(आज प्रस्तुत है गुरुवर स्व प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित – “कविता – राष्ट्रहित में सोचिये, कर्त्तव्य पथ पर आइये…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण स्वप्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे.।)
☆ काव्य धारा # २५९ ☆
☆ राष्ट्रहित में सोचिये, कर्त्तव्य पथ पर आइये… ☆ स्व प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆
झूठ-लालच स्वार्थ तज, सच नीति-नय अपनाइये
राष्ट्रहित में सोचिये, कर्तव्य पथ पर आइये।
*
कर रही है स्वार्थवश हो राजनीति अपार क्षति
कैसे इस दुर्भावना से भला संभव कोई प्रगति ?
*
बढ़ती जाती आये दिन, नई-नई समस्यायें कई
हरेक निर्णय से उभरती हैं जटिलतायें नई।
*
क्यों हुआ है मन यों मैला, क्यों नजर दुर्बुद्धि की ?
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
अभंग वाणीतून कळलेले संत तुकाराम
अत्यंत तळमळीने पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या मुखातून जी अभंगवाणी निघाली आहे त्यातून आपल्यासारख्या साधक भक्तांना तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडत गेले आहे.
आता तरी पुढे/ हाचि उपदेश/
नका करू नाश/ आयुष्याचा//
सकाळच्या पाया/ माझे दंडवत/
अपुलाले चित्त/ शुद्ध करा//
हित ते करावे/ देवाचे चिंतन/
करूनिया मन/ एक विध//
तुका म्हणे लाभ/ होय तो व्यापार/
करा काय फार/ शिकवावे//
तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी(व्यापारी) होते. त्यामुळे भक्तांना उपदेश करताना, ज्यामध्ये तुमचे हित आहे, असाच व्यापार तुम्ही करावा असे ते बोलतात. या ठिकाणी व्यापार या शब्दाचा अर्थ कर्म असाच घेणे योग्य ठरेल.
अर्थात स्वहिताचे कर्म करावे.
*शरणागत झालो/ तेणे मी पणा मुकलो//
आता दिल्याचीच वाट/ पाहू नाही खटपट//
नलगे उचित/ काही पहावे संचित//
तुका म्हणे सेवा/ माने तैसी करू देवा//
या ठिकाणी संसारातून मुक्त झाल्याची त्यांची अवस्था दिसते. त्यांच्यातील मी नष्ट होऊन परमेश्वरा जवळ त्यांनी पूर्णतया शरणागती पत्करली आहे. परमेश्वर जे देईल त्याचीच वाट पाहणे आहे असे ते म्हणतात. संचिता पासून सुखाची अथवा दुःखाची प्राप्ती होवो, त्यांना काही फरक पडत नाही. परमेश्वराची सेवा हा एकच त्यांचा ध्यास आहे.
खऱ्या अर्थी तुकाराम जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे हे खालील १३ अभंग वाचले पाहिजेत. ते काय म्हणतात बघा…
कपट काही एक/ नेणे भुलवायाचे लोक//
तुमचे करितो कीर्तन/ गातो उत्तम ते गुण//
दावू नेणे जडी बुटी/ चमत्कार उठा उठी//
नव्हे मठपती/ नाही चाहूरांची वृत्ती//
नाही देवार्चन / असे मांडीले दुकान//
नाही वेताळ प्रसन्न/ काही सांगो खाणखूण //
नव्हे पुराणिक/ करणे सांगणे आणिक//
नाही जाळीत भणदी / उद्धव म्हणोनी आनंदी//
नेणे वादा घटा पटा/ करिता पंडित करंटा//
नाही हलवीत माळ/ भोवते मिळवूनी गबाळ//
आगमीचे नेणे कुडे / स्तंभन मोहन उच्चाटणे //
नोहे त्यांच्या ऐसा/ निरथवासी पिसा/
१) लोकांना कसे फसवावे, हे कपट मी जाणत नाही.
२) मी फक्त कीर्तन करतो आणि कीर्तनातून देवा, फक्त तुमचे गुणगान करतो.
३) लोकांना नादी लावणे हा माझा उद्देश नाही, म्हणून एखादी मुळी काढण्यासारखा कोणताही चमत्कार मी कधीच करत नाही.
४) माझे कोणीही शिष्य नाहीत, की जात वारा, मी माझे मोठेपण समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन.
५) मी मठाधिपती नाही किंवा मला कोणतीही जमीन इनाम मिळालेली नाही.
६) धूप, दीप, गंधादी पुजा अर्चनेच्या कोणत्याही गोष्टींचे दुकान मांडून मी पसारा घातलेला नाही.
७) काही लोकांच्या खाणाखुणा सांगणारा कोणताही वेताळ माझ्यावर प्रसन्न नाही.
८) पुराणाचा आधार घेऊन लोकांना एक सांगावे आणि व्यवहारात वेगळेच वागावे असा ढोंगी पुराणिक मी नाही.
९) अंबाबाईच्या नावाने उदो करत डोक्यावर अग्नीचे खापर जाळणे मला माहित नाही.
१०) घटाकाश, मटाकाश, तंतू आणि पट असे जे वेदांतातील दृष्टांत आहेत त्यांचा अनुवाद करणारा करंटा पंडित मी नाही.
११) लोकांना भवती जमवून आणि त्यांच्यात बसून जपमाळ ओढण्याचे ढोंग करणाऱ्यातला मी नाही.
१२) वेदातील जारण, मारण, उच्चाटन इत्यादी प्रयोग मला माहित नाहीत.
१३) हरीच्या भक्ती वाचून इतर प्रकार करणारा नरकवासी वेडा मी नाही.
तुकाराम महाराज हे फक्त तनाने आणि मनाने हरीचे दास आहेत, भक्त आहेत.
संत तुकाराम एक प्रापंचिक माणूस, साधना करताना त्यांचे मन मध्येच साशंक होते. आपली भक्ती खरी आहे की मी भक्तीचे ढोंग!! करतो आहे अशी शंका त्यांच्या मनात उत्पन्न होते आणि ते अस्वस्थ होतात. पांडुरंगाला सांगतात…
गातो भाव नाही अंगी/ भूषण करावया जगी//
परी तू पतित पावन/ करी साच हे वचन//
मुखे म्हणावितो दास/ चित्ती माया लोभ आस//
तुका म्हणे दावी वेष/ पैसा अंतरी नाही लेश //
ते या अभंगात स्वतःचे दोष वर्णन करतात.
हे हरी, मी तुझे नाव घेतो, परंतु त्यासाठी योग्य असा भक्ती भाव माझ्यापाशी आहे का? जगात माझा लौकिक वाढावा म्हणून तर मी हे नामस्मरणाचे ढोंग करत नाही ना? अशी स्वतःविषयी ते शंका घेतात. तू पतीत पावन आहेस, तेव्हा तूच मला माझ्या चुकीतून सावर. मी जेव्हा माझ्या भक्त असण्याचे दाखवतो, स्वतःला तुझा दास म्हणवितो, तेव्हा मला असे वाटते की भक्तीचा लेशही माझ्यात नसून माझ्या चित्तात अजूनही माया मोह लोभ आहे.
देवाला तुकारामांची ही प्रामाणिक कबुली आहे.
भक्तीचा महिमा इतका अपार आहे, की त्यामुळे तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यातील द्वैतभाव हळूहळू कमी होत चालला आहे. महाराज म्हणतात,
बाहिर पडलो/ आपुल्या कर्तव्ये /
संसाराची जीवे/ वेटाळीलो//
एका मध्ये एक/ नाही मिळो येत/
ताक नवनीत/ निवडिले//
झाली दोन्ही नामे / एकची मथनी/
*दुसरीया गुणी/ वेगळाली//
तुका म्हणे दाखविली/ मुक्ताफळी/
शिम्पलेची स्वस्थळी/ खुंटलीया//
महाराज स्वतःची स्थिती या अभंगात वर्णन करतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, केवळ या जीवदशेमुळे जन्म, मृत्यू, आणि संसार यात ते गुंतून पडले आहेत. पण आता प्रयत्नपूर्वक या सर्वातून बाहेर पडत आहेत. ताकापासून निघालेले लोणी ज्याप्रमाणे ताकात पुन्हा मिसळणे अशक्य, त्याचप्रमाणे आता एकदा संसारातून बाहेर पडल्यावर त्यात पुन्हा अडकणे नाही. एकाच्याच मंथना पासून वेगळ्या गुणांमुळे सार व असार हे दोन भाग झाले आणि त्यास दोन नावे पडली. एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढल्यावर त्याला पूर्ववत शिंपल्याशी जोडता येत नाही.
तुकाराम महाराजांची स्थिती या शिंपल्यातून बाहेर काढलेल्या मोत्यासारखी झाली आहे.
मोक्ष तुमचा देवा/ तुम्ही दुर्लभ तो ठेवा/
माझी भक्तीची आवडी/ नाही अंतरी ते गोडी//
आपल्या प्रकारा/ करा जतन दातारा/
तुका म्हणे भेटी/ पुरे एकची शेवटी//
तुकारामांना मोक्षाची हाव नाही. तो दुर्लभ आहे. ते देवाला सांगतात की देवा, मोक्ष काय आहे तो तुझ्यापाशीच ठेव. मला फक्त तुझ्या भक्तीची आवड आहे. तुझ्या भेटीसाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे.
तुकाराम महाराजांच्या मनस्थितीची कल्पना या अभंगातून वाचकांना येते.
५००० अभंगाच्या या गाथेत वेळोवेळी तुकाराम महाराज आपल्या नजरेसमोर सतत उभे राहतात. त्यांच्याविषयी पुढील लेखात अजून जाणून घेऊ.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्तीसूत्र ४५.
तरङ्गायिता अपीमे सङ्गात्समुद्रायन्ती ॥ ४५ ॥
अर्थ : दु:संगानें जडणारे विकार सुरुवातीला जरी मंद लहरींप्रमाणे वाटले तरी त्या दु:संगामुळेच ते सागराप्रमाणे विशाल बनतात.
विवेचन : विकार हे नेहमी सौजन्याचा बुरखा घालून येत असतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्याकडे परिणामी जे चांगले असते, त्याला चांगले म्हटले जाते. गुढी पाडव्याला आपण कडुनिंबाची पाने खातो, ती खाताना आपल्याला कडू लागतात, पण अंतिमतः ते आपल्या फायद्याचे असते. विषय सुरुवातीला आपल्याला छान वाटतात, पण अंतिमतः मात्र ते मनुष्याचा घात करतात.
या विकारांची बाधा कळून येत नाही. कारण ते अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. पण जसा त्यांना विषयांचा संबंध होत जाईल तसे तसे ते समुद्राप्रमाणे वाढत जातात. अग्नीची ठिणगी लहान असते, पण पेंढ्यांची गंजी जाळायला पुरेशी ठरते.
ज्ञानेश्वर माउली सांगतात.
‘देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सावरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥’
(द्न्यानेश्वरी ३-२०४)
पारध्यांनी पसरलेले जाळे हरिणास प्रथम बाधक वाटत नाही पण परिणामी त्यातच त्याचा सर्वनाश असतो. जोपावेतो हे विकार तरंगासारखे अल्प परिमाणात असतात तोपावेतो त्यांतील दोषदर्शन न झाल्यामुळे त्यांचा त्याग शक्य असूनही केला जात नाही. मग एकदा का ते समुद्रासारखे विशाल व्यापक झाले की आवरले जाणे शक्य नाही. सागराचा दृष्टांत देण्यात त्याची भयानकता, विशालता दाखविणे हा उद्देश असावा. सागर तरून जाणे जसे कठीण तसेच हे कामक्रोधादि विकार तरून जाणेही कठीण आहे.
आपण समाजात राहतो. समाजातील बऱ्यावाईट माणसांशी आपला संबंध येणे अगदीच स्वाभाविक आहे. पण त्या वाईट लोकांचा गुण आपल्या अंगी येणार नाही, यासाठी आपण दक्ष रहाण्याची नितांत गरज आहे. काही लोकं घराच्या वाशासारखे असतात, त्यांना टाळणे शक्य नसते. मग त्यांना सोबत घेऊनच जीवन जगावे लागते. यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. क्रोध आणि काम या प्रमुख विकारांवर आपण ताबा मिळविला तर अर्धे मैदान जिंकले असे समजायला हरकत नाही.
जय जय रघुवीर समर्थ
—–
नारद भक्तिसूत्र ४६
कस्तरति कस्तरति मायाम्? यः सङगान्स्त्यजति यो
महानुभावं सेवते, निर्ममो भवति ॥ ४६ ॥
अर्थ : माया तरुन कोण जातो? मायेच्या पार कोण जातो? जो आसक्तींचा त्याग करतो. जो ममत्व रहित होतो. (तोच मायेच्या पलिकडे जातो.
विवेचन : मागील सूत्रातून दुःसंग हा कसा बाधक आहे व कामादिकांच्या द्वारे सर्वनाशास कारण आहे हे सांगितले. पण या सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे. केवळ कामक्रोधादिकांचा नाश झाला पण त्यांचे मूळ जी माया ती राहिली तर तिच्यापासून पुन्हा सर्व संसार निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून माया-तरण झाले पाहिजे. ते कोण करू शकतो याचा विचार या सूत्रात केला आहे. प्रथम माया म्हणजे काय पाहिले पाहिजे. उपनिषदे, पुराणे, स्मृती, गीता व संत-वाङ्मयातून, तसेच शास्त्रकारांच्या दर्शन-ग्रंथातून मायेचा फार विचार केला आहे. मायेचीच अविद्या, प्रकृती, प्रधान, कल्पना, संसार, भ्रम इत्यादी नावे आढळतात.
समर्थ म्हणतात,
*”माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥”*
(दास. १४. १०. ०१)
शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून संसारात अडकवणारी ती माया असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे.
*”तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव । दशे आले ॥”*
(ज्ञा. ७-६६)
मायेच्या दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. आवरणशक्तीने चैतन्याच्या विशेष स्वरूपास झाकून ती त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडते हेच अज्ञान.
*”आपुला आपणपया । विसरू जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥”*
(ज्ञा. १४-७१.)
ही माया आपल्या विक्षेपशक्तीने ब्रह्मांडस्वरूप सर्व सृष्टी उत्पन्न करते. तसेच जीवाला देहद्वयाचा अहंकार घ्यावयास लावून त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोर्क्तृत्वादी धर्माचा तादात्म्य अध्यास निर्माण करते; असे वेदांतग्रंथांतून म्हटले आहे. माया ही भगवंताची सद्सद्विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती आहे.
जीवाला दुःख शोकात्मक संसार भोगण्याचे कारण केवळ मायाच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
*”दुःख शोकाचिया घाई । मारिलिया सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥”*
(ज्ञा. ७-१०७)
वरील सूत्रात ‘तरति’ हे क्रियापद घेतले आहे ते महत्त्वाचे आहे. तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाणे, तिचे अतिक्रमण करणे या अर्थी होत असते. गीतेमध्येही सातव्या अध्यायात ‘मायामेतां तरन्ति ते’ असे म्हटले आहे. पोहणे ही क्रिया एखाद्या नदीतून, सामान्य जलाशय, तळे, विहीर, इत्यादिकांतून होत असते. ती अल्पकाळ श्रमपरिहाराकरिता होते. पण पोहणे व तरणे यांत अंतर आहे. जलाशय, तळे, विहीर इत्यादिकांत पोहणारा जेथे पोहण्यास प्रारंभ करतो तेथेच परत येतो. पण तरून जाणे म्हणजे एका तीराहून निघून मधला पाण्याचा भाग ओलांडून परतीराला जाणे. याकरिता महानदी किंवा समुद्रच घ्यावा लागतो. तरुन जाण्यासाठी तर वापरली जाते. आपण सगळे या भवनदीत, अर्थात भवसागरात आहोत असे सर्व संत सांगतात. या मायेला जिंकल्याशिवाय हा भवसागर तरुन जाणे शक्य नाही. भगवंत म्हणतात,
*”माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा| कासेस लागले माझ्या ते चि जाती तरुनिया|| “*
(गीताई ०७. १४)
अंतरंग व बहिरंग असे संगाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग स्त्री, पुत्र, वित्त, गृहक्षेत्रादी व अंतरंग काम-क्रोध, लोभ, अहंकारादि हे दोन्हीही जीवाला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. वास्तविक वर पुत्र, वित्त, कलत्रादी विषय बहिरंग म्हटले आहेत. जोपावेतो देह आहे तोपावेतो यांचाही संबंध राहील, मग त्याग कसा होणार? येथे संपूर्ण विषयांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत नाही. कारण स्वरूपाने ते बाधक नाहीत. बाधक अंश संग म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, अहंत्व, ममत्व, प्रियत्वबुद्धी होय. तीच साधकाला घातक असते, त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच संगत्याग होय, पण या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी, अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच काय पण अंतःकरणचतुष्ट्य सर्व त्या विषयात रंगून जाते. असा हा संग दृढ झालेला आहे.
असे जरी आहे तरी जेव्हा अंतःकरणात विवेक निर्माण होतो तेव्हा अंतःकरण, बुद्धी, विषय यांचे अनित्यत्व पटते व एक वेळा अनित्यत्व, अनात्मत्व पटले म्हणजे तो साधक पुन्हा त्यात अडकला जात नाही. तो विवेक महात्म्यांच्या कृपेविना प्राप्त होऊ शकत नाही.
येथे ‘संगान्स्त्यजति’ असे बहुवचन आहे. संगाचे अंतरंग व बहिरंग असे दोन प्रकार वर सांगितले आहेत. बाह्यसंग काही अवांतर कारणाने म्हणजे दोषदृष्टीने सुटू शकतील पण फार बाधक असणारे अंतरसंग हे विना विवेक ज्ञानाच्या टाकले जाणार नाहीत. याकरिता ”यो महानुभावं सेवते” हे वाक्य सूत्रात आले आहे. येथे ‘महानुभाव’ हा शब्द महत्त्वाचा आहे. मागे अडतीस व एकूणचाळिसाव्या सूत्रात ‘महत्’ पद संतांच्याकरिता वापरले आहे. त्यांनाच येथे महानुभाव असे म्हटले आहे. महान म्हणजे मोठा आहे अनुभव ज्यांना, त्यांना महानुभाव म्हणावे. अनुभव हा एक जीवनाचा स्थायीभाव आहे. जीवनातून अनुभव वगळता येणार नाही. जीवन हे अनुभवस्वरूप असते. अनुभव हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. मुख्य ज्ञानाचे दोन प्रकार वेदान्तशास्त्रात सांगितले आहेत. स्मृती आणि अनुभव. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानास अनुभव म्हणतात व अनुभवापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांपासून जे ज्ञान होते ते स्मृतिज्ञान होय.
अनुभवातही यथार्थ-अयथार्थ, प्रमा अप्रमा (भ्रम) असे प्रकार आहेत. योग्य प्रमाणाने योग्य विषयाचे जे यथार्थ ज्ञान होते त्यास प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान म्हटले जाते. जेव्हा प्रमाणात दोष शिरतो, विषय अयोग्य असतो म्हणजे बाधित असतो. त्याचे जे ज्ञान ते अप्रमा (भ्रम) म्हटले जाते. दोरीवर जर एखाद्याला सर्पज्ञान झाले तर तो भ्रम होय. कारण तो दोरीच्या अज्ञानाने इंद्रियदोषादिकांमुळे झालेला असतो व कालांतराने राहत नाही म्हणजे सर्पभ्रम बाधित होतो. म्हणून तो अनुभवही बाधित, अप्रमा, भ्रम म्हटला जातो. संसारात काही अनुभव प्रमाणभूत म्हणजे खरे असतात व काही अनुभव अप्रमा म्हणजे भ्रमरूप असतात, निष्फल नव्हे बाधक असतात. अनेक विषयांचा अनुभव मनुष्य घेत असतो पण तो टिकत नाही. सुखप्रद होत नाही. तसेच विषय कार्य असल्यामुळे अल्प आहेत. “यदल्पंतन्मर्त्य” जे अल्प ते मर्त्य म्हणजे विनाशी असते असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. सामान्यच काय पण इंद्रादिक देवांच्या स्वर्गीय अलौकिक अनुभवालाही तुच्छता आहे. तेही अनुभव घेणारे महान म्हटले जात नाहीत. महान अनुभव म्हणजे ज्या अनुभवाचा विषय मोठा, प्रमाण निर्दोष व अनुभव घेणारा अधिकारी योग्य तो महान एक परमात्माच आहे. याचा विचार मागे आला आहे. त्याचा प्रत्यक्ष तादात्म्याने अनुभव भक्तांना येत असतो.
जलात बुडणार्यांना जशी बळकट नौका तारून नेते त्याप्रमाणे या घोर संसारात गटंगळ्या खाणार्या जीवास शांत चित्त असलेले ब्रह्मवेत्ते संतच या संसारसागरांतून तरून जाण्याला मोठा आधार असतात.
जन्माला आलेला मनुष्य मरणार आहे, हे अंतिम सत्य आहे. येताना मनुष्य रिकाम्या हाताने येतो, आणि जाताना रिकाम्या हाताने जातो. इथुन जाताना जर तो सर्व गोष्टींची आसक्ती त्यागून जाऊ शकला, तर त्याला मुक्ति मिळण्याची शक्यता असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत असे सांगतात की प्रापंचिक मनुष्याला, साधकाला परमार्थ मार्गात पत्नी कधीही अडथळा ठरत नसते, तर तिच्याबद्दल असलेले *ममत्व* त्याला बाधक ठरत असते.
काळोखात मनुष्याला भीती वाटते. पण त्याचवेळी त्याला जर कुठे अग्नी दिसला, तर त्याची थंडी, भय आणि अंधार तिन्ही एकाच वेळी नष्ट होतात. त्यासाठी भगवंताचा आश्रय सर्वोत्तम ठरू शकतो.