मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९१ – – 

नको वीट मानू रघुनायेकाचा ।

अती आदरे बोलिजे राम वाचा ।

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।

अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, ” हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा (वीट) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.

(वाचा – मुखाने, न वेचे – खर्च करावे लागत नाही)

विवेचन :  मनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.

ते नाम किती सोपे आहे! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ‘ नाम ‘ हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात, ” सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ” सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.

समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ‘ जानकीवल्लभ ‘ हे ते नाम! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम!अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. “अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।” या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल. गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ‘ केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ‘अनुभवून तर बघा!

स्वसंवाद :: 

१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला ‘वीट’ (कंटाळा) का येतो?

२. “नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे, ” या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का?

३. जानकीवल्लभ श्रीरामांचे नाम केवळ ओठांवरून उच्चारण्याऐवजी, मी कधी पेढ्यासारखी त्याची आंतरिक गोडी अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?

४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ ‘आवडीने आणि आदराने’ त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो?

=====

श्लोक क्र. ९२ – – 

अती आदरे सर्व ही नामघोषे ।

गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।

हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात)

(गिरिकंदरी – पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु – थांबून राहतो, तोषणे – संतोष/आनंद होणे, पिसे – वेड)

विवेचन : भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.

भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात

नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥

– – श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ‘ जेथे नाम तेथे माझे प्राण ‘ असे म्हणतात.

नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात.  

रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात…

उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।

स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥

भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो.  

स्वसंवाद :: 

१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय?

२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत ‘यांत्रिकपणे’ भटकत राहते का? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे?

३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, “जेथे नाम तेथे माझे प्राण” यावर माझा विश्वास आहे का?

४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का?

– क्रमशः श्लोक ९१ आणि ९२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ग्रंथालयाचे मनोगत” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “ग्रंथालयाचे मनोगत” – लेख क्र. १७ ☆ प्रा.भारती जोगी ☆

” मुसळधार पाऊस बघतीयेस ना खिडकीतून… मग असाच साहित्य-संस्कृतीचा ही अखंड पाऊस आहे. आत.. प्रवेश करून पहा की जरा! 

हात लांबव, काढ त्या कपाटातील पुस्तकं, झटक त्यांची धूळ, फिरव त्यावर पारखी नजर, आणि मग…

 पहा त्या सगळ्यांची आठवण येते का?

 पैस, शेला, मृद्गंध, विशाखा,

 व. पु, पुल अन् अत्रे,

 आंबेडकरांचे राजगृह‘, अन् सावरकरांच्या कविता!

दुर्बोध ग्रेस, अन् सुबोध बहिणाबाई

. .. शांताबाईंच्या शब्द खुणा अन् महानोरांची हिरवी बोली.

प्राचीन ग्रंथांचा सांस्कृतिक ठेवा, धार्मिक, सामाजिक, पौराणिक वारसा…

 हे सगळं आणि अशी कितीतरी अफाट, अमाप, अगणित मेळविलेली अक्षरे डोळ्यांनी प्यायलीस ना आजवर… पोहोचवलीस, उतरवलीस ना थेट हृदयांतरी!….

मग… आता…

 माझ्या जिरत्या पानांशी तुझी कां न उरली मैत्री?

कां दिवसेंदिवस आम्ही ओस पडत चाललो आहोत. बंद पडायच्या वाटेवर आहोत? अगं, काय सांगू…

ग्रंथालयातील पुस्तकांचा श्वास रोज येतो कंठी

वाचकहो, तुमच्या साठी, वाचकहो तुमच्या साठी!

मान्य आहे गं मला, आज काळ बदलला. डिजिटल युग आलं. E Book चा जमाना आला. ग्रंथालयातील पुस्तके भ्रमण ध्वनीत एका टचवर मागे पुढे होऊ लागली. किंडल मध्ये नव्या रूपात, नव्या परिवेषात उभी राहिली. पण तुम्ही लोक एक महत्वाची गोष्ट विसरता की, आज माहितीचा प्रचंड स्फोट झालेल्या या युगात… मीच… म्हणजे ग्रंथालयच सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखून योग्य माहिती मिळविण्याचे योग्य आणि विश्वसनीय साधन आहे. ग्रंथालय हे फक्त पुस्तक घर नसून ते एक संस्कार केंद्र आहे. विचारांची देवाणघेवाण, चिंतन, मनन, सर्जनशीलतेला चालना देणारे आलय आहे.

पुस्तके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे आणि ग्रंथालय हे त्यांचे बंदर आहे.

हे विसरू नकोस ना! 

माझ्या पुस्तकांनी काळानुरूप झालेला बदल ही स्विकारलायं ना… मग तुम्ही ही एक लक्षात घेतले पाहिजे की…

ग्रंथालयांच्या मदतीने, पुस्तकांच्या सहवासात, शांत, स्थिर वातावरणात मानसिक समाधान मिळवत… तुम्ही ग्रंथालय- पुस्तके-वाचक… हे अ-क्षर नाते जपा. कारण Byte मधले शून्य ही तेच, अन् एकेरीचे आखर ही तेच! 

म्हणून ग्रंथालये ही वाचनालये कशी बनतील आणि ‘e’ च्या नव्या वेषात ही आपली भेट ग्रेट कशी होईल हा प्रयत्न करू यात! चल बराच वेळ झाला, येतीयेस ना माझ्या पाठोपाठ, पुस्तकांच्या दुनियेत! 

 आ चल, के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो, आंसूं भी ना हो, बस् प्यार और सच्चा ज्ञान ही पले!!!  .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

नदाव बन येहूदा 

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाई च्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्प मध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली. “

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिन ला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधून मधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदाव चा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदाव ने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्प पर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदाव ने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले.

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला असेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : मनीष मोहिले

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी- भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.)  इथून पुढे – – 

ते आपल्याला चार R सांगतात. पहिला R म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत, ज्यांचे लवकर विघटन होत नाही, अशा वस्तुंना refuse करा म्हणजेच नाही म्हणा. जर ते शक्य नसेल तर दुसरा R म्हणजे reduce म्हणजे त्या वस्तूचा कमीतकमी वापर करा. तिसरा R म्हणजे reuse. त्या वस्तूंचा पुनर्वापर करा. आणि चौथा R म्हणजे recycle. म्हणजे त्या वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी करा. उदा. कागदाची रद्दी रद्दीवाल्याकडेच द्या जेणेकरून त्यापासून नवीन कागद निर्मिती होईल. अधिक वृक्षतोड करावी लागणार नाही.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई ज्याला आपण लाल डबा म्हणून हिणवतो त्या लाल बसनेच प्रवास करतात. जवळ जायचं असेल तर शक्यतो पायीच जातात. त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर सायकल वापरतात. लांबच्या अंतरासाठी लाल बसचा वापर करतात. ए सी तर नाहीच नाही. बसच्या प्रवासात काढलेलं तिकीट सुद्धा ते जपून ठेवतात. त्याच्या पाठकोऱ्या भागाचा त्यांना काहीतरी लिहिण्यासाठी उपयोग होतो. ते तिकीट नंतरही ते फेकून देत नाहीत. रद्दीच्या कागदाची एक पिशवी त्यांनी केली आहे. त्यात ते ठेवतात. पुरेशी रद्दी साठल्यावर रद्दीवाल्याला देऊन टाकतात. त्यांना अमेय आणि सृजन अशी दोन मुले आहेत. अमेय पुण्यात बी एस्सी करतो. सृजन दापोलीच्या शाळेत शिकतो. दोघंही सायकल वापरतात किंवा आपल्या आईवडिलांप्रमाणे बसचा वापर करतात. आपल्या आईवडिलांची साधी जीवनशैली त्यांनीही अंगिकारली आहे. ही दोन्ही मुले इतर सर्वसामान्य मुलांसोबत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकली. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांसोबत त्यांना मुक्तपणे शिकू दिले, खेळू दिले. समाजाच्या, निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढतील याची काळजी घेतली.

जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात असे विचारल्यावर दिलीपदादा हसत हसत म्हणतात. आम्हाला महिना पाच हजार रुपये खूप होतात. त्यातूनही पैसे उरतात. शिवाय आता पुस्तकांची रॉयल्टी, व्याख्यानांचे मानधन वगैरे धरून दहा बारा हजार रुपये मिळतात. एवढ्या पैशांचं काय करायचं हा प्रश्नच पडतो. ते म्हणतात, ‘ अर्थार्जन करायचं ते केवळ उदरनिर्वाहासाठीच! अनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा नाही. तुम्ही आम्ही तर चपला, बूट, कपडे, फर्निचर इ. वस्तूंचा किती अनावश्यक साठा करतो. निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगायचं. बागकाम करायचं. त्यानं आनंद मिळतो. माणूस हा दिनचर प्राणी आहे. निशाचर नाही. त्यामुळे दिवसा काम करावं. रात्री जागत बसून विजेचा अपव्यय करू नये. दिवसाचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो. रात्री काम करण्याने संगणक, मोबाईल वापराने डोळ्यांवर ताण पडतो. दिवसा उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर करून घ्यावा. कपडे वाळवण्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता सूर्यप्रकाशात ते वाळवावेत. भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करावा म्हणजे तेच सांडपाणी बागेला वापरता येते. शहरातील लोक पाण्याची अक्षरशः नासाडी करतात. कपडे, भांडी धुण्यासाठी नळ सुरूच ठेवतात. गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरतात.

त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी ओल्या फडक्याने पुसली तर कमी पाण्यातही स्वच्छ करता येते. अंघोळीसाठी साबण वापरण्याची आवश्यकता नाही. साबण वापरला नाही तर अर्धी बादली पाण्यातसुद्धा छान अंघोळ होते. शिवाय ते पाणी झाडांना वापरता येते. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करत नाहीत. ते वाळलेल्या काटक्या किंवा तुटलेल्या फांद्यांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करतात. त्याशिवाय सोलर कुकर स्वयंपाकासाठी वापरतात. त्यांच्या घरात टीव्ही नाही, मिक्सर नाही. बातम्या कळण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक रेडिओ फक्त आहे. ताक रवीने घुसळतात. काही वाटायचे असले तर पाट्या वरवंट्यावर वाटतात. असे करण्यासाठी कष्ट जरूर पडतात, वेळ लागतो पण त्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय शारीरिक व्यायाम होतो. महिन्याकाठी जेमतेम एक ते दोन युनिट ते वीज वापरतात. त्याचे सत्तर पंचाहत्तर रुपये बिल येते तेवढेच. पण ते गमतीनं म्हणतात, ‘ आम्ही टाटा अंबानींपेक्षा महागडी वीज वापरतो. एका युनिटला सत्तर रुपये! ‘ 

जीवन जगण्याची काही सूत्रे त्यांनी ठरवली आहेत. त्याप्रमाणे आधी ते वागतात आणि मगच लोकांना सांगतात.

सूर्योदवपूर्वी उठावेच. अनेशापोटी काही व्यायाम वा योगासने करावी. ट्रेडमिलवर व्यायाम करणे त्यांना मंजूर नाही कारण त्यासाठी विनाकारण विजेची नासाडी होती. त्यापेक्षा फिरायला जाणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे निसर्गाचे सान्निध्यही लाभते. दिवसातून एखादा तास तरी थोडा घाम येईपर्यंत काही शारीरिक कष्टाचे काम करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. झाडं, माती, पालापाचोळा म्हणजे घाण नाही. जे बायो डिग्रेडेबल आहे त्यामुळे रोग होत नाहीत. माती, पालापाचोळा यांना रोज एकदा तरी हात लागलाच पाहिजे. घरात नैसर्गिक खेळती हवा आणि पुरेसा उजेड असावा. पंख्याची गरज भासू नये आणि गरज लागलीच तर अगदी कमीतकमी वापर करावा. ए सी चा वापर तर नकोच. माठातील पाणी प्यावे. फ्रीजचा वापर टाळावा. ताजे अन्न, फळे, भाजीपाला खावा. शक्यतो घरीच जेवावे. बाहेरचे खाऊ नये. प्रवासात जाताना सुद्धा दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्टीलचे ग्लास सोबत नेतात. त्यातच ते चहावाल्याकडून चहा घेतात. चहासाठी कागदी वा प्लास्टिकचे मग वापरून पर्यावरणाची हानी करणे त्यांना मान्य नाही. दुपारी सूर्य डोक्यावर आला की जेवावं आणि संध्याकाळी अंधार पडण्याआधी जेवून घ्यावं. रात्र ही विश्रांतीसाठी आहे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे या समर्थांच्या उक्तीचं ते पालन करतात. ते म्हणतात गरज आणि हाव यात आपल्याला फरक करता आला पाहिजे. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो पण आपली हाव मात्र तो पुरी करू शकत नाही. आपल्या उत्पादन वाढीच्या आणि हावेच्या लालसेमुळे निसर्गाला आपण ओरबाडतो आहोत. पुढच्या पिढ्यांसाठी आपण काही ठेवणार आहोत की नाही?

त्यांचं एकंदरीत वागणं आपल्यासारख्या शहरी जीवनमान अंगवळणी पडलेल्या लोकांना विचित्र वाटेल. उपभोगासाठी विविध वस्तूंचा संचय करणाऱ्या आणि त्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्यांची जीवनशैली पचनी पडणार नाही. पण हे लक्षात घ्यायलाच हवे की हे दोघे उच्चशिक्षित आहेत. केवळ मी पर्यावरणस्नेही वागून असा कितीसा फरक पडणार आहे असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. गांधीजींचे फोटो लावून व्यासपीठावर त्यांच्यावर बोलणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा गांधीजींच्या तत्वांचे खरे अनुकरण या दोघांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या दोघांची आध्यात्माची बैठकही पक्की आहे. विचारांची बैठक पक्की आहे. एकदा ठरवले की ते निर्धाराने करतात. गेली पंचवीस वर्षे ते ही जीवनशैली जगत आहेत. अनेक मंडळी आवर्जून त्यांचं घर, त्यांची जीवनशैली पाहायला जातात. अशा व्यक्तींचंही ते स्वागत करतात. त्यांचे ‘ स्वप्नामधील गावा ‘ हे पुस्तक त्यांना असे जीवन जगताना आलेले अनुभव आपल्याला सांगते. ‘ *थेंबांनी जर भरते घागर, का उधळावा उगाच सागर*? ‘ हे त्यांचे तत्वज्ञान आपणही एकदा जरूर विचार करावा असे आहे.

 समाप्त

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

(पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू!” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.)

इथून पुढे – –

गर्दीच्या लाटांतून वाट काढत, ढकलले जात आम्ही कसेबसे मंदिराच्या मुख्य आवारात पोहोचलो. साधारणपणे आपण कोणत्याही मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ चप्पल-बुटांचे जोड काढून ठेवतो. आम्हीही चपला काढणार होतो. पण त्या अथांग गर्दीचा अथांग पसारा पाहून आम्ही ठरवले, आधी जरा रांग कुठे आहे ते शोधूया, मग चपला काढू.

आणि आमचा हा निर्णय किती योग्य होता, हे पुढच्याच क्षणी कळाले!

दर्शन रांगेचा शोध घेता घेता, दर्शनापूर्वीच आम्हाला संपूर्ण मंदिराला एक भव्य प्रदक्षिणा घालावी लागली. वाटेत प्रत्येक दुकानदाराचा आग्रह सुरू होता, “मावशी, चप्पल इथे काढा, नारळ-फुल घ्या!” पण आम्ही त्या आग्रहाला बळी पडलो नाही. जर सुरुवातीलाच चपला काढल्या असत्या, तर उन्हात अनवाणी पायांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली असती.

मंदिराच्या मागच्या बाजूला ३० ते ४० दगडी पायऱ्या चढून वर जायचे होते. आता तिथे पायऱ्यांजवळ आल्यावर मात्र चपला कुठे काढायच्या, हा प्रश्न निर्माण झाला. गर्दीत चप्पल हरवण्याची भीती होतीच. अशा वेळी माझी नेहमीची ‘युक्ती’ कामी आली! तशी मी फारच धोरणी आणि हुशार आहे बरं का… (असा आपला स्वतः विषयीचा गोड गैरसमज)

मी माझ्या बॅगेतून एक प्लास्टिकची पिशवी काढली, चपला त्या पिशवीत टाकल्या आणि ती पिशवी स्वतःच्या खांद्याला अडकवून घेतली! माझी ही युक्ती पाहून मैत्रिणींनीही पटकन आपापल्या चपला पिशवीत भरल्या. चला, चपला हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची एक मोठी चिंता तर कायमची मिटली!

असा गोल-गोल वळसा घालून आल्यावर आम्हाला वाटले, ‘हाहा! आता दर्शन होणार!’ आम्ही एका छोट्या लाकडी दरवाजातून मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. पण आत पाऊल ठेवताच देव आपल्यापासून किती दूर आहे, याची दाहक कल्पना आली!

आतमध्ये अथांग पटांगणात बांबूच्या भल्यामोठ्या काठ्या बांधून गोल-गोल फिरणाऱ्या शेकडो ओळी (Barricades) तयार केल्या होत्या. तो एक प्रकारचा चक्रव्यूहच होता! आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. १० मिनिटे… २० मिनिटे… १ तास… २ तास… ३ तास उलटून गेले! तरीही त्या रांगा संपण्याचे नावच घेत नव्हत्या. आम्ही जसे पुढे जायचो, तशी नवीन रांग समोर उभी राहायची.

आता चपला पिशवीत असल्याने आम्ही अनवाणी होतो. पायाखाली छोटे-छोटे खडे टोचत होते. काही वेळाने आम्हाला त्या रांगा न संपण्याचे खरे गुपित कळले. गर्दीतली बरीच हुशार माणसे बांबूच्या काठ्यांच्या खालून सरपटत, रांग ओलांडून मधल्या मध्ये पुढच्या रांगेत शिरत होती! लोक सर्रास नियम मोडत होते. मग प्रामाणिकपणे रांगेत उभ्या असणाऱ्या आमचा नंबर कसा बरं लवकर लागणार?

पण त्या कंटाळवाण्या आणि त्रासाच्या रांगेतही अनेक गमतीजमती अनुभवायला मिळाल्या. रांगेत उभ्या उभ्याच अनोळखी लोकांशी गप्पा सुरू झाल्या. कित्येक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या काही जुन्या मैत्रिणी तिथे अचानक भेटल्या. लहान मुले तर बांबूच्या खालून इकडून तिकडे पळण्याचा आणि रांगेत लपाछपी खेळण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला तर आपल्या लहान मुलांना बांबूच्या खालून पुढे पाठवायच्या आणि “अहो, माझे लहान बाळ पुढे गेले!” असे सांगून मुलाच्या निमित्ताने स्वतःही ४-५ रांगा ओलांडून पुढे जायच्या!

आम्ही मात्र शांत होतो. आमच्या मनात एकच विचार सुरू होता ‘मोक्षदात्या कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला चाललोय, तर थोडे कष्ट तर होणारच ना! ईश्वरप्राप्ती एवढी सोपी कुठे असते? ‘ या सात्विक मानसिकतेमुळे आम्ही त्या शारीरिक त्रासाचाही आनंद घेत होतो.

त्याच वेळी आमच्या रांगेत शेजारी एक अतिशय सात्विक, भाविक महिला भेटली. तिने मंदिराचे महत्त्व, तिथल्या वृक्षाची महती आणि दर्शनाने कशी ‘मोक्षप्राप्ती’ होते, यावर प्रवचनवजा भाषण सुरू केले.

ती अगदी भारावून सांगू लागली, “हे बघा बायकांनो! देवाच्या दारी रांगेत मधे शिरणे पाप आहे! देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर शरीराला कष्ट सोसावेच लागतात. जेव्हा पायात खडे टोचतात, तहान-भूक व्याकुळ करते आणि शरीर थकते… तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या पापांचे क्षालन होते आणि ते दर्शन आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते!”

तिने स्वतः आजवर कोणकोणत्या तीर्थक्षेत्री किती शारीरिक कष्ट सहन करून, उपाशी पोटी रांगेत उभे राहून दर्शन घेतले, याचे असे काही रंगवून रंगवून वर्णन केले, की आम्ही अगदी भारावून गेलो! आम्हाला वाटले, ही कुणी सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष मोक्षाचा रस्ता दाखवणारी साक्षात सात्विक मूर्तीच आहे. आम्ही तर तिच्या पाया पडायच्या विचारात होतो!

इतक्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि आमचे लक्ष क्षणभर विचलित झाले. २-३ मिनिटांनी जेव्हा आम्ही त्या ‘मोक्षदात्री’ महिलेकडे पुन्हा पाहिले, तर ती गायब! आम्ही आजूबाजूला तिला शोधू लागलो. ‘अचानक ही कुठे गेली? ‘

काही वेळाने आमची नजर पुढे गेली आणि आमचा डोळ्यांवर विश्वासच बसेना! जी महिला आम्हाला एक मिनिटापूर्वी ‘कष्ट सोसून दर्शन घेतल्याने कसा मोक्ष मिळतो’ याचे ज्ञान पाजळत होती… ती स्वतःच बांबूच्या खालून अत्यंत शिताफीने सरपटत, ७ ते ८ रांगा ओलांडून, प्रामाणिक भाविकांना मागे टाकत कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी बरीच पुढे निघून गेली होती!

तिचा तो ‘अद्भूत मोक्ष मार्ग’ पाहून आम्ही डोक्याला हात लावला आणि आम्हाला हसू आवरेनासे झाले!

बरेच बांबू ओलांडणाऱ्या लोकांचे धक्के सहन करत, पायात शेकडो खडे टोचवून घेतल्यानंतर, तब्बल ५ तासांच्या खडतर वाटचालीनंतर अखेर आम्ही कपर्दिकेश्वराच्या गर्भगृहाच्या समोर उभे राहिलो!

आणि… समोरचे ते दृश्य पाहताच आमचे भान हरपले!

गर्भगृहात महादेवाची ती अलौकिक, नयनरम्य तांदळाची पिंडी साक्षात तेजाने तळपत होती. एका चिमुकल्या लिंबावर संपूर्ण तांदळाची पिंडी अत्यंत कौशल्याने आणि श्रद्धेने तोललेली होती. त्या पिंडीचे दर्शन होताच, मनातील सर्व थकवा, पायांच्या वेदना आणि ५ तासांची पायपीट एका सेकंदात गायब झाली! ५ तासांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते. डोळे भरून आम्ही त्या ‘मोक्षदात्याचे’ रूप मनात साठवून घेतले. हात आपोआप जोडले गेले आणि तोंडून शब्द बाहेर पडले “हर हर महादेव! कपर्दिकेश्वर महाराज की जय!”

दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ५ तास सतत रांगेत उभे राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे गळून गेले होते. सकाळी गाडीत ठरवलेली ती जत्रा, खरेदी, बांगड्या, भांडी… या कशाचीही आता इच्छा उरली नव्हती.

पण त्या गर्दीत एक चांगली गोष्ट घडली. परतीच्या वाटेवर रस्ता चुकण्याची किंवा चालण्याचे कष्ट करण्याची अजिबात गरज नव्हती! कारण भाविकांची ती अथांग गर्दीच मागून ढकलून ढकलून आम्हाला पुढे नेण्याचे काम करत होती! आम्हाला फक्त एकमेकींचे हात घट्ट धरून उभे राहायचे होते. गर्दीच्या त्या मानवी प्रवाहाने आम्हाला थेट मंदिरापासून २ किलोमीटर दूर असलेल्या पार्किंगपर्यंत आणून सोडले!

इतके तास दर्शनातच निघून गेल्यामुळे आणि शरीर थकल्यामुळे, इतर ठिकाणी फिरण्याचा किंवा कुठल्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. आम्ही सरळ गाडीत बसलो आणि घराची वाट धरली.

अशा प्रकारे, ओतूरच्या त्या मोक्षदात्या कपर्दिकेश्वराचे अद्भुत दर्शन, रांगेतील त्या ‘मोक्ष’ सांगणाऱ्या बाईची गंमत आणि तो संपूर्ण प्रवास आमच्या आयुष्यातील एक ‘अविस्मरणीय भावयात्रा’ बनून राहिली!

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी- भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तुम्हाला का जगायचं हे जर कळले तर कसे जगायचं या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत जाते. आणि जीवनाचं हे ध्येय ज्याला कळलं तो आपलं जीवन समृद्ध तर करतोच, पण इतरांचंही जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावतो. अशाच एका ऋषितुल्य दाम्पत्याचा परिचय आज आपल्याला करून द्यायचा ठरवला आहे. त्यांचं नाव आहे दिलीप कुलकर्णी आणि डॉ सौ पौर्णिमा कुलकर्णी. एकमेकांना सर्वच बाबतीत अनुरूप आणि साथ देणारी ही जोडी. हे दोघंही पर्यावरणाचे सदिच्छा दूत आहेत असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई. या दोघांची यु ट्यूबवरील वेध या सदरात डॉ आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत मी पाहिली आणि त्यांची जीवनशैली, साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो. मग मी आंतरजालावरून आणखी माहिती घेतली. तीच साररूपाने तुमच्यापुढे ठेवतो आहे.

दिलीप कुलकर्णी म्हणजे एक मनमोकळा माणूस चेहऱ्यावर हास्य. मुक्तपणे वाढेल तशी वाढू दिलेली दाढी. अंगावर इस्तरी न केलेले परंतु स्वच्छ असे सुती कपडे. तेवढेच साधं स्वच्छ आणि पारदर्शक असं हे व्यक्तिमत्व? आधी ते पुण्यात टेल्कोमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोकरी फार काळ करू शकत नाही कारण आपण जीवन जगण्यासाठी जी तत्त्वं मनाशी ठरवली आहेत, ती यामुळे साध्य करता येणार नाही. सुखवस्तू आणि आरामदायी जीवनशैली प्रदान करणाऱ्या नोकरीमुळे येणारा सुखवस्तूपणा त्यांनी येऊ दिला नाही. किंबहुना तसे जगणे त्यांना मान्यच नव्हते. म्हणून त्यांनी उत्तम पगार आणि प्रतिष्ठा देणारी ही नोकरी सोडली आणि कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद केंद्राशी स्वतःला जोडून घेतलं. काही वर्षे हे काम त्यांनी केलं. त्याबरोबरच ग्राहक चळवळ, ग्रामायन यासाठी काम करायला सुरुवात केली. काही काळ ‘ विवेक विचार ‘ या नियतकालिकाचं संपादन केलं. याच काळात त्यांची पौर्णिमाताईंशी ओळख झाली. पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर. दोघांचेही विचार आयुर्वेदाला आणि पर्यावरणाला पूरक असे होते. दोघांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न करून एकत्र आपल्या ध्येयासाठी कार्य करायचे ठरवले.

पौर्णिमाताईंच्या संसाराच्या कल्पना चारचौघींपेक्षा वेगळ्या होत्या. गाडी, बंगला, साड्या, दागिने या गोष्टीत त्यांचं मन रमणे शक्यच नव्हते. कमीतकमी गरजा ठेवणे, उपभोगाच्या वस्तूंवर नियंत्रण आणणे, ऊर्जेचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे ही तत्वे त्यांनी मनाशी ठरवली होती.

१९९३ मध्ये दिलीपदादा आणि पौर्णिमाताई आपल्या मुलासह कोकणातील पंचनदी या गावी राहायला आले. त्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी एक प्रकल्प सुरु केला होता. दिलीपजींनी चार वर्षे त्या प्रकल्पाचे काम पाहिले. पण पुढे काही कारणामुळे तो प्रकल्प बंद पडला. त्यानंतर या दोघांनी १९९७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या कुडावळे या गावी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी १० गुंठे जमीन भाडेकराराने घेतली. दिलीपदादा, पौर्णिमाताई यांचा संसार या ठिकाणी सुरु झाला. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई हे दोघंही खरे समाजशिक्षक. त्यांचं वाचन, चिंतन सतत सुरूच होतं. त्यातून त्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत होत्या. त्यातून जे विचारमंथन झालं त्यावरून दिलीपदादा आणि पौर्णिमाताई या निर्णयाला आले की लोकांना केवळ सल्ला देण्यापेक्षा आपण स्वतःच अशी पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करू या.

स्वतः पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर असल्याने आयुर्वेदिक औषधे, जीवनशैली त्यांना उत्तम प्रकारे परिचित होती. पण त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना केवळ औषधे सांगण्यापेक्षा त्यांची जीवनशैली जर आयुर्वेदाच्या तत्वांशी मिळतीजुळती असेल तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. त्यांना हेही लक्षात आलं की पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि आयुर्वेदाची तत्वे यात कुठेही विसंवाद नाही. ते परस्पर पूरक आहेत. त्यामुळे आधी तसे वागून दाखवायचे आणि मगच लोकांना काही सांगायचे असे दोघांनी ठरवले.

कुडावळे ठिकाणी दिलीपजींनी त्यांना हवे तसं घर बांधलं. त्यांना पर्यावरणपूरक असं मातीचच घर हवे होतं. तस त्यांनी बांधून घेतलं. जमिनीचा तळही मातीचाच. ही जमीन शेणाने सारवायची. थोडी शेती, थोडं बागकाम करायचं असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला. छोट्याशा कौलारू घरात शांत, सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा आनंद ते घेतात. पण केवळ शेती, बागकाम यातच त्यांना अडकून पडायचं नव्हतं. ‘ आधी केले मग सांगितले ‘ या उक्तीचा प्रत्यय या दोघांनी लोकांना आणून दिला. त्यांनी प्रबोधनात्मक लेखनाला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या लोकांच्या नजरा कौतुकात बदलायला सुरुवात झाली. त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे यायला लागली.

त्यातूनही त्यांना जनजागृतीचा एक मार्ग गवसला. हे सगळं सुरु असताना त्यांनी ‘ गतिमान संतुलन ‘ हे मासिक सुरु केलं. त्याशिवाय हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण, निसर्गायण, विकसित भारत, बदलू या जीवनशैली, अणू विवेक, सम्यक विकास, बसू चरित्र, अहेड टू नेचर, वेगळ्या विकासाचे वाटाडे आदी पुस्तके लिहिली. याच कालावधीत त्यांना ‘ निसर्गायण ‘ शिबिराची कल्पना सुचली. पर्यावरणविषयक गोष्टी जाणून घेण्याची ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते अशांसाठी त्यांनी निवासी आणि अनिवासी शिबिरे सुरु केली.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई यांना असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो की तुम्ही अशा प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी मोठी किंमत मोजत आहात का? तेव्हा ते म्हणतात, ‘ किंमत तर शहरी लोकांना मोजावी लागते. ट्रॅफिक जाम, प्रदूषण, निरनिराळे आजार या रूपाने शहरी लोक ही किंमत मोजतात. आजकाल आपण खूप उपभोगवादी झालो आहोत. उपभोगामुळे अधिकाधिक वस्तूंची हाव वाढत जाते. त्यामुळे उत्पादन वाढवावे लागते. उत्पादन वाढले म्हणजे विकास झाला असे आपण समजतो. पण हा विकास पर्यावरणाची म्हणजे बाह्य आणि आपली आंतरिक हानी करतो. अधिक उत्पादन यावे म्हणून रासायनिक खते, कीटकनाशके आपण वापरतो. यामुळे जमिनीची आणि पर्यावरणाची हानी तर होतेच पण अन्नधान्य, फळे, भाजीपाला, पाणी इ. च्या माध्यमातून हे घातक पदार्थ आपल्या शरीरात जातात. त्यातून अनेक नवनवीन आजारांना आमंत्रण मिळते.

मग सगळ्यांनी त्यांच्यासारखं शहर सोडून खेड्यात राहायला जावं का? याचं उत्तर त्यांच्या दृष्टीनं ‘ नाही ‘ असं आहे. आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष…  भाग – १ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष…  भाग – १ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

ओतूरच्या कपर्दिकेश्वराची भावयात्रा – – 

माणसाचा स्वभाव मोठा गमतीशीर असतो. कुणी जर म्हणाले, “चला, आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे, ” की माणसे अगदी मनापासून सावरून बसतात, कान टवकारतात आणि उत्सुक्तेने ऐकू लागतात. पण तेच जर कुणी म्हटले, “आज आपण जरा ज्ञान-माहिती किंवा एखादे तात्विक भाषण ऐकूया, ” की लगेच लोकांचा धीर सुटतो. पूर्वीच्या काळी अशा वेळी लोक सतरंजीचे दोरे काढत बसत असत. पण आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात सतरंजीच्या दोऱ्यांची जागा आपल्या हातातील मोबाईलच्या अंगठ्याने घेतली आहे. माहिती किंवा भाषण सुरू झाले की, अंगठा भरकन वर सरकतो आणि स्क्रीन स्क्रोल (Scroll) होते! म्हणूनच, हे कोणते शुष्क भाषण नाही; तर ही एका साध्या, निखळ आणि गमतीशीर भावयात्रेची रंजक कथा आहे.

आषाढ संपून जेव्हा श्रावण महिना सुरू होतो, तेव्हा निसर्गासोबतच माणसाचे मनही एका वेगळ्याच मांगल्याने न्हाऊन निघते. श्रावण म्हणजे सण, उत्सव, व्रतवैकल्ये आणि उपवास यांची एक अखंड पर्वणीच! मंदिरातून येणारा घंटानाद, धूपाचा सुगंध आणि वातावरणात असणारा एक सात्विक गारवा मनात वेगळाच उत्साह भरतो. त्यातही ‘श्रावणी सोमवार’ या दिवसाचे महत्त्व तर काही वेगळेच! वर्षभरात इतर वेळी फारसा देवधर्म न करणारी माणसेही श्रावणी सोमवारी आवर्जून उपवास करतात आणि महादेवाच्या दर्शनाला जातात.

आता हे सगळे वाचून तुम्हाला वाटले असेल, की मी नेहमीप्रमाणे श्रावण महिन्याचे अथवा महादेवाचे मोठे कौतुक सांगत बसणार आहे की काय? पण तसे अजिबात नाही हो! श्रावणाचे महत्त्व तर आपल्या सर्वांना बालपणापासून माहीतच आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात तर गावोगावी, डोंगरदऱ्यांत शंकराची अथांग मंदिरे पसरलेली आहेत.

माझेही अगदी तसेच होते. दरवर्षी श्रावण महिना जवळ आला, की माझ्या आतला भाविक जागा व्हायचा. मग चालू व्हायची शोधमोहीम! ‘या श्रावणात नक्की कोणत्या शिवमंदिरात दर्शनाला जायचे? ‘ मग तशाच देवाची आवड असणाऱ्या मैत्रिणींना फोन करणे, प्लॅन आखणे हे माझे ठरलेले गणित.

मागच्या वर्षी असाच श्रावण महिना उजाडला आणि मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली. अनेक मंदिरांची नावे समोर आली, पण शेवटी ओतूर येथील ‘कपर्दिकेश्वर’ मंदिरावर शिक्कामोर्तब झाले. ओतूरच्या कपर्दिकेश्वराचे वेगळेपण मी अगदी लहानपणापासून ऐकून होते. अगदी लहान असताना घरातील मोठ्या माणसांसोबत तिथे गेले होते, पण बालवयात घेतलेले ते दर्शन काळाच्या ओघात विस्मृतीत जमा झाले होते. म्हणूनच या श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वराच्याच दरबारी जायचे, असा पक्का बेत आखला गेला.

ज्या ठिकाणी आपण जातो, त्या जागेची थोडीफार पार्श्वभूमी आणि इतिहास आपल्याला माहीत असावा, हा माझा जुना नियम. म्हणून मी नेहमीप्रमाणे आपल्या ज्ञानी ‘गुगल बाबांना’ शरण गेले. गुगल बाबांनीही एका क्लिकवर कपर्दिकेश्वराचा सविस्तर आणि सचित्र इतिहास माझ्यासमोर उघडून ठेवला. ते वाचून मी अगदी अचंबित झाले!

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन शिवमंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे तर शेकडो वर्षांची जुनी आहेत. पुणे शहराच्या उत्तरेला असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओतूर नावाच्या शांत शहरामध्ये, मांडवी नदीच्या सुंदर तीरावर हे ‘कपर्दिकेश्वर मंदिर’ वसलेले आहे. या मंदिराला तब्बल ९०० वर्षांचा प्रदीर्घ आणि पावन इतिहास आहे! दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाचा मोठा उत्सव आणि भव्य यात्रा भरते.

पण या मंदिराचे सर्वात मोठे आश्चर्य आणि प्रमुख आकर्षण म्हणजे ‘तांदळापासून बनवलेली आणि एका लिंबावरती उभी असणारी शिवलिंगाची पिंडी! ‘

हो, अगदी बरोबर ऐकलेत तुम्ही! कोरड्या तांदळाचे दाणे जोडून बनवलेली ही अत्यंत नाजूक आणि अद्भुत पिंडी एका छोट्याशा लिंबावर संतुलित (Balance) करून उभी केली जाते. हे नयनरम्य रूप पाहण्यासाठी आणि महादेवाच्या कृपेचा वर्षाव अनुभवण्यासाठी प्रत्येक श्रावणी सोमवारी तिथे तब्बल एक लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात कुस्त्यांचे भव्य फड रंगतात.

तसेच, या मंदिराला आणखी एक महान आध्यात्मिक परिमाण लाभले आहे. मंदिराच्या अगदी शेजारीच संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधींपैकी ही एक मानली जाते. विशेष म्हणजे, ज्या मंत्राने संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायात दुमदुमून जातो, त्या ‘राम कृष्ण हरी‘ या जगप्रसिद्ध महामंत्राचे उगमस्थानही हेच पावन क्षेत्र आहे!

मंदिराचा अलौकिक इतिहास आणि नामकरण

गुगल बाबांनी मंदिराच्या स्थापनेची ही कथा अत्यंत रंजकपणे सांगितली होती. सन १२०० च्या शतकात श्री बाबाजी चैतन्य महाराज मांडवी नदीच्या तीरावर एकाग्र चित्ताने अनुष्ठानाला बसले होते. अनुष्ठान करत असताना त्यांनी भक्तीभावाने नदीकाठच्या वाळूचे एक शिवलिंग तयार केले. वाळूचे शिवलिंग बनवत असताना, त्या वाळूमध्ये महाराजांना अचानक एक छोटीशी ‘कवडी’ सापडली. आश्चर्य म्हणजे, जेव्हा त्यांनी ती कवडी निरखून पाहिली, तेव्हा त्या चिमुकल्या कवडीच्या पोटात त्यांना नैसर्गिक शिवलिंग आढळून आले!

संस्कृत भाषेमध्ये ‘कवडी’ला ‘कपर्दीक’ असे म्हटले जाते. याच कवडीत सापडलेल्या शिवलिंगावरून या मंदिराचे नाव ‘कपर्दिकेश्वर’ असे पडले. पुढे सन १२-१३ व्या शतकात या शिवलिंगाची रीतसर भव्य मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली.

मंदिराचे भौगोलिक स्थान तर अप्रतिम आहे. चंद्राकार वळण घेणाऱ्या मांडवी नदीच्या तीरावर, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत हे पुरातन, भव्य दगडी मंदिर दिमाखाने उभे आहे. शिवलिंगाच्या स्थापनेच्या काळापासूनच येथील पुजाऱ्यांनी एक अनोखी परंपरा सुरू केली. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोरड्या तांदळाची भव्य पिंडी बांधायची आणि ती एका लिंबावर तोलून धरायची! शतके उलटली, पिढ्या बदलल्या, पण ही तांदळाच्या पिंडीची अद्भुत परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने सुरू आहे.

या मंदिरात वर्षभर अनेक सण उत्साहात साजरे होतात:

१. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार

२. महाशिवरात्रीचा उत्सव

३. त्रिपुरारी पौर्णिमा

४. बाबाजी चैतन्य महाराजांचा पावन समाधी सोहळा

ही सर्व माहिती वाचल्यानंतर माझ्या मनातील ओतूरला जाण्याची उत्कंठा हजार पटीने वाढली होती.

माझा असा वैयक्तिक विचार आहे, की ज्या ठिकाणी आपण दर्शनाला किंवा फिरायला जाणार असू, त्याची माहिती आधीच मिळवावी; आणि तिथे जाऊन आल्यावर मिळालेला आनंद आणि अनुभव इतरांना सांगावा.

त्यानुसार, ठरलेल्या श्रावणी सोमवारी आम्ही सर्व मैत्रिणी भल्या पहाटेच गाडी काढून ओतूरच्या दिशेने निघालो. मनात कपर्दिकेश्वराच्या दर्शनाची तीव्र ओढ होती, तांदळाची ती अद्भुत पिंडी डोळ्यांत साठवून घ्यायची होती आणि लहानपणी पाहिलेली ती जत्रा पुन्हा एकदा अनुभवायची होती. गाडीत जाताना आम्ही आपापसात गप्पा मारत होतो “आपण पहाटेच निघालोय, म्हणजे सकाळी लवकर पोहोचू. फार गर्दी नसेल. तासभरात दर्शन आटोपले की मग आजूबाजूला अजून कुठे कुठे फिरता येईल? ” आम्ही तर दुपारच्या नंतरचा प्लॅनही गाडीतच आखून टाकला होता.

पण आमचा खरा हेतू त्या ‘मोक्षदात्या’ कपर्दिकेश्वराचे दर्शन घेणे हाच होता.

सकाळी सकाळी आम्ही ओतूर येथे पोहोचलो. पण तिथे पोहोचताच आमचा पहिला अंदाज चुकला! मंदिराच्या २ किलोमीटर आधीच भव्य गाडी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पुढे गाड्या नेण्यास सक्त मनाई होती. गाडी पार्क करून आम्ही बाहेर आलो, तर समोर अथांग जनसागर पसरला होता! पार्किंगपासून मंदिरापर्यंतचा तो २ किलोमीटरचा रस्ता म्हणजे एक भलीमोठी आणि रंगीबेरंगी जत्रा होती.

त्या जत्रेतील दुकाने पाहून कोणत्याही स्त्रीचे मन भुलून जावे, असा तो नजराणा होता! निरनिराळी चमकणारी ज्वेलरी, काचेच्या आणि धातूच्या बांगड्या, स्वयंपाकघरासाठी लागणारी नवनवीन भांडी, नक्षीदार पिशव्या, हेअर पिन्स, रंगीबेरंगी क्लिप्स… अगदी काय बघू आणि काय नको, अशी आमची अवस्था झाली होती. सोबतच विविध खाद्यपदार्थांचे आणि मिठाईचे खमंग स्टॉल्स सुटलेल्या वासाने आमची परीक्षा घेत होते.

पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू! ” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.

— क्रमशः भाग पहिला 

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(UPI – Unified Payments Interface)

श्री. दिलीप असबे 

आज जगातील जवळपास निम्म्या रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये एकट्या भारताचा वाटा आहे. हे केवळ भारताच्या अथांग लोकसंख्येमुळे नाही, तर या पेमेंट सिस्टीममुळे शक्य झाले आहे जी पूर्णपणे मोफत आहे, २४ तास अखंड चालते आणि वाराणसीतील रस्त्यांवरील फेरीवाल्यापासून ते मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वांसाठी समान रीतीने काम करते.

ही प्रणाली डिझाइन करणारे आणि यशस्वीपणे अमलात आणणारे अभियंते म्हणजे दिलीप असबे. रोजच्या जीवनात यूपीआय (UPI) वापरणाऱ्या बहुतांश भारतीयांनी त्यांचे नाव कदाचित ऐकलेही नसेल.

यूपीआय येण्यापूर्वी, डिजिटल पेमेंटचे गणित सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होते. जेव्हा जेव्हा एखादे कार्ड स्वाइप केले जायचे, तेव्हा व्यापाऱ्याला व्हिसा (Visa) किंवा मास्टरकार्डला (Mastercard) १ ते २ टक्के शुल्क द्यावे लागायचे. या परदेशी कंपन्या भारतातील प्रत्येक व्यवहारावर व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत होत्या. लहान व्यापाऱ्यांना हे परवडणारे नव्हते. बँकेतून पैसे ट्रान्सफर करायला तास जायचे आणि ते फक्त बँकेच्या दिवशीच व्हायचे. परिणामी, कोट्यवधी भारतीयांसाठी रोख रक्कम (Cash) वापरणे ही त्यांची आवड नसून एक गरज बनली होती.

मुंबईचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या दिलीप असबे यांनी एनपीसीआय (NPCI) च्या सुरुवातीच्या दिवसांत तिथे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि रुपे (RuPay) यांसारख्या भारताच्या मुख्य पेमेंट प्रणाली उभारण्यात तब्बल एक दशक घालवले. २००९ पर्यंत, त्यांच्या टीमने आधारच्या (Aadhaar) आधारे एक नवीन पेमेंट लेयर तयार करता येईल का यावर काम सुरू केले.

२०१५ पर्यंत त्यांच्या लक्षात आले की आयएमपीएस प्रणाली पुरेशी नाही. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये यूपीआय लॉन्च करण्यात आले. ही एक मोफत, २४ तास चालणारी आणि सर्व बँकांशी एकाच वेळी जोडली गेलेली प्रणाली होती, ज्यावर कोणतेही ॲप सहज तयार करता येत होते. शुल्काबाबत दिलीप असबे यांचे तत्त्व अगदी स्पष्ट होते: तुम्ही ग्राहकांकडून कोणतेही शुल्क वसूल करू शकत नाही, अन्यथा हे संपूर्ण मॉडेल अपयशी ठरेल.

आज यूपीआय ५० कोटींपेक्षा जास्त (+500 Million) वापरकर्ते आणि ६ कोटी ५० लाख (65 Million) व्यापाऱ्यांना ६७५ बँकांच्या माध्यमातून सेवा देत आहे. यूपीआयद्वारे दरमहा १८ अब्जांपेक्षा जास्त (18 Billion) व्यवहार होतात आणि व्यवहारांचे एकूण मूल्य २० लाख करोड पेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचे वर्णनजलद पेमेंट क्षेत्रातील जगाचा नेताअसे केले आहे.

दिलीप असबे हे २०१८ पासून NPCI चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.

एका बिगर-नफा (Non-profit) संस्थेत काम करणाऱ्या एका मराठी सरकारी अभियंत्याने १४० कोटी लोकांसाठी ही आर्थिक क्रांती उभारली.

लक्षात घ्या या UPI साठी कोणताही आयपीओ (IPO) नाही, कोणतीही युनिकॉर्न (Unicorn) कंपनी नाही… फक्त यूपीआय (UPI).

जाता जाता पण महत्वाचं :::: 

ज्या नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात UPI च्या योजनेचा पाया घातला गेला, आणि दिलीप असबे यांच्या टीमने अखंड मेहनत घेऊन एप्रिल 2016 मध्ये लाँच केलेली ही सिस्टिम आजही अखंड कार्यरत आहे, त्याच नंदन निलेकणी यांना पेपर फुटी विरोधातील तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी मोदींजींनी दिली आहे. त्यामुळे एक सर्वंकष लिकप्रूफ व्यवस्था नक्की निर्माण होईल याची खात्री बळगूया.

 – मला आलेल्या इंग्रजी लेखाचा मराठी भाषेत अनुवाद सादर करत आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक / अनुवादक : प्रसन्न आठवले

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

तिच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन होतं, त्याच्या खांद्यावर वीणा होती. दोघांच्याही पायात चप्पल नव्हती. पण…

त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ते आज लाखोंच्या गाड्यांतून फिरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरही क्वचितच दिसतं…

मी त्यांच्या मागे बराच वेळ चालत होतो…

 त्यांनी एकदाही तिचा हात हातात घेतला नाही, एकदाही त्यांनी त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही, एकदाही कुठली अतिशयोक्ती नव्हती…

पण प्रत्येक पावलागणिक त्यांचं प्रेम बोलत होत.

तो वृद्ध वारकरी चार पावलं पुढे जाई? 

 अचानक मागे वळून पाही ती येतेय ना…

हे पाहण्यासाठी.

 तीही काही बोलत नव्हती. फक्त त्यांच्या मागे वळून पाहण्यावर हलकंसं हसायची. बस्स… इतकंच.

दुपार झाली…

दिंडी एका ठिकाणी विसावली…

 सगळे आपापल्या शिदोऱ्या सोडू लागले…

तिने जुन्या कापडात बांधलेली भाकरी काढली. मिरचीचा ठेचा आणि भाकरी…

ती म्हणाली…

 “आधी तुम्ही तुकडा मोडा”

तो म्हणाला…

 नको गं… तू आधी घे,

दोन मिनिटं दोघेही एकमेकांनाच आग्रह करत राहिले…

शेवटी…

 तिने भाकरीचा तुकडा मोडून त्याच्या हातात ठेवला, आणि स्वतःचा घास नंतर घेतला.

 त्या क्षणी मला जाणवलं… आजची पिढी प्रेम व्यक्त करण्यासाठी महागड्या हॉटेलला जाते,

 कितीतरी मोठं सेलिब्रेशन करते,

 तरी अखेर असमाधानीच…

 

आणि ही पिढी..

 अर्ध्या भाकरीतही एकमेकांना पूर्ण आयुष्य देऊन टाकते…

सायंकाळी मुक्काम झाला…

 तिने मुक्कामाच्या अलीकडे नदीवर जाऊन त्याचं धोतर धुतलं…

हात थरथरत होते.

कंबर वाकली होती.

डोळ्यांना नीट दिसत नव्हतं.

तरी…

 तिने धोतरावर एकही डाग राहू दिला नाही…

तो दूर बसून तिच्याकडे पाहत होता… कोणी पाहू नये म्हणून.

 त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं…

 कारण तिच्या हातात आता ताकद नव्हती,

 पण त्याच्यासाठीची माया अजून तरुण होती,

वीणा वाजवत तो गुणगुणू लागला…

 ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना,

 केल्या विठुरायाला हो संसार पेलनाss’

रात्री झोपताना त्याने आधी तिच्या अंथरुणाखालचे दगड काढले,

 ती म्हणाली काय करता?

तो हसला…

“झोपताना पाठ दुखेल”

इतकंच… ते वाक्य छोटं होतं,

 पण त्यात 55 वर्षाचा संसार दडला होता…

आज प्रेमाचा अर्थ बदलला आहे,

 लोक म्हणतात मला माझी स्पेस हवी,

त्या दोघांनी मात्र आयुष्यभर एकमेकांना जागा दिली,

 पण अंतर कधी दिलं नाही…

आज लग्नाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शंभर फोटो टाकले जातात… ,

 यांनी कधी एक फोटोही काढला नाही,

कारण त्यांच्या आठवणी कॅमेऱ्यात नव्हत्या.

 त्या एकमेकांच्या डोळ्यात आणि हृदयात जपलेल्या होत्या…

आजची पिढी प्रेम सिद्ध करण्यासाठी भेटवस्तू देते, त्या देण्यात काही गैर नाही,

पण ती तिथे चुकते जिथे ते एकमेकांना न पेलणारे वचन देते,

 या जुन्या पिढीने एकमेकांना तारुण्य दिल, श्रम दिले, त्याग दिला, संयम दिला आणि शेवटी म्हातारपणातही एकनिष्ठेने साथ दिली…

वारकरी दिंडीतली ती म्हातारी जोडी पाहिली की वाटतं…

 प्रेमाचा सर्वात मोठा आवाज हा कधीच शब्दांत नसतो,

 तो आयुष्यभर निभावलेल्या जबाबदाऱ्यांच्या शांततेत असतो…

ती आजही त्याच्या मागून चालते,

 कारण पुढे जाण्याची तिची इच्छा नसते,

आणि तो आजही अधून मधून मागे वळून पाहतो, कारण तिला मागे सोडण्याची त्याची हिंमत नसते…

 त्यांनी एकमेकांना कधी गुलाब दिला नाही,

 पण आयुष्यभर एकमेकांच्या वाटेवरचे काटे वेचत राहिले…

 त्यांच्या संसारात आय लव यूनव्हतं,

‘पण तुम्ही आधी घास घ्या’..

 हेच त्यांचे सर्वात मोठं प्रेम पत्र होतं…

 आजकाल प्रेमाचा शेवट लग्नात होतो,

 आणि त्यांचं प्रेम तर लग्नानंतरच सुरू झालं होतं…

सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्या,

 पण नात्यावर नाहीत,

देह थकला…

 पण एकमेकांची काळजी करण्याची सवय कधी म्हातारी झाली नाही…

ती वारकरी जोडी दिंडीत विरून गेली…

मी बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो,

 क्षणभर वाटलं…

पंढरपुराकडे चालणारे ते दोन वारकरी नव्हतेच,

 

तो विठ्ठल होता…

ती रखुमाई होती..

कारण देव असाच असतो..

तो आयुष्यभर एकमेकांच मन राखणाऱ्या नात्यात असतो…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८९ आणि ९० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८९ आणि ९० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८९ – – 

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्य घोषें म्हणावे ।

हरीचिंतने अन्न जेवीत जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।।८९।।

अर्थ : लोकांमध्ये असताना आणि जेवण करताना भगवंताचे नाम घ्यावे. हे नाम घेताना ते आदरपूर्वक आणि मोठ्याने गजर करून स्पष्टपणे म्हणावे. जेवण करताना भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने नैसर्गिकपणे भगवंताची प्राप्ती होते.

(घोषें – मोठ्याने गजर करून, हरीचिंतने – भगवंताच्या स्मरणात राहून, स्वभावे – सहजपणे)

विवेचन : अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली भारतीय संस्कृती अन्नाला परमेशराचाच दर्जा देते. अन्नाला इतका मोठा आणि पवित्र दर्जा आपण देतो हेच आपल्या संस्कृतीचे मोठे वैशिष्ट्य आहे. मग असे पवित्र अन्न सेवन करताना आपला भावही पवित्र असावा. भाव किंवा भावना या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी महत्व. आपल्या मानण्यावरच सर्व काही अवलंबून असते. परमेश्वराच्या मंदिरात जाणारा भाविक मनोभावे त्या मूर्तीची पूजा करतो. त्याच्यासाठी ती केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवंताला तो त्या ठिकाणी पाहतो. परंतु त्याच ठिकाणी एखादा नास्तिक माणूस गेला तर त्याच्यासाठी ती फक्त एक पाषाणाची मूर्ती असते. म्हणूनच जेवताना पवित्र भाव असावा. हा पवित्र भाव कसा येईल? तर अन्नाचा घास घेण्यापूर्वी जेव्हा आपण पवित्र असे भगवंताचे नाम उच्चारू तेव्हा.

आजकाल हॉटेलमध्ये जाण्याची, बाहेरचे खाण्याची आवड सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कसे जेवतो आपण हॉटेलमध्ये? जरा आठवून पहा. आजूबाजूला लोकांच्या बोलण्याची कलकल असते. त्यातच आपण वेटर केव्हा आपले जेवण आणतो त्याकडे लक्ष ठेवून असतो. जेवताना बरेच जण मोबाईल पाहतात. जेवणाला आपल्या संस्कृतीत ‘ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ‘ असे म्हणतो. पण तिथे केवळ उदरभरणच होते. त्याला परमेश्वराच्या नामाचे अधिष्ठान आपण देत नाही.

जेवण म्हणजे एक यज्ञकर्म आहे. एखादा यज्ञ करताना आपण त्या त्या देवतेचे नाव घेऊन अग्निमध्ये आहुती टाकत असतो. अशा प्रकारे दिलेली आहुती अग्निमार्फत त्या त्या देवतेपर्यंत पोचते असे आपण मानतो. आपल्या पोटात देखील जठराग्नी असतो. तो प्रदीप्त झाल्यानंतरच त्याला आहुती द्यायची असते. आपल्या जठरातील अग्नीला ‘वैश्वानर’ असे नाव आहे. हा शब्द विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेल्या अग्निदेवतेचे प्रतिनिधित्व करतो. अर्थात ही अग्निदेवता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवंताचे स्वरूप आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ” अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।” अर्थात सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात असलेला वैश्वानर अग्नी म्हणजे मी आहे.

म्हणून समर्थ म्हणतात की समूहामध्ये जेवण करताना आदरपूर्वक परमेश्वराचे नाम घ्यावे. सर्वांना कळेल, स्पष्टपणे ऐकू येईल अशा पद्धतीने ते म्हणावे. पूर्वी आपल्याकडे जेवणाच्या पंक्तीत बसताना श्लोक म्हणण्याची प्रथा होती. आजही ती काही ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे अन्नाबद्दल पवित्र भाव बाळगणे, जेवणाला लगेच सुरुवात करण्याऐवजी थोडा संयम पाळणे, भगवंताचे नाम आदरपूर्वक घेणे या गोष्टींचे संस्कार सहजपणे बालमनावर होत होते. आता मात्र पंक्तीत श्लोक म्हणणे फार कमी झाले आहे. कोणी तो म्हणत असेल तर त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. घरी आपण एकटे असू तेव्हा देखील जेवणापूर्वी भगवंताचे नामस्मरण करूनच जेवणाला सुरुवात करावी.

आपण जसे अन्न खाऊ तसे विचार निर्माण होतात. सात्विक अन्न असेल तर विचार देखील चांगले निर्माण होतात. राजस किंवा तामसीअन्न विकारांना जन्म देते. आपली आई, पत्नी किंवा बहीण जेव्हा स्वयंपाक करते, त्यावेळी तिच्या मनात आपण आपल्या माणसांसाठी हे भोजन बनवतो आहोत असा भाव असतो. ते भोजन तयार करताना मनात प्रेम असते. साहजिकच ते विचार तिने तयार केलेल्या अन्नात उतरतात. आपले पूर्वज आणि ऋषीमुनी म्हणूनच वाटेल त्या ठिकाणी जेवत नव्हते. महाभारतात श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे जातो, तेव्हा दुर्योधनाने बराच आग्रह करूनही तो त्या ठिकाणी जात नाही. त्याऐवजी विदुराकडील साधेच परंतु सात्विक अन्न जेवणे तो पसंत करतो.

अनेक लोकांना नोकरी व्यवसायानिमित्त काही वेळा नाईलाजाने बाहेर जेवण घ्यावे लागते. असे जेवण घेताना त्याभोवती पाणी फिरवून आपण भगवंताचा प्रसाद ग्रहण करतो आहे अशी भावना मनात असू द्यावी. मग त्या अन्नाचे प्रसादात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना भगवंताचे स्मरण असू द्यावे. असे केले म्हणजे ती आहुती खरोखरच भगवंतापर्यंत पोहोचेल. ज्याला अध्यात्मार्गावर चालायचे आहे त्याला तर अन्न सेवन करताना अशी दक्षता घ्यायलाच हवी. अन्नाचा स्थूल भाग आपल्या शरीराचे भरण पोषण करतो तर त्याचा सूक्ष्म अंश आपल्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण होते. म्हणून अन्न ताजे, सात्विक, साधे असावे.

जेवताना आपले लक्ष चवीकडे जास्त असते. एखादी गोष्ट आवडली की आपण खाण्यावर नियंत्रण ठेवत नाही. रसना म्हणजे आपली जीभ यात महत्वाची भूमिका पार पाडते. जिभेची दोन कार्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वाद किंवा चवीचे ज्ञान आपल्याला तिच्यामुळे होते. दुसरे म्हणजे जीभ हे बोलण्याचे साधन आहे. ज्याला जिभेवर नियंत्रण ठेवता आले, त्याला परमार्थ लवकर साधता येतो. खाताना आणि बोलताना अशा दोन्ही अर्थाने. ज्याला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे त्याने त्याच्या स्मरणाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देता कामा नये. स्वामी समर्थांच्या वाङ्मयात सांगितल्याप्रमाणे “अहो येता जाता, कार्य करीता, सदा घेता देता, उठत बसता वदनी वदता ग्रास गिळता… ” या पंक्तीप्रमाणे सदोदित त्याचे नामस्मरण करत जावे. मग भगवंत दूर नाही.

स्वसंवाद :: 

१. मी जेवण करताना केवळ जिभेच्या ‘स्वादाचा’ आणि आवडीचा विचार करतो, की ते शरीराला ऊर्जा देणारे एक ‘यज्ञकर्म’ म्हणून शांत चित्ताने स्वीकारतो?

२. आजकाल जेवताना मोबाईल पाहण्याची किंवा टीव्ही बघण्याची लागलेली सवय सोडून, मी किमान २ मिनिटे देवाचे नाव घेऊन भोजनाला सुरुवात करतो का?

३. “अन्नाचा सूक्ष्म अंश माझ्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण करतो, ” हे लक्षात ठेवून मी सात्त्विक आहार घेण्याबाबत आणि अन्न शिजवताना मनात चांगले विचार ठेवण्याबाबत जागरूक आहे का?

४. “येता जाता, उठत बसता, ग्रास गिळता” माझ्या मनात आणि वाचेवर त्या जगनियंत्याचे नाव अखंड राहते का?

——- 

श्लोक क्र. ९० – – 

न ये राम वाणी तया थोर हाणी ।

जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ।

हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी ।।९०।।

अर्थ : ज्याच्या मुखात रामाचे नाव येत नाही असा माणूस आपल्या जीवनाचे मोठे नुकसानच करून घेत असतो. अशा व्यक्तीचे जगणे व्यर्थ आहे. अशी व्यक्ती अत्यंत हीन समजावी. वेदशास्त्रे, पुराणे यात महर्षी व्यासांनी हरिनामाची महती विविध प्रकारे सांगितली आहे.

(हाणी – हानी/नुकसान, काणी – क्षुद्र/हीन)

विवेचन :  रामनामाचे महत्व अपरंपार आहे. आतापर्यंतच्या विविध श्लोकातून त्याचे महत्व विविध प्रकारे आपल्याला सांगितले आहे. या श्लोकात ते ज्याच्या मुखी रामनाम येत नाही अशा मनुष्याची अवस्था वर्णन करतात. मुळात मनुष्य जन्म दुर्लभ. ८४ लक्ष योनी अनेकवार फिरून हा जन्म मिळतो असे सांगितले जाते. अशा या दुर्लभ मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर मुखामध्ये हरिनाम येणे आवश्यक आहे. रामनाम म्हणजे अमृत आहे. जे रामनामाचा आश्रय घेतात अशांचा मुखातून जणू अमृत बाहेर पडते. ते मुख खरोखरच धन्य होय. अन्यथा आयुष्य व्यर्थ बडबडण्यात गेले असे समजावे. अशा व्यक्ती जगल्या काय आणि मेल्या काय सारखेच? त्यांचे जीवन व्यर्थ गेले. अशा व्यक्तींचे जगणे म्हणजे अत्यंत हीन दीन अशा प्रकारचे आहे असे समर्थ म्हणतात. समर्थानी अशा व्यक्तीसाठी ‘काणी ‘ शब्द वापरला आहे. अशा व्यक्तींचे जिणे कवडीमोलाचे. स्वा. सावरकरांचे शब्द हरिनामाबद्दल वापरायचे तर असे म्हणता येईल, ” तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण… “

हरीनाम मुखात न येता जगणे म्हणजे मरणच आहे. ‘ हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रें ‘ असे ज्ञानदेव म्हणतात. हरिनामाचे सामर्थ्य अगाध आहे. त्याचे नाम मुखात आले की जन्मोजन्मीचे पाप नष्ट होते. त्यासाठी ज्ञानदेव गवत आणि अग्नीची उपमा वापरतात. वाळलेले गवत अग्नीच्या संपर्कात आले की क्षणार्धात जळून नष्ट होते, अग्नीशी समरस होते. तसेच परमेश्वराचे नाम घेणारी व्यक्ती त्याच्याशी एकरूप होते. ती परमेश्वरच होऊन जाते.

असे हरिनामाचे महत्व साधुसंतांनी निरनिराळ्या प्रकारे वर्णन केले आहे. मनुष्याला त्याद्वारे सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यासांनी वेद, शास्त्रे, पुराणे यांची रचना केली. त्यांनी देखील विविध प्रकारे त्यात हरिनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. महाभारतात एकदा दुर्योधन श्रीकृष्णाला विचारतो की धर्म म्हणजे काय हे मला कळते पण तसे वागण्याची बुद्धीच मला होत नाही. अधर्म म्हणजे काय हेही मला समजते, पण त्यातून मला बाहेर पडता येत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, ” तुझ्या हृदयात तू मला स्थान दे म्हणजे तुला चांगले वागण्याची बुद्धी होईल. ” प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव्य असतेच. परंतु अज्ञानामुळे त्यावर पडदा पडलेला असतो. हा पडदा ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो. पण दुर्योधनासारख्या व्यक्ती प्रत्यक्ष भगवंताने सांगूनही त्याप्रमाणे आचरण करीत नाहीत. अशा माणसांचे जगणे खरोखरच व्यर्थ होय. संत मीराबाई म्हणतात, ” रामनाम रस पीजे मनवा, रामनाम रस पीजे, तजि कुसंग संतसंग बैठी नित, हरी -चर्चा सुणी लीजें. ” रामनामाच्या रसातील गोडी चाखल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा आपणही रामनामाचा आश्रय घ्यावा. आपल्या मुखात अखंड रामनाम येईल असा सत्संग, असे वागणे असावे. मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावे. संत एकनाथ म्हणतात, “रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. “

स्वसंवाद :: 

१. ८४ लक्ष योनी फिरून मिळालेल्या या ‘दुर्लभ मनुष्य जन्माचा’ वापर मी केवळ व्यर्थ गोष्टींमध्ये करत आहे, की रामनामाने त्याचे सार्थक करत आहे?

२. दुर्योधनाप्रमाणे मलाही बऱ्याचदा ‘चांगले काय आणि वाईट काय’ हे समजत असूनही, माझ्या मनातील अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी मी देवाकडे ‘सद्बुद्धी’ मागतो का?

३. संत एकनाथांच्या वचनानुसार, तिन्ही लोकांत ‘धन्य’ होण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी मी रोजच्या जगण्यात नामस्मरणाचा आश्रय घेतो का?

– क्रमशः श्लोक ८९ आणि ९०

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares