संस्कृत काव्यात अजरामर झालेले, कालिदासाच्या उतुंग प्रतिभेतून निर्माण झालेले विरहगीत म्हणजे मेघदूत. नावावरूनच लक्षात येतो की येथे कवीने मेघालाच दूत बनवले आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हेच खरे म्हणूनच समर्थ रामदास कवीना कवीश्वर म्हणजे ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणतात. काल्पनिक कथेवर आधारित हे काव्य अनेकांना भुरळ पाडणारे खंड काव्य झाले.
कालिदास एका सुशिक्षित शास्त्रनिपुण राजकन्येचा पती होता. अगदी साधाभोळा होता. तेव्हा पत्नीने त्याला ज्ञान प्राप्तीसाठी पाठवले. तो परत आल्यावर तिने विचारले, ‘अस्ति कश्चित् वाग् विशेष:? ’ आपल्या वाणीत काही विशेष आहे? तेव्हा बुद्धिमान कालिदासांनी प्रश्नाच्या प्रत्येक शब्दाने सुरुवात होणारे काव्य रचले. अस्ति- कुमार संभव, कश्चित्- मेघदूत आणि वाग् विशेष- रघुवंश. मेघदूत हे अस्तिने सुरुवात होणारे १११ ओव्यांचे अप्रतिम विरहगीत, ज्याच्या दुसऱ्या श्लोकातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे आषाढ प्रतिपदा हा दिवस ‘कालिदास दिवस’ म्हणून ओळखला जातो. असा हा एकमेव कवी.
मेघदूत ही हेमामाली आणि विशालक्षी या यक्ष दांपत्याची कथा आहे. यक्ष हा कुबेराचा सेवक. अलका नगरी ही कुबेराची राजधानी. कुबेराला पूजेसाठी फुले आणून देणे हे यक्षाचे काम. पण एकदा यक्षाच्या हातून कळी तोडली जाते. या चुकीची शिक्षा म्हणून एक वर्ष त्याला पत्नी विरह सहन करावा लागतो. खरं तर कळी तुटणे ही आपल्यासाठी शुल्लक गोष्ट. पण पत्नी विरहाच्या शिक्षेतून, कळीला झाडापासून तोडण्यामुळे होणाऱ्या वेदना सांगायच्या आहेत. विरहाला विरहाची शिक्षा ही कालिदासाची प्रतिमा. ही शिक्षा भोगण्यासाठी तो रामगिरीवर फिरत होता.
कश्चित् कांता विरह गुरूणा स्वाधीकारान् प्रमतः
शापेनास्तंगतमहिमा वर्ष भोग्येषा भर्तु:
यक्षश्चक्रे जनकतनयास्नान पुण्योदकेषु
स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु १
कोणी एक यक्ष शापाने, जो सहन करण्यासाठी कठिण, एक वर्ष पत्नीपासून दूर जाण्यासाठी रामगिरीवरती झोपडी करून राहू लागला. तेथे वृक्षांची घनदाट सावली होती. जनककन्यासीतीने स्थान केल्याने जलाशयतील पाणी पवित्र झाले होते. पण शापाने यक्षाचे सर्व अधिकार नष्ट झाले. (रामगिरी म्हणजे नागपूर जवळचे सध्याचे रामटेक) अशा बाह्य सौंदर्याने अंतरंगातील वेदना कशा कमी होणार?
अशा दुःखाच्या प्रसंगी त्याला आकाशातील मेघाचा आधार वाटतो. मेघासारख्या निर्जीव घटकाला संदेशवाहक बनवण्याची कल्पना कालिदासाची. त्यातून रसपूर्ण, भावकाव्य मेघदूत तयार झाले. प्रेम वेड्या माणसाला चेतन अचेतन भेद कुठून असणार? . आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुम्
वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श
काळा मोठा ढग हत्तीप्रमाणे पर्वत शिखरावर धडका मारत होता. आलींगन देत होता. यावरून त्या ढगाच्या ताकदीची त्याला कल्पना आली. तो दूत म्हणून योग्य वाटला.
आषाढाची सुरुवात त्यामुळे ढग सजल आहे, दयाळू आहे. यक्षात इतक्यात पत्नीभेट शक्य नाही म्हणून त्याच्या जीवाची तगमग. तिला निरोप देऊन आधार देण्यासाठी तो ढग.
त्याला जाण्याचा मार्ग, वाटेत येणाऱ्या अडचणी, आपले घर या सर्वांचे व स्थानांचे मोठे रसभरीत वर्णन केले आहे. वाटेल तू काय कर हे ही सांगितले आहे. वेली वरच्या कोमेजलेल्या फुलासारखी माझी पत्नी, भाऊ होऊन तिला आधार दे. कमल तंत्तूची शिदोरी घेतलेले राजाहंस तुला सोबत करतील. पर्वत शिखरावरचे ताजे पाणी तू पिऊन तहान भागव. वेळूच्या वनात रेंगाळू नको. इंद्रधनुष्य, मोराचे नृत्य, अमृत गंध तुला सुखावेल. त्यात गुंतू नको. विदिशा, उज्जैनी, अवंती मार्गे कैलास, मानस, गंगादर्शन मग अलका नगरी. तेथे नगरीच्या कुरळ्या केसांवर मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसशील. असे वर्णन करणारे मेघदूत हे प्रेमकाव्य, विरहगीत त्याचबरोबर उपमा, रसिकता, विज्ञान, निसर्ग, पक्षी झाडे इत्यादी सर्व वर्णन सौंदर्याने परिपूर्ण आहे. मुळात पाच ओळींची कथा १११ श्लोकात रंगवली आहे.
यातून माणसाची निसर्गाबरोबरची जवळीक स्पष्ट होते. तोच मित्र, देव होतो. त्याच्याबरोबर सुखसंवाद होतो. कारण तो ‘अरेला कारे’ करत नाही. ज्ञानोबांच्या देवाच्या विरहात कावळा, सावरकरांना मातृभूच्या विरहात सागर, विवाहितेला माहेरच्या विरहात वारा साहाय्य होतो. त्यातून भावपूर्ण काव्यनिर्मिती होते. (पुण्यातील डॉक्टर भावे यांनी रामटेकहून निघून हेलिकॉप्टरने अलका नगरीपर्यंत प्रवास केला.) यावरून कालिदासाच्या अचूक भौगोलिक ज्ञानाची कल्पना येते. हे काव्य चौथ्या ते सहाव्या शतकातील असावे. धन्य तो कालिदास आणि मेघदूत!
काही वेळा असं वाटतं आपण खूप भ्रमात जगतोय, जणू स्वप्नरंजनात रमलोय की काय असा प्रश्न मनाशी पडतो. आधी भारत पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे जुलूम अराजकता त्यावेळच्या लोकांनी खूप सहन केली. अत्याचाराचा सामना केला आणि खूप स्वातंत्र्य सेनानींच्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळालं, अर्थातच खूप मोलाची माणसं पण गमवून त्याची खूप जबरी किंमत मोजली आपण सगळ्यांनी.
स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली. आपण स्वमर्जीने निवडून दिलेले आपले प्रतिनिधी सरकार बनवून सगळा कारभार बघायला लागले. देश चालवणे, सगळ्यांचे हित जोपासून निःपक्षपातीपणे सगळा देश चालवणे म्हणजे काही येरागबाल्याचे काम नव्हे. आपण समस्त डोळे झाकून ह्या सगळ्या प्रतिनिधींवर जबाबदारी टाकून निर्धास्त राहू लागलो. जे करतील ते आपल्या हिताचं, फायद्याचं असत ह्यावर डोळेझाकून विश्वास ठेवायला लागलो.
काही वेळी जनतेला असे अनुभव आलेत की त्या लोकप्रतिनिधींवरील विश्वास डळमळू लागला. ह्याचबरोबर जनता सुशिक्षित, सुजाण झाली, आपलं हित त्यांना कळायला लागलं, प्रगती कडे त्यांची पावलं वळायला लागली, विकासाकडे मन ओढ घेऊ लागलं. आणि हे सगळ साध्य करायचच ह्या निश्चयाने त्यांनी सत्ताबदल सुद्धा केला. आता मनासारखं सगळं झालं त्यामुळे आता प्रगती, विकास, अच्छे दिन मिळणारच ह्याची प्रत्येक नागरिकाला खात्रीच पटली.
काळ बदलला, दिवस पालटले, नवीन पिढी खूप खूप शिकू लागली, उद्योगधांना चालना मिळाली, पण मनात मात्र खूप सारे प्रश्न साचू लागले. उच्चशिक्षित प्रजा वाढू लागल्यावर निश्चितच समंजसपण, चांगली वृत्ती, मेहनतीच्या जोरावर इप्सित ध्येय गाठणे हे ओघानेच आले, पण विचार आला, खरंच असं दृश्य बघायला मिळतं का, निदान सरसकट बघता तरी हे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. खुप प्रगती झाल्याने खरंतर कुणालाच काहीच फुकट देण्याची देशाला गरज पडायला नको पण इकडे तर सगळेच उलटे मूठभर करदात्यांच्या जीवावर ढीगभर जनतेला वेगवेगळ्या स्वरूपात खिरापत वाटणे सुरूच. जेव्हा आपल्याकडील जनता घरी गाडी घोडी, बंगला असताना, स्वतः चांगली नोकरी करून बक्कळ पगार घेऊन वर “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत अनुदान घेताना जनतेची कीव करावी की ते अनुदान खोटेपणाने लाटणाऱ्या बहिणींची कीव करावी की अभ्यास न करता निव्वळ मतांसाठी ते सढळ हाताने देणाऱ्या त्या देशसेवक प्रतिनिधींची कीव करावी ते कळत नाही.
नुकतीच नीट परीक्षा नीट न घेण्याची शाई वाळते न वाळते तोच आज दुसऱ्या अजून एका शिक्षकांच्या परीक्षेची पेपर फुटीची बातमी कळली. खूप मेहनतीने खडतर परिस्थितीत परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागत असेल ह्याची सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे तरीही अशा भोंगळकारभाराने, मूठभर अप्रामाणिक लोकांमुळे कठीण परिस्थिती उद्भवलीय आणि ते ही जनता जनार्दनाच्या खिशातूनच. कमी उत्पन्नाचे खोटे दाखले आणून सवलती घेणाऱ्यांची खरंच कीव येते, नुसते दरिद्री रेषेखालील हे लोक नसून हे कर्माने दरिद्री असतात. असं स्वतः चा वैयक्तिक फायदा करून घेऊन देशाचे कुठले हित साध्य होते हे एक न उलगडलेलं कोडंच.
अर्थात ही सगळी खंत कुठल्याही अमुक एका पक्षाविरुद्ध, अमुक एका व्यक्तीबद्दल नसून ही सगळी खालावलेल्या, पातळी सोडलेल्या मनःस्थिती विरुद्ध आहे हे कृपया सुजाण वाचकांनी लक्षात घ्यावे.
☆ “Just Good Friends” (अनुवादित) – इंग्रजी लेखक : जेफ्री आर्चर ☆ स्वैर अनुवाद – डॉ मकरंद पिंपुटकर☆
इंग्लंडमधील माझी व रॉजरची कहाणी…
किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं तर बेडरूमच्या पडद्यामागे साधारण उजाडत होतं आणि शेजारी उघडाबंब रॉजर अजून घोरत होता. माझ्यासारखा व्यायाम केला तर त्याची ढेरी कमी होईल हे त्याला मी सांगून सांगून थकले होते पण व्यायामापेक्षा बीअरच त्याला जास्त पसंत होती, मग पोट वाढणार नाही तर काय होणार?
अर्थात या बीअरमुळेच माझी व त्याची भेट झाली होती हे मला विसरून चालणार नाही. मी ज्या बारमध्ये असे त्या “जिन and टॉनिक” बारमध्ये त्याचं नेहमी येणं असे. दिसायला चार चौघांसारखाच पण कमालीचा साधा व सरळ.
काऊंटरमागच्या माझ्या ठरलेल्या जागेवरून मी त्याच्याकडे एकटक बघत रहात असे. माझा जीव जडला होता त्याच्यावर – एकतर्फीच हं. त्याने कधी मान वर करून माझ्याकडे पाहिलेही नाही. पण मी आशा सोडली नाही कधी.
मग त्याच्या आयुष्यात नटमोगरी fake फर कोट घालणारी एलिझाबेथ आली. आमच्या बारमधलं एलिझाबेथबद्दलचं सगळ्यांचंच मत चारचौघांत सांगण्यासारखं; छापण्यासारखं नव्हतं. या प्रकरणाचा शेवट दु:खदच होणार याबद्दलही सगळ्यांचं एकमत होतं.
मला दहा वेळा वाटलं की तिच्याबद्दल सगळं सगळं रॉजरला सांगावं पण मला तिचा मत्सर वाटतो म्हणून मी चहाड्या करतीये असे तो म्हणणार याची मला खात्री होती आणि माझा धीर झाला नाही हेच खरं.
मोजून २० दिवसांत हे लफडं संपलं. मला exact माहितीये कारण प्रत्येक दिवस मी मोजत होते. आमच्याच बारमध्ये त्यांचं वाजलं. ती त्याला फडाफडा बोलली आणि ताडताड निघून गेली. या वेळी मात्र मी मागे हटली नाही. जनाची मनाची सगळी लाज कोळून प्यायले आणि सरळ जाऊन त्याच्या टेबलवर शेजारच्या खुर्चीतच जाऊन बसले.
तो काही बोलला नाही पण मला उठून जा असंही म्हणाला नाही. पण मग जेव्हा मी त्याच्याकडे बघून माझ्या पापण्या जेव्हा दिलखेचकपणे उघडमिट उघडमिट केल्या तेव्हा मात्र त्याच्या ओठावर एक हलके स्मित झळकले. माझ्या गालावर त्याने हलकेच हात फिरवला. माझ्यातर काळजाचा ठोकाच चुकला. आंखोही आंखोमें इशारा हो गया – आणि मी सरळ त्याच्याबरोबरच बारमधून निघाले आणि त्याच्या घरीच move in झाले.
सुरुवातीला काही दिवस तो एलिझाबेथच्याच आठवणीत होता – मला जाणवत होतं. ती सुंदर असेलही पण तिचा फर कोट duplicate होता. मी श्रीमंत नसेनही पण माझ्या आईने माझ्यासाठी दिलेला अस्सल golden fur coat होता. माझं त्याच्या घरी असणं त्याला आता अंगवळणी पडू लागलं and soon even the memories of Elizabeth were history.
दर सकाळी तो माझ्यासाठी दूध आणि त्याचा बेड टी घेऊन यायचा आणि आमची सकाळ सुरू व्हायची. मला फारसं धड जेवण बनवता यायचं नाही पण रॉजरनेही तसा कधी आग्रह धरला नाही. मला मासे आवडतात म्हणून तोही आता मासे खाऊ लागला होता. आठवड्यातून एक दोनदा तरी आम्ही “जिन and टॉनिक” मध्ये जायचो. मला रॉजरबरोबर पाहून तिथल्या barmaids च्या डोळ्यातील असूया मला स्पष्ट दिसायची. “एलिझाबेथ गेली आणि हिने तिची जागा पटकावली. काय पाहिलं यानं तिच्यात कोण जाणे! ” मुद्दामहून मला ऐकू येईल अशा comments मारल्या जायच्या. मीही तितकीच रॉजरला बिलगायचे आणि तोही सगळ्यांदेखत मला जवळ घ्यायचा – कुरवाळायचा. दुनिया जले तो जले!
रॉजरने कधी मला माझ्या भूतकाळाविषयी विचारलं नाही आणि मीही स्वत:हून काही सांगितलं नाही. तो त्याच्या रुटीननुसार ऑफिसला जायचा आणि मग माझंच घरात साम्राज्य असे. तो निघेपर्यंत मी जरी पलंगावर लोळत पडले तरी त्याची तक्रार नसे.
आरशासमोर बसून आपली छबी न्याहाळत बसणे हा माझा आवडता timepass होता त्यात तासन तास कसे जायचे हेही मला कळायचे नाही. त्याची यायची वेळ होइपर्यंत मी छान तयार होऊन दारातच त्याच्या स्वागताला तयार असायचे. त्याच्याभोवती रुंजी घालायचे, आळोखे पिळोखे देत लाडिकपणे त्याच्या मांडीवर बसायचे – त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर – ” मी ” असं अगदी बेधडक सांगावसं वाटायचं. सगळं कसं अगदी छान चाललं होतं.
नाही म्हणायला गेले काही दिवस शेजारच्या बंगल्याच्या छतावरून एक काळुंद्रा बोका माझ्याकडे सारखा रोखून बघतोय असं मला जाणवतंय. रॉजर आधीच्या माझ्या बॉयफ्रेंडबद्दल तर त्याला माहित नसेल ना? बिन लग्नाची माझी pregnancy आणि माझ्या जुळ्या मुली – यांच्याबद्दल तर त्याला कळलं नसेल नाही ना? मला रॉजरला गमवायचं नव्हतं.
आज तर रॉजर कामावरून येतानाच त्या काळुंद्र्याने रॉजरला गाठलं, त्याच्या पायात पायात करून माझ्या चहाड्या करायचा प्रयत्न केला पण रॉजरने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. मी जशी आहे तशी त्याला आवडत होते, त्याला माझ्या भूतकाळाविषयी interest नव्हता. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू.
तो दार उघडून आत येताच मी त्याला सामोरी गेले. नेहमीप्रमाणे त्याने माझ्यासाठी बशीत दूध ओतले. मी त्याच्याकडे रोखून पाहिले, त्याच्याबरोबर टेबलावर पहिल्यांदा बसले तेव्हासारखी डोळ्यांची उघडमिट उघडमिट केली, जीभेने लपालपा दूध पिऊ लागले, माझी सोनेरी शेपुट फेंदारून मी – त्याची लाडकी मनीमाऊ – त्याच्याकडे एकटक पाहत होते.
आम्ही मांजरी फक्त रागवलो कीच शेपुट फेंदारतो असा एक सर्वत्र मोठा गैरसमज आहे! We are friends – Just Good Friends!
मूल इंग्लिश लेखक : जेफ्री आर्चर
स्वैर अनुवाद : डॉ. मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माणुसकीचा धर्म आणि देवधर्म..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“माणुसकीचा धर्म म्हणजेच देव धर्म का?? “
सध्या पुण्यात वारीमय वातावरण. किती वाट बघतो या दिवसांची. या भव्य दिव्य उत्सवाची. महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा. पंधरा दिवस चालणारा हा उत्सव. लोकांचे थवेच्या थवे पंढरपूर मार्गी चालताना दिसतात. पालखी प्रस्थान सोहळा बघण्यासारखा असतो. जागोजागी त्यांचे स्वागत, त्यांची व्यवस्था बघणारे सेवेकरी सज्ज असतात. ‘फूल नाही फूलाची पाकळी’ समजून, आपली सेवा म्हणून, लोक श्रध्दाभावाने साधारण जनमाणूस हे सर्व करतो. स्वतः ला धन्य समजतो. मी वारी करू शकत नाही. तेंव्हा जेवढं जमेल तेवढं करावे, अशा विचाराने मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा.
पंढरपूर वारी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण. विठ्ठलाचा नामगजर, माऊली माऊली चा उदघोष आसमंतात दुमदुमतो. ही वेळ म्हणजे जणू काही वातावरणाचे शुध्दीकरणच चालू आहे असे वाटते. एक वेगळीच उर्जा अनुभवायला मिळते. बातम्या वर्तमानपत्रात अनेक माहिती, घटना ऐकून, प्रमूख पाहुण्यांचे विचार वाचून / ऐकून आपल्याही विचारांत परिवर्तन नकळत होते. नकळत हात जोडले जातात. थोड्या प्रमाणात का होईना घर गृहस्थीतून बाहेर पडून मनात वेगळे विचार येतात. वारी ला जाता आलं नाही म्हणून लोकांची तगमग बघून त्यांच्या श्रद्धेचा अंदाज येतो.
माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे रोज मी अनेकदा आभारही मानते. मला खूप साग्रसंगीत पूजा करता येत नाही. म्हणजे अगदी साधी रामरक्षा म्हणताना सुद्धा माझे लक्ष इथे तिथे जाते. त्या पाच मिनिटांत पाचशे विचार मनात येतात. मला नेहमी वाटतं जर भक्तांची देवासमोर लाइन लावली तर माझा नंबर कुठे लागेल बरं?? बहुतेक सगळ्यात शेवटचे स्थान मिळेल का मला??
मी वारी करू शकत नाही हे मला चांगले माहीत आहे. माझी शारीरिक शक्ती कमी झाली आहे. किंवा भक्तित तेवढी शक्ति नसावी. मला जमणार नाही असे मात्र वाटते. आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे देवधर्म करावा. असे मी खूपदा ऐकलंय. वाचलंय. मी माझ्या करिता हाच नियम पाळते.
माझ्या आजीचे एक वाक्य माझ्या मनावर बिंबलेले आहे, ते म्हणजे, आजी म्हणायची,
“मी माणुसकी चा धर्म पाळते. ” तो धर्म मी लक्षपूर्वक, विचार पूर्वक पाळू शकते. माझ्या सहवासात येणाऱ्या लोकांशी चांगले वागायचे. जमेल तेवढी मदत करायची. हेच माझं आयुष्यातील ध्येय मी ठरवून टाकले आहे. मलाही आजीचे हे विचार, म्हणणे पटले.
खरच लक्ष देऊन बघीतल तर माझ्या आजूबाजूला खूप माऊली दिसतात. पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. पण माझ्या आजूबाजूला बऱ्याच माऊलींचे दर्शन मला रोज घडते. मला रोज दूधाचे पॅकेट घरपोच देणारा ‘अजिंक्य’, मला घर कामात मदत करणारी ‘साक्षी ‘, ‘मंदाताई ‘, माझ्या घरचा कचरा घ्यायला येणाऱ्या ‘मावशी ‘. रोज न चूकता आपले काम व्यवस्थित पार पाडतात. सर्वांनी कोरोनाच्या कळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून आमची सेवा केली. मला या नेहमी म्हणायच्या “काकू स्वतः ला जपा. बाहेर निघू नका. काळजी घ्या. “
नाइलाजाने काम करायला घरा बाहेर निघणाऱ्या या माऊली, स्वतः रोज रिस्क घेऊन बाहेर पडतात, तरीही दुसऱ्यांचा विचार करतात. दुसऱ्यांची काळजी घेतात. देवाच्या रूपात असणाऱ्या या माऊलीचे मला रोज दर्शन होते. फक्त पंढरपूर वारी काळातच नाही तर नेहमीच या सर्व माऊली, माझे सख्खे शेजारी माझ्या आजूबाजूला आहेत. हे सर्व माझ्या extended family चेच मेंबर्स आहेत..
देवाला बघीतले नाही. पण देवाचे representative बरेच दिसतात. कोरोना काळात तर माणसातल्या देवाचे दर्शन झाले. जिव्हाळ्याचे ॠणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं नाही. माझे व यांचे पूर्व जन्मीचे काही तरी संबंध नक्कीच असावेत. आपणही नेहमी त्यांच्या समाधानाचा हिस्सा असावं. समस्याचां नाही. त्यांच्या बद्दल आदर असावा.
ही माझ्या’ contact ‘मधे असणारी सर्व मंडळी माझ्या ‘connection’ मधे पण आहे. जीवाभावाचे नाते आहे आमचे. माझा त्यांच्या शी संपर्क आहे, संवाद आहे. आम्ही एकमेकांना समजतो. जाणतो.
हा माणुसकीचा धर्म पाळला तर देवधर्म झाला का??
आपल्या आजूबाजूला समाधान, आनंदी वातावरण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा एक चांगला संसर्गजन्य रोग आहे जेवढा पसरेल तेवढा चांगला.
“We rise by lifting others “.
म्हणतात ना,
“मधूर संबंध ज्ञान और पैसे सेभी बड़ा होता है।जब ज्ञान और पैसा विफल हो जाता है, तब मधूर संबंध से स्थिति संभाली जा सकती हैं ।”
☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
– – – घटना जंगलामधले कोर्ट.
ही घटना एका जंगलामधली आणि सिंह या राजाच्या दरबारामधली आहे.
फार पूर्वी जेव्हा राजे आणि राजवटी हा प्रकार होता तेव्हा कोर्ट कचेरी हा प्रकार नव्हता. भांडण तंटे, तक्रारी या राज दरबारात राजासमोर पेश केल्या जायच्या, आणि निर्णय राजा देत असे. आणि तो अंतिम असे.
हळूहळू राजवटी संपल्या आणि लोकशाही अस्तित्वात आली. आणि या बदलामध्ये कोर्ट कचेऱ्यांचा जन्म झाला. आणि तक्रारी न्याय मिळवण्याकरता कोर्टात जायला लागल्या.
जंगलांमध्ये मात्र अजूनही राजे आणि राजवट हा प्रकार सुरू आहे. प्राण्यांचे पण आपापसात भांडण तंटे असतात, काही तक्रारी असतात, अशा सगळ्या गोष्टी राज दरबारात सिंह या राजापुढे पेश केल्या जातात. आणि सिंह राजाचा निर्णय अंतिम समजला जातो.
आता जंगला मधली एक घटना आणि निर्णय बघूया —
एका घनदाट आणि खूप दूरवर पसरलेल्या जंगलामधली ही घटना आहे. जंगलामध्ये सगळेच पशु – प्राणी – पक्षी खेळीमेळीनी रहात होते. सिंहाला जंगलामध्ये नेहेमीच राजाचा मान असतो. पशु – पक्षी – प्राणी यांच्यामधे कधी भांडण तंट्याचा प्रसंग उद्भवला, तर त्याचा न्याय निवाडा सिंहाच्या दरबारामध्ये होत असे.
एक दिवस जंगलामधे फेरफटका मारत असतांना एका वाघाची भेट गाढवाशी झाली. गाढव एका गवत असलेल्या मोकळ्या जागेवर पाय मोकळे करत हिंडत होते. एकमेकांना हाय – हॅलो – नमस्कार करून झाले. काय म्हणताय? तब्येत कशी आहे? पाऊस पाणी, अजून काय नवीन? वगैरे गप्पा झाल्या.
गाढव : मी मुद्दामच गवतावर फेऱ्या मारतो आहे. गवतावर पायताण न घालता चालल्यामुळे ब्लड प्रेशर चा त्रास होत नाही, असे जवळच्या गावात माणसे बोलतांना मागे ऐकले होते. तेव्हापासून मी रोजच फिरत असताना जिथे कुठे गवत दिसेल तिथे गवतावर छान फेऱ्या मारतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कायम १२०/८० असते. इथे छान गवत दिसले म्हणून गवतावर फेऱ्या मारतोय. इथे उन्ह पण छान आहे, त्यामुळे अनायसे डी व्हिटॅमिन पण मिळतंय.
वाघ : वा, छानच आहे
गाढव : निळंशार गवत बघतांना डोळ्यांना पण छान वाटतंय. तुम्हाला पण छान वाटत असेल ना!
वाघ : छान नक्कीच वाटतंय, पण गाढवदादा गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे.
गाढव : दादा, गवताचा रंग निळा आहे.
गवताचा रंग निळा आहे, का हिरवा आहे यावर दोघांची वादावादी सुरु झाली. आणि वाढत वाढत हमरा तुमरी वर गेली. कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते.
बाजूने जाणारा कोल्हा हे सगळे बघत थांबला होता. कोल्ह्याने दोघांना हात करून शांत व्हायला सांगितले.
कोल्हा : अशी वादावादी करून दोघांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यात आणि तुमचे मैत्री सबंध खराब करण्यात काही पॉईंट नाही. माझ्याबरोबर आपले राजे सिंह यांच्याकडे जाऊन त्यांनाच आपण विचारू, कि, गवताचा रंग निळा आहे का हिरवा आहे. ते जो निर्णय देतील तो दोघेही मान्य करा.
तिघेही सिंहाकडे गेले. सिंहानी सगळ्यां प्राण्यांची सभा बोलावली. सगळे प्राणी जमले.
सिंह (दोघांना उद्देशून) : तुम्ही दोघं तुमचे म्हणणे अगदी थोडक्यात सांगा…
वाघ : युवर ऑनर, गवताचा रंग हिरवा असतो असे माझे म्हणणे आहे.
गाढव : युवर ऑनर, मीवाघोबा दादांना सांगतोय कि गवताचा रंग निळा असतो, इथे पण सगळीकडे छान गवत उगवले आहे आणि निळ्या रंगाचे आहे. महाराज, आता आपणच निर्णय द्यावा.
सिंह : मी दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आहेत. गाढवाचे म्हणणे बरोबर आहे, असा मी निर्णय देत आहे. आणि वाघाला छोटी शिक्षा फर्मावत आहे.
सर्व प्राण्यांनी आपापल्या आवाजात टाळ्या वाजवून गाढवाचे कौतुक केले. सभा इथे संपली.
आपल्या बाजूनी निर्णय लागला हे ऐकून गाढव खुश झाले आणि मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, असे म्हणत, हुंदडत तिथून आनंदात पसार झाले.
सगळे गेल्यानंतर ….
वाघ (सिंहाला) : महाराज गवत हिरवे असते, तरी तुम्ही मला खोटे का ठरवले? आणि मला शिक्षा का दिली?
सिंह : गवत हिरवे असते, हे मला पण माहित आहे. आणि आपल्या राज्यामधल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक लक्षात घे, राज्यामधल्या आम जनतेला खुश ठेवण्याकरता कधी कधी असे निर्णय राजाला घ्यावेच लागतात. गाढवासारख्या आम जनतेला नेहेमीच खुश ठेवावे लागते. थोडंसं चुचकारले कि ते खुश असतात, त्यांना अक्कल नसते हे तुला पण समजते.
वाघ : महाराज, तुमचे हे म्हणणे मला पूर्णपणे पटले. पण मग मला शिक्षा कशाकरता?
सिंह : वादविवाद हे नेहेमी आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबर करायचे असतात. हे तुला पटतंय कां?
वाघ : पटतंय कां म्हणजे काय, शंभर टक्के पटतंय. तुम्हीच मागे मला हे समजावून सांगितले होते.
सिंह : गाढवाची आणि तुझी आकलन शक्तीची लेव्हल एक आहे कां?
वाघ : महाराज, हा काय प्रश्न झाला कां? आपण त्यांना गाढव म्हणतो यातच उत्तर दडलेले आहे.
सिंह : तुला शिक्षा का केली हे तुला आता समजले असेलच. आता लक्षात ठेव, वादविवाद हे नेहेमी आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबर करायचे असतात.
वाघानी दोन मिनिटे कान धरून उभे राहण्याची शिक्षा पूर्ण केली, सिंहाला वाकून नमस्कार केला आणि उड्या मारत मारत आपला मार्ग धरला.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
गीतांजलीतील मृत्यूची परिकल्पना…
गीतांजलीतील बहुसंख्य कवितांमध्ये मृत्यूचा उल्लेख या ना त्या प्रकारे आलेला दिसतो. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन शक्यता आढळतात.
पहिली शक्यता ही की, रविंद्रनाथांनी त्यांच्या तरुणपणीच, त्यांच्या अगदी जवळच्या, प्रिय व्यक्तींचे मृत्यू फार जवळून पाहिले किंवा अनुभवले म्हटलं तरी चालेल. ते फक्त १३ वर्षांचे असताना त्यांचं मातृछत्र हरपले. नंतर ते २२ वर्षांचे असताना त्यांची जिवलग मैत्रीण, त्यांचे प्रेरणास्थान असलेली, त्यांच्या साहित्याची प्रथम वाचक, श्रोता व टीकाकार असलेली त्यांची समवयस्क वहिनी, कादंबरी देवींचा अनपेक्षित व अनैसर्गिक मृत्यू रविंद्रनाथांना उध्वस्त करून गेला.
यानंतर तर काळाची वक्रदृष्टीच त्यांच्या कुटुंबावर पडली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची पत्नी मृणालिनी देवी ऐन तारुण्यात, पाच मुले मागे सोडून, १९०२ साली त्यांना एकटं करून गेल्या. या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच फक्त ९ महिन्यांच्या अंतरालानंतर, त्यांची मुलगी रेणुका टी बी च्या संसर्गामुळे अवघ्या १३ व्या वर्षी मृत्यू पावली. त्यानंतर एक वर्षाच्या आतच रविंद्रनाथांच्या वडिलांचा मृत्यू (१९०५) झाला. त्यांचा धाकटा मुलगा समींद्रनाथ ११ वर्षांचा असताना कॉलरा होऊन देवाघरी गेला (१९०७). पाठोपाठ सतीशचंद्र नावाचा त्यांचा तरूण, बुद्धिमान सहकारी, जो कलकत्त्यातील आपलं सगळं वैभव सोडून शांतिनिकेतनाच्या कार्यात रविंद्रनाथांना मदत करण्यासाठी आला होता तो अचानक वारला. अशा प्रकारे १९०२ ते १९०८ या सहा वर्षांत त्यांनी पाच जवळच्या व्यक्तींना गमावलं. यानंतर १९२३ साली बंधू सत्येंद्रनाथ व १९२५ ला बंधू ज्योतिरिंद्रनाथ स्वर्गवासी झाले.
रविंद्रनाथांना मृत्यूविषयी वाटणारा जिव्हाळा, जो त्यांच्या गीतांजलीतील कवितांमधून जाणवतो त्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे त्यांचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास! या अभ्यासामुळे आत्मा अमर आहे व एक शरीर नष्ट झालं तरी दुसरं शरीर धारण करून तो पृथ्वीवर येतच असतो; या जन्ममृत्यूच्या चक्रावर त्यांचा दृढ विश्वास होता व म्हणूनच या चक्राचा उल्लेख अगदी पहिल्याच कविते पासून गीतांजलीत वारंवार आलेला दिसतो.
त्यांच्यातला कवी मृत्यूला कधी घाबरत नाही किंवा टाळण्याची इच्छाही व्यक्त करत नाही, उलट तो मृत्यूचं स्वागत करताना दिसतो.
ते म्हणतात, मृत्यूला का भ्यायचं? मरण म्हणजे दोन जन्मांमधली फक्त छोटीशी विश्रांतीच तर आहे.
आपण जन्म घेऊन जसे या जगात आलो, तसेच मृत्यू नंतर दुसऱ्या जगात प्रवेश करणार असतो. ते जग आपल्याला अनोळखी असतं म्हणून भीती वाटते म्हणावं तर जन्माआधी आपल्याला हे जग तरी कुठे माहीत होतं!
ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण जन्मभर तळमळतो, मृत्यूनंतर त्याचा चिरंतन सहवास आपल्याला मिळू शकतो, त्याच्याशी एकरूप होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. या मर्त्य जगातून त्याच्या अमर्त्य जगात आपल्याला प्रवेश मिळतो. या सगळ्याचा टागोरांना अतिशय आनंद होतो. पतीगृही निघालेल्या नव्या नवरी प्रमाणे त्यांना त्या अमर्त्य जगाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तिकडे जाण्याबद्दल आतुरता आहे.
तरूण वयातच मृत्यूच्या तांडवामुळे भावविश्वाच्या चिंध्या झाल्यानंतर, रविंद्रनाथांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली, पण मृत्यूच्या या अनुभवानेच त्यांना मृत्यू विषयी विचार करायला भाग पाडले असणार आणि मग त्यांचा मृत्यू कडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलला असावा. प्रियजनांच्या कायमच्या वियोगामुळं, त्यांचं लौकिक गोष्टीत गुंतलेलं मन मुक्त झालं आणि त्यांना पटलं की मृत्यूच्या चष्म्यातून जीवनाकडं बघायला हवं तरच जीवनाचं सत्य लक्षात
येईल.
—–
☆ गीत : ९४ ☆
AT this time of my parting, wish me good luck, my friends! The sky is flushed with the
dawn and my path lies beautiful.
Ask not what I have with me to take there. I start on my journey with empty hands and
expectant heart.
I shall put on my wedding garland. Mine is not the red-brown dress of the traveller, and though there are dangers on the way I have no fear in my mind.
The evening star will come out when my voyage is done and the plaintive notes of the
twilight melodies be struck up from the King’s gateway.
पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. “तळणं, भाजणं आणि उकडणं..” या एकाच पावसाच्या तीन रूपांतरामागे लपलेलं आहे – आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ?
१) आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा. आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात “तळलेलं” खाणं हा अफलातून उपाय आहे !
विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी “औषध” बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !
म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.
शिवाय पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा Instant Romantic अंतर्बाह्य “आषाढ डायट” जगात शोधूनही सापडणार नाही !
२) श्रावण म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयवांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचं, म्हणून श्रावणात “भाजलेलं” खाणं सर्वोत्तम आहे.
आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.
आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी…” असं म्हटलेलं आहे.
३) भाद्रपद म्हणजे परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).
हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही क्षुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.
अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी भाद्रपदात “उकडलेलं” खाणं अगदी योग्य आहे.
जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.
कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?
☆
लेखक:डॉ. शिवानंद बासरे
प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “होर्मुझचे महायुद्ध” – लेखक : श्री विजय लोणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : होर्मुझचे महायुद्ध
लेखक: विजय लोणकर
पृष्ठ: १९२
मूल्य २९५₹
इतिहासाच्या पानांवर नजर टाकली, तर एक सत्य ठळकपणे जाणवते ते म्हणजे, जगातील प्रत्येक मोठ्या युद्धाच्या मुळाशी केवळ भूमी, धर्म वा विचारधारा नसते, तर त्या युद्धाची खरी नाळ असते ती संसाधनांच्या, विशेषता ऊर्जेच्या नियंत्रणाशी हॉर्मुझची सामुद्रधुनी हे त्याचे आजचे जिवंत उदाहरण आहे. जगातील एक तृतीयांश खनिज तेल याच अरुंद जलमार्गातून वाहते, या एका भौगोलिक बिंदूवर जो वर्चस्व गाजवतो, तो जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास नियंत्रित करतो; हे कटू, पण अटक वास्तव आहे.
हॉर्मुझच्या अरुंद जलपट्टीत त्याच एका कारणाने आज एक ऐतिहासिक वादळ घोंघावत आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ची गर्जना, दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची अस्तित्वाची लढाई आणि मध्यभागी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा ‘इस्लामी क्रांती’चा अखंड निर्धार, तसेच आता इराणच्या सर्वोच्च नेतेपदी असलेले अली खामेनी यांचे पुत्र मोजताबा अली खामेनी या तीन व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षामध्ये जगाचा नकाशाच बदलण्याची क्षमता आहे.
थोडक्यात सांगायचे तर, या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची आक्रमक आणि सुरक्षिततेकडे झुकणारी भूमिका, त्यांची अनिश्चित पण ठाम धोरणात्मक भाषा आणि यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान, हेही तितकेच महत्वाचे आहे. या तिघांच्या विचारसरणीने (खामेनी आज नसले तरी त्यांच्या मार्गाने जाणारा इराण) आणि या तिघांच्या निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे, हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.
याच अभूतपूर्व संघर्षाचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणाऱ्या विजय लोणकर यांच्या ‘होर्मुझचे महायुद्ध’ या पुस्तकात केले आहे.
या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. इतिहास हा केवळ घटनांनी नाही, तर निर्णय घेणाऱ्या माणसांनी घडतो आणि या संघर्षात तीन व्यक्तिमत्त्वे सर्वाधिक निर्णायक ठरली आहेत : डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतान्याहू आणि अली खामेनी.
अमेरिकेचे माजी आणि पुन्हा सत्तेत आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका या संघर्षात अत्यंत गुंतागुंतीची आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या तत्त्वज्ञानाने चालणारे ट्रम्प एकीकडे युद्धाचे समर्थन करतात, तर दुसरीकडे ‘मी युद्ध संपवणारा माणूस आहे’ असा दावाही करतात. त्यांची धोरणात्मक भाषा अनिश्चित असली, तरी ठाम असते. इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादणे, इराणच्या लष्करी नेतृत्वाला थेट लक्ष्य करणे आणि त्याच वेळी वाटाघाटींचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आव आणणे; हे ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची अनिश्चितताच त्यांचे सर्वांत मोठे धोरणात्मक अस्त्र बनते; कारण शत्रूला पुढचे पाऊल कळत नाही. इराणशी थेट युद्ध नको, पण इराणला सतत कमकुवत ठेवायचे: हीच ट्रम्प यांची रणनीती आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका या संघर्षात सर्वाधिक आक्रमक कारवाया करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. इराणच्या अणुतज्ज्ञांच्या हत्या, इराणच्या संगणक प्रणालींवर सायबर हल्ले, गाझा आणि लेबनॉनमधील हिझबुल्लांविरुद्ध एकाच वेळी लढत इराणला उत्तर देणे; हे सर्व नेतान्याहू यांच्या दीर्घकालीन रणनीतीचे भाग आहेत. ते युद्धाला केवळ लष्करी समस्या मानत नाहीत, तर ते अस्तित्वाचे एक संकट मानतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक सवलत म्हणजे इस्रायलच्या भविष्याशी केलेली तडजोड आहे, म्हणूनच ते अनेकदा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विरोधातही आपला मार्ग धरतात.
अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते. त्यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान या संघर्षाला एक वेगळेच परिमाण देते. खामेनी यांनी चार दशकांहून अधिक काळ अमेरिका आणि इस्रायल यांच्या दबावाखाली इराणला टिकवले आहे. त्यांची रणनीती थेट टकरावाची नाही, तर ती ‘हळूहळू थकवण्याची’ आहे. प्रॉक्सी गट, हिझबुल्ला, हमास, हुती हे सर्व खामेनी यांच्या दीर्घकालीन प्रतिकाराचे विस्तारित हात आहेत. अत्यंत कमी खर्चातील ड्रोनने महागड्या अमेरिकन संरक्षण प्रणालींना थकवणे, होर्मुझची सामुद्रधुनी कधीही बंद करण्याची धमकी जिवंत ठेवणे आणि अण्वस्त्र कार्यक्रम हे अंतिम संरक्षणकवच म्हणून जपणे; ही इराणची तीन मुख्य अस्त्रे होती आणि आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्यानंतरही इराण कडवी लढत देत आहे. इराणला याची जाणीव आहे की, अमेरिका आणि इस्रायल यांना इराणचे पूर्ण पतन परवडणारे नाही; कारण त्यानंतर येणारी अस्थिरता त्यांच्यासाठीही घातक ठरेल. हीच जाणीव खामेनी यांना दशकांनंतरही प्रतिकार करण्याची ताकद देते.
या तिघांच्या विचारसरणी आणि निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈