मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – १… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

अल्प परिचय 

एक साधक व नर्मदा भक्त – १ एप्रिल २०१७ ते २० एप्रिल २०१८….

भगवंत व सद्गुरुंनी १७० दिवसात पायी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. संत साहित्याचा अभ्यास यथाशक्ती चालू आहे.

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – १… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

अखंड मंडलाकारम्

व्याप्तं येन चराचरम्।

तत्पदं दर्शितं येन 

तस्मै श्री गुरुवे नमः।।

जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म, वैशाख शुद्ध पंचमी, नंदन नाम संवत्सर, युधिष्ठिर-शक 2631,  वसंत ऋतू,  रविवारी,  इसवी सन पूर्व 509 ला…. केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी, कालडी नावाच्या, गावात झाला.  त्यांच्या पित्याचे नाव शिवगुरू व आईचे नाव आर्यांबा. कुशाग्र बुद्धी,  तल्लख स्मरणशक्ती,  अत्यंत देखणी व बळकट शरीरयष्टी,  आजानुबाहू,  असे त्यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते.  

शब्दोच्चार व लिपी यांचे ज्ञान पाचव्या वर्षीच झाल्याने त्यांच्या पिताजींनी पाचव्या वर्षीच,  त्यांचा व्रतबंध केला. आठव्या वर्षी ते चतुर्वेदी झाले. बाराव्या वर्षी सर्व शास्त्र संपन्न होते.

१६ व्या वर्षी  प्रस्थान-त्रयी…. म्हणजे उपनिषदे, ब्रह्म -सूत्र व श्रीमद् भगवद्गीता यावर जगप्रसिद्ध असे भाष्य केले.  

३२ व्या वर्षी ते दिव्यलोकी परतले. 

चार वर्षांचे असताना “देवी भुजंग स्तव” हे २८ श्लोकांचे स्तोत्र  त्यांच्याकडून रचले गेले.

बालशंकरांचे उपनयन झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांचे पितृछत्र हरपले.  म्हणून त्यांच्या मातोश्रींनी, त्यांना गुरुकुलात दाखल केले. गुरुकुलात असताना एक दिवस ते भिक्षा मागायला गेले असता, त्या घरातील ब्राह्मणाची पत्नी, त्यांना देण्यासाठी,  घरामध्ये भिक्षा शोधू लागली.  घरात काहीच नव्हते.  तिला एक वाळलेला आवळा दिसला.  तोच तिने त्यांना दिला.  त्यावरून , त्यांना त्या घरातील दारिद्र्याची कल्पना आली. तेव्हा त्यांना स्फुरलेल्या कनकधारा स्तोत्राने,  त्यांनी श्री लक्ष्मी देवींची स्तुती केली.  तत्काळ लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, देवींनी,  सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला व त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे दूर झाले. त्यामुळे त्या गावचे नाव कनकांबा असे पडले.

तीन वर्षांच्या कालावधीतच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेची ख्याती राजदरबारात पोहोचली.  राजाने त्यांना बरीच संपत्ती देऊन,  राजदरबारात आणण्यासाठी,  पालखी पाठवली.  ती संपत्ती नम्रतापूर्वक परत करून, ती प्रजेसाठी वापरावी. मला याचा काय उपयोग? असा निरोप राजाला दिला. आपण विद्वानांविषयी आदर बाळगता,  त्यामुळे आपले भलेच होईल असा राजाला आशीर्वाद दिला.  त्यांची विद्वत्ता पाहून गावातले प्रतिष्ठित त्यांना खूपच मान देत असत.  शंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता. पण आईला कोण सांभाळणार?  त्यांनी विचार केला.  त्यांनी त्यांच्या अनेक शिष्यांपैकी अग्नि शर्मा या आवडत्या असलेल्या शिष्याच्या नावावर सर्व संपत्ती करून आईची जबाबदारी सोपवली. अग्निशर्मांनी पण आचार्यांना त्यांच्या आईची काळजी घेण्याचे वचन दिले.  

आईला स्नानासाठी गंगेवर लांब जायला नको म्हणून आचार्यांनी गंगेचा प्रवाह आपल्या घराजवळ आणला.  एक दिवस आचार्य स्नानाला गंगेत उतरले असता मगरीने त्यांचा पाय पकडला.  तेव्हा आचार्यांनी आईला सांगितले,  आता मगर मला खाऊन टाकणार. तर तू मगरीच्या तावडीतून सोडवायला प्रार्थना कर.  आईच्या प्रार्थनेवरून ते मगरीच्या तावडीतून सुटले.  तेव्हा ते आईला म्हणाले, आता तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दे. तू माझी आठवण काढलीस की मी नक्की परत येईन व तुला भेटेन.  असे म्हणून ते कालडी सोडून निघून गेले.  त्या दिवशी कालडी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही.  

गुरूंच्या शोधात प्रथम ते गोकर्ण महाबळेश्वरला आले. तिथे त्यांना विष्णू शर्मा नावाचा त्यांच्याबरोबर गुरुकुलात शिकत असलेला मित्र भेटला.  एके दिवशी एका संन्याशाने त्यांना सांगितले,  की ते ज्यांच्या शोधात आहेत ते “गुरुगोविंदयती” नर्मदा नदीच्या तीरावर,  ओंकार मांधाता येथे,  आश्रम स्थापून राहात आहेत.  गुरुगोविंदयती हे गौडपदाचार्यांचे शिष्य. गौडपदाचार्य पतंजलीचे शिष्य.  

आचार्य ओंकारेश्वरला गुरूंच्या गुहेत आले. गुरूंनी विचारले “ बाळा तू कोण?” आणि आचार्य उत्स्फूर्त उद्गारले …… 

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम्।

नचश्रोत्र जिव्हे, नच घ्राण नेत्रे।

नचव्योम भूमिर्नतेजो न वायुः।

चिदानंद रूप शिवोsहम् शिवोsहम्।।

 गुरु गोविंदयतींना,  बद्रिकाश्रमात, व्यासमुनींनी,  या शिष्याची कल्पना आधीच दिली होती… की पृथ्वीवरील शिवाचा अवतार तुझ्याकडे शिष्य म्हणून येईल.  ते त्यांची वाटच बघत होते. तीनच महिन्यात आचार्यांचा अभ्यास पाहून गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा दिली, व या बाल बृहस्पति शिष्याला, ‘ शंकराचार्य ‘ म्हणून उद्घोषित केले.  तिथे शंकराचार्यांनी अत्यंत अवघड अशा ‘ विवेक चूडामणी ‘ नावाच्या  ग्रंथाची निर्मिती केली.  नर्मदामाई वाट पाहत होती की, या  शंकराचार्यांचे लक्ष आपल्याकडे कधी जाईल? 

एकदा खूप पाऊस आला.  मोठाच पूरही आला.  ही संधी साधून शंकराचार्य व त्यांचे गुरु ज्या गुफेत होते,  त्या गुफेत वरपर्यंत मैय्या प्रवेश करू लागली.  तेव्हा श्री शंकराचार्यांनी नर्मदा मैय्याची स्तुती करून, नर्मदाष्टक रचले व कमांडलूमध्ये मैय्याला बंदिस्त करून,  गुरूंच्या गुफेत येण्यापासून रोखले.  

नंतर बद्रिकाश्रमात गुरूंचे गुरु गौडपादाचार्य यांचे दर्शनास ते गुरुगोविंदयतींबरोबर गेले.  

त्यानंतर गुरूंनी त्यांना वाराणसी म्हणजेच, वारणा + असी या दोन नद्यांचा संगम,  त्यावर वसलेले वाराणसी येथे पाठवले. तेथे प्रस्थान त्रयीवर भाष्य करण्यास सांगितले. 

गणेश पंचरत्न स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, कालभैरवाष्टक इत्यादी अनेक स्तोत्रे, त्यांनी  रचली.

वाराणसीत आचार्यांची प्रवचने होऊ लागली.  प्रवचनाला भरपूर गर्दी होत असे.  आचार्यांचे शिष्यवैभव अपूर्व होते. एकदा एक वृद्ध भेटले. खूप प्रश्नोत्तरे झाली.  जेव्हा ते साक्षात विष्णू आहेत हे समजले,  तेव्हा आचार्य त्यांच्या पाया पडले.  तेव्हा श्रीविष्णूंनी आपले खरे रूप प्रकट केले. 

आचार्यांचे प्रस्थान- त्रयीवरचे भाष्य-लेखन पूर्ण झाल्यावर ते आपल्या शिष्यांसह गुरूंना भेटायला बद्रिकाश्रमात आले.  त्यांच्या या कर्तृत्वावर खूष होऊन,  आपल्या गुरूंच्या संमतीने,  गुरू गोविंदयतींनी आचार्यांना अद्वैत-वादाचा प्रसार करण्याचा आदेश दिला.

तिथून पुढे जात असता आचार्यांना साक्षात भगवान शिवांचे दर्शन झाले.  आचार्यांच्या प्रार्थनेवरून शिवांनी त्यांना अध्यात्म-संन्यास दिला.  त्याच क्षणी आचार्यांनी भगवान शिवांची मानसपूजा केली व रचली.  

एके दिवशी आचार्यांना समजले, की आपल्या मातेचा अंत जवळ आला आहे.  ती आपली आठवण काढत आहे.  ते कालडीला आले. आईच्या इच्छेनुसार आचार्यांनी त्यांना भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घडवले. “विजयी भव” असा आशीर्वाद देत,  तृप्त नजरेने पुत्राकडे पहात असतानाच आर्यांबा अनंताकडे झेपावल्या व चैतन्य, चैतन्यात विलीन झाले.

आचार्य संन्यासी असल्याने गावातील वैदिक ब्राह्मणांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना विरोध केला.  पण आचार्यांनी आईला तसे वचन दिले होते.  त्यामुळे आईचे अंत्यसंस्कार करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला.  सर्व मंडळी निघून गेली. आचार्यांचा शिष्य सुखाचार्य व आचार्य दोघेच राहिले. मध्ये काही वेळ गेल्यामुळे आईचा देह जड झाला होता.  तो एकट्यांना उचलणे शक्य नव्हते.  त्यांनी त्या देहाचे तीन तुकडे केले.  मृत्युंजयाचे स्मरण केले. आणि स्वतःच्या योगसामर्थ्याने त्या चितेला अग्नी दिला. आपल्याच हाताने मातेचे दहन केले.  

आईचे दिवस करण्यासाठी गावातील कोणी ब्राह्मण येईनात. त्याच वेळी तीन ब्राह्मण अतिथी म्हणून आले. आचार्यांचा वाडा रोज वेदघोषाने दणाणू लागला.  गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले,  की ते  तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.

– क्रमशः भाग पहिला. 

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-7… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-7…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

जैसा आपुल्याच बुबुळा

न पाही आपुला डोळा॥३१॥

 

ज्ञानरूप परमात्मा तैसा

आत्मज्ञाने जाणसी कैसा॥३२॥

 

मौनचि जेथे बोलणे

नसणेचि जेथे असणे

अज्ञानबाधा नसता जेणे

ज्ञानरूप परमेश लाभणे॥३३॥

 

जैसे लाटात जळाचे आस्तित्व

ज्ञाता ज्ञेय ज्ञानात असे एकत्व

ज्ञाता ज्ञेयाची सोयरीक होता

ज्ञान येई आपसूक हाता॥३४॥

 

आत्मज्ञान का दृग्गोचर होई

एकलेपणाने सर्वत्र राही॥३५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

१८ एप्रिल : जागतिक वारसा दिनलेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

आपल्या पूर्वजांनी आमच्यासाठी गुहा, मंदिरे, चर्च, स्मारके, किल्ले अशा अनेक गोष्टी ठेवल्या. त्यांच्या बद्दल आस्था निर्माण करण्यासाठी आणि पुरातनगोष्टी जतन व्हाव्यात यासाठी १८ एप्रिल हा ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) त्यांच्याकडून १९७२ मध्ये केलेल्या ठरावानुसार सांस्कृतिक अथवा निसर्ग वारसा यादी निश्चित केली जाते. सध्या जगातील १ हजार ३१ स्थळे या वारसा यादीत आहेत. 

जागतिक वारसास्थळांची सर्वाधिक संख्या इटली देशात आहे.ज्यात ५१ वारसा स्थळे आहेत. चीनमध्ये ४८, स्पेनमध्ये ४४ तर फ्रान्समध्ये ४१ आहेत. भारत ३२ वारसास्थळांसह सातव्या क्रमांकावर आहे. मेक्सिको ३३ व जर्मनी ४० स्थळांसह अनुक्रमे सहाव्या व पाचव्या स्थानांवर आहेत. आशियात चीन मध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत. सिंगापूरकडे फक्त सात स्थळे असूनही ते आपल्यापेक्षा जास्त पर्यटक आकर्षित करतात. १९८३ मध्ये भारतातील दोनस्थळे सर्व प्रथम या यादीत समाविष्ट केली गेली. ती म्हणजे आग्र्याचा किल्ला व अजंठ्याच्या गुंफा. आता ३२ भारतीय स्थळे त्या यादीत आहेत. त्यापैकी २५ सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत तर, ७ निसर्ग स्थळे आहेत. याशिवाय आणखी ५१ स्थळांचा प्रस्ताव भारताने युनेस्कोकडे पाठवला आहे. 

अमूल्य ठेवा वारसा स्थळे घोषित करण्यामागे त्या जागांचे संरक्षण व संवर्धन करणे व पुढच्या पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणे हे उद्दिष्ट आहे. त्यातून पर्यटन वाढीला चालना मिळते. त्यातून रोजगार वाढतो. देशाला बहुमूल्य परकीय चलन प्राप्ती होते. या स्थळांना जागतिक पर्यटन नकाशावर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जागतिक वारसा दिना निमित्ताने पुढील पिढी पर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवायचा असेल तर प्राचीन शिलालेख, मंदिरे, मूर्ती आणि शिल्पे यांना सरंक्षण मिळणे गरजेचे आहे.

लेखक : श्री संजीव वेलणकर

पुणे, मो. ९४२२३०१७३३, संदर्भ : इंटरनेट

संकलन : श्री मिलिंद पंडित

कल्याण

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

जगण्याचा पायाच नाच आहे. नृत्य हा शब्द कानावर पडताच नृत्याचे अनेक दृश्य लगेच डोळ्यासमोर येतात. आपल्या संस्कृतीत नृत्याला खूप महत्व आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं ऐकूनच आपण वयाने मोठे झालो आहोत. आज नृत्य पुराण आठवण्याचे कारण म्हणजे आज 29 एप्रिल आहे. हा दिवस जागतिक स्तरावर नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बॕले नृत्याचे आद्य संस्थापक जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या  आंतरराष्ट्रीय नृत्य संस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नृत्य कलेला आणि नृत्य कलावंतांना जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि प्रसार व्हावा हा उद्देश या दिनामागे आहे.

हर्ष, भीती, नाच या मानवाच्या मूलभूत भावना आहेत. वर्ण, प्रांत, देश, भाषा, वंश इत्यादी अनेक प्रकाराने मानव परस्परांपासून भेदित झाला असला तरी आनंद, भीती, हातवा-यांच्या खुणेची भाषा भूतलावरच्या समस्त मानवजातीसाठी एकच आहे. उदा. भूक लागली, तहान लागली, इकडे ये, तिकडे, जा, नको अशा अनेक क्रिया आपण खाणाखुणांनी दाखवू शकतो. नृत्य ही पण अशीच एक सर्वव्यापी नैसर्गिक भावना आहे. मनासारखं घडलं की माणुस मनातून डोलतो.

आपल्या भारतात दहा नृत्य शैली प्रसिध्द आहेत. भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा नृत्याशी संंबंधित अति प्राचिन ग्रंथ मानला जातो. कुचिपुडी, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिशी, कथकली, मोहिनीअट्टम या भारतातील अतिप्राचिन नाट्यपद्धती आहेत. भगवान शंकराचे तांडव नृत्य हा ही एक नृत्य प्रकारच. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या लोककलेचे अविभाज्य अंग आहे. पंजाबच्या भांगड्यावर व गुजरातच्या गरब्यावर ठेका धरणारेही खूपजन आहेतच.

नृत्य व नाचणे हे जरी समान अर्थाचे शब्द असले तरी आपल्याकडे नृत्य शब्द प्रतिष्ठेचा आब राखून आहे. नाचण्याच्या वाट्याला ती प्रतिष्ठा नाही. नृत्य हा प्रकार कला म्हणून मानला जाऊ लागला तेव्हापासून नृत्याची प्रकारानुसार नियमावली तयार झाली व त्यातली नैसर्गिक भावना लोप पावली. नाचता येईना अंगण वाकडे हे तेव्हापासून सुरु झाले. खरं म्हणजे नाचण्याचा व अंगणाचा काही संबंधच नाही. नाचणे ही पूर्णतः मानसिक क्रिया आहे. मनातारखा ताल मिळताच आपोआपच शरीर त्या तालाला प्रतिसाद देते हा नाच कलेचा अभिजात नैसर्गिक पुरावा आहे.

दुःख विसरुन पूर्णपणे वर्तमान आयुष्य जगायला शिकवणारी नृत्य ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. आंतरिक सुख भावनेशी शरीराचे पूर्ण मिलन हे नृत्याविष्कारतच घडते. आपली भारतीय सिनेसृष्टी तर नृत्यावरच उभी आहे. ताल, दिल तो पागल है, एबीसीडी, तेजाब, हम आपके है कौन, रबने बना दी जोडी अशा कितीतरी चित्रपटांना लाजवाब नृत्याने घराघरात पोहोचवलं. माधुरी, ऐश्वर्या, हेमामालिनी यांच्या पदन्यासाला न भुरळणारा माणूस भेटेल का ? तेरी मेहरबानियाँ मधला प्रामाणिक कुत्रा व त्याच्यावरचं टायटल साँग डोळ्यात पाणी आणतं. जय हो, सैराटची गाणी लागताच संपूर्ण तरुणाई थिरकायला लागते. ते यामुळेच. शांताबाई व शांताराम, आईची शपथ, चिमणी उडाली भूर्र या गाण्यांना तर लग्नापूर्वीचा एक अत्यावश्यक विधी अशी मान्यताच मिळाली आहे.

नृत्य हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. जगाची चिंता न करता, लाज या भावनेला मुरड घालून स्वतःसोबतच ताल धरणे हा आनंद निर्मितीचा सहजभाव आहे. संगिताचा कुठलाही अभ्यासक्रम माहीत नसताना लहान मूल स्वताःच्या तालातच नाचतं डुलतं ते सहजभावनेमुळेच. पण माणुस वयाने मोठा होत चालला की लाजेचा प्रभाव वाढत जातो व माणसं नाचणं सोडून देतात. जगातला एकच खुला रंगमंच असा आहे की जिथं माणूस नाचायला लाजत नाही, तो रंगमंच म्हणजे स्वतःचा पाळणा व लहाणपणीचं अंगण. अन् एकच मालिक आहे असा आहे की जो आपल्या नृत्याचं भरभरून कौतुक करतो तो म्हणजे आपली आई. एकदा हा काळ संपला की वरातीतलं मुक्त नाचणं सोडलं तर सगळेच नृत्यप्रकार नियमाधिन झालेले, त्यामुळे बंधनं येतात. शोलेमधला धर्मेंद्र (वीरू) बसंतीला (हेमा)  इन कुत्तोंके सामने मत नाच असं ओरडून ओरडून सांगतो. त्याच्या उलट गंगा जमुना सरस्वतीमधली सरस्वती आपल्या गंगासाठी(अमिताभ बच्चन) चालत्या ट्रकवरच नृत्य करते. गाण्यांच्या मैफलीत खलनायकांना रंगवून नायकाची सुटका करणं वा इप्सित साध्य, साध्य करणं हे प्रकार आपण सिनेमात पाहिलेले आहेतच. म्हणजेच नृत्य ही दिल लुभानेकी बात है, तशी ती शस्त्र म्हणूनही वापरता येणारी बाब आहे.

शास्त्रीय नियमावलीत नृत्याला अडकवून तालासुरात जगण्याचा एक सोपा मार्ग आपण ठराविक लोकांच्या हाती दिला आहे. नृत्याची सोपी व्याख्या म्हणजे मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंगविक्षेपाची जोड देणे होय. नृत्य कलेची प्रतिष्ठा जपून तिचा प्रसार करणाऱ्या सर्व नृत्य शिक्षकांना सलामच. दीर्घ, निरोगी व सहज सुंदर आयुष्यासाठी नाच मित्रा नाच.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  chambhareks79@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ६-१०  : देवता वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले  असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला  आवाहन करतात. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद : 

न॒हि ते॑ क्ष॒त्रं न सहो॒ न म॒न्युं वय॑श्च॒नामी प॒तय॑न्त आ॒पुः ।

नेमा आपो॑ अनिमि॒षं चर॑न्ती॒र्न ये वात॑स्य प्रमि॒नन्त्यभ्व॑म् ॥ ६ ॥

अविरत वाहत स्रोत जलाचा पक्षीराज  व्योमीचे

देवांनी जे दूर सारले कुदर्प वायूंचे

पासंगा तुमच्या ना कोणी तुम्ही बहुथोर

शौर्य तुमचे सामर्थ्य तसे कोप तुझा अति घोर ||६||

अ॒बु॒ध्ने राजा॒ वरु॑णो॒ वन॑स्यो॒र्ध्वं स्तूपं॑ ददते पू॒तद॑क्षः ।

नी॒चीनाः॑ स्थुरु॒परि॑ बु॒ध्न ए॑षाम॒स्मे अ॒न्तर्निहि॑ताः के॒तवः॑ स्युः ॥ ७ ॥

अमर्याद विस्तीर्ण व्योमा नाही आधार

पराक्रमी वरुणाने दिधला तरुस्तंभ आधार

विचित्र त्याचे रूप आगळे बुंधा त्याचा वर

अंतर्यामी त्याच्या आहे वसले अमुचे घर ||७||

उ॒रुं हि राजा॒ वरु॑णश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ ।

अ॒पदे॒ पादा॒ प्रति॑धातवेऽकरु॒ताप॑व॒क्ता हृ॑दया॒विध॑श्चित् ॥ ८ ॥

सूर्याच्या मार्गक्रमणास्तव वरूणे विस्तृत केला 

अतिचिंचोळ्या वाटेचा तो राजमार्ग  बनविला 

क्लेशकारी जे असते अप्रिय दुसऱ्यासी बोला ना 

वरुणदेव करी अति आवेगे त्याची निर्भत्सना ||८ ||

श॒तं ते॑ राजन्भि॒षजः॑ स॒हस्र॑मु॒र्वी ग॑भी॒रा सु॑म॒तिष्टे॑ अस्तु ।

बाध॑स्व दू॒रे निर्‍ऋ॑तिं परा॒चैः कृ॒तं चि॒देन॒ः प्र मु॑मुग्ध्य॒स्मत् ॥ ९ ॥

वरूण राजा तुमच्या जवळी ओखदे अनंत

अखंड दैवी तुझ्या कृपेने व्याधींचा हो अंत

गृहपीडेचे अमुच्या, देवा  निर्मूलन हो करा

हातून घडल्या पापांपासून आम्हा मुक्त करा ||९||

अ॒मीय ऋक्षा॒ निहि॑तास उ॒च्चा नक्तं॒ ददृ॑श्रे॒ कुह॑ चि॒द्दिवे॑युः ।

अद॑ब्धानि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ वि॒चाक॑शच्च॒न्द्रमा॒ नक्त॑मेति ॥ १० ॥

उंच नभांगणी ही नक्षत्रे चमचमती रात्री

तारकाधिपती चंद्रही उजळुन झळकतसे रात्री

अहोसमयी ना दर्शन त्यांचे कुठे लुप्त होती

आज्ञा या तर वरुणाच्या ना उल्लंघुन जाती ||१०|| 

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/j3hYU5Nri74

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10

Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ ☆

? इंद्रधनुष्य ?

रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल १६ अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी ६४ अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजुक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे।

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजुक्ता जर कधी आपल्या समोरून गेली, तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते, तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेही आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजुक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरही लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। असो. 

आसामसारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून, नंतर दिल्लीच्या जे एन यु मधून डिग्री घेणारी संजुक्ता २००६ मध्ये आयपीएस परीक्षा देशात ८५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। यु. एस. फॉरेन पॉलिसी विषयात तिने पीएचडी केल्यामुळे ती ‘ डॉक्टर संजुक्ता पराशर ‘ म्हणूनओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना ६ वर्षाचा मुलगा आहे। संजुक्ता आई त्याला सांभाळते।

संजुक्ताची पोस्टिंग २०१४ मध्ये आसाममधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजुक्ता सीआर पी एफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची, तेव्हा जवानांनाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरेकीही संजुक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शीर तळहातावर घेऊन फिरणाऱ्या संजुक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल १६ अतिरेकी मारले गेले आणि ६४ अटक झाले, तेही तिच्या अवघ्या १८ महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजुक्ता पराशर दिल्लीमध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वांनीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा !

माहिती संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

असं का होतं?

(Subconscious Mind)

– असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते.”

– एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?

– पैसे नाहीत, पैसे नाहीत, असे घोकणारा दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?

– आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसला तरी आर्थिक  फटका बसतोच बसतो,

– कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातच श्रम आणि राबणं असतं. असं का बरं असतं?

– का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणून पदरात पडतं?

– का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतात? 

— तर ह्या सगळ्यांसाठी एकच कारण आहे, आणि ते कारण आहे. —- 

आकर्षणाचा सिद्धांत.— लॉ ऑफ अट्रॅक्शन

तुम्हाला माहिती आहे का ?… जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, हा आकर्षणाचा सिध्दांत नियम आहे. काय सांगतो हा नियम?—- 

तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीच  आकर्षित केलेली  असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तिक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं….. जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालून जाईल ना?

…. अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनून तुमच्या जीवनात समोर येते.

उदा. — माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो आणि त्यामुळे  तुमचं कर्ज वाढतं. 

— माझं वजन वाढतंय, वजन वाढतंय म्हटलं की वजन अजूनच वाढतं.

— माझे केस गळतायत म्हटलं की अजूनच जास्त केस गळतात.

— माझं लग्न जमत नाही म्हटलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो.

— कर्ज माझा जीव घेणार म्हटलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात….. वगैरे वगैरे…

ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या Subconscious Mind म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.

— म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालंय अशी त्याच्या रंग, चव, आकार, गंध याच्यासह कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतंच मिळतं.—- फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवून देता यायला हवं– म्हणजेच त्याप्रकारच्या संवेदना तयार करुन त्यात रंग भरून कल्पना करावी.  यालाच Creative Visualization अशी संज्ञा आहे.

— अगदी मरणाच्या दारात पोहोचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली, पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन, सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर दृढ विश्वास ठेवून पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता. आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणून तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, ठराविक स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्‍यावर समाधानाचे भाव ठेवून मनात ही वाक्ये पूर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा:…. 

१ )  स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवन मी जगत आहे.

–  ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

२ )  मी सुंदर आहे, तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

३ ) मी धैर्यवान, बलवान, सुज्ञ आणि विवेकी आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

४ ) मी समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

५ ) माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

६ )  मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

७ ) तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप खूप आभारी आहे.

याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसूचना– Auto  Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होऊन दिवसभर एक आगळीवेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.

तुम्ही हे जर मनापासून, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार  बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍याही करुन दाखवेल.

यात अट एकच असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसूचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्यात. इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसूचना बुमरॅंगसारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.

— म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचाराविषयी सजग रहा. कधीकधी वरवर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.

— उदाहरणार्थ “मी कधीच आजारी पडणार नाही.” हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे. त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी “मी आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे” हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.

इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल, अनुभव येईल.

आपणही आपल्या आयुष्यात ही शुभ सुरुवात करावी आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा !

— आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महानायक”… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “महानायक “… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

” राम ” आणि ” कृष्ण ” हे भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !! 

एकाने “अयोध्या ते रामेश्वर”, तर दुसऱ्याने “द्वारका ते आसाम” पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत गेली हजारो वर्षे या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!

तसं पाहिलं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे. एकाचा जन्म रणरणत्या उन्हाळ्यात दुपारी, तर दुसऱ्याचा मुसळधार पावसाळ्यात मध्यरात्री !! 

एकाचा राजमहालात तर दुसऱ्याचा कारागृहात !!

साम्य म्हणावं तर दोघांच्याही हातून पहिले मारल्या गेल्या त्या राक्षसिणी….. त्राटिका आणि पुतना ! 

शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जातात. 

ज्यांच्यामुळे त्यांच्या चरित्राला वेगळे वळण लागले, त्या कैकेयी आणि गांधारी एकाच प्रांतातल्या…ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यांनी स्वीकारले.!! 

एकाने सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून दिले, तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !

एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला, तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!! 

एकाने पुत्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला, तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.

एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले, तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.

एकाने अंगदाकरवी, तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जात, शिष्टाई करत, युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.

एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली, तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.

एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली, तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातून मृत्यू पत्करला.

एक Theory…. तर…दुसरा Practical !! 

दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत, आपल्या चरित्राच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता, ह्या देशापुढे दीपस्तंभ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील राहील.!!

जय श्रीराम … जय श्रीकृष्ण !!

इदं न मम …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-6… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-6…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

दर्पण असो वा नसो जगी

मुख असते मुखा जागी

जैसे असते तैसे दिसते

ते का कधी वेगळे भासते॥२६॥

 

आपले मुख आपणची पाही

म्हणून का त्यांसि द्रष्टत्व येई

दर्पणी असे अविद्येने भासे

ते खरे मानता विज्ञान फसे॥२७॥

 

म्हणोनि दृश्य पाहता धरी ध्यानी

फसवे हे, परमात्म वस्तु हो मनी॥२८॥

 

वाद्यध्वनी वाचूनही ध्वनी असे

काष्ठाग्नी वाचूनही अग्नी असे

तैसे दृश्यादि भाव जरी नष्टत

मूलभूत ब्रम्हवस्तु असे सदोदित॥२९॥

 

जी न ये शब्दात वर्णता

असतेच परि, जरी न जाणता

तैशी वर्णातीत ब्रम्हवस्तु असे

शब्द, जाणिवांच्या परे असे॥३०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हसरा बुध्द…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “हसरा बुध्द…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

पोखरण येथे १९७४ आणि १९९८ ला भारताने अणुचाचणी घेतली, त्या दोन्ही दिवशी बुध्दपौर्णिमा होती.

१९७४, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताने सर्वप्रथम अणुचाचणी घेतली, त्या संपूर्ण प्रकल्पाला *’Operation Smiling Buddha’ (‘हसरा बुध्द’) असं नाव देण्यात आलं होतं.

अणुचाचणी यशस्वी झाली आहे, हे सांकेतिक भाषेत पंतप्रधानांना कळवण्यासाठी ‘The Buddha Has Smiled’ (‘बुध्द हसला आहे’) हा कोड वापरण्यात आला होता.

१९९८ ला अटलजींच्या कार्यकाळात झालेल्या अणुचाचणीचे वैज्ञानिक सल्लागार होते – एपीजे अब्दुल कलाम. यशस्वीतेनंतर त्यांना सर्व शास्त्रज्ञांच्या चमूने ‘बोधीवृक्षाखालील ध्यानस्थ बुध्दा’ची प्रतिमा भेट म्हणून दिली होती.

१९९८ च्या प्रकल्पावर काम केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी पूर्वी माझी भेट झाली. खूप माहिती मिळवल्यावर, वरील बाबींवर आधारलेली मी एक शंका सरांना विचारली,

— “सर, बुध्द हे तर अहिंसेचे प्रणेते आणि अण्वस्त्र हे तर महाविनाशक, हिंसेचं सगळ्यात विक्राळ स्वरूप जगाने हिरोशिमा-नागासाकीच्या अणुहल्ल्यात बघितलं. मग अण्वस्त्रसज्ज होताना, भारताने ‘बुध्द’ या प्रतीकाचा वापर का केला? हे विसंगत नाही का?”

सर हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली —

एका गावाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक जवळची वाट आणि एक वळणाने गेलेली लांबची वाट.

जवळच्या वाटेवर नागाचं मोठं वारूळ होतं. नाग क्रूर होता. वाटेवर कुणी दिसलं की तो दंश करत असे. माणसं जागीच मरत. नागाने अशी अनेक माणसं मारली होती. लोकांनी अखेर ती वाट वापरणंच बंद केलं. गावकरी, गावाला येणारे जाणारे प्रवासी, सर्वजण लांबच्या वाटेने जात.

एकदा त्या गावात एक योगी आला. मोठा सिद्धपुरूष होता. गावक-यांनी योग्याकडून ज्ञान-उपदेश घेतला, त्याचं आतिथ्य केलं. योगी निघाला, तेव्हा गावक-यांनी त्याला जवळच्या वाटेने न जाण्याचा, लांबचा रस्ता पकडण्याचा सल्ला दिला. योग्याने कारण विचारलं, तेव्हा गावक-यांनी नागाची हकीकत सांगितली.

योगी म्हणाला, “मला मृत्यूची भीती नाही. मी नागाला वठणीवर आणतो. चला माझ्या मागोमाग.”

गावक-यांना वाटलं, हा भलताच सिद्धपुरूष दिसतोय. काही चमत्कार पहायला मिळणार, म्हणून गावकरी त्याच्या पाठोपाठ गेले.— योगी वारुळापुढे जाऊन उभा राहिला, गावकरी भयाने जरा दूर थांबले.

आपल्या वाटेवर कुणी आलंय हे बघून नागाचा संताप झाला. नागाने चवताळून फणा काढला, योग्याला डसणार तोच योगी म्हणाला – “मला मारून तुझा फायदा काहीच होणार नाही. उलट तुझ्या भक्ष्यासाठी जमवलेलं तुझं हे बहुमोल विष मात्र वाया जाईल. नुकसान माझं नाही, तुझंच आहे.”

नागाला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा त्याला कुणीतरी न भिणारा भेटला होता.

नाग म्हणाला, ” ही वाट माझी आहे. इथे कुणालाही येण्याची परवानगी नाही.”

योगी म्हणाला, “हा तुझा अहंकार आहे. तुझ्या जन्माच्या आधीही हे गाव आणि ही वाट अस्तित्वात होती. उलट तुझ्या भीतीने लहान मुलं, म्हातारे, रुग्ण, या सर्वांना दूरच्या वाटेनं जावं लागतं. किती लोकांचा जीव घेतलायस तू. सोडून दे ही हिंसा. अहिंसेचा मार्ग धर. लोकांना दंश करणं सोडून दे. ते तुझं भक्ष्य नाहीत.”

नागाला हे पटलं. त्याने अहिंसेचा मार्ग पत्करला. गावकरी आनंदले. योगी तिथून निघून गेला. ती वाट पुन्हा वापरात आली.

काही महिने गेले. योगी परिव्रजा करत परतीच्या मार्गावर होता. पुन्हा ते गाव लागलं. नागाशी भेट होईल म्हणून योगी त्या मार्गाने गेला, वारुळापाशी पोचला.

नाग वारूळाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत, विव्हळत पडलेला दिसला. योग्याने त्याच्या या अवस्थेचं कारण विचारलं, तेव्हा नाग रडत म्हणाला — 

“तुमचं ऐकून मी दंश करणं सोडून दिलं आणि लोक हा रस्ता वापरू लागले. मी त्यांना कुठलाही त्रास देत नाही. पण टवाळखोर लोक मला काटे टोचतात. मला लाथाडून निघून जातात. लहान मुलंसुध्दा मला बोचकून गंमत बघतात.”

योगी म्हणाला, ” तू इतक्यांचे जीव घेतलेस, त्या कर्माचं फळ तुला मिळतंय. बघ, लोकांच्या मनात किती घृणा निर्माण केली होतीस तू स्वतःबद्दल.”

नाग वैतागत म्हणाला, “असंच सुरू राहिलं तर हे लोक जीव घेतील माझा. काय रुबाब होता माझा पूर्वी, तुमच्या अहिंसेच्या उपदेशाने वाटोळं केलं माझं.”

मग योगी म्हणाला— 

“बाबा रे, दंश करू नकोस असं मी सांगितलं होतं. पण फुत्कार करण्यापासून तुला कोणी रोखलं होतं? कुणी त्रास देऊ लागल्यावर, तू केवळ फणा उभारून फुस्स केलं तरी समोरचा भीतीने दहा पावलं मागे सरकला असता. तुझी ही अवस्था अहिंसेमुळे नाही, तर अहिंसेचा तू चुकीचा अर्थ लावल्यामुळे आहे.”

गोष्ट संपली. सर म्हणाले, ” भारताने घेतलेली अणुचाचणी हा स्वसंरक्षणासाठी केलेला फुत्कार होता असं समज. कारण दुबळ्या लोकांच्या अहिंसेला किंमत नसते. तिबेट अहिंसावादी राष्ट्र. दुबळे राहिल्यामुळे चीनने गिळंकृत केलं. अखेर दलाई लामांना आश्रय दिला तो भारताने…..                     

…. स्वतः बलशाली असल्यामुळेच भारत अहिंसेच्या पुजा-यांना आश्रय, संरक्षण देऊ शकतो.”

त्या नागाला कितपत कळलं होतं ठाऊक नाही. मला मात्र पुरेपूर कळलं.

।। बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ।।

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares