मराठी साहित्य – विविधा ☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कोणी साद घातली तर प्रतिसाद द्यायला हवा. कुणी प्रतिसाद दिला तर आभार मानायला विसरू नये. याला संवाद म्हणता येईल. सुसंवादासाठी साद-प्रतिसाद-दाद-धन्यवाद यामधे सातत्य असावे.

एखाद्याच्या कलाप्रदर्शनाला रसिकांनी -दर्शक, प्रेक्षक, श्रोत्यांनी -दाद देणे फार महत्त्वाचे असते. कलानिर्मितीमागे कलाप्रदर्शन अंतर्भूत आहेच. ‘कलेसाठी कला’, ‘स्वान्तसुखाय कला’ हे म्हणणे सत्य नाही. कलाविष्कारासाठी कलाकार आणि कलाकृतीचा रसस्वाद घ्यायला रसिक हवेतच. रसिकांखेरीज कला व कलाकृती अपूर्ण आहेत. म्हणून कलाकाराला व त्याच्या कलाकृतीला रसिकांचा रसरशीत प्रतिसाद आवश्यक आहे. कोणत्याही कलाप्रदर्शनाला भरभरून दाद द्यायला हवी. दाद देणे हे जिवंतपणाचे, जिंदादिलीचे लक्षण आहे! कलाकार अशा जिंदादिल रसिकासाठी हापापलेला असतो मित्रहो.

जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याची एखादी गोष्ट आवडेल, त्या त्या क्षणी तात्काळ त्या माणसाला लगेच सांगा. व्यक्त व्हा, त्याचे कौतुक करा, त्याला दाद द्या. अशी दाद कधी शब्दाने, कधी कटाक्षाने, कधी स्पर्शाने तर कधी एखाद्या स्मिताने देता येते.

एखादी कविता, तुम्हाला आवडलेले एखादे चित्र, एखाद्या फुलाचा वास, बायकोची नवी साडी, एखादी रंगलेली मैफिल, एखाद्याचा फोटो, पहिल्या पावसाचा गंध, नव्या पुस्तकाचा वास, ओली भेळ, कांदा भज्यांचा किंवा बटाटेवड्याच्या तळण्याचा रसना चाळवणारा खमंग वास इ. इ. इ. जे जे आवडेल त्याला मोकळेपणे दाद द्या.

आपण दररोज किती तरी गोष्टी करत असतो. कितीतरी घटना, व्यक्ति पहात असतो, अनुभवत असतो. कधी त्या गोष्टी आपल्याला आवडतात, भावतात, आनंद देतात. पण त्याविषयी आपण सहसा कोणाला काही सांगतच नाही. मी काय म्हणतो, एकदा संबंधिताला सांगून तर पहा. त्याचं कौतुक करून तर पहा. आहो, याने त्याला आनंदच होईल आणि तुम्हालाही.

मला सवय आहे. माझी बायको खरेच सुगरण आहे. तिने केलेली प्रत्येक पाककृती रुचकर असते. (हे दांभिकपणे नाही, मनापासून सांगतोय बरं का! ). तिने सिद्ध केलेल्या रोजच्या पोळी-भाजीचा पहिला घास घेताना ती माझ्याकडे अपेक्षेने पहाते. मुखी तो प्रथम सुग्रास पडताच जेव्हा मी तिला म्हणतो, ” वा! क्या बात है! ” तेव्हा ते ऐकून ती सुखावते, हसते आणि मग स्वतः जेवायला वाढून घेते. खूप समाधान दिसते तिच्या मुद्रेवर. जरा अलंकारिक पद्धतीने सांगायचे झाल्यास मी म्हणेन, अशा वेळी जर स्वतः साक्षात् समर्थांनी विचारले, “जगी सर्व सुखी असा कोण आहे रे? ” तर मी नक्कीच हात आणि हातातला सुग्रास वर करून म्हणेन “मी”!

कधी कधी कलाकार एवढा मोठा असतो की त्याला आपण दाद देणे म्हणजे सूर्याला कंदिल दाखवण्यासारखे असते. म्हणून आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण हे योग्य नाही. कलाकार मोठा असला तरी तुम्ही दाद द्या. कलाकार तिच्या प्रतिक्षेत असतो. दाद न देणे म्हणजे कलाकाराच्या कलेची प्रतारणा आहे.

आपण एखादी सुंदर कविता किंवा लेख वाचतो, तो आपल्याला आवडतोही पण आपण ते कवीला किंवा लेखकाला सांगत नाही, सांगायचे विसरून जातो किंवा टाळतो. एखादे गीत काळजाचा ठाव घेते पण त्याला साधी दाद न देण्याने आपण आपल्या कृपणतेचेच प्रदर्शन करतो.

मी अनुभवाने सांगतो, कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला दाद हवीहवीशी वाटते. अगदी लतादिदी, आशाताई, माधुरी दीक्षित, रेखा, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभा अत्रे इ. सारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या या व अशा अर्थाच्या भावना प्रकट मंचांवरूनही व्यक्त केल्या आहेत अनेकवेळा.

शेरोशायरी, गझल यात दोन वाक्यांचा एक शेर असतो. हा त्या काव्यप्रकाराचा आकृतिबंध आहे. दोन ओळीनंतर शेर, गझल आवडली तर दाद द्यायची असते हे सांगावे लागते यासारखे दुर्दैव नाही. शायरी, गझल ऐकताना लोक निर्विकार चेहऱ्यांनी बसलेले असतात हे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटते. लोकांच्या रुक्षतेचे वाईट वाटते. प्रसिद्ध शायर अँड. भाऊसाहेब पाटणकर तर आपल्या मैफिलीच्या आरंभीच श्रोत्यांना म्हणायचे,

दोस्तहो, मैफील आपुली रंगण्या जर का हवी

आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी।

ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा

ती ही अशी, ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा! ।।

पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे पूर्वी एकत्र गायनाचे कार्यक्रम करायचे. त्यात बऱ्याच वेळा पुल गायचे आणि वसंतराव तबल्याची साथ करायचे.

ते दोघे एके ठिकाणी मैफिल करण्यासाठी, गाणे सादर करण्यासाठी गेले होते. चांगली उच्चभ्रू, धनिक, श्रीमंत श्रोतेमंडळी मैफिल ऐकायला जमली होती. या मैफिलीत वसंतराव गाणार होते.

मैफल सुरू झाली. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी वसंतरावांच्या एकही आलापीला, तानेला, समेवर येण्याला श्रोत्यांकडून ना दाद ना प्रतिक्रिया ना टाळी. सगळी मंडळी मठ्ठपणे, पुतळ्यासारखी बसून होती. असा प्रतिसादशून्य श्रोतागण समोर आहे हे लक्षात येताच वसंतरावांनी पुलं कडे पाहिले आणि हळूच म्हटले, ” पी एल आज रियाजच करून घेऊ. मनसोक्त.”

एवढ्यात अगदी मागच्या कोपऱ्यातून, “वाह, बहुत खूब, बहुत अच्छे! ” अशी सणसणीत दाद आली. पुलंनी दाद देणाराकडे चमकून पाहिले तर काय, सकाळी त्यांना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता! पुलंना एवढा आनंद झाला, वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा तसा! त्यांनी त्या माणसाला सन्मानाने पुढे येऊन बसायला सांगितले. पुढची सारी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली कारण दिलखुलास दाद देणारा तो एकच रसिकराज मैफिलीत उपस्थित होता!

एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन द्या अन् बघा त्याचा चेहरा किती खुलतो ते. लहान मुलांना तर प्रोत्साहनाची खूप आवश्यकता असते. बालवयात यथोचित कौतुक झाले नाही, वेळीच दाद मिळाली नाही तर मुले हिरमुसली होतात. येवढेच नव्हे तर त्यांच्या मनात न्यूनदंड निर्माण होतो. त्या कळ्या अवेळीच सुकू लागतात. मुलांचेच काय मोठ्यांचेही असेच असते. प्रत्येकाला स्तुती प्रिय असते. ती माणसाची मानसिक गरज आहे.

वास्तविक आपल्या सगळ्यांनाच कौतुक, स्तुती, प्रिय वाटते. आपल्या कृतीवर इतरांनी दिलेली दाद हवीशी वाटते. त्याने आपण उत्साहित व प्रोत्साहित होतो. त्यातूनच अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. जसे आपल्याला वाटते तसेच इतरांना, विशेषतः कलाकारांना वाटत असते. दाद न मिळाल्यास कलावंत निरुत्साही होतो, व्यथित, निराश, उद्विग्न होतो.

प्रतिसादशून्य, अरसिकांविषयी संस्कृत कवी भवभूति काहिशी अशीच भावना पुढील श्लोकातून मांडतो….

इतरतापशतानि यदृच्छया

वितर तानि सहे चतुरानन l

अरसिकेषु कवित्वनिवेदनं

शिरसि मा लिख मा लिख मा लिख।।

भावार्थ:-

इतर ताप शतानी खुषाल दे बा चतुरानना

परि, अरसिकास कवित्वनिवेदन नको लिहू भाळी, नको लिहू, नको लिहू!

म्हणून दुसऱ्याचं कौतुक करा, करायला शिका. दाद द्या, दाद द्यायला शिका.

कलावंत आपल्या कलाकृती सादर करून तुम्हाला साद घालीत असतात, ‘या आणि पहा माझा प्रतिभाविलास’. बेगम परविन सुलताना पुण्याच्या ‘सवाई गंधर्व संगित महोत्सवा’त गंगाधर महांबऱ्यांचे एक मराठी गीत अवश्य सादर करतात, ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते. ‘ हे गीत त्या गातात वाहवा करणाऱ्या जिंदादिल रसिकांसाठी!

मित्रहो, आपणही इतरांना उत्फूर्त प्रतिसाद द्या. ‘साद-प्रतिसाद-दाद’ हे आदान-प्रदान अखंड चालू ठेवा. त्याने आपले तसेच इतरांचेही जीवन समृद्ध होईल, आनंदमय होईल.

अखेर येवढीच विनंती की, जर आपल्याला हा लेख आवडला, यातले विचार पटले तर नक्की दाद द्या. मी वाट बघतोय आपल्या प्रतिसादाची.

🙏🏼🙏🏼🙏🏼

©️दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

🌼🌼

याच अभिप्रायाची आरती प्रभू यांची एक कविता आठवते…

ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा

सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा।।१।।

*

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली

न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी।।२।।

*

दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट

गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट।।३।।

*

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा

साजरा उधळून आयु हो करावा संग हा।।४।।

*

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही

आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही।।६।।

*

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा

सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा।।७।।

आरती प्रभू

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७१ – एक चंद्र…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७१ – विजय साहित्य ?

☆ एक चंद्र…!

(अष्टाक्षरी)

एक एक पान गेले

मागे डहाळी ठेवून

जीवनाच्या प्रवासात

आहे झाड ते टिकून…!

*

चैत्र पालवीत गेला

कसा सरून वसंत

एकट्याने सांभाळला

जीव अनादी अनंत…!

*

पिढ्या पिढ्या हेच घडे

जाते लेकरू सोडून

आठवांच्या पौर्णिमेला

जाते घरटे देऊन…!

*

किती आले किती गेले

जीवनात हे उन्हाळे

फांदी फांदीने जपले

सुख दुःख पावसाळे…!

*

एक चंद्र ॠतूरंगी

चैतन्याने फुलारतो

कवितेच्या रोमरोमी

अलगद विसावतो…!

*

एक चंद्र शरदाचा

मनी आशा जागवतो

तरू निष्पर्ण होताना

रोमरोमी फुलारतो…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तरी पाऊस सोसले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ तरी पाऊस सोसले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

नाही बोलावले चंद्रा,

नाही नक्षत्रे खुडली .

माझी स्वप्नील वैखरी ,

डोही माैनाच्या दडली.

नाही घेतली मी फुले,

माझी ओंजळ रिकामी.

व्यक्त होण्या अव्यक्ताला,

भाषा ठरली निकामी .

नाही पापणी भिजली,

नाही ओलावले काठ.

नाही गुंतलो नात्यात,

गणगोताकडे, फिरवली पाठ.

नाही विचारला जाब,

फक्त स्वताला कोसले.

नाही चिंबचिंब झालो,

तरी पाऊस सोसले.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तीसूत्र २८ . 

तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ॥ २८ ॥

अर्थ : त्या (भक्तीचे) ज्ञान हेच साधन आहे असे कोणी (आचार्य) म्हणतात.

विवेचनभक्ती ही कर्म, ज्ञान, योग यापेक्षा श्रेष्ठ आहे. ती फलरूपा आहे असे मागील काही सूत्रात स्पष्ट सांगितले गेले आहे. जर ती फल म्हणजे साध्यच असेल तर तिला कोणत्या तरी साधनाची अपेक्षा असणारच. साधनाविना साध्यप्राप्ती होऊ शकत नाही. 

आपल्याकडे चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. त्यात ज्ञानी भक्तच श्रेष्ठ असे मानले जाते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अनेक ठिकाणी या विषयाचा विचार केला आहे. ज्ञान नसेल तर भक्ती होणार नाही, असेही म्हटले जाते. ज्ञान नसेल तर भगवंताचे यथार्थ स्वरूप कळू शकणार नाही. अन्यथा मनुष्य क्षुद्र देवतांच्या भजनी लागू शकतो. समर्थांनी त्यांच्या काळात अशा क्षुद्र देवतांना मुक्ति दिली आहे असल्याचे आपल्या लक्षात येईल. भक्ति करण्यासाठी ज्ञान पाहिजे असे त्याचे म्हणणे असते असे काही चिंतकांचे मत आहे. 

येथे ज्ञान हा शब्द थोडा संदिग्ध वाटतो. भक्तीचे जसे स्वरूप घेतले जाईल तसे ते ज्ञान ठरणार, नाही का? निराकार, निर्गुण परमात्मस्वरूपाची भक्ती मानली तर त्या स्वरूपाचे ज्ञान उपनिषदादी प्रमाणांवरून होते आणि सगुण साकाराची मानली तर त्याचे अनंत गुण, अनंत लीला, माधुर्य, सौंदर्य तसेच रूप, आकार, त्यांचे अनेक प्रकार इत्यादिकांचे ज्ञान मानावे लागते. मागील काही सूत्रांत व्यास-गर्ग-नारद याची मते आपण अभ्यासली आहेत. त्यावरून त्यांना केवळ निर्गुण-निराकाराचे ज्ञान येथे अभिप्रेत आहे असे जाणवत नाही. कारण त्या ज्ञानात मुक्ती हे साध्य आहे, भक्ती नाही. ज्ञान हे त्या भक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन असते तर गीता व भागवत एकादश स्कंधामध्ये भक्तीमध्ये अन्य साधनांचा निषेध केला गेला नसता.

यज्ञ-ज्ञान-तपें केली, वेदाभास ही साधिला|

तरी दर्शन हे माझे, न लाभले तुज||”

(गीताई ११.५३)

संत एकनाथ महाराज आपल्या भागवतात लिहितात की भक्तीनेच ज्ञानाची प्राप्ती होत असते.

“माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता । 

माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्‍भक्तां मद्‍भावें ॥५८॥ 

*

ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें । 

भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥

(एकनाथी भागवत अध्याय ११)

पुढील सूत्रात भक्ति मुळेच ज्ञानाची प्राप्ती कशी होते ते तपशिलात पाहू . 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

।। नारद महाराज की जय!!! ।।

– भक्ती सूत्रे क्र.२८

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसा पावसा… कवयित्री : सुश्री सुचेता गोखले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ पावसा पावसा… कवयित्री : सुश्री सुचेता गोखले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

पावसा पावसा कुठे आहे तुझे गाव

जाण्याचे म्हणून तू घेतच नाहीस नाव .. 

*

ग्रीष्मात तुझे आम्ही केले स्वागत

चिकटूपणा भारी तुला आहे अवगत .. 

*

अवनी तहानेने झाली होती व्याकुळ

साद तिची ऐकून, घातलास तू धुमाकुळ .. 

*

चिंब ओली धरणी मग कित्ती सुखावली 

निसर्गात मग कुंद धुंद हिरवाई पसरली .. 

*

बाळराजे अंगणात नाचू लागले थय थय 

बळी राजा झाला प्रसन्न,बघून ओले वलय .. 

*

हिरवी शाल लेवून, ही अवनी नटली

नव चैतन्याने सृष्टी जणू  मोहरली .. 

*

विठ्ठलाच्या वारीमध्येसुद्धा तू भेटलास

रेनकोट घालून तू सुद्धा लेझीम खेळलास .. 

*

बाप्पा आले घराघरात ,घडला सत्संग

पाऊस गाणी गात भक्तगण झाले  दंग .. 

*

तुझ्या साक्षीने पार पडले नवदुर्गा पूजन

नवरंगी छत्र्या घेऊन आले रसिक जन .. 

*

आली दिवाळी, मनी आले, गेली तुझी स्वारी !

.. .. फराळ,फटाके,अभ्यंग आणि रांगोळ्या,

    बासुंदी,करंजी आणि श्रीखंडात चारोळ्या.

      सरली की दिवाळी .. . आणि अरेच्चा .. 

      आला का तू पुन्हा !!! 

आता काय ??? 

.. .. आता पतंग उडवतच जाणार का रे राजसा ….

*

कवयित्री : सुचेता गोखले

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तू रे सुखा जरासा दिलदार मित्र हो ना

केंव्हातरी गुलाबी तू प्रेम -पत्र हो ना

*

नुस्त्याच कल्पनेने पाहू तुला कसे रे

दृष्टांत..रंग..रूपे थोडा सचित्र हो ना

*

वैराण माळ पायी.. माथ्यावरी उन्हाळे

तू मोडके तरीही डोईस छत्र हो ना

*

आयुष्य हाच आहे रे यक्ष-प्रश्न माझा

तो सोडवावया तू सोपेच सूत्र हो ना

*

प्रत्येक वेळ आहे येथे रणांगणीची

रे जीवना मवाळा, तू ही सशस्त्र हो ना

*

होवून सूज्ञ, दुःखी-कष्टीच व्हायचा तू

विक्षिप्त अन् जरासा ढोंगी.. विचित्र हो ना

*

ही भांडणे..लढाया..आकांत..सांत्वने ही

आता निवांततेचे अंतीम-सत्र हो ना

*

आजन्म आटलेला.. आजन्म साठलेला

माझे खळाळणारे विस्तिर्ण पात्र हो ना

*

काही न भव्य आता काही न दिव्य आता

स्फूर्ती मिळेल ज्याने ते तू चरित्र हो ना

*

भेटोत ही शकूनी, होवोत लाख शत्रू

माझा सखा ‘सुदामा’ तू एकमात्र हो ना

*

अंधार बारमाही वाट्यास जीवनाच्या

कोजागिरी प्रमाणे तू एक रात्र हो न

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – कोणाच्या आधारे करू मी विचार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – कोणाच्या आधारे करू मी विचार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

काव्यानंद

कोणाच्या आधारें करूं मी विचार/

कोण देईल धीर माझ्या जीवा//१//

 *

शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक /

यातिशुद्ध एक ठाव नाहीं//२//

 *

कलियुगीं  बहु कुशळ हे जन /

छळितील गुण तुझे गातां //३//

 *

मज हा संदेह झाला दोन्हीं सवा /

भजन करूंं देवा किंवा नको //४//

 *

तुका म्हणे आतां दुराविता जन /

किंवा हे मरण भले दोन्ही//५//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपल्या सभोवताली निर्माण झालेले सामाजिक वातवरत पाहून त्याच्या वर वैतागलेले तुकाराम महाराज देवालाच म्हणतात.अशा या जाचातून जाणा-या कठीण काळात कोणाच्या आधारावर कोणता विचार करू. या नाजूक वेळी मला कोण आधार देईल.मी कोणी फार मोठा शास्त्रज्ञ पंडित किंवा वाचकही नाही.तसेच मी उच्य कुळात जन्मलोयकी नाही हेही मला निपटणे ठाऊक नाही.

या कलियुगात लोक फारच कुशल आणि हुशार आणि चाणाक्ष झाले आहेत.मी तुझे गुण गाणं करतो. तुझी मनोभावे पूजा करतो. केवळ तुझेच नामस्मरण करतो . म्हणून त्यांनी माझा छळवाद मांडला आहे. म्हणूनच माझ्या मनात त्यांच्या विषयीचा संदेह आणि संशय आता बळावत चालला आहे. तेव्हा मी तुझे भजन‌पुजन आणि नामस्मरण करावे की नको हे आता तूच मला सांग. माझ्या मनाला आता कठीण पेच पडला आहे. मी हे माझे कार्य बंद केले तर जन लोकासोबत जोडलेला मी माझा संपर्क हरवून बसेन. लोक माझ्यापासून दूर जातील ते मला नको आहे. तुझे नामस्मरण बंद करणे आणि जनलोकापासून दूर जाणे या दोन्ही गोष्टी माला मरणा सारख्याच वाटतात. आता या पेचातून तुझ्या वाचून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजाना छळणा-या लोकांच्या होणा-या त्रासामुळे ते किती हैराण झाले होते हे यावरून कळते. म्हणूनच त्यांनी आपली व्यथा इतराना न सांगता ती प्रत्यक्षात देवापुढेच मांडली आहे .

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ही वाट ‘वाट’ लावे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ही वाट ‘वाट’ लावे…? श्री अमोल अनंत केळकर ☆

(दिवाळी सुट्टी संपवून सुट्टीच्या शेवटच्या रविवारी आपल्या गावाकडून, कामाच्या ठिकाणच्या गावाकडे येतानाचा अनुभव …… गाव सोडून जायची हुरहुर आता मागे पडून,  ट्रॅफिक जाम ची भीती ही सध्या वरचढ ठरतीय)

(शांता शेळके यांची माफी 🙏मागून )

*

ही वाट ‘वाट’ लावे, पुण्याबाहेरच्या गावा

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**
जिथे तिथे घुसाया, वाहन आसुलेले

नाक्यावरती टोलच्या, मडगाड ठोकलेले.

इथे मोठ्या खड्ड्यांनी, टायर फुस्स व्हावा

*

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**

घे वाहन कडेला, थांबून ढाब्यापाशी

लागून भूक भारी मग खा वडा पावाशी

एकदाच  ‘जी – पे’  चा, पासवर्ड विसरावा

*

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**

स्वप्नामधील गावा, पुण्यातून न जावे

स्वप्नामधील रस्त्याला, स्पिड ब्रेक न यावे

स्वप्नातल्या सुखाचा ,’टुकार’ वेध घ्यावा

*
माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८९ ☆ पंख… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८९ ?

☆ पंख… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

खूप पूर्वी तू कापलेस,

माझे पंख,

मी उडू नये फार दूरवर म्हणून,

पण कुठले बळ घेऊन,

मी उडू शकले—

तुझ्या मनाविरुद्ध…माहित नाही !

 

तेव्हा ती माझी बंडखोरीच होती,

बाईला चार भिंतीत डांबून,

ठेवणाऱ्या पुरूष प्रधान

संस्कृती विरूद्ध ची!

आठवायचा कुठल्याशा

हिंदी सिनेमातला डायलॉग,

“शरीफ खानदान की औरते,

घरकी चार दिवारी को कैद नही माना करती!”

 

पण मी ओलांडून उंबरठा,

स्वतःला सिद्ध करताना,

सुखावत होते कुठेतरी,

१९७५ सालच्या,

माझ्या स्त्रीमुक्तीच्या कवितांना,

जागल्याने!

 

पण या सांजसमयी,

तू व्याधींनी ग्रस्त असताना,

तू माझे पंख नाही कापलेस…..

सक्तीचे बंदी बनण्याचे फर्मान काढून,

त्याला एक सोज्वळ नाव दिलेस,

पातिव्रत्य धर्माचे!

आता मावळले आहे माझे ही तेज,

आणि मी ही —

लावून घेतली आहेत,

घराची सर्व कवाडे आतल्या बाजूने घट्ट!

 

हे प्रायश्चित्त की पराभव  ??

स्वतःच्या स्त्रीत्वाचा !!

माहित नाही !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाषा मराठी… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

? कवितेचा उत्सव ?

☆ भाषा मराठी☆ श्री विष्णू सोळंके ☆

संस्कार, संस्कृती जपते भाषा मराठी

माणसा माणसाला जोडते भाषा मराठी… १

*

चक्रधर, म्हाईंभट सातवाहन आधारवड

संतसाहित्य, ज्ञानेश्वरी जपते भाषा मराठी… २

*

मढैकर, केशवसुत, फुले आणि कुसुमाग्रज

अमृतातेही पैजा जिंकते भाषा मराठी… ३

*

तीन हजार वर्षे जुना तीचा इतिहास

आता अभिजात ठरते भाषा मराठी… ४

*

संस्कृत प्राकृत मागधी पैशाची स्वरूप

शाहिरी पोवाड्यात रंगते भाषा मराठी… ५

*

तुका ज्ञानेश्वर नामदेव जनाबाई मळा

पंढरीत वारीमध्ये नाचते भाषा मराठी… ६

*

माझी माय मराठी माथी अभंग टिळा

संवाद संस्कृती जपते भाषा मराठी… ७

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares