मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”मनात आलं तर करून टाकावं..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मनात आलं तर करून टाकावं.. ☆ संध्या बेडेकर ☆

आमची नागपुरची ट्रीप ठरली. माझ्या दिरांकडे सोळा सोमवार चे उद्यापन चा मोठा कार्यक्रम होता. एवढ कठिण व्रत मी तर काही करू शकत नाही. कमीत कमी असा कार्यक्रम अटेंड करावा. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आपल्या जावेचे कौतुक, अभिनंदन म्हणून आम्ही जायचे ठरवल.

 खरंतर आमचे सर्व नातेवाईक या कार्यक्रमात भेटणार होतेच. तरी मनात आलं आपल्यापेक्षा जेष्ठ मंडळीला यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेटावे.. जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांचे आयुष्यातील किस्से ऐकावे. आपल्याच घराण्या बद्दल अनेक गोष्टी कळतील. मुख्य म्हणजे थोडा आनंद घ्यावा आणि द्यावाही. अनुभवाच्या शाळेत थोड शिकून याव.

आता आम्हीच senior citizen category त आलो आहोत, त्यामुळे काही बंधन वाढत्या वयामुळे तर काही सध्या च्या इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकून मनात घर करून बसली आहेत. थोडी हिम्मत ही कमी झाली आहे. आणि नागपूरचे आमचे जेष्ठ तर Super Senior category तच आहेत. काही तर नव्वदी पार century च्या जवळपास.

यावेळेस भेटून याव, अस आमच बोलण झाल.

सहजच मी माझी मैत्रीण रमाला आमचा नागपुर प्रोग्राम सांगितला.

रमा म्हणाली

अरे व्वा ! छान. मनात आलंय न तर नक्की जाऊन या. अग! नंतर पश्चाताप व्हायला नको.

आज आमचे हे reservation करायच म्हणून सकाळी आठ वाजताच लॅपटाॅप घेऊन बसले. मला म्हणाले करू ना नक्की reservation ? काढू ना तिकिट

अग! नाहीतर केंसल करण्यात उगीचच पैसे वाया जातात.

सहज माझ्या मनात आल,

हा एप्रिल महिना, नागपुर ची गर्मी. आज तर गर्मीचा कहरच होता. आपण ठरवतो तर आहे, पण झेपणार आहे का आपल्याला ? तिथे जाऊन आजारी पडलो तर. तशी पुण्याची गर्मी पण काही कमी नाही पण इथे आपण घरातच असतो ना. सध्याकाळी छान थंड होत. जमेल का आपल्याला ? 

मी म्हंटल अहो ! थांबा जरा. आज राहू द्या. उद्या बघू.

यांची चिडचिड बडबड मला ऐकू येत होती. पण काय करू ? एक मन म्हणत होत हो तर लगेच दुसर मन अनेक कारण सांगून नागपूरला या सीझन मध्ये जाण कस चूक आहे, हे पटवून देत होत. दोघांच्या वादविवादात माझा गोंधळ उडाला होता.

मला निर्णय घेणे जमत नव्हत.

संध्याकाळी रमाकडे चैत्र गौरीचे हळदीकुंकू म्हणून तिच्या घरी गेले, तर तिने सहज विचारले काय ग ! झाले का reservation? 

मी म्हंटल नाही ग. अग! नागपूरची गर्मी बघून हिम्मत होत नाहिये.

हळंदी कुंकवाला आलेल्या बायकांनी तर हा विषय उचलूनच धरला. पुन्हा तसेच

 हो आणि नाही चे दोन पक्ष तयार झाले.

रमा म्हणाली,

अग! लोक राहतात ना तिथे. अग! AC taxi मिळते तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, तिथे रात्री राहण शक्यअसल्यास रहा तिथे.

रमा आमच्याच बिल्डिंग मध्ये येवढ्यातच रहायला आलेली. Morning walk ला भेट होत गेली आणि आम्ही मैत्रीणी झालो.

रमा म्हणाली अग ! मी माझा अनुभव सांगते.

मी नागपूरला आणि माझा भाऊ वर्धा येथे. म्हणजे जवळच रहात होता.

रवी मला सारख म्हणायचा,

ताई ! ये ना. माझ नवीन घर, दवाखाना बघायला ये.

खरतर कोणत्याही शनिवार-रविवार मी सहज जाऊ शकले असते. पण या शनीवारी हे काम। तर पूढच्या रवीवारी ते काम, अस होत गेल, आणि माझ जाण झाल नाही.

अशाच एका शुक्रवारी फोन वाजला.

 रमेश म्हणाले ” आला तुझ्या भावाचा फोन. अग ! या शनिवार-रविवारी जाऊन ये. अग! काम काय होत राहतील.

आता फोनवरच तस सांग त्याला.

मी फोन घेतला आणि बोलणारच, तेवढ्यात वहीनीने रडत रडतच रवी गेल्याची बीतमी सांगितली.

म्हणाली, ताई तुमची खूप वाट बघत होते हो हे.

या वाक्याने तर मी पार कोलमडून पडले..

मला माझीच लाज वाटू लागली.

जी कारण सांगून मी एवढ्या जवळ असून गेले नाही, त्यातील एक तरी कारण वाजवी होत का ? खूप महत्वाच होत का ? ते काम नंतरही करता आल असत ना.

मी का नाही गेले? आजही राहून राहून हा विचार मला बधीर करतो.

म्हणतात ना,

Dead people receive more flowers than. Living ones, because

Regret is stronger than gratitude

आजपर्यंत मी स्वतःला माफ करू शकले नाही.

कितीही काम असू दे. अग! कितीही ऊन असू दे मी केलेली चूक कोणीच करू नये. नंतर फक्त पश्चाताप होतो.

 रमा बरोबरच बोलत होती. खूपदा वेळेवर निर्णय चूकतात आणि नंतर वाईट वाटत. गोष्ट काही खूप मोठी असते अस नाही. कधी कधी तर एखाद्या घरची आनंदाची बातमी असते तर कधी दुःखद असते. ऐकल्यानंतर मनात फोन करायचा विचार येतो. पण कधी कधी तर उगीच काहीही विशेष कारण नसताना राहून जातो. आणि मग आता तर ती गोष्ट जूनी झाली, या विचाराने राहून जातो.

याचा सरळ साधा उपाय म्हणजे 

मनात आल की लगेच करून टाकाव.

हाच आहे.

आज घरी आल्यावर विचारांची दिशाच बदलली. गर्मी असली तरी आपल्याला कशी आपली काळजी घेऊन नागपूर ट्रीप manage, , करता येईल या प्रश्नाची दहा उत्तर मिळाली.

सोचने से सूझता है, और ढुंढनेसे मिलता है। 

हेच बरोबर आहे. फक्त रमा सारखी मैत्रीण हवी जी विचारांची दिशा बदलू शकेल..

आम्ही नागपूर ट्रीप करून आलो. विशेष असा त्रास काही झाला नाही. आनंद, समाधान मात्र खूप मिळाल. आपल्याच घराण्यातल्या अनेक गोष्टी, सणवार पद्धती, पूर्वजांच्या अनेक गोष्टी कळल्या. मनापासून दिलेले भरपूर आशिर्वाद मिळाले.

लक्षात आल, अडचणी मनात असतात. अति विचार करून आपण त्यात भर घालतो.

म्हणतात ना

 Whether it”s a machine, house or relationship 

Maintenance is always easier, cheaper than repairing.

You need not have to regret later.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सचोटी आणि नि:स्पृहता म्हणजे..” – लेखक : संजीव ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सचोटी आणि नि:स्पृहता म्हणजे..” – लेखक : संजीव ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री, पुण्याचे पहिले आयुक्त सदाशिव गोविंद बर्वे उर्फ स_गो_बर्वे.

जन्म. २७ एप्रिल १९१४ सातारा जिल्ह्यातल्या तासगांव येथे.

स. गो. बर्वे यांचे वडील उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे आणि नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले.

१९३६ साली भारतात परत येउन अहमदाबाद इथं उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ध्वजारोहण केले. पुणे मनपा अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले. आज ज्याच्याबद्दल फक्त हळहळ वाटते तो जंगली महाराज रस्ता याच काळातला! त्यांनी पुण्याभोवती रिंग रेल ची कल्पना मांडली पण राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पूर्ण झाली नाही.

पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू उद्याने, संभाजी पूल व धार्मिक स्थळे हलवून कांही रस्ते रुंद करणे इ. कामे झाली. १९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले.

या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले. प्रशासकीय काम करत असताना राज्यसरकारच्या शासन सुधारणा समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी कॉंग्रेसवर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी ती टीका सकारात्मक रीतीने घेत त्यांना प्रोत्साहन दिले आणि सहकाऱ्यांना सुनावले.

बदल घडवण्यासाठी स्वतः राजकारणात जावं असं त्यांना वाटू लागलं होतं. सकारात्मक बदल घडवायचा असल्याने आणि सत्ताधारी मंडळी रोजच्या संपर्कात असल्याने त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसकडून निवडणूक लढवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिलां. पण सेवामुक्त होण्याआधीच १२ जुलैला पानशेतची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मदत-पुनर्वसन कार्यासाठी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली. पुराच्या दुसऱ्या दिवशीपासून अडीच महिने ते कार्यालयातच रहायला गेले, सोबत साताठ कर्मचारीही होते. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. खडकवासल्याचा मुख्य स्त्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६, ००० नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्याचं हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिलं.

पुण्याच्या पुनर्वसनाची त्यांची कल्पना भव्य होती. एवीतेवी सर्व वाहून गेलंच आहे तर पुणं अधिक नियोजनबद्ध रीतीनं पुन्हा नव्यानं बनवावं असा त्यांचा आग्रह होता. दिल्ली आणि चंदीगडचे नियोजन त्यांच्यासमोर होते. सनदी अधिकारी फक्त सुचवू शकतात. शेवटी राजकारणी ठरवतील तसंच होतं. तत्कालीन परिस्थितीत लवकर होईल ते करायचं ठरलं – त्यामुळे पुणं काही फार बदललं नाही. पण जे काही थोडंफार नियोजन झालं ते लोकमान्यनगर – लाल बहादूर शास्त्री रस्ता आणि सहकारनगर इथं पुनर्वसनातून झालं.

यानंतर यशवंतरावांनी त्यांना थेट राजकारणात आणले. १९६२ च्या निवडणुकीत शिवाजीनगर – पुणे येथून ते आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा. पुढे वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर MIDC स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०, ००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरु झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत शास्त्रीजींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले.

१९६७ मध्ये त्यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळचे विद्यमान खासदार व्ही के कृष्ण मेनन याना नाकारून कॉंग्रेसने बर्वे यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज मेनन यांनी अपक्ष लढायचे ठरवले. अपक्ष असूनही ते तुल्यबळ होते. पण अचानक शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर त्यांना पाठींबा दिला अन बर्वे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात उद्योग खातं मिळालं असतं तर त्यांनी दूरगामी बदल घडवले असते हे निश्चित. बर्वे यांनी सहकार, भारताचे नियोजन आणि आर्थिक धोरण, आणि सुशासानावर इंग्रजीतून ग्रंथलेखन ही केले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक मनाचे, विद्वत्तेचा आदर करणारे नेता होते. बर्वे यांच्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.

– – आत्ता दिल्लीत जे चाललंय ते पहातां पन्नास वर्षांआधी या सनदी अधिकाऱ्याने आधी सेवेत राहून आणि राजकारणात जाऊन केलेल्या कामाचं महत्व अजूनच ठळकपणे उठून दिसतं.

समाजासाठी काम करायचं तर प्रत्येकवेळी पैसाच लागतो असं नाही तर असलेले कायदे आणि तरतुदी व्यवस्थित वापरून बरीच चांगली कामं करता येऊ शकतात हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. अवघ्या ५३ वर्षांच्या आयुष्यात दूरदृष्टीने सार्वजनिक कामाचे डोंगर उभे करणारी माणसे कमीच दिसतात. कुठेही काम करताना सचोटी, निस्पृहता त्यांनी सोडली नाही. लक्ष्य गाठण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिले. त्यामुळे अनेक उल्लेखनीय कामं उभी राहिली. स. गो. बर्वे यांचे ६ मार्च १९६७ रोजी निधन झाले.

लेखक : श्री संजीव  

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोपामिन ट्रॅप (The Dopamine Trap) भाग – १ – लेखक : डॉ. एन. जी. उकडगावकर ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ डोपामिन ट्रॅप (The Dopamine Trap) भाग – १ – लेखक : डॉ. एन. जी. उकडगावकर ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

बाहेर पाऊस घराच्या काचेच्या भिंतींवर प्रचंड वेगाने आदळत होता. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर लाल अक्षरांमध्ये ठळक बातम्या झळकत होत्या:

“कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात जिल्हाधिकारी अटक. “

एका अंधुक प्रकाश असलेल्या अभ्यासिकेत, सेवानिवृत्त न्यूरोलॉजिस्ट (मेंदूविकार तज्ज्ञ) डॉ. अरविंद देशमुख यांनी शांतपणे टीव्ही बंद केला.

खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात त्यांचा नातू रोहन बसला होता, जो पत्रकारितेचा (Journalism) अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता.

“‘कॉन सेंट’ (भोंदू संत) च्या प्रकरणानंतर आता हे दुसरं, ” रोहन पुटपुटला. “आयएएस (IAS) अधिकारी, सोन्याच्या विटा, बेनामी संपत्ती, परदेशी बँक खाती. एवढी सुशिक्षित माणसं, एवढी हुशार डोकी. ही लोकं स्वतःला असं का उद्ध्वस्त करून घेतात?”

डॉ. देशमुखांनी आपले चष्मे हळूवारपणे काढले.

“कारण, ” ते शांत स्वरात म्हणाले, “पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी ही आजच्या काळातील सर्वात नवीन अंमली पदार्थ (ड्रग्स) आहेत. “

रोहन हलकासा हसला.

“ड्रग? तुमचा अर्थ लाक्षणिक अर्थाने आहे का?”

“नाही, ” डॉक्टरांनी उत्तर दिले. “जैविक दृष्ट्या (Biologically). “

वृद्ध न्यूरोलॉजिस्ट खिडकीकडे चालत गेले.

“दारू मेंदूला रासायनिकदृष्ट्या धुंद करते, पण सत्ता मेंदूला मज्जातंतूंच्या पातळीवर (Neurologically) धुंद करते. “

बाहेर विजेचा कडकडाट आणखी गडद झाला.

“बस, ” डॉक्टर म्हणाले. “मी तुला एक गोष्ट सांगतो. “

पंचवीस वर्षांपूर्वी, विक्रम पाटील नावाचा एक प्रामाणिक तरुण प्रशासकीय अधिकारी होता. तो एका गरीब शेतकरी कुटुंबातून आला होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिकवण्यासाठी आपली जमीन गहाण ठेवली होती. जेव्हा त्याने नागरी सेवा (Civil Services) परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हा संपूर्ण गावाने उत्सव साजरा केला होता.

त्याच्या पहिल्या नियुक्तीदरम्यान, विक्रम अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि आदर्शवादी होता. तो लाच नाकारायचा, दुर्गम गावांचा दौरा करायचा, भ्रष्ट कंत्राटदारांना शिक्षा करायचा आणि सामान्य लोकांचा आदर मिळवायचा. एक संध्याकाळी त्याची पत्नी मीराने त्याला हळूवारपणे विचारले, “तुम्ही एवढं काम का करता?”

विक्रमने हसून उत्तर दिले, “मला ही व्यवस्था बदलायची आहे. “

त्या टप्प्यावर, त्याची महत्त्वाकांक्षा शुद्ध, निरोगी आणि आवश्यक होती.

एका राजकीय कार्यक्रमादरम्यान विक्रमची भेट मंत्री सूर्यकांत राव यांच्याशी झाली. मंत्र्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, “तू हुशार आहेस, पण या देशात फक्त हुशारीच्या जोरावर जगता येत नाही. “

त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या आलिशान गाड्यांकडे बोट दाखवले आणि विचारले, “तुला माहीत आहे का या गाड्या कशा आल्या?”

विक्रम गप्प राहिला.

मंत्री मिश्कीलपणे हसले आणि त्यांनी एकच शब्द उच्चारला.

“सत्ता. “

त्या रात्री विक्रमच्या मेंदूत काहीतरी बदलले; त्याची नैतिकता नाही, तर त्याची उत्सुकता जागृत झाली.

एका महिन्यानंतर एक बिल्डर गुपचूप विक्रमच्या कार्यालयात आला.

“सर, फक्त एक लहानसं काम आहे, फाईल क्लिअरन्स. “

विक्रमला राग आला.

बिल्डरने शांतपणे टेबलजवळ एक सूटकेस ठेवली.

त्या सूटकेसमध्ये पन्नास लाख रुपये होते.

विक्रमच्या हृदयाचे ठोके वाढले, त्याचे हात थंड पडले आणि काही क्षणांसाठी त्याचा मेंदू सुन्न झाला. त्याच्या मेंदूला नुकताच त्याचा पहिला प्रचंड ‘डोपामिन शॉक’ मिळाला होता. हा शॉक केवळ पैशांमुळे नव्हता, तर निषिद्ध बक्षीस, जोखीम, सत्ता आणि नियंत्रणाच्या भावनेमुळे होता.

जुगार, ड्रग्ज आणि थरार शोधताना जी आदिम चेतासंस्था (Primitive Neural Circuitry) सक्रिय होते, तीच यंत्रणा अचानक त्याच्यात उद्दीपित झाली.

सुरुवातीला त्याने ती सूटकेस दूर लोटली, पण त्या रात्री त्याला झोप आली नाही. त्याचा मेंदू वारंवार त्या सूटकेसचे चित्र डोळ्यांसमोर आणत होता. मेंदूला आधीच त्या आनंदाची पुनरावृत्ती हवी होती.

तीन महिन्यांनंतर त्याने पहिली लाच स्वीकारली.

त्याने स्वतःची लगेच अशी समजूत काढली की, सगळेच तर हे करतात; एवढ्या वर्षांच्या त्यागानंतर त्यालाही सुखाचा अधिकार आहे आणि हे फक्त तात्पुरते आहे.

मानवी मेंदूत एक अद्भुत संरक्षण यंत्रणा असते—ती नैतिक सबबी निर्माण करून स्वतःची प्रतिमा सुरक्षित ठेवते.

निर्णय आणि संयम नियंत्रित करणारा ‘प्रिफ्रंटल कॉर्टेक्स’ (Prefrontal Cortex) आता इच्छेसोबत तडजोड करू लागला होता.

लवकरच एका मेहरबानीचे रूपांतर अनेक मेहरबांन्यांमध्ये झाले, एक तडजोड रोजची सवय बनली आणि एक बेकायदेशीर व्यवहार नेहमीचा नियम बनला.

पैसा वाहू लागला. त्यानंतर राजकीय प्रभाव आला आणि पाठोपाठ प्रसारमाध्यमांचे (Media) लक्ष वेधले गेले.

न्यूज चॅनेल्स त्याला “डायनॅमिक कलेक्टर”, “जिल्ह्याचा सिंह” आणि “जनतेचा नायक” म्हणून संबोधू लागले.

वृत्तपत्रांमध्ये रोज त्याचे फोटो छापून येत होते, सोशल मीडियावर त्याचे गौरव केले जात होते आणि टेलिव्हिजन मुलाखतींमुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. जनतेच्या टाळ्या आणि व्हीआयपी (VIP) वागणूक एखाद्या वारंवार मिळणाऱ्या डोपामिनच्या इंजेक्शनसारखी काम करत होती.

हळूहळू त्याच्या मेंदूने सेवेसाठी काम करणे थांबवले आणि तो केवळ उद्दीपनासाठी (Stimulation) काम करू लागला. एखाद्या व्यसनाला जसा उच्च डोस लागतो, तशीच आता त्याला अधिक प्रसिद्धी, मोठा प्रभाव, जास्त मीडिया कव्हरेज, मंत्र्यांची जवळीक आणि उद्योगपतींवर नियंत्रण हवे होते.

घरी मीराला हा बदल जाणवला.

“तुम्ही बदलला आहात, ” ती एका रात्री हळूच म्हणाली.

“नाही, ” विक्रम चिडून म्हणाला. “माझा विकास झाला आहे (I’ve evolved). “

तो सर्वात धोकादायक टप्पा होता, कारण व्यसनी व्यक्ती कधीच आपले व्यसन मान्य करत नाही.

डॉ. देशमुखांनी काही वेळ थांबून रोहनकडे पाहिले.

“तुला माहीत आहे का मज्जासंस्थेच्या पातळीवर (Neurologically) काय घडतं?”

रोहन शांतपणे पुढे झुकला.

“बक्षीस देणारी यंत्रणा (Reward Circuit) मजबूत होते, तर नैतिक यंत्रणा (Moral Circuit) कमकुवत होते, ” डॉक्टर म्हणाले.

“जेव्हा अनैतिक मार्गांनी वारंवार बक्षिसे मिळतात, तेव्हा मेंदू स्वतःची पुनर्रचना (Rewire) करतो. डोपामिन प्रणाली मेंदूला तेच वर्तन चालू ठेवण्यास सांगत राहते. ‘अमिगडाला’ (Amygdala) भीती कमी करतो, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स हळूहळू आपला संयम गमावतो आणि शेवटी सर्वात धोकादायक नशा तयार होते—अजेयतेची नशा (Intoxication of Invincibility). “

रोहनने हळूच व्यत्यय आणला.

“तुम्ही कोचिंग क्लासच्या संचालकांचाही उल्लेख केला होता ना?”

डॉ. देशमुखांनी होकारार्थी मान डोलवली.

“आणखी एक माणूस होता, समीर खन्ना. “

समीरची सुरुवात एक हुशार गणित शिक्षक म्हणून झाली होती, ज्याला गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याची मनापासून आवड होती. त्याच्या पहिल्या कोचिंग क्लासमध्ये तुटलेली बाके, गळके छप्पर आणि हाताने लिहिलेल्या नोट्स होत्या, तरीही विद्यार्थी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे.

त्यानंतर त्याचा एक विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेत पहिला आला.

प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली, पालकांनी त्याच्या इन्स्टिट्यूटबाहेर रांगा लावल्या आणि पैशांचा पाऊस पडू लागला.

लवकरच शिक्षणाचा उद्योग झाला आणि उद्योगाचे रूपांतर एका ध्यासात (Obsession) झाले.

समीरने आलिशान गाड्या, खाजगी जेट विमाने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि टीव्हीवर मोठ्या जाहिराती दिल्या. विकत घेतलेले रँकिंग आणि खोट्या यशाची आकडेवारी ही रोजची गोष्ट बनली.

विद्यार्थी आता मुले राहिली नव्हती, ती फक्त “रिझल्ट्स” (निकाल) बनली होती.

अपयशी ठरलेल्यांना लपवले जायचे, तर पहिल्या आलेल्यांची बाजारात उत्पादनांसारखी विक्री केली जायची.

ज्या मेंदूला एकेकाळी शिकवायला आवडायचे, त्याला आता टाळ्यांचे व्यसन लागले होते.

श्रीमंत उद्योगपती त्याला निधी पुरवत होते, राजकारणी त्याचा प्रभाव शोधत होते आणि मीडिया त्याची पूजा करत होता.

– क्रमशः भाग पहिला

***

लेखक : डॉ. एन जी उकडगावकर, न्यूरोलॉजिस्ट 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… अरुणा मुल्हेरकर ☆

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆

(भावगीत)

कळी फूल होताच धुंदावली

वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

*

सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥१॥

*

अली चुंबिता रोखुनी पाहते

तरी मुग्ध होऊनिया लाजते

मनाने अलिशी असे बांधली

वसंतासवे गर्विता जाहली ॥२॥

*

मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

खुले रूप लावण्य हे राजसी

जणू मेनकारूप ही ल्यायली

वसंतासवे गर्विता जाहली॥३॥

*

पहाटेस निहार सुस्तावता

चकाकून देहावरी थांबता

शहारुन ती बावरू लागली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥४॥

कवयित्री सौ. राधा गर्दे यांचे हे भावगीत वाचले आणि ताबडतोब त्यांच्या परवानगीने मी रसग्रहण लिहायला बसले.

सौ. राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. राधाताईंच्या या कवितेतून नेमके हेच चित्र दृश्यरूप झाल्याचे आढळते.

 कळी फुल होताच धुंदावली

 वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

ध्रुवपदाच्या या दोन ओळी वाचता क्षणीच आपल्या नजरेसमोर चित्र येते ते वसंत ऋतुतल्या बहराचे. जिकडे तिकडे जाई, जुई, मोगरा, चमेली, सोनचाफा ही सुगंधित फुले फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. या फुलातील एका कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो अशी कवयित्रीची कल्पना आहे.

 सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

 दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे…

हे कळीचे नुकतेच उमलून आलेले फुल त्याच्यावरील दवबिंदूंच्या वर्षावाने जणू काही न्हाऊन निघाले आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवत आहे.

 अली चुंबिता रोखुनी पाहते

 तरी मुग्ध होऊनिया लाजते

 मनाने अलीशी असे बांधली

 वसंतासवे…

या दुसऱ्या अंतर्‍यात त्या फुलावर लुब्ध होऊन

अली म्हणजे भ्रमर त्याचे चुंबन घेत आहे आणि ते फुल अतिशय मुग्ध व लज्जीत झाले आहे. त्या फुलाच्या मनात या मधुपा विषयी गोड प्रेम भाव निर्माण झाला आहे.

 मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

 खुले रूप लावण्य हे राजसी

 जणू मेनका रूप ही ल्यायली

 वसंतासवे…

राधाताई या तिसऱ्या कडव्यात काय सांगत आहेत? तर लाजेने ते फुल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटून घेत आहे आणि त्यामुळे त्याचे राजस रूप अधिकच खुलले आहे.

 पहाटेस निहार सुस्तावता

 चकाकून देहावरी थांबता

 शहारुन ती बावरू लागली

 वसंतासवे, गर्विता जाहली.

या शेवटच्या अंतऱ्यात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही दाट धु क्याची शाल फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या गारव्यामुळे ते फुल जसे काही शहारून गेले आहे.

हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी ही कविता वाचत जावी तसतसे लक्षात येते की हे एका कळीचे फुलात झालेल्या रूपांतराचे नुसते प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे.

एका मुग्ध बालिकेने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. वसंत ऋतु म्हणजे त्या वयात आलेल्या मुलीच्या मनातील मधुर सुगंधित असे भाव आहेत. तिच्या सौंदर्याचा तिला थोडा गर्व झाला आहे, त्याची ऐट दाखवत ती रुबाबात वावरते आहे. तिचे चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचे रोमरोम शहाले आहे आणि स्त्री सुलभलज्जेने तिचे सौंदर्य इतके खुलले आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वीतलावर अवतरली आहे. पहाटेचे धुके म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचे मन बावरून गेले आहे.

चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली राधाताईंची ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे एक सुंदर भावगीत आहे.

भुजंगीवृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी इत्यादी शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसले आहेत. रूपसी राजसी, सुस्तावता थांबता वगैरे स्वरयमकेही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण नाही. वृत्तबद्ध कविता लिहिणे ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही, कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असे नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अगदी अलगद बाहेर पडल्याचे दिसून येते.

अशाच लिहित्या रहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – माझं जीवन हाच माझा संदेश… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – माझं जीवन हाच माझा संदेश… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नाशिक आजचं आणि पूर्वीचं…! जमीन-अस्मानाचा बदल झाला आहे यात. काळानुसार शहराचे चेहरेमोहरे बदलले, पण एक गोष्ट मात्र शतकानुशतके तीच राहिली आहे—ती म्हणजे ही संथ वाहणारी गोदामाई! पण तिचं पाणी तेव्हा मुक्तपणे, अवखळपणे वाहत होतं. आज ते ठिकठिकाणी सिमेंटच्या भिंतींनी अडवलंय. ते पाणी तेव्हा ओंजळीने सहज पिता यायचं; आजची परिस्थिती तर तुम्ही जाणताच. इथे बारा वर्षांतून एकदा कुंभमेळा भरतो, त्यानिमित्ताने शहरात नव्या तयारीची लगबग सुरू असते. मी काठावर उभा राहून ती सगळी गर्दी, तो कोलाहल पाहत असतो… आणि मग माझ्या मनात चक्रं फिरतात, मला आठवतात ते पूर्वीचे दिवस!

साधारण ७,००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती, रस्ते नव्हते, चहूकडे फक्त अथांग आणि घनदाट जंगले होती. अशा अरण्यांमध्ये हिंस्ट्र श्वापदे आणि क्रूर प्रवृत्तीच्या राक्षसांची वस्ती होती. अशा एका भीषण कालखंडात या जीवनकथेची सुरुवात होते.

माझे नुकतेच लग्न झाले होते. डोळ्यांत भविष्याची सुंदर स्वप्ने रेंगाळत होती. सुखाचे दिवस आता मोरपिसारा फुलवून अंगणात आले असे वाटत असतानाच, अचानक परिस्थितीने एक क्रूर वळण घेतले. नियतीच्या एका फटकाऱ्यासरशी मला अचानक राजवैभव, राजमुकुट सोडून १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला. महालात सुखासीन आयुष्य जगलेली माझी सुशील, सुकुमार आणि सुंदर पत्नी मला संकटात साथ देण्यासाठी राजवैभवाचा त्याग करून स्वतःहून माझ्यासोबत वनवासात आली. मी कितीही नाही म्हणत असताना, माझ्यावर अपार प्रेम करणारा आणि जणू माझेच प्रतिबिंब असलेला माझा धाकटा भाऊदेखील आमची सावली बनून सोबत निघाला. उत्तरेकडून प्रवास करत करत आम्ही या दक्षिणायनात येऊन पोहोचलो. सोपा नव्हता हा प्रवास; या वाटेने आम्हाला जगण्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

असे भटकत आम्ही आलो नाशिकच्या या रम्य परिसरात. घनदाट अरण्य, वटवृक्षांची केवढी ती गर्दी आणि त्यांची ती शीतल छाया! हे ठिकाण आमच्या मनाला खूप भावले. ठरवले, आता काही काळ तरी इथंच मुक्काम करायचा. खळाळत वाहणारी गोदामैयाही जणू आम्हाला साद घालत होती, “आता दुसरीकडे कुठे जाऊ नका, माझ्याच कुशीत विसावा घ्या. ” मग गोदेच्या त्या सुंदर, निर्मळ जलाच्या काठी, पंचवटीच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही आमची छोटीशी पर्णकुटी बांधली. तिथल्या पावन वातावरणात आमचा संसार सुखाचा सुरू झाला. दिवस सुखाचे जात होते… पण एक दिवस अचानक घात झाला!

मी कुटीत नव्हतो आणि परतून पाहतो तर माझी लाडकी, प्राणप्रिय पत्नी तिथे नव्हती! कोणीतरी तिचे कपटाने हरण केले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, डोळ्यांसमोर गहिरा अंधार दाटून आला. कोण होता तो? कुठे घेऊन गेला असेल तिला? काहीच ठाऊक नव्हते. आयुष्यात असं काही वादळ येईल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

सामान्यांसारखे डोळ्यात पाणी आणून खचून बसण्याचा तो क्षण होता. पण अंतरात्म्याने हार मानणे नाकारले. मी ठरवले, ‘ छे असं हताश होऊन नाही चालणार. परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत! मी आणि माझ्या धाकट्या भावाने पाठीवर धनुष्यबाण चढवले, विझलेला निखारा पुन्हा पेटवला आणि त्या अनोळखी, खडतर वाटेवर पाऊल ठेवले. वाट दिसेल तिकडे आम्ही मार्गक्रमण करू लागलो. पायात पादत्राणे नव्हती की पाठीशी राज्याचे लष्कर नव्हते की हाती कोणती सत्ता नव्हती. होते ते फक्त मनातले ध्येय आणि सत्यावरची अढळ निष्ठा!

आम्ही दक्षिण दिशेने पायी चालू लागलो. वाटेत संकटांचे महाकाय डोंगर उभे होते. पण या प्रवासात मला एक गोष्ट उमजली—आयुष्यात संकटं कितीही मोठी आली, तरी निराश होऊन थांबायचं नसतं. जो थांबला तो संपला, जो चालत राहिला तोच जिंकला! या प्रवासात आम्हाला जंगलात राहणारी, वंचितांचे आणि शोषितांचे आयुष्य जगणारी साधी-भोळी वनवासी माणसे भेटली. त्यांच्यावर एका बलाढ्य, उन्मत्त आणि अत्यंत शक्तिशाली सम्राटाचा भयंकर जुलूम सुरू होता. तो शत्रू इतका बलाढ्य होता की त्याच्याकडे सोन्याची नगरी होती, अथांग सैन्य होते आणि अफाट ताकद होती. ही साधीभोळी माणसे त्याच्या दहशतीच्या छायेत आपले रोजचे आयुष्य कंठत होती. या अशा भयाण जगण्याला काय जगणं म्हणायचं? हे सगळं माझ्या मनाला खटकत होतं. मी ठरवलं, स्वतःचं दुःख काही काळ बाजूला ठेवायचं आणि या भोळ्या-भाबड्या लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवायचं!

वेळ पडली तर मला देखील या अन्यायी महासत्तेशी लढावं लागणार होतं. मी विचार केला, मी एकटा या महासत्तेशी कसा लढणार? पण अंतर्मनाने सांगितले की खरी शक्ती ही केवळ शस्त्रात नसते, ती असते माणसांच्या एकजुटीत आणि आत्मबळात! मी त्या जंगलातील आदिवासींना, वानर समूहाला एकत्र केले. त्यांना हाक दिली, “मित्रहो, जुलूम सहन करणे हे मरणाहून वाईट आहे. घाबरू नका, मी तुम्हाला लढायला शिकवीन! ” त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसला. आम्ही त्यांना एकत्र आणले, संघटित केले, युद्धकलेचे प्रशिक्षण दिले, त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून दिली; आणि पाहता पाहता एका मातब्बर हुकूमशहाविरुद्ध एक अभेद्य ‘लोकचळवळ’ उभी राहिली. त्या वनवासी मंडळींनी मग माझ्या संकटात सावलीसारखे उभे राहण्याची तयारी दाखवली.

तिथून पुढे आम्ही भारताच्या दक्षिण टोकापर्यंत, म्हणजेच अथांग समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलो. समोर पसरलेला महासागर गर्जत होता. आपल्याला ज्या शत्रूशी मुकाबला करायचा आहे, तो पार या समुद्रापलीकडे आहे हे समजले होते. पण आता वाट संपली होती. शत्रू समुद्रापलीकडे वैभव उपभोगत होता आणि आम्ही अलीकडे किनाऱ्यावर उभे होतो. पुन्हा तोच यक्षप्रश्न—हा अथांग समुद्र कसा ओलांडायचा? पण जेव्हा हेतू प्रामाणिक आणि पवित्र असतो, तेव्हा निसर्गही रस्ता देतो. आम्ही दगड-धोंडे गोळा केले, प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे खारीचा वाटा उचलला आणि विश्वासाच्या बळावर समुद्रावरही सेतू बांधून पूर्ण केला! आजपर्यंत समुद्रावर सेतू कोणी बांधला नव्हता. पण ते आश्चर्य घडले. सगळ्यांच्या साथीने आणि सहकार्याने ही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य झाली.

त्यानंतर काय झाले, तो एक इतिहासच आहे. अटीतटीचे, घनघोर युद्ध झाले. आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले होते. अखेर तो बलाढ्य, उन्मत्त शत्रू पराभूत झाला; अधर्माचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला! पण हे सगळे यश केवळ माझे नव्हते. माझ्यासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार असणाऱ्या माझ्या साऱ्या वनवासी, सहकारी बांधवांच्या एकजुटीचे हे यश होते. तिथेच माझी प्राणप्रिय पत्नी मला पुन्हा भेटली. विजय मिळवल्यानंतर माझ्या हातात त्या शत्रूचे अथांग, सोन्यासारखे लखलखणारे साम्राज्य चालून आले होते. कोणीही असते तर त्या वैभवाला भुलले असते. माझ्या भावानेही भावनावश होऊन मला विचारले, “दादा, आपण आपले राज्य तर सोडलेच आहे, तर या सुवर्ण भूमीतच राहायला काय हरकत आहे? “

पण मी मंद हसलो. मी त्या सुवर्णनगरीकडे पाहिले आणि म्हणालो, “नाही बंधो, हे वैभव कितीही अथांग असले, तरी माझ्या मातृभूमीची सर याला येऊ शकत नाही! “

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

(ही सोन्याची लंका मला भुरळ पाडू शकत नाही. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.)

 मित्रांनो, हा माझा ७, ००० वर्षांपूर्वीचा प्रवास आज तुम्हाला का सांगतोय? कारण, तुम्हा प्रत्येकाचं जीवन ही देखील एक अविरत लढाई आहे, हे मी जाणतो. आज तुम्हीही अशाच अनंत संकटांशी, अपयशाशी लढत आहात. तुमच्या जगातील समस्या कदाचित वेगळ्या असतील, आधुनिक जीवनशैलीने त्या तुमच्यासमोर उभ्या केल्या असतील. पण परिस्थिती कशीही असू द्या, शाश्वत जीवनमूल्ये कधीही कालबाह्य होत नाहीत!

हिंमत हरू नका. अनंत संकटे वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर उभी राहतील. कधी पराभव स्वीकारावा लागेल, कधी अपमान होईल, तर कधी विपरीत परिस्थिती मानसिक खच्चीकरण करेल. कधी एखादा बलाढ्य वाटणारा आजार किंवा बिकट आर्थिक परिस्थिती तुमच्यासमोर रावणासारखी उभी ठाकेल. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही अंधःकारमय असली, तरी धीर सोडू नका. तुमच्यातल्या सुप्त आत्मबळाला जागवा, प्रामाणिक माणसांची साथ घ्या आणि लढत राहा. मात्र, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आपली जीवनमूल्ये आणि आदर्श कधीही सोडू नका.

कदाचित तुम्हाला वाटेल, या पडत्या काळात हा अनुभव सांगणारा मी कोण?

मी दुसरा कोणी नसून, ७, ००० वर्षांपूर्वी नाशिकच्या याच गोदावरीच्या काठावरून, पंचवटीतून पायी निघून, अथांग समुद्र ओलांडून लंकेवर विजय मिळवणारा, दशरथाचा पुत्र ‘राम’ आहे. आणि हा माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा जीवनप्रवास आहे. लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला, तरी शेवटी विजय ‘उगवत्या रंगांचाच’ म्हणजेच प्रकाशाचाच होतो!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शहर बदलतंय, पण” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “शहर बदलतंय, पण…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

सकाळी रोजच्याप्रमाणे फिरणं झाल्यावर कट्ट्यावर गप्पांची मैफिल रंगलेली. राजकारण, टीव्ही सिरियल, क्रिकेट या नेहमीच्या विषयांवरुन चर्चेची गाडी बेफाम वाढणाऱ्या शहरांवर आली.

“आपलं शहरसुद्धा फार मोठं झालयं”

“मोठं???? चारही बाजूंनी बेसुमार वाढलयं. ”

“हो ना. कित्येक नवीन जागा तर माहितीही नाहीत. ”

“हे सगळं गेल्या वीस वर्षात घडलं”

“नवीन येतेय पण जुन्या वास्तु एकेक करून आठवणीत जातायेत. वाईट वाटतं. ”

“इट्स ओके, जे होतंय चांगल्यासाठीच होतंय. डोन्ट बी इमोशनल, ”डॅडींच्या बोलण्यानं वादाला तोंड फुटलं. स्वतःला आधुनिक विचारांचे समजणाऱ्या डॅडींचे टोकाचे विचार अनेकदा वादाचं कारण व्हायचे. आजही तेच झालं.

“फ्रेंडस जगा बरोबर बदलत रहा. बी प्रॅक्टिकल” डॅडी वदले.

“गपा हो, जेव्हा बघावं तेव्हा प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल जप करता. तुम्ही भावनाशून्य असलात तरी जग नाही”आप्पा एकदम उसळले.

“आप्पा, पर्सनल जायचं काम नाही. मी जनरल बोललो आणि मान्य करा किवा करू नका बदल होणारच. आठवणींचे कढ काढण्यापेक्षा नव्याबरोबर अडजेस्ट करणं हेच शहाणपणाचं आणि फायद्याचं होईल” डॅडी.

“या शहरात आयुष्य घालवलं. खूप बदल पाहिले, अनुभवले पण आताचा बदल फारच वेगळायं. ”आप्पा.

“वेगळा वगैरे काही नाही. आता आपलं शहर महानगर झालयं. माय डियर, धिस इज डेव्हलपमेंट, आय लाइक धिस ग्रोथ” बोलताना डॅडींच्या चेहऱ्यावर चमक होती.

“वी ऑल्सो लाइक ग्रोथ, बट अँट व्हॉट कॉस्ट”

“म्हणजे, समजलं नाही. ”डॅडी.

“खूप नवीन गोष्टी आल्या आणि अजूनही येतायेत. मोठाले रस्ते, अवाढव्य इमारती, शिक्षण संस्था, ब्रॅंडेड दुकानं, हॉटेल्स आणि आणखी बरंच काही.. ”

“मग चांगलचं आहे की… आरामदायी जगण्यासाठी हेच तर पाहिजे. ”

“फार एकांगी विचार करता. तुम्हांला मुद्दाच लक्षात येत नाहीये. ”आप्पा.

“ओके, समजावून सांगा. ” 

“नवीन शहरात आपलेपणा वाटत नाही. सगळं अनोळखी वाटतं. शोरूम आणि घर यात जो फरक आहे तोच.. ”

“म्हणजे”

“खूप चकचकीत, डोळे दिपवणारं शोरूम कितीही आकर्षक, चांगलं असलं तरी परकं वाटतं याउलट घराविषयी मात्र जिव्हाळा असतो. प्रेम असतं. ”

“यू आर राईट” डॅडी 

“आठवणींच्या ढिगाऱ्यावर उभं असणारं नवीन शहर खूप मोठं, आधुनिक, व्यवहारी आणि दिखाऊ आहे. आमच्यासारख्यांना अजूनही शहराविषयी प्रेम, अभिमान आहे पण आता “आपुलकी” मात्र वाटत नाही. ”आप्पा बोलायचे थांबले. कट्टयावर एकदम शांतता. आपल्या शहराविषयी वाटणारी परकेपणाची भावना ही प्रत्येकाचीच वेदना.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ११ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ११. ☆ प्रा.भारती जोगी ☆

” ओठांवर हसू म्हणजे येसू

 पावलात यश म्हणजे येसू!

आजपासून ही आमची येसूबाई! “

.. हे मोठ्या कौतुकाने उच्चारलेले गौरवोद्गार आहेत… दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे! 

महाराज कोकण मोहिमेवर गेले असतांना, दक्षिण कोकणातील शृंगारपूर इथल्या पिलाजीराव शिर्के यांच्या भेटीचा योग आला. शिर्के घराणे धाडसी, पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. त्यावेळी महाराजांच्या नजरेस पिलाजीरावांची कन्या राजाऊ उर्फ जिऊबाई पडली.

त्यांच्या नजरेनं ताडलं त्वरित की, आपल्या संभाजी राजे नावाच्या वादळाला हे तुफानच बांधू शकतं. त्यांनी लगेच तिचं येसूबाई हे नामकरण करून आमची म्हणत आपली स्नुषा म्हणून मान्यता देऊन टाकली.

त्यावेळी येसूबाई अवघ्या ६-७ वर्षे वयाच्या होत्या. पण मांसाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली अशा काही घडत गेल्या… जसं मुशीतून झळाळतं सोनं बाहेर यावं. मांसाहेबांचे सगळे गुण… माया, ममता निर्णयक्षमता, निरपेक्ष वृत्ती… सगळे उतरले त्यांच्यात. जिजाऊंची सावली, छबी म्हणत लोक!

येसूबाईंना जबाबदारीची समज त्यामुळे लहानपणीच आली. असं म्हणतात की, छोट्या येसू ने छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा हातात तलवार घेऊन तलवार ही स्त्रीच आहे… हे सिद्ध करत… तलवारीला

जणू… नाक, नथ, नथनी, डोळे, नखं, गळा, कंठी फूल, मोगरा, पुतळा कटोरा, नखा, सुचिन्ह,… या सगळ्या आभूषणांनी मंडित दाखवून दिले आणि शेवटी तिची तेज धार दाखवत सूचित केले की, आभूषणांनी शृंगारलेली असली म्हणून तिला शोभेची बाहुली समजण्याची चूक कधीही करू नका. वेळ आली तर तिची धार तिचं शस्त्र बनून ती रणचंडी ही बनू शकते. येसू मधली राज्ञी आणि वीरांगना ही दोन्ही चकित करणारी पण महाराजांना अपेक्षित अशी रूपं बालपणीच निदर्शनास आली ती अशी! बालपणातील अवखळपणातलं ; करारीपण दिसलं आणि महाराज आपल्या अचूक आणि सुयोग्य निवडीवर संतोष पावले.

येसू जसजशी मोठी होत गेली, जाणीवा ही विस्तारत गेल्या तिच्या! तिला जाणवलं की तिची गाठ एका वादळाशी बांधली गेली आहे. म्हणूनच मग तिनेही या स्वराज्य रक्षक पतीच्या… संभाजी राजेंच्या या स्वराज्याच्या धगधगत्या होमकुंडात आपण ही एक समिधा होऊन समर्पित व्हावं असा निश्चय केला. बघता-बघता स्वराज्याचं कुलमुखत्यार पद बहाल झालं तिला. स्वराज्याची पहिली कुलमुखत्यार झाली ती! राजेंनी तिचा सन्मान म्हणून… तिच्या नावाची… तिच्या गुणविशेषांना अधोरेखित करणारी अशी राजमुद्रा असलेली शिक्के कट्यार दिली. त्यावर कोरलेले शब्द… श्री सखी राज्ञी जयती… खरंच त्या काळात एका कर्तबगार पतीचा, आपल्या पत्नीच्या कर्तबगारीवर असलेला ठाम, दृढ विश्वास नक्कीच लक्षणीय आणि विचारप्रवर्तक ठरावा!!

येसूबाई संभाजी राजेंची ख-या अर्थाने सहचरी, सोबती, सावली, सुकांता सिद्ध होतच गेल्या… प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात! अगदी खांद्याला खांदा लावून उभी रहात, सोबतीने आणि प्रसंगी एकटीने ही दमदार पावलांची साथ दिली या हिंदवी स्वराज्याच्या वाघिणी ने या वाघाला!!

अवघा २३ वर्षांचा संसार… त्यातही जोडीदाराच्या सतत सहवासाला मुकलेल्या येसूबाई… अगदी शांत स्थिर चित्ताने, स्थिर मतीने ठाम राहून राजेंच्या अनुपस्थितीत, ते स्वारीवर असतांना स्वराज्य सांभाळलं! एकही राजकारण शिजू दिलं नाही. प्रजेला अगदी लेकरासारखं सांभाळलं. पती जिवंत असतांनाही एकदा काही काळ छत्रपतींच्या सूचनेनुसार विधवेचं आयुष्य ही व्यतीत करणारी ही समिधा कणा-कणाने जळतच राहिली… समर्पित झाल्यानंतर तिचं स्वतः चं असं अस्तित्व उरलंच कुठे होतं ना! ती स्वराज्यरक्षक संभाजी राजेंची सच्ची सहधर्मचारिणी होती ना!!!!

संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेत गेल्यानंतर… त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जखमेच्या वेदनेची झळ, धग, थेट पोहोचत होती येसूबाईंच्या हृदयी! वेदनांच्या विचारांनी रक्तबंबाळ होत, होरपळून निघायच्या त्या! पण तरीही आपल्या वेदनांचा, दु:खाचा बाजार नाहीच मांडला या राज्ञी ने… स्थितप्रज्ञ राहून राज्यकारभार चालवला. संभाजी राजे गेले… संपूर्ण राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली.

… पण ही हिंदवी स्वराज्याची वाघीण डगमगली नाही. यावेळी स्वराज्यानं एक वेगळंच रूप पाहिलं येसूबाईंच!! त्यागमूर्ती!!! रायगडाला मुघलांचा वेढा पडला त्यावेळी ठरवलं असतं तर आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करवला असता. पण येसूबाईंनी त्यावेळी जो दूरदर्शीपणा आणि धोरणीपणा दाखवला तो लक्षणीयच होता. त्यांनी पुत्र प्रेमापेक्षा, स्वराज्य प्रेमाला प्राधान्य दिले. आणि आपले दीर, राजाराम महाराज यांना गादीवर बसवले आणि इतर सगळ्यांना राजाराम महाराजांना घेऊन जिंजीला रवाना केले. राजाराम महाराज सुरक्षित राहिले तरच स्वराज्य जिवंत राहील हे त्यांनी ओळखले होते. दोन्ही वारस एकाच वेळी हाती लागू नये ही येसूबाईंची मुत्सद्देगिरी!! .

स्वराज्य राखण्यासाठी.. ८-९ महिने एकटीच स्त्री किल्ला लढवत होती. जयती राज्ञी च्या रूपात जणू स्वतः ला सिद्ध करत… राजमुद्रा सजीव, बोलकी करू पहात होत्या येसूबाई!!

.. पण हाय रे दैवा… फितुरीचा शाप नडलाच नेहमीप्रमाणे! आणि येसूबाई आणि शाहू राजे दोघांना औरंगजेबाच्या कैदेत जावे लागले. पण कैदेत ही येसूबाईतल्या मातेने आपल्या शाहूवर, राजधर्म, राज संस्कार आणि मराठी संस्कृतीचे संस्कार केले. जणू त्याच्या भविष्यातील राजेपदाची ही रुजवणच होती!

थोडी थोडकी नाहीच ना… तब्बल २९ वर्षे ८ महिन्यांची कैद भोगावी लागली असं म्हणतात. म्हणजे अर्ध आयुष्य आणि ७ वर्षांच्या शाहू राजेंचा ही उमेदीचा काळ कैदेतच गेला. पण येसूबाई कशा राहिल्या, त्यांनी हा एवढा मोठ्ठा प्रदीर्घ काळ कसा कंठला असेल… इतिहासाने येसूबाईंच्या एवढ्या लक्षणीय, नजरेत भरणा-या योगदानाची योग्य अशी, म्हणावी तशी आणि म्हणावी तितकी नोंदही घेतली नाही. त्यांच्या समाधी जवळ… नाही चिरा नाही पणती!!

जवळपास ३० वर्षांचा वनवास… चार भिंतीत… परकीयांच्या कैदेत… ७ वर्षांच्या लेकरासोबत… पती शिवाय… पण… तिच्या या वेदना, विरह, व्यथा… संसार आणि स्वराज्य पेलून धरण्याचं असिधारा व्रत… या सगळ्यांकडे डोळेझाक केली गेली की काय? असाच प्रश्न पडतो.

या समिधेचं समर्पण, जळत रहाणं… राख होईपर्यंत… खरंच… तेथे कर माझे जुळ*!!

– लेख क्र. ११  .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ घर – उतारवयातील आर्थिक भागीदार…  – लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ घर – उतारवयातील आर्थिक भागीदार…  – लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पुण्यात राहणारे देशमुख काका आणि काकू. वय अनुक्रमे ६५ आणि ५८. आज त्यांच्या कोथरूडमधील फ्लॅटची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. पण हा फ्लॅट त्यांना आयता मिळालेला नाही. चाळिशीत असताना त्यांनी Home Loan घेतल, अनेक वर्षे EMI भरले, काटकसर केली आणि शेवटी हे घर स्वतःच्या मालकीचं केलं. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे, मुलगी बंगळुरूत. दोघेही सुखात आहेत. पण देशमुख दांपत्यासमोर एक प्रश्न उभा राहिला आहे. घर आहे, पण नियमित उत्पन्न नाही. FD वरील व्याज कमी पडू लागलं आहे. वाढते वैद्यकीय खर्च आहेत. मुलांकडे मागायचे नाही आणि आयुष्याच्या या टप्प्यावर पैशांची चिंता करत बसायचं नाही. अशा वेळी त्यांना ” रिव्हर्स मॉर्गेज ” या योजनेची माहिती मिळाली आणि त्यांना जाणवलं की आयुष्यभर ज्यासाठी कष्ट केले, ते घरच आता त्यांच्यासाठी काम करू शकतं.

सामान्य माणसाने घराला नेहमी संपत्तीपेक्षा जास्त काहीतरी मानलं आहे. ते फक्त चार भिंतीचं बांधकाम नसतं. त्यात आयुष्याची कमाई, आठवणी, त्याग आणि स्वप्न गुंतलेली असतात. म्हणूनच “घरावर कर्ज” हे शब्द ऐकले की अनेक ज्येष्ठ नागरिक घाबरतात. पण रिव्हर्स मॉर्गेज हे नेहमीच्या कर्जासारखं नाही. यात घर विकावं लागत नाही, घर सोडावं लागत नाही आणि मालकीही तुमच्याच नावावर राहते. उलट तुम्ही ज्या घरात राहता, तेच घर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनतं. विशेषतः ज्यांना पेन्शन नाही, ज्यांची बचत कमी पडू लागली आहे किंवा ज्यांना मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही, त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

रिव्हर्स मॉर्गेजमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं राहतं घर बँकेकडे तारण ठेवता आणि बँक तुम्हालाच दरमहा पैसे देते. साधारणपणे ६० वर्षांवरील व्यक्ती यासाठी पात्र असतात. पती-पत्नी संयुक्त अर्जदार असू शकतात. घराची मालकी मात्र तुमच्याच नावावर राहते. देशमुख काकांच्या ३ कोटी रुपयांच्या घराचं उदाहरण घेतलं तर बँक साधारणपणे घराच्या किमतीच्या ४० ते ६० टक्के मूल्य विचारात घेते. म्हणजे सुमारे १. २ ते १. ८ कोटी रुपयांच्या आधारावर त्यांना योजना मिळू शकते. प्रत्यक्ष मासिक रक्कम, बँक व्याजदर, वय आणि योजनेच्या अटींवर अवलंबून असते. पण अशा मूल्याच्या मालमत्तेवर साधारणपणे दरमहा ५० हजार ते १ लाख रुपयांच्या आसपास मासिक उत्पन्न मिळू शकतं. काही घरांसाठी ते यापेक्षा कमी किंवा अधिकही असू शकतं. मुद्दा एवढाच की आयुष्यभर कष्टाने उभं केलेलं घर आता खर्चाचं ओझं न राहता उत्पन्नाचं साधन बनतं. त्यांना आता जगभर प्रवास करायचा असेल, चांगले उपचार घ्यायचे असतील किंवा फक्त निर्धास्तपणे जगायचं त्यांच्यासाठी देखील हा एक स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत तयार होतो.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या घरातच राहू शकता. अनेक जण म्हणतात, “घर भाड्याने दिलं तर उत्पन्न मिळेल ना? ” पण जर तुमच्याकडे एकच घर असेल तर ते भाड्याने दिल्यानंतर स्वतः कुठे राहायचं हा प्रश्न उभा राहतो. मोठ्या शहरांमध्ये मिळणारं भाडं आणि स्वतः राहण्यासाठी द्यावं लागणारं भाडं यांचा हिशोब कधीच जुळत नाही. त्यामुळे एकच घर असलेल्या आणि त्याच घरात राहून उत्पन्न हवं असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज हा अनेकदा अधिक व्यवहार्य पर्याय ठरतो. कारण घरही तुमच्याकडे राहते आणि त्यातून उत्पन्नही मिळतं.

खरं तर ही योजना काही विशिष्ट प्रकारच्या कुटुंबांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. मुलबाळ नसलेली दांपत्य, फक्त मुली असलेले आणि त्या आपल्या संसारात स्थिरावलेल्या पालक, परदेशात किंवा दूरच्या शहरांत राहणारी मुलं असलेली कुटुंबं, तसेच म्हातारपणी कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही असं ठरवलेले ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांसाठी हा पर्याय गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे. कारण सर्वांची मुलं आई वडिलांना टाकून देत नसले तरी प्रत्येकाला आईवडिलांना स्वतःच्या घरी नेता येत नाही. मुलांकडे हात पसारायला आई वडिलांना आवडत नाही. मग अशा वेळी आर्थिक स्वावलंबन हीच सर्वात मोठी सुरक्षितता ठरते.

समजा काही वर्षांनी देशमुख काकांचं निधन झालं तरी काकू संयुक्त अर्जदार असल्यामुळे त्या पुढेही आयुष्यभर त्या घरात राहू शकतात. बँक त्यांना बाहेर काढू शकत नाही. शिवाय योजनेच्या अटींनुसार त्यांना मिळणारी देयकेही सुरू राहू शकतात. त्यामुळे जोडीदार गेल्यानंतर अचानक आर्थिक आधार तुटत नाही. ही बाब विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. पुढे काकूंचंही निधन झाल्यानंतर मुलांसमोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे बँकेची थकबाकी भरून घर स्वतःकडे ठेवणं. दुसरा म्हणजे घर विकणं. समजा त्या वेळेस घराची किंमत ५ कोटी रुपये झाली आहे आणि रिव्हर्स मॉर्गेजमधून मिळालेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून बँकेची एकूण थकबाकी २ कोटी रुपये झाली आहे. अशा वेळी घर विकल्यास सर्वप्रथम बँकेचे २ कोटी रुपये फेडले जातील आणि उर्वरित ३ कोटी रुपये वारसांना मिळतील. म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज केल्यामुळे मुलांना काहीच मिळणार नाही असं नाही. उलट अनेकदा मालमत्तेच्या वाढलेल्या किमतीचा फायदा वारसांनाही मिळतो. जर वारसांना घर विकायचं नसेल, तर ते बँकेची थकबाकी भरून घर स्वतःच्या मालकीत ठेवू शकतात.

सिनियर सिटीझन ह्यात सहभागी झाल्यास काही घरांमध्ये वर्षातून एकदाच फोन करणारी मुलं, रिव्हर्स मॉर्गेजमधून आई-वडिलांना उत्पन्न सुरू झाल्यावर अचानक नियमित फोन करू लागतील, त्यांचं प्रेम उतू जाऊ लागेल! ह्यातील विनोद बाजूला ठेवला तर एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे म्हातारपणी सन्मानाने जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्या पैशांसाठी मुलांकडे पहावं लागू नये असे प्रत्येकाला वाटत असत. त्यातून प्रत्येक मुलगा “वंशाचा दिवा” ठरेलच असं नाही. प्रत्येक मूल म्हातारपणी आई-वडिलांचा आधार बनेलच असंही नाही. पण आयुष्यभराच्या कष्टातून तुम्ही स्वतः उभं केलेलं तुमचं घर मात्र तुम्हाला कधीच सोडून जात नाही. गरज पडली तर रिव्हर्स मॉर्गेजच्या माध्यमातून तेच घर तुमच्या उतारवयाचा आर्थिक आधार बनू शकतं. आपणच तयार केलेल्या ॲसेटचा आपल्या हयातीत, ताठ मनानें जगायला पुरेपूर वापर करता येतो. अनेकांसाठी खरा प्रश्न “वंशाचा दिवा कोण? ” हा नसून “आयुष्यभर साथ कोण देणार? ” हा आहे. आणि त्याचं उत्तर अनेकदा आपल्या स्वतःच्या घरातच दडलंलेलं असतं. फक्त ते अनेकांना माहीत नसतं. म्हणून हा लेखन प्रपंच.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : मंदार जोग

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

‘जून’ महिना संपत आला…

पण अ’जून’ पावसाचा पत्ता नाही…

असं वाटतं की भि’जून’जावं…

मो’जून’ दोन चार थेंब पडतात…

अंग भा’जून’ जातंय…

चेहरा कोमे’जून’ गेलाय…

कुठे   स’जून’ जाता येत नाही…

 

रात्री १२ वा’जून’ गेले तरी झोप  येत नाही..

 

अरे जरा त्या पावसाला सम’जून’ घ्याना.काँक्रिट जमिनीत विर’जून’ रस्ते करतात. नगरी redevelopment मुळे निळ्या प्लॅस्टिक आणि पत्र्यांनी स’जून’ गेली.

 पाणी जमिनीत  न जाता  ला’जून’   वरच राहतं.

सगळी सृष्टी भा’जून’ शि’जून’  कोमे’जून’ गेली. समुद्रात जायला पाणीच नाही.

मनुष्याचे कर्म फिरून त्यालाच फळ देते. ढग तरी कसे गर’जून’ (गर्जून )पडणार ?तो गरीब बिच्चारा पाऊस  येणार कोठून?

सगळे वातावरण प्रदूषणाने पिं’जून’ गेले आहे.

 

जीवन थि’जून’ गेलंय रे पावसा!

आता मा’जून’ जाऊ नकोस.

लवकर ये.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ योग दिवस ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ योग दिवस ☆ शालिनी जोशी

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर १४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत २१ जून हा योग दिन म्हणून साजरा करायचा प्रस्ताव मांडला. १९३ पैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. २१ जून २०१५ हा पहिला योगदिन ठरला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.

भारतीय संस्कृतीतील योग संकल्पनेचा याला आधार आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक उन्नती साधते. यामध्ये योगासने, प्राणायाम आणि ध्यान व पातंजल योग यांचा समावेश होतो. सूर्यनमस्कारानेही सर्व साध्य होते म्हणून सूर्यनमस्काराना विशेष महत्त्व आहे. सर्व लोक एकत्र येऊन योग करतात. यातून विविधतेत एकता आणि जागतिक शांततेचा संदेश मिळतो. योग (युज्) जोडणे किंवा एकत्र येणे. जीवा शिवाचे ऐक्यही साधता येते.

योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी जगभर हा दिवस साजरा केला जातो. ही चळवळ एका दिवसापूर्वी न राहता कायमची झाली पाहिजे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद आहे.

२१ जून या दिवसाचे महत्त्व म्हणजे उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस. या दिवशी रात्र लहान असते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण  पूर्ण होऊन दक्षिण दिशेकडे मार्गस्थ होतो. या दिवसाला उन्हाळा अयन दिन असेही म्हणतात.सुर्याचे भासमान भ्रमण आणि पृथ्वीचा आस साडेतेवीस अंशांनी कललेला असल्यामुळे दिवस-रात्र असमान होतात.या विशेषामुळे २१जूनला योग दिनाचा मान मिळाला.

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares