मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

भक्तीसूत्र ४५.

तरङ्गायिता अपीमे सङ्गात्समुद्रायन्ती ॥ ४५ ॥

अर्थ : दु:संगानें जडणारे विकार सुरुवातीला जरी मंद लहरींप्रमाणे वाटले तरी त्या दु:संगामुळेच ते सागराप्रमाणे विशाल बनतात.

विवेचन : विकार हे नेहमी सौजन्याचा बुरखा घालून येत असतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्याकडे परिणामी जे चांगले असते, त्याला चांगले म्हटले जाते. गुढी पाडव्याला आपण कडुनिंबाची पाने खातो, ती खाताना आपल्याला कडू लागतात, पण अंतिमतः ते आपल्या फायद्याचे असते. विषय सुरुवातीला आपल्याला छान वाटतात, पण अंतिमतः मात्र ते मनुष्याचा घात करतात.

या विकारांची बाधा कळून येत नाही. कारण ते अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. पण जसा त्यांना विषयांचा संबंध होत जाईल तसे तसे ते समुद्राप्रमाणे वाढत जातात. अग्नीची ठिणगी लहान असते, पण पेंढ्यांची गंजी जाळायला पुरेशी ठरते.

ज्ञानेश्वर माउली सांगतात.

‘देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सावरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥’

(द्न्यानेश्वरी ३-२०४)

पारध्यांनी पसरलेले जाळे हरिणास प्रथम बाधक वाटत नाही पण परिणामी त्यातच त्याचा सर्वनाश असतो. जोपावेतो हे विकार तरंगासारखे अल्प परिमाणात असतात तोपावेतो त्यांतील दोषदर्शन न झाल्यामुळे त्यांचा त्याग शक्य असूनही केला जात नाही. मग एकदा का ते समुद्रासारखे विशाल व्यापक झाले की आवरले जाणे शक्य नाही. सागराचा दृष्टांत देण्यात त्याची भयानकता, विशालता दाखविणे हा उद्देश असावा. सागर तरून जाणे जसे कठीण तसेच हे कामक्रोधादि विकार तरून जाणेही कठीण आहे.

आपण समाजात राहतो. समाजातील बऱ्यावाईट माणसांशी आपला संबंध येणे अगदीच स्वाभाविक आहे. पण त्या वाईट लोकांचा गुण आपल्या अंगी येणार नाही, यासाठी आपण दक्ष रहाण्याची नितांत गरज आहे. काही लोकं घराच्या वाशासारखे असतात, त्यांना टाळणे शक्य नसते. मग त्यांना सोबत घेऊनच जीवन जगावे लागते. यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. क्रोध आणि काम या प्रमुख विकारांवर आपण ताबा मिळविला तर अर्धे मैदान जिंकले असे समजायला हरकत नाही.

जय जय रघुवीर समर्थ

—– 

नारद भक्तिसूत्र ४६

कस्तरति कस्तरति मायाम्? यः सङगान्स्त्यजति यो

महानुभावं सेवते, निर्ममो भवति ॥ ४६ ॥

अर्थ : माया तरुन कोण जातो? मायेच्या पार कोण जातो? जो आसक्तींचा त्याग करतो. जो ममत्व रहित होतो. (तोच मायेच्या पलिकडे जातो.

विवेचन : मागील सूत्रातून दुःसंग हा कसा बाधक आहे व कामादिकांच्या द्वारे सर्वनाशास कारण आहे हे सांगितले. पण या सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे. केवळ कामक्रोधादिकांचा नाश झाला पण त्यांचे मूळ जी माया ती राहिली तर तिच्यापासून पुन्हा सर्व संसार निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून माया-तरण झाले पाहिजे. ते कोण करू शकतो याचा विचार या सूत्रात केला आहे. प्रथम माया म्हणजे काय पाहिले पाहिजे. उपनिषदे, पुराणे, स्मृती, गीता व संत-वाङ्‍मयातून, तसेच शास्त्रकारांच्या दर्शन-ग्रंथातून मायेचा फार विचार केला आहे. मायेचीच अविद्या, प्रकृती, प्रधान, कल्पना, संसार, भ्रम इत्यादी नावे आढळतात.

समर्थ म्हणतात,

*”माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥”*

(दास. १४. १०. ०१)

शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून संसारात अडकवणारी ती माया असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे.

*”तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव । दशे आले ॥”*

(ज्ञा. ७-६६)

मायेच्या दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. आवरणशक्तीने चैतन्याच्या विशेष स्वरूपास झाकून ती त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडते हेच अज्ञान.

*”आपुला आपणपया । विसरू जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥”*

(ज्ञा. १४-७१.)

ही माया आपल्या विक्षेपशक्तीने ब्रह्मांडस्वरूप सर्व सृष्टी उत्पन्न करते. तसेच जीवाला देहद्वयाचा अहंकार घ्यावयास लावून त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोर्क्तृत्वादी धर्माचा तादात्म्य अध्यास निर्माण करते; असे वेदांतग्रंथांतून म्हटले आहे. माया ही भगवंताची सद्‍सद्विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती आहे.

जीवाला दुःख शोकात्मक संसार भोगण्याचे कारण केवळ मायाच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

*”दुःख शोकाचिया घाई । मारिलिया सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥”*

(ज्ञा. ७-१०७)

वरील सूत्रात ‘तरति’ हे क्रियापद घेतले आहे ते महत्त्वाचे आहे. तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाणे, तिचे अतिक्रमण करणे या अर्थी होत असते. गीतेमध्येही सातव्या अध्यायात ‘मायामेतां तरन्ति ते’ असे म्हटले आहे. पोहणे ही क्रिया एखाद्या नदीतून, सामान्य जलाशय, तळे, विहीर, इत्यादिकांतून होत असते. ती अल्पकाळ श्रमपरिहाराकरिता होते. पण पोहणे व तरणे यांत अंतर आहे. जलाशय, तळे, विहीर इत्यादिकांत पोहणारा जेथे पोहण्यास प्रारंभ करतो तेथेच परत येतो. पण तरून जाणे म्हणजे एका तीराहून निघून मधला पाण्याचा भाग ओलांडून परतीराला जाणे. याकरिता महानदी किंवा समुद्रच घ्यावा लागतो. तरुन जाण्यासाठी तर वापरली जाते. आपण सगळे या भवनदीत, अर्थात भवसागरात आहोत असे सर्व संत सांगतात. या मायेला जिंकल्याशिवाय हा भवसागर तरुन जाणे शक्य नाही. भगवंत म्हणतात,

*”माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा| कासेस लागले माझ्या ते चि जाती तरुनिया|| “*

(गीताई ०७. १४)

अंतरंग व बहिरंग असे संगाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग स्त्री, पुत्र, वित्त, गृहक्षेत्रादी व अंतरंग काम-क्रोध, लोभ, अहंकारादि हे दोन्हीही जीवाला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. वास्तविक वर पुत्र, वित्त, कलत्रादी विषय बहिरंग म्हटले आहेत. जोपावेतो देह आहे तोपावेतो यांचाही संबंध राहील, मग त्याग कसा होणार? येथे संपूर्ण विषयांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत नाही. कारण स्वरूपाने ते बाधक नाहीत. बाधक अंश संग म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, अहंत्व, ममत्व, प्रियत्वबुद्धी होय. तीच साधकाला घातक असते, त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच संगत्याग होय, पण या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी, अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच काय पण अंतःकरणचतुष्ट्य सर्व त्या विषयात रंगून जाते. असा हा संग दृढ झालेला आहे.

असे जरी आहे तरी जेव्हा अंतःकरणात विवेक निर्माण होतो तेव्हा अंतःकरण, बुद्धी, विषय यांचे अनित्यत्व पटते व एक वेळा अनित्यत्व, अनात्मत्व पटले म्हणजे तो साधक पुन्हा त्यात अडकला जात नाही. तो विवेक महात्म्यांच्या कृपेविना प्राप्त होऊ शकत नाही.

येथे ‘संगान्स्त्यजति’ असे बहुवचन आहे. संगाचे अंतरंग व बहिरंग असे दोन प्रकार वर सांगितले आहेत. बाह्यसंग काही अवांतर कारणाने म्हणजे दोषदृष्टीने सुटू शकतील पण फार बाधक असणारे अंतरसंग हे विना विवेक ज्ञानाच्या टाकले जाणार नाहीत. याकरिता ”यो महानुभावं सेवते” हे वाक्य सूत्रात आले आहे. येथे ‘महानुभाव’ हा शब्द महत्त्वाचा आहे. मागे अडतीस व एकूणचाळिसाव्या सूत्रात ‘महत्’ पद संतांच्याकरिता वापरले आहे. त्यांनाच येथे महानुभाव असे म्हटले आहे. महान म्हणजे मोठा आहे अनुभव ज्यांना, त्यांना महानुभाव म्हणावे. अनुभव हा एक जीवनाचा स्थायीभाव आहे. जीवनातून अनुभव वगळता येणार नाही. जीवन हे अनुभवस्वरूप असते. अनुभव हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. मुख्य ज्ञानाचे दोन प्रकार वेदान्तशास्त्रात सांगितले आहेत. स्मृती आणि अनुभव. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानास अनुभव म्हणतात व अनुभवापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांपासून जे ज्ञान होते ते स्मृतिज्ञान होय.

अनुभवातही यथार्थ-अयथार्थ, प्रमा अप्रमा (भ्रम) असे प्रकार आहेत. योग्य प्रमाणाने योग्य विषयाचे जे यथार्थ ज्ञान होते त्यास प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान म्हटले जाते. जेव्हा प्रमाणात दोष शिरतो, विषय अयोग्य असतो म्हणजे बाधित असतो. त्याचे जे ज्ञान ते अप्रमा (भ्रम) म्हटले जाते. दोरीवर जर एखाद्याला सर्पज्ञान झाले तर तो भ्रम होय. कारण तो दोरीच्या अज्ञानाने इंद्रियदोषादिकांमुळे झालेला असतो व कालांतराने राहत नाही म्हणजे सर्पभ्रम बाधित होतो. म्हणून तो अनुभवही बाधित, अप्रमा, भ्रम म्हटला जातो. संसारात काही अनुभव प्रमाणभूत म्हणजे खरे असतात व काही अनुभव अप्रमा म्हणजे भ्रमरूप असतात, निष्फल नव्हे बाधक असतात. अनेक विषयांचा अनुभव मनुष्य घेत असतो पण तो टिकत नाही. सुखप्रद होत नाही. तसेच विषय कार्य असल्यामुळे अल्प आहेत. “यदल्पंतन्मर्त्य” जे अल्प ते मर्त्य म्हणजे विनाशी असते असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. सामान्यच काय पण इंद्रादिक देवांच्या स्वर्गीय अलौकिक अनुभवालाही तुच्छता आहे. तेही अनुभव घेणारे महान म्हटले जात नाहीत. महान अनुभव म्हणजे ज्या अनुभवाचा विषय मोठा, प्रमाण निर्दोष व अनुभव घेणारा अधिकारी योग्य तो महान एक परमात्माच आहे. याचा विचार मागे आला आहे. त्याचा प्रत्यक्ष तादात्म्याने अनुभव भक्तांना येत असतो.

जलात बुडणार्‍यांना जशी बळकट नौका तारून नेते त्याप्रमाणे या घोर संसारात गटंगळ्या खाणार्‍या जीवास शांत चित्त असलेले ब्रह्मवेत्ते संतच या संसारसागरांतून तरून जाण्याला मोठा आधार असतात.

जन्माला आलेला मनुष्य मरणार आहे, हे अंतिम सत्य आहे. येताना मनुष्य रिकाम्या हाताने येतो, आणि जाताना रिकाम्या हाताने जातो. इथुन जाताना जर तो सर्व गोष्टींची आसक्ती त्यागून जाऊ शकला, तर त्याला मुक्ति मिळण्याची शक्यता असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत असे सांगतात की प्रापंचिक मनुष्याला, साधकाला परमार्थ मार्गात पत्नी कधीही अडथळा ठरत नसते, तर तिच्याबद्दल असलेले *ममत्व* त्याला बाधक ठरत असते.

काळोखात मनुष्याला भीती वाटते. पण त्याचवेळी त्याला जर कुठे अग्नी दिसला, तर त्याची थंडी, भय आणि अंधार तिन्ही एकाच वेळी नष्ट होतात. त्यासाठी भगवंताचा आश्रय सर्वोत्तम ठरू शकतो.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४५ आणि ४६.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वो जफा करे..!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “वो जफा करे..!” ☆ श्री संभाजी बबन गायके

जम्मू-कश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे, हे जगाला माहित आणि मान्य आहे… पाकिस्तानचा अपवाद वगळता!

पाकिस्तान स्थानिक भारतीय काश्मिरी जनतेला धर्माच्या नावावर भडकावून त्यांना तथाकथित स्वातंत्र्याची मागणी करायला लावत आलेले आहे.

काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने आधीच बळकावून ठेवला आहे. उर्वरित काश्मीर स्वतंत्र झाला की तो ही पाकिस्तानला जोडून घ्यायचा पाकिस्तानचा डाव जगाला ठाऊक आहे. त्यासाठी पाकिस्तान त्यांच्या प्रशिक्षित अतिरेक्यांना काश्मिरातील घुसवून बंडखोरांना ‘साहाय्य’ करतो. पाकिस्तानी आणि स्थानिक अतिरेकी प्रामुख्याने भारतीय लष्कराला लक्ष्य करतात. अर्थात निष्पाप नागरिकही त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत.

मानवी हक्क आणि इतर नियमांमुळे भारतीय लष्कराला कारवाईमध्ये मर्यादा पडतात. स्थानिक नागरिक लष्कराच्या वाहनांवर, सैनिकांवर दगडफेक करीत असत (हल्ली हे प्रमाण खूप कमी झाले आहे!)… तरीही लष्कराला संयमित कारवाई करीत शांत राहावे लागते. काश्मीरातील जनतेचे मन वळवण्याचा प्रयत्न तरीही भारतीय लष्कर अतिशय नेटाने करीत आलेले आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, आपत्कालीन सेवांच्या माध्यमातून या प्रयत्नांना उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. पण यासाठी लष्कर मोठी किंमत देत असते. एकवेळ समोरासमोरचे युद्ध तुलनेने सोपे वाटावे, अशी इथली परिस्थिती आहे! असो.

काल काश्मीरातील एक तरुणी प्रसूती संदर्भातील गुंतागुंतीमुळे अत्यवस्थ झाली. बर्फवृष्टी झाली होती… रस्ते बंद होते. तिला रुग्णालयात नेण्यासाठी पाठवली गेलेली रुग्णवाहिका बर्फात रुतून बसली! इकडे रुग्ण महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली होती. तेथे तैनात असलेल्या सैन्याला ही खबर मिळताच त्यांनी युद्धपातळीवर rescue mission हाती घेतले.

गुडघ्याएवढा बर्फ, बर्फाचे वादळ, अंधार आणि चढ उताराचा रस्ता… आणि अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता अशा भयावह स्थितीमध्ये जवानांनी त्या महिलेला लाकडी खाटेवर निजवून सुमारे साडे अकरा किलोमीटर्स पायी प्रवास केला… महिलेला रुग्णालयात दाखल केले… आणि तिची सुखरूप सुटका झाली… तिला मुलगा झाला!

भारतीय लष्कराचे कौतुक होत असतानाच दुसऱ्या बाजूला काहींना असे वाटते की… आपले जवान तेथील जनतेला साहाय्य करीत असतात… पण जनता लष्कराला अपेक्षित सहकार्य करीत नाही!

 पण परिस्थिती पूर्णपणे अशी नाही. है इसी में प्यार की आबरू… वो जफा (बेइमानी) करे… मैं वफा करूं! या चालीवर आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही…! काळ दखल घेत असतो! हजारो सैनिकांनी प्राणार्पण करीत भारतीय लष्कराची लोकसेवेची परंपरा जतन करून ठेवली आहे… त्यांच्या त्यागाला, बलिदानाला आणि अविरत सेवेला विनम्र अभिवादन! जय हिंद… जय हिंद की सेना!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाहीतर मला तुझ्याकडे बोलावून घे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “नाहीतर मला तुझ्याकडे बोलावून घे!” ☆ श्री संभाजी बबन गायके

एकाच वेलीवर फुललेली दोन फुलं एकमेकांशी आयुष्यभर नातं सांगत राहतात पण दुसरं फूल कोमेजून जाईतोवरच… पण कोमेजून गेलेल्या, मातीच्या कुशीत विरून गेलेल्या फुलाची सय सल म्हणून मनात जागवत दुसरं फूल जेंव्हा सुगंधाविना जगत राहतं… तेंव्हा त्या लतेने तिच्या सर्वच फुलांत तिचे स्वप्राण गुंफलेले आहेत.. असं समजावं!

आजच्या दिवशी मोग-याचा एक फुलोरा निमाला! सुगंधाला फुलांपेक्षा जास्तीचे श्वास देऊन निसर्गाने आपल्यावर मोठेच उपकार केलेले आहेत. सुकलेली सुमनेही कितीतरी वेळ मने उल्हसित करीत राहू शकतात… फक्त ती जपून मात्र ठेवता आली पाहिजेत.

पण काही वेदना, काही दु:खं कधीच जुनी होत नाहीत. सावली निघून गेल्यानंतर भाजणारं ऊन सदोदित प्रखर होत जातं… बाळासाहेबांचं असंच झालेलं आहे!

दीनानाथ, माई, लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ… या एकमेकांशी एका अखंड सूत्रात बांधल्या गेलेल्या फुलांची संख्या स्वरांच्या संख्येएवढी असावी हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही!

लतेच्या देहातून कळ्या प्रकट होतात… आणि फुलत जातात… पण लताच कोसळून पडली की कळ्यांनाही माती जवळ करावीच लागते. या कळ्यांतील हृदयनाथ नावाची कळी पुढे स्वत:च्या सामर्थ्यावर फूल झाली… पण या फुलाने लतेचा हात काही सोडलेला नाही… अगदी आजच्या क्षणापर्यंत.

दीदी आपल्याला सोडून गेल्या त्यापेक्षा त्या हृदयनाथ यांना जास्त सोडून गेलेल्या आहेत… हे बाळासाहेबांचे शब्द सांगून जातात. गेल्या काही महिन्यांपासून दैनिक सकाळच्या रविवार पुरवणीत बाळासाहेब आणि दीदी यांच्यातील संवाद वाचायला… नव्हे ऐकायला मिळतो आहे. एक भाऊ आपल्या बहिणीशी एवढा तादात्म्य पावू शकतो हे अनुभवणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. आई आणि मूल हा स्नेहसंबंध आपल्याला ज्ञात असतो… पण भावा-बहिणीमधली ही भावसरगम दुर्मिळ म्हणावी अशी. मुख्य म्हणजे ही सरगम गद्यात व्यक्त केली जाते आहे.

आपण या संवादात जणू आगंतुक आहोत… वाटतं… हृदयनाथ जगाला काही सांगायला जात नाहीत… ते स्वत:लाच सर्वकाही सांगत आहेत. ते केवळ त्यांच्या दीदीशीच बोलत आहेत… तिच्या आठवणींच्या खोल डोहात अगदी तळापर्यंत जाऊन भावसमाधी लावून बसलेत… बाळासाहेबांचं विदीर्ण झालेलं हृद्य प्रत्येक शब्दात ठळक दिसत राहतं… हे असं प्रेम लाभलेली माणसं असतात… हे जाणवत राहतं.

मायाजाल हे असंच तर असतं… पण त्याची स्वत:चीही एक गोडी आहे. लता दीदी आणि बाळ हृदयनाथ या भावा-बहिणीच्या नात्याची उकल हृदयनाथ मंगेशकर यांच्या लिखाणातून थोडी थोडी होत जाते आहे… पण अजूनही खुद्द हृद्यनाथ यांना सर्वकाही सर्वांशाने व्यक्त करता आलेलं आहे… असं दिसत नाही. फुले वेचू जाता तिकडे दुस-या कळ्यांना बहर आलेला आहे असं होत जातं. मोगरा फुलला या माऊली ज्ञानोबारायांच्या अजरामर शब्दकळ्या सुरात गुंफताना लता-हृद्य यांच्यात झालेला संवाद जणू ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथांचा संवाद वाटतो… इथं दीदी जणू निवृत्ती!

दीदी गेल्या… आणि त्यांचे हृदय मागे राहिले आहे… या हृदयाला आता पुन्हा लतेच्या अंतरंगात शिरून तिच्याशी एकरूप होऊन जाण्याची आस लागलेली आहे…

“तू परत ये… परत येऊ शकणार नसशील… तर मला तुझ्याकडे बोलावून घे… ” हे हृदयनाथांचे शब्द मन हेलावून जातात!

लता मंगेशकरांनी जेवढे आपल्याला दिले तितकेच हृदयनाथ यांनीही दिलेले आहे. अभंगवाणी, मीरेची भजने यांच्या सुरावटी त्यांनीच तर रेखल्या आहेत… त्यांच्या सुरांवरच लता दीदीच्या स्वरांतून मोगरा फुलला आहे! बाळासाहेबांनी दीदीच्या आठवणी सांगत राहाव्यात… शब्दबद्ध करीत राहाव्यात… कारण फूलच लतेचे अंतरंग जाणत असते!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ११ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ११ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

विस्तीर्ण, ओसाड माळावरचे सप्तपर्णीचे दोन प्रचंड वृक्ष पाहून रविंद्रनाथांच्या वडिलांनी तो माळ विकत घेतला व तिथे ‘शांतिनिकेतन’ नावाची छोटीशी बंगली बांधली. तिथे ते दोघे, रविंद्रनाथ व त्यांचे वडिल राहू लागले. वडिलांबरोबर रविंद्रनाथांनी हिमालयात भ्रमंती केली. या तीन महिन्यांच्या प्रवासात ते त्यांच्याकडून खूप कांही शिकले. शाळेच्या भिंतींतून मुक्तता झाल्यानंतरच शिक्षणातील आनंद त्यांना गवसला. आणि शांतिनिकेतन च्या निर्मितीचं बीज त्यांच्या मनात रुजले.

शाळा सुरू करण्यासाठी ते १९०१ साली पत्नी व दोन मुलांसह शांतिनिकेतनात आले. तिथला शाळेचा व कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी त्यानी; जग्गनाथपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या हौसेने बांधलेला बंगला विकून टाकला. त्यांच्या पत्नीने आपले सर्व दागिने विकले.

निसर्गाला गुरू मानून, मुलांच्या मनातलं कुतूहल जिवंत ठेऊन, मुलांना समजणाऱ्या भाषेतून, त्यांच्या ओळखीच्या, आवडणाऱ्या प्रसंगवर्णनातून दिलेलं शिक्षण जास्त उपयुक्त ठरेल याबद्दल गुरूदेवांना खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वतः पाठ्यपुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेले ‘सहज पाठ’ आजही प. बंगालमधील शाळांत शिकविले जातात.

‘साधन’ असणाऱ्या पुस्तकांना ‘साध्य’ मानणाऱ्या परिक्षा पद्धतीचा त्यांना तिटकारा होता. त्यांच्या मते बुद्धीचा विकास म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशील मुक्त विचार व जिज्ञासा यांचा विकास!

विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे यावर ते ठाम होते. एखादी व्यक्ती व्यावसायिक शिक्षण किंवा बौद्धिक शिक्षण किंवा मानवता केंद्रित शिक्षण निवडेल किंवा कुणी एखादा ब्रह्मचर्य पाळून आत्मसाक्षात्कार, व्यक्तित्वाचा व चारित्र्याचा विकास हे उद्देश ठेऊ शकतो. यासाठी त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम सुरू केले होते. निरोगी शरीराचे महत्त्व ओळखून योग, खेळ यांचे शिक्षण अनिवार्य हवे अशी त्यांची धारणा होती.

अध्यापन वास्तविक व व्यावहारिक असले पाहिजे; कृत्रिम आणि सैद्धांतिक नको, यावर त्यांचा भर होता. टागोरांच्या मते, व्यक्ती स्वतःला मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकते व योग्यरित्या संवाद साधू शकते. म्हणून त्यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेवर जास्त भर दिला आहे.

ग्रामीण लोकांच्या गरिबीची चिंता त्यांना होती. शिक्षणाद्वारे गरिबी दूर झाली पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी संबंधित क्षेत्रातील विषयात त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर ते कुशल कारागीर बनू शकतात. याचसाठी त्यांनी श्रीनिकेतन ही संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू केली.

—–

☆ गीत : ३१ ☆

“PRISONER, tell me, who was it that bound you? ” 

“It was my master, ” said the prisoner‌. I thought I could outdo everybody in the world in wealth and power, and I amassed in 

my own treasure-house the money due to my king. When sleep overcame me I lay upon the bed that was for my lord, and on waking up I found I was a prisoner in my own treasure-house. “

“Prisoner, tell me who was it that wrought this unbreakable chain? ” 

“It was I, ” said the prisoner, “who forged this chain very carefully. I thought my invincible power would hold the world captive leaving me in a freedom undisturbed. Thus night and day I worked at the chain with huge fires and cruel hard strokes. When at last the work was done and the links were complete and gunbreakable, I found that it held me in its grip. “

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ३१ ☆

संपत्तीने मिळवीन सत्ता

सत्ता देईल आणिक मत्ता

दुनिया होईल गुलाम माझी

हीच कल्पना सदैव चित्ता॥

*

याचसाठी झटलो रात्रंदिनी

वन्ही तापवुनि, घाव घालुनि

अभेद्य केल्या मीच साखळ्या

लोह कड्या चातुर्ये गुंफुनि॥

*

स्वतःसाठी तिजोरी भरता

इतरांसाठी बंध निर्मिता

दमुनि निजलो, स्वप्नी रमलो

हताश झालो, जागा होता॥

*

मनाजोगती करुनि व्यवस्था

अशी कशी हो माझी अवस्था

साखळदंडा मीच निर्मिले

बंधक झालो मीच सर्वथा॥

*

मूढ असे मी, फिरली मती

तुझीच सत्ता या देहावरती

ऐहिक माया ती क्षणभंगुर 

हे रघुराया, तूच निरंतर॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत ३२ ☆

BY all means they try to hold me secure who love me in this world. But it is otherwise 

with thy love which is greater than theirs, and thou keepest me free.

Lest I forget them they never venture to leave me alone. But day passes by after day and thou art not seen.

If I call not thee in my prayers, if I keep not thee in my heart, thy love for me still waits for my love.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ३२ ☆

*

जे जे प्रेम मजवरी करिती

जखडून देती मज त्या प्रीती 

*

सावली सम येती मागुनी

भय हे जाईन मी विसरुनी

*

तुझी प्रीत त्याहुनि मोठी

मुक्त ठेविसी मज जगजेठी

*

मी नच करिते तुझी प्रार्थना

हृदयी माझ्या तुझी मूर्त ना

*

वाट पाहते प्रेम तुझे परी

जागेल का मम प्रीत हरी

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत ३३ ☆

WHEN it was day, they came into my house and said, “We shall only take the smallest room here. ” 

They said, “We shall help you in the worship of your God and humbly accept only our own share of his grace”; and then they took their seat in a corner and they sat quiet and meek.

But in the darkness of night I find they break into my sacred shrine, strong and turbulent, and snatch with unholy greed the offerings from God’s altar.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ३३ ☆

गरिबाच्या वेशात अतिथी आला

रात्रीपुरती थोडी जागा दे म्हणाला

*

तुझ्याबरोबर मी ही देवासमोर बसेन

प्रार्थनेचे फळ तुलाच द्यायला सांगेन

*

धन्य झालो मी उच्च विचार ऐकून

शांत झोपलो, शेजेला पाठ टेकून

*

रात्र होताच त्याची मती फिरली

आणि वासना उफाळून आली

*

देवाला वाहिलेली दाने सारी

ओढून झाली पसार स्वारी

*

कशी पोचेल प्रार्थना कुणाची

विवेकावर जर सत्ता षड्रिपूंची

– क्रमशः भाग ११.

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डेल्टा-15… लेखक : श्री दत्ता पवार ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डेल्टा-15… लेखक : श्री दत्ता पवार ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

अमेरिकेत “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे.

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या. मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

“डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.

या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.

पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

“डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की “मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी. ‘

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.

प्रवासी म्हणाला, “या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव ‘डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे. “

बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले.

नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव निधी घातला.

‘डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ‘डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो.

डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे.

 

लेखक : दत्ता पवार 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वेगळी प्रेम कहाणी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वेगळी प्रेम कहाणी☆ सुश्री शीला पतकी 

तिचं डोकं दुखत होतं पण काम तर करणं भाग होतं. 50 टोप्या प्रत्येक बाईने शिवायच्या होत्या. तिचे हात पटापट चालत होते. मशीन वर पाय भरभर चालत होते… पण डोके दुखण्याची वेदना चेहऱ्यावर दिसत होती. आसपास अशीच राष्ट्र उपयोगी काम चाललेली होती. एक दहा बाय दहाची खोली त्यातच एका कार्यकर्त्याचा संसार तिथेच बुलेटिनचे गठ्ठे आणि बरच काही…! इतक्यात एक तरुण कार्यकर्ता आत मध्ये आला टोप्या घेऊन जाण्यासाठी त्यांन त्या सतरा अठरा वर्षाच्या मुलीकडे पाहिलं का कोण जाणे पण त्याला वाटलं तिला काहीतरी होतंय त्यांना विचारलं, ” बरं वाटत नाही का? ” ती म्हणाली, ” नाही डोकं फक्त दुखतंय” तो म्हणाला,… “चहा घेऊन बघा “ती म्हणाली, ” ते आमच्या घरी चहा करत नाहीत महात्माजींचा आदेश आहे ना… “… मग तो तातडीने बाहेर पडला… अर्ध्या तासात परत आला… हातात एक थर्मास होता आणि रॅपर मधली गोळी! त्यांना तिचं काम थांबून एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाला, “गोळी घ्या डोके दुखणे थांबेल आणि त्यावर हा एक कप चहा घ्या” आता मात्र तिने त्याच्याकडे पाहिलं आपल्यासाठी इतक्या आदराने आणि प्रेमाने आपल्या दुखण्याची दखल घेऊन हे सगळं करणारा तरुण कोण? … समोर एक 22 /23 वर्षाचा काळ्या रंगाचा दणकट हाडापेराचा कुरळ्या केसाचा तरुण उभा होता तिने त्याच्याकडे पाहिलं तो नजरेनेच म्हणाला घ्या चहा घ्या काही बिघडत नाही. तिने चहा घेतला थोड्या वेळाने डोकं दुखायचं थांबलं.

तरुण रोज त्या कार्यालयात कामानिमित्त येत होता हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं तिने विचारलं, “खेड्यातून आलात? तो म्हणाला, ” हो शेती असते तिकडे पण शिक्षणाला इथेच होतो. शाळा सोडली… महात्माजींचा आदेश. कार्यकर्ता म्हणून सामील झालो सध्या तरी मोठ्या नेत्यांच्या हाताखाली निरोप पोहोचवणं संदेशवहन जेवण पोहोचणे इत्यादी कामे करतोय चोरून बुलेटिन वाटतो वेषांतराची कला आहे तिचा उपयोग करत लपून छपून असणारी काम करतो”. ती बेहद खुश झाली तो म्हणाला पण माझ्या जेवणाची सोय नाहीये…! ती म्हणाली, ” मी डबा देईन तुम्हाला “… तो म्हणाला मोफत नको खानावळी सारखा डबा देत असाल तर पैसे देऊन जेवेन”… ती म्हणाली, “आईला विचारून सांगते”. मग डब्याचा निमित्ताने तो रोज येत राहिला

… एक दिवस धाडस करून त्यांना विचारलं… हो धाडसच कारण ती वेगळ्या जातीची होती तो उच्च कुलीन ब्राह्मण होता घरी पटणार नाही तिला स्वीकारणार नाही याची त्याला जाणीव होती. तरीही त्यांन निर्णय घेतला. तिच्याही आईचा विरोधच होता. माणस आपली जात सोडत नाहीत आणि ते खरेच आहे कारण जीवनशैली वेगळी असते ना? पण त्या अठरा वर्षाच्या मुलीने ते धाडस दाखवलं. घरात कोणीही पुरुष माणूस नाही एक धाकटा भाऊ आणि विधवा आई. हे आपलं यापेक्षा अधिक भलं करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन तिने त्याच्याशी विवाह केला व त्यांचा चहा विचारण्याचा दिवस व्हॅलेंटाईन डे ठरला…! कुठल्याही मंगल अक्षता नाहीत.. कुठलेही भटजी नाहीत… हौस मौज नाही… शालू शेले नाहीत..! कोर्टातले एका लावलेल्या छोट्या स्टॅम्पवर ते लग्नासाठी करारबद्ध झाले. कोर्टात जमलेल्यांनी आशीर्वाद दिले. त्यांचा संसार सुरू झाला! तो कधी तुरुंगात, कधी घराबाहेर देशाच्या कामात… अनेक बाजूने विरोध… पैशाची नोकरी नाही कामधंदा नाही घरची बऱ्यापैकी श्रीमंती असताना खायचे वांदे व्हायचे… पण ते डगमगले नाहीत दोघांच्या जीवावर संसार उभा केला मुलाना उत्तम शिकवलं देशभक्तीच बीज पेरलं आज आणि हसत खेळत दिलखुलासपणे जगत राहिले…! एकमेकांची कदर करत…! जग अख्ख विरोधात होतं पण ते एकमेकांसाठी होते… मग सगळे जग त्या दोघांनी जिंकून घेतलं आज ते दोघ असते तर तो म्हणाला असता, तूच माझी व्हॅलेंटाईन करतेस ना अजूनही प्रेम तुझ्या कळ्या कभिन्न नवऱ्यावर…! “

आणि ती शांतपणे हसली असते कारण तिचं नाव शांता होत…!!!

एक सुंदर प्रेम कहाणी जी खरी आहे प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला मला ती आठवते आणि अभिमान वाटतो त्या दोघांचा. राष्ट्र प्रेमातून एकमेकांवर प्रेम करून संसार थाटणारे हे दोन प्रेमी जीव माझे आई-बाबा आहेतबाई दादा, आज तुम्ही हयात नाहीत… पण तुमच्या एवढी प्रेमळ निर्मळ प्रेम कहाणी दुसरी मी पाहिली नाही. फक्त 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करणे मोठ्या हॉटेलत जाणं भेटवस्तू देणं मग म्युझिक लावून नाच करण… केक कापणं… राजे हो हा व्हॅलेंटाईन डे नाही. प्रेम देवतेचे स्मरण करायला हे काही करावं लागत नाही फक्त एकच गोष्ट करावी लागते एकमेकांवर नितांत प्रेम.. एकमेकांप्रती विश्वास आणि आयुष्यभराची खंबीर साथ…!

असो… आज एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या प्रेमी जीवाना हॅपी व्हॅलेंटाइन डे!!!

 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयी प्रीत जागते… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ हृदयी प्रीत जागते… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

‘व्हँलेंटाईन डे‘ वरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…

एकदा एक मूर्ख शायर सूर्यास म्हणतो की…

भास्करा, कीव मजला

येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे

पाहिली आहे कधी?

तेव्हा सूर्य उत्तर देतो…

आम्हासही या शायराची

कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास

रात्र यावी लागते.

प्रेम हे काय दिवस ठरवून व्यक्त करायची चीज आहे?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.

… प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची

परिणिती आहे.

गदिमा म्हणून गेलेयत…

… *प्रथम तुज पाहता, * *जीव वेडावला… *

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की

… जिथे सागरा धरणी मिळते

 तेथे तुझी मी वाट पहाते

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.

ही कोंडी शेवटी तो फोडतो,

(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)

… लाजून हासणे अन् हासून ते पहाणे,

 मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

– – भेट झाल्यावर मात्र हृदयात एक अनाहूत हुरहुर सुरू होते.

– मग परत गदिमा मदतीला येतात,

… हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता

तोही आपल्या विश्वात नसतोच.

 

… होशवालों को खबर क्या.. बेखुदी क्या चीज है,

 इश्क किजे, फिर समझिये, बंदगी क्या चीज है

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय…

… मी मनांत हसता प्रीत हसे, हे गुपीत कुणाला सांगू कसे?

त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे. तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू) आहेत,

ती म्हणते,

… नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

 परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे नाहीत. मग तीच म्हणते,

… ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है ।

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर – – 

… घडी घडी मेरा दिल धडके, हाय धडके, क्यू धडके…

– – ह्याची खात्री पटलीय पण खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय… 

… कहना है, कहना है, आज तुमसे ये पहेली बार,

 तुम ही तो लायी हो जीवन में मेरे, प्यारही प्यारही प्यार…

ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय… तृप्त झालीय.

… धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

 शब्दरूप आले, मुक्या भावनांना…

आणि मग झाडांची पाने हलतात. तो खूष…..

… जेव्हां तिची नी माझी, पहिलीच भेट झाली,

झाली फुले कळ्यांची.. झाडे भरात आली..

– – आणि तिनं चक्क होय म्हटलं. हा गडाबडा लोळायचा बाकी… 

.. तुम क्या जानो, मोहब्बत क्या है..

 

.. कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले.

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते…

… तुज्ये पायान् रूपता काटां, माज्ये काळजान् लागतां घांव…

– – आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं… 

… दो लब्जों की है बस ये कहानी…

या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही…..

… आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा, तू अशी जवळी रहा…

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणाऱ्या या कविता ज्या साहित्यात आहेत, त्या *मराठी भाषेला ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

भारतीय संस्कृती आणि माय मराठीप्रेमी… नक्कीच सहमत असतील!!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोहात पाडणारे मोहरान… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ मोहात पाडणारे मोहरान… ☆ श्री जगदीश काबरे ☆

सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या सावळाराम अधिकारी या गुरुजींनी आपल्या साकुर्ली गावाच्या जवळील ओसाड माळरानाला हिरवेगार करण्याचे स्वप्न पाहिले आणि आजचे मोहरान अस्तित्वात आले. मोहरान (Mohraan) हे ठाणे जिल्ह्यातील शहापूरपासून ३५ किमी अतंरावर असलेले एक नैसर्गिक कृषी-पर्यटन केंद्र व फार्मस्टे / फूड फॉरेस्टचा अनुभव देणारे नयनरम्य स्थळ आहे. सात एकर परिसरात वसलेले हे मोहरान म्हणजे एक नैसर्गिक बेट आहे. वरून वाहत आलेल्या ओढ्याचे येथे दोन भाग होतात. हे दोन्ही भाग मोहरानाला अर्धवर्तुळाकार वळसा घालून पुन्हा एकत्र येतात आणि ओढा पुढे वाहू लागतो. अशा प्रकारे हे एक बेट तयार झालेले आहे. जणू काही एखाद्या किल्ल्याच्या भोवतीचा संरक्षक खंदकच! इथे पर्यटक निसर्ग, शेती आणि शहरी जीवनशैली यांचा अनोखा एकत्रित अनुभव घेऊ शकतात. हे केंद्र परंपरागत शेती आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा आदर्श वास्तुपाठ आहे. हे फ़ूड फ़ॉरेस्ट म्हणून ओळखले जाते. येथे वनासारखी विविध प्रकारची झाडे-झुडूपे रुजलेली असल्यामुळे जमिनीत जैविक साखळी आणि पर्यावरणाची समृद्धी दिसून येते. हा मोहरानचा परिसर सोडला तर पलीकडचा विस्तीर्ण प्रदेश हा तसा ओसाडच आहे. मध्येच एवढे एकच बेट वाळवंटातील ओएसिससारखे हिरवागार दिसते आणि नजरेचा सुखावते. ही किमया साधली आहे पर्यावरण प्रेमी असलेल्या कष्टाळू अधिकारी कुटुंबाने!

अर्थात ही समृद्धी येण्यासाठी अधिकारी गुरुजींबरोबरच त्यांची जुळी दोन मुले समीर आणि सचिन यांचेही तेवढेच कष्ट आहेत. या दोघांनाही परिपूर्ण साथ दिली आहे ती त्यांच्या सहचारणी तनुजा आणि श्रद्धा या दोघींनी. समीर आणि सचिन दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांचा हा व्यवसाय ते मोहरान इथूनच हाताळतात. त्यामुळे त्यांना 24 तास मोहरानमध्ये वेळ देता येतो. समीर हा तर जातिवंत शेतकरी असल्यासारखा आहे. त्याचा वृक्ष व वनस्पतींच्या संबंधीचा अभ्यास एवढा गाढा आहे की वनस्पतींचे वेगवेगळे औषधी उपयोग, ती वनस्पती खाण्यायोग्य आहे की नाही, तिच्यामुळे पर्यावरण कसे राखले जाते, अशा अनेक गोष्टींची तो रसाळ माहिती देत असतो. संपूर्ण परिसर नैसर्गिक पर्यावरण समृद्ध असल्यामुळे ते लागवडीचे वन असले तरी नैसर्गिक जंगल वाटते.

मोहरानची नैसर्गिक संपदा अत्यंत समृद्ध आणि जैवविविधतेने परिपूर्ण आहे. येथे शेकडो प्रकारच्या वनस्पती, फुले, वृक्ष, जिवाणू, कीटक, पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि किटकांसारखे अनेक सूक्ष्मजीव एकत्र राहतात. या फूड फॉरेस्टमध्ये रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर नसल्याने जमीन निरोगी आणि सकस आहे. त्यामुळे जीवसृष्टीचे सजीव चक्र कायम राहते. पर्यटकांना या परिसरात फेरफटका मारताना विविध वनस्पती आणि त्यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्याची संधी मिळते, तसेच नैसर्गिक शेती आणि पर्माकल्चरबद्दल तसेच पर्यावरणपूरक शेतीच्या पद्धतींबद्दल येथे माहिती दिली जाते. पर्माकल्चर (Permaculture) म्हणजे निसर्गाशी सुसंगत, स्वयंपूर्ण आणि शाश्वत शेती तसेच जीवनशैली होय. ‘Permanent Agriculture’ (कायमस्वरूपी शेती) आणि ‘Permanent Culture’ (कायमस्वरूपी संस्कृती) या शब्दासमुहाचा एक शब्द ‘पर्माकल्चर’ असा तयार झाला आहे. यात नैसर्गिक परिसंस्थेचे अनुकरण करून पीक विविधता, मातीचे आरोग्य आणि जैवविविधता टिकवून कमी खर्चात शाश्वत उत्पादन घेण्यावर भर दिला जातो. असो.

मोहरान केंद्राला सांभाळणाऱ्या लोकांचे कष्ट आणि त्यांचा अनुभव अतिशय प्रेरणादायी आहे. या मोहरान फार्ममुळे अधिकारी कुटुंबाने स्थानिकांना रोजगारही मिळवून दिलेला आहे. त्यांचे या फार्मचा विकास आणि निगा राखण्यामागील प्रयत्न अनेक दशकांचे आहेत. सुमारे चार दशकांच्या मेहनतीने हे केंद्र आजच्या स्वरूपात आलं आहे. येथे काम करणारे स्थानिक शेतकरी आणि तंत्रज्ञ पारंपरिक ज्ञान, पर्यावरणीय तत्त्वे आणि नव-उद्यमशीलता यांचा संगम साधून येथे विविध पिके लावतात, निसर्गसंवर्धनाची काळजी घेतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांचा उपयोग ताज्या, नैसर्गिक आहारासाठी करतात. पाहुण्यांना फक्त पाहणेच नव्हे तर शेतात सहभागी होणे, पिके लावणे, काढणे आणि व्यवस्थापनाची पद्धत समजून घेणे यांसारख्या अनुभवात्मक कामांमध्ये समाविष्ट करण्यात येते.

येथे येणाऱ्या लोकांना विविध प्राकृत अनुभव घेता यावा म्हणून केवळ शेती व बागकामच नाही, तर वन्यजीवन, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, सायकलिंग, नदीत पोहणे, कायकिंग करणे असे आनंददायी अनुभवही घेता येतात. हे अनुभव झाडे, फुले, फळॆ प्राणी आणि पक्षांचे जीवन असे निसर्गाशी निगडित असल्यामुळे हे केंद्र फक्त पर्यटन स्थळ रहात नसून, निसर्गाशी आपल्याला मनापासून तादात्म्य पावण्यासाठी निर्मिलेली जागा आहे, असे वाटल्याशिवाय राहत नाही. या केंद्रात शेतीतून मिळणारी नैसर्गिक अन्नधान्ये, विविध फळे, भाज्या व श्रम-आधारित पदार्थ वापरले जातात आणि पर्यटकांना अन्नाची खरी परंपरा आणि जीवनातील ताजेपणा यांचा अनुभव येथे दिला जातो. मोहरान ही एक अशी जागा आहे जिथे मानवी कष्ट, निसर्गाची संपदा आणि पर्यावरणपूरक कृषि संदेश हे सगळे एका आत्मीय अनुभवात मिसळलेले आहेत, आणि पर्यटकांना तो अनुभव त्यांच्या आयुष्यात खोलवर जाणवतो. या फार्ममध्ये मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचे ‘मोहरान’ हे नाव सार्थ ठरते. त्यामुळेच नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून चार क्षण विश्रांती मिळावी म्हणून येथे पर्यटकांना पुन:पुन्हा यावेसे वाटते. येथील निसर्गात राममाण होत शुद्ध हवेचा श्वास घेत पुन्हा तावेतवाने होऊन पर्यटक परत जातात. यातच मोहरानचे यश सामावलेले आहे.

येथे पर्यटकांसाठी कॅम्पिंग तंबू आहेत तसेच आरामदायी कॉटेजेस सुद्धा. शहरी पर्यटकांना सुखावणाऱ्या पंचतारांकित व्यवस्था या दोन्ही ठिकाणी त्यांना उपलब्ध आहेत. येथील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गंमत म्हणजे रानातील दगडांना स्वच्छ करून त्यावर विविध प्रकारची चित्रे काढून ती चित्रेशिल्पे पूर्ण परिसरभर विखरून ठेवलेली आहेत. त्यामुळे परिसराला एक वेगळीच शोभा आलेली आहे. मला किचनच्या बाहेरील बागेत सकाळची न्याहारी करताना असेच एक चित्रशिल्प नजरेस पडले आणि आवाक झालो. काय होते ते सांगून तुम्हाला आश्चर्य वाटेल. किचनच्या भिंतीतून काळ्या रंगाचा इलेक्ट्रिक केबल असलेला पाईप बाहेर पडलेला होता. त्याच्या तळाशी एक झाडाची कुंडी होती, त्यामुळे तळाकडचा पाईप दिसत नव्हता. पण तरी वरचा भाग उघडाच होता. मग तो जिथून भिंतीतून बाहेर पडलाय तिथे सापाच्या तोंडाचे चित्र काढले. त्यामुळे एक काळा साप तिथे फणा काढून उभा आहे असे दिसू लागले. (छायाचित्र पहा) किती प्रत्ययकारी सौंदर्यदृष्टी आहे ही!

असे म्हणतात, माणसाला आनंदी ठेवायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, ते मोहरानमध्ये अक्षरशः खरे ठरते. कारण शाकाहारी असो वा मांसाहारी, जेवणाची अस्सल गावरान चव अनुभवावी तर इथेच. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्याचा वापर या जेवणात केलेला असतो. थोडक्यात, समृद्ध पर्यावरणाशी नाते जोडायचे असेल तर मोहरानसारखे दुसरे उत्तम ठिकाण नाही. ज्यांना शरीर आणि मनाला ताजा तंदुरुस्त करणारा अनुभव घ्यावयाचा असेल त्यांनी Mohraan Farmstay – Near Mumbai, Nashik and Pune https://share. google/BIo2XYFnVX0mzWXGK या वेबसाईटवर त्यांच्याशी संपर्क साधावा.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तांडव…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तांडव…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

तांडव हा एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. हे पुरुषप्रधान नृत्य असून ते शिवाने प्रवर्तित केले. संगीत रत्नाकरात (७. ५. ६) दिलेली तांडवाची उत्पत्ती अशी…

प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्नयुक्तं ततो हरः।

तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय व्यदीदृशत्।।

लास्यमस्याग्रतः प्रीत्या पार्वत्या समदीदृशत्।

बुध्दवाथ ताण्डवं तण्डोर्मर्त्येभ्यो मुनयोsवदन्।।

अर्थः- नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धतनृत्य आठवून ते आपल्या गणातील अग्रणी असलेल्या तण्डूकरवी भरतमुनींना दाखविले. तसेच लास्य हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करवून दाखविले. तण्डूने करून दाखविले ते “तांडव” असे जाणून भरतादी मुनींनी ते नृत्य मानवांना शिकविले.

या नृत्याचे सात प्रकार आहेत ते असे…

१) आनंदतांडव २) संध्यातांडव ३) कालिका तांडव ४) त्रिपुरतांडव ५) गौरीतांडव ६) संहारतांडव ७) उमातांडव

हे सातही प्रकार नटराज शिवाला प्रीय होते.

काही काव्य ग्रंथातून दुर्गा, गणेश, भैरव, श्रीराम इ. च्या तांडवाचे वर्णन आढळते. रावणविरचित शिवतांडव स्तोत्राखेरीज आदि शंकराचार्य रचित दुर्गा तांडव (महिषासुर मर्दिनी संकटाविमोचन स्तोत्र), गणेश तांडव, भैरव तांडव तसेच श्रीभागवतानंद गुरु रचित श्रीराघवेंद्रचरितम् मधे राम तांडव स्तोत्र आहे. असे म्हणतात की रावणाच्या भवनातील पूजन समाप्त झाल्यावर शिवाने, महिषासुराला मारल्यानंतर दुर्गा मातेने, गजमुखाच्या पराभवानंतर गणेशाने, ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदल्यानंतर आदिभैरवाने तर रावणवधाच्या वेळी श्री प्रभुरामचंद्राने तांडव केले होते.

वरील सात प्रकारांपैकी गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यात शिव हा ‘भैरव’ अथवा ‘वीरभद्र’ या स्वरूपात असतो. त्याच्या सोबत उमा अथवा गौरी असते. तो जळत्या चितांनी युक्त अशा स्मशान भूमीत भूतगणांच्या साथीने हे भयानक नृत्य करतो.

(संदर्भः- अ. भा. सं. कोष, खं. ४ पृ. ७३)

संध्यातांडवाचे वर्णन शिवपुराणातील “शिवप्रदोषस्तोत्रा”त आहे. त्यावर आधारित “संध्यातांडव” ही कविता रसिकांसाठी पुढे देत आहे. तिची गुणवत्ता वाचकांनी ठरवावी.

या कवितेतील पहिल्या कडव्यात ‘ळ’ आणि ‘र’ या वर्णांच्या प्रयोगाकडे, साधलेल्या अनुप्रासाकडे वाचकांनी विशेष लक्ष द्यावे. आजपर्यंत कविश्रेष्ठ गदिमांचे “घननीळा लडिवाळा” हे एकमेव गीत “ळ ” या वर्णाच्या योजनेसाठी उदाहरण म्हणून सांगितले जाते. या पृष्ठभूमीवर या कवितेतील ‘ळ’ या वर्णाच्या अनुप्रासाचे महत्व. बघा कसे वाटते ते.

आपला अभिप्राय मात्र प्रार्थनीय आहे आणि त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करतोय.

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

भूत गणांचा संघ घेउनी स्मशान भूमिवरी

‘संध्या तांडव’ करितो भैरव सवे सती गौरी।।धृ।।

*

चिता भस्म चर्चिले तनूवर गळा व्याळ माळ

जटाभार माथ्यावर त्यावर चंद्रकोर शीतल

रुंडमाळ, करमाळ रुळतसे विशाळ वक्षावरी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।१।।

*

धडाडणाऱ्या चिता भयंकर वाऱ्यावर हलती

कभिन्न काळी भुते नाचती फेर धरुनि भवती

रक्त-कृष्ण वर्णाचे मिश्रण विचित्र भयकारी!

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।२।।

*

सिद्ध सदाशिव नृत्यालागी त्रिशूळ सरसावुनी

ब्रह्मा दे करताल, वाजवी मृदंग शारङ्पाणी

लक्ष्मी गाई, इंद्र वाजवी रत्नांकित बासरी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।३।।

*

घुमू लागले डमरू डिम् डिम्, मृदंग धिं धिं धिगि धिक्

सरस्वतीच्या वीणेमधुनी सूर सुरेल अलौकिक

कुणी वाजवी शंख, मंजि-या, कुणि वाद्ये शततारी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।४।।

*

देव दाटले, असित लोटले, यक्ष अप्सरांसवे

किन्नर गाती, देवल देती दाद तयांच्या सवे

डुलू लागला गोल धरेचा, शेष फणा सावरी!

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।५।।

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लवथवती विक्राळा…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लवथवती विक्राळा…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

“लवथवती विक्राळा

 शिवतत्त्वाच्या विश्वात्म दर्शनाचे महाकाव्य.

 (रवि १५ फेब्रु. २०२६ रोजी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त) 

प्रस्तावना

महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेत काही रचना अशा आहेत की त्या केवळ ऐकल्या किंवा म्हटल्या जात नाहीत, तर साक्षात जगल्या जातात. समर्थ रामदासस्वामी विरचित “लवथवती विक्राळा” ही शंकरांची आरती त्यापैकीच एक. घराघरांत नित्यनेमानं उच्चारली जाणारी ही आरती वरवर साधी वाटली, तरी तिच्या गर्भात शिवतत्त्वाचं अत्यंत गहन, विश्वात्म आणि अद्वैतदर्शी चिंतन सामावलेलं आहे. ही आरती म्हणजे केवळ स्तुतीगीत नसून, शिव या तत्त्वाची अनुभूती देणारं भव्यदिव्य तत्त्वकाव्य आहे.

विक्राळतेचं तत्त्वज्ञान

आरतीचा आरंभ —

“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा”

या ओळीनं होतो. इथे समर्थ शंकरांचं सौम्य रूप पुढे न आणता त्यांची विक्राळता उभी करतात. मात्र ही विक्राळता हिंसक नसून अज्ञानाला हादरवणाऱ्या सत्याची आहे. “ब्रह्मांडी माळा” या एका शब्दातून संपूर्ण विश्व शंकरांच्या कंठाभोवती गुंफलं जातं. शिव इथे एखाद्या विशिष्ट स्थानी विराजमान असलेले देव न राहता, संपूर्ण विश्व व्यापून उरणारं चैतन्य ठरतात—विश्वात असूनही विश्वापलीकडचे.

*विष, करुणा आणि साक्षीभाव*

“वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा”

या ओळीत समुद्रमंथनाची पुराणकथा येते. देव-दैत्यांच्या संघर्षातून निघालेलं हळाहळ विष शंकरांनी प्राशन केलं; मात्र ते कंठातच रोधून धरलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला.

या कृतीचा तात्त्विक अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे. शिव दुःख नष्ट करत नाहीत. ते दुःख स्वतःमध्ये सामावून घेतात; पण त्याचा प्रसार इतरत्र होऊ देत नाहीत. “त्रिनेत्रातील ज्वाळा” म्हणजे संहाराची आग नव्हे, तर भूत–वर्तमान–भविष्य या तिन्ही काळांचं जागृत ज्ञान. शिव म्हणजे संहारक नाही, तर सजग साक्षीपुरुष.

रौद्रता आणि सौम्यतेचा अद्वैत संगम

हे विक्राळ रूप पुढच्याच ओळीत सौंदर्यात विलीन होतं —

“लावण्यसुंदर मस्तकीं बाळा”

शंकर लावण्यवान आहेत. त्यांच्या मस्तकावर ‘बाळा’ म्हणजे गंगा आहे. स्वर्गातून प्रचंड वेगानं येणाऱ्या गंगेला आपल्या जटाभारात सामावून, तिचा वेग रोखून पृथ्वीवर केवळ कल्याणकारी सौम्य धार सोडली—म्हणून समर्थ गंगेला ‘बाळा’ म्हणतात.

शिवाच्या मस्तकावरला चंद्र शीतलतेचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे. रौद्रता आणि सौम्यता, भय आणि करुणा — या विरोधी भासणाऱ्या गुणांचा अद्वैत संगम म्हणजे शिवतत्त्व. जिथं चंद्र आहे, तिथं अंधार असला तरी शीतल प्रकाश असतो.

चैतन्याचा प्रवाह

“तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां”

या ओळीत गंगेचं अवतरण दिसतं. शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा केवळ पौराणिक नदी नाही, तर साक्षात चैतन्याचा, करुणेचा आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह आहे. संहारक मानला जाणारा शिवच जीवन टिकवून ठेवतो—ही विसंगती नसून हे पूर्णत्व आहे.

कर्पूरगौर शिव : अहंकारशून्य तेज

धृवपदातील “कर्पूरगौरा” या शब्दातून शिव अत्यंत गोरे असल्याचं सांगितलं आहे. कापूर जसा जळून पूर्णपणे नाहीसा होतो, तसा शिव अहंकारशून्य आहे. भोळेपणा म्हणजे दुर्बलता नाही, तर निर्मळ भावावर प्रसन्न होणारी सहज दैवी वृत्ती आहे. विशाल नेत्र म्हणजे सर्वांना सामावून घेणारं अपरंपार वात्सल्य, कारुण्य.

अर्धनारीनटेश्वर : अद्वैताचा कळस

“अर्धांगीं पार्वती”

या ओळीत अर्धनारीनटेश्वर तत्त्व प्रकट होतं. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत — चेतना आणि क्रिया, पुरुष आणि प्रकृती यांचं द्वैत इथं विरघळतं. त्यामुळे शिवतत्त्व हे केवळ वैराग्याचं प्रतीक न राहता, संतुलित, समन्वयी आणि समग्र जीवनदृष्टीचं प्रतीक ठरतं.

भस्म : वैराग्याची जागृती

“विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा”

विभूती म्हणजे भस्म. शिव सर्वांगावर चिताभस्म धारण करतात. भक्त शिवावर चिताभस्माची उधळण करतात. भस्म ही मृत्यूची आठवण आहे; पण निराशेची नाही—ती वैराग्याची जागृती आहे.

समुद्रमंथनाच्या कथेत अमृताआधी विष येतं. हा निव्वळ पौराणिक तपशील नसून मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. साधना असो वा संसार—संघर्षाविना अमृत मिळत नाही. शिव विष पितात, पण ते गिळून टाकत नाहीत—हेच शिवतत्त्वाचं जीवनसूत्र आहे.

योगी शिव

आरतीच्या अखेरच्या कडव्यात शिव योगी रूपात प्रकट होतात—

“व्याघ्रांबर, फणिवरधर, सुंदर मदनारी”

भय, काळ आणि वासना यांवर विजय मिळवलेला शिव इंथ योगी आहे.

_“पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी”

शिव पंचमुखी आहेत. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात—किंवा पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि सृष्टीची पाच कार्यं यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती म्हणजे पंचानन शिव.

“शतकोटीचें बीज वाचे उच्चारी”

ॐ या एकाक्षरी प्रणवात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. स्वयं शिव या नादात सदा मग्न आहेत.

राम–शिव अद्वैत

“रामदासा अंतरीं”

या उल्लेखातून समर्थ स्वतःला रामभक्त म्हणवतात. ते म्हणतात की, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीराम माझ्या हृदयी विराजमान आहे. रामाच्या अंतःकरणात शिव वास करतो; म्हणजेच रामदासाच्याही अंतःकरणात शिवच वास करतो. राम आणि शंकर वेगळे राहत नाहीत—इथं भक्तीतलं अद्वैत अतिशय सूक्ष्मपणे समर्थांनी उलगडलंय.

काव्यमीमांसा

या तात्त्विक गहनतेला न्याय देणारं समर्थांचं काव्यप्रभुत्व तितकंच विलक्षण आहे. विषयाला साजेसं ठेकेदार, गंभीर वृत्त, ओघवती लय आणि अर्थघन शब्दयोजना यांमुळे आरती उच्चारताना ती केवळ ऐकू येत नाही, तर अनुभवली जाते.

‘लवथव’, ‘विक्राळ’, ‘ब्रह्मांडमाळा’, ‘मदनारी’, ‘फणिवरधर’ हे शब्द अलंकार म्हणून नाही, तर तत्त्वसूचक चिन्हं म्हणून येतात. प्रथम कडव्यातील ‘ल’ आणि ‘ळ’ वर्णांचा अनुप्रास श्रुतिमधुर वाटतो.

*विरोधाभासातून परिणाम साधणारी कलाकृती*— विक्राळ पण लावण्यसुंदर, संहारक पण करुणाकर — असं शिवरूप भक्ताच्या मनात खोलवर स्थिरावतं.

समारोप

अशा प्रकारे _“लवथवती विक्राळा”_ ही आरती शिवाची स्तुती न राहता शिव होण्याची दिशा दाखवणारं तत्त्वकाव्य ठरतं. म्हणूनच ती शतकानुशतकं टिकून आहे. ती देवाला माणसाजवळ आणत नाही; उलट माणसाला अधिक विशाल, अधिक सजग आणि अधिक शिवमय बनवते. हेच या आरतीचं खरं यश आहे.

॥ ॐ शिव शंकराय नमः ॥

॥ समर्थकृत शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

*

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

*

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

*

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।

त्यामाजीं अवचित हळाहळ जें उठिलें ॥

तें त्वां असूरपणें प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

*

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

 llजय जय रघुवीर समर्थ ll

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares