मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लीलावती…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लीलावती…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

 – –भास्कराचार्यांची गणिताची काव्यमय सुरमाला 

१. प्रास्ताविक

भारतीय ज्ञानपरंपरेत असंख्य ग्रंथ आढळतात; परंतु रुक्ष वाटणाऱ्या गणितालाच काव्याचा शृंगार करणारा, संख्या-चिन्हांना नृत्य करविणारा, आणि कठीण संकल्पनांना गोड गीतामध्ये परिवर्तित करणारा ग्रंथ म्हणजे भास्कराचार्यांची ‘लीलावती’!

‘लीलावती’ भास्कराचार्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या नावाने रचलेला ग्रंथ आहे. पतीचे अकाली निधन झाल्यावर मुलगी पितृगृहात परत आली आणि भास्कराचार्यांनी तिला गणित शिकविण्याचा संकल्प केला. त्या शिक्षणाचीच ही रम्य, काव्यात्मक परिणिती— लीलावती!

२. भास्कराचार्य— व्यक्तिमत्त्वाचा परिचय

भास्कराचार्य (द्वितीय) हे मध्ययुगातील महान भारतीय गणितज्ञ व खगोलवेत्ते. त्यांचे वडील महेश्वरभट्ट हेही गणित व ज्योतिषाचे विद्वान आणि तेच भास्कराचार्यांचे गुरु.

जन्म : शके १०३६ (इ. स. १११४)

जन्मस्थान : सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले विज्जलविड

गोत्र : शांडिल्य

प्रमुख कृती : वयाच्या ३६व्या वर्षी रचलेला अमर ग्रंथ सिद्धान्तशिरोमणी

या महाग्रंथातील पहिला विभाग म्हणजेच अंकगणिताचा अप्रतिम ग्रंथ— लीलावती!

३. भास्कराचार्यांची ग्रंथसंपदा

भास्कराचार्यांनी खालील महत्त्वाचे ग्रंथ लिहिले :

सिद्धान्तशिरोमणी

करणकुतूहल

सर्वतोभद्रयंत्र

वसिष्ठतुल्य

विवाहपटल

यांपैकी पहिले दोन उपलब्ध असून उर्वरित ग्रंथ कालोघात हरवले.

४. ‘लीलावती’चा विषय

इ. स. ११५० च्या सुमारास रचलेल्या सिद्धान्तशिरोमणीचे चार विभाग :

१. लीलावती (अंकगणित)

२. बीजगणित

३. गणिताध्याय

४. गोलाध्याय

लीलावती अनेक शतके भारतातील अंकगणिताचे “पाठ्यपुस्तक” मानले जात होते.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य

हसत-खेळत गणित शिकविणारी शैली

सूत्र + उदाहरण + कोडे अशी रंजक मांडणी

अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, व्याज, प्रमाण, शेषमापन, दैनंदिन व्यवहारातील गणित याचे सुंदर विवेचन

ग्रंथात एकूण २७८ श्लोक असून ब्रह्मस्फुट, गणित-पाश यांसारखी अध्यायरचना आहे.

भास्कराचार्यांचे काही कार्यविशेष

परार्ध (१०¹⁷) पर्यंतच्या संख्यांची नावे

पायथागोरस सिद्धान्ताची संक्षिप्त सिद्धता

डायोफँटाइन समीकरणांना “कुट्टक” हे नाव

पेल्स समीकरणासाठी “चक्रवाल” पद्धत

π (पाय)चे स्थूल व सूक्ष्म मूल्य

‘फर्माचे समीकरण’ १७६९ मध्ये लॅग्रांजनं सोडवलं, परंतु भास्कराचार्यांनी त्याचे उत्तर १२व्या शतकातच मिळवले होते!

५. लीलावतीची काव्यमय भाषाशैली

ग्रंथाची भाषा संस्कृत असली तरी कठीण नाही— उलट लालित्यपूर्ण, संवादप्रधान आणि अलंकारिक आहे. निसर्गचित्रण, उपमा, प्राणी-पक्ष्यांची रूपके, भावपूर्ण संबोधने अशा मोहक शैलीतून गणित जणू बोलू लागते.

उदाहरण (भावानुवाद):

“मृदुहासिनी लीलावति

कम्पितभ्रूभङ्गे विचिन्तय।”

अर्थ : हे कोमल हास्यवती लीलावती, हा प्रश्न नीट विचार करून सोडव.

६. काही सुंदर गणिती कोडी

(अ) मधमाशांचे रूपक — गुणाकार

संस्कृत (भावानुवादी):

“परागसिक्तपङ्कजे भ्रमराणां यथा क्रमवृद्धिः,

तथैव संख्यानां गुणनं प्राज्ञैः परीक्ष्यते।”

अर्थ : कमळावर जशी मधमाशांची संख्या वाढत जाते, तसेच संख्यांचे गुणाकारही क्रमाने वाढतात.

(आ) पाण्याचा घडा — दर व वेळ

“सूक्ष्मछिद्रेण वहति तोयं,

पुनर्भरणं क्षणैः।

एतयोः वेगयोराश्रित्य

निश्चितव्यः कालः।”

अर्थ : छिद्रातून पाणी खाली पडते आणि वरून पुन्हा भरते. दोन्ही वेगांवरून घडा किती वेळात भरतो किंवा रिकामा होतो हे शोधायचे.

(इ) व्यापाऱ्याचे द्रव्य — क्रमवार वजाबाकी

“अर्धस्य तृतीयांशं दत्त्वा,

शिष्टे चतुर्थभागव्ययः।

अन्ते यत् अवशिष्टं स्यात्,

तत् मूलधनं ज्ञेयम्।”

अर्थ : व्यापाऱ्याने अर्ध्याचा तृतीयांश दान दिला, उरल्यावरून पाव भाग खर्च केला. अंतिम शिल्लक माहीत असल्यास मूलधन शोधायचे.

(ई) फुलपाखरांचे गट — शेषमापन

“त्रिभिः, चतुर्भिः, पञ्चभिः

विभक्तेऽपि शेषोऽस्ति।

तां संख्यां चिन्तयेत्

बुद्धिमान्।”

अर्थ : ३, ४ किंवा ५ ने भागले तरी काही शिल्लक उरणारी संख्या शोधायची.

(ए) नौका व नदी — सापेक्ष वेग

“स्रोतोवेगेन सह याते

नौकायाः लघुः कालः।

प्रतिस्रोते तु दीर्घः—

नद्याः वेगः गणनीयः।”

अर्थ : नदीच्या दिशेने जाताना वेळ कमी आणि उलट दिशेने जास्त लागतो. या फरकावरून नदीचा वेग शोधायचा.

७. लीलावतीचे अलौकित्व

काव्य आणि गणित यांचा अनुपमेय संगम

अवघड सिद्धांतही सुंदर रूपकांत

१२व्या शतकातच व्याज, शेषमापन, संयोजन यांसारखे “अत्याधुनिक” विचार

कोडी, संवाद, निसर्गचित्रण यातून शिक्षणाला आनंदाची जोड

आजही जगभरातील संशोधक लीलावतीचे उदाहरण देतात

८. ग्रंथाची लोकप्रियता व टीकासाहित्य

लीलावतीची अनेक भाषांत भाषांतरे झाली आणि विद्वानांनी त्यावर टीकाग्रंथ लिहिले आहेत. त्यातील विशेष उल्लेखनीय टीकाग्रंथ —

गणितामृतसागरी — गंगाधर

बुद्धिविलासिनी — गणेश दैवज्ञ

लीलावती-भूषण — धनेश्वर दैवज्ञ

लीलावती-विवृत्ती — मुनीश्वर

९. समारोप

लीलावती म्हणजे केवळ गणिताचा धडा नाही; ती एक मायानगरी आहे, जिथे संख्या बोलतात, प्रश्न फुलपाखरांसारखे उडतात, वेग पाण्याच्या धारेतून झिरपतो, आणि संख्यांचे गुह्य काव्यातून उलगडत जाते. गणिताची ही काव्यरम्य गाथा आजही तितकीच मोहक आणि प्रेरणादायी आहे!

🙏🏽🙏🏽🙏🏽

(टीप : लेखात दिलेली संस्कृतपदे ही मूळ श्लोक नसून मूळ अर्थ, छंद आणि शैली जपत केलेल्या भावानुवादी पुनर्रचना आहेत, याची नम्र नोंद घ्यावी.)

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३५  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

तत्तु विषयत्यागात्संगत्यागाच्च ॥३५॥

अर्थ : भगवंताला प्राप्त करायचे जे मार्ग आहेत, त्यांचे आचरण करताना काही नियम पाळले पाहिजेत. विषय आणि संग यांचा त्याग करता आला पाहिजे.

विवेचन : अध्यात्ममार्गात, भक्तीपंथात प्रगती साधण्यासाठी मुमुक्षाला आपले मन, तन, चित्त शुद्ध करणे अनिवार्य ठरते. मन शुद्ध केल्याशिवाय साधकाची अध्यात्मातील प्रगती होऊच शकत नाही. साधकाचा ‘मन ते अमन’ असा प्रवास असतो. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो.

*नाही निर्मळ जीवन । काय करील साबण॥ १ ॥ तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥२॥ वृक्ष न धरी पुष्पफळ। काय करील वसंत काळ ॥ ३ ॥ वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥ तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥*

ज्याला परमेश्वराची प्राप्ती करवून घ्यायची आहे त्याने अनेक पथ्ये पाळण्याची गरज असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, *”जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणें पथ्ये सांभाळावी”*. अर्थात हा नियम दैनंदिन व्यवहारात देखील पाळावा लागतो. ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, तेथील नियम आणि अटी मनुष्याला कधी नाईलाजाने तर कधी आवडीने पाळाव्याच लागतात आणि इथे तर साक्षात भगवंताची चाकरी आहे तर मग नियम अधिक कठोर असणार आणि लबाडी चालणे शक्यच नाही. सर्व संत असे सांगतात की देव कुठे बाहेर भेटत नाही तर तो आपल्या अंतरंगात असतोच, फक्त मन आणि शरीर शुद्ध झाले की तो प्रगट होतो, साधकाला त्याची प्रचिती येत असते.

आपण कुठे बाहेरगावी फिरावयास गेलो तर आपल्या आवडीचे आणि खिशाला परवडेल असे राहण्याचे ठिकाण शोधतो. इथे तर साक्षात भगवंत राहायला येणार असेल (अंतरंगात प्रकट होणार! ) तर आपले शरीर आणि मन त्याला आवडेल असे ठेवायला नको का? समजा तसे ते नसेल तर तो एखादवेळेस येईल पण कायम राहील याची शाश्वती कोण देणार? म्हणून साधकाने आपले आचार, विचार आणि आहार अतिशय शुद्ध ठेवायला हवा. शरीर शुद्ध राहण्यासाठी साधकाने योग्य तितका व्यायाम नियमितपणे करावा तसेच सात्विक आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा, तसेच चवीला तीव्र नसावा. पोट भरेल आणि सुस्ती येणार नाही याची काळजी साधकाने जरूर घ्यावी. *वाढत्या वयाबरोबर जिभेची चव आणि पोटाची भूक कमी व्हावी तसेच जिभेलाही थोडा आराम द्यावा. पचनसंस्थेस आराम मिळावा म्हणून साधकाने महिन्यातून किमान दोनदा किंवा जास्तीतजास्त चार दिवस उपवास करावा* (निराहार राहावे). *”एकादशी आणि दुप्पट खाशी”* असे होऊ नये. अतिउपवास केल्यामुळे नैसर्गिक भूक मरते आणि शरीरात विकृती निर्माण होतात, असे पू. बाबा आपल्याला सांगतात. आहारावर नियंत्रण आले की झोपेवर नियंत्रण मिळविणे सोपे होते.

*”ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला”* असे म्हणतात ते याचसाठी.

संग म्हणजे मिठी मारणे. साधकाने कोणाला मिठी मारावी अथवा मिठीत घ्यावे याचे नियम आहेत. (मिठी या शब्दाचा अर्थ संगत असा आहे) सर्व संत सांगतात की सत्संग करावा. अर्थात सत् म्हणजे चांगल्या गोष्टींचा संग. इथे चांगल्या म्हणजे ज्या देवाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा संग. देहाकडे नेणाऱ्या गोष्टींचा संग त्यागण्यास सांगितले आहे.

दुधात किंचित मीठ पडले तरी पिंप भरून असलेले दूध नासते, पण त्यात किंचित साखर पडली तर ते दूध नासत नाही तर त्याची गोडी साखरेच्या प्रमाणात वाढते आणि त्यापासून अधिकाधिक रुचकर अशी मिठाई तयार होऊ शकते.

सर्व संत सांगतात की मनुष्याला भव रोग झाला आहे. आणि हा रोग सर्वांना झाल्याने त्या रोगाचे नाव रोगांच्या पुस्तकातून काढून टाकले गेले आहे. भवरोग दूर करण्याचे प्रभावी औषध एकच आहे, ते म्हणजे भक्तीमार्ग. आपण भक्तिमार्गापासून दूर जाणार नाही यासाठी जे काही करावे लागेल ते साधकाने करावे असे नारद मुनी या सूत्रातून सांगत आहेत.

विषयत्यागाने भक्ती का भक्तीने विषयत्याग? भक्ती करिता विषयत्याग हे साधन व विषय त्यागाकरिता भक्ती हे साधन मानले तर अन्योन्याश्रय दोष येतो. याचे थोडक्यात उत्तर हे की, नारदांनी सांगितल्याप्रमाणे प्रथमतः विवेकाने विषयत्याग व संगत्याग हळूहळू करण्याचा प्रयत्न करावा. हा करीत करीत भगवद्‌भक्तीकडे मन वळवीत जावे. ते जसे जसे वळेल व ती गोडी लागेल तसा तसा सवासना विषयत्याग पूर्णरूपाने होईल. हेच सांगण्याकरिता पुढील छत्तिसाव्या सूत्राची रचना केली आहे. विषयत्यागास विवेक-वैरागादि साधने सांगितली आहेत. पण तीही कठीणच आहेत. त्यातही अनेक विघ्ने येत असतातच. ज्यांना ते शक्य आहे असे वाटते त्यानी आत्मविश्वासपूर्वक त्या साधनाचा अवलंब करावा पण ज्यांना अशक्य किंवा कठीण वाटेल त्यांच्याकरिता भक्तिसाधनाचा मार्ग बंद नाही. याकरिता पुढील सूत्रात आणखी एक महत्त्वाचे साधन सांगितले आहे.

माझी सध्याची स्थिती खालील प्रमाणे आहे. ती नित्य तशीच रहावी असा आशीर्वाद आपल्या सारख्या रामस्वरूप वाचकांनी मला द्यावा अशी नम्र विनंती करतो.

*” संतांची उच्छिष्टें। बोलतों उत्तरे।*

*काय म्यां पामरें। जाणावें हें।।”*

– *संत तुकाराम महाराज*

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूला चारवेळा हुलकावणी दिलेला वायुसूत वैमानिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूला चारवेळा हुलकावणी दिलेला वायुसूत वैमानिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके

शाळेतील इतर मुलांप्रमाणे हा मुलगाही कागदी विमाने तयार करून उडवत असावा, पण याचे कागदी विमान मात्र निश्चित योग्य पद्धतीने सुरक्षित जमिनीवर उतरत असावे, हे मात्र निश्चित. आभाळातून प्रचंड वेगाने जाणारी लढाऊ विमाने आणि अधिक उंचीवरून उडत जाणारी प्रवासी विमाने यांत त्याला लढाऊ विमानांचे आकर्षण जास्त वाटे. त्यामुळेच घरची परिस्थिती फारशी सकारात्मक नसताना, पालकांचा विरोध असतानाही हा तरुण प्रचंड अभ्यास,अदम्य आत्मविश्वास या जोरावर १९६१ मध्ये एन. डी. ए. खडकवासला येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला.

दिलीप कमलाकर पारूळकर १९६३ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले. १९६२ चे भारत-चीन युद्ध संपुष्टात आलेले होते. भारतीय सेनेचे मनोबल तसे काहीसे खालावलेले होते. अशात पाकिस्तानने १९६५ मध्ये आगळीक केली आणि यात भारतीय सेनेला आपल्या तलवारी पुन्हा एकदा परजायची संधी मिळाली!

आपले कथानायक अशा संधीची वाटच पहात होते… त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करायला निघालेल्या तुकडीत स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारली. हल्ला सुरु झाला… लक्ष्य वेधले जाऊ लागले. पाकिस्तानाला अमेरिकेने विकलेल्या पॅटन रणगाड्यांवर विमान विरोधी तोफा बसवलेल्या होत्या. या तोफेने पारुळेकर साहेबांच्या विमानाचा खालून अचूक वेध घेतला… एक गोळी कॉकपिटमध्ये शिरली आणि साहेबांच्या उजव्या खांद्यातून आरपार वर निघून गेली. साहेबांनी त्यांच्या खुर्चीवर डोके टेकवलेले नसल्याने त्यांचे डोके बचावले.. पण खांद्यातून प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. हातात ताकद राहिली नसल्याने त्यांना विमानावर नियंत्रण करणे अवघड झाले होते… त्यामुळे त्यांना युद्धक्षेत्रात टिकून राहणे अशक्य झाले. हल्ल्याचे नेतृत्व करणा-या अधिका-याने आपल्या या वैमानिकाला आदेश दिला… विमानातून बाहेर पडा! पण या बहादराने आदेशाकडे काणाडोळा केला… आणि एका हाताने विमानावर नियंत्रण राखीत भारतीय विमानतळावर हे विमान सुरक्षितरीत्या उतरवण्यात यश मिळवले… एक महागडे विमान आणि एक अमूल्य वैमानिक या कृतीमुळे बचावले गेले! या कामगिरीबद्दल भारतीय वायुसेनेने पारुळेकर साहेबांना वायू सेना मेडल देऊन सन्मानित केले!

विमानातून उडी न घेता विमान उडवत नेऊन भारतीय तळावर नेण्याचा त्यांचा हा निर्णय प्रमुखाची आज्ञा भंग करणारा होता खरा… परंतु तो आदेश त्यांनी पाळला असता तर वैमानिकाच्या आसनामध्ये बसवण्यात आलेली छत्री उघडलीच गेली नसती… चारशे किलोमीटर्स प्रती तास या वेगाने पारूळकर साहेब जमिनीकडे कोसळले असते… कारण पाकिस्तानी गोळीबारात त्यांच्या कॉकपिट मध्ये शिरलेली गोळी, त्यांच्या खांद्यातून विमानात वैमानिकाच्या खुर्चीच्या वरच्या भागात असलेल्या छत्रीचा खटका नादुरुस्त करून वर निघून गेली होती… खुर्ची हवेत उडाली असती पण या खुर्चीला जोडलेली हवाई छत्री उघडली गेलीच नसती!

पारूळकर साहेबांनी मृत्यूला दिलेली ही पहिली हुलकावणी ठरली… कुशल लढाऊ वैमानिकाच्या अंगी हा हुलकावणी देण्याचा गुण असावा लागतोच.

२ मे,१९७०. फ्लाईट लेफ्टनंट पारुळेकर साहेब सुखोई ७ विमान उडवत होते… त्यांना शिमला येथे जायचे होते… पण विमानाच्या इंजिनाने दगा दिला… साहेबांना विमानातून उडी घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

१० डिसेंबर,१९७१. भारत-पाकिस्तान बांगलादेश मुक्तीसंग्राम युद्ध. भारतीय विमाने पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खोलवर घुसली होती… जोरदार हल्ला सुरु असताना नेमके पारुळेकर साहेबांचे सुखोई ७ विमान पाकिस्तानी विमानविरोधी तोफांच्या तुफान हल्ल्यामध्ये सापडले… सुदैवाने विमान जास्त उंचीवर असल्याने साहेबांना विमानातून अचूक उडी घेता आली… पण ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले आणि युद्धकैदी झाले! भारताने युद्ध जिंकल्यावर एकमेकांच्या युद्धबंदी सैनिकांची पाठवणी करण्याचे सत्र सुरु झाले. परंतु पाकिस्तानी कैदेत असलेल्या भारतीय वैमानिकांची सुटका होण्यात विलंब लागू लागला. १९६९ मध्ये त्यांचे कमांडिंग ऑफिसर एम. एस. बावा यांना “मी शत्रूच्या तावडीत सापडलो तरी तिथून पळून येईन” असे सांगितलेल्या पारुळेकर साहेबांना असे कैदेत जास्त दिवस राहणे,शक्य झाले नाही. त्यांनी तेथील बंदिगृहात मिळतील त्या साधनांनी,अतिशय उत्तम योजना आखून आणखी दोन वैमानिकांसह बंदिगृहातून पलायन केले. परंतु हे पलायन अगदी ऐनवेळी अयशस्वी झाले. अफगाणिस्तान हद्दीच्या अगदी समीप असताना हे तिघे पाकिस्तानला सापडले आणि त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली! त्यांनी योजना आखताना पाकिस्तानचा त्या भागातील नकाशा तयार केला होता. त्यात एक रेल्वे स्टेशन आहे, अशी त्यांची माहिती होती. त्या रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे, आणि तेथून अफगाणिस्तानात शिरायचे,असे ठरले होते. परंतु हे रेल्वे स्टेशन खूप वर्षांपूर्वीच बंद करण्यात आलेले होते… आणि हे तिघे याच रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारत होते… त्यामुळे गडबड झाली.. सुटका केवळ चार मैलांवर असताना हे तीन गरुड पुन्हा कैदेत गेले! या तिघांना गोळ्या घालून ठार करावे, असा आदेश पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी दिला होता… हे तिघे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्यांना गोळ्या घातल्या… अशी बतावणी करता येईल, अशी त्यांची अटकळ होती. पण तत्कालीन पाकिस्तानी वायुसेना प्रमुखाने त्यांना पुढे होऊ शकणा-या परिणामांची जाणीव करून दिल्याने तो प्रकार टाळला गेला,असे समजते… पण पुढे काही दिवसांनी पारुळेकर साहेब आणि त्यांच्या अन्य सहका-यांची भारतात सुखरूप पाठवणी झाली… पण त्यांचे १ डिसेंबर,१९७२ रोजी वाघा सीमेवर फार जल्लोषात स्वागत करण्यात आले होते! या जगप्रसिद्ध पलायनाविषयी फेथ जॉनस्टन यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे… फोर माईल्स टू फ्रीडम! या धाडसी कामगिरीवर एक चित्रपटही निर्माण करण्यात आला… दि ग्रेट इंडियन एस्केप.. यातले नायक आहेत.. तिघेही त्यावेळचे फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारुळकर,एम. एस. ग्रेवाल उर्फ गॅरी, हरीश सिंग उर्फ हॅरी. ही कथा तरणजीतसिंग नामधारी यांनी दिग्दर्शित केली होती.

२४ जानेवारी,१९७५. स्क्वाड्रन लीडर दिलीप पारुळेकर साहेब यावेळीही सुखोई ७ उडवत होते… आज तिसरा अपघात होणार होता… तांत्रिक बिघाड झाला आणि सुखोई जमिनीकडे वेगाने जाऊ लागले.. साहेबांनी याहीवेळी अचूक उडी घेतली… सलग चौथ्या वेळी त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली होती!

पुढील कारकीर्दीत दिलीप पारूळेकर साहेबांनी भारतीय वायुसेनेत उल्लेखनीय कामगिरी केली. लढाऊ विमान प्रशिक्षक म्हणून त्यांचे काम अतिशय प्रभावी होते. सिंगापूरच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना दोन वर्षे प्रशिक्षण देण्यासाठी झालेली त्यांची निवड अत्यंत योग्य अशी ठरली. पुढे खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांनी दीर्घकाळ बटालियन कमांडर म्हणून भरीव कामगिरी बजावली. त्यांच्या एकूण देदीप्यमान कारकीर्दीचा गौरव म्हणून वायुसेनेने त्यांना विशिष्ट सेना मेडलने गौरवले.

ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर पारूळकर साहेबांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली नसती तर ते सहज एअर मार्शल पदावर पोहोचले असते. सेवानिवृत्तीनंतर साहेबांनी पर्यावरण संरक्षण आणि शेतीमध्ये लक्ष घातले. खेळ हा त्यांचा आवडीचा प्रांत होता,त्यासाठी ते नियमितपणे विम्बल्डनची वारी करीत. पुणे शहरात त्यांनी आपला अखेरचा कालावधी घालवला. तब्बल चार वेळा मृत्यूला चकवा दिलेल्या पारुळकर साहेबांना दहा ऑगस्ट,२०२५ रोजी त्यांच्या वयाच्या ८२ व्या गाठले! पण तोपर्यंत साहेब अतिशय अभिमानास्पद आयुष्य जगले! त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी भारतीय वायुसेनेने त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला! फेअर विंडस! असे नौदलात शुभेच्छा देण्याची पद्धत आहे… म्हणजे तुम्ही ज्या जहाज प्रवासाला निघाला आहात… त्या प्रवासात तुम्हांला वा-याची उत्तम साथ लाभो… पारुळकर साहेबांचे सारे आयुष्य वा-याशी स्पर्धा करण्यात गेले.. त्यांच्या स्वर्गापर्यंतच्या प्रवासात त्यांना ‘फेअर विंडस’ म्हणूयात!! …

भावपूर्ण आदरांजली! जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या आजच्या खऱ्या नायिका – लेखक – डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ या आजच्या खऱ्या नायिका – लेखक – डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

या दोन सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही ॲम्बुलन्स चालवतात… मृतदेह उचलतात, रात्री-अपरात्री अपघात झालेल्या रुग्णांना तातडीने दवाखान्यापर्यंत पोहचवतात! पिंपरी चिंचवड, पुणे-मुंबई हायवे परिसरात दिवसा-रात्री सायरन वाजवत कोणी स्त्री जर ॲम्बुलन्स चालवताना तुम्हाला दिसली असेल तरी ती या दोघींपैकी एक असेल!

कोविड नंतर काही कारणांनी यांचं कौटुंबिक आयुष्य बदललं आणि या दोघी बहिणींनी ॲम्बुलन्स चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्रीनं ॲम्बुलन्स चालवणं ही साधी गोष्ट नाही, त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना येणं खरंतर हीच मोठी क्रांतिकारी घटना आहे. हे काम करणं खरंतर पुरुषांची मक्तेदारी… आणि का असू नये? वेळी-अवेळी कधीही इमर्जन्सी येते, रुग्ण गंभीर असतात, रस्त्यावर कोण कसं असेल माहीत नाही, गुन्हेगार असतात, मदतीला कोणी आहे, नाही. हायवेवरील अपघात असेल, एखाद्या झोपडपट्टीच्या गल्लीतील इमर्जन्सी रुग्ण असेल किंवा कुठून एखादा फाशी घेतलेला मृतदेह घेऊन येणं असेल… कोणत्याही परिस्थितीत काम करावं लागतं. एका स्त्रीनं हे काम करणं किती अवघड असेल याची कल्पना करून बघा… इथं दोघी आहेत!

कुठूनतरी अचानक फोन येतो, ठिकाण सांगितलं जातं, ताबडतोब ॲम्बुलन्स काढली जाते आणि त्या ठिकाणी जाऊन रुग्णाला उचलून गाडीत टाकलं जातं. मदतीला कोणी व्यक्ती, पोलिस असेल तर ठीक, नाहीतर स्वतःच ते काम करायचं. गरज पडली तर ऑक्सिजन लावायचा, सीपीआर सुद्धा द्यायचा. अपघात झाल्यानंतर दवाखान्यात पोहचेपर्यंतचा जो ‘गोल्डन पिरेड’ असतो तो रुग्णाच्या जीवासाठी फार महत्त्वाचा असतो. या दोघी देवदूत बनून ते काम करतात. आजवर यांनी शेकडो रुग्ण मरणाच्या दारातून दवाखान्यापर्यंत पोचवलेले आहेत, लोक वाचवलेले आहेत.

माझ्या बाजूला ज्या ताई उभ्या आहेत त्यांचा एक अनुभव अगदी कमी शब्दात इथे देतोय. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एका ठिकाणी काहीतरी घडले आहे म्हणून त्यांना एक फोन आला आणि त्या ताई एकट्या तिथे पोहोचल्या. एका सुमसान ब्रिजखाली एक माणूस पडलेला होता, त्याचं अख्खं शरीर रक्तानं भरलं होतं. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की त्या माणसाने काचेची बॉटल स्वतःच्याच गळ्यामध्ये खूपसुन घेतली होती, तो अजूनही स्वतःला हानी पोहोचवत होता. अशावेळी एकटी स्त्री, समोर अशी गंभीर परिस्थिती… खरंतर त्यांनी तो कॉल घेतला नसता तरी चाललं असतं, यात त्यांचा काही आर्थिक फायदाही नव्हता पण त्याचा जीव गेला असता. त्या अवस्थेत यांनी त्याला एकटीनं उचलून ॲम्बुलन्समध्ये टाकलं. तो एक मनोरुग्ण होता हे गाडी सुरू केल्यानंतर त्यांना समजलं. तो रक्ताने माखलेला माणूस मागच्या सीटवर बसून मोठ्याने ओरडत होता… खरंतर आता यांच्याच जीवाला धोका होता! तरीही त्यांनी त्या माणसाला बाहेर न काढता अवघ्या काही मिनिटांत आमच्यासमोर आणलं… त्या माणसाला त्यांनी कसं आणलं हे त्यांनाच माहीत पण तो ‘माणूस वाचवला’!

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रेल्वे कटिंग! त्यांची ॲम्बुलन्स अपघात विभागासमोर लागली आणि त्या घाई गडबड न‌ करता चालत येताना दिसल्या की माझा पहिला प्रश्न असतो… रेल्वे कटिंग आणलंय का? आणि त्या ‘हो’ म्हणून मान हलवतात. बरेच लोक स्वतः रेल्वेमधून पडलेले असतात, काहींचा अपघात असतो, काहींना ढकलून दिलेलं असतं. अक्षरशः शरीराच्या चिंधड्या झालेल्या असतात! घटनास्थळावर जायचं, ज्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे तिथलं कोणीतरी मदतीला घ्यायचं, नसेल तर स्वतःच ते सगळे विखुरलेले भाग गोळा करून कपड्यात गुंडाळायचे आणि घेऊन यायचं. आपण कल्पनाही करू शकत नाही की प्रत्यक्षात तो कसा अनुभव असेल!

आयुष्यात काहीतरी परिस्थिती आली आणि त्यांनी हा मार्ग निवडला. या सगळ्या गोष्टीत त्यांच्या आर्थिक गोष्टीही असतील. कुटुंब सांभाळत हे काम करणं फार मोठी गोष्ट आहे. चित्रपटात आपण डॅशिंग काम करणाऱ्या नायिका बघतो… वास्तव जीवनातील या दोघी खऱ्या नायिका आहेत ज्यांनी आजवर असंख्य स्त्री-पुरुषांना वाचवलं, मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं.

खूप अनुभव आहेत सगळंच नाही लिहिता येणार. खऱ्या आयुष्यातील या योद्ध्या आहेत… आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना असंही कोणीतरी बाहेरच्या जगात आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून हा लिखाणाचा प्रयत्न. त्यांना म्हटलं तुमच्यावर एक लेख लिहायचा आहे, परवानगी द्या… आणि त्यानंतर हा सुंदर फोटो काढला.

गरजूंना ‘गोल्डन पिरेडमध्ये’ वाचवणाऱ्या अशा ‘गोल्डन स्त्रियांना’ अभिवादन 

 

लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ५  ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

ललित साहित्य एका भाषेतून दुसर्‍या भाषेत आणताना दोन भाषांच्या सांस्कृतिक संदर्भांची गल्लत होऊ शकते. भाषांतराचे दोन प्रकार असतात. मूलनिष्ठ भाषांतर किंवा छायानुवाद व लक्ष्यनिष्ठ भाषांतर किंवा भावानुवाद. पहिला प्रकार मूळ रचनेशी, मूळ भाषेच्या संस्कृतीशी, भाषिक वैशिष्ठ्यांशी एकनिष्ठ असतो तर लक्ष्यनिष्ठ भाषांतर किंवा भावानुवाद हा भाषांतराच्या भाषेशी, त्या भाषेच्या वैशिष्ठ्यांशी, सांस्कृतिक संदर्भांशी बांधिलकी जपणारा असतो. अर्थात मूळ साहित्यातील गाभा कोणत्याही प्रकारच्या भाषांतरात जसाच्या तसाच राहिला पाहिजे. प्रख्यात साहित्यिक श्री म माटे यांनी भाषांतराविषयी असं म्हटलय की, “एका कुपीतलं अत्तर दुसर्‍या कुपीत आलय की नाही हे महत्वाचं. दोन्ही बाटल्यांची काच सारख्याच वाणाची, आकाराची असली पाहिजे असा आग्रह धरण्यात कांही मतलब नाही. ”

स्वतः टागोरांनी त्यांच्या ‘The Gardener’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे की, भाषांतर म्हणजे केवळ शब्दाला शब्द देणे नाही तर काही वेळा मूळ रचनेतील शब्द बदलणे किंवा वाक्य रचना बदलणे सुद्धा आहे. मूळ काव्याचा गाभा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बदल करावे लागतात.

उदाहरणादाखल गीतांजली मधील एका कवितेचा उल्लेख करता येईल.

टागोरांनी गीतांजलीत ६५ व्या मूळ कवितेत

“What devine drink wouldst thou have my God, from this overflowing cup of my life? “

थे अनुवाद करताना “देवा, तू कोणते दैवी पेय घेणार? … ” असं म्हणावं लागलं असतं. पण देवाला पेय देऊ करण्याची कल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे रचना कशी करावी, हा प्रश्न होता. त्या ओळीचा भावानुवाद मग असा केला.

भरुनी वाहतो देवा,

सुखी जीवनाचा ठेवा 

तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून 

कोणता रस तुजला 

अर्पू मी, न कळे मला”

————–

गीत : १३

The song that I came to sing remains unsung to this day.

I have spent my days in stringing and in unstringing my instrument.

The time has not come true, the words have not been rightly set; only there is the agony of wishing in my heart.

The blossom has not opened; only the wind is sighing by.

I have not seen his face, nor have I listened to his voice; only I have heard his gentle footsteps from the road before my house.

The livelong day has passed in spreading his seat on the floor; but the lamp has not been lit and I cannot ask him into my house.

I live in the hope of meeting with him; but this meeting is not yet.

—————

भावानुवाद : गीत १३

*

गीत ना मी गाईले, येथ आलो ज्या गायना

दिस गेले, वर्षे सरली, तानपुरा लावताना

शब्द गीतातले न जुळती, वेळ ही नाही खरी

मनोरथांच्या अपूर्णतेची वेदना आहे उरी

बहर नाही उपवनी, मात्र वारा गुणगुणे

प्राशिली ना मुखप्रभा, ना स्पर्शिले ध्वनिचांदणे

पदरव त्याचे मृदुल, परि ऐकता मन नादवे

दर्शनाची ओढ हृदयी, अता प्रतिक्षा न साहवे

स्वागत त्याचे कराया, पायघड्या मी घातल्या

त्या पसरता, जीवनाच्या प्रदीर्घ घटिका संपल्या

दीप ना चेतविले, अंधार भवती दाटला

चाहूल त्याची असुनही, क्षण भेटीचा न पातला

अशा अवेळी, अशा तिमिरी, त्या न मी बोलाविते

अद्याप आशा तेवते परि, प्रकाशास आसाविते

————-

गीत : १४

My desires are many and my cry is pitiful, but ever didst thou save me by hard refusals; and this strong mercy has been wrought into my life through and through.

Day by day thou art making me worthy of the simple, great gifts that thou gavest to me unasked— this sky and the light, this body and the life and the mind — saving me from perils of overmuch desire.

There are times when I languidly linger and times when I awaken and hurry in search of my goal; but cruelly thou hidest thyself from before me.

 Day by day thou art making me worthy of thy full acceptance by refusing me ever and anon, saving me from perils of weak, uncertain desire.

—————-

भावानुवाद : गीत १४

*

अनंत आशा मनात धरितो

टाहो फोडून तुला विनवितो

जाणिसी तू ही असे मूढता

नाकारुनि मज रक्षी तत्वता

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥१॥

*

मोही जन्मते, जे सुख नश्वर

नच देउनि ते राखी ईश्वर

घेउनि जातो त्या मार्गावर

जेथे शाश्वत सुख निरंतर

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥२॥

*

नाकारुनि मज क्षण ते मोहाचे

आकारिसी मम घट जीवनाचे

होता मी मग अशा योग्यतेचा

की करिसी तू वर्षाव भेटींचा

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥३॥

*
न मागता मी, दिधलेस आकाश

त्या आकाशी भरिलास प्रकाश

देऊनि नरजन्म दाविले प्रमाण

फुंकिलेस त्या देही पंचप्राण

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥४॥

*
मोहमायेतून मज तू सोडवितो

मी सुस्तावतो, तुज पुनः शोधितो

ध्येयाप्रत जाण्या, कुठे न मिळसी

का आत्मशोधना मला सांगसी?

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥५॥

*

आशा न पुरवुनि, दडी मारुनि

देशी शिकवण या साऱ्यातुनि

मज मिळेल जर सुयोग्य आकार

करशील तेंव्हा माझा स्वीकार 

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥६॥

———–

गीत : १५

I am here to sing thee songs. In this Hall of thine I have a corner seat.

In thy world I have no work to do; my useless life can only break out in tunes without a purpose.

When the hour strikes for thy silent worship at dark temple of midnight, command me, my master, to stand before thee to sing.

When in the morning air the golden harp is tuned, honour me, commanding my presence.

——————-

भावानुवाद : गीत १५

*

तुझ्या मंदिरी नगण्य स्थानी

बसुनि गातो तुझीच गीते

ध्येय नसे, हे व्यर्थचि जीवन

अकारण, अनावर गातो गीते॥

*

मूकपूजना तुझ्याचसाठी

मध्यरात्रीचे टोले पडता

नीरव तिमिरी, तुज सामोरी

सांग मला तू गाण्या गीता॥

*

प्रभात काली वायु संगे

तव वीणेच्या सुरेल लहरी

साक्षीदार मज अद्भुत प्रहरी

करुनि माझे जीवन उद्धरी॥

– क्रमशः भाग पाचवा 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

३१ डिसेंबर…. प्रसिद्ध कवयित्री, गीतकार.. *वंदना विटणकर* यांचा स्मृती दिन!!

मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ‘वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू, बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली.

वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. महंमद रफी यांनी त्यांच्या भावगीतांचा केलेला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. “हा रुसवा सोड सखे’, “हा छंद जिवाला लावी पिसे’, “हे मना आज’ यासह वंदनाताईंची अनेक गाणी रफी यांनी गायली.

कृष्णा कल्ले यांनी गायिलेले “परी कथेतील राजकुमारा’, “नाते जुळले मनाचे’ (जयवंत कुलकर्णी) ही सतत आठवणीत राहणारी गाणी त्यांचीच आहेत.

“अगं पोरी संबाळ दर्याला’, “ऐ आई मला पावसात जावू दे’, “कुहू कुहू येई साद’, “चित्र जयाचे मनी रेखिले’, “आम्ही दोघे राजा राणी’, “पीर पीर पावसाची’, “उजळू स्मृती कशाला’, “स्वप्नामध्ये सत्य गवसले’, “नको आरती नको पुष्पमाला’, “नाते जुळले मनाचे’, अशी सुरेल शब्दरचना करणाऱ्या वंदनाताईंच्या गीतांना सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासह आघाडीच्या संगीतकारांनी संगीतसाज दिला होता. हेमंत कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांसह ख्यातनाम गायकांनी त्यांची भावगीते, भक्तीगीते गायिली आणि ती रसिकांत लोकप्रिय ठरली.

*रसिका मी कैंसें गाऊ गीत* या गाण्याचा किस्सा* 

चालीवर गीताची बांधणी करणं हा शब्द स्वरांचा खेळ आहे, शब्दांवर प्रेम आणि स्वरांशी मैत्री असली की गीत रचना करणं आनंददायी असत असं त्यांना वाटायच. फक्त त्या वेळी मनस्थिती उत्तम असली पाहिजे. अरुण पौडवाल यांनी सुंदर चाल बांधली होती. पण वंदना विटणकर यांच्या पतीच्या डोळ्याचे मोठे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती स्थिर नव्हत्या. अशा वेळी गाणं सुचणं खूप अवघड झालं होत.

दवाखान्याच्या खोलीत त्या विचार करत बसल्या होत्या. श्रोते शब्दांच्या आणि स्वरांच्या सौन्दर्याने धुंद होतात पण गाणे जन्म घेत असताना कवीची मानसिकता त्यांना कशी कळेल असं वाटत असतानाच अचानक त्यांना गाण्याच्या ओली सुचल्या

*रसिका मी कैसे गाऊ गीत*

*दाटून आले घन आसवांचे, *

*मिटलेल्या पापणीत*

आणि मग त्या भरलेल्या तंद्रीतच पुढची कडवी देखील लिहून झाली आणि एका नितांत सुंदर गाण्याचा जन्म झाला

तुटल्या मनाच्या हळुवार तारा

गेला सुरांचा जळुनी फुलोरा

नाचे प्रलय लयीत!

 

मैफल सुखाची झाली विराणी

उरे वेदनांची जखमी कहाणी

रडते स्वप्न व्यथीत!

दोन कडव्याचं गाणं आहे आणि ध्वनीमुद्रण न झालेले तिसरं कडवं देखील आहे

कशाला स्वरांची आरास आता

विझली अभागी अंगारगाथा

झाला जन्म पतीत!

स्वर : अनुराधा पौडवाल

संगीत : अनिल अरुण 

‘शुरा मी वंदिले’, ‘पारध’, ‘देवता’, ‘मर्दानी’, ‘चोराच्या मनात चांदणं’, ‘अर्धांगी’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘आम्ही दोघं राजाराणी’, ‘आई पाहिजे’, ‘मामला पोरींचा’, ‘राजानं वाजवला बाजा’, ‘सवाई हवालदार’, ‘महानदीच्या तीरावर’ आदी चित्रपटांसाठी वंदनाताईंनी गीतलेखन केलं होतं.

आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदाश्रमात रहात होत्या. वर्षाअखेरीला सकाळी चहा घेताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाजवळच्या दवाखान्यात नेले, पण त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना डॉ. डी. वाय. हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे नेत असतानाच दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांनी नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली होती. त्या प्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले; तर कळंबोलीतील एम. जी. एम रुग्णालयात देहदान करण्यात आले.

वंदना विटणकर यांना विनम्र अभिवादन!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वज्र प्रसवा मोती!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “वज्र प्रसवा मोती!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

वर्ष साधारण १९९५-९६. स्थळ काश्मीरमधील एक अतिरेकीग्रस्त गाव. या गावातल्या एका दुकानात काही अतिरेकी खरेदी करायला नियमित येतात… अशी पक्की खबर होती. यांत बहुतांश पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केलेले असतात, हेही निश्चित होतं. ते त्यावेळी मेजर पदावर होते. ९, पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्सेसमधून कमांडो प्रशिक्षण उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले सैन्याधिकारी होते.. त्यांनी कुणाच्याही नजरेस न पडता त्या दुकानाच्या छतावर मुक्काम हलवला… तब्बल ४८ तास… काहीही हालचाल न करता निपचित पडून राहिले… पण एक बोट हातातल्या एके-४७च्या ट्रिगरवर सज्ज होते. डोळ्यांनी झोपेची ओळख नाकारली होती. शरीराला कोणतेही धर्म आठवत नव्हते… एकोणपन्नासाव्या तासाला ते आले… तिघे होते… खांद्यांवर रायफल्स, कमरेला काडतुसं आणि गळ्यात हातगोळे. यांनी छतावरच्या फटीतून या तिघांनाही अचूक टिपले! आणि आपल्या खात्यात आणखी तीन बळी नोंदवले!

कश्मिरमध्ये येण्याआधी ते आसामात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त होते. जन्माने त्याच भागातला असल्याने ते स्थानिक नागरिकांत सहजी मिसळून जात. परिसरात अतिरेकी तर आहेत… त्यापैकी एक-दोघांची नांवेही माहीत आहेत… पण आपल्या सैनिकांना ते मिळून येत नाहीत.. यामुळे हे साहेब अत्यंत अस्वस्थ होते. कारण लक्षात आलं… इतर सैनिक, अधिकारी स्थानिक लोकांच्यात सहज वेगळे दिसून यायचे. हे तर स्थानिक. एके दिवशी स्वारी एकटीच बाहेर पडली… अतिरेक्यांच्या शोधात. अंगात बनियन, कमरेला आसामी गमछा, पायांत साधे धावायचे शूज आणि कमरेत लपवलेलं एक साधं पिस्टल! पण हो… मनात मुलखाचा नीडरपणा. कोणत्याही पूर्वोत्तर राज्यातील माणसासारखी उंची… पण घोटीव देहयष्टी.. अंग कातळासारखे मजबूत… टणक. जंगलाची वाट तुडवत असताना वाटेत एक मुलगा भेटला… त्याला विचारलं… अमुक अमुक कुठं आहे काही माहीत आहे का? तो मुलगा ‘हो’ म्हणताच यांनी त्याला चुचकारून सोबतीला घेतले… तीन-चार किलोमीटर्सवर तो मुलगा अचानक थांबला आणि झाडाआड लपला… म्हणाला… साहेब… पुढून जो चालत येतो आहे ना… तो अमुक अमुक आहे. तो बहाद्दर एकदम आरामात हातात रेडीओ घेऊन चालत येत होता. तो जवळ येताच साहेबांनी थेट त्याची मानगूट धरली. तो होता most wanted… पण त्याने साहेबांना खोटं नांव सांगितलं… साहेबांनी त्याच्या डोक्याला पिस्टल लावत त्याचं बखोटं धरून त्याला चालवत गावाच्या दिशेनं नेलं. वाटेत एक लहान मुलगा भेटला… त्याला विचारलं… या दादाचं नांव काय… त्या पोरानं याचं खरं नाव सांगितलं! मग मात्र साहेबांनी याला त्याच्याच कपड्यांनी एका झाडाला करकचून बांधून ठेवलं… कारण याच्यापेक्षा आणखी एका भयानक अतिरेक्याचा शोध घेणं बाकी होतं! साहेबांनी आधी भेटलेल्या आणि सोबत घेतलेल्या मुलाला सांगितलं… तू आमच्या कॅम्प पर्यंत पळत जा… आणि तिथंच थांब… मी आलोच!

साहेब पुढे चालत निघाले… दोन-तीन किलोमीटर्स… एका जागी काही झोपड्या… लोक शेतातला भात कापत आहेत.. त्यांचे जेवणही तिथे अंगणात शिजते आहे… साहेब त्या लोकांच्या सुमारे थोड्या अंतरावर पोहोचले… त्यातला पिवळ्या टी शर्ट वाला उठून उभा राहिला… कोण पाहिजे? त्याने विचारले… साहेबांनी ते स्वत: अतिरेकी असल्याचे सोंग घेतले… साहेब म्हणाले… आपल्या कमांडरने (म्हणजे अतिरेक्यांच्या म्होरक्याने) मला तुझ्याकडे पाठवलं आहे… एक निरोप आहे तातडीचा… एवढं बोलता बोलता साहेब पुढं पुढं पावलं टाकत होते.. त्या अतिरेक्याला संशय आलाच… त्याने त्याच्या कमरेचं पिस्टल काढून साहेबांच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरुवात केली… साहेबांनीही त्याला गोळीनेच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली… पण दोघांचाही नेम त्या गोंधळात चुकला… तो अतिरेकी मागे वळून पळत सुटला… त्याचं पिस्टल बहुदा कुठं तरी पडलं असावं… साहेबांनी त्याचा पाच-सहा किलोमीटर्स पाठलाग केला.. त्याला जिवंत पकडायची संधी साधायची होती! शेवटी एके ठिकाणी त्याच्यावर साहेबांनी झडप घातली… त्याला व्यवस्थित फटकावला… इतका की तो अर्धमेला झाला! त्या बाजूने एक बिचारा खेडूत सायकलवरून येत होता… साहेबांनी त्याची सायकल उसनी मागितली… आणि या अतिरेक्याला सायकलवर पुढच्या नळीवर बसवून कॅम्प पर्यंत आणला! झाडाला बांधून ठेवलेल्या अतिरेक्याला इतर सैनिकांनी मग पकडून आणले! या साहेबांचं नाव हेमंतो पॅंगिंग.. आताचे कर्नल हेमंतो पॅंगिंग (सेवानिवृत्त)

हेमंतो साहेबांच्या मातोश्रींचं नाव रीटा… म्हणजे मोती. मार्गारिटा वा मार्गारेट या नावाचं संक्षिप्त रूप म्हणजे रीटा. मोती नाजूक, देखणा आणि तसा मृदू. पण या मोत्यातून दोन वज्र अर्थात हिरे जन्माला यावेत, हा एक असाधारण दैवयोग. आणि हा योग भारताच्या दैवात असावा, हेही भाग्याचेच लक्षण! रीटा या पेशाने शिक्षिका. त्यांचा जन्म त्यावेळच्या N. E. F. A. (North-East Frontier Agency) अर्थात व्यापक आसाम राज्यात, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यावर्षी, १९४७ मध्ये झालेला असला तरी त्या पुढे अरुणाचल प्रदेशची लेक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. अरुणाचल म्हणजे अरुण=सूर्य, अचल=पर्वत. उगवत्या सूर्याचा प्रदेश. त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आज अभिमानाने विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे पती बन्सीराम पावो पॅंगिंग हे मूळचे शिक्षणतज्ज्ञ आणि बँक अधिकारी. पुढे ते स्पेशल सर्विसेस ब्युरो (आताचे सशस्त्र सीमा बल) मध्ये सर्कल ऑफिसर आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावाजले गेले. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट, नामसिंग सारख्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या या दांपत्याने त्यांच्या चारही मुलांना मोठी स्वप्नं पहायला उद्युक्त केलं. ही चारही अपत्ये शिस्तबद्ध आणि अभ्यास, खेळांत अत्यंत उजवी निपजली.

थोरले चिरंजीव मोहंतो यांनी प्रचंड मेहनत घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (N. D. A.) प्रवेश मिळवला व भारतीय वायूसेनेत विविध विमाने उडवू शकणारे, प्रशिक्षण देऊ शकणारे लढाऊ वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला. पुढे ते ग्रुप कॅप्टन पदापर्यंत पोहोचले. सुखोई-एम. के. आय. विमानांच्या स्क्वाड्रनचे कमांडर बनणारे पूर्वोत्तर राज्यातील ते पहिलेच वैमानिक ठरले. लढाऊ विमाने उडवण्याचा ३३०० तासांचा अनुभव असलेले आणि वायूसेना मेडलने सन्मानित मोहंतो साहेबांचे कर्तृत्व अभिमानास्पद आहे. ते सेवानिवृत्तीनंतर स्थानिक जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या कार्यात मग्न असतात.

भारतवासीयांच्या शारीरिक ठेवणीत वैविध्य आहे. मात्र अज्ञानी सामान्य जनता पूर्वोत्तर राज्यांतील भारतीय नागरीकांना सरसकट नेपाळी किंवा चिनी म्हणून मोकळी होते… हे अत्यंत दुर्दैवी! या आपल्याच राज्यांतील नागरीकांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केल्याचा इतिहास आहे. विस्तारवादी चीन या प्रदेशांचा लचका तोडण्याचा सतत प्रयत्न करीत असतो… ही बाब जगजाहीर आहे. भारतीय सैन्यात इथल्या शूरांनी अफाट पराक्रम गाजवलेला आहेच… लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिटा साहेब(निवृत्त), लेफ्टनंट जनरल डॉ. कोन्सम हिमालय सिंग (निवृत्त), कारगिल युद्धातल्या असाधारण पराक्रमासाठी मरणोत्तर महावीर चक्र विजेते कॅप्टन केंगृसे, चीन विरोधातल्या युद्धात महाप्रचंड पराक्रम गाजवून मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त केलेले रायफलमन जसवंतसिंग रावत ही काही नांवे आहेत जी लष्करात अत्यंत आदराने घेतली जातात. आसाम रेजिमेंट शौर्यासाठी प्रसिद्ध आहेच.. त्यांचा ‘तगडा रहो’… नारा पूर्वोत्तर राज्यांतील सैनिकांचे मनोबल दर्शवत असतो…थोडक्यात हे आपले रक्षक आहेत!आपले कथानायक श्री. हेमंतो पॅंगिंग यांनी बंधू मोहंतो यांच्या पावलावर पाऊल टाकीत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवला. युद्ध कौशल्य, नेतृत्व कौशल्य, विविध खेळ, शस्त्रे चालवणे इत्यादी कामांत त्यांनी आपला अमीट ठसा उमटवून दाखवला. त्यांचे नाव सर्वच सैनिक मोठ्या आदराने घेताना दिसतात. काश्मीर मध्ये हेमंतो साहेबांनी अतिरेक्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली होती! सहकारी त्यांना एका विशिष्ट अर्थाने ‘चेंगीज खान’ असे संबोधत असत… कारण देशाच्या शत्रूंना हेमंतो साहेबांनी अजिबात दया दाखवली नाही. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत… अतिरेक्यांना आपण घाबरायला नको… उलट त्यांनी आपल्याला घाबरायला हवे… असा त्यांचा खाक्या होता… आणि त्यांनी तो जगून दाखवला आहे! लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी काश्मिरात घडवून आणलेल्या नरसंहाराचा प्रतिशोध त्यांनी त्यावेळी सीमापार घुसून सुमारे २० अतिरेक्यांना यमसदनी पाठवून घेतला होता. ९, पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्स कमांडो म्हणून कर्नल दीब्रेटो, मेजर सुधीर वालिया अशा अनेक श्रेष्ठ लष्करी अधिका-यांसोबत खांद्याला खांदा लावून लढताना हेमंतो साहेबांनी कित्येक अतिरेक्यांचा खात्मा केला.. ऑपरेशन रक्षकमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली! सेना मेडल, सेना मेडल+बार असे सन्मान त्यांनी प्राप्त केले. त्यांचे दुसरे बंधू जयंतो हे GAIL (गॅस ऑथोरीटी ऑफ इंडिया लिमिटेड) मध्ये उच्च पदस्थ आहेत, तर दिवंगत भगिनी गीता या न्यायाधीश होत्या!

“Monks & Warriors” नावाचा podcast शौर्य चक्र विजेते कर्नल कौशल कश्यप (निवृत्त) आणि सेना मेडल विजेते लेफ्टनंट कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) हे दोन माजी लष्करी अधिकारी चालवतात… त्यांचे आभार मानायला शब्द नाहीत! भारतीय सेनेतील शूरांचा अतिशय अचूक परिचय ते करून देत असतात… सर्वांनी हा podcast आवर्जून पहावा. याच “Monks & Warriors” च्या माध्यमातून कर्नल हेमंतो साहेबांची कहाणी ऐकायला मिळाली. कर्नल साहेबांचे शौर्य तर वादातीत आहेच… पण त्यांच्या आई-वडिलांचे श्रेय मोठे आहे… हे नि:संशय.

रीटा अर्थात मोती नाव धारण करून हि-यासारख्या, वज्रासारख्या पुत्रांना जन्म देणा-या वीरमाता कै. रीटा पावो पॅंगिंग, वीरपिता कै. बन्सीराम पावो पॅंगिंग यांना सादर वंदन. हेमंतो साहेबांना कडक सल्यूट! जय हिंद.. जय भारत!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : श्री शिशिर मिश्रा ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : श्री शिशिर मिश्रा ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मी नऊ वर्षांचा होतो! आम्ही त्या सुमारास, मुंबईत कुलाब्याला नौदलाच्या कॅन्टोन्मेंट वसाहतीत राहत होतो. त्या वसाहतीला लागून, युनायटेड सर्व्हिसेस क्लबचे, अरबी समुद्राला लागून, विस्तीर्ण असे गोल्फचे मैदान होते. अनेकदा, तिथे टाटा, गोल्फ खेळताना, आम्हा मुलांना दिसायचे. एका रविवारच्या प्रसन्न सकाळी, मला स्पष्ट आठवते, आम्ही मुले आमच्या सायकली दमटवत असताना, टाटा, गोल्फच्या मैदानावर ‘tee off’ च्या तयारीत होते. अगदी त्याच वेळी, तिकडून एक तरुण नाविक अधिकारी चालला होता. आम्हाला थांबवत आणि टाटांकडे अंगुलिनिर्देश करीत, आम्हाला सांगू लागला…

“मुलांनो! त्यांना नीट बघून घ्या! लोक आयुष्यात बक्कळ धन कमवतात, पण त्यांच्या इतका मान खूप कमीजणांना मिळतो. “

पंधरा वर्षांनंतरचा काळ… बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ह्या कंपनीत मी नुकताच कन्सल्टंट म्हणून रुजू झालो होता. टाटा मोटर्स बाजारात, एक नवीन ट्रकचे मॉडेल आणणार होते, त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आमचा ग्रुप, टाटा मोटर्ससाठी वेगवेगळी माहिती संग्रहित करीत होता. त्या निमित्ताने, मी बरेच वेळा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तर पूर्व भारतात, खूपदा दुर्गम भागात, जेथे ट्रकड्रायव्हर विश्रांतीसाठी थांबत, त्यांना गाठत असे. त्यांच्याशी दोस्ती करून, त्यांच्या बरोबर जेवता जेवता, प्रसंगी एक दोन पेग घेत, मला हवी अ

टाटा नावाचा ब्रँड – –

सलेली माहिती काढून घेत असे. अशा, जवळ जवळ ५०० ड्रायव्हर्सना मी त्यावेळी भेटलो होतो!

… अशाच एका उत्साहवर्धक बैठकीत, मी एका ज्येष्ठ शीख ड्रायव्हरला मुद्दाम प्रश्न केला (भारतात, शीख संप्रदाय, ट्रक व्यवसायात अग्रेसर आहे.)

“पापाजी! राग मानू नका, पण इतर चांगले ट्रक, जसे भारत बेंझ, अशोक लेलँड, बाजारात आहेत, ते घसघशीत सवलती पण देत असतात, मग तुम्ही टाटांचे का बरे ट्रक पसंत करता? इतकी पसंती आणि ज्वाज्जल्य निष्ठा टाटा ब्रँडला? का बरे? “

… पापाजी शून्यात गेले. एका विसरु पाहणाऱ्या घटनेचे तरंग नकळत त्यांच्या डोळ्यात दिसू लागले आणि त्यांना धाप लागली… त्यांना आठवली ती एक १९८४ ची भयानक थंडी गोठवणारी रात्र, त्यांच्या भावाला, घराला आणि त्यांच्या ट्रकला अचानक भस्मसात करणारी… कौटुंबिक, न भरून येणारे दुःख तर आभाळगत होते, पण पाचजणांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर अवलंबून होता, तो त्यांचा ट्रक पण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. संपूर्णपणे खचलेले, पापाजी, ते शहर सोडून, पंजाबातील गावी परतण्याचा विचारात होते…

– – इतक्यात काही दिवसानंतर, दंगलीची धूळ खाली बसल्यानंतर, टाटा मोटर्सचा एक कर्मचारी, त्यांच्या घरी आला. त्यांच्या हातात नवीन ट्रकच्या चाव्यांचा जुडगा देऊन निघून गेला. एकही, कसलाही प्रश्न न विचारता!

… पापाजी आणि त्यांच्यासारखे खूप शीख ड्रायव्हर्स, शीखविरोधी दंगलीत, आपले ट्रक गमवून बसले होते, जी त्यांची रोजी रोटी होती. अशा असंख्य ड्रायव्हर्सना टाटा मोटर्सने शोधून निःशुल्क ट्रक वितरीत केले होते.

… ही घटना कुठेही छापून येणार नाही ह्याची संपूर्ण खबरदारी टाटा मोटर्सने त्या वेळी घेतली असताना देखील, अशा अभागी ट्रक ड्रायव्हरसच्या स्मृतिपटलावर आजही ती जणु कोरलेली आहे!

– – – वरील सर्व घटनाक्रम कथन करताना पापाजींचे डोळे पाणावले होते आणि उलगडले गेले ते, टाटा ह्या ब्रँडबरोबर केलेल्या आजन्म कराराचे गुपित सुद्धा!

व्यवहारात सचोटी आणि दर्जा राखत, बाजारातील आपले अत्युच्च स्थान प्राप्त करणाऱ्या समूहाप्रती, तो होता पापाजींचा नितळ, पारदर्शक दिशादर्शक ठरेल असा लाखमोलाचा सल्ला! नाही का?

– – – मित्रांनो! तुमची व्यवहारातील उत्तमोत्तम कार्यकुशलता आणि नेकीची खरे तर भारताला गरज आहे. ती आपल्या उत्कर्षाची नांदी ठरेल!


लेखक : श्री शिशिर मिश्रा 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जनकवी पी. सावळाराम… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ जनकवी पी. सावळाराम… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

जनकवी पी. सावळाराम – – 

*सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणीचे* निवृत्तीनाथ रावजी पाटील, आपण सारे त्यांना जनकवी पी. सावळाराम म्हणून ओळखतो.

जनकवी, ही पदवी कुसुमाग्रजांनी पी. सावळाराम यांना दिली. सावळाराम ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. स्वत:च्या कवितांवर मतं मिळवून नगराध्यक्ष पद मिळविणारा हा जगातला पहिला कवी. एकदा मुलाखत देताना ते म्हणाले होते, “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का? , जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. ’‘ या एका गीताच्या अफाट लोकप्रियतेवर मी ठाण्याचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे, ’ आणि ते खरेच होते. वि. स. पागे आणि ते जवळचे मित्र होते. पागेसाहेबांना ह. ना. आपट्यांच्या एका कादंबरीतल्या सावळया या व्यक्तिरेखेबरोबर त्यांचे साधर्म्य वाटे आणि ते त्यांना *सावळया* नावानेच हाक मारत असत. पुढे तेच नाव रूढ झाले.

*ठाण्यात पूर्वी मेंटल हॉस्पिटल* होते आणि सावळाराम मूळचे *येडेनिपाणीचे* म्हणून ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाल्यावर गदिमा गमतीत म्हणाले *येड्याचा* पाटील *ठाण्याचा* नगराध्यक्ष झाला.

पी. सावळाराम यांच्या गाण्यातून स्त्री-सुलभ भावना प्रभावीपणे व्यक्त झाल्या. त्यांची गाणी एकाहून एक सुंदर आहेत. त्यापैकी स्त्रीचं अवघं भावविश्व एका महत्वाच्या घटनेवर आधारीत असतं, ती घटना म्हणजे तिचं लग्न आणि पुढचं आयुष्य. स्त्री मनाची हळुवार रूपं साकारणारा कवी सावळारामांच्या गाण्यातून दिसतो.

त्यांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यातून स्त्रीच भावविश्व साकारणाऱ्या गाण्यांची यादी तयार करताना मी चकीत झालो. गाण्याची ओळ वाचली की प्रत्येकाची मान डोललीच पाहिजे.

*चला तर, करूया सुरवात*

मुलगी मोठी झाली, यौवनात पदार्पण करताना सारखं आरशापुढे उभं राहून स्वतःच्या प्रतिबिंबाला न्यहाळतांना ती म्हणते

*ओळख पहिली गाली हसते, *

*सांग दर्पणा कशी मी दिसते*

अशातच एक दिवस तिला तिचा जिवलग भेटतो. दोघे एकमेकांकडे तिरके कटाक्ष टाकू लागतात, अंतरीची खूण पटल्यावर दोघेजण एकमेकांना म्हणतात

*हसले आधी कुणी तू का मी*

मग सुरु होतो प्रेमाचा सिलसिला आणि सारं जग तिला सप्तरंगी दिसायला लागत, तिला स्वप्नातला राजकुमार भेटला आहे म्हणून ती म्हणते

*हसले ग बाई हसले अन कायमची मी फसले*

आता तिने इतके म्हटल्यावर तिचा तो राजकुमार देखील तिला उत्तर देताना म्हणतो

*मानसीचा चित्रकार तो, *

*तुझे निरंतर चित्र काढतो*

दोघांचेही प्रणयाराधन जोरात सुरु असताना तिच्या कल्पनेला रोज नव नवीन धुमारे फुटू लागतात आणि ती गाणी म्हणू लागते

*गंध फुलांचा गेला सांगून*

*भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गा, गा रे कोकिळा गा*

*कोकीळ कुहू कुहू बोले*

*जिथे सागरा धरणी मिळते*

तो ही काही कमी नाही त्याने देखील गाण्यातच तिला उत्तर दिले

*मनात नसता तुझ्या गडे, *

*नकळत का मग असे घडे*

मग रीतसर पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आणि लग्न नक्की झालं, मग काय तिच्या बहिणी तिला म्हणू लागल्या

*गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, *

*फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला ग दारी*

आता तिला देखील तिकडचे वेध लागले आहेत म्हणून ती म्हणते आहे

*लेक लाडकी या घरची*

*होणार सून मी त्या घरची*

बघता बघता आतुरतेने वाट बघत असलेला तो दिवस उजाडला आणि लग्न लागले, त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, त्यामुळे आनंदून गेलेली ती नवोढा पत्नी, त्याला म्हणतेय

*गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणि बांधले, *

*जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले*

आता पुढचा विधी म्हणजे सप्तपदी, एकमेकांना सात जन्म सोबत करण्याचे आश्वासन देताना ती म्हणते आहे, सात जन्मच काय, आपले नाते तर शंभर जन्मांचे आहे आणि म्हणते,

*सप्तपदी हे रोज चालते, *

*तुझ्या सवे ते शतजन्मीचे हो माझे नाते*

सप्तपदी झाल्यावर सर्वार्थाने त्याची झालेली ती आतुरतेने त्याला म्हणते, मी माझा हात विश्वासाने तुझ्या हातात दिला आहे, आता पुढची सगळी वाटचाल तू म्हणशील तशी करू असे सांगताना म्हणते

*चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते, नेशील तेथे येते*

लग्न झाले आता वेळ आली लेकीची पाठवणी करण्याची. लाडात वाढवून मोठ्या केलेल्या लाडक्या लेकीला जड अंतःकरणाने निरोप देणारी आई स्वतःच्या डोळ्यातले अश्रू थोपवून लेकीला सांगते आहे.

*गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का? , *

*जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा*

नवी नवरी माहेर सोडून सासरी आली, सारे काही तिच्या मनाजोगे झाले असले तरी, सासरच्या इतर माणसांबरोबर आणि खास करून सासूबरोबर आपले छान जुळेल ना, या विचाराने कावऱ्या बावऱ्या झालेल्या सुनेला आश्वस्त करताना प्रेमळ सासू सुनेला सांगते आहे, मला तुझ्या मनीचे काहूर कळले आहे, पण अजिबात काळजी करू नकोस, मी देखील मुलीची आई आहे आणि काही वर्षांपूर्वी सून म्हणून या घरी आले होते, आता मी तुझी आई होईन आणि तू देखील माझी मुलगीच हो असे सांगताना सासूच्या ओठी शब्द आले.

*लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी, *

*मुली तू आलीस अपुल्या घरी*

सासरच्या घरातला तिचा पहिलाच दिवस आणि येणाऱ्या रात्रीची आतुरतेने वाट बघणाऱ्या त्या प्रियेला आसुसून ओढ लागते आणि ती म्हणते

*आली हसत पहिली रात, *

*उजळत प्राणांची फुलवात*

रात्र सरली, पहाटेची शुक्राची चांदणी उगवली आणि गात्रा गात्रातून तृप्त झालेली ही ललना गुणगुणते

*माझिया नयनांच्या कोंदणी, *

*उमलते शुक्राची चांदणी*

 

*सुख येता माझ्या दारी, *

*सुखासवे तो उदया येईल, *

*दिन सोन्याचा संसारी*

*हृदयी जागा तू अनुरागा, *

*प्रीतीला या देशील का? *

आता उजाडायला लागले, साऱ्या घराला हलके हलके जाग येऊ लागली आहे. पहाटवारा अंगणातल्या प्राजक्ताला मिठी मारतोय त्यामुळे अंगणभर प्राजक्ताचा सडा पडला आहे, आणि तिच्या ओठी भूपाळीचे सूर येतात

*उष:काल झाला, उठी गोविंदा, उठी गोपाळा, *

*हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला*

लग्न होऊन थोडे दिवस झाले, बघता बघता श्रावण महिना आला सुद्धा आणि मंगळागौरीचे व्रत करून, पतीसाठी दीर्घायुष्य मागताना देवीची प्रार्थना करताना ती म्हणते

*जयदेवी मंगळागौरी, सुवासीन मी तुला पूजिते*

आता तिला वेध लागले आहेत दिवाळीचे. भाऊबीजेला भाऊ येणार म्हणून आनंदित झालेली बहीण म्हणते आहे

*आली दिवाळी आली दिवाळी, *

*घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली*

*मी नाही कुणाची, नाही नाही कुणाची, *

*मी आज बहीण हो भावाची*

कालांतराने नव्या पाहुण्याचे घरी आगमन होते, त्या आनंदात आई झालेली ती, बाळाला सांगतेय

*बाळा होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई*

पाठोपाठ बारशाचा दिवस आला. बोलावलेल्या सख्या जमल्या आणि सगळ्या गाऊ लागल्या

*कुणी गोविंद घ्या, *

*कुणी गोपाळ घ्या, *

*या ग सयांनो, या ग या*

बाळाची पावले सगळ्या घरभर दुडदुडू पडतायत, त्यामुळे आनंदी आनंद आहे, तो आनंद साजरा करताना ती मायाळू माता म्हणते

*कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी*

सासरी ती आता रूळली आहे तिच्या बऱ्याच इच्छा आकांक्षा पुऱ्या झाल्या आहेत, आता आपले घर कसे असावे याचे संकल्प चित्र आता तिच्या डोळ्यापुढे येत आहे ते गाण्यातून सांगताना ती म्हणते

*असावे घर ते अपुले छान*

आजचे लिखाण बरेच लांबले आहे याची जाणीव आहे, पण वाचताना कुणीही कंटाळणार नाही याची देखील खात्री आहे. आता लेखाच्या शेवटाकडे जाताना, जीवनातली कृतार्थता अनुभवताना देवाजवळ देखील तिने स्वतःसाठी काही न मागता तिच्या बाळासाठी मागणे मागितले.

*देव जरी मज कधी भेटला*

*माग हवे ते माग म्हणाला*

*म्हणेन प्रभू रे माझे सारे*

*जीवन देई मम बाळाला*

स्त्रीमनाचे पैलू उलगडून दाखवताना सावळारामांनी अशी वेगवेगळी गाणी लिहिली. या गाण्याचं संकलन करताना मी थक्क झाले होते. वाचताना तुमची भावना देखील वेगळी असणार नाही.

– – अशी ही ‘ स्त्री’ च्या जीवनाची वयानुरूप वाटचाल एकाच भावकवीच्या कवितांतून!

आजचा अख्खा लेख म्हणजे गाणं, गाणं आणि गाणं. पण सगळीच गाणी एकाहून एक सुंदर

… निवृत्ती रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम यांना विनम्र अभिवादन..

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चढदी कला” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “चढदी कला” ☆ श्री संभाजी बबन गायके

पंजाबला पूर काही नवा नसला तरी गेल्या ३७ वर्षांत एवढा मोठा विनाशकारी पूर पंजाबने अनुभवला नव्हता. परंतु संकटे अनुभवण्यात आणि त्यांचा सामना करण्यात पंजाब नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहिलेला दिसतो! याचे कारण आहे त्यांनी अंगीकारलेली विचारसरणी. विपरीत परिस्थतीतही मानसिक संतुलन टिकवून ठेवणे, संकटाला मोठ्या काळजाने सामोरे जाण्याची त्यांना गुरुंनी दिलेली शिकवण ते प्रत्यक्ष आचरणात आणताना दिसतात.

श्री गुरु गोविंदसिंग यांचे चार पुत्र.. साहिबजादे… त्यातले दोन मुगलांविरुद्धच्या धर्मयुद्धात वीरगती प्राप्त करते झाले तर अन्य दोघांना भिंतीमध्ये चिणून मारले गेले. ही बातमी गुरुजींच्या कानांवर पडली तेंव्हा ते शोकाकुल झाले नाहीत… आपली मुले धर्मरक्षणाच्या कामी आली याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले.. हे अतिशय प्रेरणादायी आहे.

पंजाबी भाषेत चढदी शब्दाचा अर्थ आहे उन्नत होत जाणारी आणि कला म्हणजे ऊर्जा! या शब्दाचा खरा अर्थ आहे तो म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक मन:स्थिती. गुरु नानक देव म्हणतात… नानक नाम चढ़दी कला तेरे भाने सरबत दा भला! अर्थात परमेश्वराच्या नामस्मरणाने सर्वांचे कल्याण होते!

चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो, त्याचे तेज उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहते… तशी माणसाने मन:स्थिती ठेवावी. संकटे येतात तशी जातात… पौर्णिमेनंतर चंद्र क्षीण क्षीण होत जातो तसा तो पुढे वर्धिष्णूही होत राहतो. वनवासाच्या काळात सीख सैनिकांनी केवळ भाजलेले चणे खाऊन दिवस काढले आणि त्या चण्यांना ते बदाम म्हणत. घोड्याच्या रिकिबी यालाच ते आपले घर संबोधत असत.

संकटात, युद्धात पंजाबी मनांची असाधारण सहनशक्ती जगाने अनुभवली आहे. पंजाबी कुणापुढे हात पसरण्याच्या नेहमी विरोधात असतात. आताच्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अनेक पंजाबी कलाकार, व्यावसायिक स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले दिसतात. रेल्वे कोचमध्ये लागणारे भाग बनवणा-या कारखान्यात आठवडाभरात तब्बल शंभर बोटी बनवण्यात आल्या ज्या सातशे किलो वजन वाहून नेऊ शकतात.. यासाठी मालक प्रीतपाल सिंग हंसपाल यांनी एक पैसाही आकाराला नाही. क्रिकेटपटू युवराज सिंग याने ४२ कोटी रुपये किंमतीचे ६०० Tractotors मोफत देऊ केले आहेत. गायक करण औजला याने त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाची सर्व जमा रक्कम पूरग्रस्त निधीत देण्याची घोषणा केली. रामसिंग राणा यांनी त्यांच्या पाच हॉटेल्सचे एक वर्षाचे सर्व उत्पन्न निधीत देऊ केले आहे. ही रक्कम दोन कोटी पर्यंत जाईल. कॅनडा मधील खाजगी रेडीओ केंद्रांनी मोठी रक्कम जमवली आहे. ही यादी मोठी आहे.. आणि त्यात आणखी भर पडत चालली आहे. केंद्रसरकारने सुद्धा नुकतीच १६०० कोटी रुपयांची साहाय्य राशी घोषित केली आहे.

देशातील आणि देशातील इतर बातम्या जास्त प्रसिद्ध होत गेल्याने पंजाब मध्ये आलेल्या या आपत्तीकडे उर्वरीत देशाचे फारसे लक्ष गेल्याचे दिसत नाही. असो. देशाच्या अन्नाच्या आणि संरक्षणाची मोठी जबाबदारी नेटाने पार पाडत असलेल्या पंजाबसोबत देशाने उभे राहायला पाहिजे, असे वाटते.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares