☆ औरत… (अनुवादित) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆
☆☆☆☆
(अनुवादित कथा)..(पूर्वार्ध)
थोडीशी घरघर. मंद होत जाणारा प्रकाश आणि विमान उडू लागले. समीरा हळू हळू छोट्या छोट्या होत जाणा-या घरांकडे खिडकीतून बघत होती. या सगळ्यात माझेही घर दिसेल का? एक दुसर्याला लागून असलेल्या अनेक घरात, तिचेही एक घर होते. कुठून दिसेल ते? तिला तिच्या बालपणाची आठवण झाली. तेव्हा उडत्या विमानाची घरघराट ऐकू येताच मोहल्ल्यातील सगळी मुले पळत पळत बाहेर येत असत आणि छोटं छोटं होत विमान अदृश्य होत नाही, तोपर्यंत सगळी मुले तिकडे बघत रहात. आज बरोबर उलटं आहे. ती विमानात बसलीय आणि घरं छोटी छोटी होताना ती बघतेय.
सुश्री गिरिमा घारेखान
थोड्याच वेळात विमान ढगांमधे शिरलं. समीरा, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहावं, तशी काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे दृश्य तिच्या नजरेसमोर साकार होऊ लागले.
‘नाही अम्मी, मला शादी करून इतक्या दूर जायचं नाही.’
‘अग वेडे, मस्कत कुठे इतक्या दूर आहे? ’विमानाने फक्त दोन-तीन तासात तिथं पोचता येतं. यापेक्षा जास्त वेळ ट्रेनने कोचीनला पोचायला लागतो.’
समीराला तर परदेश शब्दामुळेच पोटात भिंगरी फिरल्यासारखं गरगरायला लागलं.
‘पण अम्मी, अगदी अपरिचित देश, अपरिचित लोक… मी तिथे कशी राहू शकेन? ’
मग अम्मी, आपल्या मावशीच्या मुलीशी बोलली. ती किती तरी वर्षांपासून दुबईला होती. महालासारख्या घरात रहात होती. जास्त वेळा येणं तिला शक्य होत नसे. परंतु ईद- सणवार या निमित्ताने सगळ्यांसाठी खूप कपडे, अत्तरं, खजूर, सुका मेवा आणि चॉकलेटस पाठवते. तरीही समीराचं मन मानत नव्हतं. पावसाळ्यात त्यांच्या घराच्या गळणार्या छताप्रमाणे अम्मीच्या डोळ्यातून पाणी वहाणे सुरू झाले होते.
समीराला आपल्या घरच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. तिला माहीत होतं, की तिचे अब्बा दिवसभर श्वास घेण्याइतकीही फुरसत न घेता काम करतात, तेव्हा कुठे घरातील सहा व्यक्तींच्या शरीराला त्यांचा ऑक्सिजन मिळत होता. त्यांच्या पगारानंतरचे दहा दिवस ईदप्रमाणे वाटायचे. नंतर हळू हळू रोजांना सुरुवात व्हायची.
दूरच्या एका नातेवाईकामार्फत, वीस वर्षाच्या समीराला, मस्कतमध्ये रहाणाऱ्या एका अरबासाठी मागणी आली. या नातेवाईकाने यापूर्वीही अनेक मुलींचे विवाह खाडीतील देशात रहाणा-यांशी ठरवले होते. त्यामुळे अविश्वासाचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे हुंडा न देता मुलीला तिचा ठिकाणा मिळतोय, तर समीराची अम्मी, परवीनच्या मनात अविश्वास दाखवण्याचा विचारही आला नाही.
त्या दिवशी समीरा नको… नको… म्हणत होती, तेव्हा परवीन तिला समजावत होती. आई आणि मुलीच्या अश्रूंची धार एकसारखीच होती. कारणं फक्त वेगवेगळी होती.
समीरा विचार करत होती, एक अगदी अपरिचित देशात, एका अपरिचित व्यक्तीबरोबर, ती सारं आयुष्य कसं व्यतीत करू शकेल? शिवाय, अरब देशांबद्दल तिने काय काय ऐकलं होतं. तिथे बुरख्यात रहायला हवं. घराबाहेर जास्त पडता येत नाही, अशा खूप काही गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या.
इथे भलेही पैशाची कमतरता असेलही, पण ती स्वतंत्रपणे हिंडू-फिरू शकते.
सरकारने दिलेल्या सवलतीमुळे ती बारावीपर्यंत शिकली होती. मुलांबरोबर एका वर्गात बसली होती. मॉनिटर बनण्याचा रुबाब दाखवला होता. शाळेत मुख्याध्यापिका बनून भाषण दिले होते. मैत्रिणीच्या अॅक्टिवावर बसून बाजारातून फिरून आली होती. तिच्या अब्बा-अम्मीने या सगळ्या गोष्टी करण्याबाबत तिला कधी नकार दिला नव्हता. बुरख्याखेरीज तिथे आणखी किती बंधने असतील? काय ती श्वास घेऊ शकेल ना!
पण, अम्मीचे नाईलाजाचे शब्द आणि लाचारीचे अश्रू यात समीरा विरघळली. तिने जेव्हा अम्मीकडे बघत होकारार्थी मान हलवली., तेव्हा, तिची अम्मी इतकी खूश दिसली, जशी काही तिच्या झुकलेल्या मानेत, तिला ईदचा चाँद दिसला. समीराचे कपाळ चुंबत, ती म्हणाली, ‘ शहाणी माझी बेटी! चल! तुझा चंद्रासारखा चेहरा नीट सजव. करीम चाचा त्या अरबाला घेऊन येणार आहेत. | रशिद – रशिद नाव आहे त्यांचं.’
आणि आज ती त्या रशिदची बीबी बनून त्याच्याबरोबर मस्कतला निघाली होती. पहिल्या मुलाखतीच्या वेळी तर समीराच्या पापण्यांवर जसा काही पहाड उभा राहिला. दुसर्या मुलाखतीच्या वेळी तिला वाटलं, रशिदमध्ये आपत्तिजनक काही नाही. उंच, गहूवर्णी, बांधेसूद शरीर.
दुसर्या मुलाखतीच्या वेळी तो समीराला म्हणाला, ‘त्या दिवशी आपल्या पापण्या उचलत नव्हत्या आणि माझे डोळे आपल्या चेहर्यावरून हटत नव्हते. मी हिंदुस्थानात आलो होतो, एखाद्या मुलीशी निकाह करायला आणि मला तर नूरजहाँ मिळाली. माझी तर बिना रोजा इफ्तारी (रोजा न करताच, रोजा केल्याचे पुण्य) मिळाली. हमदुल्ला! (अल्लाची कृपाच म्हणायची की! )’
तेव्हा, समीराच्या हृदयात एक अंकूर फुटला. निकाहनंतर रशिद, एखाद्या नाबाबाप्रमाणे सॅटीनचा, दुधासारखा सफेद, ज्याला ते, ‘कंदोरा’म्हणतात, त्या कुर्त्यावर मन मोहवणारा परफ्यूम शिंपडायचा, तेव्हा समीरा त्यांच्या वयातील अंतर विसरून जायची. त्याच्या कमरेला लटकणारा चांदीचा खंजीर आणि त्याच्याबरोबर बांधलेला चांदीचा पट्टा याने समीराचं मन पूर्णपणे बांधून टाकलं। हिंदुस्तानी संस्कार असलेलं आणि अजूनपर्यंत कुमारिका राहिलेलं समीराचं मन, त्या परदेशीविषयी कधी ओतप्रोत ओढीने भरून गेलं, तिला कळलंच नाही. तो अनोळखी माणूस ‘“शौहर” ची उपाधी प्राप्त होताक्षणी तिचं सर्वस्व बनला होता.
एअर होस्टेस थंड पेय घेऊन आली. रशीदने समीराला ढगांतून बाहेर ओढली. ‘ढगांतून पहिल्यांदा उडताना कसं वाटतय? ’
‘आपल्याशेजारी बसल्यावर वाटतय, विमान जसं काही सातव्या स्वर्गातून उडतय.’ समीरा रशीदच्या अधीकच जवळ सरकत म्हणाली.
निकाहनंतर ताबडतोब, तिला बरोबर घेऊन जाण्याच्या कार्यवाहीत व्यस्त असलेल्या रशीदला, समीराला खूप काही विचारायचे होते. तिने विचारणं सुरू केलं.
‘मस्कत कसं शहर आहे? आपलं घर कसं आहे? घरात कोण कोण आहेत? ’
रशीद हसत हसत म्हणाला, ‘मस्कत खूप सुंदर शहर आहे, पण आपल्याला सोहारमध्ये राहायचे आहे.’
‘सोहार! ’
‘हो! मस्कतपेक्षा थोडं छोटं शहर आहे. तिथे माझे घर आहे. फार्म हाउस- गार्डनवालं घर आहे. फार्ममध्ये, घरामध्ये, खूप नोकर-चाकर आहेत. तिथे तुला एकटेपण मुळीच जाणवणार नाही.’
‘फार्म! ’ समीराला वाटलं, खुदाने खरोखर तिच्यावर मेहेरबानी केली आहे.
’खूप मोठा फ़ार्म आहे. खजूराची झाडे आहेत. त्यांच्याकडे तुलाच आता बघायचे आहे. ‘हिंदुस्तानातल्या मुली खूप हुशार असतात, ’ असं ऐकून होतो.’
समीराच्या गालावर हलकीशी चापट मारत, रशीद म्हणाला.
समीरा आश्चर्याने सगळं ऐकत राहिली. तिच्या सचेत डोक्यात लगेचच एक प्रश्न निर्माण झाला, ‘रशीद असं का म्हणाला, ’तुला एकटं वाटणार नाही? ’ एकटीला तिला कसं आणि काय सांभाळायचं होतं? ’ तिच्या डोक्यात हे सगळं एकदम काही शिरलं नाही. तरीही यातच तिचं मन विमानाप्रमाणे उडत उडत तिच्या विचार-शक्तीच्या पुढे गेलं होतं. यावेळी जसं काही एक वाढलेलं झाड त्याच्या मुळासकट उखडून, कुठल्या तरी दुसर्या जागी, रुजवण्यासाठी आणलं जात होतं.
फिल्ममधून बघितलेल्या विमान-तळापेक्षा, अधीक भव्य असा मस्कतचा विमान-तळ बघून तिचे केवळ डोळेच नव्हे, तर डोकंदेखील चक्रावून गेलं. विमान-तळाबाहेर रशीदचा ड्रायव्हर एक मोठी गाडी घेऊन उभा होता. कोमल, चमकदार गाडीची चाके एखाद्या आफ्रिकन सुंदरीच्या गालासारखी रस्ता चुंबत पळत होती. जवळ जवळ एकशे पंचवीस किलोमीटर रस्त्यावर, समीरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लटकणारी खजुरी आणि रांगोळीसारखी दिसणार्या फुलांसारखे विखुरलेले बंगले आपल्या डोळ्यांनी न्याहाळत होती.
सोहारमध्ये, जेव्हा तिने आपल्या बांगल्यात प्रवेश केला, तेव्हा तिला वाटलं, तिच्या आधी स्वर्ग या बंगल्यात राहायला येऊन गेला.
राशिदच्या प्रेमात बुडून गेलेली समीरा आपले कुटुंब, देश, वेळ व दिवसांची गणना करणं विसरून गेली. तो बंगला, त्यांच्या हनीमूनची रोमांचक वेळ बघत बघत रंगीबेरंगी प्रकाश पसरत राहिला. बाहेर उभे असलेले खजुराचे वृक्ष आपल्या पिवळ्या खजुरात अधीक माधुर्य भरत राहिले. एके दिवशी सकाळी रशीदच्या परफ्यूमच्या तीव्र गंधाने समीरा जागी झाली.
‘इतक्या सकाळी कुठे? ‘
‘‘मस्कतला चाललोय. आता काम तर करायला हवं ना! ’
‘म्हणजे? … अनपेक्षित धक्क्याने समीराच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळे मोठे मोठे करून ती रशिदकडे बघत राहिली. तिची झोप आता पूर्णपणे उडून गेली होती.
आपल्या कंदोर्यावर चांदीची पट्टी घालत घालत रशिद म्हणाला, ‘. ‘जानेमन, माझा मुख्य बिझनेस मस्कतमधेच आहे. आठवड्यातले पाच दिवस तिथेच रहाणार. जुम्मेच्या आधी आपल्या मलिकेजवळ तिचा शहनशाह हजर! ’
‘पण…’
‘अग, पाच दिवस कसे बघता बघता सरतील…’ हाताने चुटक्या वाजवत रशिद म्हणाला, ‘तू हा महाल सगळा नीटपणे बघशील, तोवर बंदा हजार! ’
रशिदने आलिंगनबद्ध समीराला नजाकतीने दूर केलं॰ ती त्या आघातातून बाहेर येण्यापूर्वीच रशिद निघूनही गेला.
ही गोष्ट त्याने आधी का सांगितली नाही, हे जाणून घेण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला, पण जाणू शकली नाही.
जंगलामध्ये निघालेल्या एखाद्या बालिकेचा वेळ, फांद्यांवर झुलण्यात, खाली पडलेली फळे उचलण्यात, पक्ष्यांच्या मागे पळण्यात, फुलांबरोबर बोलण्यात, जसा जातो, तसंच काही तरी समीराबाबत झालं होतं.
ती घरामध्ये हांतरलेल्या मखमली गालीचावर फुलपाखराप्रमाणे बसत होती. बाथरूममध्ये सुगंधित पाण्याने भरलेल्या टबात फेसाबरोबर एकरस होत होती. बगिचात नाचणार्या कारंजातील पाण्याच्या शिडकाव्याने ती अनेक वेळा इंद्रधनुष्य होऊन जायची. अनेक वेळा नक्षीदर मोठ्या आरशासमोर बसून अलंकार बदलत राह्यची आणि विचार करत असायची, रशिद जेव्हा येईल, तेव्हा ती काय घलेल? ती एखाद्या चातकाप्रमाणे गुरुवारची प्रतीक्षा करायची.
गुरुवारी सकाळी रशिद हजर व्हायचा आणि समीरा अपल्या या फ़रिश्त्याबरोबर स्वर्गात, स्वर्गाचा आनंद घेत रहायची.
रशिद हळू हळू खजुराच्या कारभाराबद्दल समीराला सांगत गेला. आणि चतुर समीरा थोड्याच काळात सगळं काम शिकली.
पिवळ्या झालेल्या खजुराला झाडांवरून खाली उतरवायचं. वजन केल्यानंतर पॅकिंग करायचं, लेबल लावायचं आणि मोठमोठ्या खोक्यात भरून मस्कतला पाठवायचं. ती ही सगळी कामे इथल्या लोकांकडून चांगल्या तर्हेने करवून घ्यायची. तिथे या सगळ्या लोकांचा मॅनेजर सईद होता. तो केरळहून आला होता. तो आता तिचा उजवा हात झाल्यासारखा झाला होता. आपल्याच मुलुखातून आलेल्या मालकिणीचा, त्याच्यावर जो विश्वास होता, त्याचा त्याला अभिमान वाटत होता.
गडद रंगाच्या दुपट्टयाने आपले केस झाकून, आपल्या लोकांवर हुकूम चालवणार्या समीराच्या गालावर जेव्हा तिचे सोनेरी केस यायचे, तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत रहायचा. ही सुरमा घातलेली मालकीण त्याला गावात असलेल्या त्याच्या प्रिय बहिणीची आठवण करून द्यायची.
“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.
… चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला. त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं, “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच क्राइम थ्रिलर. कथेमध्ये खून, संशय, गुंतागुंतीचा तपास, रहस्य, थरार आणि एक अनपेक्षित शेवट असणे अनिवार्य आहे.”
तो मेसेज वाचून मी जागच्या जागी अक्षरशः थिजून गेले. हातातील चहाचा कप थरथरला आणि टेबलवर वाजत स्थिरावला. अंगावर एक सरसरून काटा आला आणि कपाळावर आठ्या पडल्या. “काय झालं गं? एवढी का गोठली आहेस सकाळी सकाळी? “
स्वयंपाकघरातून पोहे बनवत असलेल्या नवऱ्याने माझा पडलेला आणि गंभीर चेहरा पाहून विचारलं. मी काही न बोलता फक्त मोबाईल त्याच्या हातात दिला. त्याने तो मेसेज शांतपणे वाचला आणि तो घरात घुमणारा मोठा हसू हसला. “अरे वा! बस, आता तुझं काम झालं तर! तू तर रोज नवनवीन विषयांवर सुंदर कथा लिहीत असतेस. हा विषय तर खूपच मस्त आणि थ्रिलिंग आहे. लिही की एखादी कडक थ्रिलर, तुला नक्की जमेल! ” तो म्हणाला.
मी त्याच्याकडे अत्यंत रागाने आणि असहाय्यतेने पाहिलं. “अरे, तुला थट्टा वाटतेय का? माझ्या आजवरच्या कथा आठव जरा. माझ्या कथेत दोन पात्रांमध्ये साधं कडाक्याचं भांडण झालं, तरी शेवटी मी दोघांची मनं वळवून त्यांची प्रेमाने समेट घडवून आणते. इथे सरळ जिवंत माणूस मारायचा आहे! रक्त, चाकू, खून… हे सगळं माझ्या संवेदनशील मनाला कसं पटणार आणि माझ्याकडून कसं होणार? ” माझं हे बोलणं ऐकून तो अजूनच जोरात हसायला लागला. तितक्यात आमचा कॉलेजला जाणारा मुलगा बेडरूममधून बाहेर आला आणि हसत म्हणाला, “बाबा, बरोबर आहे तिचं. आईच्या कथेतला खुनी आधी पीडित माणसाला प्रेमाने चहा पाजेल, मग त्याची मनधरणी करेल, ‘मला माफ कर’ म्हणून डोळ्यात पाणी आणेल आणि शेवटी दोघे गळ्यात गळे घालून पक्के मित्र होतील! ” सगळं घर माझ्यावर हसत होतं. त्या हसण्याने घरातलं वातावरण हलकं झालं असलं, तरी माझी मात्र धाकधूक वाढली होती. मी अत्यंत गंभीर झाले होते, कारण प्रश्न माझ्या लेखणीच्या प्रतिष्ठेचा होता.
दुपारी घरची सगळी कामं आटोपली. घरात शांतता पसरली होती. मी अभ्यासाच्या टेबलावर माझी आवडती वही आणि पेन घेऊन बसले. वहीच्या कोऱ्या पानाच्या अगदी मध्यभागी मी मोठ्या आणि ठळक अक्षरात शीर्षक लिहिलं, “मर्डर मिस्ट्री.” थोडं थांबून, खूप विचार करून मी कथेचं पहिलं वाक्य लिहिलं, “मध्यरात्रीचे बारा वाजले होते. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि भयानक शांतता पसरली होती. काळ्या कपड्यांमधील एक संशयास्पद माणूस हातात धारदार चाकू घेऊन बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरला…” मी ते वाक्य लिहिलं आणि स्वतःच दोनदा वाचलं. ते वाचताच माझ्या आतल्या संवेदनशील मनाने लगेच मान डोलवली आणि आतून आवाज आला, “धारदार चाकू? अगं, एवढा धारदार कशाला? चुकून जास्त लागलं तर? चाकू थोडा बोथट ठेव.” मी कपाळावर हात मारला, पण मनाचं ऐकून मी ‘धारदार’ हा शब्द खोडला आणि तिथे ‘बोथट’ असं लिहिलं.
मी पुढे लिहायला सुरुवात केली, “त्याने खोलीत झोपलेल्या माणसावर बोथट चाकूने जोरात वार केला…” पुन्हा माझं मन मध्येच ओरडलं, “जोरात नको गं बाई! खूप रक्त येईल आणि त्याला खूप वेदना होतील. त्यापेक्षा हलकासा वार कर.” मी ‘जोरात’ पुसलं आणि ‘हलकासा’ केलं. आता वाक्य झालं, “त्याने हलकासा वार केला.” पण क्षणभर विचार केल्यावर मलाच हसू आलं. हलकासा वार करून काय उपयोग? त्याने माणूस कसा मरेल? त्याला तर फक्त किरकोळ खरचटलं असेल. मग मर्डर कसा होणार? मी चिडून ते पूर्ण वाक्यच पुसून टाकलं. यावेळी मी चाकूच बाजूला ठेवला. मनात विचार केला की मारामारी दाखवू. मी लिहिलं, “त्याने मागून येऊन त्या माणसाला जोरात ढकललं…” लगेच मनातून दुसरी शंका उपस्थित झाली, “अरे, पण तो खाली पडल्यावर तिथे फरशी असेल आणि डोक्याला लागलं तर? खाली एखादी मऊ गादी किंवा सोफा असेल तर किती छान होईल! ” मी कथेतील त्या पडणाऱ्या पात्राच्या खाली सुरक्षित गादी ठेवली. पुन्हा सगळं पुसलं. असा करत करत अर्धा तास उलटून गेला होता. कागदावर शब्दांची खाडाखोड झाली होती, पण माझ्या कथेतला तो बिचारा माणूस अजून जिवंतच होता आणि खुनीसुद्धा दारात उभा राहून थकला होता.
इतक्यात नवरा खोलीत डोकावला आणि खोचकपणे म्हणाला, “काय लेखिकाबाई, झाला का मर्डर? की पोलीस तपास सुरू झाला? ” मी वैतागून पेन खाली ठेवलं आणि म्हणाले, “नाही रे… अजून खुनी दारातच उभा आहे. आत यायला तयार नाही.” तो हसत म्हणाला, “अशी दारात उभी ठेवून त्याची काय खातीरदारी करतेस? आत पाठव त्याला लवकर आणि उरकून टाक.” मी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं, “अरे, तो आत गेला तर घरातले लोक त्याला चहा-पाणी विचारतील. मग चहा द्यावा लागेल. चहा दिला की मर्डर कॅन्सल होईल आणि दोघे गप्पा मारत बसतील! ” तो डोक्याला हात लावून हसत हसत निघून गेला. मी हार मानणार नव्हते. यावेळी मी हिंसेचा मार्ग सोडायचा ठरवला. रक्तपात नको, म्हणून मी ‘विषाचा’ पर्याय निवडला. मी नवीन पानावर लिहायला घेतलं, “खुन्याने स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या कपात अत्यंत जहाल विष मिसळलं…” तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द!
‘मन अंकुरे अंकुरे’ या नावाचा ललित लेख संग्रह ज्ञानपथ पब्लिकेशन्स अमरावती द्वारा प्रकाशित.
साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कविता वाचन केलेले आहे.
वृत्तपत्रामधून सातत्याने विविध विषयांवर लिखाण.
मनमंजुषेतून
☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆
त्याच झालं असं, की परवा स्वयंपाकघरातील काळी नॉनस्टीक भांडी आरोग्यास किती व कशी बाधक आहेत वा नाहीत याबद्दलच लेखन वाचनात आलं. तसंही अलीकडे सर्वत्र केवळ स्टीलची भांडी अन्न शिजवण्यासाठी वापरावीत असा प्रचार होतोयं पण गैरसोय अशी होते की, स्टील उष्णतेचा चांगला वाहक नसल्याने, भांड्याला सर्वत्र सारखा जाळ लागत नाही त्यामुळे पदार्थ लगेच करपतो. हे सगळं मनाशी घोळत असतानांच मला दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडी गुलाबभाई घरी येऊन सर्व स्वयंपाकघरातील शिजवण्याची, खाण्याची वा अन्न काढून ठेवण्याची सगळी पितळी भांडी; उष्णतेची उत्तम वाहक असलेली, कल्हई करून अगदी चांदीसारखी चकचकीत करून द्यायचे, जेणेकरून कुठलाही पदार्थ कळकून त्याची बाधा होऊ नये आणि आम्ही कसे निर्धास्त व्हायचो हे आठवलं
कंदील भडकतोयं, गुलाबभाई. पावसाळ्याच्या तोंडी भाड्यांना कल्हई करायचीयं, गुलाबभाई. तेल संपलेल्या डब्यांची झाकणं कापून घ्यायचीयं व त्यापासून वापरायला सोयीचे डबे बनवायचेतं तर गुलाबभाई. बादलीला वाळा बसवायचायं, कुठल्या गळक्या जुनाट गुंड वा कळशीला डाग द्यायचायं, गुलाबभाई. धान्याचा हंगाम जवळ आलायं धान्य साठवायच्या कणग्या ठिकठाक करून घ्यायच्यायं तर गुलाबभाई. उन्हाळ्यात गावच्या कुंभारवाड्यातून नुकत्याच आणलेल्या नव्या कोऱ्या मातीच्या माठासाठी अडणी करायची तरी गुलाबभाई. तर एकंदरीत कुठलंही तांबा पितळ, लोखंडी वा टपरी पत्र्यांचं आणि कल्हई वगैरे कामं करायचं तर अशा कित्येक कामांसाठी आमची भिस्त केवळ गुलाबभाईवरच. अशा प्रकारची कामे करणारा आसपासच्या खेड्यांसकट एकमेव माणूस गुलाबभाई. आज ही असली कामे कुणी करवून घेत नाहीत. त्याची गरजही नाही किंवा ती कालबाह्य झालेली आहेत. आजच्या वापरा आणि फेका वा युज अँड थ्रो जमान्यात, वर्षानुवर्षे एकच, वारंवार भडकणारा कंदील पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरणाऱ्या लोकांचं जग कालौघात केव्हाच मागे पडलेलं. कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धुसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालयं व आज बहुतेकांसाठी तितकंच ते अनोळखीचही आहे. आजची पन्नाशीच्या पलीकडची, खेडेगावांशी बऱ्यापैकी परिचीत असलेली पिढी, कोणे एकेकाळी त्या जगाचा भाग होती. जसजसा काळ सरकत गेला तसतशा लहानपणीच्या दुनियेतील अगदी रोज भेटणाऱ्या खुणा एक एक करून दिसेनाशा होताहेत. तो निसर्गाचा नियमच आहे; त्याचे काय विशेष. कालपरत्वे स्थित्यंतरे ही घडणारच. गतकाळात भेटलेली कितीतरी माणसे, घडलेल्या घटना, विस्मृतीत गडप होतात. पण कधी कधी, कुणास ठाऊक कशी, अत्यंत साधी वाटणारी माणसं किंवा तेव्हा तितक्याशा महत्वाच्या नसणाऱ्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना, कुठेतरी मनाच्या पार आतल्या कप्प्यात जपलेल्या असतात, इतक्या की त्यांना पाठीशी घालत आपण कितीतरी काळ पुढे चालत आलेलो आहोत याचाही विसर पडतो, इतक्या त्या ताज्या असतात.अगदी कसं सगळं परवाच भेटल्या वा घडल्या सारखं लख्ख. त्यापैकीच एक भांड्यांना कल्हई करुन चकचकीत करणारे गुलाबभाई.
सहा फुटाच्या जवळपास उंची आणि सडपातळ शरीरयष्टी, कुठलेही भाव नसलेला उभट चेहरा, कुणी काय सांगतोय हे त्यांचे डोळेच ऐकायचे किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. पांढरा ढगळ पायजमा शर्ट व डोईवर कायम काळी साधी टोपी. टोपी न घातलेले गुलाबभाई मी बघितले नाहीत. भ्रमण वा स्थिर यापैकी कुठलीही दूरध्वनी सुविधा हाताशी नव्हती व तसल्या सोयीची पुसटशीही कल्पना त्याकाळी गावामध्ये कोणाच्याही मनीमानसी असण्याचे काही कारणही नव्हते. गावात कोणालाही काही सांगायचे झाल्यास प्रत्यक्ष भेटणे हीच पद्धत. यामुळे घरात गुलाबभाईसाठी कुठलेही काम निघाले असेल तर गुलाबभाईंच्या थेट घरीच थडकावे लागे आणि हमखास ती कामगिरी घरात लहान असल्याने माझ्याकडेच यायची. हो घरीच, त्याकाळी घर आणि व्यवसाय हे दोन्ही बहुतेक एकाच ठिकाणी असायचे किंवा कारागीर, ज्यांचे कोणाचे काम असेल त्यांच्या, घरी जाऊन ते काम करून द्यायचे. आजच्यासारखे वेगळे वर्कशॉप किंवा वेगळे दुकान अशी पद्धत नव्हतीच. गुलाबभाईंचे स्वतःचे घर नव्हते. ते राहायचे गावाला अगदी लागून असलेल्या शेतामधील डॉ. अशोक यांच्या वाड्याच्या परिसरात, दर्शनी भागातील डाव्या कोपऱ्यातील ओसरीत. अर्थातच तोच त्यांचा निवारा आणि वर्कशॉपही. त्यांचे छोटेसे कुटुंब मीयॉं, बिबी आणि दोन मुली अत्यंत उद्यमशील असा हम दो और हमारे दो असा चौकोनी संसार. वाड्याच्या समोरच्या भागात गुलाबभाई तर मागच्या बाजूला आणखी एक का दोन कुटुंब राहायला असल्याचे आठवतं. पण एकुणच सर्व गावाचा संबंध यायचा तो गुलाबभाईंशी आणि आजारी पडल्यास डॉक्टरांशी.
डॉक्टरांच्या शेतामध्ये अगदी कुंपणाला लागून, गुलाबभाईंच्या ओसरीच्या जरा डाव्या बाजूला मोठाल्या चिंचेच्या झाडांची रांग होती. वाऱ्याच्या झुळुकेसरशी डुलणारे चिंचांचे झुपके मनाला नेहमी खुणावत असत. शेताच्या कुंपणापलीकडील एका कार्यालयामध्ये शिपाई असणाऱ्या सदाभाऊंचा मात्र आमच्या चिंचा गोळा करण्याला कडाडून विरोध असे. अर्थात त्याला कारणही तसंच असायचं म्हणा. आम्हा शाळकऱ्यांचा घोळका चिंचेखाली एकदाचा जमला की इतका गोंधळ नि गोगांट करायचा की बाजूच्या कार्यालयीन कामात अडथळा यायचा पण आम्ही आपले सदाभाऊंच्या नावाने सदा बोटं मोडायचो. अशावेळी आम्ही गुलाबभाईच्या मुलींना हाक मारायचो आणि त्या आम्हाला चिंचेखालची चार-दोन बोटूकं अगदी सहज द्यायच्या आणि आमची बोळवण करायच्या. चिंचेच्या झाडांची रांग जेव्हा माकडांनी गजबजायची तेव्हा झाडावरची माकडं आणि आम्ही खालची माकडं यांच्यात करार होऊन गुलाबभाई आणि सदाभाऊ यांची चांगलीच कोंडी करत असू. माकडांच्या गोंधळात आमचाही गोंधळ मिसळून जायचा. तेव्हा माकडं गावात बाराही महिने मुक्कामाला नसायची. काही दिवसांची ही पाहुणी माकडं आमची फार आवडती होती.
वाड्यात शिरण्यासाठी, पहिले तर वाड्याच्या भल्या मोठ्या लोखंडी पत्र्याच्या फाटकाशी झुंजाव लागायचं. फाटक ढकलून आत मध्ये पाऊल पडल्याशिवाय वाड्याचा आतला परिसर काही दृष्टीपथात यायचा नाही कारण फाटक एकसंघ पत्र्याचं. त्याला मध्ये कुठलीही खिडकी वा फट नसल्याने फाटकाशी उभे राहून आत मधील कोणाला बाहेरून आवाज देणे अशक्यच म्हणून लहान मुलांसाठी ती झुंजच, पण अनिवार्य. त्यातल्या त्यात सोयीचा भाग म्हणजे फाटकाला वर किंवा खाली कडीकोंडा लागलेला नसायचा फक्त ते ढकलायचे अन् त्याचा कर्र… असा होणारा आवाज कानात घेऊन आतील ऐसपैस पटांगणात शिरायचे. फाटकाचं कर्र…एकदाच बंद झाल्यावरही जर का करकर, खडखड, ठकठक असे आवाज जर आपल्या डावीककडून येत असतील तर गुलाबभाई घरीच आहेत अन्यथा ते कुठे गावामध्ये कोणाकडे काहीशा असल्याच कामासाठी गेलेले असावेत हा अंदाज फाटकातच यायचा. गुलाबभाईंशी संवाद साधने म्हणजे अत्यंत जिकिरीचं काम. त्यांची कामानिमीत्त चाललेली ठोकपिट आणि भरीत भर गुलाबभाई दोन्ही कानाने ठार बहिरे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी गत व्हायची. मी फक्त त्यांना एवढं सांगून घराकडे येत असे, ते म्हणजे तुम्हाला काही कामासाठी आईने बोलावले आहे आणि बहुतेक हा संवाद हातवारे जास्त आणि शब्द कमी असाच व्हायचा. यावर गुलाबभाई फक्त मानेने होकार द्यायचे.
गुलाबभाईंचे कामातील कसब व सफाईदारपणा आणि माझ्या आईच्या संसारोपयोगी नवनवीन कल्पनांच्या समन्वयाची परिणीती व्हायची ती नाविन्यपूर्ण घरगुती वापरातील सुलभ उपकरणांच्या निर्मितीमध्ये. चिळ्या कंदीलांमध्ये रॉकेल भरायच्या डब्याला तोटी लावून घेऊन काम अधिक सोपे करणे तर कधी दिवालगिरीच्या वातीच्या पुंगळी भवती खबरदारी म्हणून आधीच आणखी एक जास्तीची पुंगळी बसवून घेऊन तिच्या कधी काळी भडकाण्यावर उपाय करावा. कित्येकदा बनवलेले झाकण बाहेरून नीट बसत नाही तर अशावेळी ते आत मधून बसवावे म्हणजे अधिक नीट बसेल का, असले प्रयोग करायला कधी गुलाबभाई थकत नसतं. घरोघरी दिवाळीच्या आधी होणाऱ्या वार्षिक साफसफाईच्या वेळी तर कित्येक अडगळीतल्या सामानांची दुरुस्ती करावी आणि त्यांना उपयोगात आणावे अशा विचाराने आणि इतर अनेक नियमित वापरातल्या सामानाच्या दुरुस्तीचा चेव बऱ्याच जणांना यायचा.त्यामुळे या सुमारास गुलाबभाईंच्या घराबाहेर बराच मोठा वैविध्यपूर्ण मोडक्या वा नादुरुस्त वस्तूंचे ढीग, किंवा ढीगभर काम त्यांना पडायचे. अशावेळी ते सारखे लगबगीत, प्रत्येकाची डेडलाईन सांभाळायचे. “हा हा दिवाली के पहेलेही बना दूंगा” असं पुटपुटल्यागत बोलायचे पण त्यांचा कामाचा झपाटा आणि ठोकपिटीचा आवाज त्या काळात फार वाढायचा.
कुणाच्याही कधी अध्यात मध्यात नसणारे, आपलं काम भलं आणि आपण भले या नियमाने चालणारे. सदैव कामाचीच भाषा बोलणारे व आवाजाचा एकच पोत ठाऊक असलेले. भोवतालच्या जगाला त्यांच्या व्यक्त्तीमत्वाचा केवळ गुलाबभाई डागवाला वा कल्हईवाला एवढा एकच पदर ठाऊक असलेले, कामात अत्यंत प्रामाणिक आणि तितकेच हरहुन्नरी. कधीही कुठली तक्रार नसणारे, माणुसकीचा वसा घेतलेले. कधीही कामा पलीकडे न बोलणारे, आजूबाजूच्याच काय तर कधी स्वत:बाबतही व्यक्त न होणारे गुलाबभाई; आज मात्र मला फार गूढ वाटतात.
हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो…
१९७१च्या भारत-पाक युद्धाचे चित्रण असलेल्या आणि १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि जाकी श्रॉफ यांच्यामध्ये शेवटी एक संवाद आहे… हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो! हे दोघेही पायदळ श्रेष्ठ की वायुदळ श्रेष्ठ याची चर्चा करताना एका निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले दाखवलेत…दोहोंचेही अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे!
अजूनही भारतीय जनमानसात सैन्य म्हणजे पायदळ हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे आजवरच्या युद्धचित्रपटांमध्ये अधिक चित्रीकरण पायदलाचे झालेले आढळते. वायूदलाचा क्रमांक दुसरा तर नौसेना तिस-या क्रमांकावर येते!
पण खरं तर ही तिन्ही दले म्हणजे आपले त्रिनेत्र आहेत. आधुनिक युद्धात तर Air Supremacy अर्थात ज्याच्या ताब्यात आकाश…त्याचे वर्चस्व अशी स्थिती आहे. नुकतेच पार पडलेले ऑपरेशन सिंदूर, त्या आधी पाकिस्तानातल्या बालाकोटवर आपण केलेले हवाई हल्ले हे याला साक्षी आहेत. जगभरातले देश हवाई सामर्थ्य वाढवण्याच्या सतत प्रयत्नांत असतात, त्याला काही अर्थ आहेच!
कारगिल युद्ध हे जगातल्या सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. पाकिस्तानची तयारी एवढी प्रचंड होती की केवळ पायदळ त्यांना पराभूत करण्यासाठी पुरेसे नव्हते. भारतीय वायूसेनेला या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होण्यात काही कारणांनी अंमळ उशीरच लागला…कारण तोवर युद्धाची निश्चित स्थितीच आपल्या सैन्याच्या लक्षात आलेली नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे याची खात्री होताच भारताने आपला हा तिसरा नेत्र उघडला…आणि ऑपरेशन सफेद सागर हाती घेतले. हा सागर जमिनीवरील नव्हता…आभाळात तरंगणा-या पांढ-या ढगांच्या वरून उडणा-या हवाई ‘जहाजां’नी केलेल्या पराक्रमांनी भरलेला आणि भारलेला होता.
सोळा ते अठरा हजार मीटर्सची उंची. त्यामुळे हवा विरळ. त्यामुळे विमानांच्या सामर्थ्यावर निश्चित मर्यादा. त्यात प्रचंड उंचीची टोकदार हिमशिखरे. त्यांतून वाट काढीत वेगाने जाणे यासाठी अत्युच्च दर्जाचे वैमानिक कौशल्य आवश्यक. पाकिस्तानी नियमित सैन्य अतिरेक्यांच्या वेशात कारगिलच्या शिखरांवरील बंकर्स, कपा-यांमध्ये दडून बसलेले. शिखरांवर खालून चढून जावे तर वर मोक्याच्या जागी बसलेला शत्रू भारतीय सैनिकांना सहजी टिपत होता. खालून तोफा डागाव्यात तर उंच शिखरे, द-या, कपारी असल्याने आरंभी अचूक तोफ-बॉम्बवर्षाव करणे महाकठीण होते. पाकिस्तानी सैन्याला रसद पुरवणा-या व्यवस्था तर भारतीय तोफांच्या मा-याच्या आणखीनच पलीकडे होत्या. अशा स्थितीत वायुदल हाच आशेचा एक मोठा किरण होता…आणि पाकिस्तान अधिकृत सैन्य या युद्धात सहभागी नसल्याने त्यांची वायुसेनाही युद्धात सहभागी होऊ शकत नव्हती…कारण ते तर म्हणत होते की कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हे तर काश्मिरी मुजाहिदीन, अतिरेकी शिरलेले आहेत.
आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारतीय वायुदल भारत-पाक वायूहद्द ओलांडून पलीकडे जाणारही नव्हती! अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आणि मुख्यत: तशा short noticeवर आपल्या वायूवीरांनी ७६३१ उड्डाणे केली! यांत आरंभीच्या हेलिकॉफ्टर्स उड्डाणांचाही समावेश होता. कारगिलमध्ये घुसलेले अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे ‘आका’ यांच्यातील संपर्कसूत्रे नेस्तनाबुत केली…आणि मुख्य म्हणजे सीमारेषा न ओलांडता त्यांचे मनोधैर्य रसातळाला नेऊन ठेवले!
या मोहिमेत आरंभी भारतीय वायुसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले…घुसखोरांकडे विमानविरोधी आधुनिक ‘स्टिंगर’ मिसाईल्स होती..आणि ती त्यांना डागता येत होती. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच आपण अनेक मोहारे गमावले…स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा आणि राजीव पुंडीर, फ्लाईट लेफ्टनंट सुब्रमनियम मुहीलान, सार्जंट राजकिशोर साहू, फ्लाईट सार्जंट पी.व्ही.एन.आर.प्रसाद यांचा समावेश होता. यांतील आहुजा साहेबांना पाकिस्तानी सैन्याने हालहाल करून मारल्याचे बोलले जाते. फ्लाईट लेफ्टनंट के.नचिकेत हे तर त्यांचे विमान पाकिस्तानी हद्दीत पडल्याने शत्रूच्या तावडीत सापडले होते…मात्र भारताच्या राजनैतिक दबावामुळे त्यांची सुखरूप सुटका होऊ शकली!
त्यावेळी भारतीय वायूदलाच्या ताफ्यात असलेली विमानेच या युद्धात वापरणे भाग होते. परंतू त्या विषम हवामानात आणि पर्वतीय परिसरात आणि रात्रीही बॉम्बफेक करू शकतील अशा क्षमतांची विमाने उपलब्ध होतीच किंवा त्यांचा तिथे प्रभावी वापर करता येईलच असे नव्हते. यासाठी अपारंपारिक नीती, जुने तंत्रज्ञान नव्या क्लृप्त्या वापरून कामात आणणे आवश्यक होते…आणि आपल्या वैमानिकांनी, तंत्रज्ञ वीरांनी ते करूनही दाखवले!
भारतीय वायुसेनेच्या १७व्या स्क्वाड्रन (Golden Arrows) चे विंग कमांडर बी.एस. अर्थात बिरेंद्रसिंग धनोआ ऊर्फ ‘टोनी’ (जे पुढे एअर चीफ मार्शल झाले! ) फ्लाईंग ऑफिसर आर.एस. अर्थात राजपाल सिंग धालीवाल ऊर्फ ‘धाली’ (जे पुढे विंग कमांडर झाले) यांची कामगिरी लक्षणीय ठरली…अर्थात त्यांच्या जोडीला असंख्य वायूवीर होतेच…जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ, संशोधकही होतेच. निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक बॉम्ब फेकताना ते बॉम्ब्स लक्ष्याच्या दिशेने निघालेले असताना वैमानिकांनी केलेल्या बॉम्ब्स अवे…अर्थात बॉम्ब्स निघाले…या घोषणा जमिनीवर नियंत्रण कक्षात बसलेल्या अधिका-यांच्या, कर्मचा-यांच्या, पर्वतांवर आडोशाला बसून वायूदलाच्या अचूक मा-याची वाट पहात असलेल्या सैनिकांच्या अंगावर शहारे उमटवून जात!
पायदल सैनिकांनी प्रचंड संख्येने बलिदाने दिली…त्यांना वायुदलाची मोलाची साथ लाभली…म्हणून कारगिल ‘विजय’ साकारला. भारतीय वायूदलाच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेणारी टेलीविजन मालिका ऑपरेशन सफेद सागर नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली गेली आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीमध्ये रस असणा-या सर्वांनीच ती जरूर पहावी..खरे तर यावर स्वतंत्र चित्रपट यायला पाहिजे होता!
तांत्रिक भाषा, ज्ञान कमी अवगत असणा-या माझ्यासारख्या प्रेक्षकांना या मालिकेत उल्लेख केल्या गेलेल्या विमानविद्येतील शास्त्रीय, तांत्रिक बाबी कदाचित लवकर लक्षात येणार नाहीत. पण आपल्या जांबाज fighter pilots तरुणांचे, तंत्रज्ञ मंडळीचे शौर्य, कौशल्य निश्चितच दिसेल…समजेल, हे निश्चित. यानिमित्ताने आपल्याला भारतीय वायूदलाच्या सामर्थ्याची खात्रीही पटेल. आहुजा साहेबांच्या आणि इतर हुतात्मा वायूसैनिकांच्या शौर्याचा परिचयही होईल.
ऑपरेशन सफेद सागर नावाच्या या OTT मालिकेत अभिनेते सिद्धार्थ यांनी अहुजा साहेब, जिम्मी शेरगिल यांनी धनोआ आहेब, आदिल हुसेन यांनी एअर मार्शल विनोद पटनी साहेब यांच्या भूमिका जोरदार निभावल्या असून दिया मिर्झा आणि इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. निर्माते कुशल श्रीवास्तव, अभिजित सिंग परमार आणि दिग्दर्शक ओनी सेन यांचे तसेच लेखक, संगीतकार, संवादलेखक यांचे आभार…त्यांच्यामुळे ही शौर्य गाथा पडद्यावर साकारली गेली…आणि भारतीय वायूसेनेचेही योगदान प्रकर्षाने अधोरेखित होऊ शकले.
☆ पंचमहाभूतांचे महत्व आणि ऊर्जा… ☆ विभावरी कुलकर्णी ☆
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये संपूर्ण सृष्टीची निर्मिती पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू आणि आकाश या पाच घटकांपासून झाली असल्याचे मानले जाते. या घटकांना पंचमहाभूते म्हणतात. आपल्या शरीराचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन या पंचमहाभूतांच्या ऊर्जेवरच अवलंबून असते.
या प्रत्येक तत्त्वाकडून ऊर्जा मिळवणे, त्याचे महत्त्व आणि आपल्या जीवनात होणारा उपयोग खालीलप्रमाणे आहे
१. पृथ्वी तत्व (Earth Element)
पृथ्वी तत्त्व आपल्याला स्थिरता, पोषण आणि शारीरिक रचना प्रदान करते.
महत्त्व: आपल्या शरीरातील हाडे, स्नायू आणि ऊती (tissues) हे पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात. या तत्त्वाच्या संतुलनामुळे शरीराला स्थिरता आणि मानसिक शांती मिळते.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
अनवाणी पायांनी जमिनीवर किंवा गवतावर चालणे (Grounding/Earthing).
मातीच्या संपर्कात राहणे (उदा. निसर्गोपचारात मड थेरपी किंवा मातीचे लेप).
नैसर्गिक आणि सेंद्रिय अन्नाचे सेवन करणे.
उपयोग: शारीरिक थकवा दूर होतो, शरीरातील अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा जमिनीत विसर्जित होते आणि हाडे मजबूत होतात.
२. आप/जल तत्व (Water Element)
जल तत्त्व हे प्रवाहीपणा, शुद्धता आणि भावनांचे प्रतीक आहे. मानवी शरीरात सुमारे ७०% भाग पाण्याचा असतो.
महत्त्व: शरीरातील रक्ताभिसरण, पचनक्रिया आणि पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी जल तत्त्वाची ऊर्जा आवश्यक असते.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
पुरेशा प्रमाणात शुद्ध पाण्याचे सेवन करणे.
नदी, समुद्र किंवा पाण्याच्या नैसर्गिक स्रोताजवळ वेळ घालवणे.
जलचिकित्सा (Hydrotherapy) म्हणजेच योग्य तापमानाच्या पाण्याने स्नान करणे.
उपयोग: शरीरातील विषारी द्रव्ये (toxins) बाहेर पडतात, त्वचा सतेज राहते आणि मानसिक ताण कमी होऊन मन शांत राहते.
३. तेज/अग्नी तत्व (Fire Element)
अग्नी तत्त्व हे ऊर्जा, परिवर्तन आणि पचनाचे मुख्य स्रोत आहे.
महत्त्व: शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे (जठराग्नी) हे या तत्त्वाचे कार्य आहे.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे (सूर्यस्नान).
नियमित व्यायाम आणि योगासने करून शरीरातील उष्णता संतुलित ठेवणे.
दीपप्रज्वलन किंवा अग्निहोत्रासारख्या पारंपरिक पद्धती.
उपयोग: शरीराची चयापचय क्रिया (metabolism) सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि नैराश्य दूर होऊन उत्साह जाणवतो.
४. वायू तत्व (Air Element)
वायू तत्त्व हे गती, प्राण आणि विचारांचे प्रतीक आहे.
महत्त्व: श्वसनाद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे आणि प्राणशक्तीचा प्रवाह चालू ठेवणे हे वायू तत्त्वाचे काम आहे.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
मोकळ्या आणि शुद्ध हवेत दीर्घ श्वास घेणे.
प्राणायाम (जसे की अनुलोम-विलोम, कपालभाती) नियमित करणे.
निसर्गरम्य ठिकाणी किंवा बागेत वेळ घालवणे.
उपयोग: फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते.
५. आकाश तत्व (Space/Ether Element)
आकाश तत्त्व हे विस्तार, पोकळी आणि सजगतेचे प्रतीक आहे. इतर सर्व तत्त्वांना सामावून घेण्यासाठी आकाशाची गरज असते.
महत्त्व: शरीरातील पोकळी (उदा. कान, नाक, अन्ननलिका आणि पेशींमधील अंतर) आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. मनाची शांतता आणि आंतरिक जाणीव या तत्त्वावर अवलंबून असते.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
ध्यान (Meditation) आणि मौन पाळणे.
अधूनमधून उपवास (Fasting) करणे, ज्यामुळे शरीरातील अवयवांना विश्रांती मिळते आणि पोकळी निर्माण होते.
शांत ठिकाणी बसून अथांग आकाशाकडे पाहणे.
उपयोग: मेंदूचे कार्य सुधारते, सर्जनशीलता वाढते आणि आंतरिक शांती मिळते.
आरोग्यासाठी पंचमहाभूतांचे एकत्रित महत्त्व
आपले शरीर हे या पाच घटकांचेच एक लहान स्वरूप आहे. जेव्हा या घटकांमध्ये असंतुलन निर्माण होते, तेव्हाच आपल्याला आजार किंवा मानसिक तणाव जाणवतो.
निसर्गोपचार (Naturopathy) आणि योगसाधना याद्वारे आपण या पाचही तत्त्वांची ऊर्जा ग्रहण करून स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकतो. निसर्गाच्या जितके जवळ आपण राहू, तितकीच ही ऊर्जा आपल्याला सहज आणि प्रभावीपणे प्राप्त होते.
या पंचमहाभूतांकडून ऊर्जा मिळवण्यासाठी वेगळी मेडिटेशन असतात.
☆ “वयानुसार येणाऱ्या बदलांचा स्वीकार करा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
एका ६५ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.
ऑपरेशन टेबलवर असताना तिला मृत्यूच्या अगदी जवळचा अनुभव (near-death experience) आला.
देवाला पाहून तिने विचारले: “माझी वेळ भरली आहे का?”
देव म्हणाला:
“नाही, तुला अजून ३३ वर्षे, २ महिने आणि ८ दिवस जगायचे आहे.”
सावरल्यानंतर, त्या महिलेने रुग्णालयातच राहून ‘फेस-लिफ्ट’, ‘लिपोसक्शन’, ‘ब्रेस्ट इम्प्लांट्स’ आणि ‘टमी टक’ (पोटाचा आकार सुधारण्याची शस्त्रक्रिया) करून घेण्याचा निर्णय घेतला.
तिने आपले केस रंगवून घेतले आणि दातही अधिक चमकदार करून घेतले!
आपल्याकडे जगण्यासाठी अजून खूप वेळ आहे, त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे तिला वाटले.
तिची शेवटची शस्त्रक्रिया झाल्यावर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
घरी परतताना रस्ता ओलांडत असताना एका ॲम्ब्युलन्सच्या धडकेत तिचा मृत्यू झाला.
देवाच्या समोर पोहोचल्यावर तिने जाब विचारला:
“देवा, तू तर म्हणालास की मला अजून ३३ वर्षे जगायचे आहे? मग तू मला त्या ॲम्ब्युलन्सच्या मार्गातून का वाचवले नाहीस?”
देव उत्तरला:
“मी तुला ओळखलेच नाही…!”
म्हणून लक्षात ठेवा – वयानुसार येणाऱ्या बदलांचा आनंदाने स्वीकार करा (Grow old gracefully).
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈