कोणत्याही सजिवानं जनलोकात रुजायच, वाढायचं परोपकारी झाड बनायचं अशी खुणगाठ मनाशी बांधली असेल तर त्यान मातीशी आपली फारकत करून कसं चालेल? त्यासाठी त्यांना बीज होऊन मातीवरच पडायचं, मातीतच दडायचं, लपायचं. परिस्थितीच्या
बदलत्या हवामानानं योग्यवेळी पाऊस पाडायला हळूहळू दमदार सुरुवात केली की अंकुरायच, मातीतनं काढायचं डोकं वर आणि लुकलुकणा-या डोळ्यान बघायचं जगाकड बाहेरच्या, विशाल विस्तारलेल्या. मग आकाशाकड निरखून बघत ठरवायचं मला आहे तिथपर्यंत पोहोचायचं, तेव्हा कुठं थोडंसं यश पदरी पडू लागतं जगण्याचं. तसं जगणं साधं सोपं सरळ नाही. कारण ते जोडलं गेलंय निसर्गाशी. त्याने घालून दिलेले दंडक तंतोतंत पाळले गेले तुमच्याकडून तरच तुम्हाला आडवायची बिशाद नाही कुणाची. म्हणूनच तुमच्यात मुरलेला तुमचं अवखळ खट्याळपणा तुम्ही कधीच हरवू देवू नका. रोज काहीतरी जगण्याच्या नव्या सोज्वळ खोडी अमलात आणा. आणि जगून दखवा त्याच मार्गानं जगाला. निर्माण करा तुमच्या जगण्याच्या नव्या पाऊल वाटा. हळुवारपणे पण भक्कम पावलं टाकत चालण्यासाठी. मग बघा तुमच्या पदरी काय पडतं ते. पण हे करताना मातीवर तुम्ही रोवलेले तुमचे घट्ट पाय कधीच डळमळीत होऊ देऊ नका. कारण तिथेच तुमच्या पायांना आणि त्यांच्या नव्या चालीना नवे तरतरीत कोंब फुटतील, वाढतील भिडतील आकाशाला. मग त्यांच्यावर विसावतील नव्यान जगायला शिकणारी नवी पाखरं अनुभवी मार्गदर्शनासाठी. हे करताना मतीला माता समजून तिच्याच मांडीवर खेळत रहा. वाढत रहा, तिची करु नका प्रतारणा कधी. येवढ प्रामाणिक पणे केलं तर तुम्ही खरोखरंच जग जिंकाल आणि बनाल धरणीवरचे खरे अजातशत्रू
“मी परत बंब पेटवणार नाही, पाणी तापलंय तर पटा पटा अंघोळी उरकून घ्या! नाहीतर दिवाळीची पाहिली अंघोळ गार पाण्याने करावी लागेल, सांगून ठेवत्ये! “
मंडळी साधारण प्रत्येक वर्षी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला, आम्हां लहान मुलांना उठवतांना आमच्या आईचा हा धमकी वजा डायलॉग ठरलेला असायचा. अर्थात त्याचा फारसा परिणाम आम्हां मुलांवर त्याकाळी होत नसे हा भाग निराळा. अशावेळी फार फार तर आम्ही मुलं कूस बदलून पुन्हा डोक्यावर पांघरूण घेवून परत झोपायचा प्रयत्न करायचो इतकंच. मग आम्ही अगदीच उठत नाही म्हटल्यावर, आमच्या अंगावरची पांघरूणं काढून टाकणे, पायावर हळूच चापट्या मारणे अशा दुसऱ्या ऍकशन मोड मध्ये आमच्या आईची गाडी जायची! मग मात्र आमच्यापुढे अंथरुणातून उठण्या शिवाय पर्याय नसायचा.
धारण बहात्तर वर्षांपूर्वी प्रत्येक दिवाळीला थंडी नुसती पडायची नाही तर दातावर दात आपटेपर्यंत चक्क वाजायची. त्यावेळी थंडी पडणं आणि थंडी वाजणं या दोन्ही गोष्टीत शरीराला जाणवण्या इतका फरक नक्कीच होता. हल्लीचा पर्यावरण नामक राक्षस त्या काळापर्यंत तरी अस्तित्वात नव्हता असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे दिवाळीला भल्या पहाटे बंबातल्या गरम गरम पाण्याने अंघोळ करणं ह्या सारखं स्वर्ग सुख नव्हतं!
शिवाय तेंव्हा चाळीत दिवाळीला पाहिला ऍटोम बॉम्ब कोण फोडणार यात चाळीतल्या मुलांत जणू चुरस असायची. मग चाळीतला एखादा अत्रंगी मुलगा, पहाटे तीन साडेतीनलाच “कॅप्टन” नावाचा चौकोनी ऍटोम बॉम्ब फोडून अख्खी चाळ हादरवून लोकांना पहाटे उठवायला जणू हातभारच लावायचा म्हणा नां! पण तेंव्हाचा काळच वेगळा होता, त्यामुळे दिवाळीत पहाटे पहाटे फटाक्याच्या आवाजामुळे आपली झोपमोड झाली, असं चाळीतल्या कुठल्याच चाळकऱ्याला वाटत नसे. आजकाल लोकांना फटाके फोडायला काहीही कारण पुरत. त्या सर्व कारणांची चिकित्सा करायची म्हटली तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल! शिवाय हल्लीच्या पिढीची पहाटच अनेक कारणामुळे सकाळी आठ नऊच्या आधी होत नाही, त्याला आपण मनातल्या मनांत ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणण्याशिवाय दुसरं काय करू शकतो? असो!
मंडळी, जेंव्हा अंघोळीला अंघोळच म्हणत होते, त्या काळाबद्दल मी बोलतोय. “उठा उठा, दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली! ” असं अख्ख्या चाळभर, हातातल्या मोती साबणाने लोकांची दारं वाजवत, त्यांची दिवाळीच्या गुलाबी थंडीत झोपमोड करणारे आजोबा तेंव्हा टीव्हीवर अवतारयचे होते! बरं, अशी झोपमोड करून त्या आजोबांनी घरटी एक एक मोती साबण दिवाळी भेट म्हणून दिला असता, तर एक वेळ मी समजू शकलो असतो हॊ! पण हे आजोबा (पुणेरी असल्यामुळे? ) नंतर तो हातातला साबण पुढच्या दिवाळीच्या पहाटेस, परत त्याच कामासाठी वापरायला बहुतेक स्वतःच्या घरी घेवून जात असावेत. असं काही त्या ऍड मध्ये दाखवलं नव्हतं, पण दर दिवाळीला मोती साबणाची तीच तीच ऍड बघून, मीच आपला माझा स्वतःचा असा एक अंदाज बांधला इतकंच!
दुसरं असं की त्या वेळेस “दिवाळी पहाट” सारख्या कार्यक्रमांचे गल्लो गल्ली पेव फुटलेले नव्हते. त्यामुळे अशा एखाद्या कार्यक्रमाची निवेदिका लाडे लाडे, मान थोडी तिरकी करून मधाळ आवाजात “आपण सारे रसिक अभ्यंग स्नान करून आजच्या कार्यक्रमाची रंगत वाढवायला भल्या पहाटे (तिकीट काढून) आलात त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते! ” असं रंगात येवून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील अंघोळी सारख्या रोजच्या विधिला “अभ्यंग स्नानाचा” दर्जा देऊन त्याला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर नेवून ठेवायचा तो काळच नव्हता. तर उटणं आणि सुवासिक तेल लावून, बंबातल्या गरम गरम पाण्याने अंघोळ करून, नवीन कपडे घालून एकमेकांच्या घरी न बोलावता फराळ करायला जाऊन, दिवाळीचा उत्साह द्विगुणित करायचा तो काळ होता मंडळी! गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी! तर पुन्हा एकदा, असो!
अंघोळ! अगदी अनादी काळापासून स्नान या रोजच्या विधिला अंघोळ असा पर्यायवाचक शब्द कोणाच्या डोक्यातून आला आणि तो कधी पासून आपल्या मराठी भाषेत रूढ अर्थाने वापरायला सुरवात झाली, हा एक (नेहमी प्रमाणे) संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण ज्याने हा पर्यायवाचक शब्द शोधून काढला त्या मागे त्याचं स्वतःच असं एक तर्कशास्त्र असावं, असं मला वाटतं. मी जेंव्हा (व्याकरण दृष्ट्या नाही हे आधीच कबूल करतो) माझ्या पद्धतीने आणि अल्प बुद्धीने अंघोळ या शब्दाची फोड अं(मळ)+घोळ अशी करतो, तेंव्हा अंघोळ हा पर्यायवाचक शब्द एखाद्या नवऱ्याच्या सुपीक डोक्यातूनच आला असण्याची माझ्या डोक्यातली शंका आणखीनच बळावते! कसं ते सांगतो. जगातल्या तमाम नवरे मंडळीना, सुट्टी असो अथवा नसो मुळात अंघोळ करायचाच कंटाळा, खोटं वाटत असेल तर आपल्या धर्मपत्नीला विचारा! शिवाय घोळ या शब्दाचा आणि जगातल्या तमाम बायकांचा अत्यंत जवळचा संबंध, असं जणू प्रत्येक नवऱ्याचे ठाम मत! त्यामुळे “आज काय घोळ घालून ठेवलायस? ” हा आपापल्या बायकोला उद्देशून म्हटलेला डायलॉग दर दोन दिवसाआड प्रत्येक “सुखवस्तु” घरी ऐकायला येतोच येतो. म्हणजे एका अर्थी माझ्या शंकेला पुष्टीच मिळते, असं आपलं माझं प्रांजळ मत. आता आपण म्हणाल प्रांजळ मत म्हणजे? नेहमी तुम्ही ठाम मत असं म्हणता आणि आज एकदम प्रांजळ मत म्हणून स्वतःला मवाळ वर्गातले समजायला लागलात की काय? मंडळी उगाच गैरसमज नको, मी प्रांजळ हा शब्द मुद्दामच वापरला. म्हणजे असं बघा, या शब्दात जो “जळ” हा शब्द दडला आहे त्याचा अर्थ पाणी आणि रोज कुठलाही घोळ न घालता अंघोळ करतांना मी (निदान माझा तरी) संबंध बादलीभर जळाशी येतोच येतो, म्हणून मी आपलं प्रांजळ मत म्हटलं इतकंच!
वाचकहो, आता अंघोळ ह्या शब्दाबद्दल जास्त घोळ न घालता, हा शब्द पहिल्यांदा कुणी, कधी आणि कां वापरला या बाबतीतले माझं मत मांडणं मला यापुढे आणखी घोळात घालेल असं वाटत, म्हणून या संशोधनाचे सर्व हक्क, जे कधीच माझ्याकडे नव्हते, ते कुठलाही भाषा संशोधक घेवू शकतो असं माझं मीच जाहीर करतो आणि आणखी घोळ न घालता पुढील लेखाकडे वळतो.
हमामखाना! हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा. ही मध्यपूर्वेतील संकल्पना आणि वास्तू इस्लामी राज्यकर्त्यांनी आपल्याकडे आणली. तेंव्हा दोन प्रकारचे हमामखाने होते, एक राजघराण्यातील लोकांसाठी आणि दुसरा सामान्य लोकांसाठी. शाळेत असतांना जो थोडाफार इतिहास “कानावरून गेला” त्यातील सनावळीपेक्षा लक्षात राहिलेला हा एक शब्द. अर्थात आपल्या सगळ्यांचेच जन्म इतिहासकालीन नसल्याने, या दोहोतील कुठल्याच हमामखान्यात अंघोळ करण्याचे भाग्य आपल्यापैकी कुणालाच लाभले नाही. पण माझ्या पिढीतील ज्यांचे लहानपण माझ्या सारखे चाळीत गेले, त्या लोकांनी “सार्वजनिक नळावर” आमच्या “त्या हमामखान्यात” जरी अंघोळीला सुगंधी अत्तराचे हौद नव्हते तरी, उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ नळाखाली अंघोळ करायचा आनंद नक्कीच घेतला असेल! कारण मंडळी त्यावेळी घरातल्या नळाला तर सोडाच, पण सार्वजनिक नळाला सुद्धा चौवीसतास पाणी होतं हॊ! आजच्या सारखी पाण्याची “सिन्टेक्स” संस्कृती त्या वेळेस जन्माला यायची होती!
शिवाय हमामखाना हा शब्द तसा लक्षात राहण्याचे दुसरं कारण म्हणजे त्यावेळेस आम्ही रोज अंघोळीसाठी वापरत असलेला “हमाम” साबण. आज इतक्या वर्षांनी सुद्धा हमाम साबण बाजारात तग धरून आहे, पण त्यावेळच्या त्याच्या क्वालिटीची बातच निराळी होती, हे आपण सुद्धा तो तेंव्हा वापरला असेल तर मान्य कराल. आजच्या कलियुगात जरी हमामखाने नामशेष झाले असले तरी, कलियुगातल्या अब्जाधीशांच्या महालासमान हवेल्यातून हमामखान्याला लाजवील अशा प्रकारची न्हाणीघर असतात, हे आपण माझ्याप्रमाणे कुठल्यातरी व्हिडीओत नक्कीच बघितलं असेल!
शेवटी, अंघोळ ही कधी करावी, रोज करावी का नाही, गार पाण्याने करावी का गरम पाण्याने का कोमट पाण्याने आणि कोणी कोणाला कधी घालावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्या बाबत मी अधिकार वाणीने काही बोलावं इतका माझा अंघोळ या विषयातला अभ्यास नाही. पण जेंव्हा केव्हा तुंम्ही अंघोळ कराल ती “कावळ्यासारखी” कधीच करू नका, असं आपल्याला “मैसूर सॅंडल सोपची” शपथ घालून सांगतो आणि हे माझं अंघोळपुराण, आजचं माझं आंघोळीचं बादलीभर पाणी गार व्हायच्या आधीच संपवतो व रोजच्या अंघोळीला खरोखरचा पळतो!
(पूर्वसूत्र- “त्यादिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना कीं बँकेच्या नियमात बसेल तीच शिक्षा करणं आम्हाला शक्य होईल असं? शिवाय या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य अशी ‘देवाची यंत्रणा’ असतेच आणि तो पहात असतो सगळं असंही तुम्ही म्हणाला होतात. त्याच्या हातातल्या आवाज नसणाऱ्या काठीने आता तोच योग्य तो न्याय करेल असं तुम्ही सांगितलंत ते पटलं होतं मला. म्हणूनच हे तक्रार मागं घेत असल्याचं पत्र मी त्याच दिवशी लिहून ठेवलं होतं…!”आजोबा शांतपणे म्हणाले. भारावलेल्या अवस्थेत मी थक्क होऊन पहात राहिलो फक्त!!)
माझ्या समोरचा किचकट होऊन बसलेला अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न असा सहजासहजी सुटणं हे त्या क्षणापुरतं तरी मला स्वप्नवतच वाटलं होतं. आजोबांचे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नव्हते. पण या औपचारिकतेचा विचार मनात येण्यापूर्वीच त्या भारावलेल्या अवस्थेत एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी जागचा उठलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला. ते भांबावले. चटकन् दोन पावलं मागे सरकले…
“अहो.. कमाल करताय तुम्ही.. काय करताय हे?..”
“योग्य तेच तर करतोय आजोबा. आत्ता या खेरीज तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी दुसरं कांहीच करू शकत नाहीय. खरंच खूप आभारी आहे मी तुमचा…”
“आभार आम्ही तुमचे मानायला हवेत..” हातात चहाचा ट्रे घेऊन आलेली त्यांची मुलगी म्हणाली.” त्या घटनेचा बाबा खूप त्रास करून घेत होते. त्यांच्या जीवनमरणाचाच प्रश्न बनवला होता त्यांनी तो. आता तुम्ही समजावल्यामुळेच तर ते सावरलेत..”
त्यादिवशी आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते बरंच कांही अनपेक्षितपणे मिळाल्याचं समाधान घेऊन. जे घडलं ते मनावरचं ओझं हलकं करणारं होतं हे खरंच, पण ते जसं आणि ज्या क्रमानं घडलं ते मलाच अचंबित करून गेलं होतं. मनातला अंधार जादूची कांडी फिरवावी तसा क्षणार्धात नाहीसा झाला होता आणि मनात भरून राहिलेल्या लख्ख प्रकाशात मला जाणवू लागला होता फक्त.. ‘तो’..! ‘त्या’च्या कृपालोभाशिवाय हे सगळं असं घडणं शक्य तरी होतं कां? या घटनेपर्यंतच्या, पावलोपावली अचानक समोर येत गेलेल्या असंख्य, अंधाऱ्या अशा टोकदार वळणांवर प्रत्येकवेळी मला सोबत करणाऱ्या ‘त्या’नेच मला या प्रकाशवाटेवर आणून सोडलेलं होतं! पण तरीही हे सगळं घडवत असताना स्वत: मात्र अलिप्त राहून त्याने माझ्याचकडून सगळं करवून घेतलेलं होतं जसंकांही!
चार दिवसांपूर्वीच अतिशय अस्वस्थ मन:स्थितीत स्वत:ची निकड सोबत घेऊन प्रथमच सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दाराची बेल मी वाजवली होती तो क्षण, आणि जे आणि जसं मला हवं होतं ते सगळं स्वखुशीने स्वत:च माझ्या स्वाधीन करून आज सहस्त्रबुद्धे आजोबांनी मला अतिशय समाधानाने निरोप दिला होता तो क्षण, यामधले अस्वस्थ करणारे, माझी उलघाल वाढवणारे कितीतरी प्रसंग मनात जिवंत झाले पुन्हा! आज तेच सगळे प्रसंग पुन्हा जगताना त्यातला प्रत्येक क्षण, त्या त्या वेळी वखरेसाहेबांनी,
प्रभूदेसाईंनी आणि सहस्त्रबुध्दे आजोबांनीही माझ्या विचारांना दिलेल्या परस्परविरोधी दिशा, त्यामुळे माझ्या मनात निर्माण होत राहिलेली अस्वस्थता न् अनिश्चितता, आणि त्या त्या प्रत्येक क्षणी स्वतःच्या सोयीचा आणि स्वार्थाचा लवलेशही नसलेली, माझ्याकडून माझ्याही नकळत जपली गेलेली सकारात्मकता! हे सगळं माझं कर्तृत्त्व नसून त्या त्या नेमक्या क्षणी ‘त्या’ने दिलेली प्रेरणाच होती आणि मी फक्त निमित्तमात्र! हे असंच सगळं अगदी खरं होतं पण ते फक्त माझ्यापुरतं. बाकी कुणालाच,अगदी वखरेसाहेबांनाही यामागची माझी भावना आणि यातलं तथ्य याच तीव्रतेने जाणवणं आणि पटणं अपेक्षितही नव्हतंच!
आणि म्हणूनच ‘आपलं काम झालंय. सहस्त्रबुद्धे आजोबांनी त्यांची तक्रार मागे घेतलीय आणि तसं पत्रही दिलंय’ एवढंच सांगून मी ते पत्र वखरे साहेबांच्या समोर ठेवलं तेव्हा स्वतःच्याच कानांवर विश्वास नसावा तसे ते आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिले.
“काय सांगताय..? कसं काय?..” त्यांनी विचारलं. कसं ते त्यांना मोजक्या शब्दांत मी सांगितलं तेव्हा मात्र प्रभूदेसाईंना ‘अॅडव्हायझरी मेमो’ द्यायची सूचना आणि गरज सहजपणे स्वीकारणं त्यांना थोडं कठीण गेलं. ते सहाजिकच होतं. पण सगळी पार्श्वभूमी त्यांना सांगितल्यानंतर तसा मेमो देण्याची गरज आणि अपरिहार्यता त्यांनी समजून घेतली आणि त्यामुळे पुढे प्रभूदेसाई स्वतःवर अन्याय झाल्याच्या भावनेने बरेच नाराजही झाले. तरी मुख्य म्हणजे अचानक उभ्या ठाकलेल्या आमच्यासमोरच्या या अकल्पित संकटातून आमची अर्थातच या सुखांताने पूर्णतः सुटका झाली होती! अर्थात या सगळ्या मागचा करता-करवता ‘तो’च होता हे इतर संबंधितांपर्यंत न पोचलेलं सत्य माझ्यासाठी मात्र मला उभारी देऊन गेलं होतं!!
मनावर कायमचा कोरला गेलेला हा प्रसंग या लेखनाच्या निमित्ताने पुन्हा जगताना प्रत्यक्षात न जाणवलेले अनेक दुवे मला प्रथमच जाणवले. प्रमोशननंतर माझं पुण्यातल्या झोनल ऑफिसला झालेलं पोस्टींग पुढे अनेक अर्थांनी माझ्या उर्वरित आयुष्याला अतिशय उत्कट समाधान आणि कृतार्थता वाटावी अशी वेगळीच कलाटणी देणारं ठरणार होतं जे त्याक्षणी माझ्यासाठी अज्ञातच होतं.आज जाणवतंय ते हेच कीं सहस्त्रबुद्धे आजोबांच्या संदर्भातला हा अनोखा अनुभव पुढे घडू पहाणाऱ्या अनपेक्षित अशा आनंददायी घटनांचं सूचन करणाराच तर होता! फक्त मला ते त्याक्षणी जाणवलं नव्हतं एवढंच!
व्हाॅटस्ॲप वर आपण पाठवलेला एखादा मेसेज आपल्यालाच परत येतो. काही वेळा तो थोड्या वेळातच येतो, तर काही वेळा त्याला यायला वेळ लागतो. पण परत येतोच. हे मेसेजेस साधारण असतात. यात गुपित काहिही नसतं.
पण व्हाॅटस्ॲप यायच्या आधी आणि आता सुध्दा आपलाच आणि गोपनीय मेसेज आपल्यालाच परत मिळण्याचा अनुभव काही जणांना आला असेल. कुणाला सांगू नका किंवा सांगू नकोस अशी सुरवात करून दबक्या आवाजात खणखणीतपणे सांगितलेली गोष्ट कधीकधी आपल्यालाच परत ऐकायला मिळते. कधी त्यात कशाची भर पडते तर कधी काही वगळलं जातं. वर परत कुणाला सांगू नका याची जोड असतेच.
यावेळी आपले चेहर्यावरचे भाव कमालीचे निरागस असतात. ठेवावेच लागतात.
कुणाला सांगू नका. अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट दोन प्रकारची असते. एकतर ती खरंच कोणाला सांगायची नसते. आणि दुसरा प्रकार म्हणजे सगळ्यांनाच समजावी ही ईच्छा असते. पण मी सांगितली हे समजू नये असं वाटतं.
मग ती गोष्ट वरच्या दोनपैकी कोणत्या प्रकारची आहे हे आपणच ठरवतो. पहिल्या प्रकारची असेल तर एखाद्यालाच, जवळ कोणी नसतांना, त्याला जवळ करत सांगतो. त्यालाही आपण जवळचे आहोत याचा आनंद होतो. पण यात त्याच्या जवळचं पण कोणीतरी असेल याचा विसर पडतो.
दुसर्या प्रकारची असेल तर मग ती कुठे, कशी, आणि साधारण किती जणांना सांगावी हे ठरवतो. बर्याचदा ते ठरलेलंच असत, फक्त आपण सांगायच्या संधीची वाट बघत असतो. अशी संधी आली नाही तर ती आणतो.
कुणाला सांगू नका अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्या चेहर्यावर त्यावेळी योग्य ते भाव आणि प्रतिक्रिया असतात. पण नंतर मात्र ते कुुणाला सांगू नका यातलं नका हे ते सोयीस्कर विसरतात, आणि कुणाला सांगू… अशी त्यांची अवस्था होते.
आणि त्या अवघड वाटणार्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग काढला जातो. आणि मग परत दबक्या आवाजात खणखणीतपणे ती गोष्ट पुढे सरकल्यावर थोड मोकळं वाटतं.
कुणाला सांगू नका यानंतर सांगीतलेल्या गोष्टीवर अरेच्या, काय सांगतोस, खरंच का, मला शंका होतीच, या सारखे अनेक उद्गार बाहेर पडतात. यात वाटत नाही तसं… , असं म्हणतांना आपल्याला काय वाटतं याची चर्चा होते.
कोणाला सांगू नका ही गोष्ट माणसांना सांगीतली तरी ती स्त्री वर्गात पोहोचते. आणि स्त्री वर्गात सांगीतली तरी ती पुरुष वर्गात पोहोचते.
यावर जाऊ देत… आपल्याला काय करायचय… यावर चर्चा संपलीतरी पुढे आपल्याच काही तरी करायचंय… याची कल्पना काही जणांना होते. कारण त्यांनी काही केलं नाहीतर हा बातमीचा प्रवाह थांबणार तर नाही नां, अशी शंका त्यांना येते. आणि मग ती बातमी तशाच विश्वासू व्यक्तीला त्याच पध्दतीने सांगून ते आपलं मन मोकळं करतातच, पण त्या बातमीला वाहण्यासाठी मोकळंपण करतात.
कोणाला सांगू नका. यात नात्यांचा भेद नसतो. नात्यातल्या, मित्रांच्या, शेजारच्या, वरवर ओळख असणाऱ्या, तोंड ओळख असणाऱ्या, किंवा ओळख नसणाऱ्या अशा सगळ्यांच्या गोष्टींचा समावेश त्यात असतो. बर्याचदातर अरे ते… ते नाही का… अरे तिथे कायम असतात… आठवत नाही का. असं म्हणत त्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न होतो.
कोणाला सांगू नका… ही कानातून पोटात गेलेली गोष्ट जास्तवेळ पोटात रहात नाही. ती परत तोंडातून बाहेर पडत कोणाच्यातरी कानातून त्याच्या पोटात जाते. आणि तिथून त्याच प्रकारे बाहेर पडते.
आत्ता मी काय सांगितलं यात खास असं काहीच नाही. आणि गोपनीय तर मुळीच नाही. त्यामुळेच कोणाला सांगू नका असं मुळीच म्हणणार नाही.
जीवनातलं एक शाश्वत सत्यच संत कबीर या दोह्यात नमूद करतात. पान वृक्षाला सांगते, वनराज वृक्षा ऐक. आता मी तुला सोडून जातो. पुन्हा न भेटण्यासाठी, दूर कुठेतरी मी पडून राहीन.
पानझडीच्या काळात प्रत्येक पानाला मातृवृक्षाचा वियोग सहन करावा लागतो. तो टाळणे ना झाडाच्या, ना पानाच्या हातात. निसर्ग नियमाप्रमाणे हे होत असते. खरंतर पान हा वृक्षाचा अवयव. अन्न तयार करून वृक्षाला जगविणारा. मग त्याच्यावर अशी वेळ का यावी? यामागे विज्ञान आहे. काही झाडे एकदम सगळी पाने गळून टाकतात. त्यांना पानझडी वृक्ष म्हणतात. पानगळल्यामुळे झाडाला प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ऊर्जा व पाण्याची बचत करता येते. कमी पानांमुळे पाण्याचे उसर्जन कमी होते. झाडांना पाणी कमी लागते व त्यामुळे झाडे स्वतःला जिवंत ठेवू शकतात. झाडांना ऊर्जा प्रकाश संश्लेषणातून मिळते. ही क्रिया सूर्यप्रकाशात हिरवी पाने करतात. पानातील क्लोरोफिलच्या मदतीने झाडे सूर्यप्रकाशात पाणी व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड च्या साह्याने साखर तयार करतात. पण पानझडीच्या वेळी क्लोरोफिल मुळात व खोडात साठवले जाते. त्यामुळे पानांचे कार्य थांबते आणि ती आधि पिवळी मग लाल दिसू लागतात. मग गळून पडतात. तयार असलेल्या ऊर्जेचा उपयोग फुलांच्या बहरासाठी म्हणजे प्रजननासाठी होतो. म्हणून पाणझड होते तेव्हा वृक्ष फुलांनी भरून परंपरारक्षणाचे काम करतात. रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या झाडाचा सुखद अनुभव आपण घेतो. पाने नसल्यामुळे पूर्ण शक्तीनिशी हे कार्य करून फुला फळांच्या बहरातून पुनर् निर्मिती होते. योग्य काळी परत नवीन पाने फुटतात. असे हे चक्र सुरू असते.
अशा प्रकारे पाने झाडांचा निरोप घेऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतात. आपल्या बळी देऊन झाडांना जगवतात. ‘उपजे ते नाशे’ हा जगाचा नियमच आहे. पण नाश आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळा गोंधळ माजला असता. नाश म्हणून नवनिर्मितीला शोभा आहे. तो नवसृजनाचा आनंद आपण भोगतो. फुलांनी भरलेले वृक्ष सृष्टीचे वैभव ठरतात.
☆ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆
☆
सुधीर रसाळ हे मराठी साहित्य आणि समीक्षाविश्वातील एक महत्त्वाचे नाव. सुमारे 60 वर्षे त्यांनी मराठी साहित्यव्यवहारात आपल्या समीक्षात्मक लेखनाने मोलाची भर घातली आहे. ‘कविता आणि प्रतिमा’ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक ग्रंथ 1982मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने साहित्याचा गांभीर्यपूर्वक विचार करणारा एक समीक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ‘काही मराठी कवी जाणिवा आणि शैली’, ‘वाङ्मयीन संस्कृती’, ‘मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप’, ‘मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्मक वाङ्मय’, ‘भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा’, ‘पार्थिवपूजक पु. शि. रेगे, ‘समीक्षा आणि समीक्षक’, ‘कवितायन : विंदा करंदीकर यांची कविता’, ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ इत्यादी अनेक समीक्षा ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. आजही त्यांचे लेखन चालू आहे. किंबहुना वयाच्या नव्वदीनंतरही ते तितक्याच निष्ठेने समीक्षालेखन करत आहेत. ‘संवादातून साहित्यशोध’ हा त्यांच्या मुलाखतींचा संग्रह प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी नुकताच पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने संपादित केला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा आपल्याला विचार करायचा आहे.
डॉ. सुधीर रसाळ
सुधीर रसाळ हे मर्मग्राही स्वायत्ततावादी समीक्षक आहेत . मराठी समीक्षेची सुरुवात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. मराठीतील इतर आधुनिक साहित्यप्रकारांप्रमाणेच समीक्षेची बीजे प्राचीन काळात सापडत असली तरी 1872 नंतर मराठी समीक्षेने आधुनिक रूप धरायला सुरुवात केली, असे म्हणता येईल. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात साहित्याचा विचार प्रामुख्याने जीवनवादी आणि कलावादी दृष्टिकोनातून होत राहिला आहे. जीवनवादी समीक्षक साहित्याचा मानवी जीवनाच्या संदर्भात विचार करतात. तर कलावादी समीक्षक साहित्याचा कलेच्या दृष्टीने विचार करतात. कलावादी समीक्षकांची मराठीमध्ये एक परंपरा दिसून येते. या परंपरेचे मर्ढेकरपूर्व आणि मर्ढेकरोत्तर असे दोन भाग होतात. मर्ढेकरपूर्व कालखंडात काही समीक्षक साहित्याचा कलावादी दृष्टिकोनातून विचार करत असले तरी मर्ढेकरांच्यापासून साहित्याचा विचार निखळ कलावादी दृष्टिकोनातून होऊ लागला. मर्ढेकरोत्तर कालखंडात स्वतः मर्ढेकर, पु.शि.रेगे, वा. ल.कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ, माधव आचवल, प्रभाकर पाध्ये आणि सुधीर रसाळ यांसारखे समीक्षक साहित्याचा कालावादी दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार करू लागले. मराठीतील कलावादी समीक्षकांवर पाश्चात्त्य साहित्यशास्त्रातील इमॅन्युअल कांट आणि विश्वचैतन्यवादी विचारवंत यांचा प्रामुख्याने प्रभाव दिसतो.
डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेवर सुरुवातीच्या काळात मराठीतील गंगाधर गाडगीळ आणि वा.ल. कुळकर्णी यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. नंतर अमेरिकेत विसाव्या शतकाच्या मध्यावधी कालखंडात उदयास आलेल्या ‘न्यू क्रिटीसिझम’ (नवी टीका) या रूपवादी चळवळीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. न्यू क्रिटिसिझम या चळवळीचे नाव जॉन क्रो रॅन्सम यांच्या 1941 च्या ‘द न्यू क्रिटिक्स’ या पुस्तकावरून पडले आहे. आय. ए. रिचर्ड्स, क्लींथ ब्रुक्स, जॉन क्रो, डब्ल्यू के विमसॅट आणि मोनरो ब्रियर्डस्ली हे न्यू क्रिटीसिझमच्या चळवळीतील प्रमुख विचारवंत होते. साहित्याचे कार्य एक स्वयंपूर्ण एक सौंदर्यात्म वस्तू म्हणून कसे करते हे शोधण्यासाठी त्यांनी कवितेचे बारकाईने वाचन करण्यावर भर दिला. ही समीक्षापद्धती साहित्यकृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी केवळ ग्रंथाच्या अंतर्गत रचनेवर लक्ष केंद्रित करते. लेखक, इतिहास, समाज यांसारख्या बाह्य घटकांना ती महत्त्व देत नाही. भाषेतील गुंतागुंत, विरोधाभास आणि संदिग्धता यांचा ती बारकाईने अभ्यास करते. या पद्धतीचा मुख उद्देश साहित्यकृतीला एक स्वयंपूर्ण स्वतंत्र कलाकृती मानून तिचे विश्लेषण करणे हा होता. या सर्वांच्या संस्कारातून सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका तयार झाली आहे.
1950 च्या दशकाच्या अखेरीस रसाळ यांचा पहिला समीक्षालेख प्रसिद्ध झाला. या लेखातून प्रकट झालेली त्यांची साहित्य विषयक सिद्धान्ताधिष्ठित भूमिका अधिक प्रगल्भ होत गेली ती जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी’ या ग्रंथातील समीक्षालेखनापर्यंत टिकून राहिलेली दिसते. सैद्धान्तिक लेखनाचे सातत्य त्यांच्या सर्व ग्रंथातून प्रत्ययाला येते. एखाद्या व्यक्तीच्या मनोभूमिकेत कालांतराने बदल होण्याची शक्यता असते. मात्र सुधीर रसाळ यांची भूमिका अविचल राहिली. सुधीर रसाळ यांचे महाविद्यालयीन शिक्षक हे बहुतांशी जीवनवादी होते. मात्र सुधीर रसाळ यांच्यावर स्वातंत्र्योत्तर काळातील नवकथा आणि गंगाधर गाडगीळ यांची समीक्षा यांचा प्रभाव अधिक राहिला. कलावादी भूमिकेत काही उणिवा असल्या तरी वाङ्मय व कला यांचा विचार सौंदर्यमूल्याच्या संदर्भातच केला गेला पाहिजे आणि कलाकृती म्हणूनच कलाकृतीला स्वीकारले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे . कलाकृती ही सौंदर्यनिर्मिती आणि सौंदर्यप्रत्यय देत असली तरी तिला इतर अंगेही असू शकतात आणि त्यांचे संस्कार आपल्यावर होऊ शकतात. परंतु हे संस्कार करणं हे त्या कलाकृतीचे उद्दिष्ट असू शकत नाही असे ते आग्रहाने आजही मांडतात. समीक्षेची निर्मितिप्रक्रिया सांगताना ते म्हणतात, “माझा विचार अंतर्गतदृष्ट्या सुसंगत असतो त्याचा तात्त्विक समीक्षेकडून वाङ्मयाकडे नव्हे तर वाङ्मयाकडून तात्त्विक समीक्षेकडे प्रवास होत असतो. किंबहुना हा प्रवास दुहेरी असतो. एकीकडे तात्त्विक समीक्षा तुम्हाला मदत करीत असते. तर दुसरीकडे तिला आव्हान देणारी कलाकृती तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणत असते. या पद्धतीने प्रत्येक समीक्षकाचा समीक्षाविचार सिद्ध होत असतो. ही प्रक्रिया ज्या समीक्षाकाबाबत थांबते तो समीक्षक म्हणूनही थांबलेला असतो”. यातून समीक्षेतून निकष जसे सिद्ध होतात तसेच श्रेष्ठ दर्जाची साहित्यकृती चांगल्या साहित्यकृतीचे निकष समीक्षेला देत असते, हे डॉ.रसाळ सुचवितात. गंगाधर गाडगीळ यांच्या संदर्भात लिहिताना स्वायत्ततावाद आणि कलावाद या दोन वेगळ्या संकल्पना ते मांडतात. त्यांच्या मते स्वायत्ततावादामध्ये अशी भूमिका घेतली जाऊ शकते की, वाङ्मय हे एकप्रकारचं सत्य असतं, वाड्मयामध्ये नैतिकता असू शकते. वाड्मयामध्ये जीवनाचा अर्थपूर्ण असे दर्शन घडवलं जाऊ शकतं आणि तरीही वाङ्मय हे स्वायत्त असतं. अमेरिकेतील न्यू क्रिटिसिझमच्या चळवळीतील साहित्यविचार जसा रसाळ यांना योग्य वाटतो तसाच गंगाधर गाडगीळांचा आशयाला महत्त्व देऊन मांडलेला कलावादी विचारही त्यांना योग्य वाटतो. अशी भूमिका स्वीकारून रसाळांनी केलेले समीक्षालेखन आपल्या वेगळेपणाने नजरेस भरते. डॉ. रसाळ यांची भूमिका जिला ते स्वायत्ततावादी भूमिका म्हणतात तिचे वेगळेपण असे की सामाजिकता आणि कलावाद या भूमिका तिला परस्परविरोधी वाटत नाहीत. डॉ. सुधीर रसाळ यांची ही भूमिका ललित साहित्याला योग्य न्याय देणारी भूमिका आहे, याचा प्रत्यय येत राहतो.
—-*—–
‘संवादातून साहित्यशोध’ या प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी संपादित केलेल्या डॉ. सुधीर रसाळ यांच्या मुलाखतींच्या संग्रहाचा प्रकाशन समारंभ छ. संभाजीनगर येथे रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा डॉ. वि.दा. वासमकर यांनी घेतलेला शोध.
☆ पु. लं. चे एक अप्रतिम व्यक्तिचित्र… विनोददा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र – विनोद दा
पुलंच्या सिद्धहस्त लेखणीतून जे जे काही कागदावर उतरले, ते ते अजरामर झाले असेच म्हणावे लागेल. पुलंच्या अनेक व्यक्तीचित्रांशी आपण परिचित असतो. नारायण, हरीतात्या, सखाराम गटणे, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर, नामू परिट यासारख्या त्यांच्या अनेक व्यक्तीचित्रांशी मराठी माणसाचे हृदयाचे नाते जुळले आहे. ही माणसे आपल्याला आपल्यातीलच एक वाटतात. हे त्यांचे शब्दचित्र रेखाटतानाचे कौशल्य आहे. त्या कथा वाचताना किंवा पुलंच्या तोंडून ऐकताना, ती माणसे अक्षरशः जिवंत होतात आणि आपल्या मनात कायमचे स्थान पटकावतात. पुलंच्या सिद्धहस्त लेखणीचा परिसस्पर्श ज्या ज्या विषयांना झाला, त्यांचे सोने झाले. त्यांचे असेच एक फारसे परिचित नसलेले व्यक्तीचित्र आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
हे व्यक्तिचित्र आहे विनोद दांचे. ‘ वंगचित्रे ‘ हे त्यांचे पुस्तक वाचत असताना हे विनोद दा आपल्याला भेटतात आणि कायमचे आपल्या हृदयात स्थान मिळवतात. आपल्याकडे आपण आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीला दादा असे सर्वसाधारणपणे म्हणतो. परंतु बंगालमध्ये साधारणपणे ‘ दा ‘असे म्हणण्याचा प्रघात आहे. ‘ दा ‘ शब्दच कानाला किती गोड लागतो !
वयाची पन्नाशी उलटल्यानंतर पु ल देशपांडे १९७० मध्ये शांतिनिकेतनला गेले. तिथे अनेक दिवस राहिले आणि बंगाली भाषा त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘ गीतांजली’ चा अनुवाद करणारे वामन मंगेश दुभाषी उर्फ ‘ ऋग्वेदी ‘ हे पुलंचे आजोळचे आजोबा. त्यांच्याकडूनच रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य आणि बंगाली भाषेची आवड पुलंकडे आली. कोणतीही भाषा शिकायची तर ती जिथे बोलली जात असते तिथे जाऊन अनुभवावी, तिच्या विविध रूपांचा आस्वाद घ्यावा आणि त्यातून ती शिकावी अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणेच पुलं शांतिनिकेतनात राहिले. ते कोलकात्यासारख्या शहरात राहिले तसेच बंगालमधील खेड्यापाड्यांमधूनही हिंडले. त्यातूनच त्यांचे ‘ वंगचित्रे ‘ हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकातीलच एक प्रसंग आणि हे एक व्यक्तीचित्र आहे.
आपल्या शांतिनिकेतनमधील वास्तव्यात पुलंनी तिथली भाषा, संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केल्याशिवाय तेथील संस्कृती खऱ्या अर्थाने कळत नाही. पुलंनी शांतिनिकेतनमध्ये बराच काळ वास्तव्य केले. त्यातूनच त्यांची ‘ मुक्काम शांतिनिकेतन ‘ आणि ‘ वंगचित्रे ‘ ही पुस्तके जन्माला आली. अशाच एका प्रसंगी ते शांतीनिकेतनमध्ये हिंडत असताना कलाभवनातल्या बंगलीवजा वसतिगृहातल्या छतावर त्यांनी सुंदर म्युरल्स पाहिली. ती पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या सलील यांना त्यांनी त्याबद्दल विचारले. तेव्हा सलील यांनी ती म्युरल्स विनोद – दांनी काढली असे सांगितले. त्या उत्सुकतेपोटी पुलं आणि सलील विनोद दा यांना भेटायला गेले आणि मग त्या प्रसंगाचे सजीव चित्रणच पुलं यांनी केले आहे. तो प्रसंग आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पुलंच्या शब्दांमध्ये आहे.
विनोद दा ज्या वातावरणात बसले होते, त्याचं हे बोलकं चित्रण त्यांच्याच शब्दात…!
“अंधारातच दार उघडले गेले. हा चित्रकार अंधारात का बसला होता ते मला कळेना. तेवढ्यात एक मोलकरीण आली आणि तिने बटण ओढून दिवा लावला. काळोखातल्या रंगमंचावर प्रकाश पडावा आणि एकदम अनपेक्षित अशा प्रकारच्या देखाव्याने चकित व्हावे तसे मला झाले. एका ईझीचेअरवर काळा चष्मा घालून एक अतिशय सौम्यदर्शन वृद्ध गृहस्थ बसले होते. बराच वेळ ते तिथे बसलेले असावेत. समोर एक लहानशी तिपाई होती. तिच्यावर वीत सव्वावीत उंचीची एक मातीची मूर्ती घडत होती. बाजूला मातीचा गोळा होता. त्यामुळे अंधारातच ही शिल्पकलेची आराधना चाललेली असावी. भिंतीवर नाना प्रकारची चित्रे होती. आणि फडताळ पुस्तकांनी भरलेले होते…”
हे गृहस्थ म्हणजेच सुंदर म्युरल्स तयार करणारे सुंदर चित्रे काढणारे विनोद दा. त्यांनी सलील आणि पुलंची चौकशी केली. त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात…
“मी त्याच्याकडे पाहण्यातच गर्क होतो. किती विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्व ! बोलणं तर खडीसाखरेसारखं. तप: पूत चेहरा. डोक्यावर पांढरे शुभ्र केस, सडसडीत देहयष्टी. अंगात शुभ्र कुडता, पायजमा. दोन-चार मिनिटातच मला त्यांच्या अंधत्वाचा विसर पडला. मी सहज त्यांनी केलेल्या म्युरल्सविषयी बोलणे काढले.
विनोद दा म्हणाले, ‘ खूप वर्षे झाली त्या म्युरल्सला. त्यावेळी थोडे थोडे दिसत असे मला. ‘ मग मला कळले की चित्रकलेचे वेड आणि डोळ्यांचे अधूपण घेऊनच विनोद दांनी जगात प्रवेश केला. कागदाच्या अगदी जवळ डोळे नेल्याशिवाय त्यांना दिसत नव्हते. त्याकाळी कुठलीही चित्रशाळा त्यांना प्रवेश देत नव्हती. तसल्या त्या अधूदृष्टीच्या बालचित्रकाराला सरकारी चित्र शाळेचे दरवाजे बंद होते.”
येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची महानता आणि द्रष्टेपण आपल्याला कळते. ” गुरुदेवांनी या मुलाची प्रतिभा पाहिली आणि त्याला जवळ घेतले. चित्रशाळा फक्त नियम जाणत होत्या. टागोरांना या मुलाच्या अधू डोळ्यातले तेज दिसत होते. त्यांनी त्याला रंग आणून दिले, कुंचले दिले आणि सांगितले,’ काढ तुला हवी तेवढी चित्रे. ‘ गुरुदेवांचा आधार लाभला नसता तर कुठली चित्रे काढणार होतो मी…! असे भावपूर्ण उद्गार विनोद दांनी काढले. “
त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात,” सत्तरीच्या घरातल्या वृद्धाकडून ते वाक्य ऐकताना काळजाचे पाणी झाले. सहा चौरस इंचाहून एका दमात अधिक पृष्ठभाग दिसू न शकणारे विनोद दा. त्यांनी मुकाबला घेतला तो विस्तीर्ण भिंतीशी त्या विस्ताराच्या इंचा इंचात डोळा घालून त्यांनी भव्य म्युरल्स उभे केले. सलीलच्या वडिलांनीच त्यांना लहानपणी गुरुदेवांपुढे आणल्यामुळे घोष कुटुंबावर त्यांचा विशेष लोभ. अनेक गोष्टी सांगत होते. मात्र गोष्टीवेल्हाळपणा नव्हता. बोलणे ही लोभस असून रेखीव. विनोद दा म्हणजे शांतिनिकेतनातल्या गेल्या ३०/४० वर्षातल्या कलासाधनेचा चालता बोलता इतिहास आहे. केवळ चित्रकलाच नव्हे तर महाभारत, रामायण या महाकाव्यांचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला आहे. शांतिनिकेतनातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी ऐकताना वाटत होते की केवळ कुंचल्यानेच नव्हे तर लेखणीने देखील हा माणूस काय सुरेख व्यक्तिचित्रे काढू शकला असता !”
“पूर्वी डोळे कागदाजवळ नेऊन का होईना पण दिसत होते. आता संपूर्ण अंधत्व. पण या अंधारात त्यांच्या प्रज्ञाचक्षुंपुढे आजही रंगरेषांचे विलास चालू असतात. आता त्यांनी शिल्पकलेशी मैत्री जमवली आहे. स्पर्शातून आकाराचा अंदाज घेत छोटी छोटी मृत्तिका शिल्पे घडवीत असत. दिवस आणि रात्र यांच्यात आता अभेद आहे. आता रात्र झाल्यावर झोपलेच पाहिजे ही सक्ती नाही आणि दिवसा काम केलेच पाहिजे ही देखील सक्ती नाही. आता मानू ती वेळ !”
पुढे एके दिवशी पुलंना कलाभवनाच्या वाटेवर विद्यार्थ्यांचा एक घोळका आढळला. ती मुले रंगसाहित्य घेऊन धावपळ करीत होती. पुलंनी थांबून पाहिले तर एका भिंतीपाशी विनोद दा उभे. भिंत हाताने चाचपीत म्हणायचे, ‘ इथे. ‘ बंगालीत विद्यार्थ्यांना छात्रच म्हणतात. मग एखादा छात्र किंवा छात्री तिथे वर्तमानपत्राचा एक कपटा चिकटवीत असे. पुन्हा विनोद दा भिंत चाचपीत म्हणायचे, ‘ इथे ‘. मग तिथे एक कपटा. असे काही कपटे चिकटवल्यावर विनोद दांनी हाताने त्या जागांना स्पर्श केला. एका शिष्याकडून खडू मागून घेतला आणि भिंतीवरच्या त्या कपट्यांना स्पर्श करीत सरसर सरसर रेखाकृती काढायला सुरुवात केली. केवळ स्पर्शाच्या आधाराने रेखली जाणारी ती चित्रे मुले मुली श्वास कोंडून पाहत होती. रेषा काढणाऱ्या त्या हातांना केवळ तपस्येतूनच मिळणाऱ्या आत्मविश्वासाचे वरदान होते. रेषा कुठे कापत नव्हती. थरथरत नव्हती. धीट रेषा, हातातले सामर्थ्य दाखवणाऱ्या रेषा. मनात रंगलेला चित्रपट इतका स्पष्ट होता की तो भिंतीवर रेखताना त्या भिंतीकडे डोळ्यांना दिसत असले तरी पाहण्याची गरज नसावी. तयार सतारियाची बोटे जशी पडद्याकडे न पाहता त्याच जागी पडतात त्याप्रमाणे त्या चित्राविषयी च्या चतु:सीमा स्पर्शून झाल्यावर प्रमाणबद्धतेत सुताइतकाही फरक नव्हता. लता मंगेशकरला जसे चेष्टेत सुद्धा बेसूर होणे अशक्य तसे विनोद दांच्या बोटांना प्रमाणहीन रेखाटन अशक्य. हाताच्या त्या हमखास हालचालीकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्या चित्रबंधाकडे मी अवाक् होऊन पाहत होतो. डोळ्यापुढे सदैव अंधाराचा पट असताना प्रकाशाची उपासना करणारा हा चित्रकार – चित्रकार कसला ? चित्रयोगी ! वार्धक्य, अंधत्व यांना परौते सरा असे म्हणणारा ! नव्या नव्या कल्पनांचे स्वागत करणारा ! पुढे पुलं म्हणतात, ” रवींद्रनाथांनी आपल्या बगीच्यात अशी ही अलौकिक रोपटी आणून लावली. त्याचे किती सुंदर वृक्ष झाले ! त्यातले आज काळाने काही नष्ट केले. पण जे काही आहेत त्यांच्या सावलीला मात्र पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. “
धन्य आहेत ते अशी सुंदर शब्दचित्रे रेखाटणारे पुलं, सुंदर म्युरल्स आणि चित्रे काढणारे विनोद दा आणि अशा व्यक्तींच्या जीवनाला आकार देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. या सर्वांना मनोमन प्रणाम !
पण, सौभाग्य म्हणजे काय हे तिला विचारा जे तिच्याकडून हिरवलं जात…
“स्त्रीचं सौंदर्य म्हणजे कपाळावरील कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैंजण, बोटात जोडवी “…
किती खुलेलं रूप असतं रंग कोणताही असो तिचं सौंदर्य उठून दिसतं…
“कसं कळेल आजच्या पिढीला. का पूर्वीच्या आई सारखं परंपरेच महत्व पटवल्या जात नाही “…
हातात बांगडी नसते, आई म्हणते माझ्या मुलीला बांगड्या आवडतं नाही. माझ्या मुलीला मी बंधनात अडकवलं नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे तू जग असं शिकवलं, अग बाई पण,
हे बंधन नाही सौंदर्य आहे.
“शिकली मोठी झाली मोठ्या नोकरीला लागली म्हणजे तू स्त्री म्हणून बदलत नाही स्त्रीचं असते ना, मग सौभाग्य अलंकार घालून सौंदर्य वाढव ना…
ड्रेस मध्ये कंफर्टेबल वाटतं, हातात बंगडया असल्यामुळे काम सुचत नाही. हे ऐकायला मिळतं कारण खूप आहेत… मूर्ख आहेत स्वतःच सौंदर्य स्वतः खराब करून पुरुषां सारखं रहात आहेत..
असो, ” ज्या स्त्रीचं सौंदर्य गेलं तिला किती त्रास होतो.
“तिचा जेंव्हा पती जातो, तिला “विधवा” म्हणून हिणवलं जातं…
तिचा राग, राग केला जातो, तिला शुभकार्याला बोलवलं जातं नाही, , तिला किती वेदना होत असतील?
याचा विचार कुणी करत का?
“खरी ती विधवा नसते तर “अर्ध मेलेली असते”… कारण, तिचं हृदय मेलेलं असत तिने तिचं हृदय लग्नातच पतीला दिलेलं असतं, पती गेल्यावर ती मरते पतीचं हृदय तिच्यात धडधड करत असतं..
पतीच्या मातीच्या वेळी तिचं सौंदर्य काढून घेतल्या जातं यात तिचा काय दोष असतो…
किती वेदना होत असतील जेंव्हा मंगळसूत्र काढल्या जातं…
पायातील जोडवी काढले जातात…
हातातील बांगड्या वाढवल्या जातात…
आणि हे सौंदर्य काढून घेणारी स्त्रीचं असते…
आई, बहीण, नणंद किंवा अजून कोणी विधवा…
अशावेळी सौंदर्य काढून घेता ना मग सौभाग्य कशात आहे ते वेळेत का शिकवत नाही…
बांगडी ची किंमत कळते जेंव्हा स्मशानात हातातील बांगडी काढून घेतली जाते…
जोडव्याची किंमत कळते जेंव्हा जोडवी पतीच्या चितेत फेकली जातात.
मंगळसूत्रची किंमत कळते जेंव्हा एवढ्या गर्दीत ते काढून घेतलं जातं…
“तेंव्हाच स्त्रीची खूप मोठी हार असते जरी ती मोठी क्लासवन असली तरीही”
लाखो रुपये खर्चून लग्न लावून देता पण फॅशन च्या नावाखाली..
आभूषण नको असतात म्हणून आम्हाला आवडतं नाही सांगत बंधन नको असतं…
“त्याचं अभूषणांच महत्व आई ने पटवून दिले तर स्त्रीचं खरं सौंदर्य जपता येईल असं वाटत नाही का?
स्त्रीच सौंदर्य साडीतच आहे कशीही असली तरी सुदंर दिसते…
“पती आहे तोपर्यंत स्त्री जिवंत असते,,,, तेंव्हाच जगून घ्या नंतर काही उपयोग नाही….
हातात बांगड्या, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी कुंकू,,,,,
नंतर कितीही घालावं वाटलं तरी घालू शकणार नाही…
वेळीच महत्व समजून घ्या,,, शिक्षण परंपरा हिसकावून घेत आहे… वेळीच सावरा… तुमचं सौंदर्य जपा…
सरासरी हातात बांगडी घालायची नाही किंवा गोट घालायचे आम्हाला बांगडी आवडतं नाही असं म्हणतात,,,,, त्यावेळी सांगावं वाटतं अग बाई हीच बांगडी हातातून काढतात तेंव्हा कळतं,,, पण वेळ गेलेली असते….
जेंव्हा हळदी कुंकू कार्यक्रम असतो आपल्याचं घरातील सुवासिनी हळदी कुंकू करतात तेंव्हा हळदी कुंकवाच महत्व काय असतं ते कळतं…
विधवा स्त्रीच्या हृदयात तिच्या पतीचं हृदय धडधड करत असतं मग तिने का नाही तिच्या पतीच्या फोटोला वसा अर्पण करायचा? तिच्या हृदयात पती कायम जिवंत असतो मग तिला का नकारायचं…
“वेळीच सावरा फॅशन च्या नावाखाली सुवासिनी म्हणून जगायचं विसरून चालणार नाही…
बाहेरील सौंदर्यापेक्षा आतील सौंदर्यला महत्व दया परंपरा जपा,,,, सौंदर्य टिकवा….
सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे ना, मला खरं तर “जादू तेरी नजर” या मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ज्या कलाकारांवर ते चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आजतागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही. पण असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल! असो!
वाचकहो आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्याइतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र १००% खरंय. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल!
या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने (लेख पूर्ण वाचणार असाल तर) कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे!
मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे आपल्या दादाने किंवा ताईने त्याच्या किंवा तिच्या मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे! काय, बरोबर नां मंडळी?
लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी!
आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात. हात चालाखी हा सुद्धा वेगळ्या अर्थाने जादूचाच एखादा प्रकार आहे असं या क्षेत्रातले काही जाणकार म्हणतात. अर्थात त्यांना कधीतरी ट्रेन मधून प्रवास करतांना, बहुदा पगाराच्या दिवशी त्यांचा खिसा कोणी सराईत चोराने त्याचे हस्तलाघव दाखवून रिकामा केल्यामुळे ते तसं म्हणत असावेत. कारण घरी आल्यावर आपलं पाकीट गेलं आहे किंवा खिसा कापला गेला हे त्या माणसाला कळतं हे त्रिवार सत्य आहे! त्यामुळे त्या अदृश्य चोराच्या हातचालाखीला (कां स्वतःच्या बावळटपणाला?) तो वेगळ्या अर्थाने हाताच्या जादूची अर्थात हातचालाखीची उपमा देत असावा. मला स्वतःला जादू मधली तर सोडाच, पण साधी सुधी सुद्धा चलाखी कधी बहात्तर वर्ष्याच्या आयुष्यात जमली नाही! म्हणून मी कधी कधी स्वतःच स्वतःला (अर्थात मनातल्या मनात) फक्त चलाख म्हणून घेतो आणि स्वतःची पाठ, पाठीला हात पोहचत नाही म्हणून पुन्हा मनातल्या मनात थोपटून स्वतःचे समाधान करून घेतो.
आजच्या विज्ञानाने प्रगती करून AI नामक जो महान सर्वशक्तिमान असा जादूगार जन्माला घातला आहे त्याचे एक एक सर्वच क्षेत्रातले जादूचे प्रयोग बघून, मला पुढच्या पिढीची खरंच काळजी वाटायला लागली आहे. अर्थात जसा प्रत्येक नवीन शोधाचा (उधा. अणुशक्ती) चांगला आणि वाईट उपयोग करता येतो, तसा या AIच्या जादूचा सगळे जग चांगला उपयोग करू लागेल तो सुदिन म्हणायचा! तसेच या AIच्या जादूच्या प्रयोगावर आपण किती विश्वास ठेवायचा हे ज्याच त्यानं स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, डोळे आणि कान उघडे ठेवून ठरवावं असं मला वाटतं.
माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0. 001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणं अथवा लिहिणं हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?
मंडळी शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे! तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा!
(पूर्वसूत्र- दिवसभराची सगळी कामं मार्गी लावून खूप थकल्यानंतर संध्याकाळी उशीरा मी वखरेसाहेबांच्या केबिनमधे गेलो ते उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंना भेटायला जाईन तेव्हा तिथं जे सांगायचं ते मनाशी ठरवूनच. पण… मी जे ठरवलं होतं ते वखरेसाहेबांना योग्य वाटेल? कारण ते अंमलात आणायचं तर त्याची थोडी झळ प्रभूदेसाईनाही लागणार होतीच. ते वखरेसाहेबांना योग्य वाटलं नाही तर? …)
“सर, उद्या सकाळी सहस्त्रबुध्देंना ठरल्याप्रमाणे भेटायला जाईन तेव्हा त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण प्रभूदेसाईंच्या विरुद्ध नेमकी काय कार्यवाही करणार आहोत हे त्यांना सांगावं लागेल, जेणेकरून त्यांच्या तक्रारीची आपण निदान दखल तरी घेतलीय असं होईल
त्याशिवाय… “
वखरेसाहेब विचारात पडल्याचे जाणवताच मी क्षणभर स्तब्ध झालो.
“तक्रारीबाबत प्रभूदेसाईंचं नेमकं काय म्हणणं आहे ते सांगायची निदान एक तरी संधी त्यांना द्यायला हवी ना पण? ” वखरेसाहेब म्हणाले.
” हो. हे मलाही मान्य आहे. पण आता ती वेळ निघून गेलीय. आपल्यापुरतं बोलायचं तर या न वर्षात त्यांना तशी संधीच दिली नसेल असं मला नाही वाटत. फाईलवर जरी तसं दिसत नसलं तरी त्यांना याची पूर्वकल्पना होती हे नक्की. शिवाय या संदर्भातलं सगळं प्रोसिजर तंतोतंत पूर्ण करण्याइतका वेळ, हा विषय तातडीने मिटवायचा तर आपल्याजवळ नाहीये. त्यातूनही आपण आत्ता त्यांना लेखी जाब विचारला तर ते त्याला आक्षेपही घेऊ शकतील. तक्रारीत नमूद केलेलं सगळं खोटं आहे असंही म्हणू शकतील. आणि मग तक्रार मागे घेण्यासंबंधीचे सगळेच मार्ग आपणच आपल्या हाताने बंद केल्यासारखे होईल. आज या क्षणी निकड आहे ती सहस्त्रबुद्धे आजोबांनी ती तक्रार लेखी मागे घेण्याची. “
“पण त्यामुळे ऑफिसर्स युनियनची यात इन्व्हाॅलमेंट झाली तर हे प्रकरण अधिकच चिघळेल त्याचं काय? “
“तुम्ही इथे डी. जी. एम् असताना प्रभूदेसाई युनियन मार्फत दाद मागतील असं मला नाही वाटत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी तुम्ही त्यांना समजावून सांगितलंत तर प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तरी ते तुमचं ऐकतील असं मला वाटतं. ” मी म्हणालो. ते थोडे विचारात पडले.
“ते तर आहेच. बरं मग तुम्ही सहस्त्रबुध्देंना काय सांगायचं ठरवलंय? ” त्यांनी विचारलं.
प्रश्न थेट होता. माझ्याजवळ उत्तरही होतं. पण तरीही सहस्त्रबुद्धेंचा अंदाज घेतल्याशिवाय आपली पानं आत्ताच उघड करायला नको असं मला वाटलं. कारण त्याला अनुसरून वखरेसाहेबांनी प्रभूदेसाईंना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याला प्रभूदेसाईंनी नाराजी दाखवून विरोध केला तर? विषाची परीक्षा न बघता याक्षणी मौन पाळणंच मला योग्य वाटलं.
“सहस्त्रबुद्धेंचा कल पाहून जे प्रॅक्टिकल असेल तेच करायचं तरीही कुठल्याही परिस्थितीत टोकाची तडजोड करायची नाही एवढंच मी ठरवलंय. ” मी म्हणालो, “आपला हात दगडाखाली सापडल्याचं जाणवून न देता सहस्त्रबुध्देंना कसं समजवायचं ते मी पाहिन. ” मी आश्वासन दिलं. आता यापुढं सारासार विचार करून आपल्या अधिकारात जे शक्य आहे ते करून मोकळं व्हायचं हे मनोमन ठरवून टाकलं आणि हा विषय तिथंच संपवला.
आता उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंच्या घरी जाऊ तेव्हा ‘त्या’ला साक्षी ठेवून सारासार विचार करून जे योग्य वाटेल ते करायचे हे ठरवल्यामुळे त्या रात्री मन अस्वस्थ नव्हतं. तरीही शांत झोप लागली नाहीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहस्त्रबुद्धे आजोबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं तेव्हा मात्र काल सहजसोपं वाटणारं सगळं अवघडच वाटलं क्षणभर.
“आजोबा,… ” मी शब्द जुळवू लागलो.. “काल साहेबांशी सगळी चर्चा करून मी आलोय. स्वत:शी प्रामाणिक राहून जे करणे शक्य आहे ते करायचं असं आम्ही ठरवलंय. ही तक्रार लेखी स्वरूपात करण्यामागची तुमची भावना मी समजू शकतो. प्रभूदेसाई यांच्याकडून झालेला तुमचा अपमान आणि अनादर माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक आणि असमर्थनीय आहे. खरंतर या चुकीला क्षमा नाही असंच मला वाटतं. तरीही कोणताही निर्णय घेताना भावनेपेक्षा त्यासंबंधीचे नियम आणि व्यावहारिकता याच गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे जे मला टाळता येणार नाही. निर्णय घ्यायची जबाबदारी पार पडताना आज मी या कात्रीत सापडलोय.
“मला कल्पना आहे याची. तुमच्या मर्यादेत राहून जे शक्य ते तुम्ही नक्की कराल याबद्दल मला खात्री आहे. तरीही माझी ही तक्रार तीन वर्षे दाबून कां ठेवली गेली होती? आणि याला जबाबदार कोण? या माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मात्र मला कधीच मिळणार नाहीयेत. ” आजोबा म्हणाले. त्यांचा आवाज भरून आला होता.
“याचं उत्तरही आहे माझ्याजवळ. पण त्याबाबतचे कोणतेही पुरावे माझ्याजवळ नसताना मी काही बोलणं कदाचित योग्य होणार नाही. तरीही तुमच्यासमोर याबाबतचे माझे विचार मोकळेपणाने व्यक्त करणं अनाठायी नाही असंच मला वाटतं. खरं सांगायचं तर प्रमोशननंतर मी इथं चार्ज घेऊन फक्त दोन आठवडेच तर होतायत. तुम्ही आणि प्रभूदेसाई दोघेही तोपर्यंत मला अनोळखीच होतात. यातली प्रभूदेसाईंची बाजू कोणत्याही अँगलने विचार केला तरी मला समर्थनीय वाटत नाही हे खरंच. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ प्लीज पण
प्रभूदेसाई इथे तुम्हाला भेटायला आले असताना तुम्ही त्यांना आतही न घेता हाकलून लावलं होतंत. बँकेने तुम्हाला समक्ष भेटून तुमची बाजू समजून सांगण्याचं लेखी आवाहन केलेलं असूनसुद्धा तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नव्हतात. या कम्युनिकेशन गॅपमुळे तुमच्याबाबत प्रभूदेसाईंकडून समजलेली माहितीच तत्कालीन अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरल्याने यातलं गांभीर्य त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकलेलं नसावं कदाचित. ”
“त्या प्रभूदेसाईला समोर पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तरीही मी त्याला हुसकून नव्हतं लावलं. त्याने माझे पाय धरून माफी मागावी अशीही माझी अपेक्षा नव्हती. म्हणूनच ‘तुला जे कांही सांगायचं ते तुझ्या बँकेला सांग. ‘ असं म्हणून मी त्याला परत जायला सांगितलं. दुसरी गोष्ट मी बँकेत जाऊन माझी बाजू समजावून सांगण्याची. बँकेच्या कामाच्या पद्धतीनुसार ते योग्य असेलही कदाचित किंवा त्या लोकांनी शोधलेली ती तात्पुरती पळवाटही असेल. कारण माझी बाजू खरंच समजून घ्यायची त्यांची इच्छा असती तर तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याने मला येऊन भेटणं आणि माझी बाजू समजून घेणं जास्त योग्य आणि आवश्यक होतं, कीं असे कागदी घोडे नाचवत राहून माझ्यासारख्या वृद्ध ग्राहकाला न्याय मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे घालायला लावणं संयुक्तिक होतं? तुम्ही गेले चार दिवस इथं येताच आहात ना? अतिशय समंजसपणे, पोटतिडकीने बोलता आहातच ना माझ्याशी? ”
एम्. डी. व्हिजिटमुळं हा विषय आज आलाय तसा ऐरणीवर आला नसता तर? मी आलो असतो इथं? आवर्जून भेटलो असतो यांना? … मलाच प्रश्न पडला. सहस्त्रबुद्धे आजोबांच्या रूपात समोर बसून इथं ‘तो’च मला प्रश्न विचारतोय असं वाटून गेलं. आता ‘त्या’च्यापासून काय लपवायचं?
“खरं सांगू? एरवी हा तुम्ही केलेल्या तक्रारीचा प्रश्न मी चार्ज घेतल्याबरोबर असा तातडीने माझ्या टेबलवर आलाच नसता कदाचित. पण याच दरम्यान एम्. डी. व्हिजिट झाली आणि त्यानिमित्ताने हाच नव्हे तर इतर अनेक विषय ऐरणीवर आले. योगायोगाने आमचे डी. जी. एम् पुढच्या आठवड्यात मीटिंगसाठी सेंट्रल ऑफिसला जाणार आहेत. त्यामुळेच त्यानिमित्ताने अशा प्रलंबित बाबीही तातडीने हातावेगळ्या करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मी या गोष्टीला प्राधान्य देऊन गेले चार दिवस तुमच्याकडे येतोय. यात माझा मोठेपणा किंवा कर्तृत्त्व कांहीच नाहीय. हा फक्त माझ्या कर्तव्याचा भाग आहे एक. ते कर्तव्य मी मनापासून निभावतोय एवढंच. तरीही तुमच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच तुमच्याकडून जे समजलं त्यामुळे तुमच्यावरचा अन्याय दूर करण्याची निकड मला तीव्रतेने जाणवली हेही तितकंच खरं.. ” मी मोकळेपणानं, कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. आजोबा शांतपणे ऐकत होते. आता हा धागा असाच अधांतरी सोडावासा वाटेना.
“आता पुन्हा शून्यातून सुरुवात करून प्रभूदेसाईंकडून त्यांचं म्हणणं लेखी मागवायचं, त्याची शहानिशा करायची, त्यांचं म्हणणं पटलं नाही तर योग्य कारणं देऊन ते स्वीकारता येत नसल्याचं त्यांना कळवायचं आणि या सगळ्या सोपस्कारांत हे घोंगडं असंच प्रदीर्घकाळ आहे तसंच राहू द्यायचं कां? तसं जरी केलं तरी त्यातून निष्पन्न काय होणार? यात आर्थिक फसवणूक किंवा अपहार नसल्याने जास्तीत जास्त शिक्षा काय तर त्यांना योग्य वागणुकीबद्दल लेखी समज देणे. त्यानंतरही स्वतःची चूक नाकारून ते स्वतःचं खोटं समर्थनही करू शकतील ते वेगळंच. अशा परिस्थितीत त्यांनी तुम्हाला दिलेली वागणूक योग्य नसल्याची जाणीव त्यांना करून देऊन बँक ग्राहकांशी वागता बोलताना यापुढे योग्य दक्षता घेण्याची एक संधी देणारा ‘अॅडवायजरी मेमो’ त्यांना तातडीने देऊन प्रश्न इथेच संपवावा हा एकमेव मार्ग मला या परिस्थितीत योग्य वाटतो. हे अर्थातच तुमचं समाधान होणार असेल तरच. “
सहस्त्रबुद्धे आजोबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. उठून ते लगबगीने आत गेले. ते हे सगळं कसं स्वीकारतील हेच कळत नव्हतं. यापुढं करण्यासारखं माझ्या हातात आता कांही शिल्लकही नव्हतं. आता जे होईल ते स्वीकारायचं आणि इथून निघून जायचं असा विचार करून मी बसून होतो. तेवढ्यांत आजोबा बाहेर आले आणि त्यांच्या हातातली पत्राची घडी शांतपणे माझ्याकडे दिली.
“काय आहे हे? “
“तुम्ही काय करू शकाल ते तुमचं सांगून झालं, आता मी काय करायचं ठरवलंय ते सांगतो. हे माझं पत्र. वाचून तरी बघा ” ते म्हणाले. मी घडी उघडून पत्रावरून नजर फिरवली आणि आश्चर्याने आजोबांकडे अविश्वासाने पहातच राहिलो. मला काय बोलावं तेच सुचेना.
या अकल्पितावर माझा अजूनही विश्वासच बसत नव्हता. माझ्या दृष्टीने तरी तो त्या क्षणीच नव्हे तर आजही एक चमत्कारच वाटतोय मला!
“आजोबा, तुम्ही हे.. हे सगळं खरंच मनापासून करताय ना? “
“असा प्रश्न कां पडावा तुम्हाला? त्या पत्रावरची तारीख तरी बघा.. ” ते म्हणाले.
तारीख दोन दिवसांपूर्वीची होती!
“त्यादिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना, प्रभूदेसाईना बँकेच्या नियमात बसेल तीच शिक्षा करणं आम्हाला शक्य होईल जे सर्वार्थाने तुम्हाला न्याय देणारं वाटेलंच असं नाही म्हणून? शिवाय या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली अशी एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असतेच. ती देवाची यंत्रणा! ‘तो’ पहात असतो सगळं आणि त्याच्या हातातल्या आवाज नसणाऱ्या काठीने तो योग्य न्यायही करत असतो असंही म्हणाला होतात तुम्ही. मला पटलं होतं ते. त्या प्रभूदेसाईला आता काय शिक्षा करायची ते मी त्या दिवशीच माझ्या देवावर सोपवून मोकळा झालोय. बँकेने उशीरा कां होईना माझ्या तक्रारीची योग्य दखल घेतल्याने माझी तक्रार मी मागे घेत असल्याचं हे पत्रही मी त्याच दिवशी लिहून ठेवलं होतं. आता तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करालच. बाकी सगळं दत्त महाराज पाहून घेतील.. ” ते शांतपणे म्हणाले.
माझा विश्वासच बसेना.
मी भारावलेल्या अवस्थेत थक्क होऊन पहात राहिलो फक्त…!!