मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी एका शिक्षकाची…” कवी – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी एका शिक्षकाची…” कवी – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी। 

माझी कर्मभूमी हीच, माझी रोजची पंढरी ॥ 

*

माझा खडू-फळा माझे, टाळ, विणा नि मृदूंग। 

फुले ज्ञानाची घेवून, रोज रंगतो अभंग ॥ 

*

मन मोकळे कराया, जेव्हा येतात लेकरं । 

त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझं चंद्रभागा तीर ॥ 

*

त्यांचे दुःख निवारून, देतो दान आनंदाचे । 

काही वेगळे आहे का, पूण्य देव दर्शनाचे ॥ 

*

ज्ञानदानाचे हे व्रत, हीच माझी एकादशी। 

माझ्या लेकरांचे यश, माझे प्रयाग नि काशी ॥ 

*

जेव्हा येतात लेकरं सुख-दुःख वाटायला । 

त्यांच्या रूपाने विठ्ठल, रोज येतो भेटायला ॥

*

राम कृष्ण हरी!!!!!

कवी : अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?’ –  लेखक – कै. पु. ल. देशपांडे प्रस्तुती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?‘ –  लेखक – कै. पु. ल. देशपांडे प्रस्तुती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

…. ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?

ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?

गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रकलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.

इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला ! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्ल्स बरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.

संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळी अवेळी पेटी बडवणा-या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.

नाटकात पहिली भूमिका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात ! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.

-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे, ”

हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शण’केलेले स्मरते.

सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

असो; हे विषयांतर झाले.

विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही

 

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नुसता सल्ला नव्हे.. हे तर झणझणीत अंजन – लेखक – श्री नाना पाटेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ नुसता सल्ला नव्हे.. हे तर झणझणीत अंजन – लेखक – श्री नाना पाटेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत.. कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे… त्यानंतर Dance क्लास 

attend करायचा… भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ 

करायचेच… कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

— Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.

— एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.

— आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील.

आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की.. “what is square of 12?” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता- ” तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?”

तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात.

 — ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही.

School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.

वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर 

लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात

 शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे 

मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins, DHA, minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली.. आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp, face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही.

– दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.

ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते… कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट.. E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

– – अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.

– – guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.

– – लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. — – – 

– – कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद,

निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य.. ह्याला बाजारू 

किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.

– – काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय…. पण त्यात देशाचं नाही, तर भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल, पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील…

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?… असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात… “निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.

जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल, ह्याची सतत तपासणी होते.

 दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत.

अनावश्यक विषय शिकवत नाहीत.

चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषयआणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

‘ शिक्षण काय असतं?’ –

रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.

— एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्यासमोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती.

आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत

फिरत होता… तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.

— सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?” 

टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं.

पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “

— टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात… आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि – –

…… आणि जगायचं राहून जातं !!

लेखक — नाना पाटेकर 

संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Mandatory overs!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “Mandatory overs!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

एका पाठोपाठ एक wickets पडाव्यात तसा एक एक दात crease सोडून चाललाय! तरीही काही खायला जावं तर घरातल्या घरात running between the wicket चालू होतं.

डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

डोळ्यात मोतीबिंदू झाला की काय? सारखं bad light चं appeal करतायंत! तरीही डोळे फाडून फाडून मोबाईल मधे cheer girls पाहायला जावं तर बायको पाठीमागे caught behind साठी तत्पर! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, बरोबरच आहे! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

आजकाल पाय वळतात म्हणून जरा बाहेर मित्र मैत्रिणीकडे जायला पाय वळवले तर ते नेमके ते wide ball पडल्या सारखे उजवी डावी कडे पडतात. रस्ता अडवून बायको दारात उभी आणि मुलगा सून, नातू सारे एक सुरात leg before wicket out म्हणतात. खरं म्हणजे इन म्हणतात. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

काठी ठेवत चला bat सारखी!

आजकाल कान सुद्धा माझं ऐकत नाहीत. त्या मुळे बरेच शब्द, काही वेळा अख्खं वाक्य mis-field होतं आणि विषय पार boundary line च्या बाहेर! है ना चौका देनेवाली बात! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

डोक्याच्या pitch वर जरा कुठे गवत राहीलं असेल तर शप्पथ! पार पाटा wicket. पोटाचा आकार Shape बदललेल्या चेंडू सारखा होत चाललाय. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय चालायचंच. आता mandatory overs! विसरलात वाटतं.

गुळगुळीत दाढी करून पँट वर ball घास घास घासून तकाकी लकाकी कायम ठेवावी तसं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर क्रीम चोळून चोळून चेहेऱ्यावरची तकाकी कायम ठेवायचा निष्फळ प्रयत्न करतोय. पण व्यर्थ! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच,

 mandatory overs. विसरालात वाटतं!

मनगटं तर अशी दुबळी झाली आहेत की हातातली कपबशी कधी spin होउन कपाचा कान bells उडाव्या तसा उडतो ते माझं मलाच समजत नाही. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

काहीही लक्षणं नसताना सर्दी होते. रुमालाची covers on होतात आणि खेळ थांबतो नाक आणि घशाचं field inspection होई पर्यंत! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

कॉन्फिडन्स तर एवढा शेकी झालाय की बारीक सारीक सरळ पडणारा ball सुद्धा bouncer वाटतो आणि विनाकारण beat होतो. hook करायला जावं तर हुकतो! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

Umpire ने केव्हाच इशारा केलाय तुमच्या Power play च्या overs केव्हाच संपल्यात. तेव्हा उगाच मोठे strokes न मारता जमतील तेवढ्या chikki runs काढून score board हलता ठेवावा हे मलाही उमगलंय. पण यमराज टीम चा Power play मात्र सुरू झालाय. मोठी attacking field लावलीय. डायबेटिस, बीपी,

सांधेदुखी, कंपवात, विस्मरण हे fielders, slip, gully, covers, point ला catch घ्यायला टपून बसलेत. यमदूत नेटाने inswing, outswing ची भेदक balling करतायंत. *umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandetory overs! विसरलात वाटतं!

त्या सगळ्यांना चकमा देत गोळ्या इंजेक्शन्स् चे pad बांधून इन्सुलिन चे helmet घालून gap काढत आपली मात्र batting चालू आहे. तरी एकदा attacking stroke ने दगा दिलाच. mid on ला चक्क catch out. तरीही umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

आम्ही जवळ जवळ crease सोडून निघालोच होतो!

पण तो वरती बसलाय ना third umpire! त्याने चित्रगुप्ताला action replay दाखवायला सांगितला परत परत! आणि फायनली तो no ball ठरून आम्ही crease वर परत दाखल! आता मात्र century मारायचीच! मगच pavilion ची वाट धरायची. मग भले त्या डॉक्टर नांवाच्या umpire ला म्हणू दे ना…

mandatory overs! विसरलात वाटतं!

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आली ज्येष्ठ कृष्ण नवमी 

गेला विठू आनंदूनी ।

माझा ज्ञाना निघे आज

आता अलंकापुरीतून ।।१।।

*

निवृत्ती सोपान आणि

मुक्ता चित्कलिका ।

संगे येतील घेऊन 

नामा जना आणि एका ।।२।।

*
विसो गोरा बंका 

संत गजानन चोखा ।

भक्त येतील घेऊन 

साऱ्या संतांच्या पालख्या ।।३।।

*
संत मांदियाळी 

आता येईल पंढरी ।

भक्त नाचतील 

हरिनामाच्या गजरी ।।४।।

येता एकादशी । 

आता दक्षिण ती काशी ।

जाई फुलुनी भक्तांनी । 

देव बोले रखुमाईसी ।।५।।

*
राही माझी बाळे

आता येतील माहेरी ।

दुमदुमेल माझ्या 

आता नावाने पंढरी ।।६।।

*
भक्त येतात चालत । 

मनीं दर्शनाचा हेत ।

संतांच्या पालख्या 

खांद्यावरुनी वहात ।।७।।

*
नाही पावसाची पर्वा

नाही उन्हाची गणती ।

भूक तीही विसरून 

भक्त मार्ग तो चालती ।।८।।

*
देई वस्त्रे नवी

आणि शेला तो पैठणी ।

कोणते दागिने 

घालू राही अंगावरी ।।।९।।

*
नाथ सोन्याच्या ह्या माळा 

आणि कंठा मोतियांचा ।

मुकुट मस्तकी 

ठेवा कौस्तुभ रत्नांचा ।।१०।।

*
कंठामधे घाला

हिऱ्यामाणकांचे हार।

आणि कानामधे घाला 

स्वामी कुंडले मकर ।।११।।

*
मग तुमचे रुपडे । 

अति दिसेल सुंदर ।

आल्या भक्तावरी घाला 

तुम्ही शेल्याने पाखर ।।१२।।

*
प्रसाद वाटण्या 

रांधू सांगा काय देवा ।

खीर, घावन घाटलं

की मिठाई नि मेवा ।।१३।।

*
उडे लगबग मग

राही आणि विठ्ठलाची ।

करिती तयारी दोघे 

भक्त स्वागताची ।।१४।।

*
येता एकादशी 

ठेवी हात निढळावर ।

जणु भक्ताचे दर्शन 

घेण्या विठूची अधीर ।।१५।।

*
येता एकादशी 

भक्त पोचती पंढरी ।

नाचती आनंदे 

विठुनामाच्या गजरी ।।१६।।

*
झाली दर्शनाची बारी ।

भेटे भक्ता उरोउरी ।

भक्तही सुखावे 

रूप पाहुनी अंतरी ।।१७।।

*
भक्ताच्या पायासी

लावी राही तेल प्रेमे ।

हळूवारपणे 

हात विठूचा तो फिरे ।।१८।।

*

श्रम भक्तांचे ते मग

होऊनिया लुप्त ।

सांगता सोहळा होई 

विठूच्या घरात ।।१९।।

*
आला दिवस काल्याचा । 

बसे भक्तांची पंगत ।

राही करीतसे नाना- । 

विध पक्वान्नांचा बेत ।।२०।।

*
लाडू जिलबी घीवर

आणि पुरणाच्या पोळ्या ।

शेवटी तो मिळे 

दहीपोह्याचाही काला ।।२१।।

*
पार पडता सोहळा 

आला वियोगाचा दिन ।

दुःख भक्तांचे अंतरी । 

मुख विठूचेही म्लान ।।२२।।

*
निरोप देण्यासी । 

देव येई वेशीप्रत ।

भक्त जाता दूरी 

मुख लपवी शेल्यात ।।२३।।

*

भक्त जाईल रमून । 

राही फिरूनी संसारी ।

वाट पाहणे नशिबी । 

मम पुन्हा वर्षभरी ।।२४।।

*

एक दिसाचा आनंद । 

मज येत असे बळ ।

मग राही विटेवरी 

सर्व सोसूनिया कळ ।।२५।।

कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ही कशी कासाविशी…” – कवयित्री : सुश्री श्रेयसी वझे मंत्रवादी  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “ही कशी कासाविशी…” – कवयित्री : सुश्री श्रेयसी वझे मंत्रवादी  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

 

ढग दाटून येताच, सावळ्याची लगबग

भेटीचीही तगमग, वाढतसे ।।

*

कटेवरूनी निघाले, हात मांगल्य भारले

समचरण हालले, नकळत ।।

*

व्हावी तयारी वेळेत, नको खोळंबा भक्तांचा

माझ्या प्रिय लेकरांचा, भेटीलागी ।।

*

असे पंचामृती स्नान, नवे पितांबर साजे

मुकुटाचा मणी तेजे, झळाळतो ।।

*

भाळी अष्टगंध टिळा, तुळशीचा नवा हार

रूप बघे वारंवार, दर्पणात ।।

*

माझे रूप कसे दिसे, विठू विचारे रखुला

निववेल ना भक्ताला? दर्शनाने ।।

*

रखुमाईला आणली, नवी साडी चोळी खास

आता हीच साडी नेस, सांगे विठू ।।

*

रखुमाई गोड हासे, म्हणे दूर मी थांबते

अशी दुरून पाहते, उत्सवाला ।।

*

मला हेवा वाटे भारी, तुमचा या खास दिनी

उगा माझी दृष्ट झणी, लागो नये ।।

*

मीही राखते अंतर, घेते विश्रामही थोडा

प्रिय पत्नीला हो सोडा, काही वेळ ।।

*

विठू विटेवरी चढे, हात ठेवी कटेवरी

सोनियाच्या या प्रहरी, भक्तांसाठी ।।

*

कानी दुरूनच येई, नाद विठ्ठल रखमाई

मान उंचावून पाही, सावळा हा ।।

*

येई विठुच्या मनात, आपणच तिथे जावे

गोल रिंगणी नाचावे, भक्तांसवे ।।

*

ही कशी कासाविशी, विठू हासतो स्वतःशी

प्रेमाविना मी उपाशी, भक्तांचिया ।।

*

हा साजिरा सोहळा, दर आषाढी रंगतो

मग सारे वाट पाहतो, कार्तिकीची ।।

*

येता कार्तिकीची वारी, पुन्हा तेच समाधान

प्रेम आदान-प्रदान, मनोमनी ।।

कवयित्री : श्रेयसी वझे मंत्रवादी.

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पंढरीचा चोर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पंढरीचा चोर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्रधर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे “विठ्ठल”.

ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले.

ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे:

 घटाघटांचे रूप आगळे

 प्रत्येकाचे दैव वेगळे

 तुझ्याविना ते कोणा नकळे

 मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!

 विठ्ठला, तू वेडा कुंभार!”

प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो.

विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार यांचा” असही झालं. कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचा अंतपार लागत नाही. तो अनादी, अनंत आहे.

एकूणच विठ्ठल अनेक युगे पुतळा चैतन्याचा बनून उभा ठाकला आहे. ज्याने अनेकांना विविधरंगी, विविध अंगी दर्शन दिलं आहे.

संत एकनाथ महाराज लिहितात..

 “काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल”

या ओळीचा खूप मोठा अर्थ आहे. पंढरी म्हणजे नुसतीच जमलेली गर्दी. अगदी शरीराच्या अवयवांसारखी. नुसता कलकलाट, नुसता गोंगाट.

एक एक अवयव, हळूहळू निघून गेला की गर्दी संपते. शेवटी काहीच उरत नाही.

मग विठ्ठल कुठे आहे?

एकनाथ उत्तर देतात…. “आत्मा हा विठ्ठल !”

शेवटी जो उरतो तो आत्मा, विठ्ठल !! शरीर नष्ट होईल पण आत्मा अटळ विठ्ठल अमर आहे असा धीरही एकनाथ महाराज देतात.

तसा विठ्ठल सावळा आहे; पण त्यातही अनेक रंग आहेत, त्याची रूपेही खूप आहेत. त्याचं सावता माळी ह्यांना वेगळंच रूप दिसलं.

सावता माळी आपल्या मळ्यात दिवसरात्र राबत असत. त्यांच्या मळ्याजवळून अनेक लोक पंढरपूरला जात असत. एकदा एक जण सावता माळींना म्हणाला- आम्ही नेहमी उपास-तापास करून पंढरपूरला अनवाणी जातो, तू कधीच का येत नाहीस.

सावता माळींनी उत्तर दिलं-

 कांदा-मुळा-भाजी।

 अवघीं विठाबाई माझी॥

*

लसुण-मिरची-कोथिंबिरी।

 अवघा झाला माझा हरीं॥

सावता माळी बी पेरत असत. उन्हातान्हात उभे राहून त्याला पाणी घालत असत आणि मग ते बी तरारून बाहेर येई. लसूण, मिरची, कोथिंबिरी हेच हरीसारखे प्रसन्न होत असत.

साक्षात विठ्ठल सावता माळींसमोर उभा राही!!

सावता माळींनी मनगट वापरलं, ते कर्म करत राहिले, मग विठ्ठलाने त्यांना दर्शन देण्याचं स्वतःच कर्म – स्वतःच कर्तव्य पार पाडलं.

इथे पुन्हा शब्दप्रभू ग. दि. मा. आठवतात. त्यांनी लिहिलं आहे :

 जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम

 तिथे अन्न होऊनि ठाकेल श्याम

 दिसे सांवळे रूप त्याचे शिवारी!

 नसे राउळी वा नसे मंदिरी

 जिथे राबती हात तेथे हरी!

जे सावता माळींनी सांगितलं तेच माडगूळकर वेगळ्या शब्दात सांगतात.

भूमिपुत्राने घाम गाळला तर स्वतः श्याम म्हणजे देव येऊन उभा राहील. जिथे हात राबतील, तिथे हरी येईल.

विठ्ठल अनेकांना अनेक रूपात दिसला आणि महाराष्ट्रात फार मोठी संतपरंपरा उभी राहिली.

संत कान्होपात्रा, सेना महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई, निवृत्तीनाथ आणि अनेक ज्ञात -अज्ञातांनी विठ्ठलाला पाहिले.

नरहरी सोनारांनी देवाचे वर्णन करताना म्हटले,

 “देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार”

इथे नरहरी आणि कबीर ह्यांच्यातील साम्य दिसते. कबीर म्हणत असे की मी वस्त्र विणतो तेव्हा राम म्हणतो. नरहरीही आपली प्रत्येक कृती देवासाठी करत राहिले. तोच धागा पकडून पी. सावळाराम ह्यांनी गीत रचले,

 “धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया”

संत जनाबाईंनी म्हटले,

 हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला

 गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर

कृष्ण लोणी चोरून मित्रांना वाटत असे. विठ्ठलाचंही वर्णन करताना जनाबाईंनी “चोर” म्हटले आणि मराठी भाषेची प्रतिभा पहा, हा चोर लोकांना आवडला.

आपली संत परंपरा विवेक जागृत करायला शिकविते, अंतरीचा दिवा उजाळायला शिकविते. संत सोहिरोबाई ह्यांनी लिहिले:

 सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।

 तेथ कैचि दिवस-राती।

 तयावीण नेत्रपाती हलवू नको रे।

 हरिभजनाविण काळ घालवू नको रे।

ज्ञानजोतीविना नेत्रपातीही हलवू नको रे, दिवस-रात्र या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत आराम करू नको रे. हरिभजनाशिवाय वेळ वाया घालवू नको रे.

आणि बहिणाबाईंनी देवावर भाष्य केलं नसतं तरच नवल. अंधश्रद्धेतून देव संकल्पनेला मुक्ती देताना त्या म्हणतात:

बापा नको मारू थापा

असो खऱ्या, असो खोट्या

नहि नशिब नशिब

तया हाताच्या रेघोट्या

*

नको नको रे जोतिष्या

नको हात माझा पाहू

माझं दैव मला कये

माझ्या दारी नको येऊ

अनेकांनी देव ही संकल्पना कर्मवादाशी जोडली. महाराष्ट्रात देवाला दगडातून बाहेर काढणारी परंपरा उभी राहिली.

कवी बोबडे यांनी स्वतःमधला देव दाखवण्यासाठी लिहिले:

*

 सागर पोहत बाहू बळाने।।

 नाव तयास… मिळो न मिळो रे ॥१॥

 *

स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥

 तदगृही दीप… जळो न जळो रे ।।२॥

*

जो करी कर्म अहेतू निरंतर ॥

 वेद तयास… कळो न कळो रे ॥३॥

 *

ओळख पटली ज्यास स्वतःची ॥

 देव तयास… मिळो न मिळो रे ॥४॥

बघा या कवितेतून किती सुंदर अर्थ त्यांनी सांगितला आहे. “जो स्वतःच्या हाताने पोहत जाईल, त्याला नाव मिळाली नाही तरी चालेल. जो स्वतःच्या ज्ञानाने प्रकाशित आहे, त्याच्या घरात दीप नसला तरी चालेल. जो निरंतर कर्म करतो, त्याला वेद कळले नाही तरी चालेल आणि ज्याला स्वतःची ओळख पटली आहे, त्याला देव मिळाला नाही तरी चालेल. “

काही कारणास्तव, काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, जवळच्या विठ्ठल मंदिरातही जाता येणार नाही. तरीही हरकत नाही. विठ्ठल तर आपल्या आत आहे. त्याला चोरून देवालयात बंद करण्याइतका पुण्यवान कोण आहे?

ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहे..

*

 देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

 देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई

*

 देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे

 देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

 देव शोधूनिया पाही, देव सर्वभूता ठायी

*

 देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे

 देव आपणात आहे, शिर झुकवुनिया पाहे

 तुझ्या-माझ्या जड देही, देव भरुनिया राही

*

देव इतका सोपा आहे, सुलभ आहे. बस स्वतःमध्ये पाहिला की सापडतो.

।। राम कृष्ण हरी ।। 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Non – Confirmist – देशपांडे ऑन देशपांडे” – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “Non – Confirmist – देशपांडे ऑन देशपांडे” – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्यही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले – 

“अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजाहीर असे दण-दण दण-दण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील! ” 

वसंताच्या स्वभावातच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा ‘मिजाज’ आहे.

निखारे असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! म्हणूनच की काय कोण जाने ‘शतजन्म शोधितांना’, ‘असे जीत पहा’ यासारख्या किंवा ‘रवी मी भाळी चंद्र असे धारिया’ ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रीक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे.

पण कलावंताला म्युनिसिपालिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!

वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारातली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे!

पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हणासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही.

नागर आणि ग्रामीण हिंदीचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतरावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट!

कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला, अध्यात्म, अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती- त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही.

आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्या तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे ‘कारकुनी’ ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा.

पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही.

मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिले आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी!

पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमाला पाठ असाव्यात त्याला! ‘जिनमध्ये लाइम कॉर्डियलचे प्रमाण काय’, इथपासून ते ‘अवकहडा चक्र’ म्हणजे काय इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य!

वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चंपूताईचा घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे.

कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदार मामला आहे.

भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी. पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी.

परवाचीची गोष्ट… ‘कट्यार’ मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे. भीमसेनने मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. “वश्याबुवा, हा तुझा तबलजी! ” 

जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणून रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो! ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात.

एवढ्याने काय झाले आहे… हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन “ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या – हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोंबला. ” अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना.

तीन वर्षापूर्वी प्रथम ऐकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या ‘सुलतान षरके यार’ या गाण्यापासून अगदी परवा ऐकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे.

आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे “माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला. ” त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या स्नेहाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी घातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे.

वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऐकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते.

वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपंणाने मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातुन बेफाम दौडत जाणार्‍या जवान घोडेस्वारासरखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.

वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. सूरांचा हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्‍यांना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्‍या बर्‍या!

वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सुखाची सवय…’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सुखाची सवय…’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

गावाच्या कडेला एक लहानसं घर होतं. मातीच्या भिंती, लाल कौलारू छप्पर, अंगणात फुललेली जास्वंदी आणि कुंपणावर चढलेली पांढऱ्या मोगऱ्याची वेल. त्या घरात राहत होता सखा — एक शेतकरी. अंगावर झब्बा, डोक्यावर पांढरी पटकी आणि चेहऱ्यावर नेहमीच एक प्रसन्न शांत स्मित.

तो एकटा राहत असे, आई-बाबा गेले होते काही वर्षांपूर्वी. लग्न झालं नव्हतं. काही जण म्हणायचे, “बिचारा एकटाच राहतो. ” पण जेव्हा कोणी त्याच्या अंगणात चहा प्यायला बसायचं, तेव्हा त्यांच्या मनात ‘बिचारा’ ऐवजी ‘तो सुखी आहे’ हेच शब्द येत असत.

सखाचं आयुष्य अगदी ठरावीक — पहाटे चारला उठणं, गायींसाठी चारा आणणं, शेतात फावडं घेऊन माती फोडणं, आणि दुपारी झाडाखाली भाकरी-लोणचं खाणं.

संध्याकाळी तो ओढ्याजवळ जाई, पाण्यात आपले पाय भिजवून बसत असे. आकाशाचा रंग केशरी होत जाई, पक्ष्यांचे थवे घरी परतत. सखा त्या क्षणांना कवेत घेत बसायचा — एकदम शांत, स्थिर, पूर्ण.

एके दिवशी गावात एक शहरी माणूस आला — लेखक होता. सुखाविषयी पुस्तक लिहीत होता. गावकऱ्यांनी त्याला सांगितलं, “सखाला भेटा. तो खरा सुखी माणूस आहे. ”

लेखक आलाच. अंगणातल्या झाडाखाली सखा बसला होता — गवतावर, एक चहा समोर, आणि डोळ्यांत खोल आकाश. लेखक थोडासा विस्मयाने म्हणाला:

> “तुझं जीवन इतकं साधं आहे. ना पैसा, ना सोयीसुविधा, ना साथी. तरी तू एवढा शांत आणि समाधानात कसा? तु खरंच सुखी आहेस?”

 सखा हसला. हातातला चहा पुढे करत म्हणाला,

> “हा घ्या. आधी चहा घ्या. मग उत्तर देतो. ”

 लेखकाने चहा घेतला. त्या मातीच्या कपात एक वेगळीच ऊब होती. गरम वाफ डोळ्यांत पाणी आणणारी, आणि कपातून येणारा गवतीचहाचा सुगंध… काहीतरी खोलवर हलवून गेला.

 सखा शांतपणे बोलायला लागला…

> “माझ्या शेतात कधी पीक चांगलं येतं, कधी येत नाही. गायी कधी आजारी पडतात. अंगात कधी ताप, कधी थकवा. पण रोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा मी स्वतःला सांगतो – आजचा दिवस ‘माझा’ आहे. मी जिवंत आहे. श्वास घेतोय. आणि तेच मला सुख वाटतं.

सुख ही सवय आहे, साहेब. माणसाने स्वतःला रोज शिकवायचं असतं — ‘माझ्याकडे जे आहे, त्यात मी समाधानी आहे. ‘ मग तो एक कप चहा, एक झाडाची सावली, किंवा मातीचा सुगंध… हे सगळं सोन्यासारखं वाटायला लागतं.

माझ्याकडे कमी आहे, हे पाहत राहिलात, तर आयुष्य एक रडकं नाटक होईल. पण मी रोज पाहतो — माझ्या गायी डोकं घासतात, आकाशात ढग नाचतात, आणि झाडाच्या फांदीवर साळुंखी गात असते… त्या सगळ्यांत सुख आहे. फक्त पाहायची सवय लागली पाहिजे.”

लेखक स्तब्ध झाला.

 त्याला एका क्षणी जाणवलं — शहरात हजार गोष्टी असूनसुद्धा, तो एक दिवससुद्धा पूर्णपणे समाधानात जगला नव्हता. पण या शेतकऱ्याच्या दोन भाकऱ्या, एक कप चहा आणि ढगांच्या सावलीत एक पूर्ण जग सामावलेलं होतं.

त्या रात्री लेखकाने आपल्या वहीत लिहिलं…

“सुख हे समृद्धीमध्ये नसतं, ते सजगतेत असतं.  आणि सजगतेची सवय ज्याला लागते, तोच खरा श्रीमंत असतो.”

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ राग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ राग…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

परवा एका मर्डर केसमधील आरोपीला जमानतकामी भेटण्याकरता आणि वकीलपत्रावर सही घेण्याकरता येरवडा येथील जिल्हा कारागृह येथे गेलो होतो. परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकीलपत्रावर सही आणि भेटण्या करता 3. 30 वाजेपर्यंत थांबावे लागणार होते.

त्यामुळे थोडी विचारपूस करण्याकरता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना, मला एक कैद्याचे कपडे घालून असलेला एक माणूस दिसला. तो कारागृहासमोरील मैदानाची साफ सफाई करीत होता. मी त्याच्याकडून कारागृह प्रशासनाविषयी आणि इतर माहिती घेतली. तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्तीसारखा भासत होता. मी त्याचा स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले. त्यावर त्यानी रमेश (बदललेले नाव) आणि गाव पुणे. (बदललेले ठिकाण)सांगितले. त्यानंतर संभाषण वाढविण्यासाठी मी त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का? हे विचारले.

त्यावर तो म्हणाला की, “मी 302(खून) च्या केसमध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. परंतु मी व माझ्या घरातील लोकांनी सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले. “

मी त्याला सहजपणे विचारले, ” तू तर एकदम शांत आणि संयमी दिसतोस आणि बोलण्यावरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोस. तू मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. ” त्यावर रमेश म्हणाला की, “हो साहेब. मी सुशिक्षित आणि चांगल्या घरातील आहे. वडील नोकरी करीत होते आणि मी मेडिकल (बी ए एम एस) करीत होतो, परंतु खून मीच केलेला आहे. ” त्यावर अवाक होऊन मी त्याला विचारले, ” एवढे असताना खून का केला? ” तर तो म्हणाला, “तो खून मी नाही केला तर माझ्या ‘रागाने’ केला. “

त्याने माझ्या समोर बसून सांगायला सुरुवात केली, “मी 18-19 वर्षाचा असताना खूप जास्त रागीट होतो आणि चीड चीड करीत होतो. एक दिवस त्याच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते. समोरचा व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने बाजूला पडलेला टिकाव (जमीन खोदण्याचे हत्यार) उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला आणि त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जागेवरच मेला. त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेलमध्ये आहे. त्या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका हुशार आणि सुशिक्षित मुलगा जेलमध्ये माझ्यामुळेच गेला, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे त्यांची नोकरी गेली आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करायला लागले आणि आता इकडे तिकडे फिरत असतात. खूप साऱ्या वकिलांनी माझ्या आईला तुमच्या मुलाला जामीन मिळवून देतो, त्याला निर्दोष सोडवतो, असे सांगून माझ्या आईकडून बरेच पैसे घेतले आणि इकडे मला शिक्षा झाली. मला एक भाऊ व एक बहीण आहे, केसकरता पैसे लागले आणि बाबांची नोकरी गेल्यामुळे घरची परिस्थितीसुद्धा खूप खराब झाली. मी खून करून जेलमध्ये आल्यानंतर कोणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या दारुड्या मुलाशीच करुन दिले आणि माझा भाऊ फार्मसी करत होता, परंतु वडिलांची मानसिक स्थिती बिघडलेली असल्यामुळे आणि केससाठी पैसे लागत असल्यामुळे त्याने त्याचेसुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेरचे काम करून आई वडिलांना पोसत आहे. “

त्यावर मी रमेशला विचारले, ” तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का? ” त्यावर तो म्हणाला, ” मी ज्याला मारले तो तर काही वेळातच मेला. पण त्याला मारल्यानंतर मी रोजच मरत असतो. मी रोज मरणयातना भोगत असतो. आणि साहेब, त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला, तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला. ” असे म्हणून रडतच निघून गेला आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले.

वरची घटना किती मोठी शिकवण देणारी आहे! छोट्याश्या रागाने एक सुशिक्षित आणि सुसंकृत कुटुंब मातीला मिळवले. एक नोकरीवाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतो. एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेलमध्ये आहे. एक औषधशास्त्राचा विद्यार्थी शेतात काम करतो. एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे. एका आईला एका मुलाशिवाय आणि पतीशिवाय जगावे लागत आहे.

त्यामुळे सर्वांनी रागावर नियंत्रण ठेवा. संयम आणि प्रेमाने विचार करुनच सर्व करा. वाचा आणि दोन मिनिटाचा राग किती मोठे पारिवारिक नुकसान करते. याचा विचार करा…

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares