☆ परतीचा फराळ!… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा…!
घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.
ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.
चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.
पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.
प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते. ती गृहीणींना अचूक माहीती असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.
डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.
जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.
शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो, पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.
असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा… जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा… आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा…
तर मग एन्जॉय तुमचा परतीचा फराळ!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ प्रकाश ते प्रज्ञा – लेखक : श्री संतोष गजानन खाडये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
दिवाळीची धावपळ, घराघरातील जल्लोष आणि रात्र उजळवणारे अनंत दिवे थांबले की आयुष्य एका गूढ शांततेत शिरतं. फुलबाजे, आकाश उजळवणारे कंदील, फटाके, विविध आवाज करणारे फटाके यांच्या किरर्र आवाजानंतर आकाशात उरलेली ती धुरकट झाक जणू मनावरही पसरते, पण त्या धुक्याच्या पलीकडे एक नवा प्रकाश उमलत असतो. तो दिव्यांचा नाही, आत्म्याचा असतो. घरभर उरलेले दिवे मंदावलेले असतात, पण त्यांचा उजेड अजूनही भिंतींवर पसरलेला असतो, आणि कदाचित मनातही. त्या प्रकाशात माणूस स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागतो. सणाच्या गडबडीत विसरलेली आत्मशांती पुन्हा जागी होते. गोडधोडाचे डबे रिकामे झालेले असतात, पण हृदय गोड झालेलं असतं, कारण सणानंतरही राहते ती एकच भावना : कृतज्ञतेची.
दिवाळी ही केवळ प्रकाशाचा सण नाही; ती प्रज्ञेचा आरंभ आहे. जेव्हा आपण घर झाडून, रंगवून, सजवतो, तेव्हा नकळत आपलं अंतःकरणही त्या उजेडासाठी तयार होतं. त्या तयारीत प्रेम, सहकार्य, क्षमा आणि आशेचे नवे रंग मिसळलेले असतात. सण संपल्यावर अचानक मनात एक प्रश्न जागा होतो — “या उजेडाचं पुढे काय करायचं? ” आणि इथूनच सुरू होतो प्रकाश ते प्रज्ञेचा प्रवास.
प्रकाशाचं खरं सार हे पाहण्यात नाही, तर जाणण्यात आहे. बाहेरच्या दिव्यांनी अंधार हटतो, पण आतल्या अंधारावर फक्त प्रज्ञेचा प्रकाश चालतो. ती प्रज्ञा म्हणजे विवेक — काय टिकवायचं, काय सोडायचं, कोणावर प्रेम करायचं, आणि कोणत्या मार्गाने पुढे जायचं, हे समजणं. गावातल्या शेतकऱ्याला जेव्हा दिवाळीनंतर पुन्हा मातीचा वास जाणवतो, तेव्हा तो जाणतो की हा हंगाम फक्त पिकांचा नाही — तो मनाचाही आहे. माती जशी जुन्या तणांपासून मुक्त होऊन नव्या पेरणीसाठी सज्ज होते, तसंच माणसाचं मनही जुन्या विचारांचं ओझं झटकून नव्या विचाराचे स्वागत करते. हीच दिवाळीनंतरची नवचेतना — अंतर्मनातील नव्या अंकुरांची सुरुवात.
शहरात ही नवचेतना वेगळ्या रूपात प्रकटते. गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांतून येणारा दिवाळीनंतरचा सकाळचा प्रकाश शांत असतो, पण अर्थपूर्ण. रात्रीच्या फटाक्यांच्या तेजानंतर आता तो प्रकाश स्थिर आहे, जणू सांगतो, “आता बाहेरचं पुरे, आता आत डोकाव. ” त्या क्षणी माणूस थोडा थांबतो — ऑफिसला निघताना आरशात स्वतःकडे पाहतो आणि मनात विचारतो, “मी खरंच समाधानी आहे का? ” हीच आत्मप्रज्ञेची पहिली ठिणगी असते.
दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश जर बाहेर उजळत असेल, तर त्यातून प्रज्ञा जन्म घेते — जी विचार उजळवते. प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान नाही, तर समज. ती सांगते — संपत्तीपेक्षा समाधान मोठं आहे, प्रसिद्धीपेक्षा प्रेम अधिक मूल्यवान आहे, आणि अंधाराला शाप देण्यापेक्षा एक दिवा पेटवणं अधिक अर्थपूर्ण आहे. जगातील मानवजातीच्या विभिन्न विचारांचे स्वागत, डावे उजवे सारेच विचार मानवीय प्रगतीचे द्योतक आहेत तेव्हा कुणाचा द्वेष नको तर सर्वांनीच एक दुसऱ्याच्या विचाराचा अस्तित्वाचा दिवा एकमेकात उजळायला हवा. प्रज्ञेचा मार्ग म्हणजे अंतर्मनातील प्रकाशाकडे प्रवास. त्या प्रवासात ना गडबड असते, ना गर्दी — फक्त स्वतःशी संवाद असतो. “माझं आयुष्य फक्त उपभोगासाठी आहे का, की काहीतरी निर्माण करण्यासाठी? ” या प्रश्नाचं उत्तरच माणसाला नव्या चेतनेत नेऊन ठेवतं.
दिवाळीनंतरची नवचेतना म्हणजे बदलाची भीती नाही, तर बदलाची ओढ. ती सांगते — जसा दिवस रात्र ओलांडून उजाडतो, तसंच मनाचंही पुनर्जन्म घेणं आवश्यक आहे. अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत नाही, आणि संघर्षाशिवाय प्रज्ञा जागृत होत नाही. खरी संपत्ती तीच, जी अनुभवातून मिळते. खरं यश तेच, जे मनाला स्थैर्य देतं. आणि खरी दिवाळी तीच, जी प्रत्येक दिवशी आपण मनात साजरी करतो.
आज दिवाळी संपलेली नाही, तर आरंभ आहे नव्या विचारांचा, नव्या दृष्टिकोनाचा, आणि नव्या जीवनदृष्टीचा. आपण बाहेरचे दिवे विझवले असले, तरी मनातला दिवा जपला, तर संपूर्ण वर्ष प्रकाशमान होईल. जर मन मोठं असेल, तर घरातील प्रत्येक कोपरा मंदिर बनतो. आणि तोच क्षण असतो, जेव्हा प्रकाश प्रज्ञेत रूपांतरित होतो.
दिवाळीच्या सणानंतर दिवाळी बाहेर नव्हे, आत उजळते.
लेखक – श्री संतोष गजानन खाडये
प्रस्तुती – सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सर्व भौतिक जग ज्या तत्वांपासून निर्मिल गेले आहे, ती पाच तत्वे म्हणजे – पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश. यांना ‘पंचमहाभूते’ असे म्हणतात हे बहुतेकांना माहिती असते. ‘वायुतत्व’ हे यातील एक महत्त्वाचे तत्व. वायू – वात – वारा – हलणारी हवा अशी अनेक नावे या तत्वाबद्दल बोलतांना सामान्यत: वापरली जातात. पण नाव कुठलेही वापरले, तरी तत्व एकच – “वायुतत्व”.
या तत्वाचे महत्त्व वेगवेगळ्या संदर्भात, पण विशेषत्त्वाने सांगता येते. माणसाच्या अस्तित्त्वाशी निगडीत असणारा ‘प्राण-वायू’ हा वायूचा अतिमहत्त्वाचा विशेष… शरीरात प्राण तेवता ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतो तो ‘प्राण-वायू’– आणि तो मिळेनासा झाला, तर प्राणाचा अन्त– अशी याची थोडक्यात महती सांगता येईल. माणूस श्वास घेतो, म्हणजे नाकातून हवा शरिरात ओढतो, आणि उच्छवासातून ती बाहेर टाकतो… पण इथे सर्रास ‘हवा’ असे म्हटले जाते, ते मात्र “म्हणायला सोपे” म्हणून असावे. कारण नुसती हवा सर्वत्र असली, तरी ती आपणहून कोणतीच हालचाल करत नाही. तिला हलवले की मग तिलाच वायू.. वारा म्हटले जाते. म्हणूनच “वारा अर्थात वायू म्हणजे हलणारी हवा” अशी कुणालाही समजेल अशी सोपी व्याख्या केली जाते. अर्थातच, श्वास म्हणजे खरे तर नाकाद्वारे शरीरात ओढून घेतलेला वायूच —शरीरात चालू असणाऱ्या प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या वायूमार्फत सुरु असणाऱ्या क्रिया –म्हणजे शरीरातील वायुतत्वाचे पाच भाग मानले जातात, ज्यांनाच ‘ पंचप्राण ‘ म्हटले जाते, आणि ते शरीराच्या संपूर्ण कार्यप्रणालीला जणू इंधन पुरवतात. “वायू म्हणजे गती” हे सर्वज्ञातच आहे. श्री समर्थांनी दासबोध-ग्रंथात वायूचे असे वर्णन केले आहे की —
चैतन्य आणि चंचळ ।
तो हा वायोजि केवळ ।।
या पंचतत्वांचा संबंध माणसाच्या पंचेंद्रियांशी असतो हे तर खरेच. आणि ही पाचही तत्वे शरीरात संतुलित राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यकच असते. पण श्वसनक्रियेसाठी अव्याहत कार्यरत असणारे ‘वायुतत्व’, त्याद्वारे शरीरातील सर्व कार्ये निरोगी ठेवण्याचे काम प्रामुख्याने करते असे म्हणणे वावगे ठरणार नाही —-”श्वास थांबला-माणूस संपला” असेच तर म्हटले जाते नेहेमी.
योगशास्त्रात मानवी शरीरातील जी सात योगिक-चक्रे सांगितली आहेत, त्यातील ‘अनाहत’ चक्राशी (याला ‘हृदयचक्र’ असेही म्हटले जाते) हे वायुतत्व संबंधित असते. हे अनाहत चक्र मुख्यतः हृदय आणि फुप्फुसे यांचे कार्य नियंत्रित करते. त्यामुळे अर्थातच ‘प्राणवायू’च्या रूपाने ‘वायुतत्व’, हाच या कामासाठी अत्यावश्यक असणारी शक्ती देणारा अत्यावश्यक घटक असतो. या तत्वाचा उपयोग योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे शरिरासाठी होत असेल, तर पर्यायाने शरीर निरोगी रहाण्यास मोठाच हातभार लागतो. अन्न-पाण्यावाचून माणूस काही दिवस जिवंत राहू शकतो, पण ‘प्राणवायू’वाचून तो फार तर ३ ते ५ मिनिटेच जिवंत राहू शकतो. म्हणूनच मानवी देहाच्या बाबतीत, वायुतत्व हे सर्वात जास्त सामर्थ्यवान आहे असे म्हटले जाते. शरीराला पुरेसा प्राणवायू मिळाला नाही, तर एखादे दुखणे कसे जिवावरच उठते, हे तर सध्या आपण बघतोच आहोत…करोनासारख्या साथीच्या आजारांच्या निमित्ताने. अशावेळी तर प्राणवायूचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. सगळ्या जगाला व्यापून राहिलेले हे वायुतत्व, अशावेळी माणसांना चांगलाच धडा शिकवते, हे नक्कीच लक्षात येते. याचबरोबर, शरीरात चुकीच्या जागी वायू किंवा ‘हवा’ म्हणूया, साठून रहाणे किती त्रासदायक ठरू शकते हे सांगण्याची गरज नाही.
या संदर्भाने इथे एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की, योगसाधनेने प्राणवायूवर प्रभुत्व मिळवता येते हे आता सर्वमान्य झालेले आहे. योगसाधना म्हणजे संयम… अनेक बाबतीतला संयम… ज्यामुळे… मन जास्त संतुलित रहाते, ज्यामुळे आयुष्य जास्त संपन्न – समृद्धरित्या जगण्यास मोलाची मदत होते. इतकेच नाही तर मानसिक समस्याही कमी होतात. कारण या साधनेतील प्राणायामामुळे परिणामत: वायुतत्वाचा प्रभाव वाढवता येतो, आणि संतुलन सहजरित्या वाढते.
हे झाले प्राणवायूच्या रूपातील वायुतत्त्वाचे महत्त्व. आता वाऱ्याच्या रूपातल्या वायू-तत्वाबद्दल— याबाबत तर बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. या रूपातला त्याचा एक विशेष गुणधर्म हा आहे की, वाऱ्याला ‘सरळ-वाकडं’ यातला फरक कळतच नाही. जशी दिशा मिळेल, जिथे जागा मिळेल, तिथे तो वहात जातो – वहात राहतो. थोडक्यात, ‘सारासार-विचार’ हा प्रकार त्याच्या बाबतीत नसतोच असे गंमतीने म्हणावेसे वाटते….मग कुठे ‘आला आला वारा…संगे पावसाच्या धारा…’ असं प्रसन्नपणे म्हणावंसं वाटतं, तर कधी–‘थंडगार ही हवा—’असं म्हणत तो अनामिक हुरहूर लावून जातो –शांतपणे झुळझुळत, जणू गुणगुणत आला, तर तो कधीच लांब जाऊ नये, इतका हवाहवासा, इतका आपलासा वाटायला लागतो. माणसाच्या चित्तवृत्ती आपोआप प्रसन्न होऊ लागतात, उष्णतेचा दाह शमायला लागतो… ‘पाऊस आला, वारा आला… पानं लागली नाचू’… असं काही सुचायला लागतं.
… पण कधीकधी मात्र तो इतका वेडावाकडा, इतका नकोश्या वेगाने येतो, की त्याला ‘वारा’ न म्हणता ‘वादळ’ असंच म्हणावं लागतं. कुठे हवेचा कमी दाबाचा पट्टा –कुठे जास्त दाबाचा पट्टा अशा स्वतःच स्वतःला उपाध्या देत हे वायुतत्व मग ‘वादळ’ या नावाने बरेचदा खूप मोठं नुकसान करणारं ठरतं, नकोसंच वाटतं. थोडक्यात ‘भीक नको पण कुत्रा आवर’ – अशी अवस्था होते. फक्त मानवाचीच नाही, तर सगळ्याच सजीवांची, सुंदर निसर्गाची जोपासना, निगराणी आणि संवर्धन जिव्हाळ्याने करणारे हे तत्व, बघताबघता संहारक होते आणि जणू निसर्गाला आणि त्याचसोबत इतर सजीवांनाही उन्मळून- उखडून टाकते.—–आणि याउलट जिथे ते स्वतःचा मागमूसही ठेवत नाही तिथे तर सजीवांचे अस्तित्वच संपते— सगळीकडून गच्च बंद असणाऱ्या खोलीत एखाद्या रोपाची कुंडी ठेवली तर दोन दिवसात ते रोप मरून जातं. बघा ना … म्हणजे खोलीत हवा असते पण हे “वायुतत्व” नसतं. याच्या विरुद्ध उदाहरण असं की वाफेच्या रूपातला वायू कोंडून ठेवून त्याचा दाब निर्माण करून त्यावर अनेक डबे जोडलेल्या आगगाड्या चालवून माणसाने कौतुकास्पद कामगिरी केली खरी. पण वायूचा असाच दाब जेव्हा प्रचंड वाढून अनावर होतो तेव्हा त्याचा स्फोट होतो — हाच वायू विध्वंसक होतो, आणि माणूस हतबल होतो——- अर्थात, या पंचमहाभूतांपैकी कोणावरच कुठल्याही सजीवाचे नियंत्रण नसते. ‘वायूतत्व’ हे त्यातलेच एक ‘महाभूत’… गंमतीचा भाग सोडून देऊ. पण अशावेळी या मूळ तत्वांचे सामर्थ्य, आणि मानवाची अगतिकता प्रकर्षाने जाणवते, हे खरे.
वाऱ्याचा आणखी एक विशेष गुणधर्म म्हणजे, त्याला ‘सुगंध आणि दुर्गंध’ यातला फरकच कळत नाही. याबाबतीत ‘सर्वधर्मसमभाव’ या गुणवैशिष्ट्यानुसार तो आचरण करतो, अशी समजूत करून घेतलेली बरी असते. ‘वाऱ्यावरती गंध पसरला… नाते मनाचे’… असं सुगंधाच्या बाबतीत म्हणता येतं – दुर्गंधाच्या बाबतीत नाही. पण तरीही दुर्गंधाचे खापर माणूस सहसा वाऱ्यावर फोडत नाही, हे त्याचे भाग्यच म्हणायला हवे. कारण या रूपातले वायूतत्व फक्त वहाण्याचे काम करते… सुगंध आणि दुर्गंध – निर्मितीचे काम वारा कधीच करत नाही; म्हणून त्या दोन्हीतला फरकही त्याला कळत नाही.
वैयक्तिक पातळीवर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे हे वायूतत्व, मानवजातीच्या भौतिक प्रगतीसाठीही खूप मोलाचे ठरले आहे. हवेच्या, पर्यायाने वाऱ्याच्या सक्रीयतेच्या प्रक्रियेचा अभ्यास करून मानवही पक्ष्यांसारखा हवेत उडू लागला आहे… पॅरा-ग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे प्रयोग यशस्वीपणे करू लागला आहे. विमाने, रॉकेटस्, अवकाशाला गवसणी घालणारी वेगवेगळी याने, ही सगळी याचीच तर उदाहरणे आहेत. पण ‘वायूतत्व’ जाणून घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.
… तर असे हे सजीव-सृष्टीचा जीव जोपासणारे अतिशय महत्त्वपूर्ण वायुतत्व…जे सजीवाला जगण्यासाठी थेटपणे आवश्यक असते. एक दिवस जरी या तत्वाने असहकार पुकारला, तर साऱ्या सृष्टीत केवढा हाहा:कार माजेल, संपूर्ण जगावर किती दुर्दशा ओढवेल…खरे तर सगळे सजीव जगच कसे मरणाच्या खाईत कोसळेल, याची कल्पना करणेही भीतीदायक आहे. म्हणूनच आपण या वायुतत्वाचे कायमच अगदी मन:पूर्वक ऋणी असायलाच हवे.
– – – या संदर्भात माणसाने आवर्जून लक्षात घ्यायलाच हवी अशी एक गोष्ट आहे — ती म्हणजे ऋण फेडण्याची —- एखाद्या बीजात या तत्वाने प्राण फुंकले, की पहाता पहाता त्या बीजाचा सुंदर वृक्ष होतो, जो न मागताही माणसाला सुखद गार सावली देतो–न मागताच आपली फुले त्याच्या ओंजळीत टाकतो –फळांनी फक्त त्याची भूकच नाही, तर ताकदही वाढवतो. आणि या सगळ्यापेक्षाही महत्वाचे आहे ते हे सत्य की, वायुतत्वाने त्याच्या बीजात फुंकलेल्या जराशा प्राणवायूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तो वृक्ष अगदी निरपेक्ष भावनेने त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने प्राणवायूचे उत्सर्जन करतो–वायुतत्वाचा समतोल राखण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतो…आणि आपण माणसे? अतिशय स्वार्थी, क्षूद्र हेतूने प्राणवायूचा तो स्रोतच बेफामपणे वृक्षतोड करून बंद करून टाकतो. चोंच कितीही वासता येत असली तरी पोटापुरतेच घ्यावे हा पोंच इवल्याश्या पाखरांनाही असतो. पण स्वतःला सर्व प्राणिमात्रांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान समजणाऱ्या माणसाला तो नसावा, ही बाब फक्त काळजी किंवा खंत वाटावी आणि सोडून द्यावी अशी नाही. तर असे वागणाऱ्याचा संतापच यायला हवा–आणि त्याला रोखायलाच हवे. आणि फक्त वायुतत्वच नाही, तर पाचही मूलतत्वांचा गैरफायदा कुणीही कधीही घ्यायचा नाही असा कडक निर्बंध प्रत्येकाने स्वतःच स्वतःला घालून घ्यायलाच हवा.
म्हणूनच सर्वात महत्वाचे हे की, जागतिक पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून या पंचमहाभूतांचे मूळ स्वरूप आणि प्रमाण, तसेच त्यांचे संतुलन अबाधित राखण्याचा जाणीवपूर्णक प्रयत्न करणे आणि त्यायोगे निसर्गाचे संतुलन राखणे, हे माणसाच्या सुखी आणि आनंदी जगण्यासाठी अत्यंत गरजेचे असणारे मूलभूत कर्तव्य आहे, आणि ते पार पाडण्यासाठी प्रत्येकानेच सदैव स्वतः डोळस प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे — अगदी श्वास घेण्याइतकेच अत्यावश्यक…
“अहं कालोस्मि”, ”मी काळ आहे” असे भगवंताने स्वतःच गीतेत म्हटले आहे.
काळ ‘जातो’ हा भ्रम आहे.
काळ जात नाही तर आपणच काळातून जात असतो.
जन्म-बाल्य-तारुण्य-वार्धक्य-मृत्यु हा आपला जीवनप्रवास आहे, काळाचा नाही. काळ आहे तसाच आणि आहे तिथेच आहे, स्थिर, अचल, अपरिवर्तनीय, अपार, अनंत, अवध्य!
ईश्वराखेरीज सर्व वस्तुमात्र आणि जीवमात्र मर्त्य, विनाशी, विघटनशील, विरी जाणारे, वध्य, मिथ्या आहेत.
“यदृष्टं तं नष्टम्” हे श्रुतिवचन आहे. जे दिसते ते नष्ट होते. जे जन्मते, ते मरते आणि जे मरते ते जन्मतेही!
जन्म आणि मृत्यु या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सर्व दृष्य वस्तूत सतत, प्रत्येक क्षणी, परिवर्तन होत असते.
काळ अदृष्य आहे म्हणून अपरिवर्तनीय आहे.
दोन नजिकच्या परिवर्तनातील अंतर म्हणजे ‘क्षण’.
गेलेला क्षण हा ‘भूतकाळ’, येणारा क्षण हा ‘भविष्यकाळ’ आणि आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो तो ‘वर्तमानकाळ’ होय.
गेलेला क्षण हातातून पाऱ्यासारखा निसटलाय् परत कधीही वाट्याला न येण्यासाठी! येणारा क्षण कसा असेल, किंबहुना तो अनुभवता येईल याची शाश्वती नाही. म्हणूनच या भूत आणि भविष्यातील क्षणांचा आपल्याला काहीही उपयोग नाही.
मग ज्याचा उपयोग नाही त्याचा का विचार करायचा? त्याचा विचार करणे हा निव्वळ कालापव्यय!
हातातला आत्ताचा, वर्तमानातला क्षण मात्र संपूर्ण आपला आहे. कसाही उपयोगात आणा, कसाही उपभोगा, त्याचे स्वामी तुम्हीच, केवळ तुम्ही.
म्हणून वर्तमानातील हा क्षण म्हणजे “क्षण सत्याचा”. वर्तमान हेच सत्य!
जो हा ‘सत्याचा क्षण’ सत्कारणी लावतो त्याचे जीवन कृतार्थ होते, गंगौघासारखे पवित्र होते.
ज्याने तो वर्तमान गमावला त्याने आत्मघात केला असे निश्चित समजावे.
त्याचे जीवन फुटलेल्या सांडपाण्याच्या नळासारखे. त्यातले दूषित पाणी झिरपून, पाझरून सर्व आयुष्य शेवाळवते, नासवते!
जे वर्तमानात रमून अन् जगून प्रत्येक “सत्याचा क्षण” सत्कारणी लावतात तेच जीवनमुक्त. केवळ त्यांनाच तो सच्चिदानंद प्राप्त होतो!
☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- २ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
(काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.)
(१)
भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती
पंचप्राण जीव भावे ओवाळू आरती*
*
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा
दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा
*
काय महिमा वर्णू आता सांगणे किती
कोटी ब्रम्ह हत्या मुख पाहता जाती
*
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही
मयूर पुच्छे चामरे ढाळती ठाईच्या ठाई
*
सत्व रजतमात्मक काकडा केला
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला
*
तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनीत शोभा
विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥
(२)
सहस्र दीपै दीप जैसी प्रकाशली प्रभा
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा
*
काकड आरती माझ्या कृष्णसभागीया
चराचर मोहरले तुझी मूर्ति पहाया
*
कोंदलेसे तेजे प्रभा आलीसे एक
नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख
*
आरती करता तेज प्रकाशले नयनी
तेणे नेत्रे मिळाला एका एकी जनार्दनी ॥
*
अशा अनेक आरत्या होऊन शेवटी तुळशीची आरती होते.
*
जय देवी जय देवी जय माये तुळशी
निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी
*
ही आरती सर्वांना ठाऊक आहे. पण माझ्या लहानपणी आम्ही विठ्ठल मंदिरात काकड आरतीला जात होतो, तेव्हा तुळशीची एक वेगळी आरती म्हटली जायची. ती छोटीशी आरती या ठिकाणी देते आहे.
*
श्री तुळशी जय तुळशी मानव बोलता वदनी
ऐकून यमदुत बहु दूर पळती दिशा उल्लंघुनी
*
कोमल तुळशी वनी पाहुनिया हरीशी आनंद
अखंड राहे तेथे राधा रमणा गोविंद
*
या तुळशीची सेवा करता पुण्याच्या राशी
अपार संकट भोगुनी प्राण्या जाय मुक्तिशी
*
ओवाळू आरती तुळशी हरी पंकजनयना
कृष्ण तनया म्हणे सरली भ्रांतीची भ्रमणा ॥
*
यानंतर नियमितपणे सद्गुरुची आरती, कापूर आरती होत असे. याच ओघात सर्वांसाठी एक मागणं मागितलं जायचं.
*
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा /माझीया सकळा हरीच्या दासा
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी /ही संत मंडळी सुखी असो
अहंकाराचा वारा न लागो राजसा/ माझ्या विष्णू दासा भाविकाशी
नामा म्हणे जया असावे कल्याण /द्या मुक्ती निधान पांडुरंग ॥
*
नंतर सगळ्यांना आरती दिली जायची. सर्वांचा सुका प्रसाद, फळं, तीर्थ एकत्र करून सर्वांना तीर्थप्रसाद दिला जायचा आणि हळुवार पूर्वेला सूर्यबिंब प्रकट व्हायचं. आजही ही प्रथा खेड्यापाड्यांमधून आणि मंदिरांमधून सुरू आहे. मात्र तथाकथित आधुनिकतेचा वारा लागलेले लोक यापासून दूर आहेत. काही लोकांनी तिथेही ह्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. त्याला यश देणं हे आपल्याच सर्वांच्या हातात आहे !
विस्तारभयास्तव आज इथेच थांबते. अजून अनेक काकडआरत्या आणि भुपाळ्या आहेत. त्या आपल्यालाही ठाऊक आहेत.तुळशी विवाह होतो. नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीची समाप्ती ही सहसा गोपालकाल्याने केली जाते. यावेळी कुठे कुठे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह ही आयोजित केला जातो. येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या आणि आश्विन /कार्तिक महिन्यातल्या काकड आरतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद !
☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- १ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
भूपाळी आणि ढोल दमामे गर्जती होते काकड आरती
नमस्कार. बघता बघता देवीचे नवरात्र संपले आहे. विजयादशमी झाली. उद्या कोजागिरी पौर्णिमा! या दिवशी गेले महिनाभर बसणारी भुलाबाई. या उत्सवाची सुद्धा सांगता होईल. परंतु हिंदू समाजाच्या चालीरीती अशा आहेत की, वर्षभर काही ना काही सण, उत्सव, परंपरा, कुलाचार हे सुरूच राहतात. महत्वाचं म्हणजे त्या प्रत्येक उत्सवात काव्य हे असतंच. त्याचप्रमाणे कोजागिरीपासून तर कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आकाश दिवा किंवा पाताळ दिवा लावण्याची सुद्धा आपल्याकडे परंपरा आहे. कारण याच मधल्या काळात दिवाळीचा सणही येत असतो.
या काळात स्त्रिया पहाटे उठून तुळशी समोर रांगोळीच्या द्वारे कार्तिक मास काढतात. यात राधाकृष्ण, तुळशीवृंदावन, चंद्र – सूर्य – शंख – चक्र – आवळीचं झाड – ३३ गोपद्म अशा अनेक आकृती असतात. लग्न होऊन सासरी आलेल्या छोट्या मुलींना या संस्कारांव्दारे चित्रकलेचं, वनस्पतीशास्त्राचं, अवकाशाचं शिक्षण परंपरेतून दिलं जायचं असं इथे म्हणता येतं.
याच काळातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे काकड आरती आणि त्यासाठी म्हटली जाणारी भूपाळी. अनेक मंदिरांमध्ये वर्षभर रोज भुपाळ्या म्हटल्या जातात आणि त्यानंतर आरती केली जाते. परंतु सर्वसामान्यपणे अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्तिक मास साजरा केला जातो. यात पहाटे उठून भूपाळीचा उत्सव साजरा होतो. अनेक भूपाळ्या म्हटल्या जातात. भूपाळी म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी गायला जाणाऱ्या पारंपरिक गीतांचा एक प्रकार आहे. मुळात ही सुद्धा एक कविता आहे. ही गीते शक्यतो भूप रागात बांधलेली असतात. जो सृष्टी निर्माण कर्ता, त्याची स्तुती करण्याच्या उद्देशाने म्हटल्या जातात. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. रात्रीचा अंतिम प्रहर किंवा दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याच्या, भूप रागातील पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून त्याला जागे केले जाते, तीच ही भूपाळी. होनाची बाळा यांची घनश्याम सुंदरा ही भूपाळी सर्व परिचित आहेच.
हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणजे यातील देवदेवतांना रोजच भूपाळी द्वारे जागविले जाते.
या भूपाळ्या अनेक संतांनी रचलेल्या आहेत.
त्यातली प्रथम श्री गणपतीची भूपाळी पाहूया!
*
उठा उठा सकळीक /वाचे स्मरावा गजमुख
रिद्धी सिद्धीचा नायक / सुखदायक भक्तासी
*
अंगी शेंदुराची उटी /माथा शोभतसे किरीटी
केशर कस्तुरी लल्लाटी / हार कंठी साजिरा
*
कासे पितांबराची धटी /हाती मोदकाची वाटी
रामानंद स्मरता कंठी / तो संकटी पावतो
*
भूपाळी ही सहसा चार चरणांची असते. याच्या प्रथम तिन्ही चरणात यमक साधलं जातं. शेवटची चौथी ओळ वेगळी असते. यात अक्षरे किंवा मात्रांचे बंधन नसते. मात्र मिळती जुळती अक्षरेच इथे घेतली जातात. शेवटच्या कडव्यात रचयिता जो कुणी असेल त्याचे नाव असते.
आज आपण काही भुपाळ्या बघणार आहोत. सृष्टी निर्माता, पालनकर्ता, आणि श्री शंकर या सर्वांसोबतच, आपली जी श्रध्दास्थाने आहेत, त्यांच्याही भुपाळ्या म्हटल्या जातात. त्यात तुळशी, गंगा, गाय, हेही विषय असतात. शिवाय संतांसाठीही अनेक भुपाळ्या रचलेल्या आढळतात.
श्रीरामाची भूपाळी
*
उठोनिया प्रातःकाळी / जपा रामनामावली
स्वये ध्यातो चंद्रमौळी / शैलबाळीसमवेत
*
राम योग्यांचे मंडणा राम भक्तांचे भूषण
राम धर्माचे रक्षण / संरक्षण दासांचे
*
रामे त्राटिका मारिली /रामे जानकी पर्णिली
रामे शिळा उद्धरिली /गणिका केली ती मुक्त
*
रामे पाषाण तारिले / रामे दैत्य संहारीले
रामे बंदी सोडविले / मुक्त केले सुरवर
*
रामे रक्षिले भक्ताची /रामे सोडविले देवासी
रामदासाचे मानसी / रामदासी आनंद ॥
या शिवाय
राम सर्वांगी सावळा / देह अलंकार पिवळा
नाना रत्नांचिया कळा / अलंकार शोभती ॥
ही सुद्धा श्रीरामांची भूपाळी प्रसिद्ध आहे.
*
एक गंगेची भूपाळी आपण बघूया!
उठोनिय प्रातःकाळी / वदनी-वदा चंद्रमौळी
श्री बिंदू माधवा जवळी / स्नान करा गंगेचे /स्नान करा गोदेचे ॥
*
स्नानदान जया अंतरी / घडेल भागीरथीच्या तिरी
कृपा करील त्यावरी / ऐसे महात्म्य गंगेचे
*
भागीरथीचे स्नान करा /हृदयी स्मरा गंगाधरा
चुकेल चौऱ्यांशी चा फेरा / ऐसे महात्म्य गंगेचे ॥
*
गंगा आहे स्वर्गावरती / पाताळी ते भोगावती
मृत्यूलोकी हे विख्याती ‘ ऐसे महात्म्य गंगेचे ॥
*
कृष्णा वेणा तुंगभद्रा / शरयू कालिंदी नर्मदा
भीमा भामा मुख्य गोदा /स्नान करा गंगेचे ॥
*
याशिवाय श्रीधराची / दशावताराची / पंढरीची / शंकराची अशा अनेक भूपाळ्या आहेत.
भूपाळ्या संपल्या की, ढोल दमामे गर्जती / होते काकडआरती
कार्तिक महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यातच पहाटेच्या वेळी अनेक मंदिरातून होणाऱ्या काकड आरतीच्या निनादाने सर्व आसमंत निनादून जातो मृदुंगाच्या आवाजाने व भक्तगणांच्या आरत्या आळवणीच्या स्वरांनी वातावरण भक्तीमय होऊन जाते. यासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते. प्रजेला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाक्रूर तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराच्या पोटी कार्तिक स्वामींनी जन्म घेतला. या कार्यासाठीच त्यांचा जन्म झाला आणि तोही कार्तिक महिन्यात त्यांच्या नावावरूनच या महिन्याला कार्तिक हे नाव पडले आहे. या महापराक्रमी पुत्राचे स्मरण म्हणून काकड आरती केली जाते, असेही काही ठिकाणी म्हणतात.
काकड आरती ही हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी देवाला जागृत करण्यासाठी केली जाणारी एक धार्मिक प्रथा आहे. काकडा उजळून ही आरती केली जाते. अनेक मंदिरांमध्ये विशेषता कार्तिक महिन्यात ही आरती होते आणि ती नित्यनेमाने होते जागे करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे ही दिवसाची पहिली आरती मानली जाते. वारकरी संप्रदायात काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. काकड आरती वैयक्तिक तसेच सामुदायिक परंपरा आहे. दररोज किंवा विशिष्ट काळात म्हणजे कार्तिक महिन्यात ही पाळली जाते. कार्तिक महिन्यात कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे काकड आरती करण्याची प्रथा आहे. या आरतीपूर्वी विविध भजने /स्तोत्रे आणि भुपाळ्या म्हटल्या जातात. संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ इत्यादी संतांनी काकड आरती रचलेल्या आहेत.
काकड आरतीला जाण्यापूर्वी भक्तगण स्नान संध्या करतात. सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते. मनात भक्तीरसाची निर्मिती होते. पापक्षालन होते. नंतर घरातील तुळशी वृंदावनाजवळ येऊन तुळशीची पूजा केली जाते.
उठा उठा साधुसंत /साधा अपुलाले हित
वाया जाईल हा नरदेह /मग कैसा भगवंत
उठोनिया वेगेसी चला जाऊ राऊळाशी /
तुळशी घालूनिया ओटा / विघ्ने पळतील बारा वाटा
तुळशी लावूनिया दिवा /उजेड पडेल सर्व देवा
तुळशी सारूनिया पाणी / होईल पातकांची धुनी
तुळशी लावूनिया गंध /उभा पाठीशी गोविंद
तुळशी लावूनिया कुंकू /उभी पाठीमागे सखू “
या पदानंतर भक्तगण टाळ मृदंगाच्या निनादात कृष्णाचा गजर करतात. हा गजर संपला की गावातून प्रभात फेरी काढली जाते. या योगे असं म्हणतात की वातावरणात भक्तीरस भरून राहतो.
काही ठिकाणी गावातून प्रभात फेरी काढून एक प्रकारची जनजागृती होते. तर काही ठिकाणी भक्तजन मंदिरात एकत्र होतात. सुरुवातीला भजने, भुपाळ्या म्हणतात. एक विठ्ठलाची भूपाळी –
उठोनिया पहाटे / विठ्ठल पहा उभा विटे
चरण तयाचे गोमटे /अमृत दृष्टी अवलोका ॥
जागे करा रुक्मिणीवरा / देव आहे निदसुरा
वेगे लिंबलोण करा / दृष्ट होईल तयासी ॥
पुढे वाजंत्री वाजती /ढोल दमामे गर्जती
होते काकड आरती / पांडुरंगा चरणी ॥
सिंह नाद शंखभेरी / गजर होत महाद्वारी
केशवराज विटेवरी / नामा चरण वंदितो ॥
आशा प्रकारे अनेक भूपाळया झाल्या नंतर आरतीला सुरुवात होते. जे मंदिर असेल त्याप्रमाणे अनेक आरत्या तिथे म्हटल्या जातात आणि नंतर काकड आरती केली जाते. आता हा काकडा कसा असतो तर शक्यतो पांढऱ्या, स्वच्छ नवीन वस्त्र घेऊन त्याच्या पट्ट्या काढून पीळ दिला जातो आणि नंतर एक ठराविक लांबीचा / कुठे बोटभर, कुठे वीतभर अशा काकडा तयार केला जातो. तो शुद्ध तुपात भिजवला जातो. प्रत्येकाच्या हातात निरंजन असेल असंच नाही. तर सगळे भक्त हा काकडा घेऊन उभे होतात. काकडा उजळतात आणि आरती सुरू होते हातात काकडा सुद्धा एका ठराविक पद्धतीने धरावा लागतो की, ज्यामुळे हातावर तूप सांडणार नाही. चटका लागणार नाही. काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.
(पूर्वसूत्र- त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतरही माझ्या मनात तक्रारदार सहस्त्रबुध्दे ठाण मांडून बसले होते. तोपर्यंत कधीच न पाहिलेल्या त्या माणसाने त्याच्याही नकळत माझ्या मनात एक प्रकारची बेचैनी निर्माण करून ठेवली होती. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी स्वस्थता नव्हतीच.)
त्या अस्वस्थतेत मनात रूतून बसलेला एकच विचार मला बोचत राहिला होता. उद्या नेमकं काय होईल? ते माझ्याशी मोकळेपणाने बोलतील कीं प्रभूदेसाईंसारखंच मलाही घरात न घेता बाहेरच्या बाहेर हाकलून लावतील?
हीच अस्वस्थता मनात घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या फ्लॅटची डोअरबेल वाजवली. एकदा. दोनदा. कांही क्षण बोचऱ्या शांततेत गेले आणि यथावकाश दार उघडलं गेलं.
“काय हवंय..? “
अर्धवट उघडलेल्या दारात एक मुलगी उभी होती. उदास चेहरा. गोंधळलेली प्रश्नार्थक नजर.
“सहस्त्रबुद्धे आजोबा आहेत ना? मला भेटायचं होतं. “
“आपण..? “
“मी.. लिमये. अरविंद लिमये. एक महत्त्वाचं काम होतं. “
” बाबा आहेत,.. पण नुकतीच पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत.
आजचा अध्याय मोठा आहे,.. थोडा वेळ लागेल. आणि नंतर त्यांना लगेच बाहेर जायचंय. “
मला काय बोलावं सुचेना.
” मी फार वेळ घेणार नाहीय. निदान त्यांची ओळख तरी होईल. ते म्हणाले तर मग मी उद्या येईन. त्यांचं आवरेपर्यंत थांबू कां मी? “
ती क्षणभर विचारात पडली. मग “या. ” म्हणून आत वळली. भिंतीजवळच्या खुर्च्यांकडे निर्देश करीत ‘बसा’ म्हणाली. आत जाऊन लगबगीनं पाण्याचं तांब्याभांडं आणून ठेवलंन् न् आत निघून गेली.
सहस्त्रबुद्धे पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत हे त्यांच्या मुलीकडून ऐकल्यानंतर काल मनात येऊन गेलेलेच विचार मला आठवले…
‘उद्या काय होणार आहे मला माहित नाही. त्यांना स्वतः जाऊन भेटणं एवढंच माझ्या हातात आहे. यश येणार की अपयश हे आता सहस्त्रबुद्धेंच्या नव्हे तर फक्त ‘त्या’च्याच हातात आहे…. ‘ माझ्या अस्वस्थ मनाला तेव्हा स्पर्शून गेलेल्या ‘त्या’च्या विचाराचा धागा माझ्या मनात नकळत सहस्त्रबुद्धे आजोबांच्या ‘गुरूचरित्र’ वाचनाशी जोडला गेला आणि मनावरचं जड झालेलं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तसं मला एकदम हलकं वाटलं. समोरच्या तांब्यातलं घोटभर पाणी पिता पिताच नजर नकळत सभोवतालचा अंदाज घेत राहिली. रंग उडालेल्या
भिंतीवरचं जुनंपुराणं घड्याळ, एक लोखंडी कॉट, जुनं लोखंडी कपाट आणि भिंतीलगतच्या फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या..! नजरेनं क्षणार्धात टिपलेल्या या साधेपणात एक प्रकारचं औदासिन्यही भरून राहिलेलं होतं!
“हं.. बोला… ”
मी भानावर आलो. दचकून वर पाहिलं आणि एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा उठून उभा राहिलो.
“सर, नमस्कार.. “
“नमस्कार,.. बसा” ते हसतमुखाने म्हणाले. सहस्त्रबुद्धे आजोबाच ना हे किं…? मलाच प्रश्न पडला. या माणसाचं हसतमुख, सौम्य रूप प्रभुदेसाईनी वर्णन केलेल्या संतापी, तर्कटी, हेकेखोर अशा विक्षिप्त वृध्द माणसाच्या प्रतिमेला परस्पर छेद देणारंच होतं.
” एस्. एस्. सहस्त्रबुद्धे आपणच ना..? ” स्वतःचीच खात्री करून घ्यावी तशा सहजस्वरांत मी विचारलं.
“हो.. आपण? “
” मी… मी ए. जी. लिमये. चीफ मॅनेजर म्हणून युनियन बॅंकेच्या इथल्या झोनल आॅफिसमधे मी नुकताच चार्ज घेतलाय आणि… “
बॅंकेचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य क्षणार्धात विरून गेलं. चेहरा आक्रसला.
” काम काय आहे ते बोला… ” त्यांनी फर्मावलं.
” तुम्ही एका ब्रॅंचमॅनेजर विरूध्द केलेल्या तक्रारीबाबतची फाईल माझ्या वाचनात आली आणि म्हणून… “
” म्हणून वाट वाकडी करून आज इथं आलात? ” ते कडाडले. ” दूधखुळा समजलात कां मला..? आजपर्यंत दर आठवड्याला एकेक पोस्टकार्ड खरडून दरवर्षी ५२ या हिशोबाने गेल्या ३ वर्षात १५६ स्मरणपत्रं पाठवल्यानंतर आज जागी झाली कां तुमची बॅंक..? “
“नाही तसं नाही.. पण.. “
“पण-परंतुच्या गप्पा मला सांगू नका. तुमच्या बँकेचं नाव सहज जरी कानावर पडलं तरी तुमच्या त्या निर्लज्ज ब्रॅंचमॅनेजरचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते. या तुम्ही. ती फाईल व्यवस्थित वाचलीयत ना तुम्ही? मग त्या बेजबाबदार माणसाविरूध्द आधी कारवाई करा. यामधे ब्रह्मदेव उतरून आला तरी तडजोड होणे शक्य नाहीss. या तुम्ही. ” ते ताडकन् उठले…
सगळं हातून निसटून जाण्यापूर्वी ते घट्ट धरून ठेवणं आवश्यक होतं पण….
” सर.. मला जे सांगायचंय ते निदान ऐकून तरी घ्या ना प्लीज… “
” मला फाफटपसारा नकोsय. बोलाs.. काय सांगायचंय..?
“तुम्ही म्हणालात तशी ती फाईल वाचलीय मी. तुम्ही लिहिलेली स्मरणपत्रंही पाहिलीत. त्यासंबंधीच तुमच्याशी मोकळेपणानं बोलायचं होतं सर. म्हणून… “
” मी बोललोय सर त्यांच्याशी ” मी शांतपणे म्हणालो. “पण कोणत्याही प्रश्नाला दोन बाजू असतात ना सर? तुमची बाजू न ऐकताच, ती समजून न घेताच, कोणत्याही निष्कर्षाप्रत येणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी आलोय. यात माझा कोणताही स्वार्थ नाहीय. माझ्यावरची जबाबदारी स्वत:शी प्रामाणिक राहून मला पूर्ण करायचीय. हे करताना तुमच्यावर नकळत अन्याय होऊ नये असं मला मनापासून वाटतंय. म्हणून फक्त तुमची बाजू जाणून घ्यायला मी आलोय. मला सहकार्य करायचं कीं नाही हे तुम्ही ठरवायचंय.
तेही एक उपचार म्हणून आजच्याआज ठरवावं असा माझा आग्रह नाहीय. तुम्ही शांतपणे विचार करा, मग सांगा.
तुमचा गुरूचरित्र सप्ताह सुरू आहे ना? त्याची आधी सांगता होऊ दे. त्यात व्यत्यय नको. हवंतर त्यानंतरच्या तुम्ही सांगाल त्या दिवशी मी पुन्हा येईन. “
ते विचारात पडल्याचे पाहून मी घुटमळलो.
“सप्ताह असं नाही. माझं रोज एक अध्याय असं नित्यवाचनच असतं. आज मला बाहेर जायचंय एका कामासाठी. तुम्हाला शक्य असेल तर असंच उद्या सकाळी आलात तरी चालेल… ” ते शांतपणे म्हणाले.
” पण त्या माणसावर कारवाई होण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाहीs.. हे लक्षात ठेवा. “
“मी समजू शकतो सर. येतो मी. “
त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. यातून पुढे काय निष्पन्न होणाराय मला माहित नव्हतं. पण आज माझ्यासाठी निदान सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडीतरी किलकिली झाली होती आणि त्या दाराआड ‘तो’ साक्षीरूपाने उभा असणार आहे हा एक शुभसंकेतच होता माझ्यासाठी. म्हणूनच तिथून बाहेर पडताना फार कांही न मिळताही बरंच काही गवसल्याचं समाधान मनात भरून राहिलं होतं..!!
माणूूस चिडतो का? …… तर हो….. असच उत्तर येइल. कारण काय? ….. तर प्रत्येकवेळी कारण वेगळं असू शकेल. खरंतर चिडायला कोणतही कारण लागत नाही असं म्हणण्यापेक्षा कोणतही कारण चालतं. त्याला काही नियम अटी नाहीत. जागं असतानाची कोणतीही वेळ चालते. तारीख, वार, महिना, साल कोणताही चालतो. मुहूर्त बघावा लागत नाही.
उलट कोणी चिडलंतर……. हं…. झालं…. सापडला वाटतं मुहूर्त…… असं दबक्या आवाजातलं स्पष्ट बोलणं ऐकू येतं.
चिडणं ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे. असं चिडणं कधी आणि कितीवेळ टिकतं हे सांगतायेत नाही. मीसुुध्दा चिडतो. मात्र काहीजण खूप कमीवेळा चिडतांना मी पाहिलं आहे. आणि त्यांचा चिडायचा काळ सुध्दा कमी असतो. अशा न चिडणार्या किंवा कमी आणि कमीवेळ चिडणा-यांच मला कौतुक वाटतं. पण चिडायला पाहिजे तिथेही न चिडणा-यांची मला चिड येते.
मी का चिडतो….. याची कारणं बघायला सुरुवात केली….. आणि लक्षात आलं की अरे……. यातली काही कारणं तर किरकोळ आणि शुल्लक आहेत. आणि या कारणांसाठी मी नक्की चिडतो कोणावर….. स्वतःवर की दुसर्यावर…..
मी का चिडतो…….
माझं ऐकल नाहीतर.
मला कारण नसतांना कोणाचं ऐकाव लागल तर.
मला एखादी गोष्ट जमली नाही तर.
मला ते वेळेत जमलं नाही तर.
माझ्या अगोदर दुसर्याला जमल तर.
दिलेली वेळ पाळली नाही तर. इ…….
यातही माझं ऐकलं नाही तर….. यात मी सांगतोय ते बरोबर का चूक याचा विचार काहीवेळा नसतो.
या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत. पण इथे मी जमेल त्या मार्गाने ती चिड व्यक्त करतो.
चिडण्याचे प्रकार असु शकतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अशा प्रकारे ते सांगता येतील. चिडण्याला नातं असण्याची किंवा नसण्याची गरज नाही. उलट नातं नसेल तर चिडण्यात मोकळेपणा येतो.
वैयक्तिक चिडण्यात झालेल्या गोष्टीत चुक आपलीच आहे हे आपण कळत नकळत मान्य केलेलं असत. त्याच खापर फोडायला आपल्याला कोणीच सापडत नाही. कदाचित दोष द्यायलापण कोणी सापडत नाही म्हणून आपण गप्प बसतो.
कौटुंबिक चिडण्यात कुटूंबातच आपण कोणावरतरी किंवा कुणीतरी आपल्यावर चिडल्याच लक्षात येतं. आणि हे व्यक्त केलं जातं. हे व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. यात मोठ्याने बोलणं, आदळआपट करणं, किंवा काहिच न बोलता तोंड फुगवून गप्प बसणं. नाहीतर सहकार्य नाकारणं, किंवा ते न करणं. थोडक्यात कौटुंबिक चिडणं हे जहाल, मवाळ, असहकार, किंवा सविनय कायदेभंग या प्रकारच्या वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त करता येतं.
या शिवाय संसर्गजन्य चिडणं असत. यात जो संपर्कात येईल त्याला याची लागण होते. म्हणजे एकावर कोणी चिडलतर दुसर्यावर चिडून त्या चिडण्याची परतफेड करायची. आणि त्याची परतफेड दुसरा तिसऱ्याच माणसावर करतो. फक्त ते व्यक्त झालं पाहिजे. या प्रकाराला वडाच तेल वांग्यावर असही म्हणतात.
सामाजिक चिडण्याला काही ठराविक व सततची कारणं असू शकतील. शिस्तबद्ध असणारी बेशिस्त वाहतूक, खडतर रस्ते, भ्रष्टाचार, गुंडगीरी, शैक्षणिक क्षेत्रात घातलेला गोंधळ, क्षमता नसतांना दिलेली जबाबदारी. या विरोधात होणारी चिडचिड काहीवेळा व्यापक, संघटित असते. तर काहीवेळा तो शक्ती प्रदर्शनाचा भाग वाटतो. लग्नाच्या वरातीत कसं काही वरातीत सामील झालेले असतात. काही गंमत म्हणून पाहायला येतात. तर काही समोर दिसतयं म्हणून पाहतात. पण गर्दी असते. असं हे गर्दी खेचणार चिडणं आहे.
अशा गर्दीत समर्थक आणि विरोधक असू शकतात. आणि मग विरोधक विरोधात आहे हे दाखवण्यासाठी चिडतात.
मोर्चा काढणं, फलक रंगवण, घोषणा देणं अशा वेगवेगळ्या मार्गाने ते दाखवलं जातं.
काहीवळा चीडणं निरर्थक असतं, काहीवेळा त्याला अर्थ असतो. तर काहीवेळा अर्थ हेच कारण असतं.
चिडणा-या व्यक्तीला मुद्दाम चिडवणारे किंवा चिडायला लावणारेही असतात. पण मित्रांमधे, नात्यात असं चिडणं आणि चिडवणं बर्याचदा खेळीमेळीत घेतलं जातं. आणि हे कुठे थांबवायचं हे लक्षात येतं. ते तसं खेळीमेळीने घेतलं तर त्या चिडवण्यात आणि चिडण्यात एक मजा जाणवते.
सकाळी सकाळी रेडिओ वर गाणं चालू होतं आणि स्वयंपाकघरात काम करताना नकळत मी ही गायिकेबरोबर ते गुणगुणत होते… काम करताना एकीकडे रेडिओ ऐकायची सवयच आहे मला आणि मग सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर मी गुणगुणत असते त्या दिवशीही तेच झालं… सकाळी रेडिओ मधून माझ्या घरी आलेली दिवाळी मग दिवसभर माझ्या ओठांवर रेंगाळत राहिली आणि मला माझ्या बालपणात घेऊन गेली… दिवाळी हा प्रकाशाचा, मांगल्याचा आणि उत्साह द्विगुणित करणारा सण… दर वर्षी येणारी दिवाळी प्रत्येकासाठी काही वैशिष्ट्य घेऊन येते. वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली दिवाळी प्रत्येक माणसाच्या चिरकाल स्मरणात राहते असं असलं तरी कायम आठवत राहते ती बालपणीची दिवाळी.. ही बालपणीची दिवाळी मनाच्या कोपऱ्यातून हळूच बाहेर येते व एकेक आठवण मनाला आनंद देऊन जाते… नवरात्रोत्सव संपत आला की मला दोन गोष्टींचे वेध लागायचे एक गोष्ट ती म्हणजे परीक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा दिवाळी अंकात काय नवीन वाचायला मिळणार याची उत्सुकता तर असायची…
दिवाळीच्या दिवसांत मी एका वेगळ्याच झोन मध्ये असते. वर्षातला हा माझा सगळ्यात आवडता सण. रंग, प्रकाश यांची झिलईदार सरमिसळ असलेला.. कुठलेही अवडंबर नाही, नको त्या भावना, अस्मितांना चुचकारणं नाही, पूजा असेलच तर ती वातावरणातल्या सौंदर्याची, सौहार्दाची.. फराळाचा तिखट गोड वास, चकलीच्या भाजणीचा, बेसन खमंग भाजल्याचा, चिरोट्याच्या पाकाचा, चिवड्याच्या फोडणीचा, सगळ्या संवेदनांना जागं करणारा हा माहौल, अभ्यंगस्नानाचं गरम पाणी, सुगंधी तेल, उटणी..! माझी सर्वांत पहिली आठवण
म्हणजे सुखद थंडगार हवेची… त्या वातावरणातला प्रसन्नपणा अनुभवणं हा माझ्यासाठी दिवाळीतला पहिला भाग… वेगवेगळया ऋतूंमध्ये निसर्ग आपले सगळे सुंदर कलागुण बाहेर आणतो तसं माणूसही आणतोय असं चित्रं मला सगळीकडे दिसतं… दिसायचं उदा. रांगोळीसारखी कला…. चिमटीनं बारीक बारीक ठिपके काढून नाजूक रेषांची रांगोळी काढायची याचा एक आनंद होता… दिवाळीमध्ये प्राण्यांपासून, नात्यांपासून, निसर्गापासून सगळ्यांचीच बूज राखणारा एकेक दिवस आहे… सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा हा सण खूप मौलिक होता परंतु आता मात्रं तो छापील झालाय असं मला वाटतं… आम्ही, मावशी, आत्या, काका सगळ्यांची कुटुंब एकत्र.. खूप माणसं… खूप गप्पा… आल्याचा चहा… खूप हसू… खूप आठवणी.. मधली वर्ष अक्षरशः भुर्रकन म्हणतो तशी उडून गेली. यंदाच्या दिवाळीला काका नाही…! तोही निघून गेलाय खूप लांबच्या प्रवासाला…! दिवाळीचे आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे दिवाळी अंक.. भाऊबीज मिळाली की ती मी जिवापाड जपून ठेवायची आणि रुपये गोळा झाले की दिवाळी अंक विकत घ्यायची आणि वाचनाचा आनंद घ्यायची.. ही माझ्या मनातली दिवाळीची आणखी एक आठवण आहे… माझ्यासाठी दिवाळीची सुट्टी म्हणजे खूप वाचन.. नवी नवी पुस्तके आणून वाचायची.. अगदी श्यामची आई, गोट्या, चिंगीपासून ते मृत्युंजय, श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती पर्यंत अशी अनेक पुस्तके.. चक्क माझ्या घरी मी पुस्तकांची लायब्ररी उघडली होती. माझ्या आठवणीतून ती माझी लायब्ररी कधीच पुसली गेली नाही..!
दिवाळीची सगळी चव, गंमत, आनंद हा त्या पानापानात आहे
माझ्या आठवणीतली दिवाळी ही अशी आहे… आठवणीतील प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशीच खास बनून गेली आहे..!
☆ “अनंत दीपांमध्ये प्रकाशमान…तेजस्वी दीप!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
भगवान श्रीकृष्ण यांच्या तेजाचे वर्णन करताना संतांची कल्पनाशक्ती अनंत ब्रम्हांड ओलांडून जाण्याचा प्रयत्न करते. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात…देवा….तुझी प्रभा आहे ना…तुझा जो प्रकाश आहे ना…तुझे जे तेज आहे ना….ते एकीकडे आणि अनंत दीप प्रज्वलीत केल्यावर होईल तो प्रकाश, तो उजेड एकाबाजूला! तुझ्या याच तेजाने दहाच्या दहा दिशा उजळून निघतात आणि पृथ्वीच्या डोईवर आच्छादलेल्या या गगनाला शोभा येते…ते शोभून दिसते!
तूच निर्माण केलेली हालचाल करू शकणारी चर आणि एका जागी स्थिर असणारी अचर अशी सृष्टी. आम्रवृक्ष स्वत: आनंदी कधी होतो…त्याच्या सर्वांगावर मोहर अवतरला की. हा मोहर एक सांगावा असतो पुढे पोटी येणा-या आम्रफलांचा. आंब्याचे अस्तित्व पुढे चालवणारा मोहर….चिरंतन आयुष्याची खूण. तद्वत ही सारी सृष्टी पुढे प्राप्त होऊ पाहणा-या सुखाच्या कल्पनेने अगदी मोहरून गेली आहे! हे श्रीकृष्णा…तू सभागिया आहेस…अवर्णनीय सुंदरतेची,भाग्यची परमावधी आहेस..सभागिया इथे आमच्या मध्ये असलेला आहेस…भक्तांच्या या मेळ्यात मध्यभागी विराजमान आहेस… तुला आरती ओवाळत असताना चराचर मोहरून जाते. रत्नमुख्य असलेला हीरक अधिक शोभून दिसावा यासाठी तो एखाद्या अलंकारामध्ये स्थापित केला जातो…बसवला…जडवला जातो. त्याप्रमाणे प्रभेच्या कोंदणात तुझे तेज जडवले आहे..त्यात प्रभा आणि तेज एकमेकांत एकरूप होऊन गेले आहे….त्यामुळे तुझे श्रीमुख प्रत्येक ओवाळताना प्रत्येक वेळी नवा आनंद गवसत जातो…प्राप्त होत जातो! आमच्या हातातील काकड्याच्या ज्योतीचा प्रकाश देवा..तुमच्या डोळ्यांत प्रकाशाताना मला दिसला….तेथून तो प्रकाश फिरून माझ्या डोळ्यांत प्रवेश करता झाला….आणि अचानक आलेल्या या प्रकाशाच्या परावर्तनाने या एकनाथाचे..गुरुदेव जनार्दन यांच्या शिष्याचे डोळे दिपून गेले आहेत…
(मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी।ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर। ज्ञानोबाराय म्हणतात…मनाच्या दिव्यावर आलेली काजळी निघाली की दीप अधिकच तेजाने प्रकाशतो…जणू ही कधीही न संपणारी दीपावलीच. दिवाळी आणि काकड आरती एक सुरेख पर्वणी असते ही काजळी काढून टाकण्यासाठी. म्हणून ही लेखमाला.
सहस्र ही संख्या केवळ एक हजार असा एकच अर्थ ध्वनित करीत नाही….सहस्र म्हणजे एका अर्थाने अनंत! आणि सहस्र…सहस..र…र च्या पोटात स!सहस्त्र नव्हे! असो. वारकरी संतांचे श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीश…पांडुरंग…श्री विठ्ठल. संत देवाचे वर्णन करताना जे अलौकिक शब्द वापरतात…त्या सर्वच शब्दांचा अर्थ माझ्यासारख्या सामान्य वाचकास उमगणे केवळ अशक्य. पण म्हणून आपण अर्थाचा उलगडा करून घेण्याच्या यत्नापासून दूर राहू नये….नित्य नवा आनंद…तसा नित्य नवा अर्थ समजत जातो. काकड आरतीमधील या सर्वांगसुंदर अभंगाचा मला वाटला,समजला तो अर्थ मी मांडला आहे. आपण सूज्ञ,अभ्यासक आहात..अयोग्याकडे दुर्लक्ष करालच याची खात्री आहे. रामकृष्णहरी! संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०. केवळ नाम स्मरणाचे स्मरण करून देण्यासाठी प्रकाशित. माहिती,शब्दार्थ,छायाचित्र साभार.)