परवा आणि काल राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस सुरू असल्याच्या बातम्या सतत ऐकू येत होत्या … अनेक ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसाचे .. कुठे कुठे पडत असलेल्या गारांचे व्हिडीओज व्हाट्सअप वर आणि टी व्ही वरच्या बातम्यांमध्ये सतत बघायला मिळत होते. आमच्या गावातही दुपारभर स्वच्छ असलेलं आकाश दुपारनंतर झाकोळायला लागलं होतं… आणि ते सगळं वातावरण पाहून पावासाच्याही आधी मनात शब्दांची टपटप सुरू झाली … गारा वेचाव्यात तसे घाईघाईने ते शब्द वेचतांना अचानक कागदावर तशीच घाईघाईने उतरली एक कविता .. .. .. ..
माझ्या जवळचा मित्र आणि त्याची बायको हे भिन्न विचाराचे जोडपे आहे. बायको आस्तिक आहे तर मित्र नास्तिक. पण त्या दोघांमध्ये गेली तीस वर्षे कुठल्याही प्रकारचा विसंवाद झालेला नाही. कारण ते दोघेही आपापल्या विचारांचा एकमेकांवर दबाव टाकत नाहीत. त्यांच्यातील हा सुसंवाद मी नेहमीच बघत असतो आणि त्यातून मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले, ते असे…
जगात तेहतीस कोटी देव आहे अस मानलं जात.. असतील ही कदाचित.. पण प्रत्येकाच्या मनात त्याच्या देवाची एक वेगळी प्रतिमा असते.. प्रत्येकाचं आराध्य वेगळं असत.. कोणी विष्णू भक्त असतो तर कोणी शिव भक्त.. कोणी देवी भक्त असतो तर कोणी गणेश भक्त..
किती किती रूपे तुझी..
कुठे कुठे शोधू तुला..
तुझे अनंत देव्हारे…
हे जरी खर असलं तरी प्रत्येकाची श्रद्धा त्याची भक्ती ही वेगळी असते.. कोणी देवावर फुलं वाहून आपली भक्ती जपत असत.. तर कोणी खडकाळ मातीवर अनंत फुलं फुलवून आपली भक्ती दाखवत असत आता इथे प्रत्येकाची श्रद्धा महत्वाची.. आणि जिथे श्रद्धा असते तिथे अंध श्रद्धेला अजिबात स्थान नसते हे महत्वाचे… जेंव्हा पासून देव ही संकल्पना कळायला लागलीय तेंव्हा पासून बाप्पाचे म्हणजे गणपती बाप्पाचे साजिरे रूप च माझ्या डोळ्यासमोर येतं.. आणि मग ह्या सगळ्या च्या ही पलीकडे मनात खोल वर घर करून आहे तो माझा सखा.. कृष्ण… सावळा कान्हा.. त्याचं आणि माझं नात एका गोड आठवणीने जोडलं गेलंय.. लहानपणी आजी आम्हा मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायची.. रामायण, महाभारत आणि किती काय काय गोष्टी ती सांगायची त्या सगळ्याच फार रंजक असायच्या पण कृष्णाची गोष्ट जास्त आवडीचे.. रामायणातील राम जेंव्हा सीता मातेला सोडून जायचा तेंव्हा वाईट वाटायचं.. त्या वेळी तर रामाचा राग ही यायचा पण कृष्णाच्या कुठल्याच गोष्टीचा कधी राग आला नाही.. त्याने राधेला किती ही वाट पाहायला लावली.. त्रास दिला तरी तो नटखट कान्हा अजूनच जवळचा वाटायचा.. अर्थात राम आणि कृष्ण हे कोणी वेगळे नाहीत हे कळायचं ते वय न्हवत.. पुढे दोघांच्या प्रेमाची तुलना करायला लागले तेंव्हा दोघं ही आपापल्या अवतारात किती महान होते ह्याची खात्री पटत गेली.. माझी आजी पण गोष्टी इतक्या रंगवून सांगायची ना की बास आत्ता चे हे मालिका वाले पण तिच्या पुढे पाणी कमच म्हणावे लागतील🤪 कृष्ण जन्म रंगवून सांगताना वसुदेवा ने टोपलीत लपेटून ठेवलेलं ते देखणं बाळ अगदी डोळ्यासमोर उभं राहायचं.. कारावासातून बाहेर निघताना झोपी गेलेले पहारेकरी, नदीला आलेला पूर, देवकीचा आक्रोश सगळं सगळं आपण जगतो आहोत असा भास व्हायचा.. तेंव्हा पासून हा बालगोपाल मनात घर करून बसला तो कायमचा.. नंद यशोदा घरी वाढताना त्याच्या लिला.. त्याच्या वर आक्रमण करणारे ते क्रूर राक्षस.. ती पुतना मावशी.. आपल्या वरच चाल करून येतायत की काय इतकं ते कृष्ममय जीवन मी जगते आहे असं वाटायचं.. पायाला मुसळ बांधून घर भर फिरणारा लड्डू गोपाळ तर जास्तच लाडका वाटतो.. नटखट कान्हाच्या खोड्या त्याच्या बाल लिला, त्याच लोण्यावर ताव मारणं.. लोण्यानी माखलेला तो निरागस चेहरा सगळच कस लोभसवाण वाटतं.. सवंगड्यांना सोबत घेऊन त्याने काढलेल्या खोड्या, गोवर्धन पर्वत उचलून गोकुळ वासियांना दिलेल मायेचं छत, इंद्राचा चुर केलेला अहंकार हे सगळच कौतुकास्पद वाटतं.. कृष्ण कधी देव आहे म्हणून त्याची भिती नाही वाटतं तो जवळचा मित्र बनून नेहमी जास्तच जवळचा वाटतो.. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो आपला सखा, सोबत, प्रेरणास्थान, आदर्श पुत्र, स्त्रियांचा कैवारी, दुष्टांचा वैरी आणि राधेचा प्रियकर.. ही त्याची सगळीच रूप आपण जगतो आहोत ह्याचा सतत भास होत राहतो ते आपण कृष्ण मय आहोत म्हणूनच.. कृष्ण फार आपला सामान्य माणसा सारखा अगदी आपला वाटतो.. जेवढा तो नंद यशोदेच्या लाडाकोडात वाढला तेवढाच तो संदीपणी च्या आश्रमात सुदामा सोबत सामान्य रोजची कर्तव्य करताना पण तेवढाच प्रभावी वाटतो.. वयाच्या प्रत्येक टप्प्यात कृष्णाने जगण्यासाठी उत्तमोत्तम उदाहरण घालून दिलेली आहेत.. कृष्णा वरचं प्रेम त्याची भक्ती जगण्याची एक वेगळीच प्रेरणा देऊन जाते.. त्याच्या त्यागातलं त्याच निस्सीम प्रेम त्यांचं समर्पण आजच्या पिढीने अनुकरण करण फार गरजेचं वाटतं.. आज जेंव्हा छोट्या छोट्या संकटाना घाबरून मुलं आत्महत्या करताना दिसतात तेंव्हा कृष्ण निती महत्वाची वाटते… कृष्णाची संकटावर मात करण्याची जिद्द जगण्याची नवी ऊर्जा देऊन जातात.. फक्त ती समजून घेण्याची गरज आहे.. आणि मैत्रिणींनो खर सांगू का आपण संकटात आहोत, आपल्यावर अत्याचार होतायत आपल्याला सोडवायला कृष्ण येईल ह्याची वाट बघण्यापेक्षा स्वतः कृष्ण बनून त्या संकटावर मात करणं म्हणजे कृष्ण भक्ती.. तो तर आहेच आपल्या मनात आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कृत्यात, आपल्या प्रेमात, आपल्या त्यागात त्याची साथ असतेच ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे इतकचं.. कधी हा कृष्ण आपला बाबा बनून येतो तर कधी हा मित्र, भाऊ, सखा तर कधी पतीच्या रुपात फक्त त्या कृष्णाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे.. म्हणूनच वाटतं कृष्ण येईल मदत करेल ह्याची वाट पाहत राहण्या पेक्षा आपल्या प्रयत्नांनी ते संकट दूर करण्याचे प्रयत्न करून स्वतः कृष्ण बनता आलं पाहिजे..
जगेन मी कृष्ण बनुनी
राधेचा सखा होऊन
गोपिकांचा बालगोपाल..
यशोधेचा नंदलाल..
होऊनी मित्र सुदाम्याचा..
आधार बनू आपल्या सख्याचा..
रुक्मिणी चा होऊनी नाथ..
सोबत करू देऊ निरंतर साथ..
बनुनी प्रद्युमनाचा पिता..
मार्ग दाखवू सर्वथा..
पांडवांचा होऊनी कैवारी..
दूर करू कौरवी दूर विचारी..
कुण्या द्रौपदीचा होऊनी सखा..
देऊ विश्वास रक्षणाचा..
अर्जुनाचा होऊनी सारथी..
घेऊनी सुदर्शन हाती..
आपणच होऊन आपले मुरारी
मारून टाकू सारे दूर विचारी…
होऊनी कृष्णमय..
मिरवू आनंद निरामय…
टीप – सोनी लीव्ह वरती लालो नावाचा सिनेमा पाहिला आणि कृष्णप्रेमाने मन भरून आल.. कृष्ण प्रेमीनी आवर्जून बघावा असा मूव्ही आहे नक्की बघा…)
कधी नव्हे तो निवांतपणा मिळाला होता. उकाडा फार जाणवायला लागला होता. बाल्कनीत जरा हवा येत असेल म्हणून तिथे खुर्ची टाकून बसले होते. मग नजर सहजच इकडेतिकडे भिरभिरायला लागली, आणि दररोजच समोर असणाऱ्या कित्येक गोष्टी नव्यानेच पहातेय असं वाटायला लागलं……
… त्यातलेच एक हे घरासमोरील मोठ्ठे पिंपळाचे झाड …’ आजूबाजूचं सगळंच इतकं बदललंय.. पण हे झाड मात्र गेली कित्येक वर्षं आहे तसंच आहे.. ते कसं काय ?‘…
… इतक्यात वाऱ्याची एक सुखद झुळूक आली.. अंग मोहरून उठलं.. समोरचं ते झाडही सळसळलं …. आणि.. आणि बघता बघता त्याची कितीतरी पानं अल्लाद झाडावरून खाली पडली.. मला कसंतरीच झालं.. एकदम जाणवलं की ही तर पानगळ सुरु झालीये.. म्हणजे आता शिशिर संपून वसंत ऋतू येणार तर … आणि मग त्या भिरभिरणाऱ्या पानांबरोबर मनही भिरभिरायला लागलं – – –
खरंच.. काय गंमत आहे ना.. कोणी न सांगताच या झाडांना कळतंय की वर्षभर ज्याची वाट पाहात होतो तो आपला प्रिय सखा वसंतराजा आता येणार म्हणून.. आणि झाडं आता त्याच्या स्वागताची जणू तयारी करताहेत.. मनात आलं.. ही झटकून टाकलेली पानं म्हणजे जणू इतके दिवस नावडत्या सोबत्याबरोबर राहावे लागल्याने मनाला आलेली मरगळच अशी क्षणार्धात झटकून टाकली असेल का ? पण मग ज्यांच्यामुळे झाडांना शोभा अशी ती पानं एकदम अशी निरुपयोगी समजून दूर फेकून देतांना काहीच दु:ख नसेल का झालं झाडाला ?……
…. असं नसेल पण.. इतकं कठोर नि कृतघ्न व्हायला झाडं म्हणजे माणसं थोडीच आहेत ? मग हे कदाचित फक्त स्थित्यंतर असेल …. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.. किंवा झाडाचा पुनर्जन्म ??
आत्मा तोच आणि वरचा साज मात्र नवा.. कोवळ्या लुसलुशीत तजेलदार पानांचा !!.. असंच असावं….
.. म्हणूनच तर या खाली पडलेल्या पानांच्या चेहेऱ्यावर कुठे दु:ख दिसत नाहीये ! कशी आनंदाने भिरभिरताहेत ! त्यांची जागा घेऊन आता झाडावर अभिमानाने डोलणाऱ्या नव्या पानांकडेही किती कौतुकाने पहाताहेत ! केवढं मोठं मन हे.. आणि केवढा त्याग.. आपल्या जीवावर ज्याचा रुबाब, त्याला संजीवनी मिळावी म्हणून किती सहज स्वतःचाच त्याग करताहेत ही पानं ! ही पानगळ !…. का लोक खेदाने पहातात तिच्याकडे ? तिचा मोठेपणा का लक्षातच येत नाही कुणाच्या ?.. प्रत्येक गोष्टीत फक्त ‘उणं’ तेवढंच पाहणाऱ्या आम्हा माणसांना तिच्याकडून काहीच संदेश घ्यावासा वाटत नाही ते का ?….
…. निदान आयुष्याला मरगळ आणणाऱ्या नकारात्मक संवेदना झटकून टाकून सद्भावाची अन प्रेमाची नवी पालवी फुलवावी आणि भविष्य आनंददायी ‘वसंत’ व्हावं असा प्रयत्न करण्यासाठी या पिंपळवृक्षाप्रमाणे सज्ज व्हावं असं कधी वाटेल आम्हाला ?
नव्या रक्ताला.. नव्या विचारांना.. नव्या जाणिवांना संधी देण्यासाठी जुन्यांनी अट्टाहास सोडून समजूतदारपणा दाखवायलाच हवा हे या पानगळीकडून शिकेल का कधी आमचा समाज ? … या समाजवृक्षाला नवजीवन मिळावं म्हणून हातात हात घालून एकत्रपणे काही करू शकू का आम्ही.. या पानगळीसारखं ???
… सहजपणे ‘कचरा’ समजल्या जाणाऱ्या या दुर्लक्षित पानगळीतून कितीतरी शिकण्यासारखं आहे हाच एक विचार मग कितीतरी वेळ माझ्या मनात टपटपत राहिला … त्या पानगळीसारखाच … आणि नकळत तसेच भिरभिरत कागदावर शब्द उतरले…
☆ पानगळ… ☆
☆
दिवसामागून दिवस चालती.. ऋतूमागूनी ऋतू धावती
विसावा नसे मुळी कसा तो.. निसर्गचक्रा सततची गती – –
*
वसंत प्रिय तो येईल आता.. कल्पनेत या वृक्ष थरारे
स्वागतास अति आतुर झाला.. आनंदे अन मनही भरारे – –
*
येणार नक्की तो प्रियतम म्हणुनी.. सळसळ उठली पानोपानी
स्वतःस आता किती सजवावे.. रोमरोम हे जाई हरखुनि – –
*
मरगळ मनीची झटकत असता.. विखरून पाने किती ओघळली
सालभरी त्यांनीच सजवले.. जुनी जणू ती आता झाली – –
*
जुने जाऊ द्या मरणालागी.. म्हणतच येती नवी पाने ती
परी तयांना आज कळेना.. उद्याची त्यांची हीच स्थिती – –
☆ जागतिक कविता दिन विशेष – मानसउत्सव… ☆ श्री सुनील देशपांडे☆
(२१ मार्च जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने)
सध्याचा पुणेकर असलेला मी अंतर्मनाने मूळ कविता प्रेमी नाशिककर.
दरवर्षी २८ फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती हा मराठी दिन, परंतु विशेषतः ‘मराठी कविता दिन’ म्हणून माझ्या मनात कायम घर करून राहिलेला आहेच. १० मार्च हा कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन. त्यामुळे नाशिक मध्ये असताना २८ फेब्रुवारी ते १० मार्च हा मराठी उत्सव म्हणून आम्ही साजरा करत असू.
खरं म्हणजे कवितेचे प्रेम निर्माण करणारी पहिली कविता कुसुमाग्रज उर्फ आमचे लाडके तात्या यांची…
‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ तेव्हापासून वेगवेगळ्या वयामध्ये पाठ्यपुस्तकातून तसेच कवी संमेलनातून त्यांच्या अनेक कवितांनी वेड लावले. अगदी ‘स्वातंत्र्यदेवतेच्या विनवणी’ पर्यंतच्या लोकप्रिय कवितांना रोजच वंदन करावेसे वाटते.
सध्या शारीरिक कारणामुळे फारसे बाहेर पडू शकत नसलो तरी २८ फेब्रुवारी ते १० मार्च या दिवसात मनातून हा ‘मानसउत्सव’ मी साजरा करतच असतो. आणि काव्य प्रेमामुळे त्यानंतरही वेगवेगळ्या विविध दिवशी कवितेचे ‘मानसउत्सव’ साजरे करण्याची माझी प्रथा खालील दिवशी मनापासून चालूच असते. रसिकांच्या माहितीसाठी हे दिवस सादर करीत आहे.
१) २१ मार्च : आंतरराष्ट्रीय कविता दिन किंवा जागतिक कविता दिन :
१९४५ मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनेस्को या संस्थेने काव्य अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देण्याच्या आणि लुप्त होत असलेल्या भाषांना ऐकण्याची संधी वाढवण्याच्या उद्देशाने २१ मार्च हा जागतिक काव्य दिन म्हणून १९९९ मध्ये प्रथम स्वीकारला आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये विविध भाषांमध्ये २१ मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो.
२) २८ एप्रिल: राष्ट्रीय महान कविता दिन.
भूतकाळात होऊन गेलेल्या खूप मोठ्या आणि महान कवींच्या कविता आठवणे त्यांचे पठण करणे मनन करणे आणि अशा कवींच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम करणे यासाठी राष्ट्रीय महान कविता दिन साजरा केला जातो.
३) ३० एप्रिल
अमेरिकेमध्ये ‘पोएम इन युअर पॉकेट डे’ म्हणजेच तुमच्या खिशातली कविता. असा एक अभिनव दिवस साजरा केला जातो. लघु कविता, छोट्या कविता, चारोळ्या, पाचोळ्या, रुबाई, शायरी वगैरे पद्धतीच्या कविता अशा प्रकारच्या कवितांना उठाव येण्यासाठी आणि अशा प्रकारच्या कविता सध्या अमेरिकेमध्ये खूपच लोकप्रिय असून भारतात सुद्धा सध्या अशा प्रकारच्या कविता अत्यंत लोकप्रिय होत आहेत. अशा कवितांसाठी अनेक लोकप्रिय कवीं मार्फत हा दिवस साजरा केला जातो.
४) ७ मे : कविवर्य रवींद्रनाथ टागोर जयंती
हा दिवस सहसा संगीतकविता किंवा उत्तम अशा वृत्तबद्ध कविता किंवा संगीतिका अशा पद्धतीच्या काव्य अविष्काराने साजरा करण्याची पद्धत आहे. विशेषतः बंगाली साहित्यिकांमध्ये हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतातही काव्यप्रेमी व्यक्ती या दिवशी विविध प्रकारचे उत्तम संगीतमय काव्याचे व संगीतीय कविता अथवा काव्यगायन, संगीत नृत्य गायन अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाने हा दिवस साजरा केला जातो.
५) आषाढ शुद्ध प्रतिपदा
(हा दिवस साधारणपणे जुलै महिन्यात येतो)
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत भाषेतील महान कवी व नाटककार कवी कुलगुरू कालिदास यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. याला ‘महाकवी कालिदास दिन’ किंवा ‘कवि कुलगुरू कालिदास दिन’ म्हणतात. महान कवि कालिदास यांच्या मेघदूत या महान काव्याचा निर्मिती दिवस मानला जातो. हा दिवस कालिदास जयंती दिन म्हणूनही समजला जातो. या दिवशी विविध कवी संमेलने व कवितांचे उत्सव साजरे करण्याचा प्रघात आहे. वर्षा ऋतू मधील हा काव्योत्सव. पाऊस अर्थात वर्षा ऋतू हा काव्य भावना जागृत करणारा काव्यात्मक वातावरण निर्माण करणारा ऋतू म्हणून समजला जातो. यामुळेच कवी मंडळींचा सगळ्यात आवडता दिवस त्यांच्या सगळ्यात आवडत्या ऋतूमध्ये म्हणजेच सिझनमध्ये येणारा हा स्फूर्तीदायक दिवस.
६) २१ ऑगस्ट : राष्ट्रीय कवी दिवस
हा दिवस कवींच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. कवितांमधून सामाजिक जागृती आणि सामाजिक संस्कार करणाऱ्या प्रसिद्ध कवींचा त्यादिवशी सन्मान केला जातो. त्यांच्या कवितांचे कार्यक्रम. विविध काव्य स्पर्धा व उत्कृष्ट कविता पारितोषिके देऊन अशा विविध पद्धतीने राष्ट्रीय कवी दिवस साजरा केला जातो. हा दिवस कवींचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
७) ऑक्टोबर महिन्याचा पहिला गुरुवार: राष्ट्रीय कविता दिन
एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की ८ ते १६ वर्षा दरम्यान शिक्षण घेणारी पिढी कवितेवर मनापासून प्रेम करते. सर्वसाधारणपणे या वयोगटातील ४८.८% विद्यार्थी कविता प्रेमी असतात. अशा नव्या पिढीतील उदयोन्मुख कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कवी गुणांना उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय कविता दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. प्रथमत: हा दिवस इंग्लंडमध्ये राष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा होत असे. त्यावेळी अनेक देश ब्रिटिश राजसत्ते खाली असल्यामुळे त्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. विशेषतः प्रसिद्ध कवींनी नवीन पिढीतील कवींचे काव्यविश्वात स्वागत करून त्यांच्या मनात कवितेविषयी प्रेम जिव्हाळा व नवीन पिढीच्या काव्य कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट या दिवसाचे असते. नव्या पिढीतील काव्य कल्पनांना जुन्या पिढीतील कवींनी केलेला सलाम म्हणजे राष्ट्रीय कविता दिन.
महर्षी वाल्मिकी यांना आद्यकवी मानले जाते. या विश्वातील पहिली कविता ज्यांना स्फुरलीते महर्षी वाल्मिकी. म्हणून त्यांना कवितेचे जन्मदाते संबोधले जाते. महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी कवितेच्या निर्मात्याचा जन्मदिवस म्हणून अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम आणि कवींचा सन्मान अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी स्वच्छ चांदण्यामध्ये सहसा रात्रीच्या वेळी काव्य रंगात रंगून जाणे आणि केशरी दुधा बरोबर काव्याचा आस्वाद घेणे हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सगळीकडे भारत देशामध्ये साजरा केला जातो. सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुष मध्यरात्री नंतर पर्यंत सुद्धा या कार्यक्रमामध्ये रंगून जातात.
असे हे मला ज्ञात असणारे वर्षातील विविध पद्धतीने साजरे होणारे कवितांचे दिवस. या दिवसांच्या आठवाच्या निमित्ताने माझी एक कागदावर न उठलेली कविता .. कल्पनेमध्येच लपून असलेली कविता.. त्या कवितेबद्दलची ही कविता रसिकांच्या चरणी अर्पण…
या शुभेच्छा देताना ‘यंत्रदास’ आम्हाला सुरक्षिततेच्या काही सूचनाही आवर्जून देतो. सणाच्या रंगांचा बेरंग होऊ नये म्हणून या सूचनांचे पालन करावे आणि सणाचा आनंद लुटावा अशी त्याची आग्रहाची विनंती आहे.
‘श्री सुरक्षितताबोध’ या ग्रंथाच्या ‘बालक्रीडनसुरक्षिततानाम’ अध्याय ५. श्लोक १२ ते १४ मधे यंत्रदास सांगतोय.
*
आहा. बाळके खेळतीं रंग होळी
जळीं लोळतीं (लावुनी भांग गोळी?)
फुगे फोडितीं. फेकितीं रंग नाना
सिनेमानटासारखे छंद नाना ll१२ll
*
किती रंग ते. काय त्यांची झळाळीं!
तेलातले रंग. ख्याती निराळी
निळे. तांबडे. पांढरे वा रुपेरी
जरा लागता… त्याहुनी मिर्चि बsरी! ll१३ll
*
मना! ऐशिं होळी न केव्हाच खेळीं
(रहावे सुखे खाउनी फक्त पोळी!)
असे रंग ते भंगवीतीं शरीरा
तसा लागतो रे करावा खरारा ll१४ll
*
टीप:-
खरारा: घोड्याचे अंग स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘खरारा करणे’ म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणा-या बोथट दातेरी. काटेरी पत्र्यालाही ‘खरारा’ म्हणतात.
यंत्रदास: ‘यंत्रदास’ या टोपण नावाने १९९३ साली ‘ श्रीसुरक्षिततोध ‘ नावाचा. ‘सुरक्षितता’ (Safety ) या विषयावर मी लिहिलेला ग्रंथ पुण्याच्या ‘टेल्को’ – आताची ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने प्रकाशित केला होता. ‘ सुरक्षिततेविषयी सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारा उत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन या ग्रंथास सन्मानिले आहे.
प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.
ही जुनी गोष्ट आहे.माझं लग्न 7 जून 1987ला झालं आणि मी सासरी म्हणजे बहुले, ता.पाटण,जि.सातारा इथं आले.सहा महिन्यांनी 31 डिसेंबर आला.त्यावेळी आम्ही घरातील सह्याद्री दूरदर्शनवरील कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असायचा तो पहात असू.दोनच राष्ट्रीय चॅनल त्यावेळी होते.
सासरी सतरा एकर शेती घरीच करत असल्यामुळे गडी माणसांचा राबता होता.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही होता.घरात कॅलेंडर कुठेतरी असायचे.पंचांगाचा वापरच सर्रास होत असल्याने सणवार,तिथी सर्व व्यवस्थित कळायचे.साजरे व्हायचे.गाव हे तसं स्वयंपूर्ण होतं.म्हणजे माळी,सुतार,लोहार,न्हावी ,शिंपी इ.यांनी काम केले की त्यांना धान्य, भुईमूग शेंगा असं दिलं जायचं.अशिक्षित लोकांना वेळेला सावकार लोक असायचे.त्यामुळे बॅंक व्यवहार त्यांना क्वचित माहित होते.
ही कविता या पार्श्वभूमीवर सुचली.31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहून झाला.एक तारीख गेली.दोन तारखेच्या सकाळी गावाला गेलेला एक गडी रघू परत आला.तो धारा काढायला मदत करायला येत असे.त्याला मी “Happy New year रघू “असं म्हणाले.तो क्षणभर बघतच राहिला.त्याला वाटलं वहिनींनी काही तरी काम सांगितले आहे पण कळलं नाही म्हणून म्हणाला”वहिनी,काय म्हनला तुम्ही कळलं न्हाय” मी पुन्हा Happy New year म्हणाले.तो म्हणाला” ते काय असतं ?”मला हसायला आले.सगळे हसायला लागले.मग मी म्हणाले.”अरे, नविन वर्ष सुरू झालं ना काल.ते सुखाचे जावो असं म्हणलं.”मग तो म्हणाला “काकांनी पंचांगात बगून(माझे सासरे)तसं कायबी सांगितलं नाय.”
मग मी त्याला सर्व माहिती सांगितली.त्यावर त्यानं दिलेलं उत्तर”आवं रोजची कामं काल बी हुती,आज बी हायत, उद्या बी असनार.कशाचं नवीन वरीस आन् काय.हां पुरनपोळी करायची हाय काय मंग हिला सांगतो करायला .”उत्तर साधं होतं. पण मी मात्र त्यांवर विचार करायला लागले .आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.शेतकर्यांना आजही हा जल्लोष वगैरे माहित नाही.त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते त्यामुळे विचार क्षेत्रही.त्याचा विस्तार व्हायला हवा.हे उत्तर मी कवितेत शब्दबद्ध केले आहे.