मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

  

मूर्खपणा आणि वेडेपणा (Madness and Stupidity)!

एका माणसाच्या गाडीचे टायर बरोबर एका मानसिक रुग्णालयासमोर (Mental Hospital) पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना त्याला मोठी कसरत करावी लागली.

त्याने गाडीचा बोनेट उघडला, जॅक काढला, जादा चाक (spare wheel) आणि व्हील स्पॅनर बाहेर काढले. पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी त्याने चारही नट (nuts) उघडले. पण दुर्दैवाने, ते चारही नट गडगडत गेले आणि थेट गटारात पडले. गटाराचे झाकण उघडता येण्यासारखे नव्हते; नट पाण्यात गायब झाले होते.

तो माणूस हताश होऊन इकडे-तिकडे पाहू लागला आणि शेवटी निराश होऊन पदपथावर बसला.

रुग्णालयाचा एक रुग्ण कुंपणातून हे सर्व सुरुवातीपासून पाहत होता. तो ओरडला:

“ए मूर्खा! काय करतोयस तिथे? “

माणसाने उत्तर दिले:

“मित्रा, विचारू नकोस रे. टायर पंक्चर झाला आणि चाक बदलताना चारही नट गटारात पडले. “

तो रुग्ण लगेच म्हणाला: “अरे, तू उगीच गोष्टी अवघड करतोयस! साधी गोष्ट आहे, बाकीच्या तिन्ही चाकांमधून एक-एक नट काढ, म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक चाकाला तीन नट होतील. पुढच्या पेट्रोल पंपापर्यंत किंवा टायर रिपेअरिंगच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी तेवढे पुरेसे आहेत! “

त्या माणसाने रुग्णाने सांगितल्याप्रमाणे केले आणि आनंदाने त्याला विचारले: “अरे वा! मग तू या मानसिक रुग्णालयात काय करतोयस? “

त्या रुग्णाने दिलेले उत्तर खरंच ‘लेजेंडरी’ होते…

“मित्रा, आम्ही इथे ‘वेडेपणा’मुळे आहोत, ‘मूर्खपणा’मुळे नाही! “

‘वेडेपणा’ ही एक वेगळी गोष्ट आहे.

आणि ‘मूर्खपणा’ पूर्णपणे वेगळी.

वेडेपणावर उपचार होऊ शकतात, पण मूर्खपणावर नाही!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

साळिंदराचं कोडं (Porcupine Dilemma)

जवळ यायचं की लांब राहायचं? तुम्हाला वाटतं की प्रेमात किंवा मैत्रीत जितकं जास्त जवळ जाल, तितकं जास्त सुख मिळेल? तर मग तुम्ही स्वतःला एका मोठ्या संकटात ढकलत आहात.

खरं तर, माणसांच्या बाबतीत ‘अति जवळीक’ हेच दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. नात्यातलं अंतर कमी करणं म्हणजे आनंदाची खात्री नसून, तो दुखापतीला दिलेलं आमंत्रण असू शकतं.

१८५१ सालची गोष्ट आहे… आर्थर शोपेनहॉवर नावाच्या एका जर्मन तत्त्वज्ञानं जगाला एक अजब विचार दिला. याला ‘पोरक्युपाइन डिलेमा’ किंवा ‘साळिंदराचं कोडं’ म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल, माणसाच्या आयुष्याचा आणि काट्यांनी भरलेल्या साळिंदराचा काय संबंध? ऐका तर, हा संबंध तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्याशी आणि तुटणाऱ्या नात्यांशी जोडलेला आहे!

कल्पना करा, की कडाक्याची थंडी पडलीय. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीनं कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवीय.

साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचू लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन्हा जवळ येतात, आणि पुन्हा तेच काटे टोचतात.

हा खेळ असाच सुरू राहतो. जोपर्यंत त्यांना एक असं ‘योग्य अंतर’ सापडत नाही, जिथं त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत.

माणसाचंही अगदी असंच असतं… आपल्याला एकटं वाटतं, एकाकीपणाची भीती वाटते, म्हणून आपण नात्यांच्या शोधात असतो. कुणाच्या तरी जवळ जावंसं वाटतं, कुणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं…

परंतु जसं आपण कुणाच्या तरी खूप जवळ जातो, तसे समोरच्याचे ‘काटे’ आपल्याला टोचू लागतात.

हे काटे म्हणजे काय? तर समोरच्याचे स्वभावदोष, त्यांच्या सवयी, त्यांचा अहंकार किंवा त्यांचे विचार. आपण जितके जवळ जातो, तितके त्यांचे हे दोष आपल्याला स्पष्ट दिसू लागतात आणि मग सुरू होतो संघर्षाचा प्रवास… आणि आपल्याला वाटतं की, यापेक्षा लांब राहिलेलं बरं होतं!

आज  २०२६ मध्ये, जेव्हा आपण डिजिटल जगात एकमेकांशी २४ तास जोडलेले आहोत, तेव्हा हा ‘साळिंदराचा पेच’ अधिकच गंभीर झालाय.

अलीकडच्या काही संशोधनांतून असं समोर आलंय की, सोशल मीडियामुळं आपण लोकांच्या व्हर्च्युअली इतके जवळ गेलो आहोत की, त्यांच्या खाजगी आयुष्यातले ‘काटे’ आपल्याला सतत टोचत राहतात. त्यामुळं आजकाल त्यामध्ये लवकर ‘बर्नआउट’ जाणवतोय.

शोपेनहॉवरनं यावर एक जालीम उपाय सांगितला होता… तो म्हणजे, ‘सन्मानजनक अंतर’ (Polite Distance).

नात्यात पूर्णपणे विरघळून जाणं किंवा पूर्णपणे लांब जाणं, या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. सुखी व्हायचं असेल तर दोन साळिंदरांसारखं असं अंतर राखायला हवं, जिथं प्रेमाची ऊबही टिकून राहील आणि स्वाभिमानाला धक्काही लागणार नाही.

अनेकदा आपण प्रेमाच्या नादात समोरच्याच्या वैयक्तिक अवकाशात (Personal Space) शिरतो, आणि मग तक्रार करतो की, नात्यात गुदमरल्यासारखं होतंय.

थांबा, अजून पुढं ऐका… ही समस्या फक्त जोडप्यांची नाहीये. आई-वडील आणि मुलं, जिवलग मित्र किंवा ऑफिसमधले सहकारी, या सगळ्यांना हे साळिंदराचं तत्त्व लागू पडतं.

याचा अर्थ असा नाही की जवळ जाऊच नका… याचा अर्थ असा आहे की, डोंगर चढताना त्याचे दगडधोंडे टोचणारच, हे स्वीकारून योग्य अंतर राखा. शिष्टाचार आणि मर्यादा या नात्यातल्या भिंती नसून, ती नात्याला वाचवणारी कुंपणं आहेत.

आजच्या या धावपळीच्या आणि ‘ओव्हर-शेअरिंग’च्या जगात तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपासून किती अंतर राखून आहात? विचार करा, तुम्ही उबेसाठी जवळ जाताय की एकमेकांना टोचण्यासाठी?

शेवटी प्रश्न उरतोच… आपण उबेसाठी टोचून घ्यायला तयार आहोत की थंडीत कुडकुडत एकटं राहायला? की आपण ते सुवर्णमध्य गाठणारं ‘अंतर’ शोधण्यात यशस्वी झालो आहोत…?

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई अजूनही वाट पहाते… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आई अजूनही वाट पहाते… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

आई अजूनही वाट पाहते…

पण आम्ही मोठे झालो.

 

घर बदललेलं नाही.

त्या भिंती अजूनही तशाच आहेत.

दार अजूनही तसंच किरकिरत उघडतं.

 

फक्त एक गोष्ट बदलली आहे…

घरातले आवाज कमी झालेत.

 

आई अजूनही तिथेच आहे.

पण आम्ही… मोठे झालो.

 

लहानपण :

लहानपणी घर म्हणजे गोंधळ असायचा.

सकाळी आईचा आवाज –

उठा आता! शाळेला उशीर होईल.

आम्ही चादरीत लपून बसायचो.

आई येऊन पांघरूण ओढायची –

चल… अजून झोपायचं नाही.

किचनमध्ये पोह्यांचा वास.

डब्यांसाठी घाई.

बाबा पेपर वाचत.

 

त्या सगळ्या गोंधळात

आई कायम धावत असायची.

 

पण तेव्हा आम्हाला वाटायचं…

आईला थकवा येतच नाही.

 

वेळ:

हळूहळू वर्षं गेली.

शाळा संपली.

कॉलेज सुरू झालं.

घरातले विषय बदलले.

 

Exam कधी आहे? ”

Job मिळाला का? ”

 

आई अजूनही तसंच विचारायची –

जेवलास का? ”

तो प्रश्न कधी बदललाच नाही.

 

घर सोडण्याचा दिवस :

एक दिवस बॅग भरली.

नोकरीसाठी शहर बदलायचं होतं.

आई शांतपणे कपडे घडी करत होती.

 

ती म्हणाली –

सगळं घेतलंस ना? ”

मी म्हणालो –

हो.

पण खरं सांगायचं तर

मी घरच तिथे ठेवून जात होतो.

 

दारातून बाहेर पडताना

आई म्हणाली –

कधी कधी फोन कर.

 

त्या चार शब्दांत

खूप काही होतं.

 

नवीन आयुष्य:

नवीन शहर.

नवीन नोकरी.

नवीन लोक.

आयुष्य वेगाने चालायला लागलं.

Meeting.

Deadline.

Traffic.

फोन करायचं ठरवायचो…

पण वेळ नसायचा.

 

कधी कधी रात्री आईचा missed call दिसायचा.

 

मी message करायचो –

Busy होतो.

 

आई reply द्यायची –

ठीक आहे, बाळा.

 

आईचं घर:

आई अजूनही त्या घरात आहे.

सकाळी उठते.

चहा करते.

कधी कधी चार कप ठेवते.

मग हसते –

अरे… आता दोनच लोक.

 

किचन शांत.

भांड्यांचा आवाज कमी.

पण आठवणींचा आवाज जास्त.

 

गॅलरी:

 संध्याकाळी आई गॅलरीत उभी राहते.

 रस्त्यावरची मुलं खेळत असतात.

 कुणीतरी “आई! ” म्हणत धावत येतं.

 

आई थोडं हसते…

आणि आत जाते.

 

कारण तिला आठवतं —

एकेकाळी त्या आवाजात आमचं नाव असायचं.

 

जुने फोटो:

एक दिवस आईने जुना अल्बम काढला.

फोटो –

शाळेचा.

पिकनिकचा.

दिवाळीचा.

 

एका फोटोमध्ये

आम्ही सगळे हसत होतो.

 

आई फोटोला हात लावते.

आणि हळूच म्हणते –

किती पटकन मोठे झाले.

 

सण:

दिवाळी आली.

पूर्वी घरात धिंगाणा असायचा.

 फटाके.

फराळ.

गोंधळ.

 

आता आई दोनच दिवे लावते.

एक देवासाठी.

एक दारासाठी.

 

ती म्हणते –

कदाचित यंदा येतील.

 

 फोन:

 रात्री फोन वाजतो.

 आई पटकन उचलते.

 

हॅलो? ”

मी म्हणतो –

आई, कशी आहेस? ”

 ती लगेच म्हणते –

छान… तू जेवलास का? ”

 

मी म्हणतो –

हो.

ती अजून काही बोलायचा प्रयत्न करते.

 

पण मग म्हणते –

ठीक आहे… काम कर.

 फोन ठेवला की

घर पुन्हा शांत होतं.

 

सत्य:

मोठं होणं वाईट नाही.

स्वप्नं पूर्ण करणंही चुकीचं नाही.

पण एक गोष्ट आपण विसरतो…

 

आपण मोठे होत असताना

आई अजूनही तिथेच थांबलेली असते.

 ती अजूनही वाट पाहते.

 

एका फोनची.

एका भेटीची.

एका “आई” म्हणण्याची.

 

एक दिवस:

 एक दिवस अचानक मी घरी गेलो.

 दरवाजा उघडला.

 आई मला पाहून थबकली.

 अरे अचानक? ”

 मी म्हणालो –

तुला भेटायला आलो.

त्या दिवशी किचन पुन्हा जिवंत झालं.

आईने चार पदार्थ केले.

 घरात पुन्हा आवाज आला.

 

 शेवट:

 त्या रात्री आई म्हणाली –

तू आलास की घर पुन्हा घर वाटतं.

ते वाक्य ऐकून

माझं मन भरून आलं.

 

कारण मला कळलं…

 

घर कधी रिकामं नसतं.

घरातली वाट पाहणारी आई

त्याला जिवंत ठेवत असते.

 

 जर तुम्ही ही कविता वाचत असाल…

 तर एक काम करा.

 आज आईला फोन करा.

 फक्त एवढं म्हणा —

आई, कशी आहेस? ”

 कारण…

 आपण मोठे झालो असलो

तरी आई अजूनही वाट पाहते.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “लागणे” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “लागणे” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मराठीत “लागण्याची” गंमत बघा:

बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला*होता.

तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.

त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.

बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.

घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.

भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.

निघताना बस फलाटाला “लागली”*च  होती, ती *”लागली”च पकडली.

पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय …

घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची *”लागली”.

थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..

घरची मंडळी हसायला “लागली”.

लेखक : पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समर व्हेकेशन मेमरीज… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

समर व्हेकेशन मेमरीज… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

उशिरा उठायचं,

आईच्या कामात लुडबुड करायची,

उठल्या उठल्या कॅरम काढायचा,

मित्र मैत्रिणींना बोलावून आणायचं,

सटर फटर काहीतरी खात राहायचं,

कैरीच्या फोडी पळवायच्या,

मधूनच ताट भरून कलिंगडाच्या फोडी यायच्या,

मग कधीतरी जमलं तर अंघोळ,

मग रस काढून उरलेल्या कोयी आणि सालं चोखायची,

पत्त्यांचे डाव, खाऊ, कुल्फीची घंटा,

चार आण्याची की आठ आण्याची कुल्फी आणायची ह्यावर चर्चा,

कॅरम आणि पत्त्याचे उधळलेले डाव,

कुणीतरी लायब्ररीमधून आणून दिलेली एकट्याने बसून वाचलेल्या विक्रम वेताळ, चम्पक, चांदोबा, किशोर पुस्तकं,

एक रुपया तासावर भाड्याने आणलेली सायकल,

भाड्याने आणलेला व्ही. सी. आर. ,

खराबलेल्या कॅसेट्स्,

मग चुलत, आत्ते, मामे, मावसभावा– बहिणींबरोबर एकमेकांकडे राहायला जाण्याचा प्लॅन,

भीत भीत पोहोण्याच्या तलावावर जाऊन कशीबशी संपवलेली ती ४० मिनिटं,

संध्याकाळी बागेत गेल्यावरचा तो भेळेतल्या कांदा कोथिम्बिरीचा आणि पाणी पुरीचा एकत्रित वास,

सगळ्या नातेवाईकांकडे दोन- चार, दोन-४ चार दिवस करून घालवलेली अख्खी सुट्टी,

काहींच्या अगदी बेताच्या परिस्थितीतही केलेले लाड,

कोपरापर्यंत जाणारा आमरसाचा ओघळ,

सगळ्या शर्ट्सना पडलेले रसाचे डाग,

पापड कुरडयाची वाळवणं आणि त्या पळवणं

पहाटे उठून क्रिकेट खेळणे,

एखादा सिनेमा,

ह्या सगळ्यामध्ये ताण म्हणावा म्हणजे अगदी नगण्य असं रिझल्टचं टेन्शन,

तो साधेपणा गेला. आता एवढ्या कुठल्याच साध्या गोष्टीत मन रमत नाही. खूप जास्त काहीतरी entertaining – happening लागतं. छान सुट्टी असायची….. पण संपून गेली……

खरच रम्य ते बालपण….. परत जाता येईल का हो भूतकाळात…?

Missing all..

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाया” – कवी : विजय जोशी  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “बाया” – कवी : विजय जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

बाया कपडे धुवायला जातात,

नदीवर निगुतीने!

 

सुख दुःखे बुचकळवतात पाण्यात,

आणि बोलतात वाहत्या पाण्याशी,

सराईतपणे मनमोकळं….

कपडे घासतात, आपटतात,

धोपटतात दगडावर,

साफ करतात कपड्यांचा मळ, आणि मनातली खळबळ सुद्धा!

 

बायका कुजबुजतात, पुटपुटतात, बडबडतात,

आपापसात,

मनाशी,

कपड्यांशी,

पाण्याशी,

दगडांशीसुद्धा.

 

विरघळून जातो सारा शीण,

नदीतल्या पाण्यात, आणि,

बाया फिरतात माघारी,

पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात करायला,

नदीच्या पात्रात विस्तीर्ण आणि

स्वच्छ नितळ मनाने!

कवी : विजय जोशी

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पोच पावती… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पोच पावती… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते “ह्याची पोचपावती मिळेल ना?

बरेचदा मीही हिला सांगतो, acknowledgment म्हणून जपून ठेव ग!

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…

“पोचपावती” ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये?

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं.

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा.

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात, “छान झाला बरं का आजचा कार्यक्रम! ” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो!

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते.

एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं appreciation देऊन बघा. अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं!

आमची घरकामवालीला गजरे, फुलं घालून यायची फार आवड! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येतं, “प्रमिला काय मस्त दिसतेस! चल. एक फोटो काढते तुझा! ” ह्यानेसुद्धा त्या खूप खूश होतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठीही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.

एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो, की वर्गात “छान निबंध लिहिलास हो! ” असं म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यांनी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.

ह्या पोचपावतीसाठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही. कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं, “काका, तांदूळ चांगले होते हं तुमच्याकडून घेतलेले. “

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच. ही दखल घायला आणि द्यायलाही वयाचं बंधन नसावं कधीच…

काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात, पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो..!

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही… तसं करूही नये. कारण पोचपावती जितकी उस्फूर्त, तितकीच जास्त खरी!

पोच पावती फक्त शब्दांतूनच नाही, तर डोळ्यांतून… कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी…

कधी योग्य आदर ठेवून, कधी गळामिठी मारून, अगदी कधी “च्यामारी! भारीच काम केलंस तू भावड्या! ” अशी वेगळ्या भाषेतूनही यावी.

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फूर्त! … महत्त्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत cool dude हवा.

ह्या पोचपावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो…

आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही. फक्त मोकळं आणि स्वच्छ मन…!

तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद!

लेखक : अज्ञात

संकलन व प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पानं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पानं…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

काही पानं खुडायची असतात. (चहा)

काही पानं वाढायची असतात. (केळी, भोजन)

काही पानं चिरायची असतात. (कोथिंबीर)

काही पानं शिजवायची असतात.(पालक, मेथी)

 काही पानं तळायची असतात. (अळू, कढीपत्ता)

काही पानं खायची – रंगवायची असतात. (नागवेल, विडा)

 काही पानं कुटायची असतात. (पुदिना)

 काही पानं लुटायची असतात. (आपटा)

काही पानं पुरायची असतात. (पालापाचोळा कंपोस्ट)

 काही पानं जपायची असतात. (पिंपळ)

 काही पानं तोरणात सजवायची असतात. (आंबा)

काही पानं केसात माळायची असतात. (केवडा)

काही पान वाहायची असतात. (बेल)

काही पानं मानाची असतात. (नागवेली)

काही पानं खमंग फोडणीसाठी असतात. (कढीपत्ता)

काही पानं शेवटी सोबती येतात. (कडबा)

काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात. (मेहंदी)

काही पानं नैवेद्याच्या परिपूर्णतेसाठी असतात.(तुळस)

काही पानं फक्त स्वादासाठी असतात(पुदिना)

काही पानं मसाल्यासाठी असतात. (तेजपत्ता)

काही पानं सुशोभिकरणासाठी असतात. (नारळाच्या झावळ्या)

काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात. (पळस)

काही पानं तल्लफ भागविणारी असतात. (तंबाखू)

काही पानं सत्यनारायण पूजेसाठी उपयुक्त असतात. (कर्दळी)

काही पानं गणपतीला आवडतात. (आघाडा,हराळी)

आणि

    आपल्यासाठी

काही पानं भरायची असतात.(वही)

काही पानं जोडायची असतात. (पुरवणी)

काही पानं लपवायची असतात. (प्रगती पुस्तक !)

काही पानं उलटायची असतात. (भूतकाळ, दुःखाचे क्षण)

काही पान तोंडाला पुसायची असतात (आश्वासन)

तर

काही नवीन पानं उघडायची असतात.

काही पानं खेळायची असतात (पत्ते)

थोडक्यात काय, तर पानोपानी आनंदी आनंद…!

  

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पाच मिनिटं… आणि बदललेलं घर’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पाच मिनिटं… आणि बदललेलं घर’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

 

एका मित्राच्या घरी गेलो होतो…

साधंसं २ BHK… पण समाधानाने भरलेलं.

 

मित्र—माझ्याच वयाचा.

शून्यातून उभं राहिलेला.

पुण्यात स्वतःचं घर, छोटंसं का असेना पण स्वतःचं.

बायको—घर सांभाळणारी, मनापासून आदरातिथ्य करणारी.

दोन मुलं—आधुनिक, स्मार्ट, स्वतःच्या जगात रमलेली.

 

अरे पिठलं-भाकरीला ये कधी!

असा अचानक आलेला फोन… आणि मी गेलो.

 

घरात गेलो…

हॉलमध्ये बसलो…

चहा आला… गप्पा रंगल्या…

पण एक गोष्ट सतत खटकत होती—

दोन्ही मुलं समोर बसलेली…

पण खरंतर तिथे नव्हतीच.

त्यांचं पूर्ण जग मोबाईलमध्ये हरवलेलं.

 

इतक्यात एक छोटासा प्रसंग घडला…

मित्राचा मोबाईल हँग झाला.

त्याने मुलाला बोलावलं.

मुलाने दोन सेकंदात सगळं ठीक केलं…

पण जाताना एक वाक्य टाकून गेला—

इतकी घाई कशाला करता? थांबता येत नाही का? ”

मुलगीही लगेच—

हो, परवा पण असंच केलं होतं…

 

त्या दोन वाक्यांनी वातावरण बदललं.

मित्र शांत… सवयीचा झालेला.

पण वहिनीचा चेहरा…

तो मात्र सगळं सांगून गेला.

 

मीही शांत बसलो होतो…

पण आत काहीतरी हलत होतं.

वाटलं—आपलं काम नाही… जेवून निघू.

पण दुसरं मन म्हणालं—

आज नाही बोललास, तर कधीच नाही.

 

मी त्यांना हाक मारली.

पाच मिनिटं द्या… लेक्चर नाही… फक्त गप्पा.

 

ते दोघं आले… मोबाईल बाजूला ठेवून.

आणि तिथून पुढे…

फक्त शब्द नव्हते—

ती एक पिढी दुसऱ्या पिढीशी बोलत होती.

 

मी त्यांना सांगितलं—

हो… आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये थोडे मागे आहोत.

पण लक्षात ठेवा—

आमच्या आयुष्यात साधा फोनही उशिरा आला.

तिथून इथपर्यंत आलोय… स्वतःच्या बळावर.

 

तुम्ही मोबाईलसोबत मोठे झालात…

म्हणून ते तुम्हाला जमतं.

पण त्यामुळे तुम्ही मोठे होत नाही…

कारण मोबाईल हुशारी नाही मोजत…

तो फक्त वापर मोजतो.

 

आई-बाबांनी गुगलशिवाय आयुष्य जगून दाखवलंय…

तुमच्यासाठी.

आणि तुम्ही… त्यांच्याच पैशाने घेतलेल्या मोबाईलवर

त्यांनाच शिकवता?

 

टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे…

पण ती सगळं नाही.

नातं दुखावलं, तर

कोणतीही ‘ऍप’ ते परत जोडू शकत नाही.

 

मोबाईल तुम्हाला जग दाखवतो…

पण घरातली माणसं विसरायला लावतो…

तर तो उपयोगाचा नाही.

 

आम्ही आजही मित्रांना घरी बोलावतो…

गप्पा मारतो…

त्या दोन तासात मोबाईल आठवत नाही.

आणि तुम्हाला…

टॉयलेटलाही मोबाईल लागतो…

मग खरा ‘ऍडिक्ट’ कोण? ”

 

घरात शांतता होती…

पण ती अस्वस्थ नव्हती—

ती विचारांची होती.

 

मी थांबलो.

 

दोन क्षण गेले…

आणि अचानक—

मुलगा उठला…

बाबांच्या जवळ गेला…

आणि हळूच म्हणाला—

सॉरी…

 

तो एक शब्द…

पण त्या घरातला सगळा आवाज बदलून गेला.

 

वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं…

मुलगी शांत झाली…

मित्र काही बोलला नाही…

पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान…

सगळं सांगून गेलं.

 

मी वातावरण हलकं केलं…

एक जोक सांगितला…

आणि आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो.

 

 

शेवटी त्यांना एकच सांगितलं होतं—

 

आभाळाला गवसणी घालायची असेल…

तर जमिनीला विसरू नका.

कारण ज्या मातीवर उभं राहून तुम्ही उंच जाता…

तीच माती कधीतरी आधार बनते.

 

आई-बाबा हे फक्त नातं नसतं…

ते तुमचं मूळ असतं.

आणि मूळ जपलं…

तरच झाड कायम हिरवं राहतं…

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

पिंकी इंग्लिश शाळेत जाते,

मी तिला फार भितो…

ती वॉटर ड्रिंक करते,

मी आपला पाणी पितो…

जाडे- जाडे इंग्लिश शब्द,

तिच्या तोंडात उठ- सूट,

माझ्या पायात साधी चप्पल,

तिच्या पायात छान बूट…

 *

ती म्हणाली, केक या शब्दाला,

मराठी शब्द कुठला..?

आता गप्प बसलास ना,

बघ तुला घाम फुटला…

 *

मराठीच्या प्रेमामुळे,

मला गप्प बसवे ना…

इंग्रजीची तिची ऐट,

मला मुळीच ऐकवेना…

 *

मी तिला ताडकन म्हणालो,

वरण- भात आणि पिठले,

यांना तुझ्या इंग्रजीत,

सांग बरं शब्द कुठले..?

 *

हे ऐकून, पिंकी गप्प,

तिला काही सुचेना…

इंग्रजीत पिठले खाईल,

असा शब्द मिळेना…

 *

आता पिंकी घरी गुपचूप,

मराठीत पिठले खाते…

आणि वरण- भातावर,

मराठीतच लिंबू पिळते..!

कवी : श्री मंगेश पाडगावकर

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares