मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

तेलगू रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या

*  * 

मला एक प्रसंग आठवतो : पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैद्राबादला माझ्या एका नाट्यप्रेमी तेलगू मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री गप्पागोष्टींची एक मैफल जमली होती. बहुतेक मंडळी नाटक, गाणे, वाजवणे ह्यांतली होती. तेवढ्यात कुणीतरी मला पेटीवर मराठी नाटकातले एखादे पद वाजवण्याची फर्माइश केली. मी काय वाजवावे ह्या विचारात पट्ट्यांवर बोटांची चाळवाचाळव सुरू केली. मिश्रपिलूच्या अंगाने एकदोन जागा पेटीवर निघाल्या आणि त्या गच्चीच्या कोपऱ्यातून आवाज आला, “अय्योय्यो बालगंधर्वाऽऽ! ” एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. एक गोरापान, काळेभोर कुरळे केस असलेला, अंगावर रेशमी झब्बा, पांढरेशुभ्र धोतर नेसलेला देखणा गृहस्थ तिथून उठून सरळ माझ्यापर्यंत चालत आला आणि समोर बसून त्याने चक्क आपले दोन्ही हात माझ्यापुढे केले आणि माझे हात हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावून म्हणाला, “बाबूजीऽऽ यह बालगंधर्वका गाना आपके उंगलीमें आके बैठा है… सत्य वदे बजाना-” ‘सत्य वदे’ हे माझेही आवडते गाणे. मी वाजवायला सुरुवात केली. ‘अश्रुनीर वाहे डोळां’ अशा अवस्थेत तो गृहस्थ समोर बसून कुठे तरी पार हरवल्यासारखा ते ऐकत होता. हे अद्भुत घडताना पाहून आमचे इतर तेलगू मित्रही चकित झाले होते. हा तेलगू रंगभूमीवरचा आणि त्यानंतर शेकडो तेलगू बोलपटांतला *श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या. *

– – त्या नंतरची ती मैफिल म्हणजे मी बालगंधर्वांची आठवतील ती गाणी पेटीवर वाजवत होतो, जमतील तशी गात होतो आणि त्यातल्या प्रत्येक गाण्याचे तेलगू भाषेतले रूपांतर बालगंधर्वांच्या गायनाच्या ढंगाने, त्यातल्या गानसौंदर्यातली जागा न् जागा दाखवत रघुरामय्या गात होते. कर्नाटक संगीताचा वापर असलेल्या तेलगू रंगभूमीवर ह्या बालगंधर्वांच्या एकलव्यासारखी विद्या मिळवलेल्या शिष्याने सारी बालगंधर्व गायकी नेऊन असंख्य लोकांची मने जिंकली होती.

पस्तिशी-चाळिशीतला वाटावा असा हा रसरशीत माणूस मला भेटला त्या वेळी सत्तरीत शिरला होता. एक केस पिकला नव्हता. चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती. त्यानंतर पुढचे आठ दिवस मला एखाद्या लहान मुलासारखा धरून होता. विषय फक्त बालगंधर्व! बालगंधर्वांसारखाच लहानपणी रंगभूमीवर आला. नवव्या दहाव्या वर्षांपासून गायला लागला. एका नाटक कंपनीवाल्याने ह्याच्या शेतकरी बापाला जमिनीचा लहानसा तुकडा देऊन हा मुलगा विकत घेतला. कंपनीच्या भ्रमंतीत कुठल्याशा गावी नाटकात चांगले काम केल्याबद्दल तिथल्या सावकाराने “हे गाणे गात जा” म्हणून ह्या बालनटाला बालगंधर्वांची रेकॉर्ड दिली‌, ती ‘सत्य वदे’ची. रघुरामय्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, “वह यकच प्यालामें सुधाकर जैसा पहिले पियालेमे शराबी बन गया, वैसा येक सत्य वदे’की रेकॉर्डने हमको बालगंधर्वका चरणरज बना दिया. ” रघुरामय्यांचा तो ‘चरणरज’ आजही माझ्या कानात आहे. ह्या रघुरामय्यांना आम्ही बालगंधर्व स्पर्धेची पारितोषिके द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याला बोलावले होते. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तीच मुळी, “हमने बालगंधर्वका उच्छिष्ट खाते खाते जिंदगी बितायी” ह्या वाक्याने. समोर श्रोत्यांत भीमसेन होते, हिराबाई होत्या, वसंतराव देशपांडे होते. गंधर्वप्रेमी रसिकांनी हॉल खचाखच भरला होता. आमच्या आग्रहावरून ह्या तेलगू भाषिक नटाने ‘मूर्तिमंत भीति उभी’ म्हटले. शंभर टक्के बालगंधर्वांचे स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या गाण्याला सार्‍या सभेने डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी दाद दिली. ते एक अद्भुत दृश्य होते. गंधर्व-गायकी त्याच्या रंध्रारंध्रांत भिनली होती. ती त्यांनी आत्मसात केली होती, केवळ भक्तिभावाने.

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. अशोक जैन आणि त्यांनी उभारलेली शाळा.

“ फक्त एकच खोली कशाला ? “

“ फक्त एकच खोली कशाला ? “ पूर्ण शाळाच बांध!” – आईच्या एका शब्दाखातर लेकाने उभारली तब्बल सात कोटीची शाळा…

राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील ‘दादाल’ गावातील एका शाळेची सध्या देशभर चर्चा होत आहे. ही शाळा चक्क ‘संसद भवना’ सारखी दिसते! पण या इमारतीपेक्षाही मोठी आहे ती यामागील भावना..

नेमकी गोष्ट काय? या गावातीलच सुपुत्र असलेले डॉ. अशोक जैन हे गेल्या ३१ वर्षांपासून अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण याच सरकारी शाळेत पूर्ण केले होते. जेव्हा ते गावी आले, तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना विनंती केली की, “शक्य असल्यास मुलांसाठी एक खोली बांधून द्या. “

आईचा तो शब्द आणि पालटलेले चित्र: अशोक जैन यांनी ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. तेव्हा आईने दिलेला सल्ला ऐतिहासिक ठरला. आई म्हणाली, “एका खोलीने काय होणार? मुलं खूप आहेत, तू पूर्ण शाळाच बांधून दे! “

आईचा शब्द मानून डॉ. अशोक जैन यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले. संसदेसारखी दिसणारी भव्य आणि आधुनिक इमारत उभारली. शाळेत सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या शाळेत शिकून मोठे झाले, त्याच शाळेला आज त्यांनी एक नवं रूप दिलं आहे.

अशा दानशूर सुपुत्राला आणि संस्कार देणाऱ्या मातेला सलाम!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांनी गीतांजलीतील १५ ते १६ कवितांची रचना परमेश्वराला पती, प्रियकर किंवा सखा मानून केलेली दिसते. कांही कवितांत हे नातं उघडपणे मांडलेलं आहे तर कांही कवितांत या भावनेला निसटता स्पर्श केल्याचे जाणवते.

परमेश्वर व भक्त जेव्हा परस्परात एकरूप होऊन जातात तेव्हा ती मधुरा भक्ती असते. त्यांच्यातल्या नात्याला पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी असे संबोधले जाऊ लागले. वैदिक काळापासून हिंदू धर्मात तसेच मुस्लिम व ख्रिस्ती धर्मातही अशा प्रकारचे उल्लेख आढळतात.

महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार – नवविधा भक्ती, सांगितली आहे.

१- श्रवण भक्ती: म्हणजे देवाच्या कथा, गुण, महात्म्य श्रद्धेने ऐकणे.

२- कीर्तन भक्ती: म्हणजे देवाची स्तुती भजन व गुणगान गाणे.

३- स्मरणभक्ती: परमेश्वराचे चिंतन करणे व त्याची निरंतर आठवण ठेवून नाम जप करणे.

४- पादसेवन भक्ती: यात देवाची किंवा संतांची चरण सेवा करणे.

५- अर्चना भक्ती: पूजेच्या साहित्याने देवाची बाह्य पूजा, आरती करणे.

६- वंदन भक्ती: देवाला नमस्कार करून प्रार्थना करणे.

७- दास्यभक्ती: देवाचा सेवक म्हणून त्याची तन-मनाने सेवा करणे.

८- सख्य भक्ती: देवाशी मैत्री करणे आणि आपले प्रत्येक कर्म त्याच्यासाठीच आहे याची जाणीव ठेवणे.

९- आत्मनिवेदन भक्ती: स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करणे. पूर्ण शरणागती पत्करणे. देहाभिमान नष्ट होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होईल असा प्रयत्न करणे.

आत्मनिवेदनात भगवंतावरील प्रेम, आसक्ती ही सर्वात तीव्र स्वरूपाची आहे. पण ही आसक्ती हे प्रेम मिळवायचे कसे? याचे उत्तर देण्यासाठी ऋषींनी काही अध्यात्मिक वृत्तींची माहिती दिली आहे. अत्युच्च पदापर्यंत जाण्याच्या पायऱ्याच म्हणानात! त्यांनाही भक्ती म्हणतात.

१- शांता भक्ती: यात आनंद- दुःख, यश- अपयश देवाचीच देणगी आहे म्हणून स्वीकारणे. त्यासाठी कोणतीही तक्रार न करणे.

२- सख्य भक्ती: म्हणजे साथीदार व सल्लागार प्रभूच असतो. नेहमी त्याच्या सांगण्यावरूनच भक्ताची कृती होत असते.

३- दास्यभक्ती: स्वतःला देवाचा सेवक मानणे म्हणजेच देवाला आपला स्वामी मानणे.

४- वात्सल्य भक्ती: म्हणजे देवाला आई-वडील मानून, प्रभु चरणाशी स्वतःला जोडणे.

५- मधुरा भक्ती: भक्त व देव यांच्यात अद्वैत निर्माण होणे. ज्याला नाव नाही, रूप नाही, कोणताही गुणधर्म नाही अशा परमतत्वात विलीन होण्याची तळमळ असणे.

वेद, उपनिषदे इत्यादींमधील वाङ्‍मयात ईश्वर व भक्त यांच्यामधील प्रेमसंबंधाच्या वर्णनात दांपत्यप्रेमाचे दाखले दिल्याची उदाहरणे आढळत असली, तरी तेथे ही भक्ती स्पष्टपणे मधुरा भक्तीच्या स्वरूपात आढळत नाही. मात्र गोपींनी कृष्णाची प्रेमस्वरूप भक्ती केली आणि त्यामुळे त्यांचा उध्दार झाला, या भागवतातील विवेचनामुळे मधुरा भक्तीची ही संकल्पना उदयाला आली, असे मानले जाते. या संकल्पनेनुसार भक्तांना ईश्वर प्रेमाच्या प्रचीतीसाठी गोपींप्रमाणे स्त्रीरूप स्वीकारण्याची आवश्यकता वाटू लागली. यामुळे, या प्रकारात भक्त लिंगविपर्यास मानतात. याउलट, ईश्वराला प्रेयसी व स्वत:ला प्रियकर मानून केल्या जाणाऱ्या सूफी साधू वगैरेंच्या भक्तीत असा लिंगविपर्यास मानण्याची आवश्यकता नसते.

कृष्ण हा जगातील एकमेव पुरूष असून, बाकी सर्व जीवात्मे कृष्णाची निसर्गतःच ओढ असलेल्या स्त्रिया आहेत, असा सिध्दांतही त्यासाठी निर्माण करण्यात आला. याचा परिणाम म्हणून पुरूषभक्तांनीदेखील स्त्रीवेष धारण करून भक्ती करावयास सुरवात केली. विरह, मीलन इत्यादींमध्ये स्त्रियांना ज्या विविध अवस्थांचा अनुभव येतो, त्या अवस्थांचा अनुभव पुरूषभक्तही घेऊ लागले. बंगालमधील चैतन्य गौरांग प्रभूंच्या वैष्णव संप्रदायात काही वेळा या गोष्टीचा इतका अतिरेक झाला, की पुरूषभक्ताला तो स्त्री बनल्यामुळे स्त्री प्रमाणे मासिक ऋतुप्राप्ती झाल्याचे मानून त्यानुसार वर्तन करण्याचे प्रकारही आढळू लागले.

मधुरा भक्तीमध्ये असे आगळेपण आढळत असल्यामुळे तिचे मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याचेही प्रयत्‍न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मधुरा भक्तीला काही जणांनी विकृती मानले, तर यात आश्चर्य नाही. मधुरा भक्तीमध्ये कामभावनेचे उदात्तीकरण होते, की कामभावनेचे रूपांतर होऊन मधुरा भक्ती ही एक वेगळीच अवस्था बनते, यांसारख्या प्रश्नांची मानसशास्त्रीय चर्चा करण्यात आली आहे. पुरूषभक्ताला स्त्रीवेष धारण करावा असे वाटणे ही विकृती आहे, की आणखी काही वेगळी अवस्था आहे, याचेही विवेचन करण्यात आले आहे.

परंतु एक सत्य मान्य केलेच पाहिजे की, पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी या नात्यातील अत्यंतिक उत्कटता, माधुर्य, समर्पण याकडे केवळ भक्तच नाही तर कवीही आकर्षित झाले. तद्वतच टागोरांना देखिल या भावनेचा, मधुरा भक्तीचा आधार काही रचनांसाठी घ्यावासा वाटणे स्वाभाविकच आहे.

—–

☆ गीत: ५२ ☆

THOUGHT I should ask of thee ⎯ but I dared not ⎯ the rose wreath thou hadst on thy neck. Thus I waited for the morning, when thou didst depart, to find a few fragments on the bed. And like a beggar I searched in the dawn only for a stray petal or two.

Ah me, what is it I find? What token left of thy love? It is no flower, no spices, no vase of perfumed water. It is thy mighty sword, flashing as a flame, heavy as a bolt of thunder. The young light of morning comes through the window and spreads itself upon thy bed. The morning bird twitters and asks, “Woman, what hast thou got? ” No, it is no flower, nor spices, nor vase of perfumed water ⎯ it is thy dreadful sword.

I sit and muse in wonder, what gift is this of thine. I can find no place where to hide it. I am ashamed to wear it, frail as I am, and it hurts me when I press it to my bosom. Yet shall I bear in my heart this honour of the burden of pain, this gift of thine.

From now there shall be no fear left for me in this world, and thou shalt be victorious in all my strife. Thou hast left death for my companion and I shall crown him with my life. Thy sword is with me to cut asunder my bonds, and there shall be no fear left for me in the world.

From now I leave off all petty decorations. Lord of my heart, no more shall there be for me waiting and weeping in corners, no more coyness and sweetness of demeanour.

Thou hast given me thy sword for adornment. No more doll’s decorations for me!

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५२ ☆


देशील हार गळ्यात रुळणारा?

आठवण म्हणून, तो मोहविणारा

*

वाटलं विचारावं, पण धाडस नाही

कधी येते उषा याचीच वाट पाही

*

अधाशासरखी धावले शेजेकडे

दोन तरी पाकळ्या मिळोत तिकडे 

*

भितीदायक आठवण दिलीस

तुझी पराक्रमी तलवार ठेवलीस

*

सौदामिनी सारखी तळपत होती

नाजूक हातांना या पेलत नव्हती

*

राघू, मैना काय मिळालं म्हणाले

काय सांगू? कुठं लपवू? गोंधळले

*

जड इतकी, कशी हृदयाशी घेईन

वेदनेचं ओझं सन्मानाने मिरवीन

*

आता भिती वाटत नाही कशाची

जगाच्या संघर्षात पाश तोडण्याची

*

भित्री, नाजूक, लाजरी नाही मी आता

माझा साज शृंगार ही तलवारच आता

*

तू घालून दिलेल्या मार्गानेच जाईन

वेदनेचे गीत गात तुलाच आळवीन

*

तूच माझा सखा जिवा-भावाचा

साज चढवेन तुला मम आयुष्याचा

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत:५३ ☆

BEAUTIFUL is thy wristlet, decked with stars and cunningly wrought in myriad-coloured jewels. But more beautiful to me thy sword with its curve of lightning like the outspread wings of the divine bird of Vishnu, perfectly poised in the angry red light of the sunset.

It quivers like the one last response of life in ecstasy of pain at the final stroke of death;it shines like the pure flame of being burning up earthly sense with one fierce flash.

Beautiful is thy wristlet, decked with starry gems; but thy sword, O lord of thunder, is wrought with uttermost beauty, terrible to behold or to think of.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५३ ☆

कलात्मक घडवलेलं, अनंत रंगीत रत्नांनी

कंकण तुझे सुंदर, सजवलेले लक्ष ताऱ्यांनी

*

पण त्याहून सुंदर, खड्ग बाकदार, चमकणारे

विष्णुवाहन वैनतेयाच्या पंखापरी पसरणारे

भव्य रूप ते पश्चिमेच्या लालीत तळपणारे

*

शेवटच्या प्रतिसादाला तडफडणाऱ्या देहासारखे

ऐहिक भावना जळताना उडणाऱ्या प्रकाशासारखे 

*

मेघाधिपती, कंकणरूपी जीवना साज रत्नांचा

खड्ग रुपी मृत्यू त्याहून सुंदर, अनामिक भितीचा

*

होशील जर सखा माझा, वाहीन जीवन सजलेलं

खड्ग पेलण्याचं धैर्य दे, मन आहे आसुसलेलं

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ५४ ☆

ASKED nothing from thee; I uttered not my name to thine ear. When thou took’st thy leave I stood silent. I was alone by the well where the shadow of the tree fell aslant, and the women had gone home with their brown earthen pitchers full to the brim. They called me and shouted, “Come with us, the morning is wearing on to noon. ” But I languidly lingered awhile lost in the midst of vague musings.

I heard not thy steps as thou camest. Thine eyes were sad when they fell on me; thy voice was tired as thou spokest low ⎯ “Ah, I am a thirsty traveller. ” I started up from my day-dreams and poured water from my jar on thy joined palms. The leaves rustled overhead; the cuckoo sang from the unseen dark, and perfume of babla flowers came  from the bend of the road.

I stood speechless with shame when my name thou didst ask. Indeed, what had I done for thee to keep me in remembrance? But the memory that I could give water to thee to allay thy thirst will cling to my heart and enfold it in sweetness. The morning hour is late, the bird sings in weary notes, neem leaves rustle overhead and I sit and think and think.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५४ ☆


तू बोलला नाहीस, मी ही नाही बोलले

स्तब्ध उभी पहात, सारेच अधुरे राहिले

*

घागर घेऊन उभी, जिथे होती तिरपी साऊली

मैत्रिणी म्हणाल्या, ‘चल, दुपार होऊ लागली’

*

तिथेच रेंगाळले, आज कुणी तार हृदयाची छेडली

तू आलास, तुझी चाहूल कां नाही आली?

*

तू उदास होतास, थकला होतास

तहान लागली, पाणी मिळेल कां म्हणालास

*

एकदम जागी झाले मी, दिवा स्वप्नातून

घागरीतलं पाणी प्यालास, तुझ्या ओंजळीतून

*

अन् पानं सळसळली, कोकीळ गाऊ लागला,

काय ही जादू! फुलांनीही गंध पसरला

*

नाव विचारता तू, मी लाजून चूर 

शब्दही नाही फुटला, हीच हुरहूर

*

तुझी तहान भागवली हा दिलासा जिवाला

ही गोड आठवण सदैव आनंद देईल मनाला

*

सूर्य माथ्यावर, कोकिळेचा आवाज थकला

तुझी माझी भेट हा संकेत कसला?

*

मी एकटीच विणते साखळी विचारांची

तूच माझा कान्हा, ओळख शतजन्मांची

– क्रमशः भाग १८..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माणुसकीची अनोखी गोष्ट! – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

माणुसकीची अनोखी गोष्ट! – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

माणुसकीची अनोखी गोष्ट!

 – – “ एका चिमणीसाठी ‘न्यायालय’ रस्त्यावर आलं! “

“जिथे जीव वाचवण्याची जिद्द असते, तिथे कायद्याचे दरवाजेही माणुसकीसाठी उघडले जातात! ” केरळच्या उल्लिकलमध्ये एका छोट्याशा चिमणीने संपूर्ण प्रशासनाला कसं कामाला लावलं, ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट नक्की वाचा.

८ एप्रिल रोजी मनोज कुमार नावाच्या मिस्त्रीने पाहिलं की, एका बंद कपड्याच्या दुकानात एक चिमणी अडकली आहे. एका छोट्या पाईपमधून ती आत शिरली, पण बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. काचेवर चोच मारून तिचे पंख थकत चालले होते.

दुकान एका मालमत्ता वादामुळे कोर्टाच्या आदेशाने ‘सील’ होतं. दुकान उघडण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. अग्निशमन दल, गाव अधिकारी आणि अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, पण कायद्याचं उल्लंघन कसं करणार?

ऑटो चालक, दुकानदार आणि गावकऱ्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या छोट्या छिद्रातून चिमणीसाठी दाणे आणि पाणी आत सोडलं, जेणेकरून ती जिवंत राहील. ३ दिवस गावचा जीव टांगणीला होता.

जेव्हा प्रकरण गंभीर झालं, तेव्हा गावकऱ्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हा न्यायाधीश के. टी. निसार अहमद स्वतः त्या दुकानापाशी पोहोचले आणि माणुसकीच्या नात्याने दुकान उघडण्याची विशेष परवानगी दिली!

अखेर ती उडाली… : १० एप्रिल रोजी दुकान उघडलं आणि तीन दिवसांच्या संघर्षांनंतर ती चिमणी मोकळ्या आकाशात झेपावली. गावच्या आनंदाला पारावार उरला नाही!

एका नगण्य वाटणाऱ्या चिमणीसाठी जेव्हा संपूर्ण गाव आणि न्यायव्यवस्था एकत्र येते, तेव्हा समजतं की माणुसकी अजून मेलेली नाही. ही गोष्ट आपल्याला शिकवते की, प्रत्येक सजीव महत्त्वाचा आहे!

“एका चिमणीचा जीव वाचवण्यासाठी धावून आलेल्या या गावकऱ्यांसाठी आणि संवेदनशील न्यायाधीशांसाठी कमेंटमध्ये एक ‘Heart’ नक्की द्या! माणुसकीच्या या महान कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ” 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

सुभेदार.. – मेजर सेंगर साहेब – कारगिल युद्धातील विजयाचे प्रातिनिधिक चित्र

मेजर बाळू मोहारे

“ब्रावो, तुम नीचे चले जाव… यह मेरा हुकुम है! ” 

मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे… हे एवढं १९५ मीटर्सचं अंतर चढून गेलं… दोन रात्रींत की… भारतीय सैन्याचे शूर जवान पाकिस्तानी खंदकांमध्ये घुसून हाहा:कार माजवणार आणि शत्रूला तिथून हुसकावून लावणार हे निश्चित होतं… ही सैन्यचौकी परत भारताच्या ताब्यात येणार हेही निश्चित होतं. आणि असं असताना सर्वांत पुढे असणा-या सैनिकाला मोहिमेचे प्रमुख लष्करी अधिकारी आज्ञा देत आहेत… माघारी फिर!

 “नाही, साहेब! मी माघारी नाही जाणार मोहिम अर्धवट सोडून! ” ब्रावो निर्धाराने म्हणाला!

 तो पर्वत त्याच्या मागील बाजूने पाच हजार फूट उंच वर चढून जायचं होतं. खरं तर पुढच्या बाजूने चढत जाणे सोपे आणि कमी वेळ घेणारं होतं… पण या बाजूने वर चढण्याचं धाडस करणं म्हणजे मरणाला स्वत: हाक मारण्यासारखं! कारण कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांच्या वेशात घुसखोरी करून भारताची काही ठिकाणं काबीज करून ठेवलेली होती. अनेक तरुण वीरांच्या प्राणांची बलिदाने देत देत ही सर्व ठिकाणं पुन्हा हस्तगत करण्याची मोहीम सुरु होती. या ठिकाणांपैकी हा पर्वत एक अतिशय अवघड आणि उंच पर्वत होता. शत्रू पर्वताच्या त्या उंच शिखरावर खंदक बनवून बसला होता.. आणि शत्रूच्या सैनिकांची संख्या होती दोनशेपेक्षा अधिक. आणि शस्त्रसज्जता खूप आधी, नियोजनपूर्वक करून ठेवलेली होती. उंचीवर असल्याचा फायदा घेत पाकिस्तान वरून भारतीय फौजांवर थेट आणि अचूक गोळीबार करू शकत होता. आणि म्हणूनच ही पोस्ट पाकिस्तानच्या हातून परत हिसकावून घेणं अनिवार्य झालं होतं!

 मेजर साहेबांनी निवडक वीस जवान सोबत घेतले. योजना तयार होतीच. पण योजना कागदावर जेवढी सोपी वाटत होती तेवढीच अंमलात आणायला महाकठीण. या बाजूने कधीच कुणी वर चढून येऊ शकणार नाही, अशी खुद्द शत्रूचीच खात्री होती. कारण, चढण भयावह सरळसोट. त्यात बर्फ. पाय ठेवण्यात किंचित चूक म्हणजे हजारो फूट खाली कोसळून मृत्यू ठरलेला. इथून वर चढण्याचा विचार कोण करेल?

 हा विचारच नव्हे तर कृतीही करू शकणारी एक सेना जगात आहे… भारताची… हिंद की सेना! एक प्रचंड वळसा घेत सेना निघाली. प्रत्येकाच्या खांद्यावर जगण्यासाठी, झोपण्यासाठी आणि लढण्यासाठीचं सारं अत्यावश्यक साहित्य… वजन खूप.. किमान चाळीस किलो तर निश्चित! एखादा ग्राम जरी वजन कमी नेता यावं म्हणून खाद्यपदार्थांची वेष्टने सुद्धा काढून टाकलेली होती… कारण शरीर त्याच्यावर लादलेल्या प्रत्येक ग्रामचा हिशेब मागत राहतं चालताना, डोंगर चढताना. पायांत खास बर्फातले बूट… बर्फातून वाट काढायची होती… आणि विरळ हवेतील प्राणवायू शक्ती लावून शरीरात ओढून घ्यायचा होता.

 सारा प्रवास रात्रीच्या अंधारात… तशी चंद्रप्रकाशाची थोडीसी सोबत मिळायची पण ती थोडीशीच. चालताना चंद्रप्रकाशही धोक्याचाच होता. वरून जर शत्रूने खाली पाहिले आणि त्याला हालचाल दिसली तर प्राण वाचणार नाहीत असा गोळीबार होणार. दिवसा चालण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस उजाडू लागला की पांढ-या रंगाचा पोंचू म्हणजे पावसाळ्यात घालतात तसा कोट अंगावर घ्यायचा आणि काहीही हालचाल न करता बर्फात पडून राहायचं… बर्फ मरणाचं थंड… तापमान दर्शवणारा पारा खाली खाली सरकतो आहे. लपण्यासाठी आडोसा कुठेच नाही… सर्वजण जमेल तिथे झोपून जात… पण झोप केवळ म्हणायला… दिवसभर वेळ घालवण्यासाठी गप्पा आणि हास्यविनोद… दबक्या आवाजातले! मोहिमेच्या मुख्य दोन-तीन जणांनी तर ठरवून टाकलं… पुढे आयुष्यात याच जागी यायचं आणि दिवस असाच काढायचा! मरणाच्या वाटेवर चालत असताना भविष्यकाळाचा विचार केवळ शूरच करू जाणे! तसं मोहिमेवर निघताना कमांडर साहेबांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रिय व्यक्तीच्या नावे एक पत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. जो कुणी मोहिमेवरून परतू शकणार नाही, त्याच्या घराच्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवले जाणार होतं!

 रात्रीचे चालणं आणि दिवसा बर्फात एखाद्या दगडासारखं पडून राहणं… असं पाच-सहा दिवस चाललं. मुख्य पर्वत लागला तेंव्हा एका रात्रीत शे-सव्वाशे मीटर्सच प्रवास होई… पुढे चालणारे… नव्हे बर्फाच्या पहाडाला स्वत:चं शरीर चिकटवून वर वर जाणारे दोन जवान. अत्यंत अनुभवी आणि कुशल. त्या पर्वतीय भागाची खडानखडा माहिती असलेले जुने जवान. कमरेला दोर. एका हातात टोकदार कुदळ-कु-हाड. खांद्याच्या थोडंसं वर बर्फात कु-हाड टोचायची… मग दुस-या हातातली कु-हाड टोचायची… त्या कु-हाडीवर शरीराचं वजन पेलायचं… एक पाय खालच्या किंचितशा कपारीवर टेकवायचा… पहाडाच्या छातीत खिळा ठोकायचा… त्यात दोर ओवायचा… दोर खाली सोडायचा… त्या दोराला धरून खाली थांबलेले सैनिक वर चढणार… असे एक पाऊल वर टाकायचे म्हणजे घरच्या सपाट बागेत पंधरा मिनिटे सलग फावडे मारण्याइतके श्रम. कोपरापासून हात थंडीने आकडून जायचे. म्हणून एका वेळी एकाने एकएकदा दोर लावण्यासाठी वर जायचे… असे दोघे जण आळीपाळीने हे काम पार पाडीत होते… अजून वरून शत्रूने पाहिले नव्हते! या प्रवासात किती विश्रांती मिळाली असेल? काय खाल्ले असेल? शरीरधर्म कसा पार पाडला असेल? कुटुंबियांची किती आठवण आली असेल? शेवटच्या पत्रात काय लिहिलं असेल? शत्रू संख्येने किती आहे हे माहीत नाही… मोहिमेचा शेवट कसा होईल हे ठाऊक नाही! पण सैनिकांची पावलं थबकली नव्हती!

 वाटेतल्या एका विशिष्ट जागी जवळचं इतर साहित्य ठेवलं गेलं… कारण ते घेऊन वर चढणं कठीण जात होतं. दोर लावून झाला की परत यायचं आणि हे साहित्य सोबत आणण्यासाठी जोडी जोडीने जायचं आणि यायचं. हे अंतर सुमारे दीडशे मीटर्स होतं. एकेदिवशी हे सामान परत आणायला गेलेल्या सैनिकांच्या जोडीच्या हालचाली शत्रूने टिपल्या… त्यांना आपले सैनिक दिसले नाहीत… पण एके ठिकाणी काही खुणा दिसल्या असाव्यात… त्यांनी त्या जागी बॉम्बगोळे टाकले. ते दोघेही सैनिक जबर जखमी झालेच असावेत!

 आता पुढे आलेले अधिकारी आणि एक डॉक्टर त्यांच्या B. F. N. A. (Battle Filed Nursing Assistant) सह मागे पळत निघाले… बर्फात पळणं म्हणजे जमेल तेवढं वेगात चालणं. तेवढ्यात ते दोघे सैनिक यांच्याकडेच येताना दिसले… पुढे असणा-या सैनिकाच्या हातातून रक्ताची धार लागलेली होती.. दुसरा सैनिक त्याच्या काही पावलं मागे होता… डॉक्टर पुढे झाले आणि त्या सैनिकाचा हात हातात घेऊ लागले… तेवढ्यात त्या सैनिकाने डॉक्टरांना जोरात मागे ढकलले… आणि म्हणाला… ”साहब… पिछे वाले मेरे बडी को देखो… उसके सिर में घाव हुआ है! ”

डॉक्टर आणि नर्सिंग असिस्टंट मागे धावले… बॉम्बचा एक तुकडा त्या सैनिकाच्या डोक्याला खोलवर जखम करून गेला होता… रक्त वाहत होतं… त्याही गडबडीत नर्सिंग असिस्टंटने त्या सैनिकाच्या डोक्यावरचे त्या जखमेवरचे केस काढले… आणि एखाद्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स घालतात तसे अचूक, नीटस टाके घातले… त्यामुळेच त्या सैनिकाचे प्राण वाचणार होते. सैनिकांनाच नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते… रक्तस्राव थांबवणे, रुग्णाला स्थिर करणे, उपचारासाठी तिथून हलवणे अशी कौशल्ये सैनिकांना अवगत असतात. सफाईदारपणे रायफलचे ट्रिगर्स दाबणारी खडबडीत बोटं एखाद्या विणकर पक्ष्यासारखे नाजूक, अचूक टाके घालतात हे विशेषच म्हणावे लागेल.

 आता केवळ १९५ मीटर्स अंतर उरलं… ते चढून गेलं की थोडी सपाट जागा येईल. तिथं शत्रूचे खंदक असतील… शत्रू आरामात खंदकाच्या खोलीत खोलवर बसून गोळीबार करीत असेल… आणि आपण त्यांच्यावर तुटून पडायचं!

 शेजारच्या पहाडांवरून आपले इतर सैनिक आपल्या या बहादरांचा प्रवास पाहू शकत होते… श्वास रोखून. शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्या तोफा खालून वर मारा करीत होत्याच पुढच्या दिशेने… यांना मागून वर चढता यावं अशासाठी ही योजना होती. ही शेवटची चढण चढायला आरंभ करण्याच्या वेळी, म्हणजे अंधार पडायच्या बेतात असताना या मोहिमेच्या प्रमुखाला वरिष्ठ पातळीवरून वायरलेस मेसेज आला… ”ब्रावोला परत पाठवून द्या! त्याच्या घरी आणिबाणीची वैद्यकीय परिस्थिती उदभवली आहे. त्याचे घरी असणे अत्यावश्यक आहे! ”

 ब्रावो बर्फाच्या एका कड्याखाली वर चढायला सुरुवात करण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून बसला होता… साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं… त्याच्या चेह-यावर नेहमीचं एक हास्य होतं… पण त्या हास्याच्या थराखाली एक पुसटशी चिंताही दिसली! सैन्यात बारा-पंधरा वर्षांची सेवा झालेला ब्राव्हो… गावाकडे कुटुंब… आई-वडील, पत्नी. आदर्श मुलगा आणि प्रेमळ पती म्हणून गावात याची ओळख. एक शल्य मात्र मनाला टोचणी लावून होतं… पदरी अपत्य नव्हतं. पत्नी दोनदा आई होण्याच्या अगदी जवळ असतानाच वैद्यकीय कारणांनी घात केला… आणि अपत्यसुख दूर गेलं.

 आणि आज मोहिमेच्या प्रमुख साहेबांना बेस वरून मेसेज आला आहे… पत्नी त्याच अवस्थेत आहे… यावेळी तिच्या जीवाला खूप धोका आहे! या मोहिमेच्या प्रमुखांसमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला. मोहिम महत्त्वाची आहे… हा सैनिक महत्त्वाचा आहे… त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानेच इथवर दोर लावत लावत आपल्या दलाला सुरक्षित आणलं आहे… आता तर एक दोन रात्रीचीच चढण शिल्लक आहे! पण हा ब्रावो तर जीवाला जीव देणारा… तहान-भूक हरपून याने काम केलं आहे! आता याच्या पत्नीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा तिच्याजवळ तिच्या या निकराच्या प्रसंगी असला पाहिजे… कारण घरी म्हातारे आई-वडील… अशावेळी आपलं माणूस जवळ असावं!

 मोठ्या काळजाच्या प्रमुखाने त्याही स्थितीत एक निर्णय घेतला… ब्रावोने त्याचं काम चोख बजावलं आहे… आता आम्ही उरलेलं काम करू! ते म्हणाले, ”ब्रावो… निघ. घरच्या मार्गाला लाग. इथून खाली जाणं तुलनेने सोपे आहे… वर यायला पाच दिवस लागले… खाली जायला दोनच दिवस लागतील… सोबत एक बडी देतो… जा… वहिनीला तुझी जास्त गरज आहे! ”

 यावर ब्रावो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला! ते पाहून प्रमुख अधिका-याचेही डोळे भरून आले! अंधार होऊ लागला होता… चढण सुरु करायला पाहिजे… वेळ गमवता कामा नये. पण ब्रावो काही केल्या तयार होईना… म्हणाला… ”साहेब, आपण अगदी जवळ आलोय… दोन रात्रींत पोहोचू वर. या मोहिमेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावं म्हणून स्वयंस्फूर्तीने तुमच्या दलात आलो… कारण मला माहित आहे… मी डोंगर सफाईदारपणे चढू शकतो… माझा उपयोग होईल मोहिमेत! ” 

 यावर साहेब म्हणाले, ”ब्रावो, तुझी तर वार्षिक रजाही तू घेतली नव्हतीस. आता संधी आहे आणि गरजही. जा तू! ” त्यावर ब्रावो उत्तरला… ”अशा स्थितीत रजेचा विचारही मनाला शिवला नाही, साहेब! ” “हा तर माझ्या रेजिमेंटच्या इज्जतीचा सवाल आहे… नाम, नमक और निशान! ”

 “साहेब, माझ्या सोबतीने आळीपाळीने दोरी लावण्यासाठी वर चढणा-या माझ्या बडीच्याअल्फाच्या पायांना मोठ-मोठे फोड आलेत… मी त्याला सांगितलं आहे… इथून पुढची सर्व चढण मी एकटा चढेन आणि दोर लावेन! ”

 हे बोलणे सुरु असताना ज्याच्या पायांना फोड आलेले आहेत, असा त्याचा बडी, अल्फा पुढे झाला आणि त्यानेही ब्रावोची समजूत काढायला सुरुवात केली… एक एक क्षण पुढे जात होता… मोहिमेला उशीर होत होता!

 सहका-याचे वाक्य पुरे होण्याआधीच ब्रावो एखादा स्फोट व्हावा तसा ओरडून म्हणाला… ”मला मूल झालंच आणि त्याने मला विचारलं… तुम्ही तुमच्या सहका-यांना ऐन लढाईत सोडून घरी निघून का आलात? तर त्याला मी काय सांगू? ” 

 सर्वच शांत झाले… प्रत्येकाच्याच मनात हाच सवाल होता. सर्वच जण एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे सैनिक. कुटुंबांपेक्षा जास्त सहवास लाभलेले वीर. कित्येक मरणं अनुभवलेली पहाडी मनं.

 यात अर्धा पाऊण तास गेला… शेवटी प्रमुखांनी… Its an order, Bravo! असं म्हटल्यावर जड पावलांनी ब्रावो तिथून खाली जायला तयार झाला… त्यानेच लावलेल्या दोरावरून खाली खाली घसरत चालला… एखादी निर्जीव वस्तू असावी तसा!

 इकडे दोन रात्री चढण चढत चढत सैन्य वर पोहोचले… आता केवळ काही मीटर्स अंतर राहिले होते… शत्रूचे खंदक आणि आपल्या सैनिकांत… प्रमुखांनी कवर फायर साठी बेसला मेसेज दिला… तिथून मेसेज आला… नो गन फायर! युद्ध थांबवण्याचा आदेश आला होता… Cease-fire घोषित झाले होते. भारताने ऑपरेशन विजय पूर्ण केले होते. पराभूत पाकिस्तानी सैन्य त्या पर्वतावरून खाली उतरायला सुरुवातही झाली होती!

 इकडे याच वेळी ब्रावो घरी पोहोचला होता… त्याने साहेबांना मेसेज केला… ”साहेब, बाळ-बाळंतीण सुखरूप! मी बाप झालो! ” 

 घरची काळजी बाजूला ठेवत मोहिमेत सहभागी झालेला, डोंगराएवढी समस्या असतानाही डोंगर चढत राहण्यासाठी अडून बसलेला सैनिक, मोहिमेची काळजी असतानाही सहकारी सैनिकाच्या कौटुंबिक समस्येची काळजी वाहणारे कमांडिंग ऑफिसर, मोहिमेतले प्रमुख अधिकारी… या सर्वच गोष्टी अलौकिक! या सर्वांचीच जणू दैवानेच धर्म संकटातून सुटका केली होती!

(प्रस्तुत कहाणी कारगिल युद्धादरम्यान घडलेली आहे. मेजर दीपेंद्रसिंग सेंगर (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या एका भाषणात ही कथा सांगितली होती. सैनिकी पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळी ब्रावो, अल्फा ही नांवे वापरली होती. ही नावे म्हणजे रेडीओ सिग्नल्स असतात. पण पुढे Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी ब्रावोच्या नावाचा उल्लेख केला आहे… सुभेदार मेजर बाळू मोहारे (निवृत्त)! आणि त्यांचे छायाचित्रसुद्धा दाखवले आहे.)

© श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रस्तुती… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

✦ शास्त्रस्तुती… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

ज्ञान, अनुशासन आणि मुक्तीचा दिव्य प्रवास

शास्त्र म्हणजे काय

शास्त्र या शब्दाचा उगम आणि अर्थवैभव

‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.

म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—

जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र. 

 

*शास्त्राची तात्त्विक व्याख्या*

भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.

 

प्राचीन व्याख्या सांगते—

“शासनात् शंसनात् शास्त्रम्”

म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—

“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”

म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.

 

*शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप*

कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.

– – या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—

न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)

यांखेरीज—

वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु _त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे. _

 

*शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार*

भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.

शास्त्रांचा पाया उभा आहे—

श्रुति (अध्यात्मिक परंपरा)

युक्ति (तर्कबुद्धी)

अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)

शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.

म्हणूनच शास्त्र हे—

_वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे. _

 

*शास्त्र आणि विवेकबुद्धी*

शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.

ते शिकवते—

सत्य आणि असत्य यातील भेद.

नित्य आणि अनित्य यातील भेद

आत्मा आणि अनात्म याची ओळख

परंतु—

शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.

म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—

विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता

 

*शास्त्र आणि साधकाची भूमिका*

नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर

शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.

बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.

 

*कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन*

काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.

म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे

नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.

 

*शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे*

थोडक्यात—

जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.

शास्त्र हे—

जीवनाला दिशा देते

मनाला स्थैर्य देते

बुद्धीला स्पष्टता देते

 

*समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत*

शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.

शास्त्र —

अज्ञानातून ज्ञानाकडे नेते

अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेते

मर्यादिततेतून अमर्यादतेकडे नेते

म्हणूनच—

शास्त्र हे नुसते वाचायचे नसते—ते जगायचे असते,

ते नुसते समजायचे नसते—ते आत्मसात करायचे असते.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

सगुणाबाई जनार्दनराव पेशवे 

समिधाच सख्या या!! …

” मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागत? नावही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

 आता मीच देते ओळख करून…

मी… *सगुणाबाई*! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

 *पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली.!

– लेख क्र. १.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे ☆

अर्चना मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे☆

 – एक सामाजिक प्रश्न

एक काळ असा होता की, आई होताना सामाजिक, कौटुंबिक सक्ती असायची. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट अनेक तरूणीना जाळणारा, विहिरीत ढकलणारा, माहेरी परत पाठवणारा, निराशा, औदासिन्य, ताणतणाव देणारा होता. मूल हवंच आणि मुलगाच हवा यामधल्या ‘च’ ने त्या काळातील मूल न होणार्‍या किंवा मुलगा न होणार्‍या तरूणींचा प्रचंड मानसिक छळ केला. त्या काळातील ‘मूल हवंच’ या विचारामागे शेतात आणि घरात राबण्यासाठी हात हवे असणे. वृद्धापकाळासाठीचा आधार तयार करणे. मृत्यूनंतर मुलाकडून अग्नी मिळाला तरच मोक्षप्राप्ती होते या कल्पनेनुसार सद्गती मिळवणे. अशी काही कारणं होती. मुलांचा सांभाळ हा सहज व्हायचा. तेव्हा एकल पालकत्व, द्विपालकत्व असा काही प्रकार नव्हता. एकत्र कुटुंबपद्धतीत मुलं हसत खेळत मोठी व्हायची. सामाजिक पालकत्व असायचं. मुलांचा खर्च एकत्रितपणे केला जायचा. त्यामुळे पालकत्व निभावताना तणाव नसायचा. मुलांची संख्या कितीही वाढली तरी फारशी अडचण नसायची. ‘ज्याने दिली चोच तो भरेल पोट’ असंही म्हटलं जायचं. मूल नसणं म्हणजे पाप होतं. शाप होता. त्यापेक्षा मुलांना जन्म देऊन सन्मानपूर्वक जगणं किंवा स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा टिकवणं यालाच महत्त्व दिलं जायचं.

काळ बदलला. मानवी संस्कृती – मानवी मूल्ये बदलली. जगण्याची व्याख्या बदलली. सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या. कर्तृत्वाने मोठ्या होऊ लागल्या. ‘मुलगी झाली तर चालेल’ हा विचार समाजात रुजायला लागला. पूर्वीचा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव! ‘ हा आशीर्वाद मागे पडायला लागला. आताच्या जोडप्यांच्या कुटुंबाच्या उंबरठ्यावर ‘मूल नकोच’ हा शांतपणे, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय स्तब्ध उभा आहे.

काही वर्षापूर्वी ‘मूल का नाही’ हा प्रश्न विचारला जायचा. आता ‘कशासाठी मूल हवंय’ असा प्रश्न विचारला जातो. मूल नको हा काही नगण्य लोकांचा विचार नाही. तो सामाजिक कल बनला आहे. या विचाराकडे गांभीर्याने बघणं अपेक्षित आहे.

विवाहानंतर दीप आणि निला दोघं पुण्यात स्थायिक झाले. दोघंही आय टी कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यानी अजून मुलाचा विचार केलेला नाही. ते म्हणतात, “शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडणं, स्वत:चं छोटंसं घर घेणं यात १०-१२ वर्षे निघून गेली. आता बाळाचा विचार केला तर नैसर्गिकपणे गर्भधारणेत अडचणी आहेत. डाॅक्टरनी सुचवलेले इतर पर्याय शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासदायक आहेत. त्यातूनही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलाच तर आम्ही बाळाला वेळ देऊ शकणार नाही. त्याला पाळणाघरात ठेवणं आम्हाला पटत नाही. नातेवाईकानी आम्हाला स्वार्थी म्हटलं. जबाबदार्‍या नको आहेत असंही म्हटलं. पण आम्ही ठरवलं. लोक म्हणतात म्हणून आम्ही बाळाला जन्म देणार नाही. त्याला उत्तम असं आयुष्य आम्ही देऊ शकत नाही. तर जन्माला घालून त्याच्यावर अन्याय करण्याचा आम्हाला अधिकार नाही. म्हणून आम्ही बाळाला जन्म न देण्याचा निर्णय जबाबदारीने, दोघांच्या विचाराने जाणीवपूर्वक घेतला आहे. “

– – अशी ही पिढी.. या विषयावर जेन झी मोकळेपणाने बोलतात. त्यानी आणखी काही कारणं सांगितली.

नोकरी व्यवसायात खंड पडण्याची भीती – आर्थिक स्वावलंबनाच्या हेतूनेच प्रचंड मेहनतीने शिक्षण पूर्ण केलेलं असतं. नोकरी मिळालेली असते. त्यानंतर थोडं स्थिरस्थावर होतं न होतं तो लगेच बाळाचा विचार करू शकत नाही. नोकरीमुळे बाळाची जबाबदारी नीट पार पाडू शकत नाही. नोकरी तर सोडूच शकत नाही. कारण एकदा खंड पडला तर प्रगती खुंटेल. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल. अशी भीती या पिढीला वाटते.

आर्थिक ओझं – एक चांगला पालक होऊ शकतील की नाही याची भीती असते. उत्तम शिक्षण, उत्तम भौतिक सुखं देण्यात ते कमी पडतील असं त्याना सतत वाटत असतं. मुलांचं संगोपन हे आर्थिक ओझं वाटतं. चोवीस तास पालकत्वाची जबाबदारी पेलणं खूप कठीण आहे. या चिंतानीच पालक न होण्याचा निर्णय घेतला जातो.

दूषित पर्यावरण – स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळणं अशक्य आहे. आपण मुलाना कोणत्या प्रदूषित वातावरणात ढकलत आहोत याची जाणीव तरूणाना आहे. आम्हालाच जे मिळत नाही, ते आम्ही मुलाना कुठून देणार असाही विचार ही जोडपी करताना दिसतात.

शारीरिक – मानसिक आरोग्य – आजूबाजूचं वातावरण, शैक्षणिक ताण, मित्रांचा दबाव या सगळ्यात मुलं कितपत आरोग्यपूर्ण जगतील ही शंका येते. मुलांना निरोगी आयुष्य देणं ही जबाबदारी पालकांची असते.

उशिरा होणारी लग्नं – आजकाल लग्नाचं सर्वसाधारण वय तीस वर्षे झालं आहे. त्यानंतर गर्भधारणा किंवा प्रसूती यामधली गुंतागुंत वाढू शकते. धोका पत्करायला नको म्हणूनही अपत्यहीन राहण्याचा निर्णय घेतला जातो.

‘मुलगाच हवा’ पासून ‘मूलच नको’ हा प्रवास म्हणजे आधुनिक दर्जेदार जीवनशैली, बदलत जाणारी कौटुंबिक, सामाजिक मूल्ये आणि आर्थिक स्थैर्य याचा प्रभाव असं म्हणावं लागेल. सामाजिक नियमांची चौकट कधीच ओलांडली गेली. आता ‘पाळणा हलणं’ हा वैयक्तिक निर्णय झाला आहे. आधी आपण तर नीट जगू, मग नव्या जीवाला या जगात आणायचं की नाही ते ठरवू असं म्हणणारी ही पिढी आहे.

अपत्यप्राप्तीचा बदलता दृष्टिकोन-

पूर्वीचा काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा मुख्य उद्देश वंश वाढवणे.. हे कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य आहे असं मानलं जायचं. मुलांना भविष्यातील आर्थिक आधार समजलं जायचं. तेव्हा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र कुटुंबात विभागली जायची. मातृत्व हेच स्री जीवनाचं सार्थक मानलं जायचं. अपत्यप्राप्ती न होणं हा सामाजिक अपमान होता. लग्नानंतर मूल होणं नैसर्गिक पण अनिवार्य होतं. अपत्याकडे म्हातारपणाची काठी म्हणजेच आधार म्हणून बघितलं जायचं.

आधुनिक काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा उद्देश हा वैयक्तिक आनंद मानला जातो. मूल होऊ देण्याचा निर्णय हा स्वेच्छेने घेतलेला असतो. जबाबदारीची जाणीव असते. मुलांच्या संगोपनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. संगोपनाचा खर्च मोठा असतो. विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाचा ताण पालकांवर असतो. पालक स्वत:चं करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याला महत्त्व देतात. स्वेच्छेने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. स्वत:च्या म्हातारपणाची काठी स्वत:च होतात. त्यासाठी आर्थिक तरतूद करूनच निर्णय घेतात.

पूर्वी नशीबाने, देवकृपेने मुलं व्हायची. आज निश्चयाने मुलं होतात. आधुनिक जोडपी सर्व आव्हानांचा विचार करतात. मानसिक तयारी करतात. मूल होणं ही आजच्या जोडप्यांची गरज नाही. मूल होऊ देण्यात कोणतीही जबरदस्ती ते ओढवून घेतच नाहीत. नवीन जोडप्याना बाळ न होण्यात अपूर्णत्व वाटत नाही. बाळाला जन्म देण्याचा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं पूर्णत्व असं त्यांना वाटतं. जबाबदार्‍या नको आहेत. स्वातंत्र्य हवंय असं काही नाही. न जन्मलेल्या बाळाचा ते प्रामाणिकपणे विचार करतात. त्यांच्या घरातला पाळणा रिकामा राहिला तरी त्यांचं जग अनेक सुखानी भरलेलं असतं. हेच आधुनिक सामाजिक सत्य आहे. जबाबदारीच्या जाणीवेतून स्वेच्छेने पालकत्व स्वीकारणे ही सजगतेची नांदी आहे. पण मूल होऊच न देणार्‍यांची संख्या वाढते आहे. म्हणूनच ‘पाळणा हलणार की नाही? ‘ हा सामाजिक उंबरठ्यावरचा प्रश्न झाला आहे.

© अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २१ – – 

मना वासना चुकवी येरझारा ।

मना कामना सांडि रे द्रव्यदारा |

मना यातना थोर हे गर्भवासी ।

मना सज्जना भेटवी राघवासी |२१ |

अर्थ: हे मना, वासनेमुळे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात (येरझारा)अडकतो. त्या वासनेचा त्याग कर म्हणजे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाही. पैसा आणि स्त्री सुख यांच्याबद्दल मोह बाळगू नकोस. कारण वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आणि गर्भवासाच्या यातना भयंकर असतात. म्हणून हे मना भगवंताची भेट करून घे.

विवेचन: जन्माआधी आणि जन्माच्या प्रसंगी होणाऱ्या यातना किती भयंकर असतात हे समर्थांनी आधीच्या श्लोकात सांगितले आहे. या श्लोकात ते आपल्याला म्हणतात की वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो म्हणून या वासनांचा त्याग करायला हवा. वासनाच नसतील तर जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवणार नाही. या श्लोकात ‘ चुकवी ‘ हा शब्द वासना आणि येरझारा या दोन्हीसाठी आहे. आपल्याला वासना आणि येरझारा दोन्हीही चुकवायच्या आहेतच. वासना चुकवली तर येरझारा आपोआपच चुकतील.

वासना या निरनिराळ्या प्रकारच्या असतात त्यातही त्यांचे दोन प्रमुख प्रकार सांगता येतील. सद् वासना आणि दुर्वासना. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारची वासना असेल तरी पुनर्जन्म हा अटळ आहे. परंतु त्यातल्या त्यात सद्वासना म्हणजे चांगल्या वासना असतील तर पुन्हा जन्म मिळाला तरी हरकत नसते. समाजोपयोगी कार्य करणे, संतांचा सहवास लाभणे किंवा परमेश्वर भक्तीची इच्छा धरणे या सद्वासना आहेत. या सद्वासनांमुळे आत्मिक उन्नती होण्यासाठी मदत होते. षडरिपूंच्या नादी लागून त्या वासना अपूर्ण जर राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु त्याने शेवटी मनुष्याची अधोगतीच होते आणि मुक्तीपासून तो दूर जातो.

संत तुकाराम महाराजांना संतसंग आणि भगवद्भक्तीची आस होती. ते म्हणतात – – 

न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा|

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ||

संतांचा, सज्जनांचा संग म्हणजे सहवास मिळावा, परमेश्वराची भक्ती कायम लाभावी म्हणजे जेणेकरून त्यातील गोडी कायम अनुभवता येईल. म्हणून त्यांना गर्भवास म्हणजे पुन्हा जन्म घेणेदेखील मान्य आहे.

तुकाराम महाराजांसारख्या संतांची ही सद्वासना झाली. परंतु या ऐहिक जीवनात सामान्य मनुष्य एवढा गुंतून जातो की त्याच्या अनेक प्रकारच्या वासनांची पूर्ती कधी होतच नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जेवढे इंधन घालावे तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. तशा या दुर्वासना देखील वाढत जातात आणि अंतकाळी या वासना कायम असतील तर त्या पोटी मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. सत्ता, संपत्ती आणि स्त्री संबंधित वासना कधी संपतच नाहीत. कामिनी आणि कांचन यांच्या वासना सर्वात जास्त प्रबळ आहेत. त्यांच्यावर मात करणे सोपे नाही. इतर वासना त्यामानाने गौण आहेत. आज जगातील घडणारे बहुतेक गुन्हे आणि वाईट घटना कामिनी आणि कांचनाच्या हव्यासापायीच घडत आहेत. चित्रपटातून आणि टीव्हीवरील विविध प्रकारच्या धारावाहिकांमधून अशाच घटना समोर येतात. त्यापासून बोध घेण्याऐवजी त्यातील वाईट गोष्टींचा प्रभाव समाजमनावर अधिक पडतो. भ्रष्टाचाराच्या घटनांबद्दल तर न बोललेले बरे इतक्या त्या नित्याच्या झाल्या आहेत.

वासना अपूर्ण राहिल्या की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्माला आल्यानंतर या वासनांचा भोग तर मिळतो परंतु माणसाची अधिकाधिक अधोगती होते आणि त्याने तो मुक्ती पासून दूर जातो.

परद्रव्य कांता पराची पाहता 

स्मरादि रिपु ओढिती मानसाता 

– – असे श्री दत्त स्तुतीत म्हटले आहे. दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांची अभिलाषा धरली तर काम, क्रोध यांसारखे शत्रू मनावर आक्रमण करतात आणि शेवटी ते माणसाचा नाश घडवून आणतात.

म्हणूनच जन्म मृत्यूचा फेरा म्हणजेच येरझारा चुकवायचा असेल तर समर्थ वासनेवर मात करायला सांगतात. आणि त्यासाठी ईश्वर प्राप्तीचे पवित्र ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवावे लागते. केवळ ध्येयवादी मनुष्य असा त्याग करू शकतो. माया मोहात अडकलेले मन आपण ईश्वराकडे लावले तर तेच मन आपल्याला (राघवाची) ईश्वराची भेट घडवून देईल.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात कोणत्या वासना मला सर्वाधिक बांधून ठेवतात?
  • कामिनी आणि कांचनाच्या मोहापासून दूर राहण्यासाठी मी सजग आहे का?
  • संतसंग, सत्संग किंवा आध्यात्मिक चिंतनाला माझ्या जीवनात किती स्थान आहे?
  • माझ्या जीवनाचे ध्येय केवळ भोग आहे की ईश्वरप्राप्ती?

– – – – 

श्लोक क्र. २२ – – 

मना सज्जना हीत माझे करावे ।

रघुनायका दृढ चित्ती धरावे ।

महाराज तो स्वामि वायूसुताचा ।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ।।२२।।

अर्थ :

हे सज्जन मना, तुला जर तुझे खरे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुकुलाचा नायक असलेल्या श्रीरामाला चित्तामध्ये दृढ धारण कर. तो वायूसुत हनुमंताचा स्वामी आहे आणि तिन्ही लोकांचा उद्धार करणारा आहे. म्हणून अशा त्या श्रीरामाला तू घट्ट धरून ठेव—म्हणजेच नेहमी त्याच्या चिंतनात राहून आपला उद्धार करून घे.

विवेचन :

आधीच्या श्लोकांमध्ये जन्माला येताना जीवाला किती यातना सहन कराव्या लागतात हे समर्थ सांगतात. आयुष्य जगताना देखील नाना प्रकारची दुःखे, संकटे आणि क्लेश सहन करावे लागतात. हे सर्व म्हणजे जन्म-मृत्यूच्या अखंड फेऱ्यांमुळे घडणारे आहे. या येरझाऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर माणसाने आपले खरे हीत करून घ्यायला हवे. मग हे हीत म्हणजे नेमके काय आणि ते कसे साध्य करायचे—याचे उत्तर समर्थ या श्लोकात देतात.

हे जग मायेचा एक मोहक पिसारा आहे. त्याला आपण भुलतो, तेच अंतिम सत्य आहे असे मानतो आणि त्यातच अडकून पडतो. नाना प्रकारची प्रलोभने, विकार आणि वासना आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. परिणामी, आपल्या कल्याणाचा जो अंतिम मार्ग आहे—श्रेयसाचा मार्ग, त्याऐवजी आपली वाटचाल प्रेयसाच्या मार्गाने होत राहते.

खरे पाहता मनच आपला मित्र आणि मनच आपला शत्रू असते. तेच आपले हीत किंवा अहित करू शकते. विषयसुख आणि शरीरसुखालाच आपण जीवनाचे अंतिम ध्येय मानतो. कामिनी आणि कांचनाच्या मागे धावत राहतो. परंतु या सर्व गोष्टी म्हणजे मृगजळासारख्या आहेत. मृगजळ दिसते, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. तसेच हे बाह्य जग—ते सत्य वाटते, पण ते भासमान आहे. आपण त्याच्या मागे धावत राहतो आणि जे अंतिम सत्य आहे—ब्रह्म किंवा परमेश्वर—त्याकडे दुर्लक्ष करतो.

आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी होते. कस्तुरी स्वतःच्या नाभीत असतानाही तो तिच्या शोधात रानोमाळ भटकत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या हृदयातच असलेल्या आत्मारामाला आपण विसरतो आणि बाह्य सुखांच्या मागे भटकत राहतो.

मानवी जीवनाचे खरे हीत म्हणजे त्या रघुनायकाला दृढ चित्ती धारण करणे. चित्तामध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवणे म्हणजेच आपले कल्याण करणे होय. एखाद्या वस्तूचा सतत सहवास लाभला तर ती वस्तू आपल्याला प्रिय वाटू लागते. तसेच भगवंताच्या नामाचा आणि स्मरणाचा सतत सहवास लाभला तर भगवंतही आपल्याला प्रिय वाटू लागतो. आणि जेव्हा भगवंत प्रिय वाटू लागतो, तेव्हा समजावे की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत.

श्रीराम हे वायूसुत हनुमंताचे स्वामी आहेत. हनुमंत म्हणजे शक्ती, युक्ती आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत प्रतीक. तरीही तो स्वतःला रामाचा दास मानतो. भक्ती कशी करावी हे हनुमंताकडून शिकावे. त्याने श्रीरामांना आपल्या हृदयात कायमचे धारण केले आहे. श्रीरामांच्या कृपेने तो चिरंजीव झाला आहे.

शौर्य, धैर्य, औदार्य आणि शरणागताचे रक्षण—हे श्रीरामांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. ते रघुकुलाचे भूषण आहेत. त्यांचे नाम पापातून मुक्त करणारे आहे, भवसागरातून तारून नेणारे आहे. हजारो वर्षांपासून असंख्य लोकांनी श्रीरामनामाचा आश्रय घेतला आणि या संसारसागरातून तरून गेले.

त्रैलोक्याचा नाथ असलेल्या त्या श्रीरामांनी लोककल्याणाचे व्रत स्वीकारले आहे. म्हणूनच समर्थ अत्यंत तळमळीने आपल्या मनाला सांगतात—

“हे सज्जन मना, त्या श्रीरामांना आपल्या हृदयात दृढ धारण कर; त्यातच तुझे खरे कल्याण आहे. ”

स्वसंवाद : 

  • माझ्या जीवनातील खरे “हीत” काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • विषयसुख आणि भौतिक यश यांनाच मी जीवनाचे अंतिम ध्येय मानतो आहे का?
  • माझ्या मनाला ईश्वरनाम, सद्गुण आणि सत्कर्म यांचा सहवास मिळतो आहे का?
  • हनुमंताप्रमाणे श्रद्धा, नम्रता आणि सेवाभाव माझ्या जीवनात कितपत आहे?

– क्रमशः श्लोक २१ आणि २२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पश्चात्ताप! ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ पश्चात्ताप! ☆ अपर्णा परांजपे

आपल्या मनात जर अपराध भावना आली तर दोन मार्ग जाणवतात एक देवाजवळ जायचे व प्रसाद द्यायचा व दुसरा ज्याच्यावर अन्याय झाला त्याला प्रत्यक्ष क्षमा मागायची!

आपण पहिला देवाजवळ जाण्याचा मार्ग धरू! हे ही उत्तमच आहे पण त्याने फारसा उपयोग होणार नाही कारण अंतःकरण शुद्ध नाही. आपण सोपा, सहज मार्ग आपण निवडला. पण प्रत्यक्ष क्षमा मागणे, कमीपणा वाटणे म्हणजेच देहबुद्धी नष्ट न होणे व देहबुद्धी नष्ट न होता केलेली क्षमायाचना भगवंतांना सुद्धा आवडत नाही मग तो नुसता व्यवहार ठरतो

प्रायश्चित्त विरुद्ध शुद्धीकरण 

शास्त्रात दोन संकल्पना आहेत: ‘द्रव्यशुद्धी’ आणि ‘आत्मशुद्धी’.

पहिला मार्ग (देवाजवळ जाणे): जेव्हा आपण देवाला प्रसाद चढवून अपराधमुक्त होऊ पाहतो, तेव्हा ते अनेकदा एक प्रकारची ‘तडजोड’ असते. शास्त्र सांगते की, देव भावाचा भुकेला आहे, द्रव्याचा नाही. जोपर्यंत अंतःकरणात पश्चात्ताप नाही, तोपर्यंत बाह्य उपचारांना केवळ ‘कर्मकांड’ म्हटले जाते. हे मनाला तात्पुरती शांती देऊ शकते, पण अपराधाचे मूळ (बीज) नष्ट करत नाही.

 दुसरा मार्ग (क्षमा मागणे): हा मार्ग ‘सत्य’ आणि ‘धर्मा’वर आधारित आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सामोरे जाणे म्हणजे स्वतःच्या चुकीचा आरसा पाहण्यासारखे आहे.

 २. देहबुद्धी आणि अहंकार

प्रत्यक्ष क्षमा मागण्यात ‘कमीपणा’ वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे.

शास्त्रीय दृष्टिकोन: देहबुद्धी म्हणजे ‘मी शरीर आहे आणि माझी एक सामाजिक प्रतिष्ठा आहे’ हा भ्रम. जेव्हा आपण क्षमा मागायला कच खातो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला नाही, तर आपल्या ‘अहंकाराला’ वाचवत असतो.

जोपर्यंत हा अहंकार शाबूत आहे, तोपर्यंत केलेली कोणतीही भक्ती ‘सकाम’ असते. भगवद्गीतेनुसार, जो स्वतःला कर्ता मानतो आणि अहंकाराने ग्रासलेला असतो, त्याची बुद्धी शुद्ध नसते.

३. क्षमा‘ – एक आध्यात्मिक साधना

क्षमस्व प्रवृत्तीला शास्त्रात ‘तप’ मानले गेले आहे.

मनःप्रसाद: मनाची प्रसन्नता ही खरी भक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीचे मन दुखावून आपण देवापुढे उभे राहिलो, तर ते मन विचलित असते. विचलित मनाने केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही, कारण तिथे ‘द्वैत’ (मी आणि तो वेगळा आहे ही भावना) प्रबळ असते.

व्यवहार की परमार्थ: मनाची शुद्धी नसेल तर तो केवळ एक ‘व्यवहार’ ठरतो. व्यवहारात आपण काही देऊन काहीतरी विकत घेतो (प्रसाद देऊन पुण्य विकत घेण्याचा प्रयत्न). पण परमार्थ हा ‘समर्पणाचा’ विषय आहे.

४. मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सुसंगती

आजचे मानसशास्त्रही सांगते की, जोपर्यंत आपण आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत अपराधभाव मनातून जात नाही. प्रत्यक्ष क्षमा मागितल्याने ‘हृदयग्रंथी’ सुटतात.

जेव्हा आपण नम्र होऊन क्षमा मागतो, तेव्हा देहबुद्धीचा लय होऊ लागतो आणि खऱ्या अर्थाने ‘सात्विक’ भावाचा उदय होतो. असा शुद्ध भाव असलेला भक्तच भगवंताला प्रिय असतो.

थोडक्यात सांगायचे तर:

देवाजवळ जाणे हा ‘भाव’ असेल तर उत्तम, पण तो ‘पळवाट’ असेल तर व्यर्थ आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याची क्षमा मागणे हे कठीण असले तरी तोच ‘चित्तशुद्धीचा’ खरा आणि शास्त्रीय मार्ग आहे. कारण देव हा मंदिरात असण्यापेक्षा सर्व भूतांच्या (व्यक्तींच्या) हृदयात ‘अंतर्यामी’ म्हणून वास करतो. त्यामुळे त्या व्यक्तीची क्षमा मागणे हीच प्रत्यक्षात देवाची क्षमा मागणे होय.

श्रीमद्भगवद्गीता (अहंकार आणि भक्ती)

भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात:

अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।

विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ (१८. ५३)

अर्थ: जो मनुष्य अहंकार, शक्ती, गर्व, काम, क्रोध आणि परिग्रह (संग्रहवृत्ती) यांचा त्याग करतो, जो ‘ममत्व’ (माझेपणा) रहित आणि शांत असतो, तोच ब्रह्मभाव प्राप्त करण्यास पात्र ठरतो.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे, क्षमा मागताना वाटणारा ‘कमीपणा’ हा या अहंकाराचाच भाग आहे. जोपर्यंत हा अहंकार सुटत नाही, तोपर्यंत देहबुद्धी नष्ट होत नाही.

२. संत तुकाराम महाराज (अंतःकरण शुद्धी)

तुकोबारायांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत मन शुद्ध नाही, तोपर्यंत बाह्य उपचारांना महत्त्व नाही:

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्प तया ॥”

तसेच, प्रसादाच्या किंवा केवळ बाह्य भक्तीच्या संदर्भात ते म्हणतात:

भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥”

म्हणजेच, जर मनात ‘भाव’ (चुकीची प्रांजळ कबुली) नसेल, तर ती भक्ती केवळ प्रदर्शन ठरते.

३. मनुस्मृती आणि प्रायश्चित्त शास्त्र

धर्मशास्त्रात ‘अनुताप’ (पश्चात्ताप) याला सर्वोच्च प्रायश्चित्त मानले गेले आहे:

ख्यापनेन अनुतापेन तपसा अध्ययनेन च । पापकृन्मुच्यते पापात्… ” (मनुस्मृती ११. २२७)

अर्थ: स्वतःच्या पापाची/चुकीची कबुली देणे (ख्यापन), मनातून पश्चात्ताप होणे (अनुताप) आणि तप करणे, यांमुळेच पापाचे क्षालन होते. केवळ वस्तू अर्पण करून किंवा ‘व्यवहार’ करून पापमुक्त होता येत नाही.

४. संत ज्ञानेश्वर महाराज (अमानित्व गुण)

ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात ‘अमानित्व’ (अहंकाराचा अभाव) या गुणाचे वर्णन करताना माऊली म्हणतात की, ज्याच्या ठिकाणी ‘मी मोठा आहे’ हा भाव उरलेला नाही, त्याच्याच हृदयात ज्ञान प्रकाशते. प्रत्यक्ष क्षमा मागणे हे ‘अमानित्व’ या गुणाचे प्रकटीकरण आहे.

शास्त्राप्रमाणे, देव हा ‘अंतर्यामी’ आहे. ज्याच्यावर आपण अन्याय केला, त्या व्यक्तीच्या हृदयातही तोच देव आहे. म्हणून त्या व्यक्तीची क्षमा न मागता देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे “मूळ सोडून फांद्यांना पाणी घालण्यासारखे” आहे.

या चिंतनावर काही ओळी सुचल्यात..

अंतरीचा भाव ॥

अपराध घडता हातूनि । मनी दाटे ग्लानी भारी ॥

देवापाशी धावे मन । प्रसादाची थाळी धरी ॥ १ ॥

काय उपेग प्रसादाचा । चित्त शुद्ध नाही जरी ॥

व्यवहाराची ही भक्ती । देवा आवडते का तरी? ॥ २ ॥

क्षमा मागता वाटे हो । कमीपणा देहबुद्धीचा ॥

अहंकाराचा तो पडदा । मार्ग रोखी मुक्तीचा ॥ ३ ॥

ज्यावरी झाला अन्याय । देव वसे त्याच्या हृदयी ॥

पाया पडता तयाच्या । क्षमा करी “आत्मारामा” ॥ ४ ॥

१: जेव्हा आपल्याकडून चूक होते, तेव्हा मन अस्वस्थ होते. पण आपण सोपा मार्ग शोधतो—देवाला काहीतरी ‘अर्पण’ करून स्वतःला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करतो.

२: हे ‘व्यवहाराचे’ नाते आहे. अंतःकरण शुद्ध नसल्यास बाह्य उपचार केवळ उपचारच राहतात, त्यात ‘भाव’ नसतो.

३: प्रत्यक्ष क्षमा मागताना जो अडथळा येतो, तो म्हणजे आपला ‘अहंकार’. हाच ‘मी’पणा आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे जाऊ देत नाही.

४: ईश्वराचे अधिष्ठान सर्वव्यापी आहे. ज्या व्यक्तीचे आपण मन दुखावले, तिच्यातील ईश्वराची क्षमा मागणे म्हणजेच खऱ्या अर्थाने देवाला शरण जाणे होय.

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares