मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ –घायाळ मी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? घायाळ मी? श्री आशिष  बिवलकर ☆

घायाळ केलंस सखे,

नयन तुझे तलवार!

हृदयाला भिडलीस,

केलेस जुलमी वार!

 

कुंतल तुझे

रेशमी जाल!

गोरे गोरे

मऊ मऊ गाल!

 

किती सुंदर अशी,

बहारदार तू हसते!

हास्यात तुझ्या

शरद पौर्णिमा भासते!

 

सौंदर्यात तुझ्या,

पुरता मी बुडालो!

प्रेमात तुझ्या,

पार वेडावलो!

 

एकटक तुला,

पहावेसे वाटे!

ह्रदयात तुझ्या,

पत्ता माझा भेटे!

 

तुला पहात पहात लिहावी 

कविता की गझल!

अप्सरा जरी अवतरली,

तुझ्या पुढे काय तिची मजल!

 

तुझ्या वर्णनात

शब्द सुंदर होतात!

शृंगार रसात

कवितेत सजतात!

 

तुझ्या नावाने अखंडित,

श्वासांची गुंफलीय माळ!

मृत्यू जरी आला तरी,

थांबेल तो ही सर्वकाळ!

 

स्तुतीने सुखावलीस तू,

हरवून गेलीस काही काळ!

एव्हढ्या शिट्या दिल्यात मी ,

शिजली का ग माझी डाळ! 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळोख… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ काळोख… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मी संत कुळीचा झालो संतांच्या सहवासाने

मन झाले साक्षात्कारी भक्तीच्या अभिमानाने

*

नादान जगाचे वारे घोंगावत होते भवती

मज वास्तव कळले माझे गाथेची वाचत पाने

*

भवसागर ओलांडाया झालीच तयारी होती

देहाची सुंदर नौका तरताना आनंदाने

*

काळोख गडद करणारे होतेच बिलंदर काही

त्यांनीच ठरवल्या जाती स्वार्थाच्या हव्यासाने

*

भलतेच कुणी तर होते समतेला तुडवत पायी

होत्याचे नव्हते केले मनमानी अधिकाराने

*

आताही होते आहे रणकंदन भलते येथे

सोसावे कितपत कोणी हे सगळे अपमानाने

*

खोट्याचा वाजे डंका सत्याला नाही थारा

हे घडते सारे आहे कोणाच्या कर्तृत्वाने

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तांडव…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तांडव…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

तांडव हा एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. हे पुरुषप्रधान नृत्य असून ते शिवाने प्रवर्तित केले. संगीत रत्नाकरात (७. ५. ६) दिलेली तांडवाची उत्पत्ती अशी…

प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्नयुक्तं ततो हरः।

तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय व्यदीदृशत्।।

लास्यमस्याग्रतः प्रीत्या पार्वत्या समदीदृशत्।

बुध्दवाथ ताण्डवं तण्डोर्मर्त्येभ्यो मुनयोsवदन्।।

अर्थः- नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धतनृत्य आठवून ते आपल्या गणातील अग्रणी असलेल्या तण्डूकरवी भरतमुनींना दाखविले. तसेच लास्य हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करवून दाखविले. तण्डूने करून दाखविले ते “तांडव” असे जाणून भरतादी मुनींनी ते नृत्य मानवांना शिकविले.

या नृत्याचे सात प्रकार आहेत ते असे…

१) आनंदतांडव २) संध्यातांडव ३) कालिका तांडव ४) त्रिपुरतांडव ५) गौरीतांडव ६) संहारतांडव ७) उमातांडव

हे सातही प्रकार नटराज शिवाला प्रीय होते.

काही काव्य ग्रंथातून दुर्गा, गणेश, भैरव, श्रीराम इ. च्या तांडवाचे वर्णन आढळते. रावणविरचित शिवतांडव स्तोत्राखेरीज आदि शंकराचार्य रचित दुर्गा तांडव (महिषासुर मर्दिनी संकटाविमोचन स्तोत्र), गणेश तांडव, भैरव तांडव तसेच श्रीभागवतानंद गुरु रचित श्रीराघवेंद्रचरितम् मधे राम तांडव स्तोत्र आहे. असे म्हणतात की रावणाच्या भवनातील पूजन समाप्त झाल्यावर शिवाने, महिषासुराला मारल्यानंतर दुर्गा मातेने, गजमुखाच्या पराभवानंतर गणेशाने, ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदल्यानंतर आदिभैरवाने तर रावणवधाच्या वेळी श्री प्रभुरामचंद्राने तांडव केले होते.

वरील सात प्रकारांपैकी गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यात शिव हा ‘भैरव’ अथवा ‘वीरभद्र’ या स्वरूपात असतो. त्याच्या सोबत उमा अथवा गौरी असते. तो जळत्या चितांनी युक्त अशा स्मशान भूमीत भूतगणांच्या साथीने हे भयानक नृत्य करतो.

(संदर्भः- अ. भा. सं. कोष, खं. ४ पृ. ७३)

संध्यातांडवाचे वर्णन शिवपुराणातील “शिवप्रदोषस्तोत्रा”त आहे. त्यावर आधारित “संध्यातांडव” ही कविता रसिकांसाठी पुढे देत आहे. तिची गुणवत्ता वाचकांनी ठरवावी.

या कवितेतील पहिल्या कडव्यात ‘ळ’ आणि ‘र’ या वर्णांच्या प्रयोगाकडे, साधलेल्या अनुप्रासाकडे वाचकांनी विशेष लक्ष द्यावे. आजपर्यंत कविश्रेष्ठ गदिमांचे “घननीळा लडिवाळा” हे एकमेव गीत “ळ ” या वर्णाच्या योजनेसाठी उदाहरण म्हणून सांगितले जाते. या पृष्ठभूमीवर या कवितेतील ‘ळ’ या वर्णाच्या अनुप्रासाचे महत्व. बघा कसे वाटते ते.

आपला अभिप्राय मात्र प्रार्थनीय आहे आणि त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करतोय.

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

भूत गणांचा संघ घेउनी स्मशान भूमिवरी

‘संध्या तांडव’ करितो भैरव सवे सती गौरी।।धृ।।

*

चिता भस्म चर्चिले तनूवर गळा व्याळ माळ

जटाभार माथ्यावर त्यावर चंद्रकोर शीतल

रुंडमाळ, करमाळ रुळतसे विशाळ वक्षावरी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।१।।

*

धडाडणाऱ्या चिता भयंकर वाऱ्यावर हलती

कभिन्न काळी भुते नाचती फेर धरुनि भवती

रक्त-कृष्ण वर्णाचे मिश्रण विचित्र भयकारी!

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।२।।

*

सिद्ध सदाशिव नृत्यालागी त्रिशूळ सरसावुनी

ब्रह्मा दे करताल, वाजवी मृदंग शारङ्पाणी

लक्ष्मी गाई, इंद्र वाजवी रत्नांकित बासरी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।३।।

*

घुमू लागले डमरू डिम् डिम्, मृदंग धिं धिं धिगि धिक्

सरस्वतीच्या वीणेमधुनी सूर सुरेल अलौकिक

कुणी वाजवी शंख, मंजि-या, कुणि वाद्ये शततारी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।४।।

*

देव दाटले, असित लोटले, यक्ष अप्सरांसवे

किन्नर गाती, देवल देती दाद तयांच्या सवे

डुलू लागला गोल धरेचा, शेष फणा सावरी!

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।५।।

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकटा? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ एकटा?... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

“तुम्ही एकटेच राहणार?

असं तू विचारतेस तेव्हा,

खरं तर मला हसूच येतं

 

कुठे असतो मी एकटा?

सोबतीला असतातच ना

हे शब्द, कल्पना आणि आपली स्वप्न!

खरंच,

एकटाच आलास आणि एकटाच जाणार

असं कितीही म्हटलं

तरी ते काही खरं नसतं!

येतानं असतातच की आपल्याबरोबर

आपल्या उज्वला भविष्याची स्वप्नं

आणि जाताना असतातच ना

आयुष्यभरातल्या आठवणींची गाठोडी!

मग मी एकटा कसा?

गर्दीत तर मी एकटा नसतोच

पण एकटा असतानाही नसतो मी एकटा

माझ्या आतल्या आत असते

स्वप्नांची एक नगरी

आणि आठवणींच साम्राज्य

 

मग सांग

 

मी एकटा कसा?

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सृष्टीचा आहेर ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सृष्टीचा आहेर ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

नाजुक हलकी

गिरकी घेऊन

तलम पाकळी

देठात स्थिर!!

फिकट गुलाबी

देखणे फुल

सृष्टीचा दृष्टीला

जणू आहेर!!

हात लावता

मलीन होईल

वाटतो मनाला

उगाच घोर!!

दुरून पाहू

पाहत राहू

फुलाचे सौंदर्य

मनोहर!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८१ – मनमीत…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८१ – विजय साहित्य ?

☆ मनमीत…!

प्रेमाचे नाते,गुलाब जोडी

प्रेम देवता, वाढवी गोडी.

*

उत्कट उर्जा, असे केशरी

आकर्षणाची, प्रथम पायरी..!

*

मैत्री,आनंद, पिवळ्या‌ रंगी

वेलीवरती, नवीन ढंगी…!

*

कृतज्ञतेने आनंद वाटी

रंग गुलाबी,हृदयी दाटी…!

*

समर्पणाचा, लाल गुलाब

देई वचने, नसे रूबाब…!

*

श्वेत पांढरा, लक्ष वेधतो

शुद्ध भावना, नाते जपतो..!

*

उत्साह इच्छा, उत्कट भाव

रंग नारिंगी, वसवी गाव..!

*

आदर आणि,गूढ भावना

रंग जांभळा, पूर्ण कामना..!

*

सुख समृद्धी, प्रेम लाजरे

हिरव्या रंगी, होय साजरे…!

*

गुलाब काळा,दडून राही

वैर भावना, मनात‌ साही..!

*

गुलाब रंगी, मने सांडली

प्रेम भावना, तिथे नांदली..!

*

रंगामधूनी, उमले प्रीत

देई‌ शोधून, हा मनमीत…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रोज डे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

सौ. सुनिता जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ रोज डे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

निवडून आणलेला लाल गुलाब, कोमेजून गेला

दिवसभर बघून बघून, शेवट फोन ही ऑफ झाला…

*

किती प्रॅक्टिस केली होती, मनातलं सांगण्याची,

वर्षभर वाट पहात होता, याच एका दिवसाची…

*

नेहमीच्या तिच्या वाटेवर, तरीही तो उभा होता

तिच्या त्या पाउलांच्या खुणा, शोधत तो फिरत होता…

*

शेवटी ती येताना दिसली, अन् जीव सुखावला,

किंचितसे हसली, अन् मनात मोगरा फुलला…

*

तिने गुलाब घेतला, व खूप खूप प्रेमाचे बोलली

अन् मनावर दगड ठेऊन, शपथ घालून बसली…

*

रोज डे च्या दिवशीच, नवीन नातं सांगून गेली

पण रक्षाबंधनाचं आमंत्रण, हक्काने देऊन गेली…

*

जिवाचं दुखणं झाल्याने, तो आज खूप शांत आहे.

सांभाळून घ्यारे दोस्तांनो, हा आपलाच ‘प्रशांत’ आहे…

*

रोज डे च्या अनुभवाने, सांत्वनासाठी जाणे व्यर्थ आहे

कारण व्हॅलेंटाईन डे च्या, तयारीलाही तो आता लागला आहे…

© सौ. सुनिता जोशी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

साधकांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी सगुण भक्ती करता करता त्यांच्या समवेत असलेल्या साधकांना परमेश्वराच्या भक्तीसंबंधी आपल्या अभंगांतून अमोलिक उपदेश केला आहे.

तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना या अभंगांचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

भक्तीचा सोपा उपाय ते साधकांना सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख//

म्हणवुनी शांती धरा / उतराल पैलतीरा//

खवळलीया काम क्रोधी/ अंगी भरती आधि व्याधी//

*तुका म्हणे त्रिविधताप/ मग जाती आपोआप//

शांतीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात, “

या जगात चित्ताची शांती ही श्रेष्ठ सिद्धी आहे. सर्व सुख तेथेच आहे, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून नेहमी मन शांत ठेवावे. त्यामुळे संसार सागरापासून पैलतीरी जाणे सोपे होते. काम, क्रोध खवळले तर अनेक व्याधींचा उगम होतो. एकदा आपल्या देहात, मनात शांती स्थिर झाली की आध्यात्मिक, आधिभौतीक आणि आधि दैविक हे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. “

भक्तीचा सोपा उपाय तुकाराम महाराज सामान्यांना सांगतात.

सोपे वर्म आम्हा/ सांगितले संती/

टाळ दिंडी हाती/ घेऊनी नाचा//

समाधी सुख सांडा/ ओवाळूनी//

अशा या कीर्तनी ब्रह्म रस/

तुका म्हणे मन पावोनी विश्रांती/

त्रिविध नासती ताप क्षणी//

हातात टाळ घेऊन आणि दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत तल्लीन होऊन नाचल्याने

तुमचे त्रिविध ताप क्षणार्धात नाहीसे होतील आणि समाधी लागल्याचे समाधान मिळेल.

पुढे जाऊन तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की देखाव्याच्या तीन जाती/(देवाला पाहण्याचे तीन प्रकार आहेत.

जैसा भाव तैसे फळ

स्वाती तोय एक जळ*

तुमचा देवाप्रती जसा भाव असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला दिसेल.

जसे, स्वाती नक्षत्रात पडणारे पाणी एकच असते, परंतु ते शिंपल्यात पडले तर त्याचा मोती होतो, कपाशीच्या पिकावर पडले, तर पिकाचा नाश होतो आणि जर ते सापाच्या मुखी पडले तर त्याचे विष होते. म्हणून जसा भाव तसेच फळ मिळते.

तुका म्हणे हिरा/ पारखिया मुढा गारा//

जो रत्नपारखी आहे, त्यालाच हिरा कळतो, जो मूर्ख, अज्ञानी आहे त्याच्या नजरेत हिरा आणि गारा सारख्याच असतात.

साधकांना तुकाराम महाराज भक्तीचा सोपा उपाय सांगतात.

सर्वसाधनांचे सार/ भव सिंधू उतरी पार/

योगायोग तपे/ केली तयाने अमूपे/

तुका म्हणे जपा/ मंत्र त्रि अक्षरी सोपा//

या अभंगात विठ्ठल नामाच्या चिंतनाचे महत्त्व तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत. चिंतनाने सर्व काही प्राप्त होते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे. भवसागर तरुन जाण्यास त्याची मदत होते. असंख्य व्रतवैकल्ये, तप, यज्ञ याग केल्याचे पुण्य या एका चिंतनाने मिळते. म्हणून साधकहो, विठ्ठल हा तीन अक्षरी नामजप तुम्ही श्रद्धेने आणि भक्ती भावाने करा. भक्ती मार्ग कसा अत्यंत सोपा आहे हे साधकांना महाराज सांगतात.

न लगे देश काळ/ मंत्र विधान सकळ/

करुनी करुणा भाकावी//

भक्तीतली आर्तता पाहूनच देव स्वतःहून भक्ताजवळ येतो.

*येतो बैसलिया ठाया/ आसने व्यापी देवराया/

निर्मल ते काया / अधिष्ठान तयाचे//

कल्पनेचा साक्षी/ तरी आदरेची लक्षी/

आवडीने भक्षी/ कोरडे धान्य मटामटा//

भक्ताच्या ठिकाणी भगवंताबद्दल जो आदर असतो, तो देवाला कळतो आणि भक्ताने प्रेमाने दिलेले अन्न तो मटामटा खातो.

घेणे तरी भाव/ लक्ष्मी दासाचा उपाव/

तुका म्हणे जीव/ जीवी मेळवील अनंत//

परमेश्वर दासाचा भक्तीभाव जाणून त्याचे रक्षण करतो आणि शेवटी भक्ताला आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतो.

वाटा घेई लवकरी/ मागे अंतरसी दूरी/

केली भरोवरी/ सार नेती आणिक//

ऐसी भांबावली किती/ काय जाणो नेणो/

किती समय नेणती/ माता भार वाहुनी//

नाही सरले तोवरी/ धाव घेई वेग करी/

घेतले पदरी/ पावले ते आपुले//

फटलंडी म्हणे तुका/ एक सहावे धक्का/

तरीच या सुखा / मग कैसा पावसी//

सामान्य प्रापंचिकाला महाराज या वरील अभंगातून काय सांगतात? ते म्हणतात की अरे परमार्थाचा वाटा लवकर घे, नाहीतर तुला तो मिळणार नाही. नंतर तू कितीही खटाटोप केलास, तरी दुसरेच लोक सार घेऊन जातील. संसाराच्या भ्रमात अडकलेली अशी किती माणसे आहेत, याची गणतीच नाही. निष्कारण प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन नरजन्माची सुसंधी वाया घालवतात, म्हणून आयुष्य असेपर्यंत हे साधका, तू संतांकडे धाव घे. संतांकडून मिळणारे ज्ञान साधनेने लवकर आत्मसात कर.

भगवंताला भक्त किती प्रिय आहे हे तुकाराम महाराज साधकांना पुराणातील कथांचा आधार घेऊन सांगतात.

मानी भक्तांचे उपकार/ ऋणिया म्हणवी निरंतर/

केला निर्गुणी आकार/ कीर्ती मुखे वर्णिता//

म्हणोनी जया जे वासना/ ते पुरवितो पंढरी राणा//

अंबऋषी कारणे/ जन्म घेतले नारायणे/

एवढे भक्तीचे लाहाणे/ दास्य करी दासाचे//

भावभक्तीचा अंकित/ नाम साजे दीनानाथ/

म्हणोनी राहिला निवांत/ तुका चरण धरुनी//

भक्तासाठी भगवंत सगुण रूप घेऊन त्याच्या मागे मागे सतत असतो. भक्ताला सर्वकाळ सर्व दिशा शुभच असतात. अखंड हरिनामाने तो शुचिर्भूत झालेला असतो. ज्या ठिकाणी नारायणाचे अखंड चिंतन चालू असते ते स्थळ

उत्तमच असते, मग तो एकांतवास असो, अथवा घर असो. नारायणाची कृपा हे महद्भाग्य आहे.

या ठिकाणी महाराज एक कथा सांगतात.

महाबळ नावाचा एक भट कृष्णाचे पारिपत्य करण्यासाठी गोकुळात आला होता. त्याला कंसाने पाठवले होते. आपण त्रिकालज्ञ ज्योतिषी आहोत असे भासवून त्याने नंद व यशोदेला मोहित केले होते. जेव्हा यशोदा व नंद यांनी त्याला कृष्णाचे भविष्य विचारले, तेव्हा त्याने मुद्दामच विपरीत भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी कृष्णाच्या मायेने त्या ब्राह्मणाला बसावयास दिलेला पाटच उडला आणि त्या ब्राह्मणाच्या पाठीत बसला. त्याचा खोटेपणा कृष्णाला सहन झाला नाही. असत्याचे, पापाचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे भक्तांना सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही कथा त्यांच्या अभंगात वर्णन केली आहे.

भक्तीचे महात्म्य सांगताना वेळोवेळी त्यांनी अशा प्रकारच्या रूपकात्मक कथांचा उपयोग केला आहे. कधी त्यांची भाषा परखड, तर कधी अति रसाळ आणि मधाळ वाणी त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते.

वेळोवेळी येणाऱ्या अभंगातून आपण याचा परामर्श घेणारच आहोत.

क्रमशः… ७ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४३

दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ॥ ४३ ॥

अर्थ : दुष्ट संग हा सर्व प्रकारे (अंतर्बाह्य) टाकला पाहिजे.

विवेचन:- संतांची संगत करताना काही पथ्ये ही पाळली पाहिजेत. काही गोष्टींचा संग प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. पुढील तीन सूत्रात नारद महाराज आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्याग करायचा हे सांगत आहेत.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. त्यामुळे तो एकटा राहूच शकत नाही. त्याला सतत कोणीतरी सोबतीला, संगतीला हवे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच चांगली माणसे येतील असे होत नाही. जशी भेटतील ती माणसे स्वीकारून मनुष्याला जीवन जगावे लागते. त्यामुळे रोजच्या जीवनात त्याला बरेवाईट अनुभव येत असतात. साधक पक्का होत नाही तोपर्यंत याचा त्याला कमीअधिक प्रमाणात त्रास होत असतो. संत तुकाराम महाराज एका अभंगात आपल्याला सांगतात,

*”मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥२॥शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥३॥आली ऊर्मी साहे । तुका म्हणे||४||”*

.. (अभंग क्रमांक ८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

संसारातही संग असतोच व परमार्थातही सत्संग आवश्यक आहेच हे मागील सूत्रांतून स्पष्ट झालेच आहे. पण ती सत्संगती प्राप्त होण्याला प्रतिकूल अशी दुःसंगती असते. अनादि संसारात नित्य विषयसेवनाचेच संस्कार साचलेले असतात. इंद्रिय-तादात्म्य, विकार हे त्या दुःसंगाचे प्रेरक असतात. जोपर्यंत त्या दुःसंगात साधक असतो तोपर्यंत त्याची सत्संगाकडे प्रवृत्ती होत नाही. कदाचित झाली तरी तिचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून प्रथम त्या दुःसंगाचा त्याग करावयास नारद सांगतात. कित्येक वेळी दुःसंगाचे काही अनिष्ट परिणाम भोगावयास मिळाले असता काही दुःसंग टाकले जातात असे दिसून येते. पण तो खरा त्याग नव्हे. एका प्रकारचा टाकला तर अन्य प्रकारचा राहतोच. कारण दुःसंग एकच प्रकारचा नसतो. म्हणून सूत्रात ‘सर्वथैव’ असे महत्त्वाचे पद घातले आहे. संगाचा चांगलेपणा व वाईटणा त्या संगाच्या विषयावर अवलंबून असतो. दुःसंग हा बाह्य व आंतर असा दोन प्रकारचा आहे. निषिद्ध शब्द स्पर्शादि पंचविषय हे बाह्य असतात, पण ते तमोगुण कार्य म्हणून मोहशक्तीने युक्त असतात. अनादिकालीन विषय इंद्रियतादात्म्यामुळे विषयाचे ठिकाणी अनुकूल बुद्धी निर्माण होते. अंतःकरण राग व द्वेषयुक्त असते, त्यामुळे ते सहज विषयाकडे प्रवृत्त होते. पण ते परिणामी किती बाधक असतात याचे विवेचन मागे सूत्र पस्तीसमध्ये आलेच आहे. सर्व संतांनी पर धन, परस्त्रीचा त्याग करायला सांगितले आहे. परस्त्री माते समान मानावी असे सांगितले आहे.

साधकांस स्त्रीसंगया बाधक होतो याचे अनेक दाखले देता येतील. मोठे तपस्वीही या संगात अडकून पडले असल्याचे आपल्या लक्ष्यात येईल.

दैनंदिन व्यवहार करताना मनुष्य त्याच्या इंद्रिद्वारे करीत असतों. ज्याला भगवतांची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने सर्व इंद्रिये, मन, देह निव्वळ शुद्ध करुन चालणार नाही, तर पवित्र करणे तितकेच आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज प्रापंचिक लोकांसाठी विशेष आदर्शवत असे आहेत. साधनेच्या प्रत्येक टप्प्यातील स्थितीवर त्यांनी मार्मिक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात,

*”पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥२॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥ नको मज कधी परस्त्रीसंगति । जनातुन माती उठता भली ॥४॥ तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळा आवडसी ॥५॥”*

 – संत तुकाराम

‘मनुष्य संतांच्या संगतीत राहील तर तो तसाच बनतो. असंताच्या संगाने असंत, तपस्व्याच्या संगतीत तपस्वी व चोराच्या संगतीत चोर बनतो, वस्त्राला जो रंग द्यावा तो चढतो तसेच माणसाचे आहे. ‘ म्हणून बुद्धिमान पुरुषाने दुष्टांची संगती टाकून देऊन संतांची संगती धरावी. संत हे आपल्या संगतीत असणार्‍याच्या मनातील विषयासक्तीचा आपल्या अमृतमय वाणीने नाश करतात.’

अशा रीतीने दुःसंग सर्वथा त्यागावा हे सांगितले. पण त्याचा त्याग का करावा? तर तो सर्वथा जीवाचा सर्वनाश करणारा आहे. तो कशा कशा प्रकारे मानवाचा सर्वनाश करण्यास कारण होतो हे सांगण्याकरिता पुढील सूत्राची रचना केली आहे.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद भक्तिसूत्रे ४४

कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुद्धिनाशसर्वनाशकारणत्वात् ॥४४॥

अर्थ : दु:संग हा भोगवासना, राग आणि मोह निर्माण करून स्मृतिनाश करतो, तसेच विवेक नष्ट करून मनुष्याच्या सर्वनाशास कारणीभूत होतो.

म्हणून साधकाने दु:संग प्रयत्नपूर्वक टाळावा.

विवरण : मागील सूत्रात दुःसंग हा सर्व प्रकारे त्याज्य आहे व तो दुःसंग अंतर व बाह्य असा दोन प्रकारचा आहे असे म्हटले होते. मनुष्याच्या मनात येणारे वाईट विचार आणि त्याच्या हातून घडणारी कृति, या दोन्हीचा परिमाण मनुष्यावर होत असतो.

संग करणे म्हणजे त्या गोष्टीच्या सहवासात रहाणे. कामक्रोधादी सहा विकार मनुष्याला त्याच्या मूळ ध्येयापासून दूर नेत असतात. म्हणून त्यांच्या त्याग करावा असे आपल्याकडे सांगितले जाते. श्री. गोंदवलेकर महाराज इथे व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन हाच विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतात. ते म्हणतात, की विकार भगवंताने निर्माण केले आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात निश्चित असे स्थान असले पाहिजे. स्वयंपाक करताना नुसते तिखट वापरले, किंवा नुसती हळद वापरली तर स्वयंपाक स्वादिष्ट होण्याची शक्यता अगदीच कमी. स्वयंपाक स्वादिष्ट होण्यासाठी हळद, तिखट आणि इतर जिन्नस योग्य त्या प्रमाणात त्यात घातले पाहिजेत. हेचं सूत्र आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. ह्या सहा विकारांचा विवेकाने विनियोग करता आला तर मनुष्य, साधक त्यांच्या सहाय्याने प्रगती करू शकतो. उदा. आपल्याला राग येतो, याचा मनुष्याला राग आला पाहिजे. साधना करण्याचा कंटाळा न येता, साधना करताना येणाऱ्या कंटाळ्याचा कंटाळा मनुष्याला आला पाहिजे… , पटतंय ना?

अनेक संत स्त्रीसंग करू नये असे म्हणतात. यातील मर्म नीट समजून घेतले गेले नाही तर संभ्रम होऊ शकतो. एकटी स्त्री अथवा स्त्रिया काहीही करू शकत नाहीत. पण स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातृत्वाचा नसेल तर मात्र गोष्टी बिघडू शकतात, असे सर्व संताना सुचवायचे असावे.

कित्येकाना असे वाटते की, ईश्वरच सर्व कर्माचा प्रेरक असल्याने ईश्वरप्रेरणेनेच पाप होते. कित्येकाची अविवेकमूलक भावना अशी असते की अदृष्टाने पाप होते. ईश्वर जर पापप्रेरक होईल तर त्याचेवर विषमता व क्रूरता हे दोष येतील. ज्या ईश्वराच्या कृपेने जीव उद्धरून जातो तो ईश्वर जीवास पाप करावयास कसे लावील? तसेच अदृष्टही पापास प्रेरक नाही. अदृष्ट हे भोगाला नियामक आहे. सुखदुःखादि भोग अदृष्टजन्य असतात.

कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे. ‘स्वतंत्र कर्ता’ असे पाणिनीचे सूत्र आहे. शुभसंस्काराने सद्‌बुद्धीचा जीव अंगीकार करतो तेव्हा त्याच्याकडून पुण्यकर्म होते व अशुभ संस्कार, दुर्बुद्धी व विकाराच्या स्वाधीन झालेला मानव पापकर्मात प्रवृत्त होतो म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात,

*”काम हा आणि क्रोध हा घडीला जो रजोगुणे |*

*मोठा खाादाड पापिष्ट तो वैरी जाण तूं इथे ||”*

(गीताई. ३. ३७)

काम-क्रोधाच्या आधीन झालेल्या माणसास जरी काही पूर्वसंस्कार परमार्थाचे असले तरी मोहाने ते झाकले जातात हा मोहाचा प्रभाव आहे. या स्मृतिभ्रंशाच्या पुढची पायरी ‘बुद्धिनाश’ ही आहे. बुद्धिनाश म्हणजे दुसर्‍या अध्यायात गीतेमध्ये जी सद्‌बुद्धी म्हणून सांगितली आहे किंवा गीतेच्या अठराव्या अध्यायात तीन प्रकारची सात्त्विक, राजस, तामस, अशी बुद्धी सांगितली आहे त्यात ‘प्रवृत्ती-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बंध-मोक्ष यांना यथार्थ रूपाने जी जाणते ती सात्त्विक बुद्धी होय. ‘ असे श्रीकृष्णानी अर्जुनास सांगितले आहे. अशी आपल्या हिताला जी बुद्धी जाणत नाही तोच तिचा नाश होय. कारण वर सांगितलेली बुद्धी हीच मानवाना उद्धारास अनुकूल आहे, हिलाच सद्‍बुद्धी असे म्हणतात. अशा या बुद्धीचा नाश झाला म्हणजे पुढची पायरी सर्वनाशाचीच आहे असे नारद म्हणतात.

‘अंतःकरणात विषयांची नुसती आठवण असेल तरीही संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्यामुळे विषयेच्छा प्रगट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड आधीच ठेवलेले असते, व जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे संमोह प्रगट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला असता प्राण्याची दशा होते. मग सर्वत्र केवळ अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते, अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. त्यामुळे जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते. ‘ 

श्रीनारद महाराज या दोन सूत्रातून त्याचा त्याग व बाधकता सांगून गेले. पुढील पंचेचाळीसाव्या सूत्रात आणखी एका दृष्टीने या कामक्रोधादिकांची बाधकता दृष्टान्त द्वारा पटवून देतात.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४३ आणि ४४.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

सा रे ग म प ध नि सा

संगीतातले हे सप्तसूर

आणि

बायकोच्या शब्दकोशातले नवऱ्याच्या बाबतीतले हे ‘सप्तसूर’..

 

सा धं कळत नाही या माणसाला

रे देवा, कधी सुधारणार हा माणूस..

 

ग प्प बसा, मला शिकवू नका..

म लाच सर्व करावं लागतं..

प टपट आवरणं, ह्यांना कधी जमतच नाही..

ध ड एक काम करत नाही, हा माणूस..

 

नि दान एक काम मी करीन, म्हणेल, तर शपथ..

सा री कामं बायकोवर टाकून, गावभर उंडारायला हा मोकळा..

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares