तिथे जाण्यासाठी तुम्हाला कधीही निमंत्रणाची गरज नसते.
आधी फोन करण्याचीही आवश्यकता नसते. तुम्ही कोणते कपडे घातले आहेत, तुम्ही किती यशस्वी झाला आहात किंवा तुमचा दिवस कसा गेला आहे, याने काहीही फरक पडत नाही.
ते घर नेहमीच तुमची वाट पाहत असतं.
उघडण्यासाठी तत्पर असलेलं एक दार. बालपणाच्या आठवणींमध्ये क्षणार्धात घेऊन जाणारा परिचित सुगंध. आणि तुमच्या येण्याची चाहूल लागताच आनंदाने उजळून निघणारी दोन प्रेमळ हृदये.
हे जगातील एकमेव ठिकाण आहे, जिथे तुम्ही असे प्रवेश करू शकता जणू तुम्ही कधीच तिथून दूर गेले नव्हता.
न विचारताच तुमच्यासमोर जेवणाचं ताट येऊन ठेवले जाते. आणि तुम्ही खाण्यास नकार दिलात, तर प्रेमाने थोडं रागावलंही जातं.
हे ते ठिकाण आहे जिथे तुमची शांतता ओळखली जाते, तुमच्या गोष्टी जपल्या जातात, आणि तुमची केवळ उपस्थितीच पुरेशी असते.
तिथे वेळ जणू थांबून जातो.
आई अजूनही तुमच्याकडे तितक्याच ममतेने पाहते, जशी ती नेहमी पाहत आली आहे. बाबा अजूनही तुम्हाला पाहून आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या डोळ्यांतून सत्य स्पष्ट दिसतं.
आणि मग एक दिवस, कोणतीही पूर्वसूचना न देता, ते घर हरवून जातं.
भिंती नाहीशा झाल्या म्हणून नाही. घर विकलं गेलं म्हणूनही नाही.
तर त्या घराला “घरपण” देणारी माणसं दार उघडण्यासाठी तिथे नसतात म्हणून.
म्हणून, जर अजूनही तुमच्याकडे ती संधी असेल तर…
जा.
त्यांना भेटा. त्यांच्यासोबत काही वेळ बसा. त्यांच्या गोष्टी ऐका. एकत्र जेवा. एकत्र हसा. आणखी एक छायाचित्र काढा. आणखी एक मिठी मारा.
कारण आई-बाबांचं घर कायमचं नसतं.
एक दिवस असा येईल, जेव्हा त्या दारातून पुन्हा एकदा आत जाऊन ते नेहमीप्रमाणे तुमची वाट पाहत उभे आहेत, हे पाहण्याची एक संधी मिळावी अशी तुमची मनापासून इच्छा असेल.
जर अजूनही तुमच्याकडे हे भाग्य असेल, तर ते उद्यावर ढकलू नका.
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समर्पण (२)
पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम भगवंताच्या पायी लीन झाले आहेत, त्यांची देह बुद्धी नष्ट होऊन परमेश्वराशी त्यांनी स्वतःला कसे समर्पित केले आहे याविषयीचे काही अभंग मागील लेखात आपण पाहिले. आज आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
महाराजांना चोहीकडे एका परमेश्वराचेच रूप दिसत आहे, त्याचाच आवाज त्याला ऐकू येत आहे. ते देवाला म्हणतात…
ध्याईन तुझे रूप/ गाईन तुझे नाम/
आन न करी काम/ जिव्हा मुखे//
पाहिन तुझे पाय/ ठेवीन मी डोई/
पृथक ते काही/ न करी आन//
तुझेचि गुण नाद/ आईकेन कानी/
आणिकांची वाणी/ पुरे आता//
करीन मी सेवा करे/ चालेन मी पायी/
आणिक न वजे ठायी/ तुजविण//
तुका म्हणे जीव/ ठेवीन मी पायी/
आणिक ते काही/ देऊ कवणा//
हे देवा मी सदैव तुझेच रूप माझ्या डोळ्याने पाहत राहीन आणि तुझेच नाम सतत गात राहीन. माझ्या जिभेवर दुसरे काहीच येणार नाही. माझ्या डोळ्यांनी फक्त तुझे पाय मी पाहीन आणि त्यावरच माझे मस्तक ठेवीन.
त्याशिवाय दुसरे काही करणार नाही. तुझे गुणगान ऐकत राहीन, बाकी काही बडबड करणार नाही. तुझ्याकडे पायी चालत येईन आणि या माझ्या हाताने तुझी सेवा करीन. तुला सोडून दुसरीकडे कोठेही मी जाणार नाही. हा माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करीन. आता दुसऱ्या कुणाला देण्यासाठी माझ्याकडे काही उरले नाही. हरीनामा- व्यतिरिक्त तुकारामांकडे काही नव्हते, ते हरिमय झाले होते.
एका विठू माऊलीला शरण गेल्याने भक्ताचा कसा फायदा होतो ते महाराज या अभंगात सांगत आहेत.
भावे ऐसा नाश/ अवघिया दिला त्रास/
अविटाचा केला संग / सर्व भोगी पांडुरंग//
आइताच पाक/ संयोगाचा सकळीका/
तुका म्हणे धणी / सीमा राहिली होऊनी//
आज पर्यंत मी दुसऱ्यांना जो काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे मला जे पाप लागले असेल, ते या पांडुरंगाला शरण गेल्यामुळे आता नष्ट होईल. कारण त्याच्या अवीट भक्तीमुळे मला त्याचा संग लागला आहे आणि माझी सर्व सुखदुःखे तो एक पांडुरंग आता भोगत आहे. तुकाराम महाराजांना हेच सांगायचे आहे की हरिभक्तीत लीन झाल्यामुळे भक्ताला सुखदुःखाची जाणीव राहत नाही. कोणत्याही परिस्थितीत, चांगली अथवा वाईट त्याचा समभाव राहतो.
तुकाराम सांगतात की अन्नाचा दुष्काळ पडला आहे किंवा त्यांना फार भूक लागली आहे म्हणून ते अन्न सेवन करत नाहीत, तर सर्वसाक्षी जनार्दनाचा मान राखण्यासाठी ते भोजन करतात. बालका बरोबर जर ते जेवावयास बसले तर त्यांना असे जाणवते की आमचा पिताच आम्हाला मोठ्या प्रेमाने भरवीत आहे.
चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे जेथे जळून जातात ते आत्मपद महाराजांना प्राप्त झाले आहे. मी कोणी नसून कर्ता- करविता तोच एक नियंता आहे याची अनुभूती त्यांना आलेली आहे.
तुकारामांच्या मनाची ही अवस्था ते या अभंगातून कशी व्यक्त करत आहेत ते बघा.
जे जे काही करितो देवा/ ते ते सेवा समर्पे//
भेद नाही सर्वात्मना/ नारायणा तुज मज //
आम्ही दुजे नेणो कोणा/ हेचि मना मन साक्ष/
तुका म्हणे जगन्नाथा/ हे अन्यथा नव्हे की//
ते जे जे काही कर्म करतात ते ते सर्व एका नारायणाला समर्पित करायचे या एका मनोभूमीकेतून. सर्वात्मक सर्वेश्वर आणि तुकाराम महाराज स्वतः यात तो आणि मी असा जराही भेद आता राहिलेला नाही. त्यांचे मनच या स्थितीला साक्षी आहे. ते पुन्हा पुन्हा सांगतात, ” हे जगन्नाथा, मी हे जे सांगतो आहे ते पूर्ण सत्य आहे, यात जराही खोटेपणा नाही.”
लोहचुंबकाच्या बळे/ उभे राहिले निराळे/
तैसा तूचि आम्हा ठाई/ खेळतासी अंतर्बाही //
भक्ष अग्नीचा तो दोरा/ त्यासी वाचवी मोहरा/
तुका म्हणे अधीलपणे/ नेली लाकडे चंदने//
नारायणाच्या संगतीने भक्त कसा परमेश्वराशी एकरूप होतो हे तुकाराम महाराजांनी वरील अभंगात काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते, तसा परमेश्वर भक्तांच्या अंतर्बाह्य उभा आहे. धाग्याचा धर्म आगीने जळण्याचा असतो, परंतु तोच धागा मोहरा नामक खड्याला गुंडाळून अग्नीत टाकला तर जळत नाही. चंदनाच्या संगतीने इतर वृक्षांचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो. सत्संग किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते. तात्पर्य, देवाच्या संगतीने भक्त आमुलाग्र बदलतो.
समर्पणाविषयी अनेक अभंग आपल्याला गाथेत आढळतात. मला असे वाटते की या सर्व अभंगांचा आपण अभ्यास करावा. चांगल्या वाचनाने आपल्यावरही चांगले संस्कार होऊन उचित परिणाम होऊ शकतो. यास्तव पुढील लेखात समर्पणाविषयीचे आणखी काही अभंग आपण अवश्य विवेचनासाठी घेऊ.
मी जयपूरच्या विमानतळावर उतरलो. एरवी सरफरोश, कच्चे धागे अशा चित्रपटांतून पाहिलेल्या राजस्थानच्या भूमीवर मी आज पहिल्यांदाच पाऊल ठेवले. अनेक शूरवीरांच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक ठरलेल्या, ‘त्या’ भूमीवर पाय ठेवताक्षणी मी त्या भूमीला वंदन केले. विमानतळावर मला घेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोपाल गुप्ता आणि त्यांची सर्व टीम हार-तुऱ्यांसह आली होती. हॉटेलवर पोहचण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले. तेवढ्या रात्री उद्या जयपुरात होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य अधिवेशनाच्या तयारीची बैठक घेण्यासाठी सर्व सहकारी तयार होते. बैठक झाली. अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी गेल्यावर मी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचा एक वाजला होता.
उद्याच्या कार्यक्रमाचे चिंतन करत मी अंथरुणावर पडलो होतो, पण झोप काही लागेना. मी सकाळी सातपासून एवढी पळापळ केली तरी, झोप का लागत नाही? याचा विचार मी करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की मुंबईत डॉ. मीना जोशीकाकू धर्माबाद येथून आल्या होत्या. त्यांच्या गडबडीत व्यंकटेश जोशीकाका यांनी मला जेवूच घातले नाही. मी त्यांच्यासोबतच फिरत होतो. मुंबईच्या हॉटेल वेलकमपासून ते जयपूरमधल्या हॉटेलपर्यंतचा माझा प्रवास कमालीचा पळापळीचा होता. मी हॉटेलच्या रिशेप्शनचा फोन डायल केला. त्यांना जेवणाविषयी बोललो. त्यांनी मला सांगितले, किचन अकरा वाजताच बंद झाले आहे. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. मी जेवणासाठी ऑनलाईन पार्सल मागविले. खाली काऊंटरवर आलो. दरवाजा उघडून बाहेर पाहिले, तर जोरदार पाऊस चालू होता. रस्त्याने गुडघाभर पाणी वाहत होते. अर्ध्या तासाने, तेवढ्या पावसातही माझे पार्सल आले.
पार्सल देणाऱ्या व्यक्तीने मला पार्सल दिले. पाऊस केव्हा कमी होईल, याची तो माणूस वाट पाहत होता. इतक्यात हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या माणसाला जाग आली आणि तो पार्सल आणलेल्या व्यक्तीला पाहत म्हणाला, ‘अरे ‘नाझ’, तू अजून घरी गेला नाहीस का? अजून इथेच कसा?’
त्याने सांगितले, ‘नाही, निघालो होतो. येथे असलेल्या साहेबांची ऑर्डर होती. होम डिलेव्हरी देणारी मुले घरी गेली होती. त्यामुळे मलाच यावे लागले. आता पार्सल देऊन घरी निघावे म्हटले, तर जोरदार पाऊस सुरू झाला’. अचानक लाईट गेली. साफसफाई करणाऱ्या माणसाने मेणबत्ती लावली. आम्ही तिघेजण त्या मेणबत्तीच्या उजेडात बसलो. पाऊस काही थांबत नव्हता. लाईट कधी येणार आहे, हे माहिती नव्हते. मी तिथेच जेवणाचे पार्सल उघडले आणि जेवायला सुरुवात केली. त्या दोघांनाही मी जेवण्यासाठी आग्रह करीत होतो. पण ते दोघेही जेवत नव्हते. मी जेवत जेवत बोलायला सुरुवात केली.
‘नाझ’ हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खूप सुंदर नाव आहे. ‘आमच्याकडे मुलाचे नाव लहानपणी मुलाची आत्या ठेवते. तुमच्यामध्ये कोण ठेवते?’ असे मी त्या पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला विचारले. त्यावर हॉटेलमध्ये सफाई करणारा आणि ‘नाझ’ दोघे एकमेकांकडे पाहत होते. त्यांनी मला ऊत्तर दिलेच नाही. आमचे बोलणे चालूच होते. बोलण्यातून एकएक करून अनेक विषय समोर येत होते. माझ्यासमोर बसलेले ते दोघेजण हातचे राखून बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून एक विषय पुढे आला, तो म्हणजे राजस्थानात गरिबी एवढी चिकटली आहे की, त्यातून बाहेर पडणे पिढ्यानपिढ्या शक्य नाही. तोच सफाई करणाऱ्या सोयबला कुणीतरी आवाज दिला, म्हणून तो बाहेर गेला. त्यानंतर मी आणि ‘नाझ’ बोलत बसलो. ‘नाझ’ हे कमालीचे वेगळेपण असलेले व्यक्तिमत्त्व होते. कसली सामाजिक आणि आर्थिक चिंता नाही. तो बिनधास्त जगतोय, अगदी जगाची पर्वा न करता! अनेकांना सोबत घेऊन.
मी जयपूरच्या मयूर हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलपासून अगदी जवळच नाझ राहतोय. तिथे त्याचे आणि त्याच्या मित्राचे एक छोटेसे हॉटेल आहे. जयपूरमध्ये लहानाचे मोठे होताना ‘नाझ’ने जे भोगले होते, ते खरे तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असेच होते. पण त्यातून तो एवढा आनंदी आणि समाधानी आहे की, त्याच्यासारख्या अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे.
‘नाझ’ची कहाणी सुरू होते, एका अशा गल्लीत, जिथे जाणे म्हणजे सामाजिक स्वास्थ्याच्या विरुद्ध मानले जाते. ‘नाझ’ची आई सुलताना देहविक्रीचे काम करायची. जेव्हा ‘नाझ’चा जन्म झाला, तेव्हा सुलताना हिने ठरवले की, आता हा व्यवसाय सोडून आपण दूर कुठे तरी नव्याने आयुष्य सुरू करायचे. ‘ती’ त्या दलदलीतून बाहेर पडली. तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले. सुलताना हिने कधीही ‘नाझ’च्या बाबतीत कुणालाही खोटे सांगितले नाही. पण त्याचे परिणाम ‘नाझ’ला भोगावे लागले. ‘नाझ’ त्यातून बरेच काही शिकला.
तो माझ्याशी बोलताना म्हणाला, ‘मला बाप नाही, हे माझ्या आसपास असलेल्या लोकांना खूप खटकते. मला बाप नाही, मी बिनबापाचा जन्मलो, हा विषय ते सतत काढत असतात. मला जे विचारतात, त्यांच्या आयुष्याकडे जेव्हा मी बारकाईने पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येते की, त्या व्यक्तीचे आणि त्याच्या वडिलांचे आयुष्यभर कधीच पटले नाही. अनेकांना वडील आहेत, पण त्यांनी त्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. अनेकांना वडील असून ते त्यांच्या सोबत राहत नाहीत. अनेकांना वडील आहेत, पण ते त्यांच्याशी बोलत नाहीत. दुरावा आणि दुरावा हे त्या अनेक मुलांना जसे लागू होते, तसे बापांनाही लागू होते. वडील आणि मुलगा, मुलगा आणि वडील या दोघांमधले नाते किती ठिकाणी चांगले राहते? ते कसे वाईट आहे? याचे अनेक दाखले मला ‘नाझ’ने दिले.
‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही ज्या मुस्लिम गल्लीत राहत होतो, तिथे मी लहान असताना सर्व मित्र मला ‘ये नाझयज औलाँद है’ म्हणून चिडवायचे. मी माझ्या ओळखीच्या मौलवींकडे याबाबत तक्रार केली. त्यावर मौलवी मला हसून म्हणाले, ‘तू नशीबवान आहेस. तुझ्यामुळे कुणाला तरी असुरी आनंद घेता येतो. हे चांगले आहे. तूही सर्वांना सांग, अगदी अभिमानाने, माझे नाव ‘नाझ’ आहे. ‘नाझ’ म्हणजे अभिमान, ‘नाझ’ म्हणजे आपलेपण. अरे, या जगात कुणी बिनबापाचा नसतो. सर्वांचा बाप अल्लाह आहे. कुणीही येथे पोरका नाही’.
मौलवीच्या सांगण्यानंतर माझ्याआधी माझ्या मित्रांनी माझे नाव सगळ्या गल्लीला सांगितले. माझ्या अगोदर माझे नवे नाव कुणीतरी अम्माला जाऊन सांगितले.
‘नाझायज’चा ‘नाझ’ आता सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. ‘नाझ’ने स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. तिथे अनेक माणसे काम करतात. ‘नाझ’ आणि मौलवी यांच्यातील नाते आता खूप छान झाले होते. मौलवींच्या मदतीने ‘नाझ’ने अम्मासह अनेकांच्या मदतीने ‘नाझ’सारखी असलेली अनेक मुले शोधून काढली. त्यांचे समुपदेशन करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्या सर्व मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून आलेले अनुभव आणि मिळालेले नाव यावर ‘नाझ’ माझ्याशी खूप भरभरून बोलत होता. ‘नाझ’ची पत्नी रेश्मा ‘सलोखा’ नावाची सामाजिक संस्था चालवते. ‘नाझ’चे सामाजिक काम पाहून रेश्मा ‘नाझ’सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. या दोघांना रुक्साना, सरिता आणि विजयमाला अशा तीन मुली आहेत. त्या तिन्ही मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांचा प्रथम येण्याचा क्रम दरवर्षी ठरलेला असतो.
मी ‘नाझ’ ला म्हणालो, ‘ही नावे अशी वेगवगेळी का ठेवली?’
‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही अशी नावे मुद्दामच ठेवली आहेत. मी आणि रेश्माने कधी आपला धर्म एकमेकांवर लादला नाही’.
आम्ही गप्पांमध्ये एवढे रमलो की, बाहेर पावसाची रिपरिप थांबली, हे आमच्या लक्षातच आले नाही. ‘नाझ’ बाहेर गेला. त्याने पाहिले की आता पाऊस थांबला आहे. ‘मी निघतो’ म्हणत ‘नाझ’ निघाला. नेमकेच जेवण झाले आहे. चला शतपावली करू, या उद्देशाने मीही ‘नाझ’सोबत बाहेर पडलो.
‘नाझ’ने बॅग गाडीला अडकवली आणि आम्ही जयपूरच्या ‘त्या’ रस्त्याने गपा मारत फिरत होतो. मध्येमध्ये आकाशातून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. आकाशातले ते पाणी जेवढे स्वच्छ होते, तेवढीच ‘नाझ’ची इमानदारी, वर्तन आणि माणुसकी स्वच्छ होती. मेहनतीतून कमवायचे, निराधार मुलांना रस्ता दाखवायचा, कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे, लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घ्यायचा, सामाजिक ‘सलोख्या’साठी प्रयत्न करायचे, असे अनेक उपक्रम ‘नाझ’ आणि त्यांच्या पत्नी रेश्मा दोघे मिळून चालवत होते.
मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘आता रात्र खूप झाली आहे. आपण परत हॉटेलच्या दिशेने निघूया’. त्यावर ‘नाझ’ विनंती करत म्हणाला, ‘साहेब, अगदी बाजूलाच माझे घर आहे. आपण पाच मिनिटांसाठी आलात, तर बरे होईल’.
मी होकारार्थी मान हलवली. आम्ही ‘नाझ’च्या घरी गेलो. आम्ही घरी येतोय हे ‘नाझ’ने अगोदरच घरी सांगितले होते. ‘नाझ’च्या आईने दरवाजा उघडला. ‘नाझ’ची रेशमाही आमची वाट पाहत होती. छोटेसे, पण अत्यंत नीटनेटके घर. त्या घरात मंदिर आणि मज्जितमधील ‘देवपण’ समसमान दिसत होते. ‘नाझ’, ‘नाझ’ची आई सुलताना, ‘नाझ’ची पत्नी रेश्मा यांच्यासोबत माझ्या खूप गप्पा झाल्या.
सुलताना म्हणाल्या, ‘माझ्या मुलाने, माझ्यामुळे खूप भोगले आहे. त्यातून तो आता सावरला आहे. ज्याचा त्याला त्रास व्हायचा, राग येत होता, त्यातून त्याने सावरून मौलवीच्या मदतीने खूप मोठे काम उभे केले. ‘नाझ’ लहान असताना मुले त्याला चिडवायची, तू ‘नाझायज औलाद हैं’ असे म्हणायची. त्यावर ‘नाझ’ घरात येऊन स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायचा. मी त्याला समजून सांगायची. त्यावर तो ओरडून मला विचारायचा, ‘खरं सांग, माझा बाप कोण आहे?’
तो जसाजसा मोठा गेला, तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली’. ‘नाझ’कडे पाहत सुलताना म्हणाली, ‘माझ्या ‘नाझ’चा मला अभिमान आहे. ‘नाझ’ने कित्येकांच्या आयुष्यात सोनेरी सामाजिक पहाट आणून दिली.
‘नाझ’च्या गालावरून हात फिरवत सुलतान म्हणाली, ‘बेटा, काळजी घे स्वतःची. खूप पळापळ करतोस तू. मुली मोठ्या होत आहेत त्यांची काळजी घे. किती डोळे खोल गेलेत तुझे’ असे म्हणताना सुलतानाच्या डोळ्यांत पाणी आले. सुलतानाने ‘नाझ’ला जवळH’b घेतले. ‘नाझ’ सुलतानाच्या मांडीवर झोपी गेला. सुलताना ‘नाझ’ला थोपटत होती. सुलतानाआईच्या प्रेमाला कोणत्या शब्दांत बांधावे, असे मला झाले होते.
रेश्मा म्हणाली, ‘या जगात असे अनेक ‘नाझ’आहेत, ज्यांना रस्ता दाखवण्याची गरज आहे. नाहीतर ते व्यसनाला जवळ करतात. दरवर्षी एकट्या राजस्थानमध्ये असे ‘नाझ’ वीस हजारापेक्षा जास्त सापडतात. हाच आकडा देशभरात दहा पट आहे. जगभरातल्या ‘नाझ’चा विचार केला, तर अशा ‘नाझ’ची एक मोठी जमात तयार होऊ शकते. यातली साठ टक्क्यांहून अधिक माणसे लोकांच्या बोलण्यामुळे जगणे सोडून देतात आणि उर्वरित चाळीस टक्के लोकांच्या बोलण्याला घाबरून जीव मुठीत धरून जगतात’.
मी घड्याळाकडे पाहिले. रात्र आता संपण्याकडे झुकली होती. मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘चला ‘नाझ’कुमार, निघावे लागेल मला. तुम्ही तुमच्या आईच्या कुशीत आहात. माझी आई फारच लांब आहे’.
त्यावर दुसऱ्या बाजूने मला सुलताना आईने पकडले आणि मांडीवर झोपवले. सुलताना मला म्हणाली, ‘बाळा, आई शोधा, म्हणजे सहज सापडेल’.
तो क्षण कमालीचा भावनिक होता. मी ‘नाझ’च्या घरातून बाहेर पडलो. सोबत ‘नाझ’ही होता. ‘नाझ’ मला हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आला. त्याची गाडी घेऊन तो परत घरी गेला. त्या हॉटेलमध्ये अजून लाईट आली नव्हती. मी विचार करीत होतो, अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या ‘नाझ’ला हाच समाज पूर्वी नावे ठेवत होता. आता हाच समाज ‘नाझ’चा उदो उदो करतो. या समाजाचे खरे रूप काम करणाऱ्या, वेगळेपण जपणाऱ्या, सामाजिक प्रवाहात असणाऱ्या माणसाला कधी दिसले नाही. उलट या टीका करणाऱ्या, बेसुमार वागणाऱ्या माणसांच्या चुकीच्या वागण्यामुळे चांगली माणसे अजून चांगले काम करीत असतील, जसा ‘नाझ’ करतो. सामाजिक स्वास्थ्य ‘यांनी’ बिघडवले, असा ज्यांच्यावर बेसुरी सामाजिक शिक्का बसला, पण त्यांनी सामाजिक स्वास्थ्य खऱ्या अर्थाने सुधारले, असे अनेक ‘नाझ’ आपल्या अवतीभोवती आहेत. त्या ‘नाझ’ला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून मदत करणे गरजेचे आहे, बरोबर ना? करणार ना तुम्ही मदत?
त्या लाकडी पेटीमध्ये नववधूचे वस्त्रालंकार म्हणजे तिच्या भाषेत दुल्हन का जोडा… लाल रंगाचा… आणि इतर ब-याच वस्तू निघाल्या… लग्नाच्या वेळी नवरी अंगावर मोठ्या हौसेने घालते त्या सर्व वस्तू सुद्धा होत्याच. एकक्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर त्याची बहिण जणू साक्षात उभी राहिली! तिच्या लग्नात ती अशाच पेहरावात सजली होती आणि तो तिच्यामागे तलवार घेऊन उभा होता. लग्नासारख्या आनंदाच्या सोहळ्यात शस्त्रांचं काय काम? त्यानं लहानपणी त्याच्या वडिलांना विचारलं होतं. वडील म्हणाले होते, “इथं राज्य करणा-या लोकांचे सैनिक मांडवात घुसून नवरीला थेट उचलून घेऊन जात… आणि नंतर त्या पुन्हा कधीच नजरेस पडत नसत. म्हणून संरक्षणासाठी, हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा तलवारींचा पहारा ठेवावा लागे… नंतर ही प्रथाच पडून गेली!”
“दादा, मला इकडे पाठवू शकाल त्या सा-या वस्तू… आणि तो पोशाख?” फोनवरून पलीकडून थरथरता प्रश्न ऐकून साहेबांच्या हृदयात कालवाकालव झाली! “पत्ता आहेच माझ्याकडे. पाठवण्याची व्यवस्था करतो, ताई!” साहेबांनी असं म्हणत फोन ठेवला. कॅप्टन साहेब म्हणाले, ”यह सभी चीजें अच्छे से pack करके इस address पे जल्द से जल्द भेज दो!” आणि साहेब आपल्या जीपकडे वळाले. त्यांनी एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिले!
ती त्या घरात नववधू अगदी काहीच वर्षांपूर्वी आली असावी. दोन मजली घर ते. त्याला खोल तळघरसुद्धा होतं. त्यात बरंच काही साठवून, लपवून किंवा सांभाळून ठेवता यायचं. घरामागे बर्फाने आच्छादलेले पहाड, त्यांवर उंच उंच झाडं. खळाळणारे ओहोळ. सफरचंदाच्या बागांतून पिकू लागलेल्या फळांचा मनमोहक वास. केशर तर इथल्या कणाकणात जणू मिसळून गेलेलं. धुकं असं की वाटे आभाळातून चालतो आहोत आपण. सूर्य उष्णता देणारा एक गोळा आहे, हे इथं कुणाला ठावेच नसावे… इतकी थंडी… दिवस कसे निघून चालले होते ते समजतही नव्हतं!
एकेदिवशी रात्री घराचा दरवाजा ठोठावत काळ आला… जोडीला हवेत बंदुकीतून डागल्या गेलेल्या गोळ्यांतील दारूचा दर्प होताच. “चला, निघा… नाही तर जीवाला मुकाल!” आवाज आणि चेहरे ओळखीचे होते… पण त्या चेह-यांवरचे डोळे आज अंधारातही चमकत होते… एखाद्या श्वापदाचे चमकतात तसे. ते शब्द खरेच होतील अशी खात्री पटली… कारण शेजारच्या घरांतून प्राणांतिक किंचाळण्याचे आवाज कानांवर आदळत होते… !
जगात राहायचे म्हणजे जिवंत राहण्यास प्राधान्य द्यावे लागते… नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर पडावं लागलं सर्वांना. जेवताना हातात घेतलेला घास तसाच ताटात टाकून द्यावा लागला… हात धुण्याचीही फुरसत लाभली नाही. सफरचंदाच्या व्यापारासाठी घराबाहेर पडलेले बाप-लेक रात्री घरी आले नव्हते. रस्त्यात अडकून पडले असतील अशी मनाची समजूत घालत सासू-सुना बळेच डोळे मिटून अंथरुणावर पहुडल्या होत्या… आणि त्यात दारावर पडलेल्या त्या थापा! जोडीला मोठ्या आवाजातले दरडावणे!
दिल्लीत पोहोचता पोहोचता जीव कासावीस झाला होता. बाप्या माणसांचा तर अजूनही तपास लागलेला नव्हता. सारी पांगापांग झाली होती… कोण कुठे आहे, कसा आहे, आहे की नाही? सर्व काळोख!
शरणार्थी लोकांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूत संसार थाटताना कुंकवाचा करंडा कुठे ठेवावा ते समजत नव्हतं. शेजारच्या तंबूतील मुलीचा नवरा दोन-तीन दिवसांनी परतला होता… रक्तबंबाळ अवस्थेत… पण तिचं कुंकू मजबूत होतं म्हणे! हिचं वाट पाहणं आता कुठं जुनं होऊ पहात होतं. काही दिवसांनी व्यापारानिमित्त ओळख असलेल्या एका सद्गृहस्थाने आसरा दिला.
कॅप्टन साहेबांच्या दलाला आदेश मिळाले… रिकाम्या घरांचा ताबा घ्या… अन्य कुणी घेण्याआधी… आणि त्या घराला आग लावण्यापूर्वी. काही घरांना आगी लावल्या गेल्याही होत्याच. मालकीच्या घरांतून हाकलले गेलेले लवकर परत येण्याची शक्यताही नव्हती… जिथं जगता येणार नाही तिथं राहणार तरी कोण?
साहेबांनी हे ही घर ताब्यात घेतलं… बंदोबस्त लावला! घरात राहून गेलेल्या चीजवस्तू ताब्यात घेऊन त्याची नोंद घेतली. कुण्या व्यापारी कुटुंबाचं घर असावं… घरात सारं काही नीट, छान होतं. विशेष म्हणजे त्या घरात टेलिफोनही होता. कॅप्टन साहेबांनी सहज तो फोन चालू आहे का ते पाहिलं… तो चालू होता… एस. टी. डी. सुविधेसह.
घरात काही पावत्या सापडल्या. इथून दिल्लीला सफरचंदे बाजारपेठेत पाठवण्याचा व्यवसाय होता तर या कुटुंबाचा… साहेबांनी त्या पावत्या पाहताच ओळखले. पावतीवर दिल्लीतल्या व्यापा-याचा पत्ता, फोन नंबर छापलेला होता. कॅप्टन साहेबांनी त्या नंबरवर सहज फोन लावला. एका महिलेने फोन घेतला. “कोण?” त्या महिलेने विचारले. साहेब म्हणाले, ”हम इंडियन आर्मी से है… और मैं कॅप्टन… बोल रहा हूं… ” त्यावर महिला म्हणाली, ”साहब, आप तो हमारे घर से बोल रहे है… यह घर हमारा है!”
काश्मिरातून रातोरात पलायन कराव्या लागलेल्या हजारो काश्मिरी नागरीकांपैकीच हेही एक कुटुंब होतं. पैसे, चीज वस्तू आणि शेकडो आठवणी मागे ठेवून ही माणसं जीव वाचवून त्यांच्या मालकीच्या घरांतून पळून आलेली होती!
कॅप्टन साहेबांनी त्यावर त्या महिलेला परिस्थिती समजावून सांगितली. “तुमच्या घराच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत” असंही तिला सांगितल्यावर तिने अनेक प्रश्न विचारले. म्हणाली “आमचं घर तुमचं घर समजा… सांभाळा!” आणि खात्री पटल्यावर ती साहेबांना म्हणाली, ”भाईसाहब, माझं एक काम करणार?” साहेब उदगारले… “हां, बहेन… बतावो!”
“आमच्या घराच्या तळघरात जा. तिथे एका कोप-यात फळबागेत फवारण्यासाठीची औषधं ठेवलीत… त्याच्या उजव्या बाजूला खाली एक लाकडी पेटी आहे का बघा… आणि त्या पेटीतील वस्तू मला पाठवून द्या… फार जड नाहीत वस्तू… पण माझा जीव अडकला आहे त्यांत आणि घरी कधी परतण्याची संधी मिळेल… देवास ठाऊक!”
साहेब स्वत: त्या दुमजली घराच्या तळघरात गेले. काही सैनिक सोबत घेतले… अंधा-या तळघरात ती लाकडी पेटी सापडायला वेळ लागला… पण अनेक वस्तूंच्या खाली सापडली. पेटीत अगदी निगुतीने सांभाळून ठेवलेला नववधूचा सारा साजश्रुंगार होता. साडीला तर अजूनही लग्नातल्या हळदीचा सुवास येत होता. आभूषणे ख-या सोन्याची नसावीत पण त्यांची चमक सोन्याहून चमकदार होती. पाठवणी करताना कुण्या सुवासिनीने ओटी भरली असावी… ती ओटी तशीच बांधून ठेवलेली होती पदरात! त्या वस्तू म्हणजे एका नववधूच्या जन्म-जन्मांतारीच्या आठवणी होत्या! त्या साडीच्या पदरावर आईच्या मायेची नजाकतदार वेलबुट्टी होती… आणि धागे वडिलांच्या प्रेमाचे… भावा-बहिणींनी तिची पाठवणी करताना आवेगाने मारलेल्या मिठ्या… त्यामुळे पडलेल्या सुरकुत्या अजूनही तशाच होत्या. अग्निफेरे घेताना पदराला त्यांच्या शेल्याशी बांधलेल्या गाठीच्या खुणाही तशाच होत्या!
साहेबांनी त्या सा-या वस्तू काळजीपूर्वक वर आणल्या. युनिटमध्ये परतले. एक छानसे packing करून घेतले… त्यात एक चलनी नोट आणि शगुनाचे म्हणून एक सुटे नाणेही ठेवले… आणि एक कागद ठेवला… त्यावर लिहिले. ”भावाकडून… धाकट्या बहिणीसाठी! सुखी रहा… कधी न कधी परत या तुमच्या घरी!”
पाचव्या दिवशी साहेबांच्या नावाने त्यांच्या कार्यालयात फोन आला… यावेळी पलीकडून तिचाच आवाज होता… ”दादा… !” आणि पुढची काही मिनिटे केवळ शांतता… गालांवरून ओघळणा-या आसवांना जर एखाद्या ओढ्यासारखा खळखळाटी आवाज असता तर बरं झालं असतं… पण आसवांचा तो प्रवाह निमूटपणे खाली ओघळत जात असावा.
काही वेळाने साहेबच म्हणाले, ”सब चीजें बराबर मिल गयी ना? कुछ छूट तो नहीं गया?” त्यावर ती म्हणाली, ”छूट तो सब कुछ गया पिछे… सारी जिंदगी! लेकिन आपने यादें बचा ली मेरी… और इतनी दूर भेज भी दी मेरे लिये!” पुढे ती बरंच काही बोलली… पण शब्द उमटत नव्हते… काही शब्दांना तसा काही अर्थही नव्हता… कारण मनातून जिभेवर आणि तिथून पुढे सरकायला मागून येणा-या शब्दांना जागाच उरली नव्हती… गळ्यात आवंढा गुंतून राहिलेला होता!
पुढे दिवस उलटत गेले… साहेबांची तिथून दुस-या सीमेवर बदली झाली. तिचं काय झालं माहीत नाही… पण साहेबांच्या मनात नववधूचा तो लाल रंगाचा पेहराव कायमचे रंग भरून गेला!
साहेबांना खूप दिवसांनी सुट्टी मिळू शकली… गावी पोहोचायला रात्र झाली… घरच्यांशी बोलता बोलता पहाट केंव्हा झाली ते समजलंच नाही. पहाटे गोठ्यांत गाई हंबरत होत्या… भाऊ बहिणीच्या गावाकडे निघायला घराच्या बाहेर पडला! साहेबांनी शहरातून गावाकडे परतताना तिच्यासाठी लाल रंगाची सुंदर साडी आणली होती… ती साडी तिला कधी एकदा देईन… असं साहेबांच्या जीवाला झालं होतं! सैनिकाचं कठोर शरीरातलं हळवं मन पावलांच्याही पुढं धावत निघालं होतं!
(काश्मिरातील सैनिकी जीवन सुमारे तीन दशके अनुभवलेले लेफ्टनंट जनरल रंजन महाजन साहेब (निवृत्त) यांची मुलाखत ‘The Monks & Warriors’ podcast मध्ये पाहतो आहे. महाजन साहेबांनी या मुलाखतीत एका घटनेचा ओझरता उल्लेख केला आहे. त्यावर आधारीत हा लेख आहे.)
आयुष्यात प्रत्येक माणसाला सल्ला देणारे खूप भेटतात. पण पूर्ण ऐकून घेणारे फार कमी भेटतात. कृष्णाने अर्जुनाला मध्येच थांबवलं नाही. “तू चुकीचा आहेस, ” असंही म्हटलं नाहीं. त्याने त्याला पूर्ण कोसळू दिलं. कारण कधी कधी माणूस पुन्हा उभा राहण्यासाठी आधी पूर्ण कोसळणं गरजेचं असतं. खरा मित्र तुमच्या अश्रुंना लपवत नाही. तो त्यांना वाहू देतो. कारण त्याला माहीत असतं, अश्रू थांबवले तर वेदना आतच राहते.
महाभारत सांगतं, मित्र म्हणजे तुमच्या प्रत्येक निर्णयाला होकार देणारा माणूस नाही. मित्र म्हणजे तुम्ही चुकीच्या दिशेने चालत असताना तुमचा हात पकडून “थांब” असं म्हणण्याचे धैर्य असलेला माणूस. दुर्योधन कर्णाचा मित्र होता. त्याने कर्णाला मान दिला, सन्मान दिला. जगाने नाकारलेल्या माणसाला त्याने स्वीकारलं. म्हणून कर्णाने आयुष्यभर ती मैत्री जपली. पण महाभारत इथेच थांबत नाही. ते एक प्रश्न विचारतं. मैत्री मित्राला वाचवते, की मित्राच्या चुकीलाही वाचवते? कारण दोन्ही गोष्टी सारख्या नसतात.
कृष्णाने अर्जुनासाठी युद्ध लढलं नाही. त्याने अर्जुनाला स्वतःचं युद्ध स्वतः लढायला शिकवलं. हीच महाभारताची मैत्री आहे. जी माणसाला आधार देत नाही, तर त्याला सक्षम करते. आज आपल्याकडे शेकडो संपर्क आहेत. हजारो फॉलोअर्स आहेत. असंख्य शुभेच्छा आहेत. पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. आपण हरलो तर आपल्या शेजारी कोण बसणार? आपण रडलो तर आपलं मौन कोण ऐकणार? आपण चुकलो तर आपल्याला थांबवणार कोण?
कारण टाळ्या वाजवणारे खूप भेटतात. पण आरसा दाखवणारे फार कमी असतात. भगवद्गीता मैत्रीची व्याख्या लिहित नाही. ती कृष्णाच्या रुपाने ती जगून दाखवते. मित्र तुमच्यासाठी जग बदलत नाही. तो तुमच्या मनातला अंधार बदलतो. मित्र तुमचं दुःख उचलत नाही. तो दुःख उचलण्याइतकं तुम्हाला मजबूत करतो. मित्र तुमच्यासाठी निर्णय घेत नाही. तो तुम्हाला योग्य निर्णय घेण्याइतके शहाणं करतो.
आणि कदाचित याचसाठी महाभारत संपतं. पण कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री कधीच संपत नाहीं. कारण युद्ध प्रत्येक युगात बदलतं. शस्त्रं बदलतात. रणांगणं बदलतात. माणसं बदलतात. पण प्रत्येक युगाला एका अर्जुनाची गरज असते. आणि प्रत्येक अर्जुनाला… एका कृष्णाची.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : प्राची जोशी
मो ९८२२०६५६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मुख्याध्यापकांनी एका आईला अचानक शाळेत बोलावलं आणि म्हणाले,
“तुमच्या मुलाने आज ‘जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…’ या विषयावर असा निबंध लिहिला आहे की संपूर्ण स्टाफरूममध्ये आधी सगळे हसत होते… आणि नंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.”
आई घाबरतच खुर्चीवर बसली.
तिला वाटलं, मुलाने काहीतरी मोठी खोडी केली असणार.
मुख्याध्यापकांनी हसत तिच्या हातात वही दिली आणि म्हणाले,
“ही घरी जाऊन वाचू नका… इथेच वाचा.”
वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं—
“जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…”
पूर्वी मला वाटायचं की माझी आई जगातली सर्वात रागीट बाई आहे.
ती सकाळी पाच वाजता उठवते. अभ्यास करायला लावते. डबा पूर्ण संपवला नाही तर ओरडते. उशिरापर्यंत मोबाईल वापरला तर काढून घेते. सुट्टीच्या दिवशीही म्हणते— “खोली आवर.”
मला वाटायचं… काश! माझी आई एक दिवस कुठेतरी निघून जावी.
पण गेल्या सोमवारी आई आजारी पडली. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
त्या दिवशी पहिल्यांदाच आई खरोखरच अंथरुणातून उठली नाही.
सकाळी गजर वाजला… पण माझे केस कुरवाळत “बाळा, शाळेला जायचं नाही का?” असं म्हणायला कोणीच आलं नाही.
मी उशिरा उठलो. युनिफॉर्म इस्त्री केलेला नव्हता. मोजे एका खोलीत, बूट दुसऱ्या खोलीत होते. डबा रिकामाच होता.
बाबा स्वयंपाकघरात उभे होते. त्यांनी पहिल्यांदाच पोळी करण्याचा प्रयत्न केला. पण पोळी गोल न होता भारताचा नकाशाच झाला.
तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की आई एकाच वेळी किती कामं करते.
शाळेतून घरी आलो, तर दारात कोणी वाट पाहत नव्हतं.
आई अंथरुणात होती. तरीही हसत म्हणाली,
“आलास का माझ्या राजा?”
मी म्हणालो, “आई, भूक लागली आहे.”
ती उठण्याचा प्रयत्न करू लागली… पण वेदनेने पुन्हा झोपली.
त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं.
जेवण थंड होतं… पण त्याहून जास्त थंड घर वाटत होतं.
रात्री मी पाहिलं, आईला खूप ताप होता. तरीही ती बाबांना विचारत होती—
“मुलाने दूध पिलं का?”
“गृहपाठ केला का?”
“उद्या त्याची ड्रॉईंगची वही ठेवायला विसरू नका.”
तिला स्वतःच्या औषधांपेक्षा माझी जास्त काळजी होती.
दुसऱ्या दिवशी मी आईचा मोबाईल घेतला.
मला वाटलं त्यात गेम्स असतील.
पण त्यात सर्वात जास्त फोटो माझेच होते.
मी पहिल्यांदा शाळेत गेलो तो फोटो…
मी पहिल्यांदा सायकल चालवली तो फोटो…
मला ताप आला होता तो फोटो…
आईच्या मोबाईलमध्ये तिचा स्वतःचा एकही चांगला फोटो नव्हता.
सगळे फोटो माझेच होते.
त्या दिवशी मला समजलं…
आई स्वतःचं आयुष्य जगत नाही… ती माझं आयुष्य जगत असते.
तिसऱ्या दिवशी मी आईचे पाय दाबले.
ती हसून म्हणाली,
“आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”
मीही हसलो… पण डोळ्यात पाणी होतं.
मला आठवलं…
मी कितीतरी वेळा तिला म्हटलं होतं—
“तुला काहीच येत नाही… तू फक्त ओरडत राहतेस.”
पण खरं तर मला काहीच येत नव्हतं.
माझा शाळेचा शर्ट कपाटात आपोआप येत नाही…
डबा आपोआप भरला जात नाही…
अंथरूण आपोआप आवरत नाही…
माझ्या आवडीचं जेवण आपोआप बनत नाही…
या सगळ्यामागे माझ्या आईची झोप, तिचा वेळ आणि तिचं संपूर्ण आयुष्य असतं.
आता जर देवाने मला विचारलं की जगातलं सर्वात कठीण काम कोणतं?
तर मी म्हणेन— “आई होणं.”
कारण आईला कधीच सुट्टी नसते.
तिला ताप असो… तरी घर चालतंच.
तिला वेदना असोत… तरी मुलांचीच काळजी असते.
तिला रडावंसं वाटत असलं… तरी ती हसत जेवण वाढते.
आता मी देवाला कधीच म्हणणार नाही की माझी आई एक दिवसासाठी कुठेतरी जाऊ दे.
मी फक्त एवढंच म्हणेन—
“देवा… माझं उरलेलं आयुष्यही माझ्या आईला दे.”
“कारण आई घरात असेल… तर छोटंसं घरही स्वर्गासारखं वाटतं.”
निबंध इथेच संपला.
वही हातात धरताना आईचे हात थरथर कापू लागले.
तिच्या डोळ्यातले अश्रू वहीच्या पानांवर पडू लागले.
तिला आठवलं…
गेल्या महिन्यात रागाच्या भरात मुलाने म्हटलं होतं—
“तुला फक्त ओरडताच येतं.”
त्या दिवशी ती रात्रभर रडली होती.
पण आज त्याच मुलाने, कुणीही न सांगता, तिचं संपूर्ण आयुष्य शब्दांत मांडलं होतं.
मुख्याध्यापक हळूच म्हणाले—
“मुलं आपले शब्द ऐकत नाहीत… पण आपला त्याग मात्र नक्की ओळखतात. फक्त त्यांना समजायला थोडा वेळ लागतो.”
आई घरी आली.
मुलगा धावत दारात आला.
यावेळी त्याने काहीच म्हटलं नाही.
फक्त आईला घट्ट मिठी मारली.
आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
दोघेही शांत होते…
पण त्या शांततेत हजारो शब्द दडले होते.
त्या दिवशी पहिल्यांदाच मुलाने स्वतःच आपली ताटली उचलली…
स्वतःचे बूट स्वच्छ केले…
आणि रात्री झोपण्यापूर्वी आईजवळ जाऊन म्हणाला—
“आई… आजपासून तुला सुट्टी देणार नाही… पण तुला कामात कधीच एकटंही सोडणार नाही.”
आई हसली.
तिला वाटलं, तिचा सगळा थकवा त्या एका वाक्यात विरघळून गेला.
लक्षात ठेवा…
मुलांना आई-वडिलांची किंमत ते त्यांच्यासाठी सर्व काही करत असताना कळत नाही. ती तेव्हा कळते, जेव्हा तेच हात थकायला लागतात. म्हणून वाट पाहू नका. आजच आपल्या आई-वडिलांजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि एवढंच नक्की सांगा—
“तुम्ही आहात म्हणून माझं जग सुंदर आहे.”
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.
परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या व्यक्तीला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, तिच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. अशावेळी त्या व्यक्तीला प्रसंगासमोर ठामपणे उभे राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लागते. तिचा स्वभाव ऐन मोक्याच्या वेळी कचखाऊ होतो. उलट ज्या व्यक्तीला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाते, तिच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.
सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. लोक काय म्हणतील? , नोकरी जाईल, देव रागावेल, समाजातून बहिष्कृत केले जाईल, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.
मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.
थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो. भीती, चिंता, काळजी, या भावना आपल्या जगण्याचा भाग असतातच. कारण आपण सगळेच जगण्यातल्या अशाश्वतेला घाबरत असतो. तरी कधी कधी काही गोष्टींना सामोरं जाण्याची मानसिक तयारीही आपण करत असतो आणि म्हणूनच या भावना आपल्या नियंत्रणात कशा ठेवायच्या याचा आपण विचार करायला हवा. पण तसं झालं नाही आणि या भावना सातत्यानं आपल्या मनात राहिल्या तर गडबड होतेच. आपल्याला जर सतत कशाची ना कशाची भीती वाटत राहिली तर समोर असणार्या समस्येला तोंड देण्यापेक्षा तिला टाळण्याची प्रवृत्ती वाटते. त्या परिस्थितीचे खोटंखोटं सर्मथनही करण्याची प्रवृत्ती वाढते. अशावेळी तारतम्यानं विचार करण्याची आपली क्षमता कमी होते. समस्येचं योग्य स्वरूपात आकलन होण्याऐवजी तिच्याकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाहीत. बर्याचदा असे घाबरून रहाण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्या जगण्यातला आनंदही गमावून बसतो. आपल्या मनात सतत ‘असं होईल का? ‘ ‘तसं होईल का? ‘ ‘असं झालं तर काय..? ‘ ‘तसं झालं तर काय? ‘ असे विचार येत राहतात. मनातल्या मनात आपण अनेक कल्पना करत राहतो. पण त्यातल्या एकाही कल्पनेचं आजतागायत वास्तवात रूपांतर झालेलं नसतं. पण त्या कल्पना मात्र सतत आपल्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात. आणि आपण जगण्यापेक्षा जर-तर म्हणत फक्त घाबरत राहतो. उदाहरणार्थ भुताची कल्पना.
या भीतीतून बाहेर पडायचं कसं? यावर खालील उपाय करून बघण्यासारखे आहेत.
१) ज्या गोष्टीची भीती मला वाटते आहे त्यात खरंच काही घाबरण्यासारखं आहे का याचा विचार करा. का घाबरतेय मी आता? कशाची भीती वाटतेय मला? हे प्रश्न स्वत:ला शांतपणे विचारा. या प्रश्नाचा विचार केला तर आपण बर्याच गोष्टींना विनाकारणच घाबरतो, असं तुमच्या लक्षात येईल.
२) ‘राईचा पर्वत बनवणं’ ही तुमच्या विचाराची पद्धत आहे का याचा विचार करा. असे विचार नेहमीच भीती निर्माण करणारे आणि भीतीला खतपाणी घालणारे असतात.
३) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या या भीती वाटण्याच्या भावनेविषयी बोला किंवा डायरीत तुमचे विचार लिहून काढा. मनातले विचार-भावना व्यक्त केल्यानं त्यांचं आकलन व्हायला मदत होते. आपली विचार करण्याची पद्धत त्यातून समजते व त्याची भीतीचे विचार हाताळायला मदत होते. मनात उमेद निर्माण करतील, स्वत:वरचा विश्वास कायम ठेवतील अशी वाक्यं तयार करा. भीतीच्या प्रसंगात या वाक्याचा वापर करा. सांगा स्वत:ला, ‘I CAN DO IT, YES, I CAN DO IT. ‘
‘पांडू हवालदार’ या दादा कोंडकेंच्या सिनेमात एक गाणं आहे, “माज्या कुलुपाची चावी हरवली, कोतवाल तुमी डायरीत ही क्येस न्हाई लिव्हली… ” ते गाणं दादांच्या टिपिकल द्व्यर्थी संवादाइतकं चावट जरी नसलं, तरी ऐकता-ऐकता आपोआप गालात जीभ जातेच!
पण शीर्षक म्हणून निवडलेल्या या शृंगारिक गाण्याचा आणि माझ्या लेखाचा खरं तर संबंध इतकाच की, आज अनेक दिवसांनंतर माझ्या हातून एक किल्ली हरवली.
लहानपणीचे किल्ली हरवण्याचे बरेच प्रसंग ‘माज्या डायरीत लिव्हलेले’ आहेत. कारण, मी स्वतःच ते अनुभवले होते किंवा माझ्या आसपास घडताना पाहिले होते.
साताऱ्याच्या सैनिक शाळेत असताना इयत्ता पाचवीपासून होस्टेलवरच राहात होतो. दर वर्षी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलं होस्टेलवर परत आली की दोघे-तिघे तरी आपल्या कपाटाच्या किल्ल्या घरी विसरून आलेले असायचे. कधीकधी मीही त्यातला एक होतो. क्वचित, खेळाच्या मैदानावर किंवा खेळायला जाता-येताना खिशातून किल्ली कुठेतरी पडून जायची. मग संध्याकाळी अगदी गडद काळोख होईपर्यंत किल्ली शोधण्याचे निष्फळ प्रयत्न व्हायचे.
आमच्या शाळेचे आवार म्हणजे जुना ब्रिटिश कॅम्प असल्याने, १९७०च्या दशकात आमची शाळा सातारा शहराच्या बाहेरच होती म्हणायची. सदर बाजार नावाची एक वस्ती तेवढी शाळेपासून जवळ होती. त्यामुळे डुप्लिकेट किल्ली बनवून देणाऱ्याला बोलावून कुलूप उघडणे तसे दुरापास्तच असायचे. मग रडवेल्या चेहऱ्यांनी ती मुलं कपाटाचे कुलूप तोडायचे मार्ग शोधू लागायची.
अशा वेळी काही वर्गमित्र आणि सिनियर मुलं मदतीला यायची. तशीच, मनातला आसुरी आनंद लपवत, लांबूनच फुकट सल्ले देणारीही काही मुलं होती. आमच्या कपाटांना लावलेली कुलुपं तशी साधीच असायची. त्यामुळे ती तोडायला फुटबॉल बूट हाच रामबाण उपाय कामी यायचा. त्या बुटांच्या तळाला जे कडक असे स्टड असायचे, त्यांच्या माऱ्याने त्या फुसक्या कुलुपाचा सहजी ‘आ’ वासत असे. आमच्यातली जरा जास्तच ‘Security Conscious’ असलेली काही मुलं सुट्टीवर जाताना आपल्या कपाटाला ‘नवताल’ किंवा अशाच कुठल्या तरी कंपनीची दणकट कुलुपं लावून जायची. त्यांची किल्ली जर हरवली तर मात्र त्यांची अवस्था बघवत नसे. तिथे फुटबॉल बुटांचा उपयोग होत नसे. मग दगडाचे ‘दाणदाण’ आवाज रात्री उशिरापर्यंत ऐकू येत असत.
अनेक कटू अनुभव घेतल्यानंतर, पुढे-पुढे माझ्याकडून किल्ली हरवण्याचे प्रसंग कमी झाले. कोणतीही किल्ली किंवा इतरही गोष्टी जपून ठेवण्याचं जरासं भान मला आपोआप आलं. हल्ली घरातून बाहेर पडताना, मी गाडीच्या किल्लीचा वजनदार गुच्छ रुमालासोबत पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवतो आणि घराच्या किल्लीची छोटी रिंग उजव्या खिशात ठेवतो. उद्देश हा की, रुमाल किंवा गाडीची किल्ली काढताना चुकून घराची किल्ली हाती येऊ नये किंवा खिशाबाहेर पडू नये.
आज मी जरा गडबडीत बाहेर पडलो होतो. एका हातात पिशवी असल्याने, दुसऱ्या हाताने दोन्ही किल्ल्या उचलल्या आणि एकाच खिशात कोंबल्या. पुढच्या दोन तासात, सदर्न कमांड हॉस्पिटलमधील दोन डिपार्टमेंट्स, आणि एक-दोन दुकाने अशा विविध ठिकाणी जाऊन, वेगवेगळी कामे करून, स्वातीला तिच्या क्लिनिकमधून घेऊन मी घरी आलो. तिला लगेच कॉलेजात लेक्चर घ्यायला निघायचे होते. घर उघडण्यासाठी खिशात हात घातला तो काय? किल्ली गायब! दोन्ही खिसे दोन-तीनदा तपासले, हातातली पिशवी तपासली, पण व्यर्थ.
स्वातीजवळच्या किल्लीने घर तर उघडले. पण “घराची किल्ली हरवल्यामुळे, सुरक्षेचा विचार करता, आता घराचे मुख्य कुलूप बदलावे लागणार… ” हा विचार माझ्या मनामध्ये येण्याच्याही आधी मला स्वतःची प्रचंड लाज वाटली. तसेच उलट्या पावली बाहेर पडून, ज्या दोन-तीन ठिकाणी मी गेलो होतो तिथे जाऊन शोधाशोध करावी, कुठेतरी ती किल्ली पडलेली नक्की सापडेल, असा माझा विचार होता. पण आता आम्हा दोघात मिळून एकच किल्ली असल्याने, स्वाती कॉलेजात गेल्याशिवाय मला घर बंद करून बाहेर पडता येणार नव्हते.
अखेर मी बाहेर पडलो आणि सगळीकडे पुन्हा जाऊन आलो. दुपारची वेळ झालेली होती. आज बुधवार असल्याने सदर्न कमांड हॉस्पिटलचा ‘हाफ डे’ होता. त्यामुळे तिथे शुकशुकाट झालेला होता. तिथल्या कारपार्कमध्ये शोधाशोध केली. दुकानापर्यंत आलो तर, दुपारी झोपण्याच्या ‘पुणेकर धर्मा’ला जागणाऱ्या दुकानदाराने दुकान बंद केलेले होते. त्या दुकानासमोर थोडी शोधाशोध केली. अखेर हात हलवत घरी आलो. घरात शिरत असतानाच ‘पांडू हवालदार’ सिनेमातलं गाणं आठवलं होतं आणि हा लेखही मनात तयार झाला होता.
तेवढ्यात मला किल्ली हरवण्याशी संबंधित असलेला दुसरा एका प्रसंग आठवला. बऱ्याच वर्षांपूर्वी, मुलं लहान असताना, आम्ही दोघे मुलांना घेऊन कुठंतरी लांब ड्राइव्हसाठी गेलो होतो. हवा आल्हाददायक होती. एका डोंगरावर गाडी नेली आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक मोठं, निर्मनुष्य पठार दिसलं. त्या सबंध पठारावरच काय, पण आसपासदेखील एकही मनुष्यप्राणी नव्हता. शहरातल्या माणसांना अशा जागेची भुरळ न पडली तरच नवल!
रस्ता सोडला आणि सरळ त्या पठारावर मी गाडी नेली. खाली उतरून जरा हिंडावं, फोटो काढावे, अशी सगळ्यांचीच इच्छा होती. चौघंही खाली उतरलो. काही पावलंच पुढे गेलो असू, तेवढ्यात गाडी लॉक झाल्याचा ‘पिक’ असा आवाज मागून आला. काय घडलं होतं याचा मला त्या क्षणी अंदाज आला. मी गाडीची किल्ली इग्निशन स्विचमध्ये ठेवूनच खाली उतरलो होतो आणि किल्ली ‘ऑन’ केलेल्या अवस्थेत होती. गाडीचे एक ‘फीचर असे होते की जर काही क्षण ‘ऑन’ अवस्थेत किल्ली राहिली तर गाडीचे दरवाजे आपोआप ‘लॉक’ होतात. या ‘फीचर’चा अनुभव मी गाडीमध्ये बसलेलो असताना अनेकदा घेतला होता. पण त्या क्षणी मला त्याचा विसर पडला होता.
आता परिस्थिती अशी होती की त्या निर्मनुष्य पठारावर आम्ही चौघे आमच्या गाडीच्या बाहेर होतो, किल्ली गाडीच्या आत होती, गाडीच्या खिडक्या बंद होत्या, आणि गाडी लॉक झालेली होती. किल्लीच्या बाबतीतला असा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला होता. त्यामुळे त्यावर खात्रीशीर उपाय मला चटकन सुचेना. गाड्या चोरणारे लोक पट्टी किंवा काहीतरी वापरून, बाहेरून गाडीची खिडकी उघडू शकतात इतपत माहीत होते. पण अर्थातच, तसले काही करण्याचा मला पूर्वानुभव नव्हता. काहीतरी खटपट करू लागलो. अशा वेळी भुकेजलेली स्वाती आणि मुले मला उद्देशून जे काही बोलत होती ते ऐकून माझे मनोबल आणखीच खचत चालले होते.
अचानक आमच्यापैकी कोणालातरी दूरवरच्या रस्त्यावरून जाणारी, एक ‘लालपरी’ बस दिसली. स्वाती व मुलांनी आरडा ओरडा करून ती बस थांबवली. बसचा ड्रायव्हर व कुणा प्रवाशाने काहीतरी करून गाडीची खिडकी उघडण्यात यश मिळवले आणि आमची त्या संकटातून सुटका झाली. आजवर किल्ली हरवण्याचे सर्वच प्रसंग शोकांत असल्याचा अनुभव आलेला होता. त्या मानाने, गाडीच्या किल्लीचा हा प्रसंग फार महागात पडला नव्हता म्हणून जरा हायसे वाटले.
आज किल्ली हरवल्याच्या शोकांत प्रसंगाची गोष्ट लिहायला मी जड अंतःकरणाने बसलो होतो. स्वाती कॉलेजातून आल्यावर तिला ही गोष्ट वाचून दाखवावी, म्हणजे दुःख जरा हलके होईल असा विचार केला होता. संध्याकाळी, “शोधा म्हणजे सापडेल” असे ओरडतच स्वाती घरात शिरली, तेंव्हा मात्र मी जरा खटटू झालो. माझे दुःख हलके करण्याऐवजी तिने माझ्या जखमेवर मीठ चोळावे याचे मला वाईट वाटले. पण पाहतो तो काय? माझी किल्ली माझ्या डोळ्यासमोर नाचवतच ती ओरडत होती!
कॉलेजातून परत येऊन गाडी कारपार्कमध्ये लावल्यानंतर, तिने बारकाईने कारपार्क धुंडाळले होते. तिला ती किल्ली आमच्या कारपार्कमध्येच सापडली होती असे तिने सांगितले. ते ऐकून माझी अवस्था मात्र ‘काखेत कळसा… ‘ अशी झाली होती.
परंतु, किल्ली हरवण्याच्या काही कथा सुखांतदेखील असू शकतात हा अनुभव आज मला आला, हेही नसे थोडके!
आम्ही तिघी बहिणी. अगदी सख्या, म्हणजे आमचे आई वडील सेमच.
परंतु स्वभाव सवयी, आवड निवड बघून कोणाला खरं वाटणार नाही. एकाच हाताची पाची बोटं एक सारखी नसतात, असं म्हणतात ना, अगदी खरय. आई वडीलांच्या सवयी मुलांमध्ये उतरतात. तेही खरंय. कधी कधी दोन्ही घरच्या आजी आजोबांचाही मधून मधून उद्धार होत असतोच. शेवटी स्वतः चे काही गुण असतातच की.
व्यवस्थित पणा आळशीपणा. वगैरे वगैरे.
आमची ताई म्हणजे जपानी सूत्र म्हणजे
KAIZEN पाळणारी
Place for everything. Everything in Place
सतत चांगल्यासाठी घरातील सर्वांबरोबर विचार विनिमय करून बदल करणारी.
हे पाळणारी.
तिचं घर म्हणजे खूप विचारपूर्वक डिझाईन केलेले. अगदी पूर्ण आयुष्याचा विचार करून.
मुलं झाल्यावर, ती मोठी झाल्यावर, आपण म्हातारे झाल्यावर वगैरे वगैरे सर्व गोष्टी लक्षात ठेवून छान घर बांधलं. सवयींमध्ये एवढा व्यवस्थीत पणा आहे. त्यामुळे विचारांतही स्पष्टता, बोलणही स्पष्ट. कुठेही कनफ्युजन नाहीच. घर फक्त बांधलंच नाही तर ते ठेवलही व्यवस्थित. मुलं शिस्तीत वाढली, त्यामुळे तो व्यवस्थित पणा पूढे ही चालू राहिला. आजही आहेच.
तिच्या घरी तुम्ही काहीही मागा म्हणजे सुई दोरा, रबर बॅंड, एखादी इंद्रधनुष्यग, लिहायला कागद पेन, मॅचिंग कानातले म्हणजे काहीही. ती म्हणेल
अग! माझ्या आलमरीत सेकंड ड्राॅववर मध्ये उजव्या बाजूला एका झिपलाॅक बॅग मध्ये बघ. तेथेच मिळेल तुला. एवढा आत्मविश्वास असतो ताईंच्या बोलण्यात.
घरातील प्रत्येक सामानाची जागा पक्की
Place for everything. ते सामान पण तेथेच असणार. Everything in place आठवतंही सर्व, कारण वर्षानुवर्षे त्या वस्तूची तीच जागा आहे.
ताई फक्त वस्तूंचेच व्यवस्थापन छान करते अस नाही, हा विचारपूर्वक व्यवस्थित पणा तिच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो. कारण विचारांचे व्यवस्थापन परफेक्ट आहे. चांगला बदल करायला ती नेहमीच तयार असते.
त्याउलट आमची दीदी. मस्त मौला. कोणतीही गोष्ट विचारा. अग! आहे घरात, पण शोधावी लागेल. शोधली तर नक्की मिळेल.
म्हणजे अगदी सुई दोरा ते पासपोर्ट, medical report ते साखरेचा डबा. म्हणजे डबा असतो ओटयावरच पण ओट्यावर इतर वस्तूंमध्ये शोधावा लागतो एवढंच. सर्व गोष्टी शोधल्यावर च मिळतात. पासपोर्ट कुठे मिळेल सांगता येत नाही. कधी कधी शोधण्याचे कष्टही वाया जातात. Anyways पण ती आनंदी असते. मजेत जगते.
माझं आपलं अधल मधलं काम. सोनं चांदी दागिने पासपोर्ट, अगदी जागेवर. बाकी वस्तू बऱ्यापैकी जागेवर. परंतु ताई सारख माझ्या आलमरीत सेकंड ड्रावर मध्ये••• वगैरे म्हणजे एवढ्या डिटेल्स मध्ये सांगायची काही हिम्मत नाही माझी.. कधी मिळतात वस्तू, कधी नाही. वस्तू त्याच जागेवर ठेवल्या जात नाहीत म्हणून गडबड होते. एखाद्या वेळेस खूप व्यवस्थित आवरून ठेवलं तर स्वतः बद्दल छान वाटत. परंतु महिन्याभरात जैसे थे. खूप सांभाळून ठेवलेली वस्तू तर हमखास वेळेवर मिळत नाहीच. वेळेवर विकत घ्यावी लागते. उगीचच पैसे खर्च होतात. वाईट वाटत.
तसे आमच्या तिघींचे संसार मजेत चालू आहेत.
जो है, जैसा है, उसमें हम सब खुश हैं।
ताईला भेटल्यावर प्रत्येक वेळी तिच कौतुक वाटतं. एखाद्या बाईने किती व्यवस्थित असावं?? कधीच पेटीकोट शोधावा लागत नाही. मॅचिंग नेहमी कसं काय जमतं बुआ? आश्चर्यच वाटतं. नेमकी तीच डबी कशी काय मिळते? काही शोधाशोध नाही, डब्यांची हुसकाहुसकी नाही. साडयांचा ढीग तसाच व्यवस्थीत.
तेच दीदीचे म्हणजे कुठे जायचे म्हंटले तर पसरलेल्या घरात अजून थोडा पसारा वाढतो.
माझं आपलं वेगळंच प्रकरण. ठीक ठाक. खूप व्यवस्थित तर नाहीच पण जेमतेमच. हुसकाहुसकी शोधाशोध असतेच. शेवटी दुसरच काही तरी ठरत. त्यामुळे गोंधळ असतोच.
माझ्या आणि दीदींच्या मुलांचं कौतुक म्हणजे घरी चहा पिऊन झाल्यावर तो कप तेथेच असतो, वाळतो. पण ताईकडे मात्र ही मुलं कप लगेच बेसिन मध्ये ठेवतात.
प्रत्येक वेळी मी ठरवते. स्वतः मध्ये बदल करायचा, हळूहळू मुलांनाही सवय लावायची. व्यवस्थित पणा म्हणजे वेळेवर काम करणे. वेळ वाचतो. चिडचिड कमी होते. यात फायदाच जास्त आहे. तसा उशीरच झाला आहे पण काही हरकत नाही
देर आए दुरुस्त आए।
सुबह का भूला अगर घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते।
थोडा फरक नक्कीच पडेल. मुलांना पूढच्या आयुष्यात त्याचा फायदाही होईल.
आज सहा महिन्यांनंतर ताई घरी आली. माझ्यातला बदल बघून हसून शाब्बास म्हणाली.
म्हणाली,
Yes,
Kai म्हणजे बदल
आणि Zen म्हणजे चांगला.
सतत चांगले बदल घडवत रहाणे.. मग प्रगती निश्चितच होणार. वेळ नक्कीच वाचणार. मग
ते आपले घर असो, एखादी संस्था असो नाहीतर स्वतः चे व्यक्तिमत्त्व असो. प्रगती नक्की होणार.
फक्त बदल करायची मानसिक इच्छा, तयारी, आणि सातत्य पाहिजे.