मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोपट – भाग – 1– लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? जीवनरंग ❤️

☆  पोपट – भाग – 1 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

१९९५ साल असावे. तेव्हा लॅण्डलाइन फोनचा जमाना होता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्हा तिघांना ( मी, बायको, आई ) आत्याने फराळाला बोलावले होते.  दरवर्षी दिवाळीचा एक एक दिवस आम्ही एकमेकांकडे जात असू.

सकाळी आठ वाजता नितीनने दरवाजा उघडताच त्याची साडेतीन वर्षांची गोड मुलगी बब्ली हाॅलमधेच खाली फुलबाज्यांच्या पेट्या, सापाच्या गोळ्या, रंगीत काडेपेट्या वगैरे फटाके मांडून बसलेली दिसली. श्रेया बेलचा आवाज ऐकून लगबगीने बाहेर आली. आत्या किचनमधे देवपूजा करत असावी. कारण देव्हार्यातल्या घंटेचा किणकिणाट ऐकू येत होता.

“काल सकाळी आत्या घरी नव्हती का?” मी श्रेयाला विचारले.

” परवा त्या त्यांच्या नणंदेकडे गिरगावात राहिल्या होत्या, काल संध्याकाळी आल्या.” श्रेयाने सांगितले.

” तरीच!” मी हसत उद्गारलो.

” काय झाले?”

” ते आता नितीन सांगेल.”

मी हसू आवरत म्हणालो, “नितीन, काल सकाळी साडेसातला मी तुला आमचे आजचे येणे कन्फर्म करायला फोन केला. तू बर्‍याच वेळाने फोनवर आलास.”

” काल वसूबारस होती. मी  बब्लीला उटणं लावून आंघोळ घालत होतो. दिवाळीत ही ड्यूटी माझी असते.” नितीनने श्रेयाकडे बघत उत्तर दिले. यावर तिने फक्त मान उडवली.

“नितीनराजा फोन आधी तुझ्या बब्लीनेच उचलला, मी तिला, ‘तू काय करतेस’ हे विचारले, तर तिने ‘कार्टून बघतेय’ असे उत्तर दिले. त्यानंतर माझ्या सांगण्यावरून ती तुमच्यापैकी कुणाला तरी बोलवायला गेली.” आता खर सांग, “तू कुणाच्या बब्लीला उटण लावून आंघोळ घालत होतास?”

नितीनचा चेहेरा पहाण्यासारखा झाला. श्रेया उठून घाईघाईने किचनमधे गेली. आईने न ऐकल्यासारखे केले आणि माझ्या बायकोने मला एक करकचून चिमटा काढला!

” तूला काय करायचय?” बायको पुटपुटली.

” मला फक्त खात्री करायचीय!”  मी साळसूदपणे म्हणालो.

“तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही,” असे म्हणून तीही किचनमधे आत्या आणि श्रेयाशी बोलायला निघून गेली.

बाहेर टिव्हीवर कार्टून चालू होते आणि नितीन गप्प राहून ते बघण्यात गुंग आहे असे दाखवत होता. अशीच दहा मिनीटे गेली.

तेवढ्यात आत्या किचनमधून श्रेया आणि बायकोला घेवून बाहेर आली. आम्ही सर्वजण डायनिंग टेबलवर फराळासाठी बसलो. श्रेया खालमानेने सर्वांच्या डिशेश भरू लागली. आई म्हणाली, ” काय रे तूम्ही दोघं आता बब्लीच्या भावंडाचा विचार करताय ?”      

” नाही मामी.” दोघेही ठामपणे एकाच सुरात म्हणाले. नितीनचा हात अभावितपणे पोटावर गेला. मला श्रेयाने मारलेला तो प्रसिद्ध गुद्दा आठवलाआणि हसू आले

” अरे मग निदान बब्लीला खेळायला एखादं कुत्र- मांजर तरी आणा.” आईने सल्ला दिला. 

“काही नको वहिनी, हे दोघे रोज सकाळी नोकरीसाठी बाहेर पडणार. मग मलाच त्याचे सर्व करावे लागणार.” आत्याने नाराजी दर्शवली.

” नितीन त्यापेक्षा तू पूर्वीसारखा पोपट का आणत नाहीस? त्याचे फार काही करावे लागत नाही.” मी अल्टरनेटिव्ह दिला.

“पूर्वी तुमच्याकडे पोपट होता?’

श्रेयाला आश्चर्य वाटले.

“एवढंच नाही तर बालपणी नितीनला चाळीत नीतीनशास्त्री म्हणायचे.”

“आता हे काय नवीन? मला कळलेच पाहिजे.” श्रेया लगेच सरसावून बसली.

“तो बराच मोठा किस्सा आहे.”

पुढच्या आठवड्यात आपण चौघे महाबळेश्वर ट्रिपला जाणार आहोत तिथे आम्ही तो दोघे मिळून सांगू.”

हे ऐकताच नितीनच्या चेहेर्‍यावर त्याचे सिग्नेचर (बनेल) हास्य उमटले आणि मी समाधान पावलो.” 

**** 

त्यापुढच्या आठवड्यात आम्ही चौघेजण आमच्या मुलांना त्यांच्या आज्यांकडे सोपवून तीन दिवसासाठी महाबळेश्वरला आलो. छान थंडी पडली होती. रात्री हाॅटेलच्या आवारात मोठी शेकोटी पेटलेली होती. जेवणे झाल्यावर त्या शेकोटी भोवती आम्ही गप्पा मारत बसलो. श्रेयाने लगेच पोपटाचा विषय काढला.

नितीन सांगू लागला, ” मी प्रायमरी शाळेत असताना आम्हाला हिरव्या रंगाचे आणि लाल चोचीचे पोपटाचे पिल्लू कोणीतरी आणून दिले. ते इतके लहान होते की त्याला उडता देखील येत नव्हते. त्यामुळे त्याच्या पिंजऱ्याचे दार आम्ही उघडेच ठेवत असू. पिलू घरभर फिरे. ते कधी खांद्यावर बसून हातातली हिरवी मिर्ची खाई तर कधी वाटीतली कच्ची डाळ खाई. ते नर आहे की मादी हे न कळल्याने  त्याचे आम्ही तेव्हा नामकरण केले नाही.”

“मी तेव्हा अभ्यासाची एक रंजक पद्धत शोधली होती. शाळेची सर्व पुस्तके मी पिला पुढे पसरून ठेवे. मग चोचीने जे पुस्तक ते पहिल्यांदा पुढे ओढे त्याचाच मी अभ्यास करीत असे. यामुळे माझे कित्येक विषय मागे पडत. मग वर्षाअखेरी ते कव्हर करताना आईचा घाम आणि माझी सालटे निघत.”

नितीन थांब, मी उत्साहाने म्हणालो, “याच्या पाचवीच्या व माझ्या नववीच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही नाशिकला आजी- आजोबांकडे एकत्र गेलो होतो. तिथे महिनाभर खूप मजा केली. रोज गंगेवर फिरायचो, पोहायचो, सरकार वाड्यातल्या वाचनालयात जायचो.”

“पण इच्छा असुनही आम्हाला अकबर सोडा वाॅटर फॅक्टरीचा काश्मीरी सोडा, भगवंतरावची दुध-जलेबी  आणि पांडे मिठाईवाल्याचे गुलाबजाम रोज खाणे परवडत नसे. याला कारण अपुरा पॉकेटमनी! त्यावेळी मुलांचा पॉकेटमनी ही आमच्या नोकरदार वडिलांसाठी खर्चाची लास्ट प्रायोरिटी असायची. तेव्हा वाटायचे हे जर व्यवसाय करत असते तर अशी वेळ आमच्यावर आली नसती. मला त्यावेळी प्रथमच समाजशास्त्राच्या सरांनी म्हटलेल्या, “मराठी माणूस हा मुळातच व्यवसायाभिमुख नाही” या वाक्यातील कळकळ कळली. मग  नितीनचे बौद्धीक घेत त्याला, “कोणत्याही व्यवसायास वयाची अट नसते, ती फक्त नोकरीसाठी असते,” हे सरांचे वाक्य गंभीरपणे ऐकवले.

मला तिथेच रोखत नितीन पुढे सांगू लागला, “मग असे मन मारून जगण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करून पैसे मिळवावे असे आम्ही ठरवले.”

“गंगेवर अनेक ज्योतिषी पोपट घेवून भविष्य सांगायला बसलेले असत. बाया- बापड्या त्यांना हात दाखवून आपल्या भविष्याचा वेध घेत. मी ते कुतुहलाने पहात असे. दोन रूपये घेतल्यावर ते ज्योतिषी पत्त्यांसारखी बरीच पाने पसरत. त्यानंतर पिंजर्‍यातल्या पोपटाला बाहेर सोडत. पोपट रूबाबात त्यातला एक पत्ता चोचीने पुढे ओढे. मग त्या पत्त्याच्या मागच्या बाजूला छापलेले भविष्य वाचून दाखवले जाई.”

” बराच काथ्याकूट केल्यावर दादाने वाचनालयाचा तर मी ज्योतिषाचा व्यवसाय करायचे ठरवले! हे दोन्ही धंदे आमच्या बजेटमधे बसत होते.”

“दादाच्या घरी विकत घेतलेली आणि लोकांची वाचायला आणून परत न दिलेली अशी शंभरहून अधिक पुस्तके होती तर माझ्या घरी वेल ट्रेंड पोपट होता.”

” सर्वप्रथम आम्ही दोघांनी काळ्या रामाच्या मंदिरात जावून, मराठी माणसा सारखे कूपमंडूक वृत्तीने न वागता, गुजराथी समाजाचा आदर्श ठेवून, व्यवसायासाठी जमेल तितकी मदत एकमेकांना करायची अशी शपथ घेतली.”

” मग पुढील दोन आठवडे सरावासाठी दादा वाचनालयात आणि मी ज्योतिष वृंदात जावून बसू लागलो.”

नितीनला थांबवून त्यापुढील गंमत मी सांगू लागलो, “पुस्तकांचे नंबरींग, रेकॉर्ड, जतन, नियोजन तसेच वाचकांचे रजिस्टर, ‘फी’चे हिशोब हे तिथल्या काकांकडून मी नीट शिकून घेतले. तर नितीनने भविष्य कथनातील ग्यानबाची मेख ठरेल अशी ‘चपखल भविष्यवाणी’ शिकून घेतली. अशा रितीने आमचा धंद्याचा क्रॅश कोर्स पुर्ण झाला. परत आल्यावर मी वाचनालय सुरू करायचे ठरवले. नितीनने कुठूनतरी एका नामशेष झालेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाची जीर्ण पाटी शोधून आणली आणि तिच्यावर ‘विद्यार्थी वाचनालय’ असे रंगवले. त्याबदल्यात मीही नितीनला जुन्या बाजारातून एका बाजूला भविष्य छापलेला पत्त्यांचा कॅट आणून दिला. अशा रितीने आमच्या व्यवसायाची सामग्री पूर्ण झाली. मग एक नवीनच अडचण उद्भवली. लोकांकडून आणलेल्या प्रत्येक पुस्तकांवर त्यांच्या नावापुढे ” xxx याजकडून विद्यार्थी वाचनालयास सप्रेम भेट” असा मजकूर लिहूनही काही उपयोग झाला नाही. लबाड वाचक आपल्या पुस्तकांवर मालकी हक्क सांगून व्यवसायात भागीदारी मागू लागले. शेवटी नाईलाजाने सर्व भागधारकांना फी माफ करावी लागली. मग माझ्या पॅसीव्ह स्वभावानुसार फक्त पैसे देणार्‍या गिर्‍हाईकांची वाट बघणेच उरले. पण नितीन ॲक्टीव्ह होता. त्याने जणू व्यवसायाचे व्रत घेतले होते. नाशिकहून आल्यापासून नितीनने वागणे बदलले. तो सकाळी सात वाजता आंघोळ आटपून, त्याला मुंजीत घेतलेला जांभळा कद नेसून, उघड्या अंगाने देवपूजा करू लागला. ओल्या केशरी गंधात धागा बुडवून त्याच्या तीन रेषा जेव्हा तो आपल्या गोर्‍या कपाळावर ओढे तेव्हा साक्षात सोपानदेवच आळंदीहून अवतरलेत असे वाटे. आत्या नितीनच्या ह्या नव्या रूपाने चकित झाली. खूप खोदून विचारल्यावर नितीनने आत्यास त्याला पंचवटीतल्या  धुम्डूम महाराजांनी दीक्षा दिल्याचे सांगितले. आत्याला दीक्षा (आपणहून) घेतात हे माहीत होते पण हा (न मागता) देण्याचा प्रकार नाशकात नव्याने सुरू झाला असावा असे वाटले.

एके दिवशी त्याचे बाबा घरात नसताना नितीनने देवपूजा आटोपल्यावर ज्योतिर्विद्येचा पहिला प्रयोग आत्यावर केला. तिला समोर बसवून, धुपाच्या धुरात डोळे झाकून पाच मिनीटे ध्यान लावले. मग आवाजाच्या एका वेगळ्याच टिपेत त्याच्या रूपाने पंचवटीतील ध्यानस्थ धुम्डूम महाराज बोलू लागले –

” माई, तुझा भूतकाळ मला स्पष्ट दिसतोय… तुझं आयुष्य फार खडतर गेलं … संसारात सूख नाही… कष्टाला फळ नाही… तू सगळ्यांसाठी खूप केलेस… पण कुणाला त्याची जाण नाही… काम झाल्यावर ते मिरवले… तूला खड्यासारखे बाजूला काढले… तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला … तुझ्या सरळ बोलण्याचा तिरका अर्थ काढला … वाईट घटनांचा दोष तुझ्या माथ्यावर लादला … तुझ्या पायात लक्ष्मी आहे … गृहकलहामुळे ती उंबर्‍यापाशी अडली आहे … पण लवकरच इडा-पिडा टळणार आहे… तुझे ग्रह बदलणार आहेत… त्यासाठी येत्या चंद्र नवमीला कडक उपास ठेव… गुळ घालून केलेल्या रव्याच्या खिरीचा नैवेद्य सायंकाळी शनिपारापाशी ठेव…  मगच अन्न ग्रहण कर… ओम शांती… सुखी भव!”

एवढे बोलून झाल्यावर नितीनने सावकाश डोळे उघडले व तो  आत्याची प्रतिक्रिया पाहू लागला. आपल्या पूर्वजीवना विषयीचे असे अचूक भाष्य ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. तिने उठून नितीनला  पोटाशी धरले. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे याची तिला खात्रीच झाली. आपण गरोदर असताना एकदा आळंदीला गेलो होतो हे तिला आठवले. तिथेच कुणातरी पुण्यात्म्याने आपली कुस धन्य केली असावी असे तिला वाटले.  

क्रमश: भाग –१

लेखक – श्री रविकिरण संत

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पीळ… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले – आता तुही २८ वर्षाचा असशील.मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल.मी असं करतो,मुली बघायला सुरुवात करतो” – आता इथून पुढे)

“पण तू पाठवलेली स्थळं बाबांना चालणार नाहीत “

“तेही खरंच आहे.पण तुझ्या बाबांचे नातेवाईकही तुझ्यासाठी स्थळं पाहतील असं वाटत नाही “” बरोबर. बाबांचं त्यांच्याशीही पटत नाही. तूच मुली पहा पण मुलीकडच्यांना सांगून ठेव की ते बाबांना भेटल्यावर तुझ्या ओळखीचा उल्लेखही करणार नाहीत.”

“चालेल.तू काही काळजी करु नकोस. मी करतो सगळं व्यवस्थित.”

” मामा मुलगी अशी खमकी पहा की तिने बाबांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे “

मामा हसला.  ” बरोबर आहे तुझं.मनात आणलं तर तीच सरळ करु शकते त्यांना.बघतो तसं “त्याने फोन ठेवला.वैभवला हायसं वाटलं.बहिण गेली तरी मामाने भाच्याशी संबंध तोडले नव्हते.

एक दिवस वैभव संध्याकाळी घरी आला पण घरात शांतता पाहून त्याला आश्चर्य वाटलं.यावेळी त्याचे वडील टिव्हीवरच्या बातम्या बघत बसलेले असत.

“बाबा ss”त्याने हाक मारली.पण उत्तर आलं नाही. बुट काढून तो जयंतरावांच्या बेडरुमकडे गेला.पाहतो तर जयंतराव पलंगाखाली अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते.

“काय झालं?” त्याने विचारलं “पलंगावरुन पडलात का?”

त्यांनी ओठ हलवले.पण तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही.

“बोला ना! काय झालं?”

त्यांनी परत ओठ हलवले.पण घशातून आवाज बाहेर आला नाही.

“बरं ठिक आहे. उठा पलंगावर झोपा “

त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाकडे इशारा केला.वैभवने उजव्या पायाला हात लावून पाहिला.त्यांचा पायजमा वर करुन पाहिला.तिथेही काही जखम नव्हती.

” काही तर झालेलं नाहिये.बरं ठिक आहे.मी तुम्हांला उचलतो “

त्यांच्या काखेतून दोन्ही हात घालून त्याने त्यांना उचललं पण जयंतराव पायच टेकवत नव्हते.मोठ्या मुश्कीलीने त्याने त्यांना पलंगावर बसवलं.

“झोपा आता “

जयंतरावांनी परत एकदा डाव्या हाताने उजवा पाय आणि हाताकडे इशारा केला.वैभवने त्यांच्या उजव्या पायाकडे पाहिलं.तो निर्जीवपणे लटकत होता.वैभव चमकला. एकदम त्याच्या लक्षात आलं आणि तो मुळापासून हादरला.त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला होता.त्यात त्यांची वाचा तर गेली होतीच पण उजवा पाय आणि हात कामातून गेले होते.तो बराच वेळ सुन्नावस्थेत बसून राहिला. हजारो विचार त्याच्या डोक्यात दाटून आले.मग त्याच्या लक्षात आलं.असं बसून चालणार नव्हतं.त्यांना ताबडतोब हाँस्पिटलमध्ये अँडमीट करणं गरजेचं होतं.त्याने अँम्ब्युलन्सला फोन लावला.एका चांगल्या हाँस्पिटलमध्ये अँडमीट केलं.त्याचा संशय खरा ठरला होता.तो पँरँलिसीसचाच अटँक होता.

“डाँक्टर ते बरे होतील का यातून?”त्याने चिंतातूर आवाजात डाँक्टरांना विचारलं.

“आपण प्रयत्न करु.पण रिकव्हरीला किती वेळ लागेल आपण सांगू शकत नाही. तुम्हांला आता त्यांची खुप काळजी घ्यावी लागेल.त्यांचं सगळं बेडवरच करावं लागणार आहे.तेव्हा त्यांना स्वच्छ ठेवणं, रोज मालीश करणं,वेळच्या वेळी मेडिसीन देणं या गोष्टी तुम्हांलाच कराव्या लागणार आहेत. “

वैभवने मान डोलावली आणि तो विचारात गढून गेला.थोड्या वेळाने त्याने सगळ्या नातेवाईकांना कळवलं.नातेवाईक येतीलही.दोनचार सहानुभूतीचे शब्द बोलतील पण जयंतरावांच्या सेवेसाठी कुणीही थांबणार नाही हे त्याला माहित होतं.मामा आला तेव्हा तो त्याच्या गळ्यात पडून खुप रडला.

“वैभव एखादा माणूस लावून घे त्यांचं सगळं करायला.म्हणजे तू मोकळा रहाशील. “

” अशी माणसं खुप पैसे मागतात मामा शिवाय मी घरात नसेन.त्याने घरात चोऱ्याबिऱ्या केल्या तर?”

” ती रिस्क तर आहेच पण पर्याय तरी काय आहे?तुला एकट्याला ते करणं कठीण आहे.आणि पैशांची काही काळजी करु नकोस.मी देत जाईन “

“ज्या बाबांनी तुला आयुष्यभर शिव्या दिल्या त्यांच्या सेवेसाठी तू पैसे देणार?”

” मी तुझ्यासाठी करतोय हे सर्व. तुझं आरोग्य आणि मनःस्वास्थ्य बिघडू नये म्हणून “

वैभव गहिवरला.त्याने परत मामाला मिठी मारली.

पंधरा दिवसांनी तब्येतीत काहीही सुधारणा होत नाही हे पाहून जयंतरावांना घरी पाठवण्यात आलं.वैभवने घरात आल्यावर त्यांना पलंगावर झोपवलं.त्यांच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं.तिथे कोणत्याही भावना त्याला दिसल्या नाहीत. त्याच्या मनात विचार आला ‘या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्यात घालवलं.आज हा असा लाचार होऊन पडलाय.बरी जिरली.आता कुणावर हुकूमत गाजवणार?ती घमेंड ,अहंकार यांना कसं कुरवाळणार?खरंच छान झालं.देवाने छान शिक्षा केली.आता तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून रहाणार.आता मीच कसा तुम्हांला नाचवतो बघा.’

त्याने आनंदाने जयंतरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते त्याच्याचकडे पहात होते.मात्र आता त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं.ते वैभवबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं स्मित होतं की वैभवची थट्टा करणारं होतं ते वैभवला कळलं नाही. थोड्या वेळाने त्याला कळलं आणि तो हादरुन गेला.त्या स्मितामागचा अर्थ त्याला कळला होता.ते विजयाचं हसू होतं.विकलांग होऊनही जयंतरावांची सरशी झाली होती. लोकलाजेस्तव का होईना वैभवला वडिलांची सेवा करावीच लागणार होती .त्यांची तब्येत अजून बिघडू नये म्हणून त्यांच्या आरोग्याची जास्तच काळजी त्याला घ्यावी लागणार होती.वडिल विकलांग आहेत म्हणून त्याच्याशी कुणी मुलगी लवकर लग्न करणार नव्हती.कदाचित ते जिवंत आहेत तोपर्यंत त्याचं लग्न होणं कठीण होतं किंवा मग रुप,शिक्षण,सामाजिक दर्जा विसरुन,अनेक तडजोडी स्विकारुन वैभवला मुलगी निवडावी लागली असती.म्हणजे बायकोबद्दल ज्या ज्या कल्पना त्याने केल्या होत्या,जी जी स्वप्नं रंगवली होती ती पुर्णत्वाला येणं अशक्यच दिसत होतं.

त्या विचारासरशी वैभवचं डोकं तापू लागलं.वडिलांकडे पहात तो संतापाने ओरडला,

“झालं समाधान?आयुष्यभर माझ्या आईचा छळ केलात,तिच्या माहेरच्यांचा छळ केलात.आता मीच उरलो होतो तर माझाही छळ सुरु केलात ना?मी आता कामंधामं सोडून फक्त तुमच्याकडेच बघत रहायचं का?माझीही काही स्वप्नं आहेत,काही महत्वाकांक्षा आहेत.त्या सगळ्यांवर मी तुमच्यासाठी पाणी सोडायचं का?…..……”

तो संतापाने ओरडत होता.त्यांच्या दुष्ट वागणुकीचा इतिहास उकरुन काढत होता.

जयंतराव बोलू तर शकत नव्हते पण मुलाच्या अशा ओरडण्याने ते घाबरुन गेल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.जोरजोराने बोलता बोलता एका क्षणी वैभवचा तोल गेला आणि तो किंचाळून म्हणाला,

“असा माझा मानसिक, शारीरिक छळ करण्यापेक्षा तुम्ही मरुन का नाही गेलात?”

ते ऐकून आधीच भेदरुन गेलेले जयंतराव घशातून विचित्र आवाज काढत ढसाढसा रडू लागले.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.बापाला इतकं केविलवाणं रडतांना वैभव आज पहिल्यांदाच पहात होता.त्याच्यातल्या संतापाची जागा हळूहळू करुणेनं घ्यायला सुरुवात केली.ह्रदयाला पीळ पडू लागला.त्याला लहानपणापासूनचे वडील आठवायला लागले.एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे लाड करणारे,त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे,त्याला थोडंही काही लागलं की कासावीस होणारे,सायकलवरुन त्याला शाळेत पोहचवणारे,त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करणारे,त्याचा प्रत्येक हट्ट पुरवणारे वडील त्याला आठवू लागले.एकदा त्याचा अपघात होऊन तो पंधरा दिवस हाँस्पिटलमध्ये अँडमीट होता तेव्हा दिवसरात्र ते त्याच्याजवळ बसून होते.बायको आणि मेव्हण्याशी ते वाईट वागत असले तरी वैभवशी ते नेहमीच प्रेमाने वागत आले होते.त्यांच्या तापट स्वभावामुळे वैभव मोठा झाल्यावर दोघा बापलेकांचे थोडेफार खटके उडायचे पण तेव्हा जयंतरावच बऱ्याचवेळा नमतं घ्यायचे.वैभव नागपूरला शिकण्यासाठी निघाला तेव्हा त्याला निरोप देतांना त्यांनी मारलेली मिठी आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी वैभवला आजही आठवत होतं.त्या आठवणींनी वैभव कासावीस झाला.’आज वडिलांची वाईट अवस्था झाली म्हणून आपण त्यांच्यावर संतापतोय,ओरडतोय.समजा त्यांच्याऐवजी आपलीच अशी अवस्था असती तर ते असेच आपल्याशी वाईट वागले असते?नाही.आपल्याला असंच मरुन जा म्हणाले असते? शक्यच नाही.दुसऱ्यांशी ते कसेही वागले तरी बाप म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य चोख पार पाडलं आणि मुलगा म्हणून आपलं कर्तव्य निभावण्याची वेळ आली तर आपण अशी चिडचिड करतोय.त्यांना सरळ मरुन जा असं म्हणतोय ‘ या विचारासरशी वैभवला आपल्या वागण्याची लाज वाटली.त्याला एकदम गहिवरुन आलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली.

“नका रडू बाबा.नका रडू.मी चुकलो.मी असं बोलायला नको होतं.तुम्हाला माझ्याशिवाय आणि मलाही तुमच्याशिवाय या जगात दुसरं कोण आहे?काही काळजी करु नका मी तुमचं सगळं व्यवस्थित करेन “

त्याने त्यांच्याकडे पाहिलं.ते अजूनही केविलवाणे रडत होते.वैभवला एकदम भडभडून आलं.तो रडू लागला तसं जयंतरावांनी डाव्या हाताने त्याला जवळ ओढलं आणि ते त्याच्या डोक्यावरुन,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागले.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पीळ… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

 (मागील भागात आपण पाहिले – सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते. आता इथून पुढे )

 जयंतराव संजूचा रागराग करण्याचं अजून एक कारण होतं. जयंतरावांच्या लग्नाच्या वेळी आणि पुढची दहाबारा वर्षं संजूची परिस्थिती जवळजवळ गरीबीचीच होती. पण पुढे संजूने बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्याचं नशीब फळफळलं. गरीब संजू म्हणता म्हणता धनाढ्य शेठ होऊन गेला. सात आठ वर्षांपूर्वी त्याने मोठा बंगला बांधला. घरी दोन दोन चारचाकी आल्या. . गावांतल्या मोठमोठ्या लोकांशी, राजकीय पुढाऱ्यांशी त्याची चांगली घसट वाढली. . जयंतरावांचा एक नातेवाईक संजूच्या घराजवळच रहात होता. त्याच्याकडून त्यांना संजूच्या प्रगतीबद्दल कळायचं आणि मग त्यांचा जास्तच जळफळाट व्हायचा.

तिसऱ्या दिवशी संजू आणि विद्या परत आले. निमंत्रण नसतांना ते आल्याचं पाहून जयंतराव खवळले. वैभवला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं.

” वैभव तुझ्या मामा, मावशीला कोणी बोलावलं होतं?”त्यांनी रागाने विचारलं,

“मी बोलावलं होतं. का?”वैभव त्यांच्या नजरेला नजर भिडवत धिटाईने बोलला. जयंतराव क्षणभर चुप झाले. मग उसळून म्हणाले,

“आता पुढच्या विधींसाठी तरी त्यांना बोलावू नकोस. त्यांची बहिण गेली संपले त्यांचे संबंध “

” विधी संपेपर्यंत तरी त्यांचे संबंध रहातील बाबा आणि तोपर्यंत तरी मी त्यांना बोलावणारच. मग पुढचं पुढे पाहू “वैभव जोरातच बोलला पण मग त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. आजपर्यंत तो वडिलांशी अशा भाषेत बोलला नव्हता. का कुणास ठाऊक पण आता त्याला वडिलांची भिती वाटेनाशी झाली होती.

दशक्रिया विधी झाला पण पिंडाला कावळा शिवेना. कावळे घिरट्या घालत होते पण पिंडाला शिवत नव्हते. श्यामलाबाईंची शेवटची इच्छा काय होती हेच कुणाला कळत नव्हतं. सगळे उपाय थकले. वैभव रडू लागला. जयंतरावांचेही डोळे भरुन आले होते. अचानक संजूमामाला काय वाटलं कुणास ठाऊक. तो पुढे आला आणि वैभवला जवळ घेऊन म्हणाला,

” ताई काही काळजी करु नकोस. आम्ही मरेपर्यंत तुझ्या मुलाला अंतर देणार नाही. त्याचं लग्न, संसार सगळं व्यवस्थित करुन देऊ. “

तो तसं म्हणायचा अवकाश, कावळ्यांची फौज पिंडावर तुटून पडली. वैभव मामाला घट्ट मिठी मारुन रडू लागला. जयंतरावांना मात्र अपमान झाल्यासारखं वाटलं. याचा अर्थ स्पष्टच होता की मेल्यानंतरही बायकोचा त्यांच्यावर विश्वास नव्हता.

तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यावर मामा वैभवजवळ आला.

“वैभव आम्ही आता निघतो. आता यापुढे तुझ्या घरी आमचं येणं होईल की नाही ते सांगता येत नाही. पण तू आमच्याकडे नि:संकोच येत जा. काही मदत लागली तर आम्हांला सांगायला संकोचू नको. तुझ्या लग्नाचंही आम्ही बघायला तयार आहोत पण तुझ्या वडिलांना ते चालेल का? हे विचारुन घे. तुझ्या आईला तुझी काळजी घ्यायचं मी वचन दिलंय ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. अडचणीच्या वेळी रात्रीबेरात्री केव्हाही काँल कर, मी मदतीला हजर असेन. बरं. ताईच्या आजारपणात तुझा खर्च खुप झाला असेल म्हणून मी तुझ्या खात्यात दोन लाख ट्रान्सफर केले आहेत. पाहून घे. आणि हो. परत करायचा वेडेपणा करु नकोस. माझ्या बहिणीच्या कार्यासाठी मी खर्च केलेत असं समज “

वैभवला भडभडून आलं. त्याने मामाला मिठी मारली. रडतारडता तो म्हणाला,

” मी खुप एकटा पडलोय रे मामा. हे बाबा असे तिरसट स्वभावाचे. कसं होईल माझं ?”

“काही काळजी करु नकोस. आता बायको गेल्यामुळे तरी त्यांच्या स्वभावात फरक पडेल असं वाटतंय. “

वैभव काही बोलला नाही पण मामाचं बोलणं कितपत खरं होईल याचीच त्याला शंका वाटत होती.

सगळे पाहुणे गेल्यावर दोनतीन दिवसांनी वैभव वडिलांना म्हणाला,

“तुम्ही त्या मामाचा नेहमी रागराग करता पण बघा, शेवटी तोच मदतीला धावून आला. आईच्या अंत्यविधीसाठी त्यानेच मदत केली. शेवटी जातांनाही मला दोन लाख रुपये देऊन गेला. तुमच्या एकातरी नातेवाईकाने एक रुपया तरी काढून दिला का?”

एक क्षण जयंतराव चुप बसले मग उसळून म्हणाले,

“काही उपकार नाही केले तुझ्या मामाने!वडिलोपार्जित वाडा ८० लाखाला विकला. तेव्हा तुझ्या आईच्या हिश्शाचे ८ लाख त्याने स्वतःच खाऊन टाकले. एक रुपया तरी दिला का त्याने?”” चुकीचं म्हणताय तुम्ही. आई आणि मावशीनेच विनामुल्य हक्क सोडपत्र करुन दिलं होतं. मामा तर त्यांचा हिस्सा द्यायला तयार होता असं आईनेच मला तसं सांगितलं होतं. “

” खोटं आहे ते!गोडगोड बोलून त्याने त्यांच्याकडून सह्या करुन घेतल्या आणि नंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी पाठवलं. महाहलकट आहे तुझा मामा. “

आता मात्र वैभव खवळला.

“बस करा बाबा. आख्खं आयुष्य तुम्ही मामाला शिव्या देण्यात घालवलं. आता आई गेली. संपले तुमचे संबंध. आणि मला तर कधीच मामा वाईट दिसला नाही. तुम्ही किती त्याच्याशी वाईट वागता. त्याला हिडिसफिडीस करता. पण तो नेहमीच तुमच्याशी आदराने बोलतो. फक्त तुम्हांलाच तो वाईट दिसतो. विद्यामावशीच्या नवऱ्याचं तर त्याच्याशिवाय पान हलत नाही. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते कुठलंही काम करत नाहीत. इतके त्या दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. “

” बस पुरे कर तुझं ते मामा पुराण “जयंतराव ओरडून म्हणाले “मला त्यात आता काडीचाही इंटरेस्ट उरला नाहिये. आणि आता यापुढे मामाचं नावंही या घरात काढायचं नाही. समजलं ” त्यांच्या या अवताराने वैभव वरमला. आपल्या बापाला कसं समजवावं हे त्याला कळेना.

वैभव दिवसभर ड्युटीनिमित्त बाहेर असल्यामुळे जयंतराव घरी एकटेच असायचे. हुकूम गाजवायला आता बायको उरली नसल्याने त्यांना आयुष्यभर कधीही न केलेली कामं करावी लागत होती. घरच्या कामांसाठी बाई होती तरीसुद्धा स्वतःचा चहा करुन घेणं, पाणी भरणं इत्यादी कामं त्यांना करावीच लागायची. त्यामुळे त्यांची खुप चिडचिड व्हायची. स्वयंपाकाला त्यांनी बाई लावून घेतली होती पण बायकोच्या हातच्या चटकदार जेवणाची सवय असणाऱ्या जयंतरावांना तिच्या हातचा स्वयंपाक आवडत नव्हता. तिच्या मानाने वैभव छान भाज्या बनवायचा. म्हणून संध्याकाळी तो घरी आला की ते त्याला भाजी करायला सांगायचे. थकूनभागून आलेला वैभव कधीकधी त्यांच्या आग्रहास्तव करायचा देखील. पण रोजरोज त्याला शक्य होत नव्हतं. त्याने नाही म्हंटलं की दोघांचेही खटके उडायचे.

एक दिवस वैभव संतापून त्यांना म्हणाला,

“एवढंच जर चटकदार जेवण तुम्हांला आवडतं तर आईकडून शिकून का नाही घेतलंत?”

” मला काय माहीत ती इतक्या लवकर जाईल म्हणून!”

“हो. पण कधी तरी आपण स्वयंपाक करुन बायकोला आराम द्यावा असं तुम्हांला वाटलं नाही का?आईच्या आजारपणातही तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावायचात. तिचे हाल पहावत नव्हते म्हणून मीच स्वयंपाक शिकून घेतला पण तुम्हांला कधीही तिची किंव आली नाही ” ” मीच जर स्वयंपाक करायचा तर बायकोची गरजच काय?”

“याचा अर्थ तुम्ही आईला फक्त स्वयंपाक करणारी, घरकाम करणारी बाई असंच समजत होतात ना?माणूस म्हणून तुम्ही तिच्याकडे पाहिलंच नाही ना?”

“चुप बैस. मला शहाणपणा शिकवू नकोस. नसेल करायची तुला भाजी तर राहू दे. मी बाहेर जाऊन जेवून येतो “

“जरा अँडजस्ट करायला शिका बाबा. एवढंही काही वाईट बनवत नाहीत त्या स्वयंपाकवाल्या मावशी “

जयंतरावांनी त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलं मग ते कपडे घालून बाहेर निघून गेले. ते हाँटेलमध्ये जेवायला गेलेत हे उघड होतं.

वैभवला आता कंपनीतून घरी यायचीच इच्छा होत नव्हती. एकतर घरी आल्याआल्या हातात चहाचा कप हातात ठेवणारी, सोबत काहीतरी खायला देणारी आई नव्हती शिवाय घरी आल्याआल्या वडिलांचा चिडका चेहरा बघितला की त्याचा मुड खराब व्हायचा. त्यांच्या तापट स्वभावामुळे वडिलांबद्दल त्याला कधीही प्रेम वाटलं नव्हतं. जयंतरावांनी नोकरीत असतांना कधी घरात काम केलंच नव्हतं पण निव्रुत्तीनंतरही सटरफटर कामं सोडली तर दिवसभर टिव्ही पहाण्याव्यतिरिक्त ते कोणतंही काम करत नव्हते. बायको होती तोपर्यंत हे सगळं ठिक होतं पण ती गेल्यावरही वैभवच्या अंगावर सगळी कामं टाकून ते मोकळे व्हायचे. वैभवची त्याच्यामुळे चिडचिड व्हायची.

एक दिवस त्याने वैतागून मामाला फोन लावला,

” मामा या बाबांचं काय करायचं रे? खुप वैताग आणलाय त्यांनी. आजकाल घरातच थांबावसं वाटत नाही बघ मला “

” हे असं होणार याची कल्पना होतीच मला. तुझ्या वडिलांना मी गेल्या तेहतीस वर्षांपासून ओळखतोय. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. तुझ्या आईलाही खूप त्रास दिलाय त्यांनी. विचार कर कसा संसार केला असेल तिने. पण इतका त्रास सहन करुनही कधीही तिने आम्हांला नवऱ्याबद्दल वाईट सांगितलं नाही. कधी तक्रार केली नाही. ” पदरी पडलं आणि पवित्र झालं “एवढंच ती म्हणायची. तू एकदोन महिन्यातच त्यांना कंटाळून गेला. तिने तेहतीस वर्ष काढली आहेत अशा माणसासोबत. आम्हीही सहन केलंच ना त्यांना. माझा तर कायम दुःस्वास केला त्या माणसांने. कधी आदराने, प्रेमाने बोलला नाही. उलट संधी मिळेल तेव्हा चारचौघात अपमान करायचा. खुप संताप यायचा. कधीकधी तर ठोकून काढायची इच्छा व्हायची. पण बहिणीकडे बघून आम्ही शांत बसायचो. तुही जरा धीर धर. लवकरात लवकर लग्न करुन घे म्हणजे तुलाही एक प्रेमाचं माणूस मिळेल. “

“मी लग्नाला तयार आहे रे पण येणाऱ्या सुनेशी तरी बाबा चांगले वागतील का? की तिलाही आईसारखाच त्रास देतील?”

” हो. तोही प्रश्न आहेच. पण लग्न आज उद्याकडे करावंच लागणार आहे. आता तुही २८ वर्षाचा असशील. मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल. मी असं करतो, मुली बघायला सुरुवात करतो “

क्रमश: भाग २

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पीळ… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

अल्प परिचय — 

प्रकाशित साहित्य:-

कथासंग्रह

कथा माणुसकीच्या, हा खेळ भावनांचा, रंग हळव्या मनाचे, गिफ्ट आणि अशी माणसं अशा गोष्टी

पुरस्कार-

विविध मान्यवर साहित्य मंडळांचे 16 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

डाँक्टरांनी श्यामलाबाईंच्या छातीवर स्टेथास्कोप ठेवून थोडा वेळ तपासणी केली. मग वैभवकडे पहात ते म्हणाले,

” साँरी शी इज नो मोअर “

ते ऐकताच वैभवने “आईsss”असा जोरात हंबरडा फोडत आईच्या पार्थिवाला मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडू लागला. जरा सावरल्यावर त्याने बाजूला पाहिलं. त्याचे वडील-जयंतराव खुर्चीवर बसून रडत होते. गेली पाचसहा वर्ष श्यामलाबाईंच्या आजारपणामुळे जे हाल बापलेकांचे झाले होते त्यांचं स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसत होतं. पाचसहा वर्षं प्रचंड प्रयत्न करुन आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही हाती शुन्य लागलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न बघायची श्यामलाबाईंची खुप इच्छा होती पण तीही अपूर्ण राहिली होती.

त्याच्या खांद्यावर हात पडला तसं वैभवने वळून पाहिलं. शेजारपाजारचे बरेच जण जमा झाले होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या पाटील काकांनी त्याला नजरेने इशारा केला तसा तो उठून त्यांच्यासोबत बाहेर आला.

” वैभव कुणाला फोन करुन कळवायचं असेल तर मला नंबर दे मी फोन करतो “

‘ मामा, मावशीला सोडून सगळ्यांना कळवून टाक वैभव ” अचानक जयंतराव मागून येत म्हणाले,

” असं कसं म्हणता बाबा?त्यांची सख्खी बहिण होती आई “

” असू दे. मला नकोत ती दोघं इथं “

” कमाल करता जयंतदादा तुम्ही!अहो तुमची काहिही भांडणं असोत. सख्ख्या भाऊबहिणीला कळवणं आवश्यकच आहे.  ” पाटील काका आश्चर्य वाटून म्हणाले.  

” बरोबर म्हणताय पाटील काका तुम्ही.  अहो भाऊबहिण आले नाही तर बाईंच्या पिंडाला कावळा तरी शिवेल का? काही काय सांगताय जयंतदादा?”

घोळक्यात बसलेली एक म्हातारी रागावून म्हणाली तसे जयंतराव चुप बसले. वैभवने त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत मोबाईल काढला आणि पहिला फोन संजूमामाला लावला.  ‘मामा ,  अरे आई गेली.  ‘ संजू रडत रडत बोलला.

” “काय्य्यsss?कधी आणि कशी?”मामा ओरडला आणि रडू लागला.

” आताच गेली आणि तुला तर माहितीच आहे की ती पाचसहा वर्षापासून आजारीच होती.  तिला काय झालंय हे डाँक्टरांना शेवटपर्यंत कळलं नाही.  मागच्या आठवड्यात तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या म्हणून आयसीयूत अँडमीट केलं होतं.  काल डाँक्टरांनी ट्रिटमेंटचा काही उपयोग होत नाहिये हे पाहून तिला घरी घेऊन जायला सांगितलं होतं. म्हणून काल घरी घेऊन आलो होतो. कालपासून ती मला मामाला बोलव असं म्हणत होती “

“अरे मग कळवलं का नाही मला?मी ताबडतोब आलो असतो “

वैभव बाहेर अंगणात आला. आसपास जयंतराव नाहीत हे पाहून हळूच म्हणाला,  

” बाबांनी मला तुला कळवायला मनाई केली होती”

एक क्षण शांतता पसरली मग मामा जोरात ओरडून म्हणाला,

“हलकट आहे तुझा बाप.  मरतांना सुद्धा त्याने माझ्या बहिणीची इच्छा पुर्ण केली नाही “

आता मामा जोरजोरात रडू लागला. ते ऐकून वैभवही रडू लागला.

थोड्या वेळाने भावना ओसरल्यावर मामा म्हणाला,

“मी निघतो लगेच. विद्या मावशीला तू कळवलंय का?”

“नाही.  बाबांनी मना केलं होतं “

” खरंच एक नंबरचा नीच माणूस आहे. पण आता त्याच्यावर बोलण्याची ही वेळ नाही.  मी कळवतो विद्याला आणि मी लगेच निघतो.  तरी मला तीन तास तरी लागतील पोहचायला,  तोपर्यंत थांबवून ठेव तुझ्या बापाला.  नाहितर आमची शेवटची सुध्दा भेट होऊ नये म्हणून मुद्दाम घाई करायचा “

” नाही मामा. मावशी आणि तू आल्याशिवाय मी बाबांना निघू देणार नाही.  खुप झाली त्यांची नाटकं. आता मी त्यांचं ऐकून घेणार नाही “

” गुड. बरं तुला पैशांची मदत हवीये का?”

वैभवला गहिवरून आलं. बाबा मामाशी किती वाईट वागले पण मामाने आपला चांगूलपणा सोडला नव्हता.

“नको. सध्यातरी आहेत.  अडचण आलीच तर तसं तुला सांगतो.  “

” बरं. ठेवतो फोन “

मामाने फोन ठेवला आणि वैभवला मागच्या गोष्टी आठवू लागल्या. संजूमामा आणि जयंतराव यांचं भांडण अगदी जयंतरावांच्या लग्नापासून होतं आणि त्यात चूक जयंतरावांच्या वडिलांचीच होती. लग्नाला “आमची फक्त पन्नास माणसं असतील” असं अगोदर सांगून जयंतरावांचे वडील दोनशे माणसं घेऊन गेले होते. बरं वाढलेल्या माणसांची आगावू कल्पनाही त्यांनी मुलीकडच्या लोकांना दिली नाही.  अचानक दिडशे माणसं जास्त आल्यामुळे संजूमामा गांगरला. त्यावेळी कँटरर्सना जेवणाचे काँट्रॅक्ट देण्याची पध्दत नव्हती. अर्थातच ऐनवेळी किराणा आणून जेवण तयार करण्यात साहजिकच उशीर झाला. जेवण्याच्या पंगतीला उशीर झाला, वराकडच्या मंडळींना ताटकळत बसावं लागलं म्हणून जयंतरावांच्या वडिलांनी आरडाओरड केली.  आतापर्यंत शांततेने सगळं निभावून नेणाऱ्या संजूमामाचा संयम सुटला आणि त्याने सगळ्या लोकांसमोर जयंतरावांच्या वडिलांची चांगलीच कान उघाडणी केली. नवरामुलगा म्हणून जयंतराव त्यावेळी काही बोलले नाहीत पण वडिलांचा अपमान केला म्हणून त्यांनी संजूमामाशी कायमचा अबोला धरला. मात्र संधी मिळाली की ते चारचौघात संजूमामाचा पाण उतारा करत.  त्याला वाटेल ते बोलत. इतर नातेवाईंकांमध्येही त्याची बदनामी करत,  पण आपल्या बहिणीचा संसार व्यवस्थित रहावा म्हणून संजू सगळं सहन करत होता.  सात आठ वर्षांपूर्वी संजूचा जुना वडिलोपार्जित वाडा विकला गेला.  त्यावेळी वैभवच्या आईने जयंतरावांना न सांगताच एक रुपयाही हिस्सा न घेता हक्कसोड पत्रावर सह्या केल्या होत्या. तिचंही साहजिकच होतं. ज्या माणसाने आयुष्यभर आपल्या भावाचा अपमान केला त्याला आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीतला एक रुपयाही द्यायची त्या माऊलीची इच्छा नव्हती. एक वर्षाच्या आतच जयंतरावांना ही गोष्ट कुठूनतरी कळली आणि त्यांनी एकच आकांडतांडव केलं. श्यामलाबाईंना आणि संजूला खुप शिव्या दिल्या. संजूशी आधीच संबंध खराब होते ते आता कायमचेच तोडून टाकले. तीन महिने ते श्यामला बाईंशी बोलले नाहीत. त्या दिवसांनंतर त्यांनी आपल्या सासरी पाऊलही टाकलं नाही. संजूने मात्र आपलं कर्तव्य सोडलं नाही. दर दिवाळीला तो आपल्या बहिण, मेव्हण्याला न चुकता निमंत्रण द्यायचा पण जयंतराव त्याच्याशी बोलायचे नाहीत शिवाय श्यामला बाईंनाही माहेरी पाठवायचे नाहीत. श्यामलाबाईंच्या शेवटच्या दिवसात त्यांची भावाला भेटायची इच्छाही त्यांनी पुर्ण होऊ दिली नव्हती.

बरोबर तीन तासांनी संजू आला. आल्याआल्या आपल्या मेव्हण्याला भेटायला गेला. आपल्यापरीने त्याने जयंतरावांना सांत्वन करायचा प्रयत्न केला. पण जयंतराव त्याच्याशी एक शब्दानेही बोलले नाहीत. सुंभ जळाला पण पीळ मात्र तसाच होता. थोड्या वेळाने विद्या आली. तिने मात्र काळवेळ न बघता बहिणीच्या तब्येतीबद्दल काहीही न कळविल्याबद्दल जयंतरावांची चांगलीच खरडपट्टी काढली. तिच्याशीही जयंतराव एक शब्दानेही बोलले नाहीत.

अंत्यविधी पार पडला. सगळे घरी परतले. जयंतराव वैभवला घेऊन मागच्या खोलीत आले.

“वैभव कार्य पार पडलं. मामा मावशीला घरी जायला सांग “

वैभव एक क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिला. मग संतापून म्हणाला.

” कमाल करता बाबा तुम्ही!आईला जाऊन आताशी पाचसहा तासच झालेत आणि तिच्या सख्ख्या भावाबहिणीला मी घरी जायला सांगू?”

” मला ते डोळ्यासमोर सुध्दा नको आहेत “

आता मात्र वैभवची नस तडकली.  वेळ कोणती आहे आणि हा माणूस आपलं जुनं वैर कुरवाळत बसला होता. तो जवळजवळ ओरडतच म्हणाला, ” मी नाही सांगणार. तुम्हांला सांगायचं असेल तर तुम्हीच सांगा. अशीही या दु:खाच्या प्रसंगी मला मामा मावशीची खुप गरज आहे”तो तिथून निघून बाहेर आला. बाहेरच्या खोलीत विद्या मावशी संजू मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. तिला तसं रडतांना पाहून वैभवला ही भडभडून आलं आणि तो मावशीला मिठी मारुन रडू लागला. मामा त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला,

” वैभव काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत ना!तुझ्या वडिलांमुळे आम्हांला मनात असुनही तुम्हांला मदत करता आली नाही. पण तू मात्र बिनधास्त आमच्याशी बोलत रहा. काही गरज लागली तर नि:संकोचपण सांग “

कित्येक वर्षात असं कुणी वैभवशी प्रेमाने बोललंच नव्हतं. ” खरंच आईच्या आजारपणात मामाचा आधार असता तर किती बरं वाटलं असतं. काय सांगावं कदाचित आई बरी सुद्धा झाली असती “वैभवच्या मनात विचार येऊन गेला.

” चल आम्ही निघतो. तिसऱ्या दिवशी परत येतो “मामा म्हणाला,

“का?थांबा ना. मी इथे एकटा पडेन. तुम्ही दोघं थांबलात तर बरं वाटेल “

” मला कल्पना आहे. पण नको. तुझा बाप आम्ही कधी जातो याकडे डोळे लावून बसला असेल. ते आमच्याशी बोलत नसतांना आम्हालाही घरात कोंडल्यासारखं होईल “

मामा बरोबरच म्हणत होता त्यामुळे वैभवचा नाईलाज झाला. मामामावशी गेले तसा वैभव उदास झाला. त्याला लहानपणीचे दिवस आठवले. खुप मजा यायची मामाकडे रहायला. दिवाळी आणि उन्हाळ्यातल्या सुट्यांची तो आतुरतेने वाट बघत असायचा. केव्हा एकदा सुट्या लागतात आणि मामाकडे जातो असं त्याला होऊन जायचं. वैभवला सख्खे भाऊबहिण नव्हते.  त्यातून वडिलांचा स्वभाव असा शिघ्रकोपी. त्यामुळे स्वतःच्या घरी असंही त्याला करमायचं नाही.  मामाकडे मात्र मोकळेपणा असायचा. तिथे गेल्यावर मामाची मुलं, विद्या मावशीची मुलं आणि तो स्वतः खुप धिंगाणा घालायचे. गंमत म्हणजे त्यावेळीही मोबाईल होते पण मामा मुलांना मोबाईलला हात लावू द्यायचा नाही. त्यामुळे ही मुलं दिवसभर खेळत असायची. प्रेमळ आजी जितके लाड करायची त्यांच्या दुप्पट लाड मामा करायचा. तेव्हा मामाची आर्थिक स्थिती जेमतेमच होती तरीही मामा खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेत नसे. खाण्यापिण्याची तर खुप रेलचेल असायची. रात्री गच्चीवर झोपता झोपता मामा आकाशातल्या ग्रह ताऱ्यांची माहिती द्यायचा. मामाकडे सुटीचे दिवस कधी संपायचे तेही कळत नसायचं.

” गेले ते आनंदाचे दिवस “वैभव मनातल्या मनात बोलला. त्याला आठवलं तो मोठा झाला,  इंजिनीयर झाला तरीही मामाच्या घरी जायची त्याची ओढ कधीही कमी झाली नाही. सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते.

क्रमश: भाग १ –  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “फुलपुडी”… भाग 2 ☆ श्री क्षितिज दाते ☆

? जीवनरंग ❤️

☆ “फुलपुडी”… भाग 2 ☆ श्री क्षितिज दाते ☆

(मागील भागात आपण पाहिले – हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं.

“ हुश्श !!.. थांबा लगेच त्याचे ३ महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते !”.

“ नको नको … आता मी स्वतः जाऊनच देतो .. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल!” आता इथून पुढे )

एका चकार शब्दाने पैशाबद्दल न विचारता सलग इतके महीने फुलपुडी देत होता तो.

बाबांच्या लेखी त्या फुलपुडीचं महत्व बघता हे कुठल्याही उपकारापेक्षा कमी नव्हतं. आता मात्र बाबांना कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि स्वतःच्या हातानी त्याला पैसे देऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतोय असं झालं होतं. संध्याकाळी स्वयंपाकाच्या मावशी आल्या आणि तडक बाबा फुलवाल्याकडे गेले.  तिथे जाऊन बघतात तर काय ? त्या ठिकाणी कुठलीशी चहा-वडापावची टपरी होती. बाबांनी कुतुहलाने त्याला विचारलं,

“ अरे, इथे फुलांचं दुकान होतं त्यांनी काय नवीन गाळा घेतला काय ?’

“ नाय काका .. तो गेला .. माझा गाववाला होता तो !!”. 

“ कुठे गेला ? मला पत्ता दे बरं !”.

“ वारला तो काका .. २-३ महिनं झालं !”.

“ बाप रे !! काय सांगतोस काय ? मग ते दुकान दुसरं कोणी चालवतं का ?”.

“ नाय ओ काका ! फुलांचा धंदाच बंद केला. आता मी चालवतो हे दुकान “.

हे ऐकून बाबांना चांगलाच धक्का बसला पण आता त्यांच्या मनातल्या विचार डोहात एका नवीन प्रश्नानी उडी मारली.  फुलांचं दुकान जर बंद झालं तर मग दाराला रोज फुलपुडी कोण अडकवून जातंय?

त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं. त्यांच्या बागेतल्या मित्रांकडे चौकशी केली. संस्थेतर्फे आलेल्या मुलाची शक्यता पडताळून पहिली. लेक विसरली म्हणून जावयानी चेन्नईहून काही व्यवस्था केली का याची सुद्धा खातरजमा केली. पण फुलपुडीबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. शेवटी त्यांनी सोसायटीच्या वॉचमनला या बाबत विचारलं.

“ ओ हां शाब .. एक लोडका आता है रोज .. शायकील पे .. कोभी शाम को आता है.. कोभी रात को लेट भी आता है !!“

“ अरे … अपने जान पहचान का है क्या ?”

“ पैचान का ऐसे नही… वो रोज आता है इतने दिनसे .. तो जानता है मै. “

“ अभी आज आयेगा तो मुझे बताओ !”

आता बाबांच्या डोक्यात एकाच विचाराचा भुंगा… . तो कोण असेल?

संध्याकाळनंतर बरीच वाट बघून शेवटी बाबा झोपून गेले पण रात्री उशिरा कोणीतरी फुलपुडी अडकवलीच होती.

दुसऱ्या दिवशी मात्र बाबांनी ठरवलं. वॉचमनवर विसंबून राहायचं नाही.  कितीही उशीर झाला तरी याचा सोक्षमोक्ष लावायचाच. संध्याकाळपासूनच दार किलकिलं करून बाबा थोड्या थोड्या वेळाने अस्वस्थपणे येरझारा घालत होते. अधून मधून बाहेर बघत होते.

मध्येच दाराशी खुडबुड आवाज झाला . धावत त्यांनी दार उघडलं. एक तरुण मुलगा गडबडीने खाली उतरत त्याच्या सायकलपाशी जात होता. बाबा काहीसे मोठयाने ..

“ अरे ए , इकडे ये .. ए … !!“

तो मुलगा लगेच वर आला.

“ आजोबा कशे आहे तुम्ही आता ?”

“ मी बरा आहे. पण तू कोण रे बाळा ?? . मी ओळखलं नाही तुला . पण तुला बघितल्या सारखं वाटतंय कुठेतरी . आणि तू फुलपुडी आणतोस का रोज ?.. कोणी सांगितलं तुला ? त्या फुलवाल्यानी का ? त्याच्याकडे कामाला होतास का?”

बाबांचं कमालीचं कुतूहल त्यांच्या या प्रश्नांच्या सरबत्तीतून बाहेर पडत होतं.

“ आजोबा sss . तुम्ही डिशचार्ज घेतल्यावर अँब्युलंसनी आलते किनई घरी,   त्या अँब्युलंसचा डायवर मी !”.

“ अरे हां हां … आता तू सांगितल्यावर आठवला बघ चेहरा. ये आत ये. बस इकडे.. पण तू …. फुलपुडी ? .. त्याला खुर्चीवर बसवता बसवता एकीकडे बाबांचे प्रश्न सुरूच होते. त्याचं काय झालं .. त्यादिवशी तुमचं ते तंगडं मोडलं असून पण ssssss … सॉरी हा आजोबा .. ते रोज नुसते पेशंट, मयत, लोकांचं रडणं वगैरे बघून बघून आपलं बोलणं थोडं रफ झालंय, . पण मनात तसं काय नाय बर का !”..

“ अरे हरकत नाही …   बोल बोल !!”

“ हां ss  तर तुमचा एवढा पाय फ्रँक्चर असून पण तुम्ही ते ताईला फुलपुडीचं सांगत होते ते मनात पार घुसलं होतं बघा माझ्या .तुम्हाला आजींची किती काळजी वाटते ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलतं. नंतर येके दिवशी येका पेशंटला आणायला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलतो अन् माझ्याच समोर एक बॉडी आत आली. बघतो तर तो फुलवाला sss . शॉक लागून मेला बिचारा. पण आई शप्पथ खरं सांगतो आजोबा, त्याची बॉडी बघून मला पहिलं तुम्ही आठवला. आता आजींच्या फुलपुडीचं काय होणार हा प्रश्न पडला.

तेव्हाच ठरवलं की ते बंद होऊन द्यायचं नाय.  मग येक दोन दिवस त्याची कामाला ठेवलेली पोरं दुकान बघत होती त्यांच्याकडून आणून दिली मी फुलपुडी तुम्हाला. नंतर गाशाच गुंडाळला ओ त्यानी. येकदा वाटलं त्या तुमच्या ताई पैशे भरतात त्यांना समजलं तर करतील काहीतरी पण नंतर वाटलं, त्या तरी बाहेरगावाहून काय करणार ? मलाच काही कळना झालं. म्हंटलं डबल झाली तरी चालेल पण आपण देऊ की थोडेदिवस फुलपुडी. माझ्या घराजवळ एक फुलवाला आहे पण त्याच्याकडे घरपोच द्यायला माणसं नाही. म्हंटलं आपणच देऊया. पण मी दिवसभरचा असा कुठं कुठं जाऊन येतो. देवाला घालायची फुलं म्हणल्यावर अशी नको द्यायला. म्हणून रोज घरी जाऊन आंघोळ झाली की मग सायकलवर येतो. बरं आपला घराला जायचा एक टाईम नाय. म्हणून कधी उशीर पण होतो. बरेच दिवस बघितलं तर दाराला कधीच दुसरी पुडी दिसली नाही म्हणजे म्हंटलं आजोबांनी दुसरा फुलपुडीवाला धरला नाही अजून. आता आपणच द्यायची रोज. तेवढाच आजींच्या आनंदात आपला पण वाटा.’

“ अरे मग इतक्या दिवसात एकदा तरी बेल वाजवून आत यायचंस . भेटायचंस. !”

“ अहो . आधीच तुमची तब्येत बरी नाही त्यात तुम्हाला का त्रास द्यायचा आणि भेटण्यापेक्षा फुलपुडी वेळेत मिळणं मत्त्वाचं !”.

“ अरे पण पैसे तरी घेऊन जायचेस की !! फुलवाल्याचे द्यायचेत अजून की तू दिलेस ?.

हे घे पैसे . ” .. पाकिटात हात घालत बाबा म्हणाले.

“ हाय का आता आजोबा . छे छे..  मी नाही घेणार पैसे. पण त्याची काही उधारी नाही बर का. एकदम द्यायला जमत नाही म्हणून रोजचे रोख पैशे देतो मी त्याला !”

“ अरे पण तू का उगीच भुर्दंड सहन करणार ? उलट इतके दिवस तू हे करतोयस त्याचे आभार कसे मानू हेच समजत नाहीये बघ मला. काय बोलावं हेच सुचत नाहीये.

“ अहो भुर्दंड काय ? अन् आभार कसले ? माझे पण आई वडील हैत की गावी . तिकडं असतो आणि माझ्या आईला फुलं हवी असती तर फुलपुडी आणली असतीच की मी. त्यांची इच्छा होती की मी गावात राहावं अन् मला मुंबईतच यायचं होतं. म्हणून त्यांनी बोलणं टाकलंय ओ माझ्याशी. त्याचंच वाईट वाटतं बघा. ही फुलं देऊन मला माझ्या आईला आनंद दिल्याचं समाधान मिळतंय हो!”.

बाबांचे डोळे एव्हाना आपसूक पाणावले होते. त्यांनी त्या मुलाचा हात अलगद हातात घेतला. तो मुलगा सुद्धा भावूक झाला….

“ सीरियस पेशंटला घेऊन जातो तेव्हा वेळेत पोचेपर्यंत जाम टेन्शन असतं आजोबा.

वरच्या सायरनपेक्षा जास्त जोरात माझं हार्ट बोंबलत असतंय . आणि एकदा जीव वाचला की नई  मग भरून पावतं बघा. आपली ड्यूटीच आहे ती, पण त्यादिवशी तुम्ही ते म्हणले होते ना “आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची कळी फुलण्यासाठी फुलपुडी॥ ”  .. मला काय असं छान छान बोलता येत नाही तुमच्यासारखं .. पण तुमचं बोलणं ऐकून एक गोष्ट डोक्यात फिट्ट  बसली की..  “ मरणाऱ्यांना जगवणं मोठं काम हायेच पण “ जगणाऱ्यांना आनंदी ठेवणं ” पण तितकंच मत्त्वाचं आहे, म्हणून आता पुढच्या महिन्यात मी गावी जातो आणि आमच्या म्हातारा-म्हातारीला पण जरा खुश करतो. चला….  निघतो आता….  उशीर झाला. जरा जास्त बोललो असलो तर माफ करा हां आजी आजोबा!’

हे सगळं ऐकून आई आत देवघरापाशी गेली. संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर देवापुढे ठेवलेली साखरेची वाटी घेऊन आली आणि ती त्या मुलाच्या हातात ठेवली. आपला थरथरता हात त्याच्या डोक्यावरून, गालावरून प्रेमाने फिरवला. आणि मृदु आवाजात म्हणाली ….

“ अहो बघा sss  दगडात देव शोधतो आपण .. पण तो हा असा माणसात असतो. नाहीतर या मुलाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही पण माझ्या आनंदासाठी तो इतके दिवस झटतोय! .. धन्य आहे बाळा तुझी!”

आई दारापाशी गेली. या सगळ्या गप्पात दाराला तशीच अडकून राहिलेली फुलपुडी काढली.

खुर्चीत बसली आणि प्रसन्न अन् भरल्या अंतःकरणानी, पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक बघत बसली ती दिवसागणिक आनंद देणारी इवलीशी “फुलपुडी”. 

– समाप्त –

© श्री क्षितिज दाते

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “फुलपुडी”… भाग १ ☆ श्री क्षितिज दाते ☆

? जीवनरंग ❤️

☆ “फुलपुडी”… भाग १ ☆ श्री क्षितिज दाते ☆ 

 “ हॅलो ss .. हा तुझा बाबा रिटायर झाला गं एकदाचा ss !!” ..

बाबा आपल्या चेन्नईत राहणाऱ्या एकुलत्या एका मुलीला फोनवर अगदी उत्साहात सगळं सांगत होते.

“ वा वा !! मग या आता दोघेही आराम करायला थोडे दिवस इकडे !”

“ नको गं बाई  …. तुमचा राजाराणीचा संसार त्यात या म्हातारा-म्हातारीची लुडबूड कशाला उगाच ?? आमची मुंबईच बरी आपली.. आणि खरं सांगू का ?? इतकी वर्ष  कामाचा व्याप आणि नोकरीतल्या बदल्यांमुळे तुझ्या आईला अजिबात वेळ देऊ शकलो नाही ss  पण आता पुढचं सगळं आयुष्य फक्त तिच्यासाठीच राखून ठेवलंय बघ. तेव्हाची तिची राहिलेली हौसमौज शक्य तितकी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे आता!

“बाबाss  मस्त मस्त !! तुम्हाला सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा मग ! हाहाहा ..!!”

बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण,  देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही .. या ना त्या निमित्ताने बाबा कायम आई सोबत असायचे. पण हा मनमुराद जगण्याचा आनंद फार काळ काही त्यांना घेता आला नाही. तीन-चार वर्षातच आईला काहीशा ‘अकाली वार्धक्याने’ ग्रासलं. हातपाय दुखायचे. अशक्तपणा आला होता. बाहेर पडणं तर पूर्णच बंद. जेमतेम घरच्याघरी कशीबशी फिरायची. भरीला बारीक सारीक इतर त्रास होतेच. पुढे रोजचं घरकाम करणं सुद्धा कठीण झालं. लेकीने येऊन घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका मावशींची व्यवस्था केली. शिवाय ती स्वतः दोनेक महिन्यातून एकदा तरी येऊन जायची. हळूहळू आईची दृष्टी कमी झाली. सहाजिकच लिखाण, वाचन, टीव्ही बघणं यावर बंधनं आली. देवादिकांचं करणं, जपमाळ, देवपूजा यात आता जास्त वेळ घालवायला लागली. या सगळ्यामुळे आधीच मितभाषी असलेल्या आईचं बोलणं सुद्धा आधीपेक्षा कमी झालं. उतारवयातल्या या बऱ्यावाईट दिवसांत बाबांची मात्र आपल्या अर्धांगिनीला पूर्ण साथ होती.

आताशा दोघांचा दिनक्रम चांगलाच बदलला होता. अगदी आखून दिल्याप्रमाणे. बाबा दिवसभरात शक्य तितकी घरकामात मदत करायचे. आठवड्यातून एकदा भाजी वगैरे  आणायचे. वेळ मिळेल तेव्हा आईला वर्तमानपत्र, मोबाईलवर येणारे लेख-गोष्टी वाचून दाखवायचे. गाणी लावून द्यायचे. आईला शक्यतो घरी एकटे ठेवायचे नाहीत ते. म्हणून दिवसा कुठे जायचे नाहीत पण संध्याकाळी मावशी आल्या की मात्र मोकळ्या हवेत जरा

 – 2 –

तासभर एक फेरफटका मारून यायचे. पण त्याचा मार्गही अगदी ठरलेला. सोसायटीच्या आवारात थोडावेळ, मग तिथून लायब्ररी, मग बागेत चालणं, नंतर तिथल्या काही मित्रमंडळींसोबत गप्पा, मग कधीतरी उगाच चणे-शेंगदाणे-फुटाणे घ्यायचे आणि शेवटचा मुक्काम फुलवाल्याकडे. अगदी न चुकता दररोज देवासाठी “ फुलपुडी ” घेऊन यायचे.

असं सगळं सुरू असताना एके दिवशी सकाळी बाबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले.

शेजाऱ्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. छोटसं फ्रँक्चर असल्यामुळे प्लॅस्टर घातलं. लेक ताबडतोब निघाली आणि संध्याकाळपर्यंत पोचली. पाठीलासुद्धा थोडा मार लागला होता, त्यात वयही जास्त म्हणून “पाच महीने तरी घराबाहेर पडायचं नाही” अशी सक्त ताकीद दिली होती डॉक्टरांनी. घरच्या घरी वॉकर घेऊन फिरायला परवानगी होती फक्त.

“ बाबा ss  तुम्ही दोघं चला आता चेन्नईला माझ्याबरोबर.

“ काहीतरीच काय ?? असं जावयाकडे राहतात का इतके दिवस ?”

“ काय बाबा ? असं काही नसतं . हे कसले जुनाट विचार घेऊन बसलात ?”

“ हेहेहे sss  अगं गंमत केली गं बाळा. होऊ नयेच पण भविष्यात कधी अगदीच अगतिक झालो तर तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला ? .. पण आत्ता नको . तुझं दिवसभर ऑफिस असतं. त्याचे सुद्धा कामासाठी दौरे सुरू असतात आणि आमचंही इथे सगळं रुटीन सेट झालंय आता. त्यात बदल नको वाटतो, म्हणून म्हणालो !!”.

बाबा ऐकणार नाहीत म्हंटल्यावर शेवटी मुलीनी एका ओळखीच्या संस्थेमार्फत दिवसभर घरी राहून बाबांची काळजी घेऊ शकेल अशा एका विश्वासू मुलाची सोय केली.

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सुटका झाली आणि छोट्या अँब्युलंसमधून स्वारी घरी निघाली. वाटेत बाबांनी एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितलं. खिडकी  थोडीशी उघडली आणि बाजूच्या फुलवाल्याला म्हणाले … “ बाबा रे ss .. उद्यापासून जरा घरी “फुलपुडी” देशील का रे ? महिन्याचे पैसे एकदम घे हवं तर आणि तुझे घरपोच देण्याचे काय असतील ते पण सांग !!”.

“ अहो काका , पाठवतो नक्की. दुकान बंद केलं की देईन आणून. आणि पैसे द्या हो आरामात. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा आता!. पैसे काय आता ऑनलाईन पण येतात !“

“ ते काही मला जमत नाही बुवा अजून !”

हे ऐकून मुलगी म्हणाली, “ बाबा थांबा. ते मी करीन. आता आधी घरी जाऊया लवकर.

“दादा,  तुमचा नंबर द्या. मी घरी पोचल्यावर करते ट्रान्सफर लगेच.”

फुलपुडीचं सगळं ठरवून अँब्युलंस घरच्या दिशेने निघाली.

 – 3 –

“ काय हे बाबा ? तुमच्या या अवस्थेत त्या फुलपुडीचं काय एवढं अर्जंट होतं का ? आणि तुम्ही कधीपासून इतके धार्मिक झालात हो?”

“ अगं मी आजही अजिबात देवभोळा नाहीये,  पण रोज सकाळी देवपूजेला सुरुवात करायच्या आधी तुझ्या आईनी ही फुलपुडी उघडली की त्यातल्या वेगवेगळ्या रंगांची ती प्रसन्न फुलं बघून, त्यांना स्पर्श करून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटतो बघ.

चेहरा खुलतो गं तिचा आणि मग ती तासन् तास तल्लीन होऊन पूजाअर्चा करत असते.

दिवसभरातली ही एकंच गोष्ट ती इतक्या मनापासून करते. म्हणून केवळ हा अट्टाहास.

एकवेळ भाजी-किराणा आणायला एखाद-दोन दिवस उशीर झाला तरी चालेल. आम्ही खिचडी कढी खाऊ, पण तिच्या त्या रोज नव्याने उमलणाऱ्या आनंदाच्या कळीसाठी ती फुलपुडी दररोज घरी येणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, . कळलं का ? म्हणून तू आपले ते फुलवाल्याचे पैसे मात्र न विसरता पाठव हां! . आणि जो पर्यंत मी बाहेर फिरू शकत नाही तोवर दरमहा पाठवत जा म्हणजे मला उगीच ह्याला त्याला सांगत बसायला नको.

एकहाती तुझ्याकडेच राहू दे हे काम !!”

बाबा निवृत्त झाले तेव्हाच्या त्यांच्या भावना आणि आईला कायम साथ देण्याचा तेव्हा व्यक्त केलेला विचार आजही इतका दृढ आहे हे बघून लेकीलाही दाटून आलं. 

“ हो बाबा ss  .. हे बघा..  या महिन्याचे लगेच केले सुद्धा ट्रान्सफर मोबाईलवरून. तुम्ही निश्चिंत रहा !!”

मुलगी दोन-तीन दिवस राहून , त्यांचं सगळं मार्गी लावून गेली. “फुलपुडी” मात्र त्या दिवसापासून रोज येऊ लागली. दिड महिन्यांनी डॉक्टरांना दाखवण्यासाठी म्हणून लेक- जावई येऊन गेले. त्यानंतर काही दिवसातच मुलीला तिच्या कंपनीकडून ६ महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जायची संधी चालून आली होती. आई बाबांना कधी काही मदत लागली तर? या काळजीने ती जायला तयार नव्हती पण “अशी संधी वारंवार येत नाही, आता माझी तब्येत सुधारते आहे . तू गेली नाहीस तर आम्हा दोघांना वाईट वाटेल” अशी भावनिक मनधरणी बाबांनी केली आणि शेवटी ती रवाना झाली.

दिवसामागून दिवस सरत होते. बाबा हळूहळू बरे होत होते. प्लॅस्टर निघालं. वॉकर शिवाय चालणं सुरू झालं. परिचारक मुलाचे कामाचे तास हळूहळू कमी करत एक दिवस त्यालाही सुट्टी देऊन टाकली. इतके सगळे बदल होत असले तरी एक गोष्ट तशीच होती ती म्हणजे गेले ५ महीने दररोज संध्याकाळनंतर दारावर अडकवली जाणारी  “फुलपुडी”. या ऑनलाईन युगात पैसे भरायला मुंबई-चेन्नई-ऑस्ट्रेलिया सगळं सारखंच असल्यामुळे

 – 4 –

मुलगी सातासमुद्रापार गेली असली तरी फुलपुडीचा आणि त्यासोबत येणारा ‘आनंदाचा रतीब’ नियमित सुरू होता. आता बाबा अगदी पूर्ण बरे झाले होते. एके दिवशी दुपारी त्यांनी मुलीला फोन केला. तब्येतीची सगळी खबरबात दिली आणि म्हणाले ..

“ अगं बाळा .. आता पुढच्या महिन्यापासून तू ते फुलपुडीचे पैसे भरू नकोस. मी आता पूर्वीसारखा आणत जाईन रोज फिरायला जाईन तेव्हा !”.

असं म्हंटल्यावर मुलीने डोळे एकदम मोठे केले, कपाळावर हात मारला आणि जोरात ओरडलीच ..

“ ओह नो sss बाबा बाबा .. आय अॅम एक्सट्रिमली सॉरी बाबा. मी इकडे यायच्या तयारीत साफ विसरून गेले ते फुलपुडीचं. आणि इथे आल्यावर तर काम इतकं वाढलंय ना!. शी sss  असं कसं विसरले मी . माझ्यामुळे फुलपुडी येणं बंद झालं तिकडे. बाप रे!

आणि आईच्या पूजेचं काय ?

एकदम अपराधी भावनेने तिचा डोळ्यांचा बांध फुटला. तिची ही अवस्था बघत बाबांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं..

 “ अगं अगं हो हो हो ss  … हरकत नाही … तू पैसे भरले नसलेस तरी तो फुलवाला रोज देत होता फुलपुडी. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस…. आईची देवपूजा अगदी व्यवस्थित सुरू आहे .. अगदी नियमितपणे..  चांगला आहे गं तो फुलवाला . खूप वर्ष ओळखतो मी त्याला.”

हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं. 

“ हुश्श !!.. थांबा लगेच त्याचे ३ महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते !”.

“ नको नको … आता मी स्वतः जाऊनच देतो .. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल.!”

क्रमश: भाग १  

© श्री क्षितिज दाते

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

आज गोरेगाव, मुंबईच्या सन्मित्र शाळेचे १९८६ च्या दहावीच्या बॅचचे सगळेजण खुशीत होते. फारा दिवसांनी आज त्यांचं नाशिकला गेट टुगेदर होतं. व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेजा-मेसेजी व्हायची नियमितपणे, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंदच काही आगळा.

बऱ्याच जणांच्या विशेष खुशीचं कारणही तसंच विशेष होतं – आज त्यांचा सुपरहिरो त्यांना प्रत्यक्ष भेटणार होता – सुनील लुकतुके, डेप्युटी कलेक्टर – त्यांचा वर्गमित्र, आजच्या गेट टुगेदरला येणार होता.

त्याला भेटणं म्हणजे बौद्धिक मेजवानी असायची. सर्वसामान्य मध्यमवर्गातला मुलगा, मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेला, कोणतेही ट्युशन – क्लासेस न लावता, आपल्या मेहनतीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि टप्प्याटप्प्याने बढती घेत आज डेप्युटी कलेक्टर पदावर विराजमान झाला होता. आपल्या कर्तृत्वाने, निर्भीड, निस्पृह वागण्याने त्याच्या नावाचा डंका सर्वत्र गाजत होता आणि शाळामित्र – वर्गमित्र या नात्याने आपोआपच या सगळ्यांची कॉलर ताठ होत होती.

आजही तो लाल दिव्याची सरकारी गाडी न आणता, सगळ्यांबरोबर ग्रुपने केलेल्या बसने मुंबईहून नाशिकपर्यंत आला होता. गाण्याच्या भेंड्या, नकला – सगळ्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तो सहभागी होत होता, खळखळून हसत होता, रुसत होता, फुरंगटत होता, मज्जा करत होता.

सर्व मित्र मैत्रिणींना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटत होता. एवढा मोठा माणूस, पण कोणतीही शेखी न मिरवता चारचौघांप्रमाणे सगळ्यांच्यात मिसळत होता – जणू अजून सगळेच जण शाळकरी होते.

पण त्यांना कल्पना नव्हती की त्या सगळ्या मित्रमैत्रिणींइतकाच, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त खुश स्वतः सुनील होता. आणि यामागचं त्याचं कारण होतं की त्याचे सुपरहिरो त्याला आज प्रत्यक्ष भेटत होते.

वर्गातल्या अनेक जणांशी तो फोनवरून संपर्कात होता, काहीजण व्हॉट्सॲपमुळे संपर्कात होते. आणि यातूनच त्याच्या सुपर हिरोंचे विविध पैलू त्याला उमगत होते.

तो विनी फडणीसला भेटला होता. तिचा पहिला मुलगा normal होता, पण धाकटी मात्र स्पेशल चाइल्ड होती. विनीचं कौतुक हे होतं की ना तिनं “माझ्याच नशिबी हे का” म्हणून कधी दैवाला बोल लावला ना तिनं एकाकडे लक्ष देताना दुसऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आज तिचा मुलगा तर कॉलेजात व्यवस्थित शिकत आहेच आणि तिची मुलगी भरतनाट्यम आणि स्विमिंगमध्ये, ती शिकत असलेल्या संस्थेला भारंभार सुवर्णपदकं मिळवून देत आहे. ज्यांची मुलं अशी शैक्षणिक दृष्ट्या challenged आहेत अशा पालकांना समुपदेशन करण्यासाठी विनीला त्यांच्याच सन्मित्र शाळेने नुकतेच बोलावले होते.

किशोर सरोदे हा त्याचा दुसरा हिरो. त्याचा मुलगा आता तेरा चौदा वर्षांचा आहे. आज सगळे स्पर्धात्मक युगात आपापल्या मुलांवर अभ्यास, tuitions या सगळ्यांची भारंभार ओझी लादत असताना, या पठ्ठ्याने मात्र लॉन टेनिसमध्ये प्राविण्य दाखवणाऱ्या आपल्या मुलाची शाळा बंद केली होती. त्याचा मुलगा – राघव आता पूर्णवेळ टेनिस खेळतो आणि आईवडिलांना विम्बल्डनच्या vip stand मध्ये बसवून सामना दाखवण्याचं स्वप्न उरी बाळगून आहे. आज राघव under 14 वयोगटात all India level च्या साठाव्या रँकिंगला पोचला आहे.

स्वतः इंजिनीयर असूनही, मुलाचे कौशल्य आणि मेहनत घेण्याची तयारी बघून एवढा मोठा निर्णय घेणारा किशोर सुनीलला स्तिमित करत होता.

स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा असलेली सुनंदा गोडबोले त्याला आज कित्येक वर्षांनी भेटत होती. तिचा नवरा पोलीस हवालदार होता. दारू पिऊन बायकोला मारहाण करणं हा त्याचा आवडता टाईमपास. आणि त्याच्या या छंदात त्याची आई आणि भाऊ सक्रिय सहभागी. माहेरची अति गरीबी असल्याने सुनंदाचे परतीचे दोर केव्हाच कापले गेले होते. पण सासरच्यांकडून इतका छळ होऊनही सुनंदा खचली नव्हती.

निरलस सेवा करून जेव्हा तिनं आजारपणात खितपत पडलेल्या सासूचे प्राण वाचवले, अपघातानंतर सेवा सुश्रुषा करून दिरांना शब्दशः आपल्या पायावर उभं केलं आणि नवरा नोकरीतून सस्पेंड झाल्यावर तिच्या पोळीभाजी केंद्राने जेव्हा घर चालवलं, तेव्हा कुठे तिच्या सासरच्यांचे डोळे उघडले आणि ती आता सन्मानानं सासरी रहात होती.

वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी कर्करोगाचे निदान झाल्यावरही न खचणारा आणि करोना काळात नवरा बायको एकाच वेळी icu त असूनही निराश न होणारा प्रति टॉम क्रुझ मनिष …

विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नोकरी गमावलेला, नंतर करोनामुळे घरी बसावे लागलेला, पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही आपली सदाबहार विनोदबुद्धी कायम राखणारा हिमांशू …

सुनीलच्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये, शाळेत असताना त्याचा अभ्यास घेण्यापासून त्याच्या आईची महत्त्वाची भूमिका होती. आज त्याच्या अनेक वर्गमैत्रिणी स्वतः करीअर करण्याची संधी व पात्रता असूनही मुलांना यशस्वी करण्यासाठी पूर्ण वेळ गृहिणी झाल्या होत्या आणि आपापल्या परीने सुनीलच्या आईची भूमिका निभावत होत्या.

बाकी मित्र मैत्रिणींपैकी कोणी सायबर गुन्हे तज्ञ, कोणी योगगुरू झाले होते. कोणी शरीराला प्रमाणबद्ध करणारा – वळण लावणारा बॉडी बिल्डर, तर कोणी मनाला वळण लावणारे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, कीर्तनकार, कोणी डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, उद्योगपती, आर्मी ऑफिसर, आणि या सगळ्यांचे रुसवे फुगवे सांभाळत, क्वचित कधी डोळे वटारून पण बरेचदा प्रेमाने सांगून – समजावून – चुचकारून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा all rounder निलेश … सुपर हिरोंची ही यादी न संपणारी होती.

त्याची बायको त्याला नेहमी विचारायची – “तुझे शाळा सोबती तुझे सुपर हिरो का आहेत ?” आणि त्याचं नेहमी उत्तर असायचं की “हे एका साध्यासुध्या सुनीलचे मित्र आहेत, लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या सुनीलचे मतलबी, फायद्यासाठी झालेले तोंडदेखले मित्र नव्हेत. शाळा कॉलेजात लौकिक अर्थाने त्यांना कदाचित कमी गुण असतील, पण आयुष्याच्या परीक्षेत ते त्याच्याइतकेच, किंबहुना कांकणभर जास्तच यशस्वी होते.

ते आर्थिक दृष्ट्या किती यशस्वी झाले, त्यांचं नाव –  मानमरातब किती आहे हे त्याच्या लेखी महत्त्वाचं नव्हतं. पण त्यांची झुंजार सकारात्मक वृत्ती त्याला प्रेरणादायक होती.

गुरू ठाकूरने

“असे जगावे छाताडावर

आव्हानाचे लावून अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर”

ही कविता जणू या दोस्तमंडळींना बघून, अनुभवून आणि उद्देशून लिहिली होती आणि म्हणूनच ते सगळेच त्याचे सुपरहिरो होते, आहेत आणि राहतीलही.

आजच्या गेट टुगेदरच्या दिवशी, सगळेच जण आपापल्या सुपर हिरोंना भेटून जाम खुश होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गडद मरण-स्वर (अनुवादित – The Last Post!)” ☆ भावानुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “गडद मरण-स्वर (अनुवादित – The Last Post!)” ☆ भावानुवाद – श्री संभाजी बबन गायके 

गडद काळोखामुळे दोन्ही बाजूंनी लढाई थांबबावी लागली आहे. उद्याच्या पहिल्या किरणांसोबत पुन्हा मृत्यू नाचू लागेल रणांगणावर आणि घेईल घास कुणाचाही. मृत्यूला कुठे शत्रू आणि मित्र सैन्यातला फरक समजतो? कुणीही मेला तरी त्याच्याच मुखात जाणार म्हणून तो हसतमुखाने वावरत असतो….वाट बघत थंड पडत जाणा-या श्वासांची.

मित्रसैन्य अलीकडच्या आणि शत्रूसैन्य पलीकडच्या भागात लपून बसले आहे अंधाराच्या पडद्याआड. गोळ्या झाडायच्या तरी कुणावर? दिसले तर पाहिजे या काळोखात. म्हणून परस्पर बाजूंना थोडीशी जरी हालचाल झाल्याची जाणिव झाली की अंदाजे बार टाकायच्या त्या दिशेला. यावेळी मात्र दोन्ही बाजू शांत होत्या. एका सैन्य तुकडीचा नायक आपल्या खंदकात भिंतीला टेकून बसला आहे. रातकिडे युद्धभूमीतल्या दिवसभरातल्या घडामोडींची जणू चर्चा करताहेत. झाडावरचं एखादं वटवाघुळ मधूनच दचकून उठल्यासारखं उडून जातंय आणि पुन्हा त्याच जागी येऊन चिकटून जातंय एखाद्या फांदीला. त्यांना रात्रीच दिसतं म्हणे !

एवढ्यात सैन्य तुकडी-नायकाच्या तीक्ष्ण कानांनी रणभूमीवरचा कण्हण्याचा क्षीण आवाज टिपला. कुणी तरी सैनिक बिचारा शेवटच्या घटका लवकर उलटून जाव्यात, एकदाचं सुटून जावं परलोकीच्या अज्ञात मुलखात यासाठी देवाला साकडं घालतोय. आपण आता हे जग पुन्हा पाहू शकणार नाही, याची त्याला पूर्ण खात्री वाटते आहे. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई, बहिण, भाऊ, मित्र उभे आहेत..आणि उभे आहेत बाबा ! त्यांचा निरोप घेऊन तो मागील वर्षीच पलीकडच्या राज्यात गेला होता संगीत शिकायला. आणि आता ही दोन्ही राज्ये एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. बाबांना न कळवताच तो त्या राज्याच्या सैन्यात भरती झालाय…संगीत वाद्यांच्या जागी आता त्याच्या नाजूक हातांत जीवघेणी हत्यारं आहेत.

विव्हळण्याचा तो आवाज सैन्य-तुकडी नायकाला शांत बसू देईना. कोण जाणे…तो आपल्याकडचाच सैनिक असला तर? त्याचा जीव वाचवू शकतो आपण ! नायकाच्या डोक्यात विचार सुरू होता. वरिष्ठांना विचारायला वेळ नव्हता आणि तशी परवानगीही कुणी त्याला दिली नसती. खुल्या मैदानातल्या युद्धभूमीत जाणं मोठ्या जोखमीचं होतं. तरीही नायक सरपटत सरपट्त निघाला त्या वेदनेच्या आवाजाच्या रोखाने. हालचाल टिपली गेली दूरवरच्या अंधारातून आणि गोळीबार होऊ लागला. तशाही स्थितीत नायकाने त्या जवानाला खेचून आणलेच आपल्या खंदकात. पण मघाशी आर्त स्वराच्या साथीने सुरू असलेले त्याचे श्वास मात्र आता थांबले होते. नायकाने खंदकातील कंदील त्या जवानाच्या चेह-यावर प्रकाशाची तिरीप पडेल असा धरला आणि त्याचा श्वास थबकला….बेटा ! त्याने अस्फुट किंकाळी फोडली. मोठ्याने रडणं त्याला शोभलं नसतं. त्याने कंदीलाची वात आणखी मोठी केली. आपल्या लेकाच्या चेह-यावरचं रक्त आपल्या हातांनी पुसलं आणि त्याच्या कपाळाचं दीर्घ चुंबन घेतलं. माणसा-माणसांतील रक्तरंजित संघर्षाने एका मुलाला आपल्या बापापासून कायमचं दूर केलं होतं.

रात्रभर नायक आसवं ढाळत राहिला. शत्रूकडून अधून मधून होत असलेल्या गोळीबारास उत्तर देण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. उलट तिकडूनच एखादी गोळी यावी आणि काळीज फाडून निघून जावी आरपार असं त्याला मनोमन वाटत होतं. तेवढीच भरपाई होईल एका जीवाची. आमच्या गोळ्यांनी हा संपला आणि त्यांच्या गोळ्यांनी मी संपून जावं…एवढा साधा हिशेब होता !

वरिष्ठांपर्यंत सकाळी बातमी गेलीच. सैन्य तुकडी-नायक आता फक्त एक बाप होता..अभागी ! त्याने विनंती केली…माझ्या लेकाला सैनिकी मानवंदना देऊन, बिगुलच्या, ड्रम्सच्या गजरात त्याला त्याच्या शेवटच्या प्रवासाला पाठवू द्यात…माझा लेक सैनिक होण्यासाठी नव्हता जन्माला आला. त्याला संगीतकार व्हायचं होतं !  व्यवस्थेकडून नकार आला…कारण कितीही केला तरी तो शत्रू सैनिक. फार तर एक सैनिक देऊ बिगुल वाजवू शकणारा..त्याच्या थडग्यावर ! अगतिक बापाने हे मान्य केलं. लेकाच्या कोटाच्या खिशात त्याला एक गाणं सापडलं..कागदावर लिहिलेलं…रक्ताने माखलेल्या. गाण्याच्या शब्दांसोबत गाण्याच्या वाद्य-सुरावटीही वळणदार आकारात कोरून ठेवल्या होत्या कागदावर आणि खाली सही होती दिमाखदार….संगीतकार…..कुमार…………!

बापानं त्याच्या त्या गतप्राण झालेल्या मुलाचं शव खड्ड्यात हळूहळू उतरवलं….जगातली सारी आसवं त्याच्याच डोळ्यांत अवतरली होती जणू…..त्या आसवांनी खड्ड्याच्या वरची माती भिजू लागली…त्यातलीच एक मूठ माती त्याने खड्ड्यात शांतपणे चिरनिद्रेत गेलेल्या त्या देहावर टाकली. बापाच्या कुशीत मूल झोपतं तसा त्याचा चेहरा दिसत होता.

बिगुल वाजवणा-या सैनिकासमोर बापानं ती सुरावट धरली….जीव ओतून..प्राण फुंकून वाजव…माझ्या मुलाचे शेवटचे स्वर ! त्यानेही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही…..छातीतली सर्व हवा त्याने बिगुलात फुंकण्यास प्रारंभ केला. युद्धभूमी डोळ्यांत प्राण आणून या मरणसोहळ्यातील स्वरांची उधळण पाहू लागली..कानात प्राण आणून शब्दांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू लागली…..

सैनिका…दिवस कडेला गेलाय आता….सूर्य तळ्याच्या, डोंगरांच्या आणि आभाळाच्याही पल्याड गेलाय.

सगळं ठीक आहे आता…नीज शांतपणे…दमला असशील ! देव इथंच जवळपास आहे !

अंधार डोळ्यांना काही पाहू देत नाहीये….पण आकाशातला एक तारा लकाकू लागलाय !

दुरून कुठून तरी रात्र येऊ लागलीय चोरपावलांनी !

देवाचे आभार मानावेत आज दिवसभरातल्या श्वासांसाठी !

ह्या विशाल गगनाखाली, ह्या सूर्याखाली, या ता-यांखाली

आपण आहोत आणि आपल्यावर त्याची दृष्टी आहे….

नीज बेटा ! देव इथंच जवळपासच आहे ! …… 

….. बिगुल वाजवणारा सैनिक प्राणपणानं ही सुरावट वाजवून आता थकलाय…त्याच्या बिगुलातून निघणारे सूर आता मंद मंद होत जाताहेत ! ते संपताच बाप त्याच्याकडे वळून म्हणाला….आता ही लास्ट पोस्ट सुरावट थांबव…. शिबिरातल्या सैनिकांना झोपेतून उठवणारी सुरावट..रिवाली वाजव…मित्रा ! हा माझा फौजी पोरगा आता उठेल…अंगावर सैनिकी वर्दी चढवेल आणि निघेल युद्धभूमीवर…वन्स अ सोल्जर…always अ सोल्जर !

(सैनिकांना अंतिम विदाई देताना बिगुलवर दी लास्ट पोस्ट सुरावट वाजवली जाते. त्या सुरावटीचा इतिहास अभ्यासताना ही एक काहीशी दंतकथा वाटणारी किंवा असणारी हृदयद्रावक कथा हाती लागली. ती आपल्यासाठी मराठीत लिहिली…माझ्या पद्धतीने आणि आकलनाच्या आवाक्याने.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रानपाखरू – भाग ३ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग ३ –  लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

 (मागील; भागात आपण पाहिले – तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले. आता इथून पुढे )

येता दिस नव्यासारखा सुरू झाला.

दोघी फुईभाच्यांनी मिळून लोनच्याची तयारी केली.आख्खा दिवस आडकित्त्यानी कैऱ्यांच्या फोडी करन्यात गेला .फोडी साफ करून मिठाचं पानी काढून टाकून हळदमीठ लावून वाळाया घातल्या. करकरीत फोडी आता जरा मऊ पडल्या.

पुढच्या खोलीच्या दाराचे दोन्ही कान उघडल्यावर उन्हाचा कडोसा हक्कान आतमंदी आला व्हता.त्या कडोश्यात न्हालेल्या फोडी हळदूल्या दिसत व्हत्या. जसजसं ऊन चढत गेलं तसतसं फोडींनी अंग चोरलं. आतीच्या कुंकवावानी रंगाच्या लुगड्यावर त्यांचा पिवळा रंग लय तेज दिसत व्हता.

तेवढ्यात त्या समद्या लालपिवळ्या वाळवनावर येक परकरी सावली पडली. जोडीदारीन आली व्हती..

हातात गोधडीचा बोजा.

आती आणि संगीला मोहऱ्या निवडतांना पाहून ती घुटमळली आन हळूच म्हनली,

“मावशे!! संगीला घडीभर पाठवती का माझ्याबरबर  नदीवर?”

आतीनं जरावेळ विचार केला..

“अं..येवढा का गं उशीर आज पान्याला?

बरं जा घेऊन तिला. पन तिन्ही सांज व्हायच्या आधी येऊन लागा बर्का.जा गं संगे! तुझा मामा किर्तनातून परत यायच्या आदी ये “

“हुं” म्हनत हातातलं ताट परातीत सारून संगी पटकन उठली. आतीलाबी वाटलं,

 ‘तेवढाच जीव रमंल पोरीचा.’

दोघी नदीच्या वाटंला लागल्या.जोडीदारीन संगीला उगीच इकडचा तिकडचा विषय काढून बोलतं करायचा प्रयत्न करीत व्हती.संगी वरवर समदं ठीक असल्यासारखं बोलत व्हती.पन अंमळशानं तिचा आतीमामांसमोर घातलेला आनंदी मुखौटा चिरफाटला.जोडीदारनीला समदं समजत व्हतं.

“संगे!! तुला कळलंच असंन ना?”

“काय गं?”

“शिंदेसायबाच्या मोठ्या पोरीचं जमलं म्हनत्यात.”

यदौळ खालमानेनं चालनाऱ्या संगीनं चमकून वर पायलं.तिच्या चेहऱ्याची थरथर व्हवू लागली. निसतंच कानावर पडनारं बोलनं आता थेट काळजात शिरलं व्हतं..जखम करीत व्हतं.ती काई बोलली नाई. आशेचा बारकासा धागाबी तटकन तुटून गेला.काळजाच्या डव्हात गरगरत दिसेनासा झाला.

जराशानं संगीनं मोठा श्र्वास घेतला,सुटल्यासारखं हसली. तिनं मनाच्या पाटीवरून मागल्या ऐतवारचा परसंग पार पुसून टाकला.पैल्यासारख्या..पार पैल्यासारख्या गप्पा सुरू केल्या.जोडीदारनीला हायसं वाटलं.

नदीकाठची त्यांची नेहमीची गप्पांची जागा जवळ आली .दोन काळेभोर ,मोठाले दगड..त्यांच्या बाजूला चाफ्याची चारदोन झाडं जीव खाऊन फुलल्याली.जुन्यापान्या झाडांचा वाळला पाचोळा साऱ्या वाटंवर पायाखाली इथूनतिथून गालिचासारखा अंथरलेला.पोरींच्या पायतळीच्या रेषा त्या वाटेला ठावकी व्हत्या. भुईचंपा,पळशी,पाचुंद्याची फुलं उन्हाला वाकूल्या दाखवीत व्हती. समद्या झाडांवर पिवळ्या,पोपटी,हिरव्या रंगांच्या पानांचे पक्षी अंगभर फुल्लारलेले.नदीवरून गार गार वारं येत व्हतं.मातीचा वल्ला वास मनाचा ताबेदार झाला व्हता.सोबत पाखरांच्या गप्पा..

नदीमायच्या साक्षीनं दोघी गूज बोलू लागल्या.गोधडीला धुता धुता मनबी निर्मळ झालं जनू.

गोधडी वाळू घातल्यावर दोघीही कातळावर ओनावल्या.पाय नदीच्या पान्याबरबर नाचत व्हते.पैंजनं गानी म्हनत व्हती.वल्लं शरीर कातळाच्या खरबरीत पन मायाळू पाठीवर सैलावलं .दोघींचेबी डोळे निळ्या आकाशात ढगांच्या कापूसगोंड्यांकडं टुकूरटुकूर बघत व्हते..     जरावेळ पाठीचा काटा मोडल्यावर जोडीदारीन म्हनली, “संगे चल आपून तो जुना खेळ खेळू…कपच्यांचा.बघू कुनाची कपची नदीवर जास्त उड्या मारती??”

निळ्या आकाशाकडे बघतांना निळ्याच डोळ्यांची मालकीन झालेली संगी निळाईचा हात धरूनच म्हनली,

“चल.”

दोघींच्या चेहऱ्यावर हसन्याचं खुळं फूल उमललं.दोघींनीबी खेळासाठी बऱ्याच कपच्या शोधून   आनल्या.चढाओढीनं नदीच्या डव्हाचा तलम पदर छेदू लागल्या. आधी आधी घटकेत बुडी मारनाऱ्या कपच्या जुन्या दिसांची शपथ आठवल्यावर पान्यावर नाचू लागल्या.तो तो पोरींच्या हसण्याला उफाळ आला.संगीची कपची तर दोन दोन डुबक्या घेत लांबवर पळत व्हती‌.जोडीदारनीला तर काई जमंना.ती फुरंगाटली,

“संगे!! तुझी कपची कसं काय बरं दोन डुबक्या मारती? माझी तर बळंबळं येवढीतेवढी येक उडी मारती आन् खुशाल बुडी घेती बघ..आता गं?”

तेवढ्यात मागून एक कपची तीरासारखी सरसरत आली आन नदीच्या पदराशी नाजूक छेडखानी करीत तीन डुबक्या मारीत दुसऱ्या तीराच्या दिशेनं  गेलीबी. दोघींनाबी काई सुधरलंच नाई. संगीच्या हातातली कपची तशीच व्हती.येवढा नेम कुनाचा बरं? असा आचार करून दोघींनी मागं वळून पाह्यलं.

“काय जमतंय का?” पल्लेदार पुरूषी आवाज आला. मिशीच्या आकड्यावर ताव भरत कूनाचीतरी रांगडी आकृती कातळावर येक पाय ठिवून उभी व्हती.त्याच्या दंडावर तटतटलेले स्नायू संगीच्या नजरेत भरले…

पुन्यांदा.

महिपतरावाचा पोरगा समोर ऐटीत उभा व्हता.जोडीदारीन म्हनली,

“अगं हा तर ऐतवारी आलेला पावनाच दिसतोय..”

संगीनं वळखलं नवतं थोडंच? तिनं तिच्याबी नकळत त्याच्याकडं रोखून बघितलं आन तिची नजर खाली झुकली.तळव्यात घट्ट धरलेली कपची घामेजून चिंब झाली.तिच्या मनात राग व्हताच आन त्याच्या नजरेचा मागबी..

डोळे नको भरायला म्हनून ती मासूळीसारखी तडफडत व्हती.जोडीदारीन त्यांची जुगलबंदी बघत हलकंच चार पावलं मागं सरकली ..सुर्यातळी पाठ करून असलेल्या जोडीदारनीची सावली लांबत गेली.

दोघांमधील जडावल्या बाईसारखी शांतता येकदाची बाळंतीन झाली.संगी रागं भरलेल्या आवाजात बोलली ,

” तुमचं लगीन जमल्याचं साखरपान वाटायला आलात व्हय इथं? शिंदेसायबाचं दुकानातले आयतं बुंदीलाडू आमच्या आदबूनिदबू केलेल्या पुरनपोळीवर भारी पडलं म्हनायचं..”

संगीच्या रागाची आगवळ सुटली होती.तिनं मनातलं गरळ वकून टाकलं आन तोंड पुन्यांदा शिवून टाकलं.. पन दोन्ही डोळ्यांची तळी तिच्या आवरन्याला न जुमानता खळ्ळकन भरून आली. गुलाबपाकळ्यांवानी असलेल्या पातळ नाकपुड्या थरथरू लागल्या.जिवनी बारीक पोरावानी बाबर ओठ काढती झाली.

समोरच्या राकट चेहऱ्यावर आता खट्याळ हसू फुललं व्हतं.त्यादिवशीचं बुजऱ्या हसन्याचं ठिगळ कुडल्याकुडं पांगलं व्हतं.

“अस्सं झालंय व्हय?’

‘ हुं!  तुमाला कोनी सांगितलं ह्ये?”

संगीनं मागं वळून पाह्यलं.तिचे डोळे जोडीदारनीला शोधत व्हते.

“तिकडं काय बघताय? मी सांगितलं तर जमंल ना?”

पोरगा पुन्हा एकदा खोडकर हसला.संगीची सैरभैर नजर पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर गुतली.. त्याच्या गालावरच्या खळीत घट्टमुट्ट अडकून बसली.

“अवो बाईसाहेब!! शिंदेसायबाच्या पोरीची ष्टाईल या गावरान गड्याला कवा रूचायची? शेताच्या बांधावरनं फिरता फिरता तिचं तंगडं मोडाया बसलंय…शेहरातली मड्डम ती. माज्या गळ्यात पट्टा बांधून दाराशी बांधायजोगी..

………..

गावच्या यड्याला गावचंच कोन तरी खूळं मानूस पायजेल…नाय का? जे मानूस गड्याच्या मातकट हातानं खुडलेली चिच्चाबोरं न लाजता खाईल.. शेनामुताचा वास येतो म्हनून पावडरीनं धूत बसनार नाय…” येक गडगडाटी पन मायाळू हसू नजर खाली झुकलेल्या संगीला ऐकायला आलं..तिच्या नजरंसमोर त्याचा मर्दानी हात आला. त्या मोठाल्या तळव्यातली चिच्चाबोरं पाहून संगी हरखली.यदौळ रडू येऊ नाई म्हनून तिनं शिकस्त केली व्हती पन आता मातूर डोळ्यातलं पानी थांबायचं नाव घेत नवतं.दुसऱ्या तळव्यात खाऱ्या पान्याचं तळं भरत चाललं व्हतं.मनातल्या रानपाखरांच्या पंखात आता बेगुमान वारं भरलं व्हतं… 

– समाप्त – 

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रानपाखरू – भाग १ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग १  – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

बांधावरला आंबा मव्हारला तवाच आती म्हनली ,

“यंदाच्या वर्साला मोप आंबे येतीन..पोरीचं हात याच वर्सी पिवळे केले पायजेल…बिना आईबापाचं लेकरू त्ये. मव्हारला आंबा लगेच डोळ्यात भरतोय.गावात  कुतरमुतीवानी ठाईठाई माजलेल्या रानमुंज्यांची काई कमी नाई..”

चुलीपुढं बसलेल्या आतीच्या तोंडातून काई शब्द

मामांशी आन् सोत्ताशी निगत व्हते.आविष्याला पुरलेल्या भोगवट्यामुळं तिला अशी मोठ्यांदी बोलायची सवय लागली व्हती. ती बोलत असली की, मामा जराजरा ईळानं आपसूक ‘हुं, हूं’ करत पन तंबाखू मळायच्या नादात नेमकं कायतरी मत्त्वाचं हुकून जाई आन आती पिसाळल्यागत करी.

“या मानसाला मुद्द्याचं बोलनं कवाच ऐकू जायचं नाई “.

बारीक असतांना संगीला त्यांच्या या लुटपुटच्या तंट्याची लय गंमत वाटायची पन जशी ती शानी व्हत गेली तसतशी तिला आती आन मामांच्या डोंगरावरढ्या उपकाराची जानीव झाली. म्हनूनच मग

हुशार असूनबी धाव्वीतूनच तिचा दाखला काडला , तवा ऊरी फुटुन रडावा वाटलं तरीबी ती रडली नाई.तसं ऊरी फुटून रडावं असे परसंग आतीमामांनी येऊ दिलेच नव्हते तिच्यावर. लोकंबी नवल करीत,

‘भाची असूनबी पोटच्या पोरीसारखी वाढीवली शांताबाईनं संगीला’ असं म्हनत. 

कोनी म्हनायचं , ‘ माह्यारचं तर कुत्रं बी गोड लागातंय बायांना.ही तर आख्खी रक्तामांसाची भाची.खरा मोठेपना असंल तर तो तिच्या नवऱ्याचा.’

‘अवो! कशाचं काय? त्याला सोत्ताचं पोरच झालं नाई. त्याचा कमीपना झाकायला म्हनून त्यानं बी मोडता घातला नसंल.’

‘ खरंय बया तुजं.त्याचं सोत्ताचं पोर झालं असतं तर कशाला त्यानं बायकूच्या माह्यारचं मानूस संभाळलं असतं?’

लोक धा तोंडांनी धा गोष्टी बोलत पन संगीसाठी तर ती दोघं विठ्ठलरुक्माईच व्हती.संगीचा बाप घरच्याच बैलानं भोसकला..समदी आतडी चिरफाडली गेली. त्या दुखन्यातच त्यो गेला आन् त्याच्यामागे दोनच वर्सांत मायबी. कुरडईचा घाट घेता घेता अचानक पेटली.कांबळं टाकेपर्यंत अर्धीनिर्धी करपली व्हती.शेवटी गेलीच.संगी तवा तीन वर्सांची व्हती. मायबाप आठवतबी नव्हती तिला.पन तरीबी कदीतरी ‘मायबापं कशानं गेली’ हे कुन्या नातेवाईकानं भसकन सांगितल्यावर तिला रडू आलं व्हतं.

साळंच्या पैल्या दिशी मामांनी साळंत नेऊन घातलं, तवा तर तिनं रडून हैदोस घातला व्हता. वर्गात मुसमुसत असलेल्या संगीला मास्तरीन म्हनली व्हती, ” सख्खी पोर नसूनही शाळा शिकवत आहेत.किती मोठी गोष्ट आहे ही.” समदं तिला समजलं नाई पन रडू आपोआप थांबलं ह्येबी खरं… 

आतीमामांनी घातलेल्या मायेच्या पायघड्यांवरून संगी चालत राहिली.दुडदुडत पळत जानारी तिची चाल जलम येईस्तवर नागिनीसारखी तेज व्हत गेली. 

आज आतीच्या तोंडून अवचित सोत्ताच्या लग्नाची बोलनी ऐकल्यावर, बांधावरच्या आंब्यावानी संगीच्या मनातबी मव्हर डवारला व्हता.निराळ्याच तंद्रीत आता तिची कामं व्हत व्हती. रामाकिसनाच्या काळापासून तिच्या रक्तात भिनल्यालं बाईपन आता ठसठशीत व्हत चाललं. सोत्ताच्या नकळत ती आतीचा सौंसारातला वावर निरखू निरखू बघू लागली व्हती.

आतीबी ‘ पोर आता शानीसुरती झाली,तिला सौंसारातलं बारीकनिरीक कळाया पायजेल.कुडं अडायला नकं’ या इचारानं येवढीतेवढी गोष्ट तिला दाखवू दाखवू करीत व्हती. आत्तीच्या अनभवांच्या ठिपक्यांवरून संगी भविष्याची रांगुळी वढत चालली व्हती.

” हे बघ!! हे आसं करायचं..दानं आसं पाखडायचं.. समदं सुपातून वर उधळायचं, वाऱ्यावर झूलवायचं..वाईट-साईट, कुचकं-नासकं टाकून द्यायचं आन निर्मळ तेवढंच पोटात ठिवायचं. बाईच्या जातीला पाखडाया आलं पाहिजेल…”

आती काई सोत्ताशी, काई पोरीशी, काई चार भितीतलं तर काई पोथीतलं ती बोलत व्हती.संगी जशी उमज पडंल तसं समदं साठवून घेत व्हती. 

‘शांताबाईची संगी लग्नाची हाये’ आसं समद्या भावकीत आता म्हाईत झालं व्हतं.येक दिस सांजच्याला मामा हातावर मशेरी मळत असताना आतीनं ईषय काडला,

“काय कुठे उजेड दिसतोय का?”

मामांनी वर न बघताच मशेरीची यक जोरदार फक्की मारून तोंडात कोंबली आन् सावकाशीनं सांगितलं,

” यक जागा हाये. महिपत्या नाय का? खंडोबाचा साडू, त्या जनाबाईच्या चुलतभावाचा पोरगा..”

” हा मंग!! चांगला लक्षात हाये तो.

गिरजीच्या पोरीच्या लग्नात त्यानीच तर देन्याघेन्यावरून गोंधूळ घातला व्हता.लय वंगाळ मानूस…”

आतीला मधीच थांबवीत मामा म्हनले,

” त्याचा पोरगा हाये लग्नाला..”

आतीला जरा ईळ काई बोलायलाच सुधारलं नाई. उलसंक थांबून ती म्हनली,

“तसा येवढाबी वंगाळ नाई .गिरजी तरी कुठं लय शानी लागून चालली??”

आतीचा उफराटा पवित्रा पाहून मामांना मिशीमंदी हसाया आलं.

” बरं ते हसायचं नंतर बघावा.. पोरगा कसाय? काय करतो? “

” लय भारी हाय म्हंत्यात दिसायला. घरची पंचवीस येकर बागायती शेती, पोटापुरतं शिक्षेनबी हाये. सोभावबी त्याच्या आईसारखा हाये.. गरीब.महिपत्यासारखा नाई.

…पोर सुंदर पाहिजेल पोराला फक्त”

संगीचं समदं काळीज त्या बोलन्याकडं लागून रायलं व्हतं.तिच्या मनात बागायती शिवार डोळ्यांपुढं नाचत व्हतं. बांधावर असलेल्या आंब्याच्या बुडी बसलेल्या आपल्या रांगड्या नवऱ्याला ती न्याहारी घेऊन जायाचं सपान बघू लागली.मनातल्या कोऱ्या चेहऱ्याला आकार येऊ लागला. तेज तलवारीवानी नाक आन् काळ्याभोर मधाच्या पोळ्यासारखा दाट मिशीचा आकडा आसं काईबाई तिच्या मनात उगवत व्हतं,मावळत व्हतं.

आतीमामांनी लय जीव लावला पन समज आल्यापासून मिंधेपनाची जानीव संगीचा पिच्छा करीत व्हती. सख्ख्या मायबापापाशी जसा हट्ट करता आला असता तसा तिनं आतीमामांपाशी कदीच केला नाई. जे हाय ते गोड मानून घेत रायली. आता नवरा नावाचं हक्काचं मानूस तिला मिळनार व्हतं..ज्याला ती सांगू शकनार व्हती, कच्च्या कैर्‍या पाडायला. ज्याच्या मोठाल्या तळव्यात चिचाबोरं ठेवून येक येक उचलून खायला, दोघांनी मिळून बांधावर मोकळ्यानं फिरायला, मास्तरांच्या इंदीकडे हाये तशी झुळझुळीत पोपटी रंगाची साडी घ्यायला, इहिरीत पवायला शिकवायला. राहून गेलेल्या कितीतरी हौशी..ज्या आतीमामांनी भीतीपोटी आन् संगीनं भिडंपोटी कधीच पुरवून घेतल्या नव्हत्या.

तिच्या मनातल्या मव्हरलेल्या आमराईवर आता रानपाखरं गाऊ लागली व्हती‌. 

तंद्रीत हरवल्यानं तिला आतीमामांचं पुढचं बोलनं ऐकाया गेलं नाई.

आती काळजीच्या आवाजात म्हणत होती,

“महिपत्याचं काई सांगता येत नाई.त्याला आपली संगी पसंत पडती,ना पडती?”

“लगीन महिपत्याच्या पोराला करायचंय का महिपत्याला? आन काय म्हनून नाकारतीन?अशी कंच्या बाबतीत डावी हाये आपली पोर? गोरीदेखनी हाये,घरकामात चलाख, शेतीत घातली तर सोनं पिकवील..अजून काय पायजेल? आन तुला वाटत असंल आपल्या परस्थितीचं…तर महिपत्यापासून काय आपली परस्थिती लपून नाई.. जिरायती का व्हईना पन जमिनीचा टुकडा हाये..लय डामाडौलात नाई पन पावन्यारावळ्यात कमीपना येनार नाई असं लगीन लावून द्यू.”

” या वरसाला पावसानं दगा दिला नाईतर..”

” रीनपानी करू सावकाराकडून..नायतर म्हैस हायेच आपली.बघता यील कायतरी”

“अवो पन..म्हैस हाये म्हनून दुधदूभतं तरी मिळातंय..ती इकल्यावर कसं व्हायचं?”

“त्ये बघू अजून..पावनी अजून यायचीत,त्यांनी पोर पसंत करायची..मग पुडलं बोलनं.लय हुरावल्यासारखं नको करू”

“लगीन तर लावू कसंबी पन देन्याघेन्यावर अडून बसले मंग..?”

“नाईतर त्याचा बाप दुसरा.. एवढं काय पानी पडलंय त्या पोरावर?त्याला काय सोन्याचा पत्रा बशिवलाय? आपल्या पोरीसारखी  पोर कुठं घावनारे त्यान्ला?”

यावर आतीनं मान डोलावली.बोलनं तिथच थांबलं खरं ,पन दोघांन्लाबी आशा लागलीच व्हती. 

दुसऱ्या दिशी सक्काळ सक्काळ आती म्हनली,

“मळ्यातला आंबा तरी उतरून घ्या तेवडा. जमलंच संगीचं लगीन तर लोनचं-बिनचं घालता नाई यायचं.थोडं वडं,पापड,शेवया केल्या पायजेल. यावर्साला पोर हाये हाताखाली.पुडल्या वरसाला कसंबी होवो.”

संगीच्या रूपाकडं पाहून ‘पावनी नाई म्हननार नाईत.लगीन जमल्याशिवाय रहायचं नाई’ असं तिला मनापासून वाटत व्हतं.बोलता बोलता आती मशेरी थुकायला म्हनून भाईर गेली आन डोळ्याचं पानी पुसून आली ह्ये कोनलाच कळलं नाई.

संगी कुरडयांसाठी गहू भिजू घालीत व्हती.कुरडयचा ढवळासफीद, ऊन ऊन चीक साखर टाकून खायला तिला लय आवडायचा.तिच्या जोडीदारनी तिच्यासाठी ध्यान करून चीक आनीत.तिची आवड माहित असूनबी आतीनं कुरडयांचा घाट घरी कदीच घातला नव्हता. वानळा आलेल्या कुरडयांवरच त्यांचं वरीस निघून जाई.पन् यावर्षाला मातूर आतीनं कुरडयांचं मनावर घेतलं व्हतं.संगीला प्रश्र्न पडला.तिनं विचारलंबी,सावकाशीनं आती बोलली,

“इतके दिस तुला काई म्हनले नाई..पन माझी वयनी,तुझी माय कुरडयाचा घाट घेता घेता भाजली त्ये मीच पाह्यलं व्हतं डोळ्यानं..मोप हाकबोंब केली पन वयनी नाई वाचली.तवापासून कुरडया करूशीच वाटल्या नाई कदी.”

संगी गुमान ऱ्हायली..

“आता तू म्हनशील..मग या वर्सालाच का घाट घातला? तर बयो त्याचं असंय..सांजसकाळ तू लगीन करून दुसऱ्याच्या घरला जाशीन. उद्याला तुझ्या सासूनं म्हनाया नको, का ही पोर बिनआईची म्हनून हिला कुरडया येती नाईत.तिच्या आतीनं येवढंबी शिकवलं नाई..”

बोलता बोलता आतीचं हुरदं दाटून आलं. 

क्रमश: भाग १

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print