मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सृजनाचा क्षण कधी कुठे उगवेल हे खरंच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अँजीओप्लास्टी करायची ठरल्याने मी आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. स्पेशल रूम मिळाली नाही म्हणून मला जनरल वार्ड मध्ये दाखल केले गेले. गच्च भरलेला तो मोठा हॉल….. जवळ जवळ मांडलेले बेडस, पेशंटसोबत असणाऱ्याला बसायला एक स्टूल एवढीच सोय. इतक्या लोकांसाठी फक्त २-३ नर्सेस आणि २ वॉर्ड बॉय. साहजिकच नर्सेसची धावपळ आणि जोडीला चिडचिड .. वॉर्डबॉयचा हाकांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न…. स्वतःला नेमकं काय झालंय आणि काय करणार आहेत हे न कळल्याने घाबरलेले पेशंट, आणि डॉक्टरांशी नेमकं काय बोलायचं हे कळत नसल्याने बावरलेले, उपचारांसाठी पैसे कसे कुठून उभे करायचे ही मोठीच चिंता चेहेऱ्यावर सतत बाळगणारे नातेवाईक… भीती, चिंता, हतबलता, नैराश्य अशा-सारख्या भावनांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून टाकलं होतं…….. संध्याकाळी रूम मिळाल्याने मला तिथे शिफ्ट केलं आणि ते हॉस्पिटल म्हणजे फिरता रंगमंच आहे असं वाटलं …..७-८ खोल्यांसाठी ४-५ नर्सेस, ३ वॉर्डबॉय, वरचेवर खोलीची साफसफाई, परीट -घडीच्या चादरी, सोबत आलेल्याला वेगळा बेड …… लागूनच असलेल्या सुपर स्पेशल खोल्यांची ऐट तर आणखी कितीतरी जास्त …… परिस्थितीची ही दोन टोकं पहाताना मनात दाटलेली ही कविता……उठून बसायला परवानगी नसल्याने, गुडधा उभा करून, त्यावर कागद ठेवून अक्षरशः कशीतरी खरडलेली…

☆ तसदी ☆

भेदभाव मुळी नसतो म्हणती

कधीही त्या भगवंत कृपेला

दीन नि धनवंतांना त्याचा

न्याय एकची ठरलेला ………

 

खरे न वाटे मला कधी हे

अवतीभवती जग हे बघता

कुठे पूर पैशाचा नि कुठे

गरिबीला ती नाही तृप्तता……..

 

कुठे शिंकला श्रीमंत तरी

दहाजण पहा जाती धावत

आणि कोठे रस्त्याकाठी

कोणी मृत्यूशी त्या झुंजत ……

 

कितिकांना फसवूनही येथे

गणले जाती किती मान्यवर

घाम स्वतःचा गाळूनही पण

कितीकांना ना मिळते भाकर….

 

रंक आणखी रावामधली

खोल खोल ही दरी वाढती

तशी झुंड नि पुंडशाहीची

जरब वाढती संस्कृतीवरती……

 

मरणामध्ये जगता क्वचितच

कधी कुणाला आम्ही पहावे

जगता जगता सततच आणि

कितिकांनी ते रोज मरावे……..

 

आता वाटते एकदाच त्या

रामाने अल्लासह यावे

डोळे आपले आणखी उघडूनी

राज्य स्वतःचे पाहून जावे …….

 

अंदाधुंदी येथ माजता

राहू कसे ते शकती शांत

किती भक्त ते रंकच त्यांचे

दोन वेळची ज्यांना भ्रांत ………

 

मरणानंतर देऊ म्हणती

स्वर्ग तयांना नक्की अगदी

नंतर काय करू स्वर्गाचे

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी…….

 

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी..

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

रविवार १७ मार्च २०१९ रोजी आम्ही कोरीगडचा ट्रेक ‘केला’ असे म्हणण्यापेक्षा तो ‘घडला’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून ठरवतो पण त्या तशा न होता घडते काही भलतेच! इतिहासात आपल्याला अशी अनेक उदाहरणे सापडतील. असे म्हणतात की ख्रिस्तोफर कोलंबस खरे तर निघाला होता इण्डिज बेटांच्या आणि मसाले व्यापाराच्या शोधात पण अपघाताने पोहोचला अमेरिकाला. त्या दिवशी आमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने असाच प्रकार घडला होता. म्हणजे “जाना था जापान, पहुंच गये चीन। समझ गये ना?”  नसेल समजले तरी हरकत नाही, पुढील वर्णन वाचा म्हणजे “समझ में आयेगा”! JJ

मोहन बरोबर पहाटे ५:४५ वाजता माझ्या घरी कार घेऊन पोहोचला. तिथून आम्ही हायवे ने पोहोचलो म्हाळुंगे गावात संदीपला घ्यायला. मोहन दातार, संदीप पाटील आणि मी असा आम्हा त्रिकुटाचा बेत होता ‘घनगड’ चा ट्रेक करण्याचा. म्हाळुंगेहून एका भलत्याच खडबडीत रस्त्याने नांदे-चंदे गावातून घोटावडे फाट्याला पोहोचलो. तेथून पुढे पौड-कोळवण रोड ने हाडशीला पोहोचलो. तिथे आम्हाला एक हिरवी मारुती जिप्सी पुढून येताना दिसली ज्यामध्ये विक्रम गोखले गाडी चालवताना दिसले. कदाचित ‘गिरीवन’ मधून परत येत असावेत. असो. तिथून तुंगा-तिकोना ह्या दोन गडांच्या मार्गाने पुढे निघालो. काही परदेशी पाहुणे सकाळसकाळी तुंगी गावाच्या त्या जंगलात जॉगिंग करताना दिसले. तुंगच्या बाजूने पुढे गेल्यावर असे लक्षात येत गेले की आम्ही मार्ग कुठे तरी चुकतोय. मग वाटेत एक-दोन जणांना घनगडाचा मार्ग विचारला तर त्यांनी “सरळ जात रहा!” असे सांगितले. एका फाट्याला डावीकडे वळलो तर पुढे ‘अम्बी व्हॅली क्लब’चे गेट लागले पण तिथे गेट असल्याने मार्ग बंद झाला. मग पुन्हा उलटे फिरून  फाट्यापाशी आलो व उजवीकडे वळून निघालो. वाटेत आम्हाला चार-पाच Harle Davidson मोटरसायकलस्वार प्रचंड वेगाने आडवे गेले तेव्हा हळूहळू लक्षात आले की आम्ही लोणावळ्या कडे निघालो आहोत. वाटेत एकाला विचारले तर तो म्हणाला “घनगड कुठाय माहीत नाही. पण तुम्हाला ‘कोरीगड’ ला जायचे का? इथून सरळ गेलात तर पेठ शहापूर गाव लागेल तिथे ‘कोरीगड’ दिसेल. आम्ही तिघांनी तसाही ‘कोरीगड’ पहिला नव्हताच. मग सरळ तिकडेच ट्रेक करायचा तडकाफडकी निर्णय घेतला. सरतेशेवटी कोरीगड दिसला. गडाच्या पायथ्याशी कार लावून आम्ही चौकशी केली तेव्हा कळाले की घनगड तिथून पुढे १६ किमी दूर आहे. असो. पण तो विषय आता संपला होता.

आता ’कोरीगडा’ कडे वळूयात… हा गड कोराईगड, शहागड (गडाची पेठ शहापूरला असल्याने)ह्या नावानेही ओळखला जातो. पायथ्याच्या गावाचे नाव ‘आंबवणे’ आहे. ह्या नावावरूनच त्याच्या भोवतीने सहारा ग्रुपने वसवलेल्या अतिश्रीमंतांच्या वसाहतीचे नाव ‘अंबी व्हॅली’ पडले आहे. त्याबद्दल अधिक माहिती पुढे…

प्रथमदर्शनी कोरीगडाचा आकार आकाशात तिरप्या गेलेल्या  सुळक्यांमुळे थोडा विचित्र दिसतो. पण माथ्यावर मात्र चांगलेच विस्तीर्ण पठार आहे. गड तसा खूप उंच नसला तरी रेखीव तटबंदीने मढवलेला आहे. आंबवणे गावातून चढण्याची वाट जरा जिकिरीची आहे पण मुख्य वाटेने चढल्यास पाऊणेक तासात सहज चढाई होते. सुरुवातीलाच पुरातत्वखात्याने उभारलेला गडाचा इतिहास सांगणारा फलक आपले लक्ष वेधून घेतो. पुढील वाट एका घळीतून आणि नंतर जंगलातून जाते. वळसा घालून गेल्यावर एक छोटी सपाटी लागते.

निम्या वाटेच्या वरपासून तर पायर्‍याही बांधल्या आहेत.  उजवीकडे एक प्राचीन गुहा आणि गणपतीची मूर्ती दिसते.

वरती पोहोचल्यावर गणेश दरवाजा लागतो आणि मग तुम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचता.

सभोवतालचा परिसर एकदम विलोभनीय दिसला, पावसाळ्यात गेले तर खरेच हिरवेगार दृष्य पाहायला मिळेल, हे नक्की. आम्ही गडाच्या उजव्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केली तेव्हा तटबंदीची डागडुज्जी करण्याचे व चिरे बसवण्याचे काम चालू पाहून सुखद धक्का बसला.

गडाच्या मध्यावर श्रीकोराईदेवीचे ना छत, ना भिंती असे प्राचीन पण उजाड अवस्थेतील मंदीर आहे. दोन मोठी पाण्याची तळीही दिसली. एका तळ्याजवळ दगडांच्या ढिगार्‍यामध्ये एक भग्न मूर्ती पाहून वाईट वाटले. मंदिराचा गुरव आमची चाहूल घेऊन बाहेर आला व गडावर काय पाहण्यासारखे आहे त्याची माहिती दिली. गडावरील भगवे निशाण असलेल्या बुरूजावरून पहिले तर खूप मोठा टापू नजरेस दिसला. समोर तिकोना, मोरगड, तोरणा ओळखता आले.

पुढे वळसा घालून आंबवणे गावाच्या बाजूच्या तटबंदीवरून खाली पहिले तर दोन भग्नावस्थेतील दरवाजे एकाखाली एक असे दिसले पण तिथे उतरण्याची वाट मात्र दगड कोसळून बंद झाल्यासारखी दिसली. त्याखालील वाट मात्र घनदाट जंगलात हरवलेली दिसली. महितगाराच्या मदतीशिवाय उतरणे अवघड वाटले.

त्याच तटबंदीवर एक तोफही उत्तम स्थितीत दिसली. येथपर्यंत चालून आम्हाला कडाडून भुका लागल्या असल्याने तिथेच एका झाडाच्या सावलीत बसून डब्यांवर मनसोक्त ताव मारला.

आमच्या बसल्या जागेवरून ‘अंबी व्हॅली’चा देखावा खूप छान दिसत होता. आता हयाविषयी थोडे…

सहारा ग्रुप ने विकसीत केलेल्या ह्या छोटेखानी नगरामध्ये मुंबईतील आणि देशभरातील बडेबडे उद्योगपती, सिने-नटनट्या, क्रिकेटपटू अशा घनाढ्याची आलिशान रो-हाऊसेस आहेत. त्याची खाजगी विमानाने येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून खास धावपट्टी बांधली आहे. आतमध्ये युरोप-अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते बनवले आहेत. पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या बांधल्या असून, जलशुध्दीकरण केंद्रही उभारले आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याला बांध घालून पाण्यावर तरंगते रेस्टॉरंट उभारले आहे. बोटिंगची सोय केली आहे. आम्हाला पूर्वी आडवी गेलेली मोटरसायकलस्वार मंडळी विमानाच्या धावपट्टीवरून एका टोकाकडून दुसरीकडे गाड्या उडवीत फिरताना दिसली. एम्ब्युलंस धावपट्टीच्या बाजूने फेर्‍या मारीत होती. तिथून कोणीतरी एरोमोडेलिंगची पांढरी लांब पंख असलेली विमाने अतिशय कौशल्याने उडवीत हवाई प्रात्यक्षिके करीत होते.

‘शिवलिंग’ पॉइंट

प्रदक्षिणा पूर्ण करून 3:30 च्या सुमारास आम्ही गड उतरायला प्रारंभ केला व पाऊणेक तासात उतरून आलो सुद्धा! खाली एक सरबत विक्रेता आणि त्याची बायको भेटले. लिंबू सरबत पिता-पिता त्यांच्या कडे मी सहज चौकशी केली. त्यांना विचारले की “इथे सचिन तेंडुलकरचा बंगला आहे का? इतर कोणकोण फेमस लोकांना आलेले पाहिले आहे?” तेव्हा काही धक्कादायक माहिती त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली…. नवराबायको म्हणाले, “अहो इथे येक-दोन दिवसापुरते कोण येते अन् कोण जाते आम्हाला काही कल्पना नाही. एकतर विमानाने येतात, परस्पर विमानाने जातात. कारने आले तरी बंद काचेआड कोण बसलेले असते आम्हाला पत्याच लागत नाही. शिवाय खाजगी मालमत्ता असल्याने आम्हा स्थानिक ग्रामस्थांना आत प्रवेशच देत नाहीत. पूर्वी धुण्याभांड्याची, साफसफाईची कामे तरी मिळायची आता कोर्टाच्या आदेशाने मालमत्ता खरेदी-विक्री बंद आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी केलेल्या 8-10 महिन्यांच्या कामाचे आमचे पैसेही मालकांनी बुडवले आहेत. स्थानिकांना रोजगार देत नाहीत पण मुंबई वरून बिहारी कामगारांना आणून त्यांना मात्र कामे देतात. तुम्ही सांगा हे योग्य आहे का?” कसे तरी बोलून मी आपलं त्यांचे सांत्वन केले व माहितीबद्दल आभार मानून निघालो.

परतीचा प्रवास आता लोणावळा मार्गे करायचा हे ठरवून मोहनने गाडी गियरमध्ये टाकली. परतीच्या मार्गावर ‘शिवलिंग’ पॉइंट लागला. तिथे विक्रेत्यांनी छोटीशी चौपाटी वसवलेली होती. थोडा वेळ तिथे फोटो काढून पुण्याच्या दिशेने कूच केले ते आयएनएस शिवाजीच्या बाजूबाजूने लोणावळामार्गे थेट घर येईपर्यंत विनाथांबा आलो.

एकंदरीत कोरीगडाची आमची आकस्मिक भेट श्रीकोराई मातेच्या कृपेने आनंदात पार पडली. “कोरीगड झाला, पण घनगड राहीला…” ही सल मात्र मनात बोचत आहे. आमची घनगड भेटीची पाटी अजून तरी कोरीच आहे. त्यावर “श्री गणेश” कधी लिहिला जाणार ते आता श्री गजाननाच्या घन-कृपेवरच अवलंबून आहे!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

वारक-यांची पावले आषाढ आला की संसारातून बाहेर पडून पंढरीची वाट का चालू लागतात, ते कळलं.’ ग्यानबा तुकाराम च्या तालावर चालत विठुरायाच्या पायावर माथा टेकण्याचा आनंद आणि सुख काय असतं ते कळलं. किती भाग्यवान ते वारकरी…..

विठ्ठल दर्शनानंतर रखुमाई कडे गेलो.

श्रीराम-सीता, श्री शंकर- पार्वती, श्री विष्णू -लक्ष्मी, आणि विठ्ठल-रखुमाई ही चार देव- दांपत्ये. रामसीता म्हटलं की सतत रामाबरोबर असणारी सीता,  शंकर पार्वती कैलासावर बसलेले, विष्णू शेषशायी आणि लक्ष्मी त्यांचे पायाशी असे द्रुष्य समोर येते. विठ्ठल रखुमाई हे जोडपं आपल्यातलं वाटतं. सा-या जगाचा संसार समर्थ पणे सांभाळणारा विठ्ठल आणि सगळे भक्त “विठ्ठला, पांडुरंगा” म्हणत त्यांनाच आळवतात, म्हणून जणु रुसून दुसरीकडे जाऊन आपणही कमरेवर हात ठेऊन उभी असलेली रखुमाई.  घराघरातल्या गृहस्थ- गृहिणी सारखे विठ्ठल रखुमाई.

दर्शनाला रखुमाई जवळ पोचले, कित्ती गोड रूप ते! अगदी विठ्ठलाला साजेसे.

विठ्ठलाच्या उंचपु-या मूर्ती समोर ही गोड गोजिरी रखुमाईची  अतिशय लोभसवाणी मूर्ती. जगत्जेठी आणि जगतजननी.  पिवळा शेवंतीचा हार तिच्या हिरव्यागार शालूवर छान शोभत होता. काळीशार तेजस्वी मूर्ती,  नाकात नथ, कर्णफुले,  आणि कपाळी मळवट. हेच ते दैवी, अलौकिक सौंदर्य.  अनिमिषतेने बघतच रहावे अशी रखुमाई. नमस्कार केला आणि भारावलेल्या मनाने बाहेर आले.

बाहेर दुकाने गजबजलेली होती. पण विठूमाऊलीच्या दर्शनापुढे मला बाकी सगळे गौण वाटत होतं. अतिशय शांत मनाने आणि जड अंतःकरणाने तिथून निघालो.

40 वर्षांपूर्वी ची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. किती आभार मानावेत विठूरायाचे!

आभार तर मी मित्र मैत्रिणींचे  मानते, ज्यांनी मला त्यांच्या बरोबर सामील होण्याची संधी दिली. मी शतशः त्यांची ऋणी आहे. त्यांच्यामुळेच हा ” सोनियाचा दिनु ” मला दिसला. नकळत मनात अभंगांचे स्वर रुंजी घालू लागले.

“जातो माघारी पंढरी नाथा

तुझे दर्शन झाले आता ।।

तुझ्या नादाने पाहिली

ही तुझीच रे पंढरी

धन्य झालो आम्ही जन्माचे

नाव घेऊ तुझे आवडीने ।।

दिपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी ।

तुका म्हणे भक्ती करा सोपी

जाती पापे जन्माची पळूनी ।।

।। समाप्त  ।।

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 5 – राग~ देस ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  5 – राग~ देस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

सूर संगत या सदरांत गेले काही दिवस एकेका रागाविषयी लिहितांना माझ्या मनांत आले राग म्हणजे नक्की काय? तर त्याविषयी असे म्हणतां येईल की ज्याप्रमाणे मुलामुलींची विकास, रमेश, सुरेश किंवा पुष्पा, शुभदा, रेवती अशी वैयक्तिक ओळख पटण्यासाठी नावे ठेवण्यांत येतात त्याचप्रमाणे यमन, भूप, पुरिया, मारवा आणि बागेश्री, रागेश्री, कलावती अशी राग~रागिण्यांची नावे आहेत. बाकी प्रत्येकच राग शुद्ध व विकृत अशा एकूण बारा स्वरांतूनच तयार झाला आहे. शास्रानुसार वेगवेगळ्या प्रकारांची पांच ते सात स्वरांची रचना म्हणजे राग. त्याचबरोबर ‘रंजयति इति रागः’ अशी रागाची व्याख्या आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही कशीही स्वररचना करा त्यांतून श्रोतृवृंदाचे मनोरंजन होणे महत्वाचे आहे.मग राग कोणताही का असेना!

राग देस हा त्याचपैकी एक! शास्रीय विवेचनानुसार सा रे म प नी सां/ सां नी (कोमल) ध प मग, रेग, सा असे आरोहांत ग व ध वर्ज्य आणि शुद्ध स्वर तसेच अवरोहांत कोमल नी व सातही स्वर असलेला ओडव संपूर्ण जातीचा

खमाज थाटोत्पन्न राग!साधारणपणे रात्रीच्या दुसर्‍या प्रहरांत हा राग सादर करायचा असतो, परंतु उपशास्रीय व सुगम संगीतांत ह्याचा जास्त वावर असल्यामुळे वेळेचे बंधन नाही. पंचम व रिषभ यांचा वारंवार प्रयोग होत असल्यामुळे या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे पंचम व रिषभच आहेत. त्यांतील रिषभ हे एक अजब रसायन आहे.मध्यमांतून गंधारमार्गे रिषभाकडे येतांना जी मींड आहे त्यांत देसचे सगळे सौंदर्य सामावलेले आहे. उदा. मsगरेगsसा. लहांनापासून मोठ्यांपर्यंत आणि नवशिक्यांपासून ते कसलेल्या गायकांपर्यंत सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य ह्या देस रागांत आहे.

एखाद्या युवतीच्या गालावरील पडणार्‍या खळीमुळे जसे तिचे सौंदर्य खुलते तद्वतच सर्व शुद्ध स्वरांच्या विहारांत अवरोही रचनेत येणार्‍या कोमल निषादामुळे देस ऐकायला फार हळुवार आणि गोड वाटतो. पदांतील काव्यरचनेनुसार स्वररचना केली तर एकाचवेळी ईश्वरभक्ति, देशभक्ति, शृंगार अशी विविध भावनिर्मीति करणारा हा राग आहे.

गले भुजंग भस्म अंग यातला देस शंकर पार्वतीच्या प्रेमाचा आविष्कार दाखवितो. मुंबई दूरदर्शनने ‘देस राग’ ही धुन राष्ट्रीय एकात्मता दर्शविण्यासाठी तयार केली होती. वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत अनेकविध चालीत बांधले असले तरी मूळ देस रागातीलच वन्दे मातरम् सर्वमान्य आहे.

एकच प्याला नाटकांतील ‘प्रभू मजवरी कोपला’ हे सिंधूच्या तोंडचे पद करूण भावना व्यक्त करणारे आहे. किंवा विद्याहरण नाटकांतील ‘मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला’ हे ही पद देसमधीलच ज्यांत आपल्याला शृंगार दिसतो. अगदी अलीकडील उदाहरणे द्यावयाची झाल्यास ‘कोई कहे कहता रहे’~ दिल चाहता है, ‘हर घडी बदल रही है रूप जिन्दगी’~कल हो ना हो ह्या चित्रपट गीतांचा उल्लेख करतां येईल.

शास्रीय संगीताच्या बैठकीत ठुमरी दादरा या स्वरूपांत हा राग अधिक सादर केला जातो.ख्याल किंवा धृपद गायकीत क्वचितच आढळतो.अपवाद म्हणून रोशनआरा बेगम, पं. रातंनजनकरबुवा, उल्हास कशाळकर यांनी बांधलेल्या’होरी खेलनको चले कन्हैया, ‘घन घन घन’ या देसमधील बंदिशी आज यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. शास्रीय अंगाने उपशास्रीय संगीताच्या आविष्काराला अनुकूल अशा मध्य व द्रृतलयीतील बंदिशी गायल्या जातात. माणिक वर्मांच्या एका मैफिलीत’हो श्याम मोरी बैंय्या गहो ना’ ही देसमधील द्रृत एकतालांतील बंदिश म्हणजे शास्रीय व उपशास्रीय शैलीचा बेमालूम मिलाफ होता असे म्हणतात.

शेवटी कलाकाराला हेच लक्षांत ठेवायचे असते की कोणताही राग घ्या, स्वरांशी कसरत करून आपले ज्ञान दाखवायचे नसते तर त्यांच्याशी लीलया खेळून रसिकांचे मन जिंकायचे असते.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरा विसावू या वळणावर ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जरा विसावू या वळणावर☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

असं म्हणतात की संधी आपल्या दाराबाहेरच उभी असते. दार उघडता क्षणी ती आत येते अन्यथा ती दुसरेच दार ठोठावते. संधीच सोनं करणं हा प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षेचा भाग ठरू शकतो.

बालपण तारुण्य आणि वार्धक्य अशा वळणांवरून जाणाऱ्या जीवन प्रवासात अनेक विसाव्याचे क्षण येतात. तसेच अनेक संधीही उपलब्ध होतात. दूरदृष्टी असलेला त्या संधीचं सोनं करतो. म्हणजेच त्या वळणावर तो जरा विसावतो. या गोष्टीचा झालेला फायदा त्याच्या जीवनपटावर प्रतिबिंबित होतं.

आज संपूर्ण मानव जातीला एकत्र या वळणावर थोडसं थांबायची वेळ आली आहे. एरवी आपण वैयक्तिक रित्या या वळणांवर आपापले निर्णय घेत असतो पण आता एकत्रित चिंतन करण्याची वेळ आली आहे.

करोना नावाच्या अस्मानी संकटाने गेले कित्येक महिने आपण सारेजण सैरभैर झालआहोत .सर्व थरातील, सर्व वयातील, सर्व व्यवसायातील लोकांना एकाच वेळी वेठीस धरले गेले आहे.इतकेच नव्हे तर सर्व देशांवर आणि सर्व जाती धर्मावर एकाच वेळी संकट ओढवण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. लहानापासून थोरापर्यंत रावा पासून रंका पर्यंत सामान्यांपासून ते शास्त्रज्ञ प्रंतप्रधान यासारख्या असामान्यांपर्यंत सर्वांना आव्हानात्मक असेच हे आहे .

हे अवघड आव्हान आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे आणि या संधीचं स्वागत आपण आपली मनाची कवाडं उघडी ठेवून केलं पाहिजे

सध्या आपण सर्वजण जणू स्टॅच्यू झालो आहोत. आर्थिक गती चक्र थांबले आहे. प्रत्येकाचं मन लॉक झालंय .आता आपण अनलॉक व्हायला हवं. करोनाने दिलेल्या या तथाकथित विसाव्याच्या क्षणी काही गोष्टीचा परामर्श घ्यायला हवा.

आत्मनिर्भर भारताची हाक आपल्या रोमारोमात पोचली आहे. त्याची आता आपण कास धरायला हवी .कोणावरही अवलंबून असणे ही अगतिकता आहे हे विसरून चालणार नाही. महात्मा गांधींनी स्वावलंबनाची शिकवण आपणास दिली आहे तिचे विस्मरण होता कामा नये. कोणतेही काम हे मानव निर्मित असतं त्यामुळं ते मानवाला सहज साध्य असंच असतं. याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी.

गृहिणी पासून व्यावसायिकांपर्यंत लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनी हातात हात घालून ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही भावना स्वतःत रुजवून भारत विकसनशील कसा होईल हे सामाजिक भान राखले पाहिजे.

‘मेक इन इंडिया, मेड इन इंडिया’ यावर खूप सखोल विचार केला पाहिजे. परदेशी कंपन्यांच्या वस्तूंवर अवलंबून राहता कामा नये. आपल्या देशातील कुटिरोद्योग लघुउद्योग आणि मोठ्या इंडस्ट्रीज यांना लागणारा कच्चामाल आणि त्यातून तयार होणारे सामान याची व्यवस्था आपणच करू शकतो.आपल्या देशातील खेळणी ही आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करणारी अशी आहेत मग चीनवर अवलंबून का ?

करोनाने आपल्याला आरोग्यम् धनसंपदा हा मूलमंत्र दिला आहे.’ सर सलामत तो पगडी पचास’ हे आता सर्वांना पटलेलं आहे .आपल्या शरीरावर प्रेम करायचं करोनाने आपल्याला शिकवलं आहे. आपल्या देशातील पूर्व परंपरागत योग साधना त्याचे अनुकरण इतर देशातील मंडळी करत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशातील आयुर्वेद हे महत्त्वाचे ठरत आहे.’चरक संहिता’ आता पुन्हा आठवू लागली आहे.

इतर देशांच्या लाईफ स्टाईल चे अनुकरण करता करता आपण आपल्या देशातील आपल्या हक्काच्या सर्व गोष्टी विसरत चाललो आहोत हे जाणवतयं .आपल्या पूर्वजांनी आपल्यावर घडवलेले संस्कार आणि वागण्याच्या पद्धती स्वच्छतेचे नियम आपण धाब्यावर बसून इतरांचं अनुकरण करायला शिकलो. ही आपल्याकडून मोठी घोडचूक झालेली आहे.

आपलाच नमस्कार आपलं स्वागत करतयं. हस्तांदोलन करणं किंवा गळाभेट घेणं या गोष्टी चुकीच्या ठरू लागल्या आहेत. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आज आपण या वळणावर क्षणभर विसावा घेऊन आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं असं वाटतयं .

आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागलोयं असे नाही का वाटत?…….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

दिवाळी अंकांची न्यारी सफर

“टाटा टाटांच्या टाटानगरीत

किमया करती हजार हात

लोखंडाची बघा कोंबडी

घालितसे सोन्याची अंडी “

ही चारोळी आहे  एका  बालदिवाळी अंकातली. गळ्याशप्पथ !! अभिनव पध्दतीनं चारोळ्यांचा वापर मुळाक्षरांची ओळख लहान मुलांना करुन देण्यासाठी मराठी दिवाळी अंकात केला गेला. आहे ना मजेशीर माहिती ! आनंद,छावा,छात्रप्रबोधन अशा  अंकांनी बालविश्व समृद्ध केलं दिवाळी आली की माझं मन पुस्तकांच्या दुनियेत जातं. दिवाळी अंकांच्या सफरीवर जातं

माझ्यातला वाचक, चातकपक्षी जसा पावसाची वाट बघतो, तसा दिवाळीआधी पासूनच दिवाळी अंकांची वाट बघत असतो. रंगीबेरंगी मुखपृष्ठांची प्रावरणे ल्यायलेले ते दिवाळी अंक पुस्तकांच्या स्टॉलवर असे काही मांडून ठेवले जातात की कपड्यांच्या भव्य शोरुम्सही लाजतील. पणत्या, आकाशदिवे यांच्याही आधीपासून दिवाळी अंक दिवाळीची चाहूल देत असतात. माझ्या पहिल्या बालवाचनाचा सवंगडी होता चांदोबा….  विक्रम वेताळ मधील वेताळ माझा सल्लागार होता. सावकाराचा लबाडपणा, राजाराणी, इसापनीतीमधील  नायक , गुलामांच्या कथा, यांनी बालवयातच एक मनोधारणा निर्माण केली. अजूनही स्मरणात आहेत  ती त्यातील चित्रं. दाट जंगल, दिमाखदार राजवाडे, पुष्करिणी (या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी चांदोबा मासिक वाचायलाच हव.), लांब, जाडजूड शेपटा घातलेल्या मुख्य कथा नायिका, सावकाराच्या चेहर्‍यावरील हावरा भाव, अगतिक, फसलेला मित्र, लांडगे, कोल्हे असे प्राणी अशी कितीतरी चित्रं मन:पटलावर कोरली गेली आहेत.

किशोर मासिकानंही माझं किशोर वय अलगदसं त्याच्या पानापनातून सांभाळलं. कविता, कथा, कोडी, विज्ञानाची अभूतपूर्व दुनिया, शब्दकोडी, घरबसल्या करता येतील असे अनेक उपक्रम…. पानोपानी उलगडत जाणारं हे अक्षरधन म्हणजे हिरे माणकांपेक्षाही अनमोल खजिनाच जणू. त्यातील गोष्टी, त्यांचा आशय, तो वास, कागदाचा  तो गुळगुळीत स्पर्श, आणि त्या मासिकाचं डौलदार रुप मनात कसं घर करुन बसलयं. या अक्षरमोत्यांनी नकळत आम्हांला संस्कारक्षम केलं.

वय वाढत गेलं, शहाणं समजुतदार होत गेलं … खेळातून, उनाडक्या करण्यातून बाहेर  आलं.. पण.. वाचनात मात्र रमलेलच राहिलं.. याचं श्रेयही या नटून  थटून येणाऱ्या दिवाळी अंकानाच द्यायला हवं, हो ना? खमंग चकली खावी तशी या अंकांची चव मनाला खमंग, खुमासदार बनवायची. अलगद जिभेवर विरघळणारा सुग्रास लाडू जसा रसना तृप्त करुन बळ ही देतो तसे हे अंक वाचकांची मनं सुदृढ करत असत. कुरकुरीत पोहे, खरपूस खोबरं, तळलेले दाणे, डाळे, काजू यांनी नटलेल्या चिवड्यासारख मनातील भावना  देखील नटून चुरचुरीत होत असत. शंकरपाळीचा खुसखुशीतपणा जास्त चांगला की तिच्यामुळं तोंडभर पसरलेली  माधुरी जास्त अवीट असा प्रश्न पडतो ना? (ऊत्तरही या प्रश्नातच दडलय ना?) तसाच अगदी तसाच बुध्दीला, मनाला, डोळयांना या दिवाळी अंकांनी पौष्टिक  खुराक दिला आहे.

कधी यातल्या कवितांनी भावनांच्या सतारींची तार छेडली तर कधी व्यंगचित्रांनी गालावर हलकेच स्मितरेषा उमटवली. कधीकधी तर एकमेकांना टाळ्या देऊन अख्खं कुटुंब मोठ्या हास्यलाटेवर स्वार होत असे. (जत्रा, आवाज) वहिनी, गृहलक्ष्मी, स्त्री, मानिनी या अंकांनी अवघ्या स्त्री जातीवर अधिराज्य गाजवलं. त्यांचं हळवं, नाजूक भावविश्व तरल बनवलं. त्यातील काही विचारांनी त्या सजग, प्रगल्भ, कणखर, स्वावलंबी झाल्या. आत्मभान जागृत करण्यांतही हे दिवाळी अंक सहभागी आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

थोडासा प्रौढ, बुध्दीजीवी वाचक वर्ग किर्लोस्कर, अक्षर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, ललीत, यांची वाट बघे. सामना, साधना केसरी, मनोहर सारख्या मासिकांना त्यांचा त्यांचा खास वाचकवर्ग असे. निदान दोन चार दिवाळी अंक घरात आल्याशिवाय सण साजरा होतच नसे.

मराठीतील पहिला दिवाळी अंक कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ साली संपादित केला.अनेक साहित्यिक निर्माण केले. तेंव्हापासून आजपर्यंत अक्षरसाहित्यानं समाजप्रबोधनाचा हाती घेतलेला वसा आजतागायत सुरु आहे.

साहस, महत्त्वाकांक्षा, स्वावलंबन या बरोबरच समाजाच वैचारिक परिवर्तन करुन सांस्कृतिक  जडणघडण  रुंदावून, सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा घडविण्यात या मासिकांचा महत्त्वपूर्ण  सहभाग आहे. याच अंकांनी वाड्.मय कला विषयीची अभिरुची निर्माण केली आणि तिला एक उंची दिली. अजूनही दर्जेदार दिवाळीअंकात लिहिण्याचं आमंत्रण मिळणं हा लेखकांच्या अभिमानाचा विषय आहे. केवळ याचमुळं साहित्यकृती मार्फत होत असणार्‍या या दिवाळी अंकांच्या गाथेनं महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास कसा केला हे सांगणारी ही दोन उदाहरणं देण्याचा मोह मला टाळता येत नाहीय.

१९०९ सालच्या दिवाळी अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी मोदकावर एक कविता लिहिलि होती. ती वाचून एका स्त्रीने त्यांना कवितेतूनच प्रश्न  विचारला होता ….

“मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला असे.

तव भार्त्याचे ह्याला साह्य नसे का, कथी मला ताई?”

या प्रश्नाच्या उत्तरासाठी १९१० च्या अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी पति-पत्नी ही कविता  लिहिली. आईकडून मुलीला मिळणार्‍या शिकवणुकीपासून संसारात रमलेल्या स्त्री पर्यंतचे वर्णन या कवितेत दिसत. तत्कालीन पतिपत्नींच्या संबंधांचं स्वरुपही त्यातून लक्षात येतं.

“लग्न नव्हे ते प्रेम केले, एकीकरण जीवांचे

त्या ऐक्याचे वर्णन करणे शक्य न आपुल्या वाचे

असे न जेथे संसाराचा केवळ तेथे शीण

पत्नी वाचून पती पांगळा, ती ही तशी पतिवीण”

असा समजावणीचा सूरही त्यातून  उमटतो.

संपादक रॉय किणीकर यांनी ‘चिमुकली दिवाळी’ नावाचा दिवाळी अंक लहान मुलांसाठी काढला होता. या अंकाचं मुखपृष्ठ जणू एक स्लेटपाटीच होती! त्यावर पेन्सिलनं लिहिता येऊ शकत होतं!! बालमनाचा विचार करुन त्यांना वाचनसंस्कृतीत सामील करुन घेण्याचं हे एक कौशल्यच आहे ना?

भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात. संस्कृतीच्या खुणा आणि प्रतिक म्हणून जुनं जपणं, वृध्दिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे. शतकाहून अधिक काळ दिवाळी अंक हे काम चोखपणानं करत आहेत. चारशेहून अधिक  दिवाळी अंक मराठीची पालखी खांद्यावर मिरवत आहेत. मराठीचा मराठमोळा बाणा, शहरी औपचारिकता, ग्रामीण तोरा, भाषेची नजाकत, यांच्या दिंड्या पताका उभारून मराठी मनाची मशागत करत आहेत.

नवीन अंकांचं कात टाकून समोर आलेलं डिजिटल  आधुनिक रुप तर जगभर पसरलेल्या मराठी मनातील काळ्या मायमातीची ओढ लावायला समर्थ आहे. हे ‘ई’ रुप हळवे मराठी भावबंध साखळदंडासारखे मजबूत  बनवतील आणि मराठीचा डंका सातासमुद्रापार निनादत ठेवतील यात शंका नाही.

असे हे दिवाळी अंक, त्यांच्या नाना कळा (कला), नाना गुण!

हे नसतील तर. . . . .

गत:प्रभ झणी होतील ना मनअंगणे

तेजलुप्त ते होतील ना शब्दचांदणे

असं म्हणावसं वाटतं.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  deepapujari@gmail.com

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मंदिराच्या परिसरात जाताच मला देवभूमीवर उभी असल्याचा भास झाला. नखशिखान्त आतून एक शक्ती लहर माझ्यात भिनल्यासारखे वाटले. सकाळी अकराची वेळ होती. सूर्य बराच वर आला होता. थंडीत त्याच्या उबदार किरणांची शाल अंगावर घेत दर्शनाच्या रांगेत सामील झालो. हळूहळू पुढे सरकत सरकत मंदिरात प्रवेश करते झालो. आत शिरताच दोन्ही बाजूंनी भिंतीवर विठ्ठल रखुमाई,  मंदिराबद्दल माहिती,  तिथे साजरे होणारे उत्सव, आषाढी कार्तिकी च्या वारीची आणि वारक-यांची माहिती,  रिंगण, इंद्रायणी चे महत्व,  अनेक संतांची चित्रे, अभंग, ओव्या,  ज्ञानेश्वर माऊली,  तुकाराम महाराज इत्यादींची सुचवेन, असा संत- खजिना बघायला मिळाला. सर्वात शेवटी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान होते. आमच्या मागे खानदेशातून आलेल्या भक्तांचा ग्रुप होता. ते सर्व जण  त्यांच्या भाषेतील विठ्ठलाचे अभंग सामुदायिक गात होते.ऐकायला खूप छान वाटत होतं, पण माझं लक्ष विठ्ठलाकडेच लागलं होतं.  मूर्ती अजून किती दूर आहे हे बघत होते. पुढे चालता चालता जरासं उजवीकडे वळून समोर पहाते तो……

‘सावळे सुंदर रूप मनोहर’, मकरकुंडले ल्यालेला,  कमरेवर हात ठेवून उभा होता.  मुखावर मंद हास्य, अतिशय सुंदर,  देखणा पंढरीचा राणा.

त्याच्या नजरेतून वहाणारे वात्सल्याचा झरा माझ्या डोळ्यात भरून आला.दृष्टी न हलवता पुढे जात होते. जवळ पोचताच भान हरखून मूर्ती बघतच राहिले. भटजी म्हणाले, आधी पायावर डोकं ठेवायचं, मुख दर्शन नंतर घ्या. मी विट्ठलाचे पाय धरून माथा टेकला.

रांगेत असल्याने पुढे सरकावेच लागते. मला तर विठ्ठलाच्या जवळून दूर व्हावेसेच वाटत नव्हतं. माहेराहून सासरी येताना प्रत्येक वेळी आई दारात दिसे पर्यंत मान मागे वळून वळून आईला बघत रहायचे आणि ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे डबडबलेले असायचे. आत्ता तीच अवस्था माझी झाली.  हो! ही सुद्धा विठू माऊली च ना!

परत मागे येऊन किंचित अंतरावर, मूर्ती पहाण्याची संधी मला मिळाली. बांधेसूद शरीरयष्टी, चेह-यावर सात्विक भाव, गळ्यात तुळशीहार, गुलाबी वस्र ल्यालेल्या विठोबा चं ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेतलं. “राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपियेल्या” अशा देखणेपणातून मला त्याची आश्वासक कृपाद्रुष्टी जाणवली. जणु काही मला सांगत होता, “मी असताना तुला कसली चिंता?”

गर्दी असल्याने तिथे जास्त वेळ थांबता नाही आले. पण त्या पाच मिनिटात सगळे विचार, सगळ्या चिंता, काळज्या, काळ-वेळ, सगळ्या सगळ्याचा विसर पडला. फक्त विठू माऊली आणि मी. दुसरं काहीच नाही.

“अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

मी तू पण गेले वाया

पहाता पंढरीचा राया”

अगदी अशीच मी एकरूप झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मन इतकं शांत झालं. ही सुखद अनुभूती मी प्रथमच घेत होते.

क्रमशः …

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

कुठे थांबायचे हे समजले पाहीजे”

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कुठे थांबायचे हे समजले पाहीजे. हे जीवन जगण्याचे तत्वच आहे. हे कुठेही लागु होते.बर्‍याच जणांना समजत नाही म्हणा किंवा बर्‍याच जणांच्या लक्षांत येत नाही कुठे थांबायचे ते. ज्यावेळी लक्षांत येते त्यावेळी खुप ऊशिर झालेला असतो आणि नुकसानही खुप झालेले असते. तेंव्हा कुठे थांबायचे हे तत्व आपण सर्वांनी अंगिकारले पाहीजे.

आता पर्यावरणाचाच प्रश्र्न घ्या. आपण निसर्गावर अत्याचार करीत आलेलो आहे.त्याचा परिणाम पर्यावरणाचा  र्‍हास होण्यात झालेला आहे. खरी जंगले न वाढवता आपण सिमेंटची जंगले वाढवित गेलो. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लोकांना श्र्वास घेणे अवघड होत चाललेले आहे.ही परिस्थिती बहुतेक सर्व मोठ्या शहरांमधुन आहे. विकास करीत असताना योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे ही परिस्थिती ऊदभवली.

कांहीवेळा आपल्याला प्रचंड राग येतो. रागाच्या भरात आपण खुप बोलतो असे नाही तर कांहीही बोलतो. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणायची की राग आला की १ ते १० अंक मोजायचे. हेतु हा की अंक मोजेपर्यंत राग थोडा तरी शांत होतो. रागाच्या भरात बोलताना कुठे थांबायचे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलत सुटतो. अद्वातद्वा बोलतो. माणसे दुखावली जातात, दुरावली जातात. हे टाळले पाहीजे. राग आला की योग्य ठिकाणी थांबता आले पाहीजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतील.

अलिकडे असे लक्षांत आले आहे की तरूणपिढी व्यायाम, जीम याकडे अधिक लक्ष देत आहे. पण हे करीत असताना कुठे थांबायचे हे या तरूणपिढीला समजत नाही. अशा बातम्या वाचनात आल्या आहेत की व्यायाम करीत असताना कांही मुले अति व्यायामामुळे दगावली आहेत. तेंव्हा तरूण पिढीने व्यायाम करताना कुठे थांबायचे हे लक्षांत घेतले पाहीजे.

सध्या सर्वांकडे स्मार्ट फोनस आहेत. कंपन्याचे तीन तीन महीन्यांचे पॅकेजेस असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी बोलण्याचे चार्जेस पडत नाहीत. अनेकजण त्यामुळे फोनवर बोलायला लागले की थांबतच नाहीत. तासन तास बोलत राहतात. या कालावधीत एखाद्याला यांचेशी संपर्क साधावयाचा असेल तर यांचा फोन बिझी. त्यामुळे फोनवर बोलताना कुठे थांबायचे हे समजलेच पाहीजे.

अलिकडे सर्वांना “व्हाटसअॅप” हा फार मोठा विरूंगळा आहे. आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचे एक चांगले माध्यम आहे.आपल्याकडील माहीतीसुध्दा आपण शेअर करू शकतो. पण कांहीजण याचा दुरूपयोग करतात. आला मेसेज की कर फॉरवर्ड. कांहीवेळा मेसेज वाचायचेसुध्दा कष्ट घेत नाहीत. एकाचवेळी वीस वीस तीस तीस फोटो, ६०/७० एमबीचे व्हीडीओज पाठविणे कितपत योग्य आहे. याचा विचार अतिशय आवश्यक आहे. पण तो होताना दिसत नाही. व्हाटसअॅपवरती मेसेजस पाठविताना कुठे थांबायचे हे समजले पाहीजे नाहीतर मेसेजेस डीलीट करण्याचे कामच होऊन जाते.

पुर्वी लग्नसभारंभात जेवणाच्या पंक्ति ऊठायच्या. आपुलकीचे,जिव्हाळ्याचे प्रदर्शन व्हायचे. जेवताना पाहुणेमंडळीना प्रचंड आग्रह केला जायचा. अन्नाची नासाडी व्हायची. आग्रह करण्याला “कुठे थांबयचे” हे न समजल्यामुळे असे घडायचे. आता थोडी पध्दत बदलली आहे. पंक्तिच्याऐवजी बूफे पध्दत आली. तरीसुध्दा अन्न वाढुन घेताना काय काय घ्यायचे काती किती घ्यायचे हे न समजल्यामुळे अन्नाची नासाडी ही होतेच. फक्त प्रमाण थोडे कमी.

थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. म्हणतात ना अति तेथे माती. या लेखाचे सार हेच की कुठे थांबायचे हे आपल्याला समजले पाहीजे आणि हे समजले तर आपले सर्व नातेसंबंध नॉर्मल राहतील, सुधारतील.

मैत्रीत, नातेसंबंधात बर्‍याच वेळा चेष्टा केली जाते. जोपर्यंत मजेत चालले आहे तोपर्यंत ठीक वाटते. पण चेष्टेचा अतिरेक झाला की नातेसंबंध बिघडतात. ह्या गोष्टी टाळल्या पाहीजेत.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

कॉलेज ची धमाल करता करता परीक्षा कधी संपली समजलेच नाही. काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि मी मराठी घेऊन बीए चांगल्या मार्कांनी पास झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

पण आता पुढे काय हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले. कोणी म्हणाले आता एम ए करून घे. कोणी म्हणाले त्यापेक्षा आवाज चांगला आहे गाणं शिक…

लहानपणापासून मला नृत्याबद्दल,नाचा बद्दल खुपच ओढ होती. मला ना,चवथीपर्यंत चांगलं दिसत होतं. म्हणजे जन्मतः जरी मला मोतीबिंदू असले, तरी ऑपरेशन करून थोडं दिसायला लागलं होतं. पण फार लहानपणी मोतीबिंदू झाल्यामुळे काचबिंदू वाढत गेला आणि चौथीनंतर दृष्टी कमी कमी होत गेली. पुढे बीए झाल्यावर वयाच्या एकविसाव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केली. तेच का हे सुद्धा मला चांगलं आठवतंय. माझे बाबा विद्या मंदिर प्रशाला मिरज, इथं शिक्षक होते. त्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या एका कोर्समध्ये त्यांना प्रोजेक्टर, स्लाईड्स बक्षीस मिळाले होत्या. त्यामध्ये भारतातील प्राचीन मंदिरे, भारतीय नृत्य याची सखोल माहिती होती. परमेश्वर कृपेने त्यावेळी मला दिसत होते आणि तो नाच, तो सुंदर पोशाख,छान छान दागिने माझ्या मनामध्ये इतके पक्के बिंबले होते की माझी नजर नंतर गेली पण मनावरचे ते दृश्य नाहीसे झाले नाही. ते मला सारखे साद घालत होते म्हणतात ना, चांगले बी पेरले ही पोषक वातावरणात ते उगवते, फुलते. माझेही तसेच झाले. अर्थात हे सगळे माझ्या नृत्यातल्या गुरु मुळेच घडू शकले. माझ्या नृत्यातल्या गुरु म्हणजेमिरजेतील सौ धनश्री आपटे.

माझ्या नृत्यातल्या, माझ्या विचारांच्या जडण-घडणीतल्या, माझ्या व्यक्तिमत्व विकासाला उमलू देणाऱ्या, फु लू देणाऱ्या, मला माझ्या आयुष्यातला आनंद मिळवून देणाऱ्या आणि एक प्रकारे माझे जीवन उजळून टाकणाऱ्या या माझ्या ताई म्हणजे सौ धनश्री ताई या माझ्या गुरुच आहेत.

अशा गुरू मला केवळ माझे नशीब,माझ्या आई बाबांचे आशीर्वाद,परमेश्वराची कृपा आणि  ताईचा मोठेपणा यामुळेच मला प्राप्त झाल्या.

मी बी ए झाल्यानंतर माझ्या मनातले नृत्य शिकण्याचे गुपित आई बाबांना सांगितले. माझ्या बाबांनी ते मनावर घेतले आणि मला नृत्य.  कोण शिकवू शकेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. धनश्री ताई बद्दल समजल्यावर माझे बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तो पहिला दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. बाबांनी माझी ओळख करून दिली आणि हिला तुमच्याकडे नृत्य शिकायचे आहे आहे असे सांगितले. माझ्या चालण्या वरून, वावरण्यावरून ताईंना मी पूर्ण दृष्टिहीन आहे असे वाटले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एका आंधळ्या मुलीला नृत्य शिकवायचा विडा आपल्याला उचलायचा आहे, तेव्हा क्षणभर त्याही गोंधळल्या. त्यांना हे अनपेक्षित होतं. थोडा विचार करून म्हणाल्या मी दोन दिवसांनी सांगते. आणि त्यांचा आलेला होकार माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. माझ्या आयुष्याला प्रकाश देणारा ठरला.

फक्त मला एकटीला शिकवण्यासाठी ताईंनी माझ्यासाठी बुधवार आणि शुक्रवार राखून ठेवले होते. एकदा तरी त्यांना जमणार नव्हते,म्हणून मला घरी सांगायला आल्या, आज येऊ नको म्हणून. त्यावेळी. मी एकटी जाऊ शकत नव्हते ना,कोणीतरी माझ्याबरोबर सोडायला आणायला लागायचे. आमची खेप वाचावी म्हणून त्या स्वतः आल्या. त्यांच्यातला तो साधेपणा, खरेपणा इतकी वर्ष झाली, तरी अजून तसाच आहे .

ताईंनी मला नृत्यामधल्या हाताच्या,पायाच्या विशिष्ट हालचाली, हावभाव, चेहऱ्यावरचे भाव कसे आले पाहिजेत ते मला समजून समजावून,शिकवलं. हाताच्या मुद्रा त्या तोंडी सांगायच्या. अंगठा आणि पहिले बोट यांची टोके जुळवून गोल कर, बाकीची तीनही बोटं तशीच राहू दे. पायाच्या हालचाली सांगताना त्या या खाली बसून माझे पाय तसे करून घ्यायच्या,एकदा मला कळलं की त्यांना पाहिजे तसं जमेपर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायच्या . माझ्या एमएच्या अभ्यासाचं सांगते, धीर गंभीर अशा श्लोकांच्या स्वरांमध्येमला दशावतार करायचे होते. अक्षरश: नाच करत दहा अवतार सादर करायचे होते. कलकी या अवतारामध्ये मी खरंच घोड्यावर बसून करते आहे असेच मला वाटले. मला त्या सगळ्या अभ्यासाची मजा लुटता आली,आनंद घेता आला.

गाण्यांचे विशिष्ट बोल, त्याचा अर्थ, त्यानुसार हावभाव हे सगळं प्रॅक्टिस न जमत गेलं. सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं मी नुसती शरीरानं म्हणजे फिजिकली नाचत होते. घरी येऊनही त्याचा सराव करत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं  की नाचून नाचूनमाझे पाय सुजले आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, “नृत्य नुसतं शरीरांन करायचं नसतं. मी काय सांगते ते मनानं, बुद्धीने समजून घे, तसं मनात  उतरु दे.” त्यासाठी त्या मला शंभर गोष्टी सांगायच्या, त्यातल्या मला कशातरी पन्नास समजायच्या. माझं त्यांनी इतकं पक्क करून घेतलं की मी अजून सुद्धा झोपेतही ते विसरणार नाही. त्यांनी नृत्यातल्या सगळ्या अवघड गोष्टीसोप्या करून सांगितल्या. मनापासून कसं करायचं याची ट्रिक सांगितली. मला वेगळच समाधान मिळालं. आपल्यातलं काहीतरी सुप्त असलेलं, मला लागले याची जाणीव झाली.  नृत्या तला आनंद मिळाला.

मी भरतनाट्यम ची विद्यार्थ्यांनी आहे. पूर्ण शिकून झालं असं मी म्हणणार नाही. पण पण गांधर्व महाविद्यालयाच्या सलग सात वर्ष परीक्षा दिल्या मी . शेवटची परीक्षा नृत्य विशारद ची होती.

असाध्य ते साध्य कसं करावं ते मी माझ्या ताई कडूनच शिकले. माझ्या आई बाबांच्या खालोखाल, माझ्यासाठी माझ्या ताईंचं स्थान आहे. त्यांनी मला खूप, माझ्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. शिष्याचे प्रगती गुरु कसा भेटतो यावर अवलंबून असते. माझे गुरु प्रगल्भ अध्यात्मिक पाया असणारे, उच्च स्तरावरील विचारांचे आणि खूप प्रेमळ आहेत. ताईंनी मला जवळजवळ वीस वर्ष शिकवले आहे म्हणून मी मी अनुभवान एवढं बोलू शकते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मी केवढी भाग्यवान कि,  प्राध्यापक श्री पां.ना. कुलकर्णी हे स्वतः ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक,  विवेचक, प्रवचनकार,  मला हा विषय शिकवत होते. त्या वर्षी मराठी विषयाची मी एकटीच विद्यार्थिनी होते.  अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,रसाळ वाणी, आणि ओघवतं वक्तृत्व अशा मार्गदर्शनात मी अभ्यास करत होते. वेगवेगळ्या असंख्य नोट्स लिहून तयार करत होते. सरांच्या कडून तपासून घेत होते.

वर्ष संपत आलं होतं.  परीक्षेची वेळ आली. मी विट्ठलाचीच प्रार्थना्थ करत होते, ” मला पेपर लिहिताना सगळं आठवू दे आणि लिहायला येऊ दे.” परीक्षा झाली. आणि सरांनी मला सांगितलं, ‘ तुमच्या सर्व नोट्स मला आणून द्या’. मी सगळ्या व्यवस्थित एकत्र केल्या आणि दिल्या. त्यांनी त्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या विभागात संदर्भ वाचन आणि अभ्यासासाठी दिल्या. मला खूप खूप खूप  आनंद झाला. विद्यापीठाते आपलं लेखन संदर्भा साठी असणं ही किती अभिमानाची गोष्ट.  असं असेल,हे  कधी माझ्या  स्वप्नातही  वाटलं नव्हतं. तेव्हा पटलं, संपूर्णं वर्षभर विठ्ठलच तर माझ्या कडून लिहून घेत नसेल?

तेव्हा पासून मला सतत वाटायचं, पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनाला मला कधी जायला मिळेल? ही 1978 सालची गोष्ट. लगेचच प्रपंचात पडले. नशिबात पुढे काय वाढून ठेवलेले असते, काही कळत नाही. सुखदुःख, त्रास,  अडचणी यांच्याशी दोन हात करता करता 40 वर्षे गेली. वयाची साठी ओलांडली. दरवर्षी आषाढी,  कार्तिकी एकादशीला उपवास करण्याइतकाच विठ्ठलाशी संबंध उरला होता.

आणि….अचानक ओळखीच्या मित्र मैत्रिणींचा अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूरला जायचा बेत ठरला. डिसेंबर 2019,  आम्ही प्रवास सुरू केला. अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थांचे दर्शन,  महाप्रसाद घेऊन दुसरे दिवशी सकाळी मार्गस्थ झालो. वाटेत तुळजापूर च्या आधी पंढरपूर ला जाऊ असे ठरले. आणि दोन तासात पंढरपूर ला पोचलो सुद्धा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares