मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रूप पाहता लोचनी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रूप पाहता लोचनी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

नवरात्रात देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील. ती अशी:

 

पहिली माळ – ‘मातृदेवतेची’.

जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.

आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.

मातृदेवते, तुला शतशः प्रणाम!

 

दुसरी माळ – ‘आजी’ नामक ‘मायेच्या सागराला’.

जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या सायीसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा जादूचा खजिनाच दडलेला असतो.

 

तिसरी माळ – ‘माय मरो, मावशी जगो’ या उक्तीला जी जागते त्या ‘मावशीची’.

आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखर घालणारे कोणीतरी या जगात आहे याची जाण देणारी.

 

चौथी माळ – लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरवते त्या ‘आत्याची’.

वडील रागावल्यावर पाठीशी घालून पदराने डोळे पुसणारी…

… प्रेमळ, लाघवी आत्या.

 

पाचवी माळ – मायेच्या ‘बहिणीची’.

लहान असो वा मोठी,

आपली सुख-दुःखं वाटून घेणारी,

गुपिते पोटात लपविणारी.

 

सहावी माळ – लग्नानंतर मिळालेल्या मैत्रिणीची… ‘नणंदेची’.

आपल्याला आलेल्या छोट्या-मोठ्या अडचणींचे निवारण करणारी.

लग्नानंतर नवीन घरात नवखेपणा जाणवू न देता,

अलगद बहिणीची माया देणारी.

 

सातवी माळ – ‘अहों’च्या मातृदेवतेची… ‘सासुबाईंची’.

सासरच्या पद्धती, रीतीरिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.

ते सारं अंगवळणी पडेपर्य॔त सांभाळून घेणारी.

 

आठवी माळ – जीवाला जीव देणाऱ्या जिवलग ‘सखीची’.

आपले रुसवे-फुगवे सहन करणारी.

आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.

चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.

गोड गुपिते सांभाळणारी,

सडेतोडपणे खरे सल्ले देऊन सावरून घेणारी.

 

नववी माळ – आपल्या लाडक्या ‘लेकीची’.

जिच्या जन्मामुळे झालेल्या आपल्या मातृत्वाच्या सार्थकतेची.

आपल्यावर रागावणारी, रुसणारी…

पण वेळप्रसंगी,

कधी आपली आई,

तर कधी मैत्रीण होऊन

आपल्याला समजून घेणारी.

जगातल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा प्राणप्रिय असणारी…

‘आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास, आपलीच छोटी बाहुली’.

 

शेवटचा ‘दसरा’ –

‘जो कामवाल्या बाईबरोबर होतो हसरा’.

आपला उजवा हातच जणू.

जिच्या न येण्याने वेळापत्रक कोलमडतं.

वेळप्रसंगी ‘ताई तुम्ही थकलात, मी करते, बसा तुम्ही’,

असं म्हणून आपला शीण घालविणारी.

 

– रोजच्या जीवनातील देवींची ही वेगवेगळी रूपे.

– त्यांना ‘शतशः नमन’!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महापूजा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ महापूजा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

‘मी’ ‘माझे’ ‘माझ्यामुळे’ हे शब्द  अहंकारामुळे बंधनात टाकतात.

आपल्याकडून सारे करवून घेतो तो  दयाळू परमात्मा.त्याने जन्मस्थ सारे नीटनेटके अवयव दिले नसते तर आपण काय करू शकणार होतो ?

*मी सुंदर चित्र काढले, कारण मला डोळे आणि हातांची साथ मिळाली. ती देणगी भगवंतानी दिली.

*मी रोज सुखाने जगतोय, कारण प्रभूने प्राणवायू निर्माण केला आहे.

*मी बोलून संवाद करीत आहे, कारण मला जीभ आणि स्वरयंत्राची देणगी दिली आहे.

*मी सर्वत्र भ्रमण करतो, कारण मला चालायला पाय दिले आहेत.

*मला सारे आठवते, कारण मला स्मरणशक्ती दिली आहे

*बालपणी माझी उदरभरणाची सोय झाली, कारण मातेच्या स्तनात देवाने दुग्धनिर्मिती करून ठेवली.

*मला सुमधुर संगीताचा आनंद घेता येतो,व्यवहार करता येतो, कारण मला जन्मस्थ श्रवणशक्ती दिली आहे.

*मी अन्नपाणी गिळू शकतो, कारण माझ्या श्वासनलिकेवर एक पडदा येऊन ते अन्नपाणी परस्पर अन्ननलिकेत पोहोचते.

*जन्मापूर्वीच शरीरात सा-या सुविधा ठेवून गर्भाशयातून माझी सुखरूप सुटका ‘त्या’ ने केली आहे.

मग माझे कर्तृत्व काय आहे ? मी उगाच का मिरवत बसावे ? कर्ता करविता  ‘तो ‘ आहे ही जाणीव नित्य ठेवणे हीच महापूजा आपण करावी.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक गाय, ३३ कोटी देव = २० रु” – सुश्री आशा धनाले ☆ प्रस्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा  

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक गाय, ३३ कोटी देव = २० रु – सुश्री आशा धनाले ☆ प्रस्तुती – सुश्री त्रिशला शहा

★★★

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर. केशवचंद व्यापाऱ्याचं दुग्ध भंडार. त्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल. केशवचंदचा धाकटा मुलगा या दुकानाचा मालक. त्याच्या शेजारी हिरव्या चाऱ्याचं एक लहानसं दुकान. त्यामध्ये चाऱ्याच्या लहान मोठ्या पेंड्या भरलेल्या. त्याचा मालक मोठा मुलगा.

आज त्यांच्या घरी मोठ्या मुलाची सोयरीक करण्यासाठी पाहुणे आलेले. पाहुण्यांना घराची, दुकानांची स्थिती अतिशय समाधानकारक दिसली. पण त्यांच्या मनात जी मोठी शंका होती ती त्यांनी बोलून दाखवलीच. “काय हो शेठ, मोठ्या मुलाचे चाऱ्याचे दुकान आणि धाकट्याचे दुग्ध भांडार. असे का? ” केशवचंदनी समजावून सांगितले, “अहो, खरे तर मोठ्या मुलाच्या दुकानावरच धाकट्याचा धंदा चालतो. म्हणून मोठ्याचाच फायदा जास्त आहे. ” ” आॅं, ते कसे काय? ” “अहो, हे काय, समोरच मंदिर आहे. प्रवेशदाराच्या बाहेर, उजव्या बाजूला दोन गाई हिरवा चारा खात आहेत ना, त्या गाई पण आमच्या आणि चारा पण आमचा आहे. ” शेठ नी सांगितलं.

पाहुण्यांच्या डोक्यात गोंधळ सुरू झाला. गाईंच्या चारा खाण्यापासून दुकानाचा फायदा कसा काय? केशवचंदनी हसत हसत पुन्हा समजावले, “पाहुणे, असं बघा, इथे त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी गाय फार महत्त्वाची आहे. कारण तिच्या अंगात ३३ कोटी देव आहेत. ‘२० रु. ची फक्त एक छोटीशी चारापेंडी गाईला खायला घालून ३३ कोटी देवांना तृप्त करता येते व मोठे पुण्यही कमावता येते. ‘ हे असे आम्हीच भक्तांना सांगतो. त्यामुळे दिवसभर गाईंना चारा खायला घालण्यासाठी प्रचंड रीघ लागते. प्रत्येक एका तासानंतर आम्हाला गाई बदलाव्या लागतात. अशा २० गाई आमच्याकडे आहेत. त्यांची पोटं भक्तगणच भरतात. या गाईंकडून रोज मिळणाऱ्या उत्पादनावर धाकट्याचे दुकानही चालते. जिथे गाई उभ्या आहेत त्या जागेचे भाडे नाही, चारा पेंडी देण्यात मेहनत खूपच कमी, फायदा मात्र दिवसभर आणि वारेमाप. तर काय पाहुणे? आहे ना तुमचा होणारा जावई लाखांचा धनी? मग जमवायची ना सोयरीक? अहो, इथे येणाऱ्या भक्तांच्या भक्तीचा प्रश्न आहे. ती भक्ती अबाधित ठेवली की झालं! पैसाच पैसा. काय समजलं? ” 

“आता सगळं व्यवस्थित समजलं शेठ! आता सोयरीक जमवणार तर त्र्यंबकेश्वरच्या मुलाशीच. कारण इथं भोळ्या भक्तांना कधीच तोटा नाही. ‘जय भोलेनाथ! ‘ “ 

★★★

लेखिका : सुश्री आशा धनाले

मिरज

प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कर्मा रिटर्न्स” – लेखक : श्री केदार सोमण ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “कर्मा रिटर्न्स… – लेखक : श्री केदार सोमण ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

आजकाल खूपवेळा वाचायला मिळते की “कर्मा is बिच” 

“कर्मा रिटर्न्स” 

आपल्याकडे सुद्धा म्हण आहे…. पेरावे तसे उगवते, किंवा करावे तसे भरावे.

पण हे अर्धसत्य वाटते मला, जगात वावरताना अनुभव घेताना, वरील म्हणींचा प्रत्यय नेहमी येतोच सर्वांना, असे नाही वाटत.

कितीतरी, सुस्वभावी, पापभिरू संकटात लोकांना मदत करणारी माणसे, दुर्दैवाचे दशावतार अनुभवताना दिसतात.

कित्येक फ्रॉड लोक, लोभी व्यक्ती कित्येक लाखो कोटींचे घोटाळे करून, मस्त जगत असतात.

आणि कितीतरी साधीसरळ माणसे स्वतःच्या मुलांना पैश्याअभावी उच्चशिक्षण सुद्धा देऊ शकत नाहीत.

किंवा घरात कोणीतरी असाध्य रोगाने आजारी असते, कोणाचे एकुलत्याएक अपत्याचा अकाली मृत्य होतो.

असे काय मोठे कुकर्म केलेले असते की त्यांना पुत्रवियोगाचे जगातील सर्वात मोठे दुःख भोगावे लागते?

मला स्वतःला तरी असे वाटते, नियतीला चांगलं वाईट असे काहीही कळत नाही.

विजे सारखी ती कधी कोणावर कोसळून उध्वस्त करेल आयुष्य, हे सांगू शकत नाही.

मी माणुसकीने वागतोय कारण मग माझ्यापण वाट्याला चांगली वागणूक येईल, असा विचार करत जगणे हे फोल आहे.

आपण माणुसकीने वागावे कारण ते केल्याने मला समाधान लाभते. मला स्वतःची लाज वाटणार नाही. इतकेच फक्त असावे.

या लहरी नियतीच्या फटकाऱ्याला, आपण सगळेच मनातून घाबरत असतो, ती सुप्त भीती प्रत्येकाच्या मनात असते.

ह्या सुप्तभीतीला जो व्यवस्थित सांभाळू शकला, त्याचे आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी असते.

ही मनातील सुप्तभीती, हेच उगमस्थान आहे देवाचे, भक्तीचे, श्रद्धेचे.

मन सुदृढ करण्याचे अनेक मार्ग म्हणजे हे सर्व.

आणि ज्याला स्वतःचे मन सुदृढ करण्यात यश आले, तो सुखी.

#असेच_एक_मुक्तचिंतन…

★★★

लेखक : श्री केदार सोमण

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतेय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.

त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.

तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God… Another is Teacher ! ते दोघेही खोटं बोलत नसतात… मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन… ” अशी आॕपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.

प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेंव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले.

तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने ‘आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा ? जाने दो उसे… ‘

वऱ्हाडकरांचे टीचर नांवाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.

कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात ‘आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, ‘ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना…

शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

संकलक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रोजचा दिवस तिचाच…!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “रोजचा दिवस तिचाच…! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

जेव्हा मी पावसातून भिजत घरी आलो…

बाबा ओरडले, “अरे गाढवा, छत्री का नेली नाहीस?”

बहीण म्हणाली, “आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल!”

आजोबा ओरडले, “पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले? एव्हढं भिजत यायची काय गरज होती?”

पण…

आई माझे केस पुसत म्हणाली, “मूर्ख आहे हा पाऊस! माझा मुलगा घरी येईपर्यंत याला थांबायला काय झालं होतं?”

★★★

बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. मी बाहेरुन आलेलो असतो. बाहेरच्या दाराच्या कोपऱ्यात भिजलेली छत्री ठेवतो आणि मागे वळतो. मधल्या दारात आई उभी असते, “उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस… तिला उद्या घरी यायला सांग… मला भेटायचेय…”

★★★

मित्रांमधे खेळता खेळता उंबरठ्यावर बसलेल्या आपल्या आईला बघत तो दुडूदुडू धावत येतो आणि तिच्या कुशीत घुसतो. 

“आई, तुझ्या पोटात येण्याआधी मी कुठे होतो गं?”

“तू ना… कुठे बरं होतास? हां… तू ना माझ्या स्वप्नात होतास… माझ्या डोळ्यात होतास… माझ्यातच माझ्यातला थेंब होतास…” (टागोरांच्या एका कवितेवर आधारित)

★★★

संध्याकाळची वेळ. गाडी चालवत घरी येतोय. समोर काचेवर पाऊस. बाहेर अंधार होत चाललाय. फोन वाजतो, “अरे कुठे आहेस? पाऊस पडतोय… सावकाश ये… लवकर ये… मी वाट बघतेय….”

डोळ्यात निरांजनं घेऊन दारात वाट बघत उभी असलेली आई….

★★★

“गाढवा, अक्कल कधी येणारेय तुला? बाबा इथं मर मर मरतायत आणि तुला शिकवतायत. तर तू गणितात वीस पैकी दोन मार्क आणून मला न दाखवता पेपर फाडून टाकलास? तुला काय वाटलं मला समजणार नाही? आयतं मिळतंय ना म्हणून हे सुचतेय…

जा स्टॅण्डवर जाऊन हमाली करून पाच रुपये कमवून आण. मग कळेल तुला कमावणं काय असतंय ते…

बाबा बोलत नाहीत म्हणून तुझी थेरं वाढलीत…

पण आता नाही चालणारेय हे…

जोवर तू आपण होऊन बाबांना हे सांगत नाहीस तोवर तू उपाशी बसायचं…

काही मिळणार नाही तुला…

भूक लागली तर बाहेर जाऊन भीक मागून खा…

पण घरातलं मी देणार नाही…”

रात्री न बोलता तसाच झोपलो. आई बाबा दोघंही बोलले नाहीत.

दुसरे दिवशी सकाळी उठून बाबा अ़ॉफिसला जायच्या वेळी धाडस करून त्यांना सांगितले. एक दणका पाठीत आणि एक गालावर बसला आणि न बोलता ते ताडताड निघून गेले.

आतून आई आली. पदराला हात पुसत होती. माझ्या रडक्या चेहऱ्याकडे बघत मला जवळ घेतले. केसातून हात फिरवत, “राजा, अभ्यास कर रे. अभ्यासाशिवाय काही खरं नाही रे! अरे बाबा एव्हढं कुणासाठी करतायत? आपल्यासाठी, तुझ्यासाठीच ना! मग, त्यांना बरं वाटायला तू अभ्यास करायला हवास, मार्क चांगले पाडायला हवेत. चल, आता रडणं बंद. आता अभ्यास करायचा आणि मार्क चांगले पाडायचे, हं!”

तोवर बाबा परत येतात, “जा, गाढवा. जा… ते रडकं तोंड धुवून घे आणि जेवण कर… कालपासून ती पण उपाशीच आहे… तुझ्यासाठी !”

★★★

पार्टीत बसलोय. वेळ झालाय. साडेबारा वाजलेत. पार्टी संपते. बाहेर येऊन मोबाईल बघतो. तेरा मिस कॉल्स. परत कॉल करायचा धाडस नसते.

गाडी अंगणात आत घेतो. मधला लाईट सुरूच असतो. गाडीचा आवाज ऐकून दार उघडले जाते. पेंगुळल्या डोळ्यांनी, दिवसभराच्या शिणवट्याने थकलेली ती दारात. “अरे, किती फोन करायचे रे. काळजी वाटते. एक फोन घ्यायला काय होतंय रे. म्हातारं झाल्यावर कळेल तुम्हाला… चल, ये आता आत. आत कट्ट्यावर थंड ताक ठेवलेय ते पी आणि झोप… नंतर सकाळी ॲसिडिटी झाली म्हणून जेलुसिल खात बसशील आणि आता हे जरा कमी कर… तूही पन्नाशी पार केलीयस आता. काळजी घे रे आता जरा स्वतःची.”

★★★

मुलाचं लग्न ठरलेलं. एक दिवस आईचा फोन. येऊन जा. मी जातो. आई बाबा समोर बसवून घेतात आणि हातामधे एक पाकिट कोंबतात. मी उघडून बघतो. मुलाच्या नावाने अडीच लाखाचा चेक!

“आम्ही तुला काही दिले नाही. पण नातवाला देऊ शकतोय आज. हे त्याच्यासाठी…!”

★★★

घराची थोडी दुरुस्ती करायचीय. पैसे असतात  पण गंमत करायची म्हणून मी विचारतो, “तुम्ही किती देणार?”

ताडकन् आई बोलते, “द्यायचं ते सगळं दिलेय. आता फक्त सईसाठीचे पाच लाख आहेत ते मी मोडणार नाही. ते तिलाच तिचं लग्न ठरलं की देणार. इथे जे करायचेय ते तूच करायचेस. तुला एक पैसा देणार नाही. हां पण कैरीचं लोणचं देणारेय…”

★★★

शनिवारी संध्याकाळी अंगणातल्या मारुतीसमोर भीमरुपी, रामरक्षा, करुणाष्टके म्हणून झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत ‘ईडापिडा टळो’ म्हणत दृष्ट काढणारी… आई !

★★★

अशी आई असल्यावर आपल्याला दृष्ट लावायची कुणाची टाप आहे… 

आणि म्हणूनच – – 

आईचा दिवस वर्षातला फक्त एकच नसतो, तर सगळं आयुष्यच तिचं असतं… रोजचा दिवस तिचाच…!

★★★

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जिवंत आईचे श्राद्ध…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जिवंत आईचे श्राद्ध…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द!!

मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हणाला आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.

मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो. मी काही बोलणार तेवढ्यात, मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत: येवून पोहचली.

मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं, “भल्या माणसा, ही कसली चेष्टा करतोयस वेड्या, आई तर आहे तुझ्या बाजूला..”

मित्र आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ,.आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्याऐवजी मी आईला जिवंतपणीच तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, “जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द”.

तो पुढे म्हणाला, “आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते. म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून जातो, जे जे तिला आवडतं, ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात, अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’, आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला.

सकाळी आई “दासबोध” वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे की, देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल” आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला.

मी घरी येउन सुन्न मनाने पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो. मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटलं. रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, एवढे निश्चित.

अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल, पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात.

आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरेपूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाहीत, त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतरी वृद्ध माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेश ची ओळ आहे…

आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम… मला नकोय दुसरे तीर्थधाम”!!

संत कबीर असे म्हणतात,

जीते बाप को रोटी नां दे

मरे बाद क्यो पछतांये ॥

मुठभर चावल धाबेपर झोककर

कव्वे को बाप बनाये॥

संत तुकोबाराय असे म्हणतात…

भुके नाही अन्न ।

मेल्यावरी पिंडदान ॥

हे तो चाळवा चाळवि ।

केले आपणची ठेवी ॥

प्रिय मित्र-मैत्रिणीनो, मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका… जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा- अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा?

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख पर्वताएवढं – लेखक: श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ सुख पर्वताएवढं – लेखक: श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुख! सुख! सुख!

सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस!

सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा!

कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.

मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा.

आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ‘अगदी काहीही सोसावं’लागू नये म्हणून बिचारी धावाधाव!

एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं…अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.

आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो.त्या—:त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी—मेड!

वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय— यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही!

तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.

त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी?

अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या, आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवति तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार,असं दिसतंय.

केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून’पालक’झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर…..

अनेक घरांत’मागितलं की द्या!’ हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.

केवळ’बाईक’एवढ्यात नको;अठरा वर्षे पूर्ण होऊ दे,’ असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो,अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते.या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन—ऊन जेवण केलं असेल, त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल,आजारपणात रात्र रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल… त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल?

एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. *ना घरात प्रार्थना! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना! ना घरात ग्रंथवाचन! ना पुस्तकाचं समृध्द कपाट! ना व्याख्यानांना जाणं! ना उत्तम संगीत! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं!

जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही!

जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार?

आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची!

संपूर्ण विकसित माणूसपणाची!

मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या! तुमच्या पैशाची हेलिकाॅप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं! त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या!

त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या! त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं — त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या!

 

लेखक: श्री प्रवीण दवणे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुले.. फुले.. अन् फुले… ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुले.. फुले.. अन् फुले… ☆प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

किती छान लिहिले आहे, फुलांविषयी.. केवढी क्रियापदे.. केवढी विशेषणे…. कमाल आहे आणि प्रत्येक गोष्ट मनाला पटते!

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची!

 

लेखक: श्री. पु.ल.देशपांडे

संग्राहिका –  सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शोध स्वतःचा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “शोध स्वतःचा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला.

सात दिवसांनंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली.

पहिला प्रवासी: भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो. तुम्ही मला ओळखलंस का?

दुसरा प्रवासी: नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, एवढं मात्र खरं….

पहिला प्रवासी: सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात…

तुम्ही तर माझे गुरु निघालात….!

दुसरा प्रवासी: कसे काय?

पहिला प्रवासी: काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत सात दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही!

तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय?

दुसरा प्रवासी: माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चापाण्यासाठी काही पैसे होते.

पहिला प्रवासी: मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?

दुसरा प्रवासी: मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेंव्हा मी हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे,

इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात!

तुम्ही  तुमचे स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही,

तर मग तुम्हाला काहीही सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची?

तात्पर्य: ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडं बघायला आपल्याला वेळच नाही!  ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू, तेव्हाच आपण आपले सर्व प्रश्न सोडवू.

जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares