श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ नऊ नरकासूर आणि एक श्रीकृष्ण! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मेजर जनरल सुनीलकुमार राझदान (सेवानिवृत्त)
(पण जाताना त्याने थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली…. तिथून दोन किलोमीटर्स उंचीवरील एका मोक्याच्या जागी काही घरे आहेत… त्यातील एका घरात काही लोक आहेत! या चार मजली घराला मोठे कुंपण आहे… चौथ्या मजल्यावर एक रायफलधारी पहारेकरी कायम उभा असतो… इत्यादी इत्यादी!)
इथून पुढे – – –
चालून चालून सैनिक थकले होते.. भुकेले होते. साहेबांनी स्वयंपाक करण्याच्या सुचना दिल्या… साहेबांनी खिचडीवर त्यादिवशीचा उपवास सोडला.. भूक भागवली गेली… उद्या सकाळी लवकर त्या घराकडे जाऊ असा विचार होत असतानाच… साहेब उठले… आता थांबून चालणार नाही! जे काही करायचे ते आजच, आत्ताच! त्यांचा निर्धार पाहून सैनिकांना स्फुरण चढले! ते दोन किलोमीटर्स चालून जायला पथकाला दोन तास लागले… अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती… अंधार दाटून आला होता… आभाळात चांदण्या चमकत होत्या तोच काय तो उजेड. त्या घराजवळ आणखी काही घरे होती. भटकी कुत्री होतीच. त्यांना शांत करण्यासाठी सैनिकांनी एक निराळेच हत्यार नेले होते.. मांसाचे तुकडे! ही कुत्री शांत राहिली तरच ते कुत्रे टिपता येणार होती! त्यांना चाहूल लागली की खेळ खराब होणार! पथकाने अंदाज लावून त्या ठिकाणाला वेढा घातला. सुमारे दहा सैनिक बाहेरच्या वर्तुळात, सहा जवान आतल्या वर्तुळात आणि साहेबांसोबत चार खंदे वीर. पण नेमके घर कोणते? कारण कुठून काही आवाज येत नव्हता. उंच टेकाडावरील एका घरामध्ये मिणमिणता कंदील दिसला… आणि एक वास येऊ लागला…. तुपाचा वास! त्या भागातील गरीब नागरिक मोहरीच्या तेलात स्वयंपाक करीत… मग हा तुपाचा वास जेथून येतोय… ती स्थानिक प्रजा नक्कीच नसणार… पाकिस्तानी अतिरेकीच असणार… साहेबांनी ताडले. रात्रीची दहा वाजून दहा मिनिटे झाली होती… साहेबांचा वाढदिवस आणि जन्माची हीच वेळ.. आणि आठ तारीख म्हणजे जणू जन्माष्टमीच! काश्मिरातील घरांची रचना लक्षात घेऊन भारतीय सैनिकांना त्या घरांत कशी कारवाई करायची याचे प्रशिक्षण दिले जाते. सहा पैकी दोन सैनिक बाहेर थांबले… दोन जवान दुस-या बाजूने पहिल्या मजल्यावर गेले… आणि दोघे साहेबांसोबत थेट आत जाणार होते. सर्वांनी काळ्या कापडाने चेहरे झाकले होते.. फक्त डोळे तेवढे झाकले नव्हते! रायफली सज्ज करीत साहेब आणि चार जवान घराच्या रोखाने निघाले… महिलांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला… साधी कुजबूज ती. साहेब तळमजल्यावरील स्वयंपाक घराच्या खिडकीशी पोहोचले…. इथपर्यंत भारतीय सेना पोहोचेल हे अतिरेक्यांच्या स्वप्नातही नव्हते… त्यामुळे ते पहिल्या पहिल्या मजल्यावर निवांत बैठक करीत होते… योजना आखीत. स्वयंपाकघरात एक महिला अतिरेक्यांसाठी ऑम्लेट बनवीत होती. साहेब खिडकीतून आत शिरले… त्या महिलेला त्यांनी हळूच काही विचारले… तिला वाटले हा सुद्धा अतिरेकीच आहे! तिने काहीशा रागातच म्हटले… ”तुम्हीच काम सांगता आणि तुम्हीच विचारता काय करतेस?” साहेबांना तिला खास भाषेत समजवावे लागले.. साहेबांनी त्या महिलेला काझीगुंडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा-याचा संदर्भ दिला…. तेंव्हा कुठे ती आणि इतर महिला बाहेर पळू लागल्या… सैनिकांनी एकेकीला खिडकीतून बाहेर घेतले… त्यातल्या एका चौदा वर्षांच्या पोरीने मात्र पळून जाताना अतिरेक्यांच्या नावाने ठेवणीतल्या शिव्यांची लाखोली वाहिली… का नाही? त्या सर्व भगिनी महिनाभराहून अधिक काल बलात्कार सहन करीत होत्या!
ही शिवीगाळ आणि त्या महिलांच्या पायांतील आभूषणांचा आवाज झाला.. आणि अतिरेकी सावध झाले. तोवर दोन सैनिक पहिल्या मजल्याच्या वरच्या पायरीवर पोहोचले…. अंधार होताच… बैठकीच्या खोलीच्या बाहेर लाकडी स्टूलवर पहा-यासाठी बसलेल्या एका साडे सहा फूट उंचीच्या रायफलधारी अतिरेक्याने अंधारात या दोघांचे लालबुंद डोळे पाहिले… तो आधीच उंच… बसल्या जागेवरून त्याने वर उडी मारली… त्याचे डोके लाकडी छताला लागले… त्याला वाटले पिशाच्च आले! तो जिन्न जिन्न म्हणून किंचाळू लागला… आपल्याही सैनिकांनी एवढा प्रचंड उंच माणूस पाहिल्यावर तेही गडबडले आणि मागे सरकले… काय झाले हे पाहण्यासाठी साहेबांच्या सोबत असलेले दोघे जवान खोलीबाहेर पडले… साहेब त्या खोलीत एकटेच उरले….. दोन अतिरेकी पहिल्या मजल्यावरून जिन्याने खाली उतरून आले… त्यांच्या हातात रायफल्स होत्याच… ते दोघे व्हरांड्यामध्ये आले… सुनीलकुमार साहेबांनी खोलीतील एकमेव कंदील मालवला… त्यांच्या जवळ असलेल्या एका अतिरेक्यावर झेप घेऊन त्याची रायफल डाव्या हाताने हिसकावून घेतली, त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दुस-याची रायफल सुद्धा काढून घेतली.. त्याच रायफलच्या दस्त्याने त्यांच्या डोक्यांवर प्रहार केले.. ते खाली पडताच त्यांना धडाधड गोळ्या घातल्या आणि ते दोन्ही राक्षस यमसदनी धाडून दिले… पण आणखी किती अतिरेकी असतील याचा अंदाज नव्हता! आतून गोळीबाराचा आवाज ऐकून आपल्या सैनिकांना वाटले की साहेबांनाच गोळ्या लागल्या… आणि त्यातच त्यांचे प्राण गेले… त्यांनी बाहेरून त्या घरावर तुफान गोळीबार आरंभला… वरच्या मजल्यावरून अतिरेकी प्रत्युत्तर देऊ लागले होते.. साहेबांनी बाहेर मेसेज दिला…. गोळीबार थांबला! तेवढ्यात आणखी एक अतिरेकी जिना उतरून येताना दिसला.. त्याचे पाय दिसले… साहेबांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या… तसा तो धडपडत खाली येऊन पडला… साहेबांकडे त्यांची स्वत:ची एक आणि त्या दोघा अतिरेक्यांच्या दोन अशा तीन रायफल्स होत्या. या तिस-या अतिरेक्याची रायफल काढून घेण्यासाठी साहेब पुढे सरसावले…. तो अतिरेकी मेला नव्हता तोवर….. मेल्याचे सोंग घेतलेल्या त्या अतिरेक्याने त्याच्या हाताजवळ आणि आधीच लोड असलेली रायफल झाडली…. ती नेमकी साहेबांच्या पोटात मध्यभागी… नऊ-दहा गोळ्यांचा फवारा आतडी फाडून पाठीचा कणा तोडत घुसल्या… साहेबांनी तशाही स्थितीमध्ये अतिशय त्वेषाने त्याला पुन्हा गोळ्या घातल्या… साहेबांची आतडी बाहेर पडू लागली… रक्त सांडू लागले… साहेबांनी डोक्याचा पटका काढला… आतडी आत ढकलली… आणि त्यांवर तो काळा पटका करकचून बांधला… दोन्ही हातांवर सरपटत साहेब त्या खोलीच्या बाहेर पडले… नंतर आतून गोळीबार सुरु राहिला… पहाटे तीन पर्यंत. बाहेरील सैनिक साहेबांच्या सोबत आले… तोवर मुख्यालयात संदेश पाठवून आणखी कुमक मागवली गेली.. पण त्यांना येण्यास प्रचंड वेळ लागणार होताच.. तोपर्यंत या अतिरेक्यांना रोखून धरणे अत्यावश्यक होते. साहेब लाकडाच्या एका ढिगा-यामागे लपले! तिथून हल्ल्याचे नेतृत्व करू लागले… पोटातून रक्त वाहत होतेच… बांधलेल्या पटक्यामुळे रक्ताचा वेग कमी झाला होता… वेदना? वेदनेपासून शरीर वेगळे केले होते साहेबांनी. साथीदार सैनिकांनी साहेबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला.. पण साहेबांनी स्पष्ट नकार दिला! मोहिम पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाही?
या मोहिमेत कुणी नर्सिंग असिस्टंट सोबत आणलेला नव्हता. प्रसंगावधान राखून त्यांनी एक आदेश दिला… गावात येण्याच्या आधी त्यांनी रस्त्यावरच्या एका औषधांच्या दुकानदाराशी संवाद साधला होता.. त्या दुकानात ग्लुकोज, सलाईन त्यांनी पाहिले होते. सैनिकांना सांगून त्यांनी सलाईन मागवून घेतले… सैनिकांच्या साहाय्याने, सिगारेट लायटरच्या उजेडात साहेबांनी स्वत:ला सलाईन लावून घेतले… पण जागा सोडली नाही.. आपत्कालीन परिस्थितीत काय करता येते याचे सैन्यात दिले गेलेले प्रशिक्षण साहेबांनी प्रत्यक्ष आचरणात आणले होते! पहाटे चार वाजता आणखी तीन अतिरेकी पळून जाण्याच्या इराद्याने बाहेर पडू लागले… साहेबांनी काश्मिरी लहेजामध्ये त्यांना उद्देशून जोराने आवाज दिला… ”उधरसे मत जाव… इंडियन आर्मीवाले हैं वहां… इस तरफ आ जावो भाईयों!” अतिरेक्यांना वाटले त्यांचेच स्थानिक साहाय्यक लोक आहेत… मग ते तिघे भाई आपल्या या भाईकडे अलगद आले… भाईंनी त्यांना ताब्यात घेतले.. हातपाय, तोंड बांधून ठेवले! साहेबांची शौर्यगाथा कित्येक तास सुरु होती. सकाळी दहा वाजता जादाची कुमक पोहोचल्यावर आतले आणखी तीन अतिरेकी ठार केले गेले. नऊ पैकी सहा ठार आणि तीन ताब्यात आले होते. सुनीलकुमार साहेबांना रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु झाली. तोवर घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले होते. त्यात ज्यांच्या घरातल्या महिलांची सुटका करण्यात आली होती, त्या महिलांचे नातेवाईक होते. एका बाईच्या देखतच अतिरेक्यांनी तिच्या मुलीवर आणि सुनेवर अत्याचार केले होते! पकडल्या गेलेल्या तीन अतिरेक्यांचा हिशेब या महिलेने आणि इतरांनी पूर्ण केला! नरकासूर वधात श्रीकृष्ण भगवंताला एका महिलेची, रुक्मिणीचे साहाय्य झाले होते, त्याचीच ही एका अर्थी पुनरावृत्ती म्हणावी की काय? या लष्करी कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि लष्कर-ए-हिक्मतेयार या अतिरेकी संघटनेचे एकूण नऊ धोकादायक अतिरेकी ठार मारले गेले आणि चौदा महिलांची सुटका करण्यात आली! अतिरेक्यांच्या या लपण्याच्या ठिकाणावरून दोन यु. एम. जी. (युनिवर्सल मशीन गन्स), सात ए. के. ४७ रायफल्स, एक पोते भरून काडतुसे, दहा किलो स्फोटके इत्यादी ऐवज जप्त केला गेला! ही मृत्यूची दहीहंडी श्रीकृष्णाच्या भूमिकेत शिरून सुनीलकुमार राझदान साहेबांनी जणू नऊ थर लावून फोडली! यात एकाही गोविंदाला साधे खरचटले सुद्धा नाही… पण नेतृत्व करणारा कान्हा मात्र कायमचा जायबंदी झाला होता! साहेबांना हेलिपोर्ट करून त्वरीत सेनेच्या रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांचे सुमारे नऊ फूट लांबीचे आतडे कापून काढण्यात आले. एल वन ते एल फोर मणके तुटून गेल्याने साहेब आयुष्यात पुन्हा कधीही चालू, फिरू शकणार नाहीत.. असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले! आयुष्याच्या मध्यावरच लष्करी अधिकारी कारकीर्द संपुष्टात येणार होती… घरी दोन मुलगे, पत्नी… भविष्य अंधारमय झाले! एकाकी वाटू लागले… पण अंधारात कुणीतरी उजेड घेऊन येण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता.. स्वत: उजेड होणे गरजेचे होते! निम्मे शरीर निकामी झाले… पण बुद्धी, मन शाबूत होते!
श्रीनगरमध्ये, दिल्लीत रुग्णालयात तब्बल नाऊ महिने मुकाम झाला… पुढे पुण्यात उपचारांसाठी पाठवण्यात आले! उपचारांचा खर्च सेना करीत होतीच… पण आर्थिक घडी विस्कटून गेली.. मुलांचे शिक्षण सुरु होते. ज्या मुलीची सुटका साहेबांनी केली होती… त्या मुलीचे आई-वडील तिला घेऊन साहेबांना भेटण्यासाठी श्रीनगरवरून खास पुण्याला आले होते.. कामावर नाही म्हणजे साहेबांना पगार दिला जात नसेल… म्हणून त्यांनी पैसेही देऊ केले होते… पण साहेबांनी ते नाकारले! हा देश माझा आहे, याचे रक्षण मी नाही करणार तर कोण करेल? मी माझे कर्तव्य केले.. आता सेना माझी काळजी घेईल. देशाने सुनीलकुमार राझदान यांनी केलेल्या या अविस्मरणीय कामगिरीसाठी त्यांना कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान केला! साहेबांच्या आजारपणाच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंजू राझदान यांनी साहेबांची अखंड सेवा केली. मुलगा ईशान या धकाधकीत सुद्धा अभ्यास करून सेनेत अधिकारी झाला. दुसरा चिरंजीव पार्थ डॉक्टर झाला आहे! या श्रीकृष्णाचा उपदेश घेऊन हा पार्थ युद्धाच्या मैदनात उतरला तर आश्चर्य वाटणार नाही! व्हीलचेअर मध्ये बसावे लागत असले तरी साहेब त्यांची बहुतेक सर्व कामे स्वत:च करतात! पिस्टल नेमबाजी करतात, त्यांना दोरीच्या साहायाने हेलिकॉप्टर मधून खाली यायचं आहे… हे प्रत्यक्ष युद्धात करता येईल.. असं त्यांना वाटतं! तीन मोठ्या शस्त्रक्रिया साहेबांनी पचवल्या… तारुण्यात दिल्ली-आग्रा अंतर बुलेटवरून अवघ्या दोन तासांत कापायची सवय असलेल्या साहेबांनी पुढे व्हीलचेअरमध्ये वावरण्याचा सराव केला… आणि साहेब सेनेतील सेवेत परतले! ब्रिगेडीअर म्हणून त्यांना बढती मिळाली! गणिताचे प्रचंड ज्ञान, अतिरेकीविरोधी कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणीचा अनुभव असल्याने अचूक मार्गदर्शन करण्याची उच्च क्षमता, आणि जागरूक बुद्धी यांच्या जोरावर सुनीलकुमार राझदान साहेबांनी मोठ्या उत्साहाने सैन्यसेवा जारी ठेवली. साध्या कॅलक्युलेटर मधील सोलर पॉवर वर चालून फायर होऊ शकेल, अशी रायफल साहेबांनी बनवली होती. असिस्टंट चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नेमणूक झाली. भारतीय सेनेतील व्हीलचेअरमध्ये बसून कार्य करणारे पहिले मेजर जनरल म्हणून ते ख्याती पावले. काश्मिरी युवकांनी सेनेत भरती व्हावे, म्हणून मेजर जनरल सुनीलकुमार उर्फ एस. के. राझदान साहेबांनी खूप यशस्वी प्रयत्न केले… काश्मीरमधील स्थानिक प्रश्नांची त्यांना अधिक जाण आहे. त्यांनी काश्मिरी तरुणांवर विश्वास दाखवला… भरती कार्यक्रम राबवले… तीनशे जागांसाठी तीन हजार तरुण स्पर्धा करीत, यातच सर्व आले. बंगळूरू येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी काश्मिरी तरुणांना खूप प्रभावी मार्गदर्शन केले.. देश सुरक्षित तर आपले अस्तित्व राहील, असे ते म्हणतात. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या लेफ्टनंट फैय्याज नावाच्या तरुणाने अतिरेकी विरोधी कारवाईत बलिदान देऊन साहेबांचा विश्वास सार्थ ठरवला!
दिल्लीत मुक्कामी असताना त्यांच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावर एक काश्मिरी माणूस शाली विकत होता.. त्याला जेंव्हा समजले की नौगावचे नायक इथे राहतात, तेंव्हा त्याने मोठ्या आदराने त्याच्याकडची सर्वांत महागडी शाल साहेबांच्या खांद्यावर पांघरली… म्हणाला… ”साहब आपने हमारी इज्जत बचा ली!” हुतात्मा सैनिकांच्या पत्नी, मुले यांच्या कल्याणासाठी साहेब झटत असतात. विशिष्ट सेवा मेडल त्यांच्या पोशाखावर शोभत असते. साहेब विविध ठिकाणी व्याख्याने देतात.. विशेषत: दिव्यांग व्यक्तींसाठी साहेब प्रेरणेचा मोठा स्रोत बनले आहेत!
काश्मिरात जन्मून मथुरेत वाढलेला आणि पुन्हा काश्मिरात येऊन मोठी देशसेवा बजावलेल्या या ज्येष्ठ योद्ध्यास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी खूप खूप शुभेच्छा आणि सादर वंदन… सल्यूट मेजर जनरल साब! जय हिंद!
(नरकासुराच्या तावडीतून भगवान श्रीकृष्णांनी सोळा हजार एकशे महिलांची सुटका केली. मेजर जनरल सुनीलकुमार राझदान (सेवानिवृत्त) यांनी यशस्वी केलेल्या अशाच कारवाईत काहीसे साम्य जाणवले… म्हणून त्यादृष्टीने लिहिले.)
– समाप्त –
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈















