मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

? मनमंजुषेतून ?

 ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

लहानपणी सदाशिव पेठेत असताना धमाल असायची… जागा भाड्याची असली तरी त्या छोट्याश्या जागेत खरे जीवन सामावले होते असे वाटते.  आता कितीही मोठी जागा , प्रत्येकाला स्वतंत्र रुम असली तरी जागा अपुरीच वाटते.  छोट्या जागेत माणसे जवळ होती. आता मोठ्या रूम्समुळे माणसांमध्ये दुरावा व भिंती निर्माण झाल्या आहेत.  

त्याकाळी परिस्थिती बेताची असली तरी सण आला की उत्साहाचे वातावरण असायचे.  त्यात दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. आमची सहामाही परीक्षा संपतच आलेली असायची. घरात एव्हाना सणाची तयारी सुरू झालेली असायची.  रेडीमेड कपड्यांची तेव्हा फारशी चलती नव्हती. कापड घेवून आधीच कपडे शिवायला टाकायचे.  प्रत्येकाचे कापड घ्यायचे व कपडे शिवायला टाकायचे ठिकाण ठरलेलेच असायचे.  मी माझे कापड बाळाराम मार्केट मधून घेवून लक्ष्मी रोड वर असलेल्या चार्ली मध्ये शिवायला टाकायचो. वर्षाला ठराविक कपडे फक्त दिवाळीलाच मिळायचे. आत्ता सारखे कधीही जावून कपडे आणायची परवानगी व पर्वणीही नव्हती. आई मंडई मधून चुरमुरे व पुढे रविवार पेठेतून चिवडा तसेच इतर दिवाळी पदार्थ बनविण्यासाठी सामान आणायची. दिवाळी पदार्थ रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. आईच्या हातच्या पदार्थांचा एक वेगळाच स्वाद होता, मायेचा ओलावा होता. जेमतेम आर्थिक परिस्थिती आई सर्व खर्चाचे नियोजन कसे करायची तीच जाणे. दिवाळी पदार्थ बनवायला सुरुवात झाली की वाड्यातील प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा गंध यायला लागायचा. बायका घरात वासावरुन समजायच्या कोणाच्या कडे कोणता पदार्थ चालू आहे. बायका एकमेकींना मदतही करायच्या. दिवाळीच्या एखाद्या दुसर्‍या दिवस आधी नवीन कपडे आलेले असायचे. वाड्यात ते प्रत्येक घरात जावून दाखवायचा कार्यक्रम व्हायचा.  स्त्रियांची खरेदी व ती खरेदी एकमेकींना दाखविणे हा एक वेगळाच विषय, नव्हे वेगळे विश्व असायचे. वाड्यात विकायला आलेल्या विक्रेत्यापासून ते लक्ष्मी रोड वरील दुकानातील सेल् मधील खरेदी असा व्यापक विषय असायचा. फटाके  खरेदी हा पण स्वतंत्र विभाग असायचा. पुण्यात सारसबाग समोर फक्त फटाक्यांचे स्टॉल असायचे. फटाके सुद्धा ठराविक असायचे. लवंगी, पानपट्टी, मिरची,  नाग गोळी,  लक्ष्मी बॉम्ब,  सुतळी बॉम्ब,  चिमणी बॉम्ब, भुईनोळे , बाण यांचीच रेलचेल होती. टिकली रोल आणि पिस्तूल मिळाली तरी खूप भारी वाटायचे.  वाड्यात अभ्यंगस्नानासाठी पहाटेच नंबर लागायचे. पहाटे सर्वात पहिला फटाका कोण फोडतो यात शर्यत लागायची. थंडीने कुडकुडत असताना आई उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवाला व घरातील मोठ्यांना नमस्कार करून फटाके उडवायला पळायचे. किल्ला ही तोपर्यंत तयार असायचा. फटाके उडवून झाले की घरी फराळ व्हायचा. मग आम्ही दिवसभर किल्ला, क्रिकेट,  पत्ते असा धुडगूस घालायला मोकळे. दिवाळीचे सर्व दिवस त्या त्या दिवसाच्या महत्वाप्रमाणे उत्साहात साजरा केला जायचा. वाड्यात मग एकमेकांची फराळाची ताटे एकमेकांत फिरायची. त्यात बरीच टीकाटिप्पणी व्हायची. पण एक वेगळीच गंमत व आपुलकी त्यात असायची. वडीलधारी मंडळी देवाला जावून यायची. बायकांच्या उत्साहाला तर पारावार नसायचा. दिवाळीचा शेवट दिवसात मग उरलेल्या फटाक्यांचे भस्म बनवायचे प्रकार चालायचे. किल्ल्या मधील बुरुज बॉम्ब लावून उडवून दिले जायचे.  पुण्यातील सर्व पेठांमध्ये एकच लगबग व उत्साह असायचा. पाहुणे घरी असतील तर मग मुलांचा प्रचंड धुडगूस चालायचा. दिवाळीचे दिवस सरले की मग मन उदास व्हायचे. प्रत्येकजण हळूहळू आपापल्या कामाला लागायचा. पाहुणे त्यांच्यात्यांच्या गावाला रवाना व्हायचे. 

आता मोबाईल आले. आता कोणाकडे यायची जायची गरज नाही. सर्व फोन कॉल,  video कॉल नाहीतर whatsapp मेसेज वर होवून जाते. महागाचे फटाके उडवून सुद्धा आत्ता तशी मजा नाही,  नव्हे फटाक्यांना आता बंदीच आहे. फराळाची ताटे आता सोसायटी संस्कृतीत फिरत नाहीत. घरात वडिलधारे नाहीत,  नवरा बायको दोघे नोकरीला. आता सुट्टी मिळवायची हेच मोठे दिव्य. चितळे कडून अथवा ओळखीच्या बाईकडून पदार्थ विकत आणले म्हणजे झाले. कपड्यांचे नावीन्य नाही कारण आता येता जाता कधीही अथवा ऑनलाईन सुद्धा आपण कधीही खरेदी करत असतो. सर्वांकडे आता लक्ष्मी आहे पण लहानपणच्या जुन्या फोटोमधील लक्ष्मीची  प्रसन्नता आताच्या डिजिटल फोटो मध्ये जाणवत नाही. आठवणीतील पुण्याची  दिवाळी अजूनही मनांत घर करून आहे.

ले. – जितेंद्र भूस

संग्राहक – श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

“परमेश्वरही संकटाच्या वेळी कुणाला ना कुणाला आपल्यासाठी प्रसादच म्हणून पाठवत असतो, फक्त तो प्रसाद आपण व्यवस्थित ग्रहण करायला हवा. त्या प्रसादाची किंमत करता यायला हवी.”

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे. 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मुख्यत्वे माझ्या पिढीचा विचार करता ज्या चार ‘सुरांवर’ आमचं पोषण झालं, जगणं तेजोमय झालं त्यांविषयी चार दिवस जमेल तशा शब्दज्योती उजळवून दिवाळी साजरी करण्याचा हा माझा प्रयत्न! खरंतर, ह्या सुरांचं देणं कसं मुठीत पकडावं, कसं आकार-उकार-वेलांट्यांत सजवावं आणि कसं त्याला शब्दांच्या हवाली करावं !?… ती फक्त अनुभवायची गोष्ट! ती अनुभूतीच शब्दांत सजवायचा प्रयत्न करतेय.

टिपूर चांदणभरल्या आकाशाचं छत, चंदेरी अंधारात सजलेलं निबिडवन, तिथं मंदपणं खळाळता एक निर्झर, त्याच्या काठाशी वडवाईच्या पारावर भान हरपून बसलेलं असावं…. चढत्या निशेच्या साक्षीनं निर्झराचा खळाळ जेमतेम ऐकू येण्याइतपत मंद व्हावा…. ती गाज ऐकताऐकता अवचित उरात लाटा उसळून याव्या, मनाच्या तळातून अल्लद वरती येत काळजावर तरंगू लागलेल्या एकेक संवेदना जाणवाव्या… साचू लागलेल्या नेत्रतळ्यांना आपसूक पापण्यांचा बांध पडावा, बंद डबीत मोती डुगडुगावा तसे पापण्यांच्या आत जाणवणारे आसवमोती आणि एका क्षणी पापण्यांच्या काठावर देणेकरी होऊन आलेल्या अनावरपणाची रिती ओंजळ लयदारपणे झरणाऱ्या थेंबांनी भरून जावी….

विरत जावेत सभोवतीचे बंध, मन रितं होताहोता भरून येणारा श्वास जाणवावा आणि स्वत:ला त्या क्षणाच्या हवाली करत झाडाच्या बुंध्याशी अलगद मान टेकवावी…. उसळून येणाऱ्या भावतराण्यांसोबत अश्रूंचा सळसळता झंकार, निमिषांच्या अंतरांपाठोपाठ जाणिवांच्या थकलेपणासोबत शांतावत चाललेला लयहुंकार… क्षण लोपतालोपता जीव मालवतामालवता आपण निर्गुणाच्या कुशीत विसावावं आणि तो क्षण कमलपाकळीवरच्या दंवभरल्या मोत्यासारखा अथांगात ओघळून लुप्त होत जावा…!  हे…….. असं काहीसं………. नव्हे, अगदी असंच किशोरीताईंच्या सुरांचं देणं!

खऱ्या अर्थानं महान उत्तुंग व्यक्तिमत्वं ही परमेश्वरानं वेळ देऊन घडवूनच पृथ्वीतलावर पाठवलेली असतात. असंच एक स्वरशिल्प त्यानं एका स्वरसाधिकेच्या पोटी जन्माला घातलं आणि त्या स्वरशिल्पाची साधना उच्चतम पातळीवर सातत्यानं सुरू राहावी इतक्या विशाल त्याच्या ज्ञानकक्षा व्हायला हव्यात ह्याची जाण त्या मातृहृदयातही घातली. त्यामुळंच पंडिता मोगूबाई कुर्डीकर ह्यांनी स्वत: आचरत असलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम आपली लेक किशोरीताईंना दिल्यानंतर इतरही सर्व संगीत घराण्यांतील बारकावे त्यांना उमजावे आणि प्रत्येकातील उत्तम ते त्यांच्या गायनात उमटून त्यांची स्वत:ची एक संपन्न गानशैली निर्माण व्हावी ही जागरुकता दाखवली.

केवळ संगीतसमृद्धीची आस धरून स्वत:चा अहंभाव मधे येऊ न देता लेकीला इतर गुरूंकडंही शिकायला पाठवलं. मोगुबाईंचे स्वत:चे गुरू जयपूर-अत्रौली घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खॉं साहेब, आग्रा घराण्याचे उस्ताद अनवर हुसेन खॉं साहेब, पं. बाळकृष्णबुवा पर्वतकर, पं. मोहन पालेकर, शरदचंद्र आरोळकर, पंडिता अंजनीबाई मालपेकर अशा गुरुजनांकडून किशोईताईंना गायकीतली जाण व सौंदर्यदृष्टी लाभावी ह्या मोगुबाईंच्या विचाराचा परिपाक म्हणून आपल्याला गानसरस्वती किशोरीताई आमोणकर लाभल्या.

प्रत्येक राग हे एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, त्याला स्वत:चा असा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाला सूक्ष्म कंगोरेही असतात. ते समजून उमजून घेऊन आपण राग उभा केला पाहिजे अशा असामान्य विचारानं ताईंनी रागसंगीताची साधना केली. म्हणूनच त्यांचा प्रत्येक राग आपल्याला वेगळी अनुभूती देतो. शास्त्रीय संगीतासोबतच अनेक उपशास्त्रीय संगीतप्रकार, भावगीत, अभंग, भजन इ. कित्येक प्रकारांतूनही त्यांनी आपल्याला आनंद दिला आहे. मात्र कोणत्याही प्रकारात स्वत:शी तादात्म्य पावलेल्या त्यांच्या सुराचं आपल्या काळजाला हात घालणं चुकत नाही. ‘अवघा रंग एक झाला’ ह्या त्यांनी अजरामर केलेल्या रचनेतील शब्दांनुसारच अवघा रंग एक असल्याची अनुभूती त्यांचं कोणत्याही प्रकारचं गायन ऐकताना आपल्याला प्रत्येकच वेळी येत असते.

एकवेळ संतप्रभृतींच्या परमेश्वराविषयी असलेल्या भक्ती-प्रीतीभावावर लिहिता येईल, परमेश्वराला कधी भगवंत म्हणवत लेखणीतून भक्तिफुलांची ओंजळ वाहाता येईल तर कधी सखा म्हणवत त्याच्याभोवती लडिवाळ शृंगारपखरणही करता येईल. परंतू ताईंच्या भावस्वराचं काळीजभेदी, गगनचुंबी निर्गुण निराकारत्व कोणत्या शब्दांत पेलणार, असं त्यांचे अभंग, भजनं ऐकताना होऊन जातं. त्यांच्या सुराचं विश्व आभाळाच्याही पल्याड जाणारं! हाती येणं लांबच, ते डोळ्यांना तरी कसं दिसावं… आणि… कुठल्या आधारावर त्याला शब्दांत विणायला घ्यावं!?

सुराला परमेश्वर मानणारी जितकी अलौकिक दृष्टी त्यांच्याकडे होती तितकीच अलौकिक विचारधारा त्यांच्या स्वरार्थरमणी ह्या पुस्तकात दिसून येते.  आपलं मोठं भाग्य कि, जाणिवेतून नेणिवेकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे, अशाश्वताकडून शाश्वताकडे घेऊन जाणारा ताईंचा सूर आपल्याला अनुभवायला मिळाला!! ज्ञानेश्वर माऊलींच्या, `हृदया हृदय येक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।‘ ह्या शब्दरत्नांचा अर्थ ताईंचा सूर ऐकताना प्रकर्षाने उमगतो. प्रत्येकच रचनेतून आपल्या मनात गडदगहिरे भावतरंग उमटवणारा, ऐकणाऱ्याशी अद्वैत साधणारा असा किशोरीताईंचा सूर!! अपार साधना, अनंत शोधवाटा, अथक ध्यास,, अफाट मेहनत ह्यातून गवसलेलं असीम सृजन असं भावरंगांशी अद्वैत न साधतं तरच नवल! ताईंच्या अनंत सृजनावकाशाला वंदन करताना माझ्या दोन तोकड्या शब्दांचं समर्पण….    

मिल के बिछडे वह सूर नही ।  जगत को भूले परमेश कही!?

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बदलती दिवाळी…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ बदलती दिवाळी…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिराती टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते.आणि तर्‍हेतर्‍हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणी यांचे वास नाकाला येऊ लागतात!

दिवाळीची चाहूल तर लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या  तेल, वात घालून प्रज्वलित होऊ लागल्या! या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले! त्याचा प्रकाश मनभर पसरला! पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या!

आमच्या लहानपणी आता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पावित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी विठोबाच्या, दत्ताच्या देवळात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळायचं.. कोजागिरी पौर्णिमा आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे.बोचरी थंडी पहाटे अंगात शिरशिरी आणायची पण तो गारवा सुखद वाटायचा! घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की, बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या!

डबे घासणे, अनारसा पीठ करणे, चकली, कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे लवकर सुरू होत असत. दिवाळीची खरेदी फार मोठी नसे, तरीही खिशाचा परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडेसे फटाके आणले जात! कधीतरी घरासाठी म्हणून काही खरेदी असे. दिवाळीची वाट पाहिली जायची ती फराळासाठी! लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी या सगळ्याची सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे! आता फराळाचे पदार्थ बारा महिने मिळत असल्याने त्याचीं अपूर्वाई कमी झाली. दिवाळी अगदी उद्यावर आली की, दिवाळीचा पहिला फटाका कोण आणि किती वाजता लावणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत, कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा मी घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्‍यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे. त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे याची जोरदार चर्चा सुरू असे. मुली अंगणात रांगोळ्या काढून वेगवेगळ्या रंगाने सुशोभित करत असत. सगळे वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेली सुगंधी तेलं, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली!

आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठणे, तेल लावणे, गरम गरम पाण्याच्या आंघोळी करणे आणि सर्वांना ओवाळणे हा कार्यक्रम असे.त्यानंतर नवीन कपडे घालून देवदर्शन व नंतर फराळ असे. एकदा का दिवाळी सुरू झाली की दिवाळीचे चार दिवस फारच भरभर जात असत!

लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या काळात पाहुणे मंडळींची जा- ये असे. एकमेकांना फराळाची ताटे दिली जात. भेटवस्तूंची देवाण घेवाण होई. त्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण असे.

पण गेल्या पंधरा-वीस वर्षात दिवाळीने थोडे वेगळे स्वरूप घेतले असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले, त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. दिवाळीमध्ये काही बदलही झाले. यानिमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ, मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करीत असतात. दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकाची मेजवानी तर सुट्टीत मिळत आहेच. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले असले तरी दिवाळी आनंदमय आहे. रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग मुळे पणत्यांची शोभा कमी झाली.पण अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे,ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते. खरेदी बारा महिने होत असल्यामुळे दिवाळी खरेदी चे महत्व कमी झाले असले तरी सतत खरेदी करण्याचा उत्साह असलेला वर्ग आणि जे खरोखरच सणासाठी खरेदी करतात असा वर्ग बाजारात गर्दी करत आहे.

गेले एक-दीड वर्ष आपण सर्वजण करोनाच्या राक्षसाला तोंड देत होतो, त्यामुळे एकत्र येणे, सण साजरे करणे अवघड झाले होते.आता करोना चा प्रभाव जरी कमी झाला असला तरी अजूनही सर्वांनी काळजी घेणे आवश्यकच आहे. तरीही बाजारातली  गर्दी लोकांचा उत्साह वाढल्याचे दाखवून देत आहे.

रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. आनंदाचा कोणताही क्षण मनाची दिवाळी साजरी करत असतो! दिवाळी आता उंबरठ्यावर आली असताना माझ्या मनात ती उजळू लागली आहे. अशीच आपल्या सर्वांची दिवाळी आनंदमय जावो हीच सदिच्छा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

(देशातले ६९ पूल आज तिच्यामुळे उभे राहिलेत!) 

देशाची सर्वांगीण प्रगती अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे त्या देशातल्या सोयीसुविधा किती दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत! आजसुद्धा आपल्याकडे अनेक गावे अत्यंत दुर्गम आहेत. तेथे पोहोचायला वाहतुकीची साधने नाहीत, दळणवळणाच्या सुविधा नाहीत. देशात असूनही अशी ‘बेटे’ त्यांच्या दुर्गम स्थानामुळे प्रगतीपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर पूलांचे मोठे योगदान आहे. या पुलांनी गावे एकमेकांना ‘जोडण्याचे’ महत्त्वाचे काम केले आहे; अनेक गावांवरचा दुर्गमपणाचा शिक्का पुसायला मदत केली आहे.                      

शकुंतला भगत यांचे नाव आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल. त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर. भारतातल्या ६९ आणि जगभरातल्या २०० पुलांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी पूल बांधणीच्या क्षेत्रात केलेले काम आजही भल्याभल्यांना चकित करते. निवडलेल्या कामाची तीव्र आवड असेल तर कुठल्या कुठे पोहोचता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला भगत.                        

शकुंतला यांचा जन्म १९३३ मधला. त्या काळाचा विचार करता मुलीने इंजीनियर होणे ही खूपच मोठी गोष्ट होती. वडिलांनी शिकायला प्रोत्साहन दिले. शकुंतला जोशी म्हणून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलेल्या या मुलीने इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये त्वरित गती पकडली. तिचे वडील स्वतः एक उत्तम अभियंता होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले होते. ते विचारांनी इतके पुढारलेले होते की मुलीने आपले इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्न केले नसते तरी त्यांना चालणार होते. 

१९५३ मध्ये शकुंतला जोशी यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच व्हीजेटीआय या विख्यात संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर बनल्या. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी एका ठिकाणी फॅक्टरी ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. पण एकदा काम करत असताना छोटासा अपघात होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यावेळी त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुन्हा एकदा वडिलांनी त्यांना कणखर आधार दिला. त्यांनी त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी जर्मनीला पाठवले. जर्मनीहून त्या १९५७ मध्ये भारतात परतल्या.                    

त्यानंतर त्यांनी अजून एक धाडस केले ते म्हणजे प्रेमविवाह. काळाच्या कितीतरी पुढे जात त्यांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला. तोही इंजिनीअर नसलेला! अनिरुद्ध भगत यांचे स्वतःचे ऑटोमोबाईल गॅरेज होते. एवढी शिकलेली मुलगी एका गॅरेजमालकावर प्रेम करते हे कळल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. शकुंतला यांनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहात लग्न केले आणि संसारही निभावून नेला. अर्थात त्यासाठी अनिरुद्ध भगत यांची साथ मोलाची ठरली. भगत यांचे उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे शकुंतला यांनी आर्थिक जबाबदारीही स्वीकारली. त्यांनी १९५९ ते १९७० या काळात आयआयटी, मुंबई येथे सिव्हिल इंजीनियरिंगच्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली.                                      

या काळात त्यांनी मध्ये दोन वर्षांसाठी सब्बटिकल (प्राध्यापकांना शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाकडून मिळणारी भरपगारी रजा) घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया इथून मास्टर्स पूर्ण केले. पुढे १९७० मध्ये शकुंतला भगत यांनी आपले यजमान अनिरुद्ध भगत यांच्यासह क्वाड्रीकॉन नावाची पूल बांधणी करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीने वेगवेगळी रुंदी आणि विस्तार असलेले पूल अल्प खर्चात तयार केले. त्यासाठी त्यांनी प्री-फॅब्रिकेटेड(आधीच तयार करुन ठेवलेल्या) सुट्ट्या भागांचा वापर केला. तसेच हे भाग एकमेकांना जोडण्यासाठी बिजागऱ्यांसारख्या जोडणीचा वापर केल्यामुळे त्यासाठी कमी स्टील वापरावे लागे. अस्तित्वात असलेला एखादा पूल मोडकळीस आला असेल तर त्याला आधार देण्यासाठी त्यांनी टोएबल ब्रिज या नव्या प्रकारच्या पुलांचे डिझाईन तयार केले. हे पूल नादुरुस्त पुलांखाली वापरून मोडकळीस आलेल्या पुलावरूनदेखील अवजड वाहनांची वाहतूक करणे शक्य होऊ लागले.                            

हा काळ एकंदरच देशाच्या विकासाचा आणि भरभराटीचा होता. हिमालयालगतच्या प्रदेशात बांधल्या गेलेल्या पुलांमुळे त्या प्रदेशाचे चित्र पालटू लागले होते. इतके दिवस भौगोलिक दृष्टीने दुर्गम असलेले भाग क्वाड्रीकॉनने उत्तर आणि ईशान्य भारतात बांधलेल्या ६९ पुलांमुळे आज उर्वरित भारताशी जोडले गेले आहेत. याशिवाय युके, युएस, जर्मनी या देशांमध्येही त्यांनी पूल बांधले आहेत.                          

त्यांच्या मुलांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई नि वडील दोघांमध्येही प्रचंड इच्छाशक्ती होती. अगदी जेवायला बसल्यावरही त्यांच्यातल्या चर्चा कामाभोवतीच फिरत. कधी त्या चर्चांमधून वादही रंगायचे. पण एकदा का एक निर्णय झाला आणि तो कंपनीच्या हिताचा आहे यावर शिक्कामोर्तब झाले की वाद थांबे. मग जणू काही झालेच नाही अशा थाटात हे नवराबायको खेळीमेळीने संभाषण सुरू करत. आपण उभारलेली संस्था बहरावी म्हणून त्यांनी त्या काळात सर्व प्रकारचे धोके स्वीकारले, पण कंपनीची घोडदौड कायम ठेवली. जेव्हा त्यांच्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करायला सरकार किंवा खाजगी कंपन्या राजी नव्हत्या तेव्हा त्यांनी पैसा उभा करण्यासाठी स्वतःचे घर गहाण टाकले, दागदागिने विकले, पण स्वप्ने सत्यात उतरवून दाखवली. कधी एखाद्या साइटवर छोटासा जरी अपघात झाला तरी घरात सुतकी वातावरण असे. त्यांच्यासाठी त्यांची कंपनी घराइतकीच जवळची होती. पण म्हणून त्यांचे घराकडे दुर्लक्ष झाले नाही. उलट करिअरची एकेक शिखरे सर करत असताना शकुंतला यांनी कौटुंबिक आघाडीही तितक्याच ताकदीने सांभाळली. एवढे सगळे करूनही जर्मनीत असताना परिचित झालेल्या वेस्टर्न क्लासिकल सिंफनीज ऐकण्यासाठी त्या खास वेळ काढत.                             

त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना अतिशय पद्धतशीरपणे काम करताना पाहिलेले आहे. त्या काळात संगणक नसल्यामुळे वह्यांमध्ये आकडेमोड करणारी, एखादे डिझाईन मनासारखे उतरेपर्यंत वहीत रेखाटने करण्यात गढून गेलेली आई आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इतरांपेक्षा आपल्या आई नक्कीच वेगळी आहे, जिथे एकही स्त्री नाही अशा क्षेत्रात ती समर्थपणे पाय रोवून उभी आहे याचा अभिमान त्या मुलांना वाटला नाही तर नवलच! त्यांच्या फॅमिली पिकनिक्ससुद्धा बहुतेक वेळा कंस्ट्रक्शन साइटवरच असायच्या. त्यामुळे नकळतच मुलांवर कामाचे संस्कार झाले. मोठमोठ्या स्ट्रक्चर्समधील बारकावे, त्यांची तपशीलवार तपासणी याबद्दल मुलांना आई-वडिलांकडूनच शिकायला मिळाले.

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पुलांची बांधणी सगळ्यात अवघड मानली जाते. पण याच विषयाला हात घालत, त्याला आपलेसे करत शकुंतला भगत यांनी जी उभारणी केली आहे त्याला तोड नाही.                               

 

– स्मिता जोगळेकर

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ येत्या १० वर्षात हे बदल होतील ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ येत्या १० वर्षात हे बदल होतील ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

तज्ञांच्या अंदाजानुसार येत्या १० वर्षात हे बदल होतील —–

पूर्णवेळ कार्यालये पध्दत बंद होईल. त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील. फुड होम डिलिव्हरी वाढेल व रेस्टॉरंटचा धंदा ६०% कमी होईल, ब्युटीपार्लर ही घरपोच सेवा होईल. 

घरपोच ऑनलाईन हेल्थ सेवा देणाऱ्या कंपन्या निघतील व मोठी फी घेणारे डॉक्टर व टोलेजंग हॉस्पिटलचे दिवाळं निघेल. 

शिक्षण ऑनलाईन होईल. भव्य इमारती असणाऱ्या शिक्षण संस्था खंडहर बनतील. त्यामुळे बहुसंख्य शिक्षकांच्या नोकऱ्या जातील किंवा कित्येक महिने पगारच मिळणार नाहीत. 

कोचिंगची पध्दती पूर्ण बदलून ती ऑनलाईन होईल. प्रायव्हेट ट्यूटर व इन्स्ट्रक्टर यांचे काम खूप वाढेल. शॉर्ट व कमी खर्चातील व उपयोगी शिक्षणाला महत्व येईल. 

सर्व राजकीय प्रचार-प्रसार ऑनलाईनच असेल, रस्त्यावर भाषण, सभा, आंदोलने, मोर्चे इत्यादी मागास व खुळे समजले जातील. लोकांना उल्लू बनवायचा धंदा बंद होईल. 

बँकेचे सर्व व्यवहार मोबाईलवर होतील. तुम्हाला केव्हाही बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. मागास, सहकारी बँका पूर्ण बंद होतील. 

चित्रपट हे मल्टिप्लेक्समध्ये पाहणे खूप कमी होईल. नवीन चित्रपटसुध्दा ऑनलाईन रिलीज होतील. टीव्ही पाहणे कमी होऊन सर्वजण मोबाईलवरच पाहतील. त्यामुळे टीव्ही चॅनेल तोट्यात जाऊन बरीच चॅनेल बंद होतील.

जात, धर्म, वंश ह्या संकल्पना १५ वर्षात संपतील, पैसा व गुण ह्या आधारेच विवाह ठरतील. फक्त पैसे कमविणार्‍याचेच विवाह ठरतील.  बाकीचे वरातीत नाचायला व  मिरवणुकीलाच कामी येतील. 

नोकर्‍या हा प्रकार झपाट्याने कमी 0होईल, फक्त प्रोफेशनल असतील. ९०% कंपन्या आपली कामे आऊटसोर्स करतील, ह्या धंद्याला चांगले दिवस येतील. ९०% पेट्रोल, डिझेल गाड्या बंद होतील. इलेक्ट्रीक चार्जिंग गाड्या धावतील- तेही तातडीची गरज असेल तरच.

हे पुढील १५-२० वर्षात नक्कीच घडेल.  या आव्हानासाठी आपण तयार आहात का?

…………..

काळानुरूप स्वतः ला बदला… नाहीतर काळ तुम्हाला बदलवून टाकेल.

 

संग्राहक : सुनीत मुळे 

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

प्रकाश कुलकर्णी सरांनी यंदाच्या ‘नवरत्न’दिवाळी अंकाचा ‘दिवाळी कालची व आजची’हा विषय कळल्यानंतर मला माझं बालपण आठवल.

आम्ही लहान होतो तेव्हाची दिवाळी मला अजूनही आठवते. सहामाही परीक्षा संपली की आम्हाला दिवाळीची सुट्टी लागायची. त्याअगोदरच आम्ही आईबाबांच्या मागे लागायचो.चुलत भावडांना,मामाला भेटण्याची ओढ लागलेली असायची. माझ्या बाबांना तीनही भाऊच.अत्त्या नाही. चौघे चार ठिकाणी असल्याने चारही भाऊ मुलांच्या शाळेच्या सुट्टीत एकत्र जमून कुठेही एकिकडे आम्ही दिवाळी साजरी करायचो.आम्ही सर्व सख्खी चुलत भावंडे एकत्र जमायचो.मोठी धमाल असायची. आम्ही खूप गमतीजमती करायचो.रोज दुपारी पत्ते  खेळायचो. कुठलेच। काकाकाकू आम्हा भावंडामधे भेदभाव करत नव्हते. सर्वांना समान न्याय होता.

दिवाळी म्हटली की अजूनही आठवतं ते गारगार कडक थंडीत दात कडकड वाजत असतानाचं कुडकुडत पहाटे उठणं.घड्याळात रात्री झोपताना पहाटे साडेतीन/चारचा गजर लावलेला असायचा. तो झाला हळूच उठायचं आणि बाबांच्या किंवा मोठ्या बहीणभावाच्या सोबतीने अंधारात अंगणात लावलेल्या व पणत्यांच्या उजेडात घाबरत घाबरत जाऊन पहीला फटका लावायचा. तेव्हा आतासारखे गँसचे किंवा लाईट वरचे गिझर नव्हते. कोकणात तर सगळीकडेच नारळीपोफळीची झाडे खूप असतात. त्यामुळे त्यांच्या वाळलेल्या झावळी पडल्यावर त्या गोळा करून त्याच्याच तटक्या विणून त्यांनी शाकारलेल्या खोपीत उन्हाळ्यात लाकडे व झावळी तोडून लहान लहान तुकडे गोळा करून ठेवलेले असायचे. घराच्या मागच्या अंगणात एका कोपऱ्यात चुल बाराही महीने कायमच असायची. त्याजवळच पाण्याचा हौद व त्यालगतच मोठी न्हाणी असायची. चुलीवरच्या हंड्यात पाणी तापत असायच. प्रत्येक वेळी हंड्यात भर घालायची. चुलीत नीट विस्तव करायचा. तेल उटणं लावयचं आणि कुडकुडत पटापटा अंघोळी करायच्या एकमेकांच्या अंघोळीच्या वेळी प्रत्येकाने फटाके उडवायचे.आम्ही बहीणी पुढच्या अंगणात केलेल्या किल्ल्यावर मावळे मांडायचो. त्यापुढे शेणाने सारवलेल्या अंगणात ठिपक्यांच्या कागदाच्या मदतीने ठिपके काढून रांगोळी काढायचो.त्यात रंग भरायचे. तोपर्यंत उजाडायला लागायचे. मग फराळ करायचा. त्याबरोबरच दहीपोहेही असायचे.

हळूहळू काळ बदलला. मानवाच्या प्रगतीबरोबर जंगले,थंडी कमी झाली. आता पुर्वीसारखी थंडी पडत नाही. पहाटे उठणंही कमी झालं.ठिपक्यांची रांगोळी जाऊन संस्कारभारतीच्या रांगोळ्या आल्या. नोकरीच्या बदलेल्या स्वरुपामुळे रजा मिळणे कठीण झाले. त्यामुळे एकत्र येऊन सण साजरे केले जात नाहीत. पुर्वी एकमेकांना दिवाळीची भेटकार्ड पाठवली जायची. ती.बंद झाली. बायका दिवाळीचा फराळ करायला एकमेकांच्या घरी जमायच्या.एकमेकांना फराळाचे डबे ,ताटं द्यायच्या.फराळ ,भाऊबीजेची एकत्र जेवणं सगळंच कमी झालं माणसातलं प्रेम कमी झालं. बाजारात साचेबद्ध किल्ले मिळतात. अपार्टमेंट झाल्याने प्रत्येकाचा वेगळा आकाशकंदील आणि लाईटच्या माळा त्यामुळे इमारती झगमगतात.सर्व अपार्टमेंटची अंगणं गाड्यांच्या पार्किंगने भरून गेलेली असतात रांगोळीला जागाच नसते. फ्ल्याटच्या दाराशी काळ्या फर्शीवर  छोटीशी रांगोळी काढली जाते. त्यातही तयार रांगोळ्याहि अनेक प्रकारच्या बाजारात मिळतात.

एकुण काय पुर्वीच्या दिवाळीची मजा कमी झाली हेच खरं. आणि या दोन-तीन वर्षात पावसाळी पुर त्याबरोबरच आताचा हा कोरोना या नैसर्गिक संकटांमळे सगळं बदलून गेलं.या कोरोनामुळे तर सगळीकडेच वाहतूक व दुकाने बंद आहेत.घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

      आठवणी जागतात

       मन मोहून जातात

       बदलत्या जगासवे

       लागते बदलावे

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष.. भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

(बुजणारी तीच मी आता धीट झाले होते.) इथून पुढे —-

वेगवेगळ्या खेळांसाठी नावे घेणे निवड करून टीम तयार करणे सामान्यांच्या वेळी हजर राहून खेळाडूंच्या गरजा  अशी अनेक कामे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊनही आवडीने व चोखपणे केली. गोरे सरही जिमखान्यातील गरजा अडचणी याबद्दल सतत चौकशी करायचे. प्रत्येक  टीम खेळायला जाण्यापूर्वी मीटिंग घेऊन स दिच्छा देत व सल्लेही देत त्याचप्रमाणे  विद्यार्थिनी सल्लागार पिटके बाई मार्गदर्शन करीत असत आमच्या खो-खो कबड्डी अथलटिक्सच्या टीम बरोबर परगावी जाताना कधी पिटके बाई कधी  पोंक्षे बाई कधी उत्तरा जोशी बाई कोणी ना कोणी अगदी मोकळ्या मैत्रिणी सारख्या असायचा खेळाडूंचे खाणेपिणे लागले खुपले अगदी जातीने पहायच्या. शिपाई मारुती तात्या सदा यांनीही उत्तम सहकार्य केलं मी एल आर झाल्यानंतर मुलींची कबड्डी आणि ग्राउंड टेनिसची टीम प्रथमच सुरू झाली या संबंध वर्षात मी स्वतःही अनेक खेळात घेऊन कॉलेज पातळीवर बरीच बक्षिसे मिळविली आत्मप्रौढीचा दोष पत्करून सुद्धा सांगायला अभिमान वाटतो की उंच उडी मध्ये सांगली झोनला पहिला नंबर आला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या  पोर्च मधील बोर्डवर जेव्हा आपलंच नाव रंगीत अक्षरात पाहिलं आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला तेव्हा झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता जिमखाना डे म्हणजे आमचा मिरवण्याचा उत्साहाचा पर्वणी चा दिवस. बक्षीस समारंभाला कोणाला बोलवायचे याबाबत  प्रो. गोरे सर सर्वांची मते घ्यायचे व मिळून प्लॅनिंग करायचे.

कॉलेजचे गॅदरिंगही  धुमधडाक्यात  असायचे. त्यातील एक भाग सरप्राईज गिफ्ट असा असायचा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे सवयी कडे पाहून किरकोळ बक्षीस देत असत मी देहयष्टीने  खूप बारीक होते तरीही स्टॅमिना चांगला होता बऱ्याच खेळात खेळत होते मला नाव पुकारून स्टेजवर बोलावले गेले आणि डोंगरे बालामृत ची बाटली दिली हसत-हसत स्वीकारली सर्वजण खूप खूप हसले संपूर्ण वर्ष असच धामधुमीत गेलं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं शेवटचे दोन महिने जोरदार अभ्यास केला लॉजिक आणि सायकॉलॉजी विषय खूप आवडायचे इंग्रजीच्या नातू सरांनी शिकविलेली ॲनिमल फार्म कादंबरी अजूनही विसरलेली नाही मी प्राणीप्रेमी असल्याने त्यातील सर्व प्राणी अजूनही डोळ्यासमोर येतात याच वर्षात हौशी मुलींनी बसविलेली बायकात पुरुष लांबोडा या एकांकिकेत गणू या शिपायाची विनोदी भूमिका करण्याची संधी मिळाली खूप खूप मजा आली त्या वेळी. एस वायच वर्ष अविस्मरणीय कसं गेलं

टी वाय च्या वर्षाची सुरुवात झाली. आणि आता हे कॉलेज सोडून जाणार या विचारांनी एक प्रकारची रुखरुख लागून गेली आता आपल्याला मैदानी खेळ पुढील आयुष्यात कधीच खेळायला मिळणार नाहीत  म्हणून भरपूर खेळून घेतल आणि बक्षीसही मिळविली माझा स्पेशल विषय अर्थशास्त्र असल्याने तीनही वर्ष आंबर्डेकर सरांच्या शिकवण्याचा लाभ घेता आला विनोद करत टोमणे मारत हास्याचे फवारे उडवत अशी त्यांची शिकवण्याची हातोटी अजूनही स्मरणात आहे सरांच्या तासाला पुन्हा बसण्याची संधी मिळावी असं अजूनही वाटतं सरांचा तास कधी संपला कळायचे ही नाही त्यांचा तास मात्र कधीच चुकवला नाही इंग्रजीचे बर्ट्रांड रसेलचे निबंध खूप कठीण होते समजायला. माझी मैत्रीण जुल्फिकार नाईकवडीने मला खूपच छान समजाविले आणि म्हणून मी पेपर लिहू शकले.

कॉलेजच्या आठवणी किती सांगू तितक्या कमीच एकदा आम्ही मैत्रिणी लेडीजरुमच्या पूर्वीचे मागील पायऱ्यांवर खात बसलो होतो गप्पा चालू होत्या आपण कॉलेजच्या जुबिलीला जमू तेव्हा कशा दिसत असू ग केस पिकले असतील मुलं असतील संसार असतील नवरे बरोबर असतील एक एक मत ऐकता-ऐकता हसून हसून पुरेवाट झाली एकदा रेल्वेचा संप होता बस लवकर मिळेना एकदमच ठरलं चालत जायचं का आणि खरंच सात आठ जणी चालत चालत आलो दुसरे दिवशी पाय उचलवेनात अशी स्थिती झाली पण त्यातही एक  थ्रिल होत मजा आली पुढे गॅदरिंग ला आम्हाला वाऱ्यावरची वरात असा फिश्पोंड मिळाला मिरज सांगली पॅसेंजर गाडी म्हणजे उत्साहाचा खजिना तीन महिन्याचा पासला चार रुपये आणि बसला एक महिन्याला अकरा रुपये दहा रुपयांमध्ये वर्षाचा कॉलेजचा प्रवास खर्च व्हायचा त्यामुळे रेल्वेला खूपच गर्दी असायची थर्ड क्लास लेडीज डबा म्हणजे गाणी बजावणी विनोद चेष्टा मस्करी वर्गात शिकविलेल्या विषयांवर चर्चा वाद-विवाद ठेवलेली टोपण नावे मजा मजा असायची पावसाळ्यात कित्येकदा वह्या पुस्तके साडीच्या निऱ्या पद सांभाळत धूम ठोकून गाडी पकडावी लागायची कधीकधी इंजिन ड्रायव्हर शिट्टी वाजवून मुद्दाम गाडी सुरू करत आणि थोडी पुढे नेऊन पुन्हा थांबवत असत. तेही विद्यार्थ्यांबरोबर एंजॉय करत असायचे.

विलिंग्डन मधील चार वर्षांचा काळ (१९६५–६६. ते १९६८–६९) हा झुळुझुळु वाहणाऱ्या निर्मळ कारंज्याचे तुषार झेलत कसा गेला कळलंही नाही कन्या शाळेतून बाहेर पडलेल्या लाजऱ्या बुजऱ्या मला कॉलेजनी बनवलं भरभरून शिकायला मिळालं अनेक अनुभव मिळाले यशाच्या आनंदा प्रमाणे कशालाही कसं तोंड द्यायचं हेही शिकविलं. अजूनही कधीतरी तीव्रतेने वाटत की कॉलेजमध्ये जाव त्या त्या वर्गात जाऊन बसावं ठराविक विषय त्या-त्या सरांनी शिकवावेत गप्पा माराव्यात खेळाव  स्टडीडीमध्ये बसून अभ्यास करावा रेल्वेची   न्यारी गंमत अनुभवावी निदान पुढील जन्मी तरी ते सत्यात उतरावं या चार वर्षांच्या छोट्याशा प्रवासात कोण कुठून आलं कसं आलं माहित नाही पण या प्रवासाच्या सूत्रातून आम्हा मैत्रिणींना  सख्यांना  शिक्षकांना एकत्र आणून सच्चिदानंद देण्याचच सृष्टीकर्त्याच  प्रयोजन असावं. या मुशाफिरीतील काही सहप्रवासी. काळाच्या पडद्याआड गेले काही अधूनमधून भेटतात कॉलेजच्या आठवणी गप्पा होतात अत्यानंद होतो काहीवेळ कॉलेजच्या वातावरणात गेल्याचा भास होतो. आणि मन प्रसन्न होत. आजही आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो,” आमचं शिक्षण  विलिंग्डन मध्ये झालंय”

समाप्त 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

( पूर्वाश्रमीची पुष्पा व्यंकटेश रिसबूड )

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष.. भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नुकतीच सकाळ’मधे बातमी वाचली की विलिंग्डन कॉलेजला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत .तोंडून आपोआप उद्गार आले ” अरे वा, आमचं कॉलेज शंभर वर्षांचं झालं” असं म्हणत असताना मी आमच्या कॉलेजचा इतिहास आणि माझ्या कॉलेज जीवनाच्या चार वर्षांच्या भूतकाळात रममाण झाले.

दक्षिणा महाराष्ट्रात त्यावेळी उच्च शिक्षणाची सोय नव्हती. डी. ई. सोसायटीच्या कार्यकर्त्यांच्या मनात दक्षिण महाराष्ट्रात एखादे महाविद्यालय काढावे असा विचार आला शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्यात जागृती निर्माण होणार नाही असा एक विचार होता सांगली मिरजेच्या परिसराची पाहणी करून सर्व दृष्टीने योग्य असा निर्णय घेण्यात आला

महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी त्यावेळेचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्याकडे मंडळी गेली आणि विलिंग्डन यांनी अपेक्षेबाहेर मदत केली. अनेकांचा विरोध दूर करून महाविद्यालयाचा मार्ग मोकळा केला. तत्कालीन परिस्थिती त्यांच्या मदतीशिवाय हे महाविद्यालय निघणे शक्य नव्हते. म्हणून त्यांचेच नाव या महाविद्यालयाला देण्याचा निर्णय डी. ई. सोसायटी ने घेतला.२२जून१९१९ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू  सर चिमणलाल  सेटलवाड यांच्या हस्ते विलिंग्डन महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी उच्चारलेली  वाणी पूर्णांशाने खरी ठरली आहे. ते म्हणाले‌‌.‌ It is a great day for the southern  maratha country, for today this part of the country views the  birth of an institution, which has a great future and which will play an important part in the educational and political progress of the  southern maratha country.

१९६५साली मी मिरजच्या जुबिली कन्या शाळेतून अकरावी मॅट्रिक पास होऊन, प्री. डिग्री आर्ट्सला प्रवेश घेतला. साध्या कन्या शाळेतून एकदम एका भारदस्त, प्रतिष्ठित,नामांकित, अलौकिक आणि इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये येताना थोडं काय, पण खूपच  गांगरायला  झालं. आमचा पी. डी .आर्ट्सचा ,सहा नंबरचा, मोठा वर्ग पूर्ण भरलेला असायचा. दोन लेक्चर्स मधील दहा मिनिटे म्हणजे धमाल असायची. कागदी बाण फेकण काय ,टोमणे मारणे काय, टोपण नावाने चेष्टा करणं काय, सगळाच गोंधळ असायचा. लेडीज रूमपासून वर्गापर्यंत किंवा रेल्वे स्टेशन पर्यंत आम्ही एकटी दुकटी कधीच जात नव्हतो. कायम ग्रुपनेच जायचो. कधी मुलांची बोलणं तर दूरच ,पण उगीचच एक भीती आणि संकोच मनात वाटायचा.

प्री.डिग्रीला असताना असणारे सरांचा भूगोलाचा तास खूप आवडायचा कारण तो माझा आवडीचा विषय होता आणि त्यात सर्वोच्च मार्गही मिळाले होते.  प्रिन्सिपल  मुगळी सरांनी शिकविलेली डफोडिल्स कविता अजूनही आठवते.

डफोडिल्सच्या  लाटांप्रमाणे ते स्वताही  डोलायचे. इंग्रजीचे खळदकर सरांची सुपरफास्ट गाडी वर्गात आल्यापासून सुरू व्हायची. संपल्यानंतरच थांबायची. आम्हा मराठी माध्यमातून आलेल्यांना.  सुरुवातीला ते डोक्यावरून जायचं. हळू हळू सवय झाली. आणि मग आवडायला लागलं.

त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने एन.सी.सी.  स्पोर्टस्  किंवा पी.टी. यापैकी एका प्रकारात भाग घेणे सक्तीचे असायचे. मला खेळाची आवड व अनुभव असून सुद्धा संकोच आणि बुजरेपणा मुळे खेळात न जाता एन सी सी मध्ये भाग घेतला निपाणीजवळ अर्जुन नगरच्या दहा दिवसाच्या  कंपने  खूप काही शिकविले . दहा दिवस कडक परेड फायरिंग रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम हार्ड वर्क अनेक ओळखी जमवून घेण्याची वृत्ती आणि शेवटच्या दिवशीचा कंप फायर सगळा खूप छान अनुभव मिळाला. त्याचा पुढील आयुष्यातही उपयोग झाला.

प्रि डिग्री पास होऊन एफ वाय बी ए ला प्रवेश घेतला. आता बुजणे अनेक भीती थोडी कमी झाली. थोडा आत्मविश्वास आला. माझी खेळातील मैत्रीण शीलकरमरकरने खो-खो  सिलेक्शनसाठी माझं नाव दिलं. स्वत‌ःचा  स्पोर्ट्स ड्रेस घालायला लावून मला ग्राउंड वर घेऊनच गेली .एक दीड वर्ष खेळाची सवय मोडली होती. पण तरीही खो-खोच्या टीम मध्ये मी निवडले गेले आणि पुढील सामान्यांसाठी सराव सुरू झाला. मला मोठ्या कौतुकानं सांगावसं वाटतं की त्यावेळी विलिंग्डनची  बहुतेक प्रत्येक टीम सांगली दोन ला चॅम्पियन असायची. आता माझ्यातला संकोच भीती बुजरे पणा कमी झाला होता. शाळा सोडल्यानंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.खेळाची ओढ मुळात होतीच. ती आता जास्तच वाढली अभ्यासात कधी फर्स्ट क्लास वगैरे मिळाला नाही कुठे गच्चूही खाल्ला नाही. पांडवप्रताप नावाच्या विनोदी एकांकिकेसाठी विचारणा झाली आणि मी पटकन होकार दिला द्रौपदीची छोटीशी भूमिका पार पाडण्याची संधी आणि अभिनयाचा छान अनुभव मिळाला.

एस वाय बी ए ला प्रवेश घेतला संपूर्ण वर्ष खूपच धामधुमीत गेल. जिमखाना मॅनेजिंग कमिटीच्या निवडणुकीत जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर म्हणून मी निवडून आले आवडीचे आणि मानाचे स्थान मिळाले खूप खूप आनंद झाला त्याच बरोबर बऱ्याच जबाबदाऱ्याही आल्या.  बुजणारी तीच मी आता  धीट झाले होते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुझी जात कुठली? ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ तुझी जात कुठली? ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

त्याने तिला विचारलं —

“तुझी जात कुठली?”

तिने उलट त्यालाच विचारलं —

एक आई म्हणून, की एक स्त्री म्हणून  ?

तो म्हणाला ठीक आहे, दोन्ही म्हणजे — आई आणि स्त्री म्हणून सांग. 

तिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले —

“स्त्री” जेव्हा ‘आई’ होते तेव्हा ती जातीहीन असते. 

तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन

विचारता झाला  “ते कसं काय? “

ती म्हणाली जेव्हा एक आई आपल्या बाळाचं संगोपन करत असते,ती त्याची शी-शु साफ करत असते, तेव्हा ती “शूद्र” जातीची असते.

बाळ जसजसं मोठं होत जातं, तेव्हा आई नकारात्मक गोष्टी आणि अपप्रवृत्तींपासून त्याची रक्षा करते, तेव्हा ती “क्षत्रिय” होते…

जेव्हा मूल आणिक मोठं होत जातं, तेव्हा आई त्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवित असते; तेव्हा ती “ब्राम्हण” जातीची असते…

आणि शेवटी मुलगा शिकून मोठा होतो, कमावू लागतो, तेव्हा तीच आई त्याच्या मिळकत आणि खर्च ह्या विषयी योग्य ते मार्गदर्शन करुन, जमा – खर्चाचा ताळ- मेळ ठिक करते तेव्हा ती आपला ‘वैश्य धर्म ‘ निभावते…

तर मी काय म्हणते, ते योग्य आहे ना की स्त्री  ‘जाती हीन’ असते. “

हे तिचे उत्तर ऐकून तो “अवाक” झाला. त्याच्या डोळ्यात तिच्या व समस्त स्त्रीयांविषयी आदरयुक्त भावना चमकली, आणि तिला एक आई आणि स्री होण्याचा अभिमान असलेला दिसून आला.

स्त्री आहे म्हणून आपण आहोत.. ती नसती तर आपण नसतो. सर्वांनी हा विचार केला पाहिजे ती कुणाची आई असते, कुणाची बहीण, कुणाची बायको तर कुणाची मुलगी—-

प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे.

 

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares