मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

Instant Gratification – संयम हरवलेल मन

काल एका देवळाच्या रांगेत दर्शनाला भाविक उभे होते, तेव्हा एक माणूस रांगेत पुढे उभारण्यासाठी व लगेच दर्शन घेण्यासाठी वाद घालत होता, हे पाहून हे लक्षात आले की आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात.

आज, आता, ताबडतोब!

 

जेवण हवं तर instant noodles.

मनोरंजन हवं तर ३० सेकंदाची reel.

खरेदी हवी तर one day delivery.

खेळ हवा आहे तर झटपट निकाल.

आणि यशही हवं ते overnight success!

 

थांबणं, वाट पाहणं, एखादी गोष्ट हळूहळू घडू देणं —

ही सवय जणू आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवत चालली आहे.

 

मानसशास्त्रात यालाच म्हणतात Instant Gratification —

म्हणजे ताबडतोब सुख मिळवण्याची सवय.

 

रस्त्यावर सिग्नल लागतो. तीस सेकंदही झाले नसतात आणि मागून हॉर्न वाजायला सुरुवात होते. जणू त्या तीस सेकंदांवरच आयुष्याचं भविष्य ठरणार आहे.

 

इंटरनेट थोडं slow झालं की चिडचिड. फूड डिलिव्हरी दहा मिनिटं उशिरा आली की राग.

 

आजचं मन जणू एका विचित्र मोडमध्ये जगत आहे —

“आत्ता… लगेच… instant. ”

 

या सवयीचा परिणाम फक्त आपल्या वागण्यात दिसतो, पण तो आपल्या मेंदूतुन आणि मनातून तयार होतो.

 

जेव्हा आपल्याला लगेच आनंद मिळतो — मोबाईल notification, reel, likes, instant fast food — तेव्हा मेंदूमध्ये dopamine नावाचं रसायन वाढतं. हे dopamine मेंदूला सांगतं — “हे पुन्हा कर… यात मजा आहे. ” म्हणून आपण पुन्हा मोबाईल उघडतो, पुन्हा reels पाहतो, पुन्हा पटकन आनंद देणाऱ्या गोष्टी करतो.

हळूहळू मेंदूला सवय लागते जलद आनंदाची.

मग जे काम वेळ घेणारं आहे — अभ्यास, व्यायाम, नातं टिकवणं, करिअर घडवणं — त्यात मन टिकत नाही. कारण तिथे instant reward नसतो.

 

एका अर्थाने आजचा मेंदू जणू reel-training सारखा क्षणिक आनंदाचा गुलाम झाला आहे.

३० सेकंदात excitement.

 

पण आयुष्य reel नसतं…

तो full चित्रपट असतो.

आणि समजायला, जगायला, अनुभवायला

फक्त संयम लागतो.

मनशांतीचा उगमही संयमातून होतो.

अधीर मन धारदार असतं. टोचणारं, बोचणारं आणि मानसिक समाधानाचे तुकडे करणारं.

 

एका रोपट्याला झाड व्हायला वर्षं लागतात. पण आपण रोज मुळं उपटून पाहिलं — “वाढलं का? ” तर ते झाड कधीच वाढणार नाही.

 

पण आज आपण आयुष्याबरोबरही हेच करत आहोत.

 

थोडा संघर्ष आला की हार.

थोडं नातं कठीण झालं की दूर.

थोडा वेळ लागला की निराशा.

 

कारण मनाला संयमाची सवय उरलेली नाही.

 

खरं तर आयुष्यातील मोठ्या गोष्टी instant मिळत नाहीत. विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. नातं मजबूत व्हायला वेळ लागतो. यश घडायला वर्षं लागतात.

 

आजच्या जगात वेग सगळ्यांकडे आहे. पण संयम फार थोड्यांकडे आहे. जग फास्ट झालंय, असं सर्वांना वाटतंय, पण पृथ्वी त्याच संयमी वेगाने फिरतेय. निसर्गचक्र तसेच आहे. माणसाने मोहाच्या पाठी गती बदलली आहे बस!

 

संयमी राहणं ही अचानक येणारी गोष्ट नाही; ती हळूहळू तयार होणारी सवय आहे. कधी कधी उतावळेपणा वाटला तर थोडा विराम घ्यायला शिका. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा — कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. मोबाईलपासून कधी कधी थोडं अंतर ठेवा — कारण instant आनंदाची सर्वात मोठी सवय आज मोबाईल लावतो.

 

कारण संयम म्हणजे फक्त थांबणं नाही…

तर योग्य वेळी गोष्टी होतील यावर विश्वास ठेवून थांबणं आहे.

 

संत होणं कदाचित कठीण असेल…

पण संयमाने शांत राहणं ही प्रत्येकाला शिकता येणारी कला आहे.

 

कारण आयुष्यात झाडावरील आनंदाची फुलं instant फुलत नाहीत तर ती

संयमानेच फुलतात आणि समाधान, आत्मशांतीचा सुगंध सर्वत्र वाटतात.

 

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ – ही जवळची माणसे…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? क्षण सृजनचा ?

☆– ही जवळची माणसे… – ☆ ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

काही योगायोग असतात… १४ मार्च… कविवर्य सुरेश भट साहेबांचा स्मृतीदिन…

एक महिन्यापूर्वी भट साहेबांची चारोळी वाचायला मिळाली होती – –

रोज छळतात ही

जवळची माणसे

जन्म गिळतात ही

जवळची माणसे

तेव्हा लहान तोंडी मोठा घास म्हणून त्याचा विस्तार म्हणून तीन चार कडवी तेव्हा लिहून झाली पण रचना आज म्हणजे १४ मार्चला पूर्ण झाली…

… रचना पूर्ण झाल्यानंतर लक्षात आले की १४ मार्च हा भटसाहेबांचा स्मृतीदिन!

हीच ती रचना – – (… ळतात हा शब्द एकत्रित आणण्याचा आणि त्यातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न)

☆ ही जवळची माणसे.. ☆

रोज छळतात ही

जवळची माणसे

जन्म गिळतात ही

जवळची माणसे…

*

अडचणीला पळतात ही

जवळची माणसे

आपले परके कळतात ही

जवळची माणसे…

*

सुखामध्ये लोळतात ही

जवळची माणसे

दुःखामध्ये गळतात ही

जवळची माणसे…

*

निकडीला कळतात ही

जवळची माणसे

दुज्यांना फळतात ही

जवळची माणसे…

*

समृद्धीला जळतात ही

जवळची माणसे

कडकीला वळतात ही

जवळची माणसे…

*

नकोशांशी जुळतात ही

जवळची माणसे

कृतघ्नते उसळतात ही

जवळची माणसे…

*

दुराव्यात रूळतात ही

जवळची माणसे

कटाक्षात वळतात ही

जवळची माणसे…

*

भावनांशी खेळतात ही

जवळची माणसे

अंतर्मनात मळतात ही

जवळची माणसे…

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “नेमक्या कोणत्या थकीत कर्ज खात्यांमध्ये मी वसुलीसाठी आवश्यक तो पाठपुरावा योग्य पध्दतीने केलेला नाही हे त्यांनी निदर्शनास आणून द्यायला नको कां? सरसकट आरोप करून ते समाधानकारक स्पष्टीकरणाची अपेक्षाच कशी करू शकतात सर? ‘अकोला ब्रँचचा मी चार्ज घेण्यापूर्वीची तिथल्या गलथान कारभाराची नेमकी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू कां? ‘ असं तेव्हा मी विचारलं होतं ना सर, ते यासाठीच.. ” मी म्हंटलं.

“तुम्ही जे कांही सांगणार होतात ते मला जरूर सांगा. पण या सगळ्याचं विनाकारण दडपण नका घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना? ” वखरेसाहेब म्हणाले.

वखरेसाहेबांच्या या शब्दांमधून जणू ‘तो’च मला आश्वस्त करतो आहे असंच वाटत राहिलं…!

पण पुढे घटनाच अशा घडत गेल्या की कांहीतरी विपरीत होणार असल्याच्या आशंकेने माझं मन सैरभैर होऊ लागलं..! )

इथून स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठीचे अर्ज फाॅरवर्ड झाले त्याला चारसहा दिवस उलटून गेले होते. त्या अर्जांची छाननी करून अर्ज स्वीकृती, अस्वीकृती किंवा त्यांचे प्रलंबन याबाबतचे निर्णय सेंट्रल आॅफिसमधील संबंधित डिपार्टमेंटने तात्काळ म्हणजे ३१ डिसेंबर अखेर कोणत्याही परिस्थितीत घ्यायचे होते. तसे सख्त आदेश एम. डी. आॅफीस कडून त्यांना देण्यात आले होतेच. त्यानुसार तिथे युध्दपातळीवर सर्व कामे सुरूही झाली होती. त्यामुळे रोजच्या इनवर्ड मेलमधे पुणे रिजनमधील स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची मंजूरीपत्रे रोज टप्प्याटप्याने येऊही लागली होती. अर्थात नाॅर्मल रूटीनमधे मलाही अर्ज स्वीकारल्याचं पत्र अपेक्षित होतंच. तरीही अकोला ब्रॅंचमधील थकीत कर्ज खात्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नामुळे जो अडसर निर्माण व्हायची शक्यता होती त्यामुळे फार तर चार दोन दिवस उशीरा मंजुरीपत्र येऊ शकेल असं मला वाटलं होतं. पण झालं भलतंच. मी नागपूर रिजनल आॅफीसला पाठवलेल्या सविस्तर उत्तरानंतर मला त्यांच्याकडून खरंतर पुढे कसलीही विचारणा किंवा अधिक स्पष्टीकरणाची मागणी आलेली नव्हती. तरीही एकेक दिवस उलटत चालला पण या बाबतीतली माझी प्रतीक्षा मात्र संपली नाहीच. वखरेसाहेब गेले चार दिवस ब्रॅंचेस् व्हिजीटच्या पूर्वनियोजित टूरवर होते त्यामुळे नेमकं काय करावं मला सुचेना. वाट पहाण्याशिवाय पर्यायच नव्हता. तो टूर प्रोग्राम संपवून साहेब आॅफिसला आले ते ३० डिसेंबरला. त्यांच्या अनुपस्थितीतल्या महत्त्वाच्या पेंडिंग मॅटर्सचा निपटारा करण्यात दिवसभर ते पूर्णत: व्यस्तच होते त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती.

एकदा वाटलं त्याना भेटावं आणि सांगावं सगळं. निदान मनातली चलबिचल तरी कमी होईल. पण मलाच ते योग्य वाटेना. ते टूरवरून दमून आले होते. पुन्हा दिवसभर कामांचं दडपण. ते चिडले नक्कीच नसते पण तरीही..? माझ्या समोरचा प्रश्न माझ्या जीवनमरणाचा नाहीये हे मी स्वत:ला समजावलं आणि मनातले ते उलटसुलट विचार झटकून टाकले. ३० डिसेंबरचा दिवस असाच कोरडेपणाने उलटूनही गेला!

३१ डिसेंबर २००० चा दिवस उजाडला. त्यादिवशीही इनवर्ड मेलमधे माझ्यासाठी कांहीच नव्हतं!

अखेर परतीचे दोर असे पूर्णत: कापलेच गेले होते. आता यापुढे अधांतरी लटकत नाही रहायचं. जे समोर आलंय ते आहे तसं स्वीकारून पुढं जायचं आणि तेच आपल्या हिताचं असणाराय असा विचार केला आणि मन एकदम शांत झालं. आता माझा अर्ज प्रलंबित तरी रहाणार किंवा थेट नाकारला तरी जाणार हे जवळजवळ ठरल्यातच जमा होतं. यापैकी कांहीही झालं तरी ते माझ्यावर अन्याय करणारंच होतं. तरीही त्यानंतर नेमकं जे कांही होईल त्यानुसार तेव्हा काय करायचं करायचं ते वखरेसाहेबांशी बोलून ठरवता येईल असा विचार केला. वखरेसाहेबांची अशी आठवण झाली आणि सकाळपासून आपण त्यांना भेटलोच नव्हतो हेही लक्षात आलं. आज अर्जमंजूरीचा अखेरचा दिवस. त्यांना माझ्याबाबतीतल्या या अडचणीची पूर्वकल्पना असूनही त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत त्याबाबत कांहीच केलं नाहीय यामागेही कांहीतरी कारण असणारच ना? त्यांच्यामागेही इतर अनेक व्यवधानं होती त्यात ते हा विषय विसरलेही असतील कदाचित. कांहीही असो पण जे व्हायचं ते आता होऊन गेलंय. आमचा लंचब्रेक झाला. मी सोबत आणलेला माझा डबा उघडला. तोंडात घास घेताना हात अडखळला. आपला इथला अन्नाचा शेर अद्याप संपलेला नाहीय असा विचार मनात आला न् मग माझं मलाच हसू आलं. आपण किती वरवरचा विचार करत असतो असंच वाटत राहीलं. जे कांही घडणार आहे ते तोच घडवणार आहे, मग आपला अन्नाचा शेर कुठं आणि किती दिवस हे ठरवणारे आपण कोण?

माझं खाणं आवरलं. शिपायाने सर्व्ह केलेला चहा घेऊन मी माझ्या टेबलावरची पुढची फाईल समोर ओढली तेव्हाच इंटरकाॅमची रिंग वाजली. फोन रिसेप्शनिस्टचा होता. ‘जस्ट अ मिनिट’ म्हणत तिने तो बंद केला. कदाचित वखरेसाहेबांनी आपल्याला बोलावलं तर नसेल? असंही वाटून गेलं पण ते तेवढंच. कारण माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजूरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच तर टाकले होते! पण.. ते खोटं ठरवणारं, अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातंय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती!

आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.

मी केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं.

“काॅंग्रच्युलेशन्स अॅण्ड आॅल द व्हेरी बेस्ट.. ” ते म्हणाले.

त्यांचे प्रसन्नचित्ताने मला अशा शुभेच्छा देणं माझ्यासाठी त्याक्षणी वास्तव नव्हे तर स्वप्नवतच वाटत राहिलं.

“बसा.. ” ते म्हणाले.

“यू आर् व्हेरी लकी मिस्टर लिमये. गेम वाॅज व्हेरी टफ. बट यू हॅव वन इट.. “

” म्हणजे..? ” मी न समजून विचारले.

“मिस्टर श्रीवास्तव, अवर नागपूर रिजनल मॅनेजर वाॅज नाॅट रेडी टू गीव्ह क्लीनचीट टू यू. तुमच्या Voluntary retirement साठी it was a big obstacle.. ” ते म्हणाले.

पण मग हा तिढा असा अचानक सुटला कसा हेच मला समजेना.

” तुम्ही नका दडपण घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना..? ” कांही दिवसांपूर्वीचे मला आश्वस्त करणारे वखरे साहेबांचे शब्द मला आठवले. ते केवळ माझी समजूत घालण्यासाठी बोललेले वरवरचे शब्द नव्हते याची ग्वाही आज दिवसभरात काय घडलं ते त्यांच्याकडून ऐकताना मला प्रत्येक क्षणी जाणवत होतं!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्नेहलता गाडगीळ ☆

स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्नेहलता गाडगीळ ☆

वेळेवर उठण्यापासून वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..

बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्ली पासुन दिल्ली पर्यंत सगळ्या विषयावर खाडखाड बोलु शकतो…

त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजुनच वाढतो.

बारकाईने विचार करा…

साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण भात भाजी पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्ना बद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…

 

या भाजीत हे व्हिटामीन..

पोळीत एवढ्या कॅलरी..

सॅलड पाहीजेच..

गोड नको रे बाबा…

हे तेल असं ते तेल तसं…

१०००० पावलं चाललंच पाहिजे..

 

फलाणं आणि बिस्तानं…

अरे दोन घास ताटात आलेत ते खायचे नाही नीट आणि शंभर नाटकं…

 

शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… हे सुत्रं नाहीच हल्ली…

 

प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचय… तरुणच रहायचय… तरुणच दिसायचय… कशासाठी…???

तरुण मुलांना दिसु द्या कि तरुण.. तुमचं तरुणपण झालय ना जगुन… आपण काय अश्वत्थामा आहोत का??? पृथ्वीवरच कायम रहायला..

 

Accept the reality… and live your life happily.

 

मी एक अति छोटी व्यक्ती आहे

जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही..

असं रोज स्वतःला सांगितलं तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.

 

फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…

 

काही दिवसांपूर्वी मी असंच खुप ज्ञानाचा विस्तार केला होता… माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं कि या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय 

मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केल्या आणि आता खुssss प बरं वाटतय..

 

आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करतो… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सुत्रं आहे सध्या…

 

तुम्हाला एक गंमत सांगतो…

नविन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…

राहु खराब… केतु खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…

म्हटलं हे ऐकुन वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा…

 कृष्णार्पण म्हटलं आणि दिलं सोडुन…

 

आता मस्त वाटतंय..

 

रोजचं जेवण… रोजची झोप.. रोजची आवराआवर… रोजचं रुटीन याचा ताण घेऊ नका…

तुमच्या सोयीने ते करा… आणि मनापासुन केलेलं कधीही अपाय करत नाही… त्याचा उपयोग चांगलाच होतो..

 

घेऊ नका ताण आणि जगणं करा छान..

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निरोप… ☆ त्रिशला शहा ☆

त्रिशला शहा

??

☆ निरोप… ☆ त्रिशला शहा 

“निरोप कसला माझा घेता

जेथे राघव तेथे सीता”

… गीतरामायणातील अतिशय ह्रद्य असे, श्रीराम वनवासात जाताना आपल्या प्रियेचा निरोप घ्यायला सीतेच्या कक्षात येतात तेव्हा सीतेच्या तोंडी असलेले हे गाणे.

 निरोप, एक साधा तीन अक्षरी शब्द, पण या एकाच शब्दामध्ये अनेक भावभावनांचा कल्लोळ दाटलेला असतो. एक प्रकारची हुरहुर, करुणा, वैषम्य, स्नेह, आनंद मनात साकारत असते. निरोप देणे म्हणजे नव्याचे स्वागत करणेही असते म्हणूनच काही वेळा निरोप देणे म्हणजे आनंद साजरा करणे असते.

 आत्ताच पहा नं, आपण सरत्या वर्षाला निरोप देतोय आणि नविन वर्षाचे स्वागत करतोय. हा अतिशय आनंदाचा क्षण कारण फाल्गुन अमावस्येचा अंधार संपून चैत्राची नवी पहाट येते तेव्हा गुढ्या तोरणे उभ्या करुन आनंदोत्सव साजरा करतो.

 तीस-पस्तीस वर्षे नोकरी करुन योग्य वयात सेवानिवृत्ती घेताना निरोप समारंभ होतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतः साठी जगण्याची ही एक संधीच असते. घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना परत या असा आग्रहही असतो. एकाद्या सुंदरशा समारंभाचा शेवट आभार मानून करताना त्या समारंभाच्या यजमानांचा निरोप घेऊन आपण घरी परततो. लग्नात मुलीला सासरी पाठवताना तिला निरोप देताना घरच्या सगळ्यांना च भावना आवरता येत नाहीत. मुलीचे मनही कातर होतेच, हे जरी आनंदाश्रू असले तरी त्यातील निरोपाची भावना मनाला हुरहुर वाटणारीचं असते.

 सहलीला जाताना मन अगदी आनंदाने भरून येते पण परतीचा प्रवास कधीतरी सुरु करावाच लागतो मग त्या उधाणलेल्या लाटा असोत, दरीडोंगर असोत किंवा एखादी मस्त बाग असो, निसर्गाच्या अद्भूत नजाऱ्याचा देखावा असो या साऱ्याला टाटा बायबाय करून आपल्या कर्तव्याच्या जगात परत यावचं लागते. एखाद्या सुंदरशा मैफिलीची सांगता करावीच लागते.

निरोप घेण्याचा आणि देण्याचा अतिशय ह्रद्य प्रसंग म्हणजे देशावरच्या सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला निरोप देण्याचा. आपल्या कुटुंबाला सोडून जाताना त्या जवानाचे मन कातर होतेच पण भारतमातेच्या रक्षणासाठी मन सीमेवर धावही घेते. घरच्यांची पण अवस्था यापेक्षा वेगळी नसते.

 दहावीच्या निरोप समारंभात लहानपणापासून शिक्षण घेत आलेल्या शाळेचा निरोप घेताना त्या विद्यार्थ्यांना भावना अनावर होतातच पण पुढील शिक्षणासाठीची भरारी घेताना मन आतुरलेले असते.

 म्हणूनच निरोप देणे म्हणजे नविनच्या स्वागतासाठी सज्ज होणे. इथे कुठेही भावनेला महत्व उरत नाही हेचं खरे.

 

© त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी ‘दीपिका अधाना’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ रणरागिणी ‘दीपिका अधाना’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

“कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही फिकी पडते!” हरियाणातील फरीदाबादच्या २३ वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने अटीतटीच्या प्रसंगात दाखवलेले धैर्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहे. युएई (UAE) मधून १६९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी जेव्हा तिच्यावर आली, तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक होती.

मोहिमेवर निघण्यापूर्वी दीपिकाने आपल्या कुटुंबाला फोन केला आणि ती भावनिक होऊन म्हणाली, “आई, काका… कदाचित मी पुन्हा दिसणार नाही, मला शेवटचं बघून घ्या. ” पण तिच्या कुटुंबाने खचून न जाता तिला लढण्याचं बळ दिलं!

या ऐतिहासिक उड्डाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विमानातील सहाही क्रू मेंबर्स महिला होत्या. कॅप्टनपासून ते क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनीच या संकटात पोलादी जिद्द दाखवली. मानाचा मुजरा!

एटीसीशी संपर्क तुटला अन… : उड्डाणादरम्यान काही काळ एटीसीशी (ATC) संपर्क तुटल्याने सर्वांचाच श्वास रोखला गेला होता. मात्र, दीपिकाने डगमगता विमान नियंत्रित केलं आणि अवघ्या एका तासात सर्व प्रवाशांना घेऊन दिल्ली गाठली.

जेव्हा विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. १६९ भारतीयांसाठी दीपिका आणि तिची टीम साक्षात ‘देवदूत’ बनून आली होती.

२३ वर्ष हे वय खेळण्या-बागडण्याचं असतं, पण दीपिकाने या वयात मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून आव्हान दिलं. हीच खरी ‘नारीशक्ती’ आहे!

“स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता १६९ भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या वाघिणीचा – दीपिका अधानाचा हा पराक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा! ” 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘द बेस्ट शेफ…’ – लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘द बेस्ट शेफ…’ – लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

दुपारचे दोन वाजत आले होते. ऊन चांगलंच चढलं होतं. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतून आली असणार. त्यांचं जेवण, अभ्यास, आपली कामं, सगळंच वाट बघत असतं. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावतेच, पावलं जराशी रेंगाळतातच. कारण या रस्त्यावर आई रहाते. तिला दोन मिनिटं भेटून येऊ असा विचार मी करते.

कित्येकदा इथे जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं, तर घरी का आली नाहीस, म्हणून ती रागावते. पण आपल्याला कायमच घाई असते. आज वाकडी वाट करून तिला भेटूच म्हणते.

ढळढळीत दुपारी मला दारात पाहून आई जरा चमकतेच.

काय ग अचानक? म्हणत लगेच हातात पाणी देते.

काही नाही गं… सहज आले, म्हणत आईच्या सोफ्यावर धपकन बसते. इथे धपकन बसायला फार मजा वाटते. मग तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येतो,

‘जेवलीस? ‘

मी नाही म्हणते, घरी जाऊन (आपणच बनवलेलं) जेवायचं असतं. जरा इकडचं तिकडचं बोलतो आम्ही.

परत जिव्हाळा प्रश्न रिटर्न्स, जेवतेस का? मी नको गं… म्हणत असतानाच, उशीर बघ किती झालाय, मुलं बघतील आज एक दिवस स्वतःचं, जेऊनच जा म्हणत, एकीकडे ती स्वयंपाकघरात शिरतेसुद्धा.

एकटीच असल्याने स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिने संपवलेला असतो. त्यामुळे माझ्यासाठी आता स्क्रॅचपासून सुरुवात करायची असते. तिला काम करावं लागतं, या गोष्टीचं मी स्वतः आई झाल्यापासून मला फार वाईट वाटतं. पण तसंही आईचं कायम ऐकावं, हे मी नाहीतरी आमच्या लेकीला बजावत असतेच. त्यामुळे मी तिचं निमूट ऐकते.

‘जरा वेळ टीव्ही बघ, मी करते काहीतरी’ म्हणत, साठी ओलांडलेली माझी आई, एकीकडे कांदा चिरायला घेते.

काही मदत करु का गं? या प्रश्नाचं उत्तर ‘ नको, बस नुसती ‘ असं येणार हे माहीत असलं, तरी मी उगाच तिला विचारते. कारण हे उत्तर ऐकायला मला आवडतं.

पाच मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीत घातल्याचा वास, कुकरच्या शिट्टीचे, भाकरी थापल्याचे आवाज येऊ लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते, हे ती कधी म्हणजे कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातला बेस्ट शेफ कामाला लागलेला असून सगळ्यात सुंदर अन्न बनत असतं.

दहाव्या मिनिटाला माझ्यासमोर तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफाळतं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड असलेलं सुग्रास ताट येतं.

पहिल्या घासाबरोबरच मी आनंदाचा कढ गिळते आणि मला जेवताना बघून आईची पुढच्या चार दिवसांची भूक भागते. पांढऱ्याशुभ्र भाकरीचे पदर व्यवस्थित सुटलेले, पिठल्याची कंसिस्टंसी परफेक्ट, कोशिंबीरीला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलो नाहीये हे मला जाणवतं. आजकाल इतक्या हॉटेलांचे रिव्ह्यू वाचत असतो आपण, पण या जेवणाचा रिव्ह्यू लिहायला शब्द कमी पडतील. आणि तसंही, देव, बच्चन, पुलं, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण यांचे रिव्ह्यू लिहू नयेत.

आज पुन्हा एकदा पटलं, पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं!

 *

लेखिका: सुश्री  गौरी ब्रह्मे.

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पत्र लेखन + अभिनंदन – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌺  अ भि नं द न  🌺

कर्मयोगिनी महिला संस्था, पुणे यांनी ‘पत्रलेखन स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील साहित्यिका विभावरी कुलकर्णी यांच्या पत्रलेखनास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई-अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐💐

आजच्या अंकात वाचूया त्यांचे प्रथम पुरस्कार प्राप्त रचना – “पत्रलेखन…”

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆

🔅 विविधा 🔅

☆ पत्रलेखन ☆ विभावरी कुलकर्णी

(प्रथम पुरस्कार प्राप्त)

****

आदरणीय मॅडम,

सप्रेम नमस्कार.

आज तुम्ही आमच्यात देहरूपाने नसलात, तरी तुमची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. आपली पहिली भेट झाली तेव्हा जणू काही जन्मांतरीचे ऋणानुबंध असावेत, असा भास झाला होता. तुमच्या भेटीमुळे कोड्यासारखे गुंतागुंतीचे वाटणारे माझे आयुष्य एखाद्या सुंदर फुलासारखे उलगडत गेले. तुम्ही मला आयुष्याचा खरा उद्देश समजावून सांगितलात आणि त्यामुळेच मला जीवनाची एक नवी दिशा सापडली.

आज मी जी काही यशस्वी ‘रेकी मास्टर’ आहे, ते केवळ तुमच्यामुळेच. तुम्ही दिलेली दीक्षा, तुमची शिकवण आणि तुम्ही करून घेतलेली प्रात्यक्षिके माझ्या यशाचा पाया ठरली. तुमच्या मार्गदर्शनाखाली मी विविध ध्यानाचे (Meditation) प्रकार शिकले. तुमच्या सान्निध्यात आल्यावरच मला जाणीव झाली की माझी ज्ञानाची झोळी किती रिकामी होती. प्रत्येक शिष्याला समान वागणूक आणि समान ज्ञान देण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होती.

रेकीचा खरा अर्थ आणि या पवित्र प्राणशक्तीचा उपयोग कसा करावा, याचे पूर्ण ज्ञान तुम्ही मला दिलेत. पंचमहाभूते, त्यांची उपयुक्तता आणि त्यांची ऊर्जा कशी प्राप्त करावी, हे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलेत. रेकीचा उगम आणि त्यामागचे शास्त्र तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले की, त्यामुळेच मला आज समाजसेवेची संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही दिलेल्या शिकवणीचा उपयोग मी आज लोकांसाठी करत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.

कृतज्ञतेत कसे राहावे, आभार मानण्याचे महत्त्व काय असते, चराचर सृष्टीशी स्वतःला कसे जोडून घ्यावे आणि भूतदया कशी असावी, सर्वात राहून अलिप्त कसे असावे, लोभ – मोह दूर कसे ठेवावेत, निरपेक्ष वृत्तीने सेवा कशी करावी.

हे संस्कार तुम्ही माझ्यावर बिंबवलेत. आजही एखादा कठीण प्रसंग समोर उभा ठाकला की, तुमच्या नोट्स आणि तुमची शिकवण मला मार्ग दाखवते. आजही मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या आठवणींतून मिळतात. आपल्यात गुरु-शिष्या पलीकडचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. आपण दोघींनी मिळून मेडिटेशनवर एक पुस्तक लिहायचे ठरवले होते, पण काळाने ती इच्छा अपूर्णच ठेवली.

तुमची शिकवण आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, याची मला खात्री आहे. ते आशीर्वाद असेच कायम लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सदैव आपल्या कृतज्ञतेत,

तुमची शिष्या,

विभावरी

—–

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गावजत्रा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ गावजत्रा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा झाला की महाराष्ट्रातील गावोगावच्या उत्सवांना आरंभ होतो. 

रब्बीची पिके घरी येवून पडलेली असतात. बुरुडाकडून आणलेल्या, गोमयाने अंतर्बाह्य लिंपून उन्हात खडखडीत वाळवून निर्जंतुक केलेल्या धान्यांच्या कणग्यांची पोटे नवधान्यांनी तट्ट भरल्यावर त्यांच्या तोंडी कडुनिंबाच्या पानांचे तोबरे भरून, वर राख आणि शेणांनी ती तोंडे लिंपली जातात. आता अश्विनापर्यंत तोंडे बंद!

उरलेल्या धान्यांच्या खरेद्या-विक्र्या होऊन शेतकऱ्यांच्या कनवटीला चार पैसे खुळखुळू लागतात. सगळीकडे आनंदीआनंद असतो. मुलं, नातवंडांना नवी कापडं, नातींना परकर-पोलकी- गवानं, तान्ह्याला आंगडी, टोपडी, कुंच्या, करगोटं आणि घरधणीन, सुना, लेकींना लुगडी-चिरे-चोळ्या घ्यायच्या असतात. जमलं तर कारभारणीला एखादा सोन्याचा डागही करायची इच्छा असते घरधन्याची. 

गावातील सार्वजनिक ग्रामदैवतांच्या मंदिरात नामसप्ताह आयोजित केले जातात. अखंड नामसंकीर्तनाखेरीज रोज संध्याकाळी वारकरी कीर्तने होतात. आठवडाभर ग्रामस्थ विठूभजनात मग्न राहतात. रामनवमी उत्साहाने पार पडते. हनुमानाचा जन्मोत्सव होतो. रामाला आणि हनुमंताला वाहिलेल्या मोगरा-दवण्याचा सुगंध मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत पुढे आठवडाभर दरवळत असतो. गावभर सुंठवडा वाटला जातो. एकूण मजा असते, आनंदी आनंद असतो.

आमच्या माळशिरस (भुलेश्वर) गावाचा भैरवनाथाचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र बारशीला (चैत्र शु. द्वादशी) असतो. सकाळी सहा वाजता ग्रामदैवत, ‘पुण्याचे वेरुळ’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वराला महाभिषेक, सात वाजता गावातील भैरवनाथाला महाभिषेक केला जातो. दुपारी बारा वाजता पाण्याची कावड नाचवत भुलेश्वरला नेली जाते. नंतर देवाच्या तांदळ्यावर (शिवपिंडीवरील दंडगोलाकार शाळिग्राम) जलधारा धरून अभिषेक केला जातो. रात्री साठेआठला गावात छबिना निघतो. ढोल-लेझिम पथके नाचतात. तरुण देहभान विसरून नाचतात, वाजवतात, नामगजर करतात. महिला, मुली, बालके नवी वस्त्रे लेऊन, नटूनथटून सहभागी होतात.

गावात पारावर, चौकात विविध वस्तू, मिठाया, खेळणी, कपडे, खाद्यपदार्थांची हाटेले इ. फिरत्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटलेली असतात. बाया घोळक्याने बाजारात फिरत, हसंत खिदळत, कलकल करीत खरेदी करीत असतात. एक लेकरु कडेवर, दुसरं बोटाला धरलेलं, तिसरं जरा थोरलं, आईच्या मागून ढकलंत घरंगळंत चालल्यासरखं चाललेलं, गर्दीतून चाँवचाँव करीत वाट काढीत पुढं पुढं जात असतात. लेकरासाठी जिलबी, गुडीशेव, भेळ, गारेगार घेत असतात. 

जत्रेच्या निमित्ताने घरोघरी सोयरेधायरे, व्याही मंडळी, मित्रमंडळी, पाहुण्यांचे आगमन झालेले असते. गोडाधोडाच्या जेवणावळी झडत असतात. आग्रह करकरून वाढले जाते. सारा दिवस धामधुमीत जातो. 

या दोन-चार दिवसाच्या धामधुमीत उपवर किंवा उपवधू कन्या-पुत्रांच्या विवाहासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी, टेहाळणी काही धूर्त, चाणक्ष पालक करून घेतात. आपल्या कुटुंबासाठी सुयोग्य, आनुरूप सून-जावई हेरून ठेवतात. काही व्यवहारी मंडळी जमीन, घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सूतोवाच्य करून ठेतात, जुजबी बोलणी करून घेतात. विवाहाचे आणि जमीन, घर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार नंतर सोईने संपन्न होतात.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे चैत्र शु. त्रयोदशीला घरोघरी सामिष भोजने होतात. दुपारी चिंचेच्या बागात कुस्त्यांचे फड उभे राहतात. पंचक्रोशीतले मल्ल त्यात सहभागी होऊन आपापल्या क्रिडा नैपुण्याचे प्रदर्शन करतात. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यांच्यावर कौतुक म्हणून रेवड्या उधळल्या जातात. उधळलेल्या रेवड्या हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर पोरा-टोरांच्या, प्रेक्षकांच्या उड्या पडतात. मोठ्या तरुणांच्या कुस्त्यांमधे विजेत्याला रोख रकमांची पारितोषिके दिली जातात. हौशी कुस्तीप्रेमी गावकरी पारितोषिकांच्या बोल्या लावतात. उत्तरोत्तर खेळ रंगत जातो. प्रेक्षकांपैकी काही जण विजयी वीरांना खांद्यावर घेऊन नाचवतात, मिरवतात. रात्री पारावरील मोकळ्या मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर एखादे लोकनाट्य (तमाशा) रंगते.

नमन, गण-गौळण, लावणी, बतावणी झाली की मुख्य वगाला आरंभ होतो. ढोल्या विविध ताल व लयकाऱ्या वाजवून ढोलकीवरील आपले प्रभुत्व वारंवार सिद्ध करतो. पायपेटी वादक त्याच्या करामती दाखवतो. नृत्यांगनांचा लयबद्ध पदन्यास, गिरक्या, फिरक्या, मुरक्या, ठुमके आणि अदकारीला प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून, डोईचे फेटे हवेत उडवून भरभरून दाद देतात. मावशी मजा आणते. सोंगाड्या आपल्या अंगविक्षेपांनी आणि द्विअर्थी शाब्दिक कोट्यांनी धमाल उडवतो, प्रेक्षकांना खळखळून हसवतो. असे हे उत्तरोत्तर रंगलेले लोकनाट्य पहाटे पहाटे संपते. गावकरी पुढील वर्षभर पुरेल येवढ्या आनंदाची साठवण मनात करीत आपापल्या घरी परततात.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

 

??

☆ ✍️ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करावा असे म्हणतात. पण संकल्प हा संकल्प च रहातो हा आपला अनुभव आहे. असे का घडते यावर थोडे चिंतन केले तर जाणवते आपण काही तरी वेगळे करु किंवा काहीतरी वेगळे मिळवू असा मनात विचार करुन आपण संकल्प करतो हे जाणवले. मग काहीतरी विशेष भले ही ते छोटे का असेना करावे असे वाटते इथेच आपली खरी चूक होते. काहीही वेगळे न करता आहे तेच जर सातत्याने केले तरी समाधान मिळते. 

सण समारंभ उत्सव साजरा करण्यामागे आनंद मिळणे ही भावना असते. सणाच्या दिवशी करण्यात येणारी विशेष तयारी ती फक्त एक दिवस न करता दैनंदिन जीवनातच थोडं थोडं करत गेलो तर रोजच तो आनंद मिळणार नाही का? (जर त्या दिवशी तो मिळतो हा अनुभव आहे तर रोजही मिळणारच! ) 

उदा. गुढीपाडवा पहाटे उठणे, रांगोळी काढणे, तुपाचा दिवा लावणे व रामरक्षा या मूलभूत गोष्टी रोज केल्या तर त्याची शिस्त मनाला शरीराला लागेल व रोज व गुढिपाडव्याला मुहूर्तावर गुढी उभारल्यानंतर तो आनंद द्विगुणित होईल. दैनंदिन व नैमित्तिक गोष्टी एकात एक मिसळतील व समाधान सतत मिळेल केवळ सातत्याने!

नैमित्तिक तर करायचेच मुहूर्तावर पण त्यातील मूलभूत गोष्टी करुन त्या शिस्तीत जीवन जगले तर वर्तमानाचाही आनंद घेता येईल. 

आनंद समाधान केवळ एका विशिष्ट क्षणी कसे असेल. 

वर्तमानात जगण्यासाठी सातत्य व शिस्त लागतेच तर त्या मुहूर्तावरील आनंद शाश्वत असेल. 

करचरण कृतं वाक्कयजं कर्मजं वा

।श्रवणनयनजं वा मनसं वपराधं” ।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व ।

जय जय करुणाबद्ध श्रीमहादेव शम्भो ॥

पवित्र विचार, पवित्र वातावरण, दिवा लावणे स्तोत्र म्हणणे या नित्याच्या गोष्टी मनापासून, सतत करत करत नैमित्तिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहज वागणे शक्य करणे म्हणजे हा संकल्प नसून सहजता ठरेल. ही सहजताच ताण न देता खरे समाधान देणारी ठरू शकते.

आचार्य म्हणतात जे जे कृत्य करू ते सगळे भगवंताच्या साक्षीने केले तर तीच त्याची सेवा ठरते. वेगळं काही करण्याच्या नादात सहजता निसटते व‌ वर्तमानातील आनंद न मिळता संकल्प हा ताण ठरतो व तो पूर्ण होत नाही. 

आचार्य तर म्हणतात ईश्वरसाक्ष जीवन असेल तर निद्रा सुद्धा समाधी ठरेल. यावर मनन केल्यास साधेपणा व नैसर्गिकताच आपले समाधान आहे. 

संकल्प म्हणजे रोजचेच वागणे सहज केले तर वेगळाच अनुभव मिळू शकेल असे वाटते.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares