एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते: “बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली? ”
मैत्रीण म्हणाली, “काहीच नाही! “
तेव्हा ती विचारते, “हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्या लेखी तुझी काही किंमतच नाही का? “
हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते.
संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की बायकोचा चेहरा उतरलेला आहे. मग दोघांमध्ये वाद होतो. एकमेकांना दोष दिले जातात.
शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो.
तुम्हाला माहितीये सगळ्याची सुरुवात कुठून झाली?
त्या एका निष्कारण प्रश्नातून, जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता.
—
रवि आपल्या जिवलग मित्र पवनला विचारतो: “कुठे काम करतोस? “
पवन – “अमुक एका दुकानात. “
रवि – “किती पगार मिळतो? “
पवन – “१८ हजार. “
रवि – “फक्त १८ हजार? इतक्यात कशी चालते तुमची रोजची जिंदगी? “
पवन – (खाली मान घालून) “काय सांगू रे… बस तसंच. “
या छोट्याशा संवादानंतर, पवनच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होतं.
त्याने पगारवाढीची मागणी केली, मालकाने नकार दिला. पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो.
पूर्वी त्याच्याकडे काम होतं… आता काहीच नाही!
—
एका गृहस्थाने एका वृद्ध पित्याला विचारलं, “तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का? म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटतं? ”
वडील म्हणाले, “तो खूप व्यस्त असतो. त्याला त्याची कामं, बायको, मुलं… वेळ मिळत नाही. “
ते गृहस्थ म्हणतात, “हे काय उत्तर झालं? तुम्ही त्याला वाढवलंत, सगळं दिलंत, आता तो म्हणतो त्याला वेळ नाही? “
त्या संभाषणानंतर, बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली.
जेव्हा मुलगा भेटायला यायचा, तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात असंच चालायचं.. “माझ्यासाठी वेळच नाही… “
—
एक गोष्ट लक्षात ठेवा:
आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोल परिणाम करू शकतात. कधी कधी आपले प्रश्न निष्कपट वाटतात, पण ते दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात. उदाहरणार्थ:
“तुम्ही हे का नाही घेतलंत? “
“तुमच्याकडे हे का नाही? “
“तुम्ही याच्यासोबत कसं राहू शकता? “
“तो तुमच्या योग्य आहे का? “
हे असले बिनधास्त प्रश्न, जे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नाही, पण हे विसरतो की, याचा परिणाम समोरच्याच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो. आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं, तर अनेकदा असं आढळतं की कोणाच्या तरी चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं आहे. जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात, आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. म्हणून एकच विनंती….
लोकांच्या घरात अंधासारखं शिरा आणि मुक्यासारखं बाहेर या!
आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट न पडो, हीच खऱ्या माणसाची ओळख आहे.
☆
लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वर्ग नावाच्या मैफलीतील कलावंत! – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆
शिक्षक म्हणजे बोलणारा कारकून नव्हे. तर तो एक कलावंत आहे. कलावंत ज्याप्रमाणे जन्मावा लागतो असे म्हणतात ;त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा जन्मावा लागतो असे मला वाटते. याचाच अर्थ कलावंताची प्रतिभा जशी उपजत असते, पुढे ती मार्गदर्शनाने फुलवता येते. विविध प्रकारच्या कार्यशाळांतून आकाराला येते. व्यासंगाने कलेची जडणघडण करता येते. परंतु मुळात त्या व्यक्तिमत्त्वात कला निर्मितीचे काही रसतंतू असावेच लागतातत्. केवळ कुणाला तरी वाटते आहे म्हणून, कवी नर्तक, चित्रकार गायक, निर्माण करता येत नाहीत. अध्यापन व्यवसायाचा मी जेव्हा अगदी मुळातून विचार करतो, तेव्हा मला असे वाटते, कलावंताप्रमाणे अध्यापक हा सुद्धा अभिजात असावा लागतो. नव्या पिढीला काहीतरी मनातलं सांगावे, केवळ इथून तिथून गोळा केलेले, आजच्या भाषेत कॉपी-पेस्ट केलेले अध्यापन असून चालत नाही. जमिनीतून तरारून बी उगवावे तसे अध्यापन असावे लागते. केवळ देखावा म्हणून प्लॅस्टिकचे झाड प्लास्टिकची फुले कितीही हुबेहूब केली, तरीही आलेल्या पाहुण्यांना चकवता येईल; परंतु फुलपाखरांना चकवता येत नाही. कारण फुलपाखरांना फुलांच्या आत्म्यातील सुगंध कळतो. त्याचप्रमाणे, नव्या पिढीलाही समोर उभा असलेला आपला शिक्षक हा अंतर्यामातून बोलतो आहे की नाही हे नक्कीच जाणवते. विद्यार्थी उघड व्यक्त करू शकणार नाही, परंतु त्याला अध्यापनातील सच्चेपणा नक्कीच प्रतीत होत असतो. मनापासून केलेल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांची हृदये स्पंदित होतात. खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय म्हणजे ” ये हृदयीचे ते हृदयी “रुजवण्याचा आगळावेगळा स्वधर्म आहे.
अध्यापनाची कलासुद्धा आपल्या पिंडात असावी लागते. अर्थात् प्रशिक्षणाने एक उत्तम अध्यापक घडवता येतो. पण मुळात अध्यापनाचे काही मूलद्रव्य त्याच्यात असावे लागते.
सुमारे पस्तीस वर्षाच्या अध्यापन काळात आणि अनेक विद्यालयांच्या मधून कार्यक्रम केल्यामुळे तेथीलही अनेक प्रकारचे अध्यापक निरीक्षणांतून अनुभवले.
काहीना केवळ प्राचार्यांच्या केबिनमध्ये खलबते करण्यातच रस असे. आपले नियोजित तास बुडतील कसे, याची काळजीपूर्वक काळजी घेताना काही शिक्षक असायचे. काही शिक्षकांना केवळ वेतनश्रेणी, भत्त्यांची वाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक कमाईच्या वाटा यातच रस असायचा. ही मंडळी कधी एखाद्या नव्या पुस्तकाबद्दल बोलली आहेत, किंवा वर्गातील एखादा नवा शैक्षणिक प्रयोग त्यांनी चर्चिला आहे, किंवा स्नेहसंमेलनात एखादा उपक्रम त्यांनी मुलांकडून बसवला आहे, हे मला जाणवलेच नाही. बरीच मंडळी ती अक्षरशः काठावर बसून गंमत पहात. लाटेवर येऊन त्यांना अध्यापनाच्या अथांग तलावात भिजता आलेच नाही. काही जणांना वेगवेगळ्या निमित्ताने चमचमीत खाण्याचे आकर्षण असे. एखादी खाद्य पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हातखंडा. अर्थातच स्टाफरूम मध्ये असे चेहरे लोकप्रिय असतातच तसेच ते होते. त्यातील काहींचे स्वभाव चांगले होते. परंतु प्रत्यक्ष अध्यापनात जितकी उडवा उडवी करता येईल तितकी ते करत असत. आपल्या संपन्न ग्रंथालयाचा लाभ त्यांनी मनापासून कधी घेतला आहे हे मी अनुभवलेच नाही फक्त पाठ्यपुस्तके तेवढे बदलत असतात आणि संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांची मार्गदर्शक आहे या व्यतिरिक्त अनेक प्राध्यापकांचा ग्रंथालयाशी संबंध नसायचा नवीन चरित्रे कुठली आली आहे कथा कादंबरी लेखन कुठले आले आहे याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले आहे हे कधी मला जाणवलेच नाही आणि गंमतही की आपण एखाद्याला सुचवू शकतो पण आपल्या व्यवसाय मित्रांना आपण आग्रह करू शकत नाही, कारण आपला अपमान करण्याचे धारदार शस्त्र त्यांच्याकडे असते. त्यांना आपले हेतू ध्यानात येत नाही, त्यांना फक्त वाटते “हा कोण टिकोजीराव! आम्हाला काहीतरी वेगळे शिकवतो आहे. स्वतःचे ज्ञान घरी ठेवा म्हणाव ” हा त्यांचा सूर लगेच आपल्याला लक्षात येतो आणि अर्थातच आपण त्यांना काही सांगण्याच्या फंदातच पडत नाही
परंतु सुदैवाने अशा प्रकारची मंडळी अगदी तुरळक असत, पण एखादा खडा सुद्धा आपले जेवण काहीसे नीरस करतोच ना! उत्साही शिक्षकांचा उत्साह काही उदास मंडळी मुळे मावळतो, अशावेळी ज्येष्ठ शिक्षक, प्राचार्य, यांनी जे चैतन्याने काम करत आहेत, जे प्रयोगाशील आहेत, आपले तन-मन धन खर्च करत आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. कारण त्यातच वर्गात आशेने वाट पाहणाऱ्या नव्या पिढीचे भवितव्य दडलेले आहे. कुठल्याही क्षेत्रात लोकप्रियता ही योगायोगाने आपोआप मिळत नाही तर ती प्रत्यक्ष काम करून सातत्य ठेवून मिळवावी लागते. मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भक्तीचा पिसारा त्यांना लाभतो. मी असे काळजाचे शिक्षक अनेक पाहिले आणि मुशाफिरीतही आजही मी असे कार्यशील उत्साही शिक्षक पाहतो आहे अनुभवतो आहे. अध्यापनाची मनापासून आवड असणारे अनेक शिक्षक मी असे पाहिले की त्यांना अधिक वेतनाच्या व्यावसायिक संधी त्यांच्या उमेदीच्या वयात मिळत असूनही अध्यापकच व्हायचे याच स्वप्नाने ते झपातून या क्षेत्रात आले होते. जेव्हा कोणत्याही शाळेत कार्यक्रमासाठी जातो तेव्हा डोळ्यात उत्सुकता असलेला, संवादात प्रसन्नता आणि वागण्यात अगत्य असणारा तरुण अध्यापक मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला त्याचा मी न पाहिलेला, अतिशय रंगलेला असा तास कल्पनेने अनुभवतो.
एखादी मैफल रंगवायला गायक रंगमंचावर जावा त्या उत्साहाने जे वर्गात जातात आणि तास संपवून पुन्हा एकदा स्टाफरूम मध्ये परतल्यावर तो उत्तम अध्यापनाचा आनंदरंग त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसत असेल, तर तो अध्यापक या क्षेत्राशी एकरूप झाला आहे असे समजावे.
आपण अध्यापक अखेर माणसेच आहोत. केव्हा तरी कंटाळा येणारच. केव्हातरी मन उदास असणार ; आपल्या घरातील किंवा आयुष्यातील सुखदुःख आपल्या चेहऱ्यावर ते उमटणारच. पण हे ‘केव्हातरी ‘ केव्हातरीच असावे, जर तोच आपला स्वभाव झाला, तर आपणही उदास आणि समोरची पिढी उदास!
शक्यतो एका दालनातून दुसऱ्या दालनात जावे, तसे मनाचा मूड बदलून स्वतःला अंतर्यामातून बदलता येणे ही सुद्धा अध्यापन व्यवसायातील एक कला आहे. एकदा हा व्यवसाय आपण स्वीकारल्यानंतर त्या व्यवसायाविषयी, आणि विशेषतः जिवंत मनांना, नवी पंखभरारी देण्याचा हा व्यवसाय निवडल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. अंतर्मुख होऊन अगदी प्रत्येकाने आपल्याला या व्यवसायात आनंद मिळतोय का? मिळत असेल तर तो अधिक कसा मिळेल आणि मिळत नसेल तर तो का मिळत नाही याचा शोध अंतर्मुख होऊन घ्यायला हवा असे मला वाटते. आपल्या व्यवसायातील व्यावसायिक अस्थिरता, काही वेळा होणारा स्थानिक पातळीवरचा अन्याय, अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी शासकीय कामे ही कारणे आहेतच. नक्कीच अशा तऱ्हेच्या कारणांचे कुणीच समर्थन करणार नाही.
पण मला नेहमी वाटते, या सगळ्या बाह्य गोष्टीची शिक्षा त्या अजाण विद्यार्थ्यांना का बरे द्यायची,? उभे आयुष्य त्यांना साद घालत असत भविष्य खुणावत असते. मोठ्या अपेक्षांनी ती समोरील अध्यापकाकडे पाहत असतात. अशावेळी आपला अनुभव, आपले ज्ञान, व्यवहारज्ञान त्यांना भरभरून दिले तर शिक्षक पदाचा विस्तारही होतो आणि ते पद सखोले होते सखोलही होते.
कलावंत ज्याप्रमाणे कलेतील नवनिर्मितीमुळे चिरतरुण राहतो. अक्षरशः अध्यापकाच्या व्यवसायातही तेच घडत असते. मला काही जण विचारत असत, ” एकच कविता अनेक वर्ष शिकवून तुम्हाला कंटाळा येत नाही का? “
मी त्यांना म्हणत असे, “कविता तीच असेल, पण मी नवा आहे. मी नित्य नवा झालो की आपोआपच कवितेतील नवीन रूपरंग आकळतात. शिवाय दरवर्षी वर्ग बदलतो, चेहरे नवीन असतात. त्यामुळे अर्थात ती कविता मला “तीचतीच “वाटत नाही माझे तर स्पष्ट मत आहे, आपल्या मानसिक वयाबरोबर साहित्यातील संवेदनशील पदर अधिक उलगडत जातात. उदाहरणार्थ ‘औदुंबर’ सारखी कविता एका सारखी शिकवू शकत नाही. सतत त्यात नवे नवे काहीतरी सापडत जाते. खरे म्हणजे नवे जे सापडते, ते केवळ कवितेतील असत नाही, तर ते आपल्यातले नवे सापडते ;आणि त्यामुळे भाषा असो की विज्ञान, गणित असो का इतिहास भूगोल, विषय कुठलाही असो ;सतत नव्या वर्षी नव्या वर्गात नव्या मुलांपुढे आपण नवतेचा शोध घेत असतो आणि त्यामुळेच नवनिर्मितीचा आणि कलावंताचा ज्याप्रमाणे संबंध आहे, त्याप्रमाणे अर्थातच अध्यापकाचा आणि नवनिर्मितीचा संबंध आहे. म्हणूनच मला हाडाचा शिक्षकही कलावंत वाटतो. आचार्य अत्रे यांनी आपल्या आत्मकथनात” मी शिक्षक कसर झालो? “या प्रकरणांमध्ये स्पष्ट म्हणून ठेवले आहे, “पुढे आयुष्यात माझ्याकडून जे लेखन झाले, अनेक नाटके लिहिली गेली, साहित्यात मी अनेक प्रयोग केले, त्या सर्वांची मुळे माझ्या अध्यापन व्यवसायात आहेत. अतिशय बोलके वाक्य आहे त्यांचे. लेखनातील प्रतिभा अध्यापनात येते आणि अध्यापनातील प्रतिभेने आपले लेखने वेगळे होते.
शिक्षकाकडे अक्षरशः संपूर्ण समाज अध्यापनाच्या निमित्ताने वर्गात येतो. आणि त्यामुळेच अनेक सुखदुःखे आपण जवळून पाहतो. केवळ आपण पुस्तके वाचत नाही, विद्यार्थ्यांचे चेहरे वाचतो. चेहरे वाचतावाचता, सामाजिक पुस्तक कळत जाते. समाजात नेमके कुठले बरे वाईट बदल होत आहेत, मानसिक प्रवाह येत आहेत, कुठल्या प्रकृती विकृती जन्माला येत आहेत, हे आपल्याला एक कलावंत म्हणून कळते. अध्यापकाला ती संधी असते. मात्र ती घेतली पाहिजे. अध्यापनाच्या व्यवसायाकडे केवळ एक अनुक्रमाणिका पूर्ण करण्याचा, आणि उत्तर पत्रिका तपासण्याचा व्यवसाय तेवढ्यापुरताच जर आपण पाहिले, तर अनुक्रमणिका पूर्ण होईल आपण मात्र अपूर्ण राहू आणि अर्थातच एक अपूर्ण शिक्षक स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही, आणि आपल्या व्यवसायाला हिला न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच मनाच्या पूर्ण जागेपणाने, उत्फुल्ल मनाने आपण वर्गात जावे लागते. कलावंत ज्याप्रमाणे एखादी मैफल रंगवतो,.
कधी वक्तृत्वाने कधी अभिनयाने, त्याप्रमाणे अध्यापकाला सुद्धा वर्ग नावाची मैफल रंगवण्याची संधी असते. मात्र ते जिंदादिल मन आपल्यामध्ये हवे, ते आपल्यामध्ये तो निश्चित आहे, म्हणूनच हे हितगुज.
एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.
शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.
शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…
करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…
हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…
तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…
हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…
जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…
बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…
तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला,
हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…
अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.
गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्चर्य वाटे.
शाळा अशा मजेत चालायच्या!
आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.
अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.
सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.
(वरील कविता गेल्या शतकात मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. ही कविता वाचून आजच्या भक्तांच्या विचारात काही फरक पडावा ही अपेक्षा..)
प्रस्तुती : जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझे whatsap ज्ञान!!” – लेखिका : सुश्री नीलिमा जपे कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
गेल्या काही वर्षांत मी अभ्यास करून एवढे ज्ञान मिळवले आहे, जे मी कुठल्याही विद्यापिठाच्या पदवी साठी अभ्यास करतांना मिळवले नसेल. यासाठी मला एखाद्या विद्यापिठाने एखादी डॉक्टरेट प्रदान करावी, अशी शिफारस मी करू इच्छिते, पण ती कोणत्या विषयात द्यावी हे अजून ठरत नसल्याने घोडे अडले आहे.
खरंच मी या काही वर्षांत जगातील सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला असावा असे मला वाटते आहे. मी विज्ञान, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, भाषा, गणित, धार्मिक शास्त्रे, या आणि इतर अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला आहे. जेंव्हा पासून माझ्या भ्रमणध्वनी वर whats ap हे अतिशय उपयुक्त अॅप घेतले, तेंव्हा पासून ज्ञानाची अनेक कवाडेच माझ्यासाठी जणू खुली झाली.
त्या दिवसाासून मला आलेले एकूण एक लेख मी वाचून काढले आहेत, काहींची तर पुन्हा पुन्हा पारायणे केली आहेत. काही लेख तर पिंजून काढले आहेत. आणि त्यावर होणाऱ्या चर्चांचा अभ्यास बघता विचारमंथनातून नवनीत निघावे असे एकाहून एक सरस ज्ञानकण मी वेचित असते.
मी या अॅपची शतश: ऋणी आहे, इतकी की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी याच गुरुला साक्षात दंडवत घातला.
यावरच मला बाल संगोपनाचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून धडे मिळाले, पूर्वीच्या शिक्षा कशा अगदी मानस शास्त्राला धरून होत्या हे मी जाणले. त्यापायी मला अनेकदा माझ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करावे लागले, पण त्यात पुढे जाऊन त्यांचेच भले आहे हे उमजून मी त्याबद्दल जराही खंत बाळगली नाही. त्यातच अनेक पौष्टिक व समतोल पाककृतींचाही अभ्यास करता आला. आता त्या प्रत्यक्ष करून बघण्या इतका अवधी मिळाला नाही तो भाग अलहिदा. बऱ्याचदा बाहेरच्या पदार्थांवरच भागवावे लागले, पण ते सर्व मिळालेल्या ज्ञानामृतापुढे क्षुल्लकच, नाही का!
यावरच मला आईवडील कसे श्रेष्ठ असतात हेही कळाले, हे सर्व शिकत असताना त्यांच्याकडे जायला, अथवा संपर्क साधायला जमले नाही तो भाग वेगळा, पण आईवडील तेवढे तरी समजून घेतीलच!
संवाद कसा साधावा याचे धडे इथेच मिळाले, त्यामुळे शेजारी बसलेला दुरावला एव्हढेच नुकसान झाले दुसरे काही नाही.
कित्येक अनाथ मुले, हरवलेली कागदपत्रे माझ्यामुळे योग्य व्यक्तीला मिळाली असतील याची गणनाच नाही. Whats app मुळे माझी समाजसेवाही सुरु झाली. अनेक गरजू लोकांसम्बंधीचे लेख कधीकधी तर न वाचता देखील केवळ पुढे पाठवून मी आतापर्यन्त भरपूर पुण्य गोळा केले आहे. त्या नादात आजूबाजूच्या गरजूंकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही इतकेच.
यामुळेच मी नतमस्तक झाले आहे, कारण सतत मी मान खाली घालून काहीतरी वाचतच असते. ‘केल्याने देशाटन मनुजा येत ऐसे पांडित्य फार’अशी जुनी म्हण बाद करून ‘केल्याने व्हाट्सपायन…. …….. ‘अशी नवीन म्हण आता वापरावी असे मला वाटते.
यावरच मला कळले की माझी मराठी ही वैज्ञानिक भाषा आहे (? ) भाषा वैज्ञानिक कशी काय असू शकते असा प्रश्न ही मला कधी पडला नाही, कारण माझा w. a. वरील गाढ ( अंध) विश्वास. आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वश्रेष्ठ ठरले हेही समजले, तेव्हाही मला प्रश्न पडला नाही की सर्वच देशाचे राष्ट्रगीत त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. पूर्वी असे मानायची पद्धत होती की जे पेपर मध्ये छापून आले ते सर्व खरे. आता मी मानते की w. a. वर येते तेच फक्त खरे.
या नादात एकच कविता वेग वेगळ्या कवींच्या नावे आली, तरी मी संशय घेतला नाही. कारण great men think alike ही उक्ती मला माहीत होती. आपल्या प्रथा परंपरा कशा विज्ञानाला धरून होत्या याचाही मी अभ्यास केला. आणि त्या सर्व परपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. अर्थात ज्ञान कण वेचण्यातून वेळ मिळाला तर!
याशिवाय आयुर्वेद, आहारशास्त्र, वजन कमी करण्यासाठी असंख्य उपाय, घरगुती औषधे इत्यादी अनेक शास्त्रे मी अभ्यासली आहेत. त्या सर्व गडबडीत माझे वजन थोडे वाढले आहे, पण कदाचित ते वाढलेल्या ज्ञानाने असू शकेल असे मी मनाचे समाधान करून घेतले आहे. व्यायामाचे फायदे वाचता वाचता व्यायाम करायला वेळच न मिळाल्याने माझे आरोग्य गमावले आहे.
हे सर्व ज्ञान मिळवून त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करायला वेळच न मिळाल्याने मी माझे उरले सुरले शहाणपण गमावून बसले आहे हाच एक लहानसा तोटा!! ज्ञान मिळवून त्यातील काय घ्यावे व काय त्यागावे ही नीर क्षीर वृत्तीच मी हरवली आहे. बाकी काही फार नुकसान नाही. काही मिळवायचे असेल तर काही तरी गमवावेच लागते ना! शहाणपण गेले पण ज्ञान तर हाती आले ना!!
लेखिका : सुश्री नीलिमा जपे- कुलकर्णी
नाशिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.
एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!
☆
लेखिका : सुश्री दुर्गा भागवत
प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सगळी गल्ली अजूनही गाढ झोपेत असायची. आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायची.
पेपरवालादेखील याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा आणि दरवेळी म्हणायचा,
“नमस्कार मॅडम! ”
हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही.
आता मी सकाळी सातला उठू लागले.
कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल.
एका रविवारी, तो सकाळी नऊ वाजता माझ्या घरी आला. चेहऱ्यावर काळजी होती, पण बोलण्यात आदर.
“मॅडम, ” त्याने हात जोडत सांगितले,
“एक गोष्ट सांगू का? “
मी हसून म्हटले,
“नक्की, बोला. “
तो म्हणाला,
“तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलंत? मी रोज गांधी मार्गावरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो आणि विचार करतो, ‘मॅडम वाट पाहत असतील’.
म्हणून सर्वात आधी तुमचंच घर गाठतो. “
मी थोडीशी आश्चर्यचकित झाले:
“तू एवढ्या लांबून येतोस? “
“हो मॅडम, तिथूनच वितरण सुरू होतं. “
“मग तू झोपेतून किती वाजता उठतोस? “
“अडीच वाजता. सव्वा तीनपर्यंत तिथे पोचतो. सातपर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि मग दहाला दुसऱ्या कामावर निघतो…
मॅडम! मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे… करावंच लागतं. “
त्याचं समर्पण ऐकून मी निःशब्द झाले.
फक्त एवढंच म्हणू शकले,
“ठीक आहे, मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन. “
काही वर्षे लोटली…
पंधरा वर्षांनंतर, तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला.
हातात एक सुंदर आमंत्रणपत्रिका होती.
“मॅडम! मुलीचं लग्न आहे… सगळ्यांसह जरूर या. “
मी कार्ड पाहिलं…
एक डॉक्टर मुलगी, एक डॉक्टर जावई.
आश्चर्याने विचारलं,
“तुझी मुलगी? “
तो हसला, आणि म्हणाला:
“काय बोलताय मॅडम! हो, माझीच मुलगी. तिने एमबीबीएस केलंय. आणि जावईही एमडी आहे. “
“आणि मुलगा? “
“तो इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे. “
त्याचा साधेपणा आणि यश बघून काही क्षण मी स्तब्ध झाले.
“आता निघतो, मॅडम … अजून खूप कार्डं वाटायची आहेत. “
तो गेला…
पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं होतं.
—
दोन वर्षांनंतर तो पुन्हा भेटला.
“मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय, ” असं अभिमानाने सांगितलं.
मी थोडं कुतूहलाने विचारलं,
“इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं? “
तो सौम्य हसला आणि म्हणाला:
“मॅडम! पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर. जे स्वस्त, जे हंगामातलं.. तेच खात होतो. कधी कधी फक्त दोडका, भोपळा, वांगी… “
थोडा थांबला, मग हळूच म्हणाला:
“एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला, ‘रोज हीच कोरडी भाजी! दुसऱ्यांच्या घरात काय काय बनतंय बघा. ’
मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं, ‘बाळा, आधी स्वतःचं ताट पाहा. दुसऱ्यांची ताटे पाहशील, तर स्वतःचंही हरवून बसशील. ही कोरडी भाजी नाहीये, या ताटात मी तुझं भविष्य वाढतोय…
त्याचा अपमान करू नकोस. ’
तो माझ्या डोळ्यांत पाहत राहिला, हसला… आणि चुपचाप सगळं खाल्लं. त्या दिवसानंतर त्याने कधीही तक्रार केली नाही. “
—
आज, ही आठवण शब्दांमध्ये उतरवत असताना,
माझं मन विचारात गुंतून जातं…
आजकालची मुलं. आपल्या पालकांची परिस्थिती न समजता, ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते. कोण त्यांना समजावेल, की कधी कधी कोरड्या ताटातही
पूर्ण भविष्य वाढलेलं असतं…
फक्त डोळ्यांत पाहण्याची दृष्टी लागते…!
लेखिका: अज्ञात
प्रस्तुती: सौ. मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संपत चाललेली निरागसता… – लेखक : श्री अनिश सहस्त्रबुद्धे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
संपत चाललेली निरागसता… आणि ती टिकावी म्हणून आमची चाललेली धडपड.
सध्या आपण बघितलं, तर लहान मुलं लहान असल्यासारखी वागतच नाहीत. त्यांचे कपडे मोठ्यांसारखे, त्यांची भाषा मोठ्यांसारखी, आणि हल्ली तर त्यांचा attitude पण मोठ्यांसारखाच!
त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या वागण्यातला सहजपणा, आणि एकंदर त्यांचं आयुष्य जगण्याकडचा दृष्टिकोन — हे सगळं प्रचंड बदलताना दिसतंय.
आणि या सगळ्या बदलांचं खापर नक्की कोणावर फोडायचं, हे ठरवणं खरंच अवघड आहे.
म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न — या गुंत्यातलं गोंधळ समजून घेण्याचा…
१. आजी आजोबांचा अभाव – नात्यांच्या मुळांपासून तुटलेली मुलं
कधीकाळी आजी आजोबांचं घर म्हणजे मुलांसाठी एक छोटंसं परीकथांचं विश्व असायचं —
पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या गोष्टी, शाळेतून येताना त्यांच्या कुशीत विसावलेलं मूल, आणि त्या नजरेतल्या प्रेमाचा थेट हृदयाशी लागणारा स्पर्श…
आज मात्र बऱ्याच मुलांना आजी आजोबांचं अस्तित्वच माहीत नाहीये.
कोणी दूर शहरात राहतात, कोणी वृद्धाश्रमात, तर कोणी आपल्या घरात असूनही irrelevant झालेत — फक्त या ‘generation gap’ मुळे.
आणि त्याचबरोबर हरवलीय ती मुलांमधली मुरलेली माया, शिस्त, आणि rooted भावना.
२. पालकांची सोशल रेस –परिपक्वतेच्या नादात हरवतंय बालपण
आजचा पालक फक्त आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी नव्हे, तर समाजात काय दिसेल यासाठीही झगडतोय.
पण या सगळ्या checklist पूर्ण करताना, मुलाच्या डोळ्यातली चमक, त्याच्या प्रश्नांमागचं कुतूहल, आणि त्याचं निखळ हसू कुठेतरी हरवतंय.
Quality time या संकल्पनेवरच ‘busy’ या शब्दाने कुर्हाड मारलीय. आणि त्यामुळे पालक असूनही आपण कधी कधी मुलांच्या आयुष्यात guest appearance होतो, हे कळतही नाही.
३. नको इतकं इंटरनेट – जोडणाऱ्यांनी दुरावलेली माणसं
तंत्रज्ञानानं माणसं जवळ आणायची होती, पण त्याच तंत्रज्ञानामुळे आज घरातली माणसं एकमेकांपासून दूर गेलेली दिसतात.
एकाच घरातली माणसं वेगवेगळ्या स्क्रीनकडे पाहत जेवतात, बोलत नाहीत, ऐकत नाहीत. आणि त्या वातावरणात वाढणारी ही पिढी — भावनांचं ’emoji version’ शिकते, पण माणसं समजून घेणं विसरते.
मुलांना संवादाची सवय कमी होतेय, सहवेदनांची जाणीव कमी होतेय…
जे लहानपणी मिळायला हवं तेच डिजिटल दुनियेत हरवलंय.
४. मुलांना दिल्या जाणाऱ्या गोष्टी – engagement की isolation?
मुलांना हातात स्क्रीन देऊन ‘बिझी’ ठेवणं म्हणजे त्यांना गुंतवणं नव्हे, त्यांना त्यांच्याच बालपणापासून दूर ठेवणं आहे.
मुलं गप्प बसावीत, त्रास द्यायला नकोत म्हणून त्यांच्याकडे दिलेली गॅजेट्स काही काळ कामाची वाटतात, पण हळूहळू ती मुलं गप्पगप्प, आतल्या आत बंद होत जातात.
एकटी बसलेली मुलं आता फक्त गेमच्या लेव्हल्समध्ये आनंद शोधतात, पण रिअल लाईफमध्ये हरवलेले वाटतात.
हे खरं ‘disconnect’ आहे — जिथे आपण त्यांचं अस्तित्व acknowledge करत असतो, पण त्यांचं actual presence विसरतो.
५. अति प्रोटेक्शन – ‘mature’ बनवताना मुलांना लहानपण विसरायला लावणं
मुलांना सुरक्षित ठेवणं, वाईटापासून वाचवणं ही जबाबदारी समजण्यासारखी आहे, पण अत्यंत प्रोटेक्शनमध्ये त्यांचं लहानपण गुदमरू लागलंय.
मुलांना त्यांची स्पेस नाही, चूक करायची मुभा नाही, वेडेपणा करायचं स्वातंत्र्य नाही.
‘शाळा बुडवणं म्हणजे बिघडणं’, ‘दंगा करणे म्हणजे बेशिस्त’ — असा perception तयार झालाय.
“माझं मूल खूप समजूतदार आहे, तो mature आहे” असं अभिमानाने सांगणारे पालक विसरतात की — मुलगा असो वा मुलगी, लहानपण हे जगण्यासाठीच असतं, दाखवण्यासाठी नाही.
आणि या सगळ्यात भरडले जातायत — आमच्यासारखे काही पालक
जे खरंच आपल्या मुलांना बालपण द्यायचं ठरवतात.
जे त्यांना दंगा करू देतात, जमिनीवर लोळू देतात, नाचू-उड्या मारू देतात…
पण याच गोष्टी केल्या की आम्हाला बेजबाबदार, निष्काळजी पालक ठरवलं जातं.
शिस्तीचे गोंडस मुखवटे घालून जगणाऱ्यांना अशा मोकळ्या बालपणाचं भय वाटतं, म्हणून त्यात दोष शोधले जातात.
मुलांनी इंग्लिश कविताच पाठ करावी – मग ते बुद्धिमान! पण रामरक्षा म्हंटली, की गावंढळ?
हे द्वंद्व अजूनही ठसठशीतपणे समाजात आहे, आणि त्याला आपण प्रश्न विचारायलाच विसरलो आहोत.
कदाचित ही धडपड फारशी कुणाच्या लक्षात येणार नाही,
कदाचित समाजाला त्यातली किंमतही कळणार नाही…
पण आमच्या मुलांचं हसरं, वेडसर, स्वच्छंदी बालपण हेच आमचं यश आहे.
एक दिवस हेच मूल मोठं होईल…
तेव्हा त्याच्या मनात आपण सोडून दिलेलं ते निरागस आठवणींचं बीज हळूहळू उगम पावेल…
तेव्हा कळेल – बालपण शिस्तीने नाही, प्रेमाने जपावं लागतं!