मराठी साहित्य – विविधा ☆ सामान्यातील असामान्य…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ सामान्यातील असामान्य… ☆ सौ शालिनी जोशी

सालूमरादा थियाक्का यांचे १५/११/२५ रोजी निधन झाले. त्यानिमित्त विशेष लेख:

सामान्यांतील असामान्य

मुख्यमंत्र्यांचा एक लाख झाडे लावण्याचा संकल्प, वनराई संस्थेने माळरानावरती ६००० झाडे लावली, तर कोणी आपल्या ६१ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त सहाशे दहा तुळशीची रोपे भेट म्हणून दिली. अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. अर्थात यातील किती झाडे जगली, याची बातमी कधीच होत नाही, ही गोष्ट वेगळी. आरंभशूर सगळेच असतात. पण नंतर लागणारे सातत्य, कष्ट विसरतात. हे सांगण्याचे कारण मध्यंतरी वाचनात आलेली एक बातमी. नुसती बातमी नव्हे तर सत्यकथा आहे. घडली आहे. घडत आहे आणि पुढे घडत राहण्याचे शाश्वती देणारा मार्ग दाखवणारी आहे. धडा देणारी स्त्री आहे सालूमरादा थियाक्का.

एका निरक्षर घरात जन्माला आली. मोलमजुरी करणारा पती मिळाला. मूलबाळ झालं नाही. पण या दुःखाचा कोणताही बाऊ न करता घराजवळील हायवेवर या माऊलीने ३८५ पेक्षा जास्त वडाची झाडे लावली आहेत. नवऱ्याची ही साथ मिळाली. रणरणत्या उन्हातही लोकांना सावली देत ही झाडे डौलाने उभी आहेत. झाड लावून त्यांचे पोटच्या मुलांप्रमाणे दोघांनी काळजी घेतली. त्या सगळ्या झाडांची माता ती झाली. एवढेच नव्हे तर आज पर्यंतच्या आयुष्यात ८००० झाडे तिने लावली. मुलबाळ नाही या दुःखात रडत न राहता ८००० पेक्षा जास्त ठणठणीत आणि सुस्थितीत असलेल्या समाज उपयोगी मुलांची आईच ती झाली. १०० मुले असलेल्या गांधारी पेक्षाही ती श्रेष्ठ ठरली.

आजचे तिचे वय विचारले तर १०६ वर्षे पूर्ण. गेले ८० वर्षे सतत ती वृक्षारोपणचे काम करते आहे. पर्यावरण, हरित परिणाम, प्रदूषण, ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादी कोणत्याच गोष्टीशी तिचे कोणतेच देणेघेणे नाही. तरी निष्ठेने तिने हे काम केले. तिला कल्पनाही नसेल, ही झाडे पुढे कित्येक पिढ्यांचा आधार होणार आहेत. निवडलेली झालेली वडाची, भरपूर ऑक्सिजन देणारी आणि कायम हिरवीगार असणारी, पारंब्यातून पुनर्लागवड करणारी आहेत. एकदा रुजली की त्यांची काहीही सेवा करावी लागत नाही. रामाने सेतुबांधताना छोट्या खारीने आपल्या वाटा उचलला. त्यासाठी तिला कोणतेही आमंत्रण द्यावे लागले नाही, की मोबदला द्यावा लागला नाही. तसेच आपले काम निरपेक्ष बुद्धीने करून लोकांपुढे आदर्श ठेवणारी थियाक्का. अक्षर ओळख नाही म्हणून निरक्षर असते तरी सुशिक्षितच म्हटली पाहिजे. कृतीतून तिने दाखवून दिले की वय हा एक आकडा असतो. आयुष्य किती जगता यापेक्षा कसं जगता याला महत्त्व आहे. थियाक्काने दोन्ही साधलं.

आपला सत्कार होईल बक्षीस मिळेल, याची काही तिला जाणीवही नव्हती. आणि अचानक भारत सरकारचे निमंत्रण आले. काय वाटले असेल तिला, ती बावरली असेल. तिला नकोसे वाटली असेल. पण लोकाग्रहास्तव तिला ते स्वीकारावे लागले असेल. भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित केले. खरंतर भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराचाच मान वाढवला. कार्यक्रमाचे वेळी राष्ट्रपतींचे डोक्यावर तिने मायेने हात फिरवला. तो दिवस होता १६ मार्च २०१९. राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद.

नवीन इकोसिस्टीम जन्माला घालणारी ती खरी कर्मयोगी. पोटा पाण्यापुरती मोलमजुरी करून झाडांना जगण्याचे काम तिने निस्वार्थपणे केले. कर्मयोग काय असतं दाखवून दिले. शेतात काम करणाऱ्या बहिणाबाई चौधरीनी आपल्या अहिराणी भाषेतील काव्यातून ज्ञानयोग सांगितला. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्या ज्ञानयोगी ठरल्या. चोखा महाराच्या पत्नीने सोयराने नवऱ्याच्या ग्राम स्वच्छतेच्या शूद्राच्या व्यवसायात मदत करून भक्तियोग साधला. अनेक अभंग तिने लिहिले. प्रत्यक्ष भेटूरायाचे दर्शन कधीही झाले नाही. तरी समाधानी राहिली. अशा या स्त्रिया आणखीही आहेत आणि होतील. पण सामान्यात निर्माण होऊन असामान्य ठरल्या. सामान्यांच्या मार्गदर्शक झाल्या.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुमचा बॉस हरमनप्रीत कौरसारखा असेल तर? – मूळ लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?  विविधा ?

☆ तुमचा बॉस हरमनप्रीत कौरसारखा असेल तर? – मूळ लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆

२ नोव्हेंबरला भारताने इतिहास घडवला. २०२५च्या विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल जिंकून.

प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण. स्त्रियांच्या क्रीडाक्षेत्रातील ऐतिहासिक क्षण.

फटाके, जयघोष आणि तिरंगी सोहळ्यावर मात केली एका छोट्याशा कृतीने.

संघाच्या विजययात्रेच्या वेळी कप्तान हरमनप्रीतने एक असामान्य गोष्ट केली – तिने दोन ख्यातनाम महिला क्रिकेटपटूंना आमंत्रित केले. झूलन गोस्वामी आणि मिताली राज या त्या दोन निवृत्त दिग्गज क्रिकेटपटू. त्यांच्या हातात विश्वचषक देऊन हरमनप्रीतने त्यांनाही विजययात्रेत सामील करून घेतलं.

या एकाच कृतीने नेतृत्वसंस्कृतीचं एक उत्तम उदाहरण जगासमोर सादर केलं.

या एका साध्या कृतीमुळे तिचे नेतृत्वगुण झळाळून उठले.

हरमनप्रीतने त्यांच्याकडे ‘भूतकाळ’ म्हणून नाही, तर ‘पाया’ म्हणून बघितलं. त्यांनीच तर या पिढीला स्वप्नं बघायला उद्युक्त केलं होतं.

त्यांना आमंत्रित करून तिने जे उदाहरण घालून दिलं, त्यामुळे तिची उंची कमी झाली नाही, उलट कित्येक पटींनी वाढली. कारण स्वतःला सुरक्षित समजणारा नेताच आपल्या प्रकाशझोतात इतरांना सहभागी करून घेतो.

आणि हे करून तिने स्वतःच्या संघाला मौल्यवान देणगी दिली – विश्वास, नम्रता आणि संघवृत्तीची संस्कृती.

आता, आपण क्रिकेट थोडं बाजूला ठेवून आपल्या कामाच्या जागेकडे वळूया.

आजकाल बऱ्याच ऑफिसांतील नेते असुरक्षित कप्तानाप्रमाणे वागतात.

ते इतरांचे योगदान कमी लेखतात. त्यांना मान्यता दिलीच तर हातचं राखून देतात. एखादा चांगली कामगिरी करतोय, असं वाटलं, तर त्यांना आपलं महत्त्व कमी होण्याची भीती वाटते.

आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं, की ‘आपली टीम उत्साही, कार्यप्रवृत्त का नाही? ‘

उत्तर सोपं आहे. कार्यसंस्कृती ही वरून खाली झिरपत असते.

जर नेता राजकारण करत असेल, तर त्याची टीम धोका पत्करायला तयार होणार नाही.

जर नेता सगळ्यांचं श्रेय स्वतःकडे घेत असेल, तर त्याच्या टीममधील लोक कामाची जबाबदारी घेणं टाळतात.

जर नेता इतरांचं यश साजरं करत नसेल, तर टीम यश साजरं करणं सोडूनच देते.

निकृष्ट नेतृत्वामुळे सामर्थ्यशाली टीमचाही विचका झालेला मी अनेकदा पाहिला आहे. याचं कारण कौशल्याचा अभाव नसून मानसिक सुरक्षिततेचा अभाव हेच आहे.

जेव्हा नेत्याचं वागणं विश्वासाऐवजी भीतीवर आधारित असतं, तेव्हा त्याच्या टीममधील लोकांचं कौशल्य, हुशारी विझून जाते.

कल्पना करा, जर हरमनप्रीतने विश्वचषक हातात घेऊन फक्त आपल्या संघासमवेत फेरी मारली असती, ते उज्ज्वल यश स्वतःच मिरवलं असतं, तर त्यातून ‘हा माझा विजय आहे’, हा संदेश जगाला मिळाला असता.

पण झूलन आणि मितालीला त्यात सामील करून तिने ‘माझ्या विजया’चं रूपांतर ‘आपल्या परंपरे’त केलं.

संस्कृती अशीच घडत असते – विशिष्ट कार्याविषयीच्या वक्तव्यामुळे ती निर्माण होत नाही, तर यासारख्या नम्र क्षणांनी ती विकसित होत असते.

कॉर्पोरेट नेत्यांना त्या विजययात्रेपासून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

खरे नेते त्यांच्या टीमशी स्पर्धा करत नाहीत, ते त्यांना पूर्णत्व देतात.

ते पुष्टीकरणाच्या पाठी धावत नाहीत, ते निष्ठा निर्माण करतात.

त्यांना आपली जागा कोणी घेईल, अशी भीती वाटत नाही, उलट ते आपली जागा घेऊ शकतील, अशी माणसं तयार करतात आणि त्यांचा आदर करतात.

अशा तऱ्हेने कायम टिकणारी कार्यसंस्कृती तयार होते, जिथे यश हे एकदाच घडणारी घटना नसते, तर ती एक सातत्यपूर्ण परंपरा असते.

मी जेव्हा झूलन आणि मितालीला साश्रू नयनांनी तो चषक उंचावताना बघितलं, तेव्हा माझ्या मनात एक विचार चमकून गेला – नेतृत्व म्हणजे चषक मिळवणं नव्हे, तर तुमच्यासमवेत चषक धरण्यासाठी कोण योग्य आहे, याची जाण असणं, हे खरं नेतृत्व.

अशाच प्रकारे तुम्ही असा संघ तयार करू शकता, जो फक्त एकदाच जिंकून थांबणार नाही, तर तो नेहमी जिंकतच राहील, तुम्ही गेल्यानंतरही.

आणि त्या एकाच कृतीमुळे हरमनप्रीतने फक्त विश्वचषकच जिंकला असं नाही, तर तिने त्याहूनही दुर्लभ अशी गोष्ट जिंकली – मनं आणि आदर – तिच्या संघाचा आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांचा.

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात

मराठी अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काय हवे:विद्वत्ता की चातुर्य?

*

​माझे एक मित्र आहेत, नाव त्यांचे पंडित.

आणि या पंडित नावाच्या मित्राचा जेव्हा जेव्हा फोन येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो आणि लगेच कविवर्य मोरोपंतांच्या एका सुभाषितातल्या ओळींची आठवण होते:

​”केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।

शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।”

मी स्वतःशीच हसतो, कारण मोरोपंतांनी ‘पंडित मैत्री’तून मनुष्याला चातुर्य येतं असं सांगितलं आहे. गंमत थोडा वेळ बाजूला राहू देऊ पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत राहतो. तो हा की. मोरोपंत हे स्वतः इतके मोठे विद्वान असूनही त्यांनी या चार मार्गातून मिळणाऱ्या अंतिम फळाला ‘विद्वत्ता’ न म्हणता, ‘चातुर्य’ (Practical Wisdom) असे का म्हटले असेल बरं? त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही काहीतरी अधिक महत्त्वाचे सांगायचे आहे, हे निश्चित!

​येथेच विद्वत्ता आणि चातुर्य यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो, जो जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. विद्वत्ता आणि व्यावहारिक चातुर्य यातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बऱ्याच वेळा सांगितली जाते. आपल्यापैकी बहुतेकांनी ती वाचलीही असेल. एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. अनेक शास्त्र आणि ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. एकदा ते नदी ओलांडण्यासाठी एका नावाड्याच्या बोटीत बसले.

नावेत बसल्यावर पंडितजींनी नावाड्याला विचारले, “अरे, तू कधी व्याकरण, तत्त्वज्ञान किंवा धर्मशास्त्र वाचले आहेस का? “

नावाड्याने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मला हे काहीच माहीत नाही. “

पंडितजी उपहासाने म्हणाले, “तुझ्या आयुष्यातील पाव भाग तर व्यर्थ गेला! “

​थोडे पुढे गेल्यावर नदीत अचानक वादळ आले आणि बोट डळमळू लागली.

घाबरलेल्या नावाड्याने पंडितजींना विचारले, “महाराज, तुम्हाला पोहता येते का? “

पंडितजी घाम पुसत म्हणाले, “मी फक्त शास्त्रे वाचली आहेत; मला पोहता येत नाही! “

यावर नावाड्याने शांतपणे उत्तर दिले, “महाराज, तुमचे तर पूर्ण आयुष्यच व्यर्थ गेले! कारण ही बोट बुडणार आहे. “

​ही कथा आपल्याला सांगते की, केवळ ‘ज्ञान’ (विद्वत्ता) पुरेसे नसते, तर ते ज्ञान आणि त्यासोबत जगण्याचे ‘व्यवहारिक शहाणपण’ (चातुर्य) असणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्वान माणूस आपल्या विषयात पारंगत असतो, पण अनेकदा तो जगापासून, व्यवहारापासून आणि ‘लोकांच्या स्वभावा’पासून अनभिज्ञ असतो. तो आपल्या ग्रंथसिद्ध भूमिकेवर किंवा नियमांवर ठाम असतो. तो ‘जे योग्य आहे’ तेच करायचा हट्ट धरतो.

​याउलट, चतुर माणूस लवचिक भूमिका घेतो. चतुर माणूस आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार आपली रणनीती बदलतो. ही लवचिकता म्हणजे नैतिकतेचा त्याग नव्हे, तर उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे व्यावहारिक ज्ञान आहे. तो ‘काय करायचे आहे’ (Aim) यावर लक्ष केंद्रित करतो, तर विद्वान ‘कसे करायचे’ (Process/Rule) यावर ठाम राहतो. विद्वत्ता आपल्याला ज्ञान देते, पण चातुर्य आपल्याला ते ज्ञान वापरण्याची कला शिकवते.

​मोरोपंत वरील श्लोकात चातुर्य मिळवण्यासाठी चार मार्ग सांगतात, आणि ते सर्व केवळ ग्रंथपठणाचे मार्ग नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचे मार्ग आहेत: देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्रग्रंथविलोकन. या चार क्रियांमध्ये मोरोपंत केवळ शास्त्रग्रंथ वाचून पांडित्य मिळवण्याऐवजी, देशाटन, मैत्री आणि सभेतला संचार यांसारख्या प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारी चातुर्य प्राप्त करण्यावर भर देतात. ​

चांगदेव महाराजांनी तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या केली. त्यांची प्रचंड विद्वत्ता आणि कठोर साधना यामुळे लक्षात येते. मात्र, ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या पत्रात मायना काय लिहावा हे एवढ्या मोठ्या विद्वान संताला कळू शकले नाही. जेव्हा ते संत ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर बसून आले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना चक्क भिंत चालवून प्रती-उत्तर दिले. १४०० वर्षांच्या तपश्चर्येनंतरही त्यांना व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) आले नव्हते, हे या प्रसंगातून स्पष्ट होते.

बिरबल हा अकबराच्या दरबारातील ‘विद्वान’ असण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) म्हणून अधिक प्रसिद्ध होता. त्याने दरबारातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मानवी स्वभावाचे अचूक निरीक्षण केले आणि हजरजबाबीपणा वापरला. मानवी मनाचा त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याचा वापर करण्यातून त्याचे चातुर्य दिसून येते.

श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे चातुर्याचा आदर्श नमुना आहे, कारण त्यांनी वेळप्रसंगी घेतलेली लवचिक भूमिका. जेव्हा त्यांना जाणवले की बलवान अशा जरासंधासमोर उघडपणे टिकाव लागणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले. त्याचप्रमाणे, कालयवनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी रणांगणातून पळ काढला आणि प्रसंगी ‘रणछोड’ हे नाव आनंदाने स्वीकारले. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ‘युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म’ म्हणून लढून प्राण दिला असता; पण श्रीकृष्णाने तत्त्वांची तडजोड न करता धर्माचे रक्षण करण्यासाठी रणनीतीत लवचिकता आणली. अशा प्रकारची लवचिकता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अनेक प्रसंगात दाखवली. परंतु महाभारत युद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य यांना ती दाखवता आली नाही. आपल्या तत्त्वांना किंवा प्रतिज्ञाला थोडी मुरड घालून त्यांनी अधर्माची बाजू सोडली असती तर त्यांच्यासारखे महान कोणी ठरले नसते. परंतु तसे न केल्यामुळे त्यांचा रणांगणामध्ये अंत झाला. अगदी रामायणातील हनुमान सुद्धा चातुर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही सांगितलेली सगळी माणसे विद्वान, बुद्धिमान तर होतीच परंतु विद्वत्ता आणि चातुर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात हातात हात घालून चालत होते. आणि नेमके हेच आपल्या शिक्षण पद्धतीने करणे अपेक्षित आहे.

आजच्या शिक्षण पद्धतीकडे पाहता अनेकदा असे जाणवते की, आजची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना ज्ञान देते, पण त्यांच्यात व्यावहारिक शहाणपण निर्माण करण्यात कमी पडते. (Knowledge comes but wisdom lingers) अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पुस्तकी ज्ञान (विद्वत्ता) मिळते, पदवी मिळते पण मिळालेले ज्ञान कसे वापरावे याचे व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) येण्यास वेळ लागतो.

​मोरोपंतांनी याच व्यावहारिक चातुर्यावर भर दिला. म्हणूनच, ते आपल्याला ‘विद्वान’ होण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) होण्याचा संदेश देतात. जीवनात पुढे जाण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, आणि आनंदी राहण्यासाठी ही व्यावहारिक बुद्धिमत्ता किंवा चातुर्यच खरे उपयुक्त ठरते.

आज आपल्या हातात माहितीचा अपार साठा आहे, ज्ञानाचे दरवाजे उघडे आहेत; पण जीवन जगताना, निर्णय घेताना, नाती सांभाळताना, आणि संकटांचा सामना करताना आपल्याला मदत करते ते चातुर्य, म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. मोरोपंतांनी शतकांपूर्वी दिलेला संदेश आजही तितकाच लागू आहे — विद्वत्ता महत्त्वाची आहेच, पण चातुर्य त्याहूनही महत्त्वाचे!

म्हणूनच,

चला, फक्त जाणकार न बनता, जाणिवेने वागणारे बनूया!

फक्त माहिती गोळा न करता, त्या माहितीचे जीवनात रूपांतर करू या!

फक्त शहाणे न बनता, शहाणपणाने चालणारे बनूया!

 

विद्वत्तेची कास धरत, चातुर्याचा दीप पेटवू या!

आणि जीवन अधिक सुंदर, सुकर आणि सुजाण बनवू या.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मनात विचार होते ते आता त्यांच्याशी काय बोलायचं याचेच. मनातली हतबलता कधीच विरून गेली होती. अनिश्चिततेचा तर लवलेशही नव्हता. हीच पुढे घडू पहाणाऱ्या चमत्काराची सुरूवात आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाही नव्हती!)

सहस्त्रबुद्धे आजोबांनीच दार उघडलं. ‘या’ म्हणाले आणि लगबगीने आत गेले. वेळेचा अंदाज घ्यायला मी माझ्या हातातल्या घड्याळकडं पाहिलं त्याच वेळी पाण्याचं तांब्या-भांडं घेऊन बाहेर आलेल्या आजोबांच्या ते नेमकं लक्षात आलं.

“गेले तीन दिवस अशीच वेळेची सर्कस चाललेय तुमची. मी फार त्रास देत नाहीय ना तुम्हाला?”

“अजिबातच नाही. उलट खूप वेळ घेऊन येता आलं असतं तर तेच मला जास्त आवडलं असतं. ” मी मनापासून म्हणालो. आणि ते खरंही होतं. केवळ बँक स्टाफच्या आत्मकेंद्री विचारांमुळे ग्राहक कसे दुखावले जातात आणि बॅंक-व्यवस्थापनालाही त्याचा किती मनस्ताप होत असतो याचा खूप काही शिकवून जाणारा अनुभव बँकिंग क्षेत्रामधल्या माझ्या तोवरच्या दीर्घ वाटचालीत मी प्रथमच घेत होतो. त्यामुळेच त्यादिवशीच्या कटू घटनेमुळे दुखावल्या गेलेल्या सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणंही आवश्यक आहे असंच मला वाटत होतं.

सहस्त्रबुद्धे आजोबांबद्दल मला कितीही सहानुभूती वाटत असली तरी केवळ त्यांच्या समाधानासाठी मी प्रभूदेसाईंना अतिशय कठोर शिक्षा करू शकणार नव्हतो आणि म्हणूनच आजोबांना अपेक्षित असणारा न्यायही मला देता येणार नव्हता. कारण प्रभूदेसाईंना शिक्षा करायची तर बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर आरोप ठेवून तो पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाचाच एक भाग म्हणून माझ्यावरच येणार होती. त्यामुळे सहस्त्रबुद्धे आजोबांचं समाधान करायचं तर त्यांना प्रोसेसमधील या अडथळ्यांची जाणीव करून देणं जेवढं आवश्यक होतं तेवढंच अडचणीचंही ठरू शकणार होतं. कारण आजोबा ते ऐकून दुखावले, अस्वस्थ झाले, चिडले तर सगळ्याच प्रकरणाला नकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ज्या उद्देशाने हे सगळंच प्रकरण आम्ही धसाला लावलं होतं तो उद्देशही पूर्ण झाला नसता ते वेगळंच. त्यामुळे परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळणं आवश्यक होतं. बोलण्यातल्या कौशल्यापेक्षा आजोबांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधणं गरजेचं आहे असा विचार मी केला. गेल्या तीन दिवसात वेळोवेळी या प्रकरणाबद्दल माझ्या मनात जे जे विचार येऊन गेले ते सगळे अतिशय निखळ स्वरूपात आजोबांपुढे व्यक्त करून त्या पार्श्वभूमीवर यापुढे त्यांनी काय करणं आपल्याला अपेक्षित आहे हेही अतिशय स्पष्ट शब्दात त्यांना सूचवणं हाच एकमेव मार्ग मला योग्य वाटला. याच्या परिणामतः येणारं यशापयश ‘त्या’च्यावर सोपवून मी बोलायला सुरूवात केली.

“आजोबा, खरं सांगायचं तर या सगळ्या प्रकरणाबद्दलचेच विचार गेले तीन दिवस माझ्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. तुमच्या दुखावलेल्या भावना, तुम्हाला झालेला मनस्ताप, आणि त्यामुळे तुमच्यासारख्या वयोवृध्द ग्राहकाच्या मनातली बॅंकेची प्रतिमा डागाळली गेल्याच्या विचाराचाच मला खूप त्रास होतोय. खरंतर ग्राहकाला बॅंकेत तत्पर आणि चांगली सेवा मिळावी यासाठी सर्वच बॅंकांमधे काटेकोर नियम आहेत. एखाद्या ग्राहकाने तक्रार केली तर त्याचं तत्परतेने निराकरण होतेय कीं नाही हे पहाण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही कार्यरत आहे. खरं सांगायचं तर यामुळेच निर्माण होऊ पहाणारी तक्रार शक्यतो ब्रॅंचपातळीवरच योग्य पध्दतीने हाताळून त्याचं निराकरण करण्याचाच प्रयत्न बहुतेक ब्रॅंचमॅनेजर्स करीत असल्याने स्थानिक पातळीवरच त्याची दखल घेतली जाते.

प्रभूदेसाईंच्या बाबतीत मात्र जे घडलं ते खरंच त्यांच्यासारख्या सूज्ञ माणसांकडून कधीच अपेक्षित नाहीय. ही नकळत झालेली चूक नाहीये. आमच्या साहेबांशी बोलतानाही मी त्यांना जे सांगितलं होतं तेच आज तुम्हालाही सांगतो. ब्रॅंच मॅनेजरच्या दृष्टीने मोठ्या रकमांची डिपॉझिट्स बँकेत ठेवणारे खातेदार हेच महत्त्वपूर्ण ग्राहक असा अपवादात्मक कां असेना पण कांही मॅनेजर्सचा चुकीचा समज असतो. कदाचित त्या दिवशी समोर बसलेल्या अशाच एका कस्टमरला तत्पर सेवा देताना कोणताही अडथळा मधे येऊ नये असा प्रयत्न करत असतानाच प्रभूदेसाईंनी दुसऱ्या ग्राहकावर आपल्याकडून अन्याय होऊ नये याचीही काळजी, केवळ ते ब्रॅंच मॅनेजर होते म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही घ्यायला हवी होती असंच मला वाटतं. विशेषतः तुम्ही बराच वेळ बाहेर ताटकळत बसलाय हे त्यांच्या लक्षातही न येणं हेच चुकीचं होतं. तुम्ही आपणहोऊन पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा केबिनमधे गेलात तेव्हा निदान तिथेच बसलेल्या दुसऱ्या ग्राहकासमोर तरी त्यांनी तुमचं हसतमुखानं स्वागत करून नेमकं काय काम आहे हे विचारून घ्यायला हवंच होतं. एरवी इंटरकाॅमवरून अकाऊंटंना पूर्वकल्पना देऊन तुम्हाला त्यांच्याकडेही ते पाठवू शकले असते. तुमचं एक अगदी साधं काम हातावेगळं करण्यासाठी फक्त दोन मिनिटंही पुरेशी ठरली असती. असं असताना त्यांना ते करावंसं न वाटणं हेच आक्षेपार्ह आहे.

ज्या मन:स्थितीत तुम्ही बॅंकेत आला होतात त्याचा विचार करता प्रभूदेसाईंच्या वागण्या-बोलण्यावरील तुमच्या प्रतिक्रिया कितीही टोकाच्या असल्या तरी त्या नैसर्गिक आणि अपरिहार्य अशाच होत्या… “

ते लक्षपूर्वक ऐकत होते. मी बोलायचं थांबलो तसं भानावर येत त्यांनी चमकून माझ्याकडं पाहिलं. त्यांची ओलसर नजर पाहून मला पुढं काय बोलावं सुचेचना.

“… हे सगळं पुन्हा आठवताना, ऐकताना तुम्हालाही खूप त्रास होतोय हे समजतंय मला आजोबा. पण असं असूनही तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी तुमचं पूर्ण समाधान होईल असं मी काय करायला हवं तेच मला समजत नाहीय ” मी म्हणालो.

” म्हणजे?”

“प्रभूदेसाईंना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून तुम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. असं वाटणं यात गैर कांहीच नाही. पण तुम्ही थोडं समजूतीनं घेतलंत तर तुमच्या दृष्टीनं यातून समाधानकारक मार्ग कसा निघेल याचा विचार आपण करू शकू असं मला वाटतं. “

“सबुरीनं घ्यायचं म्हणजे काय करायचं?”

“कोणत्याही कर्मचाऱ्यांने नकळत किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कुठल्याही चुकीची त्याला काय शिक्षा करायची याचे बँकांचे काही नियम आहेत आणि त्यासाठीची ठराविक प्रोसेसही. त्या बाहेर न जाता प्रभूदेसाईंना त्यांच्याकडून झालेल्या चुकीची स्पष्ट शब्दात कल्पना देऊन त्यांच्या बाबतीत नेमकी काय ॲक्शन घ्यायची हे ठरवावं लागेल. हे सगळं शक्यतो झोनल ऑफिसच्या पातळीवरच झालं तर लगेच अंमलात आणता येऊ शकेल. सर्व अहवाल सेंट्रल ऑफिसला पाठवून त्यांची अनुमती घ्यायची तर त्या प्रोसेसला बराच वेळही लागू शकेल. या दोन्हीपैकी जे करायचं ते तुमचं समाधान होईल असं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. पण जे कांही ठरेल त्याचा अंतिम निर्णय अर्थातच आमच्या डी. जी. एम्. साहेबांचाच असेल. तरीही त्याची पूर्वकल्पना तुम्हाला देऊन तुमची संमती घेण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. “

“ठीक आहे. जे ठरेल ते सांगा मला. त्यानंतर काय करायचं ते मी पाहिन. ” आजोबा कांहीशा नाराजीने म्हणाले.

मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो. पण ही अनिश्चितता अशीच सोबत घेऊन जाणं मला नको होतं. विषय पूर्णतः संपायला हवा होता आणि या क्षणापर्यंत तरी आजोबांचा अॅप्रोच मला निश्चिंत करणारा वाटत नव्हता. मी जाता जाता क्षणभर थबकलो. आजोबा माझ्याकडेच पहात होते.

“जाण्यापूर्वी एकच सांगायचंय. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. अनुभवी आहात. खरंतर मी तुम्हाला कांही सांगणं योग्य आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही भाविक आहात, दत्त महाराजांच्यावर तुमची श्रद्धा आहे याची मला कल्पना असल्यानेच हे सांगावंसं वाटतंय म्हणून सांगतो.. “

त्यांनी मला आत येऊन बसायची खूण केली. निसटू पहाणारा क्षण जणू अकल्पितपणे क्षणभर थबकला होता. तो घट्ट धरून ठेवत मी ‘त्या’नेच प्रेरणा द्यावी तसं बोलू लागलो….

“कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा, चुकीबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार केवळ व्यवस्थेचा एक भाग म्हणून माणसाने स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे नियम ठरवलेले आहेत. त्या नियमांप्रमाणे घेतलेला निर्णय सर्वार्थाने न्याय देणारा असतोच असं नाही. पण या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असते. सोप्या भाषेत आपण ज्याला ‘देव’ म्हणतो त्या देवाची यंत्रणा. तो पहात असतो सगळं. आणि प्रत्येक क्षणी घडणाऱ्या घटनांचा साक्षीदारही तोच असतो. न्याय देणारा जसा तो तसाच अन्यायाचं निवारण करणाराही तोच. त्या देवाच्या काठीला आवाज नसतो. पण अतिशय योग्य पद्धतीने, कुणाच्याही नकळत, कसलाही गाजावाजा न करता, त्या काठीने होणारा न्यायनिवाडा हा अन्यायचं निराकरण करणारा, अन्याय झालेल्याला खऱ्या अर्थाने न्याय देणाराच असतो. एकच सांगावंसं वाटतं, प्रभूदेसाईंना काय शिक्षा करायची हेही आपण ‘त्या’च्यावर सोपवूया. जे होईल ते योग्यच असेल हा विश्वास असू दे. मी आमच्याकडून जे करणं आवश्यक आणि शक्य असेल ते सगळं करीन. उद्याची आपली भेट असेल ती या विषयापुरती शेवटची असेल हे नक्की. येतो मी… “

त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात झिरपणारं समाधान मला दिलासा देत होतं. यापुढं जे घडेल ते ‘तो म्हणेल तसं’ ! तिकडं सहस्त्रबुद्धे आजोबाही असाच विचार करत असतील याची मला खात्री होती.

तरीही त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच मला येणाराय यांची मात्र मला कल्पना नव्हती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😂 कापणे – एक इव्हेंट! 😢 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्याकाळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल! मला आज बहात्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो, म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा!

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच? “लिहिता हात” म्हणजे काय? तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे? ) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला ऐकून घेवू? काय बरोबर ना मंडळी?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी. आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या!

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई. मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा. मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय! टोक काढतांना गाढवासारखं (? ) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं? बस अभ्यासाला! “

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला तरी अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे!

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे! हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल! आजकाल कशातच “राम” उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही? असो! कालाय तस्मै नमः!

तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” नामक आमच्या आठ चाळीच्या संकुलचा एकच नाभिक असलेल्या नाभिकपुढे पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे. आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे! या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा!

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे. शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (? ) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई!

आज वयाच्या बहात्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” अनेक कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी. माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच होतं!

केस कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच! आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकलमधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो!

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त!

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात!

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल! ” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल! म्हणून सोप्या चालू भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source! ” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे!

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला! “

“टॅक्स! ” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात!

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘कुचंबले किचन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कुचंबले किचन’ ☆ श्री दिवाकर बुरसे

जिथे नव्या हाऊसिंग स्कीम्स उभारल्या जात आहेत, सोसायट्यांचा पुनर्विकास झाला आहे/ होत आहे, नवी टाॕवर्स, नव्या इमारती बांधल्या गेल्या आहेत किंवा जात आहेत त्यांच्या १-२-३ बीएचके फ्लॅट मध्ये किचनचा एवढा संकोच करून ठेवला आहे की जेमतेम एक माणूस कसाबसा उभा राहू शकतो! गेल्या ५-७ वर्षात मुख्यतः महानगरातून हे विशेषत्वाने आढळून येते.

नक्की काय खूळ (कदाचित व्यावसायिक लाभाचे गणित? ) बसले आहे या पुनर्विकासक/ बिल्डर/इंटीरियर करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही कळत नाही.

ह्या लोकांना असे का वाटते की, हल्ली घरी कोणी स्वयंपाक करतच नाही. सगळे रोज सकाळ संध्याकाळ बाहेरील हाॕटेलांत आॕर्डर देऊन तिथून घरी पार्सलं मागवून खातात.

हल्ली कोणी कोणाच्या घरी जात नाही की येत नाही. कुटुंबे लहान आहेत. (घरात जास्तिजास्त तीन सदस्य! ) घरी पाहुण्या-रावळ्यांचा राबता नसतो. मामाच्या घरी येऊन धुडगूस घालणारी, मामीकडे शिक्रण पोळीचा हट्ट धरणारी व्रात्य भाचरे नसतात. त्यामुळे भांडी, ताटे, वाट्या, पातेली, डाव, ओगराळी किंवा गेलाबाजार क्रोकरी असले अवजड सामान ठेवायला कशाला जागा लागते? तेव्हा ती वाचवलेली जागा या नवीन रचनेत बेडरूम, हॉल मोठा करण्यात वापरू या. त्यांचे मानस खरेच असे आहे का?

ज्या लोकांनी १९८५ ते ९५ सालापर्यंत फ्लॕट घेतले आहेत ते लोक नवीन फ्लॕट बघायला जातात तेव्हा तिथले वितभर रुंदी-लांबीचे किचन पाहिल्यावर त्यांचे डोकेच सटकते.

मी काय म्हणतो, बांधकाम व एफ एस आय इ. चे चे नियम बदलले आहेत/असतीलही. त्यामुळे घराच्या, साॕरी फ्लॕटच्या, रचनेत बरेच बदल करावे लागत असतील हे ही मान्य करू या. पण भारतीय संस्कृतीमध्ये घरातील सगळ्यात महत्त्वाचे असलेले स्वयंपाकघर म्हणजे किचन, आणि चक्क त्याचाच बळी पडत आहे. किचनचा असा श्वास कोडणारा संकोच अगदी अमान्य आहे. अहो, असे करुन कसे चालेल बरे?

पुनर्विकास करताना या किचन कुचंबणेचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. गृहिणींनीही नव्या फ्लॕटमधे मोठ्या किचनचा आग्रह धरावा. मला वाटते की हा स्त्रीहट्ट योग्य आहे आणि तो पुरवायला हवा.

सोसायट्यांच्या पुनर्विकास समित्यांनी व विकासकांनी या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा. या सूचनेला पुरेसे महत्व व प्राधान्य द्यावे.

घरोघरीच्या (गृह) लक्ष्मींना प्रसन्न करण्याची, पुनर्विकासाच्या निमित्ताने घर चालत आलेली ही सुवर्णसंधी, कोणाही ‘धूर्त व चाणाक्ष’ पुरुषाने अजिबात दवडू नये असे त्यांच्या हिताचे सांगणे आहे.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तक्रार निवारण केंद्र…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “तक्रार निवारण केंद्र…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

आपण मोबदला देऊन घेतलेल्या वस्तू व सेवा याच्या बद्दल काही तक्रार असल्यास अशी तक्रार निवारण करायला निवारण केंद्र असतात.

यात प्रत्यक्ष भेटून, लिहून, किंवा तोंडी तक्रार देता येते. हल्ली ऑनलाईन तक्रार करता येते. ब-याचदा तर तक्रार करणारा आणि घेणारा समोरासमोर येत सुुध्दा नाहीत.

पण मला आठवतय आमच्यावेळी असणारं तक्रार निवारण केंद्र. हे साधारण आमचे आईवडील म्हणजे पालक आणि आम्हाला शिकवणारे म्हणजे गुरूजन म्हणजे शिक्षक यांच्यातच असायचं. आणि तक्रार…. साहजिकच ती आमच्या बद्दलच असायची. आणि आईवडील व शिक्षक यापैकी कोणालाही तक्रार करायची मुभा असायची.

या तक्रारीची नुसतीच दखल घेतली जायची नाही तर तीचं निवारण झालं की नाही याची शहानिशा व्हायची.

ब-याचदा तर मोठा भाऊ, बहीण कोणीतरी दोन तीन वर्षांच्या अंतराने मागच्या किंवा पुढच्या वर्गात असायचेच. याची व्यवस्थित माहिती शिक्षकांना असायची. काहिवेेळा तर त्यांचच उदाहरण दिलं जायचं. बघ जरा…… तो किंवा ती कशी….. आणि तू…… या तू म्हणण्याचा अर्थ कळायचाच…… शाळेतली तक्रार त्यांच्याच मार्फत घरी पोहचवण्याची व्यवस्था व्हायची. आणि ते सुुध्दा जशीच्यातशी आणि न चुकता ती तक्रार घरी व्यवस्थित पोहोचवायचे. स्पीड पोस्ट. किंवा एका दिवसात डिलेव्हरी…… त्यावेळी सुुध्दा होती.

या तक्रारीत तर आमच्यावरचे असणारे अधिकार सुध्दा एकमेकांना विश्वासाने सोपवले जायचे. म्हणजे शिक्षकांनी तक्रार केली तर तुमचा मुलगा….. अशी सुरुवात व्हायची. आणि आईवडील यांची तक्रार असेल तर….. तुमचा विद्यार्थी आहे…. घ्या ताब्यात…. अशीच सुरुवात करायचे.

तक्रारीच्या स्वरूपानुसार मग योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न व्हायचा. प्रयत्न बहुतेक यशस्वीच व्हायचा.

यात जागेवर ऊभा रहा. यापासून जागेवर पण बाकावर ऊभा रहा. अशा काही सौम्य पण अपमान वाटणा-या गोष्टी असायच्या. तर काहीवेळा वर्गाच्या दारात सुध्दा ऊभं रहावं लागायचं.

आजकाल एरी॓अल व्ह्यू हा शब्द ऐकू येतो. पण याचा अनुभव आम्ही शाळेत असतांनाच ज्या ज्या वेळी बाकावर ऊभं राहिलो त्या त्या वेळी घेतला होता. बाकावर ऊभं राहिल्यावर काही गोष्टी दिसायच्या. यात पुस्तकात धड्यांचे लेखक किंवा लेखिका यांच्या फोटोवर पेनच्या सहाय्याने चढवलेला चष्मा. किंवा त्यांना काढलेली निळ्या रंगाची दाढीमिशी दिसायची. ती वाकून पाहण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्यात शिक्षक ओरडायचे, नीट, ताठ ऊभा रहा……. या आवाजात इतकं वजन असायचं, कि बाकावर ऊभा असलेला काय पण बाकावर बसलेला सुध्दा ताठ बसलेेला असला तरी परत सरसावून बसायचा. कधी कधी या ओरडण्यासोबत एक खडूचा तुकडा अचानक मीसाईल सारखा यायचा आणि त्याच काम करून जायचा. सर्जीकल स्ट्राईक.

वस्तू दुरुस्त झाल्यावर जसे काही स्क्रु पिळून घट्ट करतात तसेच काहीवेळा आमचे कानसुध्दा स्क्रू सारखेच पिळले नाही तर अक्षरश: पिरगळले जायचे. फक्त वस्तूंचे सगळेच स्क्रू पिळून घट्ट झाले का पहावे लागतात. आमच्या एका कानाचा स्क्रू पिळला जाणार अशी शंका आलीतरी सगळेच स्क्रू आपोआप ठिकाणावर गेल्याची जाणीव व्हायची.

ब-याचदा तर एक स्क्रू म्हणजे कान पकडल्यानंतर दुसरा स्क्रू म्हणजे कान पिळला जाऊनये म्हणून तो एका हाताने झाकायचा केविलवाणा प्रयत्न असायचा. पण मग त्या झाकलेल्या हातावरच असा फटका बसायचा कि न पिळताच तो स्क्रू रुपी कान ठणकायचा.

किल्ली फिरवून घट्ट केली कि काहीकाळ चालणारी खेळणी असतात. त्याच पध्दतीने आमचा कान पीरगळून एकदा किल्ली घट्ट केली की आमचं खेळणं बराचकाळ नीट चालायचं. पर्याय नसायचा. सारखी सारखी कोण किल्ली घट्ट करून घेणार…

अक्षराबद्दल काय बोलणार… अक्षर चांगलच असलं पाहिजे असाच कटाक्ष असायचा. अक्षर वाईट असेल आणि त्याच दर्शन शिक्षकांंना झालं, तर त्याचं आणि अक्षराचं दोघांच प्रदर्शन वर्गात होणारच याची खात्रीच असायची. वर… काय लिहितोस?… असा शेरा असायचाच.

अक्षरासाठी मग वहिची दोन पानं लिहून आणायची शिक्षा असायची. अशी दोन पानं करता करता एकदातर माझी एक पूर्ण वही भरली होती. सुदैवाने ते वर्ष संपलं म्हणून. नाहीतर घरी नवीन वही मागावी लागली असती. परत आता वही कशाला हवी? … ही विचारणा झालीच असती. मोठ्यांंची हिशोबासाठी वही असायची, पण आमच्या वह्यांचा हिशोब सुुध्दा त्यांच्याकडे असायचा.

पाढे पाठ असणं किंवा करणं हा शिस्तीचा भाग असायचा. पण तोच कधीकधी शिक्षेसाठी कारणीभूत ठरायचा. मग पाढे पाठ नसायची शिक्षा पाठीवर जाणवायची.

पण त्या तक्रार निवारण केंद्रात माया, आणि प्रेम काळजी, आणि आपुलकी होती हे खरं आहे. शिक्षणसंस्था, शिक्षण, शिकवणं आणि शिकणं या बद्दल शिक्षकांना आणि पालकांनासुध्दा आस्था व अभिमान असायचा.

विद्यार्थांचं अपयश हे शिक्षकांना स्वतःच अपयश वाटायचं, तर विद्यार्थांच्या यशाने शिक्षकांची छाती गर्वाने फुलायची आणि मान अभिमानाने ताठ व्हायची.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोळी…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोळी… ☆ सौ शालिनी जोशी

कोळी घरात कोठेतरी कोपऱ्यात आढळणारा प्राणी. दिसला की गृहिणी केरसुणी आणायला पळतेच. पण परत येते तेव्हा तो कोळी कुठच्या कोठेच पळालेला असतो. सापडतच नाही. दिसते ते त्यांने कोपऱ्यात कोठे तरी केलेले जाळे. अतिशय पारदर्शक व सूक्ष्म तंतू पासून केलेली कलाकृती. खरोखरच किती अद्भुत आहे नाही! माणसाने कितीही प्रयत्न केले तरी असे नाजूक जाळे करणे शक्य नाही.

हे जाळे ज्यावेळी घराबाहेर एखाद्या झाडाला किंवा खिडकीला धरून केले जाते, तेव्हा विशेष शोभिवंत दिसते. लांबवर त्याचे हातपाय पसरलेले असतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात ते चमकू लागले की त्याची रचना स्पष्ट दिसते. त्या लटकणाऱ्या झोपाळ्यात झोके घेणारा तो कोळी अगदी राजासारखा शोधतो. जणू आपले ऐश्वर्य डोळे भरून पाहत आहे, उपभोगत आहे. त्यात हिवाळा असेल तर दवबिंदूही त्याचा आधार घेतात. आणि मग तो हिरे महालच होऊन जातो. सूर्याच्या सप्तरंगात तो न्हाऊन निघतो. त्या छोट्या विश्वकर्माच्या त्या रचने पुढे नतमस्तक व्हावे वाटते. केवळ फोटोत बंदिस्त करणे आपल्या हातात असते.

असे हे जाळे नुसते शोभेचे नाही. किड्यांना पकडून आपले पोट भरण्याचे कोळ्याचे ते साधन आहे. बसल्या जागी अन्न मिळवण्याची ही त्याची अनोखी पद्धत. ‘पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी तू जगदिशा’ म्हणायची वेळ त्याचे वर कधीच येत नाही.

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घर बांधायला त्याला काही सामग्री गोळा करावी लागत नाही. घर बांधायचे म्हणजे माणसाची किती धावपळ. विटा, वाळू, सळई, पाणी, लाकूड आणि मुख्य म्हणजे जागा आणि कामगार, काय नको! पण हा बिचारा आपल्या शरीरातून एक चिवट धागा काढतो व आपल्या शरीराभोवती मोठ्या कौशल्याने गुंतवितो. अंतरिक्षात लोंबत ठेवतो. साहित्य नको, जागा नको. माणसाच्या श्रेष्ठत्वाच्या अभिमानाला तडा देतो. माझे घर म्हणणाऱ्यांना आपली जागा दाखवतो. सुखा समाधानाने जाळ्यात येणाऱ्या अन्नाचा उपभोग घेतो. गरज संपल्यावर सगळा पसारा आपल्यातच सामावून घेऊन मोकळा. मागे काही उरत नाही. सृष्टीची निर्मिती करून लिला दाखवणारा आणि परत सृष्टीला आपल्या सामावून घेणारा परमात्माच तो होतो. ज्या परमात्म्याने त्याला निर्माण केले, त्याचा आदर्श तो तंतोतंतो पाळतो. आपल्या पसारा आपणच आवरून त्या परमत्वात लीन व्हायला मोकळा. केर नाही कचरा नाही. म्हणूनच अवधुताने आपल्या २४ गुरूत त्याला स्थान दिले.

आदर्श घ्यावा तर त्याचा. स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी सारा पसारा मांडावा. पण त्याचा त्रास कुणाला होणार नाही. त्याची जबाबदारी कुणावर पडणार नाही. अशा प्रकारे तो आवरून निरोप घ्यावा. हा आदर्श देणारा एकमेव कोळी.

कोळी तसा निरुपद्रवी प्राणी, घर अस्वच्छ करतो असे वाटत असले तरी बारीक सारीक किडे खाऊन घर स्वच्छ ठेवतो. त्याचा स्पर्श झाला किंवा अंगावर चिरडला गेला तर थोडा त्रासदायक असे म्हणतात. त्याच्या पुष्कळ जाती, रंगावरून व घर बांधायच्या पद्धतीवरून ठरतात. असो आठ पायांचा हा छोटासा प्राणी सृष्टीच्या विविधतेचे एक अंग आहे एवढे मात्र नक्की.

पर्यावरण रक्षणासाठी माणसे ज्या 5R(reduce, reuse, recycle, refuse, recover) चा वारंवार गवगवा करतात, ते तर याच्या पचनीच पडलेले असतात. कारण ज्या ज्या वेळी तो नवीन जाळं तयार करतो, तेव्हा पहिले खाऊन पचवतो, शक्ती मिळवतो आणि परत शरीरातून काढलेल्या धाग्याने नवीन जाळे तयार करतो. फारतर एक तासाचा कालावधी. ही जाळ्याची तोडमोड ध्येयपूर्तीपर्यंत सुरू असते. एकदा का अंडी घातली की कार्यभाग संपला. मग पसारा आवरून रामराम. राहिलाच एखादा जाळ्याचा धागा तर तो इतर पक्षांचे आवडते खाद्य. त्यातून परोपकारही साधला. सारेच अजब!

‘एका कोळीयाने घर बांधलेले ना कळस ना पाया रे’ खरं आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ए. आय…… भविष्याचा मार्ग” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “ए. आय… भविष्याचा मार्ग☆ श्री जगदीश काबरे ☆

मागच्या वर्षा-दीड वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला वाढू लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर कपात होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण त्याच वेळेला नवीन प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होणार, अशी आशाही या क्षेत्रातील तज्ञ दाखवू लागले आहेत. माझ्यासारख्या मागच्या शतकात जन्मलेल्या माणसाला ही सगळी दुनिया अद्भुतच वाटत आहे. आमच्या पिढीने कधीकाळी या सगळ्या गोष्टी स्वप्नातसुद्धा आणल्या नव्हत्या त्या आज नवीन पिढी जन्मल्यानंतर लगेच वापरायला सुरुवात करते.

तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जुन्या नोकऱ्या जाऊन नवीन प्रकारच्या कोणत्या नोकऱ्या निर्माण होणार हे समजून घेण्यासाठी मी ’एआय’ म्हणजे ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे नेमके काय प्रकरण आहे आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो या विषयावर तज्ञांनी लिहिलेली पुस्तके वाचायला सुरुवात केली. वाचताना माझ्या लक्षात आले की, त्यातील बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी कल्पनातीत आहेत. पण आजच्या तरुण पिढीने त्या जर समजून घेतल्या तर त्यांचे भविष्य उज्वल आहे. तेव्हा माझ्या वाचनातून मला जे काही आकलले त्याची सूत्र पद्धतीने या लेखात मांडणी केलेली आहे.

बदल हा निसर्गाचा जसा स्थायीभाव आहे तसाच माणसाच्या आयुष्यातही बदल घडणारच. तेव्हा त्या बदलानुसार माणसानेही बदलणे क्रमप्राप्त आहे. त्या बदलाला अभ्यासाने प्रकट होत धैर्याने सामोरे जाणे हाच जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे. जो बदलणार नाही तो मागे पडणार… थोडक्यात जो थांबला तो संपला. तेव्हा तरुणांनो, या एआय मुळे ज्या प्रकारच्या नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत त्याचा अभ्यास करायला लागा, हे सांगण्यासाठी विदर्भातून प्रसिद्ध होणाऱ्या ’जनयात्रा’ वर्तमानपत्रात मी हा लेख लिहिला आहे. तो असा…

ए. आय. मुळे निर्माण झालेल्या नव्या नोकरीच्या संधी : तरुणांसाठी भविष्याचा नवा मार्ग – जगदीश काबरे

आजचा जगाचा चेहरा बदलवणारे तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता—Artificial Intelligence, किंवा थोडक्यात ‘ए. आय. ’. माणसाच्या विचार, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता याचे अनुकरण करणारे हे तंत्रज्ञान आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरले आहे. ए. आय. म्हणजे फक्त रोबोट्स नाहीत, तर भाषांतर करणारी साधने, व्हॉईस असिस्टंट्स, स्मार्टफोनवरील कॅमेऱ्यांचे ऑटोफोकस, वैद्यकीय निदान करणारे सॉफ्टवेअर, ग्राहकांच्या सवयी ओळखून जाहिराती तयार करणारे अल्गोरिदम्स, अशा असंख्य क्षेत्रांतील उपयोग याचाच एक भाग आहेत. काही जणांना वाटते की ए. आय. मुळे मानवी नोकऱ्या नाहीशा होतील, परंतु वास्तविकता अशी आहे की ए. आय. मुळे तितक्याच वेगाने नव्या प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होत आहेत. विशेषतः तरुणांसाठी या क्षेत्रात सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि विश्लेषणशक्ती यांचा सुंदर मिलाफ असलेले करिअरचे नवे दरवाजे उघडले आहेत.

ए. आय. आणि नोकऱ्यांचा बदलता पट लक्षात घेतला तर अनेक अभ्यास सांगतात की, ज्या नोकऱ्या पुनरावृत्तीच्या स्वरूपाच्या आहेत—उदा. डेटा एंट्री, साधे लेखापरीक्षण, ग्राहक सेवा, किंवा मूलभूत भाषांतर—त्या मोठ्या प्रमाणावर ए. आय. द्वारे हाताळल्या जात आहेत. पण त्याच वेळी मानवी सर्जनशीलता, तर्कशक्ती, भावना आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये ए. आय. आधारित नव्या नोकऱ्या वाढत आहेत. या नव्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ए. आय. शी संवाद साधता यायला हवे, त्याचे परिणाम समजून घ्यायला हवे आणि मानवी समाजासाठी उपयुक्त दिशा देण्यासाठी त्याला वापरता यायला हवे.

ए. आय. च्या नव्या युगातील प्रमुख कौशल्य म्हणजे ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’. हे या नव्या क्षेत्रातील सर्वात चर्चित आणि मागणी असलेले कौशल्य आहे. ए. आय. मॉडेल्स—जसे की चॅट जीपीटी, क्लाऊड, जेमिनी, मीडजर्नी यांना योग्य प्रश्न, सूचना आणि संदर्भ देऊन अपेक्षित आणि अचूक उत्तर मिळवणे ही या कामाची कला आहे. या मॉडेल्सना दिलेल्या सूचनेला “प्रॉम्प्ट” म्हणतात. चांगला प्रॉम्प्ट म्हणजे ए. आय. कडून योग्य प्रकारची, सखोल आणि तर्कशुद्ध माहिती मिळवण्याची गुरुकिल्ली. उदाहरणार्थ, एखाद्या जाहिरात कंपनीला नव्या उत्पादनासाठी प्रचार मोहीम तयार करायची आहे. जर त्यांनी ए. आय. ला फक्त ’नवीन शीतपेयासाठी जाहिरात तयार करा’, असा प्रॉम्प्ट दिला, तर ए. आय. सर्वसाधारण मजकूर तयार करेल. पण एक प्रशिक्षित प्रॉम्प्ट इंजिनिअर असे लिहील की, ’तरुणाईत ऊर्जा आणि आनंद निर्माण करत घट्ट मैत्री साधण्यासाठी शीत पेयाच्या ब्रँडची आकर्षक आणि उत्साहवर्धक शब्दामध्ये मराठी जाहिरात करा. ’ तर यामुळे तयार होणारे उत्पादन अधिक विशिष्ट, स्थानिक आणि प्रभावी ठरते. म्हणूनच, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे एक प्रकारे भाषिक आणि तांत्रिक कौशल्यांचा संगम आहे.

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त इंग्रजी किंवा मराठी भाषेचे ज्ञान पुरेसे नाही. डेटा मॉडेल्स, मशीन लर्निंगचे प्राथमिक तत्त्व, आणि ए. आय. च्या कार्यपद्धतींचे आकलन असणे आवश्यक आहे. वापरकर्त्याचा हेतू समजून त्यानुसार ए. आय. ला योग्य दिशेने मार्गदर्शन करणे, परिणाम तपासून त्याचे विश्लेषण करणे, आणि चुकीच्या प्रतिसादांवर सुधारणा सुचवणे, अशी सर्व कौशल्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा भाग आहेत. आज अनेक कंपन्या ’ए. आय. इंटरॅक्शन डिझायनर प्रॉम्प्ट आर्किटेक्ट, ए. आय. कंटेंट स्पेशालिस्ट’, अशा पदांसाठी भरती करत आहेत.

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगइतकेच महत्त्वाचे दुसरे क्षेत्र म्हणजे डेटा सायन्स म्हणजे विदा शास्त्र. ए. आय. चा आधारस्तंभ म्हणजे विदा. विदा गोळा करणे, तिचे वर्गीकरण करणे, चुकीची विदा गाळणे आणि मॉडेल्सना शिकवण्यासाठी त्याचा वापर करणे, या सगळ्या प्रक्रियेत विदा शास्त्रज्ञाची भूमिका निर्णायक असते. तसेच ’ए. आय. मॉडेल ट्रेनर’ किंवा ’डेटा एनोटेटर हीसुद्धा महत्त्वाची पदे निर्माण झाली आहेत. या कामात माणसाला योग्य उदाहरणे दाखवून ए. आय. ला शिकवायचे असते. उदा. फोटोमधून मांजर आणि कुत्रा ओळखणे, किंवा मजकुरातून भावना ओळखणे. या प्रकारचे काम मानवी अभिप्रायावर आधारित शिक्षण म्हणून ओळखले जाते.

ए. आय. च्या मदतीने आता लेखन, चित्रकला, संगीतनिर्मिती, व्हिडिओ एडिटिंग आणि डिझाइन या सर्जनशील क्षेत्रांत प्रचंड बदल घडला आहे. ‘जनरेटिव्ह ए. आय. ’ ही अशी प्रणाली आहे जी मजकूर, प्रतिमा, ध्वनी किंवा व्हिडिओ तयार करू शकते. त्यामुळे ’ए आय कंटेंट क्रियेटर’, ’ए आय व्हिडिओ एडिटर’, ’ए आय म्युझिक कंपोजर’, ’ए आय आर्ट क्रिएटर‘ अशा अनेक नव्या पदांची मागणी वाढली आहे.

आज अनेक तरुण चॅट जीपीटी किंवा क्लाऊडसारख्या साधनांचा वापर करून स्क्रिप्ट लेखन, ब्लॉग लेखन, किंवा मार्केटिंग कंटेंट तयार करून फ्रीलान्सिंग करत आहेत. काही जण ’मीडजर्नी’ आणि ’डाल-ई’ वापरून डिजिटल आर्ट तयार करतात, ज्याची विक्री NFT बाजारात किंवा ऑनलाइन गॅलरीमध्ये केली जाते. (NFT बाजार हा असा एक अद्वितीय डिजिटल मालमत्ता बाजार आहे, जिथे डिजिटल कला, संगीत, गेमिंग मालमत्ता आणि इतर संग्रहणीय वस्तूंची मालकी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे सत्यापित केली जाते.) त्यामुळे ए. आय. च्या माध्यमातून स्वावलंबी व्यवसाय निर्माण करण्याची संधीही वाढली आहे.

आरोग्य क्षेत्रात ए. आय. चा वापर निदान प्रक्रियेत वाढत आहे. एक्स-रे, एमआरआय स्कॅन किंवा रक्तातील घटकांचे विश्लेषण ए. आय. द्वारे जलद आणि अचूकरीत्या केले जाते. त्यामुळे ’ए आय मेडिकल डाटा एनॅलिस्ट’, ’हेल्थकेअर डेव्हलपर’, ’बायोइन्फॉर्मेटिक इंजिनियर’, अशी पदे तयार झाली आहेत.

शेतीत ए. आय. आधारित ‘प्रिसिजन फार्मिंग’ तंत्रज्ञानामुळे पिकांची वाढ, मातीतील पोषण आणि हवामानातील बदल यांचे निरीक्षण करता येते. यासाठी ए. आय. ड्रोन ऑपरेटर, विदा विश्लेषक, आणि कृषी-सल्लागार अशा पदांची गरज आहे.

शिक्षण क्षेत्रातही ’ए आय शिक्षक’, ’ए आय प्रशिक्षणासाठी तयार केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचा डिझायनर’ अशी नव्या पिढीची पदे निर्माण होत आहेत. शिक्षक आणि ए. आय. यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वैयक्तिक शिकवणी आणि विश्लेषण देण्याचे काम या पदांवर होते.

दुसऱ्या बाजूला ए. आय. जसजसे प्रगत होत आहे, तसतसे त्याच्या दुरुपयोगाचे धोकेही वाढत आहेत. बनावट माहिती – ज्याला आपण फेक न्यूज म्हणतो ती, डीपफेक व्हिडिओ, आणि विदा गोपनीयतेचे प्रश्न गंभीर झाले आहेत. त्यामुळे “ए आय एथिक्स विशेषज्ञ’, ’ए आय सायबर सुरक्षा रक्षक’, ’ए आय ची धोरणे ठरवणारा संशोधक’ अशा पदांना मोठी मागणी आहे. हे तज्ञ ए. आय. प्रणाली नैतिक, पारदर्शक आणि सुरक्षित राहतील यासाठी मार्गदर्शक धोरणे तयार करतात.

भारतासारख्या देशात ए. आय. वर आधारित स्टार्टअप्स झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य, वित्तीय सेवा, शिक्षण, वाहतूक, कृषी, आणि शासन व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत ए. आय. चा वापर करून नव्या संधी निर्माण होत आहेत. ’ए आय सल्लागार’, ’चॅटबोट निर्माते’, ’व्हॉइस इंटरफेस डिझाईन’, ’प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स’ अशा सेवांची मागणी वाढल्यामुळे तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मोठी संधी मिळाली आहे.

ए. आय. साठी आवश्यक शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी संगणक विज्ञान, गणित, सांख्यिकी, डेटा सायन्स, आणि भाषिक तंत्रज्ञान यांचा अभ्यास उपयोगी ठरतो. भारतातील अनेक विद्यापीठे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स जसे की Coursera, edX, NPTEL, IITs, आणि Google AI कोर्सेस, हे मोफत किंवा सशुल्क प्रमाणपत्र अभ्यासक्रम देतात. ‘Python’, ‘TensorFlow’, ‘PyTorch’, ‘Hugging Face’ यांसारखी साधने शिकणेही आवश्यक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्यात जिज्ञासा आणि शिकण्याची तयारी हवी. कारण ए. आय. क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि सतत नवीन तंत्रज्ञान येत आहे.

जरी ए. आय. अनेक कामे जलद आणि कार्यक्षमपणे करत असले, तरी त्याला मानवी संवेदना, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी शिकवावी लागते. म्हणूनच भविष्यातील ए. आय. व्यावसायिकांनी फक्त तंत्रज्ञान नव्हे तर मानवतावाद, मानसशास्त्र, आणि समाजशास्त्राचाही अभ्यास केला पाहिजे. मशीनच्या मर्यादा समजून त्याचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी करण्याची दृष्टी तरुणांमध्ये असली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटेमुळे नोकऱ्यांच्या स्वरूपात झालेला बदल अपरिहार्य आहे, परंतु तो विनाशकारी नाही. उलट, ज्यांना नवे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ए. आय. मुळे जगात सर्जनशीलता, विश्लेषण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांचा संगम घडत आहे. “प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग”, “डेटा सायन्स”, “ए. आय. एथिक्स”, “जनरेटिव्ह क्रिएटिव्हिटी” आणि “सायबरसुरक्षा” ही नव्या युगातील प्रमुख क्षेत्रे ठरत आहेत.

म्हणून आजचा तरुण जर या बदलत्या जगाकडे घाबरून न पाहता शिकण्याच्या दृष्टिकोनातून पाहू लागला, तर त्याच्यासाठी नवी युगनिर्मिती शक्य आहे. ए. आय. ही माणसाची जागा घेणारी प्रणाली नाही, तर माणसाची क्षमता अनेक पटींनी वाढवणारी साधनशक्ती आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सुसंस्कारित विचारशक्ती यांच्या संगमातूनच तरुण पिढी ए. आय. च्या मदतीने अधिक न्याय्य, सर्जनशील आणि प्रगत समाजाची निर्मिती करू शकते.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “नो प्रॉब्लेम, बोला” वखरेसाहेब म्हणाले. मनाशी नेमकं कांहीच ठरवलेलं नसल्याने जे आपल्या मनात आहे ते सगळं हातचं काहीही राखून न ठेवता मोकळेपणानं बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. गेल्या दोन दिवसात यासंदर्भात घडलेलं सगळं आणि त्यावरच्या माझ्या मनात उमटलेल्या त्या त्या वेळच्या प्रतिक्रिया यांचंच उत्स्फूर्त शब्दरूप माझ्याही नकळत मनाच्या तळातून उत्कटतेनं व्यक्त होत राहिलं..! )

“तसं पाहिलं तर प्रभूदेसाई आणि सहस्त्रबुद्धे दोघेही कालपरवापर्यंत तरी माझ्यासाठी अनोळखीच होते. ” मी म्हणालो. ” कदाचित दोघांनाही मी प्रथमच

भेटल्यामुळेही असेल घडलेल्या प्रसंगाकडे मी तिऱ्हाईत नजरेने पाहू शकलो. तरीही या सर्व प्रकरणात दोघांपैकी नेमकं कुणाचं चुकलं याचा खल मधे प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर आज करणं निरर्थकच वाटतं. तीन वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीचा आज पंचनामा करण्यासारखा तो केवळ एक उपचारच ठरेल. त्याऐवजी ही प्रदीर्घ काळ विलंबित राहिलेली तक्रार सहस्त्रबुध्देंनी विनाविलंब मागे घेण्यासाठी कांही करता येईल कां याचा विचार करणं याक्षणी गरजेचं आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी काय करायला हवं ते ठरवूया. “

” पण सहस्त्रबुद्धे तक्रार मागं घ्यायला सहजासहजी तयार होतील? “

” सहजासहजी नाही होणार. तो त्यांच्यापुरता तरी प्रेस्टीज इश्यूच बनलेला आहे. प्रभूदेसाईंची भूमिकाही मला तरी तितकीच ताठर आहे असंच वाटतंय. सहस्त्रबुध्देंचं समाधान होईल अशी शिक्षा प्रभूदेसाईंना व्हायला हवी असा त्यांचा आग्रह आहे आणि तोच आपल्यासाठी मोठा अडसर ठरायची शक्यता आहे. प्रभूदेसाईंची चूक आहे असं एक वेळ गृहित धरलं तरी कोणत्या चुकीला काय शिक्षा करायची हे बॅंकेच्या नियमांप्रमाणेच ठरवायला हवं. पण त्याने सहस्त्रबुद्धेंचं समाधान होणं अवघड आहे. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करावा लागेल पण ते त्यांचा कल पाहून. त्यातून कांही मार्ग सापडला तर प्रभूदेसाईंनाही थोडं नमतं घ्यायला लावणं हे ओघानं आलंच. पण ती नंतरची गोष्ट. “

“प्रभूदेसाईचं खरंच काही चुकलंय असं वाटतंय तुम्हाला? “

“ति-हाईतपणे विचार केला तर हो. मुख्य म्हणजे ‘साॅरी’ या शब्दाचं महत्त्व आणि शक्ती कुणीही कधीच विसरू नये. या प्रकरणात प्रभूदेसाईंनी ती ओळखली नव्हती. स्वत:चं कांहीतरी चुकलंय हे त्यांना योग्यवेळी जाणवलं असतं तर वाद सुरू होण्यापूर्वीच मिटला असता. एक पाऊल योग्यवेळी मागं घेणाराच दहा पावलं पुढं जाऊ शकतो. प्रभूदेसाईंना हे या प्रकरणामुळे कायम लक्षात राहिल असं वाटतं.

दुसरी गोष्ट प्रभूदेसाईंना सहस्त्रबुद्धे आजोबा हे नेहमीच तक्रारखोर म्हणून ‘अनवाॅंटेड कस्टमर’च वाटत असत. उलट

वस्तूस्थिती ही आहे कीं सहस्त्रबुध्दे हे एक साधे पेन्शनर कस्टमर आहेत. बँकेत ते फक्त दोन कारणांसाठीच यायचे. पेन्शन काढायला आणि महागाईभत्ता वाढीचा ठराविक अंतराने मिळणारा फरक जमा झालाय कां हे पहायला. सेंट्रल व स्टेट गव्हर्नमेंट पेन्शनर्सची खाती आणि त्या संदर्भात येणाऱ्या सर्क्युलर्सचा अभ्यास करून देय रक्कम योग्य वेळेत पेन्शनर्स खातेदारांच्या पेन्शनखात्यांमधे जमा करणे ही खरंतर बँकांचीच जबाबदारी. दैनंदिन कामातल्या बिझी शेड्यूलमधे ही किचकट कामे नेहमीच दुर्लक्षित रहाणं हा सार्वत्रिक अनुभवच आहे. बऱ्याच ब्रॅंचेसमधे सहस्रबुद्धेंसारख्या अभ्यासू आणि जाणकार पेन्शनरला एखादा क्लार्क मदतीला देऊन ती सर्क्यूलर्सची माहिती समजून घेऊन त्या कामांना प्राधान्य देणं जाणीवपूर्वक केलं जातंही. स्वतःची नेमकी अडचण सांगून, सहस्त्रबुध्देंशी मोकळेपणाने बोलून पेन्शनर्सच्या संदर्भातली कामे प्रभूदेसाई अशा पद्धतीने सहजसुलभपणे पूर्ण करू शकले असते. पण तसं न करता त्यांच्यावर ‘तक्रारखोर’ असा शिक्का मारून त्यांना मोडीत काढणं प्रभूदेसाईंना सोयीचं वाटलं आणि मन कलुषित व्हायला तेच कारणीभूत ठरलं. निदान ब्रॅंचमॅनेजर या पदावर काम करणाऱ्याने तरी सामोपचार आणि सहकार्य यांचं महत्त्व ओळखून नियमानुसार काम करतानाही सर्वांच्याच हिताचं ठरेल असा अॅप्रोच ठेवायलाच हवा असं मला वाटतं.

त्यादिवशी ज्या मन:स्थितीत सहस्त्रबुद्धे बँकेत आले होते याचा विचार केला तर ब्रँचमधे प्रवेश केल्यापासूनचा प्रभूदेसाईंचा त्यांच्या बाबतीतला अॅप्रोच कुणालाही खटकणं सहाजिकच होतं. सहस्त्रबुद्धेना पाहून ‘आता हा माणूस सकाळी सकाळी माझं डोकं खायला कशाला आलाय? ‘ हाच विचार प्रभूदेसाईंच्या मनात आल्यासारखं ते त्यांना सातत्याने टाळतच राहिले होते. त्यांच्यानंतर आलेल्या महत्वपूर्ण ग्राहकाला प्राधान्यक्रमाने अटेंड करणं चुकीचं नसलं तरी निदान सहस्त्रबुद्धे दुसऱ्यांदा केबिनमधे आले तेव्हा तरी त्यांचं (वरवर कां होईना) हसतमुखाने स्वागत करून, ”काय काम आहे? ” असं अगत्याने विचारून कामाचं स्वरूप ते जाणून घेऊ शकले असते. फक्त बॅंकेचाच विचार करायचा म्हंटलं तरीही क्षणार्धात हातावेगळं करता आलं असतं इतकं किरकोळ काम होतं त्यांचं. पण सहस्त्रबुध्देंच्यासाठी तेच काम अतिशय निकडीचं तर होतंच आणि तितकंच महत्वाचंही. त्या कामाचं स्वरूप समजल्यानंतर तरी प्रभूदेसाई अकाऊंटंला बोलावून त्याच्यावर ते काम सोपवू शकले असते आणि प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटला असता. पण घडलं वेगळंच. ‘मी बोलावल्यानंतरच त्यांनी केबिनमधे यायला हवं.. ‘ हा प्रभूदेसाईंचा दुराग्रह समर्थनीय नक्कीच नव्हता. निदान एका जबाबदार ब्रॅंच मॅनेजरकडून तरी हे अपेक्षित नव्हतं असं मला वाटतं. बायको नुकतीच गेल्यानंतरची समोर उभ्या एका वृध्द ग्राहकाची मनोवस्था ब्रॅंचमॅनेजरला माहित नसणं गृहित धरलं तरी कांही कामानिमित्त केबिनमधे

आलेल्या सामान्य ग्राहकाला निदान आपुलकीची वागणूक देण्याचं भान तरी त्यांनी राखायला हवं ना? ते राखलं गेलं असतं तर त्या ग्राहकाचं काम लक्षपूर्वक समजून घेता आलं असतं. आणि त्यामुळे त्या वृध्द ग्राहकाच्या मन:स्थितीची जाणीवही त्याने न सांगताच झाली असती. त्यानंतर आपसूकच आलेले सांत्वनाचे दोन शब्दही त्याचं समाधान करायला पुरेसे ठरले असते. पण ते काय सांगताहेत याच्याकडे प्रभूदेसाईंचं पूर्ण लक्षच नव्हतं. या माणसाला कसं घालवायचं एवढाच विचार ते करत होते. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती त्यांना समजूच शकली नाही. शिवाय त्यानंतरचं त्यांचं लागट असं तोडून बोलणं तर कुणालाही संताप यावा असंच होतं. या पार्श्वभूमीवरची त्या विशिष्ट मन:स्थितीत सहस्त्रबुध्देंकडून उमटलेली टोकाची प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल कुणालाही किंव वाटावी अशीच होती. याक्षणी नकळत कां असेना आपल्याकडून अक्षम्य चूक झालीय ही जाणीव प्रभूदेसाईंना होणं अपेक्षित होतं. आणि ती न होणंच पुढच्या अरिष्टाला आमंत्रण देणारं ठरलं. हे सगळं सांगण्यामागे प्रभूदेसाईंच्या सारख्या स्टार परफॉर्मरला दोष देण्याचा माझा उद्देश नाहीये. निर्माण झालेल्या परिस्थितीचं ति-हाईत नजरेनं विश्लेषण करताना जे जाणवलं ते मांडणं आवश्यक वाटलं एवढंच. या सगळ्यामुळे निर्माण झालेलं सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनातलं दुखावलेपण समजून घेऊन त्याची तीव्रता कमी करायचा प्रयत्न करणं अगत्याचं आहे असं मला वाटतं. तरच निर्माण झालेला हा प्रश्न पुढे योग्य पद्धतीने सोडवणं सोपं जाईल. “

माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असताना वखरे साहेब कांहीसे गंभीर झाले होते. मी बोलायचं थांबताच ते भानावर आले.

“हे खरंच खूप विचित्र आहे. यापुढं हे प्रकरण आणखी न चिघळता सामोपचारानं मिटवायलाच हवं. प्रभूदेसाईला हे सांगणं फारसं अवघड नाही. मी बोलेन त्याच्याशी. पण सहस्त्रबुद्धेंचं काय? ते हटूनच बसले तर? “

“मी उद्या सकाळीच भेटतो सहस्त्रबुद्धेना. बोलतो त्यांच्याशी. बाकी कांही नाही तरी ते कसा प्रतिसाद देतात हे तरी समजेल. “

त्या दिवसापुरता हा विषय असा अधांतरीच राहिला. मनात विचार सुरू झाले ते उद्या सकाळी त्यांना भेटल्यानंतर काय बोलायचं याचेच.

नियोजित एम्. डी. मिटींगमुळे

निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची थेट कल्पना सहस्त्रबुध्देना देणं आमच्या निर्णयप्रक्रियेत अडसर निर्माण करणारं ठरू शकतं असतं. कदाचित ते ऐकून सहस्त्रबुद्धे प्रभूदेसाईना अडचणीत आणण्यासाठी तडजोड करणं नाकारतील ही भीती होतीच. अधिक उशीर न होता सहस्त्रबुध्देना लवकरात लवकर न्याय मिळावा ही माझ्या मनातली प्रामाणिक भावना योग्य पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचवणं एवढंच माझ्या हातात होतं. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही इच्छा असूनही मी त्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. काय करायचं ते ‘तो’ पाहून घेईल असं म्हणून सगळं त्या’च्यावर सोपवण्याशिवाय माझ्या हातात दुसरं होतंच काय?

त्या त्या क्षणापुरते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे असे प्रसंग कधी ना कधी प्रत्येकाच्याच आयुष्यात अचानक निर्माण होतात आणि आता एखादा चमत्कार घडल्याशिवाय यातून मार्ग निघणं शक्यच नाही असं वाटण्याइतके आपण हतबल होऊन जातो. मीही याला अपवाद नव्हतो. अशा प्रत्येकवेळी माझ्या मनावरचं सगळं ओझं ‘तो’च आपसूक उतरवून घेतो. मग जे कांही घडतं ते सहजपणे योगायोगानेच घडलंय असं वाटावं असंच असतं, पण माझ्यापुरता त्या क्षणी तरी तो चमत्कारच असतो. अतिशय अकल्पित आणि ‘त्या’चा परीसस्पर्शच वाटावा इतका अतर्क्यही..!

दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहस्रबुद्धे आजोबांच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मनात विचार होते ते आता त्यांच्याशी काय बोलायचं याचेच. मनातली हतबलता कधीच विरून गेली होती. अनिश्चिततेचा तर लवलेशही नव्हता. हीच पुढे घडू पहाणाऱ्या चमत्काराची सुरूवात आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाही नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares