श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ३३ – – – –
वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|
शशी सूर्य तारांगणे मेघमाला|
चिरंजीव केले जनी दास दोन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|अर्थ : ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
(मेरू – स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार – समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला)
विवेचन : समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.
मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो.
मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.
थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.
जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे.
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात.
या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः।
कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजिविनः॥
अश्वत्थामा, बळीराजा, वेद व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सप्त चिरंजीव. यातील हनुमान आणि बिभीषण हे दोघे निस्सीम श्रीरामांचे भक्त आहेत. हनुमंताचा जन्म वानर कुळातील तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला. हनुमंत श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हे आपण जाणतो. बिभीषणाची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. त्याचा जन्म राक्षस कुळात झालेला आणि महापराक्रमी रावणाचा तो सख्खा भाऊ. अन्यायी अशा रावणाची साथ सोडून श्रीरामांच्या पक्षात येणे ही गोष्ट त्याच्यासाठी एवढी सोपी नव्हती. परंतु तरी देखील त्याची रामावर असणारी श्रद्धा एवढी प्रचंड होती की तो हा सगळा विरोध सहन करून श्रीरामांना शरण आला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी लंकेचा राजा व्हावे अशीही इच्छा बिभीषणाने व्यक्त केली होती. एवढा तो रामभक्त होता.
हनुमंत आणि बिभीषण या दोघांचेही स्वभाव आणि कर्म वेगवेगळे होते. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. ती म्हणजे ते दोघेही श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीरामांनी त्यांना चिरंजीव केले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका केली. या मृत्यू लोकात जन्म घेऊनही ते अमर झाले ही फक्त श्रीरामंचीच कृपा!
खरी निष्ठा आणि भक्ती कशी असते आणि अशा भक्तांवर प्रभू श्रीराम कशी कृपा करतात हे या उदाहरणातून समर्थांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्याला सांगत आहेत की श्रीराम हे दासाभिमानी आहेत. आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत.
स्वसंवाद :
१) हनुमान आणि बिभीषण यांच्या इतकी भगवंताची भक्ती कदाचित मला जमणार नाही. परंतु किमान त्या मार्गावर चालावे असे तरी मला वाटते का?
२) ही सृष्टी भगवंताची लीला आहे असे मी मानतो का?
३) निसर्गाच्या विशालतेकडे पाहताना माझ्या मनात परमेश्वराप्रती कृतज्ञता येते का की मी ते गृहीत धरतो?
४) चिरंजीव होणे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. माझ्या भक्तीचे ध्येय केवळ सांसारिक सुखापुरते आहे की मोक्षापर्यंत पोहोचण्याची माझी खरी इच्छा आहे?
– – – –
श्लोक क्र. ३४ – – –
उपेक्षा कदा रामरुपी असेना|
जिवा मानवां निश्चयो तो वसेना|
शिरी भार वाहेन बोले पुराणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४|
अर्थ : आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु (आपण असे दुर्दैवी जीव आहोत की) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
(रामरुपी – भगवंताजवळ, जिवां मानवां – जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला)
विवेचन : आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्व प्रसंगांमध्ये भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी नरसिंह रूपात प्रकट होऊन श्रीविष्णूंनी अत्याचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अशा रीतीने आपल्या भक्ताचे संरक्षण केले.
आपल्या प्रजेला परमेश्वराचे नाव घेण्यास आणि ऋषीमुनींना यज्ञ करण्यास कंसाने बंदी घातली होती. त्याने ईश्वर भक्तांचा अनन्वित छळ केला. परंतु भगवंताने श्रीकृष्ण अवतारात या अन्यायी आणि दुराचारी कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले.
अशा विविध प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यांचा भार किंवा काळजी तो आपल्या शिरावर घेतो अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये आहेत.
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
असे वचन त्याने गीतेत आपल्याला दिले आहेच. असे असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंत आपल्याला सहाय्य करीलच याची खात्री वाटत नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे आणि तो सदैव आपल्याजवळ आहे याची खात्री आपल्याला असत नाही. आपल्या हाकेला तो धावून येईलच याबद्दलही आपण साशंक असतो. त्याच्यावर भार टाकून निर्धास्त राहण्याइतकी निष्ठा किंवा समर्पण आपले नसते.
आपली अशी अपेक्षा असते की भगवंताने आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणींमध्ये आणि दुःखामध्ये मदत करावी. अशा गोष्टींसाठी आपण भगवंताला गृहीत धरतो. तो प्रसन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नवस करतो, प्रार्थना करतो. भगवंताला निरनिराळ्या प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याला कोणी भक्त मोठी देणगी देतो तर कधी कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो. परंतु या गोष्टींची भगवंताला अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची!
आपण परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली की आपली अशी अपेक्षा असते की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपल्या संकटात धावून यावे. परंतु जेव्हा आपल्याला तसे होताना दिसत नाही तेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास डळमळीत होताना दिसू लागतो. परंतु ही परमेश्वराने पाहिलेली आपली परीक्षा असते असे म्हणावे लागेल.
जो भगवंत आनंदनिधान आहे, कल्पतरू आहे अशा भगवंताकडे भक्ती, मुक्ती आणि मोक्ष मागण्या ऐवजी त्याच्याकडून आपण पैसा, व्यवहारातील यश, सुखाचा प्रपंच यासारख्या क्षुल्लक गोष्टींची अपेक्षा करत असतो. व्यवहारातील यश, पैसा, सुखसमृद्धी या गोष्टींनाच सामान्य माणसे परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असे समजतात. परंतु सदाचार आणि सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे असे समजावे.
भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे की “योगक्षेमं वहम्याहं. ” भगवंत आपला भार घेतो. त्याला आपली काळजी आहे. या त्याच्या वचनाचा अर्थ आपण असा घेता कामा नये की आपण आपले जे कर्तव्य आहे ते सोडून केवळ त्याच्यावर भार टाकून निवांत बसावे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच तर त्याने गीता सांगितली. आपल्या पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य करावे, स्वधर्म पार पाडावा. परंतु असे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. संत जनाबाई म्हणतात
दळीता कांडीता तुज गाईन अनंता |
न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी
– असेच आपणही आपले कर्तव्य करत असताना त्याच्या नामात मग्न राहावे.
स्वसंवाद :
१) मी भगवंताची भक्ती करतो तेव्हा माझ्या मनात काय असते – निरपेक्ष प्रेम की एखादी अपेक्षा?
२) परमेश्वराप्रती असलेली माझी भक्ती खरोखर निरपेक्ष असून ती “लाच” तर नाही ना?
३) संकटात भगवंताची कृपा दिसली नाही तेव्हा माझी श्रद्धा डळमळीत होते का?
४) “योगक्षेमं वहाम्यहं” हे वचन मला माहीत आहे – परंतु माझे कर्तव्य करताना मी खरोखर त्याच्यावर भार सोपवतो का की प्रपंचाची काळजी मीच वाहत राहतो?
– क्रमशः श्लोक ३३ आणि ३४.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
















