मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पैशाची रोख देवघेव करणारे स्वयंचलित यंत्र ”- मूळ लेखक: अज्ञात ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “पैशाची रोख देवघेव करणारे स्वयंचलित यंत्र ”  – मूळ लेखक:  अज्ञात ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी 

   

(ATM – Automated Teller Machine) — हे आता आपल्या आयुष्याचा एक अपरिहार्य भाग झालेले आहे.                                                             

स्नानपात्रात (टबमध्ये) बसून स्वतःच्याच आळशीपणावर वैतागलेल्या जॉन शेफर्ड-बॅरॉनला (हा शिलाँगमध्ये जन्मलेला स्कॉटिश इसम) अकस्मात स्फूर्तिदेवता प्रसन्न झाली. १९६०च्या मध्यास, एके दिवशी बँकेतून पैसे काढायला म्हणून हा गेला आणि नेमका बँक बंद झाल्यावर एक मिनिट उशीरा पोहोचला. त्यामुळे झालं काय की, सप्ताहाची अखेर त्याला पैशांविना घालवावी लागली.  तो चडफडला, विचारात पडला की, ‘बँकेच्या कामकाजाच्या वेळाव्यतिरिक्त पैसे काढता यायला हवेत. काय करावं बरं?’  

दिवसाच्या किंवा रात्रीच्या कुठल्याही वेळी पैसे टाकल्यावर चॉकलेट देणारे स्वयंचलित विक्रीयंत्र त्याच्या मनःचक्षूंसमोर चमकून गेले. अशा त-हेने, एका मुद्रणसंस्थेत काम करणा-या शेफर्ड-बॅरॉनने एक स्वयंचलित रोख पैसे देणारी पद्धती शोधून काढली.  

१९६०च्या अखेरीस अकस्मात एक दिवस जेवणाच्या सुट्टीत त्याची गाठ बार्कलेज बँकेच्या महाव्यवस्थापकांशी पडली आणि त्यांच्याकडे केवळ ९० सेकंदांचा वेळ मागून, छानशा गुलाबी वाईनचे घुटके घेत शेफर्ड-बॅरॉनने आपल्या अभिनव स्वयंचलित रोखीच्या यंत्राची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. “तुम्ही तुमच्या बँकेशेजारी एक खाच बसवली, की ज्यात तुमचा अधिकृत धनादेश टाकला, तर तिथून कोणत्याही वेळेला प्रमाणित रोकड मिळू शकेल, अशा कार्यपद्धतीची कल्पना माझ्याकडे आहे.”  त्यावर बँकेचे महाव्यवस्थापक म्हणाले, “तू सोमवारी सकाळी मला येऊन भेट.”  

बार्कलेज बँकेने शेफर्ड-बॅरॉनला सहा स्वयंचलित रोखीची यंत्रे कार्यान्वित करण्याचे काम दिले. त्यापैकी पहिले यंत्र लंडनच्या उत्तर भागातील एन्फिल्ड उपनगरात दि.२७ जून १९६७ रोजी बसविण्यात आले.                                                                       

शेफर्ड-बॅरॉनचा जन्म १९२५ साली, भारतात शिलाँग येथे झाला. पुढे त्याने भारतीय सैन्याच्या हवाई दलाच्या दुस-या तुकडीत नोकरी केली आणि गुरखा सैनिकांना हवाई छत्रीचे प्रशिक्षण दिले.                                                                  

तसाच त्याने अजून एक अभिनव शोध लावला – भारतीय सैन्यातील परिचय क्रमांकाप्रमाणे PIN चा (Personal Identification Number) शोध ! सुरूवातीला त्याने हा क्रमांक सहा अंकी करण्याचे ठरवले. पण त्याच्या पत्नीने – कॅरोलिनने तक्रार केली की सहा अंकी क्रमांक फार लांबलचक होतो, म्हणून त्याने तो चार अंकी केला. त्याची आठवण सांगतांना त्याने म्हटले की, “स्वयंपाकाच्या मेजावर चर्चा करतांना ती म्हणाली की, चार अंक सहजपणे तिच्या लक्षात रहातात. मग काय? चार अंकी क्रमांकाला मिळून गेला जागतिक दर्जा.”   

ही गोष्ट शक्य होण्याचे कारण म्हणजे भारतीय प्रतिभावान गणितज्ञ – श्रीनिवास रामानुजन — अपारंपारिक प्रतिभावान गणितज्ञ – श्रीनिवास रामानुजन् यांनी गणिताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतले नव्हते आणि मद्रास विद्यापीठातही त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नव्हते. परंतु त्यांचे मद्रास पोर्ट ट्रस्टमधील कार्यालयीन वरिष्ठ, जे इंग्लिश होते, त्यांनी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधील प्राध्यापक हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यास त्यांना उद्युक्त केले. श्रीनिवास रामानुजन् यांनी आपली गणितीय समीकरणे मांडून एक भले मोठे पत्र लिहिले, ज्यामुळे प्रा. हार्डी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी कुठल्याही पूर्वपरीक्षेशिवाय, इतकेच काय, अत्यंत कठीण समजली जाणारी ‘ट्रायपॉस परीक्षा’ पास होण्याच्या अटीशिवाय श्रीनिवास रामानुजन् यांचा कॉलेज-प्रवेश नक्की करून टाकला. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजने सर्व नियम मोडून टाकून त्यांना कॉलेज-प्रवेश दिला नसता, तर त्यांना आपल्या ‘विभाजन सिद्धांता’ने प्राप्त झालेल्या जागतिक ख्यातीला वंचित व्हावे लागले असते, यात शंकाच नाही. 

जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यंत्रामध्ये सरकवता आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम यंत्राने द्यावी, असे फर्मावता – तेव्हा यंत्र तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचे विभाजन – रामानुजन् ‘विभाजन सिद्धांता’नुसार करून ती तुमच्या हाती पडेल, असे बघते. जसे की पुढीलप्रमाणे :-                           

अंकगणितात सकारात्मक पूर्णांकांचे विभाजन (n), जे पूर्णांक विभाजन म्हटले जाते, ती ‘n’ ही सकारात्मक पूर्णांकांची बेरीज पद्धति आहे. दोन बेरजा ज्या दोन किंवा अधिक प्रमाणात वेगवेगळ्या निर्दिष्टांमध्ये दर्शविल्या असतील, त्याही समान विभाजन मानल्या जातील.                                                                                                                     

उदा. “४” ह्या संख्येचे विभाजन पाच प्रकारे करता येईल :-                                              

४  =   ३ + १                                                             

         २ + २                                                                   

         २ + १ + १                                                              

         १ + १ + १  + १                                                                                                   

 हे स्वयंचलित रोखीचे यंत्र ह्या श्रीनिवास रामानुजन् यांच्या ‘विभाजन सिद्धांता’नुसार बरोबर रकम रोख अदा करते.

(एक छानशी टिप :- श्रीनिवास रामानुजन नावाच्या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञांच्या नावाने ‘रामानुजन समेशन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मालिकेबद्दल तुमच्यापैकी जे अपरिचित आहेत त्यांच्यासाठी: – त्यात असे नमूद केले आहे की तुम्ही सर्व नैसर्गिक संख्या जोडल्यास, म्हणजे 1, 2, 3, 4, आणि असेच, अनंतापर्यंत सर्व मार्ग, तुम्हाला ते  -1/12 च्या बरोबरीचे आढळेल.) 

तर, दोन अत्यंत आदर्श सद्गृहस्थ, जे कधीही एकमेकांना भेटले नाहीत आणि ज्यांनी आपल्या संशोधनाच्या/कल्पनेच्या स्वामित्वहक्काबद्दल जराही फिकीर केली नाही, त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार म्हणजे स्वयंचलित रोखीच्या यंत्राकडून तुमच्या हातात पडणारी रोकड !  

आता जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंचलित रोखीच्या यंत्रासमोर उभे रहाल, तेव्हा या दोन प्रतिभावंतांची जरूर आठवण करा – एक, ज्याला कल्पना सुचली आणि दुसरा, ज्याला स्वयंचलित रोखीचे यंत्र अवतरण्यापूर्वी त्याच्यासाठी वापरायची गणिती कार्यपद्धती सुचली.   

(मूळ इंग्लिश लघुलेखाचे हे रूपांतर आहे.)

मूळ लेखक:  अज्ञात

अनुवाद : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अतिप्राचीन अतिप्रगत हिंदुस्तानी संख्या मापन… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ अतिप्राचीन अतिप्रगत हिंदुस्तानी संख्या मापन☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा.

१०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००

एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.

मोजा आणि इतरांनाही सांगा….. 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १५ ते २१  — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १५ ते २१ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १५ ते २१

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पंधरा ते एकवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

उ॒त यो मानु॑षे॒ष्वा यश॑श्च॒क्रे असा॒म्या । अ॒स्माक॑मु॒दरे॒ष्वा ॥ १५ ॥

समस्त मनुजांनी पाहिली यशोपताका यांची

यशोदुन्दुभी दिगंत झाली दाही दिशांना यांची

अपुल्या उदरामध्ये यांनी कीर्तीपद रचियले 

त्यायोगे ते विश्वामध्ये कीर्तिमंत जाहले ||१५||

परा॑ मे यन्ति धी॒तयो॒ गावो॒ न गव्यू॑ती॒रनु॑ । इ॒च्छन्ती॑रुरु॒चक्ष॑सम् ॥ १६ ॥

किती प्रार्थना रचुन गाईल्या भक्तीप्रेमाने 

त्यांच्याचिकडे  वळूनी येती किती आर्ततेने

बुभुक्षीत झालेल्या धेनु घराकडे वळती

अमुची अर्चना अर्पित होते यांच्या चरणांप्रती ||१६|| 

सं नु वो॑चावहै॒ पुन॒र्यतो॑ मे॒ मध्वाभृ॑तम् । होते॑व॒ क्षद॑से प्रि॒यम् ॥ १७ ॥

देवांनो या वेदीवरती करण्या संभाषण 

तुम्ही येता करीन हवीला भक्तीने अर्पण

स्वीकारुनी घेण्याला आहे हवी सिद्ध आतुर

झणि येउनिया यज्ञी करी रे हविर्भाग स्वीकार ||१७||

दर्शं॒ रथ॒मधि॒ क्षमि॑ । ए॒दर्शं॒ नु वि॒श्वद॑र्शतं॒ ता जु॑षत मे॒ गिरः॑ ॥ १८ ॥

दिव्य रूपाने विश्वामध्ये ख्यातनाम झाला 

धन्य जाहलो आज जाहले दर्शन हो मजला 

या अवनीवर शकट तयाचा नयनांनी देखिला

प्रसन्न होऊनी मम स्तोत्रांचा स्वीकार केला ||१८||

इ॒मं मे॑ वरुण श्रुधी॒ हव॑म॒द्या च॑ मृळय । त्वाम॑व॒स्युरा च॑के ॥ १९ ॥

वरूण देवा साद घालितो माझ्या जवळी या

अक्षय मजला सुखा अर्पिण्या वर द्यायला या

मनात धरिल्या कामनेची मम पूर्ति कराया या

पूर्ण कृपेचा आशीर्वच आम्हाला द्याया या ||१९||

त्वं विश्व॑स्य मेधिर दि॒वश्च॒ ग्मश्च॑ राजसि । स याम॑नि॒ प्रति॑ श्रुधि ॥ २० ॥

प्रज्ञामती हे चंडप्रतापी थोर तुम्ही देवा 

अवनीवरती स्वर्गामध्ये तुमचे सुराज्य देवा

तुमच्या चरणी आर्जव अमुचे लीन होउनी देवा 

पदरी अमुच्या आश्वासन देउनिया जावे देवा ||२०||

उदु॑त्त॒मं मु॑मुग्धि नो॒ वि पाशं॑ मध्य॒मं चृ॑त । अवा॑ध॒मानि॑ जी॒वसे॑ ॥ २१ ॥

पाश-बंधने आम्हावरची शिथील कर देवा

चिरायु होउन आयुष्याचा भोग आम्ही घ्यावा 

किती जखडती कायेच्या मध्ये खाली  बंधने

मुक्त करी या पाशांमधुनी अपुल्या आशिर्वचने ||२१||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीत रुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/khU_eGlo-GY

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21

Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कोदंड राम मंदिर”… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(कृपया फोटो मोठा करून पहावा.)

? इंद्रधनुष्य ?

☆ “कोदंड राम मंदिर”…  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश येथील हे कोदंड राम मंदिर…

भारतात सुई सुद्धा बनत नव्हती असं ज्या देशद्रोहीना वाटतं, त्यांनी नीट बघावं म्हणून ही पोस्ट.

कागदावरही जे रेखाटणे अवघड आहे ते दगडात कोरलेले आहे.  आपल्या पूर्वजांच्या हातातून जणू काही देवाने घडवून आणलेले शिल्प आहे हे.

कोदंडराम मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्ह्यातील गोल्लाला ममिदादा येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे . हे मंदिर विष्णूचा सातवा अवतार रामाला समर्पित आहे . हे गोदावरीची उपनदी तुळयभागाच्या (अंतरवाहिनी) काठावर बांधले गेले .

हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्यकलेसाठी आणि दोन विशाल गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे जे १६० – १७० फूट ( ४९ – ५२ मीटर) आणि २०० – २१० फूट (६१ – ६४ मीटर) उंच आहेत. मंदिरातील गोपुरम रामायण , महाभारत आणि भागवतातील दृश्ये दर्शविणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरीव मूर्तींनी सुशोभित केलेले आहेत . मंदिराचे बांधकाम १८८९ मध्ये सुरू झाले, जेव्हा द्वारमपुडी सुब्बी रेड्डी आणि रामी रेड्डी या भावांनी जमीन दान केली आणि राम आणि सीतेच्या लाकडी मूर्ती असलेले छोटे मंदिर बांधले . एक मोठे मंदिर १९३९ मध्ये बांधले गेले. दोन गोपुरम १९४८ – ५० आणि १९५६ -५८ मध्ये बांधले गेले.

मंदिराला ‘चिन्ना भद्राडी’ किंवा ‘छोटे भद्राचलम ‘ असेही म्हणतात. हे आंध्र प्रदेशातील वोंटीमिट्टा येथील कोडंडराम मंदिरासह दोन सर्वात लोकप्रिय राम मंदिरांपैकी एक आहे. श्री राम नवमी हा मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात प्रमुख सण आहे आणि त्यात राम आणि सीता यांचा वार्षिक विवाह सोहळा असतो. मंदिरात साजरे होणारे इतर महत्त्वाचे सण म्हणजे वैकुंठ एकादशी आणि विजयादशमी.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हा औरंग मज प्यारा !… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ हा औरंग मज प्यारा !… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अबुल मुजफ्फर मुहउद्दीन मुहमद हे नाव वाचून फार बोध होणार नाही कदाचित. पण औरंगजेब हे नाव हा देश आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र कसा विसरू शकेल? औरंगजेब म्हणजे सिंहासनरत्न. आणि यालाच आलमगीर अशी उपाधी होती… म्हणजे जगज्जेता! छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूरायांच्या महाराष्ट्राच्या मातीतच या औरंगजेबाला मूठमाती द्यावी लागली. पण आपल्या स्मरणात हा धर्मांध,पाषाणहृदयी आणि सत्तापिपासु औरंगजेबही ठाण मांडून बसला आहे. 

पण हेच नाव धारण करणारा आणखी एक भारतीय आपण पुन्हा आठवला पाहिजे… आणि स्मरणातही ठेवला पाहिजे… औरंगजेब महम्म्द खान असे या वीराचे नाव…रायफलमॅन औरंगजेब खान… भारतीय सेना ! 

रायफलमॅन औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ भारतीय लष्करात जम्मू अ‍ॅन्ड कश्मीर लाईट इन्फंट्री मध्ये सैनिकी सेवा करून निवृत्त झाले आहेत. एक भाऊ आधीच सैन्यात आहे. रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या एका काकांनी दहशतवादी विरोधी कारवाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. यांचे आणखी दोन भाऊ मोहम्मद तारीख आणि मोहम्मद शब्बीर प्रादेशिक सेनेत भरती होऊन देशसेवा करत आहेत. 

हे औरंगजेब खान जम्मू-कश्मीरच्या ४४व्या राष्ट्रीय रायफल्स जम्मू अ‍ॅन्ड कश्मिर लाईट इन्फंट्रीमधील वीर शिपाईगडी…तरणेबांड,नीडर नौजवान..२०१२ मध्ये भरती झालेले.  सैनिकी संस्कार रक्तात भिनलेले औरंगजेब सैनिक सोडून दुसरे काहीही होण्यासाठी जन्मालाच आलेले नव्हतेच मुळात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून औरंगजेब यांनी फौजी वर्दी अंगावर चढवली. भारतात घुसलेले परकीय दहशतवादी आणि देशाशी बेईमान असलेले स्थानिक माथेफिरू यांच्याविरुद्ध भारतीय सेनेच्या सुरू असलेल्या अनेक कारवायांमध्ये रायफलमॅन औरंगजेब खान आघाडीवर होते. 

२०१८ हे वर्ष भारतीय सैन्य आणि अतिरेकी यांच्या संघर्षात भारताच्या बाजूने झुकते माप टाकणारे सिद्ध झाले होते. ४४,राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटने या वर्षी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल १९ अतिरेक्यांना त्यांच्या ‘आखरी अंजाम तक’ जाण्यात मोठी मदतच केली होती. ह्या युनिटच्या प्रवेशद्वाराबाहेर एक वाक्य लिहिलेला फलक आहे…त्यावर लिहिलेलं आहे…’ आज कॉन्टॅक्ट होगा ! म्हणजे आज आपली आणि अतिरेक्यांची समोरासमोर भेट होणारच आहे…तयारीत रहा गड्यांनो ! ….. ‘ 

अतिरेकीविरोधी कारवाई धडाक्यात सुरू होती…अनेक अतिरेकी मारले जात होते…त्यात एक मोठे नाव होते… समीर अहमद भट उर्फ टायगर ! हा हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर होता. यानेच मेजर मोहित शुक्ल यांना ‘मला मारून दाखव’ असे आव्हान विडीओद्वारे दिले होते. मेजर शुक्लसाहेबांनी त्याला त्याची विडीओ-धमकी चोवीस तास जुनी व्हायच्या आतच यमसदनी धाडला !

स्थानिक भागाची, इथल्या तरुणांच्या मानसिकतेची, त्यांच्या शक्ती आणि मर्मस्थळांची उत्तम माहिती असलेले औरंगजेब म्हणजे भारतीय सेनेच्या हातात असलेले अमोघ अस्त्रच बनले होते. अनेक धाडसी कारवायांमध्ये औरंगजेब सहभागी होते. अशाच एका कारवाईत बारामुल्ला मध्ये औरंगजेब यांनी एका जखमी सैनिकाचे प्राण वाचवताना तीन अतिरेक्याना ठार केले होते.

ईद जवळ आली होती. रायफलमॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी निघाले होते. सैनिकांना सुट्टीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जाण्याची अनुमती नसते. म्हणून औरंगजेब नि:शस्त्र होते. आपल्या युनिटच्या जवळूनच त्यांनी एका खाजगी कार चालकाकडे बसस्टॅन्डपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट घेतली. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हालाचालींवर शत्रूची नजर होती. कुणी तरी फितुरही झाले असावे बहुदा !  कार युनिटपासून दूर गेल्यावर लगेच त्यांच्यावर हल्ला केला गेला. कारमधून ओढून घेऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. दूर जंगलात नेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. काश्मीर खो-यातील जे तरुण देशाच्या बाजूने उभे आहेत, त्यांना धाक दाखवण्यासाठी, मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्या अतिरेक्यांनी औरंगजेब यांचा विडीओ बनवून प्रसारित करण्याचा घाट घातला होता. त्यांना वाटले असावे…हा गडी घाबरेल..प्राणांची भीक मागेल ! पण यातले काहीही झाले नाही. रायफलमॅन औरंगजेब यांनी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितले…” फौजी हूं….मौत से कैसा डर? मै अपना फर्ज निभा रहा हूं….तुम्हे जो करना है कर सकते हो !” आणि हे सांगताना औरंगजेब यांच्या चेह-यावर भीती नावाच्या भावनेचा लवलेशही नव्हता. आणि अर्थातच याचा त्या अतिरेक्यांना प्रचंड संताप आला असावा….त्यांनी तब्बल दहा दिवस त्यांना अमानुषपणे छळले आणि दहाव्या दिवशी रायफलच्या गोळ्यांनी छिन्न विछीन्न झालेला औरंगजेब यांचा देह रस्त्यावर टाकून ते अतिरेकी जंगलात पळून गेले ! दिवस होता १४ जून २०१८. 

रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या अंत्ययात्रेस हजारोंचा जनसमुदाय लोटला होता… अतिरेक्यांच्या अंत्ययात्रांना जमतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ! भारतीय सैन्याने पूर्ण सैनिकी सन्मानाने त्यांना अंतिम निरोप दिला. या अलौकिक त्यागाची दखल घेत भारतीय सेनेने औरंगजेब यांना १४ ऑगस्ट २०१८ या दिवशी मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या जन्मगावातील काही तरुण गल्फ देशांमध्ये नोकरीस होते. त्यांनी भारतीय लष्करी दलांत सामील होऊन औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या नोक-या सोडून भारतात परतण्याचा निर्णय जाहीर केला… या बलिदानाच्या काहीच महिन्यानंतर औरंगजेब यांना मारण्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या सैन्याने ठार केला. दुस-या वर्षीच औरंगजेब यांचे दोन धाकटे भाऊ प्रादेशिक सेनेत भरती झाले ! एका बलिदानाने देशाला आणखी काही सैनिक मिळवून दिले होते…ही बलिदानाची किमया… हुतात्म्यांच्या रक्ताच्या एक-एका थेंबातून एक एक सैनिक तयार होऊ शकतो… म्हणून बलिदाने सातत्याने तरुणांच्या नजरेसमोर असायला पाहिजेत ! 

१० मे २०२३ रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी एका विशेष समारंभात या शूर हुतात्मा सैनिकाच्या माता-पित्याकडे, महमद हनीफ आणि राजबेगम यांच्याकडे त्यांच्या बहादूर मुलाने मिळवलेले शौर्यचक्र सुपूर्द केले ! या कार्यक्रमात मेजर आदित्य कुमार (10,गढवाल रायफल्स) मुदस्सीर अहमद शेख (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर शौर्य चक्र, कॉन्स्टेबल रोहित कुमार (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांने अत्यंत दु:खद अंत:करणाने हे पुरस्कार स्विकारले. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी शिष्टाचार बाजूला सारत वीरपत्नी आणि वीरमातांना स्वत: पुढे होऊन आलिंगन दिले… त्यांचे अश्रू पुसले… आणि सारा भारत देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… असा संदेश दिला. 

या भावपूर्ण समारंभात महामहिम राष्ट्रपती महोदयांनी विविध संरक्षण सेवांमधील शूरांना एकूण आठ कीर्ती चक्र (यात पाच मरणोत्तर), एकोणतीस शौर्य चक्र (यातील पाच मरणोत्तर) प्रदान केली. डिफेन्स इनव्हेस्टीचर नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण समारंभ वर्षातून एकदा आयोजित केला जातो. याचे चित्रण दूरचित्रवाणी बातम्यांमध्ये दाखवले जाते. असे समारंभ खरे तर राष्ट्रीय महत्त्वाचे ठरावेत, शाळांतून-महाविद्यालयांतून याची माहिती दिली गेली पाहिजे.  

या लेखातील सर्व छायाचित्रे नीट पहावीत, अशी विनंती आहे. हुतात्मा औरंगजेब यांना अखेरची सलामी दिली जात आहे आणि त्याच छायाचित्रात अतिरेक्यांच्या मगरमिठीत असतानाही नीडर राहिलेले औरंगजेब, त्यांच्या आई-वडीलांनी शौर्यचक्र स्विकारल्यानंतर मा.राष्ट्रपती महोदयांनी त्यांना हात जोडून केलेले अभिवादन, औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ सैन्यात सामील झाले तेंव्हा त्यांच्या आईच्या चेह-यावरील अभिमान,मा.राष्ट्रपती महोदयांनी वीरमातेला दिलेले सांत्वन-आलिंगन ! हर तस्वीर कुछ कहना चाहती है ! यह देश कब सुनेगा उनकी बाते? सत्ता-संघर्ष, ख-या ख-या पैशांची क्रिकेट-सर्कस, राजकीय-सामाजिक आंदोलनं, मौज-मज्जा यांच्या गदारोळात हे असे महान समारंभ एका बाजूला राहतात….हे खेदजनक आहे, हे कुणीही मान्यच करेल ! 

… कोण जाणे, हे वाचून कुणी औरंगजेब सेनेची वर्दी शरीरावर परिधान करून देशरक्षणार्थ पुढे सरसावेलही !  जयहिंद !!!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

आज ३ जून २०२३, म्हणजेच ‘जागतिक सायकल दिन’ आहे. त्या निमित्याने आमच्या संकुलात गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एका उपक्रमाची आठवण झाली. त्याविषयी सांगेनच, पण आधी जाणून घेऊ या खास दिवसाबद्दल. सायकल चालवणे हा व्यायामाचा एक स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा जागतिक सायकल दिवस (वर्ल्ड बायसिकल डे) म्हणून घोषित केला.

आता सायकल चालवण्याचे मुख्य फायदे बघू या.

  • नियमित सायकल चालवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण तर होतेच पण वयानुसार कमी झालेली ही शक्ती वृद्धिंगत होते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती फार महत्वाची असते.
  • सायकलिंग वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय सुधारणे, स्नायू मजबूत करणे याशिवाय चरबी जाळणे, या सर्वांतून प्रति तास सुमारे ३०० कॅलरीज जाळल्या जातात.
  • सायकलिंगमुळे हृदयाची तंदुरुस्ती वाढते. नियमित सायकल चालवल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. दररोज नियमितरित्या फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्के कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • सायकलिंग शरीराची लवचिकता आणि स्नायू तसेच सांधे यांची संयुक्त गतिशीलता सुधारते. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा व्यायामाचा अत्युत्तम प्रकार आहे.
  • सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच, आपले मानसिक आरोग्य सुधारण्यात सायकल चालवण्याचा हातभार लागतो. व्यायामामुळे एंडोर्फिन (Endorphin) नामक संप्रेरक (hormone) शरीरात निर्माण होतात, यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात. यासोबत निसर्गाचा आनंद लुटतांना, रोजच्या कंटाळवाण्या कामातून ब्रेक घेतांना आपला मूड छान असतो आणि चिंता अन नैराश्य हे दूर जातात. मंडळी, असे निरोगी शरीर अन निरोगी मन असेल तर सायकल एकटयाने काय किंवा ग्रुप मध्ये काय चालवण्याची मजा न्यारीच!
  • सायकलिंगमुळे आपले जीवाश्म ईंधनावर, अर्थात fossil fuel (उदा. पेट्रोल) खर्च होणारे पैसे वाचतात. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वायूचा वापर करणाऱ्या वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होते. यात विजेचीही बचत होऊ शकते. आजकाल विजेवर चालणारी वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

सायकल चालवा अभियान

कांही देश तर आपल्या नागरिकांनी सायकल चालवावी म्हणून विशेष अभियान राबवत आहेत. नेदरलँड या देशाने खूप आधीपासून ‘सायकलिंग हॉटबेड’ म्हणून ख्याती मिळवली आहे, बघा ना, सध्या बाईक (सायकल) ची संख्या २३ दशलक्ष) आणि रहिवासी १७ दशलक्ष! अर्थातच सायकल चालवणाऱ्या व्यक्तींमध्ये हा देश नंबर एक आहे. इथे सायकल चालवणाऱ्या नागरिकांना चक्क पैसे दिल्या जातात. २००६ पासून इथल्या कांही व्यावसायिकांनी बाइक चालवणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर (किमी) कांही युरो देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे कंपन्या आणि कर्मचारी दोघेही आनंदी आहेत. या योजनेप्रमाणे जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस दररोज १० किमी सायकल चालवली, तर तुम्ही योजनेतून वर्षाला सुमारे ४५० युरो कमवू शकता (आता हे आकडे नक्कीच वाढले असतील). या व्यतिरिक्त जर अजून जास्त प्रमाणात सायकल चालवली तर पुरस्कार देण्यात येतात. 

येथील डच सरकारने २०१८ ते २०२१ पर्यंत लोकांना सायकल चालवण्यासाठी आणि कामावर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात सायकलिंगच्या पायाभूत सुविधांवर सुमारे ४०० दशलक्ष युरो खर्च करण्याचे ठरवले होते. मैत्रांनो, यासाठी १५ मार्ग केवळ सायकलस्वारांसाठी ‘सायकलस्वार फ्रीवे’ बनवणे आणि सायकलसाठी २५००० आणखी पार्किंगसाठी स्थानके निर्माण करणे या सुविधा देण्याचे उद्दिष्ट होते. वरील सर्व आकडे कोरोना काळाच्या आधीचे (२०१८) आहेत) हे वर्णन यासाठी केले की कुठल्याही योजनेत सरकार, खाजगी व्यावसायिक कंपन्या आणि नागरिक यांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरते. 

या बाबतीत नेदरलँड सर्वात पुढे असले तरी इटली, फ्रांस आणि बेल्जियम या इतर युरोपियन देशांमध्ये हे कार्य सुरु झाले आहे. न्यूझीलंडमध्ये देखील या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्या जात आहे. जपानमध्ये देखील सायकल अतिशय प्रचलित वाहन आहे. मैत्रांनो आपल्या देशात सुद्धा सायकलिंगला उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. यात अग्रगण्य नांव आहे Cyclop. तसेच या संबंधी कांही ऍप्स देखील प्रचलित आहेत. या संस्था आणि ऍप विषयी संबंधितांनी अधिक माहिती नेटवरून जाणून घेणे आणि त्यांत सहभागी होणे हिताचे ठरेल. आपल्या माहितीनुसार आपल्या शहरात मोफत सायकल स्टॅन्ड असतील, सरकारतर्फे सायकली पुरवल्या जात असतील किंवा सायकल ट्रॅक असतील तर त्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकल्यास लोक त्या सोयीचा वापर करतील.

रुणवाल गार्डन सिटीचा ‘साइक्लोफन-अर्थ डे २०२३

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ म्हणजेच सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे. म्हणूनच शरीर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सर्व कर्तव्ये आणि कार्ये या शरीराद्वारेच पार पाडावी लागतात. त्यामुळे या मौल्यवान देहाचे रक्षण करणे व त्याचे आरोग्य राखणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. हाच विचार करून रुणवाल गार्डन सिटी मध्ये मागील वर्षी प्रथमच सायक्लोफन-२०२२ हा उपक्रम कार्यान्वित केला होता. मागील वर्षी आमच्या पहिल्या सायक्लोफनच्या सांगतेच्या दिवशी, ठाण्याचे प्रसिद्ध बायसिकल मेयर, .श्री चिराग शहा यांनी प्रमुख अतिथि या नात्याने उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच खूप प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेचे फलित म्हणजे या वर्षी देखील हा उपक्रम राबवल्या गेला.

या आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या २२ ते ३० एप्रिलच्या अवधीत (कुठल्याही ७ दिवसात) सायकलिंग करणाऱ्यांना दररोज ५ किमी प्रमाणे किमान ३५ किमी असे अंतर, किंवा याच अवधी मध्ये दररोज ३ किमी पायी चालत, किमान २१ किमी असे अंतर पूर्ण करायचे होते. हा माफक चॅलेंज होता. परंतू चालणे, सायकल चालवणे किंवा तत्सम कुठलाही व्यायाम न करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज तसा भारीच होता. मुलांच्या नुकत्याच सुट्ट्या होऊ घातलेल्या आणि बहुतेकांचे मे महिन्यात बाहेरगावी जाणे असल्याने ‘विश्व वसुंधरा दिवसाचे’   (World Earth Day) निमित्य साधत २२ एप्रिल पासून हा इव्हेंट सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे मुलांचा सायकल चालवण्यात सहभाग अतिशय कौतुकास्पद होता. दिलेल्या अवधीत जास्तीतजास्त किमी पार करणाऱ्या सायकलस्वाराला आणि पायी चालणाऱ्याला बक्षीस होते. संपूर्ण कुटुंबाने भाग घेतल्यास वेगळे बक्षीस होते.

आमचे कुटुंब यात दर वर्षीप्रमाणे सहभागी होतेच. माझे कुटुंबीय सायकल चालवीत होते. मी मात्र चालण्यात समाधान मानले. रामप्रहरी चालल्यास ऊन आणि घामापासून सुटका असायची. यात कांही लोकांना (मी यात होते) सकाळी उठोनि चालायची खंडित झालेली सवय मात्र परत लागली. यात सहभाग घेणाऱ्यास STRAVA किंवा इतर कुठलेही ऍप वापरून सायकल चालवण्याचे किंवा पायी चालण्याचे किमी रेकॉर्ड करून त्यांचा “पुरावा” आयोजकांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच निसर्गरम्य स्थानांचे आणि सेल्फी, या सर्व फोटोंचे ‘CycloFUN-2023’ या व्हॅट्सऍप ग्रुप मध्ये स्वागतच असायचे. यात गंमत म्हणजे तुम्ही नोंदणी करतांना तुमचा किंवा तुमची जोडीदार असणे आवश्यक होते. शक्य असल्यास जोडीदाराबरोबर सायकल चालवणे किंवा पायी चालणे, सोबत सेल्फी काढणे वगैरे कार्यक्रम आपसूकच झाले.

या विषयाच्या उत्तरार्धात ‘सायक्लोफन-२०२३’ चे आमचे अनुभव आणि ३० एप्रिल २०२३ ला झालेल्या या उपक्रमाच्या सांगतेचा वृत्तांत सादर करीन. अगदी लवकरच भेटू या. 

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप :

  • या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.
  • या लेखासोबत दिलेल्या भित्तिचित्रांचे (wall painting) किंवा अन्य फोटो वैयक्तिक आहेत. ही सुंदर भित्तिचित्रे आमच्या संकुलाच्या जवळपासच्या परिसरातील आहेत.
  • हा लेख माझे नाव आणि फोन नंबर यासकट अग्रेषित करावा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ♻️ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… 🌻 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या नेतृत्वाखाली १९७३ पासून दर वर्षी ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ आयोजित केला जातो. २०२३ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे ‘Beat Plastic Pollution’ अर्थात ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात करा’, कारण वाढते प्लास्टिक प्रदूषण हे पर्यावरण प्रदूषणाचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी ४०० दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिकचे उत्पादन केले जाते, त्यातील निम्मे प्लास्टिक एकदाच वापरण्यासाठी (एकल वापर प्लास्टिक अर्थात सिंगल यूज प्लास्टिक) डिझाइन केलेले आहे. म्हणूनच आजच्या काळाची नितांत गरज बनलेल्या २०२३ च्या थीमच्या अंतर्गत प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याविषयी सार्वजनिक व निजी क्षेत्र तसेच नागरिकांचा सहभाग असलेले जागतिक उपक्रम राबवल्या जातील.

प्लास्टिक प्रदूषणाची कारणे

प्लॅस्टिकचे उत्पादन करतांना जीवाश्म इंधन वापरतात, जे ग्रीन हाऊस गॅस (कार्बन डाय ऑक्साईड) बाहेर टाकते आणि जागतिक तापमान वाढवते. एकल वापर प्लास्टिक, मुख्यत्वे करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ आणि पाण्याच्या बाटल्या यांचा अतिरेकी वापर हे वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. प्लास्टिक कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन (मुख्यत्वे कचऱ्याचे वर्गीकरण न करणे), कचराकुंडीच्या बाहेर किंवा इतरत्र प्लास्टिक फेकल्यास प्लास्टिक जलमार्ग आणि महासागरांमध्ये प्रवेश करून सागरी जीवन आणि पर्यावरणास हानी पोहोचवू शकते. या प्लास्टिकचे विघटन होण्यास १००० हून जास्त वर्षे लागतात, शिवाय हे विषारी रसायनाच्या रूपात विघटित झालेले प्लास्टिक पर्यावरण कलुषित करीत राहते. सागरी जीवनावर प्लास्टिक प्रदूषणाचा परिणाम होतो. महासागरांतील कासव, मासे आणि इतर जलचरांच्या जीवांची हानी होते. तसेच जलमार्ग प्रभावित होतात. नद्या आणि नाले प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबू शकतात, ज्यामुळे पूर आणि प्रदूषण होते. यात आपल्या पिण्याचे पाणी देखील प्रदूषित होते. यामुळे जैवविविधता (biodiversity) कमी होत आहे. प्लास्टिकच्या विषारी रसायनांनी मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याचे मार्ग

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याकरता रिड्यूस, रीयूज और रीसायकल, हे तीन आवश्यक R अर्थात उपाय आहेत. एकल वापर प्लास्टिकचा वापर कमी करून त्याऐवजी शाश्वत पर्याय अर्थात नैसर्गिक साहित्य वापरावे. या लढ्यात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. सामाजिक जागरूकता अभियान, तसेच समाज प्रबोधन यासाठी समाज माध्यमे खूप परिणामकारक ठरतात. एकल-वापरणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर मर्यादित करणारी सरकारी धोरणे आणि नियम यांचे पूर्ण कसोशीने पालन करणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी समुद्रकिनारे, बगीचे, इतर सार्वजनिक ठिकाणे आणि संकुलात स्वच्छता अभियान आयोजित करून आपण प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करू शकतो.

‘स्वच्छ रुणवाल’ अभियान 

मैत्रांनो, आपण प्लास्टिकचा वापर करतोच, पण ते आपल्या घराबाहेर, संकुलाच्या परिसरात, रस्त्यांवर तसेच कचराकुंडीच्या असतानाही तिच्या बाहेर हा कचरा टाकतो. हे कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. या दृष्टीने रुणवाल गार्डन सिटी, ठाणे पश्चिम या आमच्या संकुलात जानेवारी २०१७ पासून ‘स्वच्छ रुणवाल’ हा उपक्रम कार्यान्वित आहे. बिस्लेरी-बॉटल फॉर चेंज, अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट, परिसर भगिनी विकास संघ, उर्जा फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ‘स्वच्छ रुणवाल’ हा प्रकल्प राबवल्या जात आहे. आजपावेतो आम्ही २७००० किलो पेक्षाही अधिक प्लास्टिक पुनर्वापर करण्याकरता दिलेले आहे, याचा रहिवासी आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांना (मी यात स्वयंसेवक आहे) रास्त अभिमान आहे. याच उपक्रमात इलेक्ट्रॉनिक कचरा आणि थर्माकोलचाही पुनर्वापर केल्या जातो. वृक्षारोपण मोहिमेद्वारे हिरवळ आणि स्वच्छतेला प्रोत्साहन दिल्या जाते. ठाणे लगतच्या समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी स्वच्छता मोहीमेत आमच्या कांही स्वयंसेवकांनी योगदान दिलेले आहे.

जानेवारी २०१७ मध्ये आम्ही प्लॅस्टिक संकलनाची सुरुवात केली. यात गोळा केलेला प्लास्टिक कचरा स्वयंसेवक त्यांच्या स्वतःच्या वाहनातून पुनर्वापरासाठी ऊर्जा फाउंडेशन केंद्रांमध्ये नेत असत. संकुलाचे योगदान वाढत गेले, म्हणून आम्ही ‘बॉटल फॉर चेंज’ आणि ‘अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट’ शी करार केला. ऑगस्ट २०१९ पासून याला चांगलीच गती मिळाली. आता एका आठवड्याआडच्या शनिवारी रुणवाल गार्डन सिटीच्या रहिवाशांनी प्लॅस्टिक कचरा इमारतींच्या ठराविक ठिकाणी जमा करून प्लास्टिक पुनर्वापराची मोहीम सुरू ठेवली आहे. आमचे संकुल ‘बॉटल फॉर चेंज’ च्या प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत आहे. यात ही संस्था तुमच्या सोसायटीमधून प्लास्टिक गोळा करण्यासाठी त्यांचे वाहन तुमच्या दारात पाठवते आणि त्यांच्या ऍपद्वारे हे काम करणे खूप सोपे असते. हे ऍप आमच्या सोसायटीने त्यांच्याकडे जमा केलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे नेमके वजन सांगते.

प्लॉगिंग

मंडळी, आमच्या संकुलात ‘प्लॉगिंग’ (म्हणजेच जॉगिंग किंवा इतर व्यायाम करता करता प्लास्टिकचा कचरा गोळा करणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे) देखील करण्यात येते. दर रविवारी आमच्या या प्रकल्पातील सदस्य आणि मुले हे विखुरलेले प्लास्टिक वेचून, तर कधी खोदून काढत सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे ते जमा करीत असतात. या व्यतिरिक्त कांही खास दिवशी (उदा. धुळवडीचा दुसरा दिवस- ८ मार्च २०२३ आणि जागतिक वसुंधरा दिन-२२ एप्रिल २०२३) हे काम जोमात सुरु असते.

जनजागरण

हे स्वयंसेवक जनजागरण करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीत. या संकुलातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात यांचे आवाहन असतेच! कधी समाजमाध्यमातीळ संदेश, व्हिडीओ (मुख्यतः व्हाट्स ऍप आणि फेस बुक) कधी भाषण तर कधी सुंदर पथनाट्य, कधी पोस्टर, पेन्टिंग स्पर्धा! या सर्व माध्यमातून हे काम अव्याहत सुरूच असते. अत्यंत आशाजनक आणि आनंददायी गोष्ट ही की, या उपक्रमात लहान मोठी मुले खूप उत्साहात आणि हिरीरीने सहभागी होतात.

पुरस्कार

या अभियानाला कित्येक पुरस्कार आणि प्रमाणपत्रे मिळाली आहेत. २०२३ विषयी सांगायचे तर, ८ मार्च रोजी झालेल्या ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधत, संजय भोईर प्रतिष्ठान तर्फे ‘उषा सखी सन्मान’ या कार्यक्रमात माननीय श्री संजय भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रुणवालच्या या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करण्यात आला. ११ एप्रिल २०२३ ला गोदरेज आणि बॉयस यांच्या सहकार्याने ‘द बेटर इंडिया’ ने सादर केलेला ‘सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्था पुरस्कार’ (स्वच्छ पुढाकार श्रेणीतील विजेते) रुणवाल गार्डन सिटी, ठाणेला मिळाला आहे. शहरांना राहण्यायोग्य अशी चांगली ठिकाणे बनवण्याच्या दिशेने एकत्रितपणे काम करणे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये त्याची अंमलबजावणी आणि जागरूकता निर्माण केल्याबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

मंडळी सामाजिक उपक्रम सरकारी असो वा खाजगी, तो नागरिकांच्या सहभागाशिवाय सिद्धीस जात नसतो. कुठल्याही उपक्रमाची सुरुवात स्वतः पासूनच होते. आपण सर्वांनी एकल वापर प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, प्लेट, डबे, भांडी, चमचे, स्ट्रॉ, कप इत्यादींचा वापर थांबवला पाहिजे. पर्यायी वस्तूंपासून बनलेले साहित्य (उदा. कापडी पिशव्या, स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, केळ्याच्या सालीपासून तयार केलेल्या प्लेट, वाट्या इत्यादी) वापरात आणल्यास कित्येक टन प्लास्टिकचा वापर थांबवता येईल. सरकारी पातळीवर प्रत्येक संकुलात कचऱ्याचे नियोजन करणे आणि प्लास्टिक वेगळे जमा करणे या योजना आधीच सुरु झाल्या आहेत, त्या यशस्वी करणे हे त्या रहिवाश्यांचे सामाजिक कर्तव्य आहे. ‘माझा प्लास्टिक कचरा, माझी जबाबदारी’ हा मंत्र ध्यानात ठेवत आपण या प्रकल्पात खारीचा वाटा उचलावा, असे मला वाटते. लक्षात असू द्या मंडळी, आपण पुनर्वापरासाठी दिलेले प्रत्येक प्लास्टिक हे हरित वसुंधरेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे !

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप-

वरील उपक्रमासंबंधी विडिओच्या लिंक लेखाच्या शेवटी दिलेल्या आहेत. या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.

कृपया प्रतिक्रिया अग्रेषित करायची असल्यास माझे नाव आणि फोन नंबर त्यात असू द्यावे!

https://m. facebook. com/story. php?story_fbid=6801541356538935&id=100000494153962&mibextid=Nif5oz

https://photos. app. goo. gl/Gtgj1jNfVn139nTJ6

https://fb. watch/kM4CvBc5Jo/?mibextid=RUbZ1f

Instagram: https://www. instagram. com/reel/Cq7Uvs1rT98/?igshid=YmMyMTA2M2Y=

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-10… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-10…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

 पाण्याची खोली मोजण्यासि

मीठ तेथ जाई बुडी मारण्यासि

स्वतःच तेथे विरघळून ते जाता

कशी पाण्याची खोली, मोजे हाता

आत्मभाव तुझा मापु न शकतो

माझा आत्मभाव तयात विरतो

एकरूप होता पाणी व लवण

कोण कोणा करी उपदेश जाण॥४६॥

 

नसे जिथे मी स्वतः, तुज जातो पाहू

आत्मरूपी लीन तूही, तुज कैसे पाहू॥४७॥

 

जागा राहुनिया निद्रेसि कसा पाहू

स्वरूपी एकरूप तुला कसा पाहू॥४८॥

 

अंधार असता प्रकाश नसे, परि

स्वतः असण्याची जाणीव उरी

अंधार दूर करि जरी सूर्यप्रकाश

पाहू न शके तो कधी अंधारास

जंव पाही मी तुजकडे चांगदेवा

मज दिसे केवळ आत्मस्वरूप ठेवा

मम स्वरूपे, पहावे तव स्वरूप

मम देह, तव देहाचे न पाही रूप

इंद्रियस्थ केवळ पाहणे, दिसणे

आत्मतत्वी भेटता, विरून जाणे॥४९॥

 

तव आत्मस्वरूपा मी शोधू जाता

माझे मीपण, तुझे तूपण नष्ट होता

अशा भेटी, अद्वैत आत्मतत्वांचे

घेशील सुख आत्मसाक्षात्काराचे॥५०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे 

३१ मे – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. मला एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श वाटते’? 

मार्मिक प्रश्न होता, अगदी ब्रह्मवादिनी गार्गी आणि मैत्रेयीपासून ते झाशीच्या राणीपर्यंत भारतीय इतिहासात आदर्शवत वाटू शकणाऱ्या खूप स्त्रिया आहेत पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आली ती एक शुभ्रवस्त्रावृता, विलक्षण बोलक्या डोळ्यांची एक कृश स्त्री जी आयुष्यभर केवळ इतरांसाठीच जगली. नगर जिल्ह्यातल्या जामखेड च्या चौंडी गावच्या एका साध्या धनगराची ही मुलगी, मल्हारराव होळकरांच्या दृष्टीला काय पडते, तिची कुवत त्यांच्या पारखी नजरेला काय समजते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी म्हणून ती आजच्या मध्य प्रदेशाच्या इंदौर संस्थानात काय येते आणि पूर्ण देशाच्या इतिहासात स्वतःचं नाव काय कोरते, सारंच अद्भुत. 

अहिल्याबाईना त्यांच्या खासगी आयुष्यात फार कमी सुखाचे दिवस लाभले. त्यांचे पती फार लवकर गेले. त्या काळच्या रीतीप्रमाणे सती जायला निघालेल्या अहिल्याबाईंना मल्हारबांनी मागे खेचलं, तिच्या राज्याप्रती असलेल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन. मल्हारबांच्या शब्दाखातर अहिल्याबाईनी सतीचे वाण खाली ठेवले आणि त्याबदलात अनेक लोकापवाद झेलले पण त्यानंतर जे आयुष्य त्या जगल्या ते निव्वळ व्रतस्थ होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले. थोरले बाजीराव पेशवे ते नारायणराव ही पेशवाईतली स्थित्यंतरे त्यांनी जवळून बघितली, पानिपतचा दारुण पराभव बघितला, राघोबादादाची कारस्थाने बघितली, ब्रिटिशांची भारत देशावरची हळूहळू घट्ट होणारी पकड बघितली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर इतकी राजकीय स्थित्यंतरं घडत असताना त्यानी होळकरांच्या त्या चिमुकल्या संस्थानात न्याय आणि सुबत्ता तर राखलीच, पण देशभर धर्माचे काम म्हणून मुसलमानांनी उध्वस्त केलेली मंदिरे परत बांधली, गोर गरीबांसाठी जागोजाग धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले, आणि हे सर्व केले ते स्वतःच्या खासगी मिळकतीतून. 

त्यांच्या दुर्दैवाने ज्या ज्या व्यक्तिवर त्यांनी जीव लावला त्या त्या व्यक्तीकडून त्यांच्या पदरी निराशाच आली. मुलगा व्यसनी, बदफैली निघाला. त्यांच्या डोळ्यासमोर मुलाचा करुण मृत्यू अहिल्याबाईंना बघावा लागला. अत्यंत लाडकी अशी त्यांची मुलगी मुक्ता, नवऱ्यामागे सती गेली. स्वतः सती जाण्यापासून मागे हटलेल्या अहिल्याबाई काही तिला थांबवू शकल्या नाहीत. तिचा मुलगा, त्यांचा नातू, तोही त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू पावला. हे सर्व आघात त्यांनी झेलले आणि जगल्या त्या निव्वळ रयतेसाठी. निष्कलंक चारित्र्याच्या, व्रतस्थ प्रशासक असलेल्या ह्या कणखर स्त्रीचे चारित्र्य खरोखरच प्रेरक असेच आहे. 

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान.. – लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान.. – लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ||

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||

एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य! 

माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही. 

या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले….दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही. 

काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.

भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.

थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते. 

सुजनहो!

मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही. 

पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय. 

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||

‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात…

भारुड शब्दाची व्युत्पत्ती:

भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं. 

भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.

भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:

गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो….

मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार….अशा असंख्य…! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली…यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.

भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड…

‘अग ग ग ग ग विंचू चावला…

विंचू चावला हो…

काम क्रोध विंचू चावला..

तेणे माझा प्राण चालला..’

माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ. 

पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच,  पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो. 

एकनाथ महाराज पुढे म्हणतात,   ‘…या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’

विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!

भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला. 

‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’

सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय…अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!

‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’

समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला….

‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला 

भवानीआई रोडगा वाहीन तुला….’

एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय…खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…

हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा… तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं…अधिक रमलं…

किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी! 

पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!

लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print