तृप्ती देव
मनमंजुषेतून
☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆
(तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द! _
इथून पुढे – –
त्यानंतर मी विचार केला की, झोपेत असताना उशी तोंडावर दाबून गुदमरवून मारावं. यात रक्ताचा थेंबही सांडणार नाही आणि काही वायाही जाणार नाही. मी लिहिलं, “तो सावलीसारखा बेडजवळ गेला आणि त्याने सुती उशी त्या पात्राच्या तोंडावर जोरात दाबली… ” पण लगेच माझ्या मनात विचार आला, “अरेरे! ती उशी आणि त्याचं कव्हर तर अगदी नवीन आहे. माणूस वाचण्यासाठी हातपाय मारेल, तडफडेल, त्याने ते कव्हर फाटून जाईल किंवा खराब होईल. नको नको, उशी नको. ” उशीचा प्लॅनही फ्लॉप झाला. शेवटी मी ठरवलं की आपण स्वतः काही करायला नको, निसर्गावर किंवा नशिबावर सोडून देऊ. ‘अपघात’ दाखवू या. मी लिहिलं, “खुन्याने रात्रीच्या अंधारात त्याच्या कारचे ब्रेक निकामी केले. दुसऱ्या दिवशी तो कार घेऊन घाटातून जात असताना… ” पण लगेच माझ्या मनात पाझर फुटला, “अरे, पण घाटात गाडी चालवताना कारमध्ये त्याच्यासोबत त्याची बायको लहान मुलं किंवा एखादा निरपराध मित्र असेल तर? एकाच्या पापात बाकीच्या निष्पाप जीवांचा बळी का? कार दरीत कोसळली तर संपूर्ण कुटुंब संपून जाईल. ” माझ्या संवेदनशील मनाने कारचे ब्रेक पुन्हा जागेवर दुरुस्त केले. कथा पुन्हा शून्यावर आली!
दोन दिवस झाले होते. माझ्या वहीत खाडाखोड करून फक्त चार ओळ्या उरल्या होत्या, पण माझ्या डोक्यात मात्र चाळीस जिवंत माणसं इकडून तिकडे फिरत होती. मला रात्री झोपेतही तेच विचार यायचे. दोन दिवस सतत विचार करून माझं डोकं जाम झालं होतं. शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी साहित्याची जाणकार होती. मी तिला माझी अडचण सांगितली, “अगं, तूच सांग, तुझ्या कथेत मर्डर कसा करतात ग लोक? मला जमतच नाहीये. ” ती फोनवर शांतपणे म्हणाली, “वेडी आहेस का तू? अगं, तो खून खराखुरा नसतो. ती फक्त एक काल्पनिक कथा असते. पात्रं काल्पनिक असतात. ” मी हताश होऊन म्हणाले, “मला माहिती आहे गं ते काल्पनिक असतं. पण जेव्हा मी लिहायला घेते, तेव्हा माझं मन त्या पात्रांना जिवंत समजतं. मला वाटतं मी खरोखरच कोणाचा तरी जीव घेतेय. ” माझं हे भाबडेपण ऐकून ती फोनवर पोट धरून हसायला लागली.
त्या रात्री मन हलकं करण्यासाठी मी टीव्ही चालू केला. एका वाहिनीवर गुन्हेगारीवर आधारित मालिका सुरू होती. त्यात एका माणसाने क्षणात खिशातून बंदूक काढली आणि समोरच्यावर गोळी झाडली. समोरचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. मी दचकून रिमोटने टीव्ही लगेच बंद केला. मनात एकच प्रश्न आला, “हे पडद्यावर किंवा पुस्तकात इतकं सहज कसं दाखवतात? माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का? ” दुसऱ्या दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्याच पानावर मोठी बातमी होती, “जमिनीच्या किरकोळ वादातून सख्या भावाने केला भावाचा खून. ” पान उलटलं, तर दुसऱ्या पानावर बातमी होती, “मोबाईल गेमवरून झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा जीव घेतला. ” मी काही क्षण स्तब्ध झाले. वर्तमानपत्र हातातून गळून पडलं. कालपर्यंत ज्या विषयावर मी घरात विनोद करत होते, पती आणि मुलासोबत हसत होते, ते वास्तव किती भयानक, क्रूर आणि वेदनादायी आहे याची मला जाणीव झाली. समाजात माणसाच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे? किती सहजतेने हत्या आणि मर्डर होते.. मी तर माझ्या पायाखाली मुंगी पण मारू शकणार नाही.
आणि धडा धड दररोज मर्डर होतात आहे.
मी पुन्हा माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि वही उघडली. या क्षणी माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. मी ठरवलं, मी मर्डर मिस्ट्री लिहिणारच नाही. माझ्याकडून कोणाचा खून होणार नाही— अगदी कागदावरसुद्धा नाही! त्याऐवजी, मी पेन उचललं आणि एका वेगळ्याच कथेला सुरुवात केली. मी एका अशा लेखिकेची कथा लिहायला घेतली, जिला स्पर्धेसाठी मर्डर मिस्ट्री लिहायची असते, पण अत्यंत संवेदनशील मनामुळे हजार प्रयत्न करूनही तिच्याकडून कथेत कोणाचा खून होत नाही. ती कशी पात्रांना वाचवत राहते, याची ती एक हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी कथा होती.
स्पर्धेचा दिवस आला, मी माझी ती ‘वेगळी’ कथा पाठवून दिली. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे माझ्या कथेला पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळाला नाही. कारण कथेच्या मुख्य अटीनुसार त्यात ‘मर्डर’ किंवा ‘रहस्य’ नव्हतंच. पण निकालपत्राच्या शेवटी परीक्षकांनी माझ्या कथेबद्दल विशेष नोंद म्हणून एक ओळ लिहिली होती. ती ओळ वाचून माझे डोळे भरून आले. तिथे लिहिलं होतं, “ही कथा कोणत्याही गुन्ह्याची किंवा रक्ताची नाही; तर ही एका अत्यंत संवेदनशील आणि जिवंत मनाची कथा आहे. लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत. ” तो कागद हातात धरून मी बराच वेळ शांत बसून राहिले. तो पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान होता.
संध्याकाळी चहा पिताना नवरा हसत हसत म्हणाला, “चल काही हरकत नाही. यंदा नंबर नाही आला तर काय झालं? पुढच्या वर्षी नक्कीच प्रेमकथेची किंवा कौटुंबिक विषयावरची स्पर्धा असेल. तेव्हा बघू. ” मी चहाचा घोट घेतला आणि हसून म्हणाले, “हो… ते माझ्याकडून नक्कीच होईल. त्यात मी अव्वल येईन. ” त्याने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं, “आणि मर्डर मिस्ट्री? ” मीही तितक्याच आत्मविश्वासाने आणि हसून उत्तर दिलं, “माझ्याकडून कागदावरसुद्धा मर्डर होत नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात तर प्रश्नच उद्भवत नाही! “
त्या दिवशी मला जगण्याचं आणि लेखनाचं एक खूप मोठं सत्य कळलं होतं. लेखक तो मोठा नाही, जो आपल्या लेखणीच्या बळावर सहज एखादं पात्र मारून टाकतो आणि क्रूरता निर्माण करतो. खरा लेखक तर तो असतो, ज्याच्या मनात आणि लेखणीत पात्रांना जिवंत ठेवण्याची ताकद असते, जे पात्र वाचकांच्या मनात घर करून राहतं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतं, तर काही लोकांच्या हातात पेन असतं. शस्त्र माणसाचा जीव घेऊ शकतं, समाजात भीती पसरवू शकतं. पण एक पेन… ते माणसाची मेलेली मनं आणि संवेदना जिवंत ठेवू शकतं. आणि कदाचित म्हणूनच, मला सार्थ अभिमान आहे की आजपर्यंत माझ्याकडून कागदावर का होईना, पण एकही “मर्डर” झाला नाही आणि माझी लेखणी नेहमीच माणुसकी जपणारी राहिली!
धन्यवाद
– समाप्त –
┉❀꧁꧂❀┉
© तृप्ती देव
भिलाई, छत्तीसगड.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





