मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पूर्तता… – लेखक – श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? जीवनरंग ?

☆ पूर्तता… – लेखक – श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

आज काकू चकचकीत तयार झाल्या, ठरवून ठेवलेली साडी, चपला, पर्स, हातात घड्याळ… घरात सांगून ठेवलं, येते जेवणाच्या वेळेपर्यंत… खाली उतरल्यावर रिक्षाला हात केला, रिक्षावाल्याला सारसबाग सांगितलं… कोथरुडधून, नळ स्टॉप, म्हात्रे पूल, शास्त्री रोड, निलायमचा चौक, आणि मग सारसबाग… रस्त्यावर थांबून लांबून दर्शन घेतलं… सणस ग्राऊंडला एक फेरी मारली… एक भेळ बांधून घेतली… आता पार्वती पायथा… पायथ्याशी गेल्यावर एक क्षणभर थांबून वरच्या देवळाकडे बघितलं आणि पुन्हा म्हणाल्या आता संभाजी बाग… रिक्षावाला थोडा प्रश्नार्थक नजरेने आरशात बघत होता… काकू रिक्षातून उतरल्या सुद्धा नाहीत आणि आता दुसरी बाग… संभाजी बागेतल्या एका गेटमधून आत जाऊन दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले… आता शनिवार वाडा, रिक्षावाला बुचकळ्यात पडला होता… बर गि-हाईक तर चांगलं मिळालं आहे, मग तक्रार तरी कसली करायची? … जायचंय तर नेऊ…

शनिवारवाड्याशी आल्यावर दरवाजासमोर गेल्या, पटांगणाकडे एकदा बघितलं.. खारेदाणेवाल्याकडे जाऊन एक पुडी घेतली, पुन्हा रिक्षात बसल्या… आता मात्र रिक्षावाल्याच कुतूहल प्रचंड वाढलं.. विषय काढायचा म्हणून विचारलं, “काकू तुम्ही पुण्यातल्याच का? “, , , , , , ,

“हो, का रे? “…

“सहज विचारलं. “, , , , , ,

“अगदी लहानपणापासून की लग्न झाल्यावर आलात? “, , , , ,

“अरे, मी जन्मापासून पुण्यात आहे…

आता तू ५४६ नारायण पेठेत चल… “

काय बरं असेल तिकडे? रिक्षावाला मनात म्हणत होता.. अगदी बाहेर ऐकू येईल इतकं जोरात मन बोलत होतं, , , , , ,

काकू पुढे बोलायला लागल्या, “अरे माझं माहेर तिथे होतं पूर्वी… “

“ओहहहह, तिकडे सीताफळबाग कॉलनीमध्ये नदीत आम्ही मासे पकडायला यायचो… “

“हो, तिथे एक गोठा आहे, मुलं दिसायची आम्हाला मासे पकडताना… माती गणपतीपाशी दीपमाळ होती, त्यावर दिवे लावले जायचे… कबीर बागेत खेळायची सगळी मुलं… “

बोलता बोलता माती गणपती आला… ५४६ नारायण पेठ आली, काकू उतरल्या, नवीन बिल्डिंग झाली होती, त्याच्या भिंतीला हात लावला… क्षणभर डोळे ओले झाले, म्हणाल्या, “चल आता पुन्हा कोथरूडला.. ” रिक्षावाल्याला आता प्रकाश पडला.. …. काकूंच्या जुन्या आठवणी ताज्या करायला म्हणून इतकी फिरस्ती झाली…

कोथरूडमध्ये घराशी उतरल्यावर मीटरकडे बघत पैसे सांगितले काकूंनी नोट काढून दिली… त्याने साहजिकच विचारलं, “मला चांगलं गि-हाईक मिळालं, चांगला धंदा झाला, हे सर्व ठीक आहे, , , , , पण इतकं आठवणीसाठी कोणी फिरत नाही हो.. “

“तस नाहीये रे… लहानपणी आमचे बाबा आम्हाला या सगळ्या ठिकाणी सायकलवर घेऊन जायचे, काहीवेळा तर आम्ही चालत जायचो… तेव्हा मी हट्ट करायचे, रिक्षातून जाऊ… बाबा म्हणायचे, चालल्यामुळे तब्येत छान राहते, भूक छान लागते… दोघात खाल्लेली एक भेळ सहज पचून जाते… पण कळत्या वयात समजलं की रिक्षाला खूप पैसे लागायचे, म्हणून बाबा चालत किंवा सायकलवर न्यायचे… आता यजमान स्कुटरवर नेतात, मुलं मोठी झाली, ती पण नेतात, यात माझं रिक्षात बसून फिरायचं स्वप्न तसच राहून गेलं होतं…

ते म्हणतात ती काय ती ” बकेट लिस्ट ” ओसंडून वाहात होती… होईल रिकामी हळू हळू, पुन्हा भरण्यासाठी… “

– – ऐकून रिक्षावाला स्तब्ध झाला… म्हणाला, “खरंय हो. ” त्याचं स्वप्न आठवून म्हणाला, “आकाशात विमान दिसलं की मला पण वाटतं, कधीतरी विमानात बसून, उंचावरून पुणं बघता येईल… बघू कधी स्वप्न पूर्ण होईल.. स्वप्नाचा पाठलाग मी नक्की करीन…

स्वप्नपूर्तीला वय नसतं… “

लेखक : श्री पराग दामले

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

(“बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”) 

इथून पुढे – – – 

तिथून फुडं दरवर्षी संत बहिणाबाई पोथी पारायन सुरू झालं. नंतर मातुर कुटलीबी घटना घडली नाय. त्यामुळं हळूहळू गावाचा ईस्वास पारायनावर बसला आनि जोमाने उत्सवाप्रमानं अत्यंत उत्साहात पारायन सुरू राहिलं. चार वर्षं झाली. यंदाचं पाचवं वरीस. पारायन सुरू झालं. दोन दिस झालं आनि अचानक कोल्हापूरहून मोतीलाल शेटजी गाडीतून गावात आले. त्यांचं चार पिढ्यांपूर्वी गावाशी नातं हुतं. गावात दुकान हुतं. पन पोरं बाहेर पडल्यामुळे दुकान तेंव्हाच बंद पडलं हुतं. रहातं घर पूर्वीच विकलं हुतं. दोन पिढ्या कोल्हापुरात राहून गडगंज झाल्या हुत्यात्या. सगळं येवस्थित हुतं. त्यास्नी वंशाला दिवा हवा म्हनून कुनीतरी सांगितलं, गावाकडं दान धर्म करायला होवा. त्यांना गावाचा ठावठिकाना लागला आनि त्यांनी ईचार केला की, आपलं पूर्वज जिथं रहात हुतं ते गाव तर पाहून यिऊ. तिथंच काही मदत करता आली तर पूर्वजांची आठवन म्हनून करू. मंडप पाहून शेटजींनी कार्यक्रमाची समदी इचारपूस केली. आता काय चाललंय इचारलं. पाटील, पंच, बाबा सर्वांच्या गाठी घेतल्या आनि समद्या गावकर्ऱ्यांफुडं जाहीर केलं की, मंदिर बांदायला सुरुवात करावी. मी लागल इतका दगड कोल्हापूरहून आननार हाय आनि मंदिराला दान करनार हाय.

बाबांना लई आनंद झाला. देवीनंच सुरूवात करून दिली. आता मंदिर होनार टप्प्याटप्प्यानं. फुडच्या वर्षात बाकी देनग्या गोळा केल्या. लाखभर रूपय जमा झालं. मंदिराबरोबरच समोर नंदी, तुळस सर्व काम झालं. रंगकाम झालं. मंदिर दिमाखात हुबं राहिलं. एक दिस कळस बसवावा आनि होमाचा कार्यक्रम करावा असं ग्रामपंचायत मिटींगमधे ठरलं. त्याप्रमानं बाबांनी पंढरपुरातून संन्यासी धुंडामहाराजांना निमंत्रित केलं. त्यांच्या हस्ते कळस बसवावा असं ठरलं. सांगलीतून कळस आनला. एका शुभ दिशी धुंडामहाराज आले. पालकी प्रदक्षणा झाली. पाच जोडप्यांनी मिळून होम केला. देवीची पूजा केली. पंचामृत स्नान झालं. देवी सजली. तेजस्वी दिसायला लागली. महाराजांनी कळसाचं पूजन केलं आणि मंदिरावर चढून कळस बसवला. खाली उतरले. सर्व विधी यथासांग झाले हुते. आता महाराजांनी प्रवचनाला सुरूवात केली.

“लोकहो, आपन सर्वांनी मंदिर बांदायचा पवित्र विचार केला. त्याला देविनं दुजोरा दिला. चार वर्षं आपल्याकडून सेवा करवून घेतली. आपल्याला देविनं खूप अनुभव दिले. परीक्षा पन बघितली.

सर्जाला इजा बी झाली. बरा बी झाला. हीच मोठी परीक्षा हुती. तिथं तुमी थांबला असता. पारायन थांबवलं असतं तर तुमी नापास झाला असता देविच्या परीक्षेत पन तुम्ही धीर धरला. देवीवर ईस्वास ठिवला. यालाच “श्रद्धा” म्हनतात.

ती तुमी दाखिवली. देविने ती पाह्यली. देवी प्रसन्न झाली. तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ही श्रद्धा पुना कदीबी डगमगू दिऊ नका. म्हनजे प्रत्येकाचे जन्माला येऊन सार्थक झाले म्हनता यिल. ”

“आता महत्त्वाचा ईषय हाय. आपल्या गावातील भुलाबाईचा. ती हाय का इथं? ”असे म्हनून महाराज लोकांकडे पहायला लागले. ती लांब हुबी राह्यली हुती. कुनीतरी तिला बोलावलं आणि फुडं आनलं. महाराज म्हणाले, ”भुला, ये बाई फुडं. आता मला सांग, तुझ्या अंगात येतं म्हन्जे काय हुतं ते सांगता यील का? ”

भुला म्हनली, “महाराज ढोलकी वाजली की काय तरी हुतं. मेंदूला बाकी कायबी कळत न्हाय. निस्त कामातनं गेल्यावानी हुतं. कशाचीबी सूद रहात न्हाय. म्यां येकदमच नाचायला लागते. मला काय बी कळत नाय. बाया ईचारतात एकेक प्रश्न पन म्यां मला वाटतंय ते सांगते. बाया माझी वटी भरत्यात. साडी, कापडं जमा हुत्यात. पैसं देत्यात. माजा प्रपंच चालतो. मला महत्त्व देत्यात. मी कुटंबी चोरी केली नाय बगा. आईची सेवा करते”

महाराज म्हणाले, “भुला, देवी दिसती व्हय तुला? ” “नाय बा”

“मंग तू मंदिर बांदू नका हे कसं सांगितलंस? ”

“आवं, पूर्वापार अनुभव हाय. कुनाकुनाच्या सपनात देवी ईती. मंदिर बांदन्यापेक्षा शेवा जास्त झाली तर पुन्याईपन वाढल आनि देविच्या वाटला बी नगं, श्रापबी नगं म्हनून म्या तसं सांगितलं. ”

“बरं, या दोन दिसांत तुझ्या अंगात का आलं नाही? ”

“आवं, ढोलकी कुटं वाजली? ”

असं म्हनताच समदीकडं एकच हशा पिकला. भुलाबाईला कळंना का हसत्यात. ती कावरीबावरी झाली. तिला सन्मानाने व्यासपीटावर आनलं.

महाराज म्हनाले, ” पाटील आणि पंचहो, आपल्या गावातील मानसांच्या ईकासातही आपन लक्ष घालायला हवं. निसत्या इमारती, मंदिर बांदून ईकास कसा हुनार? लोकहो, अंगात का येतं तर ज्या मानसाकडं कुनी लक्ष देत नाय, ज्या मानसाला जगन्याचं साधन नसतं, त्याला वाटतं का नाही की माझ्याकडं लक्ष द्यावं, मला जगायला साधन हवं. त्याची काय चूक? त्याच्या मेंदूत चलबिचल हुते. मानसिकता बिगडते. आनि कायतरी वाजायला लागलं की ही मानसं घुमायला लागतात आनि विच्छा पूर्न करून घेतात. ”

पाटलानं हात जोडलं, “चुकलं महाराज. आता काय करू आमी? तुमीच सांगा”

“आता असं करा, या भुलाच्या जगन्यासाठी समद्या गोष्टींची येवस्ता करा. आता पहिली गोष्ट, सर्वांनी भुलाबाई म्हन्जे देविच जनू, या देविच्या घराची डागडुजी करा. तिला झेपेल ते काम द्या. ग्रामसेविका, शिपाई असं काय बी करा. ती जगेल आनि नीट राहिल. महिला सक्षम करा म्हनत्यात म्हन्जे आनखी तरी काय? ”

भुलाबाईनं अश्रूंचा अभिषेक महाराजांच्या पायावर घातला. तिला साडी चोळी करून सन्मानाने घरी पाटविले.

या गोष्टीला एक वरीस झालं. धुंडामहाराज पुन्यांदा बघायला आले आणि पारायनालाबी. त्यावेळी भुलाबाई सर्वांत फुडं वाचायला बसली हुती. नीट नेटकं आवरून चापून चोपून साडी नेसून वाचत हुती. तिच्या घराची डागडुजी बी झाली हुती. दुपारी प्रसाद वाटप झाल्यावर तिनं महाराजांना घरी येन्याची इनती केली. महाराजांनी घर पाहिलं. टुमदार घर पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी भुलाला आशीर्वाद दिला. एक मुलगी सक्षम झाली. संत तुकारामांचा अभंग त्यांच्या मनात रूंजी घालू लागला. “जे कां रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले||तो चि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा||अभंग गुनगुनत समाधानातच ते पंढरपुरला परत आले. अशारितीने देवीच्या निमित्ताने अंधश्रद्धा दूर होन्याबरोबरच गावात महिला सक्षमीकरण सुरू झाले.

 – समाप्त –

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – २ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – २ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

(त्यांनी सर्व सोसलं. त्यांना मारन्याच्या नादात वासरालाबी मारलं. वासरू गेलं. त्या आजारी हुत्या, काय बी लक्ष दिलं नाही. पन गंमत म्हनजे नवरा घरातून निघून लांब जायला बगायचा. गेला की त्योच आजारी पडायचा. असं तीन चारदा झालं.) 

इथून पुढे – –

बिचारीनं नवऱ्याची लई शेवा केली. द्येवाची भक्ती केली. नवऱ्याला नंतर चूक कळली आन् त्यानं माफी मागितली, पुना दोघांनी लई झ्याक संसार केला. हेच ते महाराज सांगत हुते. लई मोटी कथा हाय. नीट वाचू कदीतरी. ”असं बोलून त्यानं इषय थांबवला. लिहिन्याचं काम आटवडाभर चाललं. पोथी परत करून ते बहुल्याला परत आले. आता छापील प्रती तयार करायचं काम. ते पोलिस पाटलानं उचाललं. शंभर प्रती लगोलग कराडास्न छापून आनल्या. पोथीची गावातून मिरवनूक निघाली. सर्वांनी भक्तिभावाने आईला आनि पोथीला हात जोडलं. ”आई, होऊ दे गं बाई तुजं मंदिर. ”आई पत्र्याच्या शेडमधे असते हे कुनालाच पहावत नव्हतं. बाया बापड्याही श्रद्धेनं सर्व शेवा करत हुत्या.

 पारायनाचा आटवडा निश्चित करण्यात आला. तयारी पूर्न झाली. पारायन सुरू झालं. समदी मंडळी वाचाया बसली. चार दिस झालं. पाचवा दिस उजाडला. सकाळची लगबग, तयारी सुरू होती.

तवर गन्या धावतपळत आला आन् म्हनला, “आवं बापू, तात्या, गुरजी कळलं का तुमास्नी पाटलाच्या सर्जाला बैलांनं मारलं म्हनं” 

हे ऐकताच जो तो आ वासून पाहू लागला. पळापळ झाली. समदी मंडळी निघाली वाड्यावर. खरंच, पाटलाचा तरणाबांड लेक सर्जा पडला हुता जमिनीवर. पाटील डोकं धरून बसला हुता. पाटलीन रडत हुती. त्याचं असं झालं हुतं, बैलाला नेहमी परमानं वैरन टाकायला सर्जा गेला हुता. त्याचवेळी नवीन गडी शान मागं सारत हुता. निशाण बैलाला तो काय वळखला नाय. तो जोरात हिकडं तिकडं करायला लागला. सर्जा त्याला हो हो म्हनून हाकारत हुता. पण चवताळलेल्या निशाणानं एकदम मान हलवली आन् नेमकं टोकदार शिंग लागलं सर्जाच्या खांद्याला. सर्जा कळवळून खाली पडला. बरं तर बरं निशाण्याला बांधलं हुतं.

 सर्जाला वेदनेनं मूर्च्छा आली. पाटलाला काय करावं कळंना. काही जाणकारांनी तालुक्याच्या गावची ॲम्ब्युलन्स बोलावली. सर्जाला घेऊन दोन चार जन तालुक्याच्या मोठ्या डॉक्टरकडं गेले.

 गावात वातावरन गंभीर झालं. आई निनाईचा कोप झाला का काय असं वाटून जो तो मंदिरात गेला. सर्जासाठी प्रार्थना कराया लागला. सर्जा होताच तसा. सर्वांच्या गरजंला धावनारा. मदत करनारा. येता जाता विचारपूस करनारा. भावी पाटील तोच हुता. थोडावेळ पारायन थांबलं.

 पाटील, गावातील पंच मंडळी जमली. गाव जमलं. पाटील चिंतेत हुता. तरीबी फुडं काय करायचं ते कळत नव्हतं. तेवढ्यात भुलाबाई उटली. फुडं आली. म्हनली, “आवं, म्या म्हनलं हुतं नीट शेवा करा. नगा त्या फंदात पडू. कोप झालाय देवीचा आता. भाकणूक करू, माफी मागू आनि म्हनू पुन्हा वाटंला जानार नाय मंदिर बांदायच्या. ”

 समदी इचार करायला लागली. खरं हाय तिचं. येवडं देवाचं करती. अंगात बी येतिया देवी. समद्यांना उत्तरं देती. मंग देविनंच सांगितलं असनार तिला असं वाटायला लागलं.

 पंच काहीतरी बोलनार तेवड्यात “ रामकृष्ण हरी” म्हनत एकनाथ बाबा उठले आणि फुडं आले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

 “लोकहो, आपल्या कित्येक पिढ्यांची देवीवर श्रद्धा हाय. त्यांनी आखून दिलेली परंपरा आपन आजपर्यंत जपून ठिवली हाय. देव कदी कोपत नसतो. आई कधी लेकावर रूसती व्हय? देवच जर लोकास्नी माराया लागला तर ईस्वास कुनावर ठिवनार.? म्या बी भाकणूक घालून देविचा कौल घेतला हुता. आरं येड्यानों, चांगल्या कामाला देव का न्हाय म्हनंल? माजी दोन तपाची पुन्याई म्यां देविच्या मंदिरासाठी कौल लावला तवा लावली हाय. आरं बाबानों, देवी नाय खोटं ठरविनार. आई निनाई, म्यां पारायन सुरू केलं हाय. ते निम्म्यात थांबलं तर कसं हुनार? तूच आता तार नाही तर मला मार पन त्या सर्जाला वाचिव. ”येवडं बोलून बाबा खाली बसलं. पंच, पाटील काय सांगतात तिकडं सर्वांचं कान लागलं. पाटलाचं डोळं डबडबलं हुतं. एक ध्यान तालुक्याला गेलेली मंडळी कदी येतील इकडं तर दुसरं ध्यान पारायनाचं काय करायचं इकडं.

शेवटी धीर धरून पाटील म्हनालं,

 “लोकहो, माजं बी मन लागंना पन् कायतरी ईचार केला पायजे. आपन फकस्त मंदिर बांदायचा संकल्प केलाय. देवाचं पारायन तरी बंद कसं करायचं? आपन देवीला पाया पडू आन् सुरू ठिऊ पारायन. काय देवी सुचविल तसं करू. ”एवडं बोलून पाटलांनी देवीला हात जोडले. त्यांच्या बरोबर आख्ख्या गावानं आई निनाईला प्रार्थना केली. “आई निनाई, पारायन तरी आमी पूर्न करतो. नंतर तू सांगशील तसं करतो. तूच हायेस आमाला. आमचं काय चुकलं असंल तर माफी कर”

 एवडं बोलून पारायनाच्या मंडपात समदे आले. पारायन सुरू झालं. तास दोन तास गेले. पाटील पाटलीनबाई डोळं मिटून शांत बसले होते. पोराचा जीव वाचू दे म्हनून प्रार्थना करत होते. तेवड्यात तालुक्याच्या गावी दवाखान्यात गेलेला गन्या तराट आला आणि हाकारायला लागला,

 “पाटील पाटील”

 त्यांनी डोळं उघडून पाहिलं. म्हनले, ”आरं, बोल की लवकर. ”

गन्या म्हनला, “पाटील, काय बी काळजी करू नगासा. सर्जेरावाला सुद आलीय. काय बी धोका नाय. डागदरांनी जखम धुवून पट्टी केलीय. सलाईन चालू हाय. औषधं चालू हायेत. ठीक हाय समदं. ” पाटलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आलं. पाटलीन रडाया लागली. आयाबायांना म्हनली,

 “बयांनो, देवी पावली गं आपनास्नी. पारायन संपलं की लुगडं चोळी करते गं देविला आनि निवद बी दावते पुरणपोळीचा. ”

बायांना पन हायसं झालं. काहीजनी घरला गेल्या. प्रसाद करायला. दोघी पाच सात कप चा

आनि कप घिऊन आल्या. उपाशी मंडळींना चा दिला. पारायन चा पिऊन फुडं सुरू झालं.

संध्याकाळ झाली. पारायन संपलं. आरती झाली दिस मावळला. समदे घरला गेले. सर्जाला दोन दिस दवाखान्यात ठिवनार असं कळलं पन आता धोका टळला हुता. समदी निवांत हुती.

पारायनाचे पुढील दोन दिस शांततेत गेले. नित्यनेमाने वाचन, आरती, निवद, प्रसाद समदं सुरू हुतं. आता बाबांना पण हायसं वाटत हुतं. चांगल्या कामाचा संकल्प केला हाय तर पूर्न होयाला हवं असं त्यास्नी वाटतं हुतं.

भुलाबाई मात्र आतून संतापली हुती. कढ जिरवत हुती.

 “म्यां येवडं सांगून बी कशाला ईचार करतायत पाटील. हे बरं नव्हं. त्या पोराच्या जिवावर आलं तरी बी कुनी ऐकना. ” म्हनून भुलाबाई चरफडत हुती. कुनाकुनाला कानाला लागत हुती. मंदिर बांदायचा फेरईचार करावा म्हनून हट्ट करत हुती. आई निनाईचा कोप नको म्हनत हुती. काहीजनी तिला गप बशवित हुत्या. तिची नकारघंटा नको वाटत हुती पन करनार काय. देवी अंगात यिती. तिला मान दिलाच पायजे. नायतर ती रागावली तर आपल्या घरावर संकट यिल म्हनून गपगुमान तिचं ऐकत हुत्या.

दोन दिसांनी सर्जा घरला आला. दुसऱ्या दिशी पारायनाची सांगता हुती. महाप्रसाद हुता. सर्जा उठला. आंघोळ करून, बॅंडेज बांधून, आवरून देविच्या दर्शनाला गेला. तिथून पारायनाच्या मंडपात गेला. तिथं बाबांच्या पाया पडला आणि म्हनला, “बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”

– क्रमशः भाग दुसरा 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – १ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – १ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

“आई निनाईच्या नावानं चांगभलं! ”गर्दीनं जोरात गजर केला आनि पालकी उचालली. आज भंडारा, पालकी प्रदक्षणा होनार आनि आरती, निवद झाला की प्रसाद वाटप. जो तो उत्साहात वावरत हुता. गावचा पाटील झ्याकवानी फेटा घालून सूचना देत हुता. “आरं पोरांनो, देवीनं लई कल्याण केलं हाय आपलं. तिच्या कृपेनं गावाला पानी कदी कमी पडलं नाय. जिकडं तिकडं हिरी भरल्यात. शिवार फुललं परत्येक वरसाला. लाईटीचं डांब आलं. मोबाईलचं टावरबी आलं. आता घरातून मोबाईल वर बटन दाबूनश्यान आपुन पानी देतोय शिवाराला. आनि काय पायजे? समदं गाव सुखात नांदतया. कवा बी भांडान बखेडा नाय. पोरांनो, शेवा करा आईची. तीच आपल्याला आधार हाय” एवढं बोलला पाटील पन डोळं भरुन आलं त्याचं. त्याच्या मनात आई निनाईबद्दल भाव दाटून आला. कायतरी मनात ईचार येत हुता. त्यानं भक्तीभावानं देवीला हात जोडलं.

गाव हुतं सातारा जिल्ह्यातील बहुलं. हेच माजं गाव. गावाच्या तीन वाड्या हावळंवाडी, जरंवाडी आनि पाळंकरवाडी. यापैकी पाळंकरवाडीच्या शेजारी डोंगराच्या पायथ्याला पन जरा दरीतच निनाई देविचं मंदिर हाय. तिथली ही कथा. कायमची लक्षात रहान्याजोगी.

भंडारा झाला. प्रसादवाटप झालं. जो तो आपापल्या घरला गेला. पाटील तिथंच बसून हुता. आज देवी तेजस्वी दिसत हुती. सूर्व्याची किरनं तिच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे ती हसत आहे असं वाटत हुतं. पाटलाच्या मनात मात्र खंत हुती. तो सादंसुदं पत्र्याचं मंदिर न्याहाळत हुता. भिंती पत्र्याच्या, छत पत्र्याचं, पायऱ्या नीट नव्हत्या. गावात मस्त बंगले बांदले हुते लोकांनी. गावाला मंदिर बांदणं काय जड नव्हतं.  मंदिर पाहून आपण बंगल्यात रहातोय ही खंत, अपराधीपणा पाटलाला सतावित हुता. मंदिर न हुयाला कारन बी तसंच ठोस हुतं. देवीनं दृष्टांत दिलेला, पूर्वीच्या पिढ्यांनी सांगितला हुता.

मागील चार पिढ्यांनी दोन तीनदा मंदिर बांदायचा प्रयत्न केला हुता पन काय तरी कारणानं रहायचं. सुरूवातच होत नव्हती. मागील पिढीत प्रयत्न केला गेला पन तेंव्हाच्या गुरवाला देवीनं सपनात येऊन सांगितलं, “एका रात्रीत मंदिर  होयाला पाहिजे तरच हुनार” हे कसलं सपान? गुरवानं सांगितलं समद्यांना. हे घडनार नाही म्हनून आजपातुर मंदिर राहिलं हुतं.

गावातील जुनी म्हातारी मानसं सांगत की देवी डोंगरावरच हुती म्हने. एका भक्तानं देवीची खूप सेवा केली हुती. म्हातारपनी त्याला डोंगरावर जायाला ईना म्हनून त्यानं देवीला हात जोडले आनि आता येत नाही म्हनून सांगितलं. त्यावर देवी म्हनली, “तू फुडं बघून चाल. मी मागून घरापातुर येते पन मागं वळून बगू नको. नायतर मी हाय तिथंच थांबणार. ” भक्त निगाला चालत. डोंगराचा  पायथा सुरू झाला आन् त्याला इच्छा झाली मागं वळून पहान्याची. त्यानं मागं पाहिलं आन् देवी तिथंच थांबली. गुप्त झाली. मग त्याच जागेवर एक खोली एवडं पत्र्याचं मंदिर केलं. दगडाचीच देवी केली. गेल्या चार पिढ्या ते  तसंच हुबं हाय.

आज भंडाऱ्याच्या वक्ताला आरती चालू असताना घंटा, ढोल ताशा वाजू लागला. भुलाबाईच्या अचानक अंगात आलं. ती हात वर करून घुमाया लागली. आयाबाया तिच्या भवतंनं घुटमळत हुत्या. “आई, काय मागनं हाय बोल. आमी तू म्हनशील ती शेवा करू. ”आसं म्हनत नमस्कार करत हुत्या. भुलाबाईनं घुमण्याचा हुंकार टाकला.

“हुं हुं…पाटलाच्या मनात आलंय मंदिराचं…. पन नीट शेवा केल्या बिगर हुनार नाय…उगाच एका रात्रीत बांदायचा इचार बी करू नगासा. हुनार नाय मंदिर तसं. हुं.. हुं.. ”

बाया बापड्यांनी “व्हय व्हय”म्हनत वटी भरली. ती शांत झाली पन पाटील अशांत झाला. देवी मंदिर बांदा पन म्हनतीय, बांदू नगा बी म्हनतीय. काय करायचं आता…या विचारातच तो घरला परतला.

पाटलीन तुळशी फुडं दिवा लावत हुती. तिनं पाटलाचा चेहरा पाह्यला. “आवं काय हुतंया.? समदं नीट पार पडलं नव्हं? ”

“व्हय गं, देवीच्या मनात काय हाय कळना बग”असं म्हनून त्यानं समदी हकिकत सांगितली. पाटलीन बी इचारात पडली.

“बर, बर, बगू नंतर, चला हातपाय धुवून या जेवाया. मी तयारी करते. ”असं म्हनून ती आत गेली पानं घ्यायला.

दिसामागून दिस सरले. सुगी झाली. गावची जत्रा जवळ आली. जत्रेत कथा किर्तनाची रेलचेल हुती. ग्रामदैवत जोतिबा बरोबर पुन्हा एकबार निनाईदेवीची पालखी निगाली. पुन्हा मागील इषयाला उजाळा मिळाला. रातच्याला समदी मंडळी पाटलाच्या वाड्यात जमली. यात्रेमुळं संतमंडळी पन कथा किर्तनासाठी आली हुतीतं.

वारकरी संत एकनाथ बाबा पन हुतं. बाबांनी सर्व हकिकत आयंकली आनि विचार करून ध्यानाला बसले. बाबा विठ्ठल भक्त हुते. तपश्चर्या  लई हुती. अध्यात्मिक जीवन जगत हुते. कथा, कीर्तनात मग्नच जनू. अर्ध्या तासाने बाबांचं ध्यान संपलं. ते ध्यानातून उठून आले. समद्यांना उद्देशून म्हनले, “म्यां देवीला साकडं घातलं हाय. तुजं मंदिर टप्प्याटप्प्याने पुरं करतो. त्यासाठी दरवरसाला आट दिसाचं पोथीचं पारायन सुरू करतो. तू करवून घेशील तेंव्हा हुईल. आता नगं म्हनू नकोस. आई, असाच आशीर्वाद असू दे. ”यांवर देवीनं आशीर्वाद दिला, पन म्हनली, “ स्त्रियांकडे समाजाचे अजूनबी लक्ष नाय. त्यांना आदर नाय म्हनून स्त्री ही आतून सहनशील राहिली नाय. ती पुरूषांवर जमल तेवडी दादागिरी करती. स्त्री-पुरूष समतोल गावात तरी असावा म्हनून एका आदर्श स्त्रिची पोथी शोधा. ज्या स्त्रिने संसारात सहनशीलता दाखवून आदर्श ठिवलाय तिच्याच पोथीचं पारायन केलं पाहिजे कारन आपली संस्कृती सांगती की, “यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते  तत्र देवता||. ” बाबांनी “नमस्कार”करून ध्यान संपविलं. बाबांची भाकणूक झाली. सर्वांनी माना डोलावल्या आनि महिन्याभरातच पोथीचं पारायन सुरू करू आसं समद्यांनी ठरविलं.

आता पेचप्रसंग असा होता कुनाचं पारायन करायचं? ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गुरूचरित्र काहीच उपेगाचं नाय. अनेक संत स्त्रिया हुत्या की पन संसारी लई कमी हुत्या. संत जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा हुत्या पन संसारी नव्हत्या. स्त्रिची पोथी हवी ते पन सहनशील आनि संसारी हवी. बाबा स्वतः च या कामाला लागले.

आले पंढरपुरात. समदे मठ, पुस्तकांच्या दुकानात मानसं पाटवली. असाच आटवडा गेला. एक दिवशी रघू विठ्ठल मंदिरात किर्तन ऐकताना पळत पळत आला. “बाबा, बाबा म्यां आत्ताच एका स्त्रिची कथा ऐकून आलोय. आक्षी आपल्याला पायजे तशीच कथा हाय. पन तिची पोथी हाय का बघावं लागंल. ”किर्तनात महाराजांनी कथा लावली हुती एका स्त्रीची. अत्यंत सहनशील, अध्यात्मिक आनि संसारी. नाव हुते ‘संत बहिणाबाई ‘त्यांचे आख्यान ऐकूनच रघू पळत आला अन् बाबांना सर्व सांगू लागला. बाबा उठले. कुठल्या महाराजांनी कथा सांगितली ते शोधलं. ते हुतं महाराष्ट्रातील लई मोट्टं ‘संत धुंडामहाराज देगलूरकर. ’किर्तन संपलं..

बाबांनी महाराजांना वाकून नमस्कार केला, “जरा थोडं बोलायचं हुतं” 

महाराज म्हणाले, ”“बसा बसा. बोला की. काय  शंका हाय का? ” 

“शंका न्हाय पन आपन कथा सांगितलेल्या संत बहिणाबाईंची पोथी हाय का? ”

“ हाय की. पन जरा जीर्ण अवस्थेत हाय ”महाराज म्हणाले.

बाबांना खूप आनंद झाला. देविच्या मनात बी आलंय मंदिराचं काम पूर्न व्हावं याची पक्की खूण बाबांना पटली. ते म्हणाले, ”असू द्या. थोडं दिवस आमाला द्या. आमी पुना लिहून काढतो. काय आडलं तर तुमास्नी इचारतो. ”चला पोथीचा प्रश्न सुटला. रघूचा उत्साह वाढला. बरोबर आलेल्या गन्यानं इचारलं, “ आरं रघू, ह्या संत बहिणाबाई मंजी त्या पुस्तकात कविता असत्यात त्याच व्हय रं? ”

रघू म्हनाला, ” आरं त्या बी लई सोशिक हुत्या आनि ज्ञानानं, अनुभवानं तर लई बेस हुत्या बग. ह्या त्या नव्हंत पन त्यांची बहीनंच जनू. ह्यांनी हाल सोसत सोसत  नवऱ्याबर आयुष्य काढलं आनि कुनी त्यांचा छळ केला माहित हाय का? आरं नवऱ्यानंच. त्यांनी सर्व सोसलं. त्यांना मारन्याच्या नादात वासरालाबी मारलं. वासरू गेलं. त्या आजारी हुत्या, काय बी लक्ष दिलं नाही. पन गंमत म्हनजे नवरा घरातून निघून लांब जायला बगायचा. गेला की त्योच आजारी पडायचा. असं तीन चारदा झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शाम दहावीला बसतो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “शाम दहावीला बसतो…” ☆ श्री सुधीर करंदीकर

दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.

शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.

रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.

फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.

शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.

म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.

त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.

चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.

ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.

झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.

शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.

अमिताभ : किससे पूछना चाहोगे?

शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!

शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू

अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?

शाम : हा, सर. पक्का

अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.

टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर

अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल

ओबामा : यस्, आय नो दॅट यु आर ऑन द लाईन. हाऊ कॅन आय हेल्प यू?

अमिताभ : सर, शाम वॉन्टस टू आस्क यु समथिंग. यु विल बी गिव्हन 30 सेकंड्स. नेक्स्ट व्हाईस इज फ्रॉम शाम, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ

ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर

शाम जाम खुश झाला.

शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?

ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.

सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.

फोन कट झाला.

ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.

सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.

पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला

शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(सदानंद गेल्यावर लीना व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकली. आत्यानंदाने तिचं हृदय धडधडत होतं. सदानंदने सही केलेल्या फॉर्मवर परत एकदा नजर फिरवत तिने मनात म्हटलं ॓ थँक गॉड. अखेर जिंकले मी आयुष्याचा डाव. आपल्या हुशारीला, चलाखीला नशिबाने साथ दिली. आता जन्मभराची काळजी मिटली झोपाळ्याला हलकी गती देऊन लीना आठवणींच्या झुल्यावर रमून गेली …) 

इथून पुढे – – 

नीरज एमिलीची जवळीक वाढल्याने आपल्याला स्वतःच्या भविष्याची चिंता पडली होती. नशिबाने अशाच एका पार्टीत सदानंदची ओळख झाली. भारतात स्वतःचा छोटा व्यवसाय असलेला सदानंद काही कामानिमित्त त्याच्या मित्राकडे अमेरिकेत आला होता गप्पांमधून कळलं की बराच काळ आजारी असलेली त्याची पत्नी नुकतीच त्याला सोडून गेली होती. श्रीधर आणि रमा या त्यांच्या मुलांना त्याने बारावीनंतर अमेरिकेतच शिकायला ठेवलं होतं. रुबाबदार पण मनाने थोडा खचलेला सदानंद आपल्या सहानुभूतीच्या शब्दांनी जरा मोकळा झाला. फोन नंबर्सची देवाण-घेवाण झाली. आता हा चान्स अजिबात सोडायचा नाही असा निश्चय करून आपण त्याला एका निवांत हॉटेलला जेवणाचं निमंत्रण दिलं. बोलता बोलता डोळ्यात पाणी आणून आपण नीरजबरोबर लग्न करून कसं फसलो ते सांगितलं. आता ही मायावी अमेरिका नको वाटते. भारतात येऊन आधीचं सगळं विसरून शांत आयुष्य जगण्याची आपली इच्छाही त्याच्या कानावर घातली.

– – – 

सदानंद भारतात परतला तरी फोनवरून आपण त्याच्याशी सतत संपर्क ठेवला. बायकोच्या प्रदीर्घ आजाराने कंटाळलेल्या सदानंदलाही त्याच्या पोझिशनला शोभेशी, उच्चभ्रू समाजात वावरणारी कम्पॅनियन हवी होतीच. महिनाभरात तो अमेरिकेला परत आला.

नीरजलाही आपण दुसरं काही जमविण्याचा प्रयत्न करीत आहोत याचा अंदाज आला होता. त्याच्या मार्गातला अडथळा विनासायास दूर होतोय म्हणून तोही आपल्या वागण्याकडे दुर्लक्ष करीत होता. आपण नीरज बरोबरचे कायदेशीर व्यवहार पूर्ण केले. घटस्फोट घेतला आणि सदानंद बरोबर रजिस्टर लग्न करून तिथे छोटीशी पार्टी देऊन भारतात परतलो.

अमेरिका सोडण्याच्या आधी सदानंद च्या दोन्ही मुलांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना सांगितलं मी तुमच्याशी आईच्याच नात्यानं वागणार आहे. प्लीज तुम्ही मला आणि तुमच्या बाबांना समजून घ्या. सुट्टीमध्ये घरी या आम्ही तुमची वाट पाहू. त्या बुजलेल्या मुलांची थोडी समजूत काढून निरोप घेतला तेंव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरंगत होतं.

उपनगरातल्या एका को ऑपरेटिव्ह सोसायटीतला सदानंदचा बंगला स्टेशनपासून दूर असला तरी चांगला होता. फक्त देखभाल नसल्याने त्याची रया गेली होती. भारतात नोकरांची, कामगारांची काही कमता नसल्याने आपण त्यांच्या मदतीने बंगल्याचे, बागेचं रूप दोन दोन तीन महिन्यातच पालटलं.

आपल्या लग्नाच्या पार्टीला सदानंदचे दोन्हीकडचे नातेवाईक आवर्जून उपस्थित होते. आपल्या दिसण्याचं, मिळून- मिसळून वागण्याचं कौतुक करून त्यांनी सदानंदला चांगली सहचारिणी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. गेल्या काही वर्षात जवळच्या लग्नकार्यानाही न गेलेला सदानंद आपल्याला घेऊन अशा समारंभात उत्साहाने भाग घेऊ लागला. नाटक, सिनेमा, गाण्याचे कार्यक्रम, क्लब, पार्ट्या यात आपणही रमून गेलो.

सुट्टीसाठी श्रीधर आणि रमा तीन आठवडे येण्याचे ठरल्यावर आपण आवर्जून सारी तयारी केली. मुलांना आवडणारे पदार्थ करून घेतले. नवीन पडदे, रंग लावून त्यांच्या खोल्या सजवल्या. घरात बदललेलं रूप आणि बाबांची सुधारलेली प्रकृती बघून मुलही खुश झाली. श्रीधर रमाला सर्व नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना भेटता यावं म्हणून आपण एक गेट-टुगेदर अरेंज केलं. त्या पार्टीच्या चार दिवस आधी आपण सदानंदला नाश्त्याचे वेळी सांगत होतो की,  ॓अरे एकदा निमंत्रितांच्या लिस्टवर नजर टाक. आणि मेनू फायनल करण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरचा आता फोन येणारे तर मेनू बघून घे.॔ तेवढ्यात कॉन्ट्रॅक्टरचा फोन आलाच त्याच्याशी बोलत असताना सदानंदचाही फोन वाजला मुलं काल त्यांच्या एका मित्राकडे नाईट आऊटसाठी गेली होती.

सदानंद फोनवर आश्चर्याने विचारत होता एवढे पैसे आहेत तुझ्याकडे? बरं बरं! मग घे ते शूज तुला आवडले आहेत तर! फोन ठेवून सदानंद सांगू लागला, सकाळी घरी येता येता मुलं शॉपिंगला गेली. तिथे रमाला एक छान शूज आवडले पण त्यांची किंमत दहा हजार आहे म्हणून ती शूज घेऊ का म्हणून विचारत होती. पैशांबद्दल विचारलं तर ममाने दिलेत म्हणाली.

  ॓अरे हो! तुला सांगायचंच राहिलं. मी घरखर्चासाठी बँकेतून पैसे काढले तेव्हा मुलं येणार म्हणून त्यांच्यासाठीही वीस-वीस हजार काढले आणि मुलं आल्यावर त्यांना दिले. काय असतं ना, मित्र- मैत्रिणी बरेच दिवसांनी भेटतात. सिनेमा, हॉटेलिंग, खरेदी असते. मुलं आपली शिकताहेत. त्यांच्या जवळचे डॉलर्स, क्रेडिट कार्ड इथे कशाला वापरायचं? मुलांना कुठे कमीपणा येता कामा नये. तुझ्या पोझिशनप्रमाणे त्यांना सारं मिळालं पाहिजे. त्यांचा तो हक्कच आहे नाही का ?॔

आपलं बोलणं ऐकून सदानंदनं कृतज्ञतेने आपल्या हातावर हात ठेवला. लीना, कसं सांगू तुला? पैशाची काही कमी नाही पण असं काही करायला पाहिजे हे सुचलंच नसतं मला .॔

  ॓अरे मग मी कशाला आहे? काय ठरलंय आपलं? आता मागचं सगळं विसरून दोघांनी एकमेकांच्या सहवासात सुखात राहायचं. हो ना?॔ 

आपणही त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वस्त केलं पण पैसे काढताना जास्तीचे दहा हजार स्वतःसाठी काढले हे सांगायचं टाळलं. त्या आठवड्यात क्लबमध्ये रमी खेळताना आपण भरपूर हरलो होतो. त्यासाठी पैसे काढले हे सांगू त्याला नंतर कधीतरी असं मनाशी ठरवलं.

पार्टीमध्ये मुलं खुश होती. सर्वांशी मोकळेपणी बोलत होती. मुलांच्या आवडीचे पदार्थ करून घेऊन, त्यांच्यासाठी थोडी फार औषधं, कपडे सगळ्याचं व्यवस्थित पॅकिंग करून आपण त्यांच्या बॅगा भरल्या तेव्हा तिघेही कौतुकाने बघत आपल्याभोवती चिवचिवत होती.

काल रात्री श्रीधर- रमाला एअरपोर्टला पोहोचवून यायला उशीर झाला. सकाळी सदानंदला नाश्ता दिल्यावर आठवल्यासारखं करून आपण म्हटलं,  ॓अरे, आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरीबाईंचा रिमाइंडरचा फोन आला होता. मागच्या आठवड्यात त्यांनी घराच्या ॓चेंज ऑफ नॉमिनेशन ॔ साठी आपल्याकडे फॉर्म पाठवले होते पण मुलांच्या गडबडीत मी ते विसरले. त्यांची मीटिंग आहे शनिवारी. त्याआधी त्यांनी तो फॉर्म भरून मागितलाय.

  ॓एवढंच ना! दे तो फॉर्म. तुझ्या नावाने घराचं नॉमिनेशन करून तो फॉर्म भरून देतो.॔ सदानंद म्हणाला.

  ॓ अरे इतकी घाई नको करू. मुलांना विचार आणखी कुणाचा सल्ला घे.॔ आपण मानभावीपणे म्हटलं 

 ‌॓ कशाला? मुलांसाठी मी फॅक्टरीतला निम्मा-निम्मा हिस्सा ठेवलाय. ज्या घरासाठी तू एवढी जीव लावून धडपडतेस त्या घरावर तुझाच हक्क राहू दे. दे तो फॉर्म इकडे. बाकी काय त्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून देऊन दे तो सेक्रेटरीबाईंकडे.

नेहमीप्रमाणे सदानंदला हसतमुखाने बाय करून आपण इथे झोपाळ्यावरून येऊन बसलो. त्या सही केलेल्या फॉर्मवर डोळे भरून नजर फिरवली आणि मनातलं आवडतं गाणं ओठावर आलं….

 ‌॓ आय ॲम समथिंग स्पेशल!

आय हॅव टॅलेंट.. आय एम ग्रेट!

आय से थँक्यू फॉर द लाईफ 

आय ॲम एन्जॉईंग…!

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

.. आय ॲम समथिंग स्पेशल 

.. आय हॅव टॅलेंट… आय ॲम ग्रेट 

.. आय से थँक्यू फॉर द लाईफ 

.. आय ॲम एन्जॉईंग…!

 एका ऑपेरात ऐकलेलं आवडतं गाणं गुणगुणत लीना बाथरूममध्ये शिरली. शॉवर घेतल्यावर तिने टबभोवतीच्या स्टॅंडमधल्या रंगीत सुगंधी मेणबत्त्या लावल्या. सुवासिक फेसाने भरलेल्या टबमध्ये अलगद बसून तिने बाजूचा बुकस्टॅन्ड जवळ ओढला. सर्वांगाला गरम सुगंधी शेक घेत तिने बुक स्टॅंडवरच्या पुस्तकांवरून नजर फिरवून एक पुस्तक निवडण्याचा प्रयत्न केला. पण डोक्यात विचारांची गर्दी उसळली होती. अस्वस्थ मनाला दिलासा देण्याचा तिचा प्रयत्न सफल होत नव्हता. नीरज आणि एमिलीची वाढती सलगी तिच्या काळजाचा ठोका चुकवीत होती. अमेरिकेतल्या गेल्या जवळजवळ वीस वर्षांच्या वास्तव्याने तिथल्या मनमुक्त स्वैर वातावरणाला ती सरावली होती. पण हे एमिली प्रकरण हाताबाहेर जातंय या भीतीने तिच्या मनात घर केलं होतं. बुडबुड्यांच्या आवाजाने तिचे विचार विचलित झाले.

टबमध्ये तरंगणारे, डुलणारे इंद्रधनुष्यी बुडबुडे न्याहाळताना तिचं मन खूप मागे, गावच्या शंकराच्या देवळ्यामागल्या तळ्यावर पोचलं. पाणी भरायला आलेल्या बायकांच्या घागरींमुळे तळ्यावर लहान- मोठे बुडबुडे नाचत होते. त्यात छोटासा दगड भिरकावत आपण शेजारी बसलेल्या इशाला म्हटलं होतं, इशा या गावंढळ गावातून सटकायचा एकच मार्ग म्हणजे लग्न. थोडी तडजोड स्वीकारून एखाद्या मोठ्या शहरातला मुलगा पत्करला तर आपल्या मनासारखं आधुनिक जीवन अनुभवायला मिळेल.

इशाची आणि आपली मैत्री लहानपणापासूनची. दहावीनंतर दोघींनीही घरी हट्ट करून, तालुक्याच्या ठिकाणी राहून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्या पुढचं शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. नशिबानं त्याचवेळी सरकारी योजनेमुळे गावात मुलींसाठी मोफत कॉम्प्युटर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. त्या संधीचा फायदा घेऊन दोघींनी कॉम्प्युटरच्या मायाजालातल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. एका क्लिकवर होणाऱ्या विश्वरूप दर्शनाने त्यांची शहरी, श्रीमंत, चैनीच्या आयुष्याची ओढ वाढली होती. स्वतःच्या सौंदर्यावर हुशारीच्या जोरावर काहीतरी वेगळं मिळवण्याची त्यांची धडपड होती.

त्यावेळी इशाने तिचे बदामी पिंगट डोळे आपल्यावर रोखून म्हटलं होतं,  ॓अगं तेच सांगायला मी तुला इथे बोलावलंय. माझ्या दूरच्या, डोंबिवलीत राहणाऱ्या आत्याने तिथलं स्थळ माझ्यासाठी जमवत आणलंय. तो दिसायला अगदी सामान्य आहे पण नोकरी चांगली आहे. स्वतःची जागा आहे. जबाबदारी अशी काही नाही. आमचा जोडा विजोड दिसेल पण मी ॓हो ॔म्हणायचं ठरवलं आहे. पैशांची अडवणूक नाही त्यामुळे घरचेही खुश आहेत.

काँग्रॅटस् इशा. गो अहेड. नंतर मलाही शहराचा रस्ता शोधायला मदत कर. इशाने बाजी मारल्यामुळे मनातून थोड्या नाराजीने पण वरकरणी हसून आपण तिचं अभिनंदन केलं. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता तरी ॓कॉम्प्युटरच्या बाईंनी स्पेशल क्लासला बोलवलय ॔ अशी घरात थाप मारून आपण दुपारी बाहेर पडलो. तालुक्याच्या ठिकाणाहून या गावात मुलींना कॉम्प्युटर शिकवायला आलेल्या सरकारी बाई एकट्याच एक खोली राहत घेऊन रहात होत्या. घरातून निघताना पर्समध्ये हळूच भरून घेतलेले भोपळ्याचे पाच-सहा घारगे बाईंपुढे करत आपण म्हटलं आईने दिलेत. आणि सांगितलंय की त्या कॉम्प्युटरवर स्थळं शोधता येतात ना तर बाईंच्या मदतीने बघ काही बरं ठिकाण दिसतंय का ते! घारगे पाहून खुश झालेल्या बाईंनी त्यांच्या घरातला कॉम्प्युटर उघडून दिला. नशिबाने इंटरनेट कनेक्शन होतं. दोन-तीन तास खर्च करून आपण स्वतःच अशोकचं स्थळ शोधून काढलं. अमेरिकेत नोकरी करीत होता म्हणजे हुशार असणार. पण त्याच्या चेहऱ्यावरचा बावळेपणा लपत नव्हता. अगदी साधा शामळू दिसतो म्हणून अनेक मुलींनी नाकारलेला असावा. आपण अशोकला पत्करायचं ठरवलं. घरी आल्यावर बाईंच्या नावाने या स्थळाची माहिती सांगितली. भावाच्या मदतीने पुण्याला पोहोचलो. लांब केसांचा घट्ट शेपटा घालून दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन भावी सासू-सासर्‍यांना वाकून नमस्कार केला. दोघेही खुश झाले. यथावकाश अमेरिकेहून आलेल्या, चेहऱ्यावर बावळट हसू ओघळणाऱ्या अशोकशी लग्न होऊन आपण अमेरिकेत या स्वप्न नगरीत पोचलो तेव्हा नातेवाईक आणि गावकरी म्हणावे ॓नशीबवान आहे मुलगी !॔

तीन-चार वर्षांनंतर आपल्या बाळंतपणासाठी सासू-सासरे अमेरिकेत आले. त्यावेळी आपणच पुढाकार घेऊन स्वतःच्या बेबी- शॉवरचा घाट घातला. गेल्या चार वर्षात जमविलेल्या अनेक मित्र मैत्रिणींनी हौसेने येऊन भरपूर धमाल केली. पण अशोक तोंडदेखलं बावळट हसू हसून थंडपणे त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता त्याला सोशल लाईफची मौज मस्तीची अजिबात आवड नव्हती. शिवाय एवढे डॉलर्स खर्च करणंही त्याच्या जीवावर आलं होतं. मुुलगा झाल्यावर सासू-सासर्‍यांवर मुलाला बिनधास्त टाकून आपण आपलं पूर्वीच सोशल लाईफ सुरु ठेवलं.

अशाच एका पार्टीत नीरज भेटला. आपल्या ड्रेसचं, दिसण्याचं, ग्रेसफुल डान्सचं त्यानं भरभरून कौतुक केलं. आपल्या सर्वांगावरून त्याची नजर भिरभिरत होती. आपण मनातून सुखावलो. हवं असं काहीतरी सापडल्यासारखं झालं. उच्चपदस्थ नीरज घटस्फोटीत होता. फारसा विचार न करता पुढच्या पायऱ्या भराभर ओलांडून आपण अशोक बरोबर घटस्फोट घेतला.

अशोकचं घर सोडताना चार-पाच वर्षांच्या छोट्या आनंदसाठी पाय अडखळत होते पण नीरजला मुलाबाळांचा गुंतवळा नको होता. त्याला फुलपाखरासारखं स्वच्छंदी, रंगीबेरंगी आयुष्य उपभोगायचं होतं. चैनीच्या स्वैर, विलासी आयुष्याचा आपल्यालाही मोह पडला.

जवळजवळ दहा वर्ष आपण नीरज सोबत ऐषोआरामात काढली. या काळातही तो दुसऱ्या काही स्त्रियांच्यात थोडाफार गुंतला होता. तरी आपण हुशारीने, सावधपणे नीरजवरची पकड अधिकच घट्ट केली. पण हे एमिली प्रकरण डोईजड होतंय. आपल्याला सोडून नीरजने एमिलीशी लग्न करायचं ठरवलं तर आपलं भवितव्य काय? या अफाट अमेरिकेत आपण कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? कपडे घालता घालता लिनाचं विचारचक्र सुरू होतं. तिने मान झटकली आणि निश्चय केला,  ॓छे! अशी हार मानून चालणार नाही. आयुष्यातलं हेही वळण सफाईन पार केलं पाहिजे मात्र आता स्थिर आयुष्याच्या दृष्टीने विचारपूर्वक, हुशारीने पावलं टाकली पाहिजेत. पन्नाशी जवळ आलीय. चांगली संधी मिळेपर्यंत नीरजला दुखावून चालणार नाही या विचारांनी तिला थोडं हलकं वाटलं.

 ****

 नीटनेटका भरलेला डबा आणि पाण्याची बाटली लीनाने किल्ली न्यायला आलेल्या ड्रायव्हर जवळ दिली.

 पावसाचं लक्षण दिसतंय. छत्री आहे ना गाडीत? आणि दुपारी वेळेवर जेव बरं का. डब्यात वरतीच दुपारची औषधं ठेवल्येत. ती घे. मी फोन करीनच. लीनाने प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने सदानंदला बाय केलं.

  ॓अगं हो हो! किती काळजी घेशील? आणि आता जरा रेस्ट घे. काल रात्रीही एअरपोर्टवरून यायला उशीर झालाय. गेला महिनाभर धावाधाव चाललेय तुझी. मावशीनाही आज सुट्टी दे. संध्याकाळी आपण बाहेरच जाऊ. सदानंदने लीनाला अच्छा करताना प्रेमाने बजावलं.

सदानंद गेल्यावर लीना व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकली. आत्यानंदाने तिचं हृदय धडधडत होतं. सदानंदने सही केलेल्या फॉर्मवर परत एकदा नजर फिरवत तिने मनात म्हटलं ॓ थँक गॉड. अखेर जिंकले मी आयुष्याचा डाव. आपल्या हुशारीला, चलाखीला नशिबाने साथ दिली. आता जन्मभराची काळजी मिटली .॔

झोपाळ्याला हलकी गती देऊन लीना आठवणींच्या झुल्यावर रमून गेली.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अंगतपंगत… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ अंगतपंगत… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“चल कल्पना, जरा शेवयाची खीर करून घेतेस का? मी समोरची खोली झाडून घेते… खरंतर आमची अंगतपंगत नेहमी गच्चीवर लिंबाच्या सावलीत असते पण आज नेमकं आभाळ आहे ना त्यामुळे आपल्याकडे ठरलंय, तू आटपून घे लवकर, कारण बायकांचा घोळका आला ना की गप्पांमुळे काही सुचणार नाही. “

 कल्पनाने शेवया परतायला घेतल्या, एकिकडे दूध तापवायला ठेवलं. तिला वहिनींमधला सकाळचा नवरा बायकोचा संवाद आठवला, “अहो जरा दूध जास्त आणायचं आहे, आज आमची अंगतपंगत आहे. काहितरी गोडधोड म्हणून खीर करते. जोशी काकु येतील आज. नवरा वारल्यानंतर त्यांना बोलवायचं राहिलं. पलीकडच्या अविच्या बायकोची गोड बातमी आहे, सुमती आजीची नात मोठी झालीए, तिचंही कौतुक करायचं आहे, माणकेबाईंचा पोरगा मेरीटमध्ये आला त्या माऊलीचं कौतुक गोडधोडाने होईल… “

 त्यावर त्यांचे नवरोबा म्हणाले, “अहो राणीसरकार तुमचा निर्णय आम्ही नाही थोडीच म्हणणार आहे, हे घ्या शंभर रुपये आणि हवं ते आणा म्हणजे तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी गजरे ही आणा हवे तर, आणि तुम्ही लावा एखादा, तुम्हालाही गोड खीर हवी ना, आपलं सगळं आहे, त्यात धकवून नेहमी आनंदी राहता तुम्ही… “

 वहिनी लगेच म्हणाली होती, “अहो हे आनंदी राहणं ना तुमच्या चाळीतल्या बायकांनी शिकवलं आहे मला… ह्या अंगतपंगत मधून. सहा एक महिन्यात कधीतरी आम्ही भेटतो, रोजच्यापेक्षा वेगळं, एकमेकींचे लाड पुरवायला वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी भरते, कुणाचं तिखट तर कुणाचं अंबट, कुणाचं गोड तर कुणाचं साधं जेवण, आणि त्या सोबत संवादाची असणारी देवाणघेवाण ह्या पदार्थांसारखीच सुरू असते. कुणीतरी आयुष्यातला गोड अनुभव सांगते. तेवढ्यात कुणाचं तरी जखमेवर मीठ चोळल्या जावं असा आयुष्याचा अनुभव असतो, कुणीतरी साधं सरळ काहितरी नात्यातलं मांडतं तर कोणी अध्यात्माचं सारं गप्पांतून मांडून जातं… चला, बोलत बसायला विषय तसा आवडीचा आहे, द्या ते पैसे, तुम्हालाही मिळेल हो आज गोड खीर” असं म्हणत उत्साहाने वहिनींनी सगळी तयारी केली होती.

 विनयच्या ऑफिसच्या कामामुळे आपण दोन दिवस पाहुण्या असलो तरी आपली अडचण न वाटून त्यांनी अंगतपंगत करायचं ठरवलंच होतं, कल्पनाला मनात वाटलं खरंच हाय सोसायटीत असला आनंद नाहीच घेता येत, प्रत्येक जण आपल्या मोठेपणाची प्रौढी मिरवतो. आता अंगतपंगत तर आपल्या सोसायटीत होतच नाही, पण भिशी पार्टी अशीच काहीशी पण पदार्थांपासून इतर सगळ्याच गोष्टींचं प्रदर्शन करणारी. खरंच हि अशी अंगतपंगत व्हायलाच हवी असं कल्पनालाही वाटून गेलं.

 वहिनी आत आल्या तेंव्हा कल्पनाने हे बोलून देखिल दाखवलं.. त्यावर वहिनी म्हणाल्या, “खरंतर मी आले त्या वातावरणात असलं काही नव्हतंच, शिष्टाचाराने दार लावून जेवणं, कोणी आलं तरी हॉलमधून ताट घेऊन आत पळत जाणाऱ्या संस्कृतीतून मी आले. मला नवीन नवीन रुळायला वेळ लागला पण आवडायला लागलं हे असं अंगतपंगत मधुन होणारं वेगवेगळ्या आयुष्याची देवाणघेवाण करणं, आपण जगत असतो आपलीच सुखदुःख कुरवाळत, फारसं कोणाशी विचारांची देवाणघेवाण न करत अगदी आपल्या रोजच्या जेवणासारखं आपलं आपलं जेवून घ्यायचं, पण त्यात हि संकल्पना आवडली. जुनीच असली तरी हल्ली बऱ्यापैकी बंद पडलेली, पण ह्या सोसायटीत अखंड चालू असलेली अंगतपंगत देवाणघेवाण.

 आपल्यापेक्षाही संघर्ष करत जगणारे आयुष्य असतात त्यांना बघून शिकता येतं. ह्या विचारांच्या अंगतपंगत मधुन भावना आणि पदार्थ दोन्ही खुप काही शिकवून जातात. एक वेगळाच उत्साह, एक वेगळी किनार आयुष्याला मिळते. तू बघच आज” म्हणत वहिनींनी मघाशी आणलेले गजरे दोन दोन तुकड्यात केले, “अग सगळ्यांना पुरवायला हवे”.

 दाराशी सुंदर रांगोळी सजली, देवासमोर सुंदर सुवासिक उदबत्ती लावली आणि छोट्याशा वाटीत खिरीचा नैवेद्य देवासमोर ठेवत वहिनी म्हणाल्या, “आमच्या अंगतपंगत मधला तू मुख्य पाहुणा, प्रत्येकाच्या चैतन्यातून डोकावणारा, मग पहिले आजची स्पेशल डिश तू घे आणि अशीच सगळ्यांच्या विचारांनी आयुष्याची अंगतपंगत आंनदी होऊ दे, “

 छान आवरून चाळीतल्या एकएक जणी येत होत्या, आपले डबे मध्यभागी मांडून पटापट पान मांडत होत्या. काही ज्येष्ठ बायका ‘हे सगळं परंपरेने चालू आहे आपल्या सोसायटीत’ ह्याचं कौतुक करत होत्या… पदार्थांची ताटात रेलचेल झाली होती.. खिरीच्या वाट्या सजल्या.. ‘वदनी कवल घेता’ म्हणत हसत खेळत जेवणं सुरू झाली.. गप्पांना वेग आला, अगदी मनमोकळेपणाने पदार्थांसारखीच भावनांची देवाणघेवाण सुरू होती, कुणाचं एखादं दुखणं त्यावर दहा तरी उपाय सापडत होते, कुणाच्या आर्थिक अडचणींसाठी घरगुती तोडगे सांगितले जात होते, कुणी फार दिवसात कुणाशी बोलणं झालं नाही म्हणत मनसोक्त गप्पा मारत होत्या, कुणी कुठे काय छान मिळतं याची यादी देत होत्या, एकंदर सगळं हलकंफुलकं वातावरण होतं,.. तेवढ्यात जोशी काकूंना ठसका लागला, डोळ्यातून खळखळ पाणी आलं. ठसक्याचं पाणी काकांच्या आठवणीने वहायला लागलं हे सगळ्यानी ओळखलं. सगळ्यांचेच डोळे पाणावले, कारण हि अंगतपंगत चाळीत काकांनीच सुरू करायला लावली होती बायकांना… काका म्हणायचे.. “तुम्ही बायका एकट्या असल्या की विचार तुमच्यावर राज्य करतात, जरा महिनाभरात एकमेकींना भेटत जा, एकमेकींचे लाड करत जा, ह्या अंगतपंगत मध्ये सगळ्याच तुम्ही सासुरवाशिणी आपलं माहेरचं अंगण सोडून आलेल्या इथे एकत्र येऊन एकमेकींना आई, मावशी, ताई बनवा आणि चालू द्या विचरांची अंगतपंगत म्हणजे मोकळ्या राहताल, साचत गेल्या तर मानसिक उपचार करायची वेळ येईल. मी बघतो, आमच्या दवाखान्यात येतात अश्या बायका, तेंव्हा वाईट वाटतं, ह्यांना कोणीच कसं जमवता आलं नाही आयुष्यात, मग वाटतं, आपल्याच भोवताली असतात ही माणसं, म्हणून ही अंगतपंगतची कल्पना सुचली… आपल्याच शेजारी पाजारी बनणारे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ घेऊ या आपल्या ताटात, तेंव्हाच समोरच्यांच्या आयुष्याचीही चव लक्षात येईल, संवादातून मग कळेल ‘अरे संघर्षात जगणारे फक्त आपणच नाही, तो प्रत्येकाला आहे, फक्त प्रत्येकाच्या संघर्षाचा रंग वेगवेगळा आहे, कुणाला लेकरू नसल्याचा, कुणाला नोकरी नसल्याचा, कुणाला पैश्याने, कुणाला आजाराने संघर्ष करावाच लागतोय.. मग ह्यात काय, जशी दुसऱ्याची भाजी अंगतपंगतला ताटात घेतल्यावर बरं वाटतंय तस दुसऱ्याला पण संघर्ष आहे, आपण काही एकटे नाही, ही भावना बळावून जगण्याला आणखी उत्साह येणार आहे. जसा दुसऱ्याच्या घरचा पदार्थ खाऊन जेवणाला चव येते तसंच आहे हे. ह्यातून जगण्याचा सोहळा करायला शिका. एखादा गोड पदार्थ निमित्त म्हणून खाऊ घाला सगळ्यांना. मनाला आनंद मिळतो पण तो मिळवण्याची तयारी पाहिजे.. इतकं साधं अंगतपंगतच गणित मांडून काका आज हि परंपरा चालू ठेवून निघून गेले होते.. सगळ्यांनी डोळे पुसले. परत विषयांतर झालं… हसत खेळत अनेक विषय हाताळले. मनं मोकळी झाली. संवादाची देवाणघेवाण होऊन गजऱ्याच्या सुगंधी निरोपाने अंगतपंगत संपली.. घरभर मोगऱ्याची दरवळ झाली….

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(किशनजी क्षणभर शांत राहिले, मग म्हणाले, “नाही. कारण मी अनेकांना भीतीने मरताना पाहिले आहे आणि अनेकांना श्रद्धेने जगताना. त्यातून मी शिकलो आहे— खरी श्रद्धा घाबरत नाही. ती सन्मानाने उभी राहते, ठाम, भीतीशिवाय. ”) 

इथून पुढे

म्होरक्याने आपला चहा संपवला. बसकडे पाहत. झोपलेली माणसं — वृद्ध, मुले, कुटुंबे.

म्होरक्या बसच्या मागच्या बाजूला गेला. लोक झोपले होते. एक मूल एका टेडी बेअरला बिलगले होते. एका वृद्ध महिलेच्या बोटात जपमाळ होती. कोणीतरी घोरत होते. सामान्य माणसे. त्याच्या गावातील लोकांसारखी, त्याच्या आईसारखी, मावशीसारखी, आजीसारखी.

तो किशनजींकडे परतला. “माझी आजी… ” तो थांबला.

“त्यांचं काय? ” किशनजींनी विचारले.

“ती दरवर्षी याच मार्गाने प्रवास करायची— खाटू, पुष्कर. ती म्हणायची की यामुळेच तिला शांती मिळते. तीन वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. मी तिला शेवटच्या वेळी घेऊन जाऊ शकलो नाही. मी busy होतो. ” त्याचा आवाज दाटून आला.

किशनजींनी मान डोलावली. “तुम्हाला माहित आहे का, ” ते म्हणाले, “या मार्गाबद्दल मला सर्वात जास्त कशाचा त्रास होतो? चेकपॉइंट्सचा नाही. खराब रस्त्यांचा नाही. पण जेव्हा कोणी म्हणतं— “माझ्या अमुक अमुकला ही यात्रा करायची होती, पण ती होऊ शकली नाही. ”

म्होरक्याने डोळे मिटले.

“या बसमधील प्रत्येक व्यक्ती असा वेळ खर्च करत आहे, जो त्यांना कदाचित नंतर परत मिळणार नाही. ते असे पैसे खर्च करत आहेत, जे कदाचित अन्य काही कामासाठी वापरले जाऊ शकले असते. पण ते या प्रवासावर ते पैसे खर्च करत आहेत. का? कारण आतून काहीतरी त्यांना जाणवत आहे की त्यांनी आत्ता इथेच असायला हवे. ”

त्यांनी डॅशबोर्ड उघडला. एक जुनी, जीर्ण डायरी बाहेर काढली. “बघा, ” ते म्हणाले. “४० वर्षांहून अधिक काळातील प्रवाशांच्या सह्या. हजारो नावे. हजारो कथा. काहीजण आता या दुनियेत नाहीत, पण त्यांची श्रद्धा अजूनही इथे आहे. ”

म्होरक्याने ती डायरी हातात घेतली आणि पाने चाळू लागला. आणि तो थबकला. एक नाव वाचून. “मंजू देवी त्रिवेदी, १६ ऑगस्ट, २००३. खाटू श्याम यात्रा—नातवाच्या आरोग्यासाठी. ”

त्याचे हात थरथरू लागले. “ही… ही तर माझी आजी आहे. ”

किशनजींनी हळूच मान डोलावली. “मला माहित आहे. जेव्हा तू बसमध्ये चढलास तेव्हाच मी तुला ओळखले होते. तुझे डोळे अगदी तुझ्या आजीसारखेच आहेत. ती नेहमी म्हणायची, “माझा नातू एके दिवशी लोकांचे रक्षण करेल. ”

एक क्षणभर शांतता.

म्होरक्याने डायरी बंद केली. “तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? ” त्याने जड आवाजात विचारले.

“काही नाही, ” किशनजी म्हणाले. “फक्त तू कोण आहेस हे ठरव. लोकांचे रक्षण करणारा मंजू देवीचा नातू की प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली हप्ता गोळा करणारा एक गुंड. ”

म्होरक्या बसमधून खाली उतरला, आपल्या माणसांमध्ये उभा राहिला.

आकाश मंदपणे उजळत होते.

“चला, ” तो म्हणाला, “रस्ता मोकळा करा. बसला जाऊ द्या. ही बस आज जाईल. प्रत्येक वेळी. “

वाहने बाजूला झाली. रस्ता मोकळा झाला. म्होरक्या परत आला.

“धन्यवाद, ” किशनजी म्हणाले, “तुम्हाला नाही, तुमच्या आजीला. तिने तुमच्यावर केलेल्या संस्कारांना. “

बस पुढे सरकली. प्रवासी जागे होत होते पण पहाटे काय झाले होते, हे किशनजींनी कोणाला कधीच सांगितले नाही.

पण पुढच्या शनिवारी, जेव्हा ते त्याच मार्गाने पुन्हा जात होते— ४७ व्या किलोमीटरवर, वाहने तिथे रस्ता अडवून होती. पण यावेळी, जेव्हा बस जवळ आली, ते फक्त बाजूला झाले. कोणताही इशारा नाही. कोणतेही प्रश्न नाहीत. थांबवणे नाही. आणि त्या वाहनांपैकी एकाच्या खिडकीवर, कोणीतरी खाटूश्यामजींचे एक छोटे चित्र चिकटवले होते.

किशनजींच्या ते लक्षात आलं, ते हलकेच हसले. त्यांनी हॉर्न वाजवला आणि बस पुढे काढली.

त्या सकाळच्या सहा महिन्यांनंतर, त्यांच्या घरी, दारात एक पाकीट पडलेलं त्यांना दिसलं. कोणताही पत्ता नाही. पाठवणाऱ्याचे नाव नाही. फक्त हाताने लिहिलेले होते— किशन यादव. आत दोन गोष्टी होत्या. पहिली— एक ५०० रुपयांची नोट, त्यासोबत एक छोटा कागदाचा तुकडा— “बसच्या आणि भक्तांच्या देखभालीच्या निधीसाठी. ” — एक हितचिंतक आणि दुसरी गोष्ट— एक जुना फोटो. त्या फोटोमध्ये, मंजू देवी त्रिवेदी किशनजींच्या बससमोर उभ्या होत्या. वर्ष २००३ होते. त्या हसत होत्या. त्यांच्या मागे, सुमारे १० वर्षांचा एक मुलगा उभा होता, बसकडे पाहत होता.

फोटोच्या मागे, थरथरत्या अक्षरात लिहिलेले होते— “आजीचे म्हणणे खरे होते. तिचा नातू आता खरंच लोकांचं रक्षण करतो. धन्यवाद. ” मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. —मंजू देवीचा नातू”

किशनजींनी तो फोटो आपल्या जुन्या डायरीत ठेवला— अगदी त्याच पानावर जिथे मंजू देवीची सही होती.

नंतर जेव्हा जेव्हा ते तो किलोमीटर ४७ वरून जायचे तेव्हा तेव्हा तिथे, त्या मैलाच्या दगडाशी ते बसचा हॉर्न वाजवायचे.

लोकांनाही ४७ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाशी घडलेली घटना आता ठाऊक झाली होती.

किशनजी आणखी सात वर्षे त्याच मार्गावरून चालले. मग डोळे आणि हात साथ द्यायला कमी पडू लागल्यावर ते थांबले. त्यांच्या शेवटच्या प्रवासाच्या दिवशी, किलोमीटर ४७ वर, काहीतरी वेगळे होते. तिथे कोणतीही वाहने नव्हती. तिथे फुले होती— शेकडो फुले, रस्त्याच्या कडेला.

आणि एक फलक— “श्रद्धेचे रक्षण करणाऱ्याचे आभार. “

किशनजींनी बस थांबवली. त्यातले एक फूल सोबत घेतले – खाटूश्यामला वाहण्यासाठी.

काळ वहात राहिला. किशनजी राहिले नाहीत. ते खाटूश्यामजींच्या चरणी विलीन झाले.

पण तो मार्ग तसाच आहे. नवीन चालक त्यावर गाडी चालवतात. नवीन यात्रेकरू त्यावरून चालतात.

आणि प्रत्येक वेळी जेव्हा बस ४७ व्या किलोमीटरवरून जाते— तेव्हा चालक तीनदा हॉर्न वाजवतो. यात्रेकरू हात जोडतात. आणि प्रत्येकजण एक मिनिट मौन पाळतो.

त्या चालकासाठी – जो घाबरला नाही.

त्या माणसासाठी – ज्याला आठवले की तो कोण आहे.

आणि त्या आजीसाठी – जिने श्रद्धेचे आणि संस्कारांचे बीज पेरले.

– समाप्त –  

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

आज शनिवार होता, बस पहाटे नेहमीप्रमाणे निघाली होती. हा प्रवास किशनजींना काही नवीन नव्हता, दर शनिवारी पहाटे जयपूरहून निघायचं, आधी खाटूश्यामजींचे दर्शन घ्यायचं, मग तिथून पुष्करला ब्रह्माजींचं मंदिर आणि संध्याकाळपर्यंत जयपूरला परत. गेली चाळीस वर्षे किशन यादव शनिवारी याच रूटने ट्रॅव्हल्सची बस चालवायचे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी. प्रत्येक जत्रेसाठी. प्रत्येक नवसासाठी.

४७ किलोमीटरचा मैलाचा दगड जवळ येत होता, आणि किशनजींना बसच्या मागच्या आरश्यात प्रखर हेडलाईट्स दिसू लागले. तीन एसयुव्ही गाड्या वेगाने बसचा पाठलाग करत होत्या. त्यांना आश्चर्य वाटले नाही, ते चलबिचल झाले नाहीत. त्यांचे हात स्टिअरिंग व्हीलवर स्थिर होते. त्यांनी मागे झोपलेल्या ६२ यात्रेकरूंना जागे केले नाही. कारण त्यांना माहित होते की ते येणार आहेत.

खरं तर, ते तीन दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांना एक निनावी फोन आला होता, “या शनिवारी, खाटूश्यामजींच्या दर्शनाला पहाटे निघणारी तुमची बस ४७ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाशी थांबवली जाईल. ” एवढंच सांगून फोन कट केला गेला होता.

किशनजी पूर्ण पाच मिनिटे फोनकडे पाहत राहिले. नंतर ते फक्त गूढ हसले. त्यांनी ना आपल्या दैनंदिन व्यवहारांत बदल केला, ना आपल्या पत्नीला – ना ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला या फोनबद्दल काही सांगितलं.

फोननंतर दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे गाडी मेकॅनिककडे घेऊन गेले. ब्रेक, तेल पाणी वगैरे सर्व तपासून घेतलं, प्रवासात काही तांत्रिक अडचण यायला नको होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व प्रवाश्यांना फोन केले. “तुमची औषधे सोबत आहेत का? ”, “तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगितले आहे का? ”, “तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला जायचेच आहे? ” आपल्या नातवाच्या आरोग्यासाठी नवस करणाऱ्या ८४ वर्षीय शांती देवी म्हणाल्या, “बाळा, मी सहा महिन्यांपासून वाट पाहत आहे. भले माझा हा जीवनातील शेवटचा प्रवास ठरला, तरी मी जाईनच. ” 

फोनवर होकार दिलेले सर्व प्रवासी आपापल्या पिशव्या, थर्मास, जपमाळा आणि आशा घेऊन गाडीत बसलेले होते, माळा जपत असलेल्या वृद्ध स्त्रिया, संपूर्ण कुटुंबे, घोंगड्यांमध्ये गुंडाळलेली मुले – सगळे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.

आरशात दिसणारा हेडलाईट्सचा प्रकाश अधिक तेजस्वी झाला. मैलाचा दगड जवळ येत होता. पुढे काय होणार हे किशनजींना ठाऊक होतं, त्यांनी ब्रेक लावायला सुरुवात केली. मैलाचा दगड आला आणि त्याच क्षणी, एसयूव्ही गाड्या बसचा मार्ग रोखत तिला आडव्या थांबवल्या गेल्या.

किशनजींनी ब्रेक दाबले. बसच्या एअरब्रेकने एक मोठा सुस्कारा सोडला. बस थांबली. साइड मिररमध्ये त्यांनी पाहिलं, एसयूव्हीमधून माणसे खाली उतरत होती. सहा – आठ – दहा. हातात वॉकी-टॉकी, फ्लॅशलाइट्स — आणि ती चाल – ज्यांना आव्हान देण्याचे धाडस कोणी करत नाही.

त्यांच्यापैकी एकजण, बहुधा त्यांचा म्होरक्या, बसच्या दरवाजाजवळ आला. बोटांनी काचेवर दोनदा थाप मारली. किशनजींनी बटन दाबून आत येणाऱ्या दरवाज्याचे दार उघडलं, बसचे इंजिन बंद केलं, आणि म्हणाले, “बोला. मी तुमची वाटच बघत होतो. तुम्ही इथे बस थांबवणार हे सांगणारा फोन आला होता मला. “

तो म्होरक्या, सुमारे ३५ वर्षांचा, धिप्पाड शरीरयष्टीचा, करारी नजरेचा— बसच्या पहिल्या पायरीवर चढला. त्याच्या टॉर्चचा प्रकाश किशनजींच्या चेहऱ्यावर पडला. “आम्ही तुम्हाला थांबवणार हे माहित होतं, आणि तरीही तुम्ही आलात? ”

किशनजींनी सरळ त्याच्या डोळ्यात पाहिले. “मी गेली ४० वर्षे या मार्गावरून प्रवास करत आहे. मी लष्करी चेकपॉईंट पाहिले आहेत. मी पोलीस अधिकारी पाहिले आहेत. तुमच्यासारखी माणसे. इतर टोळ्या. दरोडे, अपहरण, लाचखोरी—सगळं काही. आणि या सगळ्यातून एकच शिकलो, पाठ दाखवायची नाही, लपायचं नाही. लपल्याने गोष्टी नेहमीच बिघडतात. ”

तो म्होरक्या किशनजींकडे पाहत राहिला— त्यांच्या नजरेतली भीती शोधत, कमकुवतपणा शोधत, आवाजातील कंप शोधत. पण त्याला यापैकी काहीच आढळलं नाही. आणि याच गोष्टीमुळे त्याला सर्वाधिक अस्वस्थता वाटत होती.

“आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहीत आहे का? ” त्याने विचारले.

“मला माहीत आहे, ” किशन म्हणाला. “तुम्ही गेल्या आठ महिन्यांपासून या भागावर नियंत्रण ठेवले आहे. तुमच्याआधी कोणीतरी दुसरे होते. आणि कदाचित काही वर्षांनंतर कोणीतरी दुसरे असेल. ”

मग त्यांनी आपले डोके मागे वळवले— जिथे प्रवासी बसमध्ये झोपले होते. “पण ही माणसे… ती येतच राहतील. कारण श्रद्धा अमर आहे. ”

म्होरक्याचा एक साथीदार बसमध्ये चढला. तरुण. थोडा घाबरलेला, गोंधळलेला. त्याचे बोट वायरलेस रेडिओच्या बटणाजवळ होते. “सर… आता आपण काय करायचे? ” तो कुजबुजला. म्होरक्याने उत्तर दिले नाही. तो अजूनही किशनजींकडेच पाहत होता.

“तुम्ही बसमध्ये काय घेऊन जात आहात? ” त्याने विचारले.

“६२ भाविक. १७ मुले. २८ महिला. १७ पुरुष. ” किशनजींनी लगेच सांगितलं. “खाटूश्यामला जात आहेत. काहीजण आभार मानण्यासाठी. काहीजण चमत्काराची मागणी करण्यासाठी. ” 

मग त्याने हळूच मागे बोट दाखवले. “सीट नंबर २३ वर बसलेल्या शांती देवी त्यांच्या नातवासाठी प्रार्थना करायला जात आहेत. त्याला कॅन्सर आहे. रामस्वरूपजी सीट नंबर १५ वर आहेत— आपल्या मुलीच्या जगण्यासाठी घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी. आणि ८ ते १२ पर्यंत शर्मा कुटुंब आहे— गेल्या पुरात त्यांचे घर वाहून गेले. ते फक्त नव्याने सुरुवात करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायला जात आहेत. ”

म्होरक्याने डोळे मिचकावले. “तुम्हाला जणू प्रत्येकाची कहाणी आठवते, नाही का? ”

“प्रत्येकाची, ” किशनजींनी मान डोलावली. “कारण तेच माझे काम आहे, फक्त बस चालवणे नाही—मी कोणाला घेऊन जात आहे, का घेऊन जात आहे, हे जाणून घेणे, हे माझे काम आहे. माझी बस फक्त एक बस नाही, ते एक चालतेफिरते मंदिर आहे. श्रद्धाळूंच्या आशेचे प्रतीक! ”

आणखी काही न बोलता किशनजींनी आपला थर्मास बाहेर काढला, एक कप चहा स्वतःला घेतला, दुसऱ्या कपात चहा ओतला आणि त्या म्होरक्याला देऊ केला. “चहा घ्या, थंडी आहे. “

म्होरक्याने एक घोट घेतला. चहा गरम होता—वेलची आणि गुळाच्या सुगंधाने दरवळणारा. अगदी तसाच, जसा त्याची आजी लहानपणी त्याला बनवून द्यायची. आणि त्या क्षणी— फक्त एका क्षणासाठी— तो त्या भागातला शक्तिशाली माणूस – भाई – डॉन राहिला नाही, तो फक्त एक ३५ वर्षांचा माणूस होता, जो वीस वर्षांपूर्वीच्या एका प्रेमळ स्वयंपाकघराची आठवण काढत होता. “तू घाबरत का नाहीस? ” त्याने हळूवारपणे विचारले.

किशनजी क्षणभर शांत राहिले, मग म्हणाले, “नाही. कारण मी अनेकांना भीतीने मरताना पाहिले आहे आणि अनेकांना श्रद्धेने जगताना. त्यातून मी शिकलो आहे— खरी श्रद्धा घाबरत नाही. ती सन्मानाने उभी राहते, ठाम, भीतीशिवाय. ”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares