुणाच्यात मला अडकून पडायचं नाही. मग तुझ्या बाबांच्याकडे बघायला, सुखदुःखात, आजारपणात सोबत ही हवीचं नाही का!
ईशान तसा संस्कारी, भावनाप्रधान होता माणसाच्या मनाचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उमटतं. नकळत त्यांचे डोळे पाणावले होते तो म्हणाला, ” काका इतका विचार आम्ही मुलांनी कधी केलाच नव्हता. आईबाबांशी कधी प्रेमाने बोललो नाही, त्यांच्याजवळ बसून त्यांच्या भावना प्रेम आम्ही कधी समजूनच घेतलं नाही. सतत बाहेरच वारं, मित्रमैत्रिणी पार्ट्या आणि पैशाच्या मागे धावताना फक्त स्वतःचाच विचार करून स्वार्थ साधलाय आम्ही. मला खूप पश्चाताप झाला आहे काका, तुम्ही झणझणीत अंजन घातलंतं माझ्या डोळ्यात.
आई तर आता नाही ह्या जगात पण हे लक्षात आलंय माझ्या, झालेली चूक मी सुधारणार आहे. बाबांना सुखी झालेलं बघायचे मला. तरुणपणी, माध्यान्हकाळी लागत नाही इतकी साथीदाराची सोबत आयुष्याच्या संध्याकाळी आवश्यक असते.
स्वार्थाच्या डोंगरावर चढताना पायथ्याशी असलेल्या आई-बाबांना आम्ही मुले विसरतो हे चुकलचं आमचं “
ईशान मनापासून, भरभरून बोलत होता. तो आता इतका उतावळा झाला होता की असं वाटलं हा पठ्ठया आत्ताच बाबांना बोहोल्यावर चढवतोय की काय असं मनांत आलं आणि हंसू फुटलं.
त्याच्यातला बदल मला जाणवला. माझं काम फत्ते झालं होतं. गड इतक्या लवकर ‘सर’ होईल असं वाटलं नव्हतं. तो पुढे म्हणाला, “काका केवढं मोठ्ठ काम केलंत. आमचे पाय तुम्ही जमिनीवर आणलेत. तुमचे विचार पटले मला. जग पुढे गेलयं. डिम्पलला पण हे पटेल. ती सोशल सुधारक विचारांची आहे.
आता एकच विनंती आमच्यासाठी नवी आई आणण्याचं काम तुमचं. मी यूएसए ला जाण्यापूर्वी लग्नाच्या तयारीला लागतो. माझ्या चेहऱ्यावर खट्याळ हंसू उमटलं पण त्या मिस्कील हास्या मागे दडलेलं गुपित मी त्याच्यापासून क्षणभर लपवलं. कारण सुधाकरसाठी आम्ही मित्रांनी आधीच एक जोडीदारीण शोधून ठेवली होती.
बाबांना भेटण्यासाठी, त्यांना मिठी मारण्यासाठी उतावळा झालेला लेक वळून म्हणाला. “काका पण माझी एक अट आहे माझं लग्न आधी होणार’ ते ऐकून मी चमकलो. मनात म्हणालो, आला का ह्याचा स्वार्थीपणा उफाळून ‘
माझ्या चेहऱ्यावरचा भाव ओळखून तो हसत म्हणाला, “आधी लग्न माझं मग बाबांचं अशी घोषणा मी का करतोय ते समजून घ्या काकामहाराज बाबांच्या लग्नात देवदेवक मी माझी बायको स्नेहा बसवणार. आणि नवीन पद्धत सुरू करणार. लग्न शास्त्र शुद्ध वैदिक पद्धतीने करूयात आपण. नव्या आईच्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचाय मला. आणि आमच्या नव्या पिढीला दाखवून द्यायचय, आपण आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांचं मन जाणायला हवं त्यासाठी नवीन पायंडा पाडावा लागला तरी चालेल.
ईशानचा उत्साह बघून मलाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला जवळ घेऊन म्हणालो, ” बेटा ये हुई ना बात ‘पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा”
आता हा झेंडा घेऊन मला सुध्याला गाठायला हवं. तो अस्वस्थ होऊन येरझारा घालत असेल.
अरे पण! ईशान– तो तर केव्हाच पुढे पळाला होता. लग्नाची तयारी करण्यासाठी उतावळा झाला होता.
मंडळी विषय वेगळा आहे पण आशय मोठा आहे. जग सुधारलय, अशा गोष्टी घडल्यात, घडतील आणि सगळ्यांच्या सुखसोयीसाठी त्या घडाव्यात. असं झालं तर
सर्वे संतु निरामय:
असंच होईल.
☆☆
© राधिका माजगावकर पंडित
सन सॅटॅलाइट पुणे – 51
मो. 8451027554
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈





