मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्म… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ कर्म… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

आपुलकीच्या

नात्याने

स्नेह जपावा

मनामध्ये

अन् चुकू नये कधी

कर्तव्यामध्ये…

 

नकोत केवळ

विटांच्या भिंती

स्वार्थ विरहीत

प्रेम असावे चित्ती…

 

येणा-याचे अगत्याने

स्वागत करु या

जाणा-याच्या मनात

ओढ वाटावी परतण्याची तया…

 

आज आहोत

उद्या नसू हयात

ओठी प्रत्येकाच्या

नामोल्लेख असावा तयात…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७९ – मौलिक प्रवास…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७९ – विजय साहित्य ?

☆ मौलिक प्रवास…!

मित्रासवे दुचाकीने

बालपणी दिली साथ

जवळच्या प्रवासात

“सायकल”  दावी वाट…! १

*

वाट वाकडी तिकडी

कींवा डोंगराचा घाट

कच्च्या पक्क्या रस्त्यातून

“सायकल”  काढी वाट…! २

*

कधी मागे, कधी पुढे

बैसवोनी सवंगडी

वाण सामान वहाया

“सायकल”  हरघडी…! ३

*

हवा भरताच धावे

प्रवासात भरे रंग

“सायकल”  सफरीचा

मनमौजी असे ढंग…! ४

*

हातामध्ये असे ब्रेक

नियंत्रित हिची धाव

क्षण भर विश्रांतीचे

गाठी मुक्कामाचा गाव…! ५

*

नित्य घडतो व्यायाम

वेळ वाचवीते खास

नाही खास देखभाल

करी मौलिक प्रवास..! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सन्मानचिन्ह…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ सन्मानचिन्ह ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

जन्म दिला माऊलीने

पदरात जोजविले

तिच्या पदरात सदा

प्रेम वात्सल्य लाभले ||

आजी मावशी ताईचा

लाभे पदर मायेचा

येता कसले संकट

हात देती आधाराचा ||

 *

चूक पदरात घेई

खूणगाठ पदराला

बांधी पदरी निखारा

वाण सतीचे बाईला ||

 *

ओटी पदरात घेते

संसारात प्रवेशिता

सारे सर्वस्व सखीचे

पदरी सुरक्षितता ||

 *

पदराचे आभूषण

खूण तिच्या सौंदर्याची

शोभे तिला प्रभावळ

शान तिच्या सन्मानाची ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्तिसूत्र ३९ – – 

महत्संगस्तुदुर्लभोऽगम्योऽमोघश्‍च ॥ ३९ ॥

अर्थ : संत महापुरुषांची संगत दुर्लभ, अगम्य व अमोघ – (कधीही व्यर्थ न जाणारी) आहे.

विवरण :  मागील सूत्रात महात्म्याची कृपा हे भक्तीप्राप्तीचे अंतरंग साधन आहे असे सांगितले पण तो महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा आहे असे ते म्हणतात. एका सुभाषितकाराने म्हटले आहे, ‘प्रत्येक पर्वतावर माणिक म्हणजे रत्न सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मौक्तिक (मोती) नसतो. प्रत्येक वनात उत्तम चंदनवृक्ष असतो असे नाही, त्याप्रमाणे सर्वत्र साधू दिसतात, सापडतात असे नाही. ‘ बहुतेक संसारी जीव अनादि अज्ञानमूलक संस्काराने शुभाशुभ पापपुण्याचे फल भोगीत असतात. त्यातही बहुतेकांची ऐहिक पारत्रिक विषयभोगातच अधिक प्रवृत्ती असते. मनबुद्ध्यादिकाना तेच संस्कार असतात. म्हणून त्यांची धाव विषयापावेतोच जाते, विषयसंपादन हाच पुरुषार्थ होऊन बसतो. अशा बहिर्मुखतेमुळे हृदयस्थ सच्चितानंद भगवंताचे यथार्थ ज्ञानही नसते. म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती होत नाही. एखादाच सत्त्वसंपन्न विचारी पुरुष पूर्वसुकृताने परमार्थमार्गात प्रविष्ट होत असतो.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसर्‍याच्या संगतीमधे रहावे लागणे अनिवार्य आहे. संगत ही परमार्थाला मारकही असू शकते किंवा पोषकही असू शकते. ऐहिकतेकडे, सुखासीनतेकडे मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. दुर्गुण मनुष्य सहज उचलतो. पण सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक बाणवावे लागतात. मद्यप्राशन कसे करावे? हे शिकवण्याची शाळा कुठेही नाही, परंतु आज मद्यार्क निर्मिती हा सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा उद्योग आहे आणि तोही महाराष्ट्रासारख्या सतांच्या भूमीत, हा दैवदुर्विलास नव्हे काय?

श्रीसमर्थ मनोबोधात संगती कशी असावी याचे वर्णन करतात.

जयाचेनि संगे समाधान भंगे । 

अहंता अकस्मात येउनि लागे ॥ 

तये संगतीची जनीं कोण गोडी । 

जिये संगतीने मती राम सोडी ||४५||

ज्या संगतीमुळे मनुष्य रामापासून दूर जातो अशा संगतीची मनुष्याला स्वाभाविक ओढ असते. पण त्यामुळे मनाचे समाधान भंग पावते. मनुष्याचा जन्म होताच त्याची देहबुद्धि जागृत होते. देहबुद्धि नष्ट होणे हे परमार्थ प्राप्तीसाठी अत्यावश्यक असते. एक सुभाषित आहे.

सङ्ग: सर्वात्मना त्याज्य: स चेद्धातुं न शक्यते ।

स सद्भि: सह कर्तव्य: सन्त: सङ्गस्य भेषजम् ॥

सुभाषितकार म्हणतात की मुख्य म्हणजे संगत कुणाचीच करू नये. पण जर करायचीच असेल तर सज्जनांचीच संगत करावी. समाजात राहून पूर्ण नि:संग होणे कुणाही मनुष्यास शक्य नाही. समाजात सज्जन-दुर्जन, चांगली, धूर्त, लबाड, वाईट सर्वच प्रकारची माणसे असतात. या सर्वांची संगत पूर्णपणे टाळणे शक्य नाही, तरीही कोणाच्या संगतीत रहावे व कोणाच्या संगतीत राहू नये य़ाचे स्वातंत्र्य मनुष्याकडे नक्कीच आहे. तेव्हा मनुष्याने विवेकाने नास्तिक, लोभी, दुर्जन यांची संगत टाळावी व संतांचीच संगत धरावी.

संगतीचा विलक्षण परिणाम मनुष्यावर होत असतो. मनुष्याच्या हातात कोणी काठी दिली तर तो काठी कुणाला मारण्याचा प्रयत्न करेल पण काठीऐवजी त्या मनुष्याच्या हातात आपण जपमाळ दिली तर मात्र तो त्या माळेने नामजप करण्याची शक्यता जास्त. काठीच्या संगतीचा परिणाम वेगळा आणि जपमाळेच्या संग लाभला तर मनुष्याच्या वागण्यात किती फरक पडतो आणि जर साक्षात भगवंताचा म्हणजे त्याच्या नामाचा संग लाभला तर त्या मनुष्यात किती फरक पडेल. संतसंगतीमुळे मनुष्याच्या जीवनाचे सार्थक होते.

चोखंदळ वाचकांनी खालील मनाच्या श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।

परी अंतरी पाहिजे यत्न केले॥

सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।

धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥

*

मना सर्वही संग सोडुनि द्यावा।

अती आदरे सज्जनाचा धरावा॥

जयाचेनि संगे महादुःख भंगे।

जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥

*

मना संग हा सर्वसंगास तोडी।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥

मना संग हा साधका शीघ्र सोडी।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥

*

एकनाथी भागवतात कृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे, त्यात भगवंत म्हणतात,

“ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति कां न करिती । 

देवो म्हणे भाग्येंवीण माझी भक्ति । न घडे निश्चितीं उद्धवा ॥ 

कोटि जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गांठीं असेल आइती । 

तैं जोडे माझ्या संतांची संगती । सत्संगें भक्ती उल्हासे॥”

(संदर्भ:- एकनाथी भागवत अध्याय ११, १५४९, ५०)

पूर्वसुकृत उदयास आले तरच संतसंग लाभतो. ध्यानीमनी राम असेल तर आपल्या कामात सुध्दा राम दिसतो. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या पायाला कान लावला तर त्यातून रामनाम ऐकायला येई असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते.

माऊली म्हणतात की माझे अनंत जन्माचे पुण्य फळा आले म्हणून माझ्या मुखी नाम आले. साधकाने नाम घेताना हा भाव नित्य ध्यानी ठेवला तर नामाची गोडी खात्रीने चाखायला मिळेल असे वाटते.

लौकिक उदाहरण द्यावयाचे तर विजेचा प्रखर दाब जेथे साठविला गेला आहे त्या विद्युत घटाशी दुरून जरी स्पर्श झाला तरी ती वीज सर्वांगात क्षणात प्रविष्ट होते, तसे संत हे ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेम यानी कायावाचामनाने संपूर्ण व्यापून गेलेले असतात. तसेच सर्वानी याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा व आपले जीवन भगवन्मय बनवावे हीच त्याची धारणा व खटपट असते. याकरिता त्याच्या संगतीत कोणी कसा जरी आला तरी त्याचे गुण दोष याति न विचारिता, सर्व संत त्या व्यक्तीवर कृपा करीत असतात. कोणी कितीही अज्ञानी, दुष्ट, दुराचारी, पापी असला तरी त्याची ती पापशक्ती संतांच्या पापनाशक, तारक अशा करुणाशक्तीपुढे व्यर्थ होते म्हणून महत्संग ‘अमोघ’ आहे असे सूत्रात म्हटले आहे.

भक्तिसूत्र ४० – – 

लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥ ४० ॥

अर्थ : केवळ भगवंताच्या कृपेनेच सत्संग लाभतो.

विवेचन :  मागील सूत्रात महात्संग दुर्लभ आहे असे सांगितले आहे. दुर्लभ म्हणजे अशक्य नव्हे, अशक्याचा विचारच करावयाचा नसतो. दुर्लभ म्हणजे सामान्य प्रयत्नाने प्राप्त न होणारा. ज्याकरिता काही विशेष अधिकार, विशेष साधन अपेक्षित असते, तसा महत्संग दुर्लभ म्हणजे अगदीच न प्राप्त होणारा असा म्हणता येत नाही, तर त्याचे जे साधन या सूत्रात सांगितले आहे त्यानेच प्राप्त होणारा तो आहे. ते म्हणजे भगवत्कृपा.

जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत सद्‌गुरू प्राप्त होत नाही असे एक वचन आहे. भगवंताची कृपा कधी होईल याचा काहीही नेम नाही. ज्याप्रमाणे पाऊस कधी पडेल, याचा अंदाज हवामान खाते सांगू शकेल, पण अमक्या वेळी अमुक ठिकाणी पाऊस पडेलच असे सांगणे शक्य नाही. भगवंताच्या कृपेच्या बाबतीत सुद्धा आपण हेच समजू शकतो. आजपर्यंत अनेक संत होऊन गेले, त्यांनी विविध प्रकारे साधन केले आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण इथे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. पण त्यांची स्थिती अमुक अमुक होती म्हणून त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असे म्हणणे चुकीचे ठरू शकेल.

यावन्नानुग्रहस्साक्षाज्जायते परमात्मनः।

तावन्न सद्गुरुं कञ्चित्सच्छास्त्रमपि नो लभेत॥

पूज्य बाबा बेलसरे एका ठिकाणी म्हणतात. साधना करून काहीही साधत नाही. मग, साधना का करायची? साधना अशासाठी करायची की साधनाने साधत नाही हे कळण्यासाठी साधना करायची. शेवटी देवाची प्रार्थना करायची की देवा, मला शक्य ते मी सर्व केलेझ तरी तुझी प्राप्ती झाली नाही. आता तूच काहीतरी कर. असे केले तर मनात शरणागत भाव दृढ होऊ लागतो. ज्याक्षणी साधक संपूर्ण शरणागत होऊन देवाची आळवणी करतो, तेव्हा भगवंताला यावेच लागते…! द्रौपदीने काकुळतीला येऊन भगवंतांची प्रार्थना केली, भगवंत धावत आले. गजेंद्राने अशीच प्रार्थना केली, भगवंत त्याला वाचवायला आले.

संत तुकाराम महाराजांचे चरित्र सामान्य प्रापंचिक मनुष्यासाठी आदर्श आहे, असे श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. संत तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांना साक्षात्कार होण्या आधीचे जे अभंग आहेत, त्यात ते पांडुरंगाला विनवणी करतात की देवा मला सत्संग घडू दे. त्यात ते सत्संगाचा महिमा अधोरेखित करतात.

“तुम्ही संत मायबाप कृपावंत| काय मी पतित कीर्ती वाणू ||१|| अवतार तुम्हां धराया कारण उद्धरावे जन जडजीव ||२|| वाढवाया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे ||३|| तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन ||४||”

भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर एका अभंगात ते म्हणतात,

“आम्ही वैकुंठवासी| आलो याच कारणासी||बोलिले जे ऋषी| साच भावे वर्ताया ||”

या सूत्रात ‘लभ्यते’ हे क्रियापद सहेतुक वापरले आहे. म्हणजे यात ‘लाभ’ होणे हा अर्थ ध्वनित होतो. लाभ हे शब्द अनुकूल व प्रयोजनयुक्त वस्तूच्या प्राप्तीकडेच केला जातो. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग इथे देणे उचित होईल.

“दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥

आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥ 

उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥३॥ 

तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥”

– – सत्संगतीपेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभच नाही, असे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात.

साधकाच्या हातात आपली साधना नियमितपणे करावी आणि आपला शरणागत भाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. भगवंत कृपा केल्याशिवाय रहाणार नाही.

भगवत्कृपा व सत्संग याच्या प्राप्तीचा कार्यकारण संबंध सांगितला तो कसा सिद्ध होणार? याचे उत्तर पुढील सूत्रात दिले आहे.

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ३९ आणि ४०. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गांव… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गांव… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कोठे असेल ते गांव जिथे आहे पोचायचे

कशी गांवची त्या वाट जिच्यावरून जायचे

 *

कसे असेल ते गांव? भग्न? भकास? समृद्ध?

सप्तसूरांत भिजले? की ते असेल नि:शब्द?

 *

असतील का सोबती? का तो भयाण एकांत?

जीणे असेल का तृप्त? समाधानी आणि शांत?

 *

लळा इथला तरीही आहे हंगामी मुक्काम

जरी सुखवस्तू तरी आहे भाडोत्री हे धाम

असो कसेही ते गांव आणि गांवची त्या वाट

कधीतरी सोडावी ही लागणार वहिवाट

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथांचे पिता व वडील बंधूंचा वेद, उपनिषदांचा अभ्यास होता. त्यामधील संकल्पनांचा पुरस्कार (एकेश्वरवाद, अद्वैतवाद, निर्गुण उपासना) त्यांनी ब्राम्होसमाजाची जडणघडण होतांना केला कारण राजा राम मोहन रॉय यांच्याबरोबर रविंद्रनाथांच्या वडिलांनीच ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. वडिलांच्या निधनानंतर, रविंद्रनाथांचे वडील बंधू ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले.

रविंद्रनाथांचाही वेद व उपनिषदांचा अभ्यास होता व सुरवातीच्या काळात त्यांच्यावर ब्राम्हो समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रभावही होता. मात्र ब्राम्हो समाजाच्या विभाजनानंतर हा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. संत तुकारामांच्या अभंगांनी ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांच्या कांही अभंगांचे बंगाली भाषेत रूपांतर केलं. आणि आपल्याला चांगलच ठाऊक आहे की संत तुकाराम सगुणोपासक होते. यावरून असं सिद्ध होतं की टागोर सगुण उपासनेच्या विरोधात तरी नव्हते.

‘ऋग्वेदी’ या टोपणनावाने लेखन करणारे पु ल देशपांडेंचे आजोबा (आईचे वडील) श्री. वामन मंगेश दुभाषी यांनी रविंद्रनाथांच्या हयातीतच गीतांजलीचं अभंग रूपात भाषांतर केलेलं आहे. टागोरांनी ऋग्वेदींना पाठविलेल्या आपल्या संदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की ऋग्वेदींनी माझ्या कवितांचं यथार्थ भाषांतर करून माझे विचार मराठी वाचकांपर्यंत पोचविले आहेत. ऋग्वेदींनी तर आपल्या अभंगांत परमेश्वराला उद्देशून हरी, नारायणा, अनंता, विश्वनाथा म्हटलं आहे. कुठे त्याच्या मुरलीचा उल्लेख आहे तर कुठे त्याच्या भासमान सगुण रूपाचा संदर्भ आहे. पूजन, अर्चन यांचा उल्लेख तर अनेक ठिकाणी आहे. पूजाअर्चा तर सगुण रूपाचीच होते ना!

ऋग्वेदींच्या अभंग गीतांजलीत असे उल्लेख आहेत की परमेश्वर भक्तांना विविध रूपात भेटतो, तसेच तो विविध नावांनी ओळखला जातो. मात्र टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीत असे उल्लेख नाहीत कदाचित् मूळ बंगालीत ते असावेत. कारण ऋग्वेदींनी मूळ बंगाली व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील कवितांचा अभ्यास करून मग हे भाषांतर केले आहे. कदाचित भाषांतराच्या इंग्रजी भाषेच्या संस्कृतीच्या संदर्भात असे उल्लेख गैरलागू ठरले असते म्हणून ते इंग्रजी गीतांजलीत आले नसावेत. पण आपण सामान्य मराठी वाचक तर परमात्म्याला राम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध रूपातच ओळखतो व हीच रूपं आपल्याला जवळची, ओळखीची वाटतात. म्हणून आम्ही आमच्या भावानुवादात परमेश्वराच्या या रूपांचा संदर्भ जागोजागी वापरला आहे.

—–

☆ गीत : २२ ☆

In the deep shadows of rainy July, with secret steps, thou walkest, silent as night, eluding all watchers.

To-day the morning has closed its eyes, heedless of the insistent calls of the loud east wind, and a thick veil has been drawn over the ever – wakeful blue sky.

The woodlands have hushed their songs, and doors are all shut at every house. Thou art the solitary wayfarer in this deserted street. Oh my only friend, my best beloved, the gates are open in my house — do not pass by like a dream.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २२ ☆

*

आषाढातील संध्याकाळी

हळुच उतरते नीरव रजनी

वर्षा ऋतूतील रिमझिम वेळी

तव पदरव, मी अधीर नयनी॥

सजग निळ्या, आतुर आभाळी

पांघरुन शामल, मेघांची दुलई

अशा शांत, निद्रिस्त सकाळी

लगबग कसली ऐकू न येई॥

 *

सुस्तावलेले आसमंत सारे

परांत चोची पक्षी घालती

घर दरवाजे पण बंदच सारे

झाडे झुडपे गीत न गाती॥

 *

एकच तू मम सखा प्रियतम

फिरसी एकटा निर्जन वाटेवर

जाशील निसटुनी तू स्वप्नासम

म्हणुनि उघडले द्वार नि अंतर॥

 *

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत: २३ ☆

Art thou abroad on this stormy night on the journey of love, my friend? The sky groans like one in despair

It have no sleep to-night. Ever and again I open my door and look out on the darkness, my friend!

I can see nothing before me. I wonder where lies thy path!

By what dim shore of the ink-black river, by what far edge of the frowning forest, through what mazy depth of gloom art thou threading thy course to come to me, my friend?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २३ ☆

*

रात्र वादळी अन् अंधारी

उदास नभ हे कण्हत उरी

नीज न ये मज ऐशा काळी

नेत्र पाहती तुझी वाटुली॥

प्रेमरथावर स्वार होउनि

येशील वाटे अंधारातुनि

पाही राजसा मी दाराशी

येई उदासी, तू नच दिसशी॥

 *

कुठुनि? कशी? वाट कोणती?

काळोखाच्या नदी जवळ ती?

की उपवनीच्या फुलाफुलातून?

की दुःखाच्या चक्रव्यूहातून?

शोध शोधिले वाट दिसेना

तव भेटीची आस मिटेना

शोधी तू मार्गा, ये मजपाशी

सखया, लवकरी ये दाराशी॥

* 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : २४ ☆

If the day is done, if birds sing no more, if the wind has flagged tired, then draw the veil of darkness thick upon me, even as thou hast wrapt the earth with the coverlet of sleep and tenderly closed the petals of the drooping lotus at the dusk.

From the traveller, whose sack of provisions is empty

before the voyage is ended, whose garment is torn and dust-layden, whose strength is exhausted, remove shame and poverty, and renew his life like a flower under the cover of thy kindly night.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २४ ☆

*

जरी दिवस तो असेल सरला

पक्षी कोटरी असे परतला

वारा शिणुनी, दमुनी बसला

मिटल्या कमली, भृंग गुंतला

 *

निसर्ग निद्रेच्या अधीन झाला

दे अंधाराची गोधडी मजला

 *

संचित सरले, प्रवास उरला

धोतर फाटे, सदरा मळला

 *

प्राणांमध्ये त्राण न उरला

असा प्रवासी शरण तुजला

 *

प्रवाशाची त्या लाज राखण्या

दारिद्र्य तयाचे दूर करण्या

 *

पुनर्जन्म जणु त्याला देण्या

मिटली कमले पुन्हा उमलण्या

 *

येई लवकरी दीनानाथा,

अंगुलीवरी गिरीराज तोलण्या

*

– क्रमशः भाग आठवा 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई गं आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आई गं आई… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

आई गं आई 

एवढी का तुला घाई 

पावसात हात धरून चाललीस तरातरा 

मनी भूभू भिजतय बघ ना तू जरा ||

*

ज्ञानेश्वरांचे पसायदान तूच तर शिकवले 

भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे सांगितले 

मग मला या दोघांशी मैत्री करू दे 

माझ्या छत्रीत दोघांना घेऊ दे ||

*

आता नको म्हणू मस्तीखोर

अगं मीच तुझा ना चित्तचोर

बघ तू माझे मित्र आपल्या बरोबर राहतील

पसायदान ते पण शिकतील ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मकाऊ नगरी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मकाऊ नगरी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाले ऊन पावसाचा 

इथे क्षणोक्षणी खेळ,

छत्री घ्यावी कां न घ्यावी 

लागेना मनाचा मेळ!

*

दिसे मकाऊची सुंदरता 

उंच टॉवरवरून छानशी,

तीन बेटांचे वसले शहर

लगट करुन चीनशी!

*

डोळे दिपविणारी सारी

दिसे मकाऊ नगरी,

खिसे रिते करण्या इथे 

जमती जगातून जुगारी!

*

एका पेक्षा एक कॅसिनो 

मनं आकर्षित करतो,

“डायमंड शो” गॅलॅक्सिचा 

डोळ्याचे पारणे फेडतो!

*

करून रामराम मकाऊला 

परत माघारी वळणार,

रहाट गाडगे रोजचे

दोस्तीत सुरु होणार!

दोस्तीत सुरु होणार!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१५ ☆ कार्यशाळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१५ ?

☆ कार्यशाळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वेदनेने कार्यशाळा घेतली

अन् तरीही खूप होती गाजली

खोल जखमांचीच जागा ही तरी

दुर्बलांनी चाळ तेथे बांधली

जाहलेले तेजही नाही कमी

कुंदनाने खूप ज्वाळा सोसली

खंजिराचा दोष नव्हता फारसा

रक्तरंजित योजना तू आखली

वस्त्र नव्हते अंगभर त्यांच्याकडे

जीर्ण कपडा लाज त्याने झाकली

पेटला शेजार आहे अन् तरी

झोप आम्हाला कशी ही लागली

केस साधा कापतो आहे गळा

क्रूरतेने आज सीमा गाठली

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अदृश्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अदृश्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

दरड कोसळावा

काळीज घुसळावा

मनात उसळावा

ढासळ-ढासळ.

 *

रस्तेच जेरबंद

भावना  अंध-अंध

वेदना धुंद-धुंद

कातळ-कातळ.

 *

आभाळ अबाधीत

वादळ अच्छादित

क्षणात अवचित

अंधार-अंधार.

 *

पिसारे अस्त व्यस्त

जीवन फस्त-फस्त

आठव सुस्त-सुस्त

दुरावा-दुरावा.

 *

कातर चिंब-चिंब

व्याकुळ बिंब-बिंब

नजर टिंँब-टिंब

घायाळ-घायाळ.

 *

प्रेमात घाव-घाव

नितीचा डाव-डाव

ओशाळ भाव-भाव

अदृश्य-अदृश्य.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares