मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निघून गेलेली सावली…  लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ निघून गेलेली सावली…  लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(आई आणि मुलाच्या नात्यातल्या न बोलल्या वेदनांची कथा)

घरात… पण परकं वाटणारं..

“आई, आता पुण्यातच राहा. बंगलोरमध्ये कामाच्या घाईत मी वेळ देऊ शकत नाही. “

शुभमचं वाक्य ऐकून सुलभा ताईंनी शांतपणे मान डोलावली.

काहीशा हसऱ्या चेहऱ्याने, पण डोळ्यांत क्षणभर ओल आली.

शुभमला ती दिसली नाही… तो आधीच फोनकडे वळला होता.

 

सगळं आयुष्य मुलासाठी काढून, वयाच्या सत्तरीत त्या पुन्हा एका नवीन आयुष्याच्या पायरीवर उभ्या होत्या.

मुलगा मोठा झाला, कमावता झाला…

पण आयुष्यभर आईने उरलेलं सगळं गुंफून ठेवलेलं नातं, आता स्वतःचं वय गाठत होतं.

 

नवऱ्याचं अचानक निधन झालं…

माणसं जरा थांबली, सांत्वना दिली, आणि निघून गेली.

घर, ज्यात दोन पिढ्या घालवल्या, आठवणींनी भरलेलं – विकावं लागलं.

“आई, ते जुनं गावातलं घर विकून टाक. मी पुण्यात बघतो एक चांगली जागा. “

तेव्हा सुलभा ताईंनीही काहीच विचारलं नाही.

फक्त विचारलं – “तुला वेळ होईल का माझ्यासोबत राहायला? “

शुभम म्हणाला – “पुणं सोयीचं होईल दोघांसाठी. “

 

आता, त्याच मुलाने प्रेमाने, काळजीने, व्यवस्थेने सांगितलं –

“पुण्यात तू एकटी नको राहूस. ” तू इकडेच ये.

 

पण त्या वाक्याच्या आड एक अधुरी जाणीव दडलेली होती –

“आई, तू इथं राहा, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. “

 

सुलभा ताईंनी कपाट उघडलं, आणि जुन्या साड्या उचलायला लागल्या.

एका साडीच्या घडीत शुभमचा लहानपणीचा शाळेचा रिबन सापडला…

ती साडी अलगद डोळ्यांशी नेली.

क्षणभरात ती मुलाची आई परत झाली –

 

आता तीच आई नवीन शहरात एकटी राहणार होती, जिथं आठवणी नव्हत्या… फक्त भिंती.

 

घर मोठं होतं. सुखवस्तू. प्रिया – सून – नोकरी करणारी, सोज्वळ. नातू – रियांश – दुसऱ्या वर्गात.

पण घरात त्यांच्यासाठी जागा होती, “सुलभा ताईं” म्हणून. ‘आई’ म्हणून नव्हे.

 

पहिल्याच दिवशी, त्यांनी प्रियेच्या स्वयंपाकात मदत करायला विचारलं.

 

प्रिया सौम्य हसली, पण थोडीशी संकोचलेली –

“आई, मी ऑफिसहून येताना थकलेली असते, माझं एक ठरलेलं पॅटर्न असतं, “तुम्ही आराम करा ना! “

ती म्हणाली आणि लगेच AirPods कानात घातले.

किचनमध्ये automatic rice cooker सुरू झाला, आणि गॅसवर ready-to-eat पॅक गरम होऊ लागला.

 

सुलभा ताई काहीच बोलल्या नाहीत.

पण त्यांच्या डोळ्यांतला उत्साह मंद झाला.

 

“आई, तुम्ही आराम करा, “

हे वाक्य “आई, तुमचं काही काम नाहीये इथं” असं अनाहूतपणे कानावर पडून गेलं.

 

सुलभा ताई परत आपल्या खोलीत आल्या. रेस्ट पॅटर्न मधे.

सुलभा ताईंचं सगळं प्रेम आता रियांशभोवती फिरत होतं.

सकाळी दूध, संध्याकाळी फळं… आणि संध्याकाळी गच्चीत खेळणं हे त्यांचं दिवसाचं गोड वेळापत्रक होतं.

ती रियांशला झुला झुलवत, गाणी म्हणत –

“अरे माझा पोपट राजा, आई कुठं गेली? “

तो हसून म्हणायचा – “ऑफिस! “

 

एक दिवस, गच्चीवर जाण्याच्या तयारीत असताना प्रिया म्हणाली –

“आई, त्याला उन्हं लागून जाईल… त्याला उन्हाचा त्रास आहे. “

सुलभा ताईंनी गप्प बसून खेळण्याची चप्पल बाजूला ठेवली.

 

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी विचारलं –

“रियांशला वर घेऊन जाऊ का ग, थोडा खेळवते? “

 

प्रिया म्हणाली –

“आई, आज त्याचे ऑनलाइन क्लास आहेत… तुम्ही त्याला disturb करू नका. “

 

‘डिस्टर्ब करू नका’… हे दोन शब्द सुलभा ताईंना दिवसभर बोचत राहिले.

 

रियांश आता डोळ्यांवर चष्मा घालून स्क्रीनकडे बघायचा, आणि सुलभा ताई त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायच्या.

पण आता तो उठून बिलकुल यायचा नाही.

कदाचित त्याला आईनंच सांगितलं असेल…

 

त्या रात्री सुलभा ताईंनी त्यांच्या जुन्या चष्म्याच्या डब्यात एक कागद ठेवला.

त्यावर लिहिलं होतं –

“मी रियांशला खेळवते, पण त्याच्या आयुष्यात अजून फक्त एक ‘notification’ बनून राहायचं नाहीये. “

दुसऱ्या दिवशी, रियांशला त्यांनी झोपताना गोष्ट सांगितली.

“एक राजा होता…”

 

“आजी, प्लीज! मला कार्टूनचं अॅप लाव ना! “

शुभम आतून ओरडला, “आई, त्याला गोष्टींपेक्षा मोबाईलवर कार्टून आवडतात आता. “

 

रोजचे संवाद मर्यादित… “आई, पाणी पाज. ” “आई, भाजी झाक. “

आईला ‘होते’ होण्याची सुरुवात झाली होती.

 

‘आई’ असणं, ‘असणं’ न उरतं

 

प्रत्येक दिवशी सकाळी शुभम आणि प्रिया दोघंही ऑफिसला निघायचे.

 

सुलभा ताई दररोज आपल्या कोपऱ्यात शांत बसायला लागल्या.

कधी तरी त्या दिवसभरात बोललेलं एकमेव वाक्य असे –

“रियांशने जेवलं का? “

 

प्रिया कधीच आईशी भांडत नाही. पण संवादही फारसा नाही.

ना एकत्र स्वयंपाक, ना एकत्र टीव्ही. ना एकत्र चहा.

 

प्रिया आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करते, मदर-इन-लॉचा उल्लेख “She’s there… in her room mostly. ” असा करते.

 

शुभम हल्ली आईशी कमी बोलतो. केवळ आवश्यक उत्तरं.

प्रिया तर हसते, पण शब्दात एक अलिप्तपणा असतो.

 

“आई, फ्रीजमध्ये ठेवताना भाजी व्यवस्थित झाकून ठेव. वास येतो. “

“आई, तुला काही लागलं तर maid ला सांग. आम्ही मिटींगमध्ये असतो. “

“आई, थोडं टीव्हीचा आवाज कमी ठेव ना. रियांश अभ्यास करतोय. “

 

आवाज कमी केला जातो. आईच्या अस्तित्वाचा.

 

फ्लॅशबॅकमधली ‘आई’

 

एका दुपारी कपाट आवरताना शुभमचे जुने फोटो सापडले.

पहिलं बक्षीस, नाट्यस्पर्धा, पाढे म्हणताना…

त्या फोटोला पाहून डोळे भरून आले.

“हाच मुलगा. छोटा असताना माझ्या मांडीवर झोपायचा. त्याच्या तापात मी रात्रभर जागी राहायचे… आणि आता मी जर गप्पा मारल्या, तर disturb वाटतं त्याला? ”

 

सुलभा ताई पुन्हा डायरी उघडतात —

“मी कधी तिची सासू झालेच नाही… फक्त घरातली एक ‘म्यूट’ व्यक्तिरेखा आहे. “असचं वाटत.

 

“मुलं मोठी झाली की आईचं वय वाढतं … पण नातं मागेच राहतं का? “मुलं मोठी होतात. उंच वाढतात, जग बघतात, शिकतात, करिअर करतात… पण त्या वाढीच्या सावलीत एक शहाणी बाई हळूहळू वयात येते — ती म्हणजे आई.

.. कालपर्यंत जी पाटीवर अक्षरं गिरवत होती, ती आज मोबाईलवर टाईप करायला शिकते… मुलांसाठी.

.. कालपर्यंत जी नकार देत होती, आज ती समजून घेते… मुलांसाठी.

.. पण तिच्या आयुष्याचा काटा मात्र पुढे सरकत राहतो — हळूहळू, नि:शब्द.

 

मुलं विचारतात — “आई, तू शांत का झालीस? “

आई हसते… तिच्या चेहऱ्यावर थकव्याची लकीर असते, पण डोळ्यात अजूनही तेच प्रेम.

“शांत नाही ग, फक्त आवाज थोडा हळू झाला आहे. तुम्ही मोठे झालात ना! “

 

पूर्वी घरात कुठेही वळलं की तिची नजर आपल्यावर असे.

आता तीच नजर दरवाज्याकडे लागून बसते — ‘मुलं कधी येतील’ या विचारात.

एकेक करून सगळे मोठे होतात, आपापल्या आयुष्यात रमतात, आणि तिचं आयुष्य तिथेच थांबून राहतं.

 

ती आता विचार करत नाही की काय खायचं, काय आवडतं.

ती विचारते — “तुला काय हवंय? “

ती स्वतःसाठी कपडे घेत नाही, पण तुमच्या खरेदीत ती रमते.

ती आता काही मागत नाही — कारण आता ती ‘मुलांची आई’ राहिलेली असते, ‘स्वतःची व्यक्ती’ नव्हे.

 

पण प्रश्न राहतो —

“मुलं मोठी झाली की आईचं वय वाढतं … पण नातं मागेच राहतं का? “

 

नाही… नातं मागे राहत नाही.

ते कुठेही जात नाही… फक्त दुर्लक्षित होतं.

ते जपायचं असतं…

एवढंच की, जेव्हा आपण म्हणतो — “आई, वेळ नाही गं” — तेव्हा तिच्या दिवसाचा सगळ्यात मोठा अपमान होतो.

कारण तिच्या वेळाचा प्रत्येक क्षण आपणच होतो. एवढं लिहून आजचा दिवस परत एक चांगल्या आठवणीत गेला.

 

डायरी बंद करते.

 

रविवारी सर्वजण बाहेर गेले. आई घरीच.

शुभम म्हणाला, “आई, तुझी तब्येत हल्ली फारशी चांगली नसते, थोडं विश्रांती घे. “

 

त्या संध्याकाळी सुलभा ताईंनी प्रिया आणि शुभमला चहा दिला.

तेवढ्यात प्रिया चहा घेत म्हणाली –

“आई, थोडं कमी साखर घालायचं होतं. माझं डाएट चालू आहे. “

 

सुलभा ताई मनातल्या मनात म्हणाल्या –

“तिच्या डाएटचा विचार करताना माझ्या नजरेच्या अश्रूंनी कुणालाही ‘कॅलोरी’ वाटत नाहीत…”

 

एका दिवशी सुलभा ताईंनी शुभमला विचारलं –

“माझं जुने गावातलं घर आठवतं का रे तुला? चल एकदा जाऊया. थोडं आठवणींमध्ये फिरून येऊ. “

 

शुभम मोबाईलवर पाहत म्हणाला –

“आई, मी ट्रॅव्हल प्लॅन करत नाही. खूप बिझी आहे. “

 

प्रिया हसून म्हणाली –

“आई, तुम्ही तरी तिथे जाऊन काय करणार? गावात काय उरलंच आहे? “

 

सुलभा ताईंनी मान डोलावली. “हो बाई… काहीच नाही उरलं. “

 

पण त्या रात्री त्या उठून बसल्या. शेल्फमधून जुनं कपड्यांचं बॅग काढली. चार साड्या, औषधं, डायरी, आणि एक जपलेली फोटोफ्रेम – शुभम आणि त्याच्या वडिलांची.

 

सकाळी घरात शांतता होती.

आईचं रूम चा दरवाजा उघडा.

सामान नाही. फक्त एक चिठ्ठी:

 

“शुभम,

तुझ्या आयुष्यात मी अडथळा नाही,

म्हणूनच अडथळा नको वाटावा म्हणून निघतेय.

तू चांगला आहेस, प्रिया चांगली आहे.

फक्त माझ्या ‘आई’ असण्याचा अर्थ आता तुमच्या व्याख्येत बसत नाही.

म्हणून मी नजरेआड होतेय.

रियांशला सांग – त्याची आजी परत एक गोष्ट सांगायला कधीतरी येईल. “आईची माया अजूनही असते” असं एक वाक्य नक्की असेल.

 

तोपर्यंत, मी एका जुन्या घरात, एका गोधडीखाली,

आई म्हणून अजूनही तुझ्यासाठी प्रार्थना करत राहीन.

– तुझी आई अजून ही तुझीची. “

 

शुभम काहीच बोलू शकत नाही. प्रिया म्हणते, “तुमचं नातं होतंच ना? ती कुठेही गेली असेल, परत येईल. “

 

पण तो दिवसभर आईचा आवाज शोधतो — “शुभम, जेवलास का रे? “

“तुला पाणी आणून ठेवते रे! “

“थोडं थांब, थंडी पडतेय बाहेर! “

 

कोणीच काही बोलत नाही आता.

आता आवाज गेला… आणि पोकळी राहिली.

 

प्रिया विचारच करत राहिली,

“तिनं कधीच तक्रार केली नव्हती… पण त्यांनी असं का केलं? ”

 

रियांश दररोज विचारतो –

“आजोबा गेले… आता आजी पण गेली? “

प्रिया आणि शुभम काहीच बोलत नाहीत.

ते दोघंही एका अशा वास्तवात गुरफटलेत,

जिथे आई गेली हे बोलायचं नाही,

पण ती होती हे विसरायचंही नाही…

 

त्या रात्री, रियांशच्या पाटीवर एक चित्र होतं –

एक मोठ्ठं घर, त्याच्या बाजूला आजी, आणि तिच्या हातात गोष्टीचं पुस्तक.

खालच्या कोपऱ्यात एका लहानशा अक्षरांत लिहिलं होतं –

“आजी परत येईल, गोष्ट सांगायला! “

 

शुभम शांत होतो.

 

“ती जाताना काहीच घेऊन गेली नाही… पण मागे सगळंच पोकळ करून गेली. “ति असे पर्यंत कोणालाच कळली नाही.

 

कधी कधी लोक नातं संपवत नाहीत.

ते फक्त इतकं दुर्लक्षित केलं जातं की,

ते स्वतःच त्या नात्याच्या चौकटीतून बाहेर पडतात –

जेणेकरून त्यांना दोष दिला जाऊ नये…

 

तुटणं तर झालेलंच असतं ना?

फक्त त्याचा screenshot कुणाकडेच नसतो.

ना स्टेटसला लावायला,

ना आठवणीत जपून ठेवायला…

 

“तिला काय हवंय? “

हे कधीच ती सांगणार नाही… पण तिला अजूनही आपल्या आवाजाची, आपल्या स्पर्शाची, आपल्या संवादाची गरज असते हे विसरू नका.

लेखिका : तृप्ती देव

भिलाई 

प्रस्तुती : गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आजकालची लग्न म्हणजे” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आजकालची लग्न म्हणजे…” ☆ श्री मंगेश मधुकर

परिचयातल्या एकाच्या मुलीच्या लग्न होतं. आग्रहाचं आमंत्रण असल्यानं तासाभराचा प्रवास करून संध्याकाळी सहाच्या सुमारास विवाहस्थळी पोचलो. सव्वा सहाचा मुहूर्त होता. भल्या मोठ्या लॉनमध्ये जंगी तयारी. पाचसातशे खुर्च्या मांडलेल्या. पाहुणे मंडळीचा ओघ सुरू होता. स्टेजवर सत्कार सुरू होते. तीस-चाळीसजण तिथं उगीचच गर्दी करून उभे होते. माईकवर नावं पुकारणाऱ्या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये मोठा आवाज कुणाचा? यावर स्पर्धा चाललेली त्यात भरिसभर म्हणजे दोघं एकाचवेळी बोलत असल्यानं सत्कार घ्यायला येणाऱ्यांना नक्की कोणत्या बाजूला जायचं हे कळत नव्हतं. यामुळे वातावरण तापायला लागल्यावर नवरीच्या मामानं आपल्या माणसाला थांबायला सांगितल्यानं पुढचे सत्कार नीट सुरू झाले. काही वर्षांपासून लग्नात सत्काराचं फॅड बरचं वाढलंय. त्यावरून बऱ्याच मानपानाच्या घटना घडतात. खरं तर या सत्कारांकडं कोणाचं फारसं लक्ष नसतं पण त्याला फार महत्व आलंय. एवढं मात्र नक्की!! असो.

अचानक मुहूर्ताची आठवण झाल्यानं नवरा-नवरीला स्टेजवर बोलावलं गेलं तोपर्यंत साडे-सहा वाजलेले. मुहूर्तची वेळ टळून गेलेली पण त्याविषयी कोणाला देणघेणं नव्हतं. मुहूर्ताची वेळ फक्त पत्रिकेत छापण्यासाठीच असते. बाहेर डीजेच्या दणदणाटात वरात सुरू झाली.

घोड्यावर विराजमान नवरदेव, समोर नाचणारे मित्र-नातेवाईक तर लॉनच्या दाराशी वाट बघणारी नवरी. स्टेजवर चालू असलेले सत्कार आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टरमध्ये गुंतलेली पाहुणेमंडळी. असं एकूणच नजारा.

सुमारे पाऊण तासानं वरात दाराशी आल्यावर जोरात नाचगाणं झालं त्यात नवरदेवही नाचले. नवरीला पण आग्रह झाला पण ती आली नाही. सुवासिनींनी ओवाळल्यावर रंगबिरंगी दिव्यांच्या झगमगत्या रथात नवरा-नवरी बसले. साधारणत: पाचशे मीटरचं अंतर त्यातही रथाच्या बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी, मशीनमधून धूर सोडला जात होता सोबत सोनेरी कागदाची चमचम उधळली जात होती, पुढे सहा तरुणींचे समईनृत्य परंतु स्पीकरवरचं गाणं सारखं बंद पडायचं म्हणून वैतागून सगळ्याजणी चालायला लागल्या. या शाही वरातीचे उत्सवमूर्ती नवरा नवरी मात्र अवघडल्यासारखे बसलेले. त्यातही नवरी खूप एक्साईट झालेली. सगळा प्रकार फार भन्नाट, भारी वाटत असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं. नवरा मात्र बावचळल्यासारखा टकामका पाहत होता. रथ स्टेजजवळ पोचल्यावर सत्कार थांबले. दोन्ही कुटुंबातर्फे पुन्हा पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर दोन पुढऱ्याचं आशीर्वादपर भाषणं झालं आणि अंतरपाट धरला गेला.

पहिली मंगलअष्टका झाल्यावर अक्षतांची वारेमाप उधळण झाली. त्यानंतर एकच मंगलअष्टका म्हटली गेली आणि “लग्न” लागलं. आकाशात डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ती दहा मिनिटं चालली आणि “लग्न” मात्र अवघ्या तीन मिनिटांत लागलं. लगेचच पाहुणे मंडळीं जेवणाच्या हॉलच्या दिशेने पळाली. काही क्षणांपूर्वी सेलिब्रिटी असणारे नवरा-नवरी एकदम बेदखल अर्थात ती दोघंसुद्धा जग विसरून फोटोसाठी पोजेस देण्यात बिझी. नवीन जोडप्याला शुभेच्छा आणि आहेर देण्यासाठी लागलेल्या रांगेत मीही सामील झालो.

बुफे काउंटर जवळ तुफान गर्दी झालेली. दिसेल त्या मोकळ्या जागेत बसून खाणं चाललेलं. प्रत्येकाची ताटं गच्च भरलेली. त्यातलं बरंचसं टाकून दिलं जात होतं. अन्नाची नासाडी पाहून जेवायची इच्छा राहिली नाही. घड्याळात पाहिलं तेव्हा साडेआठ वाजून गेलेले. न जेवताच निघालो.

डोक्यात विचारांचा कल्लोळ…

  • आताशा ‘लग्न” मंगल सोहळा न राहता भपकेबाज इव्हेंट झालाय.
  • परंपरांसोबतच अनेक फिल्मी आणि खर्चिक गोष्टींच प्रमाण वाढलंय.
  • आपुलकी, आपलेपणा, अगत्य कमी आणि दिखाऊपणा जास्तच असतो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

त्यादिवशी ती मला सांगत होती, “मी आहे म्हणून यांचं बरं चाललंय. माझ्यामुळेच यांचं सारं सुरळीत चाललं आहे. संसाराचा रगाडा काही कमी असतो का? सगळं काही मी खांद्यावर पेलते म्हणून यांना कसली ददात नाही, तोशीश नाही. उद्या मी गेल्यावर यांचं कसं होईल गं? याची चिंता मला लागून राहिली आहे. ”

… थोडक्यात ‘मी मी आणि मीच’. माझ्या आधीही मीच, आताही मीच आणि नंतरही मीच. तिचं हे लांबलचक “मी पुराण” ऐकून मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं पण तिला काही समजूतीचं लवचिकतेचं, दूरस्थ, निवृत्त राहण्याबाबतीतलं काही सांगावं असंही मला वाटेना. कारण ती तिच्या ‘मीपणात’ इतकी डुबून गेली होती की माझं बोलणं तिनं माशी सारखं उडवून दिलं असतं. शेवटी मी तिला इतकंच म्हणाले, “खरोखरच तू सुपर वुमन आहेस. ”

आमच्या सोसायटीतल्या मिसेस उदगावकर ही अशाच. तशा त्या देखण्या आहेत, त्यांची राहणी नीटनेटकी आहे, धनवानही आहेत, पारिवारिक आयुष्यात तशा सुखीच. रोज संध्याकाळी कट्ट्यावर येतातही पण बाईच्या चेहऱ्यावर अदृश्य अक्षरे लिहिलेली जाणवतात. ”आय अॅम द बेस्ट! ” माझ्यासारखी मीच. जे जे काही नंबर वन ते सगळं सगळं माझ्याकडे आहे. ”

.. …. तशा बोलतात सगळ्यांशी पण चेहऱ्यावर असलेला कायमस्वरूपी, दुसऱ्यांच्या बाबतीतला तुच्छताभाव कधीही लपत नाही. ज्या दिवशी त्या कट्ट्यावर येत नाहीत तो दिवस भाग्याचाच असतो म्हणाना सगळ्यांसाठी.

“आज आल्या नाहीत का मिसेस “फुशारकी”? बरं झालं! ” असं म्हणून कट्ट्यावर एक अत्यंत नैसर्गिक असा हशा पिकतो.

समोरचे नानाही त्याच पठडीतले आहेत. ”आपलं बुवा असं आहे. भल्याभल्यांनी माझ्यापुढे नाकं घासली आहेत आता सांगा? ”

पण नानांच्या बाबतीत एकदा कुणीतरी म्हणाले होते, ” अहो! कोण विचारते या नानांना? निवृत्त झाले तेव्हा साधा निरोपसमारंभ ही कुणी आयोजित केला नाही यांच्यासाठी. एकही मित्र, स्नेही यांना नाही. पत्नी बिचारी त्यांचा हा अहंभाव, मीपणा नाईलाजाने सहन करते पण मुले कुठे विचारतात? ”

 – – थोडक्यात ही “मीपण” पांघरून वावरणारी माणसं असतात ना ती आपल्या पलीकडे काही जग आहे हे विसरूनच गेलेली असतात. अत्यंत अहमन्य आणि आत्मकेंद्री असतात ही.

मला आठवतंय एकदा मी माझ्या नातीने (वय वर्ष सात) काढलेलं एक सुंदर चित्र जवळच्या एका नातेवाईक स्त्रीला दाखवत होते. खरं म्हणजे तिने ते नीट पाहिलं सुद्धा नाही. कौतुक करणं तर दूरच राहो पण फाटकन म्हणाली,

.. “छे हो! हे तर काहीच नाही. माझ्या नातवाने केलेली पेंटिंग्ज तुला दाखवेन. रवी वर्माने पाहिली असती ना तर त्यानेही त्याचं कौतुक केलं असतं. आमच्या घरात एका खोलीत माझ्या सुनेने त्याची सर्व पेंटिंग्ज भिंतीवर छान रचनात्मक पद्धतीने लावून ठेवली आहेत. ये एकदा पहायला मग कळेल तुला. ”

– – तिच्या कलाकार नातवाचं मला का कौतुक नसावं पण *त्या दिवसाचा एक अत्यंत बावळट चेहरा म्हणून*(Todays Face या मोडमध्ये) माझा क्रमांक नक्कीच लागला असता…. तिनं माझ्या वात्सल्य भावनांना अथवा ममत्त्वाला किती दुखावलं याचा तिला पत्ताही नसेल इतकी ती स्वतःत गुंतलेली होती. तिच्या “मीपणाच्या” रम्य कल्पना विश्वात ती मात्र खरोखरच खुशीत असावी. *खुदपसंत* यालाच म्हणतात का?

अशा अहंभावात रमलेल्यांना काय कळणार हो संत रामदासांचा दासबोध आणि युगंधराची गीता? हे लिहिताना “गाढवापुढे वाचली गीता” ही म्हण मात्र माझ्या मनात अगदी बिनदिक्कत प्रवेश करती झाली.

भगवत गीतेनुसार “मीपण” म्हणजेच अहंकार, म्हणजेच दुःखाचे मूळ कारण. अहंकार सोडून निमित्तमात्र होऊन कर्म करणे, निस्वार्थ भावनेने जगणे आणि देहबुद्धी न ठेवता आत्मरूपाने राहणे, अहंकाराचे विसर्जन करणे, मीपण गळून जाणे हे तत्त्वज्ञान यांच्या कधीतरी पचनी पडो असाच धावा जणू मी या समस्त “मीपण” बाळगणाऱ्यांसाठी परमेश्वरापाशी करेन.

– – या “मीपण” असणार्‍यांच्या गोतावळ्यात जेव्हा मी चेंगरून जाते तेव्हा नकळत स्वतःलाही तपासून पाहते बरं का! मी थोडीच साधू संत आहे? तसे काही विकार माझ्यातही असणारच ना? *कोहम* हा प्रश्न माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा घुमतो तेव्हा मीही अशीच भांबावते. खरं म्हणजे त्या क्षणी ही जी काही माणसं माझ्या भोवती अहमन्यतेचे झेंडे घेऊन परिक्रमा करत असतात तेव्हा मी सावधपणे विचार करू लागते” मी कशी आहे? ” यापेक्षा मी कशी असले पाहिजे याकडे आपोआपच लक्ष केंद्रित करते. झाडावरून एक पान अलगद माझ्या पायाशी गळून पडतं आणि तेव्हाच त्या गळून पडलेल्या पानाच्या स्वधर्माशी मी मला तपासून पाहते. माझ्यात असलेलं “मीपण” हे असंच या पानासारखं गळून पडावं. नको अहंकार, नको मोह, नको पाश. मुक्त तरी जोडलेलं, स्वतंत्र तरी नम्र. “मी आणि माझे” या रेषा ओलांडून पूर्णपणे विसावलेलं असं माझं मन असावं मग या सुखाच्या अविकारी मार्गावरून जाण्याची मला ओढ लागते पण जमेल का मला हे?

खरं म्हणजे मनातल्या मनात मी कधीतरी, माझ्या भोवतालच्या या अहंकाराने पछाडलेल्या माणसांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच “मीपणा” गळावा या चिंतनयुक्त तत्त्व रेषेवर मी येऊन पोहोचलेली असते. समाजात अशा माणसांची होणारी थट्टा, उपहास, निंदा, नकोसेपण आणि पर्यायाने त्यांचे अंतिम एकटेपण पाहून मला या अवगुणांपासून दूर जावेसे वाटते.

– – एक असतो अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊन समाजात स्वतःचीच पाठ थोपटत बडेजावात मिरवणारा तर दुसरा असतो साधक, तपस्वी, स्थिर, शांत, निगर्वी. त्याच्या ठायी असलेल्या महान कलागुणांचा त्याला इतकासाही दर्प नसतो, अहंकार नसतो. तो त्याच्या प्रेक्षकांसमोर श्रोत्यांसमोर, शिष्यगणांसमोर आणि स्वतःच्या कलेशीही सदैव लीन असतो. श्रेयस आणि प्रेयस मधल्या कलहात तो कधीच नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत “मीपण” पार गळून गेलेला तो फक्त एक अभ्यासक असतो.

.. आज मी नसेन तशी, नाहीच. पण उद्याच्या वाटेवर मी नक्की प्रयत्न करेन.

‘ लहानपण देगा देवा … मुंगी साखरेचा रवा.. ’

– – यातला “लहानपण” हा शब्द खूप व्यापक आहे. ”लहानपण” म्हणजे मीपणा, मोठेपणा गळून गेलेला काळ.

.. “ भगवंता माझ्यातले “मीपण” असेच गळून जावे इतकेच माझे मागणे ”.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामियाचा केक… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

? इंद्रधनुष्य ?

☆ लामियाचा केक☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

काही वर्षांपूर्वी एका जंगल सफारी दरम्यान वाघाचे दर्शन घेण्यासाठी आमची धडपड चालू होती. हरणं, गवे, हत्ती दिसले पण वाघ काही दिसेना. परतीच्या वाटेवर दूर एका झाडामागे मला काहीतरी भास झाला. “वाघच असावा बहुतेक, ” मी म्हणाले, तर आमचा गाईड हसून म्हणाला, ” तो वाघापेक्षाही भयानक दोन पायांचा प्राणी आहे. ” या विधानाच्या सत्यतेचा अनुभव अनेक वेळा नराधमांच्या कृत्याच्या बातम्या वाचून आपल्याला येतो. क्रौर्य आणि हिंसेने बरबटलेल्या अनेक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या रूपाने कधी बाहेर येतात तर कधी सामूहिक अत्याचार आणि दंगलींच्या रूपात दिसतात.

जगाच्या इतिहासात प्रचंड हिंसाचार आणि क्रौर्य घडतं ते युद्धाच्या वेळी. सीमेवरील सैनिकच याचे बळी ठरतात असे नाही तर लहान मुलं, स्त्रिया हजारो निरपराध जीवांचं आयुष्य आणि अनेक पिढ्या युद्धामुळे उध्वस्त होतात. कधीही भरून न येणाऱ्या भळभळणाऱ्या जखमा युद्धामुळे तयार होतात.

लामियाची ही कथा अशीच एक. 1990 साल, इराक मधील एका छोट्या खेड्यात आपल्या आजी – बीबी सोबत राहणारी नऊ वर्षाची एक गोड मुलगी लामिया आणि तिचा हिंदी नावाचा एक कोंबडा. लामिया आपल्या काबाडकष्ट करणाऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होती. आजीला ती प्रत्येक कामात मदत करत असे. कंदीलाच्या प्रकाशात घरचा अभ्यास करणारी, आपल्या मित्रासोबत आपले स्वप्न बोलून दाखवणारी निरागस लामिया. सद्दाम हुसेन इराकवर राज्य करत होता. या तानाशहाचे गोडवे गाऊन शाळेतला दिवस सुरू होतो. ‘आमचं रक्त, आमचा आत्मा, आमचं सर्वस्व आम्ही त्याग करू आमच्या सद्दाम साठी. शत्रू ने आमचं अन्नपाणी, औषधे बंद केले, एवढेच काय आम्ही श्वास घेतो ती हवा थांबवली तरी आम्ही झुकणार नाही. ‘ अशी सद्दामच्या जयजयकाराची प्रार्थना होऊन शाळा सुरू होते. सायरन चे आवाज आणि आकाशात घिरट्या घालणारी विमानं छातीत धडकी भरत असतात. सद्दाम हुसेन चा वाढदिवस शाळेत साजरा करायचा असतो. त्यासाठी मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या शिक्षक काढतात. एक विद्यार्थी शाळा स्वच्छ करेल, एक ताजे फळं आणेल. केक कोण आणणार?

केक आणण्यासाठी चिठ्ठी निघते ती लामियाच्या नावाची. शाळेत रोज डबाही आणू न शकणारी लामिया सगळ्यांसाठी केक कसा आणणार? घरी पोहोचल्यावर आपल्या लाडक्या बीबीला ती ही बातमी सांगते. शेजारणी कडून ते आजीला आधीच समजलं असतं. शेजारणीचा मुलगा सईद लामियाचा मित्र. रात्री बीबी आणि लामिया केकला काय काय साहित्य लागणार, याची यादी करतात मैदा, साखर, बेकिंग पावडर इत्यादी. लामियाच्या वडिलांची आठवण म्हणून ठेवलेलं एक घड्याळ आणि अशाच काही जुन्या वस्तू झोळीत घेऊन लामिया, बीबी आणि हिंदी, लामियाचा कोंबडा दुसऱ्या दिवशी शहरात जायला निघतात. शहरात गेल्यावर बीबी काही जुन्या वस्तू विकून एक छान ड्रेस लामियाला घेऊन देते. मग ती तिला एका जुन्या ओळखीच्या संपन्न घरात घेऊन येते. ती म्हणते, ” मी आता म्हातारी झाली आहे. तुझं शिक्षण, खाणं- पिणं मला आता झेपणार नाही. तू आता यांच्यासोबत रहा. लामियाचा चेहरा कावरा -बावरा होतो.

“बीबी, तू माझ्यावर रागावली का? मी सगळं करेन. कपडे धुवेन. भांडी घासेन. तू म्हणशील ते ऐकेन. मला तू इथे नको राहायला सांगू. मी तुझ्याबरोबर येईन. तू केक साठी माझ्यावर रागावली आहेस का? ” बीबी काही उत्तर देईना. संधी साधून लामिया पळाली. तिला बिचारीला वाटलं की केक साठी बीबी आपल्यावर रागावलेली आहे. मी केकचं साहित्य जमवलं तर बीबी आपल्याला परत घरी घेऊन जाईल. बीबी लामियाला शोधत याला त्याला विचारता विचारता पोलीस स्टेशनमध्ये येते. पोलीस तिला काही दाद देईना. तिकडे लामिया गावात भटकत राहते. योगायोगाने तिचा मित्र सईद तिला भेटतो. केकचं साहित्य जमवण्यासाठी दोन लहान मुलांची केविलवाणी धडपड. कधी चोरी करतात, कधी लोक त्यांना फसवतात, कधी कोंबडा हरवतो, कधी भांडतात, रुसतात तर कधी एकमेकांसाठी जीव ओवाळतात. हॉस्पिटलमध्ये हातपाय तुटलेले लोक जेव्हा सईदला भेटतात तेव्हा सईद त्यांना विचारतो, ” अमेरिकन बॉम्ब मुळे तुटला का तुझा हात? “

इकडे बिबीला एक भला माणूस भेटतो. अंध:कारातही कुठेतरी पणतीची मंद वाद तेवत असते, तशीच या क्रौर्याने भरलेल्या या जगात भली माणसं अधून मधून भेटत राहतात. बीबी त्या माणसाच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये लामिया हरवल्याची तक्रार करते. तेवढ्यात सायरनचा आवाज येतो आणि बीबी खाली कोसळते. हा भला माणूस बीबीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो. लामियाची शहरातली पायपीट सुरूच असते. एका दुष्ट माणसाच्या तावडीतून पळून येताना एका मिरवणुकीत ती घुसते आणि पोलीस तिला पकडतात. त्या भल्या माणसाला अखेरीस लामिया सापडते …

तो त्वरेने तिला हॉस्पिटलमध्ये आजीला भेटायला घेऊन जातो पण आजी बेडवर नसते. लामियाला भेटण्याअगोदरच बीबीचा मृत्यू झालेला असतो. बीबीचं प्रेत घेऊन दोघे परत खेड्यात येतात. बीबीला दफन केल्या जातं. आता सईदची आई लामियाला केक करायला शिकवते. या केक साठी लामियाने आजीच्या मरणाचं दुःख झेललं असतं. अनेक हालअपेष्टा सोसून जमा केलेलं ते केकचे साहित्य. अखेर तो वाढदिवसाचा दिवस येतो. सद्दामचा जयजयकार होतो. शिक्षक लामियाचा केक, इतर मुलांनी आणलेली फळं टेबलवर मांडून ठेवतात. केकचा एक घास खाऊन बघतात आणि लामियाचं कौतुक करतात. डोळ्यात अश्रू आणि दुःखी चेहऱ्याने लामिया ते सगळं बघत असते. इतक्यात सायरनचा आवाज येतो, पाठोपाठ बॉम्ब पडल्याचा आवाज. सगळी मुले बेंच खाली लपतात. लामिया आणि तिचा मित्र एकमेकांकडे बघत बेंच खाली लपलेले असतात. तेवढ्यात आणखी मोठा आवाज येतो. बॉम्ब तिच्या वर्गावरही पडतो. अर्धा वर्ग उद्ध्वस्त होतो. एका क्षणात नाहीसे होतात- शिक्षक, वर्गातली मुलं आणि लामियाने आणलेला केकही. लामिया आणि तिचा मित्र अश्रूपूर्ण नजरेने एकमेकांकडे बघत असतात आणि याच वेळी कुठेतरी आनंदी म्युझिक सुरू असतं. सद्दाम हुसेनच्या राजवाड्यात वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला असतो. छतापर्यंत मोठा केक. दिव्यांचा झगमगाट. पदार्थांची रेलचेल…. सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा, क्रौर्य आणि हिंसेतून मिळालेला बीभत्स आनंदोत्सव.

ही कथा आहे, “The president’s cake, ” या सिनेमाची.

आजही जगात हजारो निरागस मुलं अनाथ होतात, हजारो बेघर होतात, हजारो भूकबळी पडतात. युद्ध काही संपत नाही. सत्तेची न संपणारी राक्षसी आकांक्षा, मत्सर, क्रौर्य, विवेक बुद्धीचा अभाव यातील प्रत्येक गोष्ट विनाशकारी ठरते आणि या सगळ्या एकत्रित आल्या तर काय होणार?

ऐश्वर्यमीर्ष्या नैर्घृण्यं क्षीबत्वं निर्विवेकता|

एकैकं किं न यत् कुर्यात् पञ्चाङ्गित्वे तु का कथा ॥

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

 (एक डॅाक्टरची आई)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दक्षिण भारतात ६०, ७०, ८०, ९० आणि १०० व्या वर्षाचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा आहे, याचे कारण:

आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० ही वर्षे इतक्या थाटामाटात का साजरी करतो? या आकड्यांमागे काही *आध्यात्मिक* अर्थ आहे की या केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत?

याचे उत्तर महाभारतातील एका प्रभावी कथेत दडलेले आहे—राजा ययातीची कथा.

राजा ययातीचे आयुष्य ऐश्वर्य, सुख आणि यशाने परिपूर्ण होते. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो आतून हादरला. सखोल चिंतनानंतर त्याला एक गहन सत्य उमजले:

सुखाला मर्यादा आहेत, पण इच्छेला कधीच अंत नसतो. “

या एका जाणीवेने त्याचे आयुष्य बदलले. त्याने वृद्धत्वाचा स्वीकार केला आणि स्पष्ट केले की मानवी आयुष्यात पाच आंतरिक वळणे असतात—जी वयावर नाही, तर समजूतदारपणावर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० वर्षांच्या टप्प्यांशी तंतोतंत जुळतात. चला तर मग, हे टप्पे सोप्या भाषेत समजून घेऊया.

६० वर्षे – षष्टी:

मन साठवण्याकडून समजून घेण्याकडे वळते.

वयाच्या ६० व्या वर्षी शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात बदल होतो. “मला अजून किती मिळू शकेल? ” हा प्रश्न हळूहळू मावळतो आणि “आता खरंच महत्त्वाचं काय आहे? ” हा प्रश्न त्याची जागा घेतो.

येथे आत्मचिंतन सुरू होते. आता गोंगाट, टाळ्या किंवा इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची गरज उरत नाही. आता ओढ असते ती केवळ स्पष्टतेची. हा ऱ्हास नाही—तर महत्त्वाकांक्षेला मिळालेली परिपक्वतेची जोड आहे.

७० वर्षे – भीमरथ शांती:

स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते.

चाळीशी आणि पन्नाशीमध्ये आपण जगाला आपले म्हणणे पटवून देण्यात वेळ घालवतो. ७० व्या वर्षी एक शांत बदल घडतो. तुम्ही आता लगेच प्रतिक्रिया देत नाही. वादांचे आकर्षण संपते. *वाद जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे वाटते. *

एक जाणीव प्रबळ होते: “बरोबर असण्यापेक्षा शांत असणे जास्त मौल्यवान आहे. ” म्हणूनच ७० वे वर्ष साजरे केले जाते.

८० वर्षे – सहस्रचंद्रदर्शन / शताभिषेकम:

तुमचे अस्तित्वच एक उपचार बनते.

८० व्या वर्षी लोक तुमच्याकडे केवळ सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी सखोल शोधत येतात—एक असा विश्वास की, “आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते. “

या वयात तुमचे अस्तित्वच एक आशीर्वाद बनते.  शब्दांची गरज उरत नाही. तुमचे असणेच सांगून जाते: “सगळं काही ठीक होतं. आयुष्य आपला मार्ग शोधून घेतं. ” म्हणूनच ८० वे वर्ष पवित्र मानले जाते.

९० वर्षे – नवती:

अहंकार हळूच निवृत्त होतो.

९० व्या वर्षी काहीतरी दुर्मिळ घडते. *तुम्हाला आता लोकांना सुधारण्याची इच्छा होत नाही. * तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिक रित्या घेतल्या जात नाहीत. तुमचे मन सहजासहजी दुखावले जात नाही.

हे अशक्तपणामुळे घडत नाही—तर आयुष्याने तुम्हाला आतापर्यंत पुरेसे दाखवलेले असते. *क्षुल्लक गोष्टी आता तुमची ऊर्जा खर्च करण्यास पात्र नसतात. * एक सात्त्विक शांतता मनात स्थिरावते. ही नम्रताच खरी आध्यात्मिकता आहे.

१०० वर्षे – शतमानम्:

आयुष्य वैयक्तिक कहाण्यांच्या पलीकडे जाते.

१०० व्या वर्षी पोहोचणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या गाठणे नव्हे. ही अशी अवस्था आहे जिथे आयुष्याचे व्यापक चित्र स्पष्ट दिसू लागते.

तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहिलेल्या अनेक चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम हेच खरोखर महत्त्वाचे होते. आणि हे आयुष्य नेहमीच एका अनामिक, दयाळू शक्तीने सावरून धरलेले होते. १०० व्या वर्षी व्यक्ती एक ‘व्यक्ती’ उरत नाही, तर ती एक दैवी ‘अस्तित्व’ बनते.

सार:

आपल्या ऋषीमुनींनी केवळ वयाचा उत्सव साजरा केला नाही. त्यांनी वयासोबत येणाऱ्या आंतरिक परिवर्तनाचा उत्सव साजरा केला.

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात.
  • ७० – शांतता हीच ताकद बनते.
  • ८० – अस्तित्व हेच औषध/उपचार बनते.
  • ९० – अहंकार शांतपणे विरघळतो.
  • १०० – आयुष्य पूर्णत्वास जाते.

वृद्धत्व म्हणजे झिजणे नव्हे.  वृद्धत्व ही एक गाळण्याची प्रक्रिया आहे—ज्यातून केवळ शहाणपण, सौम्यता आणि कृपा शिल्लक राहते.

अर्थात – – 

वयाने मोठे होणे म्हणजे आयुष्य अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होणे होय. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मैत्रिणींचं माहेरपण… – लेखिका : अर्चना अनंत ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्रिणींचं माहेरपण… – लेखिका : अर्चना अनंत ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित 

​शरयू मोबाईल हातात घेऊन शांतपणे बसली होती. सकाळपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एकामागून एक स्टेटस दिसत होते.

​”अधिक मासाचं वाण मिळालं…”

“माहेरहून ओटी आली…”

“भावाने खास बोलावलं…”

​कुठे लेकींचे फोटो, कुठे माहेरच्या अंगणात काढलेले क्षण, तर कुठे आईच्या हातचा स्वयंपाक.

​स्टेटस पाहताना शरयूच्या ओठांवर हलकंसं हसू आलं, पण मनात कुठेतरी एक हुरहूर दाटून आली.

​”आपलं असं कौतुक कधी झालंच नाही…” ती स्वतःशीच पुटपुटली. 

​खिडकीतून बाहेर नजर गेली. समोरच्या झाडावर पक्षी किलबिल करत होते. घरात सगळं सुरळीत होतं. संसार, मुलं, जबाबदाऱ्या… काहीच कमी नव्हतं.

​तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात माहेर नावाचा एक नाजूक धागा अजूनही जिवंत होता.

​तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं — माधवी.

​”हॅलो, काय करतेस गं?” माधवीने विचारलं.

​”काही नाही गं. हे अधिक मासाचे स्टेटस बघत होते.”

​माधवी हलकंसं हसली, “माझंही तेच चाललंय. आई-बाबा होते तोपर्यंत थोडंफार तरी अधिक मासाचं कौतुक व्हायचं. आता तर माहेरच संपलं म्हण ना!”

​क्षणभर दोघीही शांत झाल्या.

​”अगं, आपण आता पन्नाशी पार केलीये. कुठे अशा अपेक्षा ठेवायच्या आता?” शरयू म्हणाली.

​”अपेक्षा नाही गं…” माधवीचा आवाज किंचित भरून आला, “पण कधीतरी वाटतं ना… कुणीतरी हक्काने म्हणावं, ‘ये गं माहेरी.’ भाऊ आहे, वहिनी आहेत. त्यांचा संसार, त्यांची मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या… तेही त्यांच्या जागी चुकीचे नाहीत. पण मनातली माहेराची ओढ कधी संपत नाही गं!”

​शरयूच्या मनातलं जणू माधवीच बोलत होती. फोन ठेवला, पण दोघींच्या मनातले विचार थांबत नव्हते.

​शरयूने लगेच त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला — “सांगा बरं, तुमचं माहेरपण अजून टिकून आहे का?”

​काहीच क्षणांत उत्तरांचा पाऊस सुरू झाला…

​”माझा तर भाऊच नाही…”

“आई गेल्यापासून माहेरी जाण्याचं कारणच उरलं नाही…”

“भाऊ आहे, पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही गं…”

“माहेर आहे, पण तिथे आता माहेरपण नाही…”

​एकामागून एक मेसेज वाचताना शरयूच्या लक्षात आलं की, ग्रुपमधली एकही मैत्रीण अशी नव्हती, जिला अजूनही जुन्यासारखं हक्काचं माहेर लाभलं होतं.

​त्या रात्री शरयूने माधवीला पुन्हा फोन केला.

​”ऐक, एक कल्पना आहे.”

​”काय?”

​”आपणच आपल्या मैत्रिणींचं माहेरपण जपायचं!”

​क्षणभर पलीकडून शांतता पसरली. “म्हणजे? काय म्हणायचंय तुला?” माधवीने विचारलं.

​”अधिक मासानिमित्त सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवू. पण अगदी सरप्राइज! कुणालाच काही सांगायचं नाही. प्रत्येकीची ओटी भरायची, छोटंसं गिफ्ट द्यायचं आणि एक दिवस त्यांना पुन्हा माहेरची लाडकी लेक असल्याचा अनुभव द्यायचा.”

​माधवी काही क्षण गप्प राहिली. मग तिचा भरून आलेला आवाज ऐकू आला, “शरयू… ही फक्त कल्पना नाही गं… ही तर एक सुंदर भावना आहे!”

​पुढचे काही दिवस दोघींची अक्षरशः धावपळ सुरू झाली. स्वयंपाकाचा बेत त्यांनी स्वतः ठरवला. आंब्याचा रस, मऊसुत पुरणपोळी आणि सगळ्यांचे आवडीचे पदार्थ… सोबतीला ओटीचं सामान, भेटवस्तू, सजावट… सगळं काही दोघींनी मिळून केलं.

​पण तयारी करताना त्यांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्नही येत होते.

​”उगीच तर नाही ना करत आपण हे सगळं?”

“लोकांना आवडेल का?”

“कोणी याला नाटक तर म्हणणार नाही ना?”

“या वयात अशा गोष्टींनी कोण भावूक होतं?”

​पण प्रत्येक वेळी त्यांच्या मनातून एकच उत्तर यायचं — “जर यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर घटकेचा आनंद मिळणार असेल, तर हे जरूर करायचं!”

​ठरलेल्या दिवशी घर फुलांनी सजलं होतं. दारात सुंदर रांगोळी काढली होती. स्वयंपाकघरातून रसाचा आणि पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता.

​एकामागून एक मैत्रिणी येऊ लागल्या. सगळ्यांना वाटलं होतं की, हा नेहमीसारखाच एखादा गेट-टुगेदर असेल. गप्पा, जेवण आणि जुन्या आठवणी. हशा, टाळ्या, कॉलेजचे दिवस, लग्नानंतरचे किस्से… घर आनंदाने आणि किलबिलाटाने भरून गेलं होतं.

​आणि मग अचानक शरयूने घोषणा केली, “आजचा कार्यक्रम इथेच संपत नाहीये…”

​सगळ्या मैत्रिणी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या.

​त्यानंतर एकेक मैत्रीण पाटावर बसू लागली. तिची प्रेमाने ओटी भरली जाऊ लागली, हातात सुंदर भेटवस्तू दिली गेली. आणि शरयू-माधवी दोघीही प्रत्येकीला एकच वाक्य सांगत होत्या — “आज तू आमच्या माहेरची लेक आहेस!”

​ते वाक्य ऐकताच अनेकांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांना ‘लेक’ म्हणून जपलं होतं. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांच्या मनातल्या त्या रिकाम्या कोपऱ्यावर मायेचा हात ठेवला होता.

​पण अजून एक भावूक क्षण बाकी होता…

​ग्रुपमधली एक मैत्रीण, जिला सगळ्या जणी हक्काने “झाशीची राणी” म्हणायच्या. स्वभावाने अत्यंत कणखर, निर्भीड, कधीच न रडणारी आणि वेळ प्रसंगी सगळ्यांना आधार देणारी.

​तिची ओटी भरून झाल्यावर ती काही क्षण शांत उभी राहिली. अचानक ती शरयूच्या जवळ आली आणि पुढच्याच क्षणी तिच्या गळ्यात पडून  रडू लागली… अगदी एखाद्या लहान मुलीसारखी! तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.

​भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली, “अगं शरयू… माझ्यासाठीही कुणी असं काही करू शकतं, असं मला कधी वाटलंच नव्हतं गं!” ती थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, “आई-वडील जिवंत होते, तेव्हाही माझं असं कौतुक कधी झालं नाही… आज पहिल्यांदाच वाटतंय, मी सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!”

​क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. कोणाच्याही डोळ्यांतलं पाणी लपून राहिलं नाही.

​शरयू आणि माधवी एकमेकींकडे पाहत होत्या. त्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण त्या एका वाक्याने त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.

​”आपण उगीच तर नाही ना केलं?”, “लोक काय म्हणतील?”, “कुणाला आवडेल का?” — या सगळ्या शंकांना त्या एका भावनिक क्षणाने पूर्णविराम दिला होता.

​त्यांना जाणवलं की, आपण काहीच चुकीचं केलं नाही. आपण फक्त काही रिकाम्या झालेल्या मनांना मायेचा ओलावा दिला, काही हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आणि काही स्त्रियांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून दिली.

​त्या दिवशी गिफ्टची किंमत महत्त्वाची नव्हती, की ओटीत काय होतं याला अर्थ नव्हता. महत्त्व होतं ते फक्त त्या शुद्ध भावनेला, त्या मायेला आणि त्या आपलेपणाला!

​कारण स्त्री कितीही मोठी झाली, कितीही कणखर झाली, तिने कितीही जबाबदाऱ्या पेलल्या… तरी तिच्या मनात एक छोटीशी मुलगी कायम जिवंत असते, जिला कधीतरी हक्काने माहेरी जायचं असतं.

 

​आणि त्या दिवशी शरयू आणि माधवीने त्या सगळ्या मुलींना पुन्हा एकदा त्यांचं हक्काचं माहेर मिळवून दिलं होतं.

​खरंच… माहेर हे फक्त एक विटांचं घर नसतं, माहेर ही एक निखळ भावना असते. आणि त्या दिवशी त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांचं हरवलेलं माहेर पुन्हा सापडलं होतं… मैत्रीच्या रूपाने!

 

@ अर्चना अनंत

 

माझं मनोगत…

ही कथा काल्पनिक नाही. यातला भावनिक अनुभव आम्ही मैत्रिणींनी प्रत्यक्ष जगला आहे. अधिक मासानिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणींना एकत्र बोलावलं, त्यांची ओटी भरली, त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि मन भरून आलं होतं.

पण या निमित्ताने माझ्या स्वतःच्या मनातही काही विचार आले.

आम्ही चार बहिणी. वडील आमच्या लहानपणीच गेले. आर्थिक परिस्थिती जेमतेम  . त्यामुळे वाण, औक्षण, भेटवस्तू किंवा अशा प्रकारचं विशेष कौतुक आमच्या वाट्याला फारसं आलं नाही. पण त्याबद्दल मला कधीच वाईट वाटलं नाही. कारण माझ्या आईने आम्हाला जे भरभरून प्रेम दिलं, ज्या ताकदीने उभं केलं आणि प्रत्येक अडीअडचणीत जी साथ दिली, त्याची किंमत कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप मोठी होती.

आज आई नाही. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही. कितीही मोठं गिफ्ट मिळालं, कितीही प्रेमाने औक्षण झालं, तरी आईच्या मायेची सर त्याला येऊ शकत नाही.

मला वाटतं, अशा भेटीगाठी, असे उपक्रम आणि अशा प्रेमाच्या क्षणांमुळे मनाला आधार मिळतो, जुन्या जखमांवर मायेची फुंकर बसते. पण खरं माहेर आपण आपल्या आठवणींत जपून ठेवलेलं असतं. आई-वडिलांचं प्रेम, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हेच आयुष्यभर आपली खरी संपत्ती असते.

आपली माणसं आपल्यापासून दूर जातात, पण त्यांचं प्रेम कधीच दूर जात नाही. ते आपल्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक यशात आणि प्रत्येक संघर्षात आपल्यासोबत असतं. म्हणूनच मला वाटतं, माहेर फक्त एका घरात नसतं; ते आपल्या मनात, आपल्या स्मृतीत आणि आपल्या जपलेल्या प्रेमात कायम जिवंत असतं.

लेखिका:  अर्चना अनंत

प्रस्तुती: सुचिता पंडित

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ इथे ओशाळली माणुसकी! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? इथे ओशाळली माणुसकी ? श्री आशिष  बिवलकर ☆

माणुसकी ओशाळली,

संस्कार ही थिजले |

वयाची ही न जाण,

अधिकारी हे कसले |

*

वृद्ध कष्टाळू माऊली ती,

नियम कायदा नसे माहित |

रस्त्यावर विकून भाजी,

सोडवी पोटापाण्याचे गणित |

*

कर्तव्यदक्ष धृतराष्ट्र पालिकेचे,

न दिसली तिच्यात त्यांना आई |

कारवाईचा बडगा कठोर ऐसा,

नासधूस सारी, कशाची ही घाई |

*

गाडीत गॉगल लावून साहेब,

गोरगरिबांच्यावर नुसता रुबाब |

घरात नसेल म्हातारी आई त्याच्या,

श्रीमुखात देऊन विचारावा जाब |

*

अतिक्रमण हटाव मोहिमेत,

सगळीकडे चालतो दुजाभाव |

चिरीमिरी, हप्ते वसुली सर्रास,

परप्रांतीयांसाठी चाले धावाधाव |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २८८ – महा-प्रस्थान के क्षण – २ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता –  महा-प्रस्थान के क्षण – २।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २८९ ☆

☆ – महा-प्रस्थान के क्षण – २ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ✍

बूढ़े पिता सा

देखता आकाश

दृश्य यह कितना करुण है।

ज्वाल के सम्मुख लिए जल

और भी जन है,

जिनके टूटते मन हैं।

ठीक ऐसी ही दशा में…

भू, हवा, पर्वत, किरन, वन औ सुमन हैं।

त्यक्त वस्त्रों सी पड़ी

निस्पंद ये

परछाइयाँ,

मानो किसी का शापमय आदेश हो!

लग रहा-

जैसे कि खण्डित मूर्तियों का देश हो !

पाषाण जैसे प्राण भी तो

कर रहे हैं

आँसुओं में संतरण,

क्योंकि निष्प्रभ हो गई है

सभ्यता की व्याकरण।

आह! मेरे प्रश्न बालक, खो गये,

पगवाट में, वनवाट में,

और उनके उत्तरोंका ध्रुव

कि वह तो गया है

शान्ति वन के घाट में।

 

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares
1

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २८६ – “ऐसे आर्तनाद के क्षण बस…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत ऐसे आर्तनाद के क्षण बस...”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २८६ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “ऐसे आर्तनाद के क्षण बस...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

जिसकी बेटी व्याह योग्य हो

हम वह बाप रहे

हालातों के कोपभवन का

कठिन विलाप रहे

 

नीचा सिर करके निकाल दी

जीवन की आशा

शायद कोई क्रुद्ध हो गया

गति का दुर्वासा

 

ऐसी विकट परिस्थितियों का

दारुण ताप रहे

 

कतरब्योत में लगे रहे

या फिर उधेड सींते

याद नही कर पाते यह दिन

कैसे क्पा बीते

 

बे मौसम की बारिश का

जैसे अनुताप रहे

 

सूत कातते रहे मगर

ना बुन पाये कपड़ा

जिन्हें बनाया अपना

अब उन से भी है झगडा

 

ऐसी भिन्न परिस्थितियों में

हम चुपचाप रहे

 

हारे थके व्यथा अपनी यह

हम कहते किससे

जिससे कहते उसके भी

अनगिनत मौन किस्से

 

ऐसे आर्तनाद के क्षण बस

आत्म प्रलाप रहे

©  श्री राघवेन्द्र तिवारी

04-07-2025

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # ३४० – सबसे बड़ा रुपैया ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # ३४० सबसे बड़ा रुपैया… ?

समाचारपत्र में संबंध विच्छेद के एक मुकदमे का निर्णय छपा है। उच्च शिक्षित युगल में विवाह के लगभग दो वर्षों के भीतर ही संबंध विच्छेद हो गया। समाज में निरंतर बदलते मूल्य और अपने तक सीमित रहने की वृत्ति के चलते आजकल दो वर्ष भी दांपत्य के लिए उल्लेखनीय अवधि मानी जा सकती है। तथापि इस मामले में चौंकाने वाला तथ्य संबंध-विच्छेद का कारण था। समाचार में बताया गया कि कि पति हर व्यय में पत्नी से पचास प्रतिशत की अपेक्षा रखता था। यह अपेक्षा सुबह के नाश्ते से लेकर रात के भोजन तक हर छोटे-बड़े व्यवहार में थी। समाचार कह रहा था कि विवाह से पूर्व उसके द्वारा दिये गए उपहारों की आधी कीमत भी उसे चाहिए थी। उधर दूसरे पक्ष का कहना था कि पत्नी की आमदनी, पति की तुलना में कम है, अतः यह विभाजन तर्कसंगत नहीं है।

आर्टिफिशियल इंटेलिजेंस के समय में मनुष्य की संवेदनाओं के आर्टिफिशियल होने की पराकाष्ठा है यह। भौतिक जगत में भौतिकता का चरम बिंदु है यह। समाचारपत्र में छपे कुछ पंक्तियों के समाचार के आधार पर इस घटना में किसी को दोषी या निर्दोष सिद्ध नहीं किया जा सकता। इस तरह की विवेचना इस लघु आलेख का उद्देश्य भी नहीं है। माननीय न्यायालय ने भारतीय न्याय संहिता के अंतर्गत तथ्यों के आधार पर गुण-दोष के धरातल पर निर्णय दिया होगा। दोषी जो भी रहा हो, यहाँ संबंधों में बढ़ती असुरक्षा और संदेह विचारणीय हैं।

नीतिसूत्र कहता है कि शक्ति का केंद्रीकरण निरंकुशता को जन्म देता है। निरंकुशता अविवेक को जनती है। अविवेक बहुधा आत्ममोह का कारण बनता है। आत्ममोह अपने अलावा दूसरा कुछ नहीं देख पाता। इस स्वानुभूत दृष्टिहीनता की परिधि में संबंध, संवेदना, सामाजिकता, सामंजस्य, साहचर्य सभी आ जाते हैं।

मनुष्यजीवन के सारे व्यवहार के केंद्र में पैसे का आ जाना मनुष्यता का अवमूल्यन है या अधिमूल्यन, इस पर भिन्न-भिन्न मत हो सकते हैं। कुछ लोग इसका नामकरण ‘नई मनुष्यता’ भी कर सकते हैं। सारे बौद्धिक विलास के परे ‘ना बीवी ना बच्चा, ना बाप बड़ा ना मैया, द होल थिंग इज़ दैट कि भैया सबसे बड़ा रुपैया’ का यूँ साकार होना हर विचारवान के मन में गंभीर प्रश्न खड़े करता है।

प्रकृति में अंतिम कुछ भी नहीं है। पैसे को सर्वोच्च समझने की वृत्ति भी अंतिम नहीं रहेगी। मनुष्य को मिले बौद्धिकता के वरदान के चलते उससे वांछित है कि वह जीवन में मूल्यों के बीच भी सामंजस्य और संतुलन रखना सीखे। यह घटना इस बात का ज्वलंत उदाहरण है कि यंत्रमानव बनाने वाले मानव में धीरे-धीरे यंत्र अपने को स्थापित करता जा रहा है। क्या निकट भविष्य में माता- पिता, सगे-संबंधी, मित्र- आत्मीय, पति-पत्नी सभी आर्थिक आधार पर आँके जाने लगेंगे? ऐसी स्थिति में शब्दकोश से इन शब्दों के विलुप्त होने में समय नहीं लगेगा।

कुछ लोगों को यह विचार अतिरेक लग सकता है। कुछ लोग इस घटना को अपवाद के रूप में देख सकते हैं। तथापि अपवाद जब निरंतर घटने लगे तो मान लीजिए कि वह परंपरा होने के मार्ग पर अग्रसर है। ऐसे समय में परंपरा, अपवाद कहलाने लगती है।

उपरोक्त घटना के अपवाद को परंपरा बनने से रोकना है तो विचार को व्यवहार में उतारना होगा। घर, परिवार, समाज हर स्थान पर संबंधों की अनुभूति, महत्व और अनिवार्यता को रेखांकित करना होगा, अपने-अपने स्तर पर संबंधों को सच्चाई से जीना होगा। अन्यथा की स्थिति में संभव है कि भविष्य में व्यय में पचास प्रतिशत की भागीदारी ना कर सकने वालों को अमनुष्य करार दिया जाने लगे।

अनुरोध है कि हर मनुष्य विचार करे।

 

© संजय भारद्वाज 

(15:51 बजे, 13 जून 2026)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ १७ मई से ज्येष्ठ अधिकमास आरंभ हुआ है। इसी दिन से नारायण साधना आरंभ होगी।  इसका मंत्र है – ॐ नारायणाय नम:। 🕉️

💥 इसके साथ मौन साधना एवं आत्म परिष्कार भी चलेंगे। अपनी हर निर्बलता पर विजय पाने का साधन है आत्म परिष्कार। इसका नियमित अभ्यास रखे💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares