☆ ‘‘काय मिळालं असतं?’ – हिन्दी कवी : डॉ. मधू चतुर्वेदी – मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆
मूळ हिंदी कविता : ‘क्या क्या मिलता? ‘
मराठी भावानुवाद : “काय मिळाले असते? “
कवयित्री : डॉ. मधु चतुर्वेदी
मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर
प्रस्तुती: शामला पालेकर
स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर…
अपमानाच्या असंख्य घटनांचा धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती,
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती अनेक रात्र जागलेल्या आसवांनी बेफाण पुरात वाहताना, कंठात रुतलेले उत्तर दिसले असते,
सकारण हरलेले वादविवाद, दयनीय अवस्थेत मिळाले असते,
उपेक्षेच्या डंखाचे निशाण त्या मशीनला ऐकू आले असते,
कोंडलेल्या हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश, अगतिक रात्रीच्या बदललेल्या असंख्य कुशी धोक्याच्या निशाणीच्या वर पोहचलेल्या, प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ, सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका मिळाला असता,
अनव्रत टिकेचे खोल व्रण दिसले असते,
भावना शोधणारी मशीन असती तर सुहास्य मुद्रेमागील वेदनेचे सत्य समोर आले असते.
मुळ हिंदी कविता : “क्या क्या मिलता” – कवयित्री : डॉ. मधु चतुर्वेदी
मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ करी ऑफ कॉन्स्पिरसी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
पुरणपोळ्या खाण्याचं पुण्य कटाच्या आमटीसोबतच पोटाला मिळतं म्हणून आज ही रेसिपी वाचाच!
आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या हजारो घरांच्या किचनमधून एक विशिष्ट, खमंग आणि मसालेदार असा सुगंध दरवळतोय. प्रेशर कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज आता शांत झालाय, पण खऱ्या ‘कारस्थानाला’ आता कुठे सुरुवात झाली आहे. पुरणपोळीचा बेत म्हटला की घराघरात एक वेगळीच लगबग असते, पण त्या गोडधोड पोळीच्या सावलीत एक अशी डिश शिजत असते, जिच्याशिवाय जेवणाचं पान पूर्णच होऊ शकत नाही.
**
याला ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ म्हणण्याचं कारण असं की, ही आमटी म्हणजे चण्याच्या डाळीने मागे सोडलेल्या अस्तित्वाचा एक हुशार अविष्कार आहे. पुरणासाठी डाळ शिजवून झाल्यावर जे पाणी उरतं, त्याला आपण ‘कट’ म्हणतो. खरंतर ते फेकून देण्यासारखं पाणी, पण गृहिणींच्या कल्पकतेने त्यातून जे अमृत बाहेर पडतं, त्यालाच आपण ‘कटाची आमटी’ म्हणून ओळखतो.
आजच्या या घाईघाईच्या जगात जिथे इन्स्टंट रेसिपीजचा सुळसुळाट झालाय, तिथे कटाची आमटी बनवणं ही एक ‘स्लो कुकिंग’ची कला आहे. त्याआधी घरातील पुरुषवर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि वैधानिक सूचना. जोपर्यंत किचनमधून तो विशिष्ट खमंग दरवळ येत नाही, तोपर्यंत उगाचच ‘काय होतंय?’ किंवा ‘डाळ शिजली का?’ हे बघायला तिथे जाऊ नये. डाळ शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी बोटचेपेपणा करणं म्हणजे सुगरणीच्या कामात खोडा घालण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत कट व्यवस्थित निघत नाही, तोपर्यंत डाळ शिजली असं म्हणता येणार नाही.
**
कटाची आमटी ही अत्यंत नाजूक पाककृती आहे, जी केवळ सरावानेच जमते. जर थोडंही गणित चुकलं, तर आमटीची ‘गुळवणी’ व्हायला वेळ लागत नाही. या आमटीचा जो सुगंध संपूर्ण गल्लीत पसरतो, तेच तिचं खरं ‘आयएसओ ४१०००’ प्रमाणपत्र असतं. त्यासाठी मसाल्याची तयारी ही एखाद्या युद्धाच्या तयारीसारखी असावी लागते. जिरं, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता मंद आचेवर खमंग भाजून घेताना जो आवाज येतो, तोच या रेसिपीचा खरा म्युझिक स्कोअर आहे.
खोबऱ्याचा एक तुकडा गॅसच्या निळ्या ज्योतीवर थेट धरून तो वरून काळा होईपर्यंत भाजणं, ही या रेसिपीतली सर्वात थरारक पायरी. तो भाजलेला काळा तुकडा आणि गरम मसाला जेव्हा मिक्सरमध्ये एकत्र फिरतात, तेव्हा तयार होणारा मसाला म्हणजे या कटाच्या आमटीचा आत्मा असतो. त्यात चिंचेचा कोळ, थोडा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलं की बेस तयार होतो. पण थांबा, खरी जादू अजून बाकी आहे.
**
फोडणीची तयारी करताना आज थोडं उदार व्हावं लागतं. तेलाचा वापर रोजच्यापेक्षा थोडा जास्त हवा, कारण त्याशिवाय आमटीला ती ‘तर्री’ किंवा ‘कट’ येणार नाही. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी बसली की त्यात तीळ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे नाचू लागतात. मग त्यात भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप आणि आपल्या खिशाला परवडतील तसे काजूचे तुकडे टाकले की एक राजेशाही थाट येतो.
हा सगळा मसाला आणि कट एकत्र होऊन जेव्हा गॅसवर १० मिनिटं उकळायला लागतो, तेव्हा किचनमधलं वातावरण एखाद्या मंदिरातल्या गाभाऱ्यासारखं पवित्र होतं. वरून हिरवीगार कोथिंबीर पेरली की ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ सर्व्ह करण्यासाठी तयार होते. ही आमटी नुसती चवीला लागते असं नाही, तर ती पुरणपोळी खाण्याचं पुण्य आपल्या पोटाला मिळवून देते.
**
एका बाजूला मऊशार पुरणपोळी आणि दुसऱ्या बाजूला झणझणीत कटाची आमटी, हा संगम म्हणजे मराठी खाद्यसंस्कृतीचं सर्वात मोठं यश आहे. ही आमटी म्हणजे केवळ जेवणातला एक पदार्थ नसून, तो संयम आणि कौशल्याचा एक परिपाक आहे. म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा घरात पुरणपोळीचा बेत असेल, तेव्हा त्या कटाच्या आमटीकडे आदराने बघा, कारण ती डाळीच्या त्यागातून निर्माण झालेली एक चविष्ट क्रांती आहे.
ज्या घराच्या किचनमधून कटाच्या आमटीचा सुगंध बाहेर येत नाही, त्या घराला पुरणपोळीचा खरा आनंद कधीच कळू शकत नाही.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकr
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “स्वतःच बना स्वतःची आई…” – लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझ्या 27 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो. आता प्रेम म्हटल्यावर लगेच आपल्याला ते हिरो आणि हिरॉईनचं सिनेमामधलं प्रेम आठवतं. पण ते प्रेम नाही म्हणत मी. तर ज्याला आपण माया, ममता, वात्सल्य म्हणतो, ते आईचं प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं.
थोडं स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा ना… मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते.) पण पुरुषही थोड्या फार प्रमाणात असे असलेले आपण पहातो.
तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीरही करत नाही, पण एखादी वेळ अशी येते की, त्या व्यक्तीलाही प्रेमाची गरज असते. मग त्या व्यक्तीला एकाकी वाटतं आणि कुठे तरी आधार हवा, असं वाटतं.
ह्या मनाच्या अस्वस्थतेमुळेच काही व्याधी निर्माण होतात उदा : ऍसिडिटी, डोकेदुखी, डिप्रेशन, रक्तदाब, मधुमेह वगैरे…
तर ह्याला उपाय एकच आहे की, तुम्हीच तुमची आई व्हा. जसं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर, नातवांवर करता तसं स्वतःवर करायला शिका. कारण प्रेम करणं, हा तुमचा स्वभाव आहे. मात्र स्वतःकडे प्रेमाने पाहायला तुम्ही विसरून गेला आहात, आणि सगळं प्रेमाचं भांडं दुसऱ्यांवर ओतता आहात.
एखाद्या स्त्रीची कंबर खूप काम करून दुखली, किंवा गुडघा दुखला तरी ती स्त्री त्या अवयवाचा राग करते आणि ‘काय मेलं झालं ह्याला दुखायला, ‘ असं म्हणून ती अपेक्षा करते की, नवऱ्याने किंवा मुलांनी तरी विचारावं की ‘दमलीस का?’ काही बाम वगैरे लावून देऊ का.. एक तर मूव्हची जाहिरात बघून अपेक्षा दुणावतात. पण प्रत्येक वेळी कोणी वेळ देईलच, असं नाही.
अशावेळी मनात कुढण्यापेक्षा स्वतःच स्वतःची आई बना. थोडा वेळ एकटं बसा, आणि दुखणाऱ्या भागावरून जमल्यास हात फिरवा.. आता पाठ दुखत असेल तरी डोळे मिटा आणि हात फिरवताना फील करा… स्वतःच्या शरीराकडे प्रेमाने बघा, आणि तुमच्या मुलाला किंवा नातवाला म्हणता ना… तसं म्हणा… काय झालं माझ्या बाळाला.. बरं नाही का?
आणि मग स्वतःच्याच डोक्यावरून हात फिरवा. दुखऱ्या भागाला थोडा वेळ गोंजारा.. आणि बघा जादू… दुखणं दूर पळतं की नाही. सुरुवातीला लाज वाटेल, पण हे मनातल्या मनात आपण आपल्याशीच बोलत असल्यामुळे कोणाला ऐकायलाही जात नाही, आणि खूप बरं वाटतं.
ह्या सगळ्यात भावना खूप महत्वाची आहे. तुमच्या मुला-नातवासारखं स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा. तुम्हाला जो खाऊ खावासा वाटेल, तो सगळ्यांसाठी घेऊन या आणि त्यांच्यासोबत मनसोक्त खा. तुम्हाला आवडणारी भाजी आवर्जून बनवा आणि दुसऱ्यांसाठी काही वेगळं बनवा.
पण स्वतःची आई बना आणि स्वतःचे लाड करा. ते ही दुसऱ्यांना न दुखावता.
कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि मग आयुष्यात हे करायचं राहिलं, ते राहिलं… ह्याची खंत करून दुःख करण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्यांसाठी प्रेमाचा सागर असणारे तुम्ही स्वतःच कोरडे राहिलात तर काय उपयोग.
विचार करा आणि एकदा का होईना, हे करून पहा. ह्या मुळे आपल्यावर एकटं राहायची वेळ आली, तरी आपली प्रॅक्टिस असते, मग डिप्रेशन येत नाही.
☆
लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ इस ताण का क्या करे..?– लेखिका : योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…
वेळेवर उठण्यापासुन वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..
बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या विषयांवर खाडखाड बोलू शकते…
त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजूनच वाढतो.
बारकाईने विचार करा…
साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण- भात, भाजी, पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्नाबद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…
या भाजीत हे व्हिटॅमिन..
पोळीत एवढ्या कॅलरी..
सॅलड पाहिजेच..
गोड नको रे बाबा…
हे तेल असं, ते तेल तसं…
१०००० पावलं चाललंच पाहिजे..
फलाणं आणि बिस्तानं…
अरे! दोन घास ताटात आलेत, ते खायचे नाहीत नीट आणि शंभर नाटकं…
शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… ही सूत्रं नाहीतच हल्ली…
प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचंय… तरुणच रहायचंय… तरुणच दिसायचंय… कशासाठी…?
तरुण मुलांना दिसू द्या की तरुण.. तुमचं तरुणपण झालंय ना जगून… आपण काय अश्वत्थामा आहोत का? पृथ्वीवरच कायम राहायला..
Accept the reality… and live your life happily.
‘मी एक अतिछोटी व्यक्ती आहे
जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही.. ‘
असं रोज स्वतःला सांगितलं, तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.
फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या- नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…
काही दिवसांपूर्वी मी असंंच खूप ज्ञानाचा विस्तार केला होता.. माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं की या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय.
मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केलं आणि आता खूप बरं वाटतंय..
आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करते… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सूत्र आहे सध्या…
तुम्हाला एक गंमत सांगते..
नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…
राहू खराब… केतू खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…
म्हटलं हे ऐकून, वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा… कृष्णार्पण म्हटलं आणि दिलं सोडून…
पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या ‘ जिल्हा परिषद शाळेत’ आज मोठा कार्यक्रम होता. शाळेला १० संगणक (Computers) भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन ‘मिस्टर सुहास ओक’ आले होते.
सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता – “दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे.”
शाळेच्या पटांगणात कार्यक्रम सुरू झाला. सुहासराव मंचावर (Stage) मधल्या खुर्चीत बसले होते.
त्यांची नजर अचानक मंचाच्या खाली, एका कोपऱ्यात गेली.
तिथे एक ७५-८० वर्षांचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर सतरंजीवर मुलांमध्ये बसले होते. त्यांचे कपडे अत्यंत साधे होते – एक विटकं धोतर, जुना सदरा आणि डोक्यावर एक मळके उपरणं. ते सारखे खोकत होते आणि त्यांच्या पायात एक जुनी चप्पल होती.
सुहासरावांना ते दृश्य खटकलं. त्यांना वाटलं, “हा भिकारी इथे काय करतोय? माझ्यासारखा एवढा मोठा माणूस आलाय आणि इथे मंचासमोर हे असं दृश्य?”
त्यांनी मुख्याध्यापकांना (Principal) खुणेने जवळ बोलावलं.
सुहासराव रागाने कुजबुजले, “सर, तो म्हातारा कोण आहे? त्याला तिथून उठवा. माझ्या फोटोच्या फ्रेममध्ये येतोय तो. ‘स्टँडर्ड’ खराब दिसतंय शाळेचं. भिकारी वाटतोय तो, त्याला गेटच्या बाहेर काढा आणि जेवण देऊन वाटेला लावा.”
मुख्याध्यापक थोडे ओशाळले. ते म्हणाले, “साहेब, ते… ते…”
सुहासरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. “अहो, कसले ‘ते’? सांगा शिपायाला. उचलून बाहेर काढा त्यांना.”
शिपाई गेला आणि त्याने त्या म्हाताऱ्याला (ज्यांचं नाव ‘तात्या’ होतं) हाताला धरून उठवलं.
“तात्या, चला उठा. साहेबांना त्रास होतोय. तुम्ही मागे जाऊन बसा किंवा बाहेर थांबा.”
तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. त्यांनी आपली काठी टेकवली आणि ते थरथरत्या पायांनी मंचाच्या मागच्या बाजूला, जिथे मुलांचे बूट ठेवले होते, तिथे जाऊन एका दगडावर बसले.
कार्यक्रम पार पडला. सुहासरावांनी १० कॉम्प्युटर दिले. खूप टाळ्या वाजल्या. हार-तुरे झाले.
शेवटी भाषणाची वेळ आली.
मुख्याध्यापक माईकवर आले. त्यांचा आवाज भरून आला होता.
ते म्हणाले:”आज सुहासरावांनी आपल्याला १० कॉम्प्युटर दिले, त्याबद्दल त्यांचे आभार.
पण आज मला एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, ज्याने या शाळेसाठी आपलं ‘सर्वस्व’ दिलं, पण कधी स्टेजवर येऊन हार स्वीकारला नाही.
सुहासराव, मगाशी ज्यांना तुम्ही ‘भिकारी’ समजून मंचासमोरून उठवलंत आणि बूट स्टँडजवळ बसवलंत ना…
ते ‘तात्या पाटील’ आहेत.
या शाळेची जी २ एकर जमीन आहे, ज्याची आजची किंमत ५ कोटी रुपये आहे… ती जमीन या तात्यांनी शाळेला ‘दान’ दिली आहे.
तात्यांकडे राहायला स्वतःचं पकं घर नाहीये, ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलं त्यांना सोडून गेली.
म्हातारपणी औषधाला पैसे नसतात, पण दरवर्षी आपल्या पेन्शनचे पैसे साठवून ते शाळेतल्या गरिबांच्या पोरांना गणवेश (Uniform) देतात.
साहेब, तुम्ही १० कॉम्प्युटर दिलेत, पण त्यासाठी १० फोटोग्राफर आणलेत.
या माणसाने ५ कोटींची जमीन दिली, पण आज स्वतःच्याच जागेवर बसण्यासाठी त्यांना तुमच्या परवानगीची गरज लागली.
खरा ‘श्रीमंत’ कोण, हे आज तुम्हीच ठरवा.”
सगळ्या सभामंडपात स्मशानशांतता पसरली.
सुहासरावांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
ज्या माणसाला ते कपड्यावरून ‘भिकारी’ समजत होते, त्या माणसाची दानत सुहासरावांच्या संपत्तीपेक्षा हजार पटीने मोठी होती.
सुहासराव मंचावरून खाली उतरले. त्यांचे बाउन्सर, त्यांचे फोटोग्राफर सगळे बघत होते.
सुहासराव धावत त्या मंचाच्या मागे गेले.
तिथे तात्या एका दगडावर बसून, मुलांनी दिलेलं बिस्किट खात होते.
सुहासरावांनी आपले महागडे बूट तिथेच काढले आणि त्या मळक्या धोतर नेसलेल्या तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं.
“मला माफ करा तात्या! मी पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने खूप गरीब राहिलो. तुम्ही खरे ‘राजा’ आहात. मी तुमची लायकी काढली, पण खरी लायकी आज मला माझी समजली.”
तात्यांनी हसून सुहासरावांच्या पाठीवर हात फिरवला.
“अरे बाबा, त्यात काय झालं? देव देतो आणि देवच नेतो. आपण फक्त माध्यम असतो. तू दिलं, मी दिलं… हे महत्त्वाचं नाही. पोरांनी शिकणं महत्त्वाचं. उठ, कपडे खराब होतील तुझे.”
सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं.
आज त्यांना समजलं होतं की, श्रीमंती बँकेच्या बॅलन्समध्ये नसते, तर ती ‘देण्याच्या’ वृत्तीमध्ये असते.
त्या दिवशी सुहासरावांनी एकही फोटो काढला नाही. त्यांनी तात्यांचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने मंचावर नेऊन आपल्या खुर्चीवर बसवलं.
कोणाच्या कपड्यावरून त्यांची लायकी ठरवू नका. साध्या राहणीमागे खूप मोठं आणि श्रीमंत मन असू शकतं. दान दिल्यावर त्याचा गाजावाजा करणं म्हणजे त्या दानाची किंमत कमी करण्यासारखं आहे. ‘गुप्तदान’ हेच श्रेष्ठ दान असते जेथे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला देखील कळलेलं नसतं.
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात! ”
समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले.
पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली…
समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते –
“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav. ”
घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं!
इंटरव्ह्यूचा दिवस :
शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात.
प्रिन्सिपल मिस्टर डिसूझा यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला.
आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
अचानक प्रिन्सिपलने विचारलं,
“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतोस? ”
समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं!
आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला… प्रिन्सिपलकडे गेला… वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला—
“परनाम गुरुजी! राम-राम! ”
क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली…
प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं.
“मिस्टर समीर, ” ते म्हणाले,
“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ती आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत. ”
आरव आनंदाने म्हणाला,
“माझी आजी शिकवते! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता. ”
प्रिन्सिपल म्हणाले,
“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे. ”
घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या.
समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला.
“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच. ”
त्या दिवशी समीरला उमगलं—
सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो.
त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला—
“राम-राम, आई. ”
कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं.
कथासार:
आधुनिक होणं चुकीचं नाही, पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.
इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत.
तुमच्यासाठी प्रश्न:
आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे, असं तुम्हाला वाटतं का?
घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?
* * * *
लेखिका : ज्योति निंबाळकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈