मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे

वादळांना दिशा नसते; जहाजांना असावी लागते

 मनाच्या सागरात ध्येयाचा दीपस्तंभ उभा राहिला की नकारात्मक विचारांचे धुके विरायला लागते.

 मानवी इतिहासातील प्रत्येक महान प्रवासाचा आरंभ एका दिशेपासून झाला आहे. “

 समुद्राला वादळांची भीती नसते.

वादळं त्याच्या स्वभावात असतात.

प्रत्येक वादळानंतर काही जहाजं किनाऱ्यावर पोहोचतात आणि काही समुद्रात हरवून जातात.

 भेद लाटांमध्ये नसतो.

जहाजांच्या डोळ्यांत असतो.

ज्यांच्या दृष्टीपुढे दीपस्तंभ असतो, ती जहाजं धुक्यातही मार्ग शोधतात.

ज्यांच्या दृष्टीपुढे निश्चित दिशा नसते, ती शांत पाण्यातही भरकटतात.

 मनाचंही असंच असतं.

भूतकाळाची खंत,

भविष्याची भीती,

 स्वतःबद्दलच संशय,

 “माझ्याकडून काही होणार नाही… “

“माझी वेळ निघून गेली… “

“लोक काय म्हणतील?”

 

हे असले विचार नवीन नाहीत. मानवजातीइतकेच पुराण आहेत.

पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे—ते रिक्त मनातच सर्वाधिक वाढतात.

रिकाम्या घरात प्रतिध्वनी अधिक ऐकू येतात.

रिकाम्या बंदरात वाऱ्यांचा ध्वनी मोठा वाटतो आणि रिकाम्या मनात शंका सत्यासारख्या वाटू लागतात !

 

 मानसशास्त्र सांगतं— मनाला जर अर्थपूर्ण दिशा मिळाली नाही, तर ते स्वतःच चिंता निर्माण करू लागतं.

 नकारात्मक विचारांचा सर्वात मोठा शत्रू सकारात्मक विचार नसतो, तो असतो—अर्थपूर्ण कृती.

संत तुकारामांचा अभंग आजही काळाच्या पल्याडून ऐकू येतो—”मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ”

ही ओळ आनंदाचा उपदेश नाही,

 ही ओळ दिशेचा उपदेश आहे –

 

प्रसन्न मन म्हणजे दुःख नसलेलं मन नव्हे; प्रसन्न मन म्हणजे दुःखापेक्षा मोठं ध्येय सापडलेलं मन !

 काळ्या पाण्याची शिक्षा.

समोर अथांग जलधी.

भोवती अभेद्य भिंती.

हाता – पायात निर्दय शृंखला.

जगाशी संबंध तुटलेला.

पण त्या अंधाऱ्या बंदिगृहातही एक गोष्ट जिवंत होती—स्वातंत्र्याचं ध्येय.

 

ज्यांनी सागराला स्वातंत्र्याची शपथ घेतली, त्यांना समुद्राच्या मधोमध उभारलेल्या कारागृहाने कसं रोखलं असतं?

 साखळदंडांनी केवळ हात जखडले, विचार नाही.

भिंतींनी शरीर अडवलं, क्षितिज नाही.

ज्यांच्या मनात ध्येयाचे स्थंडिल धगधगत असते त्यांना परिस्थिती हरवत नाही; ती केवळ त्यांची परीक्षा घेते.

 

एक राजपुत्र राजवाडा सोडून निघाला.

एका कृश वकिलाने ‘सूर्य कधीही न मावळणाऱ्या’ साम्राज्याच्या डोळ्यात डोळे घातले.

एका बहिष्कृत मुलाने शिक्षणाच्या बळावर इतिहासाला नवा अर्थ दिला.

एका मासेमाऱ्याच्या गावात वाढलेल्या मुलाने आकाशाला स्पर्श करण्याचं धाडस केलं.

 

इतिहासातली मोठी माणसं मोठ्या परिस्थितीत जन्माला आली म्हणून मोठी झाली नाहीत. ती मोठी झाली कारण त्यांच्याकडे स्वतःपेक्षा मोठं ध्येय होतं.

 ध्येय म्हणजे केवळ ‘करिअर’ नाही.

 ध्येय म्हणजे सकाळी उठण्याचं कारण, रात्री झोपण्यापूर्वीची शांतता.

ध्येय म्हणजे पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याचं मनोबल आणि उद्याच्या दिशेने टाकलेलं आजचं पाऊल.

ध्येय म्हणजे अंतिम गंतव्य नाही.

ध्येय म्हणजे प्रवासाला मिळालेला उत्तरतारा.

 तो वादळं थांबवत नाही, पण तो भरकटूही देत नाही.

 

नकारात्मक विचारांना हरवायचं असेल तर त्यांच्याशी झुंज देण्यात अर्थ नाही.

अंधाराशी भांडून का कधी प्रकाश निर्माण होतो ?

तिथे दिवाच लावावा लागतो !

 

 तुमचं ध्येय लिहून ठेवा.

त्याचे लघु लघु भाग करा.

प्रत्यही एक पाऊल टाका.

प्रत्येक भीतीला विचारा—”तू सत्य आहेस, की केवळ माझी कल्पना?”

 

मनाला जर काम दिलं नाही, तर ते झालेले व्रण मोजत बसतं.

मनाला दिशा दिली नाही, तर ते भीतीचे नकाशे काढत राहतं. मनाला ध्येय दिलं नाही, तर ते शंकांची शेती करू लागतं.

 

 समर्थ रामदासांच्या अश्वासक वचननांचा ध्वनी आजही कानी निनादतो —”केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे. ”

त्याच वेळी जीवन कुठेतरी हळूच गुणगुणत राहतं—”रुक जाना नहीं… “

 

जीवनात पराभव नसतात, असतात केवळ दोन प्रकारचे प्रवासी—एक ते, जे चक्रावून वादळांकडे पाहतात, आणि दुसरे ते, जे एकटक दीपस्तंभाकडे पाहतात.

 अखेर माणूस जगतो तो केवळ श्वासांवर नाही…

तो जगतो एखाद्या अपूर्ण स्वप्ना च्या पूर्ततेसाठी,

 एखाद्या अजून न गाठलेल्या क्षितिजासाठी,

 एखाद्या अजून न लिहिलेल्या इतिहासासाठी.

 

 ज्या दिवशी माणसाला स्वतःपेक्षा मोठं असं एखादं ध्येय सापडतं, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील सगळे प्रश्न सुटतात असं नाही,

वादळं थांबतात असं नाही,

धुकं विरत असही नाही,

 पण त्याला प्रश्नांपेक्षा मोठा मार्ग सापडतो !

 

अनेकदा—मार्ग सापडणं हे उत्तर सापडण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं.

 म्हणून मनात वादळ उठलं, तर वाऱ्यांना दोष देऊ नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा—”माझ्या समुद्रात दीपस्तंभ आहे का?” कारण…

वादळांना दिशा नसते, जहाजांना असावी लागते!

 वादळं येतील.

धुकं दाटेल.

लाटा आदळतील.

पण जर दीपस्तंभ जळत असेल,

तर जहाजं हरवत नाहीत.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कृतार्थ…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ कृतार्थ… ☆ प्रा. भरत खैरकर 

 सेवानिवृत्त कमांडर विश्वास त्यांच्या बुलढाण्याच्या आलिशान आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या बंगल्यावर निवांत आरामखुर्चीत बसलेले होते. एकंदर २६ गुंठ्यामध्ये असलेला तो भव्यदिव्य बंगला.. आज जवळपास साडेपाच कोटी रुपये किमतीचा आहे. शहरांमध्ये त्यांना मान आहे.. सामाजिक कार्य आणि सिंबोयसिस क्लबच्या माध्यमातून त्यांनी शहरातील जेष्ठ आणि सुशिक्षित व्यक्तींचा गोतावळा आपल्याभोवती जमा केलेला आहे.. त्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, नामांकित डॉक्टर, वकील, समाजसेवक, इत्यादींचा समावेश आहे. हा क्लब नेहमी नावीन्यपूर्ण गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेतो.. त्यांच्याशी परिचित होतो.. ह्या सर्वांमध्ये कमांडर विश्वासचा खूप मोठा वाटा आहे.. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे.. आणि नौदलाचा अनुभव तर विचारायलाच नको.. एकापेक्षा एक मजेदार किस्से त्यांच्याकडे आहेत.. त्यामुळे सहजच कुणीही व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षिली जाते..

 आपल्या कृतार्थ जगण्यामागे त्याच्या माध्यमिक शाळेचा जास्त प्रभाव असल्याचे ते सांगतात.. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम आणि विदर्भात पाचवा नंबर आलेल्या विश्वासला चिखलदरा येथील सरकारी पब्लिक स्कूलमध्ये वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला होता.. विश्वासचे वडील शिक्षक असल्याने चौथीपर्यंतचे त्याचे शिक्षण तसे घरीच झाले होते.. बाबांनी त्याचे नाव चौथ्या वर्गातच नोंदविले होते. विश्वास आधीपासूनच चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता.. वस्तिगृहात थोडा उशिरा प्रवेश झाल्याने पंधरा-वीस दिवसाचा अभ्यास बुडाला होता.. तो होमवर्क बाकी असल्याने.. जुनी मुले आकसापोटी त्याला कुठलीही वही, बुक देत नव्हते.. शिवाय शाळेमध्ये जिल्ह्याचे कलेक्टर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी.. नव्याने आलेल्या विश्वासची निवड प्राचार्यांनी केली होती.. ह्या गोष्टीचा रागही इतर मुलांमध्ये होता.. स्वागत करणाऱ्या मुलाला फुलपॅंट असावी म्हणून.. खुद्द प्राचार्यांनी आपल्या मुलाची फुलपॅन्ट विश्वासला दिली होती.. त्यामुळे तर इतर मुलांचा अधिकच जळफळाट झाला होता. त्या कार्यक्रमात “अध्यक्ष महाराज… ” अशी विश्वासने भाषणाची सुरुवात केली होती.. तेव्हापासून सर्व मुले त्याला “अध्यक्ष महाराज” म्हणूनच चिडवायची..

 काही दिवसानंतर गॅदरिंग झालं. त्यामध्ये “जानकीबाई” नावाचा “लेडीज रोल” करायचा होता.. विश्वासने स्वतःहून ” हो” म्हटले.. नाटक झाल्यानंतर मात्र सर्वांनी “जानकीबाई.. जानकीबाई.. ” म्हणून विश्वासला खिजवायला सुरुवात केली. मग मात्र चिडवणाऱ्या सर्वांना तो एकसाथ बडवत सुटला.. त्यामध्ये मोठ्या वर्गाची ही मुले होती!

… त्यातील एका मुलाने प्राचार्यांकडे तक्रार केली की, ” सर मला विश्वासने मारलं. “

 तर प्राचार्य म्हणाले, “तो कुठल्या वर्गाचा मुलगा आहे?”

 ” सर तो पाचवीचा मुलगा आहे. ” 

“आणि तू कुठल्या वर्गाचा आहे? “

“सर मी सातवीतला आहे!” 

“अरे तरीही तू पाचवीतल्या मुलाचा मार खाल्लास? जाऊन मार त्याला परत!” प्राचार्य सर त्याला बोलले.

 असा हा प्राचार्याच्या छत्रछायेखाली वाढलेला विश्वास जशास तसा अशा स्वभावाचा, शरीराने आणि मनाने बळकट बनला होता. तेव्हाच त्याने बारावीनंतर आपण नेव्हीमध्ये जायचे हा बेत केला होता. त्यासाठी त्याने पुणे गाठलं होतं.. नेव्हीसाठी पोहणे अत्यंत आवश्यक आहे.. म्हणून मोरवाडीजवळील टाटा मोटर्सच्या स्विमिंग पूलामध्ये त्याने रितसर पोहणे शिकून घेतले होते. तो पोहण्यामध्ये एवढा तरबेज झाला होता की एकदा तर त्याने “कोचिंग ते लक्षद्वीप” असा शिडाच्या जहाजातून प्रवास केला होता.. त्यामुळे त्याची समुद्राची भीती गायब झाली होती.

 नेव्हीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर उत्तरोत्तर प्रमोशन घेत विश्वास कमांडर या पदापर्यंत पोहोचला.. आपल्या कार्यकाळात त्याने नेव्हीमध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबविले.. विश्वास हा उत्तम कवी, लेखक, नाटककार, कलावंत, असल्याने तो सतत विविध उपक्रम नेव्हीच्या लोकांसाठी राबवत होता. त्यातून वाढलेला लोकसंग्रह आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती विश्वासला नेहमीच इतरांपासून ठळक दर्शवित होती.. विश्वासच्या ह्याच कर्तबगारिमुळे त्याला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपर्यंत नेव्हीच्या माध्यमातून पोहचता आले होते.. तरीही ह्या गोष्टीचा अभिमान आपल्या डोक्यात जाऊ न देता, विश्वासचे पाय जमिनीवरच होते.. त्यामुळे तो अधिक लाडका झाला होता..

 सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काहीतरी करावे, म्हणून “राजकारण करायचे कां?” हे विचारायला विश्वास त्यांचे आध्यात्मिक गुरु रविशंकर यांना भेटायला बेंगलोरला गेला होता. मात्र त्यांनी “तू इलेक्शनला उभा राहू नकोस?” सांगितल्यावर परत गावाला येऊन सिम्बॉयसिस क्लबची स्थापना केली होती..

 विश्वासचा मुलगा आणि सुनबाई दोघेही नेव्हीमध्ये कमांडर आहेत.. हे दोघेही विश्वासचा वारसा चालवत भारतीय नौदलाची सेवा करत आहेत.. त्याने आपला बंगला बांधला तेव्हा, त्याच्या गुरुने एक उपदेश केला होता. “देणा-याकडे भरपूर आहे. तो भरभरून देतो.. फक्त आपली पात्रता तेवढी असली पाहिजे.. जसे की समुद्रामधून तुम्ही पाणी वाटी, मग किंवा बकेट कशा पद्धतीच्या.. पात्रातून काढता त्यावर तुमचा पाणीसाठा ठरतो. मात्र समुद्राला काही फरक पडत नाही.. त्यामुळे आपण आपले पात्र वाढविले पाहिजे. मोठे केले पाहिजे. ” हे आठवून विश्वासने निवांत खुर्चीत बसून डोळे मिटून घेतले होते.. आणि समोरच्या बंगल्याकडे पाणावलेल्या डोळ्याने बघत होता.

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

गोष्ट १९९७ मधली. माऊली हडपसरच्या दुपारच्या विसाव्यावरून दिवे घाटाकडे प्रस्थान करत्या झाल्या होत्या. सकाळपासून शहरात बंद असलेली बससेवा दुपारी काही अंशी सुरु झाली होती. त्यामुळे डेक्कन जिमखान्यावरून हडपसर गाडीतळापर्यंत बस मिळाली आणि दुपारी तीन वाजता दिवे घाटाच्या रस्त्याला लागता आले.

आभाळात तुरळक ढग होते आणि ऊनही होतंच. वातावरणात उष्मा दाटला होता. दिवे घाटाकडे जाणारी वाहने अर्थातच नव्हती. काही पाण्याचे tankers मात्र पुढे जाताना दिसत होते. तसाच चालत निघालो. वाटेत तहान लागली की रस्त्यावर उभ्या असलेल्या tanker मधले पाणी प्यायलो.. जे त्यातील जंतूनाशक औषधामुळे घशाखाली लवकर उतरत नव्हते.. पण इलाज नव्हता. एकतर त्या दिवशी एकादशी असल्याने सकाळी केलेल्या थोड्याशा फराळावरच दिवस ढकलला होता. दिवे घाटाच्या ओढीने पावले झपाझप पडत होती.

मागील काही वर्षे दिंडीसोबत पुणे ते सासवड आणि पुढे पंढरीपर्यंत पायी वारी घडल्याने घाटातील सुंदर वातावरणाच्या आठवणी मनात दाटून आलेल्या होत्या. वेगाने वाट चालणारे वारकरी, दिंडीची वाहने आणि टाळ मृदुंगाचा ध्वनी अजूनही कानांत घुमत होता. घाटाचा रस्ता काहीसा एका बाजूला उताराचा असल्याने उजव्या पायावर शरीराचे वजन आपसूक जास्त येते. पुढची दिंडी थांबली की आपल्यालाही थांबावेच लागते… त्यावेळी मांडीच्या खुब्याचे हाड आपल्याशी बोलू लागलेले असते. पण तिकडे फारसे लक्ष जात नाही. घाट हिरवागार आणि माणसांच्या अंगावरील वेशाने पांढरा शुभ्र दिसत असतो. त्यात पावसाची एखादी सर येऊन गेली की तो गारवा मनात आनंदाची बरसात करीत राहतो. माऊली… माऊली करीत वारक-यांचे जत्थे पुढे पुढे धावत असतात. पुण्यापासून सासवड हा टप्पा तसा बराच मोठा आहे.

वारीत दोन प्रकारची माणसे चालत असतात. ज्यांच्या स्वत:च्या स्वतंत्र दिंड्या आहेत, त्यांची मुक्कामांची जागा आधीच ठरलेली असते. इतर लोक मिळेल तिथे राहतात, खातात आणि वारीसोबत चालत राहतात. वारीत व्यवासायानिमित्त सहभागी असणा-या लोकांची, भिका-यांची संख्याही मोठी असते.

संध्याकाळचा अंधार जवळ येऊ लागला आणि सासवड जवळ येऊ लागले की दिंडीतील वारक-यांना एकत्रित चालणे गरजेचे होऊन जाते. अन्यथा गर्दीमुळे पुढच्या दिंडीत आणि आपल्या दिंडीमध्ये थोडे जरी अंतर पडले आणि चुकामुक झाली की त्या लाखोंच्या समुद्यात आपली दिंडी आणि तिची मुक्कामाची जागा सापडणे महामुश्किल होऊन जाते… असा अनुभव पाठीशी असतो. त्यामुळे सासवड जवळ येताच लगबग वाढते.

दिवे घाटमाथा ते सासवड पालखी तळ हेही अंतर मोठे आहे. त्यामुळे वारकरी लोकांची बरीच दमछाक झालेली असते. उपवास असल्याने तशी शारीरिक ताकद कमीच असते. पुण्यातील विश्रांतीनंतरचा हा मोठा टप्पा असल्याने वारकरी काहीसे थकलेले असले तरी मनात उत्साह मोठा असतो.

मी वेगाने चालत निघालो. आणि एका वळणावर मला वारका-यांचा एक गट चालताना दिसला. त्यांना गाठले तर पुढच्या वळणावर चक्क माऊलींचा रथ… घाटातील चढावर चढण्याच्या प्रयत्नात! आधी विश्वासच बसेना… जवळ जाऊन पाहता परिस्थिती लक्षात आली. त्यावेळी रथ बराच जड असे. बैलांच्या अनेक जोड्या लावून रथ ओढावा लागे. वारकरी मंडळी घाईत असल्याने रथाला ओलांडून केंव्हाच पुढे गेली होती. रथापुढे क्रमांक एकची दिंडीसुद्धा बरीच पुढे गेली होती. रथासोबत असलेल्या पाच-पन्नास लोकांनी, सेवेकरी, पोलिसांनी बैलांच्या जोडीने रथ वर वर ढकलत चालवला होता. माऊली! माऊली! असा गजर करीत एका एका चढाचे अवघड वळण पार केले जात होते… मी ही जमेल तसा हातभार लावला!

काही वेळातच पुढे चालणारा जनसमुदाय आणि पालखी रथ यांच्यात योग्य समन्वय साधला गेला. सासवडची भजनी मंडळी घाटाच्या माथ्यावर स्वागतासाठी दिंडी घेऊन आलेली होती… माऊली आता सासवडच्या वेशीतून प्रवेश करत्या झाल्या होत्या! 

घाटाच्या शेवटच्या टोकावर पुण्यातल्या अनेक व्यापा-यांनी त्यांच्या मालगाड्या आणून आधीच उभ्या करून ठेवल्या होत्या… आणि त्यांच्या मार्फत वारक-यांना फराळाचे पदार्थ, उपयोगी वस्तू यांचे मुक्तहस्ते वितरण सुरु होते… ! 

मला पुण्यात तसेच रात्री माघारी यायचे होते. याच मालट्रकमधून येण्याची परवानगी एका चालकाने दिली. अंधार पडू लागला होता. मालट्रक परतण्याच्या तयारीत होते. एवढ्यात मला घाटातून खालून तीन आकृत्या चालत येताना दिसल्या… दोन महिला आणि एक वयस्कर पुरुष! पुरुषाच्या पायात काटा रुतल्याने त्यांचा पाय सुजला होता. पत्नी आणि सूनबाई यांच्या साहाय्याने ते वारकरी गृहस्थ एवढा मोठा घाट चढून आले होते… म्हणून त्यांना एवढा उशीर लागला होता! 

यावेळी पुण्यातून सासवडकडे दिवे घाट मार्गे वाहनांची वाहतूक पूर्ण बंद असते. पण कसा कुणास ठाऊक एक मिनीट्रक मागून येताना दिसला… ! मी त्या वाहनाला आडवा होत वाहन अडवले. चालक नाखुशीनेच थांबला… वाहनाच्या मागच्या बाजूने त्या वारकरी बाबांना वर चढवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्यांच्या पायाला मोठी सूज, वेदना असल्याने त्यांना वेळ लागला… बाबांना वर चढता आलेच नाही.. आणि का कुणास ठाऊक त्या चालकाने त्याचे वाहन पुढे दामटले… आम्ही आवाज देत राहिलो… पण तो चालक वाहन घेऊन निघूनही गेला! त्या दोन महिला आणि ते वारकरी बाबा खालीच राहिले… तेथून त्यांचा सासवड मुक्काम किमान चार-पाच किलोमीटर्स तरी दूर असावा! 

मी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बाबांनी मला तोंडभरून आशीर्वाद दिला… आणि म्हणाले… ”असू दे, बाळा! माऊली घेऊन जातील आम्हांला!” आणि असं म्हणत ते तिघेही हळूहळू सासवडच्या दिशेने निघाले. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. माझ्याकडे असलेले फराळाचे पदार्थ त्यांच्या हाती सोपवले!

अंधारून आले होते… मागून एकही वाहन येताना दिसत नव्हते. मी त्या तिघांच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात राहिलो… माझे वाहन पुढे निघाले! घाट उतरेपर्यंत वर येणारे एकही वाहन नजरेस पडले नाही! ती तीन माणसं त्यांच्या मुक्कामाला किती वाजता, कशी पोहोचली असली असतील हा एकच विचार मनात सातत्याने येत राहिला! माउलींनी त्यांना सुखरूप नेले असेलच याची खात्री होती! 

दरवर्षी पुण्यातून माऊली दिवेघाटाकडे निघतात तेंव्हा त्या तीन वारक-यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही! रामकृष्णहरी! 

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

अमानवी, अमानुष किंवा पाशवी हे शब्द अनेकदा माणसांनी केलेल्या कृत्यांसाठी वापरले जातात. बऱ्याच काळापासून ते शब्द मला खटकत आले आहेत. विशेषतः ‘पाशवी’ हा शब्द तर फारच त्रास देतो. ते शब्द अप्रस्तुत वाटण्यामागे माझी काही कारणेही आहेत.

आज त्याबद्दल लिहावेसे वाटण्यासाठी तात्कालिक कारण म्हणावे, तर नुकतीच घडलेली एक घटना वाचनात आली.

पण मुळात, ते शब्द मला का खटकतात? 

मनुष्यप्राण्याच्या हातून घडणाऱ्या काही कृत्यांच्या संदर्भात हे शब्द सर्रास वापरले जातात. उदाहरणार्थ, कुठेतरी कौटुंबिक वादामुळे, किंवा व्यावसायिक शत्रुत्वातून उद्भवलेल्या कडाक्याच्या भांडणानंतर एका गटाचे लोक दुसऱ्या गटातल्या निरपराध व्यक्तींनाही जीवे मारतात. अशा घटनेनंतर ‘अमानुष नरसंहार’ अशा मथळ्याखाली ती बातमी छापून येते.

बलात्काराच्या घटनांमध्येही अमानवी, पाशवी अशी विशेषणे नेहमी वाचनात येतात. पुण्याजवळ नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेचेही वृत्तांकन करताना, ‘पाशवी अत्याचार’, ‘माणुसकीला काळिमा’ अशी विशेषणे वाचनात आली.

एका बाबतीत कोणाचेही दुमत असणार नाही की, मी उदाहरणादाखल दिलेल्या सर्वच घटना निंदनीय आहेत, आणि कोणाच्याही हातून कुठेही त्या घडल्या तरी मनात चीड उत्पन्न होतेच. अगदी दूर कुठेतरी युरोपीय देशांमधल्या ज्यू-धर्मियांवर, ८०-८५ वर्षांपूर्वी हिटलरच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला आजही घृणाच वाटते.

आपण या अत्याचारांसाठी ‘अमानवी’ हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्या शब्दात असाही अर्थ गर्भित असतो का, की मानवजातीच्या प्राण्यांच्या हातून अपेक्षित नसली तरी, इतर जातीच्या प्राण्यांकडून तशी कृत्ये घडू शकतात? माझा नेमका आक्षेप त्याच गर्भित अर्थाला आहे. ‘पाशवी’ हा शब्द वापरताना तर तो अर्थ गर्भितदेखील नसतो. आपण सरळ-सरळ असेच म्हणत असतो की ते कृत्य पशूकडून घडले तर काही नवल नाही!

पण हे तर सर्वमान्य आहे की कधीकधी एखादा प्राणी किंवा पक्षी, निव्वळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या प्राण्या-पक्ष्यावर हल्ला करतो. तसेच एखाद्या पशूला जर भूक लागली तर आणि तरच तो दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपली भूक भागवतो. पण त्यातदेखील एक विलक्षण सत्य दडलेले आहे. सर्वसाधारणपणे, कितीही भूक लागलेली असली तरी पशू भक्ष्य शोधत रानोमाळ हिंडतो, पण सहसा आपल्या जातीच्या प्राण्याला मारून खात नाही. अपवादात्मक परिस्थितीत कदाचित तसेही घडतही असेल.

त्याचप्रमाणे, लैंगिक भूक भागवण्यासाठी एखाद्या पशूने बलात्कार केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यासाठीही पशूजातीतल्या नराकडून मादीची, किंवा मादीकडून नराची मनधरणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांचा समागम होतो असे मी ऐकले-वाचले-पाहिले आहे.

परंतु, मनुष्य हा एकमेव प्राणी असेल जो भुकेपोटी नव्हे तर इतर भावनांच्या प्रभावाखाली चोरी, दरोडे किंवा हत्या करतो. केवळ मनुष्यप्राणीच आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी बलात्कार करतो. मग त्याच्या कृत्यांना ‘पाशवी’ म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?

आता, हे सगळे विचार आजच लिहावेसे मला का वाटले?

… आजच वर्तमानपत्रात फोटोसह आलेली एक बातमी वाचली. गुजरातमध्ये पालिताना तालुक्यातल्या गरजिया नावाच्या गावी, काळू परमार नावाचा एक माणूस गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. अचानक एका सिंहिणीने त्याच्यावर झेप घेऊन त्याला खाली पाडले. त्यानंतर ती सिंहीण त्या माणसाच्या पायावर आपले वजन ठेवून बसून राहिली. त्याच्या नरडीचा घोट ती अगदी सहज घेऊ शकली असती. पण तिने तसे केले नाही. त्या बिचाऱ्या माणसाला फारसे काहीच करता येत नव्हते. पण तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी दगड मारून त्या सिंहिणीला पळवून लावायचे प्रयत्न सुरु ठेवले. बऱ्याच प्रयत्नांती, ती सिंहीण उठून रानात पळून गेली आणि काळू परमारचा जीव वाचला.

अधिक माहिती अशी समोर आली की त्या सिंहिणीने नुकतीच एक शिकार केलेली होती. कदाचित ती भुकेजलेली नसेलच. आणि म्हणूनच तिने काळूला जीवे मारले नाही!

आता या घटनेला लोक असेही म्हणण्याची शक्यता आहे की, “त्या सिंहिणीने काळूला जिवंत सोडून अक्षरशः ‘माणुसकी’ चा प्रत्यय दिला!”

खरे पाहता, इतकेच म्हणता येईल की त्या सिंहिणीने केवळ ‘पशुधर्म’ पाळला !

 

© कर्नल आनंद बापट ( निवृत्त ) 

 मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७३ – – 

देहेदंडणेचे महा दुःख आहे।

महादुःख ते नाम घेता न राहे।

सदाशिव चिंतीतसे देव देवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७३।।

अर्थ : देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.

(देहेदंडणे – देहाला कष्ट/यातना देणे )

विवेचन : अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या पाण्यात उभे राहून. असे अनेक प्रकार होते. या सगळ्या गोष्टींचा उद्देश देहाबद्दलची आसक्ती नाहीशी व्हावी आणि परमेश्वर प्राप्तीकडे मनाचा कल व्हावा असा असायचा. परंतु देहाला एवढे कष्ट देऊन सर्वांनाच परमेश्वर प्राप्ती होईल अशी शाश्वती नव्हती. शिवाय काही कारणाने तप करणे मध्येच थांबले तर सर्वच व्यर्थ जायचे.

परंतु नामसाधनेत असे कष्ट देहाला पडत नाहीत. नामसाधना सोपी आहे. तुकाराम महाराज देखील सांगतात, “नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. “मग एवढे सोपे साधन सोडून देहाला ताडन करणारी इतर साधने का अवलंबावीत ?

या संसारात देखील मानवी देहाला अनेक प्रकारचे कष्ट होतात. नानाविध त्रासांना सामोरे जावे लागते. प्रारब्धाने वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. या सगळ्या गोष्टीत शरीराला प्रचंड त्रास होतो. आपण म्हणतो की कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही. हे खरेच आहे. प्रारब्धाने आलेले दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. पण सगळ्या परिस्थितीत रामनाम औषधाचे काम करते. देहाला वेदना होतील पण रामनामामुळे तो त्रास मनापर्यंत पोहोचत नाही. देहाच्या दुःखावर इतर औषधे तात्पुरती काम करतात पण रामनाम त्यावर मात करण्याची शक्ती देते. मात्र ते औषध नियमितपणे घोट घोट पोटात जायला हवे.

रामनामाचे इतके महत्व समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट सांगून, समजावूनही पटली नाही तर त्याला एखाद्या मोठया व्यक्तीचे उदाहरण देऊन समजवावे लागते. समर्थ म्हणतात, ” हे मना, अरे तुला किती आणि काय सांगू ? प्रत्यक्ष योगियांचा राणा असलेले भगवान शंकर देखील श्रीरामाचा जप करतात. त्याचेच चिंतन करतात. मग तुला करायला काय हरकत आहे ?” श्रीराम हे देवांचे देव आहेत. त्यांनीच देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले आहे. आदी आणि अंत तेच आहेत. तेव्हा हे मना, प्रभात समयी रामाचे चिंतन कर.

स्वसंवाद :: 

१. मी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा समाधानासाठी केवळ बाह्य कष्टांचे (उपासतापास, कठीण व्रतवैकल्ये) अवडंबर माजवत आहे का?

२. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे माझ्या देहाला ‘दुःख’ होते, तेव्हा मी निराश होतो की रामनामरूपी औषधाचा आश्रय घेतो?

३. “कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही” हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून, मी माझ्या मनाला नामस्मरणाने खंबीर बनवले आहे का?

४. जर प्रत्यक्ष भगवान शंकर (देवाधिदेव) निरंतर रामनामाचे चिंतन करतात, तर मग संसारी असलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?

============== 

श्लोक क्र. ७४ – – 

बहुतांपरी संकटे साधनाची।

व्रते दान उद्यापने ते धनाची।

दिनाचा दयाळू मनी आठवावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७४।।

अर्थ : परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.

(बहुतांपरी – अनेक प्रकारचे, साधनांची – ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन – एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी )

विवेचन : ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम असतात. त्यांचे व्यवस्थित पालन झाले पाहिजे. व्रत व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर त्याची विधिपूर्वक सांगता करावी लागते. त्यासाठी पुरोहितांना बोलावून धार्मिक विधी, दानधर्म, दक्षिणा आदी गोष्टी कराव्या लागतात.

व्रत, दानधर्म आणि उद्यापने या गोष्टी करायच्या तर पैशाची व्यवस्था आधी करावी लागते. बरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठीचे बाह्य मार्ग झाले. हे सगळे करीत असताना माणूस यातच गुंतून पडतो. परमेश्वर प्राप्तीसाठी अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. तो आपल्या अंतर्यामीच वसलेला असतो. सगळे लोक व्रतवैकल्ये, उद्यापन सोहळे, दानधर्म आदी गोष्टी समारंभपूर्वक करतात म्हणून आपल्यालाही असे करायलाच हवे नाहीतर लोक काय म्हणतील अशी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. बऱ्याच वेळा मग इतरांना दाखवण्यासाठी देखील असे विधी मोठे समारंभपूर्वक करावे लागतात. यात आर्थिक आणि मानसिक कुतरओढ होते ती सर्वसामान्य माणसाची. त्याचा गोंधळ होतो. नेमके काय करावे ते कळत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण परमेश्वर यापैकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करत नाही.

समर्थांसारख्या संतांना या गोष्टीची अचूक जाणीव असते. समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस जपतप, अनुष्ठान, व्रते, उद्यापने यासारख्या कर्मकांडात अडकून पडला होता. तो बहिर्मुख झाला होता. त्याला अंतर्मुख करणे आवश्यक होते. समर्थांसारखे सद्गुरू लोककल्याणाचा कळवळा असल्यानेच नामस्मरणासारखा सोपा मार्ग सांगत आहेत. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. त्याची दीन होऊन म्हणजेच आर्ततेने भक्ती केली, तर तो आपल्या दासांवर कृपा करतो. ‘ नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ‘ असे समर्थांनी सांगितलेच आहे. आपणही तो मार्ग अनुसरावा. दीनांचा दयाळू असलेल्या भगवंताला मनी आठवावे. त्याचे रूपगुण अंतरी साठवावे. अशा या भगवंताचे प्रभात समयी चिंतन करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ” आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. “

स्वसंवाद :: 

१. मी करत असलेल्या धार्मिक गोष्टी (व्रतवैकल्ये किंवा पूजा) केवळ ‘इतरांना दाखवण्यासाठी’ किंवा एक सामाजिक प्रथा म्हणून करत आहे का?

२. भगवंत माझ्या अंतर्यामीच आहे हे ठाऊक असूनही, मी त्याला शोधण्यासाठी बाह्य कर्मकांडात आणि सण-समारंभांच्या अवडंबरातच गुंतून पडलो आहे का?

३. जेव्हा माझ्याकडे आर्थिक मर्यादा असतात, तेव्हा मी देवाचा कोप होईल या भीतीने व्याकुळ होतो, की “तो दीनांचा दयाळू आहे” या भावनेने त्याला आर्ततेने साद घालतो?

४. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मी सर्व चिंता त्या लक्ष्मीपतीवर सोडून देऊन कधी ‘आवडीने आणि भक्तीभावाने’ केवळ नामस्मरण केले आहे का?

– क्रमशः श्लोक ७३ आणि ७४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || वारीतला शिरा आणि डोळ्यातलं पाणी || ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

|| वारीतला शिरा आणि डोळ्यातलं पाणी || ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

– – – एक मनाला भिडणारा प्रसंग

|| वारीत खाणं-पिणंमजा नाही… वाटणंमजा आहे ||

|| एक घास पोट भरतो… एक घास मन भरतो ||

|| सत्य प्रसंग: सासवड ते जेजुरी – वारी 2023 ||

|| श्री स्वामी समर्थ || श्री विठ्ठल रखुमाई || 

——— 

|| 5 किलो शिरा आणि 5 लाखांचं समाधान ||

*

आषाढी वारी 2023. सासवडचा मुक्काम.  

लाखो वारकरी. टेंट, पालं, भजनाचा गजर.  

रात्री 8 वाजता अन्नछत्रात जेवणाची पंगत.  

*

पुण्याचा एक तरुण – नाव ऋषी‘. वय 28. IT कंपनीत.  

पॅकेज 25 लाख. पहिल्यांदाच वारीला. ‘Reel’ बनवायला आला होता.  

GoPro, iPhone, गॉगल. “Wari Vlog” प्लॅन.  

 

जेवणाच्या रांगेत उभा. पानात पडलं – भात, आमटी, एक शिरा.  

ऋषीने व्हिडिओ सुरू केला – “Guys, बघा वारीचं जेवण. Simple पण Soulful. ”

शिरा उचलला. कॅमेरासमोर ‘Yummy’ म्हणणार…

 

तेवढ्यात बाजूच्या पानावरून आवाज – “आई ग…”

वळून बघितलं. 7-8 वर्षांचा पोरगा. नाव ‘सखाराम’.  

मळकट कपडे. केस विस्कटलेले. डोळे मोठे.  

त्याच्या पानात फक्त भात-आमटी. शिरा संपला होता.  

 

वाढणारा काका म्हणाला – “माफ करा बाळा. शिरा संपला. उद्या नक्की. “

सखारामच्या डोळ्यात पाणी. हळूच म्हणाला – “काका, मी 3 दिवसापासून गोड खाल्लं नाही. आई म्हणाली होती – वारीत ‘बुंदीचा लाडू’ मिळतो. तो नाही मिळाला… शिरा तरी…”

 

ऋषीने ऐकलं. GoPro बंद केला.  

क्षणभर विचार केला. मग स्वतःच्या पानातला ‘शिरा’ उचलला.  

सखारामच्या पानात टाकला.  

म्हणाला – “घे बाळा. तुझा ‘बुंदीचा लाडू’. ”

 

सखारामचे डोळे चमकले. पण त्याने शिरा उचलला नाही.  

त्याने पानाचे 4 भाग केले.  

1 घास स्वतः खाल्ला.  

2रा घास शेजारच्या 4 वर्षांच्या पोरीला दिला – “ताई, खा. “

3रा घास मागे बसलेल्या आजीला – “आजी, गोड खा. “

4था घास… ऋषीकडे बघितलं. हसला. ऋषीच्या पानात टाकला.  

“दादा, तू पण खा. वारीत एकट्याने नाही खायचं. “

 

ऋषी सुन्न.  

25 लाखाच्या पॅकेजवाला… 7 वर्षांच्या पोराकडून ‘वाटणं’ शिकला.  

त्याने तो घास खाल्ला. खारट लागला.  

कारण डोळ्यातलं पाणी त्यात पडलं होतं.  

 || रात्रभर झोप नाही || सकाळी शिरानाही… विचारबनला ||

ऋषी रात्रभर झोपला नाही.  

GoPro उघडला. Vlog डिलीट केला.  

सकाळी 4 ला उठला. सासवडच्या बाजारात गेला.  

रवा, साखर, तूप, काजू… 5 किलोचा शिरा बनवायचं सामान घेतलं.  

एकट्याने स्टोव्ह लावला. शिरा बनवला.  

वासाने सगळे वारकरी गोळा झाले.  

 

ऋषी ओरडला – “माऊली, काल माझा ‘एक’ शिरा 4 जणांनी वाटून खाल्ला.  

आज माझा ‘5 किलो’ शिरा 500 जणांनी खायचा.  

रांग लावा. पण अट एकच –

एक घास स्वतः खायचा… दुसरा शेजाऱ्याला भरवायचा.  

कारण वारीत ‘पोट’ नाही भरायचं… ‘प्रेम’ भरायचं. “

 

500 वारकरी. रांग लागली.  

ऋषी स्वतः वाढत होता. प्रत्येकाला सांगत होता – “शेजाऱ्याला द्या. “

सखाराम पण होता. त्याने 3 घास खाल्ले… 3 जणांना भरवले.  

आणि ऋषीला म्हणाला – “दादा, काल तू मला ‘गोड’ दिलं…

आज तू ‘सगळ्यांना’ गोड देतोय. तू ‘विठोबा’ आहेस. “

 

ऋषी रडला. म्हणाला –

“बाळा, मी विठोबा नाही. मी ‘वाटमारा’ होतो.  

‘Like-Share-Subscribe’ साठी आलो होतो.  

तू मला ‘Love-Care-Sacrifice’ शिकवलंस.  

आजपासून माझा ‘Vlog’ बंद… ‘वारकरी’ सुरू. “

|| जेजुरीचा खंडोबा आणि वारीचा शिरा ||

दिंडी जेजुरीला पोहोचली.  

सोन्याची जेजुरी. पिवळी भंडारा उधळण.  

ऋषी पुन्हा शिरा बनवणार होता.  

 

तेवढ्यात सखाराम धावत आला.  

हातात मळकट पिशवी. उघडली.  

आत 2 रुपये, 5 रुपये… असे करून 137 रुपये.  

“दादा, हे माझे ‘वारीचे पैसे’. आईने दिले होते.  

मी खर्च केले नाही. तू ह्यातला शिरा कर.  

म्हणजे हा शिरा ‘माझा’ पण असेल. “

 

ऋषीने ते 137 रुपये डोक्याला लावले.  

म्हणाला – “बाळा, तुझ्या 137 रुपयात जो ‘गोडवा’ आहे ना…

तो माझ्या 25 लाखात नाही.  

कारण तू ‘हौसे’साठी नाही… ‘दुसऱ्यासाठी’ वाचवलेस. “

 

त्या दिवशी जेजुरीत 10 किलो शिरा वाटला गेला.  

नाव दिलं – “सखारामचा शिरा”.  

पाटी लावली – “एक घास तुम्ही खा… दुसरा शेजाऱ्याला द्या.  

कारण पंढरीचा रस्ता ‘पोटाने’ नाही… ‘परस्पराने’ कापायचा असतो. “

|| आज… 2026 ||

आज ऋषी IT सोडली. ‘वारी फूड ब्लॉगर’ नाही.  

तो ‘वारी अन्नपूर्णा’ नावाची NGO चालवतो.  

दरवर्षी वारीत 10 टन शिरा, लाडू, बिस्कीट वाटतो.  

पण नियम तोच – “एक घास स्वतःचा… दुसरा शेजाऱ्याचा. “

 

सखाराम?

तो आता 10 वर्षांचा. ऋषीदादासोबत वारीला येतो.  

खिशात 10 रुपये असले तरी 5 रुपये ‘शिरा फंडा’त टाकतो.  

म्हणतो – “दादा, आपण ‘गरीब’ नाही… ‘श्रीमंत’ आहोत.  

कारण आपल्याकडे ‘वाटायला’ आहे. “

 

आणि हो…

ऋषीच्या ऑफिसमध्ये एकच फोटो आहे.  

सखारामचा. पानाचे 4 भाग करतानाचा.  

खाली लिहिलंय – “My CEO. He taught me Sharing is Earning. ”

|| भक्तांनो, वारीतल्या खाण्या-पिण्यातले 6 बोध ||

  1. || वारीत बुफेनसतो… प्रसादअसतो ||

हॉटेलमध्ये आपण ‘पोट’ भरतो. वारीत ‘पंगत’ भरते. फरक काय? हॉटेलात ‘मी’ जेवतो… वारीत ‘आम्ही’ जेवतो. म्हणूनच तिथला शिरा ‘अमृत’ लागतो.  

  1. || ‘एक घासची किंमत एक लाखापेक्षा मोठी ||

ऋषीचा 1 घास सखारामसाठी ‘बुंदीचा लाडू’ झाला. तुमचा ‘उरलेला’ घास कोणासाठी ‘पहिला’ घास होऊ शकतो. वाटून बघा.  

  1. || मुलं खातनाहीत… वाटतात‘ ||

मोठी माणसं ‘साठवतात’. सखारामसारखी मुलं ‘वाटतात’. म्हणूनच विठोबाला ‘बालरूप’ प्रिय आहे. कारण ‘मूल’ झालं की ‘मळ’ जातो.   

  1. || ‘Vlog’ पेक्षा लोगमहत्त्वाचे ||

ऋषी ‘Reel’ बनवायला आला होता… ‘Real’ होऊन गेला. कॅमेरा बंद करा… काळीज सुरू करा. तिथे ‘Like’ नाही… ‘जीवन’ मिळतं.  

  1. || 137 रुपये ‘137 कोटीवर भारी पडले ||

सखारामचे पैसे ‘संख्येने’ लहान… ‘वृत्तीने’ मोठे. देव ‘दान’ नाही बघत… ‘भाव’ बघतो. 1 रुपया ‘ओढून’ दिला तर ‘कचरा’… ‘रडून’ दिला तर ‘कुबेर’.  

  1. || वारी मजानाही… जबाबदारीआहे ||

‘खाणं-पिणं-नाचणं’ वारी नाही. ‘खाऊ घालणं-पाणी पाजणं-सांभाळणं’ वारी आहे. पंढरीचा रस्ता ‘पायाने’ नाही… ‘परोपकाराने’ तुडवायचा असतो.   

|| शेवटचा मंत्र || विठूमाऊलीचा ||

“बाळांनो, वारीला येताना ‘डबा’ भरून आणू नका…

‘दिल’ भरून या.  

कारण ‘पोळी’ शिळी होते…

‘प्रेम’ शिळं होत नाही.  

‘शिरा’ संपतो…

‘स्मरण’ संपत नाही.  

 

एका घासात ‘विठ्ठल’ भेटतो…

जर तो घास ‘दुसऱ्याच्या’ मुखात गेला तर.  

म्हणून या वर्षी ‘वारी’ करा…

पण ‘एकट्याने’ नको…

‘सोबत’ करा.  

‘खाऊन’ मजा नाही…

‘खाऊ घालून’ मजा आहे.  

तीच खरी ‘पंढरीची वारी’. ”

|| राम कृष्ण हरी || जय जय राम कृष्ण हरी ||

|| श्री स्वामी समर्थ || 

 भक्तांनो, या वारीला जाताना एक्स्ट्रा डबाघेऊन जा. एक्स्ट्रा बिस्कीटघ्या. वाटेत सखारामभेटेल… त्याला शिराद्या. कदाचित तो तुमचा ऋषीकरेल. ही गोष्ट 1 ‘वारीमित्राला पाठवा… म्हणजे पंढरीच्या वाटेवर भूकनाही… फक्त भक्तीउरेल

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणूस आजाराने मरत नाही… – लेखक : . अखिलेश राजूरकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ माणूस आजाराने मरत नाही… – लेखक : . अखिलेश राजूरकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

माणूस आजाराने मरत नाही; तो कारणं संपली की मरू लागतो…

मी गेली अनेक वर्षे आयसीयूमध्ये काम करतो आहे.

हजारो रुग्ण पाहिले.

हजारो नातेवाईकांचे डोळे पाहिले.

हजारो वेळा मृत्यूला दारात उभं पाहिलं.

आणि तरीही, आजही काही गोष्टी मला आश्चर्यचकित करतात.

 

मी जे लिहितो आहे ते कोणतं संशोधन नाही. कोणताही वैद्यकीय निष्कर्ष नाही. याला अनेक अपवाद असतील. अचानक घडणारे अपघात, क्षणात होणारे मृत्यू, नियतीचे काही क्रूर फटके — मी त्याबद्दल बोलत नाही.

 

मी त्या संघर्षाबद्दल बोलतो आहे जो आयसीयूमध्ये दिवसेन्-दिवस चालतो.

जिथे जीवन आणि मृत्यू दोघेही एकाच खोलीत बसलेले असतात.

जिथे एखाद्या माणसाला चार दिवस, आठ दिवस, कधी चार आठवडे लढावं लागतं.

 

या संघर्षात मला एक गोष्ट वारंवार दिसली आहे.

काही रुग्ण असे असतात की त्यांच्या शरीरात आजारांशिवाय दुसरं काहीच नसावं असं वाटतं.

डायबिटीज.

रक्तदाब.

थायरॉईड.

जुना हार्ट अटॅक.

पक्षाघात.

किडनीचे विकार.

फुफ्फुसांचे आजार.

 

त्यांचे अहवाल पाहिले की वैद्यकीय भाषेत त्यांच्याबद्दल आशावादी राहणं कठीण वाटतं.

पण हेच लोक कधी कधी मृत्यूच्या दारातून परत येतात.

हळूहळू बसायला लागतात.

पुन्हा चालतात.

पुन्हा घरी जातात.

आणि काही महिन्यांनी OPD मध्ये हसत भेटायला येतात.

 

दुसऱ्या बाजूला एखादा रुग्ण असतो.

वयाने कमी.

मोठे आजार नाहीत.

तुलनेने निरोगी.

पण तो मात्र आपल्या हातातून निसटून जातो.

 

वर्षानुवर्षे हे पाहिल्यानंतर मी स्वतःला एक प्रश्न विचारू लागलो.

नेमकं काय असतं ते, जे काही लोकांना परत खेचून आणतं?

काय असतं ते, जे काही लोकांना मृत्यूच्या सावलीतूनही चालत बाहेर आणतं?

 

वैद्यकीय विज्ञान त्याची अनेक उत्तरं देतं.

पण सगळी उत्तरं देत नाही.

आणि कालांतराने मला एक गोष्ट जाणवू लागली.

कदाचित माणूस किती आजारी आहे, हे नेहमी महत्त्वाचं नसतं.

कधी कधी त्याला अजून किती जगायचं आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं.

त्याला अजून मुलाचं लग्न बघायचं असतं.

मुलीचा संसार उभा राहिलेला पाहायचा असतो.

नातवाला मोठं होताना पाहायचं असतं.

कर्ज फेडायचं असतं.

घर बांधायचं असतं.

एखादं स्वप्न पूर्ण करायचं असतं.

किंवा फक्त घरी परत जाऊन आपल्या माणसांमध्ये पुन्हा बसायचं असतं.

 

व्हेंटिलेटरवर पडलेले अनेक रुग्ण मला आजही आठवतात.

त्यांच्या शरीरात शक्ती उरलेली नसते.

पण त्यांच्या डोळ्यांत भविष्य उरलेलं असतं.

आणि मला वाटतं, त्या भविष्याची ओढच त्यांना परत आणत असते.

 

आयसीयूमध्ये मशीन हृदयाचे ठोके मोजतात.

ऑक्सिजन मोजतात.

रक्तदाब मोजतात.

शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करतात.

 

पण एक गोष्ट मोजण्यासाठी अजून कोणतंही मशीन तयार झालेलं नाही.

“या माणसाकडे अजून किती जगण्याची कारणं उरली आहेत?”

कदाचित हीच ती संख्या आहे जी सर्वात महत्त्वाची असते.

 

मी अनेक वृद्ध जोडपी पाहिली आहेत.

पन्नास-साठ वर्षे एकत्र जगलेली.

त्यांपैकी एक व्यक्ती गेल्यानंतर दुसरी फार काळ जगत नाही.

कदाचित त्याला वैद्यकीय स्पष्टीकरण असेल.

पण एक डॉक्टर म्हणून अनेकदा मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्याचा अर्थच हरवलेला असतो.

त्यांच्या जगण्याचं कारण निघून गेलेलं असतं.

आणि ज्या दिवशी कारणं संपतात, त्या दिवशी माणूस थोडा थोडा मरायला लागतो.

 

उलट एखादा बाप असतो.

अत्यंत गंभीर अवस्थेत.

पण त्याला अजून मुलांना उभं करायचं असतं.

घर सांभाळायचं असतं.

जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात.

आणि अशा लोकांना मी मृत्यूच्या दारातून परत फिरताना पाहिलं आहे.

 

म्हणून आज इतकी वर्षे आयसीयूमध्ये उभं राहिल्यानंतर जर कोणी मला विचारलं की जीवनाबद्दल सर्वात मोठा धडा कोणता मिळाला?

तर मी एवढंच सांगेन—

माणूस फक्त श्वासांवर जगत नाही.

तो फक्त हृदयाच्या ठोक्यांवर जगत नाही.

तो फक्त औषधांवरही जगत नाही.

तो जगतो त्या कारणांवर, ज्यासाठी त्याला उद्या पुन्हा डोळे उघडायचे असतात.

 

कदाचित म्हणूनच मानसोपचारतज्ज्ञ Viktor Frankl यांनी लिहिलं होतं—

“He who has a why to live can bear almost any how. “

“ज्याच्याकडे जगण्याचं कारण असतं, तो कोणताही संघर्ष सहन करू शकतो. “

आयसीयूने मला या एका वाक्याचा अर्थ रोज शिकवला आहे.

 

आजार शरीराला कमकुवत करतात.

पण आशा माणसाला जिवंत ठेवते. हा प्रकार फेसबुकवर पोस्ट केल्यास लोक “लाईक” करून पुढे जाणार नाहीत; ते शेवटपर्यंत वाचतील, स्वतःच्या आई-वडिलांचा, जोडीदाराचा किंवा एखाद्या ICU अनुभवाचा विचार करतील. तिथेच लेख जिंकतो.

*

लेखक :डॉ. अखिलेश राजूरकर

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सारे आहे गैर…! ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ सारे आहे गैर नीलांबरी शिर्के 

सत्यवान कापे

वड फांदी जेंव्हा

तुटूनिया फांदी

पडे खाली तेंव्हा!!

*

यमराज आले

नेण्या त्याचे प्राण

सावित्री आडवी

उभी राहे येऊन !!

*

तुटलेली फांदी

तिचे झाले काय ?

हळूहळू फांदी

होते मृतप्राय !!

*

मेलेल्या फांदीचे

पुजन करता

सावित्रीचे पुण्य

कसे येईल म्हणता !!

*

फांदी तोडोनिया

कुणी पुजन करता

व्रत केले यैसे

कसे येईल म्हणता !!

*

वृक्षाचा संहार

पुजा उपचार

कधी समजेल

सारे आहे गैर !!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मिसिंग लिंक! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मिसिंग लिंक! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मि सिंग लिंकची लिंक

 काल तुटली अतिवृष्टीने 

 गार प्रवास बोगद्यातला 

 थांबला दरड कोसळल्याने

*

सिं हावलोकन करता 

 कालच्या त्या घटनेचे 

 उदघाट्नाची घाई नडली 

 जनसामान्य वदे वाचे

*

ग रज होतीच म्हणा 

 अशा मिसिंग लींकची 

 घाट प्रवासाचा त्रास

 कायमचा टाळण्याची

*

लिं कची खराब हालत 

 काल टळली असती

 जर बोगद्यावर दरडींना

 जाळी बसवली असती

*

क माल नव तंत्रज्ञानाची 

 मिसिंग लिंकमुळे कळली 

 पण काळजी न घेतल्याने

 त्याची त्रुटी उघडी पडली

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “कुर्सी” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “यह घर किसका है ?” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

प्रेस क्लब ने मुख्यमंत्री को आमंत्रित किया। पुलिस तैनात हो गयी और आम जनता का रास्ता बंद कर‌ दिया गया। हर अधिकारी मुआयना करने आया। क्या सिविल, क्या पुलिस के अधिकारी ! सब आते रहे, मुआयना करते रहे।

आखिर सीआईडी विभाग के उच्चाधिकारी ने कहा कि जिस कुर्सी पर मुख्यमंत्री को बैठना है, वह कुर्सी ठीक नहीं। इसे तुरंत बदलो। यह हमारे उच्चाधिकारियों का आदेश है।

हम वहां सारी तैयारियां कर चुके थे। अब कुर्सी में क्या खोट निकल आया?

हमने मज़ाक मज़ाक में पूछा -फिर यह भी बता दीजिये कि कौन सी कुर्सी लायें? तीन महीने वाली या पांच साल चलने वाली?

अधिकारी हमारा मुह देखते रह गये!!

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares