साडेतीन म्हटल्यावर नकळतच तोंडातून शहाणे असाच पुढचा शब्द बाहेर पडतो. किंवा साडेतीन शहाणे अस म्हंटल्यावर पेशवाई व सोबत सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हीच नांव डोळ्यासमोर येतात.
पेशवाईच्या अगोदर किंवा नंतर अशा प्रकारची माणसं नव्हती किंवा नाहीत अस नाही. पण पेशवाई आणि हिच नांव साडेतीन शहाणे असा ऊल्लेख झाल्यावर येतात.
राजेशाही, पेशवाई संपली. राज्य, संस्थानं जाऊन देश, व प्रादेशिक प्रदेश म्हणजे राज्य उदयास आली. याच बरोबर वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षातल्या खंबीर नेतृत्वाची माणसं समोर आली. काहिंंनी खंबीरपणे पक्षाच नेतृत्व केलं. तर आपण खंबीर असल्याच्या बळावर काहींनी वेगळा पक्ष, गट तयार केला. तसंच काही घराणी आणि घराण्यातली काही माणसं कर्तुत्ववान असल्याच दाखवत त्यांना पुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न सुरु झाला, व तो अजूनही काही प्रमाणात बर्याच ठिकाणी सुरु आहे. आणि हीच राज्य, पक्ष, आणि कुटुंबातील काही माणसं पाहिली की परत आठवण होते ती साडेतीन शहाणे या शब्दाची.
पेशवाई काळातले साडेतीन शहाणे यांचा ऊल्लेख नक्की कोणत्या अर्थाने (म्हणजे चांगले का कारस्थानी) करतात हे ठामपणे सांगता आलं नाही तरी ते नक्की कोण आणि त्यातले पूर्ण आणि अर्धे शहाणे कोण हे पक्क होतं. या माणसांची आज एक उद्या अर्धा अशी अदलाबदल नव्हती. पण आज जाणवणाऱ्या साडेतीन शहाण्यांच तसं वाटत नाही.
कारण आज जो पूर्ण शहाणा वाटतो तो कदाचित उद्या अर्धा शाहणाच वाटेल, किंवा शहाणा या यादितही नसेल. तसेच सध्या एकाच पक्षात, राज्यात, घराण्यात या प्रकारचे लोक असल्याच बोललं जातं. सत्तेसाठी किंवा विरोधासाठी एकत्र येण्याचा कल दिसतो. यासाठी धर्म, जात, भाषा, ऊत्सव या (साडेतीन) गोष्टिंचा आधार घेतलेला दिसतो. काहीवेळा खरंच याच गोष्टिंना आधार देण्याची, व यांचा आधार घेण्याची गरज आहे याची जाणीव होते. तर काही वेळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याचा वापर केला असं वाटतं. मग यासाठी एकत्र आलेल्या लोकांमधे या प्रकारचे साडेतीन शहाणे सत्तेेसाठी, विरोधासाठी एकत्र असल्याचा सुर निघतो. या एकत्र आलेल्या साडेतीन शहाण्यांचे परत आपले आपले साडेतीन शहाणे असल्याची चर्चा होते. आणि या साडेतीन शहाण्यांची साखळी किंवा संख्या वाढत जाते असं वाटलं तरी जनमानसात सगळ्यांचा ऊल्लेख साडेतीन शहाणे असाच होतो. आणि बर्यचदा त्यात उपहास, टिंगलच जाणवते.
यातला एखादा मुळातच अर्धा असतो. पण आपणच पूर्ण असल्याच्या विश्वास त्याला वाटतो. लोक आपल्यामागे फिरतील असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाल्याने मग तो तळ्यात मळ्यात करतो. आणि तो येऊन मिळाल्याने अगोदर संख्येने तीन असणारे व्यावहारिक द्रृष्ट्या साडेतीन झाल्याची चर्चा सुरू होते. विचारांप्रमाणे या चर्चेत गांभीर्य, उपहास, विनोद सगळच जाणवतं.
मुहूर्तांंमधे साडेतीन मुहूर्त, देेवस्थानात साडेतीन शक्तीपीठं हे शब्द कायम वापरले जातील. तसंच शहाणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तरी साडेतीन शहाणे असा वापर यापुढे सुध्दा होत राहील असं वाटत.
☆ त्या दिवशी असं झालं… भाग ३ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆
(अचानकच विहीरीच्या अधिक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला..) – इथून पुढे – –
‘सगळं कसं पापणी लावते न लावते, तोच घडलं. सुरूवातीला ठरलं होतं, त्याच्या उलट जागा बदलल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थच्या बड्डींनी आपआपल्या रायफल तळघराच्या तोंडाच्या निशाणावर ठेवल्या. सिद्धार्थ आपल्या दोन्ही हातात एक एक ग्रेनेड घेऊन सिद्ध झाला. लांस नायक खुशहालने तळघर झाकलेली लाकडाची पट्टी उचलायला सुरुवात केली, इतक्यात ती पट्टी जोराच्या आवाजासहित खालून वर उसळली गेली. आणि तळघरातून होणार्या गोळ्यांच्या वर्षावाने लांस नायक खुशहालला धराशायी केलं आणि दूसर्या फैरीत सिद्धार्थला. एका ओझरत्या क्षणी गौरवला खुशहाल आणि सिद्धार्थ एक चित्कार करत धराशायी होताना दिसले आणि दुसर्या क्षणी उघडलेल्या तळघरातून पठाणी कुर्ता घातलेले आणि लांब लांब दाढया असलेलेले दोघे जण उडी मारून बाहेर येताना दिसले. दोघे आतंकवादी आपली एके -४७ चारी दिशांनी फिरवत अंदाधुंद गोळीबार करू लागले. क्षणार्धात गौरवला त्याच्या शरिराच्या मध्यात कसला तरी झटका बसल्यासारखं जाणवलं. डाव्या हातात आणि पोटात काही तरी तीव्रसं टोचलं. पुढच्या क्षणी तो माळ्याच्या पायर्यांवरून गडगडत पहिल्या मजल्यावर येऊन पडला. पडता पडता त्याला, कॅप्टन सिद्धार्थचा बड्डी हेमचंद्र, पहिल्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर उडी मारताना दिसला. सगळीकडे फक्त धूरच धूर आणि जिथे गौरव धडपडत येऊन पडला होता, त्याच्या आजूबाजूला होत होता धूळ उडवणार्या गोळ्यांचा वर्षाव. स्वत:ला घसटत घसटत पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत जाऊन भिंतीचा आडोसा घेत त्याने वरच्या बाजूला गोळीबार करणं सुरू केलं.
गौरवच्या आठवणीत आता सगळं दृश्य धूसर धूसर दिसतय. गोळीबार आणि त्यामुळे पसरलेला धूर याच्यामधून, माळ्यावर उठणार्या दोघा आतंकवाद्यांच्या घोषणा ‘नारा-ए – तकबीर – अल्लाह- ओ- अकबर’, ऐकू येत होत्या. याच वेळी गौरवचे आपल्या डाव्या हाताकडे लक्ष गेले. त्यातून रक्ताची धार वहात होती. रायफलवरील त्याच्या डाव्या हाताची पकड ढिली होत होती. त्याचबरोबर त्याने आपल्या वर्दीवर घातलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटखाली पोटात वेदना जाणवू लागल्या होत्या आणि वर्दी ओलसर चिपचिपित झाली होती. वरच्या माळ्यावरून दोघे आतंकवादी थांबून थांबून गौरवच्या दिशेने गोळीबार करत होते. गौरव भिंतीच्या आडून, थांबून थांबून त्यांच्या फायरिंगला प्रत्युत्तर देत होता. त्याचा डावा हात सुन्न होऊ लागला होता. त्यातून वहाणारं रक्त त्याचे बूट आणि खालची फरशी रंगवत होतं. बुलेट प्रूफच्या आतील त्याची वर्दीही वाहणार्या रक्तामुळे अधिकच चिपचिपित होत होती. या सगळ्या आवाजात एक क्षीणसा आवाज त्याला ऐकू आला, खूप दबका आवाज… त्याला स्पष्ट ऐकू आला… ‘गौरव सर सेव्ह मी प्लीज… ’ थोड्या वेळाने पुन्हा हाक आली, ‘गौरव सर…. ’ त्या हाकेने जणू गौरवच्या धमण्यांमधून टपकणार्या रक्ताच्या थेंबांना ठिणग्यांमध्ये परावर्तीत केलं. आपल्या सार्या वेदना विसरून गौरव खोलीतून बाहेर आला आणि वर माळ्याकडे धावणार, इतक्यात ‘मर काफिर, मर’च्या आवाजाबरोबर गोळ्यांचा आवाज आला आणि शेवटी घुमली कॅप्टन सिद्धार्थची किंचाळी. सुन्न झालेला गौरव तिथेच फरशीवर धप्पकन बसला.
एनकाऊंटर सुरू होऊन जवळ जवळ एक तास झाला होता. सूर्य आता माथ्यावर आला. होता. गौरवला आता खूप थकल्यासारखं वाटत होतं. आता त्याच्याजवळ तीस गोळ्यांची फक्त एक मॅगझीन शिल्लक होती. त्याला नक्की माहीत होतं की त्या दोन आतंकवाद्यांजवळ गोळ्यांची काही कमतरता नाही. त्यांच्या स्वत:जवळच्या गोळ्या आणि आता लांस नायक खुशहाल नि सिद्धार्थच्या जॅकेट मध्ये असलेली मॅगझीन्स आता त्यांचीच संपत्ती बनलेली असणार. त्याचा बड्डी खुशहाल आणि सिद्धार्थ यांच्या जिवंत असण्याची कुठलीही आशा आता उरली नव्हती. वर्दीच्या खिशात ठेवलेला रेडियो सेट सुरुवातीच्या फायरिंगमधे कधीचाच बंद पडला होता. घराच्या बाहेर तैनात असलेल्या आपल्या तुकडीला संदेश पाठवण्याचा कुठलाच मार्ग आता गौरवकडे नव्हता. एकच आशा होती. सिद्धार्थचा बड्डी, शिपाई हेमचंद्र बाहेर उडी मारून गेला होता, तो काही मदत घेऊन आला, तर आला, पण मदत येणार असती, तर एव्हाना यायला हवी होती. प्रत्येक जाणारा क्षण घातक वाटत होता. खूप रक्त वाहून गेल्यामुळे आपल्या शरीरात अजिबात ताकद नाही, असं त्याला वाटत होतं. त्याचे डोळे मिटू लागले होते. डोळे मिटता मिटता टिप्सीचा चेहरा डोळ्यापुढे तरळला आणि मनात विचार आला की टिप्सीला आता या जगात आपल्या पप्पांशिवायच मोठं व्हावं लागेल. गीतालीचा गोल चेहरा डोळ्यापुढे नाचू लागला. टिप्सीला मांडीवर घेऊन बसेलेली गीताली…. त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर असलेल्या वॉलपेपरवरचं छायाचित्र…. मोबाईल बघता बघता, अचानक काही तरी गौरवला आठवलं आणि तो त्याच्या कॉँटॅक्ट लिस्टवरचे काही नंबर डिलीट करू लागला. डोक्यावर असलेल्या मृत्यूच्या व्याकुळ छायेतही गौरवचे विचार कुठे कुठे भटकत होते. मग त्याने एक निर्णय घेतला की मरायचच जर आहे, तर या माथेफिरूंना मारून का मरू नये? आणि तो आपली शेवटची मॅगझीन आपल्या रायफलवर चढवत त्यासाठी तयार झाला.
त्यानंतरचं सगळं गौरवच्या स्मृतीत धूसर घूसरच आहे. त्याला स्पष्ट आठवत नाही. इतकच आठतय की तो आपली रायफल घेऊन गोळ्यांची बरसात करत जिन्यावरून धावत गेला. त्याच्या बुलेट प्रूफ जॅकेटला तीन – चार गोळ्या लागल्या आणि त्याच वेळी खालच्या जिन्यावरून फौजी बुटांचा धप धप आवाज ऐकू येऊ लागला. दुसर्या दिवशी त्याचे डोळे उघडले, तेव्हा तो बेस हॉस्पिटलच्या बेडवर होता. डावा हात प्लॅस्टरमध्ये हवेत लटकत होता. एका क्लिपने तो स्टॅंडला अडकवलेला होता आणि त्याच्या पोटावर मोठीशी पट्टी बांधलेली होती. नंतर कळलं त्याच्या पोटातून चार गोळ्या, आणि डाव्या हाताच्या बोटांचा जोड व कोपरापासून एक आशा तीन गोळ्या काढल्या होत्या. त्याच्या उन्मादी आक्रमणात ते दोघे आतंकवादी ठार झाले होते. त्यांच्या मृत शरीरातून काढून जप्त केलेल्या कागदपत्रावरून, ते अफगाणी असल्याचं कळलं होतं.
आपली सगळी कहाणी ऐकवल्यावर गौरव एकदम गप्प गप्प झाला. धापा टाकू लागला. जसा काही मैलो – न – मैल पळून आत्ताच इथे येतोय. मणा मणाचं ओझं जसं काही त्याच्या छातीवर पडलय आणि गेले पंधरा-वीस दिवस तो ते आपल्या छातीवर वागवतोय. क्षणभर त्याला औदासिन्यानं घेरलं आणि मग… मग भारी भक्कम ओझ्याखाली अस्वस्थ, झालेल्या, तळमळणार्या त्याला, थोड्या वेळासाठी अगदी थोड्या वेळेसाठी का होईना, पण त्याच्या उखडलेल्या श्वासाच्या अवती भवती, थंडगार झुळुक फिरत असल्याचा भास झाला.
‘गॉड ब्लेस यू माय सन… माझं नशीब किती चांगलं की तुझ्यासारख्या ब्रेव्ह सोल्जरची देखभाल करण्याची संधी मला मिळाली. ’ आपल्या ओलसर झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत शकुंतला मॅम म्हणाल्या.
‘कसला ब्रेव्ह सोल्जर मॅम? दररोज सिद्धार्थ माझ्या बेडच्या जवळ उभा राहतो आणि माझ्याकडे टवकारून बघतो. ज्या गोळ्यांनी त्याचा जीव घेतला, ती खरं तर माझ्या नावाने निघाली होती. ’
‘मी समजू शकते गौरव, तुझ्यावर कोणता प्रसंग ओढवलाय! पण आता काही करता येणार नाही ना! इतका विचार केलास, तर तुझी तब्बेत सुधारणं अवघड होऊन जाईल. ’
‘मला बरं व्हायचंच नाहीये. आय वॉँट टू सफर… कदाचित तेच माझं प्रायश्चित्त असेल! ही वेदना, हे दु:ख माझ्याजवळ राहावं… अगदी कायमसाठी… ’
‘असा विचार करू नकोस बेट! . आपल्या फौजेचे हे बलीदान थेट गॉडसमोर रुजू होतं! ’
‘ही सगळी नुसती बडबड आहे. सांगण्या-ऐकण्याच्या मोठमोठ्या गोष्टी…. कुणालाच या बलिदानाची जाणीव नाही की त्याचं महत्व कळलेलं नाही. नाही तर गेल्या तीस-चाळीस वर्षात काश्मीरमध्ये इतके जीव गेले आहेत की त्या हिशेबाने बघितलं तर हा स्वर्ग, खराखुरा स्वर्ग व्हायला हवा होता पण इतक्या सगळ्या बलिदानानंतरही आम्ही लोक फक्त गोळ्याच खात रहातोय. देशवासीयांना आमच्या सगळ्या चुकाच चुका दिसताहेत फक्त! ’
‘मला कळतय गौरव… बरं ते जाऊ दे… त्या शेवटच्या क्षणी तुला काय वाटलं? मृत्यूला इतकं जवळ उभं राहिलेलं पाहून… ओह… माझा तर केवळ विचारानेच थरकाप होतोय. ’
‘काही खास नाही मॅम.. बस! मुलीची आठवण झाली. सहा वर्षाची होईल आता ती. मला असं वाटलं की आता तिला मोठं होताना तिचे पापा पाहू शकणार नाहीत. ’ गौरवच्या या बोलण्यावर हॉस्पिटलची ती हेड नर्स स्फुंदून स्फुंदून रडू लागली. खूप वेळेपर्यंत ऑफिसर वॉर्डच्या त्या कोपर्यातल्या अवती-भवती दबलेले हुंदके गुंजत राहिले. मग वातावरण तणावमुक्त करण्यासाठी शकुंतला मॅम म्हणाल्या, ‘आपल्या बायको-मुलीला बोलाव ना इथे! त्या इथे राहिल्या, तर पेन किलरच्या डोसाची गरजही कमी भासेल. मीदेखील बघीन माझ्या ब्रेव्ह सोल्जरची गोड छोकरी! ’
‘नाही मॅम! त्या दोघींनी मला आशा स्थितीत पाहावं, असं मला वाटत नाही. मी त्या दोघींचा हीरो आहे आणि हीरो कधी बेडवर पडलेला, पट्ट्या लपेटलेला असतो का? ’
‘ गॉड… तू आणि तुझे विचार… बरं हे सांग, तिथे तुझ्यावर गोळ्यांची बरसात होत होती आणि अशातही तू मोबाईलवरून कुणाचे नंबर डीलीट करत होतास? ’
शकुंतला मॅमच्या या प्रश्नावर गौरव काहीसा संकोचला पण त्याने जे उत्तर दिले त्यामुळे शकुंतला मॅम चकीतच झाली.
तो काहीसा शरमिंदया स्वरात म्हणाला, ‘मॅम, त्याचं काय आहे की मी दोन-तीन मुलींचे नंबर डीलीट करत होतो. ’
‘काय? … पण का? ’
‘त्याचं काय आहे ना मॅम, सोल्जरच्या बॉडीबरोबर त्याचं सगळं सामान त्याच्या फॅमिलीकडे पाठवलं जातं. मी मेल्यावर माझा मोबाईल माझ्या बायकोकडे गेला असता आणि तिने बघितलं असतं की त्या दोन-तीन मुलींच्या संपर्कात मी अजूनही आहे, तर तिला किती वाईट वाटलं असतं! मी तर तिला सांगितलं होतं की आता माझा त्या जुन्या गर्ल फ्रेंडशी काहीही संबंध नाही.
मेजर गौरव वत्सच्या बोलण्यावर हेड नर्स शकुंतला बर्मन इतकी मोठमोठ्याने हसू लागली, की तो हास्यध्वनी, किती तरी वेळ तिथे रेंगाळत राहिला. ते हसू, ऑक्टोबरच्या त्या कुडकुडणार्या दुपारी, ऑफिसर वॉर्डमधल्या त्या ठणक्याला थोडीशी ऊब देण्याची मेहरबानी करत राहिलं.
– समाप्त –
मूळ हिंदी कथा – ‘गर्लफ्रेंड’ मूळ लेखक – गौतम राजऋषि
अनुवाद – उज्ज्वला केळकर
संपर्क –निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपण अनेकदा पूर्वीच्या पिढीकडून एक वाक्य ऐकलेलं असतं—“यात काहीच राम नाही. ” लहानपणी हे वाक्य ऐकताना त्याचा नेमका अर्थ कळत नसे; पण जसजसं आकलन वाढत गेलं, तसं या वाक्यामागचा आशय उलगडत गेला. “राम” म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्या अभावाने जगणं अपूर्ण का वाटतं—या प्रश्नांची उत्सुकता मनात निर्माण झाली.
भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीराम हे केवळ श्रद्धास्थान नाहीत, तर आदर्श जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. अनेक पिढ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली आहे. म्हणूनच “रामराम” म्हणत अभिवादन करण्याची परंपराही आपल्या संस्कृतीत रूढ झाली. म्हणजेच, “राम” हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे.
रामायणातून आपण श्रीरामांचे जीवन वारंवार ऐकले, पाहिले आणि वाचले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्नेह, साहस, संयम, सात्विकता, समर्पण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसतो. आयुष्यातील अनेक कठीण आणि वेदनादायक प्रसंग त्यांनी अत्यंत शांतपणे आणि धैर्याने स्वीकारले—वडिलांच्या वचनासाठी वनवास पत्करणे, राक्षसांशी लढणे, सीतेचे अपहरण आणि तिची सुटका, तसेच राज्यप्राप्तीनंतरही प्रजेच्या हितासाठी घेतलेले कठोर निर्णय. स्वतःकडे अपार सामर्थ्य असूनही त्यांनी अनेकदा स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांच्या जीवनातून माणसाने कोणत्या स्तरावर जगावं, याचं सूक्ष्म मार्गदर्शन मिळतं.
त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे नातेसंबंधांची जपणूक. राजा, पुत्र, भाऊ, पती आणि पिता या प्रत्येक भूमिकेत त्यांनी जबाबदारी, संवेदनशीलता आणि न्यायबुद्धी जपली. आजच्या काळातही, कुटुंब असो वा संस्था, नात्यांमध्ये संतुलन आणि विश्वास टिकवण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो.
मानवी जीवन भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन पातळ्यांवर उभं आहे. या दोन्हींचा समतोल साधला, तरच जीवन अर्थपूर्ण होतं. आज तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन अधिक सोपं आणि सुलभ झालं आहे; अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. तरीही मनाच्या पातळीवर अस्वस्थता, असंतोष आणि तुटलेपणाची भावना वाढताना दिसते. कारण भौतिक प्रगतीच्या तुलनेत मन, भावना आणि आत्मिक जाणीवा यांच्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलेलं नाही.
यामुळेच व्यक्तीच्या आत विसंगती निर्माण होते—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे जणू वेगवेगळ्या दिशांनी ओढ घेतात. विचार काही सांगतात, भावना काही अनुभवतात आणि कृती वेगळ्याच घडतात. परिणामी, मनात अस्वस्थता, मत्सर, लोभ, असुरक्षितता या भावना निर्माण होतात. स्वतःशीच तुटलेपण जाणवू लागतं.
खरं तर “राम” म्हणजे या सर्व स्तरांचं—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा—संतुलित, सुसंवादी आणि एकात्म अस्तित्व. जेव्हा या चारही घटकांमध्ये सुसंगती असते, तेव्हा जीवनात शांतता, समाधान आणि स्पष्टता येते. पण आज आपण स्वतःपासूनच दूर जात असल्यामुळे हा “राम” हरवत चालला आहे.
हा हरवलेला “राम” पुन्हा मिळवण्यासाठी मानवी मूल्यांची जाणीवपूर्वक जोपासना आवश्यक आहे. त्याग, सेवा, समर्पण या गोष्टी आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात. पूर्ण निस्वार्थपणे जगणं जरी शक्य नसलं, तरी आपल्या कृतींमुळे दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, शक्य असेल तिथे त्याला मदतच होईल, हा दृष्टिकोन आपण नक्कीच स्वीकारू शकतो. आपल्या गरजांबरोबर इतरांच्या गरजांचाही विचार करणं, आपल्या उपभोगावर मर्यादा ठेवणं—या साध्या गोष्टीही मोठा बदल घडवू शकतात.
तसंच, नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर, शरीराला सक्रिय आणि निरोगी ठेवणं, तसेच तंत्रज्ञानाचा सजग वापर करणंही आवश्यक आहे.
थोडक्यात, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद आणि संतुलन साधणं—यालाच “राम असणं” म्हणता येईल. आतल्या या रामाला जागं केलं, तरच आपल्या बाह्य जगण्यातही समाधान, स्थैर्य आणि अर्थपूर्णता अनुभवता येईल.
आपल्या प्रत्येकाला जगण्यात राम प्राप्त होवो या सदिच्छा!
– – – लिंबाचा रस तोंडावर फासून बँकेवर दरोडा घालणारा “मिस्टर इंडिया” आणि त्यातून जन्माला आला एक क्रांतिकारी सिद्धांत डनिंग-क्रुगर इफेक्ट!!!
१९९५ साली एका भरदुपारी पिट्सबर्गमध्ये *मॅकआर्थर व्हीलर* नावाच्या एका धिप्पाड माणसाने तोंडाला साधा रुमालही न बांधता दोन बँका लुटल्या, कारण त्याचा असा ठाम विश्वास होता की चेहऱ्याला लिंबाचा रस फासला की माणूस सीसीटीव्ही कॅमेऱ्याला ‘अदृश्य’ होतो. हे वाचताना आपल्याला हसू येईल, पण या एका ‘येडचाप’ घटनेने जागतिक मानसशास्त्राला ‘डनिंग-क्रुगर इफेक्ट’ नावाचा एक असा क्रांतिकारी सिद्धांत दिला, जो आज आपल्या सोशल मीडिया फीडपासून ते गल्लीतल्या राजकारणापर्यंत प्रत्येक ठिकाणी अगदी तंतोतंत लागू होतो.
****
कोणताही गुन्हेगार चोरी करताना आपला चेहरा लपवतो, पण व्हीलर महाशय चक्क कॅमेऱ्याकडे बघून हसत होते. त्यांना खात्री होती की लिंबाचा रस हा ‘इनव्हिजिबल इंक (अदृश्य शाई) म्हणून वापरला जातो, तर तो चेहऱ्याला लावला की आपला चेहराही अदृश्य होईल. त्यांनी घरी याचा प्रयोगही करून बघितला होता. तोंडाला रस फासून त्यांनी स्वतःचा पोलरॉइड फोटो काढला, पण नेमकं त्याच वेळी डोळ्यात रस गेल्याने त्यांनी डोळे गच्च मिटले आणि कॅमेरा हलला. फोटो कोरा आला आणि या महाशयांना वाटलं, “झाली की फत्ते! आता आपण मिस्टर इंडिया झालो! “
****
पण मुद्दा असा आहे की, व्हीलर हे काही पहिले किंवा शेवटचे ‘अतिशहाणे’ नव्हते. त्यांच्या या अजब पराक्रमाची बातमी जेव्हा कॉर्ननेल विद्यापीठातील डेव्हिड डनिंग आणि जस्टिन क्रुगर या दोन मानसशास्त्रज्ञांनी वाचली, तेव्हा त्यांना एक वेगळाच विचार सुचला. त्यांना प्रश्न पडला की, *एखादा माणूस स्वतःच्या अज्ञानाबद्दल इतका ‘कॉन्फिडन्ट’ कसा असू शकतो? * यातूनच १९९९ मध्ये जन्म झाला *डनिंग-क्रुगर इफेक्ट’चा! *
या सिद्धांतानुसार, ज्या व्यक्तीकडे एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा कौशल्य अत्यंत कमी असते, तीच व्यक्ती त्या विषयात आपण ‘तज्ज्ञ’ असल्याचा सर्वाधिक आव आणते. सरळ सांगतो, अडाणी माणसाला आपण अडाणी आहोत हे समजण्यासाठी जेवढी बुद्धी लागते, तेवढीही त्याच्याकडे नसते. याला मानसशास्त्रात ‘मेटाकॉग्निशन’ची (Metacognition) कमतरता म्हणतात. म्हणजे स्वतःच्याच विचारांचे विश्लेषण करण्याची क्षमता नसणे.
****
आपल्या महाराष्ट्रात अशा नमुन्यांची अजिबात कमतरता नाही. लग्नाच्या पंगतीत एखादा काका भेटतोच, ज्याला इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून ते शेअर मार्केट कोसळण्यापर्यंतच्या सगळ्या कारणांची ‘इनसाईडर’ माहिती असते. या काकांनी आयुष्यात कधी पासपोर्ट काढलेला नसतो किंवा डीमॅट खाते उघडलेले नसते, पण त्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगा असतो की समोर बसलेला एखादा खरा अर्थतज्ज्ञही गप्प बसतो. हे मान्य करायलाच हवं की, *अज्ञान हे ज्ञानापेक्षा जास्त आत्मविश्वास निर्माण करतं. *
डनिंग-क्रुगर इफेक्ट हा आजच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या काळात अधिक धोकादायक झाला आहे. एखाद्या विषयावर दोन मिनिटांचा व्हिडिओ पाहिला की लोकांना वाटतं आपण त्या विषयात पी एच. डी. केली आहे. मग ते डॉक्टरला सर्जरी कशी करायची हे शिकवतात आणि इंजिनिअरला पूल कसा बांधायचा याचे सल्ले देतात. व्हीलरने चेहऱ्याला लिंबाचा रस लावला होता, हे लोक बुद्धीलाच अज्ञानाचा लेप लावून फिरत असतात.
****
डनिंग आणि क्रुगर यांनी त्यांच्या संशोधनात असे सिद्ध केले की, जे लोक खरोखर हुशार किंवा कुशल असतात, त्यांना उलट ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ जाणवतो. म्हणजे, त्यांना सतत असं वाटतं की आपल्याला अजून खूप शिकायचं आहे किंवा समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त समजतंय. याउलट, ज्यांना काहीच येत नाही, ते मूर्खपणाच्या शिखरावर बसलेले असतात.
****
विश्लेषकांच्या मते, या समस्येवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे *बौद्धिक नम्रता*.
आपण सर्वज्ञ नाही आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट माहित नसू शकते, हे मान्य करायला खूप मोठे काळीज लागते. मॅकआर्थर व्हीलरला जेव्हा पोलिसांनी अटक केली आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवलं, तेव्हा तो आश्चर्याने उद्गारला होता, “बट आय वोअर द ज्यूस! ” (पण मी तर रस लावला होता! ). त्याच्यासाठी तो रस म्हणजे एक सुरक्षा कवच होतं, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हतं.
आपल्या दैनंदिन जीवनातही आपण अनेकदा ‘लिंबू रस’ लावून वावरत असतो. कधी राजकारणाच्या चर्चांमध्ये, कधी ऑफिसच्या मिटिंगमध्ये, तर कधी कौटुंबिक वादात.
आपल्याला वाटतं आपण समोरच्याला व्यवस्थित बनवलंय किंवा आपल्याला सगळं समजतंय, पण प्रत्यक्षात आपला चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असतो. संशोधकांचा शोध असं सांगतो की, जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही की “मला खरंच हे माहित आहे का? ” तोपर्यंत तुम्ही डनिंग-क्रुगर इफेक्टचे शिकार आहात.
****
आणखी एक गोष्ट म्हणजे, हा इफेक्ट फक्त मूर्ख माणसांपुरता मर्यादित नाही. अत्यंत बुद्धिमान माणसंही जेव्हा त्यांच्या क्षेत्राबाहेरील विषयात नाक खुपसतात, तेव्हा ते याच सापळ्यात अडकतात. एखादा मोठा शास्त्रज्ञ जेव्हा संगीतावर किंवा साहित्यावर अधिकाराने भाष्य करायला जातो आणि तिथे तो चुकतो, तेव्हा तो व्हीलरच्याच रांगेत उभा असतो. फरक फक्त एवढाच की व्हीलरने लिंबाचा रस लावला होता, हे लोक आपल्या पदव्यांचा रस लावतात.
****
भविष्यात काय होणार? तंत्रज्ञान वाढत जाईल, माहितीचा महापूर येईल, पण जोपर्यंत माणूस स्वतःच्या अज्ञानाचे मूल्यमापन करायला शिकत नाही, तोपर्यंत मॅकआर्थर व्हीलरचे वारसदार बँका लुटत राहतील किंवा सोशल मीडियावर कमेंट्समध्ये भांडत राहतील.
आश्चर्यकारक माहिती ही आहे की, व्हीलरने जेलमध्ये गेल्यावरही बराच काळ हे मान्य केलं नव्हतं की त्याची लिंबाची थिअरी चुकीची होती. त्याला वाटलं कॅमेऱ्यातच काहीतरी दोष असावा.
डनिंग-क्रुगर इफेक्ट हा केवळ एक वैज्ञानिक सिद्धांत नाही, तर तो मानवी स्वभावाचा एक आरसा आहे. हा आरसा आपल्याला सांगतो की, शहाणपणाची पहिली पायरी म्हणजे ‘आपल्याला काहीच माहित नाही’ हे समजणे.
****
शेवटी, व्हीलरच्या त्या लिंबाच्या रसाने त्याला तुरुंगात पाठवलं, पण जगाला एक मोठा धडा दिला. *पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची माहिती सांगताना दिसेल, तेव्हा चिडण्यापेक्षा फक्त स्मितहास्य करा. समजून जा की, समोरच्याने नकळत आपल्याला लिंबाचा रस चोपडला आहे आणि त्याला वाटतंय की तो जगाला दिसत नाहीये.
तुमच्या आजूबाजूला असा ‘लिंबू रस’ लावून फिरणारा एखादा इसम नक्कीच असेल, जो स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारात मजेत जगतोय आणि आपण मात्र त्याच्या आत्मविश्वासाकडे बघून थक्क होतोय…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈