(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता ‘हमें तेरा ही सहारा…‘।)
☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
“निष्पाप तारुण्य ही एक अमूल्य संपत्ती आहे, जी तथाकथित सुखाच्या क्षणिक उत्साहासाठी वाया घालवू नये”— महात्मा गांधी
या लेखाच्या संदर्भात तरुण म्हणजे नुसताच मनाने तरुण नव्हे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार हे वय १५ ते २४ वर्षे आहे, मात्र भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा धोरणानुसार ते १५ ते २९ वर्षे आहे. हे वय लक्षात घेता तरुणाची शारीरिक क्षमता अत्यंत उर्जावान असते. त्याच्या डोळ्यात जग बदलण्याची स्वप्ने तरळत असतात तर रगारगात चैतन्याचे रक्त उसळत असते. हि अशी आग आहे जिला योग्य दिशेच्या अग्निकुंडात ठेवणे आवश्यक आहे नाही तर ती, जग जाळून टाकेल. समाज तरुण पिढीकडे मोठ्या आशेने बघत असतो कारण आजचा तरुण हा देशाचे भविष्य नव्हे तर वर्तमान आहे. “
आजची युवा पिढी ही आपल्या देशाची संपत्ती आहे. तिचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे कालच्या पिढीचे परम कर्तव्य आहे. कुठल्याही तरुणाच्या जीवनात सर्वाधिक प्रभाव पडतो तो त्याच्या कुटुंबाचा! , याव्यतिरिक्त शेजारी, समाज, महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, शासकीय व्यवस्था, राजकारणी हे या ना त्या कारणाने त्याला प्रभावित करतात. मात्र मी म्हणेन की याहूनही त्याचे जीवन ढवळून टाकणारी अधिक प्रभावशाली आहेत ती समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमे. नेटफ्लिक्स पासून तर हॉटस्टारपर्यंत समाजमाध्यमांतून तरुणांसाठी करमणुकीचे दरवाजे सताड उघडे आहेत. गुगल गुरुजी, ए आयचे अलाउद्दीनच्या शक्तिशाली जिन्नसारखे सेवक त्यांच्या चरणी बारा महिने आणि तिन्ही त्रिकाळ सेवेसाठी सज्ज आहेत. या स्वप्ननगरीच्या अतिविशाल फुग्यात आजचा तरुण आरामात विहार करतोय. तेच त्याचे जग आहे. या आभासी जगात तो किती वेळ वाया घालवतो त्याचे मोजमाप करायला देखील त्याला वेळ नाही. हळू हळू हेच आभासी जग त्याचे सर्वस्व होऊन बसते. त्यातील समृद्ध नायक नायिका, त्यांचे अनिर्बंध विचार, श्रीमंत जीवन पद्धती आणि स्वैराचार हेच त्याला सामान्य वाटू लागते. मंडळी बहुतांश तरुणांना अमेरिका आणि युरोपसारख्या पाश्चात्य देशांतील जीवनाची भुरळ पडलेली असते ती याच माध्यमस्नेही प्रवृत्तीमुळे. त्यातूनच निर्माण होते ती मदिरा आणि मदिराक्षीची वासना, सोबतीला अभिनव आणि अनवट अनुभव देणारे ड्रग्स. रेव्ह पार्ट्या तर श्रीमंत तरुणांचा जिव्हाळ्याचा विषय. सिगारेट आणि दारू तर सर्वमान्य आणि सामान्य जनांसाठी असल्याने ड्रग्सच्या रूपाने त्या पुढील पायरी गाठणे हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे प्रदर्शन असते. यासाठी प्रतिष्ठा हेच एक कारण नसून इतर करणे देखील आहेत.
स्वतःच्या आणि पालकांच्या अपेक्षेनुसार शैक्षणिक प्रगती न होणे
गरिबीमुळे हवे ते शिक्षण घेता न येणे
पेपरफुटीसारख्या समस्या आणि शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार
शिक्षणाअभावी किंवा योग्य शिक्षण झाल्यावरही बेरोजगारीचा सामना करावा लागणे
व्यवसाय किंवा नोकरीत वरिष्ठांशी न पटणे
कामाचा योग्य तो मोबदला न मिळणे किंवा त्याची वरिष्ठांकडून दाखल घेतल्या न जाणे
प्रेमभंग
कौटुंबिक कलह आणि कुटुंबातील व्यसनाधीनता
समाजात प्रतिष्ठा न मिळणे
वरील कारणांमुळे आजचा तरुण तणावाखाली आणि नैराश्याने ग्रस्त असू शकतो. अशा वेळी कधीतरी मनाच्या कमकुवत अवस्थेत तो व्यसनांच्या आहारी जातो. आपण याच व्यसनाधीनतेविषयी आणि त्यापासून मुक्तीबद्दल चर्चा करणार आहोत. तरुण अंमली पदार्थांचे सेवन कान करीत आहेत? मंडळी, एरवी माणसाच्या विविध व्याधींकरिता अनुकूल अशा कांही औषधांपैकी कांही मोजकी औषधे रोगांविरुद्ध लढण्याऐवजी स्वतःच अतिभयानक रोगाचे कारण बनतात. तेव्हां या अमृतवेलीची माणसाला कशी अन केव्हां आपला गुलाम बनवणारी विषवल्ली होते हे त्याचे त्यालाच कळत नाही. कळते तेव्हां तो मृत्यूच्या पाशात अडकलेला असतो. हे असे कां आणि कसे होते?
वैद्यकीय व्याख्येनुसार ड्रग अर्थात औषध म्हणजे असा कोणताही रासायनिक पदार्थ, जो आपल्या सामान्य किंवा विकृत शारीरिक प्रक्रियेत बदल करतो. उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी हे रसायन ‘औषधी तत्व’ आहे. मात्र औषध कंपन्यांसाठी ते निव्वळ एक ‘प्रॉडक्ट’ अर्थात उत्पादन आहे. त्यापलीकडेही ‘ड्रग’ या शब्दाचा विस्तारित अर्थ ‘रंग माझा वेगळा’ असा प्रतिध्वनित होतो. समाजासाठी व्यावहारिकरित्या ड्रग म्हणजे व्यसनाधीनता निर्माण करणारे घातक रसायन असते हे सर्वांनी लक्षात असू द्यावे. एकाच रसायनाकरता आपण दोन नावे वापरतो, ड्रग आणि मेडिसिन. या दोहोंतला मूलभूत फरक त्यांच्या वापरातील हेतूचा आहे. डॉक्टर पेशंटला ‘मेडिसिन’ देतांना त्यांचा एकमेव उद्देश रुग्णाला बरे करण्याचा असतो. डॉक्टरांना अर्थातच त्या औषधाचे डोस आणि साईड इफेक्टचे परिपूर्ण ज्ञान असणे अपेक्षित असते.
ऍडिक्शन अथवा अंमली पदार्थांचे सेवन हा एक रोग आहे. यात व्यक्ती मेंदूला घातक उत्तेजना देणारे ड्रग वारंवार वापरते. इथे तीन कळीचे मुद्दे आहेत.
त्या व्यक्तीचे एकमेव उद्दिष्ट असते, ड्रग घेत राहणे. त्याला त्या ड्रगचा इतका पराकोटीचा हव्यास असतो की, ‘हवास मज तू, हवास तू’ या विचाराने वेडे होत ते कुठूनही अन कसेही मिळवण्यासाठी तो जिवाचे रान करतो, (भीक मागणे किंवा लाचार होऊन गयावया करणे अथवा चोरी करणे यापैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करणे)! आईजवळ हे (अजाण? ? ) लेकरू वाढीव अधिक पॉकेटमनीचा हट्ट करते, तर कधी जवळच्या मित्राकडे दोस्तीचा हवाला देत उधार मागते, हे उपाय अयशस्वी झाल्यावर बिनदिक्कतपणे घरातील पैसे चोरते! या आगंतुक रसायनाविषयी इतकी लालसा का? कारण त्याला वाटत असते, “हे ड्रग मिळाले नाही तर मी मरून जाईन”.
कांही दिवसांनी या रासायनिक तत्वाचे त्याचे आवडते परिणाम त्या डोसने येईनासे होतात. मग त्या ड्रगचे तथाकथित ‘गोड’ परिणाम अनुभवण्यासाठी तो स्वतःच निष्णात डॉक्टरचा आव आणत ड्रगचा डोस वाढवत राहतो. मी या तथाकथित ग्वाड परिणामांची फक्त काही उदाहरणे सांगते, मूड मध्ये येणे, परमानंदाचा अनुभव, भ्रम, नसलेली गोष्ट दिसणे किंवा ऐकू येणे, (ध्वनी दिसणे आणि प्रकाश ऐकू येणे) आणि या सर्वांवर वरताण म्हणजे सर्वात आकर्षक अशी जगप्रसिद्ध ‘किक’!
अशा व्यक्तीने ड्रग घेणे थांबवले तर गंभीर विथड्रॉव्हल सिंड्रोम (ड्रगपासून वंचित राहण्याचे भयंकर परिणाम अर्थात विरहवेदना) दिसून येतो. यात अस्वस्थपणा, नैराश्य, निद्रानाश, फिट्स येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात तसेच एखाद्या वेळेस मृत्यू देखील होऊ शकतो.
व्यसनाधीनता निर्माण करणारी काही औषधे ही वनस्पतींपासून निर्मित आहेत. उदाहरण द्यायचे तर तंबाखू, अफू, कोकेन इत्यादी घटक सामाजिक संस्कृतीचा भाग म्हणून सामूहिकरीत्या सेवन करण्याची प्रथा बरीच जुनी आहे. आपण म्हणतो ना, देव सोमरसपान करतात, ते बहुधा ‘दैवी मद्य’ असावे. अफूच्या पार्ट्यांची तर लेखी नोंदच उपलब्ध आहे. मागील शतकात अशा पार्ट्यांची आमंत्रणे राजरोस छापली जात होती. अफू आणि मद्य हे ५००० वर्षे किंवा त्याहून आधीपासून प्रचलित असावे. हे ड्रग नैसर्गिक अवस्थेत अशुद्ध रूपात असत. त्यांचे वाईट प्रभाव पण त्या मानाने कमीच असत. पण जेव्हां अफूच्या स्रोतातून आधुनिक पद्धतीने प्रयोगशाळेतून मॉर्फिनसारखे शुद्ध औषध निर्माण केल्या गेले तेव्हा त्याचे चांगले अन वाईट दोन्ही परिणाम तीव्र होते. वैज्ञानिकांनी त्याचे रासायनिक अपत्य शोधले हेरॉइन, सुपर ऍडिक्शन निर्माण करणारे ड्रग. म्हणजेच अवगुणांत बाप से बेटा सवाई! अशी अनेक नवनव्या उचापती करणारी संयोगक्रियेद्वारा प्रयोगशाळेत निर्मित कृत्रिम ड्रगस युवा पिढीला आपला विषाक्त विळखा घालण्यास सज्ज आहेत. हे प्रयोगशाळेतून निघालेले शुद्ध सिंथेटिक ड्रगस खूप विषारी असतात आणि व्यसनी माणसाचा जीव देखील घेऊ शकतात.
धूम्रपान करणे, तंबाखू खाणे आणि दारू पिणे हा अनेक लोकांच्या वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक जीवनाचा देखील एक अविभाज्य भाग झालेला आहे. माझ्या मते या सर्व व्यसनांचे मूळ कारण आहे त्यांना मिळालेली अवास्तव सामाजिक मान्यता, प्रतिष्ठा आणि स्टेटस सिम्बॉलचे अग्रमानांकित स्थान. अशा अमली पदार्थांचे व्यसन कुठल्याही दृष्टिकोनातून बघावे! शरीर, मन, कुटुंब आणि समाज यांच्याकरता हे व्यसन पूर्णपणे हानिकारक आहे हेच मुळी समाज मान्य करीत नाही. सेलिब्रिटीजचा वरदहस्त असल्यामुळे त्याला लाभलेल्या ग्लॅमरचे वलय तर अनुकरणप्रिय युवा पिढीकरता आणखीच वाईट! यात पहिल्या प्रेमासारखी पहिली सिगारेट, दारूचा पहिला पेग आणि कोकेनचा पहिला झुरका या ‘प्रथम तुज पाहता’ सारखी जी अवस्था होते तिच्यातून बाहेर येणे कठीण. दुर्दैवाने ही पहिली पायरी दाखवणारे कधी कधी पालक, कुटुंबातील अन्य सदस्य, नातेवाईक किंवा जवळचे मित्र असतात. एकदा का ही पहिली पायरी ओलांडली की मग त्या माणसाला कुठे थांबावे हेच कळत नाही. याशिवाय मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत केलेले अपराध आणि लैंगिक गुन्हे घडतात ते वेगळेच. आजकाल रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या आपण बघतो. यातून स्वतःला वाचवायचे तर या ड्रगच्या पहिल्या डोसलाच नाकारणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. राम गणेश गडकरींचे ‘एकच प्याला’ हे १९१२ सालचे आशयघन नाटक दुर्दैवाने आजच्या घटकेला तितकेच प्रभावी आणि समयोचित वाटते.
“विजय, अरे, हे काय? किराणा सामान कुठे आहे? ” दुकानातून रिकाम्या हाताने येणाऱ्या मुलाकडे आश्चर्याने आणि अविश्र्वासाने बघत अनसूयेने विचारले. अनसूयाच्या नवऱ्याचे निधन झाले होते. विजय तिचा एकुलता एक मुलगा. यंदा दहावीत होता. साधा – सरळ स्वभावाचा.
एका बिस्कीट फॅक्टरीत अनसूया पॅकिंग विभागात नोकरी करायची, आणि काटकसरीने संसार करायची. लेक सत्शील होता. आईला मदत करायचा, मनापासून अभ्यास करायचा. आज आईने महिन्याभराच्या सामानाची यादी आणि दोन हजार रुपये देऊन त्याला बाजारात पाठवले होते, आणि तो खाली हाथ परतला होता.
“आई, सोनादीदी भेटली होती, चेहरा रडवेला होता तिचा. तिच्या घरी तिच्या ताईच्या सासरची माणसं येणार आहेत, आणि तिचे पैसे हरवले म्हणत होती. ” विजय.
“तिनं सांगितलं, तू ऐकलंस आणि सगळे पैसे तिला देऊन टाकलेस? ” कपाळावर हात मारत अनसूया म्हणाली. “अरे, तू गेल्या वेळीही तिला असेच पैसे दिले होतेस, ते अजून तिने परत केलेले नाहीत, आणि तू आणखी देऊन बसलास! तू चल माझ्याबरोबर, आणि तुझ्या डोळ्यांनी बघ. “
अनसूया त्याचा हात धरून, त्याला जवळजवळ खेचतच सोना ज्या चाळीत रहात होती, तिथे घेऊन गेली. सोनाच्या घराबाहेर, व्हरांड्यात उभे राहून मायलेक कानोसा घेत होते. सोनाच्या घरातून पक्वानांचा दरवळ येत होता, आणि जोरजोराने हशाही ऐकू येत होता.
“सोना, तू तर अगदी जंगी पार्टीच दिलीस आज, मला तर वाटलं होतं गेल्या वेळसारखे वडापाव खायला घालणार तू. ” सोनाची मैत्रीण.
“काय सांगू अग तुला? तो बावळट विजय भेटला नसता तर वडापावसुद्धा देणं शक्य नव्हतं. पण मी दोन थेंब अश्रू ढाळले त्याच्यासमोर, त्याला खोटंच सांगितलं ताईच्या सासरकडची माणसं येत आहेत म्हणून. ते येडं विरघळलं अन् दोन हज्जार रुपये काढून दिले त्यानं. “
विजय गोरामोरा झाला.
“दुसऱ्यांना मदत करावी, पण नीट विचार करून करावी, बेटा. ” अनसूया हिरमुसल्या विजयला समजावत होती.
काही दिवसांनंतरची गोष्ट. पुढच्या आठवड्यापासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार होत्या, पण विजय काहीसा चिंतेत दिसत होता.
“नाही ग आई, अभ्यास ठीक चालला आहे माझा. थोडी गणिताची भीती वाटते. तो रमेश म्हणाला की माझा भाऊ भन्नाट गणित शिकवतो. मी त्या भावाला भेटलो, तो म्हणाला – हजार रुपये दे, मी तुला स्पेशल शिकवतो. मी चार वेळा गेलोसुद्धा, पण काही ना काही कारण काढून त्याने मला काहीच शिकवलं नाही. आज गेलो, तर म्हणाला, तू बिनधास्त परीक्षा दे, मी तुझे मार्क वाढवतो. मला काहीच उमगत नाहीये, म्हणून मी गोंधळलो आहे, इतकंच. “
अनसूयेने पुन्हा एकदा कपाळाला हात लावला. “अरे, बोर्डाच्या परीक्षेत असे परस्पर कसे मार्क वाढवेल तो? तुझा पेपर कुठल्या गठ्ठ्यातून कोणाकडे तपासायला जाणार हे त्याला थोडीच कळणार आहे? त्याने फसवलं बाळा तुला.
तू पैसे द्यायच्या आधी मला विचारायचे तरी होतेस. आणि एवढे पैसे आले कुठून तुझ्याकडे? “
“आई, माझ्या पिगी बँकेतून घेतले होते. मस्त मार्क्स मिळवून तुला surprise द्यायचं होतं, म्हणून नव्हतं सांगितलं, ” विजयचा आवाज आणि चेहरा, दोन्ही पडला होता.
विजय मनाने खूप चांगला होता, पण त्याच्या या भोळसरपणाने या जगात त्याचा कसा निभाव लागणार हे त्याच्या आईला लागलेली मोठ्ठी काळजी होती.
यथावकाश विजयची बोर्डाची परीक्षा पार पडली. पेपर चांगले गेले होते. सध्या विजय आईबरोबर तिच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी (apprentice) म्हणून काम करत होता. वेळ चांगला जाईल, चार पैसे गाठीशी लावता येतील हे तर हेतू होतेच, पण अनसूयेला त्या निमित्ताने विजयची दुनियेशी ओळख करून द्यायची होती, त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी समजावून द्यायच्या होत्या.
आज तो कंपनीत कामाला येऊ लागला त्याला दोन महिने होऊन गेले होते. अचानकच आई विजयला म्हणाली, “विजय, बाळा, अरे त्या नलिनीला पैश्यांची गरज आहे रे. महिनाभरासाठी दहा हजार रुपये मागते आहे, काय करू रे? “
“अग आई, कालच नलूमावशी पेढे वाटत होती ना तिच्या मुलीचा पहिला पगार झाला म्हणून. तू जरा नीट चौकशी करतेस का? म्हणजे, खरंच काही अडचण असेल तर देच तू पैसे… “
अनसूयेच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं.
“तुझा रिझल्ट लागला की गणितासाठी लगेच तू त्या रमेशच्या भावाची शिकवणी लाव, म्हणजे ऐन वेळी धावाधाव नको, ” अनसूया विजयला सुचवत होती.
“कप्पाळ! अग, त्या रमेशला स्वतःलाच यंदा बोर्डाच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला कॉपी करताना पकडलं. त्याचा भाऊ गणित चांगलं शिकवत असता, तर रमेशवर ही पाळी का आली असती? उलट मीच त्याच्याकडून माझे हजार रुपये परत घेऊन आलोय. ”
हळूहळू अनसूया विजयबाबतीत निर्धास्त होऊ लागली होती. एवढ्यात शेजारच्या इमारतीतील सोनादीदी धावतच आली.
“काकू, मला जरा हजार रुपये उसने देता का? ताईच्या सासूबाई इथे घरी आल्या होत्या, त्यांना चक्कर आली आहे, डॉक्टरांनी औषधं आणायला सांगितली आहेत. ”
“हे बघ सोना, तू माझ्या विजयला दोनदा फसवलंस, पण मी नाही हो बधायची. तू इथून जा बघू कशी. ” अनसूयेने करडेपणाने सांगितले.
पाहिलं तर विजय मात्र शेजारी नव्हता. दहा पंधरा मिनिटांनी स्वारी घामाघूम होऊन आली. आईच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून त्याने सांगायला सुरुवात केली.
“मला या वेळी दीदी खरंच घाबरलेली वाटली, म्हणून मग खात्री करून घ्यायला मी तिच्या घरी गेलो. तिच्या ताईच्या सासूबाई खरंच आल्या आहेत आणि त्यांना खरंच बरं नाहीये. मग मी डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी घेतली.
केमिस्टकडे औषधं महाग पडतात, म्हणून मग मी पुढच्या चौकातील जेनेरिक केमिस्टकडे गेलो. तिथे तीच औषधं मला स्वस्त मिळाली. ती घेऊन मी दीदीच्या घरी गेलो, आजींना औषधं कशी घ्यायची ते समजावून सांगितलं आणि घरी परत आलो.
मी ते रमेशच्या दादाकडून माझे पैसे परत घेतले होते ना, आई, त्यातले वापरले मी पैसे. आणि आता दीदी परत आली ना, की मी तिला लांडगा आला रे आला गोष्ट सांगणार आहे, बरं का… ” विजय अव्याहतपणे बोलत होता.
आणि या निरागस बालपणाला नीरक्षीरविवेक बुद्धी आलेली पाहून माऊली सुखावत होती.
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज तपासण्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. कुठे गेले की पाहणी, पाहणी म्हणजे पाहणी, नुसतं वरवर बघायचं नाही, तर त्याच्या मुळापर्यंत जायचं! त्यांच्या या नो-नॉन्सेन्स वृत्तीचा घरात एक छोटासा प्रयोग करावा, असा विचार माझ्या मनात आला.
… आणि घरात तपासणीसाठी सगळ्यात योग्य जागा कोणती?
फ्रीज!
फ्रीज ही घरातली अशी जागा आहे की तिथे काय सापडेल याचा अंदाज स्वतः फ्रीजच्या मालकिणीलाही नसतो. किंबहुना, ब्रह्मांडातल्या तमाम गोष्टी *‘कधीतरी उपयोगी पडू शकतात’* या सिद्धांतावर फ्रीजच्या मालकिणीची अढळ श्रद्धा असते. त्यामुळे जिचा ‘आत्ता उपयोग नाही’ ती गोष्ट फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी सर्वात पात्र समजली जाते!
मी दार उघडलं आणि माझ्या डोळ्यांसमोर अन्नपदार्थांचा नव्हे, तर एका समांतर विश्वाचा दरवाजा उघडला!
महिन्यांपूर्वीचा मंदिरातला प्रसाद होता. मागच्या महिन्यातली खिचडी होती. टोमॅटो होते, जे आधी उन्हात वाळले होते आणि नंतर फ्रीजमध्ये वाळण्याचा मान त्यांनी मिळवला होता. अर्धं लिंबू होतं. ते लिंबू आहे की पुरातत्त्व खात्याने जतन करावा असा नमुना, याचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी लागली असती.
एक गूढ बरणी होती. तिच्यात काय आहे? हा प्रश्न विचारण्याचं धाडस मी केलं नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. एका कोपऱ्यात एक हिरवी मिरची पडली होती. ती इतकी एकटी होती की तिला पाहून वाटलं, तिनंही जगण्याची आशा सोडली असावी.
आणि मग सापडला चॉकलेटचा डबा!
कधीतरी कुणीतरी प्रेमाने दिलेला. ‘एखाद्या खास दिवशी खाऊ’ म्हणून ठेवलेला. तो खास दिवस अजून आला नव्हता. चॉकलेट मात्र फ्रीजमध्ये बसून त्या दिवसाची वाट पाहत होतं. आता त्या डब्याला पाहून वाटलं, हा चॉकलेटचा डबा नसून आपल्या संयमाचं स्मारक आहे!
पण एवढ्यावरच हा विषय संपत नाही.
फ्रीजमध्ये अशा अनेक गोष्टी सापडतात ज्यांचा फ्रीजशी दूरदूरपर्यंत संबंध नसतो.
उदाहरणार्थ …. रवा!
रवा हा स्वयंपाकघरातल्या कपाटात राहणारा नागरिक. पण काही काळाने तो अचानक फ्रीजमध्ये स्थलांतरित झालेला आढळतो.
शेंगदाणेही तसेच. सुकामेवा तर फ्रीजमध्ये इतक्या अधिकाराने वावरतो की तो तिथला कायमस्वरूपी रहिवासी असावा!
खरंतर किचनच्या कपाटात असायला हव्या अशा अनेक जिनसांनी बाहेरील नागरिकांप्रमाणे फ्रीजमध्ये अवैध घुसखोरी केलेली असते.
या घुसखोरांना हुसकावून लावावं की नाही, यावर फ्रीजची मालकिण मात्र ठाम असते
“ठेवू दे! लागतात कधीतरी! ”
हे ‘कधीतरी’ नेमकं कधी येतं, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
कधीतरी म्हणजे उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात की पुढच्या जन्मी याचा खुलासा आजवर झालेला नाही.
मी मात्र तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला मनात साक्षी ठेवून कारवाई करायचं ठरवलं.
नोटीस काढायची.
दोषींवर गुन्हे दाखल करायचे.
आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर फ्रीज सील करायचा!
पण तेवढ्यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा माझ्या लक्षात आला.
मी तुकाराम मुंढे नाही.
तुकाराम मुंढे कारवाई करून पुढच्या ठिकाणी जाऊ शकतात.
मला मात्र इथेच राहायचं आहे.
आणि मुख्य म्हणजे…
या सगळ्या फ्रीज साम्राज्याची मालकीणही याच घरात राहते!
म्हणून चौकशीला वेगळं वळण मिळालं.
आमच्यात वाटाघाटी झाल्या.
काही गोष्टींची मुदत वाढवण्यात आली. काहींना तातडीने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काही संशयास्पद पदार्थांचा पंचनामा झाला. काहींची ओळख पटली नाही म्हणून त्यांना ‘अज्ञात’ म्हणून विल्हेवाट लावण्यात आली.
अखेर तपासणी बंद करण्यात आली.
फ्रीजला माफ करण्यात आलं.
फ्रीजच्या मालकिणीला जाब विचारण्यात आला नाही.
आणि शेवटी आम्ही एकमताने ठरवलं
या प्रकरणावर पडदा टाकूया.
कारण घर चालवताना प्रत्येक गोष्ट नियमाने चालत नाही.
काही गोष्टी प्रेमाने चालतात.
काही सवयींनी.
आणि काही…
मी, तुकाराम!
‘जाऊ दे, पुढच्या वेळी फ्रीज साफ करू’ या शाश्वत आश्वासनावर तह केला.
पुढची वेळ कधी आली का?
हा प्रश्न विचारू नका.
फ्रीज अजूनही भरलेला आहे!
लेखिका : अज्ञात
प्रस्तुती – मीनल केळकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कोणता नवरा खरेदी करू?– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆
शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं, ज्यावर लिहिलं होतं –
“इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता.”
हे वाचून बायका वेड्यासारख्या दुकानाकडे धावू लागल्या. दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली.
मुख्य दरवाजावर सूचना लिहिलेली होती –
१. या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल. आधार कार्ड आवश्यक आहे.
२. दुकानात एकूण ६ मजले आहेत, आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिलेले आहेत.
३. कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून नवरा निवडू शकते.
४. पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही – केवळ दुकानाबाहेर जाता येईल.
एक देखणी तरुणीला दुकानात प्रवेश मिळाला…
पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं –
“या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत.” ती पुढे गेली…
दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि मुलांना आवडतात.”
ती पुन्हा पुढे गेली…
तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि देखणेही आहेत.”
हे वाचून ती थोडा वेळ थांबली, पण विचार केला, “वर काय आहे ते पाहूया…”
चौथ्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन, देखणे आहेत आणि घरकामात मदतही करतात.”
हे वाचून ती थक्क झाली. विचार करू लागली –
“खरंच असे नवरे आजकाल असतात का?”
तरीही मन नाही मानलं आणि ती वर गेली…
पाचव्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत, देखणे आहेत, घरकामात मदत करतात आणि आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करतात.”
आता तिचं डोकंच फिरू लागलं… विचार केला –
“यापेक्षा चांगलं काय असू शकतं?”
पण तिचं मन अजून समाधानात नव्हतं…
ती शेवटच्या ६ व्या मजल्यावर गेली…
सहाव्या मजल्यावर लिहिलं होतं –
“आपण या मजल्यावर येणाऱ्या ३३३९ व्या महिला आहात. या मजल्यावर एकही नवरा नाही. हा मजला केवळ सुप्रीम कोर्टाला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णतः समाधानी करणं अशक्य आहे.
आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! डावीकडे ८ पायऱ्या आहेत, त्या थेट दुकानाबाहेर जातात.”
सारांश –
आजकाल समाजात अनेक कन्या आणि वरपक्षाचे पालक “आणखी चांगला… आणि अजून चांगला… ” याच्या मागे लागून आहेत, आणि त्यातच लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाते आहे…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित
सांगली – ४१६ ४१६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ AI उर्फ ANI ची गोष्ट – लेखक : माधव शिरवळकर ☆ प्रस्तुती : हेमन्त बावनकर ☆
आपण शाळेत असताना किंवा एखाद्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रभक्तीपर गीत असंख्य वेळा ऐकलं आहे. त्यात ‘सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्’ अशी एक ओळ येते. तीही आपण अनेकदा उच्चारली आहे. त्या ओळीतला ‘भाषिणी’ हा शब्द घ्या. आता भारत सरकारने या ‘भाषिणी’ शब्दाला Artificial Intelligence (AI) शी जोडलं आहे. नुसतं जोडलं नाही, तर ‘भाषिणी’ या नावाचं एक ॲपही गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलं आहे. हे भारत सरकारचं अधिकृत आणि मोफत ॲप आहे. तुमच्या-आमच्यासाठी. आपण हे AI-आधारित ॲप डाउनलोड करू शकतो. कसलं आहे ते ॲप?
माधव शिरवळकर
(माधव शिरवळकर हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विषयाचे अभ्यासक आहेत.)
भाषिणी आणि AI
‘भाषिणी’ हा भारत सरकारचा AI-आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाची माहिती देणारी वेबसाइट एकूण ३४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यात इंग्रजीसह ३४ भाषा आहेत. पैकी ३३ भाषा या भारतीय भाषा आहेत. भारतात बोलल्या, ऐकल्या, वाचल्या आणि लिहिल्या जाणाऱ्या भाषा. कोणत्या आहेत त्या भाषा? ही घ्या यादी—
कसला आहे हा भाषिणी प्रकल्प? आणि त्याचा AI शी काय संबंध? असा प्रश्न तुम्ही विचाराल. त्या प्रश्नाचं उत्तर ‘भाषिणी’ ॲपमध्ये आहे. वर दिलेल्या वेबसाइटवरही त्याची सविस्तर माहिती आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन सर्वप्रथम हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या.
भाषिणी ॲपची उपयुक्तता
भाषिणी ॲप आपल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त आहे. काय करतं हे ॲप? ते खालील तीन प्रकारे आपल्याला मदत करू शकतं.
१. भाषांतर
हे ॲप कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेत भाषांतर करून देऊ शकतं. उदाहरणार्थ, समजा आपल्याला मराठीतून कन्नडमध्ये भाषांतर हवं आहे. आपलं वाक्य आहे—
‘मी उद्या सकाळी पुण्याहून मुंबईला येणार आहे. ’
त्याचं कन्नड भाषांतर—
ನಾನು ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪುಣೆಯಿಂದ ಮುಂಬೈಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದೇನೆ.
तुम्हाला एका क्षणात मिळेल. उलट दिशेनेही भाषांतर करता येईल. खरं तर कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेत भाषांतर या ॲपवर तात्काळ करून मिळतं. तुम्ही कुठलीही भाषा निवडू शकता.
२. आवाजाचं भाषांतर
वरील सोय झाली मजकुरासाठी, म्हणजे Text साठी. पण आवाजाचं काय? समजा मी मराठीत एखादं वाक्य बोललो, तर त्याचं भाषांतर होऊन ते कन्नडमध्ये ऐकू येईल का?
होय. तुम्ही मराठीत बोला. त्याचं भाषांतर तात्काळ कन्नडमध्ये होईल आणि ते वाक्य कन्नडमध्ये ऐकूही येईल.
समजा, तुम्ही पश्चिम बंगालमधल्या एखाद्या गावात गेला आहात. तिथे एका दुकानात तुम्हाला काही खरेदी करायची आहे. पण दुकानदाराला फक्त बंगाली भाषा समजते. हिंदी किंवा इंग्रजीचा त्याला गंधही नाही. अशा वेळी तुम्ही तुमचं ‘भाषिणी’ ॲप उघडायचं. त्यात मराठीत बोलायचं. त्या दुकानदाराला त्याचं बंगाली भाषांतर लगेच ऐकू येईल. अशी ही उपयुक्त सुविधा आहे.
३. फोटोतील मजकूर वाचून भाषांतर
तिसरा प्रकार तर आणखी उपयुक्त आहे. समजा, तुम्ही तामिळनाडूमधल्या एखाद्या गावात गेलात. तिथे तामिळ भाषेत एक सूचना फलक लावलेला आहे. तुम्हाला तामिळ वाचता येत नाही. त्यामुळे त्याचा अर्थही कळणार नाही.
अशा वेळी ‘भाषिणी’ ॲपमधील Scene नावाची सुविधा कामी येते. त्या सूचना फलकाचा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो घ्या. फोटोतल्या मजकुराचं भाषांतर तुम्हाला इंग्रजीत किंवा तुम्हाला हवी त्या भाषेत लगेच वाचता येईल.
भाषिणी ॲप सुरक्षित आहे. ते भारत सरकारचं अधिकृत ॲप आहे. पूर्णपणे मोफत आहे. गुगल प्ले स्टोअरवरून ते सहज डाउनलोड होतं. तुम्ही आजच ते वापरायला सुरुवात करू शकता.
शीर्षकातल्या ‘AI उर्फ ANI’चा अर्थ काय?
या पोस्टच्या शीर्षकात दिलेल्या ANI चा अर्थ Artificial Narrow Intelligence असा आहे. यालाच थोडक्यात Weak AI असंही म्हटलं जातं.
म्हणजे काय?
आजचं AI अजूनही विशिष्ट प्रकारची कामं करण्यापुरतंच मर्यादित आहे. ते गाणी तयार करू शकतं, व्हिडिओ तयार करू शकतं, भाषांतर करू शकतं, फोटोवर प्रक्रिया करू शकतं किंवा अशीच अनेक विशिष्ट प्रकारची कामं करू शकतं. पण ते अजून माणसासारखा सर्वसाधारण विचार करू शकत नाही. म्हणून त्याला Artificial Narrow Intelligence (ANI) किंवा Weak AI म्हणतात.
तुम्ही म्हणाल, “आम्हाला तर ते प्रचंड प्रगत वाटतं आहे. एका भाषेत बोला आणि दुसऱ्या भाषेत लगेच ऐकू येतं; हे प्रगत नाही का? “
नक्कीच प्रगत आहे; पण ते विशिष्ट कामांपुरतंच प्रगत आहे. सर्व क्षेत्रांत माणसाइतकी समज, विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि अनुभवाधारित विवेक अजून त्याच्यात आलेला नाही.
पुढे काय होईल?
याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. काही तज्ज्ञांच्या मते २०२८ ते २०३० च्या दरम्यान AI अधिक विकसित होऊन Artificial General Intelligence (AGI) कडे वाटचाल करू शकतं. तर काहींच्या मते त्याला आणखी बराच काळ लागू शकतो. Artificial Super Intelligence (ASI) ही तर त्याहून पुढची अवस्था आहे. ती नेमकी कधी येईल, याबद्दल आज निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही.
मात्र एक गोष्ट निश्चित आहे. भारतासह जगातील अनेक देश AGI आणि ASI च्या युगासाठी आजपासूनच तयारी करत आहेत. भारत सरकारही त्या दिशेने विविध उपक्रम राबवत आहे.
***
चित्र : साभार इन्टरनेट
लेखक : माधव शिरवळकर
प्रस्तुती : हेमन्त बावनकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग ऐकताना मला नेहमी एक गोष्ट विलक्षण आकर्षित करते. त्यांच्या शब्दांना जणु कडा नाहीत.
परिमळ नाही—परिमळु.
गोपाळ नाही—गोपाळु.
सुंदर नाही—सुंदरु.
मनोहर नाही—मनोहरु.
ओंकार नाही—ओंकारु.
आणि मग मध्येच एखादा शब्द येतो—अळुमाळु! “अवचिता परिमळु, झुळकला अळुमाळु…”
हा अभंग मोठ्याने म्हटला तरी मोठ्याने बोलल्यासारखा वाटत नाही. तो आपोआप कुजबुजल्यासारखा होतो. ‘अवचिता’मध्ये आश्चर्य आहे, ‘परिमळु’मध्ये सुगंध आहे, ‘झुळकला’मध्ये वारा आहे आणि ‘अळुमाळु’ तर शब्द कमी आणि गालावरून अलगद फिरलेल मोरपीसच जास्त वाटतं. ‘अळुमाळु’चा प्राचीन मराठीतील अर्थही – किंचित, थोडासा, अल्प – असा येतो.
देवाच्या आगमनाची कल्पना आपण केली तर काय सुचेल?
.. प्रचंड प्रकाश. घंटांचा नाद. आकाशवाणी. काहीतरी भव्य.
.. माऊलींचा देव मात्र तसा येत नाही. तो परिमळासारखा झुळकतो.
कदाचित हीच माऊलींची खासियत आहे. त्यांचा ईश्वर आपल्याला दिपवण्यासाठी येत नाही; तो नकळत आपल्याला व्यापून टाकतो.
मग दुसरा अभंग ऐकावा—
“घनु वाजे घुणघुणा
वारा वाजे रुणझुणा…”
इथेही मेघ ‘गर्जत’ नाही. तो घुणघुणतो. वारा ‘सुसाट’ वाहत नाही. तो रुणझुणतो. पुढे ‘भवतारकु’, ‘चंदनु’, ‘नंदनु’ असे शब्द येत राहतात.
‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’मध्ये तर हा नाद आणखी विलक्षण होतो. अवगुणु, कमळदळु, निश्चळु, सुगंधु, परिमळु, सुंदरु… शब्द एकामागून एक येतात आणि अभंगाचा अर्थ समजण्याआधीच त्याची लय मनाला समजते.
इथे एक भाषिक गंमत मात्र आहे.
या शब्दांच्या शेवटी येणारा ‘उ’ हा प्रत्येक वेळी माऊलींनी केवळ शब्द मऊ करण्यासाठी जोडलेला नाही. ज्ञानेश्वरीच्या भाषेवरील अभ्यास पाहिला तर जुन्या मराठीत अकारान्त पुल्लिंगी शब्दांची अनेक एकवचनी रूपे उकारान्त असणे हे त्या काळच्या भाषेचेच वैशिष्ट्य होते. म्हणजे ‘सुंदरु’, ‘परिमळु’, ‘ओंकारु’ यामागे व्याकरणही आहे.
भाषेने माऊलींना मऊ माती दिली होती. पण त्या मातीतून त्यांनी घडवले काय, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.
->> त्याच काळच्या भाषेत युद्धही लिहिता आले असते. क्रोध लिहिता आला असता. तिरस्कार लिहिता आला असता.
->> आत्मज्ञानासारख्या प्रचंड विषयासाठी माऊली एखादे दार्शनिक रणशिंग फुंकत नाहीत. ते आपल्या दारात इवलेसे रोप लावतात. ते वाढत जाते. गगनापर्यंत पोहोचते. त्याला कळ्या येतात. फुले येतात. आणि शेवटी त्याच फुलांचा शेला विठ्ठलाला अर्पण होतो.
ज्ञानेश्वरांना विश्व समजावून सांगायचे आहे; पण ते त्यासाठी विश्वाचा आकार वाढवत नाहीत.
ते रोप लहान करतात आणि त्या इवल्याशा रोपातून आपल्याला गगन दाखवतात.
मला वाटते माऊलींच्या भाषेचा हा फार मोठा गुण आहे, त्यांच्या अध्यात्मात धाक नाही.
“रूप पाहतां लोचनी”मध्येही विठ्ठल ‘महान’, ‘सर्वशक्तिमान’, ‘अजेय’ वगैरे नाही.
->> तो ‘बरवा’ आहे.
“तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा…”
->> आणि पुढे तो “सर्व सुखाचे आगरु” आहे.
देवाचे वर्णन करताना ‘बरवा’ हा शब्द वापरण्यासाठी देवाबरोबरचे नाते किती जवळचे असावे लागेल! ज्याच्यापुढे थरथरायचे त्याला ‘बरवा’ म्हणता येत नाही. ज्याच्यावर प्रेम करायचे त्यालाच म्हणता येते आणि इथे मला वाटते शब्दांच्या पलीकडे माऊलींचे व्यक्तिमत्त्व दिसायला लागते. त्याचा सर्वांत मोठा पुरावा कदाचित अभंगात नाही, तर पसायदानात आहे.
जगात ‘खल’ आहेत, हे माऊली नाकारत नाहीत. दुष्टपणा आहे, अंधार आहे, दुरित आहे. पण त्यावर त्यांचा उपाय काय?
… खळांचा नाश होवो? नाही.
“जे खळांची व्यंकटी सांडो. ” ->> माणूस जाऊ नये. त्याचा वाकडेपणा जावा.
आणि एवढ्यावरही ते थांबत नाहीत,
“तया सत्कर्मी रती वाढो. ” ->> वाईट माणसाला शिक्षा मिळावी, अशी इच्छा नाही. त्याला चांगल्या कामाची आवड निर्माण व्हावी, ही प्रार्थना आहे.
नंतर, “भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचें. ”
आणि अंधाराबद्दलसुद्धा ते ‘अंधार नष्ट करा’ अशा आक्रमक भाषेत बोलत नाहीत.
“दुरितांचे तिमिर जावो. ”
->> जणु सूर्य उगवावा आणि अंधाराने स्वतःच निघून जावे. किती विलक्षण आहे हे!
->> माणसाच्या वाईटपणाबद्दल बोलतानासुद्धा माऊली शब्दांची तलवार काढत नाहीत.
म्हणूनच आता मला वाटते, ‘अळुमाळु’, ‘परिमळु’, ‘गोपाळु’, ‘सुंदरु’, ‘मनोहरु’, ‘रुणुझुणु’, ‘घुणघुणा’, ‘गगनावेरी’, ‘कळियासी’ हे फक्त गोड आवाजाचे जुने मराठी शब्द नाहीत. त्या शब्दांमधून एक वृत्ती सतत डोकावत राहते.
जगाला समजावून सांगायचे आहे; जिंकायचे नाही.
माणसाला बदलायचे आहे; मोडायचे नाही.
ईश्वर दाखवायचा आहे; त्याची भीति घालायची नाही.
कदाचित म्हणूनच महाराष्ट्र त्यांना ‘ज्ञानेश्वर महाराज’ म्हणतो, पण त्याहून जास्त प्रेमाने ‘माऊली’ म्हणतो.
‘महाराज’ या शब्दात आदर आहे. पण ‘माऊली’ या शब्दालाही कडा नाहीत. आणि तेच त्यांच्या रचनांनाही शोभून दिसते..
***
लेखक : सुबोध गाडगीळ
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
कृष्ण खरंतर योगेश्वर होता.. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या.. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या.. ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले.. उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले.. मग त्याचे उदात्तीकरणही केले..
एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते.
दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली. पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे, त्याचा आपण खरंच विचार करतो का?
या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले… कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की, त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश, भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके… पाळणा, दूध, दही,
रासलीला या पलीकडचा कृष्ण गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या “कृष्णनीती ” या पुस्तकात रंगवला आहे…
त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहेत, असा-
१. तत्त्वज्ञानी, राजकारणी, मुत्सद्दी…
२. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा, त्याचे महत्त्व पटवून देणारा… रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर…
३. गवळी असूनही, आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक…
५. द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर…
६. स्थापत्य शास्रज्ञ(इंजिनिअर) आपल्या कलात्मक दृष्टीने द्वारका नगरी बनविणारा…
अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो…
गीतेची निर्मिती करणारा विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा शूद्र अशा सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो…
‘महाभारता’चा परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी, राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून…
“कृष्णकिनारा” मधून तो भेटतो राधा, द्रौपदी आणि कुंतीचा सखा, मित्र, पाठीराखा म्हणून…
आणि जितकं मन, मेंदू, मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो…
कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा, जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (?) लोकांची चीड येते! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा…
कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!
माणूस म्हणून त्याचे तेज, त्याचा लढाऊ बाणा त्याचे ‘योगेश्वर’ रूप.. म्हणजेच खरा ‘कृष्ण’… त्याला विविध पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती. माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात…
ज्यांना समजून घेता येतं, त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ…
कृष्णा… तू थोडा तरी समजलास, म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूहं भेदता आलीत…
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈