मराठी साहित्य – विविधा ☆ यंत्र आणि मानव… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

यंत्र आणि मानव☆ सौ शालिनी जोशी

यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यंत्रामुळेच आपले जीवन सहज, सुलभ, कमी कष्टाचे व आनंददायी झाले आहे. आपण कोणतेही नवीन यंत्र घेतो, तेव्हा त्याची पूजा करून त्याचे स्वागत करतो. यात आनंद असतो. पण ज्यावेळी जुन्या, कार्यक्षमता संपलेल्या यंत्राला निरोप द्यायची वेळ येते, तेव्हाही आपले मन तेवढेच हळवे होते. इतके दिवस त्या यंत्राने केलेल्या मदतीच्या ऋणाची भावना त्यात असते.

मिग २१ विमानांच्या निरोपाची बातमी वाचली. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेले, सहा दशके हवाई दलात सेवा दिलेली ही विमाने चंदीगड हवाई दलावर समारंभपूर्वक निवृत्त झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अखेरच्या उड्डाणाचे वैमानिक हवाई दलप्रमुख एअरचिफ मार्शल अमरप्रीतसिंग हे सहभागी झाले होते. निरोप देताना सर्व वायूवीरांचे मन दाटून आले. सर्वच सैनिकांची भिस्त शेवटी यंत्रावर असते. त्यामुळे यंत्राशी त्यांचे भावनिक नाते निर्माण होते. प्रत्येक यंत्राला त्याच्या स्वरूपा नुसार एक प्रथा, परंपरा, विशिष्ट कार्य संस्कृती प्राप्त झालेली असते. त्याचा अंगीकार वीर सैनिक करतात. त्याचे त्यांना सवय होते. व्यवहारातही हाच आपला अनुभव असतो.

विहित कालावधी पलीकडे माणूसही जगत नाही. तेथे यंत्राचे काय? हीच गोष्ट इतर सर्व क्षेत्रातील यंत्रांच्या बाबतीत घडत असते. जुने जाणे ही नवनिर्मितीला प्रेरणा ठरते. जुने मागे पडून, नवीन तयार होणारी यंत्रे जास्त सुधारित, उपयुक्त व वापरायला सोपी असतात.

अश्मयुगात माणसाकडे काहीच नव्हते. मग आपल्या संरक्षणासाठी व इतर कामासाठी माणसाला साधनांची गरज भासू लागली. त्यावेळी संरक्षणासाठी टोकदार दगड वापरत. त्यात सुधारणा होत भाले, बरच्या, तलवारी, बंदुका,——- रणगाडे अशी प्रणाली निर्माण होत गेली. पदार्थ कुटण्यासाठी घेतलेल्या दोन दगडातून——- जाती, गिरण्या, मिक्सर अशी यंत्रे निर्माण झाली. सर्वच क्षेत्रात अशी प्रगती झाली आणि होत आहे. शेतकऱ्यांसाठी खुरपे, कुदळ, नांगर—- ट्रॅक्टर आले. लिहिण्यासाठी बोरु, टाक, पेन— लॅपटॉप, स्मार्टफोन ने तीही गरज संपली. बैलगाड्या—- विमाने अशी  वाहने बदलली. सर्वच क्षेत्रातील साधनात विविधता आली .आणि ही सारी यंत्रेच.

खरंतर आपली संस्कृती निसर्गाशी निगडित, त्यावर अवलंबून. म्हणून पशु,पक्षी, चंद्रासारखे ग्रह, सूर्यासारखे तारे, समुद्र,भूमी यांना आपण सणात मान देतो. देवतारूप देऊन त्यांची पूजा करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तीच गोष्ट यंत्रांची. यंत्रे आपण निर्माण केली. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुलभ, सोपे, कमी कष्टाचे आनंददायी व सुखकर झाले. त्याची आठवण ठेवून, नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीला यंत्र पूजा केली जाते. यंत्राची स्वच्छता करून त्याची पूजा करणे म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. त्या जड यंत्रातही आपण देव पहातो. झेंडूच्या फुलांनी त्याची सजावट करतो. मोठ्या कारखान्यापासून घरगुती स्वरूपापर्यंत हे पूजा होते. मात्र मध्य युगात लढायांचे प्रमाण वाढले. त्यामुळे यंत्र पूजा ही शस्त्रपूजा झाली. आणि त्याला खंडेनवमी म्हणून लागले. कारण खड्ग म्हणजे तलवार, त्याचे खंडे झाले. अशीही आपली संस्कृती गुढ आहे.उदार आहे.निसर्गा सकट सर्व उपयोगी वस्तूंची  काळजी घेऊन माणसाने सुखाने जगावे हा हेतू.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पूर्तता… – लेखक – श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? जीवनरंग ?

☆ पूर्तता… – लेखक – श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

आज काकू चकचकीत तयार झाल्या, ठरवून ठेवलेली साडी, चपला, पर्स, हातात घड्याळ… घरात सांगून ठेवलं, येते जेवणाच्या वेळेपर्यंत… खाली उतरल्यावर रिक्षाला हात केला, रिक्षावाल्याला सारसबाग सांगितलं… कोथरुडधून, नळ स्टॉप, म्हात्रे पूल, शास्त्री रोड, निलायमचा चौक, आणि मग सारसबाग… रस्त्यावर थांबून लांबून दर्शन घेतलं… सणस ग्राऊंडला एक फेरी मारली… एक भेळ बांधून घेतली… आता पार्वती पायथा… पायथ्याशी गेल्यावर एक क्षणभर थांबून वरच्या देवळाकडे बघितलं आणि पुन्हा म्हणाल्या आता संभाजी बाग… रिक्षावाला थोडा प्रश्नार्थक नजरेने आरशात बघत होता… काकू रिक्षातून उतरल्या सुद्धा नाहीत आणि आता दुसरी बाग… संभाजी बागेतल्या एका गेटमधून आत जाऊन दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले… आता शनिवार वाडा, रिक्षावाला बुचकळ्यात पडला होता… बर गि-हाईक तर चांगलं मिळालं आहे, मग तक्रार तरी कसली करायची? … जायचंय तर नेऊ…

शनिवारवाड्याशी आल्यावर दरवाजासमोर गेल्या, पटांगणाकडे एकदा बघितलं.. खारेदाणेवाल्याकडे जाऊन एक पुडी घेतली, पुन्हा रिक्षात बसल्या… आता मात्र रिक्षावाल्याच कुतूहल प्रचंड वाढलं.. विषय काढायचा म्हणून विचारलं, “काकू तुम्ही पुण्यातल्याच का? “, , , , , , ,

“हो, का रे? “…

“सहज विचारलं. “, , , , , ,

“अगदी लहानपणापासून की लग्न झाल्यावर आलात? “, , , , ,

“अरे, मी जन्मापासून पुण्यात आहे…

आता तू ५४६ नारायण पेठेत चल… “

काय बरं असेल तिकडे? रिक्षावाला मनात म्हणत होता.. अगदी बाहेर ऐकू येईल इतकं जोरात मन बोलत होतं, , , , , ,

काकू पुढे बोलायला लागल्या, “अरे माझं माहेर तिथे होतं पूर्वी… “

“ओहहहह, तिकडे सीताफळबाग कॉलनीमध्ये नदीत आम्ही मासे पकडायला यायचो… “

“हो, तिथे एक गोठा आहे, मुलं दिसायची आम्हाला मासे पकडताना… माती गणपतीपाशी दीपमाळ होती, त्यावर दिवे लावले जायचे… कबीर बागेत खेळायची सगळी मुलं… “

बोलता बोलता माती गणपती आला… ५४६ नारायण पेठ आली, काकू उतरल्या, नवीन बिल्डिंग झाली होती, त्याच्या भिंतीला हात लावला… क्षणभर डोळे ओले झाले, म्हणाल्या, “चल आता पुन्हा कोथरूडला.. ” रिक्षावाल्याला आता प्रकाश पडला.. …. काकूंच्या जुन्या आठवणी ताज्या करायला म्हणून इतकी फिरस्ती झाली…

कोथरूडमध्ये घराशी उतरल्यावर मीटरकडे बघत पैसे सांगितले काकूंनी नोट काढून दिली… त्याने साहजिकच विचारलं, “मला चांगलं गि-हाईक मिळालं, चांगला धंदा झाला, हे सर्व ठीक आहे, , , , , पण इतकं आठवणीसाठी कोणी फिरत नाही हो.. “

“तस नाहीये रे… लहानपणी आमचे बाबा आम्हाला या सगळ्या ठिकाणी सायकलवर घेऊन जायचे, काहीवेळा तर आम्ही चालत जायचो… तेव्हा मी हट्ट करायचे, रिक्षातून जाऊ… बाबा म्हणायचे, चालल्यामुळे तब्येत छान राहते, भूक छान लागते… दोघात खाल्लेली एक भेळ सहज पचून जाते… पण कळत्या वयात समजलं की रिक्षाला खूप पैसे लागायचे, म्हणून बाबा चालत किंवा सायकलवर न्यायचे… आता यजमान स्कुटरवर नेतात, मुलं मोठी झाली, ती पण नेतात, यात माझं रिक्षात बसून फिरायचं स्वप्न तसच राहून गेलं होतं…

ते म्हणतात ती काय ती ” बकेट लिस्ट ” ओसंडून वाहात होती… होईल रिकामी हळू हळू, पुन्हा भरण्यासाठी… “

– – ऐकून रिक्षावाला स्तब्ध झाला… म्हणाला, “खरंय हो. ” त्याचं स्वप्न आठवून म्हणाला, “आकाशात विमान दिसलं की मला पण वाटतं, कधीतरी विमानात बसून, उंचावरून पुणं बघता येईल… बघू कधी स्वप्न पूर्ण होईल.. स्वप्नाचा पाठलाग मी नक्की करीन…

स्वप्नपूर्तीला वय नसतं… “

लेखक : श्री पराग दामले

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(“आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.) 

इथून पुढे – – 

मला जवळ बोलावण्यामागे त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी बोलून दाखविला. म्हणाले, “इथं जमलेल्या समाजात मीच वयानं जेष्ठ दिसतो. माझं वय आता सत्त्याऐंशी आहे. म्हणून मलाच हे कर्तव्य करायला हवे. तुमच्या भावाचं अभिनंदन करायला हवं. मी त्यांच्याशी, इतर लोकांशी बोलू शकतो का? ” मी म्हणालो, ” अहो भाग्यम्! निश्चित बोलू शकता. यामुळे सर्वांना बरंच वाटेल. चार ज्ञानाच्या गोष्टी समजतील. ” 

“ज्ञानाविषयी म्हणशील तर ज्ञानदानही सत्पात्री करावं. गुरूनं शिष्य नीट पारखून, त्याची योग्यता तपासून मगच त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्ञान द्यावं. अशिष्याला ज्ञान देऊ नये. ‘अशिष्याय न देयम्’ असं शास्त्रवचनच आहे.

स्मशान हे ज्ञानदानासाठी सर्वात पवित्र स्थान आहे. स्मशानात अगदी एखाद्या चांडाळानं जरी ज्ञानयाचना केली तर गुरुनं त्याच्या अधिकाराचा, योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता त्याला अवश्य ज्ञान द्यावं असंही शास्त्र सांगतं. इथं जमलेले तुम्ही तर सर्व ज्ञानाचे अधिकारी आहात. मी अवश्य बोलेन.

तुला व्यक्तिशः मात्र तत्वज्ञानाचं सार असणारा आचार्यांचा एक श्लोक सांगतो. जमेल तसं, वेळ मिळेल तेव्हा यावर चिंतन करीत रहा. कल्याणमस्तु! “

स्वामींनी स्मशानभूमीत मला सांगितलेला श्लोक आणि त्याचा अर्थ असा…

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं

स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे।

चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने

किं तत्रामहतो भवान्परमकं ज्योतिस्तद्स्मि प्रभो।।

स्पष्टीकरण:- 

‘किं ज्योतिः तव? ‘- कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो? दिवसा सूर्याचा ‘रात्रौ प्रदीपादिकं’ – दिव्यामुळं. (दिवा नसल्यास चंद्र, अग्नी इ. मुळं) ‘स्यादेव’- असूदे! पण ‘रविदीपदर्शनविधौ किं ज्योति? ‘ सूर्य, दिवा इ. च्या ज्ञानाचं साधन कोणतं? ‘आख्याहि हे’ ते मला सांग. ‘चक्षुः’ (हो महाराज) डोळे. ‘तस्य निमीलनादिसमये किं? ‘ हे डोळे झाकल्यावर कशानं ज्ञान होतं? ‘धीः’ म्हणजे बुद्धीनं. ‘धीयो दर्शने किं? ‘ आणि बुद्धीचं ज्ञान कशानं होतं? ‘तत्राहम्’ – (हे बुद्धीचं ज्ञान व्हायला) मीच कारणीभूत आहे. आचार्य पुढे म्हणतात, ‘अतो भवान् परमकं ज्योतिः’ म्हणून या सर्वांना (सूर्य, चंद्र, दिवा, बुद्धी, डोळे) प्रकाश देणारा तूच आहेस. तूच परंज्योती स्वयंप्रकाश आत्मा आहेस!

स्वामींचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो. आमच्या या चर्चेत अर्धा पाऊण तास गेला असेल. तेवढ्यात जळणाऱ्या चितेतून ‘फट्’ असा ध्वनी उमटला. दोन-तीन निखारे ढासळले. काही ठिणग्या, सूक्ष्म धूम्ररेखा आणि अग्निशिखा बाहेर पडल्या. हे पाहून स्वामीजी बोलायचं थांबले आणि म्हणाले, “आता खऱ्या अर्थानं देहातील पंचही प्राणांचं उत्क्रमण झालं आहे. पार्थिवही पंचत्वात विलीन झालं आहे. आता इथंच थांबूया. येवढं पुरे. चला, लोक निघून जातील. त्यापूर्वी त्यांच्याशी बोलू. “

मी सर्वांना एकत्र जमवून, दोन मिनिटं मौन पाळून, समुदायिक श्रद्धांजलि अर्पण करायची विनंती केली. मौन झाल्यानंतर स्वामींनी पुढे येवून जमलेल्या सर्वांसमक्ष दादाचं अभिनंदन केलं, आभार मानले आणि समाजाला दोन तात्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या.

ते म्हणाले, “सज्जनहो, हा मृत्युलोक आहे. इथं येणाऱ्या आपल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. जीवन क्षणभंगुर आहे हे स्मशानात आल्यावर कळतं आणि मनात वैराग्य उत्पन्न होतं. पण हे वैराग्य अल्पकाळ टिकणारं असतं. ‘मैथुन वैराग्य’, ‘प्रसूति वैराग्य’ आणि ‘स्मशान वैराग्य’ ही तिन्ही प्रकारची वैराग्यं अल्पजीवी असतात. ज्ञानप्राप्तीतून येणारं निर्भय वैराग्य चिरकाळ टिकतं आणि त्यातून माणूस अध्यात्माच्या वाटेवरून प्रवास करीत आपलं कल्याण साधतो. असो.

गेलेली व्यक्ती उत्तरायणात, महिन्याच्या शुक्लपक्षात, दिवसाच्या पूर्वार्धात गेल्यानं शास्त्रात सांगितल्या प्रमाणे ती निश्चितच प्रकाशमार्गानं उर्ध्वगतीला जाणार आहे. असा मृत्यु केवळ पुण्यवान माणसालाच प्राप्त होतो. शरीर नष्ट झालं तरी आत्मा अमर आहे हे आपण जाणता. तेव्हा शोक करू नये. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहतील. ईश्वर सर्वांचे कल्याण करो. येवढं बोलून स्वामींनी आपलं अल्पसं पण प्रामाणिक, परिणामकारक प्रबोधनपर निवेदन संपविलं.

स्वामींचे आभार मानून, त्यांना वंदन करून मीही इतरांबरोबर स्मशानातून घरी जायला निघालो. नळावर जाऊन हातपाय धुतले आणि जाता जाता पुन्हा स्वमींकडे पाहिलं. स्वामी हात उंचाऊन सर्वांना निरोप देत तिथेच उभे होते. बाजूच्या काळोखात जळणारी चिता आणि तिच्या केशरी प्रकाशात कौपीनधारी स्वामींची मूर्ती उठून दिसत होती. त्यांचे तेजस्वी पण दयार्द्र डोळे विशेष चमकत होते!

काही दिवसात आमचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. जो तो आपापल्या उद्योग व्यवसायात व्यस्त झाला. अशी काही वर्षं गेली.

१९८५-८६ (नक्की वर्ष आठवत नाही) च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही कुटुंबियांनी चारधाम यात्रेला जायचं ठरवलं. प्रवासाचं नियोजन करताना कळलं की या यात्रेत उत्तरकाशी हे स्थान लागतं. मला एकदम मामाच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानात भेटलेल्या स्वामी चिद्विलासानंदभारतींची आठवण झाली. ते उत्तरकाशीहून पुण्यात आले होते त्यावेळी. म्हणजे ते इथल्याच कुठल्यातरी मठात, आश्रमात असणार असा तर्क करून मी या यात्रेत त्यांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी वेळ पडल्यास उत्तरकाशीत दोन दिवस वास्तव्य करायचं निश्चित केलं.

जेव्हा प्रत्यक्ष उत्तरकाशीत गेलो तेव्हा समजलं की इथं बरेच आश्रम आहेत. आपले स्वामीजी नक्की कुठल्या आश्रमात असतील हे कसं कळणार? त्यांच्या नावाखेरीज आपल्याला तर त्यांच्याविषयी अधिक काहीच माहित नाही. आपण त्यांना त्यांच्या नावाखेरीज अधिक काही विचारलंच नव्हतं. मग त्यांचा शोध घ्यावा कसा? कुणाला विचारावं? त्यांना कुठं शोधायचं? कसं शोधायचं?

मी ठरवलं आता प्रत्येक आश्रमात चौकशी करायची. कुठंतरी सापडतील की. निदान त्यांची काही तरी माहिती तर मिळेलच. हाँटेल मालकाच्या मदतीनं एका स्थानिकाला बरोबर घेऊन मी माझी ‘श्रीस्वामीशोधमोहीम’ सुरू केली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो आणि एकेका आश्रमाला भेट द्यायला सुरवात केली. दिवसाचा पूर्वार्ध अगदीच वाया गेला. उपलब्ध माहिती इतकी त्रोटक होती की त्या माहितीवरून अनोळखी परगावात केवळ टोपण नावावरून एखादी व्यक्ती मिळणं जवळ जवळ अशक्य होतं. मी निराश झालो. ‘आता थांबावं, उगाच कालापव्य नको’ असं मनात येऊ लागलं तोच रस्त्यानं समोरून दोन तरूण जटाधारी साधक येताना दिसले. माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

मी त्यांना हाटकलं, अभिवादन केलं आणि विचारलं, “स्वामिजी, मी महाराष्ट्रातून आलोय. मला इथं कुठल्यातरी मठात राहणारे स्वामी चिद्विलासानंदभारती यांना भेटायचं आहे. मला त्यांच्या मठाचं नाव माहित नाही पण ते इथंच उत्तरकाशीत वास्तव्याला असतात. पुण्यात त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. त्याला आता पाच वर्षं झाली. आपण मला काही मार्गदर्शन करू शकाल का? ” 

पुण्याचा उल्लेख ऐकल्यावर त्यातला एक जण जरा चमकला आणि चटकन म्हणाला, “आप हमारे आश्रम चलिये। हमारे गुरुजी शायद कुछ बता सकेंगे उनके बारेमे। चलिये हमारे साथ। आश्रम यही, नजदीकही है।” 

आम्ही त्यांच्या मागून आश्रमात गेलो. त्यांनी आम्हाला आपल्या गुरुजींसमोर उभं केलं. मी गुरुजींना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देत त्यांनी मला आसन ग्रहण करण्याची विनंती केली तसा मी जवळच्या दर्भासनावर बसलो.

गुरुजी मधुर वाणीनं म्हणाले, “कहियेजी, आप किसे ढूँड रहे है? आपको क्या चाहिये।” यावर मी त्यांना स्वामींविषयी माझ्याकडे होती तेवढी माहिती सांगून मला स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा असल्याचं सांगितलं. माझं सगळं म्हणणं शांतपणे, एकाग्रतेनं ऐकल्यावर गुरुजींनी एक दीर्घ उच्छ्वास सोडला केवळ, आणि गप्प बसले. मी आधीरतेनं म्हणालो, “क्या हुवा गुरुजी? मैने कुछ गलत तो नही कहाँ? ” त्यावर गुरुजींनी पुन्हा एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, “नहीजी, आप बिलकुल उचित स्थानपर आए है, परंतु आनेका समय अनुचित चुना आपने। स्वामी चिद्विलासानंदभारतीजी यही रहते थे।”

“रहते थे? अर्थात्? अब यहाँ नही रहते? कही बाहर गये है? वो अब कहाँ हो सकते है? आप हमे कुछ बता सकते है? ताकि हम वही जाकर उनका दर्शन करेंगे।” मी आधीरतेनं एका श्वासातच प्रश्नावर प्रश्न विचारले. गुरुजींनी आकाशाकडं पाहिलं आणि विषण्णपणे उद्गारले, “ओंम् शांति, शांति शांतिः। वत्स, स्वामिजी तीन वर्ष पूर्व, वृद्धावस्थाके कारण समाधिस्थ हो गये।मृत्युसमय उनकी आयू पूरे नब्बे वर्षकी थी। उनका अंतिम संस्कार यही नदीके तटपर किया गया और उपर समाधि स्थापित की गयी।” 

ही दुःखद वार्ता ऐकून मला फार वाईट वाटलं. मी तसाच व्यथित मनानं आसनावर बसून राहिलो. डोळे नकळत पाझरू लागले!

भावनावेग मंदावल्यावर मी स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर गुरुजींनी जे सांगितलं ते ऐकून मी पुरेपूर हादरलो. गुरुजींनी सांगितलं की, “गेल्या वर्षी उत्तर काशीला भूकंप झाले, भूस्खलने झाली, नद्यांना महापूर आले. त्यात स्वामींजींची समाधी वाहून गेली. अक्षरशः ‘गंगार्पणमस्तु’ झाली. नदीचा आकार बदलला आणि काठचा भूगोलही बदलला. आता स्वामींच्या केवळ स्मृती विद्यमान आहेत! ‘

दहा मिनिटं कोणी काहीच बोललो नाही. नंतर मी उठलो. गुरुजींना वंदन केलं आणि आश्रमाबाहेर पडलो. दूर अंतरावरून संथपणे वाहणारी नदी दिसत होती. तिच्याकडे पाहताना मला वाल्मिकी रामायणातला श्लोक आठवला

यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ

समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमाः।l

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाहि गाठ।l

– समाप्त – 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मनामनातील वेताळ ::: समारोप

विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकल्या असतील, वाचल्या असतील…

त्या गोष्टीतील वेताळ जसा त्या विक्रम राजास त्रास द्यायचा तसा त्रास सध्या अनेक प्रकारचे अनेक वेताळ अनेक प्रकारांनी आपल्याला त्रास देत आहेत… , छळत आहेत, नव्हे छळकपट करीत आहेत, असे आपल्या लक्षात येईल.

श्रीरामरक्षेमध्ये एक श्लोक आहे…

*”पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥”*

अर्थ: पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)

रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत.

या श्लोकाचा संदर्भ आपल्याला आज सुद्धा लागू होतो…

अनेक वेताळ आपले मायावी रूप घेऊन आपल्या मनावर अधिराज्य करीत आहेत. त्यातील मोजक्या वेताळांचे वर्णन करण्याचा प्रयत्न मी माझ्या काही लेखात केला आहे…

तरीही काही छद्मी वेताळ आपल्या मनात दडून बसलेले आहेत, त्यांचा उल्लेख जाताजाता करतो…

# अतिरेकी सर्वधर्मसमभाव

# सद्गुण विकृती

# अंधानुकरण

# कुपमंडुक वृत्ती

# मला काय त्याचे?

# चांगले आईबाप न होता लोकप्रिय पालक होण्याची चढाओढ

# विहीत स्वार्थ न पाहता वैयक्तिक स्वार्थाकडे धावण्याची वृत्ती

माझ्या अल्पमतीने हे वेताळ मांडण्याचा प्रयत्न मी केला. या वेताळांचा त्याग करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे…!

राजेश खन्ना यांच्या तोंडी आनंद चित्रपटात एक छान संवाद आहे. तो सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही…

*”बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं”*

आपल्याला जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर मग वर उल्लेख केलेल्या आणि आपल्या मनात दडून बसलेल्या अनेक वेताळांचा आपल्याला त्याग करावा लागेल…

तसा प्रयत्न आपण खात्रीने कराल असा विश्वास वाटतो…

कोणतीही रेघ जर न खोडता छोटी करायची असेल तर त्या रेघेच्या बाजूला आणिक एक मोठी रेघ आखावी लागते…

ही रेघ विवेकाची असावी…

विवेक या शब्दाची व्याप्ती खूप विशाल आहे. आपण ती नीट समजून घ्यावी अशी प्रार्थना.

शुभेच्छा!!!

 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

*

रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव असे कवी आहेत, ज्यांनी रचलेल्या दोन काव्यांना भारत व बांगलादेश या दोन राष्ट्रांनी आपले राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे. परंतु का कोण जाणे, पण त्या काळातील तथाकथित विचारवंतांमध्ये टागोरांबद्दल गैरसमज फार होते व कदाचित ते जाणून बुजून पसरविलेही जात होते. कदाचित टागोर एका उच्चशिक्षित, सुखवस्तू, जमिनदार घरात जन्मले होते, त्यांचे बंधू ब्रिटिश सरकारमधे अंमलदार होते, त्यांच्या वडिलांची उच्च सरकारी अधिकाऱ्यांत उठबस होती म्हणून असेल. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून असेल.

सुरवातीच्या काळात ते सरकारवर फारशी जहाल टीका जाहीरपणे करत नसत. जे कांही म्हणायचं ते आपल्या लेखनातून, काव्यातून म्हणत. “जनगणमन अधिनायक जय हे” हे गीत टागोरांनी इंग्रज बादशहाच्या स्वागतासाठी लिहिलं होतं हा गैरसमज आजही कित्येकांच्या मनात आहे. पण त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लिहिलेल्या लेखांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. ब्रिटिश युवराज भारतात आले तेव्हा टागोरांनी म्हटलं होतं, “स्वतःच्या बळाचं प्रदर्शन करणाऱ्या राजाचं स्वागत करणं म्हणजे कैद्यांच्या पंगतीला मेजवानी म्हणण्यासारखं आहे. “

ब्रिटिश साम्राज्यशाहीने भारतीयांना स्वत्वहीन करून टाकले होतं व गोऱ्या कातड्याच्या लांगूलचालनात उच्चभ्रू समाज धन्यता मानत होता. यावर १८८४ साली, वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसच्या धुरिणांना उद्देशून लिहिलं होतं की, इंग्रजांपेक्षा स्वतःला हीन दीन समजून वागणारे लोक त्यांच्यापुढे हात जोडून “आम्हाला बरोबरीचा दर्जा द्या” अशी मागणी करणार आहेत काय? आम्ही स्वत:च्या हिमतीवर आपली, आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवू शकणार नाही काय? जे स्वतःचा मान स्वतः राखू शकत नाहीत, त्यांचा मान राखायला परके येणार आहेत काय? का आपण स्वभाषेत बोलत नाही? का स्वदेशी वस्त्रं वापरत नाही? का म्हणून आम्हीच आमच्या मनात स्वदेशाची घृणा बाळगतो? ” असा विचार करणारा व ते बोलणारा, लिहिणारा कवी ब्रिटिश राजासाठी स्वागतगीत लिहिल का?

रविंद्रनाथांनी उत्तम इंग्रजी येत असूनही, वयाच्या पन्नाशी पर्यंत फक्त बंगाली भाषेतून लिहिलं व बंगालीतूनच भाषणं केली. पण त्याचवेळी उत्तम इंग्रजी कविता, धर्मोपसानेचे संस्कृत मंत्र, संत तुकारामांचे अभंग इ, साहित्य आपल्या वंग बांधवांसाठी बंगालीत भाषांतरित केले.

जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी आपला ‘सर’ हा किताब परत केला होता हे सर्वांना ठाऊक आहे पण वयाच्या ८०व्या वर्षी मृत्युशय्येवरून त्यांनी लिहिलेले (कृष्ण कृपलानींकडून लिहून घेतलेले), ब्रिटिश राजवटीला सणसणीत चपराक मारणारे त्यांचे अनावृत्त पत्र मात्र कुणाला फारसे ठाऊक नाही. दुर्दैवाने त्यानंतर दोनच महिन्यांनी ते वारले. पण या पत्रात त्यांनी “आधी भारतीयांचे शोषण थांबवा, त्यांना स्वतंत्र करा आणि मगच नाझींच्या विरुद्ध लढायला बोलवा” अशी जी मागणी केली होती त्याचाच स्फोट म. गांधींच्या ८ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’च्या भाषणात झालेला दिसला.

मनाला झोंबणाऱ्या भावनांना आपल्या गीतातून वाचा फोडणाऱ्या या महाकवीची “आमि भय करबोना” सारखी गीतं गात हजारो बंगाली तरूण वंगभंगाच्या चळवळीत पोलिसांच्या लाठ्या खात होते. “आमार शोनार बांगला” “ऍकला चलो रे” ही त्यांची सुप्रसिद्ध स्फूर्तीदायक गाणी याच चळवळीतली!

(संदर्भ – रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

—– 

☆ गीत : ३७ ☆

I THOUGHT that my voyage had come to its end at the last limit of my power, ⎯ that the

path before me was closed, that provisions were exhausted and the time come to take 

shelter in a silent obscurity.

But I find that thy will knows no end in me. And when old words die out on the tongue,

new melodies break forth from the heart; and where the old tracks are lost, new country is revealed with its wonders.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ३७ ☆

*

वाट संपली, प्रवास थांबला

डळमळला विश्वास आतला

हीच वेळ कां चिरनिद्रेची?

*

तान थबकता ओठावरची

सरगम उसळे हृदयांतरीची 

असेल कशी ही खूण अंताची?

*

वाट हरवता वाटेवरची

निर्मिती होते नव विश्वाची

अंतच हा नां त्या अंताचा? सांग तूचि!

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत ३८ ☆

THAT I want thee, only thee ⎯ let my heart repeat without end. All desires that distract 

me, day and night, are false and empty to the core.

As the night keeps hidden in its gloom the petition for light, even thus in the depth of my unconsciousness rings the cry ⎯ I want thee, only thee.

As the storm still seeks its end in peace when it strikes against peace with all its might,

even thus my rebellion strikes against thy love and still its cry is ⎯ I want thee, only 

thee

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत ३८ ☆

*

रात्रीच्या गर्भात, प्रकाशाचा हव्यास

तशी माझ्या मनी, तुझीच रे आस

मला तू हवास, मला तू हवास॥

*

शांत हवा अंत, जसा वादळास

तुझी ओढ वेगे, माझ्या प्रेमास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

विचलित मन, करण्या प्रयास

वासनांचा दाह, कर्मांचा फास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

मिथ्या जग, आसक्ती कशास

चिरंतन माझ्या, मुखी हा ध्यास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत ३९ ☆

WHEN the heart is hard and parched up, come upon me with a shower of mercy.

When grace is lost from life, come with a burst of song.

When tumultuous work raises its din on all sides shutting me out from beyond, come to 

me, my lord of silence, with thy peace and rest.

When my beggarly heart sits crouched, shut up in a corner, break open the door, my king, and come with the ceremony of a king.

When desire blinds the mind with delusion and dust, thou holy one, thou wakeful, come 

with thy light and thy thunder.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३९

*

मन माझे होता शुष्क अन् कठोर

वर्षाव दयेचा करी मजवरती

*

आनंदास होता पारखा या जीवनी

गीत रंगांची उधळण कर ती

*

जो तुज अंतरतो, कोलाहल दैनंदिनीचा

असह्य होता, दे शांती अन् विश्रांती 

*

दीन माझे मन, जखडले धरणीशी

तोड दार, दाखव सत्ता, हो अधिपती

*

वासनांचे जर उठेल मोहोळ 

ने प्रखर प्रकाशी, देण्यास जागृती

*

– क्रमशः भाग १३.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

मेजर जेम्स थॉमस कँडी 

कँडी यांचा अदृश्य स्पर्श – – 

*

मराठी भाषेत आपण किती सहज वापरतो – – 

स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह.. …

*

– – या विरामचिन्हांची शिस्तबद्ध सुरुवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली!

ते डेक्कन कॉलेज पुणे चे प्राचार्य सुद्धा होते..

त्यांचे नाव “मेजर जेम्स थॉमस कँडी” 

१८व्या-१९व्या शतकात मराठी लेखन सलग असायचे… 

दंड (|) आणि द्विदंड (||) एवढीच चिन्हे वापरली जात.

इंग्रजी भाषेच्या प्रभावानंतर पुढील चिन्हे मराठीत रूढ झाली :

स्वल्पविराम (,)अर्धविराम (;) पूर्णविराम (.) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) इत्यादी…

– – मात्र कँडी यांनी १८५० साली ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही पुस्तिका लिहून मराठी लेखनाला नवा श्वास दिला.

– – वाक्याचा अर्थ स्पष्ट व्हावा, वाचन सुलभ व्हावे, आणि लेखनाला शिस्त लाभावी, यासाठी त्यांनी नियम तयार केले.

आज आपण लिहितो त्या प्रत्येक वाक्यात कँडींचा अदृश्य स्पर्श आहे!

विरामचिन्हांची परिभाषा ही १६ पानी पुस्तिकाच त्यांनी लिहीली, मराठी इंग्लिश शब्दकोश निर्मीतीमधे

त्यांचे अमुल्य योगदान आहे 

२६ फेब्रुवारी रोजी त्यांचे १५० वे स्मृतिवर्ष असेल.

मराठी लेखन समृद्ध करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!!!

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेमभावना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेमभावना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला ह्या फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डेवरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…

एकदा एक मूर्ख शायर

सूर्यास म्हणतो की….

 

भास्करा, कीव मजला

येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे

पाहिली आहे कधी ?

 

तेव्हा सूर्य उत्तर देतो…

 

आम्हासही या शायराची

कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास

रात्र यावी लागते.

 

प्रेम हे काय दिवस ठरवून

व्यक्त करायची चीज आहे ?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.

प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.

गदिमा म्हणून गेलेयत…

‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला…’

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की

‘जिथे सागरा धरणी मिळते

तेथे तुझी मी वाट पहाते’

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.

ही कोंडी शेवटी तो फोडतो,

(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)

 

‘लाजून हांसणे अन् हांसून ते पहाणे,

मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’

भेट झाल्यावर मात्र हृदयात

एक अनाहूत हुरहुर सुरू होते.

मग परत गदिमा मदतीला येतात,

 

‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’

 तोही आपल्या विश्वात नसतोच.

 

‘होशवालों को खबर

बेखुदी क्या चीज है,

इश्क किजे, फिर समझिये,

बंदगी क्या चीज है’

 

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय….

 ‘मी मनांत हसता प्रीत हसे,

हे गुपीत कुणाला सांगू कसे ?’

त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे.

तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू ) आहेत,

ती म्हणते,

 

‘नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी’

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे

नाहीत. मग तीच म्हणते,

 

‘ये मुलाकात इक बहाना है,

प्यार का सिलसिला पुराना है’

 

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर

 

‘घडी घडी मेरा दिल धडके,

हाय धडके, क्यू धडके’

ह्याची खात्री पटलीय पण

खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.

 

‘कहना है, कहना है,

आज तुमसे ये पहली बार,

तुम ही तो लायी हो,

 जीवन में मेरे

प्यार, प्यार, प्यार..’

 ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय.

तृप्त झालीय.

 

‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

शब्दरूप आले, मुक्या भावनांना’

आणि मग झाडांची पाने हलतांत. तो खूष.

 

‘जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरांत आली’

 

आणि तिनं चक्क होय म्हटलं.

हा गडाबडा लोळायचा बाकी.

 

‘तुम क्या जानो, मुहब्बत क्या है..:

 

‘कोकिळ कुहूकुहू बोले,

तू माझा तुझी मी झाले.’

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते:

‘तुज्ये पायान् रूपता काटां,

माज्ये काळजान् लागतां घांव’

आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.

 

दो लब्जों की है बस ये कहानी या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.

 

‘आज तू डोळ्यांत माझ्या,

 मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा,

 तू अशी जवळी रहा..’

 

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डेच्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

भारतीय संस्कृती आणि माय मराठी प्रेमी… नक्कीच सहमत असतील.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “शिवभूमीची शौर्यकथा” – लेखक : श्री गोविंद अनंत मोडक ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “शिवभूमीची शौर्यकथा” – लेखक : श्री गोविंद अनंत मोडक ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: शिवभूमीची शौर्यकथा

– – – महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास 

लेखक: श्री गोविंद अनंत मोडक

पृष्ठ: २४१

मूल्य: ३५०₹ 

श्री. गोविंद अनंत मोडक, यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी संपादित केलेल्या ह्या दुर्मिळ पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती फारच सुंदर लिहिली असून, ती वाचताना कंटाळा येत नाही, सर्व माहिती लिहिताना पाल्हाळ न लावता लिहिली असल्यामुळे तीनवेळा जरी हे पुस्तक कोणत्याही तरुणाने किंवा तरुणीने मन लावून वाचले तरी हा महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास त्याच्या मनात पक्का ठसेल.

सदरहू पुस्तकाची अनुक्रमणिका जरी सहज चाळली तरी ‘छत्रपती श्री शिवाजीराजे’ ह्यांच्या जन्मापूर्वीच्याही काळाचा आढावा घेऊन, शिवशाही कशी गाजली, कशी अस्त पावली, पेशवाई कशी सुरु झाली आणि पुढे एकंदरच मराठ्यांचे राज्य ‘कसे बुडाले’ इत्थंभुत माहिती सर्वच तरुण मुलामुलींना आणि प्रौढांनाही वाचायला मिळेल.

ह्या पुस्तकाची प्रस्तावना वाचून असे लक्षात येते की, इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संशोधक ह्यांना सदरहू पुस्तक कसे समजावून द्यावे ह्याबाबतच्या पाच-सहा विशेष सूचनाही लेखकाने लिहिल्या आहेत.

 महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास” हे पुस्तक मराठी इतिहासाचा थरारक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण प्रवास आहे.

शिवरायांच्या तलवारीपासून पानिपतच्या रणांगणापर्यंत असे वीर जे धन दौलतीसाठी नाही लढले, ते स्वतःसाठी नाही लढले, ते राष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या शिवरायांसाठी लढले. रक्त, श्रद्धा आणि धगधगत्या ज्योतीने महाराष्ट्र घडवणाऱ्या वीरांचे जगणे तसेच विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला पुन्हा जिवंत करणाऱ्या ऐतिहासिक गोष्टींचा हा संग्रह आहे. हा संग्रह महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाची अनोखी सहल वाचकांना घडवतो.

यात शूर चांदबिबी व हुशार मलिक अंबर, भोसले घराण्याचा उदय, शहाजी राजांची कर्तबगारी शिवबांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची पूर्वतयारी, स्वराज्य स्थापना, शहाजी राजांची कैद, अफजलखानाचा वध, बाजीप्रभूंचा पराक्रम, शाहिस्तेखानाची स्वारी, बादशहाशी समेट, कपटाने धरले पण युक्तिने सुटले, स्वराज्य व्यवस्था, गड आला पण, सिंह गेला, दोन मोठ्या लढाया, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठी राज्यावरील आरिष्ट, स्थलांतर, जगण्यासाठी पराकाष्ठा, मराठी राज्यांत दुही, बाळाजी विश्वनाथांस पेशवाई कशी मिळाली, मराठी राज्याच्या वाढीची तयारी, निजामाचा मोड, शिंदे होळकरांचा उदय, गजेंद्रमोक्ष, कोल्हापूरकर संभाजी सभेट, आपसांत लढाई, बाजीरावांची धडाडी, ‘‘माझे मस्तक तरी किल्ल्यात पडू दे! ’’, आता हिंदु- झाले पाहिजे, माळव्याची सनद, आधी एकी मग मुलुखगिरी, शाहूंचा मृत्यु, इत्यादी अश्या एकूण ५९ गोष्टी या संग्रहात समाविष्ट केलेल्या असून सनावली आणि कठिण शब्दांचा कोश हि दिलेला आहे.

इतिहास गोष्टीच्या स्वरूपात – सोपा, रंजक व शैक्षणिक दृष्टिकोनातून मांडलेला विद्यार्थी, शिक्षक, वाचक आणि इतिहासप्रेमींसाठी आदर्श ग्रंथ – – 

मराठी साम्राज्याचा अभिमान जागवणारा प्रेरणादायी इतिहास“शिवभूमीची शौर्यकथा”

हे पुस्तक, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीतल्या सर्वांनीच वाचण्याइतके सोप्या आणि भाषेची लांबण टाळून लिहिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट असून त्यात सनावली, प्रसिद्ध व्यक्तींचा कार्यकाळ इ. माहिती असून, बऱ्याच ऐतिहासिक शब्दांचे अर्थही त्यात दिलेले आहेत.

गडकोट किल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. सर्वच तरुणांना हे पुस्तक आवडेल अशी आम्ही आशा करतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १३९ – बुन्देली कविता – “काम-काज का लूघर कर है” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – काम-काज का लूघर कर है।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ बुन्देली कविता – काम-काज का लूघर कर है☆ आचार्य भगवत दुबे ✍

काम-काज का लूघर कर है

सबकी इज्जत धो खें धर है

*

दिन चढ़ आव अबै सोउत है

पूजा होने, कबै सपर है

*

पिछली साल परो तो छेटा

आसों आमा खूबइ फर है

*

उखरी-मूसर कितै बिला गय

काहे में अब चाँउर छर है

*

अबै पढ़ाव, ब्याव ने सोचौ

भौतइ कच्ची अबै उमर है

*

झाड़-पेड़ सब काटत जा रय

अब कंडों की होरी जर है

*

कितनी नईं आरती रट लइँ

‘भगवत’ मौड़ी गुनी निकर है

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ होली पर चारः क्षणिकाएँ…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆

डॉ. रामेश्वरम तिवारी

संक्षिप्त परिचय

  • हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल  (म.प्र).
  • नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए,  मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।

आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – होली पर चारः क्षणिकाएँ…!

☆ ॥ कविता॥ होली पर चारः क्षणिकाएँ…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी

 

॥ एक ॥

नकटों दरमियाँ…!

ज़ोर की बहस छिड़ी है

मेरी नाक से

तेरी नाक कैसे बड़ी है…!

 

॥ दो ॥

बौने के द्वारा…!

बड़प्पन का

स्वांग रचा जा रहा है

आईने से रुबरू

होने से बचा जा रहा है…!

 

॥ तीन ॥

चतुर सुजान…!

अपने दुश्मन को

कब्र में दफ्नाने तुले हैं

लेकिन एक दिन

सबका नम्बर आना है

इस सच्चाई को भुले हैं…!

 

॥ चार ॥

प्रदर्शन…!

प्रदर्शन…!

प्रदर्शन…!

वर्तमान का एकमात्र

यही है वैश्विक दर्शन…!

© डॉ. रामेश्वरम तिवारी

सम्पर्क – सागर रॉयल होम्स, होशंगाबाद रोड, भोपाल-462026

मोबाईल – 8085014478

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares